Tuesday, 12 May 2026

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना युतीवरून शिवसेनेतच मतभेद?

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना युतीवरून शिवसेनेतच मतभेद?

** सुनील चौधरींच्या युती प्रस्तावाला राजेंद्र वाळेकरांचा विरोध

अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ शहरातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेला वेग आला असतानाच शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेनेचे सुनील चौधरी यांनी भाजपसोबत युतीचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा सुरू असताना, माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी या प्रस्तावाला उघड विरोध दर्शवला आहे.

सोमवारी सुनील चौधरी आणि काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसोबत युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. मात्र, या निर्णयावर पक्षातीलच काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

“नगरसेवकांना विश्वासात न घेता युतीचा प्रस्ताव पुढे करण्यात आला. पक्षातील पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही,” असा आरोप राजेंद्र वाळेकर यांनी केला आहे. त्यामुळे अंबरनाथ शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती संदर्भात मुंबई येथे वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील राजकीय रणनीती यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

युतीबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असले तरी अंबरनाथमधील स्थानिक पातळीवरील मतभेदांमुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे.

मात्र राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सदामामा पाटील व शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय आम्ही काहीही बोलणार नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...