Sunday, 22 March 2026

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !!

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !!

** महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिले निवेदन.

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, झाडे, वृक्ष वेली आदीचे महत्व येणाऱ्या भविष्यातील नवीन पिढीला समजावे, पर्यावरण विषयक जनजागृती व्हावे या अनुषंगाने उरण मधील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या व वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करणाऱ्या विजय विकास सामाजिक संस्थेने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची मागणी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्याच बरोबर श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा, महेश बालदी  आमदार उरण विधानसभा, प्रशांत ठाकूर आमदार-पनवेल विधानसभा,जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला "३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम" हा पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील महान नेत्यांच्या स्मृती जपण्याची आणि पर्यावरण रक्षणाची दुहेरी संधी निर्माण झाली आहे.

रायगड व नवी मुंबई परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि आगरी समाजाचे नेतृत्व करणारे लोकनेते दि. बा. पाटील यांनी आयुष्यभर स्थानिक जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या त्याग, नेतृत्व आणि कार्यामुळे संपूर्ण परिसरातील जनतेच्या मनात त्यांचे स्थान अत्यंत आदराचे आणि प्रेरणादायी आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली. या विकासकामांच्या प्रक्रियेत त्या परिसरातील अनेक झाडे तोडली गेली. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसानही झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्या परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संतुलन राखणे ही काळाची गरज आहे.त्या अनुषंगाने विजय विकास सामाजिक संस्था, नवघर तसेच स्थानिक जनता आणि आगरी समाज यांची अशी ठाम मागणी आहे की, नवी मुंबई विमानतळ परिसरात विशेष वृक्षलागवड करून "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्यात यावे. या स्मृती वनामध्ये हिंदू संस्कृतीत पूजनीय आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडे जसे वड, पिंपळ, औदुंबर, कडुलिंब, बेल इत्यादी मोठ्या प्रमाणावर लावण्यात यावीत.अशी मागणी विजय विकास संस्थेने केली आहे.

अशा प्रकारे उभारण्यात येणारे "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" हे केवळ पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक ठरणार नाही, तर ते लोकनेते दि. बा. पाटील यांच्या महान कार्याचे स्मरण करून देणारे एक प्रेरणास्थान ठरेल. भविष्यातील पिढ्यांना या स्मृती वनातून प्रेरणा, ऊर्जा आणि सामाजिक जाणीव मिळेल, असा ठाम विश्वास विजय विकास सामाजिक संस्थेचे विजय भोईर, विकास भोईर यांनी व्यक्त केला आहे.

सदर मागणीचा सकारात्मक विचार करून शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विजय विकास सामाजिक संस्था, नवघर तसेच स्थानिक जनता आणि आगरी समाज यांच्या वतीने करण्यात आहे.या मागणी बाबत श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा,महेश बालदी  आमदार उरण विधानसभा, प्रशांत ठाकूर  आमदार-पनवेल विधानसभा, जिल्हाधिकारी रायगड आदी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे लवकरात लवकर दिबा पाटील स्मृती वन उभारण्यात यावे अशी मागणी आता सर्वच स्तरातून होत आहे.

Saturday, 21 March 2026

कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा !!

कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
कोकण ज्ञानपीठचे उरण वाणिज्य कला महाविद्यालय वाणिज्य विभाग व अजीवन अध्ययन निरंतर व विस्तार विभागातर्फे उरण महाविद्यालयामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Right Day) प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांच्या मार्गदर्शनानुसार साजरा करण्यात आला.  

जागतिक ग्राहक हक्क दिनाचे उद्दिष्टे व महत्त्व प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी कार्यक्रमाच्या  सुरुवातीला प्रस्तावनेत स्पष्ट केले. ग्राहक हा राजा आहे व त्याचे कायद्याने दिलेले मूलभूत हक्क याबाबत विश्लेषण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण, साकलेन डाखवे , खुशी शर्मा व देवयानी खैरनार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे ग्राहक हक्क व दिनाचे महत्त्व आपल्या उत्कृष्ट वकृत्व शैलीत व्यक्त केले. सदर विद्यार्थ्यांचे मनोगत खूपच प्रभावी होते. मुंबई विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे सदस्य व पीएचडी गाईड डॉ. पराग कारुळकर हे देखील कार्यक्रमास हजर होते. ग्राहकाचे हक्क व संरक्षण याबद्दलचे महत्त्व उदाहरणासहित देऊन स्पष्ट केले व प्रत्यक्षात आपले अनुभव त्यांनी सर्वांना सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. व्ही एस इंदुलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

फॉन संघटनेच्या वेस्ट मधून बेस्ट संकल्पने अंतर्गत चिमण्यासाठी बनविले घरटे !!

फॉन संघटनेच्या वेस्ट मधून बेस्ट संकल्पने अंतर्गत चिमण्यासाठी बनविले घरटे !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्,कॉमर्स  अँड सायन्स,आवरे (उरण) येथे जागतिक चिमणीदिन  निमित्ताने फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)ची वेस्ट मधून बेस्ट या संकल्पनेतून चिमणी घरटे बनविण्याची कार्यशाळा पार पडली.

फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )च्या टीम द्वारे विद्यार्थ्यांना कागदी पुठ्ठ्याच्या टाकाऊ रोल पासून चिमण्यांची घरटी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.१०० घरटी बनवून ती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. चिमण्यांची घटती संख्या, त्यामागची कारणे-धोके  व चिमण्यांची संख्या कशी वाढविता येईल याविषयी फॉन च्या टीमने विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर, सर्व शिक्षकवृंद व सहकाऱ्यांचे योगदान लाभले. फॉन संस्थेच्या वतीने जयवंत ठाकूर व दिनेश चिरनेरकर हे सहभागी  झाले होते

कु. युगसाई अविनाश म्हात्रे यांच्या तर्फे नवघर जिल्हा परिषद शाळेस आर्थिक मदत !!

कु. युगसाई अविनाश म्हात्रे यांच्या तर्फे नवघर जिल्हा परिषद शाळेस आर्थिक मदत !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षण प्रेमी माजी विद्यार्थी महासंघ शाळा नवघरचे कोषाध्यक्ष हिंदूहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक विद्यमान शाखाप्रमुख  अविनाश एकनाथ म्हात्रे यांच्या मुलाचा कु. युगसाई अविनाश म्हात्रे याचा ९ वा वाढदिवसा निमित्त ग्रामपंचायत नवघरचे विद्यमान उपसरपंच प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा नवघरच्या नवीन इमारती बांधकामासाठी आर्थिक सहकार्य १११२१/- रुपयाचा धनादेश शाळेतील मुख्याध्यापक श्रीम. समता ठाकूर , उषा गावंड , श्रीमती सरिता गोरे , गणेश गावंड, प्रकाश जोशी, अनिल म्हात्रे आणि  प्रसाद म्हात्रे  यांच्याकडे देण्यात आला. 

शाळेतर्फे  युग साई बाळाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या  शुभेच्छा देण्यात आल्या व त्याचे  व आई वडिलांचे शाळेतर्फे आभार मानण्यात आले. शिक्षणप्रेमी अविनाश म्हात्रे व त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी व त्यांचा मुलगा कु. युगसाई यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. युगसाई याच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चवदार तळ्याच्या आंदोलनातून समतेचा संदेश : हर्षवर्धन सपकाळ

चवदार तळ्याच्या आंदोलनातून समतेचा संदेश :  हर्षवर्धन सपकाळ

आजचे सत्ताधीश खोटारडे  : उल्का महाजन

चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा  : महेद्रशेठ घरत 

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झाला. अस्पृशांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी, सामाजिक समतेसाठी हा लढा झाला होता. त्या सत्याग्रह आंदोलनाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त महाड येथे चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्षे सोहळा शुक्रवारी (ता. २०) आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, सिद्धार्थ हत्तीअंबीरे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "चवदार तळ्याच्या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेकांचा सहभाग होता. त्या आंदोलनातून समतेचा संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. तेव्हा समता, बंधुता, न्याय यांची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी तोच वसा पुढे नेला. त्यातूनच पुढे संविधानाची निर्मिती झाली. आज सर्वधर्मसमभावाच्या विचारानेच काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातून माणसाने माणसाशी कसे वागावे, हा संदेश मिळतो."

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन म्हणाल्या, "बाबासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मीयांचे अनुयायी होते. आजचा काळ फार कठीण आहे. आजच्या सत्ताधीशांची सत्तेसाठी जी तंत्रे वापरली आहेत त्यात पोटात भूक आणि डोक्यात भीती, जातीभेद याचा अवलंब केला आहे. आजच्या सत्ताधीशांचा खोटे बोलण्यात कुणी हात धरू शकत नाही. ते प्रचंड भ्रष्टाचारी आहेत." 

यावेळी तुषार गांधी म्हणाले, "महाडमधील ९९ वर्षांपूर्वीचा काळ अंगावर काटा आणणारा आहे. तो फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर समतेचा विचार समाजात देण्याचा होता. त्यामुळे तो विचार रुजविण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे."

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात रुजविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या. चवदार तळ्याचा शताब्दी महोत्सव पुढच्या वर्षी भरगच्च व्हायला हवा. तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे." यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते

Friday, 20 March 2026

मुक्ताबाई लक्ष्मण मोकल यांचे दुःखद निधन !!

मुक्ताबाई लक्ष्मण मोकल यांचे दुःखद निधन !!

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
 महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श गृहिणी मुक्ताबाई लक्ष्मण मोकल यांचे दिनांक १६/३/२०२६ रोजी वयाच्या ७५ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार २५/३/२०२६ रोजी माणकेश्वर उरण येथे सकाळी ८ वाजता तर उत्तर क्रिया विधी व होम विधी शुक्रवार दिनांक २७/३/२०२६ रोजी बोरखार येथे त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. उत्तर कार्य निमित्त गोरक्षक समाज प्रबोधनकार कीर्तनकार ह भ प कलावतीबाई शिवकर (केळवणे - पनवेल) यांचे दिनांक २७ रोजी सकाळी ९:३० वा.सुश्राव्य कीर्तन ठेवण्यात आले आहे. मनमिळाऊ व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, गोर गरिबांच्या अडी अडचणीत गोरगरिबांना त्या मदत करत असल्याने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पाच नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. बोरखार गावचे पोलीस पाटील विनायक लक्ष्मण मोकल यांच्या त्या मातोश्री होत्या. या दुःखद प्रसंगी व विधी प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुःखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे.

कोप्रोली येथे श्री साई चरित्र पारायण, श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न !!

कोप्रोली येथे श्री साई चरित्र पारायण, श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न !!

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : सालाबाद प्रमाणे ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली (उरण )यांच्या सौजन्याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवार दिनांक १८/३/२०२६ ते गुरुवार दिनांक १९/३/२०२६ रोजी श्री साईबाबांचे साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायणाचे महापूजा व साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार व गुरुवारी दररोज काकड आरती, बाबाचे मंगल स्नान,श्री साई चरित्र पारायण, मध्यान्ह आरती, हरिपाठ, साईबाबांचे धुपारती असे विविध धार्मिक उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.दि १९/३/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या साई भंडाराचा (महाप्रसादाचा ) साई भक्तानी, भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. रात्री ९ वाजता श्री बापूजी देव कला मंच व अर्णवी आर्ट कोप्रोली उरण प्रस्तुत साई गीत, लोकगीत,कोळीगीतांचा मराठी नजराणा कार्यक्रम सादर करण्यात आले. आलेल्या प्रत्येक प्रमुख पाहुण्यांचे तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील गणेश मंदिर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जनतेचा भाविक भक्तांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली व साई सेवक, ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ उरण व साई सेवक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, सर्व महिला बचत गट, माऊली हरिपाठ मंडळ, सर्व क्रिकेट क्लब, बापूजी देव कला मंच, अर्णवी आर्ट, थ्री व फोर व्हीलर रिक्षा चालक-मालक संघटना  कोप्रोली, ग्रामस्थ मंडळ कोप्रोली आदी विविध संस्था,संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्वच कार्यक्रमाचे सुंदर,उत्तम असे नियोजन व आयोजन केल्याने सर्वांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !!

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !! *...