टाळेबंदी शिथिलत केल्यानंतर दिसून आली नागरिक व दुकानदार यांच्यात जागरूकता !
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील अतिसंक्रमित क्षेत्र वगळून इतर भागांत टाळेबंदी शिथिल केल्यानंतर सोमवारी सकाळपासून जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमधील व्यवहार सुरळीत झाल्याचे पाहायला मिळाले. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह इतर भागांतील बाजारपेठा, दुकाने सुरू झाली खरी, मात्र पहिल्याच दिवशी नागरिक आणि व्यापारी सावध पद्धतीने व्यवहार करताना दिसले. बाजार सुरू होताच गर्दी उसळेल ही भीती होती. प्रत्यक्षात असे घडले नाही.
ठाणे शहरातील जांभळीनाका भाजी आणि धान्य बाजार, गावदेवी, नौपाडा, ठाणे स्थानक परिसरात सम-विषम पद्धतीने दुकाने खुली करण्यात आली. सकाळी ग्राहकांची गर्दी कमी असली तरी रविवारी मध्यरात्रीपासूनच ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. त्यामुळे येथील हातगाडी किंवा रस्त्यावर विक्री करण्यासाठी येणारे भाजीपाला विक्रेते गायब होते, तर १७ दिवसांपासून बंद असलेली दुकाने उघडल्यानंतर आपला जुना, नाशवंत माल बाजूला सारण्यातच धान्य विक्रेत्यांचा बराचसा वेळ गेला.

No comments:
Post a Comment