कल्याण तालुक्यातील ऐक्केचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, वरप अनुचित जाती महिला, बेहरे खोणी सर्वसाधारण महिला तर म्हारळ नागरिकांचा मागास प्रवर्ग ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज काढण्यात आली. यामध्ये वरप ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासूनच पहिल्यांदाच ग्रामपंचायतीवर मागासवर्गीय महिला सरपंच पदाचे आरक्षण पडले असून तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या बेहरे आणि खोणी ग्रामपंचायतीवर खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर दुसऱ्या मोठ्या व श्रीमंत असलेली म्हारळ ग्रामपंचायत ही नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव पडल्याने येथे सरपंच पदाची चुरस निर्माण होणार आहे.
कल्याण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या २१ ग्रामपंचायतीचे व उर्वरित २० ग्रामपंचायतीसाठी असे एकूण ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात लहान मुलगा पार्थ चौगले याच्या हस्ते काढण्यात आले. यामध्ये नुकत्याच निवडणूका झालेल्या आपटी मांजर्ली, रायते पिंपळोली, नवगाव बापसई, गोवेली रेवती, निंबवली मोस, म्हारळ, वरप, कांबा, जांभूळ मोहिली, आणे भिसोळ, खोणी वडवली, वडवली शिरढोण, बेहरे, नडगाव दांनबाव, घोटसई, सांगोडा कोंढेरी, म्हसकळ अनखर, मानवली, उतणे चिंचवली, गुरवली आणि राया ओझल्री आदी ग्रामपंचायतीचा समावेश होता.
परंतु आज सरपंच पदाचे आरक्षणासाठी उर्वरित २० ग्रामपंचायतीचेहीआरक्षण काढण्यात आले. ही सोडत काढताना मागील १५ वर्षांतील म्हणजे २००५, २०१०, व २०१५ यावेळी काय आरक्षण होते याचा विचार करून ही सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रथम अनुचित जाती /मागासवर्गीय साठी तीन जागा राखीव ठेवण्यात आल्या, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता ११ तर सर्वसाधारण (खुला) १२ जागा आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने वरप आणि निंबवली मोस या ग्रामपंचायती मागासवर्गीय महिला साठी आरक्षित झाल्या तर गोवेली रेवती अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी राखीव ठेवण्यात आली. त्यानंतर अनुसूचित जमाती महिला म्हसकळ अनखर तसेत कांबा, चौरे या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी ११ ग्रामपंचायती पैकी ५ महिलासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये आपटी मांजर्ली, फळेगाव, रायते, रुंदा आंबिवली, आणि नडगाव दांनबाव याचा समावेश आहे उर्वरित म्हारळ, गेरसे, आणे भिसोळ, आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
सर्वांचेच लक्ष लागलेल्या सर्वसाधारण (खुला) गटातील २४ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला साठी राखीव ठेवण्यात येवून याचे आरक्षण काढण्यात आले. बापसई नवगाव, बेहरे, पोई, खोणी वढवली, उशीद, वासुद्री, पळसोली, रोहन अंताडे, सांगोडा, उतणे चिंचवली, मानिवली व वडवली शिरढोण या १२ ग्रामपंचायतीचां समावेश आहे. उर्वरित दहिवली, गुरवली, वसत शेलवली, काकडपाडा, दहागाव, वाहोली, रुदे आंबिवली, नांदप, मामणोली, कोसले, केळणी कोलम आणि जांभूळ या ग्रामपंचायती अराखीव ठेवण्यात आल्या.
"पहिल्यांदा आणि चुरस";
आज झालेल्या कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत वरप ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर या ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच एक मागासवर्गीय महिला सरपंच म्हणून बसणार आहे. त्यामुळे या समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तर तालुक्यातील सर्वात मोठ्या व श्रीमंत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव झाल्याने व येथे कोणालाही बहुमत नसल्याने याठिकाणी खरेदी विक्री, कोलांट्या उड्या, पळवा पळवी, आदी सर्व प्रकारचे लोक मनोरंजन होणार आहे. तर बेहरे, खोणी, वडवली शिरढोण येथील सरपंच पद खुला महिलांसाठी राखीव असल्याने येथे असे काहीसे प्रकार घडू शकतात. त्यामुळे हे रामायण व महाभारत येत्या ८ व १० फेब्रुवारी पर्यंत पाह्यला मिळणार आहे.
आजच्या या सरपंच आरक्षण सोडतीकरीता कल्याण तहसीलदार दिपक आकडे, नायब तहसीलदार संजय भालेराव, लिपिक सुनील कोलते पाटील, खेत्रे, तलाठी सुर्यवंशी आदी उपस्थित होते. तसेच सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment