Monday, 25 January 2021

ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण? पिण्याच्या पाण्यात टाकले औषध, मुरबाड तालुक्यातील घोरले गावातील प्रकार !!

ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण? पिण्याच्या पाण्यात टाकले औषध, मुरबाड तालुक्यातील घोरले गावातील प्रकार !!


कल्याण (संजय कांबळे) : गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल, या सत्तर ऐंशीच्या दशकातील मराठी सिनेमात राजकारणामुळे एका समृद्ध गावाची कशी वाट लागते हे अंत्यत मार्मिकपणे दाखवले आहे. नेमके असेच राजकारण मुरबाड तालुक्यातील घोरले गावात घडले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांच्या भागात जाणाऱ्या पाईपलाईन मध्ये "कॅनाल" नावाचे औषध टाकल्याचा आरोप गावातील सामाजिक कार्यकर्ते अंनता भोईर, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य संजय भोईर, अलका घायवट आणि कविता मुकणे यांनी केला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भोईर ग्रामस्थांनी केली आहे. तर घटनास्थळी, पोलिस, आरोग्य कर्मचारी, मुरबाड पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक पोहचले आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


मुरबाड तालुक्यातील घोरले हे गाव मुरबाडी नदीच्या काठावर वसलेले आहे. पोटगाव, बरडपाडा आणि घोरले अशी तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायती तयार झाली असून या गावांची लोकसंख्या सुमारे २ ते ३ हजाराच्या आसपास आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरचे पाणी १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाकीत जमाकरुन पाईपलाईन नळकनेक्शन द्वारे गावाला पुरवले जाते. घोरले गावात भोईर व चौधरी असे दोन मोठे गट आहेत.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भोईर गटाचे संजय दशरथ भोईर, श्रीमती अलका भगवान घायवट, आणि कविता ज्ञानेश्वर मुकणे असे तिन्ही उमेदवार निवडून आले तर तर चौधरी गटाचे उमेदवारांचा पराभव झाला. याहूनही महत्त्वाचे म्हणजे येथील एकमेव मागासवर्गीय उमेदवार श्रीमती अलका भगवान घायवट हे एकच घर असलेल्या सदस्याला उमेदवारी देऊ नये आपण निवडणूक बिनविरोध करू असेही या गटाचे म्हणणे होते. पण गेली ३०/४० वर्षे हे घर आमच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आमच्याशी एकनिष्ठ राहिले त्यामुळे आम्ही त्यांना सोडू शकत नाही अशी रास्त भूमिका भोईर गटाने घेतली व येथेच वादाला सुरुवात झाली. अखेर निवडणूका झाल्या व भोईर गटाचे पुर्ण पॅनेल निवडून आले. त्यामुळे गावातील वातावरण गरम होते.
अशा वेळी भोईर व चौधरी या दोन्ही भागाला वेगवेगळा पाणीपुरवठा होत असताना केवळ भोईरांच्या लाईनीला येणाऱ्या पाण्याचा उग्र वास येवू लागल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब गावातील ग्रामस्थांना व ग्रामपंचायत सदस्य यांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनी पाण्याची टाकी तपासली परतू त्या पाण्याला वास येत नव्हता. फक्त भोईरांच्या पाईपलाईन मध्ये कोणीतरी जाणूनबुजून औषध टाकल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना, मुरबाड पंचायत समितीच्या अधिकारी रमेश अवचार, यांना सांगितले. त्यानुसार गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी घोरले गावास भेट देऊन ग्रामसेवक केवणे, आरोग्य कर्मचारी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांनी पंचनामा करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर हा सर्व प्रकार  निवडणूकीच्या राजकारणातून कोणीतरी केल्याचा  गंभीर आरोप भोईर कंपनीने केला आहे. तर दोषींवर कडक कारवाई करुन त्अयांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्या कडे केली आहे. तर याबाबत येत्या एक दोन दिवसात घोरले गावातील दोन्ही गटाला बोलावून ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात येणार आहे असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांनी सांगितले. .
दरम्यान भोईर कंपनीने जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने मागासवर्गीय एक घर असताना त्यांना बिनविरोध सदस्य म्हणून निवडून दिले. तसेच आदिवासी समाजाला देखील प्रतिनिधित्व दिल्याने भोईर कंपनीचे मुरबाड तालुक्यातून कौतुक केले जाते आहे. 

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...