निष्क्रिय नेत्यांना दिल्या कानपिचक्या, गद्दारी करण्यापेक्षा बिनधास्तपणे शिवसेना सोडावी. बघून घेऊ आम्ही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भिवंडी, दिं,24, अरुण पाटील (कोपर) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांचे कान उपटत त्यांना पक्ष सोडून जाण्याचा सल्ला दिला. आपलं एक काय चुकतं, आपण खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी... म्हणजे काय लोकसभा आणि विधानसभा ज्या जिद्दीने लढवतो, तेवढ्या जिद्दीने निवडणुका लढवत नाही. मग माझ्यासह आपले नेते असतील, आता आपले मंत्री आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, ते या निवडणुकांकडे फारसं लक्ष देतात का? भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीने साध्यासुध्या निवडणुकांकडे लक्ष देतात. त्यांचे मोठे नेते रिंगणात उतरून प्रत्यक्ष निवडणूक लढत नसले तरी देखील त्यांच्या उमेदवारांना सर्वकाही मदत करतात. तशी मदत आपल्याकडून होत नाही, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, मी माझ्यापासून सुरू करतो. मी सुद्धा तसं पाहिलं तर गुन्हेगार आहे. मी तरी कुठे फिरलो? यावेळचा भाग वेगळा आहे, पण इतर वेळेला मी सुद्धा तसं काही लक्ष दिलेलं नाही. नाही आपल्या कोणत्या नेत्याने एखाद दुसरा सोडला तर लक्ष दिलेलं आहे. आता हे यापुढे टाळले पाहिजे. गेल्या दोन वर्षात दोन विधानपरिषदा आपणच आपल्या हरलो. कशा हरलो? काहीजण सांगतात तुमच्यातच गद्दारी झाली. मला नाही वाटत.
जे शिवसेनाप्रमुख म्हणायचे तशी आईचं दूध विकणारी औलाद आता आपल्यामध्ये आहे असे मला वाटत नाही. आणि असेल तर त्यांनी अशी गद्दारी करण्यापेक्षा बिनधास्तपणे शिवसेना सोडावी. बघून घेऊ आम्ही. जे शिवसैनिक कट्टर आहेत, त्यांच्या मदतीने त्या मुठभर शिवसैनिकाच्या हातात मी अभिमानाची आणि स्वाभिमानाची तलवार देऊन निवडणुका जिंकून दाखवल्याशिवाय राहणार नाही या जिद्दीने मी मैदानात उतरलेलो आहे.
असतील मुठभर, पण निष्ठावान आहेत. शेवटी लढाईमध्ये हारजीत ठरते ती निष्ठावानांवर ठरते. म्हणून मूठभर असतील तरी चालतील,पण अशी वेळ अजून आलेली नाही. पण ही गद्दारी खरच होते आहे का. गद्दारी नाही पण दुर्लक्ष होत आहे. आपण नव्या संस्था उभ्या करायला हव्यात, असेही ठाकरे म्हणाले.
खरं हिंदुत्व घेऊन आपण पुढे जाऊ, म्हणे हिम्मत असेल तर एकट्याने लढा,ठीक आहे,आम्ही शिवसैनिक आहोत षंढ नाहीत, एकट्याने लढू, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले आहे.ठाकरे पुढे म्हणाले की, काल परवा ज्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतीच्या असतील, कधी लोकसभा, कधी विधानपरिषदेच्या निवडणुका होत असतील. बँकेच्या निवडणुका असतील. आता ती वेळ आलेली आहे. ती वेळ म्हणजे असे की जर आपण सर्वत्र म्हणजे इतर राज्यातही आपण आता निवडणुका लढवत आहोत.
जे काही होईल ते होईल. पण खरं हिंदुत्व काय आहे हे घेऊन आपण पुढे जायचं आहे. हार होईल किंवा जीत होईल, ठीक आहे होऊ द्या. आपण विजयी झालो म्हणून डोक्यात उन्माद जाता कामा नये आणि हारलो तरी पराजयाने खचून जाता कामा नये. आम्ही लढणार. आणि आम्ही बघू बाहेरच्या राज्यात आम्ही किती दिवस हरू?... एक दिवस तोही येईल. जसा भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात आलेला आहे. तसा आमच्याही आयुष्यात येईल. आणि आम्ही तो आणू एवढी जिद्द आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी दिलेली आहे.
पण या ज्या काही निवडणुका आहेत. त्याचा निकाल लागल्यानंतर एक गोष्ट खरी आहे,की एकतर आपण सर्वच जागा लढवलेल्या नव्हत्या. आपण काही ठिकाणी आघाडी केलेली होती, काही ठिकाणी आघाडी झालेली नव्हती. सर्व जागा लढवलेल्या नव्हत्या. मग वर्तमानपत्रातून छापून आले की शिवसेनेचे असे का होते. आम्ही मात्र यावेळेला ज्या जागा लढवल्या त्या पाहता आपण जास्त निवडणून आलेलो आहोत. युतीत लढलो होतो त्यापेक्षा जास्त आलेले आहेत. पण मी यावर समाधान मानणार नाही, असेही ठाकरे पुढे म्हणाले.

No comments:
Post a Comment