Saturday, 18 April 2026

"इतिहासाच्या पाऊलवाटेवर 'बहुसांस्कृतिक ठाणे' !

"इतिहासाच्या पाऊलवाटेवर 'बहुसांस्कृतिक ठाणे' !

*संस्कृतीचा संगम आणि इतिहासाची साद: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा अनोखा 'हेरिटेज वॉक'*

ठाणे,दि.18 :-* 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या विशेष दिवसानिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने "बहु सांस्कृतिक ठाणे" या हेरिटेज वॉक (Heritage Walk) चे आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज वॉकची सुरुवात सुप्रसिद्ध पुरातन कोपिनेश्वर मंदिरापासून करण्यात आली, त्यानंतर मासुंदा तलाव, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर, मुस्लिम धर्मियांचे सामाजिक भवन या ठिकाणी भेट देऊन शेवटी समारोप टाऊन हॉल येथे करण्यात आला.

     या हेरिटेज वॉक मध्ये अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, तहसिलदार सचिन चौधरी, अमोल कदम, उमेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहायक गिरीश काळे, आर्किऑलॉजिस्ट गौरी काळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अद्वैता मांगले, क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

     या हेरिटेज वॉक दरम्यान संदेश अवडण यांनी मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत चोख बजावली. भेट दिलेल्या प्रत्येक वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व, त्या वास्तूविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, त्याचे संदर्भ अशी वैविध्यपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांना जेष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव तेटविलकर, इंटॅक च्या सहसंयोजक ॲड.दिव्या ठाकूर, सिने अभ्यासक संतोष पाठारे, दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मानसी आमडेकर, कार्यक्रम छायाचित्रकार जय मनोरे या सर्वांची मोलाची साथ लाभली. 

   जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या हेरिटेज वॉकचे अतिशय उत्कृष्ट नियोजन तहसिलदार सचिन चौधर आणि अश्वमेध प्रतिष्ठान चे संस्थापक, पुरातत्व अभ्यासक व मानद वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र राज्य अविनाश हरड यांनी केले.

बोकडवीरा एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाजवळील उड्डाणपूल धोक्यात; आधाराच्या प्रतीक्षेत, अपघाताची भीती !!

बोकडवीरा एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाजवळील उड्डाणपूल धोक्यात; आधाराच्या प्रतीक्षेत, अपघाताची भीती !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाजूला असलेला उड्डाणपूल अस्तित्व टिकवण्यासाठी आधाराची वाट पाहत उभा आहे. पाच वर्षांपूर्वी अवजड वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मालाचे कंटेनर वेळेत बंदरात पोहोचवण्यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. मात्र आजघडीला हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून वाहनचालक व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

पूलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.प्रत्यक्ष पाहणी केली असता पूलाची दुरवस्था स्पष्ट दिसते. एका बाजूला पूलाच्या मध्यभागी तडे गेले असून तो तब्बल सुमारे एक फूट खचला आहे. तर दुसऱ्या बाजूला पूलाच्या दोन्ही कडेला संरक्षक कठडे तुटले आहेत. उड्डाणपूलाच्या दोन्ही टोकाला भल्या मोठ्या भगदाडांची निर्मिती झाली असून येथून अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू आहे. सध्या या पुलावरून जड वाहतूक बंद करून फक्त हलकी वाहने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने धोका कायम आहे.

द्रोणागिरी नोडमधील धोक्याची मालिका सुरूच आहे.ही परिस्थिती नवीन नाही. १४ मार्च  २०२१ रोजी द्रोणागिरी नोडमधील सेक्टर १५ मध्ये फुंडे गावाजवळील उरण-जुनाशेवा मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टवरून प्रवास करताना अचानक स्लॅब कोसळल्याने दीपक कसूरकर या तरुणाचा मोटारसायकलसह कोसळून करुण अंत झाला होता. या घटनेनंतर सिडकोने द्रोणागिरी नोडमधील सेक्टर १५ ते ५१ मधील सर्व मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासर्वांची दुरुस्तीसाठी निविदा काढली होती. द्रोणागिरी नोड परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाणपूलांची निर्मिती करण्यात आली असली तरी त्यांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला असून चौकशीची मागणी जनतेतून होत आहे.एकिकडे उड्डाणपूलाचे काम सदोष व निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध होत आहे. आता या द्रोणागिरी नोड परिसरातील सर्वच उड्डाणपूलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनतेकडून या सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित ठेकेदारांच्या कामाची सखोलपणे चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणीही जोर धरत आहे. अशा पद्धतीने काम करून घेणाऱ्या अभियंत्यांचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाची भूमिकेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी पावेतो हा पूल परिसरातील उड्डाणपूलांचा काही भाग पडला होता. त्यानंतर चार ते पाच वर्षे पूर्वी जासई गावाजवळील उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू असतानाच काही भाग कोसळून पडला होता. तेव्हापासूनच या भागातील उड्डाणपूलांच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या हा पूल  आधाराची आणि अपघात होण्याची वाट पाहत आहे. संरक्षणाच्या दोन बाजूंना ही संरक्षणभिंत तोकडी असल्याने वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे.

 एमएसईबी प्रकल्प आणि वीज यंत्रणा
बोकडवीरा येथे महानिर्मितीचा (MAHAGENCO) औष्णिक वीज प्रकल्प आहे. राज्यात वीजेची मागणी वाढत असताना अशा प्रकल्पांजवळील पायाभूत सुविधा सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. महापारेषणच्या बाभळेश्वर-कुडूस २२८ किमी लांबीच्या वीजवाहिनीमुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. मात्र स्थानिक पातळीवर रस्ते व पुलांची अवस्था वाईट असेल तर औद्योगिक विकासाला खीळ बसू शकते.

नागरिक, वाहनचालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या उड्डाणपूलाच्या तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक आधार देण्याची मागणी केली आहे. अन्यथा उरणमधील आणखी एक मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. सिडको, एमएसईबी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जासई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

जासई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
फुले शाहु आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठाण जासई, नवी मुंबई यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला, सकाळी जासई हायस्कुल येथे सर्व महापुरुषाच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आले व नंतर सावित्रीबाई फुले नगर येथे मान्यवरांचे आगमन व स्वागत करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी उरण पंचायत समिती सदस्या  निर्मला नरेश घरत उपस्तिथ होत्या.या प्रसंगी रायगड जिल्हा रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष सुधीर पवार यांनी आपले विचार मांडले व रिपब्लिकन सेना सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनीही जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या , कार्यक्रमाचे दिप प्रज्वलित करून कामगार नेते व शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रोहिदास घरत यांनी उपस्तिथ आंबेडकरी जनतेस मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.आपण एकत्रित राहूनच कुठलेही कार्य पुढे नेऊ शकतो हेच त्यांनी जयंती दिनी सांगितले. तसेच कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे माजी व्हा. चेअरमेन नूरा शेख सर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजाप्रती त्याग व आपण यातून आपल्या मुलांना शिक्षण देणे हे किती गरजेचे आहे ते सांगितले. जासई ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच धिरज घरत यांनी हि शुभेच्छा दिल्या व आजही उपेक्षित वर्गासाठी आपण याच  जयंती च्या मार्फत काय केले पाहिजे , जेणेकरून समाजाच्या शेवट पर्यंत मुलांना शिक्षण कसे घेता येईल यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ग्रामपंचायत सदस्य आदित्य यशवंत घरत यांनी फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठाण च्या जयंती ला आल्यावर प्रत्येक वर्षी या ठिकाणी कुणी डॉक्टर तर वकील , तर शासकीय अधिकारी , अनेक मुलं घडवण्याचे काम या ठिकाणी चालू आहे आणि आम्हाला हे चित्र दिसल्यावर खरच अभिमान वाटतो या शब्दात त्यांनी आपले विचार मांडले. अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाग्यश्री मुंजाजी मस्के यांनीही आपले अध्यक्षीय भाषण केले , स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि पुढे येऊन चळवळीचे काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विजय मस्के आणि सुरज पवार यांनी केले तर अनेक विध्यार्थाने आपले विचार मांडले  व काही विध्यार्थ्यानी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असलेल्या गीतावर नृत्य केले सर्व मुलांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले, व कार्यक्रमाच्या शेवटी भोजन देण्यात आले ,  या कार्यक्रमास अनेक ठिकाणाचे, विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते.हा कार्यक्रम फुले शाहु आंबेकर सामाजिक प्रतिष्ठाण जासई यांच्या सर्व सभासदांनी व रमाई महिला बचत गट आणि यशोधरा महिला बचत गट यांच्या सर्व सभासद यांनी उत्तम नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडला. या कार्यक्रमास  जासई , एस सी ठाकूर कॉलनी ,फुले नगर , शिवाजीनगर , रेल्वे कॉलनी , शिर्के कॉलनी , नवघर , कोपर  येथून आलेले सर्व अनुयायी उपस्थित होते

सत्तेच्या विरोधात लढण्याचे पत्रकाराचे कर्तव्य मी बजावतो - प्रवीण पुरो.

सत्तेच्या विरोधात लढण्याचे पत्रकाराचे कर्तव्य मी बजावतो  -  प्रवीण पुरो.

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मधुबन कट्ट्यावर "भोंदू बाबा "या विषयांवर झालेल्या कविसंमेलनात जीवन गौरव मूर्ती जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो या विषयावर बोलताना म्हणाले की, एका अशोक खरात या एका भोंदूने महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. त्याला कारण सरकार आहे.जे सरकार चुकीचे करीत आहे,त्या विरोधात लढण्याचे पत्रकाराचे कर्तव्य करणं आवश्यक आहे ते मी करीत आहे.यावेळी प्रवीण पुरो यांच्यासोबत लेखक नाट्यकर्मी शरद कोरडे आणि पत्रकार नागेश कुलकर्णी यांनाही कोमसापकडून जीवन गौरव पुरस्काराने कट्ट्याचे अध्यक्ष राम म्हात्रे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष स्थानी सुरेश शिंदेसर  होते.सूत्रसंचालन मच्छिंद्र म्हात्रे यांनी सुरेख केले.
  
    
     विमला उरण येथे  दर महिन्याच्या १७  तारखेला कवी संमेलन आयोजित करण्यात येते. विमला तलाव येथे १२६ व्या कविसंमेलनात भोंदूबाबांच्या भोंदूगिरीवर अतिशय परखड विचारांच्या कविता सादर करण्यात आल्या. साहित्यरत्न प्रा.एल.बी. पाटील अजय शिवकर, नरेश पाटील, म.का. म्हात्रे,अनिल भोईर, कवी पुगावकर, भरत पाटील,हेमंत पाटील, रामचंद्र म्हात्रे,मारुती तांबे, भालचन्द्र म्हात्रे,ज्येष्ठ कवी मेस्त्री,नारायण धरत इत्यादी १६ कवींनी कविता सादर केल्या.     
  
   
        एड.राजेंद्र जैन, सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, नीळवर्ण दत्ताराम, प्रकाश पाटील, राम पाटील, बाजीराव घरत इत्यादी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.

जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले व ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या वतीने आई भवानी मातेचा उत्सव साजरा !!


जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले व ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या वतीने आई भवानी  मातेचा उत्सव साजरा !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात अनेक ठिकाणी देवीच्या यात्रा, उत्सव सुरु आहेत.उरण तालुक्यातील पाले गावात  आई भवानी मातेचे जागरण तसेच आई  भवानी मातेचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी मंडळाचे सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी, खजिनदार सल्लागार व सर्व सभासद, ग्रामस्थ तसेच वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पंचायत समिती सदस्य प्रारंभी अविनाश गावंड यांनी आई भवानी मातेच्या मंदिरात स्पीकर साठी दहा हजाराची मदत यावेळी केली.

जय भवानी नवतरुण  मित्र मंडळ पाले व ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली २३ वर्षे जय भवानी मातेचा उत्सव साजरा मोठ्या उत्साह साजरा होत आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच गावातील सर्व कार्यकारी मंडळ माता भगिनी सहभागी होतात.या उत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद लाभत आहे यावर्षी सुद्धा हा उत्सव साजरा  करण्यासाठी गावातील ग्रामस्थ तसेच  जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले चे सर्व सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सल्लागार यांनी विशेष मेहनत घेऊन हा उत्सव यशस्वीपणे, उत्साहाने साजरा केला. आई भवानी माता  म्हणजे पालेगाव ची शान आहे. भाविक भक्तांची देवीवर खूप मोठी श्रद्धा आहे.म्हणून हा उत्सव मोठ्या उत्साहाने भाविक भक्त साजरा करतात

८ वर्षांच्या अक्षरचा विक्रम ; अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया १७ किमी पोहून गाठले !

८ वर्षांच्या अक्षरचा विक्रम ; अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया १७ किमी पोहून गाठले !

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : उरणमधील सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या ८ वर्षीय अक्षर दिपाली चेतन पाटील याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

१७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १ वाजून ५९ मिनिटांनी अटल सेतूजवळून समुद्रात झेप घेत त्याने ४ वाजून २९ मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया गाठले. १७ किमीचे अंतर त्याने २ तास २९ मिनिट २९ सेकंदात पूर्ण केले.

महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली. उरण तालुक्यातील केगांव गावचा रहिवासी असलेला अक्षर पाटील हा परिवार, 'सी स्विमिंग टीम' आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत पोहला. या वयात केलेल्या कामगिरीमुळे उरण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे

व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडून वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा; पुढील वाटचालीवर उच्चस्तरीय बैठक !!


व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडून वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा; पुढील वाटचालीवर उच्चस्तरीय बैठक !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
 वाढवण पोर्ट प्रकल्प लिमिटेड (व्हीपीपीएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री गौरव दयाल, भा.प्र.से. यांनी भारतातील १३ वे प्रमुख बंदर असलेल्या या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील वाटचालीचा आराखडा निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रकल्पाचा पुढील वाटचाल, रस्ते जोडणीसाठी आवश्यक जमीन संपादन, मत्स्य व्यवसायाशी संबंधित धोरणात्मक बाबी तसेच स्थानिक मनुष्यबळाच्या कौशल्यविकासासाठी राबविण्यात येत असलेल्या वाढवण पोर्ट कौशल्य विकास कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

डॉ. इंदू राणी जाखर, भा. प्र. से., जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, पालघर, सुश्री प्रेरणा देशभरतर, भा. प्र. से., मत्स्य आयुक्त, मुंबई, तसेच श्री रविश कुमार सिंह, भा. रे. वा. से., उपाध्यक्ष, जेएनपीए व मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हीपीपीएल हेही या बैठकीस उपस्थित होते व त्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला.

या बैठकीस केंद्र व राज्य शासनातील विविध महत्त्वाच्या विभागांतील आणि संस्थांतील इतर वरिष्ठ अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये बंदर प्रशासन, जिल्हा प्रशासन, कायदा अंमलबजावणी यंत्रणा, वन व मत्स्य विभाग यांचे अधिकारी तसेच एनएचएआय, डीविइटी, भारतीय रेल्वे, तांत्रिक सल्लागार आणि इतर कौशल्य विकास संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
Poo
महत्त्वाच्या रस्ते पायाभूत सुविधांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली, जेणेकरून बंदराशी अखंड आणि सुरळीत जोडणी सुनिश्चित करता येईल. तसेच, मत्स्य व्यवसायाशी संबंधित प्रश्न हाताळताना संतुलित दृष्टिकोन अवलंबण्याचे महत्त्व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  यांनी अधोरेखित केले, ज्यायोगे प्रकल्पाच्या उद्दिष्टांसोबतच स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे संरक्षणही सुनिश्चित होईल.

वाढवण पोर्ट स्कौशल्य विकास कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक युवकांना उद्योग-सुसंगत कौशल्ये प्रदान करणे तसेच प्रकल्पाच्या प्रगतीसोबतच परिसरातील रोजगाराच्या संधी वाढविणे हा आहे.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी विविध संस्थांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करीत असताना सर्व संबंधित भागधारकांना मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा वेग कायम राखण्यासाठी परस्पर सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या.

"इतिहासाच्या पाऊलवाटेवर 'बहुसांस्कृतिक ठाणे' !

"इतिहासाच्या पाऊलवाटेवर 'बहुसांस्कृतिक ठाणे' ! *संस्कृतीचा संगम आणि इतिहासाची साद: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा अनोखा 'हेर...