Friday, 6 March 2026

सामाजिक क्षेत्रातील सक्रिय महिला सामाजिक कार्यकर्त्या - भूमिका सिंह

महिला दिना निमित्त लेख.

सामाजिक क्षेत्रातील सक्रिय महिला सामाजिक कार्यकर्त्या -  भूमिका सिंह 

भूमिका सिंह या लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी आणि द्रोणागिरी फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून समाजाच्या उन्नतीसाठी आपला वेळ, ऊर्जा आणि नेतृत्व समर्पितपणे देत आहेत. त्यांच्या कार्यातून समाजाबद्दलची जबाबदारी आणि गरजूंबद्दलची संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते.

त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कपडे वाटप उपक्रम, बीच स्वच्छता अभियान आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण यांसारख्या साध्या पण अर्थपूर्ण उपक्रमांपासून झाली. छोट्या स्तरावर सुरू झालेले हे कार्य हळूहळू व्यापक मानवतावादी चळवळीत रूपांतरित झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन घडून आले.

शिक्षण आणि बालकल्याण हे त्यांच्या कार्याचे प्रमुख क्षेत्र ठरले. झोपडपट्टीतील मुलांना मोफत शिक्षण देणे, दर रविवारी शैक्षणिक उपक्रम आयोजित करणे, गरजू मुलांना मोफत अन्न वितरण करणे तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांची शाळेची फी भरणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की शिक्षण हे गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे.
भूमिका सिंह या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठीही कटिबद्ध आहेत. निराधार व गरजू वृद्धांना आधार देऊन त्यांना वृद्धाश्रमात सन्मानाने स्थायिक करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना योग्य काळजी, सन्मान आणि भावनिक आधार मिळावा यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी विविध मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करून गरजू नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे.
तरुणांना योग्य दिशा देणे हे त्यांच्या कार्याचे आणखी एक महत्त्वाचे अंग आहे. त्या नियमितपणे NSS सत्रे, नेतृत्व विकास कार्यशाळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करून युवकांना सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रेरित करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवक आणि ज्येष्ठ नागरिक समाजकार्यात सक्रिय सहभागी झाले आहेत.

लायन्स क्लबच्या सहकार्याने त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रभावी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वाखाली ३५० हून अधिक हेल्मेटचे वाटप करून रस्ते सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. सामाजिक सेवेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांचे समर्पण, करुणा आणि नेतृत्वगुण हे समाजात सकारात्मक व दीर्घकालीन बदल घडवण्याच्या त्यांच्या ध्येयाचे प्रतीक आहेत.


लेखन / शब्दांकन - विठ्ठल ममताबादे, उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास – पूनम पाटेकर

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास – पूनम पाटेकर

आजच्या काळात महिला अनेक क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. कला, शिक्षण, समाजकार्य आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या पूनम पाटेकर या त्यापैकी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. गायिका, संगीत शिक्षिका, महिला उद्योजिका आणि समाजसेविका म्हणून त्यांनी समाजात आपला ठसा उमटवला आहे.

पूनम पाटेकर यांनी B.A., ECCEd तसेच Diploma in Shipping & Logistics ही शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. त्याचबरोबर त्या CSC VLE आणि UIDAI Supervisor म्हणूनही कार्यरत आहेत. संगीत क्षेत्रात त्यांनी संगीत विशारद (हार्मोनियम) – द्वितीय पूर्ण केले असून संगीत विशारद (गायन) – तृतीय मध्ये शिक्षण घेत आहेत.

संगीत हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मागील २४ वर्षांपासून त्या संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक गाणी रेकॉर्ड केली असून ४०० हून अधिक स्टेज कार्यक्रम सादर केले आहेत. चिपळूण, रत्नागिरी, दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, गोरेगाव, माणगाव, महाड, उरण आणि वाशी या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

स्पर्धांमध्येही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाड आयडॉल (२००८) तसेच उरण द्रोणगिरी आयडॉल मध्ये सलग तीन वर्षे त्यांनी आपली कला सादर केली. Sur Maharashtra Online Singing Competition मध्ये प्रथम क्रमांक आणि Maharashtra News 18 गायन स्पर्धा मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. अनेक गायन स्पर्धांमध्ये त्या परीक्षक (Judge) म्हणूनही काम करत आहेत.

संगीत शिक्षणाची आवड लक्षात घेऊन त्यांनी “Surganga Music Hub & Academy” ची स्थापना केली. या अकादमीद्वारे सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना गायनाचे शिक्षण दिले जाते. याशिवाय त्यांना शाळेत शिक्षिका म्हणून ७ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी स्वतःचा म्युझिक ग्रुप देखील तयार केला आहे.

सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्या अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि मूक-बधिर मुलांना आर्थिक व वस्तुरूप मदत करतात. तसेच महिलांमध्ये मासिक पाळीविषयी जागृती करण्यासाठी मार्गदर्शन करतात. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये त्या बालसंस्कार वर्ग घेऊन मुलांना गाणी, प्रार्थना आणि स्तोत्रांद्वारे संस्कार देण्याचे काम करतात.

उद्योजकतेच्या क्षेत्रात त्यांनी Durva Enterprises या Online Service Centre ची स्थापना केली असून व्यवसायासाठी लागणारी सरकारी लायसन्स व सर्टिफिकेट सेवा तसेच सर्व प्रकारच्या विमा सेवा उपलब्ध करून देतात.

महिलांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी FRELAX – Organic Cotton Sanitary Napkins हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून त्या Wholesaler व Retailer म्हणून काम करत असून १६ महिलांना घरबसल्या व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या उत्पादनांची उपलब्धता पुणे, मुंबई, नवी मुंबई, अहिल्यानगर, बेळगाव, महाड, वडोदरा तसेच काही मेडिकल स्टोअर्स व बाजारपेठांमध्ये आहे.

महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी “अस्तित्व महिला सक्षमीकरण” या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

कला, शिक्षण, समाजकार्य आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत काम करत पूनम पाटेकर यांनी समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यातून अनेक महिलांना स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त अशा कार्यकर्त्या महिलांचा गौरव करणे हीच खरी समाजाची प्रगती आहे.

शब्दांकन / लेखन - विठ्ठल ममताबादे, उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व - श्रीमती ज्योती ज्ञानेश्वर पाटील

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व - श्रीमती ज्योती ज्ञानेश्वर पाटील.

श्रीमती ज्योती ज्ञानेश्वर पाटील यांचे शिक्षण डी.एड., बी.ए., बी.एड., डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट असे असून २०१३ पासून त्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट( नेटिव्ह इन्स्टिटयूट) च्या इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत व २०२० पासून  प्राथमिक इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ज्योती पाटील यांनी आपल्या कार्यातून नेतृत्व, कर्तृत्व व प्रभावी वक्तृत्वाची उज्ज्वल परंपरा जोपासली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी दागिन्यांप्रमाणे पैलू पाडण्याचे कार्य आजपर्यंत त्यांनी अत्यंत एकनिष्ठेने केले आहे.ज्योती पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त, संवेदनशीलता, दूरदृष्टी आणि कार्यतत्परता यांचा सुंदर संगम दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या केवळ शिक्षणच देत नाही, तर संस्कार, मूल्ये आणि आत्मविश्वासही देत असतात.

 बुद्धिचातुर्य, अचूक निर्णयक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य यांमुळे ज्योती पाटील या अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करत आहेत . कठीण परिस्थितीतही शांतपणे योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.ज्ञानसागरात मुक्त विहार करणाऱ्या राजहंसांना ज्ञानरूपी अमृतकण पोहोचविणाऱ्या ज्योती पाटील यांना सन २०२३-२४ चा संस्थेचा के. श्री. दादासाहेब तात्याबा सातपुते स्मृती पुरस्कार तसेच श्री. ज्ञानेश्वर तुकाराम मेटकरी पुरस्कृत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावत असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि नैतिक मूल्यांची जोपासना होत आहे. सामाजिक क्षेत्रातून शाळेसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न ज्योती पाटील करत आहेत.ज्योती पाटील यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे शिक्षकवर्गात उत्साह, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि पालकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे संस्थेचे नाव देखील उज्ज्वल झाले आहे.शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्या सर्वांना सुपरिचित आहेत.


शब्दांकन - लेखन - विठ्ठल ममताबादे, उरण

यशस्वी व्यावसायिका - रोशनी गुरव

यशस्वी व्यावसायिका - रोशनी गुरव .

एक गृहिणी ते एक यशस्वी व्यवसायिका म्हणून रोशनी गुरव ह्या गृहिणी आपले घर सांभाळताना, खूप संघर्ष करून टेलरिंग क्षेत्रात काम करून आपले नाव व्हावे, याकरिता काहीतरी नवीन करावे म्हणून नऊवारी साडीचे तीन ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मागील सात आठ वर्षापासून उरण शहरात बाझारपेठ मध्ये नऊवारी साडी शिवण्याचे काम करत आहेत, आज त्यांच्याच नावाने रोशनी नऊवारी साडी म्हणून त्यांचे दुकान उरण मध्ये प्रसिद्ध आहे.उरण शहरात नऊवारी साडी शिवण्याचे एकमेव दुकान असा त्यांचा प्रवास चालू आहे. आपले नाव करून एक यशस्वी गृहिणी ते एक यशस्वी व्यावसायिका म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. 

आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी अशा वेगवेगळ्या भूमिका निभावत त्यांनी व्यवसायात उंच गगन भरारी घेतली आहे. विश्वास, प्रामाणिकपणा, कार्यतत्पर, ग्राहकांना नम्रतेने बोलणे, वेळच्या वेळी सर्व कामे करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहेत. सर्वसामान्य गृहिणी ते एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. महिलांच्या गरजा ओळखून त्यांनी त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, महिलांना चांगली सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने व्यवसायात प्रवेश केला व त्या यशस्वी सुद्धा झाल्या आहेत. त्यांच्या या आदर्श व्यक्तिमत्वाची सर्व महिला प्रेरणा घेत आहेत. आदर्श घेत आहेत.

शब्दांकन / लेखन - विठ्ठल ममताबादे, उरण

आदर्श शासकीय कर्मचारी - अपर्णा पंकज तांडेल.

आदर्श शासकीय कर्मचारी - अपर्णा पंकज तांडेल.

स्त्री म्हटली कि अनेक भूमिका आल्या मुलगी,बहीण,पत्नी, आई, सासू अशा अनेक भूमिका एका स्त्रीला निभवाव्या लागतात.अशीच एक आदर्श भूमिका निभावत आहेत त्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातले विदयुत वायरमन कै. नरेश रामा ठाकूर यांची जेष्ठ कन्या अपर्णा नरेश ठाकूर. वडिलांचा मृत्यू नंतर त्यांच्या जागेवर महावितरण  जसखार शाखेत कार्यरत असलेल्या अपर्णा नरेश ठाकूर यांनी SSC शिक्षण पूर्ण केले. नंतर Electric ITI केले.लग्नानंतर  सौ. अपर्णा पंकज तांडेल या नावाने त्या सर्वांना परिचित झाल्या. सध्या ते वरिष्ठ तंत्रद्य म्हणून पदावर कार्यरत आहेत.त्या एक उत्तम गृहिणी, एक उत्तम सरकारी कर्मचारी आहेत.एक मुलगा त्याची सकाळी ७ ची शाळा, नवरा ओएनजीसी न्हावा येथे कामाला आहे. घरातली तयारी, दोघांचे डब्बे, घरातला काम आवरून स्वतःची नोकरी सांभाळतात , त्यातच अपर्णा या वसुली पथकात असल्याने रोज प्रत्येक गावात जाऊन महाविरणच्या ग्राहकांना भेटते. व भेटून वसुली करते. अपर्णा यांना कामावर असताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.पण त्या कधीही निराश झालेल्या नाहीत.वेळच्या वेळी दिलेली वसुली यादी नेहमी पूर्ण करतात, घरी आल्यावर कामाचा ताण -तणाव घराच्या बाहेर ठेवायचं या तत्वाने त्या वागतात.अपर्णा नरेश ठाकूर उर्फ सौ. अपर्णा पंकज तांडेल व श्री पंकज पंढरीनाथ तांडेल ही आदर्श पती पत्नीची जोडी आहे. अपर्णा यांच्या पाठीशी त्यांच्या सुख दुःखात त्यांचे पती पंकज तांडेल (चिरनेर उरण )हे नेहमी उभे असतात. त्यांचे नेहमी सहकार्य असते.एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. अपर्णा यांचा कुटुंबाला अभिमान वाटतो. घरात असताना व घराबाहेर शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असताना एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जनता त्यांच्याकडे पाहते.


शब्दांकन / लेखन - विठ्ठल ममताबादे, उरण

८ मार्चला महिलांचा भव्य ‘रक्तदान उत्सव माहीमच्या शितला देवी आदिशक्तीच्या दरबारात घुमणार नारीशक्तीचा हुंकार. !!

८ मार्चला महिलांचा भव्य ‘रक्तदान उत्सव माहीमच्या शितला देवी आदिशक्तीच्या दरबारात घुमणार नारीशक्तीचा हुंकार. !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

      स्त्री ही केवळ मायेचा पाझ नसून ती समाजाला जीवदान देणारी 'शक्ती' सुद्धा आहे. याच आदिशक्तीचा जागर करण्यासाठी आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, मुंबईतील ऐतिहासिक शितलादेवी मंदिर, माहीम येथे एक अनोखा आणि पवित्र संगम पाहायला मिळणार आहे. जीएसबी टेंपल ट्रस्ट आणि जीवनदाता सामाजिक संस्था (महिला परिवार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिशक्तीच्या दरबारात नारीशक्तीच्या रक्तदानाचा उत्सव’ या उपक्रमा अंतर्गत महिलांसाठीच  विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत करण्यात आले आहे.
        महिलांकडून, महिलांसाठी... एक आगळावेगळा पुढाकार असणार आहे. या शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण आयोजन महिलांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. 
        आज महिला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहेत. प्रशासन, उद्योग, क्रीडा, आरोग्य, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मग रक्तदानासारख्या समाजोपयोगी आणि जीवनदायी कार्यातही महिलांनी पुढाकार घेऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवावा, तसेच इतरांना रक्तदानासाठी प्रेरित करावे. रक्तदानाबाबत स्त्रियांच्या मनात असलेले भीतीचे मळभ दूर करून, त्यांच्यात 'होय, आम्ही सुद्धा जीवदान देऊ शकतो' हा आत्मविश्वास निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
       "महिलांना जेव्हा योग्य संधी आणि व्यासपीठ मिळते, तेव्हा त्या प्रत्येक आव्हानावर मात करतात. गेल्या सात वर्षांपासून आमचा हाच अनुभव आहे की, स्त्रिया अतिशय अभिमानाने या कार्यात सहभागी होऊन रक्तदान करण्यास पुढे येतात," असे या विशेष रक्तदान शिबिराच्या संयोजिका सौ. वीणा आमडोसकर यांनी सांगितले.
         भीती नको, फक्त सहभाग हवा! अनेकदा हिमोग्लोबिन कमी असणे किंवा अशक्तपणा यांसारख्या शंकांमुळे महिला रक्तदानासाठी कचरतात. मात्र, या शिबिरात प्रथम तज्ज्ञ डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी केली जाणार आहे. रक्तदानासाठी प्रकृती योग्य असेल तरच रक्त घेतले जाईल. त्यामुळे मुंबईतील माता-भगिनींनी किमान तपासणीसाठी तरी यावे, त्या निमित्ताने तुमचे हिमोग्लोबिनची तपासणी होईल. असे आवाहन करण्यात आले आहे.
        हे शिबिर श्री शितलादेवी मातेच्या पवित्र प्रांगणात होत असल्याने, येथील वातावरण आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले असेल. जर एखाद्या भगिनीचे रक्तदान वैद्यकीय कारणास्तव शक्य झाले नाही, तरी आयोजकांच्या वतीने सन्मान तर होईलच व तिला मातेचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेता येईल. ज्या महिलांचे रक्तदान झाले तर जीवनदान आणि न झाले तर देवदर्शन' असा हा दुहेरी आनंदाचा सोहळा असणार आहे. याप्रसंगी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक महिलेचा विशेष सत्कार केला जाईल. 
         या उपक्रमासोबतच महिलांसाठी अजून एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबई (बॉम्बे)हॉस्पिटलचे प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुजित कोरडे हे स्वतः त्यांच्या तज्ज्ञ टीमसह उपस्थित राहून महिलांच्या अस्थीरोगासंबंधी तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
         याच उपक्रमात स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुनीता निवळे यांच्या वतीने सामाजिक आणि रक्तदान क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या रणरागिणींना  ‘आदीशक्ती पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी _

संपर्क: वीणा आमडोसकर: ९००४२३६०३६, जान्हवी नाईक: ७०३९४७५३१२

"चला, या जागतिक महिला दिनी केवळ शुभेच्छा न देता, आपल्या रक्ताने कोणाचे तरी प्राण वाचवूया आणि माणुसकीचा हा सोहळा साजरा करूया!" असे आवाहन जीवनदाता सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

दूरदृष्टिचे अंदाजपत्रक - रविंद्र माणगावे, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर !!

दूरदृष्टिचे अंदाजपत्रक - रविंद्र माणगावे, अध्यक्ष,  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर !!

 महाराष्ट्राचे अंदाजपत्रक सादर करतांना मुख्यमंत्री व अर्थ मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यकालिन विकासाच्या अनुषंगाने विचार केल्याचे जाणवते. उद्योग ४ पिढी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या काळातही राज्याची प्रगती कशी होईल हा विचार यामागे असल्याचे जाणवते. महाराष्ट्र हे "नाविन्यता उद्योग राजधानी "असल्याने "ए आय आयुक्तालय " निर्माण करणे, सुक्ष्म  व लघु उद्योग विकासाकरीता प्रत्येक जिल्ह्यात खास केंद्रे आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन यासारख्या तरतुदी अत्यंत महत्वाच्या आहेत. महाराष्ट्र चेंबरने "गाव तेथे उद्योजक " हे मिशन स्वीकारले असून त्याला एक पाठबळ यातून मिळत आहे. या अंदाजपत्रकाचे स्वागत !

वृत्त - राहुल बैसाणे 

सामाजिक क्षेत्रातील सक्रिय महिला सामाजिक कार्यकर्त्या - भूमिका सिंह

महिला दिना निमित्त लेख. सामाजिक क्षेत्रातील सक्रिय महिला सामाजिक कार्यकर्त्या -  भूमिका सिंह  भूमिका सिंह या लायन्स क्लब ऑफ द्रो...