राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या !
मुंबई, बातमीदार : राज्यातील सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणावरुन निर्माण झालेला पेच, राज्यभर मुसळधार असलेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पुरस्थिती या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो आहे.राज्यातील सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार ३० सप्टेंबर पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी या निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार होते. स्थानिक राजकारणामध्ये या निवडणुकांना अधिक महत्त्व असते.
सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण या मुद्द्यांवरुन ही निवडणूक लांबणीवर टाकण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर राजकीय पक्षांनी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. या विनंतीनंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा केली.


No comments:
Post a Comment