Tuesday, 20 July 2021

शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विठुराया चरणी घातले साकडे.!

शासकीय पूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  विठुराया चरणी घातले साकडे.!


अरुण पाटील, भिवंडी,( कोपर ) दिं.20 :
             आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी कोरोनाचं संकट नष्ट होऊ दे असं साकडे घातलं आहे.पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातलं.
          पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पाहायचं आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.
        महापुजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.यापूर्वी पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयक आढावा घेतला. सुमारे साडेसहा तास गाडी चालवत मुंबईहून पंढरपुरात आले. सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास त्यांचे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोरोनाविषयक आढावा घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
               तसंच कोरोना प्रादुर्भावात आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
             या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. प्रशासन, आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. जिल्ह्यात टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या. नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या.पुढे त्यांनी सांगितलं की, ऑगस्ट, सप्टेंबरपासून लसीचा पुरवठा सुरळीत होईल. ऑक्सिजनची उपलब्धता आणि लागणारी गरज याचे योग्य नियोजन करा. ऑक्सिजनचा अधिक साठा करण्यावर भर द्यावा. अर्थचक्र थांबू नये म्हणून कोरोनाचे नियम पाळून उद्योग-धंदे सुरू आहेत. कामगारांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच खासगी दवाखान्यातून लस घेण्यास परवानगी दिली असल्याने उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा असेही ते पुढे म्हणाले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...