Sunday, 22 February 2026

राज्यात मुदत संपलेल्या १४ हजार ग्राम पंचायतीवर "प्रशासक "म्हणून विद्यमान सरपंचाचीच नेमणूक, तर सदस्याचीं प्रशासकीय समिती असणार !!

राज्यात मुदत संपलेल्या १४ हजार ग्राम पंचायतीवर "प्रशासक "म्हणून विद्यमान सरपंचाचीच नेमणूक, तर सदस्याचीं प्रशासकीय समिती असणार !!

भिवंडी, दिं, २२,अरुण पाटील (कोपर) :

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे आणि विविध प्रशासकीय कारणांमुळे निवडणुका घेता आल्या नाहीत अशा  ग्राम पंचायतीवर "प्रशासक" म्हणून विद्यमान सरपंचच राहणार तर सदस्यांची प्रशासकीय समितीत असणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार आहे. 

या आधी जानेवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकानुसार, २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्यातील ग्रामपंचायतींची मोठी संख्या आणि विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता प्रशासनासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने सुधारित निर्णय घेतला आहे. 

नव्या निर्णयानुसार, ग्रामपंचायतीची मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत जे सरपंच पदावर असतील, त्यांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात येईल. त्यांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल आणि नव्या व्यक्तींना प्रशासन समजून घेण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. 

प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत, जे आधी होईल तेवढा राहणार आहे. हा तात्पुरता उपाय असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच नियमित निवडून आलेले पदाधिकारी कारभार स्वीकारतील. 

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय सध्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतींसाठीच लागू राहणार आहे. या कालावधीत प्रशासक आणि प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असतील. 

राज्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने सर्वत्र बाहेरील प्रशासक नेमणे व्यवहार्य ठरणार नव्हते. पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाऱ्यांची मर्यादित संख्या ही देखील मोठी अडचण होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन सरकारने स्थानिक स्तरावरच विद्यमान सरपंच आणि त्यांच्या टीमकडे तात्पुरता कारभार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनात सातत्य, पारदर्शकता आणि वेग राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Friday, 20 February 2026

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित "ग्रामीण विकास व संस्कार शिबीर" !!

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित
*"ग्रामीण विकास व संस्कार शिबीर"*
  *(१०/२/२०२६ ते‌ १६/२/२०२६)*

सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई, राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांचे, ग्रामीण विकास व संस्कार शिबीर, दि. १०/२ ते १६/२/२०२६ या कालावधीत मु.पो. केळवणे, तालुका पनवेल या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात एकूण ५२ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षक सहभागी झाले होते. या गावातील हे आमचे पहिले शिबीर होते. शिबिराचे उद्घाटन दिनांक १०/२/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सरपंच श्री गुरूराज ठाकूर, पंचायत समिती सदस्या सौ. वैदेही घरत, समाजसेवक श्री. राजू मुंबईकर (रायगड भूषण पुरस्कार प्राप्त), श्री विलासभाऊ ठाकूर व सौ. महानंदा ठाकूर यांच्या हस्ते, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर, डॉ. विष्णू भंडारे व ऍड. दिपक पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले व शिबिराला औपचारिक सुरुवात झाली.

आमच्या विद्यार्थ्यांनी रोज सकाळच्या तीन तासांच्या श्रमदानातून ग्रामस्वच्छता व शून्य प्लास्टिक मोहीम यशस्वीरित्या राबवली व स्थानिक ग्रामस्थांना त्यांचे गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आवाहन केले. तसेच स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, रस्ता सुरक्षा या विषयावर पथनाट्याद्वारे गावातील विविध ठिकाणी जनजागृती केली. एके दिवशी या विषयांवर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते, यामध्ये ३० विद्यार्थी सहभागी झाले होते.

तसेच रोज वेगवेगळ्या सामाजिक विषयावर बौद्धिक सत्रांचे आयोजन तेथील शाळेमध्ये व शिबिरात करण्यात आले होते. यामध्ये शिवाजी महाराजांची थोरवी, अंधश्रद्धा व बुवाबाजी, साप व पर्यावरण, व्यसनमुक्ती, कवितेतून प्रबोधन अशा महत्त्वाच्या विषयांवर निमंत्रित व्यक्तींची व्याख्याने झाली. यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांसह शाळेतील २०० पेक्षा जास्त विद्यार्थांचा उत्तम सहभाग लाभला.
  
रविवारी, महाशिवरात्रीच्या दिवशी, १५/२/२६ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता आम्ही गावातील महिलांसाठी हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयासमोरील भव्य व्यासपीठावर केले होते. यामध्ये आमच्या ३२ मुलींसह ७० पेक्षा जास्त स्थानिक महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये महिलाना तिळगुळ, भेटवस्तू वाटण्यात आल्या. त्यानंतर सर्व  ग्रामस्थां साठी 'मनोरंजनातून प्रबोधन' अशा स्वरूपाचा सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, सामुहिक नृत्य, गाणी तसेच स्थानिक विद्यार्थ्यांनी देखील नृत्य व शिवाजी व संभाजी राजेंच्या जीवनावरील भाषणांचा समावेश होता. यामध्ये गावातील सहभागी व विजेत्या मुलांना बक्षिसे देण्यात आली.

प्रा. विशाल करंजकर सरांनी मुलांच्या उत्तम फिटनेस व आरोग्यासाठी नियमित रोज सकाळी सहा ते साडेसात या वेळेत हलका व्यायाम, कवायती व योगाचे विविध प्रकार त्यांना शिकवले. तसेच शेवटच्या दिवशी धावण्याच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

शिबिराच्या दरम्यान सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक डॉ. समीर ठाकूर, डॉ. सुनील गायकवाड, प्रा. कुंदन कांबळे, प्रा. सुमेध माने, प्रा. निर्मला कांबळे, वैभव महाडीक, ऍड. रेश्मा महाडीक यांनी शिबिराला भेट देऊन सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री विलास ठाकूर, सौ. महानंदा ठाकूर, श्री. राजू मुंबईकर, सौ. राणीताई मुंबईकर व सरपंच श्री. गुरुराज ठाकूर व स्थानिक पत्रकार श्री. अजय शिवकर यांनी केलेले सहकार्य खूपच मोलाचे ठरले. तसेच एन. एस. एस‌. कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर व डॉ. विष्णू भंडारे यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजचे आजी- माजी वरिष्ठ स्वयंसेवक विद्यार्थी ऋषिकेश सौंदाळकर, सागर, अधीरा, अर्पिता, विघ्नेश, तन्वी, आदित्य, विजय, आशिष, हर्षद, प्रियांका, प्रितेश, ओंकार, निलेश इ. सुट्टी घेऊन जमेल तसे शिबीरात सहभागी झाले व त्यांनी मनापासून सहकार्य केले.

*प्रा. विशाल करंजवकर व*
*डॉ. विष्णू भंडारे*
*(एन. एस. एस‌. कार्यक्रम अधिकारी)*

आर. के. एफ. जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा येथे शिवजयंती उत्सवाचा अभूतपूर्व सोहळा; !!

आर. के. एफ. जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा येथे शिवजयंती उत्सवाचा अभूतपूर्व सोहळा; !!

** जेएनपीटी टाऊनशिपमध्ये शिवरायांच्या नामाचा जयघोष!

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : आर. के. एफ. जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा येथे गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी 'शिवजयंती उत्सव' अत्यंत जल्लोषात आणि पारंपारिक उत्साहात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्याने संपूर्ण जेएनपीटी टाऊनशिप परिसर भगवामय झाला असून शिवरायांच्या जयघोषाने भारावून गेला होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालक-शिक्षक संघाचे प्राथमिक मराठी माध्यम विभागाच्या उपाध्यक्षा  अश्विनी पाटील, प्राथमिक इंग्रजी माध्यमाचे उपाध्यक्ष ॲड.  केवल गावंड, माध्यमिक इंग्रजी माध्यमाचे उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे, तसेच विश्वास पाटील, पालक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष योगेश तांडेल, उपाध्यक्ष रमाकांत म्हात्रे, आणि जासईचे गुरुनाथ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे माध्यमिक विभागाच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक होते. क्रीडा शिक्षक मनोहर टेमकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत या मुलींनी लेझीमचा ताल धरला. शिवरायांच्या पालखी सोहळ्याने संपूर्ण जेएनपीटी टाऊनशिपमध्ये मिरवणूक काढली. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शिवराय, जिजाऊ आऊसाहेब आणि मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.मिरवणूक सेक्टर १ मधील प्राथमिक विभागाच्या शाळेत पोहोचल्यानंतर, बालोद्यान, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन  किशोर म्हात्रे आणि  मिलिंद ठाकूर यांनी संयुक्तपणे केले.​ यावेळी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षक विनोद हरड आणि वर्षा म्हात्रे  तसेच चौथी मधील विद्यार्थी नमित वाघावले यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विशेष कौतुकाची बाब म्हणजे, इयत्ता चौथीमधील विद्यार्थिनी प्रत्यूषा हिने आपल्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या या भाषणाचे सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या तिन्ही विभागांच्या मुख्याध्यापकांचे म्हणजे रमाकांत गावंड (प्राथमिक), गिरीश पाटील  (माध्यमिक), अंकुश जोगळे, भूषण जाधव, आणि मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे (बालोद्यान) यांचे नियोजन कौतुकास्पद ठरले. तसेच ज्येष्ठ शिक्षक जगदीश मढवी आणि सुपरवायझर चंदा टेमकर  यांचेही सहकार्य लाभले.​ विशेष म्हणजे, हा सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला सफाई कामगार आणि सिक्युरिटी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच तमाम पालक वर्गाचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. या भव्य कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार मुख्याध्यापक रमाकांत गावंड  यांनी मानले. अशा पद्धतीने हा भारदस्त आणि प्रेरणादायी सोहळा संपन्न झाला

दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे भव्य शिवजन्मोत्सव साजरा !

दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे भव्य शिवजन्मोत्सव साजरा !

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
“हा एकच असा राजा होऊन गेला की त्याची शिवजयंती तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे साजरी होते,” या भावनेतून १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे द्रोणागिरी किल्ला येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दोन ते तीन महिने आधीपासून गड स्वच्छता व संवर्धनाची तयारी करण्यात आली. १८ फेब्रुवारी रोजी गडाची सजावट करून विमला तलाव येथे शिवप्रतिमेचा अभिषेक, मशाल फेरी व सहभोजन पार पडले.१९ फेब्रुवारी रोजी बालशिवरायांच्या अंगाई गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. उरण बाजारपेठेतून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टिमकी वाद्य आणि बालशिवरायांच्या वेशातील मावळा हे विशेष आकर्षण ठरले. गडावर पारंपरिक पूजन व भंडाऱ्याने जल्लोष करण्यात आला.शिवगर्जना शाहीर पथकाचे युवाशाहीर अभिषेक पाटील व सहकाऱ्यांच्या जोशपूर्ण पोवाड्यांनी वातावरण भारावून गेले. “राजांचे विचार जपायचे असतील तर गड-कोट टिकवले पाहिजेत,” हा संदेश त्यांनी दिला.शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. लहान मावळ्यांना शिववस्त्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष शेखर भोमकर व उपाध्यक्ष विवेक केणी यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा यशस्वी पार पडला. कार्यक्रमाचे निवेदन राजेंद्र ठाकूर यांनी केले.गडाची स्वच्छता करून जल्लोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा उपक्रम गडसंवर्धन व राष्ट्रप्रेमाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

पुनाडे गावात शिवजयंती उत्साहात साजरी !

पुनाडे गावात शिवजयंती उत्साहात साजरी !

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज संघटना पुनाडे आणि देवेंद्र पाटील आणि परिवार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पुनाडे गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनोहरशेठ भोईर, खोपटे गावातील उद्योगपती देवेंद्रशेठ पाटील. ए.डी.पाटील , द्रोणागिरी भुषण पुरस्कार प्राप्त चित्रकार रुपेश पाटील,ना.क.पाटील गुरुजी, शिंदे गटाचे तालुका संघटक रमेश म्हात्रे , ना.शं.पाटील गुरुजी, संदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रसिक पाटील, कृष्णा डाकी,  डोळ्यांच्या डॉक्टर दिक्षा डाकी, सद्गुरू अज्ञा बचत गटाच्या अध्यक्षा प्रिती देवेंद्र पाटील, जनाबाई पाटील, काशिबाई खारपाटील चिरनेर,लिलाबाई पाटील, प्रदिप पाटील व मिना पाटील रांजण पाडा, यश पाटील चरण पाटील रावे, अमित पाटील आवरे, प्रणाली डाकी, स्वाती पाटील,एड.रुषाली पाटील, स्नेहल पाटील, डॉक्टर जयेश पाटील, संदेश पाटील, अमित ठाकूर, ग्रामसुधारणा ग्रामस्थ मंडळ सावरखार अध्यक्ष गणेश घरत, आणि मोठ्या प्रमाणात पुनाडे ग्रामस्थ आणि शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मान्यवरांनी भाषणातून माहिती दिली ह्या मध्ये चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर भाषणे केली. चिन्मय पाटील रावे, चिराग पाटील रावे,वेदा पाटील पुनाडे, आणि शिवाजी महाराजांच्या बाळ भुमीकेत वेद पाटील ह्याने महत्वाची भूमिका बजावली.ह्या कार्यक्रमाचे आयोजक आणि पुनाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. देवेंद्र पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असुन ते गोरगरीब जनतेला नेहमीच मदत करत असतात त्यांनी पुनाडे गावात अनेक कार्यक्रम राबविले आहेत .तसेच ह्या कार्यक्रमातील पाहुण्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत देवेंद्र पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अशारीतीने पुनाडे गावात शिवजयंती उत्सव देवेंद्र पाटील आणि परिवार तसेच छत्रपती शिवाजी महाराज संघटना ह्यांच्या वतीने खेळीमेळीच्या वातावरणात, मोठया उत्साहात संपन्न झाले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना गरम चादरीचे वाटप !

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना गरम चादरीचे वाटप !

** शिवजयंती निमित्त संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे कार्य व विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून उरण तालुक्यातील करळ फाटा येथील झोपडपट्टीतील गोरगरीब गरजूंना, नागरिकांना गरम चादरीचे ( ब्लॅंकेटचे ) वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे जवळचे सहकारी कट्टर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत (चिरनेर) यांची उपस्थिती लाभली. राजेंद्र भगत यांच्या शुभहस्ते गोरगरिबांना गरम चादरीचे (ब्लॅंकेटचे) वाटप करण्यात आले. 

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सुदेश पाटील, विठ्ठल ममताबादे, कुमार ठाकूर, प्रेम म्हात्रे, माधव म्हात्रे, अन्वी पाटील,हेमंत ठाकूर,कृष्णा कोळी,सादिक शेख,साहिल म्हात्रे,परशुराम म्हात्रे,घनश्याम पाटील, सचिन म्हात्रे, अभय पाटील, प्रकाश म्हात्रे, नारायण कोळी आदी पदाधिकारी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्तावनेत संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी संस्थेचा थोडक्यात परिचय व संस्थेने केलेली कार्य याची माहिती दिली. ज्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर नाही, उन्हाळा हिवाळा पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये जे हलाकीचे जीवन जगत आहेत, ज्यांना कोणत्याही सुख सुविधा नाहीत अशा गोरगरीब जनतेला गरम चादरीचे (ब्लॅंकेटचे) वाटप करण्यात आल्याने गरजू. नागरिकांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. आभार मानताना संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले.कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत यांचा यावेळी यथोचित मान सन्मान करण्यात आला. सदर उपक्रमासाठी राजेंद्र भगत यांचे विशेष सहकार्य लाभल्याने  त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पालघरच्या संघ व्यवस्थापकांची रांचीतील राष्ट्रीय निवड चाचणीत उल्लेखनीय कामगिरी !!

पालघरच्या संघ व्यवस्थापकांची रांचीतील राष्ट्रीय निवड चाचणीत उल्लेखनीय कामगिरी !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

भारत सरकारच्या खेळ आणि क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स अंतर्गत वैयक्तिक मैदानी स्पर्धांसाठी राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणी दिनांक १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रांची येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापक म्हणून पालघर जिल्ह्यातील श्री. आशिष नरोत्तम पाटील (डॉन बॉस्को शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, बोईसर) तसेच प्रा. योगेश किशोर चौधरी (कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, विरार) यांची निवड करण्यात आली होती.

दोन्ही संघ व्यवस्थापकांनी आपली जबाबदारी अत्यंत सक्षमपणे व यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल चंद्रशेखर साखरे (सहाय्यक संचालक, क्रीडा आणि युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे) तसेच पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सुहास व्हनमाने यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पालघर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे.

राज्यात मुदत संपलेल्या १४ हजार ग्राम पंचायतीवर "प्रशासक "म्हणून विद्यमान सरपंचाचीच नेमणूक, तर सदस्याचीं प्रशासकीय समिती असणार !!

राज्यात मुदत संपलेल्या १४ हजार ग्राम पंचायतीवर "प्रशासक "म्हणून विद्यमान सरपंचाचीच नेमणूक, तर सदस्याचीं प्रशासकीय समिती असणार !! ...