Tuesday, 23 June 2026

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !!

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !!

1984 च्या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांचे रोखठोक मत

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापही दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशी सरकारने केलेली प्रतारणा आहे, असे रोखठोक मत १९८४ च्या उरणच्या शेतकऱ्यांच्या लढ्यातील अग्रभागी असलेल्या रणरागिणी भारतीताई पोवार यांनी जसखार येथे मंगळवारी (ता. २३) आपले मत व्यक्त केले. यावेळी भारतीताई म्हणाल्या, "१९८४ च्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व दि. बा. पाटील साहेब करीत होते. ते आंदोलन शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला म्हणून होते. दि. बा. पाटील साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सरकारने तुरुंगात डांबले होते. त्यावेळी दिबांचा मला आदेश आला, तुम्ही तातडीने निघून या. त्यावेळी मी २३ वर्षांची होती. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मी तान्ह्या बाळाला घरी सोडून कोल्हापूर येथून तडक निघून आले जासईला. त्यावेळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी उरणला येण्यासाठी माझ्याकडे तिकिटासाठी जवळ पैसे नव्हते. एकाकडून शंभर रुपये उसणे घेऊन आले. पाहतो तर परिसरातील गावे ओस पडली होती. प्रचंड पोलिसांचा फौजफाटा होता. एसआरपी बंदुका जणू रोखूनच होते, अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे दिबांनी जणू काही माझ्यावर विश्वास ठेवून आंदोलनाचे नेतृत्व माझ्याकडे सोपवून पुढील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जणू आदेश दिला होता. तो कार्यकर्ती म्हणून मी स्वीकारला आणि आंदोलनाच्या तयारीसाठी गावोगावी जाऊन गुप्त बैठका घेतल्या. या बैठकांमधून निर्धार करण्यात आला. सरकारसमोर झुकायचे नाही. एक इंच जमिनीवर सुद्धा ताबा द्यायचा नाही. त्यामुळे 
 १९८४ च्या त्या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यात गावोगावच्या शेतकऱ्यांनी घरादाराला कुलपे लावून एकप्रकारे घरावर तुळशीपत्र ठेवून रस्त्यावर उतरले होते. ते दिवस अंगावर काटा आणणारे आहेत." असेही भारतीताई म्हणाल्या.

दिबांची  (ता. २५) पुण्यतिथी आहे. त्यामुळे भारतीताई दिबांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरवरून आल्या आहेत. त्यांचे आगमन होताच स्वतः आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे सारथ्य केले. सर्वप्रथम भारतीताई यांनी गव्हाण येथील शांतादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर उरण तालुक्यातील जसखार येथील रत्नेश्वरीचे दर्शन घेतले. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरांचे  वाटप त्यांच्या हस्ते झाले. 

यावेळी महेंद्रशेठ घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीताई म्हणाल्या, "आंदोलनाला जवळ जवळ ४२ झालीत, पण माझा सन्मान फक्त महेंद्रशेठ घरत यांनी आईच्या नावाने पुरस्कार देऊन केला. सध्या सर्वांचे भले व्हावे म्हणून विचार करणारा महेंद्रशेठ मला दिसतोय. त्याचे काम मी डोळ्यांदेखत पाहातोय. तो ग्रेट माणूस आहे." 

त्यानंतर त्या आंदोलनात सक्रिय असणारे पी. जे. पाटील यांची भारतीताई आणि महेंद्रशेठ घरत यांनी सदिच्छा भेट घेतली आणि आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला. पी. जे. पाटील परिवाराने यावेळी भारतीताई यांचा साडीचोळी देऊन यथोचित सन्मान केला.
दरम्यान, उरण परिसर पाहून भारतीताई गहिवरल्या. जुन्या आठवणींत रमल्या. महेंद्रशेठ घरत स्वतः गाडी चालवत असल्याने त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा, गावांचा, परिसराचा, डोंगररांगांचा आवर्जून उल्लेख केला. हा संपूर्ण परिसर मी पायी फिरले. अनेक जण सोबत होते. तहानभूक विसरून आंदोलन केले. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. हे सर्व महेंद्रशेठ घरत ऐकून घेऊन म्हणाले, "मी त्यावेळी १२ वीला होतो. विद्यार्थिदशेत असतानाही आंदोलन सहभागी झालो होतो. माझ्या शेजारी असणाऱ्या गव्हाण कोपर येथील एका सहकारीला गोळी लागली. पोलिसांच्या गोळीबारामुळे सगळे सैरावैरा पळत होते"

३० जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करा; अन्यथा १० हजारांचा दंड !!

३० जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करा; अन्यथा १० हजारांचा दंड !!

*मुंबई, दि. 23 जून 2026*

प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम 2023 अंतर्गत नोंदणीकृत सर्व नियतकालिकांच्या प्रकाशकांनी आर्थिक वर्ष 2024-25 चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र Annual Statement 30 जून 2026 पर्यंत प्रेस सेवा पोर्टल PSP वर ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी केले आहे.

*बंधनकारक सूचना*  
प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम 2023 मधील कलम 14(1)(ब) व 14(3) नुसार प्रत्येक नोंदणीकृत नियतकालिकासाठी वार्षिक विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 चे विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांना 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

*दंडात्मक कारवाई*  
निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर न केल्यास संबंधित प्रकाशकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
*पहिले उल्लंघन*: किमान 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.  
*पुढील उल्लंघन*: त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल.  
*कमाल मर्यादा*: एकूण दंडाची कमाल मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

प्रेस रजिस्टर जनरल यांनी आर्थिक वर्ष 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र अद्याप दाखल न केलेल्या प्रकाशकांना 30 जूनपूर्वी प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन विवरणपत्र सादर करून दंडात्मक कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

केंद्र शासनामार्फत स्टँड अप इंडिया योजना राबविण्यात येत असून, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेला पूरक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी सहाय्य योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. योजनेच्या लाभासाठी प्रकल्प खर्चाच्या १० टक्के स्वहिस्स्याचा भरणा केल्यानंतर आणि संबंधित बँकेने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर, उर्वरित १५ टक्के रक्कम फ्रंट एंड सबसिडी (मार्जिन मनी) स्वरुपात राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील इच्छुक व पात्र नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

*कल्याणमध्ये दिलासा फाउंडेशनच्या कार्यक्रमात किन्नर अखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंद गिरी यांना मानद डॉक्टरेट*

*कल्याणमध्ये दिलासा फाउंडेशनच्या कार्यक्रमात किन्नर अखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंद गिरी यांना मानद डॉक्टरेट*

(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)
कल्याण: - समाजाच्या प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने दिलासा फाउंडेशनतर्फे नुकतेच कल्याण येथील के. एम. अग्रवाल कॉलेजमध्ये "प्यार, दोस्ती और बारिश" या कराओके म्युझिकल शोचे उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमात तृतीयपंथी समाजाच्या किन्नर अखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंद गिरी यांना दिलासा फाउंडेशन आणि सॉक्रेटीस सोशल रिसर्च युनिवर्सिटी यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजरत्न डॉ. विजयनारायण पंडित, उद्योग विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी राजेश डोईफोडे, सुप्रसिद्ध समाजसेविका जरीना बेग यांच्यासह इतर मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुमारे शेकडो संगीतप्रेमींनी या कराओके महफिलीचा आनंद लुटला.

दिलासा फाउंडेशन समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांना, वंचित कुटुंबातील व्यक्तींना आपली कला आणि कार्य दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देते. हा कार्यक्रम वर्षातून दोन वेळा आयोजित केला जातो, अशी माहिती फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. पद्मिनी कृष्णा यांनी दिली.

सॉक्रेटीस सोशल रिसर्च युनिवर्सिटी (SSRU) ही एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. जी समाजसेवा, मानवता किंवा आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, परंतु पारंपरिक शैक्षणिक पात्रता नसलेल्या व्यक्तींना "ऑनरेरी डॉक्टरेट - ऑनोरिस कॉसा" पदवी प्रदान करते. ही एक सन्माननीय उपाधी असून पारंपरिक शैक्षणिक नोकरीसाठी शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रता म्हणून ग्राह्य धरली जात नाही.
कार्यक्रमाच्या शेवटी दिलासा फाउंडेशनच्या डॉ. पद्मिनी कृष्णा यांनी सर्व पाहुण्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनाही स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !!

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !!

संग्रहित फोटो - (वाळू तस्करी करताना डंपर मध्ये "जेसीबी"यंत्राच्या सहाय्याने वाळू भरताना)

भिवंडी, दिं, २३जून२०२६, अरुण पाटील (कोपर) :

भिवंडी तालुक्यातून शनिवार, रविवार या साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर खुलेआम बेकायदेशीर रित्या रेती बंदर येथून वाळू, व दगड खाणीतून दगड ,मातीची/ मुरुमाची रॉयल्टी "न "(स्वामित्व धन) भरता चोरून चोरटी वाहतूक होत असून या बाबतची माहिती काही महसूल व पोलीस अधिकार्यांना असून देखील कारवाई करत नसल्याने या मुळे शासनाचे या सुट्टीच्या दिवशी लाखो रुपयांचे महसूल बुडत असून याला जबाबदार असणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांन कडून बोलले जात आहे. 

सविस्तर वृत्त असे आहे कि, भिवंडी तहसीलदार अधिकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दगड, माती खाणी आहेत. या खाण पट्ट्यातून दररोज हजारो ब्रास दगड, माती व मुरुम उत्खनन होत आहे. या पैकी काही ठिकाणी रॉयल्टी "न" (स्वामित्व धन) भरता बेकायदेशीर रित्या उत्खनन करून त्याची बेकायदेशीरपणे चोरटी वाहतूक होत असून या पैकी बहुतांश भाग हा "तालुका पोलिस" ठाणे व "नारपोली पोलिस" ठाण्याच्या हद्दीत येत आहे.

तसेच या तालुक्याला  मोठा खाडी किनारा लाभला आहे. त्या पैकी मंडळ अधिकारी - खारबाव यांच्या कार्य क्षेत्रातील केवणी रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, कशेळी रेती बंदर व खारबाव खाडी या ठिकाणावरून वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पैकी तलाठी सजा कोपर/ केवणी यांच्या अधिकारात येत असलेल्या केवणी रेती बंदर या ठिकाणावरून प्रतिबंध असलेल्या सक्शन पंपाद्वारे उत्खनन केलेली वळूची सर्वात जास्त तस्करी/चोरी व चोरटी वाहतूक होत असून ही वाहतूक "तालुका पोलिस" ठाणे व "नारपोली पोलीस" ठाणे यांच्या हद्दीतून होत आहे. 

तसेच अंजुर खाडी, कोन गाव रेती बंदर व इतर  खाडी पत्रातून देखील दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर  बेकायदेशीर रित्या सक्शन पंपा द्वारे वाळू उत्खनन होत आहे. व नंतर ही वाळू येथील वाळू माफिया हे काही महसूल अधिकारी, काही पोलिस अधिकारी यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून शासनाची रॉयल्टी "न"(स्वामित्व धन) भरता  चोरटी वाहतूक करत आहेत. त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणारे वाळू व दगड, माती माफिया हे तर गब्बर झालेच आहेत त्यांच्या बरोबरच काही पोलिस व महसूल अधिकारी देखील गब्बर झाले आहेत. 

मुख्य म्हणजे शानीवार, रविवार या साप्ताहिक व ईतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी  दिवस व रात्र खुले आम  मोठ्या प्रमाणावर चोरटी "गौण खनिज" वाहतुक सुरू असते त्यामुळे शासनाचे महसूल रूपाने या दिवसात लाखो/करोडो रुपयांचे महसूल बुडत आहे.त्यामुळे या बाबत वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन नागरिकान कडून होत आहे. 

या वाळू तस्करांची/चोरांची दहशत इतकी आहे की,यांना पोलिस प्रशासन व महसूल विभागातील काही अधिकारी घाबरत असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही. त्यामुळे सर्व सामान्य स्थानिक नागरिकही यांच्या विरोधात तक्रार देण्यास घाबरतात.जर कारवाई करायची असेल तर "तालुका पोलीस" ठाणे भिवंडी व महसूल खाते भिवंडी यांनी केवणी रेती बंदर येथे संध्याकाळी ७ वा. ते सकाळी ७ वाजे दरम्यान हायवा डंपरमध्ये "जेसीबी" यंत्राद्वारे वाळू भरणाऱ्या वाळू तस्करांवर छापा टाकून त्यांच्यावर कारवाई  करून यंत्र सामुग्री जप्त कारूनच दाखवावी असे आवाहन येथील स्थानिक नागरिकांनी या दोन्ही प्रशासनाला केले आहे. 

जर यदा कदाचित कारवाई झालीच तर ती येथील सक्शन पंपावर व बार्ज वर काम करणाऱ्या गरीब कामगारावरच करण्यात आल्याचे येथील ग्रामस्थ बोलत आहे. त्यामुळं आता वारंवार चोरीचा गुन्हा करून वारंवार वाळू तस्करी व चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर वाहन चालकांवर जर कायद्यात तरतूद असेल तर त्यांच्यावर "मकोका"(महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा)अंतर्गत गुन्हा दाखल करावा व हायवा डंपर व वाळू भरून देणाऱ्या "जेसीबी" यंत्र जप्त करावेत असे सर्व सामन्यांचे मत आहे. 

त्यामुळे आता केवणी रेती बंदर येथून वाळू तस्करी करणारे केवणी व दिवे गावचे वाळू तस्कर कोण? यांची गोपनीय शोध मोहीम आता वरिष्ठ कार्यालया मार्फत सुरू झाली असून यात आरोप सिद्ध झाल्यास तस्करांवर "मकोका" (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागणार असल्याचे गोपनीय सूत्रांकडून समजले आहे.

Monday, 22 June 2026

योगातून निरोगी जीवनाचा संदेश : उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !!

योगातून निरोगी जीवनाचा संदेश : उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक २० जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षित योगतज्ज्ञ श्रीमती रुपाली नाईक आणि प्रा. डॉ. महेंद्र घरत यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्याचा इतिहास, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच सूर्यनमस्कार यांचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करत प्रत्येक आसनाचा आपल्या शरीरावर त्याचा कसा फायदा होतो या बद्दल संक्षिप्त माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली. प्रशिक्षकांनी योग्य सराव सुनिश्चित करण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिले.

या कार्यक्रमात इयत्ता बारावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमास प्राचार्या श्रीमती चित्रा ठाकूर, उपप्राचार्या श्रीमती कुसुम नाईक, श्रीमती हेमा पाटील, उपप्राचार्य श्री रमेश पाटील, समन्वयक कल्पना राऊत
सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. स्वाती जयकर, डॉ. महादेव दिनकर तसेच विविध विभागांतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

योग ही केवळ व्यायामपद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आरोग्यदायी भविष्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर तसेच संस्थेच्या सर्व विश्वस्तांचे मोलाचे सहकार्य लाभले. योगाच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी*

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी*

*बदलापूर, दि. २१, प्रतिनिधी* : वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाड गावाजवळ रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. टिटवाळा दिशेकडून बदलापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटली. या अपघात एक पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे.

*२५१ किमी वेगाने कार, चुराडा*  
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात पहाटे सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान घडला. रस्ता मोकळा असल्याने बीएमडब्ल्यू कार तब्बल २५१ किमी प्रतितास वेगाने धावत होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की बीएमडब्ल्यू कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघातानंतर वाहनाचे सुटे भाग आणि मृत व्यक्तींच्या अवयवांचे तुकडे रस्त्यावर दूरपर्यंत विखुरले होते, असे घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी सांगितले. कारच्या धडकेचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !!

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !! 1984 च्या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांचे...