Monday, 4 May 2026

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. डोंगर-दऱ्यांतून वळणावळणांनी जाणारा हा मार्ग केवळ भौगोलिक नव्हे, तर इतिहासाचा साक्षीदार आहे. या घाटाशी निगडित एक तेजस्वी, पण दुर्लक्षित नाव म्हणजे सिंग्रोबा धनगर.लोककथांमधून जिवंत राहिलेला हा वीर केवळ मार्गदर्शक नव्हता, तर देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि त्याग यांचा जिवंत आदर्श होता. 

सिंग्रोबा धनगर हे सह्याद्रीच्या कठीण भौगोलिक रचनेत वाढलेले धनगर समाजातील व्यक्तिमत्व होते. मेंढपाळीच्या कामातून त्यांना डोंगर-दऱ्यांची, वाटांची, हवामानाची आणि भूभागाची अचूक ओळख होती. आज ज्या अचूकतेने आपण “गूगल मॅप” वापरतो, त्याच अचूकतेने त्या काळी धनगर समाजातील लोक प्रवाशांना मार्ग दाखवत असत. सिंग्रोबा हे त्यातीलच एक विलक्षण ज्ञान असलेले मार्गदर्शक होते. त्यांनी खंडाळा घाटातील गुंतागुंतीच्या वाटा ओळखून सुरक्षित मार्ग शोधून काढला, ज्यामुळे प्रवाशांना आणि व्यापाराला मोठी मदत झाली. 

लोकपरंपरेनुसार, इंग्रजांनी हा घाट मार्ग उभारण्यासाठी सिंग्रोबा धनगर यांची मदत घेतली. त्यांच्या ज्ञानामुळे खंडाळा घाटाचा मार्ग सुकर झाला. या कार्याबद्दल इंग्रजांनी त्यांना बक्षीस देऊ केले. परंतु सिंग्रोबांनी अत्यंत स्वाभिमानाने उत्तर दिले—“मी धनगर, म्हणजे धनाचा धनी आहे; मला काही नको. तुम्ही फक्त आमचा भारत देश सोडून जा.” हा संवाद त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कणा दर्शवतो—त्यांना संपत्तीची लालसा नव्हती; त्यांना हवी होती ती मातृभूमीची स्वातंत्र्य. 

याच कारणामुळे, असेही सांगितले जाते की इंग्रजांनी त्यांच्या देशभक्तीमुळे आणि नकारामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हा प्रसंग अधिकृत इतिहासात ठळकपणे नोंदलेला नसला, तरी लोककथांमध्ये तो अत्यंत जिवंत आहे. अशा कथांमधून समाजाच्या स्मृतीत साठवलेले सत्य, त्या काळातील संघर्ष आणि लोकांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब दिसते. सिंग्रोबा धनगर यांचा त्याग हा अशाच लोकस्मृतीतून जपला गेलेला एक प्रेरणादायी अध्याय आहे. 

आज खंडाळा घाटातून प्रवास करताना “सिंग्रोबा मंदिर” आणि त्या परिसरातील स्थानिक श्रद्धा या त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देतात. प्रवासी क्षणभर थांबून नमस्कार करतात, कारण त्यांना ठाऊक आहे की या मार्गामागे कोणाचा तरी कष्ट, ज्ञान आणि त्याग दडलेला आहे. हा केवळ धार्मिक भाव नाही, तर इतिहासाबद्दलचा आदर आहे. 

दुर्दैवाने, अशा अनेक लोकनायकांची माहिती मुख्य प्रवाहातील इतिहासात फारशी दिसत नाही. अभ्यासक्रमात त्यांचा उल्लेख नसल्यामुळे नव्या पिढीपर्यंत त्यांची गाथा पोहोचत नाही. त्यामुळेच आज गरज आहे की सिंग्रोबा धनगर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांना योग्य स्थान मिळावे. त्यांच्या कार्याची शास्त्रशुद्ध नोंद व्हावी, संशोधन व्हावे आणि त्यांच्या योगदानाची जाणीव समाजाला व्हावी. 

खंडाळा घाटाच्या “मिसिंग लिंक” प्रकल्पाला सिंग्रोबा धनगर यांचे नाव देणे ही केवळ एक नामफलकाची बाब नाही; ती त्यांच्या कार्याची कृतज्ञतेने केलेली दखल ठरेल. हा निर्णय पुढील पिढ्यांना त्यांच्या इतिहासाची जाणीव करून देईल आणि देशभक्तीचा संदेश देईल. 

इतिहास केवळ पुस्तकांत नसतो; तो लोकांच्या स्मृतीत, परंपरांत आणि कथांमध्ये जिवंत असतो. सिंग्रोबा धनगर यांची कथा ही त्याच जिवंत इतिहासाचा भाग आहे. त्यांच्या त्यागाची, स्वाभिमानाची आणि देशप्रेमाची गाथा आपण जपली पाहिजे, पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण अशा वीरांच्या कथा आपल्याला केवळ भूतकाळ सांगत नाहीत, तर वर्तमानाला दिशा देतात आणि भविष्याला प्रेरणा देतात. 

सिंग्रोबा धनगर—एक नाव, एक मार्गदर्शक, आणि एक अजरामर दीपस्तंभ. त्यांची माहिती संपूर्ण विश्वाला झाली पाहिजे. त्यांचे उदाहरण म्हणजे एका उत्तम देशभक्ती चे उदाहरण आहे. त्यांनी स्वतः साठी काही मागितले नाही तर, संपूर्ण भारतीयांसाठी मागितले.. मला धन, दौलत नको, मी धनाचा धनी म्हणजे धनगर आहे, मला फक्त माझा देश स्वतंत्र हवा, तुम्ही येथे थांबू नका. किती महान विचार होते. त्यांच्या परिवाराबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्यांचे गाव तेथेच पायथ्याशी असलेले शिवोली असे सांगतात, त्यांना ३ भाऊ होते, त्यांनीच त्या ठिकाणी दगड ठेवला, जेथे इंग्रजांनी सिंग्रोबा धनगरास गोळ्या घालून ठार केले. आता तेथे एक छोटे मंदिर बांधले आहे.पूर्वी पासून धनगर लोक काटक होती, मैत्रीत जीव देत होती, प्रामाणिक, निष्ठावान, देशप्रेमी होती. त्यांच्या इतके कार्य कोणाचे नाही. पण तरीही त्यांचा इतिहास काही नोंद घेत नाही, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा इतिहास अजूनही समावेश केलेला नाही? का असे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर यांच्याबद्दल ही लोकांना माहिती नाही.. त्यांच्यावर कविता, लेख लिहायला सांगितले की, त्यांची इच्छा होत नाही असे जाणवते? काही झाले तरी, न्याय हा मिळाला पाहिजेच. ज्यांनी खंडाळा घाट मार्ग शोधला, दाखविला त्यांचा म्हणजे सिंग्रोबा धनगर यांचेच नाव त्या मिसिंग लिंकला मिळायला हवेच. तरच समानता, योग्य मिळाला सारखे होईल. ज्यांचे कार्य, त्यांनाच त्याचे श्रेय मिळायला हवेच. कार्य एकाने करायचे, नाव दुसऱ्यांचे द्यायचे हे कितपत योग्य. थोडी तरी माणुसकीची जाणीव हवी, विचार आपले पारदर्शक हवे, अभ्यासू वृत्ती हवी, विशाल दृष्टी हवी. तरच अचूक न्याय मिळेल. माझा भारतीय लोकशाहीवर विश्वास आहे, ते अचूक न्याय देतील.

सौ.प्रतिमा अरुण काळे/खेमनर
निगडी प्राधिकरण,पुणे ४४
मो. न.९४०५०४२९३८

Sunday, 3 May 2026

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
१ मे जागतिक कामगार दिना निमित्ताने नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस कडून राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला आय टी एफ चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर तथा इंटकचे राष्ट्रीय सविक राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा कडाडून विरोध केला व आम्ही सर्व नेते कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहू असे कामगारांना आश्वाशित केले.

या परिषदेसाठी आय टी एफ लंडनचे जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन, एसीया पॅसिफिक रिजनल सेक्रेटरी अब्दुल गनी सारंग, नेपाल कॉंग्रेस अध्यक्ष गगन थापा, कॉंग्रेस जेष्ठ नेते शेखरजी कोईराला, नेपाळ ट्रेड युनियनचे अध्यक्ष योगेंद्र कुमार, नेपाळ ट्रेड युनियन तथा आय टी एफ चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर अजयकुमार राय आदी उपस्थित होते, या परीषदेनंतर महेंद्रशेठ घरत यांनी नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेलजी यांची भेट घेतली. नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस तर्फे परीषदेचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले होते

प्रियांशी आशाराम जामनेरकर उरण तालुक्यातून प्रथम !!


प्रियांशी आशाराम जामनेरकर उरण तालुक्यातून प्रथम !!

** सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि ३(, विठ्ठल ममताबादे) :
 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस तसा कौतुकाचा आणि आनंदाचा होता सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत असताना अकोला जिल्ह्यातील अनकवाडी या छोट्याशा गावातील कुमारी प्रियांशी आशाराम जामनेरकर या विद्यार्थिनीने मुंबईत विभागातील उरण या तालुक्यात आपली बाजी मारली आहे. उरण येथील सिटीजन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ८७.५०% गुण घेत घवघवीत यश प्राप्त करून सायन्स शाखेतून उरण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपेक्षित गुणवंत विद्यार्थिनीचे नाव कुमारी प्रियांशी आसाराम जामनेरकर असून सिटीजन हायस्कूल ज्युनिअर कॉलेज उरण येथे शिक्षण घेऊन शिक्षक सादिक सर, शैलेंद्र प्रजापती, नरेंद्र पाटील ,प्रमोद पाटील , व साजिया मामी यांच्या मार्गदर्शनाखाली व विवेकानंद येथील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षक दत्तात्रय शेळके , मयूर पाटील,आदित्य सर यांचे मार्गदर्शन घेऊन उत्तम अभ्यास करून तालुक्यातील पहिला क्रमांक पटकावला आहे. 

प्रियांशी चे वडील शेतकरी असून उरण येथे एसटी बस चालक आहेत व आईचे वडापावचे दुकान आहे.तिने दहावीपर्यंत जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतले. स्नितिल पडते  यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरा क्रमांक दहावीत पटकावला होता. पुढे प्रियांशीला इंजीनियरिंग करायची आहे असे तिथे ठरविले आहे. कम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशल इंटेलिजन्स या ब्रांच मध्ये  पुढचे करिअर तिला करायचे आहे. सायन्स शाखेतून प्रियांशी आशाराम जामनेरकर ही उरण तालुक्यातून प्रथम आल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !!

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !!

मुंबई : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने “कुर्मी जोडो अभियान” (6 जून 2026 ते 15 ऑगस्ट 2027) राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय इतिहासातील दोन महत्त्वपूर्ण घटनांच्या स्मरणार्थ हे अभियान आयोजित करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (6 जून 1674) आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी उपपंतप्रधान पदाची घेतलेली शपथ (15 ऑगस्ट 1947) या दोन ऐतिहासिक घटनांमधून समाज एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश मिळतो. याच प्रेरणेने हे अभियान सुरू करण्यात येत आहे.

अभियानाचा शुभारंभ 6 जून 2026 रोजी रायगड किल्ल्यावर होणार असून सांगता समारंभ 15 ऑगस्ट 2027 रोजी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होणार आहे. सुमारे 14 महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट कुर्मी समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, समाजात एकता व बंधुभाव वाढवणे, विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या समाजघटकांमध्ये एकात्मतेची जाणीव निर्माण करणे तसेच समाजातील महापुरुषांचे विचार पुढे नेणे आणि युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे हे आहे.

“कुर्मी” या प्रातिनिधिक संज्ञेत मराठा, रोड मराठा,कुणबी,कुडुंबर, कलबी, कुडुमी, वेलमा,  गुर्जर, पटेल, पाटीदार, रेड्डी,  कापा. कम्मा, कुलमी, नायक,नायडू,कापूनाडू, खंडायत, ओक्का लिंगा,देवेंद्र कुल वेल्लालार,कंबोज, अंजना समाज आदी विविध समाजघटकांचा समावेश मानला जातो. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा हा समाज मुळात एकच असल्याची जाणीव दृढ करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

अभियानांतर्गत समाज एकता रॅली, मेळावे, गाव व पार बैठका, युवक व महिला सक्षमीकरण कार्यक्रम, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे, नाटिका व पथनाट्य, सामाजिक संवाद उपक्रम तसेच डिजिटल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा सन्मान सोहळा आयोजित केला जाणार आहे.

हे अभियान केवळ एक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणण्याचा, त्याची ओळख मजबूत करण्याचा आणि भविष्याची दिशा ठरवण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, प्रदेश महासचिव जयेश शेलार पाटील आणि प्रदेश कोषाध्यक्ष संदीप काळे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.आहे

सौजन्य/वृत्त - मा. संजय पाटील 
अध्यक्ष - महाराष्ट्र कृर्मी समाज 
+91 77450 48505

६८ व्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; मंगला ठोके यांची प्रेरणादायी यशोगाथा !!

६८ व्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण; मंगला ठोके यांची प्रेरणादायी यशोगाथा !!

मुंबई, प्रतिनिधी : ता. ३,
“शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते,” हा संदेश आपल्या कृतीतून देत श्रीम .मंगला पोपट ठोके यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इ 12वी परीक्षा फेब्रुवारी २०२६ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

बहुतेक वेळा एका विशिष्ट वयानंतर शिक्षण घेणे कठीण मानले जाते. मात्र शिक्षणाची प्रबळ आवड, काहीतरी नवीन साध्य करण्याची जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मंगला ताईंनी पुन्हा पुस्तक हातात घेतले. त्यांनी शारदा नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विक्रोळी येथे प्रवेश घेऊन शिक्षणाचा प्रवास नव्याने सुरू केला.

घरकाम, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वयानुसार येणाऱ्या अडचणींवर मात करत त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले आणि परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत यशाचे शिखर गाठले.

या यशामागे त्यांच्या पाच मुलींचा मोलाचा वाटा आहे. मुलींनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले, शिक्षकांनी अभ्यासात मार्गदर्शन केले आणि आत्मविश्वास वाढवला. कुटुंबीय व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे मंगला ताईंना आपले स्वप्न पूर्ण करता आले.

मंगला ठोके यांची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. त्यांच्या यशामुळे रात्रशाळांची गरज अधोरेखित झाले आहे. शारदा नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सारख्या संस्थांमुळे शिक्षणात खंड पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाची संधी मिळत आहे.

“नोकरी, संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे रात्रशाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यालयांचे महत्त्व अधोरेखित होते,” अशी भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली.

मंगला ठोके यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विक्रोळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्मा. श्री बी. डी. काळे, मुख्याध्यापक श्री दत्तात्रय सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“आता थांबायचं नाय,” असा जिद्दीचा संदेश देणाऱ्या मंगला ठोके आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर (बातमीदार)

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

 ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध कामगिरीचे मान्यवरांकडून विशेष कौतुक

ठाणे प्रतिनिधी: ता. ३, महाराष्ट्र दिनानिमित्त दि. १ मे २०२६ रोजी साकेत पोलीस परेड मैदान, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला परेड संचलनाचा भव्य आणि दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.           

     या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणेचे पालकमंञी मा.श्री.एकनाथ संभाजी शिंदे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी तथा नियंत्रक, नागरी सरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्यक्षेञरक्षक आमदार श्री.संजय केळकर, ठाणे महापौर सौ. शर्मिला पिंपळकर, उपमहापौर अरुण पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

     या सोहळ्यात पोलीस दल, वाहतूक नियंत्रण विभाग, अग्निशमन दल, केडीएमसी मालमत्ता विभाग, होमगार्ड, नागरी संरक्षण दल तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांनी संयुक्त सहभाग घेत उत्कृष्ट संचलन सादर केले.

     नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका तालात संचलन करून महाराष्ट्राच्या एकतेचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडविले. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाला हीच खरी मानवंदना ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

     नागरी संरक्षण दलाच्या परेडचे नेतृत्व महिलांकडे सोपविण्यात आले होते. परेड कमांडर म्हणून सौ.भारती सतीश देशमुख, उपविभागीय क्षेञरक्षक, वागळे ईस्टेट, ठाणे यांनी अत्यंत रुबाबदार नेतृत्व केले, तर सुपरनंबरी म्हणून सौ.रोहिणी आदेश गोलतकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पथकाने उत्कृष्ट संचलन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

     सदर परेडसाठी गेले पंधरा दिवस स्वयंसेवकांनी कडक उन्हाची पर्वा न करता अत्यंत मेहनत, शिस्त आणि समर्पणाने सराव पूर्ण केला होता. या अथक परिश्रमांची दखल घेत नागरी संरक्षण दलाचे मा.उपनियंत्रक श्री.विजय जाधव, सहाय्यक उपनियंत्रक सौ.दीपा घरत मॅडम, उप मुख्य क्षेत्ररक्षक, ठाणे विभाग १, २, ३ व ४ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागी स्वयंसेवकांना सत्काररूपी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

     यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त प्रमाणपत्रांवर त्यांचे प्रेरणादायी छायाचित्र व विचार समाविष्ट करून प्रमाणपत्रांना विशेष स्वरूप देण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवानी यांचे विशेष योगदान लाभले. स्वयंसेवकांसाठी आवश्यक जॅकेट्स व कॅप्स उपलब्ध करून देणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे तसेच संपूर्ण पथकाचा उत्साह कायम ठेवण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. याशिवाय श्री.संजय मगर श्री.हनुमान चौधरी, उपमुख्य क्षेत्ररक्षक कमलेश श्रीवास्तव, विभागीय क्षेत्ररक्षक सुब्रमन्यम मुरुगन तसेच अरुण सातपुते यांनीही सातत्याने सहकार्य व प्रेरणा दिली.

   ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ सर यांनी नागरी संरक्षण दलाच्या शिस्तबद्ध संचलनाचे विशेष कौतुक करत स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. तसेच मुख्य क्षेत्ररक्षक श्री.संजयजी केळकर यांनीही स्वयंसेवकांच्या समर्पित कार्याचे अभिनंदन केले.

     याच अनुषंगाने नागरी संरक्षण अंबरनाथ कार्यालय येथेही मा. उपनियंत्रक, नागरी संयक्षण श्री.विजय जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कार्यालयीन कर्मचारी, विभागीय क्षेत्ररक्षक, उपविभागीय क्षेत्ररक्षक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     “आजचा हा गौरवशाली सोहळा म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकाच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाचे मोत्यात रूपांतर झाल्याचा क्षण आहे. संघटनेशी एकनिष्ठ राहून भविष्यातही अशाच उत्साहाने कार्यरत राहण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.” अशी भावना व्यक्त करत आगामी २६ जानेवारीच्या परेडसाठी नव्या जोशाने तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले.

     कार्यक्रमाच्या शेवटी “जय हिंद! जय महाराष्ट्र!” च्या घोषणांनी संपूर्ण साकेत मैदान देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेले. 🇮🇳🚩

https://www.youtube.com/live/tAls--eTT5I?si=9D9FeFA88iK8sWhF


वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर (बातमीदार)

Saturday, 2 May 2026

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे :

मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा पटांगणात आयोजित हिंदू संमेलन उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले. हिंदू समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा  वाढवली.

या संमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून यशोदाताई पाटील आणि हर्षदाताई केणे यांनी बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीवर सखोल भाष्य केले. आपल्या हिंदू परंपरेचा आणि महापुरुषांचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर  मांडला त्यांनी विशेषतः मुलींना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. "लव्ह जिहाद" आणि "लँड जिहाद" सारख्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मुलींनी सावध राहावे, कोणत्याही आंधळ्या प्रेमाला बळी पडू नये, तसेच पालकांनीही जागरूक राहण्याचे आवाहन केले. 

वक्त्यांनी हिंदू धर्माची महानता पटवून देताना इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांची उत्तम छान मांडणी करत उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी आणि येसूबाई यांनी हिंदू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुलजी मिश्रा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदू समाजातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकमेकांना मदत करून सुखदुःखात एकत्र राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील ऐक्य आणि परस्पर सहकार्य यामुळेच समाज अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन देवसर यांनी उत्कृष्टरीत्या केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या संमेलनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता, एकजूट आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...