Saturday, 2 May 2026

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न !!

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व  भावनिक वातावरणात संपन्न !!

जुचंद्र (प्रतिनिधी) –ता. २, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एम. पी. ज्युनिअर कॉलेज, जुचंद्र येथील वरिष्ठ लिपिक मा. श्री. सुरेश तुकाराम राऊत सर (एम.ए. स्टेनो) यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार समारंभ दि. ३० एप्रिल २०२६ रोजी विद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

सुमारे ३४ वर्षे ६ दिवस प्रदीर्घ, प्रामाणिक, समर्पित आणि आदर्श सेवेनंतर वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्या श्री.सुरेश राऊत यांनी आपल्या जिद्द, कर्तृत्व आणि सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिव्यांग असूनही त्यांनी यांच्या जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत अनेक पदके, पुरस्कार व सन्मान प्राप्त केले असून विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. आज त्यांचे नॅशनल  ट्रष्टच्या माध्यमातून दिव्यांग अर्थात मतिमंद मुलांसाठीचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. 

तसेच ते २० वर्षापासुन दिव्यांग कर्मचारी किंवा ईतर दिव्यांग व्यक्तिच्या समस्या, कोणत्याही अडचणी असोत त्या सोडविण्याचे प्रेरणादायी कार्य ते  करत आहेत. आज पर्यन्त ते जिल्हा व राज्यस्तरीय दिव्यांग व्यक्तिचे नेतृत्व करीत आहेत. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती, जुचंद्रचे अध्यक्ष मा. श्री. पुरुषोत्तम पाटील साहेब हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोज रानडे साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. पालघर मा. श्री. अशोक पाटील साहेब, अध्यक्ष, सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर चे  श्री बाळाशेठ पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. विनयजी पाटील साहेब,  स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. विवेकानंद पाटील साहेब तसेच वसई विरार महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. कन्हैया भोईर साहेब व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री.  जनार्दन म्हात्रे, मा.श्री. हरिहर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. 

सत्कारमूर्ती श्री सुरेश राऊत सर यांचे कुटुंबीय कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामध्ये त्यांचे मोठे बंधू श्री. शांताराम तुकाराम राऊत, पुतणे श्री. विश्वनाथ राऊत, श्री. प्रकाश राऊत, जावई पंढरीनाथ ठाकरे, संकेत तारमळे, नातवंडे तसेच सायली तारमळे (राऊत), सुरज राऊत, शुभम राऊत यांच्यासह मित्रपरिवार, सासरकडील मेव्हणे, साडू व अन्य आप्तेष्ट उपस्थित होते. 

यावेळी श्री. सुरेश राऊत यांच्या धर्मपत्नी सौ. सुप्रिया सुरेश राऊत यांनी आपल्या मनोगतातून विवाहापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा जीवनप्रवास अत्यंत भावुकतेने उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या संघर्षमय आयुष्याच्या अनेक आठवणी सांगताना सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले. 

तसेच त्यांची कन्या सायली राऊत उर्फ सायली तारमळे हिने आपल्या मनोगतातून “माझे वडील माझ्यासाठी हिरो आहेत आणि ते कायम हिरोच राहतील,” अशा भावना व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री भोईर सर व उप शिक्षक श्री म्हात्रे सर यांनी श्री. सुरेश राऊत सर हे जिद्दी व कर्तुत्ववान कसे आहेत हे त्यांच्या मनोगतात सांगितले. 

विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, श्री. नाडेकर सर,  पर्यवेक्षिका सौ.कविता पाटील मॅडम, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. अनेक मान्यवरांनी तसेच आप्तेष्टांनी श्री. सुरेश राऊत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, कष्टाळूपणा व सेवाभावी वृत्तीचा विशेष उल्लेख केला. 

यावेळी त्यांचे पुतणे श्री. विश्वनाथ राऊत यांनी स्वतः शब्दबद्ध केलेल्या मानपत्राचे प्रभावी वाचन करून श्री. सुरेश  राऊत (नाना) यांच्या संपूर्ण सेवाकाळाचा, जीवनप्रवासाचा व सामाजिक कार्याचा भावनिक आढावा घेतला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

समारोपाच्या मनोगतात श्री. सुरेश तुकाराम राऊत यांनी आपल्या जन्मापासूनचा खडतर जीवनप्रवास अत्यंत भावुक शब्दांत उपस्थितांसमोर मांडला. लहानपणी दिव्यांग असल्यामुळे आई-वडिलांना आपल्या भवितव्याची मोठी चिंता वाटत होती. “माझ्या मुलाला नोकरी कशी लागेल, शिक्षण कसे पूर्ण होईल,” अशी काळजी त्यांना सतावत असे, असे सांगताना ते भावुक झाले.

गावापासून दूर असलेल्या शाळेत जाण्यासाठी पायाने दिव्यांग असूनही दररोज पडत-उठत तीन किलोमीटरचा प्रवास करून रेल्वे स्टेशन गाठत शिक्षण पूर्ण केले आणि आई-वडिलांचे स्वप्न साकार केले, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि सभागृहही भावनांनी भारावून गेले.

तसेच त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच सर्वांचे भले कसे होईल, याचाच विचार केला. सुख-दुःखात राऊत कुटुंबासोबत राहून योग्य मार्गदर्शन केले, मित्रपरिवार जपला, चांगली माणसे जोडली आणि ज्या-ज्या ठिकाणी नोकरी केली तेथील लोकांना आपण “हवेहवेसे” वाटलो, अशा भावना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.  

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सौ.  जान्हवी भोसले मॅडम यांनी उत्कृष्ट केले. शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले व विद्यालयाच्या उप शिक्षिका सौ स्मिता पाटील मॅडम यांच्या पसायदानाने समारंभाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.

सौजन्य / वृत्तांकन - विश्वनाथ राऊत (सर)

निकालाच्या तोंडावर शासकीय दाखला पोर्टल बंद !!

निकालाच्या तोंडावर शासकीय दाखला पोर्टल बंद !!

** पालक विद्यार्थ्यांना नाहक त्रास.; विद्यार्थी पालकांना शैक्षणिक नुकसानीची भीती.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
बारावीचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन दाखल्यासाठीचे शासकीय पोर्टल गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने उरणमधील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मात्र, पोर्टल बंद असल्याने हे दाखले मिळविणे अशक्य झाले आहे.पुढील शिक्षणासाठी जात, उत्पन्न, रहिवासी आदी विविध दाखल्यांची आवश्यकता असते मात्र ते वेळेत मिळत नसल्याने  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.या परिस्थितीचा परिणाम सेतू केंद्रांवरही झाला असून, पोर्टल बंद असल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. नागरिकांची गर्दी वाढत असताना सेवा देणे शक्य नसल्याने सेतू चालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी निकालाच्या काळात पोर्टल बंद पडण्याचा अनुभव येत असल्याने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

उरणच्या कस्टम बॉण्डेड वेअरहाऊसमधून लाखोंच्या मालाची चोरी !!

उरणच्या कस्टम बॉण्डेड वेअरहाऊसमधून लाखोंच्या मालाची चोरी !!

** विनायक नायडूसह त्याच्या साथीदारांचा शोध सुरू

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात अनेक ठिकाणी चोऱ्यांचे सत्र सुरु असून नुकताच एक चोरीची घटना समोर आली आहे.उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी भोम गाव येथील 'सुयश लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'सुयश कमोडिटीज'च्या वेअरहाऊसमध्ये पुढील कारवाईसाठी ठेवलेल्या कंटेनरमधील तब्बल ७० लाख ३१ हजार रुपये किमतीच्या - मालाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या विनायक नायडू आणि त्याच्या इतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पियुष अग्रवाल (५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 'द प्रेमिसो', 'ध्रुवा इंटरनॅशनल' आणि 'एन. एम. शाह कॉर्पोरेशन' या तीन कंपन्यांनी आयात केलेला माल कस्टम विभागाने तपासणीसाठी जप्त केला होता. हा माल 'सुयश लॉजिस्टिक्स'च्या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, १४ मे २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विनायक नायडू आणि त्याच्या इतर साथीदारांनी या वेअरहाऊसमध्ये प्रवेश करून या मालाची चोरी केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या 'बिल ऑफ एण्ट्री' नुसार या मालावर डल्ला मारला आहे, ज्यात प्रामुख्याने ट्रॉली, ब्रेसलेट, पोर्टेबल शिलाई मशीन, शूज व सॉक्स (५३,३५,००० रुपये), चिकटपट्टी, वेस्ट बॅग, सफाई संच, कॉफी कप, ब्रँडेड शूज (नायके, ऍडिडास, ऍसिक्स), अंडरगारमेंट आणि लहान मुलांच्या बॅगा (१०,२९,८९१ रुपये) व प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, मुलांच्या स्कूल बॅग, चुंबक, पेन्सिल पाऊच (६,६६,४८६ रुपये) असा एकूण ७० लाख ३१ हजार रुपये किमतीचा माल चोरला आहे. उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि. हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. अभिजीत देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत. उरण मध्ये चोरीच्या घटना वारंवार होत असून याला वेळीच लगाम बसविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

उरणकरांना अतिरिक्त पाणी कपातीपासून मिळाला दिलासा !!

उरणकरांना अतिरिक्त पाणी कपातीपासून मिळाला दिलासा !!

** पाणी नियोजनासाठी एमआयडीसी चाचपणी

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पाणीकपातीचे सत्र सुरू झाले असताना उरणकरांना मात्र अतिरिक्त पाणी कपातीपासून दिलासा मिळाला आहे. उरण तालुक्यातील रानसई धरणातून केला जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात आधीपासूनच दोन दिवसांची कपात होत आहे. पाणीसाठ्याचे योग्य नियोजन केल्याने यंदा टंचाई काळात अतिरिक्त कपातीपासून उरणकरांचा बचाव झाला आहे. सध्याच्या पाणीसाठ्याबाबत एमआयडीसी चाचपणी करत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील २३ ग्रामपंचायतीना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात नोव्हेंबर पासूनच कपात केली आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवारी ही कपात केली जाते. उरणच्या रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने पावसाळ्यातील कालावधीत लाखो लीटर पाणी वाया जाते. त्यामुळे येथील नागरिकांना नोव्हेंबर पासूनच पाणीकपातीचा सामना करावा लागतो.उरणकरांना दररोज ४१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना एमआयडीसीकडे केवळ ३० दश लक्ष लिटर पाणी असल्याने तूट भरून काढण्यासाठी कपात केली जाते.तसेच दुसरी महत्वाची समस्या म्हणजे धरण क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव धूळखात पडला आहे.धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात पडला आहे. ही समस्या निकाली लागल्यास उरणच्या नागरिकांना मुबलक व मोठया प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होईल.

कोट (चौकट ):- 


उरण तालुक्यातील रानसई धरणातील पाणीसाठ्याच्या वापराचे नियोजन नोव्हेंबरपासून सुरू आहे. सध्याच्या पाणीसाठ्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती घेण्यात येत आहे. तसेच जास्तीत जास्त पाणी बचतीकडे लक्ष दिले जात आहे.                                      - जी. एन. सोनवणे, उपअभियंता, एमआयडीसी, उरण.

संगीता ढेरें राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित !!

संगीता ढेरें राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित !!

** सर्वच स्तरातून शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र दिनाचे तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील उरण येथील जेष्ठ समाजसेविका संगीता सचिन ढेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या प्रतिष्ठित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यात त्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ढेरे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. संगीता ढेरे यांनी उरण परिसरात महिला सक्षमीकरण, बालकल्याण, शिक्षण आणि समाजजागृती या क्षेत्रांत सातत्याने काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग सापडला असून सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.महिला बचत गटांना एकत्रित करून त्यांच्यात समन्वय घडून आणून विविध उत्पादने वस्तू निर्मितीला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. वेगवेगळे मेळावे, स्टॉल लावून तसेच महिलांच्या सर्वांगीण प्रगती साठी विविध कार्यक्रम त्यांनी राबविले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले.संगीता ढेरे यांना मिळालेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार हा त्यांच्या कार्याची पावती असून समाजसेवेचा आदर्श ठरतो.उरण मधील जेष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेवा कोळीवाडाचे पुनर्वसन ४० वर्षे रखडल्याने उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व जेएनपीए प्रशासनाला सुनावले खडे बोल !!

शेवा कोळीवाडाचे पुनर्वसन ४० वर्षे रखडल्याने उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व जेएनपीए प्रशासनाला सुनावले खडे बोल !!

**प्रशासनाच्या कार्य पद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह.

**तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे दिले आदेश.
 
**अंतीम संधी म्हणून सहा आठवड्याची मुदत.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : गेली ४० वर्षे प्रलंबित असलेल्या उरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून उच्च न्यायाल्यामुळे हा प्रश्न सुटण्याचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे.उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू बंदर प्रकल्पांमुळे (जेएनपीए) चार दशकांपासून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, तसेच प्रगतीही झाली नसल्याची गंभीर दखल नुकतीच उच्च न्यायालयाने घेतली. तसेच केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरही असमाधान व्यक्त केले.

आम्ही प्रतिज्ञापत्रावर समाधानी नाही. या प्रतिज्ञापत्रात केवळ प्रक्रियात्मक आवश्यकता आणि विविध मंत्रालयामधील सल्लामसलतीचा हवाला दिला आहे; परंतु पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीही ठोस कालमर्यादा नमूद केलेली नाही, अशा शब्दांत न्या. मनीष पितळे आणि न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने केंद्रीय बंदरे, नौवहन आणि 'जलमार्ग मंत्रालय, जेएनपीए आणि इतर सरकारी संस्थांना सुनावले. बाधित कुटुंबांनी १९८६ मध्येच विनामूल्य गावठाण जमिनींचा ताबा प्रशासनाकडे सुपूर्द केला होता; मात्र अद्यापही ते पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुनर्वसनासाठी विशिष्ट कालमर्यादा निश्चित होत नाही, तोपर्यंत ही याचिका वर्षानुवर्षे तशीच राहील आणि पुनर्वसनाची वाट पाहणारी याचिकाकर्त्यांची सध्याची पिढीही नाहीशी होईल, असा संतापही न्यायालयाने व्यक्त केला. तसेच प्राधिकरणाने अर्थ मंत्रालयाला दिलेली स्पष्टीकरणे संदिग्ध आणि अपूर्ण असून, त्यामध्ये कोणत्याही ठोस वचनबद्धतेचा अभाव असल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. तसेच, प्राधिकरणाला संक्रमण शिबिरातील मूलभूत सुविधांची तातडीने पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशामुळे शेवा कोळीवाडा प्रकल्पग्रस्तांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

शेवा कोळीवाडा येथील प्रकल्पग्रस्त २५६ कुटुंबांच्या पुनर्वसनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय येथे दिनांक २२ एप्रिल व २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सुनावण्यांमध्ये न्यायालयाने जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी तसेच मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेस , नवी दिल्ली यांना अत्यंत कडक शब्दांत फटकारले.गेल्या तब्बल ४० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे कायदेशीर पुनर्वसन रखडले असून, एक संपूर्ण पिढी ९१ गुंठयाच्या संक्रमण शिबिरातच व्यतीत झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा केवळ प्रशासकीय विलंब नसून मानवी हक्कांचा गंभीर प्रश्न आहे,” अशा शब्दांत न्यायालयाने संबंधित प्राधिकरणांना सुनावले.

न्यायालयाने नमूद केले की, यापूर्वीही पुनर्वसनासाठी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र संबंधित मंत्रालयाकडून केवळ कागदी हालचाली करून वेळकाढूपणा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर टीका केली.
तसेच, ९१ गुंठयाच्या संक्रमण शिबिरांमधील अत्यंत दयनीय परिस्थिती—विशेषतः पिण्याच्या पाण्याची टंचाई, जिथे पंधरा दिवसांतून फक्त एकदाच एक तास पाणीपुरवठा होतो—यावर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत तात्काळ व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांना देण्यात आले. दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेस यांना अंतिम संधी म्हणून सहा आठवड्यांची मुदत दिली. या कालावधीत प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे कायदेशीर पुनर्वसन न झाल्यास, न्यायालय स्वतः अंतिम आदेश देऊन शासनाला संमंती दिलेल्या १८०  कुटुंबास कायदेशीर हक्काचा भूखंड देण्याचे निर्देश पारित करेल, असे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी मंत्रालयात  संजय इंगळे (सह सचिव, महसूल व वन विभाग) यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त कुटुंबांची बैठक झाली. या बैठकीत १०.१६हेक्टर जमीन केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले.संक्रमण शिबिरात पुनर्वसन होई पर्यंत सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश सह सचिव संजय इंगळे यांनी जेएनपीए प्रशासनाला दिले आहेत. जो पर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत संक्रमण शिबिराची सर्व जबाबदारी जेएनपीए प्रशासनाची राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण प्रकरणात जेष्ठ वकील रशीद खान आणि ऍड.सिद्धार्थ इंगळे यांनी प्रभावीपणे प्रकल्पग्रस्तांची बाजू न्यायालयात मांडली.महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष  नंदकुमार पवार यांनी तसेच जनरल सेक्रेटरी रमेश कोळी यांनी आशा व्यक्त केली की, मुंबई उच्च न्यायालय प्रकल्पग्रस्त कुटुंबांना सन्मानपूर्वक पुनर्वसन देऊन गेल्या चार दशकांपासून चालू असलेल्या या अन्यायाला कायमस्वरूपी पूर्णविराम देईल.संपूर्ण शेवा कोळीवाडा आणि हजारो हेक्टर समृद्ध खाजन जमिनी  कोळी बांधवांनी देशाच्या आर्थिक विकासाच्या नावाखाली कुर्बान केली परंतु दुसर्‍या बाजूला जेएनपीए सारखे प्रशासन मानवी हक्कांची  लोकशाही मूल्यांची आणि संवैधानिक हक्कांची खुले आम पायमल्ली करीत आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो अशा भावना नंदकुमार पवार, रमेश कोळी यांनी व्यक्त केल्या.



==============================================

याचिकेत नेमके काय आहे ? 

शेवा कोळीवाड्यातील २५६ कुटुंबांच्या वतीने न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांची जमीन १९८३ मध्ये या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती आणि त्यामुळे ते विस्थापित झाले होते.

याचिकेनुसार, ८८ शेतकरी आणि १६८ बिगर-शेतकरी कुटुंबे १९८६ पासून हनुमान कोळीवाड्यातील संक्रमण शिबिरांमध्ये राहत असून, ते आपल्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.


==============================================

निधीचा अभाव :- 

निधीअभावी पुनर्वसन रखडल्याचा दावा 'जेएनपीए'कडून करण्यात आला. प्राधिकरणाने २७ नोव्हेंबर २०२५ मधील अर्थ मंत्रालयाने जेएनपीएने सादर केलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला नाही आणि त्यांनी यासंदर्भात काही स्पष्टीकरणे मागवली होती. त्यानुसार, २२ डिसेंबर २०२५ रोजी आवश्यक स्पष्टीकरणे दिले. १९ जानेवारी २०२६ रोजी एक सुधारित प्रस्ताव सादर केला आणि २८ जानेवारीला पाठवण्यात आला, असे जेएनपीए प्राधिकरणातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

==============================

Friday, 1 May 2026

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!

मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ;  उरण मधील बाजारावर परिणाम !!

** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती.

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : बिर्याणी खाल्या नंतर लगेचच कलिंगड खाल्याने 
मुंबईत एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कलिंगडाबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उरण मधील बाजारातील मागणीवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. संबंधित प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी असतानाच कलिंगड खरेदी बाबत नागरिक सावध झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.उन्हाळ्यात कलिंगडला मोठी मागणी असते. त्यामुळे उरण मधील बाजारात दररोज विविध ठिकाणाहून कलिंगडाची आवक होत आहे.


घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले की बाजारात कलिंगड दहा ते पंधरा रुपये किलो दराने विकले जात आहे. तर किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये किलो दराने विक्री होत असून एक कलिंगड साधारण ४० ते ८० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.मात्र मंगळवारपासून किरकोळ बाजारात कलिंगडची विक्री कमी झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ग्राहक खरेदीपूर्वी फळ तपासून घेत आहेत. काही ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलल्याचे चित्र दिसत आहे. 'कलिंगड सुरक्षित आहे ना?', 'हे खाल्ल्यावर काही त्रास होणार नाही ना?' 'असे प्रश्न ग्राहकांकडून विचारले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितलें.दरवर्षीच्या तुलनेत यंदा कलिंगडाचे उत्पादन आणि आवक आधीच कमी असल्याचे व्यापारी सांगतात. त्यातच मागणी घटल्याने व्यापारावर परिणाम होऊ लागला असून नुकसानाची चिंता वाढली आहे.मुंबई मधील घटनेचा परिणाम उरण मधील कलिंगड व्यापारी, विक्रेता वर झालेला दिसून येत आहे.

 तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही घटनेचे कारण तपास अहवालाशिवाय ठाम सांगता येत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न !!

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत...