कल्याण शीळ रस्त्यावरील काटई टोल नाका बंद करा : मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी !
कल्याण - कल्याण शीळ रस्त्याचे सुरू असलेले काम आणि निळजे येथील नवीन पुलाचे बांधकाम होईपर्यंत काटई येथील टोल नाका बंद करण्यात यावा अशी मागणी मनसे चे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कल्याण-शीळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका आहे. सदर टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो.सध्या कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू असून, बहुतांश ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. रस्ता पूर्णपणे खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सह इतरही प्रवाशांना कल्याण शीळ रस्त्यावरून प्रवास करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
या रस्त्यावर वाढलेली वाहनांची संख्या व काम सुरू असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी असते, वास्तविक रस्त्याचे काम सुरू असे पर्यंत हा टोल नाका बंद करून टोल वसूल करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा काढून टाकावी अशी मागणी ठाणे जिल्हा नियोजन समितीमध्ये केली होती. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही असेही आमदार पाटील यांनी निदर्शनास आणले आहे.

No comments:
Post a Comment