Thursday, 24 June 2021

गणेशपुरी पोलीसांच्या तिसऱ्या डोळ्यांमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर बसणार आळा.!

गणेशपुरी पोलीसांच्या तिसऱ्या डोळ्यांमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर  बसणार आळा.!
 
    
अरुण पाटील,भिवंडी दि.25 :

भिवंडी - वाडा या राज्य मार्गासह वज्रेश्वरी गणेशपुरी येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ या भागात वाढत्या गुन्हेगारीवर वारंवार  कारवायां केल्या जात असून आता या कारवाया अधिक सक्षम करण्यासाठी गणेशपुरी पोलिसांनी (सीसीटीव्ही.) तिसऱ्या डोळ्याचा वापर केला जाणार असल्याने  वाढत्या गुन्हेगारीला चांगलाच अंकुश बसणार असल्याचे वक्तव्य ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले. ते गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिलाच स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलेल्या गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या ४७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या लोकार्पण समारंभावेळी सांगितले.

गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाण्यात असताना संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही लावून हा उपक्रम राबविला होता, त्यावेळी त्यांना गुन्हेगारीला मध्ये मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी ठाणे जिल्ह्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये बदली झाली असता त्यांना सदर उपक्रमाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे जाणवल्याने त्यांनी याठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे ठरवले परंतु गणेशपुरी पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने आणि या हद्दीत अंबाडी ते उसगाव हा राज्यमार्ग क्र.८१ मधील १२ किमीचा मार्ग आणि अंबाडी ते अनगाव हा राज्यमार्ग क्र.७६ मधील १२ किमीचा मार्ग जात असल्याने आणि वज्रेश्वरी, अकलोली अशी मोठी तीर्थक्षेत्र असल्याने मोठ्या संख्येने सीसीटीव्ही लावण्याची गरज होती आणि ही मोठी खर्चिक बाब होती तरीही जाधव यांनी सदर उपक्रम कोणत्याही परिस्थितीत राबविण्याचे ध्येय मनाशी बाळगले असल्याने त्यांनी दानशूर व्यक्तींना आवाहन केले आणि त्यांना सदर उपक्रमाचे महत्त्व पटवून दिल्याने जेष्ठ उद्योजक सुरेंद्र कल्याणपूर यांनी सढळ हाताने ११ लाख रुपयांची मदत केली आणि केळठण येथील अमित राऊत यांनी ४७ पोल उपलब्ध करून दिल्याने मोठा आर्थिक भाग हलका झाला. आणि रवदी ते अनगाव टोलनाका येथे भूमिगत केबल टाकण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर डीएफएलचे मॅनेजर एम.पी.सिंग यांनी त्यांची यापूर्वी असलेल्या केबलमधून एक कोअर उपलब्ध करून दिल्याने सर्व प्रश्न सुटला आणि सुनील जाधव यांचे ध्येय असलेला तिसरा डोळा हा उपक्रम यशस्वी झाला.

सीसीटीव्ही च्या तिसऱ्या डोळ्यांची नजर या भागातील सर्व हालचालींवर असल्याने या भागातील गुन्हेगार व गुन्हेगारी कारवायांना अटकाव करता येणे शक्य असून पर्यटन आणि तीर्थक्षेत्र असल्याने या भागात मोठ्या संख्येने भाविक पर्यटक येत असतात त्यांच्या बारीक हालचाली कॅमेरा टिपणार असल्याने या भागात भयमुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत होईल असे शेवटी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी स्पष्ट केले.
         
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे चंद्रकांत भोईर, दिलीप पाटील, गणेशपुरी ग्रामपंचायत उपसरपंच विनोद पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी सदर उपक्रमाला मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तीचा पोलीस अधीक्षक देशमाने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
      
गणेशपुरी पोलीस ठाणे हद्दीतून भिवंडी वाडा राज्यामार्ग व अंबाडी ते उसगाव हा राज्यमार्ग जात असून या मार्गावर ठिक ठिकाणी ३६ कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामध्ये वाहनांचे नंबर टिपणारे एएनपीआर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर अकलोली येथील गरम पाण्याचे कुंड व नदी क्षेत्रात ७ व गणेशपुरी परिसरात २ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

        ( सदर उपक्रम आम्ही ठाणे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करीत आहोत.गणेशपुरी पोलीस ठाणे हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र असल्याने या ठिकाणी तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्हीची मोठ्या प्रमाणात गरज होती ती सहा.पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या संकल्पनेतून साकार झाल्याने गुन्हेगारीला निश्चितच आळा बसेल : विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण)

             ( सदर तिसरा डोळा हा माझा महत्वाकांक्षी उपक्रम होता आणि त्यासाठी अनंत अडचणी येऊनही दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केल्याने आणि वरिष्ठांनी मार्गदर्शन केल्याने आज साकार झाला आता याची योग्य देखभाल करून आम्ही गुन्हेगारीला आळा घालू : सुनील जाधव, सहा. पोलीस निरीक्षक गणेशपुरी पोलीस ठाणे )

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...