औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. ०३ :
राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्याकारणाने महानगर पालिकेच्या कामकाजावर प्रशासनाचे लक्ष नसून अनेक विकासकामे लांबणीवर पडलेली आहेत. याच अनुषंगाने डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी औरंगाबाद महानगर पालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या विकास कामाचा आढावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला. या मध्ये मनपा क्षेत्रातील विकास व प्रलंबित कामांची त्यांनी माहिती घेतली. त्याबरोबरच मनपा व स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सर्व खातेप्रमुखांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली.
यामध्ये प्रामुख्याने स्मार्ट सिटी अंतर्गत मंजुर झालेले शहरातील रस्ते, शहरातील पथदिवे, शहर स्मार्ट बस, शहरातील कर वसुली, शहरातील गुंठेवारीचा प्रश्न, एमजेपी तर्फे राबविण्यात आलेले पेयजल योजना, शहरातील मलनिस्सारण व्यवस्था, मा. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, मिटमिटा येथील सफारी पार्क, बीओटी तत्वावर मनपाच्या दिलेल्या जागा, हॉकर्स झोन, शहरातील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण, केंद्र व राज्य यांच्याकडे प्रलंबीत अनुदाने व योजना, खाम नदी ब्युटीफिकेशन, बहुमजली पार्किंग कचरा प्रक्रीया प्रकल्प आदी विषयांवर चर्चा करुन योग्य त्या मार्गदर्शक सूचनाही केल्या.
यावेळी मनपा आयुक्त अजय चौधरी,महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर,
शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विधानसभा संघटक राजु वैद्य, जिल्हा संघटिका प्रतिभा ताई जगताप यांच्या समवेत संबंधित विभागांचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment