भिवंडी, दिं,१४, अरुण पाटील (कोपर) :
शिर्डीत प्रत्यक्ष साईबाबांचे नामकरण करणारे परम भक्त व ज्यांच्या उल्लेखाशिवाय साईचरित्र पुर्ण होवू शकत नाही, असे साईबाबांचे निकटवर्तीय म्हाळसापती सोनार यांच्या निर्वाणाला १२ सप्टेंबर रोजी शंभर वर्षे पुर्ण होत आहेत.
लग्नाच्या वऱ्हाडा बरोबर आलेल्या एका फकीराचे म्हाळसापतींनी खंडोबा मंदिरात ”आवो साई " म्हणून स्वागत केले. तेव्हापासून ते "साईबाबा" या नावानेच ओळखले जावू लागले. म्हाळसापती चिमणाजी सोनार नागरे हे शिर्डीच्या खंडोबा मंदिराचे पुजारी होते. शिर्डीलगतच्या निमगाव येथील प्राचीन खंडोबा देवस्थानाच्या पुजाअर्चेचा मानही म्हाळसापतींना होता.
म्हाळसापतींनी बाबांचे केवळ नामकरणच केले नाही, तर त्यांनी आपले मित्र काशिराम शिंपी व आप्पा जागले यांना साईबाबांची ओळख करून दिली. द्वारकामाई मशीद जगभरातील करोडो सर्वधर्मिय भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र साईबाबा शिर्डीत आले, तेव्हा म्हाळसापतींनीच आपल्या या दोन मित्रांच्या मदतीनेच मारुती मंदिरासमोरील पडक्या मशीदीची साफसफाई करून तेथे बाबांची राहण्याची व्यवस्था केली.
साईबाबांच्या पुजेचा अगदी पहिला मान याच द्वारकामाईत म्हाळसापतींना मिळाला. ते साईबाबांच्या पायांना गंध लावीत.अनेक वर्षे साईबाबांच्या सोबत द्वारकामाईत झोपण्याच भाग्य म्हाळसापती व तात्या पाटील कोते यांना लाभलं. तीघेही तीन दिशांना डोके करून व मध्यभागी पाय ठेवून झोपत. रात्रभर एकमेकांच्या चेष्टा, खोड्या व दंगामस्ती करत असत. रात्रभर बाबा म्हाळसापतींना पाय चेपायला सांगून जागरण करायला भाग पाडीत.
१९१o पासून बाबा दिवसाआड चावडीत झोपायला जात होते. बाबांच्या चावडी मुक्कामाच्या दिवशी म्हाळसापती घरी झोपत असत. चावडीत झोपायला जाणार्या साईबाबांना भाविक एखाद्या राजा किंंवा संस्थानिकाप्रमाणे मिरवणुकीने नेत या मिरवणुकीत म्हाळसापती सुरवातीला बाबांचा उजवा हात धरून, तर नंतर त्यांच्या कफनीचे टोक धरून सोबत चालत असत.
साईनगरीतील खंडोबा मंदिरात उपासनी महाराज तसेच संत मेहेरबाबा अनेक दिवस वास्तव्याला होते. म्हाळसापतींना या सत्पुरूषांचाही सहवास लाभला. म्हाळसापती लौकिकदृष्ट्या बाबांचे निर्धन भक्त होते. बाबा अनेकांना काहीही न करता रोज पैसे देत, पण म्हाळसापतींना देत नसत. किंवा कुणी भक्त देवू लागला, तर देवुही देत नसत. बाबांनी मोहमायेपासुन दुर ठेवत म्हाळसापतींचा मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर केला. दुपारी बाबांच्या मध्यान्ह आरतीनंतर आजही म्हाळसापतींच्या समाधीला साईसंस्थानच्या वतीने नैवेद्य पाठवला जातो.
पुण्यतिथी शताब्दी सोहळ्याचे आयोजन १२ सप्टेंबर १९२२ रोजी म्हाळसापतींचे निर्वाण झाले. तारखेनुसार १२ सप्टेंबर रोजी तारखेने, तर १६ सप्टेंबर रोजी तिथीनुसार म्हाळसापतींंच्या निर्वाणाला शंभर वर्षे होत आहेत. या दरम्यान म्हाळसापती महाराज ट्रस्ट व शिर्डीच्या आओ साई खंडोबा मंदिराच्या वतीने पुण्यतिथी शताब्दी सोहळा साजरा होत आहे. या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, असल्याचे अध्यक्ष संदीप नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, खजिनदार दिपक नागरे, विश्वस्त अशोक नागरे आशालता नागरे, निलेश नागरे, श्रीकांत नागरे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment