Friday, 12 June 2026

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ !!

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ !!
पुणे, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मार्जिन मनी योजना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा २५ टक्के रकमेपैकी जास्तीत जास्त १५ टक्के  सबसिडी (मार्जिन मनी) राज्य शासनामार्फत देण्यात येते. लाभार्थ्यांनी १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि संबंधित बँकेने स्टॅन्डअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी वितरित करण्यात येते.

इच्छुक व पात्र नवउद्योजकांनी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे  येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांनी केले आहे.

Thursday, 11 June 2026

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आजअखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत.

दरम्यान, NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तत्काळ रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावे, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहे.

मोहने येथील पाटील बाल मंदिर शाळेचा दहावीचा विद्यार्थी वेदांत मिश्रा बेपत्ता !!

मोहने येथील पाटील बाल मंदिर शाळेचा दहावीचा विद्यार्थी वेदांत मिश्रा बेपत्ता !!

पालकांची आर्त हाक

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने परिसरातील पाटील बाल मंदिर या शाळेचा विद्यार्थी वेदांत मिश्रा हा आज दुपारी शाळेतून घरी परत येताना बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.वेदांत हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून तो मोहने येथील पाटील शाळेत शिक्षण घेत आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर वेदांत घरी परतला नसल्याने कुटुंबीय अत्यंत चिंतेत असून त्याचा सर्वत्र शोध सुरू आहे. वेदांतच्या अंगावर पाटील शाळेचा गणवेश असून, तो शेवटचा शाळेतून घरी येताना दिसला होता. परंतु तो कोठे गेला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश आंधळे तपास करीत असून सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे तसेच त्याचा शोध घेण्याकरिता राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क केल्याचे आंधळे यांनी सांगितले आहे.

आपल्या मुलाच्या शोधासाठी आई-वडील, नातेवाईक आणि मित्रपरिवार हतबल झाले असून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून वेदांत दिसल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
9321265331
96536 77810

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त -अतुल कानडे

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त -अतुल कानडे

पुणे, प्रतिनिधी :
राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे १ कोटी २० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, १५ लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३५ हजार ९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता . प्रसाद सुर्वे तसेच पुणे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार गुणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सी यांनी केलेल्या कारवाईत पुणे-मुंबई महामार्गावरील हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण एका कंटेनर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्याचे १ हजार २०० बॉक्स गोवा राज्यात निर्मित झालेली परंतु मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्री असलेल्या बनावट लेबलांचा वापर करून "Royal Select Deluxe Whisky" या बँडचे विदेशी मद्य आढळून आले. वाहनातून १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण १० हजार ३६८ ब. लि. मद्य जप्त करण्यात आले.

मद्य वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना आढळून आला आहे. त्यांच्याकडे कंट्रोल पॅनेल रिकामे बॉक्सचे बनावट टॅक्स इनव्हाईस अशी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच वाहतुकीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रेही संशयास्पद व बनावट असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले.

या गुन्ह्यामध्ये वाहनाचा चालक यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५(अ) (ई), ८०, ८३, ८६, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, सदर मद्य बनावट असल्याची शक्यता तपासली जात आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक संदीप कदम आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने  नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्याविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९ किंवा ०२०-२६९१७३२१ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

"कोकण रेल्वे भरती: वॉक-इन मुलाखती महाराष्ट्रातच घ्या, अन्यथा आंदोलन"; मनसेचा KRCL ला इशारा !!

"कोकण रेल्वे भरती: वॉक-इन मुलाखती महाराष्ट्रातच घ्या, अन्यथा आंदोलन"; मनसेचा KRCL ला इशारा !!

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) :
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मार्फत ८ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत १७ प्रकारच्या १५० तांत्रिक पदांसाठी कंत्राटी तत्त्वावर वॉक-इन मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीच्या मुलाखती महाराष्ट्राबाहेर घेतल्यास महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय होईल, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुलाखती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथेच घेण्याची मागणी केली आहे. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश बाळचंद्र ठाकूर यांनी १० जून २०२६ रोजी KRCL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना पत्र पाठवून हा इशारा दिला आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या भरतीमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, गुणवत्ता निरीक्षक, तंत्रज्ञ (वेल्डर, ऑपरेटर, फिटर), वाहन चालक, लिस्ट ऑपरेटर, हायड्रा ऑपरेटर, ऑफिस बॉय/हेल्पर अशा १७ विविध पदांसाठी एकूण १५० जागा कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. यासाठी ८ जूनपासून ३० जूनपर्यंत वेगवेगळ्या पदांसाठी वॉक-इन मुलाखती आयोजित केल्या आहेत. या भरतीसाठी ओबीसी, एससी, एसटी व अन्य आरक्षण लागू असून पात्रता निकष व इतर तपशीलासाठी उमेदवारांनी www.konkanrailway.com या वेबसाईटवर अधिसूचना पाहावी, असे प्रशासनाने कळवले आहे.

संदेश ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे की, "कोकण रेल्वेचा सर्वाधिक मार्ग महाराष्ट्रातून जातो आणि KRCL चे मुख्यालयही नवी मुंबई, महाराष्ट्रात आहे. असे असताना भरतीसाठीच्या वॉक-इन मुलाखतीची ठिकाणे महाराष्ट्राबाहेर ठेवणे म्हणजे महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक व वेळेचा मोठा फटका बसवण्यासारखे आहे. परराज्यात मुलाखतीला जाण्यासाठी येणारा प्रवासखर्च व वेळ यामुळे अनेक होतकरू मराठी मुलं या संधीपासून वंचित राहतील".

मनसेने या पत्रातून दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. पहिली म्हणजे KRCL मधील सदर भरती प्रक्रियेच्या वॉक-इन मुलाखती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे आयोजित कराव्यात. दुसरी मागणी म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे. "कोकण रेल्वे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत महाराष्ट्रातील तरुणांना न्याय मिळावा, ही अपेक्षा आहे. आपण या विनंतीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा," असे ठाकूर यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, मनसेने हे पत्र मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, पोलीस आयुक्त नवी मुंबई व मनसे संपर्क अध्यक्ष रायगड यांनाही प्रत माहितीसाठी पाठवले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. त्यामुळे आता KRCL प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वनार्टीच्या जागावाटपात धनगर जमातीवर (NT-C प्रवर्गावर) अन्याय; ८ जूनची सर्व परिपत्रके रद्द करण्याची बिरू कोळेकर यांची मागणी !!

वनार्टीच्या जागावाटपात धनगर जमातीवर (NT-C प्रवर्गावर) अन्याय; ८ जूनची सर्व परिपत्रके रद्द करण्याची बिरू कोळेकर यांची मागणी !!

.                                                श्री बिरू कोळेकर

मुंबई, प्रतिनिधी : वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) मार्फत दिनांक ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध विद्यार्थी योजना परिपत्रकांमध्ये VJNT प्रवर्गातील जागांचे उपवर्गनिहाय वाटप महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण टक्केवारीनुसार करण्यात आलेले नाही आरोप करत सदर परिपत्रके तात्काळ रद्द करण्याची मागणी मा. श्री. अतुल सावे, मंत्री, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे करण्यात आली आहे.

ही मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्यचे राज्य संघटक, मुख्य प्रवक्ता तथा आयटी व मीडिया प्रमुख श्री. बिरू कोळेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनानुसार VJNT आरक्षणाचे उपवर्गनिहाय प्रमाण VJ-A – ३ टक्के, NT-B – २.५० टक्के, NT-C – ३.५० टक्के आणि NT-D – २ टक्के असे आहे. या प्रमाणाचे १०० टक्क्यांमध्ये रूपांतर केल्यास VJ-A – २७ टक्के, NT-B – २३ टक्के, NT-C – ३२ टक्के आणि NT-D – १८ टक्के असे प्रमाण प्राप्त होते.

मात्र वनार्टीच्या परिपत्रकांमध्ये VJ-A – ४० टक्के, NT-B – २२.५० टक्के, NT-C – २२.५० टक्के (धनगर) आणि NT-D – १५ टक्के असे वाटप करण्यात आले असल्याचे दिसून येते. शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार धनगर जमातीचा (NT-C प्रवर्गाचा) हिस्सा सर्वाधिक असताना त्यास केवळ २२.५० टक्के वाटा देण्यात आल्यामुळे धनगर जमातीतील (NT-C प्रवर्गातील) विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार व युवकांवर अन्याय झाल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे.

श्री. बिरू कोळेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनार्टीने कोणत्या शासन निर्णय, कायदेशीर तरतूद अथवा धोरणाच्या आधारे सदर वाटप केले याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दिनांक ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व संबंधित परिपत्रके तात्काळ रद्द करून महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण टक्केवारीनुसार नव्याने व न्याय्य पद्धतीने जागावाटप करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही न झाल्यास VJNT समाजातील विशेषतः धनगर जमातीतील (NT-C प्रवर्गातील) विद्यार्थी, युवक व सामाजिक संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे श्री. बिरू कोळेकर,राज्य संघटक, मुख्य प्रवक्ता, आयटी व मीडिया प्रमुख
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य यांनी कळवले आहे.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

5 वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा: मित्रानेच केला होता घात, 4 आरोपींना अटक !!

5 वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा: मित्रानेच केला होता घात, 4 आरोपींना अटक !!

मुंबई, (सन्नी लोंढे) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 5 वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्याचा मुंबई गुन्हे शाखा कक्ष-7 ने यशस्वी उलगडा केला आहे. पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फोंडा घाटात फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

 कणकवली पोलीस ठाणे गु.र.नं. 39/2022, कलम 279, 304(अ), 337, 338, भा.दं.वि. सह कलम 184, 185 मोटार वाहन कायदा
2022 मध्ये कुडाळ येथील दाखल गुन्ह्यात अशपाक मुलाणी उर्फ निहाल, रा. माळशिरस, जि. सोलापूर, हा तरुण बेपत्ता झाला होता. त्यावेळी हा मोटार अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने तपास सुरू केला. 

तपासात समोर आले की, पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनावडेकर, अतिष भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांसह संगनमत केले. त्यांनी निहालला कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलावून रात्रीच्या सुमारास जिवे मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह व त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली व रस्ते अपघाताचा बनाव रचला.

गुन्हे शाखा कक्ष-7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींची कबुली घेतली. अटक केलेल्या चारही आरोपींना पुढील कारवाईसाठी कणकवली पोलीस ठाणे, जि. सिंधुदुर्ग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त अनिल कुंभार, अपर आयुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ !!

स्टॅन्डअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनीचा लाभ !! पुणे, प्रतिनिधी : केंद्र शासना...