ठाणे जिल्ह्यात तुर्तास पाणी कपात नाही !!
बदलापूर : मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी ठाणे जिल्ह्य़ात मात्र अद्याप पाणीकपातीबाबत कोणताही विचार नसल्याचे संबंधित विभागांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ात पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी, भातसा, आंध्र धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी असतानाही संबंधित प्रशासनाने कपातीबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
यंदा ठाणे जिल्ह्य़ातील धरणक्षेत्रात फारसा पाऊस झालेला नसून यामुळे धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरू शकलेली नाहीत. जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी यांसारख्या महापालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर यांसारख्या नगरपालिकांना आंध्र, भातसा आणि एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या तिन्ही धरणांत सरासरी ४० टक्के पाणीसाठा असून पावसाने दडी मारल्यास भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्याचे पावसाचे प्रमाण आणि भविष्यातील टंचाईची चाहूल लागताच मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा असूनही अद्याप कोणत्याही प्रकारची कपात लागू केली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

No comments:
Post a Comment