Saturday, 18 July 2026

निवृत्त सैनिकांनी विद्यार्थ्यांना दिला देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश !!

निवृत्त सैनिकांनी विद्यार्थ्यांना दिला देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश !!

टेंडर किड्झ प्री-स्कूल व पॅराडाईज इंग्लिश स्कूलमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि करिअर मार्गदर्शनावर विशेष व्याख्यान

प्रतिनिधी भिवंडी 
दिनांक 17 जुलै 2026 

आरियन्स अकॅडमी एज्युकेशनल ट्रस्ट संचलित टेंडर किड्झ प्री-स्कूल व पॅराडाईज इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुणांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले सैनिक फुलसिंग सोलंकी यांच्या विशेष प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या फुलसिंग सोलंकी यांनी भारतीय सैन्यातील आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर उलगडले. त्यांनी देशाच्या सीमांवर कर्तव्य बजावताना आलेली आव्हाने, सैनिकांचे कठोर जीवन आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व याविषयी माहिती दिली. तसेच 'ऑपरेशन सिंदूर' मधील सहभागाचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांना शिस्त, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम आणि जबाबदार नागरिक बनण्याचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात करिअर करण्यासाठी आवश्यक पात्रता, शारीरिक व मानसिक तयारी, तसेच शिक्षणाचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेबद्दल अभिमान निर्माण झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात भारतीय सैन्यात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.

शाळा व्यवस्थापनाने सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. शिस्त, नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवेप्रती आदराची भावना रुजविण्यास अशा कार्यक्रमांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याचे जीवन, त्याग, शौर्य आणि देशसेवेची मूल्ये जवळून जाणून घेण्याची संधी मिळते.

या कार्यक्रमाला शाळेच्या संस्थापिका संगीता नागवंशी, नरेश साहू, विजय गुप्ता, अरविंद जैसवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी निवृत्त सैनिक फुलसिंग सोलंकी यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करत त्यांचे आभार मानले.

टिटवाळ्यातील के.एन.टी. शाळा प्रकरणात पालकांच्या एकजुटीचा विजय !!

टिटवाळ्यातील के.एन.टी. शाळा प्रकरणात पालकांच्या एकजुटीचा विजय !!

** प्रशासनाकडून लेखी आश्वासन

कल्याण, संदीप शेंडगे : टिटवाळ्यातील के.एन.टी. शाळेतील कथित सक्तीची गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी, जादा शुल्क आणि अन्य अनियमिततेविरोधात पालकांनी कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागासमोर शांततापूर्ण आंदोलन केले. या आंदोलनानंतर प्रशासनाने पालकांच्या प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन देत पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले.

प्रशासनाने गणवेश बदल प्रक्रियेची चौकशी, कथित पीटीए ठरावाची पडताळणी, लेट फी प्रकरणी नोटीस, मुख्याध्यापिकांवरील तक्रारींची चौकशी तसेच विद्यार्थ्यांवर कोणताही भेदभाव होणार नाही, याची ग्वाही दिली. तसेच, पालकांना नको असलेले गणवेश व शैक्षणिक साहित्य परत स्वीकारण्याचे निर्देश शाळेला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना बालभारतीची पुस्तके वापरण्याचा अधिकारही प्रशासनाने अधोरेखित केला.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी हा लढा प्रत्येक पालकाच्या हक्कासाठी असल्याचे सांगत, टिटवाळा परिसरात महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी २,००० पालकांच्या हमीपत्र मोहिमेला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती दिली.

दूदूरदृष्टी असलेला कामगार नेता म्हणजे महेंद्रशेठ घरत ; CWC द्रोणागिरी कामगारांना ६००० रुपये पगारवाढ.!

दूदूरदृष्टी असलेला कामगार नेता म्हणजे महेंद्रशेठ घरत ; CWC द्रोणागिरी कामगारांना ६००० रुपये पगारवाढ.!

येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे )
सन २०२३ पूर्वी १३ वर्ष कंपनी बंद असतांना उरण तालुक्यातील बजेट सीएफएस यांच्या मार्फत कंपनी सुरु करण्याचा प्रस्ताव आला. त्यावेळी ९००० रुपये पगारावर कंपनी सुरु करण्यात बऱ्याच जणांचा विरोध होता परंतु चारशे ते पाचशे कामगारांच्या चुली पुन्हा सुरु होतील या दूरदृष्टीने कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी लोकांनी त्यावेळी केलेल्या टिकेला न जुमानता कंपनी सुरु करून जवळजवळ ५०० कामगारांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला. कंपनी सुरु होवून सहा महिन्याच्या कालावधीतच कामगारांना किमान वेतन देण्यात कामगार नेते महेंद्रशेठ घरत यशस्वी झाले. आणि दिनांक १० जुलै २०२६ रोजी किमान वेतनाच्या वर कामगारांच्या पगारात ६००० रुपये वाढ करण्याचा करार सुद्धा महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटने तर्फे करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना प्रथमवर्षी रुपये ३०००, द्वितीय वर्षी १५०० रुपये तर तिसऱ्या वर्षी १५०० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगार विमा योजना (ESIS),कामगार कायद्यानुसार बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कामगारांना तिन महिन्याचा पगारवाढीच्या फरकाची रक्कम या महिन्यातच मिळणार आहे. या करारनाम्यामुळे कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे, येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे असे उद्गार कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या बद्दल काढले व त्यांचे मनपूर्वक आभार मानले.

या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, बजेट सिएस चे डायरेक्टर संजिव गुप्ता, डायरेक्टर निखिल भंडारे, ऍडमिन मॅनेजर कालिदास यादव, कामगार प्रतिनिधी अरुण पाटील, सुजित पाटील, प्रदिप पाटील, वसंत भोईर, सर्वेश तांडेल, संदीप पाटील, धर्मेश पाटील, मंदा पाटील, प्रकाश गायकवाड व धिरज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

द्रोणागिरी नोडमध्ये कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवरचा सुळसुळाट; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवणार कोण ?

द्रोणागिरी नोडमध्ये कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवरचा सुळसुळाट; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवणार कोण ?

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारले जात असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी चिंता वाढली असून, संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, निवासी भागात मोबाईल टॉवर उभारल्यामुळे दीर्घकाळ रेडिओ-फ्रिक्वेन्सी किरणोत्सर्गाच्या संपर्कात राहावे लागते. यामुळे डोकेदुखी, झोप न लागणे, मानसिक तणाव, थकवा, एकाग्रता कमी होणे यांसारख्या तक्रारींची भीती व्यक्त केली जाते. या विषयावर जगभरात विविध अभ्यास सुरू असून, त्यामुळे निवासी भागातील टॉवर उभारणीबाबत सर्व सुरक्षा निकष आणि कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आवश्यक परवानग्यांशिवाय उभारण्यात आलेले टॉवर त्वरित हटवावेत तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांनी सिडको प्रशासन व संबंधित शासकीय विभागाकडे अधिकृत पत्रव्यवहार करून कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवरची सखोल चौकशी करण्याची, नियमांचे उल्लंघन आढळल्यास तातडीने कठोर कारवाई करण्याची आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तांत्रिक तपासणीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.


कोट (चौकट ):- 

द्रोणागिरी परिसरात अवैध बेकायदेशीर मोबाईल टॉवर यांना कोणतेही परवानगी मिळू नये.मोबाईल टॉवर मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून बेकायदेशीर टॉवर वर त्वरित कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक ते पाठपुरावा सुरु आहे.
      - जगजीवन भोईर,  द्रोणागिरी शिवसेना शहर प्रमुख 


======================================================
मोबाईल टॉवर बसवायला आलेले कर्मचारी सिडकोची परवानगी आहे असे सांगतात मात्र कागदपत्रे दाखवत नाहीत. मोबाईल टॉवर भर रस्त्यात बसवत आहेत. मोबाईल टॉवर मुळे जनता, नागरिक यांना भविष्यात मोठे दुष्परिणाम भोगावे लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावर किंवा रस्त्यात कुठेही मोबाईल टॉवर बसवू नयेत अशी जनतेची मागणी आहे.
       - शोभा भोईर, महिला सामाजिक कार्यकर्त्या, द्रोणागिरी नोड, उरण

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या वाणिज्य विभागामार्फत गुरुवार, दि.१६ जुलै २०२६ रोजी नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी ठिक ११.०० वाजता करण्यात आले होते.
 
नवीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची व महाविद्यालयाच्या धेय्य व उद्दिष्टांची ओळख करून देणे आणि त्यांचे स्वागत करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत करून झाली. त्यानंतर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिकरित्या सुंदर स्वागतगीत सादर करून वातावरणात प्रसन्न केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत के. बेहेरा यांनी आपल्या भाषणात नवीन विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच शिस्त, नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. पंकज सरवदे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना विभागाची रचना, अभ्यासक्रम, महाविद्यालयातील सुविधा, परीक्षा पद्धती तसेच भविष्यातील करिअरच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी वाणिज्य विभागातील प्राध्यापक प्रशांत दळवी, साक्षी क्षीरसागर, मनप्रीत कौर, निलेश पवार, चंद्रकांत मोहिते, रोशनी सिंग, डॉ. शाश्वत गुप्ता, हिमांशू अग्रवाल आणि नंदिनी पाटील यांनी स्वतःचा परिचय करून देत आपल्या विषयांची व जबाबदाऱ्यांची माहिती दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या प्राध्यापक व विभागाशी परिचित होण्यास मदत झाली.

हा स्वागत समारंभ अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला. या कार्यक्रमामुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तसेच महाविद्यालयाबद्दल आपुलकीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेज मॅनेजमेंट (संस्था चालक), प्राचार्य, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

*प्रा. पंकज सरवदे*
(वाणिज्य विभाग प्रमुख)

Friday, 17 July 2026

शासनाच्या आदेशानंतरही कल्याण पंचायत समितीत घरकुल योजनेबाबत जनजागृती फलक नाही !!

शासनाच्या आदेशानंतरही कल्याण पंचायत समितीत घरकुल योजनेबाबत जनजागृती फलक नाही !! 

सामाजिक कार्यकर्ते पञकार विशाल कुरकुटे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

कल्याण | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. १७. एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या आवारात घरकुल योजनांमधील अनियमितता, दलालगिरी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जनजागृती फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कल्याण पंचायत समिती कार्यालयात अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार  विशाल शांताराम कुरकुटे यांनी केला आहे.
यासंदर्भात विशाल कुरकुटे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कल्याण यांना लेखी निवेदन सादर करून शासनाच्या निर्देशानुसार तात्काळ जनजागृती फलक उभारण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, दलालांपासून सावध राहावे तसेच तक्रारींसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक स्पष्टपणे दर्शविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून करण्यात आलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनाची दखल घेत पंचायत समिती प्रशासन शासनाच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन; भिवंडीत दोन आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित !!

अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन; भिवंडीत दोन आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित !!

महानगरपालिकेची संयुक्त कारवाई; नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशारा

प्रतिनिधी भिवंडी 
दिनांक 17 जुलै 2026

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने शहरातील विविध औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. या तपासणीत अग्निसुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना न केलेल्या तसेच अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला (NOC) न घेतलेल्या आस्थापनांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिकेने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६, सुधारित अधिनियम २०२३ आणि नियम २०२५ अंतर्गत संबंधित आस्थापनांना नोटिसा बजावून अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

याच मोहिमेअंतर्गत गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी कल्याण रोडवरील नारायण भोईर कंपाऊंड येथे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, कुंभारवाडा पोलीस ठाणे आणि टोरंट पॉवरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान मेसर्स एक्सेल इलेक्ट्रोकेम टेक्नॉलॉजी (युनिट क्र. २) आणि मेसर्स क्रेस्कोनंट इंडिया प्रा. लि. या दोन आस्थापनांचा वीजपुरवठा खंडित करून आस्थापने सील करण्यात आली.

महानगरपालिकेने शहरातील सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनाधारकांना आवाहन केले असून, अशा प्रकारच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, परवाना विभाग आणि करमूल्यांकन विभागाशी संपर्क साधून आवश्यक परवाने, अग्निशमन ना-हरकत दाखला (NOC) तसेच घरपट्टीसह इतर थकबाकीची पूर्तता करावी, असे स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेने इशारा दिला आहे की, अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांनी अग्निसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळून आवश्यक परवानग्या तातडीने प्राप्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवृत्त सैनिकांनी विद्यार्थ्यांना दिला देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश !!

निवृत्त सैनिकांनी विद्यार्थ्यांना दिला देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश !! टेंडर किड्झ प्री-स्कूल व पॅराडाईज इंग्लिश स्कूलमध्ये शिस्त, नेतृत्वगु...