येत्या पावसाळ्यात साथीच्या प्रार्दुभावाची शक्यता लक्षात घेता कल्याण डोंबिवली परिसरात स्वच्छता व निरोगी वातावरण राहण्यासाठी आज पासून विशेष स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ - *महापालिका उपायुक्त अतुल पाटील*
कल्याण, नारायण सुरोशी : येत्या पावसाळ्यात साथीच्या प्रार्दुभावाची शक्यता लक्षात घेता कल्याण डोंबिवली परिसरात स्वच्छता व निरोगी वातावरण राहण्यासाठी "महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे" यांच्या निर्देशानुसार आजपासून विशेष स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला असून या मोहिमेमध्ये साथरोग नियंत्रणासाठी,जंतुनाशक फवारणी व धुरावणी देखील सर्वत्र केली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी आज महापालिका मुख्यालय परिसरात या मोहिमेचा शुभारंभ करताना दिली. यासमयी कल्याण विभागाचे उप मुख्य स्वच्छता अधिकारी ए.एल.घुटे, डोंबिवली विभागाचे स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता अधिकारी मोहनीश गडे, अविनाश मांजरेकर, संजय धात्रक, योगेश जगताप, संदिप खिस्तमराव, मोहन दिघे, सुरेश सोळंके, राजेंद्र खैरे यांचेसह महापालिकेच्या फवारणी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
राज्यात जुन ते सप्टेंबर ह्या पावसाळयाच्या कालावधीमध्ये विविध परिसरामध्ये पाणी साचून मोठया प्रमाणात डासोत्पत्ती होत असल्याचे दिसून येते. यामध्ये डेंगी, मलेरीया व इतर किटकजन्य आजारांचा फैलाव करणा-या डासांचा समावेश असतो. तसेच पावसाळ्यामध्ये पाण्याबरोबर कचरा देखील जमा होवून माशांचा प्रार्दुभाव देखील होत असतो. परिणामी किटकजन्य आजार व साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता असते.
यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात किटकजन्य आजार व साथीच्या रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्याच्या हेतुने महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सर्व प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणी व धुरावणी बाबत नियोजन करण्यात आलेले असून याकरीता नियोजनबध्द कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर दिवशी प्रत्येक प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील ०१ निवडणूक प्रभाग याप्रमाणे एकूण १० निवडणूक प्रभागांमध्ये दररोज जंतुनाशक व धुरावणी मोहिम राबविण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत १० मल्टीजेट हायप्रेशर मशीन, १२२ हँण्ड पंप, ०३ जीप वाहने व कर्मचारी वर्ग यांच्या सहाय्याने सदर मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत महापालिकेमार्फत जंतुनाशक फवारणी व धुरावणी बरोबरच डासोत्पत्तीची स्थाने नष्ट करण्यात येणार आहेत तसेच वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सुचना प्राप्त झालेल्या रुग्णांच्या परिसरामध्ये युध्दपातळीवर जंतुनाशक व धुरावणीची कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर मोहिमेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात किटकजन्य आजार व साथरोग आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या घराच्या पसिसरामध्ये जेथे पावसाचे पाणी साठण्याची शक्यता आहे, अशा भागात उचीत कार्यवाहीकरीता त्वरीत आपल्या जवळच्या प्रभागक्षेत्र कार्यालयात संपर्क साधावा. तसेच दर आठवड्यातील एक दिवस घरातील सर्व पाण्याची भांडी स्वच्छ करुन, पुसुन कोरडी करुन एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा.
No comments:
Post a Comment