Tuesday, 7 April 2026

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

कल्याण, प्रतिनिधी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त 'रामदास कोकरे' यांनी नुकताच कल्याण परिसरातील वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने वालधुनी नदीपात्रात प्रत्यक्ष उतरून प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

या पाहणी दरम्यान त्यांनी नदीतील विविध ठिकाणांची स्थिती बारकाईने तपासली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. नागरिकांनीही त्यांना नदी प्रदूषणाबाबत सविस्तर माहिती दिली.

या दौऱ्यात वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील सिताराम उतेकर, खजिनदार श्री निशांत बबली कांबळे, तसेच श्री दीपक थोरात, श्री गणेश कांबळे, सौ. भारती अय्यर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने माननीय उपायुक्तांना नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर उपायुक्त श्री रामदास कोकरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, "या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करून शहराला पुन्हा एकदा स्वच्छ व सुंदर नदीचे वैभव मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे," असे आश्वासन दिले.

या पाहणी दौऱ्यास उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे प्रमुख श्री. शशिकांत दायमा, सौ.रेखा अत्तरदे, श्री.सुरेश अहिरे यांनी उपायुक्तांचे आभार मानले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांची नियुक्ती !!

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांची नियुक्ती !!

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्यातील आगरी-कोळी समाज हा पारंपरिक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या फार महत्त्वपूर्ण घटक आहे. कोकणात आणि विशेष करून मुंबई महानगर प्रदेशात प्रभावी लोकसंख्या असलेला आणि स्थानिक भूमिपुत्र असलेल्या ह्या समाजाला गेल्या पन्नास वर्षात अनेक प्रकल्पांनी वेढा घातलेला असून या समाजास विविध शासकीय, शैक्षणिक, रोजगार व सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

आगरी व कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या समस्या शासन प्रशासन स्तरावर प्रभावीपणे मांडून सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” ची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सक्षम आणि उमदे नेतृत्व, अनुभवी व समाजकार्याची जाणीव असणारे नवी मुंबईतील उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांच्या कडे देण्यात आलेली असून त्यांची “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार - आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे  ह्यांच्या हस्ते आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून पक्षाची आणि समाजाची प्रतिमा उंचावून समाजाच्या हितासाठी निष्ठेने कार्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

ओएनजीसी तर्फे ग्रामपंचायत नवघरला नवीन घंटागाडी उपलब्ध !!

ओएनजीसी तर्फे ग्रामपंचायत नवघरला नवीन घंटागाडी उपलब्ध !!

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : ग्रामपंचायत नवघर तर्फे ओएनजीसी कंपनीला घनकचरा उचलण्यासाठी घंटागाडीची मागणी दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत तर्फे मागणी व ठराव सरपंच आणि उपसरपंच यांनी ओएनजीसीला केला होता शिवसेना शाखाप्रमुख  अविनाश म्हात्रे आणि नितीन मढवी यांनी भेटून विनंती केली की आम्हाला घंटागाडीचे खूप आवश्यकता आहे आपण लवकरात लवकर घंटा गाडीच्या मागणीचा विचार करावा अशी विनंती करण्यात आली.त्यानंतर त्यांनी संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना जे काही पत्र किंवा माहिती पाहिजे सर्व देऊन त्यांनी पण आश्वासित केले होते की तुमच्या मागणीचा लवकरात लवकर विचार केला जाईल. एनजीओ संस्था आणि ओएनजीसी अधिकारी यांच्या सोबत शाखाप्रमुख  अविनाश म्हात्रे यांनी  स्वतः सतत पाठपुरवठा, संपर्क केला. त्यांनी ग्रामपंचायतला नवीन एक चांगली घंटागाडीची व्यवस्था करून दिली.सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी ओएनजीसी कंपनी मध्ये या घंटागाडीचे उद्घाटन ओएनजीसी चे प्लांट मॅनेजर  एस एन अहमद सर(CGM) आणि एस के मोहन  सपोर्ट मॅनेजर उरण प्लांट यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी ओएनजीसी चे अधिकारी  अभिषेक पाटील  आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच सरपंच  सविता मढवी,उपसरपंच  प्रियदर्शनी म्हात्रे, नितीन मढवी, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, आतिश भोईर उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे उद्घाटनाला आलेल्या ओएनजीसी अधिकारी यांचे शाल व फुलझाडे देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आले.ही घंटागाडी उपलब्ध होण्यासाठी ओएनजीसीचे अधिकारी अभिषेक पाटील यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे विशेष सत्कार करून ग्रामपंचायत तर्फे आभार मानण्यात आले.तसेच भूमिका फाउंडेशनचे डॉक्टर विशाल गणर यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. शिवसेना शाखाप्रमुख  अविनाश म्हात्रे यांनी ओएनजीसी अधिकारी आणि एनजीओ संस्थेशी सतत पाठपुरवठा संपर्क करून ओएनजीसी कडून ही नवीन घंटागाडी मिळण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल ग्रामपंचायतीतर्फे त्यांचे सुद्धा  मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

मैदानांअभावी तरुणांची अवस्था 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' : महेंद्रशेठ घरत

मैदानांअभावी तरुणांची अवस्था 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' :  महेंद्रशेठ घरत

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : ग्रामीण भागातील तरुणांमध्ये  टॅलेंट आहे; परंतु  आजघडीला अनेक गावांत खेळाडू,तरुणांना खेळण्यासाठी हक्काची मैदानेच नाहीत. त्यामुळे 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील तरुणांची हक्काच्या मैदानांअभावी अवस्था झालेली आहे. हे सारे विदारक चित्र बदलायचे असेल तर गावोगावच्या तरुणांनी सावध व्हायल हवे. त्यांनी आपल्या हक्काच्या मैदानांसाठी राजकीय चपला बाहेर ठेवून लढा उभारण्याची गरज आहे. सरकारची वक्रदृष्टी उरण, पेण परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडली आहे. त्यामुळे आजही वेळ गेलेली नाही. तरुणांनी गुरचरण जमीन वा त्या अनुषंगिक जमिनीवर मैदाने तयार करावीत. ती अधिकृत करण्यासाठी मी आपल्या मागे खंबीरपणे उभा आहे. कारण आजपर्यंत अनेक गावांना मी मैदाने मिळवून दिलेली आहेत. मी सर्वसामान्यांसाठी लढत आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपले मत उरण तालुक्यातील कोप्रोली येथे व्यक्त केले. त्यांच्या हस्ते चंद्रशेखर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोप्रोली आयोजित बापूजी देव चषकाचे भव्य उद्घाटन सोमवारी (ता.६) करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन 'मी मराठी' मोठी जुईच्या मैदानावर करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील, अलंकार परदेशी, घनश्याम पाटील, ध्रुव म्हात्रे आणि एमजी ग्रुपचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या टेनिस क्रिकेट सामन्यांसाठी चंद्रशेखर ठाकूर, अमेय पितळे, प्रितेश पाटील, अक्षय कोळी, अनिकेत ठाकूर आणि ग्रामस्थांनी मेहनत घेतली आहे. यावेळी उत्कृष्ट सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले

कल्याण येथे नागरी संरक्षण प्राथमिक वर्ग क्र. ०८/२०२६ ला उत्साहात प्रारंभ; ४२ प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग !!

कल्याण येथे नागरी संरक्षण प्राथमिक वर्ग क्र. ०८/२०२६ ला उत्साहात प्रारंभ; ४२ प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग !!

बातमीदार प्रतिनिधी: ता. ७, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली सोमवार दि. ०६/०४/२०२६ ते १०/०४/२०२६ या कालावधीत दुपारी १३.०० ते १७.०० या वेळेत नागरी संरक्षण प्रशिक्षण हॉल, कल्याण कार्यालय येथे प्राथमिक वर्ग क्र. ०८/२०२६ सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गात एकूण ४२ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून पहिल्याच दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात प्रशिक्षणास प्रारंभ झाला.

आज पहिल्या दिवशी नियोजित वेळापत्रकानुसार सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित यांनी विविध विषयांवरील व्याख्याने व प्रात्यक्षिकांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रशिक्षण अधिक समृद्ध करण्यासाठी मानसेवी निदेशक डॉ. प्रकाश ठमके तसेच श्री. रामबरन यादव यांनीही व्याख्याने व प्रात्यक्षिकांमध्ये मोलाचे सहकार्य केले.

यावेळी मा. उपनियंत्रक विजय जाधव यांनी प्रशिक्षण वर्गास प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नागरी संरक्षण कार्याबद्दल अधिक उत्साह व बांधिलकी निर्माण झाल्याचे दिसून आले.

सदर पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गामध्ये आपत्कालीन परिस्थितीतील बचावकार्य, प्राथमिक उपचार, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षणाची मूलभूत तत्त्वे याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Regards : DCCD, NMC, Thane

सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

Monday, 6 April 2026

१५ वर्षीय मुलगी बेपत्ता, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !!

१५ वर्षीय मुलगी बेपत्ता, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !!

उरण दि ६, (विठ्ठल ममताबादे) :
उरण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा BNS कलम १३७(२) आणि IPC कलम ३६३ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी श्रीमती कल्पना समीर विजयम बय ४२, धंदा मजुरी, राहतात दि.ब्रा. हॉलचे बाजुला, अमृत म्हात्रे यांचे घर कमांक ३१७ जासई ता. उरण जि. रायगड येथे आहेत. 

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी कु. स्मिता समीर विजयम (वय १५ वर्ष) घरातून बेपत्ता झाली आहे. ती ४ फूट १ इंच उंचीची, बांधे-मजबुत, रंग-गोरा, चेहरा- गोल, केस-काळे लांब, अंगात पांढरा मऊम शर्ट व पायात मस्त रंगाचा सलवार परिधान केलेला असून भाषा - मराठी, हिंदी व इंग्रजी अवगत आहे.

गुन्हा दाखल करण्याचे कारण म्हणजे २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास उरण येथील हॉलचे बाजुला, अमृत म्हात्रे यांचे घर कमांक ३१७ जासई ता. उरण येथून ती बेपत्ता झाली.

पोलीस तपास अधिकारी सपोनि राजेश खांडवे, उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई (मोबाईल नंबर ९८३४८६४३४४) यांनी तपास सुरू केला आहे. फिर्यादीचे ई-साक्ष नोंदवण्यात आले आहे.

पोलीसांनी फिर्यादीची मुलगी कु. स्मिता समीर विजयम याच्या बेपत्ता होण्याच्या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, तिच्या सुरक्षित परतण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. उरण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी  यांनी या प्रकरणावर लक्ष ठेवले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोलीच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त ; डेंगूच्या साथीने नागरिक हैराण !!

प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोलीच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त ; डेंगूच्या साथीने नागरिक हैराण !!


** डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ.

उरण दि ६ (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निष्क्रिय कारभारामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कोप्रोली पाणदिवें गावात डेंग्यूची साथ मोठ्या झपाट्याने पसरत आहे. गावात २५ ते ३० पेशंट सापडले आहेत, अजूनही हि संख्या वाढतच आहे अशा परिस्थितीत आरोग्य केंद्रामार्फत फक्त नॉर्मल पहाणी व फवारणी केली आहे. पण डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना नसल्याने पेशंट वाढतच आहेत. आरोग्य केंद्रात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर सेवा न मिळाल्याने रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, अनेक वेळा आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसतात. त्यामुळे लहानसहान आजारांसाठीही रुग्णांना उरण किंवा पनवेल येथील मोठ्या रुग्णालयात जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा अभाव, अपुरी साधनसामग्री आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. काही ग्रामस्थांनी सांगितले की, तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती दखल घेतली जात नाही.

दरम्यान, नागरिकांनी संबंधित आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, तसेच आवश्यक औषधे व सुविधा तत्काळ उपलब्ध कराव्यात, डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी आरोग्य विभागाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करणे गरजेचे असून, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ मंडळ पाणदिवे यांच्यामार्फत देण्यात आला आहे

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  घ...