Saturday, 18 July 2026

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या वाणिज्य विभागामार्फत गुरुवार, दि.१६ जुलै २०२६ रोजी नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी ठिक ११.०० वाजता करण्यात आले होते.
 
नवीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची व महाविद्यालयाच्या धेय्य व उद्दिष्टांची ओळख करून देणे आणि त्यांचे स्वागत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत करून झाली. त्यानंतर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिकरित्या सुंदर स्वागतगीत सादर करून वातावरणात प्रसन्न केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत के. बेहेरा यांनी आपल्या भाषणात नवीन विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच शिस्त, नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. पंकज सरवदे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना विभागाची रचना, अभ्यासक्रम, महाविद्यालयातील सुविधा, परीक्षा पद्धती तसेच भविष्यातील करिअरच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी वाणिज्य विभागातील प्राध्यापक प्रशांत दळवी, साक्षी क्षीरसागर, मनप्रीत कौर, निलेश पवार, चंद्रकांत मोहिते, रोशनी सिंग, डॉ. शाश्वत गुप्ता, हिमांशू अग्रवाल आणि नंदिनी पाटील यांनी स्वतःचा परिचय करून देत आपल्या विषयांची व जबाबदाऱ्यांची माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या प्राध्यापक व विभागाशी परिचित होण्यास मदत झाली.

हा स्वागत समारंभ अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला. या कार्यक्रमामुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तसेच महाविद्यालयाबद्दल आपुलकीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेज मॅनेजमेंट (संस्था चालक), प्राचार्य, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

*प्रा. पंकज सरवदे*
(वाणिज्य विभाग प्रमुख)

Friday, 17 July 2026

शासनाच्या आदेशानंतरही कल्याण पंचायत समितीत घरकुल योजनेबाबत जनजागृती फलक नाही !!

शासनाच्या आदेशानंतरही कल्याण पंचायत समितीत घरकुल योजनेबाबत जनजागृती फलक नाही !! 

सामाजिक कार्यकर्ते पञकार विशाल कुरकुटे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कल्याण | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. १७. एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या आवारात घरकुल योजनांमधील अनियमितता, दलालगिरी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जनजागृती फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कल्याण पंचायत समिती कार्यालयात अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार  विशाल शांताराम कुरकुटे यांनी केला आहे.
यासंदर्भात विशाल कुरकुटे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कल्याण यांना लेखी निवेदन सादर करून शासनाच्या निर्देशानुसार तात्काळ जनजागृती फलक उभारण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, दलालांपासून सावध राहावे तसेच तक्रारींसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक स्पष्टपणे दर्शविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून करण्यात आलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनाची दखल घेत पंचायत समिती प्रशासन शासनाच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन; भिवंडीत दोन आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित !!

अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन; भिवंडीत दोन आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित !!

महानगरपालिकेची संयुक्त कारवाई; नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा

प्रतिनिधी भिवंडी 
दिनांक 17 जुलै 2026

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने शहरातील विविध औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. या तपासणीत अग्निसुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न केलेल्या तसेच अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला (NOC) न घेतलेल्या आस्थापनांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिकेने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६, सुधारित अधिनियम २०२३ आणि नियम २०२५ अंतर्गत संबंधित आस्थापनांना नोटिसा बजावून अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

याच मोहिमेअंतर्गत गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी कल्याण रोडवरील नारायण भोईर कंपाऊंड येथे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, कुंभारवाडा पोलीस ठाणे आणि टोरंट पॉवरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान मेसर्स एक्सेल इलेक्ट्रोकेम टेक्नॉलॉजी (युनिट क्र. २) आणि मेसर्स क्रेस्कोनंट इंडिया प्रा. लि. या दोन आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित करून आस्थापने सील करण्यात आली.

महानगरपालिकेने शहरातील सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनाधारकांना आवाहन केले असून, अशा प्रकारच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, परवाना विभाग आणि करमूल्यांकन विभागाशी संपर्क साधून आवश्यक परवाने, अग्निशमन ना-हरकत दाखला (NOC) तसेच घरपट्टीसह इतर थकबाकीची पूर्तता करावी, असे स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने इशारा दिला आहे की, अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांनी अग्निसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळून आवश्यक परवानग्या तातडीने प्राप्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यास वर्गाला सुरुवात !!

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यास वर्गाला  सुरुवात !!

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार दिनांक १४ जुलै २०२६ रोजी स्कॉलरशिप परीक्षेच्या उज्वल निकालाची परंपरा असलेल्या साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप अभ्यास वर्गाचे  उद्घाटन साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या शुभहस्ते झाले.

       यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड,माध्यमिक विभाग मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक  गिरीश पाटील , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  भूषण जाधव , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  अंकुश जोगळे , बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे आणि इयत्ता चौथी व सातवी चे स्कॉलरशिप विषय शिक्षक  उपस्थित होते. 

        सदर स्कॉलरशिप अभ्यास वर्ग शाळेच्या वेळा व्यतिरिक्त १ तास अगोदर येऊन शिक्षक स्वतःचा जादा वेळ देऊन घेणार आहेत. अशाच प्रकारे इयत्ता दहावीचे इंग्रजी आणि मराठी माध्यमाचे शिक्षक अभ्यास वर्ग शाळेच्या वेळा व्यतिरिक्त १ तास अगोदर येऊन घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  नरसू पाटील  यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही असे सांगताना स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ध्येयवेडे व्हा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. येथील गुणवत्तावान शिक्षक शालेय वेळेव्यतिरिक्त वेळेत आपणाला मार्गदर्शन करणार आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यावा असे म्हटले. तर शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड  यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मेहनत घेऊन रायगड जिल्ह्यात अधिकाधिक स्कॉलरशिप मिळवण्याचा मान मिळवून साई ट्रस्टचे नाव मोठं करावं अशी शुभेच्छा देताना सर्व स्कॉलरशिप शिकवणाऱ्या गुणी शिक्षकांचे कौतुक केले.मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील  यांनी स्कॉलरशिप परीक्षेत सर्वोत्कृष्ट गुण मिळवणारा विद्यार्थी शाळेच्या झेंडावंदनाचा मानकरी होईल. शाळेच्या वतीने हा मान विद्यार्थ्यांना दिला जातो ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या इतिहासात नोंद होईल अशी प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली. इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  अंकुश जोगळे यांनी आपल्या शाळेने सर्वाधिक स्कॉलरशिप आणण्याचा विक्रम करावा आणि साई ट्रस्ट चे नाव मोठे करावे असे म्हटले.बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून आपल्या आई वडिलांचे आणि शाळेचे नाव मोठे करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कॉलरशिप तज्ञ मार्गदर्शिका श्रीमती योगसाधना पाटील  यांनी केले

वसईत अभेद अभिषेकी यांच्या शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताची सुरेल मैफल; संगीत रसिकांसाठी अविस्मरणीय पर्वणी !!

वसईत अभेद अभिषेकी यांच्या शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताची सुरेल मैफल; संगीत रसिकांसाठी अविस्मरणीय पर्वणी !!

वसई, प्रतिनिधी : पंकज चव्हाण

वसईतील संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी ठरणारी युवा गायक श्री. अभेद शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची सुरेल मैफल रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता वसई (प.) येथील बाजीपूर वनिता विद्यालय, एम. एस. ई. बी. कार्यालयासमोर (वसई गाव) येथे रंगणार आहे. अनौपचारिक संगीत सभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संगीत रसिकांना अभिजात भारतीय संगीताचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी लाभणार आहे.

प्रख्यात गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या समृद्ध संगीत परंपरेचा वारसा लाभलेले आणि ज्येष्ठ गायक शौनक अभिषेकी यांचे सुपुत्र अभेद अभिषेकी यांनी आपल्या सुरेल, अभ्यासपूर्ण आणि भावस्पर्शी गायकीमुळे अल्पावधीतच संगीतविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शास्त्रीय संगीताची सखोल जाण, रागदारीतील प्रभुत्व आणि उपशास्त्रीय संगीताचे भावपूर्ण सादरीकरण ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मैफलीला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.

या मैफलीत अभेद अभिषेकी यांना तबल्यावर श्री. कार्तिक स्वामी तर हार्मोनियमवर श्री. वरद सोहोनी यांची समर्थ आणि सुरेल साथ लाभणार आहे. या त्रिवेणी संगमातून संगीताची एक संस्मरणीय मैफल अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

अभिजात संगीताची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, दर्जेदार संगीताचा आस्वाद सर्वसामान्य रसिकांपर्यंत नेणे आणि वसईच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणे या उद्देशाने अनौपचारिक संगीत सभेतर्फे अशा मैफलींचे सातत्याने आयोजन केले जाते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे वसईसह परिसरातील संगीतप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, स्वेच्छादेणगीचे स्वागत करण्यात येणार आहे. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांनी या सुरेल सांगीतिक पर्वणीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभेद अभिषेकी यांच्या मधुर स्वरांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अभिजात संगीताची श्रीमंती, तरुण प्रतिभेचे प्रभावी सादरीकरण आणि अनुभवी साथसंगत यांचा संगम घडविणारी ही मैफल वसईच्या सांस्कृतिक विश्वात निश्चितच संस्मरणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

*इम्पॅक्ट न्यूज : मिलापनगर तलाव परिसरात केडीएमसीकडून साफसफाई !!

*इम्पॅक्ट न्यूज : मिलापनगर तलाव परिसरात केडीएमसीकडून साफसफाई !!

*डोंबिवली, दि. 17 जुलै 2026*

"बातमीदार माझा" मध्ये 16 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीची केडीएमसी प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. केडीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मिलापनगर तलावातील निर्माल्य आणि कचरा तलावातून काढला आहे. तसेच तलावाच्या आजूबाजूच्या परिसरातील कचरा आणि प्लास्टिकही उचलून नेण्यात आले आहे.

*नागरिकांच्या 6 मागण्यांवर अद्याप निर्णय नाही*  
स्वच्छता मोहिमेबद्दल स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केडीएमसीचे आभार मानले आहेत. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या एकूण 6 मागण्यांवर केडीएमसीने अद्याप कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तलावाची स्वच्छता कायमस्वरूपी राखली जाईल का, याबत नागरिक साशंक आहेत.

*कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी*  
नागरिकांनी केडीएमसीला तलाव स्वच्छतेबाबत केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. तसेच तलावात निर्माल्य आणि कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर कडक कारवाई करावी. नागरिकांनीही तलाव स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी "बातमीदार माझा" आणि केडीएमसी प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.

कल्याणच्या शिक्षिकेचा घोटी येथे मृतदेह आढळला ; हत्येचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू !

कल्याणच्या शिक्षिकेचा घोटी येथे मृतदेह आढळला ; हत्येचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू !

कल्याण : संदीप शेंडगे 

कल्याण येथील वेणूबाई पावशे विद्यालयाच्या शिक्षिका संगीता मारुती चंदनशिवे (वय ५३) या १४ जुलै २०२६ रोजी बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह १६ जुलै रोजी घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलच्या कंपाऊंडबाहेर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला जात असून वाडीवरे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता चंदनशिवे या १४ जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत हजर झाल्या होत्या. दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या एलआयसीच्या कामानिमित्त आसनगाव येथे गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला आणि त्या बेपत्ता झाल्या असल्याची कुटुंबीयांनी माहिती दिली.

तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन जोंधळे पॉलिटेक्निक स्कूलजवळील मुंबई-नाशिक महामार्ग परिसरात आढळून आले. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाल्याचे समोर आले आहे. 

आसनगाव येथे त्या कोणाला भेटल्या, आसनगाव ते घोटी हा प्रवास त्यांनी कोणासोबत केला, तसेच प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली का, आणि त्यानंतर मृतदेह एसएमबीटी हॉस्पिटल परिसरात आणून टाकण्यात आला का, या सर्व बाबींचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. तसेच त्यांच्या अंगावर मारल्याच्या खुणा असून हाताला व पायाच्या मार लागल्याचे दिसून आले

या घटनेमुळे कल्याणमधील शिक्षकवर्ग तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणाचा तपास वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण लहामाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासानंतरच मृत्यूमागील नेमके काय घडले याचा सखोल तपास करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !! पनवेल येथील सेंट व...