Friday, 15 May 2026

साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत.

्साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत.

निष्ठा पाटील हिचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : निष्ठा प्रज्वल पाटील हिने दहावीत घवघवीत यश मिळविल्याने वहाळच्या साई मंदिरात तिचा गुरुवारी (ता. १४) महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मो. का. मढवी गुरुजी, साई मंदिरचे संस्थापक-अध्यक्ष रविशेठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. इंटकचे उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची ती नात होय. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, "वहाळच्या साई मंदिरचे व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे मी प्रभावित होऊन साई मंदिरात दरमहा अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आम्ही अन्नदान करतो, ते कायम सुरूच राहील. गेली अनेक वर्षे अव्याहतपणे हे काम रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे. मी सुद्धा काबाडकष्ट करून वर आलोय, आई-वडिलांच्या मेहनतीमुळे, संस्कारामुळे आणि समाजाला  देण्याच्या भूमिकेमुळे आजची माझी वाटचाल सुखकर आहे. आजघडीला मी जग पालथे घातले आहे, कैलास मानसरोवरापासून सर्व देवस्थाने पाहिली, पण मला देव मानसात दिसतोय."

यावेळी श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाकडी यांचे सुश्राव्य भजन झाले. जयवंत गंगाराम पाटील आणि जयश्री जयवंत पाटील यांना साई मंदिरात मंगलस्नान करण्याचा मान मिळाला. यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आले

आजच्या राजकारणात अर्थकारण : गणेश नाईक.

आजच्या राजकारणात अर्थकारण : गणेश नाईक.

आगरी समाजाचा मला सार्थ अभिमान : महेंद्रशेठ घरत 

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : "दुसऱ्याच्या आयुष्यातील सुख ओरबाडल्यास आपल्याला सुख लाभत नाही. त्यांना वातानुकूलित दालनातही घाम फुटतो. प्राणी असो वा माणूस आपल्या पोटच्या गोळ्याला कधीही कुणी पायदळी तुडवत नाही. एकेकाळी आगरी समाजाला खूप बदनाम केले गेले. मात्र तो काळ गेला, आज समाजाची प्रगती सर्वच बाबतीत निश्चितच चांगल्या प्रकारे होत आहे. स्वाभिमानाने आपला पुढे जात आहे. मी सामाजिक बांधिलकी जपून काम करीत आहे, मात्र आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही नाही," असे वनमंत्री गणेश नाईक पेण येथे म्हणाले. पेण येथे शुक्रवारी (ता. १५) अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था आयोजित राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन पार पडले. त्याचे उदघाटन वनमंत्री गणेश नाईक, आमदार रवींद्र पाटील, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. 
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "आगरी समाजाची ताकद मोठी आहे, परंतु समाज विखुरला आहे. आज आगरी समाज एकसंध झाला तर रायगड, ठाणे येथील सर्व आमदार, खासदार आगरी समाजाचेच होतील. मी जिल्हा परिषद सदस्य होताच सर्वप्रथम जलकुंभ उभारून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला. आगरी समाजासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करीत आलो आहे  आणि करीतच राहीन. कारण आगरी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र दिबांचे नाव अद्यापही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे समाज पेटून उठला पाहिजे. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवायला हवी. आज आगरी समाजातील असंख्य तरुण, तरुण उच्च शिक्षण घेत आहेत, हे अभिमानास्पद आहे. आपला आगरी समाज स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनीही आगरी समाजावर अतोनात प्रेम केले. शिवरायांच्या काळातही आगरी समाजाचे योगदान अनन्यसाधारण आहे, मात्र आताच्या राज्यकर्त्यांना दिबांच्या नावाचा विसर पडला आहे. त्यांना आगरी समाजाचे योगदान कळत नाही. त्यामुळे येत्या काळात आगरी समाजाची एकजूट कायम हवी. नाही तर रात्र वैऱ्याची आहे, हे समाजातील नेत्यांनीही लक्षात घ्यावे. आगरी समाजासाठी मी काम करतो. समाजासाठी सर्वकाही सहकार्य करतो आणि यापुढेही करायला तयार आहे. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत असलो तरी माझी सही मी मराठीत करतो. आगरी माणसाने आगरी समाजाला साथ दिली पाहिजे. तरच समाज कुठेतरी जिवंत राहील."

यावेळी  पेणचे आमदार रवींद्र पाटील, पुरुषोत्तम महाराज यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सूर्यकांत पाटील यांनी केले. यावेळी 'वारी देवाची' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

तबलावादक प्रताप पाटील, जगदीश पाटील, संजीवन म्हात्रे, तसेच समाजातील अनेक मान्यवर मंडळींचा यावेळी सत्कार करण्यात आला. आगरी समाजाचे कार्य म्हणून यावेळी दोन लाख रुपयांची देणगी महेंद्रशेठ घरत यांनी दिली. 

"समाजाचे उपकार कधीही विसरणार नाही,  ज्यांच्या नावात इंद्र आहे, ते महेंद्रशेठ घरत असे सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील म्हणाले. यावेळी 'माझा आगरी आगरी जाम हाय स्वाभिमानी' हे गाणे त्यांनी गाऊन रसिकांना जिंकले

मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षा साठी मोफत वर्षभर मार्गदर्शन !

मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षा साठी मोफत वर्षभर मार्गदर्शन !

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) :

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे  च्या पुढाकाराने व शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे "सुपर थर्टी" या उपक्रमा अंतर्गत बारावी सायन्स उत्तीर्ण मेडिकल आणि इंजीनियरिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत नीट व जेईई परीक्षेसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे हा उपक्रम देशभरात दहा ठिकाणी चालू आहे.
 या उपक्रमा अंतर्गत उरण  तालुक्यातील विज्ञान शाखेच्या सर्व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य/शिक्षक यांची एक बैठक घेऊन उपक्रमाची माहिती दिली. बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रकल्पाची माहिती दिली.बारावी उत्तीर्ण झालेल्या मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे सुपर थर्टी या उपक्रमांतर्गत वर्षभर निवासी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

गरीब व गरजू इच्छुक विद्यार्थ्यांतील गुणवंत तीस विद्यार्थी नीट साठी व तीस विद्यार्थी जेईई परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षा घेऊन निवडले जातील. परीक्षा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेचे गुण व विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी निवासी प्रशिक्षण दिले जाईल, त्यामध्ये अभ्यासक्रम शिकविणे, उजळणी परीक्षा, गृहपाठ, शंका निरसन, सराव परीक्षा इत्यादी तयारी करून घेतली जाईल. 

सुपर थर्टी साठी इच्छुक विद्यार्थी व त्यांचे पालक यांची बैठक दिनांक २० मे रोजी सकाळी साडेदहा वाजता वीर वाजेकर महाविद्यालयात आयोजित केलेली आहे. पालकांना या उपक्रमाची माहिती दिली जाईल व त्याच वेळेस विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया परीक्षा ही घेतली जाईल. 

 मेडिकल व इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व दिनांक २० मे रोजी महाविद्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन शोभा मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने  आशिष गुप्ता व डॉ. आमोद ठक्कर प्रभारी प्राचार्य वीर वाजेकर महाविद्यालय, फुंडे, उरण,  यांच्याकडून करण्यात आले आहे.

उरण महाविद्यालयात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षण !!

उरण महाविद्यालयात जर्मन  व जपानी भाषा प्रशिक्षण !!

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) :
 आजच्या स्पर्धात्मक युगात नवनवीन कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करणे गरजेचे आहे. त्याचा एक भाग म्हणजे परदेशी भाषा अवगत असणे होय. सद्यस्थितीत जर्मनी आणि जपान या दोन देशांमध्ये मनुष्यबळाची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे म्हणून महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशा अंतर्गत करार झाला असून महाराष्ट्रातील दहा हजार लोकांना रोजगाराची संधी यातून मिळणार आहे. तसेच जपान देशासोबत झालेल्या करारा नुसार पाच लाख  लोकांना रोजगार संधी मिळणार आहे.मात्र या देशांमध्ये जायचे असेल तर तेथील भाषा अवगत असणे आवश्यक आहे.

याचा विचार करून उरण आणि परिसरातील गरजूंना कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षण वर्ग नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत जर्मनीच्या प्रसिद्ध गोथें इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने तज्ञ शिक्षक हे प्रशिक्षण देणार आहेत. भाषेचे प्रशिक्षण घेतल्या नंतर मुंबई व नवी मुंबई येथील जपानी व जर्मन उद्योगा मध्ये नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत तसेच जर्मनी व जपान मध्ये जाऊन तेथे ही नोकरी ची संधी मिळणार आहे.

बारावी पास तसेच आय.टी. आय. विद्यार्थी, तंत्र शिक्षण घेतलेले,कौश्यल्य शिक्षण प्राप्त तरुण व गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा आणि प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे यांनी केले आहे

नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेसला नियमित दर्जा: रेल्वे बोर्डाची मंजुरी !!

नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेसला नियमित दर्जा: रेल्वे बोर्डाची मंजुरी !!

*नागपूर, दि. 15 मे 2026*

भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे नागपूर विभागातून धावणाऱ्या 01139/40 नागपूर-मडगाव द्वितीय साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला नियमित करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही रेल्वेगाडी आता 11203/04 क्रमांकाने नियमित धावणार आहे.

*नियमित गाडीचे वेळापत्रक*  
*11203 नागपूर ते मडगाव*: ही गाडी नागपूर जंक्शन येथून दर बुधवारी व शनिवारी दुपारी 3 वाजून 05 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी गुरुवार व रविवारी सायंकाळी 5 वाजून 46 मिनिटांनी मडगाव गोवा येथे पोहोचेल.  
*11204 मडगाव ते नागपूर*: मडगाव गोवा येथून दर गुरुवारी व रविवारी रात्री 8 वाजून 01 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 46 मिनिटांनी नागपूर जंक्शनला पोहोचेल.

*थांब्यांची यादी*  
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जं, अकोला जं, शेगाव, मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम गोवा तसेच करमाळी गोवा या स्थानकांवर थांबणार आहे.

*प्रवाशांची मागणी कायम*  
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर गाडी नसल्याने अशा गाडीची प्रवासी व प्रवासी संघटनांकडून वारंवार मागणी होत होती. नवरात्र, दिवाळी, नाताळ या गर्दीच्या हंगामात सुरू केलेल्या या विशेष गाडीला आता नियमित दर्जा मिळाला आहे. मात्र वैभववाडी रोड, विलवडे, पेण, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, मूर्तिजापूर, चांदुर या स्थानकांवर थांबा मिळावा अशी प्रवाशांची मागणी कायम आहे.

*आरक्षण 16 मे पासून सुरू*  
या नियमित रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण http://www.inquiry.indianrail.gov.in, http://www.irctc.gov.in व NTES अॅप तसेच भारतीय रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर 16 मे 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे.

*प्रवासी संघटनांचे आवाहन*  
11203/11204 नागपूर-मडगाव गोवा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी संस्थापक अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब, विदर्भ खान्देश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रांतप्रमुख वैभव बहुतूले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

उल्हासनगरमध्ये महेंद्र अहिरे यांच्यातर्फे भव्य दाखले शिबीर ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

उल्हासनगरमध्ये महेंद्र अहिरे यांच्यातर्फे भव्य दाखले शिबीर ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !! 

उल्हासनगर, दि. 15 मे 2026*

शाळा व महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी नागरिकांना उत्पन्न व रहिवासी दाखल्यांची गरज भासते. तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या मारूनही वेळेवर दाखले मिळत नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी 'शासन आपल्या दारी' योजनेंतर्गत महेंद्र अहिरे (माही) यांच्यातर्फे उल्हासनगर कॅम्प 4, सुभाष टेकडी येथे आज भव्य दाखले शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

*दरवर्षीचा उपक्रम*  
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महेंद्र अहिरे यांच्यामार्फत हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यंदाही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक दाखले काढून देण्यात आले.

*घरपोच मिळणार दाखले*  
या शिबिरात नोंदणी केलेले सर्व दाखले काही दिवसांत नागरिकांना घरपोच मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे.

*मान्यवरांची उपस्थिती*  
यावेळी नगरसेविका सुरेखा सुरेश सोनवणे, नगरसेवक विकास खरात, भारतीय मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष अभिजीत चंदनशिव, समाजसेवक गणेश मोरे तसेच सुनील जाधव हे मान्यवर उपस्थित होते. 

*तहसील कार्यालयाचे सहकार्य*  
शिबीर यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अधिकारी ज्योती बिरासदार मॅडम, ग्राम महसूल अधिकारी तसेच विजय लाटे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. नागरिकांनी आयोजकांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Wednesday, 13 May 2026

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

*कल्याण, दि. 13 मे 2026*

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सभागृहात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, पुनर्वसन, क्लस्टर योजना, प्रशासकीय प्रकल्प अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

*पाणीप्रश्नावर मोठा निर्णय*  
*अमृत योजनेला 100 कोटींचा निधी*: 27 गावांमधील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महापालिकेच्या 50 कोटी रुपयांच्या निधीसह आता एकूण 100 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून नवीन जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था मजबूत करण्याच्या कामांना गती मिळणार आहे.  
*268 कोटींचा स्वतंत्र आराखडा*: जुन्या जलवाहिन्यांमुळे होणारी गळती व कमी दाबाची समस्या सोडवण्यासाठी 268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र शासनाच्या नव्या तरतुदींमधून निधी उपलब्ध करण्यावर चर्चा झाली.

*वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रकल्प*  
*वालधुनी पुलाचे काम वेगाने*: कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.  
*यू-टाईप रस्ते प्रकल्प*: शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी यू-टाईप रस्ते प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.  
*कल्याण रिंग रोड*: टप्पा तीनसाठी भूसंपादन पूर्ण झाले असून कामाला गती दिली जाणार आहे. उर्वरित भूसंपादन जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.  
*सॅटिस प्रकल्प*: डोंबिवली पूर्व येथे सॅटिस प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कल्याण पश्चिम येथील सॅटिस प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला.

*आरोग्य सुविधांवर भर*  
*500 बेडची रुग्णालये*: शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयांचा पुनर्विकास करून ठाण्याच्या धर्तीवर प्रत्येकी 500 बेडची अत्याधुनिक रुग्णालये उभारण्यावर भर देण्यात आला.  
*कॅन्सर हॉस्पिटल व सुतिकागृह*: डोंबिवलीतील कॅन्सर हॉस्पिटल व सुतिकागृह प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत आणण्याचे नियोजन आहे.

*पुनर्वसन व गृहनिर्माण*  
*बीएसयुपी घरे*: विकासकामांमुळे बाधित नागरिकांचे पुनर्वसन बीएसयुपी घरांमध्ये करताना घरांची गुणवत्ता, सुरक्षितता व मूलभूत सुविधांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.  
*क्लस्टर योजना*: ठाणे व मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना प्रभावीपणे राबविण्यावर चर्चा झाली. कल्याण पूर्व, पश्चिम व डोंबिवली परिसरातील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

*इतर महत्त्वाचे निर्णय*  
*प्रशासकीय इमारत व स्मारके*: कचोरे व नेतिवली टेकडी येथील नवी महापालिका प्रशासकीय इमारत, संत सावळाराम महाराज स्मारक व शिवसृष्टी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना.  
*पार्किंग व फेरीवाला धोरण*: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व शिस्तबद्ध पार्किंगसाठी तयार केलेल्या फेरीवाला धोरण व पार्किंग धोरणाची लवकरच अंमलबजावणी होणार.  
*नाट्यगृह पुनर्विकास*: डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी 20 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार राजेश मोरे, उपमहापौर राहुल दामले, स्थायी समिती अध्यक्ष मल्लेश शेट्टी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा पालिका गटनेते शशिकांत कांबळे, भाजपाचे वरूण पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, रमिझ मणियार यांच्यासह कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवक व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत.

्साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत. निष्ठा पाटील हिचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : ...