मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाकडून गेल्या २१ वर्षांत शहरातील रस्तेबांधणीसाठी तब्बल २१ हजार कोटींहून अधिकचा निधी खर्च झाल्याची धक्कादायक माहिती खुद्द महापालिका प्रशासनानेच दिली आहे. रस्त्यांवर झालेल्या खर्चाची माहिती प्राप्त करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या एका माहिती अधिकार याचिकेवर उत्तर देताना महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली आहे.
मात्र, शहरातील रस्त्यांची सद्यःस्थिती, दयनीय आणि बिकट अवस्था बघता हजारो कोटींचा हा निधी गेला कुठे? हा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर विचारू लागला आहे. मान्सूनची सुरुवात होताच मुंबईत पाणी साचणे आणि रस्त्यांवर खड्ड्यांच्या समस्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईची हीच अवस्था असूनच खड्डे आणि पाणी भरण्याच्या समस्येवर महापालिका प्रशासनाला अद्यापही कुठलीही ठोस उपाययोजना करता आलेली नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात होणारी शहराची अवस्था पाहता महापालिकेने खर्च केलेले सर्वसामान्यांचे पैसे गेले कुठे? हा प्रश्न उभा राहिला आहे.
भाजप आमदार अमित साटम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर महापालिकेने या खर्चावर स्पष्टीकरण दिले आहे. १९९७ ते २०२१पर्यंत महापालिकेने रस्ते दुरुस्ती, बांधकामासाठी आणि रस्त्यांवरून खड्डे भरण्यासाठी २१ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. २०१३ ते २०१४ या एका वर्षात सर्वाधिक म्हणजे ३.२०१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.
आतापर्यंत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. मागील अनेक वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर अनेक निवडणुका पार पडल्या, अनेक वेळा आश्वासने दिली गेली, टीका-टिप्पणी केली गेली, तरी अद्याप गेल्या अनेक वर्षांत खड्ड्यांचा विषय काही संपू शकलेला नाही, हे वास्तव आहे.
No comments:
Post a Comment