Thursday, 21 May 2026

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ३१ मे नंतर कारवाई : आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे आश्वासन

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ३१ मे नंतर कारवाई : आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे आश्वासन

उरण, विठ्ठल ममताबादे : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठीची प्रकरणे सावंतवाडी नगरपरिषद, उरण नगरपरिषद आणि काही तुरळक ठिकाणी केवळ त्या त्या ठिकाणच्या मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रलंबित आहेत.


या गंभीर विषयाच्या अनुषंगाने  उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची माजी राज्यमंत्री प्रविण भोसले आणि कामगार नेते संतोष पवार, कार्याध्यक्ष म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियन यांनी एक्स्प्रेस टॉवर येथे भेट घेतली. 

सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय, मा. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, तसेच नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे स्पष्ट आदेश असतानाही विनाकारण दिरंगाई होत असल्याचे शिष्टमंडळाने मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले.

याची तात्काळ दखल घेत  मंत्री  उदय सामंत यांनी आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय अभिषेक कृष्णा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. यावेळी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, _"संबंधित अधिकारी विनाकारण अडवणूक करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर ३१ मे २०२६ नंतर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल."

या बैठकीस सावंतवाडी नगरपरिषदेचे सफाई कामगारांचे वारस गोपाळ नामदेव सावंत,  सुनिल नारायण परब, नितीन सदानंद कदम आणि संदीप पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपली व्यथा मंत्रीमहोदयांसमोर मांडली.

शासनाचे स्पष्ट आदेश असूनही मुख्याधिकारी पातळीवर फाईल अडवून ठेवली जात असल्याने अनेक सफाई कामगार कुटुंबे न्यायापासून वंचित आहेत. आयुक्तांच्या आश्वासनामुळे आता कारवाईची अपेक्षा वाढली आहे.

सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेतून शेतकरी महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा !!

सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेतून शेतकरी महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा !!

*उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान व पंचायत समिती कल्याण कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण तालुक्यातील महिला बचत गटांनी ई-कार्टच्या माध्यमातून थेट बाजारपेठ गाठली*

ठाणे, दि. २० : पंचायत समिती कल्याण कृषी विभाग व उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान  यांच्या कृती संगमातून सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजना २०२५-२६ अंतर्गत ६० टक्के अनुदानित योजनेद्वारे कल्याण तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत घोटसई प्रभागातील सांगोडे गावच्या “स्वराज्य स्वयं सहायता समूह” आणि वासुंद्री गावच्या “प्रगती स्वयं सहायता समूह” या महिला बचत गटांनी ई-कार्टचा लाभ घेत स्वतःचा भाजीपाला थेट बाजारपेठेत विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामीण भागातील अनेक महिला शेतकरी भाजीपाला उत्पादन करत असल्या तरी बाजारपेठेचे ज्ञान, वाहतुकीची सुविधा आणि विक्री व्यवस्थेअभावी त्यांना आपला माल कमी दरात व्यापाऱ्यांना विकावा लागत होता. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या भाजीपाल्याला योग्य मोबदला मिळत नसल्याने महिलांच्या उत्पन्नावर मर्यादा येत होत्या.
ही परिस्थिती बदलण्यासाठी महिला बचत गटांनी एकत्र येत गावातील महिलांचा भाजीपाला संकलित करून तो थेट मोठ्या बाजारपेठेत विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पंचायत समिती कल्याण कृषी विभागामार्फत सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजना अंतर्गत ई-कार्ट उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेत ६० टक्के अनुदान मिळाल्यामुळे महिलांनी स्वनिधीतून उर्वरित रक्कम उभी करून हा उपक्रम सुरू केला आहे.

या माध्यमातून सांगोडे व वासुंद्री गावातील महिला आता कल्याण, टिटवाळा तसेच विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला विक्री करत आहेत. त्यामुळे मध्यस्थांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली असून शेतमालाला पूर्वीपेक्षा अधिक चांगला दर मिळू लागला आहे.

भाजीपाला विक्रीबरोबरच या ई-कार्टचा उपयोग गावातील मच्छी विक्री, पाणी जार वाहतूक तसेच इतर वस्तूंच्या ने-आणीसाठीही करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील महिलांना कमी खर्चात वाहतूक सुविधा उपलब्ध होऊन अतिरिक्त रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.

स्वराज्य स्वयं सहायता समूहाच्या सदस्य कामिनी शनिश्वर सुतार यांनी सांगितले की, “उमेद अभियानामुळे आम्हाला उपजीविका वाढीचे महत्त्व समजले. आधुनिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळल्यानंतर उत्पादन वाढले, मात्र बाजारपेठेअभावी योग्य दर मिळत नव्हता. आता ई-कार्टमुळे आम्ही स्वतःच भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगला भाव मिळत असून गावातील इतर महिलांनाही फायदा होत आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “पूर्वी व्यापाऱ्यांना कमी दरात भाजी विकावी लागत होती. आता आम्ही गावातील महिलांकडूनच भाजीपाला योग्य दराने खरेदी करून मोठ्या बाजारात विक्री करत आहोत. यातून गटातील महिलांचे उत्पन्न वाढत असून आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे.”

जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती कल्याण यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यात येत असून ग्रामीण महिलांना रोजगार, बाजारपेठ आणि आर्थिक सक्षमीकरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिला शेतकरी संघटित होत असून “उत्पादन ते बाजारपेठ” हा संपूर्ण प्रवास स्वतः हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण होत आहे. सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाबरोबरच ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराला नवी गती मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आणि पुढे जाऊन अशाच प्रकारे उमेद - महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत महिलांच्या उपजीविका वाढीवर भर देऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणार आहेत.
जसे आता भाजीपाला कलेक्शन, ग्रेडिंग, पॅकिंजिंग, बाजारपेठ शोधणे, मार्केटिंग करून स्वतः मार्केट मध्ये स्थान निर्माण करत आहेत.

Wednesday, 20 May 2026

पत्रकारितेतील तळागाळातील शब्दांना सलाम ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा 2026’ चे आयोजन; पुरस्कारासाठी मागविले प्रस्ताव !!

पत्रकारितेतील तळागाळातील शब्दांना सलाम ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा 2026’ चे आयोजन; पुरस्कारासाठी मागविले प्रस्ताव !!

मुंबई (प्रतिनिधी) : समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ तर्फे ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा 2026’ आयोजित करण्यात आला आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत आहे.

‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ या संस्थेच्या माध्यमातून तेटांबे यांनी सलग चार वर्षे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा, सेलिब्रिटी क्रिकेट मॅच आदी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. आता त्यांनी पत्रकार आणि संपादकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या उपक्रमात मुख्य प्रवाहातील माध्यमांसह ग्रामीण भागातील मुक्त वार्ताहर, साप्ताहिक व पाक्षिकांचे प्रतिनिधी, डिजिटल न्यूज पोर्टल संपादक, तळागाळातील पत्रकार तसेच सोशल मीडियामधून कार्यरत पत्रकारांना विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. पत्रकारितेतील निष्ठा, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

या सोहळ्यात ‘स्वाभिमान लेखणी सन्मान पुरस्कार’, ‘शब्दवेध गौरव सन्मान पुरस्कार’, ‘अजेय लेखणी सन्मान पुरस्कार’, ‘कलम-रत्न सन्मान पुरस्कार’ तसेच ‘निर्भीड पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्कारासाठी इच्छुक पत्रकार, संपादक व डिजिटल मीडिया प्रतिनिधींनी आपली वैयक्तिक माहिती, कार्याचा संक्षिप्त परिचय आणि छायाचित्र दि. 15 जून 2026 पर्यंत आर्यारवी एंटरटेनमेंट, 7/52, दिग्विजय मिल चाळ, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई – 400033 येथे पाठवावे, असे आवाहन संस्थापक महेश्वर तेटांबे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी 9082293867 / 8879810298 या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख व स्थळ कार्यक्रमाच्या पंधरा दिवस अगोदर जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

समन्वयक :

गुरुनाथ तिरपणकर – 9323662619
राहुल खरात – 8308809754
केतन भोज – 8369554418 / 8879544540

Tuesday, 19 May 2026

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

*रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त*

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने येथील मुख्य बाजारपेठ ते स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा वाढल्याने नागरिकांसह रिक्षाचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते, फळ विक्रेते, आईस्क्रीम विक्रेते, भेळपुरी मोमोज आणि शोरमा विक्रेते आणि विविध हातगाडीधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
या फेरीवाल्यांविरोधा रिक्षा चालक मालक असोसिएशन आंबिवली मोहने विभागीय अध्यक्ष शिवाजी पाटील आक्रमक झाले असून त्यांनी थेट पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.


विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मोहने मुख्य बाजारपेठ परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. हातगाड्यांमुळे रस्ते अरुंद झाले असून रिक्षा वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे रिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

अनधिकृत फेरीवाला पथकाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवाजी पाटील यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचे रिक्षा चालक आक्रमक झाले आहे. 
मोहने परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर कठोर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थी महिला व वृद्ध आणि नोकरदार वर्गांने अशा रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होत असून भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Monday, 18 May 2026

वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या - अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष*

वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या - अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

   *नीट (NEET)* वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड गैरव्यवहारामुळे आज देशातील तब्बल बावीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. ही केवळ एका परीक्षेची गोपनीयता धोक्यात येण्याची बाब नसून, देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेली शिक्षण माफियांची कीड यातून उघड झाली आहे. या घोटाळ्यामुळे नैराश्यातून चार निष्पाप विद्यार्थ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली आहे, परंतु हा आत्महत्येचा प्रकार नसून भ्रष्ट यंत्रणेने घेतलेला तो बळी आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, देशातील या सर्वात मोठ्या परीक्षेचे पवित्र्य राखण्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. घोटाळा समोर आल्यानंतर सुरुवातीला तो पूर्णपणे नाकारणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी नेहमीप्रमाणे आपली नैतिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते, परंतु त्यांनी तसे न केल्यामुळे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच धारिष्ट्य दाखवून शिक्षण मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी आता राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

वृत्तांकन - विलासराव कोळेकर सर 

** २० मेच्या मेडिकल संपाला नागरिकांचा तीव्र विरोध !!

** २० मेच्या मेडिकल संपाला नागरिकांचा तीव्र विरोध !!

*“संपात सहभागी होणाऱ्या मेडिकल दुकानांचे परवाने रद्द करा” — नागरिकांची मागणी*

संदीप शेंडगे.....
कल्याण : २० मे रोजी पुकारण्यात आलेल्या ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या देशातील सर्व मेडिकल दुकानांच्या संपाला नागरिकांकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत असून, अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या मेडिकल सेवा बंद ठेवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे अयोग्य असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संपात सहभागी होणाऱ्या मेडिकल दुकानांवर शासनाने कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असून त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला असून पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे महागाईने उच्चांक गाठला असून नागरिक कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत त्यातच मेडिकल असोसिएशनने बंदची हाक दिल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राज्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात आवश्यक तेवढा सर्वसामान्य पुरेल इतका मेडिकलचा साठा उपलब्ध नाही याचाच परिणाम रुग्णांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हलवण्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्षाचे ३६५ दिवस मोठ्या प्रमाणात नफा कमावणारे अनेक मेडिकल चालक आता स्वतःच्या आर्थिक हितासाठी संपाचा मार्ग अवलंबत असून, रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करत आहेत. मूळ किमतीपेक्षा दोनशे ते तीनशे टक्के जादा दराने औषध विक्री होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मेडिकल औषध निर्माण कंपन्या मेडिकल दुकानदारांना मोठ्या प्रमाणात एमआरपी पेक्षा जास्त किंमत ठेवून औषध विक्री करायला सांगतात औषधांवर लिहिलेली किंमत पाहून ग्राहक असेल ती किंमत देऊन औषधे खरेदी करतो.

हे मेडिकल दुकानदार स्वस्त व परिणामकारक असलेल्या जेनेरिक औषधांना सुरुवातीपासून विरोध करीत आले आहेत. आजही अनेक मेडिकल दुकानांमध्ये जाणीवपूर्वक जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना महागडी ब्रँडेड औषधे खरेदी करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

डायबिटीस, बीपी, पेनकिलर यांसारख्या नियमित लागणाऱ्या औषधांमधून मोठ्या प्रमाणावर नफा कमावला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरने लिहून दिलेली औषधे घ्यावी लागत असल्याने मेडिकल चालक मनमानी करत आहेत,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

प्रत्येक मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट नियुक्त करणे हा शासकीय नियम असतानाही हेच मेडिकल चालक फार्मासिस्ट ठेवत नाहीत तसेच एकाच लायसनवर परवाण्यावर अनेक मेडिकल दुकाने चालवली जातातकाही शहरी व ग्रामीण भागातील मेडिकल चालक हे अशिक्षित दहावी बारावी शिकलेले व्यक्ती दुकानात असतात मेडिकल डिग्री न घेतलेले म्हणजेच बी फार्मसी किंवा एम फार्मसी कोर्स न केलेले आढळून येतात.

काही ठिकाणी बंदी असलेल्या सेक्स वर्धक गोळ्या तसेच गर्भपाताच्या गोळ्यांचीही बेकायदेशीर विक्री होत असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“अत्यावश्यक सेवा बंद ठेवून नागरिकांना त्रास देण्याचा अधिकार कोणालाही नाही. २० मेच्या संपाला नागरिकांचा पूर्ण विरोध असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध !

चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध !

** आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) ::उरण तालुक्यातील चिर्ले ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश ज्ञानेश्वर पाटील हे सोमवारी (ता. १८) बिनविरोध निवडून आले. गावठाण, जांभूळपाडा आणि चिर्ले अशा तीन गावांची मिळून चिर्ले ग्रामपंचायत आहे. ते मूळचे जांभूळपाडा गावचे आहेत. कॉंग्रेसचे ते गाव अध्यक्ष आहेत. राजेश पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांची  बॅंजोच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील (काका पाटील), तसेच चिर्ले ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील, समीर मढवी, विनोद पाटील, प्रफुल्ल माळी आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचा उपसरपंच झाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीत जांभूळपाडा ग्रामस्थांनी उपसरपंचांचे स्वागत केले

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ३१ मे नंतर कारवाई : आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे आश्वासन

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ३१ मे नंतर कारवाई : आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे आश्वासन उर...