Tuesday, 21 April 2026

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

बातमीदार, ठाणे प्रतिनिधी : ता. २२,  नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत  उपनियंत्रक मा. श्री विजय जाधव साहेब यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. १७ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत पोलिस वाहतूक नियंत्रण हॉल, तीन हात नाका, ठाणे (प.) येथे प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन  प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. ०९/२०२६ आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण वर्गात एकूण ५६ RSP शिक्षक वृंद प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.

      दररोज दुपारी १.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात विविध विषयांवर मानसेवी निदेशक अनुक्रमे श्री.बिमल नथवाणी, डाॅ.राहुल घाटवळ, हनुमान चौधरी व कमलेशजी श्रीवास्तव यांचेद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विभागीय क्षेञरक्षक भारती देशमुख, डाॅ.किशोर आढळकर व रोहिणी गोलतकर यांचे सहकार्य लाभले. अंतिम दिवशी सहाय्यक उपनियंञक श्री. अनिल गावित व मानसेवी निदेशक श्री. कमलेश श्रीवास्तव यांनी प्रशिक्षणार्थ्यांना व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. डाॅ.किशोर आढळकर, विभा, क्षेञरक्षक, ठाणे व उपमुख्य क्षेञरक्षक, क्षेञ-४, नवीमुंबई यांचे सहकार्याने लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

     यावेळी मा. श्री विजय जाधव साहेब,  उपनियंत्रक यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सभासदत्वाची शपथ देऊन त्यांना मोलाचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच श्री.संजय केळकर, मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण दल यांनीही उपस्थित राहून प्रशिक्षणार्थ्यांना  मार्गदर्शन करुन सर्व मानसेवी निदेशकांचे अभिनंदन केले.

     हा प्रशिक्षण वर्ग आयोजनासाठी डाॅ.किशोर आढळकर यांनी समन्वय साधला. याप्रसंगी डाॅ.शिंपी, स्वामी सर व समाजसेवक माणिक पाटील सुद्धा उपस्थित होते. श्री.पाटील सरांनी खणखणीत सुञसंचालन करुन आनंदी व खेळीमेळीचे वातावरण ठेवले.  प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडल्याने सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
     राष्ट्रगीताने  प्रशिक्षण वर्गाची सांगता करण्यांत आली.

Regards – DCCD, NMC, Thane.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

लोहार समाजाच्या विकासासाठी भव्य सत्कार समारंभ; मान्यवर मंत्र्यांची उपस्थिती !!

लोहार समाजाच्या विकासासाठी भव्य सत्कार समारंभ; मान्यवर मंत्र्यांची उपस्थिती !!

बातमीदार प्रतिनिधी: मुंबई, ता. २१, समस्त लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंदपुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्रातील विविध लोहार समाज संघटनांच्या सहकार्याने भव्य सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता वसंतस्मृती, भारतीय जनता पार्टी कार्यालय, दादर (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी लोहार समाजातील बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाजाच्या विविध प्रश्नांबाबत ३२ मागण्यांचे निवेदन मान्यवर मंत्र्यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या कार्यक्रमास मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे (महसूल मंत्री), मा. ना. श्री. आशीषजी शेलार (सांस्कृतिक कार्य मंत्री), मा. ना. श्री. मंगलप्रभातजी लोढा (कौशल्य विकास मंत्री) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय मा. श्री. रविंद्रजी चव्हाण (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप), मा. आ. श्री. अमितजी साटम (मुंबई प्रदेश अध्यक्ष, भाजप) व मा. सौ. निहारिकाताई खोंडले (कार्यकारिणी सदस्य, भाजप) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सत्कार समारंभाच्या निमित्ताने लोहार समाजाच्या विकासासाठी शासन पातळीवर सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आयोजकांनी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

सौजन्य/ वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.3500 सभासद शाळांना घड्याळ वाटप !!

सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.3500 सभासद शाळांना घड्याळ वाटप !!

** आंबवणे येथील वाळंज विद्यालयात सेकंडरी चे तज्ञ् संचालक मा गुलाबराव गवळे यांची भेट 

आंबवणे, प्रतिनिधी :- 
आमच्या कोराईगड शिक्षण संस्था संचालित सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे ता. मुळशी या शाळेत घड्याळ वाटप व सभासद भेट वस्तू वाटप करण्यात आले.

सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुबंई.. शाखा लोणावळा अंतर्गत घड्याळ वाटप साठी सोसायटी चे तज्ञ् संचालक मा गुलाबराव गवळे, कोषाध्यक्ष शिक्षक परिषद पुणे, अध्यक्ष शिक्षक परिषद पुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भटू देवरे  शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. 

सेकंड्री स्कुल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी ही शिक्षक कर्मचारी यांच्या उज्वल गुंतवणूक व गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रराज्यातील अग्रगण्य संस्था आहे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सर्वच संचालक यांच्या मार्गदनाने वाटचाल करत असताना सभासदांचे हीत जोपसण्याचे कार्य निश्चित करत आहोत  सुवर्णं महोत्सवी वर्षा निमित्त सभासद शाळांना घड्याळ भेट देत आहोत.त्या बद्दल समाधान वाटते. 
आज पर्यत 3500 सभासद शाळांना भिंतीवरील घड्याळ व प्रत्येक सभासदास भेट वस्तू वाटप कार्यक्रम सुरु आहे. आपल्या शाळेस भेट देऊन आनंद झाला. निसर्ग रम्य परिसर व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे कार्य मुख्याध्यापक देवरे सरांच्या नेतृत्वात होत आहे. असे मत  सोसायटी चे तज्ञ संचालक मा गुलाबराव गवळे यांनी व्यक्त केले...संजय कुलथे यांनी पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन केले. तसेच मान्यवरांचे आभार मानले.

वृत्त/प्रसिद्धी - भटू देवरे सर

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार !!

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार !!

** अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका 

ठाणे, दि. २१ - मोदी सरकारने लोकसभेत महिला बिल आणलेच नव्हते, भाजपने घटना दुरुस्ती बिल मंजुरीसाठी मांडले होते. संसदेत बहुमत नसतानाही घटना दुरुस्ती विधयक आणून काँग्रेसला बदनाम आणि लोकशाही संपविण्याचा डाव आखला होता. वास्तविक भाजपला महिला आरक्षण द्यायचेच नसून महिलांच्या आडून घटना दुरुस्तीचा घाट घालण्यात आला होता. काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेचा पोलखोल करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषेदेत सांगितले.

लोकसभेत २०२३ मध्ये महिला आरक्षण बिल काँग्रेसच्या पाठिंब्याने मंजूर झालेला आहे.  असे असताना केवळ काँग्रेसला महिला विरोधी ठरविण्यासाठी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव मोदी सरकारने कसा आखला आहे, याचा पोलखोल आज काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. महिला बिलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी सरकारचा खोटेपणा दिसून आला आहे. सतत खोटे बोलून राजकारण करणारे जुमलेबाज असे भाजप सरकार असून चोर दरवाजातून  संविधान कमजोर करण्याचा घाट घातला होता. हा धोका ओळखून काँग्रेस आणि इतर पक्षांनी घटना दुरुस्तीचे बिल नामंजूर करीत लोकशाही वाचविली आहे. आता मोदी सरकारचा निर्णय त्यांच्या अंगलटी आल्याने त्यांनी महिला आरक्षण नामंजूर झाल्याचा खोटा प्रचार सुरु केला आहे. महिला आरक्षण २०२३ मध्ये मंजूर झालेला असून हे आरक्षण तात्काळ लागू करावे आणि येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत महिलांना समान संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने यापूर्वीच केलेली आहे, असे ते म्हणाले. डेलिमिटेशनची प्रक्रिया पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करावी, तशी प्रक्रिया न करता घटना दुरुस्तीच्या माध्यमातून सर्व अधिकार मोदी सरकारला हवे होते जेणेकरून आपल्या मर्जीनुसार मतदार संघाची निर्मिती करता येईल. हे विधयक मंजूर झाले असते तर लोकशाही धोक्यात आली असती म्हणून काँग्रेसने विरोध केल्याचे खान यांनी सांगितले.  महिलांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी ठरलेल्या भाजपने केंद्रात आणि राज्यात महिलांना मंत्री केले आहे?  भाजपचे नेतेच महिलांवर अत्याचार करीत असताना ते का थांबविले जात नाहीत, असे प्रश्न करीत खान यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर आसूड ओढले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऍड. विक्रांत चव्हाण, ठाणे ग्रामीण अध्यक्ष चेतनसिंह पवार आदी नेते उपस्थित होते.

वृत्तांकन - सौ. गौरी धबडे (ठाणे )
पत्रकार

म्हाप्रळ कुंभार्ली गावात संत शिरोमणी श्री गोरोबा काका ७०९ वी पुण्यतिथी - भक्ती, एकोपा आणि परंपरेचा भव्य सोहळा !

म्हाप्रळ कुंभार्ली गावात संत शिरोमणी श्री गोरोबा काका ७०९ वी पुण्यतिथी - भक्ती, एकोपा आणि परंपरेचा भव्य सोहळा !

ग्रामस्थानी राखली  संतांची परंपरा कीर्तन आणि हरिमानाचा गजरात सोहळा संपन्न 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

              म्हाप्रळ कुंभार्ली येथे संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील सर्व लहान-थोर मंडळींनी या कार्यक्रमासाठी मनापासून परिश्रम घेतले. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात गावातील तसेच मुंबईकर चाकरमानी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
               कार्यक्रमाची सुरुवात काकांच्या पवित्र स्मरणाने व पूजा-अर्चनेने झाली. भजन, कीर्तन, हरिपाठ आणि नामस्मरणाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पालखी सोहळा, दिंडी आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.महिलांनीही उत्साहाने पुढाकार घेत विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडले.
             भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा सर्वांनी लाभ घेतला. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात भक्ती, एकता आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
गावातील युवकांनी नियोजन, व्यवस्था आणि शिस्त राखण्यात मोलाची भूमिका बजावली. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडला. या पुण्यतिथी निमित्त गावकऱ्यांमध्ये एकोपा, श्रद्धा आणि समाजभावना अधिक दृढ झाली.अशा पवित्र आणि प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे संत गोरोबा काकांच्या शिकवणीची आठवण सतत जागृत राहते आणि पुढील पिढीला संस्कारांची अमूल्य देणगी मिळते.

न्हावा शेवातून १३२ कंटेनर्स जप्त ; चुकीची माहिती देत केली दिशाभूल !!

न्हावा शेवातून १३२ कंटेनर्स जप्त ; चुकीची माहिती देत केली दिशाभूल !!

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) ::उरण तालुक्यात अनेकदा अवैध मार्गाने व चुकीची माहिती देऊन परदेशातून विविध मालाची, वस्तूची आयात केल्याचे निदर्शनास आले आहे. पुन्हा एकदा या बाबीवर शिक्का मोर्तब झाले आहे.तस्करीविरोधातील एका मोठ्या मोहिमेत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) न्हावा शेवा बंदरावर १३९ कोटी रुपयांच्या चुकीची माहिती दिलेल्या मालाने भरलेले १३२ कंटेनर्स जप्त केले आहेत. या रॅकेटशी संबंधित मुख्य आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी सुमारे ३,०२९ मेट्रिक टन माल असलेले कंटेनर्स जप्त केले; या मालाची नोंद खोट्या पद्धतीने 'तूर डाळ' म्हणून करण्यात आली होती. सखोल तपासानंतर असे उघड झाले की, या साठ्यांमध्ये प्रत्यक्षात टांझानिया आणि सुदानमधून आयात केलेल्या २,७१० मेट्रिक टन कलिंगडाच्या बिया आणि कॅनडाकडून मिळवलेल्या ३१९ मेट्रिक टन हिरव्या वाटाण्यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने लादलेल्या कडक आयात निर्बंधांना बगल देण्याच्या विशिष्ट उद्देशाने ही चुकीची माहिती देण्यात आली होती.उरण तालुक्यात न्हावा शेवा बंदर विभागात अवैध वाहतूक, अवैध साहित्य, अवैध व बेकायदेशीर माल, वस्तूची मोठया प्रमाणात कंटेनर मधून वाहतूक होत असून पुन्हा एकदा उरण मध्ये या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे

निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्या दूर करा ; सभापती महेश म्हात्रे यांना संघटनेने घातले साकडं !!

निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्या दूर करा ; सभापती महेश म्हात्रे यांना संघटनेने घातले साकडं !!

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
 रायगड जिल्ह्यातील वयोवृद्ध सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी/निवड श्रेणीपासून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे प्रश्न प्रलंबित ठेवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला निवृत्त शिक्षक कंटाळले आहेत. ज्या शिक्षकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. त्यांचं निधन झालं आहे. प्रशासनातील अधिकारी त्यांच्याकडून तक्रार अर्ज मागतात ते देणार कसे ? असा प्रश्न निवृत्त शिक्षक संघाकडे समोर आला आहे. १९८६ च्या प्रा. चट्टोपाध्याय वेतन आयोगानी वरिष्ठ श्रेणी /निवड श्रेणी मंजूर करण्यासाठी २ सप्टेंबर १९८९ रोजी पारीत केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट मार्गदर्शन दिलेले आहे. त्याचा अभ्यास न केल्यामुळे अनेक निवृत्त शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी मंजूर केली नाही. परिणामी संबंधीत निवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करता येत नाही. असे निवृत्त शिक्षक आज या जगात नाहीत. तसेच त्यांचे वारसदार हयात नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचे तक्रार अर्ज करणार कोण ? तसेच संबंधीत शिक्षकांची सेवा पुस्तके गहाळ झाल्याचे कारण सांगून प्रलंबित प्रश्न सोडविण्यास तीन दशकाहून अधिक काळ टाळाटाळ केली आहे. त्यामुळे हताश झालेल्या सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन एका निवेदनाद्वारे निवृत्त शिक्षकांच्या समस्या दूर करा  असं साकडं घातलं असून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिनांक ३० जून २०२५ रोजी दिलेल्या निवदेनाची प्रलंबित प्रश्नांसह प्रत दिली आहे, असे संघटनेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !!

ठाण्यात नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे संपन्न !! बातमीदार, ठाणे प्रतिनिधी : ता. २२,  नागरी संरक्षण, नवी मुंबई स...