Monday, 29 June 2026

ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; ३० जूनपासून 'बीएलओ' घरोघरी जाणार !!

*ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; ३० जूनपासून 'बीएलओ' घरोघरी जाणार !!

*ठाणे, दि. २९* : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) राबवण्यात येत आहे. मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन गणनाप्रपत्र भरून घेणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

*राजकीय पक्षांसोबत बैठक*  
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत रोडे, विठ्ठल डाके आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

*७४.५ लाख मतदारांची तपासणी*  
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ६,८९४ मतदान केंद्रांशी जोडलेल्या ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांची पात्रता या मोहिमेत तपासली जाणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची भागनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.

*कार्यक्रमाचा टप्पा*  
- *३० जून ते २९ जुलै २०२६*: BLO घरोघरी जाऊन गणनाप्रपत्र भरून घेणार. नाव, लिंग, वय, पालकांचा तपशील, स्थलांतरित, मृत व दुहेरी नोंद असलेल्या मतदारांचे वर्गीकरण केले जाईल. 
- *५ ऑगस्ट २०२६*: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. विसंगती असलेल्या मतदारांची सुनावणी होईल.
- *५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६*: दावे व हरकतींचा कालावधी. नवीन नोंदणीसाठी फॉर्म ६, नाव वगळण्यासाठी फॉर्म ७, दुरुस्ती व स्थलांतरासाठी फॉर्म ८ भरावा लागेल.

*नागरिकत्वाचा पुरावा बंधनकारक*  
- *१ जुलै १९८७ पूर्वी जन्म*: स्वतःची जन्मतारीख/जन्मस्थळाचा कोणताही एक वैध पुरावा.
- *१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४*: आई किंवा वडिलांचा भारतातील जन्माचा पुरावा.
- *२ डिसेंबर २००४ नंतर जन्म*: पालकांपैकी कोणी भारतीय नागरिक नसल्यास, जन्माच्या वेळचा वैध पासपोर्ट व व्हिसा.
- *परदेशात जन्म*: भारतीय दूतावासाने जारी केलेला जन्मनोंदणी पुरावा.
- *नागरिकीकरणाद्वारे नागरिकत्व*: नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र.

मतदाराचा २०२६ च्या यादीतील छापील तपशील, गणना प्रपत्र आणि घोषणापत्राशिवाय नवीन नोंद केली जाणार नाही. ज्या भागात ४० टक्क्यांपेक्षा कमी मॅपिंग आहे, तेथे राजकीय पक्षांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

*'पात्र मतदार सुटणार नाही, अपात्र समाविष्ट होणार नाही'*  
‘पात्र असलेल्या कोणत्याही नागरिकाचे नाव मतदार यादीतून सुटणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही’ हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अंतिम यादी छापेपर्यंत दर आठवड्याला आढावा बैठक होणार असून राजकीय पक्षांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर बौद्धभूमीच्या जागेसाठी जनआक्रोश मोर्चा !!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर बौद्धभूमीच्या जागेसाठी जनआक्रोश मोर्चा !!

भिख्खू गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जनसमुदाय हजर

कल्याण, संदीप शेंडगे : वालधुनी येथील बुद्धमूर्तीची तोडफोड प्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर बौद्धभूमी फाउंडेशन च्या वतीने जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या दहा दिवसापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर बौद्ध भिक्खू संघ दे मदत धरणे आंदोलन करत आहे परंतु महापालिकेकडून अजूनही बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागे संदर्भात निर्णय होत नसल्याने आज मोर्चाची हाक देण्यात आली होती. गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली हजारो बौद्ध अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व फुले शाहू आंबेडकरी नागरिकांनी 'विशाल जनआक्रोश महामोर्चा' काढला. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी निळे व पंचशील ध्वज फडकावत परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

"बौद्धभूमी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची!", "संविधान वाचवा, बुद्धभूमी वाचवा!" अशा जोरदार घोषणा देत आपला विरोध दर्शवला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.

मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या.
१) खासदार श्रीकांत शिंदे यांनी बौद्ध मूर्ती तोडफोड प्रकरणी देशातील तमाम बौद्ध अनुयायांची जाहीर माफी मागून आपल्या खासदारपदाचा राजीनामा द्यावा.
 २) श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे तथा उद्योजक अभिषेक घोरडे व त्यांच्या सर्व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
३) आयुक्त अभिनव गोयल व उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे.
४) सातबारा उताऱ्यावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची करण्यात आलेली खोटी नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी. सदर जमिन बौद्धभूमी फाउंडेशनच्या नावे करावी.
५) बेकायदेशीर टीडीआर प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व महापालिका अधिकारी व भूमाफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

मोर्चामध्ये हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त
सहभाग दिसून आला. आंदोलकांनी बौद्ध समाजाच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. या मोर्चामध्ये बामसेफ प्रणित बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटना, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बहुजन मुक्ती पार्टी सह अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

एकलव्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे समता संस्कार शिबिर, संजय मंगला गोपाळ यांचे गौरवोद्गार !!

एकलव्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे समता संस्कार शिबिर, संजय मंगला गोपाळ यांचे गौरवोद्गार !!

ठाणे, दि. 29,

“दहावी पास झाल्याच्या या वळणावर तुम्हांला समता संस्कार शिबिरात जे अविस्मरणीय अनुभव व नवे मित्र - मैत्रिणी मिळाले आहेत, त्याने तुमचं पुढील आयुष्य समृद्ध होणार आहे”, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ३२ व्या वार्षिक समता संस्कार शिबिराच्या समारोपात काढले. समता विचार प्रसारक संस्थेने येऊरच्या निसर्ग समृद्ध वातावरणात हे चार दिवसीय युवा विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले होते. संजय मं गो पुढे म्हणाले, “शिबिरातील स्त्री - पुरुष संबंध, मुली मुलांमधील प्रेम व आकर्षण या सत्रांमधून तुम्हाला तुमची आई, बहीण व मैत्रीण यांच्याकडे पाहण्याचा जो समतेचा दृष्टीकोन मिळाला आहे तो कधीच विसरु नका. जसं जगण्यासाठी अन्न आवश्यक असलं तरी आपण ठराविक वेळी व प्रमाणात खातो तसेच मोबाईल सोबत वागा. दिवसांची ठराविक वेळच मोबाईल हातात घ्या. त्या वेळात वर्तमानपत्र, अवांतर पुस्तकं वाचा, चांगल्या फिल्म्स पहा. आपल्या परिसरातील अनेक समस्या तुम्ही मांडल्यात. आता त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या! आपल्या करियरविषयी अधिक पर्यायांचा विचार करा.

यावेळी शिबिरार्थींनीही मनोगतात शिबिर अनुभव अविस्मरणीय आहेत. आम्हांला खूप महत्वाचे ज्ञान शिबिरातून मिळाले, हे आवर्जून सांगितले. पालकांनीही आम्हा सामान्य परिस्थितीत जगणाऱ्यांच्या घरातील मुली - मुलांसाठी संस्था करत असलेल्या धडपडीसाठी आभार व्यक्त केले. संस्थेच्या विश्वस्त मनीषा जोशी यांनी मुलांना शिबिरात मिळालेली शिकवण लक्षात ठेऊन त्या प्रमाणे पुढे मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. संस्थेच्या सचिव लतिका सु. मो. यानी मुलांना संस्थेच्या कार्यक्रमांशी जोडून रहा असे सांगत संस्थेच्या पुस्तक पेढी उपक्रमाची माहिती दिली.

या वर्षीचे हे युवा शिबिर एकलव्य गौरव पुरस्कार प्राप्त एकलव्यांनी आणि वंचितांच्या रंगमंचाच्या कलाकारांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साही वातावरणात आणि संस्थेची माजी एकलव्य दिपाली सावंत आणि संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर यांच्या संयोजनात संपन्न झालं. संस्थेच्या संस्थापनात सक्रिय असलेले बिरपाल भाल यांनी शिबिराचे उद्घाटन केले. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी उद्घाटनाच्या सत्रात मुलांचे स्वागत करून संस्थेची माहिती दिली. या वेळी ठाणे शहरातील किसन नगर, येऊर, मानपाडा, धर्मवीर नगर या वस्तीतील विद्यार्थ्यांबरोबरच घणसोली, काल्हेर, केवणी – दिवे येथील आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या शिबिरात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांची वैचारिक, सामाजिक आणि कलात्मकतेची जाणीव वाढवण्याच्या दृष्टीने खेळ, कार्यशाळा, व्याख्याने, गट – चर्चा आणि नाटिकांच्या माध्यमातून  त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या साठी अनेक तज्ज्ञ व्यक्ती शिबिरार्थींशी संवाद करायला आले होते.

राजेंद्र बहाळकर यांनी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून मुलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, मित्र - मैत्रिणींशी निखळ मैत्रीच्या दृष्टीने खेळकरपणे समजुतीने कसे राहायचे, मोबाईल फ़ोन, सोशल माध्यमांचा प्रभावावर मात करून टेन्शन फ्री पण ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कसे करायचे या बद्दल खूप प्रभावीपणाने दाखवले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बुवांच्या चमत्कारांमागचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितले. जादूटोणा, करणी, भूताखेतांच्या गोष्टींमागचा खोटेपणा प्रयोगांद्वारे उघड करून मुलांच्या विचारात बदल घडवून आणला.

आरती नाईक यांनी शरीर विज्ञानामध्ये स्त्री - पुरुषांच्या शारिरीक जडणं घडणीची शास्त्रीय माहिती दिली. वयात येताना प्रकर्षाने जाणवणाऱ्या आकर्षण, प्रेम आणि सेक्स या विषयांवरही त्यांनी शिबिरार्थींना सविस्तर माहिती दिली. मुलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारत मोकळेपणाने चर्चा केली.

सतीश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पुढे घेता येऊ शकणाऱ्या विविध करियर निवडींबद्दल माहिती सांगत विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांवर चर्चा केली. मकरंद जोशी यांनी मुलांना अल्गोरिदमची माहिती आणि महत्व समजावून सांगत ते आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अनुभवाशी कसे निगडित आहे हे अतिशय छान समजावून सांगितले.

आसावरी जोशी यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून टाकाऊतून टिकाऊ वस्तू हस्तकलेने कसा साध्य करू शकतो हे शिकवलं आणि मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनात कागदाच्या वस्तू बनवल्या.

सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी नाट्य कार्यशाळा घेऊन मुलांना नाटक या कलेबद्दल माहिती दिली आणि त्यांचे 4 गट पाडून त्या गटांची 4 छोटी नाटकं बसवण्याची तयारी केली. मुलांनी या नाटकांची तालीम करून ती बसवली आणि शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात उत्तम प्रकारे सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
संस्थेचे कार्यकर्ते अक्षता दंडवते, किशन सिंग बेदी, ओम गायकवाड, एनॉक कोलियार, अजय भोसले, मयूर बने यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन मेहनत केली.

संस्थेचे हितचिंतक शरद जोशी, संध्या धारडे, संगीता धनुकटे, सुप्रिया कर्णिक, विनीता मोकाशी, प्रशांत पाटील, सहभागी एकलव्यांचे पालक आदिनी शिबिराला भेट देऊन मुलांचे अभिनंदन केले.

मीनल उत्तुरकर 
समता विचार प्रसारक संस्था 
9833113414

साई फाउंडेशनच्या "सेवा गौरव पुरस्कार २०२६" ने नागरी संरक्षण दलाचे बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन श्री. लक्ष्मीकांत पोपळे सन्मानित !!!

साई फाउंडेशनच्या "सेवा गौरव पुरस्कार २०२६" ने नागरी  संरक्षण दलाचे बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन श्री. लक्ष्मीकांत पोपळे सन्मानित !!! 

ठाणे, दि. २८ जून २०२६ : समाजसेवा, मानवता आणि राष्ट्रहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, समाजसेवक व परिवर्तनकर्त्यांचा गौरव करण्यासाठी साई फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित "सेवा गौरव पुरस्कार २०२६" तसेच संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन ठाणे महानगरपालिकेच्या पाचपाखाडी येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात उत्साहात पार पडले.

या विशेष सोहळ्यात श्री. लक्ष्मीकांत पोपळे  यांना सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल "सेवा गौरव पुरस्कार २०२६" प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजातील गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या नागरी  संरक्षण दलाच्या कार्याची दखल घेत साई फाउंडेशनने हा सन्मान प्रदान केला. या पुरस्कारामुळे नागरी  संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांमध्ये अधिक उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन  श्री. लक्ष्मीकांत पोपळे म्हणाले, "सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून समाजसेवेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन साई फाउंडेशनने आम्हाला 'सेवा गौरव पुरस्कार २०२६' ने सन्मानित केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान व कृतज्ञता वाटते. हा गौरव केवळ आमच्या संपूर्ण टीमच्या सामूहिक प्रयत्नांची पोचपावती नसून, ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर जिथे-जिथे आपत्ती व गरज असेल तिथे निःस्वार्थ भावनेने धावून जाण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मिळालेली थाप आहे.

"हा सन्मान आमची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. समाज, मानवता आणि राष्ट्रसेवेसाठी यापुढेही अधिक समर्पण, करुणा व शिस्तीने कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. साई फाउंडेशनच्या विश्वास, प्रोत्साहन आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत."

यावेळी त्यांनी "सेवा, सुरक्षा, शिस्त - हेच आमचे ब्रीद!" असा संदेश देत "जय हिंद! जय महाराष्ट्र!" अशा घोषणेद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

साई फाउंडेशन ही संस्था समाजातील विविध क्षेत्रांमध्ये निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. "Be a Reason for Someone's Smile" या प्रेरणादायी संदेशातून संस्था समाजात सेवा, करुणा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सेवा, सुरक्षा, शिस्त - हेच आमचे ब्रीद!
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर 

खाकीतील कुटुंबालाच न्यायासाठी संघर्ष; डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थेतील वादाच्या तपासावर प्रश्नचिन्ह !!

खाकीतील कुटुंबालाच न्यायासाठी संघर्ष; डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थेतील वादाच्या तपासावर प्रश्नचिन्ह !!

महेंद्र (अण्णा) पंडित / प्रतिनिधी 

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गृहनिर्माण संस्थेतील वादाने गंभीर वळण घेतले असून, अनुसूचित जातीच्या (एससी) एका महिलेने पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन पिढ्या पोलीस सेवेशी संबंधित असलेल्या कुटुंबातील या महिलेने, ठोस डिजिटल पुरावे आणि लेखी कागदपत्रे सादर करूनही मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आजोबा सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावरून सेवानिवृत्त झाले असून, पती सध्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून कार्यरत आहेत. संबंधित गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि काही व्यक्तींनी संगनमताने मानसिक, सामाजिक व जातीय छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, सोसायटीतील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करण्यात आली आणि गुन्ह्याशी संबंधित फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. घटनास्थळाच्या पंचनाम्यावेळीही अडथळे निर्माण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मूळ डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची 'हॅश व्हॅल्यू' तसेच भारतीय पुरावा कायद्यातील कलम ६५-अ व ६५-ब अन्वये आवश्यक प्रमाणपत्र पोलिसांना दिल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलमे ३५१, ३५२, ३६५, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन तीन महिने आणि आरोपींची नावे स्पष्टपणे दिल्यानंतरही अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपास अधिकारी "शहानिशा सुरू आहे" आणि "आरोपींचे म्हणणे ऐकणे आवश्यक आहे" अशी भूमिका घेत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिलेने आणखी असा आरोप केला आहे की, इमारतीतील एकमेव अनुसूचित जातीच्या कुटुंबाला लक्ष्य करून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करण्यात आले असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर जबाब बदलण्यासाठी दबाव व धमक्या दिल्या जात आहेत.

याशिवाय, गृहनिर्माण संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही दस्तऐवजांवर खोट्या सह्या करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संदर्भात संस्थेच्या खजिनदारांनी स्वतंत्र लेखी तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

पीडित महिलेने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर विभाग) तसेच अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे सादर केली असून, तपासावर देखरेख ठेवून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर संबंधित आरोपी किंवा मानपाडा पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.

Sunday, 28 June 2026

मुरबाड-कल्याण मार्गावर १० नवीन बसेस दाखल; ३० फेऱ्या वाढणार !!

मुरबाड-कल्याण मार्गावर १० नवीन बसेस दाखल; ३० फेऱ्या वाढणार !!

*मुरबाड, प्रतिनिधी* : मुरबाड-कल्याण मार्गावरील हजारो दैनंदिन प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. परिवहन विभागाने मुरबाड बस आगाराला अत्याधुनिक सुविधांनी सज्ज १० नवीन बसेस सुपूर्द केल्या आहेत. 

यापैकी ५ बसेस मुरबाड आगारात तर ५ बसेस कल्याण आगारात दाखल झाल्या आहेत. या सर्व बसेस केवळ मुरबाड-कल्याण मार्गावरच धावणार आहेत. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला.

नवीन १० बसेसमुळे या मार्गावर दैनंदिन ३० अतिरिक्त फेऱ्या वाढणार असून प्रवासी वाहतूक क्षमता ३० ते ३५ टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी व व्यावसायिकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

“प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नोव्हेंबरपर्यंत मुरबाड बस डेपोचे नूतनीकरणही पूर्ण होईल,” असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका मा. सौ. माया कांबळे यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी व पाणी दौरा केला. या दौऱ्यात नदीच्या विविध पाच ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

नदीतील वाढलेले प्रदूषण, साचलेला गाळ, दुर्गंधी आणि नदीची झालेली दयनीय अवस्था पाहून सौ. माया कांबळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. "कल्याण हे एक सुंदर शहर असून शहरातील नदीची अशी अवस्था असणे दुर्दैवी आहे. आपण सर्वांनी मिळून ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारली पाहिजे. नदी ही आपली आई आहे आणि तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे," असे त्या म्हणाल्या.

वालधुनी नदीच्या पुनर्जीवनासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाशी चर्चा करून येणाऱ्या सभागृहात हा विषय लक्षवेधी स्वरूपात मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात संस्थेचे प्रमुख सदस्य श्री. अनिल गायकवाड, श्रीमती सुनीता खेताडे, श्री. अनिल सरदार, श्री. किरण म्हात्रे, श्री. दिलीप दादा गायकवाड तसेच संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीर उदयकर यांनी नदीची सद्यस्थिती, प्रदूषणाची  आणि पुनर्जीवनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देऊन प्रशासनाने लवकरात लवकर काम सुरू करण्याची विनंती केली.

दौऱ्याच्या शेवटी सौ. माया कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; ३० जूनपासून 'बीएलओ' घरोघरी जाणार !!

*ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; ३० जूनपासून 'बीएलओ' घरोघरी जाणार !! *ठाणे, दि. २९* : ...