कोकणात पारंपरिक भात शेतीसह आधुनिक पध्दतीने भात शेती लागवड !!
कोकण, (शांत्ताराम गुडेकर) :
आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते.हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ, शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब इत्यादी बाबींवर विशेष भर दिला जात आहे. संकरीत भात निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. राज्यातील खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते.पारंपरिक बैल जोडी नांगरणी आज सुरु असली काही प्रगत शेतकरी आधुनिक उपकरणांचा वापर करुन भात शेती लागवडही करत आहेत. राज्यातील शेतकरी भातशेती अनेक वर्षापासून करीत आहेत. तरी सुद्धा देशाच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता राज्याची उत्पादकता अत्यंत कमी असून त्यास बरीच करणे आहेत. सुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र. सेंद्रिय व रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा कमी आणि असंतीलुत वापर.कीड, रोग व तण नियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर.वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील अडचणींमुळे रोप लावणी करताना लागणारा अधिक कालावधी.राज्यातील भातशेती करणारे सुमारे ८० ते ८५ टक्के अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी आणि त्यांची विखुरलेली भातशेती त्यामुळे यांत्रिकीकरणाचा कमी प्रमाणात वापर.सुधारित भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यापर्यंत होणारा अल्प प्रमाणातील प्रसार.अति बारीक, लांब दाण्याचा व सुवासिक भात जाती भरडण्यासाठी लागणाऱ्या सुधारित भात गिरण्यांची लागवड क्षेत्रातील अपुरी उपलब्धता. देशात भात उत्पादनातील हरीक्रांतीची सुरुवात ही सन १९६४ मध्ये तायचुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर-८ ही भात जातींची लागवडीद्वारे झाली. त्यांनतर सन १९६७ पासून आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न लोळणाऱ्या तसेच रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, लवकर तयार होणार्या, किडींना व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातींची निर्मिती करण्यामध्ये यश मिळाले. शेतकरीदेखील या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशातील व राज्यातील भात उत्पादनात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. महाराष्ट्रात सन १९९१ पासून भात पिकावरील संशोधनास सुरुवात झाली.आज कोकणचा शेतकरी विविध नविन बीयांनी वापरुन भातशेती केली जात आहे.

No comments:
Post a Comment