Thursday, 7 April 2022

उठ कुणबी बांधवा जागा हो आणि समाजाचा धागा हो !!

उठ कुणबी बांधवा जागा हो आणि समाजाचा धागा हो !!
‐---------------------------------------------------------


उद्याचा उज्वल समृध्द आणि बलशाली कुणबी समाज घडविण्यासाठी कुणबी समाजातील बांधवांनी महिलांनी युवक युवतींनी आज पेटून उठले पाहिजे.

ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे वाक्य डोळ्यासमोर ठेऊन समाजातील तळागाळातील प्रत्येक बांधवांनी आपले घर नोकरी व इतर सर्व गोष्टी सांभाळून आज आपल्यासाठी नाही निदान येणाऱ्या पिढीसाठी तरी घराबाहेर पडले पाहिजे. त्याच बरोबर आपल्या समाजातील महिला वर्ग खूप खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आणि सक्षम बनल्या आहेत. त्यांनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता त्यांनी पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या समाजासाठी काम केले पाहिजे. आणखीन महत्त्वाचे म्हणजे समाजातील युवक व युवतींनी ही पाठीमागे न राहता समाजासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे.

आपल्या समाजाची एक शोकांतिका आहे की आपल्या न्याय हक्कांसाठी आपल्याला आंदोलने करावी लागत आहेत. समाजातील प्रत्येकाने बांधवांनी जर फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करत राहिलात तर समाज कितीतरी पटीने मागे राहील. आपल्या समाजातील काही बांधवांची खेकड्या सारखी वृत्ती झाली आहे.

आपल्यातील एखादा बांधव जर स्वतःच्या मेहनतीने जिद्दीने जर पुढे जात असेल तर त्याला आणखीन पुढे जाण्यासाठी हात न देता त्याचे पाय धरून पाठीमागे खेचतात. पाठीमागे जुन्या झाल्या गेल्या गोष्टी लक्षात न घेता पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या विचारणे आपण गरुड झेप घेतली पाहिजे. आजही समाजात कितीतरी आपले समाजबांधव आहेत ते आपल्या समाजासाठी अत्यंत तळमळीने काहीतरी करायची धडपड करत आहेत. तर आपण त्यांची ढाल बनुन त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने आनंद होत आहे की आपल्या समाजातील युवक व युवती क्रीडा,कला, सांस्कृतिक क्षेत्रासह एकत्र येताना दिसत आहेत त्यांनी केवळ या गोष्टीतीत च मर्यादित न राहता समाजकार्यात सक्रिय होऊन आपले स्वतःचे कर्तृत्व पणाला लावून स्वतःच्या नावासह आपल्या वाडीचे गावाचे व आपल्या समाजाचे ही देखील नाव रोशन केले पाहिजे.

मनुष्य जन्म हा माणसाला एकदाच मिळत असतो. हा मनुष्य जन्म म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेले एक वरदानच आहे. समाजात रोजच्या रोज हजारो च्या संख्येने माणसे जन्माला येतात व तेवढी रोज मरण ही पावतात. पण त्यातील काही मोजकीच लोक समाजात आपल्या कर्तृत्वाने आपलें नाव लौकिक करून समाजाचा निरोप घेऊन आपले नाव करून जातात. आपन पण असे सामान्य आयुष्य न जगता उरलेले आयुष्य जर सार्थकी करायचे असेल तर आपण समाजप्रवाहात उतरून आपल्या नावाला साजेसे कर्तृत्व दाखवून आपले नाव समाजात सिध्द करून दाखवलेच पाहिजे. तळागाळातील बांधवांसाठी समाज हा एक असा प्लॅटफॉर्म की तिथे कोणालाही काम करण्यापासून कोण अडवत नाही. आपल्या मनाची जर इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि समाजाची सेवा करण्याची मनाची संपूर्ण तयारी असेल तर येणाऱ्या काळात समाज तुम्हला तुमच्या कार्याची पोचपावती नकीच देणार यात तिळमात्र शंका नाही.
मी समाजासाठी समाज माझ्यासाठी ही वृत्ती जर समाजातील प्रत्येक बांधवांनी आत्मसात केली तर येणाऱ्या पुढील काळात समाजात खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्याशिवाय राहणार नाही.

*प्रत्येक क्षण समाजासाठी प्रत्येक सण विकासासाठी*
       शब्दांकन
श्री नितिन काशिनाथ शिगवण

प्रसिद्धी :- 
दिपक कारकर, मुंबई ; 📞 +91 99305 85153

No comments:

Post a Comment