Thursday, 8 April 2021

वरपगावची शान, कुस्तीची जान पै, रवी भोईर काळाच्या पडद्याआड! गावावर शोककळा?

वरपगावची शान, कुस्तीची जान पै, रवी भोईर काळाच्या पडद्याआड! गावावर शोककळा? 


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्रातील समस्त कुस्तीगीरांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूरच्या खासबाग तालीमची प्रेरणा घेऊन आपल्या छोट्याश्या गावात घरोघरी पैलवान निर्माण झाले पाहिजे ही इच्छा उराशी बाळगून तशी कृती करणारे वरपगावची शान आणि कुस्तीची जान अशी ज्यांनी ओळख निर्माण केली आहे ते 'वस्ताद' पै रवी भोईर आज काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


कल्याण तालुक्यातील वरपगाव हे बहुसंख्य आगरी लोकवस्तीचे गाव, हाणामा-या, मारामाऱ्या, पोलिस केसेस, यामुळे हे गाव काहीसे बदनाम झाले होते. कल्याण पासून ते अगदी माळशेज घाट पर्यंत कोणी ही या गावाच्या नादी लागत नसे, तशी वचक, दरारा या गावाचा होता. परंतु हे गावातील पै रवी बाळाराम भोईर यांना मान्य नव्हते. आपल्या तरुण पिढी ने मजबूत शरीरयष्टी कमाऊन कुस्तीमध्ये गावाचे नाव चमकावावे असे वाटत होते. स्वत अनेक गावोगावी यात्रांमध्ये पै रवी भोईर यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांना सगळे वस्ताद, म्हणायचे
एन आर सी कंपनीमध्ये ते कामगार म्हणून काम करीत असताना कंपनी बंद पडली. त्यामुळे त्यांनी पुर्णवेळ कुस्तीपटू घडविण्यात वेळ दिला. गावातील मुलांना हक्काची तालीम असावी म्हणून त्यांनी आईच्या नावाने तालीम बांधली व त्याचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते पै चैनू लोंखडे यांच्या हस्ते केले. कुस्तीच्या बदललेल्या ट्रेड मुळे आपल्या मुलांनी मॅटवर खेळावे व त्यासाठी मॅट आवश्यक आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. अशी त्यांची इच्छा होती. पै रवी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा मुलगा सोमनाथ सह अनेक पैलवांनी कुस्ती मध्ये वरपगावचे नाव राज्य पातळीवर चमकविले आहे.
काही दिवसापूर्वी त्याच्या मुलीचा साखरपुडा झाला होता. तर लग्न १०/१५ दिवसावर येऊन ठेपले असताना काळाने घाला घातला. लाल मातीत कुस्तीच्या अनेक 'डावानी' भल्याभल्यांना चितपट करणारे पै रवी भोईर आयुष्याच्या मैदानात मात्र मृत्यूला आस्मान दाखवू शकले नाहीत. आपल्या मुलाने नामांकित मल्ल व्हावे, आणि त्याच्या सत्कार सोहळ्याचे 'निवेदक' म्हणून पत्रकार तू काम करावे अशी अखेरची इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती.
अंत्यत रागीट, मजबूत शरीरयष्टी परंतु तितकाच प्रेमळ, जिवाला जीव देणारा मैत्रीतील 'वस्ताद' अल्पक्षा आजाराने असा अचानक निघून गेल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पै रवी भोईर यांच्या अशा दुर्दैवी निधनाने वरपगावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे . अशा परममित्रास कल्याण तालुका पत्रकार संघटना, जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्था, एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस व समस्त वरप ग्रामस्थां तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...