Tuesday, 14 April 2026

उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर पाच पर्यटकांची मृत्यूशी झुंज !!

उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर पाच पर्यटकांची मृत्यूशी झुंज !!

** सागर सुरक्षा रक्षकांमुळे टळला मोठा अनर्थ! 

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला पिरवाडी किनारा पुन्हा एकदा एका थरारक घटनेमुळे चर्चेत आला आहे. सोमवारी संध्याकाळी समुद्रात फिरायला गेलेले पाच पर्यटक भरतीमुळे खडकांमध्ये अडकले होते. मात्र, सागर सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या पाचही जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
     सोमवारी संध्याकाळी काही पर्यटक उत्साहाच्या भरात किनाऱ्यापासून लांब असलेल्या खडकांवर गेले होते. यावेळी समुद्राला भरती आल्याने पाण्याचा वेढा वाढला आणि हे पर्यटक मध्येच अडकून पडले. जीवाची भीती निर्माण झाल्याने पर्यटकांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. यावेळी तिथे तैनात असलेल्या सागर सुरक्षा रक्षकांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने धाव घेतली आणि पाचही पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

      पिरवाडी किनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे खाण्यापिण्याची आणि मनोरंजनाची उत्तम सोय असली, तरी प्रशासकीय उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. किनाऱ्यावर कुठेही धोक्याच्या सूचना देणारे फलक नसल्याने नवीन येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा आणि खडकांचा अंदाज येत नाही. अनेकदा उत्साहाच्या भरात पर्यटक खोल पाण्यात किंवा खडकांवर जातात आणि आपला जीव धोक्यात घालतात.

      पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटकांना योग्य दिशा मिळावी आणि असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठिकठिकाणी माहिती फलक आणि इशारा देणारे बोर्ड लावावेत, अशी मागणी स्थानिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे. सोमवारी झालेल्या या घटनेत केवळ सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...