Wednesday, 4 February 2026

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा..

घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत..

कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सावळा गोंधळ माहिती अधिकार कार्यकर्ते जय यांना ५ जानेवारी २०२६ रोजी जन माहिती अधिकारी तथा प्रभारी मुख्य स्वच्छता अधिकारी अगस्टीग घुटे हे स्वतःला मुख्य स्वच्छता अधिकारी समजतात  यांनी दिलेल्या बनावट व दिशाभूल करणाऱ्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दैनंदिन साफसफाई रस्ते गटार कचरा उचलणे चौक गल्ली आणि पर्यावरणातील प्रदूषण थांबवणे इत्यादी कामे केली जातात. याकरिता नागरिकांकडून युजर चार्जेस घेतली जातात याकरिता नागरिकांना दर्जेदार स्वच्छता देणे गरजेचे आहे. परंतु महानगरपालिकेचा पगार घेऊन सफाई कर्मचारी नियमित आणि दैनंदिन साफसफाई करणे गरजेचे आहे. याकरिता महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांचे फायदे दिले जातात. उदाहरणार्थ सफाई कामगारांचे मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या मुलांना वारस हक्काने नोकरी दिली जाते. कर्मचारी स्वच्छ रहावे याकरिता धुलाई भत्ता दिला जातो कर्मचारी यांना कामाच्या तासात सवलत दिली जाते. परंतु काही कर्मचारी याचा फायदा घेऊन घाणीचे काम न करता इतर खात्यात काम करण्याचे पसंत करतात. 

यातूनही काही कर्मचारी बाहुबली असून राजकीय वरदहस्त याचा फायदा घेणे, साफसफाईचे काम न करणे आरोग्य निरीक्षकांना दमदाटी करणे मारहाण करणे मोठ्याने बोलणे तसेच कामावर न येणे यामुळे दैनंदिन साफसफाईच्या कामात व्यत्य येत असून घाणीचे साम्राज्य पसरून ठिकठिकाणी कचरा साठणे गटारी भरणे ओला सुखकचरा व्यवस्थित न होणे इत्यादी बाबी निदर्शनास येतात. 

वास्तविक पाहिले तर ४०० ते ५०० कर्मचारी इतर खात्यात काम करत आहेत सदर कर्मचाऱ्यांना प्रशासनाने सरसकट सफाई कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करून इतर खात्यात वर्ग करावा आणि चारशे ते पाचशे कर्मचारी नवीन भरती करावे जेणेकरून साफसफाई नियमित आणि दर्जेदार होईल. 

नुकतेच आता माहिती अधिकारात पंधरा दिवसापेक्षा जास्त गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागितली असता एकूण १० प्रभागात ४९ कर्मचारी गैरहजर असल्याची माहिती मिळाली आहे. सदर कर्मचाऱ्यांवर कोणत्या स्वरूपात कार्यवाही केली जाते असे विचारणा केले असता महापालिका अधिनियम १९४९ कलम  ५६ अन्वये शिस्तभंगाची कारवाई केली जाते असे मुख्य स्वच्छता अधिकारी घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी माहिती दिली आहे. वास्तविक पाहता कलम ५६ अन्वये कारवाई केल्यास एकही कर्मचारी गैरहजर राहण्याची हिंमत करणार नाही. परंतु सदर कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन थातूरमातूर कारवाई करून कर्मचाऱ्यास अभय दिले जाते. 

यामध्ये असा एक कर्मचारी निदर्शनास आला आहे. विनोद वसंत वाघेला घनकचरा व्यवस्थापन विभागात काम न करता दमदाठी करणे एसीबी कडे तक्रार देणे आणि काही वर्षापूर्वी एका अधिकाऱ्याला यांनी ऑन ड्युटी मारहाण केली. त्यासाठी सदर कर्मचाऱ्यास निलंबित केले होते. 

निलंबित होऊन देखील सदर कर्मचाऱ्यावर कुठलाही फरक पडलेला दिसून येत नाही. सदर कर्मचारी फेरीवाला हटाव पथकात बदली मिळणे करिता चुकीचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करून काही अधिकाऱ्यांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न देखील केलेला दिसतो. त्यानंतर अद्याप सदर कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. म्हणजेच प्रशासनाची कर्मचाऱ्यांवरती धाक दिसून येत नाही. महापालिकेत लागणे म्हणजे सेवा नसून केवळ कमाईचे एक साधन झालेले दिसते त्यातल्या त्यात २ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशामध्ये सुरेश परमार  मालती देसले  सुमन चव्हाण इत्यादी कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने खाडे करण्याचे आदेश पारित केले आहेत.तरीही हे कर्मचारी हजर न होता बदलीसाठी प्रयत्न करतील कामावर रुजू होणार नाहीत. म्हणजेच कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज दिसून येत नाही अशा कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून रिक्त जागेवर नवीन कर्मचारी भरती केल्यास स्वच्छतेत मोठ्या प्रमाणात फरक जाणवेल असे वाटते. 

नुकतेच महापालिकेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाली असून जनता यांच्याकडून नक्कीच बदल होईल या आशेने पाहत आहेत.

मुलाच्या अपघाताचा धसका अन् आईने जीव सोडला, माय-लेकाचं प्रेम पाहून सारं हळहळलं..

मुलाच्या अपघाताचा धसका अन् आईने जीव सोडला, माय-लेकाचं प्रेम पाहून सारं हळहळलं..

*मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची नाईक कुटूंबास सांत्वन भेट...*

नालासोपारा, प्रतिनिधी ता, ४ : आईचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते. ती कधीच आपल्या मुलांना त्रास झालेला पाहू शकत नाही. पण, जेव्हा एका आईला आपल्याच मुलाचा अपघात झाल्याचे कळताच त्यापेक्षा वेदनादायी या जगात काही नाही असं म्हणतात. हे दु:ख पचवणं जवळपास अशक्य असतं. असंच काहीसं नालासोपारा येथिल समेळपाडा येथे घडलं आहे. जिथे आपल्या मुलाच्या अपघाताचा आईने इतका धसका घेतला की आपले प्राण त्यागले
शिवसेनेच्या माजी शहरप्रमुख रूचिता नाईक यांचे पती अमित नाईक वय ३२ याचा उमराळे रोड नालासोपारा येथे अपघात झाला हे त्यांच्या आईला कळताच मयुरा ( माई ) नाईक वय ६२ यांची प्रकृती आधीच खालावली असताना अपघात घटनेची माहिती मिळताच व मुलाला बघताच आईनेही आपले प्राण सोडले. अशाप्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने  एकच शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मनसेचे अविनाश जाधव यांनी नाईक कुटूंबाची सांत्वन भेट घेत आधार दिला.

यामुळे नुकत्याच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या रूचिता नाईक यांच्या कुटूंबाची मनसेचे अविनाश जाधव यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत वैभव पवार यांनी मोफत रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देत व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले.

नवनिर्माण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष खरे यांना पीएच.डी.पदवी प्रदान !!

नवनिर्माण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष खरे यांना पीएच.डी.पदवी प्रदान !!

मुंबई (शांताराम गुडेकर)

           नवनिर्माण कला,वाणिज्य व विज्ञान (एच एम) महाविद्यालय, संगमेश्वर (जि. रत्नागिरी) येथील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष नवनीत खरे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांची पीएच.डी. पद‌वी प्रदान करण्यात आली आहे.
             श्री.खरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 'अनाथ मुलांचा समाजशास्त्रीय अभ्यास' या महत्त्वपूर्ण विषयावर  त्यांचा संशोधन प्रबंध सादर केला होता. यामध्ये अनाथ मुलांबाबत केलेल्या अभ्यासात सामाजिक दृष्टीकोनाचे तात्विक व सैद्धांतिक विश्लेषण प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. हे संशोधन कार्य शिवाजी विद्यापीठ सलग्न मार्गदर्शक प्रा. डॉ. महेंद्रकुमार आनंदराव जाधव, नाईट कला व वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर येथील प्राध्यापक व समाजशास्त्र विभागप्रमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
               मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख, प्रा. डॉ. बी. एन. केंद्रे यांनी सदर प्रबंधाचे  एक बाहिस्त परीक्षक म्हणून काम केले आहे.तसेच दुसरे बाहिस्त परीक्षक प्रा.डॉ. रमेश मकवाना सरदार पटेल विद्यापीठ, आनंद नगर, गुजरात, यांनी या संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.दोन्ही मान्यवरानी या प्रबंधाच्या दर्जेदार संशोधनाची प्रशंसा केली. प्रा. संतोष खरे यांच्या या यशाबद्दल  मित्र, अभ्यासक, विद्यार्थी व संशोधकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Tuesday, 3 February 2026

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

ठाणे प्रतिनिधी: ता.३,

पत्रकारिता, प्रभावी निवेदन, चित्रपट निर्मिती-दिग्दर्शन तसेच सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान रविवारी, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे येथे संपन्न झालेल्या Asian Youth Image Conference & Award Ceremony – 2026 या भव्य कार्यक्रमात करण्यात आला.

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (IIORC मान्यताप्राप्त) संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून निवड करण्यात आलेल्या १३० मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला माननीय श्री. विजय जाधव साहेब (उपसंचालक, नागरी संरक्षण, नवी मुंबई–ठाणे, गृह विभाग, महाराष्ट्र शासन), सुप्रसिद्ध मालिका व चित्रपट निर्माता श्री. दीपक जोशी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात बोलताना श्री. दीपक जोशी यांनी माध्यमे, चित्रपट व मालिका यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवून आणण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी निर्मित केलेल्या विविध मालिका व चित्रपटांतून सामाजिक आशय मांडण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पत्रकारिता क्षेत्रात सकारात्मक व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे, प्रभावी निवेदक म्हणून अनेक कार्यक्रमांना सुसंस्कृत दिशा देणारे, तसेच चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनातून सामाजिक प्रश्न अधोरेखित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.

सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करणाऱ्या श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांचा हा सन्मान तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या सन्मान सोहळ्यास प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे, पुरस्कारार्थी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या कार्याचा झालेला हा गौरव माध्यम व सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

रायगडमध्ये कॉंग्रेस किंग मेकर : हर्षवर्धन सपकाळ

रायगडमध्ये कॉंग्रेस किंग मेकर : हर्षवर्धन सपकाळ 

रायगडमध्ये महाविकास आघाडीचाच झेंडा : महेंद्रशेठ घरत 

दिबांच्या जन्मभूमीत कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मैदानात !

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद ! 

उरण  दि ३, (विठ्ठल ममताबादे) : लोकनेते दिबांच्या जन्मभूमीत जासई येथे कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. ३) आले होते. यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना प्रांतांमध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. 

यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, " रायगडमध्ये कॉंग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी कॉंग्रेस पक्ष सुरुवातीपासून आग्रही आहे. केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे, पण दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील." असे ते म्हणाले.यावेळी महेंद्ररशेठ घरत म्हणाले कि " जासई  उरण तालुका ही दिबांची जन्मभूमी आहे. दिबांची कामगिरी देशपातळीवर अभिमानास्पद आहे. अद्याप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिलेले नाही, येथील भूमिपुत्र हे कधीच सहन करणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भूमिपुत्रांनी विजयी करून सरकारचा निषेध करावा, तेव्हा सरकार जागे होईल. महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा मला शंभर टक्के विश्वास आहे. जासई, चिरनेर हे आमचे बालेकिल्ले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता येईल." जासई जिल्हा परिषद मतदार संघात डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून ऍड. अविनाश ठाकूर हे कॉंग्रेसचे उमेदवार उभे आहेत.पंचायत समितीसाठी जासई - निर्मला घरत, चिर्ले - प्रियंका मढवी, पंचायत समिती उमेदवार कविता पाटील, प्रारंभी गावंड हे सर्व उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. 
जासई, दिघोडे, कोप्रोली येथील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा विश्वास सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला.यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, प्रभारी डॉमनिक डिमेलो, माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे,  उपाध्यक्ष रामनाथ पंडित, जयवंत पाटील, संजय ठाकूर, प्रेमनाथ म्हात्रे, महिला अध्यक्षा रेखा घरत, शेकापचे नरेश घरत, संतोष म्हात्रे,सरपंच संतोष घरत, कामगार नेते संतोष घरत, कामगार नेते रवी घरत, बबन कांबळे आदी महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी पिरकोन येथे स्नेह भोजनाचा आस्वाद पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला.

** कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या 'आशीर्वादाने’ जंगलात निकृष्ट दर्जाचे पिलर काम?

** कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या 'आशीर्वादाने’ जंगलात निकृष्ट दर्जाचे पिलर काम?

वनविभाग–ठेकेदार संगनमताचा गंभीर आरोप; नागरिक संतप्त**

कल्याण | प्रतिनिधी

कल्याण तालुक्यातील मौजे नवगाव येथील जंगल परिसरात वनविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या निकृष्ट व खालच्या दर्जाच्या पिलर बांधकामामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे काम थेट कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, वनविभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

वन व्यवस्थापन समितीने हा गैरप्रकार २२ जानेवारी २०२६ रोजी उघडकीस आणत ठेकेदारांकडून शासनाचा निधी हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. हा विषय “बातमीदार माझा” या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात आला होता. मात्र, इतके गंभीर आरोप समोर येऊनही आजतागायत वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब अधिकच संशय निर्माण करणारी आहे.

जंगल परिसराचे थेट नुकसान होत असताना, शासनाच्या पैशाचा अपव्यय होत असताना तसेच निकृष्ट साहित्य वापरून काम सुरू असतानाही वनविभागातील अधिकाऱ्यांचे मौन नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे वनविभाग व संबंधित ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय अधिक बळावत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर आवाज उठविणारी वन व्यवस्थापन समिती सुद्धा अलीकडे मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. “मी कल्याण वनविभागातील भोंगळ कारभार आणि गैरप्रकारांविरोधात आधीपासूनच लढा देत आहे. मौजे नवगाव येथील निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवण्यासाठी मी लवकरच आमच्या शिष्टमंडळासह वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी तक्रार देणार आहे. या प्रकरणातील ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे तसेच जबाबदार वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आम्ही करणार आहोत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

आता प्रश्न हा आहे की,
👉 वनविभाग कारवाई कधी करणार?
👉 जंगलातील गैरप्रकारांना अभय देणारे अधिकारी कोण?
👉 शासनाचा पैसा व जंगल वाचवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

नागरिकांच्या रोषाचा उद्रेक होण्याआधी प्रशासन जागे होणार का, याकडे संपूर्ण कल्याण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

ठाणे, प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवडण्यात आलेल्या १३० “हिर्‍यांमध्ये” उल्लेखनीय कार्यामुळे मा.श्री. विजय जाधव साहेब (उपनियंञक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह – ठाणे, गृह विभाग विशेष, महाराष्ट्र शासन) यांचा कौतुक सन्मान रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे येथे संपन्न झालेल्या Asian Youth Image Conference & Award Ceremony – 2026 मध्ये करण्यात आला.

इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (IIORC मान्यताप्राप्त) संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन व नागरी संरक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व लोकाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नागरी संरक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन, जनजागृती, स्वयंसेवक प्रशिक्षण, तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्पर मदत देण्यासाठी श्री.जाधव साहेब यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई समुह, ठाणे विभागात नागरी संरक्षण कार्य अधिक सक्षम झाले असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहुणे, मान्यवर, पुरस्कारार्थी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. श्री. विजय जाधव साहेब यांचा झालेला हा गौरव नागरी संरक्षण विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी अभिमानास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...