Friday, 13 March 2026

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!


उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष.

** वारंवार होत असलेल्या चिट फंड घोट्याळा मुळे नागरिक हैराण ; उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात नागरिकांची अनेकदा चिट फंड घोटाळे अर्थात आर्थिक फसवणूक झाले आहेत.तरीही उरण मधील नागरिक या घटनेतून बोध घेताना दिसून येत नाही. अनेक वेगवेगळे चिट फंड चे उदाहरण ताजे असतानाच उरण तालुक्यातील सारडे गावात पैसे डबल करण्याच्या नादातून नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. उरण मध्ये अनेक चिट फंड घोटाळा नंतर आता उरण तालुक्यातील सारडे गावातील आर्थिक फसवणूकीचा चिट फंड घोटाळा बाहेर आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक प्रश्नाचा विषय पुन्हा एकदा ऐरणी वर आला आहे.


उरणमधील सारडे गावामध्ये आणखी एक चिटफंड घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यातील आरोपींनी जादा परताव्याचे आमिष दाखवून १७ गुंतवणूकदारांकडून तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक करून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या प्रकरणातील एकाच कुटुंबातील तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल त्यांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण पाटील (४६), विनायक पाटील (४३) आणि कमिक्षा पाटील (३७) हे तिघेही सारडे गावातील रहिवासी असून त्यांनी वर्षभरापूर्वी चिटफंड नावाची एक गुंतवणूक योजना सुरू केली होती. या योजनेत गुंतवणूक केल्यास अवघ्या १५ दिवसांत भरघोस परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी ग्रामस्थांना दाखवले होते. तसेच एका आयडीसाठी ११,००० रुपये गुंतवल्यास १५ दिवसांनंतर १९,००० रुपये परतावा दिला जाईल, असा विश्वास त्यांनी गुंतवणूकदारांना दिला होता. आरोपींनी सुरुवातीला काही लोकांना परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गावातील अनेक लोकांकडून मोठी रक्कम गोळा केली.या प्रकरणातील एका तक्रारदाराने चिटफंडमध्ये २६ लाख ७ हजार रुपये (२३७ आयडी) गुंतवले होते. त्यांच्याप्रमाणेच गावातील इतर १७ प्रमुख गुंतवणूकदारांसह अनेक लोकांनी या चिटफंड योजनेमध्ये एकूण २७६९ आयडी मिळून ३ कोटी ३० लाख ६६ हजार रुपये गुंतवले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही गुंतवणूक केलेली मुद्दल किंवा परतावा न देता आरोपींनी या रकमेचा अपहार केला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांची मागणी करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपींनी आपल्या घराला कुलूप लावून आपल्या नातेवाईकांसह गावातून पळ काढला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने अखेर फसवणूक झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.उरण मध्ये अशा आर्थिक फसवणूकीच्या, पैसे डबल करण्याच्या व त्यातून आर्थिक फसवणूकीच्या घटना वारंवार घडत असून नागरिक यातून कोणताही बोध घेत नसल्याने खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध शासकीय यंत्रणानी एकत्र येत जनजागृती करण्याची गरज आता निर्माण झाली आहे

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...