एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली सत्तावन वर्षे यशस्वीपणे राबविणारे मंडळ व संदप ग्रामस्थांकडून 'पत्रकार संजय कांबळे' यांचा गौरव !!
"जिल्हाधिकां-याकडून संकल्पनेची दखल"
कल्याण, (प्रतिनिधी) : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आदर्शवत अशी एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली सत्तावन वर्षे यशस्वी पणे राबविणारे कल्याण तालुक्यातील संदप गावातील ग्रामस्थ व गणपती मंडळाच्या वतीने पत्रकार संजय कांबळे यांचा आज गौरव करण्यात आला. यावेळी संवेदनशील व कर्तव्यनिष्ठ जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या गावाची दखल घेऊन तहसीलदार कल्याण यांना भेट द्यायला सांगून तात्काळ त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल असे आश्वासन दिले ; त्यामुळे मंडळ पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री कै. आर आर पाटील यांनी तंटामुक्ती मध्ये एक गाव एक गणपती ही अभिनव संकल्पना राबविण्याचे अवाहन केले होते. एकता आणि शांतता हा यामागील उद्देश होता. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बबन पाटील यांच्या प्रेरणेतून १९६६ पासून कल्याण तालुक्यातील संदप गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. ते आजपर्यंत म्हणजे ५७ वर्षे पुर्णत्वास येत असताना ते अत्यंत यशस्वीपणे राबवित आहेत.
कल्याण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आदर्शवत आणि इतर गावांना प्रेरणादायी ठरणाऱ्या संदप गावाच्या या कामाची दखल पोलीस किंवा महसूल प्रशासनाने घेऊ नये हे दुर्दैव म्हणावे की जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष ? या बाबतची उघडपणे नाराजी या मंडळाचे कार्याध्यक्ष अनंता पाटील यांनी बोलून दाखवली. त्यांच्या बरोबर इतर पदाधिकां-यांनी देखील याला दुजोरा दिला.
परंतु पत्रकार संजय कांबळे यांनी संदप गावाची एक गाव एक गणपती ही संकल्पना आपल्या विविध दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचवली, त्यामुळे एक गाव एक गणपती मंडळ संदप व ग्रामस्थांनी आज बाप्पा समोरच सभामंडपात त्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. याप्रंसगी मंडळाचे अध्यक्ष दशरथ बुवा पाटील, उपाध्यक्ष मधूकर पाटील, सरचिटणीस अभिमन्यू पाटील, कार्याध्यक्ष अनंता पाटील, खजिनदार राजेश पाटील, समाजसेवक गणेश पाटील, काशीनाथ पाटील, प्रविण पाटील, कर्षण पाटील, शालिक पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील, आण्णा पाटील, भालचंद्र पाटील, गोविंद पाटील, अजय पाटील, गोविंद पाटील, प्रशांत पाटील व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभामंडपातूनच ठाणे जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ व संवेदनशील जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्रकार संजय कांबळे यांनी संपर्क साधला तेव्हा आपण तात्काळ या मंडळाची दखल घेतली असून कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना या मंडळाला भेट द्यायला सांगून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल असे आश्वासन दिलं, त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.





No comments:
Post a Comment