Saturday, 31 January 2026

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमिक शाळा, पोसरी, रसायनी,तालुका पनवेल येथे पिल्लई कॉलेज,रसायनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विशेष श्रम संस्कार शिबिरात  फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था,चिरनेर-उरण,रायगड( महाराष्ट्र ) तर्फे शून्य सर्पदंश मृत्यू अभियान व संस्थेच्या स्नेक बाईट ऍकशन टीम(S.A.T)" या विषयावर संस्थेचे  सदस्य तुषार अनंता कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना  सर्प ओळख,सर्पदंश कसे टाळावे व सर्पदंश झाल्यास काय करावे ? संस्थेच्या शून्य सर्पदंश मृत्यू अभियान आणि स्नेक बाईट ऍकशन टीम (S.A.T) प्रकल्पाबद्दल तसेच पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती केली. उपस्थित विद्यार्थ्यांना रात्री ०८ ते १० वाजेपर्यंत २ तास मार्गदर्शन केले. मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनियरिंग या दोन्ही विभागाची  एकूण ५० मुली –मुले या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.भविष्यात  अश्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना एखादा वन्यजीव (साप) वाचविण्यास तसेच कोणास चुकून सर्पदंश झाल्यास तो साप विषारी अथवा बिनविषारी हे ओळखण्यास मदत होईल.सदर कार्यक्रमासाठी पिल्लई कॉलेज रसायनी चे प्राध्यापक विक्रम पवार, वैभव भगत,अपूर्वा देशपांडे,सायली कुलकर्णी इ.शिक्षक तसेच फॉन संस्थेतर्फे अलका अनंता कांबळे व स्नेहा तुषार कांबळे यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती व सहकार्य लाभले.

पहिली संयुक्त राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा २०२६ नाशिक येथील स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी !!

पहिली संयुक्त राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा २०२६ नाशिक येथील स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी !!

उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )मास्टर्स गेम्स असोसिएशन आयोजित पहिली संयुक्त राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा २०२६ नाशिक येथे दिनांक २८ आणि २९ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाल्या.या स्पर्धेत श्री समर्थ कृपा स्पोर्ट्स अकॅडमी दादरपाडा च्या प्रशिक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी केली.उरण तालुक्याचे सुपुत्र स्नेहल राम पालकर यांनी ३५ वर्षांवरील पुरुष या गटामधील ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे आणि थाळीफेक या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.चेतना स्नेहल पालकर यांनी ३५ वर्षांवरील महिला या गटामधील ४०० धावणे, ८०० मीटर धावणे आणि तिहेरी उडी या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.समाधान चांगू कणेकर यांनी ३५ वर्षांवरील पुरुष या गटामधील ४०० मीटर हर्डल्स मधे सुवर्णपदक आणि १५०० मीटर धावणे मधे रौप्यपदक तसेच २०० मीटर धावणे मधे कांस्यपदक प्राप्त केले.तसेच त्यांचे खोपोली येथील सहकारी अमित पांडुरंग विचारे यांनी ४० वर्षांवरील पुरुष या गटांमधील १००००मीटर धावणे, ५००० मीटर धावणे, १५०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. तर दिलीप विचारे  यांना ५५ वर्षांवरील पुरुष गटामध्ये २०० मीटर धावणे मधे कांस्यपदक,महेश भोसले यांना ५ किमी जलद चालणे या स्पर्धा प्रकारात रौप्यपदक,मनीष खवळे यांना बांबू उडी मधे कांस्यपदक,दत्ता दांगड यांना नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक मिळाले.रूपेश म्हात्रे यांनी उंचउडी, ११० मीटर अडथळा शर्यत मध्ये सुवर्णपदक आणि तिहेरी उडी मधे कांस्यपदक प्राप्त केले.विश्वास खुटले यांनी भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले.तसेच या सर्वांनी रिले आणि मिक्स रिले या दोन स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्ण आणि रौप्यपदक प्राप्त करून महाराष्ट्र साठी प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप मिळवून देण्यात मोठे योगदान दिले.त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

खोपटा येथे शतकोत्तर “अखंड हरिनाम व गुरु दशमी सोहळा” !!

खोपटा येथे शतकोत्तर “अखंड हरिनाम व गुरु दशमी सोहळा” !!

** संतश्रेष्ठ गोपाळकाका महाराजांच्या परंपरेचा भव्य उत्सव

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : श्री परमपूज्य सद्गुरु गोपाळकाका महाराज ट्रस्ट, खोपटे बांधपाडा (उरण) यांच्या वतीने शतकोत्तर परंपरेने साजरा होणारा “अखंड हरिनाम व गुरु दशमी सोहळा तसेच ज्ञानेश्वरी पारायण” महोत्सव यंदाही मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला होता .श्रीमतपरमहंस जीवनमुक्त स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सुरू झालेली ही आध्यात्मिक परंपरा आता १०० वर्षांहून अधिक काळ अखंड सुरू आहे.संतशिरोमणी गोपाळकाका महाराजांनी गृहस्थाश्रमात राहून कीर्तन, अभंग, प्रवचनातून भक्ती, नैतिकता, व्यसनमुक्ती व समाजप्रबोधनाचा संदेश दिला.त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक अनुभव व जनकल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे ते जनमानसात संतस्वरूप मानले जातात.त्यांच्या कृपेनेच ही परंपरा पुढे वाढत असून आजही अनेक भक्तांना आध्यात्मिक आधार व मार्गदर्शन मिळत असल्याच्या अनुभूती व्यक्त केल्या जातात.

         महोत्सवाचा प्रारंभ माघ शुद्ध षष्ठी, शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी झाला असून समारोप माघ शुद्ध द्वादशी, शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२६ रोजी झाला आहे. या कालावधीत काकडा व आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, भजन, कीर्तन, जागर भजन व महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.राज्यभरातील ख्यातनाम कीर्तनकार — ह.भ.प. संजय महाराज पाटील, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, रामकृष्ण महाराज मोकळ, ज्ञानेश्वरी महाराज ठाकूर, वामन महाराज भोर, तुषार महाराज पाटील, नंदकुमार महाराज गावंड आदी मान्यवरांची कीर्तनसेवा भाविक भक्तांना लाभली आहे. विशेष म्हणजे, श्री जीवनमुक्त स्वामी महाराज पादुका पूजन, ग्रंथ दिंडी, महाआरती, तसेच विविध भजन मंडळांच्या सहभागामुळे संपूर्ण खोपटा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता . ग्रामस्थ, वारकरी, महिला मंडळे, युवक मंडळे आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. श्री हेमवर्ण घनश्याम ठाकूर यांनी व ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी उत्तम आयोजन व नियोजन केले होते. भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन नामस्मरण, कीर्तन व ज्ञानेश्वरी श्रवणाचा मोठया प्रमाणात लाभ घेतला. “आम्ही काकांचे वारकरी, नित्य मुखी रामकृष्ण हरी” या जयघोषात खोपटा नगरीत भक्तिरसाचा महापूर दररोज उसळत असून देहू–आळंदीप्रमाणेच हे स्थान वारकऱ्यांसाठी श्रद्धास्थान बनले आहे.

आई फाउंडेशनकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप व शिक्षण सहकार्याचा मानवतावादी संकल्प !!

आई फाउंडेशनकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप व शिक्षण सहकार्याचा मानवतावादी संकल्प !!

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : “ हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे — माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या हृदयस्पर्शी विचारांना कृतीत उतरवत, दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आई फाउंडेशन या सामाजिक संस्थेने मानवतेचा जिवंत संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
           
 समाजातील सर्वात वंचित घटक असलेल्या आदिवासी पाड्यांवरील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप करण्यात आले. विंधणे आदिवासी वाडी, पिरवाडी आदिवासी वाडी, कोप्रोली आदिवासी वाडी, येथील शाळांमधील लहानग्यांच्या चेहऱ्यावर खुललेले आनंदी हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. हा केवळ खाऊवाटपाचा कार्यक्रम नव्हता, तर “तुम्ही एकटे नाही” हा विश्वास देणारा भावनिक आधार होता. दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या अडचणींवर मात करत समाजासाठी उभे राहण्याचा घेतलेला हा निर्धार खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. आई फाउंडेशन ही संस्था दिव्यांग बांधव तसेच आदिवासी व वंचित घटकांच्या उत्कर्षासाठी मार्गदर्शन, सहकार्य आणि सामाजिक भान जागृत करण्याचे सातत्याने कार्य करत आहे.संस्थेने यापूर्वीही पूरग्रस्तांना मदत, उरणमधील गरजू दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. यावेळी खाऊवाटपासोबतच प्रत्येक वाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. संस्थेच्या प्रतिनिधींनी भावनिक शब्दांत सांगितले कि 
 “दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि सेवाभावाची ओळख आहे. आम्ही मदत करत नाही, आम्ही नातं जोडतो.” 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिलेदार — मदन पाटील (अध्यक्ष), राजेंद्र पाटील (उपाध्यक्ष), रणिता ठाकूर (सचिव), महेश पाटील (खजिनदार), सदस्य उमेश पाटील, संदेश राजगुरू, योगेश पाटील, नितीन सांगवीकर, राकेश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच रामकृष्ण थळी (पिरवाडी आदिवासी वाडी ), कल्पेश ठाकूर (कोप्रोली वाडी), नरेश पाटील आणि रमण पंडित (विंधणे आदिवासी वाडी) या शिक्षकांचे सहकार्य लाभले.याशिवाय गणेश पाटील (अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ दादरपाडा) चंद्रकांत पाटील (सहव्यवस्थापक, एच.ओ.सी. कंपनी, रसायनी) यांचेही मोलाचे योगदान लाभले. 

हा कार्यक्रम समाजाला एक सुंदर संदेश देऊन गेला -मानवतेची खरी ओळख मदतीत नसून, समानतेच्या भावनेत आहे.आई फाउंडेशन पुढील काळातही शिक्षण, मार्गदर्शन व सामाजिक उन्नतीसाठी असेच उपक्रम राबवत राहणार आहे. असे मत संस्थेच्या प्रत्येक शिलेदारांनी व्यक्त केले.

जासई जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात !!

जासई जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात !!

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) :
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, जासई जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. मनीष अनंत पाटील व चिर्ले पंचायत समिती गणातील काँग्रेस, शेकाप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रियांका दीपक मढवी यांचा जासई धुतुम, करळ, सोनारी, चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विधणे या ग्रामपंचायतींच्या विविध गावांसह रानसई  ग्रामपंचायत आदिवासी वाड्या परिसरात प्रचाराचा झंझावात सुरू असून, घरोघरी जाऊन उमेदवार व कार्यकर्ते  प्रचार पत्रकाचे वाटप करत आहेत. प्रत्येक गावागावात उमेदवारांचे जल्लोषात स्वागत होत आहे. फेब्रुवारी २००७ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जासई मतदारसंघातून, स्वतंत्र काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या डॉ.मनिष पाटील यांनी रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा यांवर भर देऊन, मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. 

आजही विकासाचा धडाका सुरू आहे. मतदार संघातील मतदार हे जागृत मतदार आहेत. महाआघाडीला मत म्हणजे विकासाला मत त्यामुळे जासई  जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महा विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे. दरम्यान तालुक्यातील विंधणे, वेश्वीसह अनेक गावांमध्ये शुक्रवारी, शनिवारी या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी  त्यांनी गावा गावातील प्रत्येक मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उमेदवारांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी नागरिकांबरोबर संवाद साधून, हाताचा पंजा व खटारा चिन्हा समोरील बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन केले. प्रचारात महिला, तरुण मंडळी, जेष्ठ कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून आला. प्रचारात डॉ.मनिष पाटील व प्रियांका मढवी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित, ज्येष्ठ नेते के बी पाटील, माजी सरपंच नामदेव पाटील, स्वाती मुंबईकर, सुरेश कडू, जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील, प्रकाश मुंबईकर, जगदीश पाटील, रवींद्र पाटील, परेश पाटील, शरद पालकर, महेंद्र मुंबईकर, अरविंद पाटील, राम पालकर, गोपाळ पाटील, अच्युत कडू, विकास पाटील, कैलास डाकी, सुरेश डाकी, सुनील मढवी, अविनाश पाटील, दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील, बी एम ठाकूर, रामकृष्ण नवाळे, गणेश पाटील, विनोद पाटील, किशोर पाटील, बळीराम नवाळे, सुमन पाटील, प्रेमनाथ ठाकूर, सूर्यकांत कासकर, समाधान जोशी, अभिजीत जोशी, अलंकार पाटील, दिनकर पाटील, शक्ति म्हात्रे, कैलास थळी, वैभव घरत, दत्तात्रेय नवाळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

उरणमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, पोलीसांची ओळख पटविण्याचे आवाहन !!

उरणमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, पोलीसांची ओळख पटविण्याचे आवाहन !!

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) :
उरण पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात पंजाब ब्रीजचे बाजुला, पनवेल- जे.एन.पी.टी पश्चिम वाहीनी मार्गिकेवर, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. मृत व्यक्तीचे वर्णन साधारण ३० ते ३५ वर्ष, निळ्या रंगाचा हाफ बाह्याचा टिशर्ट, गडद निळ्या रंगाची फुल ट्रैक पँन्ट, चेह-यावरील त्वचा निघालेली असे आहे.

पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस तात्पुरते कार्यवाही केली असून उरण पोलीस ठाण्यात अ.मृ. रजि. नं. ८८/२०२५ भा.ना.सु. संहीता कलम १९४ प्रमाणे वरील घटना दाखल करण्यात आलेली आहे.

सदर अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीसांनी आवाहन केले आहे. कोणालाही सदर व्यक्तीची माहिती असल्यास उरण पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे (मो.नं. 9422940225) यांच्याशी संपर्क साधावा.

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) :
SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण तालुका निवडणूक अधिकारी आविशकुमार सोनोने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार  उद्धव कदम व स्वीप पथक प्रमुख निर्मला घरत तथा गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १६ तारखेपासून उरण तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन मतदान जनजागृती सुरू आहे. शनिवार दिनांक ३१/०१/२०२६ रोजी  नवीन शेवेतून उरण तालुक्यातील सर्व शिक्षकांची मतदान जनजागृती बाईक रॅली निघाली. नवीन शेवे ते दिघोडे पर्यंत ही जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. 

या बाईक रॅलीचा शुभारंभ निवडणूक निर्णय अधिकारी आविश कुमार सोनोने, तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम व निर्मला घरत, केंद्र प्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. स्वीप  कार्यक्रमातील सर्व शिक्षक वर्ग व तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना 'मी मतदान करणारच' नावाची टी-शर्ट देऊन हातामध्ये विविध मतदान जनजागृती बॅनर देऊन रॅली काढण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीच्या वेगवेगळ्या  मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मी मतदान करणारच, चला मतदान केंद्रावर जाऊ या मतदानाचा हक्क बजाऊ या... घोषणा देण्यात आल्या.नवीन शेवे येथून निघालेली रॅली बोकडवीरा जेएनपीटी जासई मार्गे दिघोडे येथे समाप्त करण्यात आली.

उरण एसटी डेपो ने गाड्यांच्या संख्येत वाढ करावी. शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी !!

उरण एसटी डेपो ने गाड्यांच्या संख्येत वाढ करावी. शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी !!

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळच्या उरण डेपोने गाड्यांच्या संख्येत वाढ करावी व सातत्याने होणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे शहरचिटणीस शेखर पाटील यांनी डेपो मॅनेजर अमोल दराडे यांना निवेदन प्रस्तुत केले.निवेदन देऊन शेखर पाटील यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी विविध मागण्या केल्या आहेत.उरण डेपो मध्ये यात्रा सहल इत्यादी कारणास्तव सकाळच्या सत्राच्या साडेसहा वाजता ची पेंण दादर पनवेल व इतर टाइमिंगच्या गाड्या रद्द करण्यात येतात तर कधी कंडक्टर ड्रायव्हर  येत नसल्याने गाड्या रद्द होणे तर ड्रायव्हर कंडक्टर उशिरा येत असल्याने गाड्या उशिरा सुटणे यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. कामगार वर्गाला वेळेवर पोहोचता येत नाही यासंदर्भात प्रवाशांनी तक्रारी देऊन देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे प्रवासी वर्गाला  त्रास सहन करावा लागतो त्यामुळे एसटीचा प्रवासी वर्ग कमी होऊन उत्पन्नात घट होत आहे. पनवेल पेण दादर मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यासाठी उरण डेपोने ज्यादा गाड्या मागवण्याची गरज आहे. या डेपोंतून पनवेल दादर व पेण कडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाची संख्या मोठी असून त्यामुळे नक्कीच उत्पन्नात वाढ होईल. त्याचबरोबर प्रवाशांना देखील ज्यादा बस सेवेचा फायदा होईल. उरण पनवेल जलद गाड्या सोडण्याची आवश्यकता आहे. तसेच नवघर रेल्वे स्टेशन  न्हावा शेवा रेल्वे स्टेशन इथेही गाड्या सोडण्याची आवश्यकता आहे. येथून पूर्व विभागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे .करंजा व मोरा मार्गावर प्रवासी बस नियमित वेळेत सोडाव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या पास साठी नऊ ते पाच ही वेळ पाळावी.त्याचबरोबर महिलांच्या व पुरुषांची  स्वच्छतागृह  वीज व पाणी सुविधाची उत्तम व्यवस्था करावी. त्यामुळे प्रवाशांची कुचंबना होणार नाही. यासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण शहर चिटणीस शेखर पाटील यांनी डेपो मॅनेजर अमोल दराडे यांना केल्या आहेत. उरण डेपो हा रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबरचा उत्पन्न देणारा डेपो राहिला आहे त्यासाठी प्रयत्न करावेत व डेपोला गतवैभव प्राप्त करून द्यावे उरणहून लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष नयना पाटील. उरण क्राईम ब्रांच अध्यक्ष नारायण पाटील उपस्थित होते.

Friday, 30 January 2026

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात ! 

कल्याण, राजेंद्र शिरोशे :
कल्याण तालुक्यात वरप ग्रामपंचायत ही औद्योगिकरित्या  व आर्थिक रित्या पुढारलेली असून येथे राष्ट्रीय महामार्गावरच ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे, त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. 

कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तानाजी पाखरे यांना संपर्क साधला असता त्यांनी कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही असे सांगून आपली जबदारी झटकली आहे. त्यामुळे यावर ग्रामपंचायत काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा विरोधात लढण्यासाठी शिंदे सेना सज्ज.

** आ. महेंद्र थोरवे यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराविरोधात तसेच आ.महेश बालदी यांच्या आडमुठ्या धोरणाला केला विरोध

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
उरण पनवेल मध्ये भाजपचे उमेदवारांसाठी शिंदे सेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दिलेले आदेश पक्षातील सहा उमेदवारांनी धुडकावून लावले आहेत. भाजप शिंदेसेनेत तेढ वाढल्याने महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आधीच जिल्हाप्रमुखातून अतुल भगत यांना पदावरून दूर केले होते. त्या जागी विनोद साबळे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर शिंदे सेनेचे ४० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देत संताप व्यक्त केला होता. शिंदे सेनेची भूमिका मांडण्यासाठी  शुक्रवारी (दि.३०) या पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या अधिकृत भूमिके बद्दल माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले कि ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही. तर ही शिंदे शिवसेना गटाची स्थानिक नेतृत्वाबरोबर लढाई आहे. शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याचे व कार्यकर्त्यांचे एक मत आहे की देशामध्ये व राज्यांमध्ये आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत. ही आमची शिंदे सेनेची लढाई स्थानिक नेतृत्वाबरोबर आहे. युती होता होता या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे केले. काहींना माघार घेण्याचे आदेश दिले. परंतु निवडणुकी संदर्भात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची भूमिका वेगळी आहे. चुकीचे आहे. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. असे ते म्हणाले. नगरपालिकेची निवडणुक आपल्याला माहित आहे. या निवडणुकीसाठी युती करण्यासाठी आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते आग्रही होतो. परंतु आमदार महेश बालदी यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही नगरपालिकेच्या  नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवकांच्या पदाच्या उमेदवारासाठी उमेदवार उभे केले. त्यानंतर माघार घेण्याच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी आमदार महेश बालदी यांनी संपर्क केला. परंतु त्यांची भूमिका तुम्ही माघार घ्या आणि आम्हाला पाठिंबा द्या. अशी होती. या अशा महेश बालदींच्या आडमुठ्या धोरणामुळे ही युती झाली नाही. त्यानंतर  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकी साठी युती व्हावी. असा कार्यकर्त्यांचा विचार होता. मात्र ही युती न झाल्यामुळे आमच्या शिंदे सेनेच्या १८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. पक्षाकडून एबी फॉर्म भरले. मात्र पक्षाकडून माघार घेण्याचे आदेश आले आहेत. असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगून, उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे काही उमेदवारांनी माघार घेतली. तर सहा उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिला. पक्षाने आम्हाला ए  बी फॉर्म दिलेत. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढू . असा निर्धार करत, शिंदेसेनेतर्फे ही निवडणूक लढविली जात आहे. परंतु पक्षाकडून कुठल्याही प्रकारची मदत केली जाणार नाही. साहित्य व सहकार्य केले जाणार नाही. तर कारवाई करू. असे सांगितले गेले . महेश बालदिंना सपोर्ट करण्यासाठी ही भूमिका आहे. या भूमिकेला आम्ही विरोध करू. उत्तर रायगडचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्या पक्षाला किंवा मित्राला  मदत करण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे. हे चुकीचे आहे. त्यानंतर मी प्रचार साहित्य वाटप करून प्रचाराला सुरुवात केली आहे.   कार्यकर्त्यांना मदत केली पाहिजे. कार्यकर्ता जगला पाहिजे. त्यांना बळ दिले पाहिजे. उरण पनवेलमध्ये उत्तर रायगडचे आमदार थोरवेंनी निवडणुकीच्या काळात मदत न करता हे अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे आम्ही निषेध करत आहोत .भविष्यात त्यांनी अशी भूमिका घेऊ नये. मात्र निवडणुका संपल्यानंतर वरिष्ठांना पक्षश्रेष्ठींना आम्ही या त्यांच्या निगेटिव्ह भूमिकेबद्दल सांगणार आहोत. आणि योग्य ती कारवाई करण्यास सांगणार आहोत. असे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी शेवटी स्पष्ट केले.

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

ठाणे (एस. एल. गुडेकर) :

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उपक्रम म्हणून भिवंडी आगरी महोत्सवाची ओळख निर्माण झाली आहे. साई सेवक प्रतिष्ठान व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ ते बुधवार दिनांक २८ जानेवारी २०२६ या कालावधीत १५व्या भिवंडी आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव ग्रुप ग्रामपंचायत क्रीडांगण, आदित्य कंपनीजवळ, मुंबई–नाशिक महामार्ग, सोनाळे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

भिवंडी आगरी महोत्सव २०२६ चे अध्यक्षपद ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. पंडित नकुल पाटील यांनी भूषविले. मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन या त्रिसूत्रीचा अंगीकार करून समाजविकासासाठी कार्यरत असलेल्या साई सेवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित या महोत्सवात दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष श्री. विशुभाऊ म्हात्रे, स्वागताध्यक्ष डॉ. श्री. यशवंत महादू सोरे, कार्याध्यक्ष श्री. हनुमान पाटील, उपाध्यक्ष श्री. संतोष पाटील, सल्लागार डॉ. श्री. भगवान हेंदर ठाकूर, श्री. अमर म्हात्रे, श्री. रमेश कराळे, कायदेविषयक सल्लागार अ‍ॅड. श्री. शशिकांत गोतरणे तसेच सर्व उपाध्यक्ष व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महोत्सवाने सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आगरी समाजाच्या योगदानाला नवी दिशा दिल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Thursday, 29 January 2026

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याकडून संगणक भेट देण्यात आला. हा कार्यक्रम सुखकर्ता बंगला शेलघर येथे पार पडला. पत्रकारितेच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हावा, बातमी लेखन व माहिती संकलन अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने ही भेट देण्यात आली. यावेळी संगणक विभागाचे तज्ञ आनंद ठाकूर उपस्थित होते.यावेळी पत्रकार हेमंत चव्हाण यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.  सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते. पत्रकार हेमंत चव्हाण यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आगरी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित महेंद्रशेठ घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव !!

आगरी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित महेंद्रशेठ घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव !!

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने आगरी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल मुरबा गणपती मंदिर ट्रस्ट व नाव्हे गाव महिला काँग्रेस कमिटी यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक, कामगारहिताच्या व जनसेवेतील कार्याचे कौतुक केले. पुरस्कार हा त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक योगदानाची पोचपावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी मुरबा गणपती मंदिर ट्रस्ट व नाव्हे गाव महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुरबा गणपती ट्रस्ट चे पदाधिकारी व न्हावे गावातील महिला उपस्थित होत्या.

माणगाव येथे 'पाणी फाउंडेशन'तर्फे उरणच्या शेतकऱ्यांचा 'गट शेती' मंत्र ; ३ दिवसांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न !

माणगाव येथे 'पाणी फाउंडेशन'तर्फे उरणच्या शेतकऱ्यांचा 'गट शेती' मंत्र ; ३ दिवसांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न !

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, माणगाव येथे 'पाणी फाउंडेशन'च्या वतीने आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणासाठी उरण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारंपारिक शेतीला व्यावसायिक जोड देऊन 'गट शेती'च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याचे मोलाचे धडे यावेळी देण्यात आले.खेळांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा नवा पॅटर्न हे प्रशिक्षण शिबिर इतर शिबिरांपेक्षा वेगळे ठरले ते त्यातील शिकवण्याच्या पद्धतीमुळे. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षकांनी कोरड्या व्याख्यानांऐवजी विविध खेळ आणि उपक्रमांच्या माध्यमातून गट शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवले. "एकटा शेतकरी हतबल ठरू शकतो, पण संघटित गट शेतीमुळे बाजारपेठ काबीज करता येते," हा संदेश खेळांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आला.

======================================

शेतकऱ्यांच्या भूमिकेवर विशेष भर :- 

गट शेतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याची भूमिका (Role) काय असावी, गटाचे नियोजन कसे करावे, खर्च कमी करून नफा कसा वाढवावा आणि एकमेकांवर विश्वास ठेवून सामूहिक प्रगती कशी साधावी, यावर प्रशिक्षणात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

======================================

उरणच्या शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद :- 

उरण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "साने गुरुजी स्मारकाच्या पवित्र वातावरणात मिळालेले हे ज्ञान आमच्या आयुष्याला नवी दिशा देणारे ठरेल. आता आम्ही केवळ शेतकरी राहणार नाही, तर एक उद्योजक म्हणून काम करू." या यशस्वी आयोजनाबद्दल उरणच्या शेतकरी बांधवांनी पाणी फाउंडेशनच्या टीमचे आणि साने गुरुजी स्मारकाचे आभार मानले आहेत. या उपक्रमामुळे उरण परिसरातील शेती क्षेत्रात आता मोठ्या बदलाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रजासत्ताक दिनाची पूर्व संध्या....नमन लोककलेचा त्रिवेणी संगम !!

प्रजासत्ताक दिनाची पूर्व संध्या....नमन लोककलेचा त्रिवेणी संगम !!

मुंबई प्रतिनीधी( दिपक वेलुंडे)
       रविवार २५ जानेवारी, २०२६ रोजी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे कुणबीवाडी विकास मंडळ, असोरे (रजि.) मंडळाच्या वतीने पारंपरिक कोकणची लोककलेचा "नमन" कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडळाच्या अंतर्गत श्री. चंडिका कलापथक, असोरे यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून तब्बल चार दशकांपासून जपली गेलेली नमन कला प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आली. 

कोकणचे खेळे व नमन हा पारंपरिक बाज कायम राखत "भक्तिमय गण, स्त्री पात्रांनी नटलेली गवळण, पौराणिक वगनाट्य - सत्यवान सावित्री" सादरीकरण करण्यात आले. विशेषतः गवळणींची अर्थपूर्ण लोकगीते तसेच प्रणाली थोरसे गायिकेचा मधुर आणि लयबद्ध आवाज तसेच नजरेला भावणारे नृत्याविष्कार यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली. लोककलेचा रुपबंध जपत आधुनिक सादरीकरणाची जोड देण्यात आली, ही बाब रसिक प्रेक्षकांच्या मनाला विशेष भावली.

रविवार, प्रयोगाच्या निमित्ताने ही पारंपरिक कला नव्या पिढीकडे संक्रमित होताना स्पष्टपणे दिसून आली. जेष्ठ पिढी, तरुण पिढी आणि बाल पिढी असा त्रिवेणी संगम एकाच मंचावर अप्रतिम पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील सर्व कलाकार हे गावातीलच होते, ही बाब अभिमानास्पद ठरली.

कार्यक्रमातील सर्व कलाकार उच्चशिक्षित असूनही लोककलेची परंपरा जोपासत आहेत हे विशेष कौतुकास्पद आहे. शिक्षण आणि संस्कृती यांचा सुंदर समन्वय या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक करत लोककलेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

एकूणच हा नमन कार्यक्रम परंपरा, संस्कृती आणि नव्या पिढीची ऊर्जा यांचा सुंदर संगम ठरला असून, कोकणच्या लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

ठाणे, दि. २९ जानेवारी २०२६ —
नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे यांच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. मा. संचालक, नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार व मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली परेड संचालन सराव, ध्वजवंदन सोहळा तसेच स्वयंसेवकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण (Capacity Building Course) यशस्वीरित्या पार पडले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. २६/०१/२०२६ रोजी सकाळी ०७.०० ते १२.०० या वेळेत साकेत पोलीस परेड मैदान, ठाणे येथे परेड संचालन सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या सरावामध्ये एकूण ५० नागरी संरक्षण स्वयंसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमास ठाणे व अंबरनाथ विभागातील क्षेत्ररक्षक तसेच मानसेवी अधिकारी उपस्थित होते. याच प्रसंगी मा. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर व सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित यांना उत्कृष्ट कार्याबद्दल मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मानसेवी उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. बिमल नथवाणी, श्री. कमलेश श्रीवास्तव व श्री. करमबीर भुर्जी यांची उपस्थिती लाभली.

तसेच, उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे कार्यालयामार्फत सकाळी ०८.३५ वाजता नागरी संरक्षण उपनियंत्रण केंद्र, अंबरनाथ (प.), जि. ठाणे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा पार पडला. सेवा ज्येष्ठ सहायक उपनिरीक्षक श्रीमती दिपा घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यालयीन कर्मचारी, विभागीय क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी असे एकूण ८५ जण उपस्थित होते.

दरम्यान, नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत दि. २०/०१/२०२६ ते २६/०१/२०२६ या कालावधीत अंबरनाथ प्रशिक्षण हॉल येथे Capacity Building of Civil Defence Volunteer Course No.11/2026 चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.०० ते सायंकाळी १७.४५ या वेळेत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गात एकूण ४१ स्वयंसेवक सहभागी झाले होते. दि. २६/०१/२०२६ रोजी सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित, मास्टर ट्रेनर डॉ. राहुल घाटवळ व डॉ. प्रकाश ठमके यांनी व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांनी संपूर्ण सात दिवसांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

या सर्व उपक्रमांमुळे नागरी संरक्षण दलाची कार्यक्षमता, शिस्त व आपत्ती व्यवस्थापनातील सज्जता अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले.
— DCCD, ठाणे

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

वर्दीतले भाऊ, आयुष्यभराचे सोबती: महाराष्ट्र पोलिस कर्मचाऱ्याने धाकट्या भावासाठी यकृतदान करून वाचवले प्राण !!

वर्दीतले भाऊ, आयुष्यभराचे सोबती: महाराष्ट्र पोलिस कर्मचाऱ्याने धाकट्या भावासाठी यकृतदान करून वाचवले प्राण !!

कल्याण, २९ जानेवारी २०२६ : आजच्या युगात धैर्य, त्याग आणि अटूट बंधुत्वाची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या धाकट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा (लिव्हरचा) एक भाग दान केला. शौर्य नेहमी रस्त्यावरच दिसते असे नाही, कधी कधी ते ऑपरेशन थिएटरमध्येही घडते, याची ही जिवंत साक्ष आहे.

ही जीवनदायी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात डॉ. स्वप्निल शर्मा (सल्लागार – लिव्हर ट्रान्सप्लांट व जठरांत्र शल्यविशारद) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली.

३८ वर्षीय धाकटा भाऊ अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला तीव्र ‘अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअर’चा त्रास होता. तीव्र पिवळेपणा, व्हेंटिलेटरवरील अवलंबित्व आणि रक्तदाब टिकवण्यासाठी औषधांची गरज अशी त्याची प्रकृती होती. त्याच्या जगण्याची एकमेव आशा म्हणजे तातडीचे यकृत प्रत्यारोपण.

क्षणाचाही विलंब न लावता, महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेला त्याचा मोठा भाऊ जिवंत दाता म्हणून पुढे सरसावला.

दाता भावाने सांगितले, “पोलिस म्हणून आम्हाला इतरांचे प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते — स्वतःचा धोका पत्करूनही. पण यावेळी ती वर्दी किंवा कर्तव्याची बाब नव्हती; तो माझा धाकटा भाऊ होता. जर मी त्याला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकत असेन, तर माझ्या मनात कोणताही प्रश्न नव्हता. त्यानेही माझ्यासाठी हेच केले असते.”

सखोल वैद्यकीय तपासणीनंतर मोठा भाऊ दानासाठी योग्य असल्याचे आढळले. शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, परंतु ती यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यासाठी शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, विशेष प्रशिक्षित ICU परिचारिका, आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट अशा बहुविद्याशाखीय लिव्हर ट्रान्सप्लांट पथकाने काटेकोर समन्वय साधला.

डॉ. स्वप्निल शर्मा म्हणाले, “अक्यूट-ऑन-क्रॉनिक लिव्हर फेल्युअरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ही आमच्यासाठी सर्वात आव्हानात्मक शस्त्रक्रियांपैकी एक असते. या प्रकरणात केवळ वैद्यकीय गुंतागुंत नव्हे, तर दोन भावांचे असामान्य भावनिक बळही ठळकपणे दिसून आले. प्रेम, त्याग आणि विज्ञान यांनी एकत्र येत मृत्यूवर मात केलेली ही दुर्मीळ घटना आहे.”

आता प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असलेला धाकटा भाऊ भावूक होत म्हणाला,“मी माझे आयुष्य माझ्या भावाला देणे लागतो. आम्ही दोघांनी एकच वर्दी घातली आहे, पण यावेळी त्याने मला पोलिस म्हणून नाही, तर कुटुंबातील सदस्य म्हणून वाचवले. हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही.”

सध्या दोन्ही भाऊ प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर आहेत — एक पुन्हा निरोगी आयुष्याकडे, तर दुसरा पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याच्या तयारीत. यकृत प्रत्यारोपणातील आधुनिक वैद्यकीय प्रगती आणि मानवी धैर्य यांची सांगड घातल्यास नियतीलाही बदलता येते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

ही उल्लेखनीय घटना भारतातील वाढत्या लिव्हर ट्रान्सप्लांट क्षमतेसोबतच मानवी नात्यांच्या सामर्थ्याचीही जाणीव करून देते. वैद्यकीय उत्कृष्टता, योग्य वेळी केलेला हस्तक्षेप आणि भावाने केलेला असामान्य त्याग — या सर्वांनी मिळून एक जीव वाचवला. काही सर्वात मोठी शौर्यकृत्ये टाळ्यांच्या गजरात नव्हे, तर प्रेमाने प्रेरित शांत कृतीतून घडतात, याची ही प्रेरणादायी आठवण आहे.

Wednesday, 28 January 2026

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

संदीप शेंडगे...
कल्याण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी, समाजप्रबोधक व महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या डॉ. सविता भीमराव आंबेडकर अर्थातच माईसाहेब आंबेडकर यांची जयंती कल्याणमध्ये विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सन्मानपूर्वक साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या नवविवाहित दांपत्यांचा, जोडप्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

कर्मवीर दत्त देशमुख सभागृह, ३ रा मजला, उषा संकुल, वीज कंपनी कर्मचारी सहकारी पतसंस्था, सितारा हॉटेल समोर, वलीपीर रोड, कल्याण (प.) येथे ३१ जानेवारी शनिवारी ४.३० वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य संघटक कॉम्रेड किशोर टमाळे हे असणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून लेखक व साहित्यिक श्री. विजय सुरवाडे हे उपस्थित राहणार आहेत.

डॉ. सविता आंबेडकर यांचा जन्म २७ जानेवारी १९०९ रोजी झाला असून, त्यांनी आयुष्यभर सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि विवेकनिष्ठ समाजरचनेसाठी कार्य केले. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खंबीर साथ देणाऱ्या प्रेरणास्थानी होत्या. त्यांच्या स्मृतिदिनी आयोजित हा कार्यक्रम सामाजिक एकोपा, मानवतावाद आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारा ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय महिला फेडरेशन, समता संघर्ष संघटना, सकल भारतीय समाज, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, ऑल इंडिया युथ फेडरेशन, श्रमिक मुक्ति दल, नागरी हक्क संघटना, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC), पुरोगामी विचारमंच, ऑल इंडिया स्टुडंट्स ऑर्गनायझेशन व डॉ. आंबेडकर मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

समाजातील समतेचा संदेश देणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे आयोजक यांना खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
संपर्क :
उदय चौधरी 
मो. ९९६९५००३६९
बाबा रामटेके 
मो. ८०९७५४०४०६
डॉ. सुषमा बसवंत 
मो. ९५९३२८०४९३
विशाल जाधव 
मो. ९९६९३२०३६३

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील रामकृष्ण आत्माराम पाटील सभागृहात सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्ञाती समाजाच्या भगिनींचा स्पर्धेतील सहभाग लक्षणीय होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिश पुरव (अध्यक्ष शांती निवास, मुंबई) यांनी भुषविले, तर विशेष अतिथी म्हणून क्षात्रैक्य समाज, ठाणे चे विश्वस्त  पंकज अशोक म्हात्रे उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात विद्यमान अध्यक्ष रंजन अनंत काठे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. रंजन काठे यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्ञाती समाजाच्या गोसपाड्यातील ताबेकब्जात असलेल्या पण सध्या वापरात नसलेल्या चार गुंठे जागेचा उल्लेख करत लवकरच याही जागेचा वापर समाजाच्या काही उपक्रमांसाठी सुरु करणार असल्याचे जाहीर केले. उपस्थित समाज बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत म्हातवलीच्या सरपंच श्रीमती रिना रुपेश शिरधनकर व उप सरपंच श्रीमती निलिमा प्रदीप थळी यांना सो.क्ष.पा. ज्ञाती समाज उरणच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने  झाली.

मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!

मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई शाळेत  ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि संगीतमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय लोकशाहीचा हा महान सण साजरा करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८ वाजता झाली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि ध्वजवंदना झाली. 

यावर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली 'संगीतमय कवायत'. देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि लयबद्ध कवायतींचे सादरीकरण केले. तसेच एस एम एस डेकोरेटरने तयार केलेल्या सुंदर डेकोरेशनने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आणि कलात्मक सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक झाले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई !

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई !

** हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात.

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर, उरण नगर परिषदेचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, मार्निंग कट्टा विमला तलाव या संघटनेचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, उरण नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी उरण शहरातील विमला तलाव गार्डनमध्ये हातात झाडू घेऊन कचरा साफसफाई केली. कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.उरण स्वच्छ सुंदर दिसावा, नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे या दृष्टिकोनातून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे उरण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सांगितले. 

या स्वच्छता अभियानातून उरणमध्ये होणारा कचरा समस्यांचे लवकरच निवारण करण्यात येणार असल्याचेही भावनाताई घाणेकर यांनी सांगितले.

उरण मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत !!

उरण मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप थेट लढत !!

** ३४ उमेदवारांची माघार, ३९ उमेदवार रिंगणात.

** ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला फैसला; राजकीय रणधुमाळीला वेग

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी उरण तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.मंगळवारी ३४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता १२ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार आहेत.अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार असून तालुक्यात राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे.३४ उमेदवारांनी अर्ज पाठीमागे घेतल्याने  निवडणूक लढविणाऱ्या इतर उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.


 जागांचे गणित आणि उमेदवारांची संख्या :- 

उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ अशा एकूण १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठी सुरुवातीला २९ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १६ उमेदवार रिंगणात आहेत.

 पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ४६ अर्ज आले होते. त्यापैकी २ अर्ज बाद झाले आणि २१ उमेदवारांनी माघार घेतली. आता २३ उमेदवार मैदानात उरले आहेत.

उरणमध्ये ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट आणि अटीतटीची होणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपकडून नगराध्यक्षपद खेचून घेतले होते. त्याच यशाची पुनरावृत्ती महाविकास आघाडी करणार की भाजप आपला गड राखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री शरदचंद्र पवार पक्ष ), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटक पक्षांचा समावेश आहे.उरण मध्ये खरी लढत ही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक अटीतटीची झाली आहे.

अर्ज माघारीची प्रक्रिया आता पूर्ण झाल्याने आता प्रचारासाठी एक आठवडा शिल्लक आहे.गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतमोजणी शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.मंगळवारी सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पक्षांतर, बंडखोरी थोपवणे आणि सोयीचे राजकारण करण्यासाठी हालचालींना वेग आला होता. आता अंतिम उमेदवार निश्चित झाल्यामुळे आजपासूनच गावोगावी प्रचारसभा, पदयात्रा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे.उमेदवारांनी गावोगाव, गल्लो गल्ली पिंजून काढायला सुरवात केली आहे.उरण तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये कोणाची सत्ता येणार, कोण बाजी मारणार, याचा अंतिम निकाल ७ फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

हायवेवरील ‘देवदूत’ कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाचा रस्त्यावर उतरून संघर्ष !!

हायवेवरील ‘देवदूत’ कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाचा रस्त्यावर उतरून संघर्ष !!

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या  ‘देवदूत’ कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे आयर्न पंप कंपनी  प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात आले.या कामगारांकडून अत्यंत धोकादायक व जबाबदारीचे काम  करून घेतले जात असतानाही त्यांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा संरक्षण, सुरक्षितता साधने, कामाचे निश्चित तास व कायदेशीर हक्क मिळत नाहीत. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.या आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब भुजबळ – संघटन सचिव, भारतीय मजदूर संघ सचिन मेंगाळे – भारतीय मज़दूर संघ उपाध्यक्ष, महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सागर पवार – सचिव, पुणे जिल्हा  उमेश विश्वाद बाळासाहेब पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, देवदूत कामगारांच्या प्रश्नांवर तात्काळ ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल व ही लढाई राज्य स्तरावर नेली जाईल. भारतीय मजदूर संघाने कंपनी व्यवस्थापन व संबंधित यंत्रणांना आवाहन केले आहे की, देवदूत कामगारांना वेतनवाढ, प्रलंबित प्रश्नांबाबत, ई सर्व कायदेशीर लाभ व सामाजिक सुरक्षा तात्काळ लागू करावी अशी ठाम मागणी करण्यात आली . 

या बाबतीत त्रिपक्षीय बैठक  संपन्न होवून देशदुत मधील कामगारांना सन्मानजनक वेतनवाढ बाबतीत वरिष्ठ पातळीवर चर्चे करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.कामगार च्या पत्नी व मुलांकरिता सध्या कार्यरत ३ लाख मेडिक्लेम मधे समाविष्ट करण्यात येईल.  
सर्व कामगारांना करिता अपघाती मृत्यु विमा योजनेंतर्गत २० लाख रु चा लाभ देण्यात येणार आहेत. मागील काळातील  प्रलंबितच ओव्हरटाईम वेतन लवकरच कामगारांना देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लेखी स्वरूपात समझोता झाला आहे. त्या मुळे आंदोलन शनिवार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थगित करण्यात आले असून या बाबत आर्यन पंप कंपनी ने सकारात्मक निर्णय न झाल्यास सोमवार २ फेब्रुवारीपासून पासून बेमुदत आंदोलन करण्या बाबतीत इशारा बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश व सचिन मेंगाळे उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ व सागर पवार यांनी दिला आहे .या बैठकीत कंपनी कडून  व्दिवेश दिवाकर एच आर हेड, निलेश कुडेकर मॅनेजर, भारतीय मजदूर संघा कडुन बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव महाराष्ट्र, सचिन मेंगाळे भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ, सागर पवार सचिव पुणे , बाळासाहेब पाटील कार्याध्यक्ष, उमेश विश्वाद संघटन सचिव, व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री आशिष ठोंबरे- शिवसेना तालुकाप्रमुख उबाठा, निखिल कविश्वर- नगरसेवक लोणावळा, धनंजय काळोखे- नगरसेवक लोणावळा, मयूर ढोरे- नगराध्यक्ष वडगांव, नवनाथ हारपुडे- पंचायत समिती उमेदवार, भाऊ गुंड- भाजपा तालुकाध्यक्ष, सनी दळवी- नगरसेवक, गायत्री रिले- नगरसेवक, दिपा आगरवाल- नगरसेवक, मुकेश परमार- नगरसेवक ,  व आर्यन पंप चे कामगार प्रतिनिधी कामगार नितीन निकम, भुषण पाटील, आशीष सावंत, अजय ठोंबरे  कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Tuesday, 27 January 2026

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !
मुंबई (शांताराम गुडेकर) :
            खडावली येथील जी. के. एस.  कला,वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालय खडवली  तर्फे “Research Methodology and Scientific Writing” (संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखन) या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश संशोधन क्षेत्रातील विद्यार्थी व प्राध्यापकांना संशोधन पद्धती, वैज्ञानिक लेखन तसेच संशोधन प्रकाशन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे हा होता.

             ही कार्यशाळा मंगळवार, दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यापीठ संकुलातील राजीव गांधी सभागृह, कलिना, मुंबई येथे संपन्न झाली.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.एम. एच.फुलेकर (वरिष्ठ प्राध्यापक व संशोधन सल्लागार, पारुल विद्यापीठ, वडोदरा), मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.कविता शिकतोडे तसेच शिक्षण संचालक डॉ.बी.एल.जाधव उपस्थित होते.

            महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.सागर यांनी प्रास्ताविक भाषणात संशोधनाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर डॉ. एम. एच. फुलेकर यांनी विशेष मार्गदर्शनपर भाषण केले.

              यानंतर तांत्रिक सत्रास प्रारंभ झाला. पहिल्या सत्रात डॉ.एम.एच.फुलेकर यांनी संशोधन प्रकल्प प्रस्ताव लेखन व निधी संस्थांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या पद्धती यावर मार्गदर्शन केले. डॉ. संगीता पवार (मुंबई विद्यापीठ) यांनी पीएच.डी.प्रवेश प्रक्रिया, नोंदणी व संशोधन शिष्यवृत्ती याबाबत सविस्तर माहिती दिली.
           डॉ.सत्यनारायण कोठे यांनी संशोधन समस्या निश्चित करणे व संशोधन प्रस्ताव तयार करणे यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. संदीप वाघ यांनी संशोधन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध संशोधन पद्धती स्पष्ट केल्या. डॉ. संतोष गीते यांनी सांख्यिकीय पद्धती व डेटा विश्लेषणावर सखोल मार्गदर्शन केले.तसेच डॉ. बी. एल. जाधव यांनी प्रबंध लेखनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली, तर डॉ. अहमद अली यांनी संशोधन प्रकाशने व पेटंट्स याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

         ही कार्यशाळा संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. सर्वांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा हिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन जाधव यांनी केले. उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांडले यांच्यासह जी. के. एस. महाविद्यालयाच्या शिक्षकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे..

विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. या दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा लॅण्डिंगआधी भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये हा अपघात झाला. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एका शेतात हे विमान लॅण्डिंगदरम्यान कोसळलं आहे

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : संघर्षाला शस्त्र, वेदनांना शक्ती आणि दिव्यांगत्वाला समाजपरिवर्तनाचे साधन बनवत ज्या व्यक्तीने आयुष्य समाजासाठी झोकून दिले, त्या राजेंद्र गजानन पाटील यांच्या सेवाभावी कार्याला दादासाहेब फाळके चित्रपट युनियनतर्फे “उत्कृष्ट समाजसेवक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादरपाडा (उरण) येथील रहिवासी व दिव्यांग सामाजिक संघटना उरणचे उपाध्यक्ष असलेले राजेंद्र पाटील यांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण दिव्यांग समाजाच्या जिद्दीचा गौरव मानला जात आहे.

राजेंद्र पाटील यांनी दिव्यांगत्वाला कधीही मर्यादा मानले नाही. उलट त्यालाच ताकद बनवत त्यांनी असंख्य दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. त्यांच्या दुःखाला स्वतःचे दुःख समजून त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवत त्यांनी हजारो कुटुंबांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण केला.

त्यांचे कार्य केवळ दिव्यांग बांधवांपुरते मर्यादित न राहता आदिवासी पाड्यांवरील वंचित घटक, ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आणि समाजातील प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचले. निःस्वार्थ वृत्तीने केलेल्या या कार्याबद्दल यापूर्वीही द्रोणागिरी भूषण पुरस्कार – २०२४, ग्रामीण विकास कार्यकर्ता, दिव्यांग दूत असे विविध सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.

“हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून उरण तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवाचा आहे,” असे भावनिक उद्गार राजेंद्र पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले. आपल्या यशामागे कुटुंबीयांचा आधार, दिव्यांग सामाजिक संघटनेचे शिलेदार आणि मित्रपरिवार यांचे सहकार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. “यापुढेही माझी सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा अखंड सुरू ठेवणार,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (मुंबई) येथे आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा धांदळे यांच्या हस्ते राजेंद्र पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी  संतोष शिवदास आमले (अध्यक्ष, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन – महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते.

हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून माणुसकी, जिद्द आणि निस्वार्थ सेवेचा विजय आहे. राजेंद्र पाटील यांच्या कार्यामुळे समाज बदलू शकतो, याची जिवंत साक्ष या पुरस्कारातून अधोरेखित झाली आहे

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...