मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यानची ५ वी आणि ६ वी मार्गिकेचे काम पुर्ण !! "रेल्वेचा प्रवास होणार वेगवान"
कल्याण, बातमीदार : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यानची ५ वी आणि ६ वी मार्गिका आजपासून सुरू झाली आहे. त्यामुळे कुर्ला ते कल्याण दरम्यान मेल, एक्सप्रेस आणि माल गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग उपलब्ध झाला आहे.मध्य रेल्वेवर उपनगरी आणि मेल, एक्सप्रेससाठी वेगळ्या मार्गिका नसल्यामुळे त्याचा ताण रेल्वे मार्गावर येत होता. याचा फटका उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही बसत होता. त्यामुळे मध्य रेल्वेने कुर्ला ते कल्याण दरम्यान नव्या दोन रेल्वे मार्गिकांचे काम हाती घेतले होते. त्यातील ठाणे-दिवा दरम्यानच्या टप्प्यातील काम रखडल्यामुळे हे नवीन रेल्वेमार्ग पूर्ण सुरू झाले नव्हते. मात्र या पाचव्या आणि सहाव्या नव्या रेल्वे मार्गिकांसाठी रेल्वेने घेतलेल्या ७२ तासांच्या ब्लॉकचे काम सोमवारी मध्यरात्री संपले. त्यामुळे आता या नव्या मालिका आजपासून सुरू झाल्या. यामुळे मेल, एक्सप्रेस व मालगाड्या कुर्ला ते कल्याण दरम्यान थेट धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना वेगळी मार्गिका मिळाल्यामुळे लोकलच्या फेऱ्या आणि नवे वेळापत्रक तयार करण्याचा मध्य रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा फायदा उपनगरी प्रवाशांनाही होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेने पाचव्या आणि सहाव्या नव्या मार्गिका तयार केल्या आहेत. यामुळे रेल्वेचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
जाहिरात :-


No comments:
Post a Comment