Wednesday, 13 May 2026

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

*श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान*

रत्नागिरी, प्रतिनिधी :
लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स, त्यानंतर सभा, सत्कार व  दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक व  महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर  यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देवून या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच  "हा छंद प्रियेचा" हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.लोकप्रिय दिग्दर्शक, प्रसाद धोपट व रणरागिणी ताराराणी  नाटक फेम,स्टार प्रवाह वरील 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेमधील 'पूजा' अभिनेत्री 'ज्योती निमसे आदीनी हा नाट्यप्रयोग सादर केला.न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचे भव्य पटांगणात हे कार्यक्रम पार पडले. यावेळी डॉ. मयुरेश मोहिते, अध्यक्ष स्वप्नील मोहिते, वैभव पवार, नितीन सावंत, सुरेश मोहिते, रमेश सावंत, गंगाराम पवार, महेश पवार, मुकेश पवार, सुदेश पवार, सुजित मोहिते, सुरज मोहिते, सागर मोहिते, रोहित मोहिते, सिद्धार्थ मोहिते सुधाकर मोहिते. योगेंद्र कल्याणकर, डॉ. विकी सावंत, श्रीमती ऋतुजा जाधव, राजेश जाधव, दीपक लिंगायत, उमेश रहाटे, अनिकेत सुर्वे, अरुण मोर्ये, सरपंच साजिद शेकासन, ओंकार शिर्के, अविनाश केदारी, राजेश जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Tuesday, 12 May 2026

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना युतीवरून शिवसेनेतच मतभेद?

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना युतीवरून शिवसेनेतच मतभेद?

** सुनील चौधरींच्या युती प्रस्तावाला राजेंद्र वाळेकरांचा विरोध

अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ शहरातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेला वेग आला असतानाच शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेनेचे सुनील चौधरी यांनी भाजपसोबत युतीचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा सुरू असताना, माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी या प्रस्तावाला उघड विरोध दर्शवला आहे.

सोमवारी सुनील चौधरी आणि काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसोबत युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. मात्र, या निर्णयावर पक्षातीलच काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

“नगरसेवकांना विश्वासात न घेता युतीचा प्रस्ताव पुढे करण्यात आला. पक्षातील पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही,” असा आरोप राजेंद्र वाळेकर यांनी केला आहे. त्यामुळे अंबरनाथ शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती संदर्भात मुंबई येथे वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील राजकीय रणनीती यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

युतीबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असले तरी अंबरनाथमधील स्थानिक पातळीवरील मतभेदांमुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे.

मात्र राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सदामामा पाटील व शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय आम्ही काहीही बोलणार नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गव्हाणफाट्याचा राडारोडा विंधणे जवळ फेकणार ; आसामच्या ठेकेदाराला कंत्राट; सिडकोचा प्रताप !!

गव्हाणफाट्याचा राडारोडा विंधणे जवळ फेकणार ; आसामच्या ठेकेदाराला कंत्राट; सिडकोचा प्रताप !!

सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी केलेल्या माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड.

उरण मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असलेल्या पनवेल तालुक्यातील गव्हाणफाटा ते उरण तालुक्यातील जासई येथील परिसरात जमिन विकसित करण्याचे कंत्राट सिडकोने चक्क आसामच्या एका कंपनीला दिले आहे. तो राडारोडा उचलून उरण तालुक्यातील विंधणे गावाजवळ फेकण्यात येणार असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.ही बाब सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघडकीस आणली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी विविध नागरी व पर्यावरण समस्या वर अनेकदा आवाज उठविला आहे. अनेक समस्या शासन दरबारी मांडले आहे.उरणचे सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी सिडकोकडे मागितलेल्या माहितीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उरण परिसरात अटल सेतू, अलिबाग कॉरिडोअर आणि तिसऱ्या मुंबईच्या अनुषंगाने विकास कामांना गती मिळत आहे. काही खासगी बिल्डरांनीसुद्धा इकडे जमिनी खरेदीसाठी मोर्चा वळविला आहे.जमिनीला जास्त किंमत असल्यामुळे नवी मुंबई विमानतळाशेजारी जमिनी खरेदी विक्रीला उधाण आले आहे.त्यातच सिडकोने गव्हाण फाटा ते जासई भागातील जमिनी विकसित करण्याचा सपाटा लावला आहे. मधल्या काळात मुंबईतील विविध भागांतून काढण्यात आलेला राडारोडा आणि इतर कचऱ्याचे ढीग गव्हाणफाटा, जासई शंकर मंदिर परिसरात रचण्यात आल्याने तेथे सिडको अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिले आहेत.

सिडको अधिकाऱ्यांच्या हफ्तेखोरीमुळे जमिनी विकसित करण्यावर आता कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहेत. मोठया मोठया उद्योगपतीचा डोळा उरण व उरणच्या आसपास च्या जमिनीवर आहे.त्यामुळे जमीन विकसित करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु आहे. त्यातच कंत्राट आसाम येथील भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती उरणचे सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी दिली आहे.यावरून सिडको अधिकाऱ्यांच्या बदमाशीचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे. हा संपूर्ण कचरा, राडारोडा सिडको हद्दीबाहेर टाकण्याचे ठरले असून त्यासाठी उरण तालुक्यातील पूर्व भागातील विंधणे गावाच्या परिसराची निवड केली आहे.त्यामुळे विंधणे आणि आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला सिडकोने शत्रू निर्माण केल्याची भावना पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या राडारोडा मुळे, कचऱ्या मुळे दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण मिळणार असल्याने उरणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे

मोहोने खडकपाडा दुर्गाडी बससेवा सुरू ; महिला व कामगार वर्गात समाधान !

मोहोने खडकपाडा दुर्गाडी बससेवा सुरू !!

** महिला व कामगार वर्गात समाधान

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने मोहोने – खडकपाडा – दुर्गाडी या नव्या बससेवेचा शुभारंभ मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता मोहोने गेट येथे महिला कामगार कार्यकर्त्यांच्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या बससेवेमुळे मोहोने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ वाचून पैसाही वाचणार आहे.

मोहोने टिटवाळा ब्लॉक  अध्यक्ष तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश विष्णु वाघमारे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राजेश वाघमारे हे परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून बैठका घेऊन त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला या कामी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ पातकर, आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला तसेच परिवहन विभागाने साथ दिल्याने बस सेवा सुरू होऊ शकली असे वाघमारे यांनी सांगितले.

या नव्या बससेवेचा लाभ विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच दुर्गाडी देवस्थान येथे जाणाऱ्या भाविकांना होणार आहे. खडकपाडा, आधारवाडी परिसरातील महिलांना शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये पोलीस स्टेशन रुक्मिणीबाई प्रसूती गृह कॉलेज खडकपाडा पोलीस ठाणे तसेच घरकाम करणाऱ्या महिला व सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्यांना या बस सेवेचा अधिक फायदा होणार आहे. तसेच आवश्यक सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. दुर्गाडी किल्ला व परिसर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही या बससेवेचा फायदा होणार आहे. असे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ पातकर यांनी सांगितले

विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा, महिलांसाठी सुरक्षित प्रवास तसेच नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचविणारी ही सेवा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोहोने परिसरातील सर्व नागरिकांनी

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 
ज्येष्ठ काँग्रेस नेते मामा पगारे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दशरथ पाटील, माजी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विष्णु वाघमारे, मोहोने ग्रामस्थ मंडळ प्रमुख सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुरेश सोनार, विजय परियार, नाना भालेराव, संध्या ठोसर, काँग्रेसचे एस.सी सेलचे जिल्हाध्यक्ष अँड. अजिंक्य साळवे, नागेश भोईर, हरिश्चंद्र पाटील, अशोक काळपुंड, राजेश दीक्षित, वेंकटेशन, अशपाक शेख, बाळा बर्वे, विवेक घोडके, अजय रामचंद्रन, धर्मांना मेडी, उर्मिला भोईर, अश्विनी वाघमारे, सुजाता वाघमारे, दर्शना पानपाटील, मेहनाज शहा, वर्षा माने, रंजना उपदेशे, निर्मला गोडबोले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश कोनकर, रमेश रोकडे, पांडुरंग वाघमारे, विजय बोरे, रोहिदास भालेराव आरपीआय पक्षाचे रमेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते रमेश नंबियार, बौद्धाचार्य गौतम मोरे, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तम शेंडगे व इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व मोहोने शहरातील नागरिक उपस्थित होते.

खडवलीत वारंवार वीज पुरवठा खंडित प्रकरणी शंभूदुर्ग संघटनेचा मोर्चा !!

खडवलीत वारंवार वीज पुरवठा खंडित प्रकरणी शंभूदुर्ग संघटनेचा मोर्चा !!

कल्याण, संदीप शेंडगे : गेल्या अनेक दिवसांपासून खडवली व आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून महावितरणाचा भोंगळ कारभार सुरू आहे. परिसरातील नागरिक सतत त्रस्त झाले आहेत. याची दखल घेऊन शंभूदुर्ग संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान महावितरण अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

शंभूदुर्ग संघटनेचे महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा सागर मोरे, राज्य संघटक संजय पाटील व महिला अध्यक्षा जयवंती लोणे, उपजिल्हा अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा खडवली महावितरण कार्यालयावर काढण्यात आला होता.

खडवली विभागाचे महावितरणाचे कनिष्ठ अभियंता योगेश चेंदवनकर यांना निवेदन देण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करणे, जुना व नादुरुस्त तारा लाईन टाकणे, विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर देताना योग्य जागेची पाहणी करणे, जुने मीटर बदलून नवीन मीटर देणे, तसेच परिसरातील अनेक तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

यावेळी शंभूदुर्ग संघटनेच्या महिला तालुका अध्यक्षा जयवंती लोणे यांनी सांगितले की, खडवली परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लहान मुलांचे शिक्षण, व्यापारी वर्ग तसेच रुग्णालयीन सेवा यावर परिणाम होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरणाचे कनिष्ठ अभियंता योगेश चेंदवनकर यांनी सांगितले की, आज सकाळी लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून पुढील काळात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम प्रस्तावित आहे. तसेच विजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

यावेळी शंभूदुर्ग संघटनेचे कल्याण तालुका उपाध्यक्ष व माजी सरपंच चेतन शेलार, उद्योजक सदाशिव मोरे, संघटनेचे आरोग्य विभागाचे जिल्हाध्यक्ष संदेश लोणे, सचिव रुपेश खंडागळे, देवा सोनावले, अक्षय ठिगळे, वैभव मोरे, खडवली रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ मोरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण मोरे, कुणाल दलाल, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश मोरे, सचिन सावंत, भोला सिंग, ऋतिक पाटील, वासुदेव शेलार यांच्यासह खडवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, 10 May 2026

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

          सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धनाजी कराडे यांच्या 'युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' या कवितासंग्रहाचे आज  सातारा येथे 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनामध्ये संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर आयु. संभाजी भगत यांच्या हस्ते उद्घाटन सत्रात प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मशाल प्रज्वलित करून   'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी केले. 
       यावेळी संमेलनाचे उद्घाटक ह. भ. प सुहास फडतरे, संमेलनाध्यक्ष लोकशाहीर आयु. संभाजी भगत, संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोनाझरीया मिंझ, स्वागतातध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर, कॉम्रेड धनाजी गुरव, 'युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' या कविता संग्रहाचे कवी धनाजी कराडे, वडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा स्वाती कराडे, डॉ. संतोष भोसले डॉ. किरण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत 'युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' या कविता संग्रहाचे प्रकाशन समारंभ पार पडला.

वृत्तांकन - विलासराव कोळेकर सर 

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

पेण (पंकजकुमार पाटील) : 
पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ताहिक 'रायगडची शान' चे संपादक सुरेश सीताराम म्हात्रे यांचे दिनांक ७ मे रोजी हृदय विकाराच्या झटक्याने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी (पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पेण तालुका सचिव) अवंतिका म्हात्रे, दोन मुली एक मुलगा व इतर नातलग  असा परिवार आहे.

" *शब्दांची लेखणी विसावली, विचारांचा सूर्य मावळला...* 

सुरेश म्हात्रे यांची एक निर्भीड पत्रकार, सच्चा विचारवंत अशी ओळख होती. त्यांनी आपल्या लेखणीतून  केवल  बातम्या लिहिल्या नाहीत, तर समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. समाजातील  अन्यायाविरुद्ध त्यांची लेखणी तलवारीपेक्षा धारदार होती. जनतेच्या समस्या  शासन -प्रशासन दरबारी पोहचवून प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचा त्यांचा  प्रामाणिक प्रयत्न राहिला. सत्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांच्या वेदनेला वाचा फोडणारा तो आवाज आज कायमचा शांत झाला आहे. 

🙏🙏 त्यांचा  उत्तरकार्य विधी-  दशक्रिया विधी शनिवार दि. १६ मे  रोजी उद्धर -पाली  येथे होईल. तर तेरावा विधी मंगळवार दि. १९ मे  रोजी राहत्या घरी गडब, काराव पेण येथे होईल असे त्यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !! *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव...