Monday, 30 March 2026

सुधीर मुंबईकर आदर्श व्यक्तिमत्व - जे एम म्हात्रे.

सुधीर मुंबईकर आदर्श व्यक्तिमत्व - जे एम म्हात्रे.

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
 शिक्षकाचे काम देश घडविण्याचे आहे, विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षकाचे आहे, शिक्षक कधीच रिटायर होत नाही. आयुष्यात भरपूर कामे करायची असतात. मोरा सारख्या ठिकाणी शिक्षकाचे काम करणे कठीण आहे अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी चांगले काम केले आहे.अनेक  शिक्षण संस्था पैसे कमवण्याच्या पलीकडे काहीच करत नाहीत. शिक्षणाचे व्यवसायिकरण वाढत चालले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगले शिका मोठे व्हा. ग्रामीण भागात शाळा चालविणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांची कर्तव्ये व जबाबदारी खूपच महत्वाची आहे. आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर हे सेवानिवृत्त होत आहेत. सुधीर मुंबईकर हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या ज्ञानाचा शाळेला खूपच मोठा फायदा झाला. शाळेसाठी त्यांचे योगदान खूपच महत्वाचे आहे.असे गौरवोदगार जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा पनवेल महानगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी काढले.

 जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था,विद्या संकुल मोरा उरण येथील मुख्याध्यापक  सुधीर शांताराम मुंबईकर हे ३६ वर्षाच्या  प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले . त्यानिमित्त त्यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शाळा समितीचे चेअरमन परशुराम मोतीराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली मोरा येथे विद्या संकुलात मोठया उत्साहात संपन्न झाला.यावेळी जे एम म्हात्रे बोलत होते.या कार्यक्रम प्रसंगी न्हावा ग्रामपंचायतचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे,शिक्षणाधिकारी निर्मला घरत,माध्यमिक मराठी माध्यम शाळेचे चेअरमन पी एम कोळी, प्राथमिक मराठी शाळेचे चेअरमन चंद्रकांत कोळी, इंग्लिश मिडीयम स्कुल चे चेअरमन दिलीप मुंबईकर, शाळा कमिटीचे मेंबर - बी पी म्हात्रे, आर के पाटील, के एस शिंगटे, आर बी कोळी, राजश्री कोळी, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक साईनाथ गावंड, माध्यमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक मनोज म्हात्रे, इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक संध्या ठाकूर, विलास मुंबईकर, अनिल मुंबईकर, मनोहर मुंबईकर , जयराम मुंबईकर, नितीन मुंबईकर , शिवदास पालकर, निळकंठ पाटील, हरेश म्हात्रे,सनी सर, विविध पदाधिकारी , तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक, विद्या संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी जे एम म्हात्रे यांनी सुधीर शांताराम मुंबईकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सेवानिवृत्त झाले तरी तुम्ही सारखे शाळेत येत चला. तुमच्या मार्गदर्शनाची शाळेला गरज आहे असेही त्यांनी यावेळी  आपले मनोगत व्यक्त करून सुधीर मुंबईकर यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी उपस्थित असलेले मुख्याध्यापक मनोज म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक मध्ये त्यांनी सुधीर मुंबईकर यांच्या बद्दल माहिती दिली.या नंतर मोठया स्क्रीन वर सुधीर मुंबईकर यांचे जीवनपट चलचित्रपटावर दाखविण्यात आले. प्रतिक मुंबईकर यांनी आपल्या वडिलांविषयी आदर व्यक्त करत एक आदर्श शिक्षक, आदर्श वडील कसे असतात हे सांगितले.माजी विद्यार्थीनी स्वप्नाली हळदणकर यांनी सुधीर मुंबईकर सर शाळेत असताना कशा पद्धतीने शिक्षण देत होते, कसे विद्यार्थ्यांवर संस्कार करत होते हे सांगत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. माजी मुख्याध्यापक किरण शिंगटे, माजी मुख्याध्यापक बी पी म्हात्रे, मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनीही आपल्या मनोगतात सुधीर मुंबईकर यांच्या कार्याचे,शाळेला दिलेल्या योगदान बद्दल त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन परशुराम मोतीराम कोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि सुधीर मुंबईकर यांनी आपल्या काळात शाळा चांगल्या पद्धतीने चालविली. शाळेकडे घरासारखे लक्ष दिले. कधीही कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. शाळेचे सुंदर असे सुशोभीकरण केले. त्यांचे योगदान शाळेतील शिक्षक, कर्मचारी, येथील ग्रामस्थ, विद्यार्थी कधीही विसरणार नाही. असे सांगत त्यांना सेवानिवृत्त बद्दल शुभेच्छा दिल्या. शेवटी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधीर शांताराम मुंबईकर यांनी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, युवा नेते प्रितम दादा म्हात्रे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. मनोगतात त्यांनी सुरवातीपासून कशा पद्धतीने काम केले याची माहिती दिली. आज माझा सेवानिवृत्तचा कार्यक्रम आहे. चिरनेरला ८ वर्षे, १ वर्षे व्ही के हायस्कूल, २८ वर्षे मोरा येथे सेवा केली. सर्वांचे मला सहकार्य मिळाले. जे एम म्हात्रे भाऊ तसेच चेअरमन, सोबत असणारे सर्व सहकारी यांचे मला नेहमी मोलाचे मार्गदर्शन लाभले. सहकार्य लाभले, सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज येथे उभा आहे. जीवनात प्रगती करत आहे. या सर्वांचा तसेच माझे सर्व नातेवाईकांचा मला आशीर्वाद, पाठिंबा आहे, सहकार्य आहे म्हणूनच मी माझ्या आयुष्यात प्रगती करू शकलो.या सर्वांचे माझ्या जीवनात महत्वाचे योगदान आहे . विद्यार्थी हेच माझे दैवत आहेत. पण त्यांची आता उद्यापासून सेवा करायला मला मिळणार नाही असे भावनिक उदगार सुधीर मुंबईकर यांनी काढले. यावेळी सुधीर मुंबईकर सर भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले.अतिशय भावनिक होत त्यांनी सर्वांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्या बद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुंदर व उत्तम असे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित सरांनी केले.मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांना २०१३ साली रायगड जिल्हा परिषदेचा माध्यमिक आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे आदर्श कोविड योद्धा पुरस्कार, द्रोणागिरी भूषण पुरस्कार, रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ तर्फे आदर्श मुख्याध्यापक असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सध्या सुधीर मुंबईकर हे उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघांचे उरण तालुकाध्यक्ष, उरण तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष,स्व. धर्मबाई शांताराम मुंबईकर चॅरिटेबल संस्था वेश्वी उरण अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सल्लागार असे वेगवेगळ्या संस्था संघटनेत वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. सुधीर मुंबईकर यांची सामाजिक बांधिलकी खूप मोठी असून त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळे त्यांना सर्वच स्तरातून सेवानिवृत्ती बद्दल व पुढील वाटचालीसाठी मोठया प्रमाणात शुभेच्छा देण्यात आले.

शेलघर येथे एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद !!

शेलघर येथे एम जी ट्रॉफीला निलेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीने चार चांद !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :पनवेल तालुक्यातील शेलघर येथे प्रकाश झोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विजेत्यांना २१ बाईक असलेली क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या स्पर्धेला भारताचे माजी डावखुरे फिरकी गोलंदाज निलेश कुलकर्णी यांनी उपस्थित राहून एम जी ट्रॉफीला चार चांद लावले आहेत.

निलेश कुलकर्णी यांनी १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर बळी (विकेट) घेणारे ते पहिले भारतीय गोलंदाज ठरले. मुंबई संघाकडून खेळताना, त्यांनी बडोदा संघाचे १० बळी अवघ्या १२० धावांत घेतले होते.आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी एम जी ट्रॉफीला आलेले निलेश कुलकर्णी यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने शनिवारी (ता. २८ ) स्वागत केले. त्यानंतर शाल आणि सन्मानचिन्ह देऊन महेंद्रशेठ घरत यांनी निलेश कुलकर्णी यांचा सन्मान केला.
यावेळी निलेश कुलकर्णी म्हणाले, "खेळ कोणताही असो, त्यासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे. महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने आयोजित एम जी ट्रॉफीचे सामने आणि भव्य मैदान पाहून मनापासून आनंद झाला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. प्राथमिक सुविधा नसतानाही मी त्याकाळी क्रिकेटवर जिवापाड प्रेम करून खेळलो. तहानभूक माहित नसायची. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मी मात केली. त्यामुळे भारतीय संघात स्थान मिळवू शकलो. त्यामुळे आजही मी क्रिकेटची सेवा करतोय. खेळाडूंना घडवतोय

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज : डॉ. रागिणी नायक

कॉंग्रेसला साथ देण्याची गरज :  डॉ. रागिणी नायक 

कर्जत, खोपोलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना महेंद्रशेठ घरत यांचे मार्गदर्शन

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी नेहरू गांधी यांच्या विचारांची गरज आहे. सध्या प्रतिकूल परिस्थितीत कॉंग्रेसला साथ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी केले. कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.   यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.  प्रदेश काँग्रेसच्या संगठन सृजन अभियानानिमित्ताने कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन नेरळ येथील साने हॉल येथे करण्यात आले होते.यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "कॉंग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. 

पक्षाची विचारधारा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. सध्या रायगड जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत आपण कार्यकर्त्यांच्या बळावर चांगले यश संपादन करीत आहोत. येत्या काळात पक्षाच्या वाढीसाठी आपणा सर्वांना हातात हात घालून काम करायचे आहे." यावेळी पक्षाच्या निरीक्षक राष्ट्रीय प्रवक्ता रागिणी नायक,पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस प्रदीप राव,मनीष गणोरे,पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत,महिला जिल्हा अध्यक्ष ॲड. श्रद्धा ठाकूर, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते

संतोष पटकारे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड !!

संतोष पटकारे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड !!

                     
 श्री संतोष महादेव पटकारे, रा पाचल, ता राजापूर जि रत्नागिरी. सध्या राहणार विलेपार्ले मुंबई यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली चे मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे ही निवड प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांनी केली आहे. ही निवड मुंबई येथे चेंबूर येथील स्वामी विवेकानंद काॅलेज  पटांगणात कै भरत बोडेकर यांचे स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिले आहे...या प्रसंगी विजय कोकरे राज्य संघटक ऑल इंडिया धनगर गणेश गोरे सुनील गोरे परेश गोरे  मारुती झोरे पांडुरंग काळे मनोहर कोकरे पांडुरंग गोरे गणेश शेळके संतोष खुटेकर प्रकाश देसाई संजय झोरे संदीप झोरे इत्यादी उपस्थित होते समाज महासंघ महाराष्ट्र राज्य नवलराज काळे कोकण प्रदेश अध्यक्ष युवा आघाडीचे संतोष पटकारे हे प्रत्येक वर्षी सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक वर्षी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महिलांना मदत क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मदत करत असतात गेले १० ते १२ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे धनगर समाजाचे प्रत्येक कार्यक्रम ला आवर्जून उपस्थित राहुन सहकार्य करत असतात अशा या सामाजिक नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा ३ आणि ४ एप्रिलला !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा ३ आणि ४ एप्रिलला !!

** गावक-यांकडून जय्यत तयारी;यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
            देवाप्रति श्रद्धा ज्यांच्या मनात वास्तव्य करते अशा व्यक्तीना आपण आस्तिक म्हणून ओळखतो, खरे पाहिले तर मनात भाव व देवापरी भक्ती मनापासून जोपासली तर मनुष्याच्या ह्दयातच देवाचे स्थान आहे. असे म्हटले जाते. या बाबी श्रद्धाळू माणसांना पटण्याजोगा नसतात. म्हणूनच ते जेथे देवाचे मंदिर आहे तेथेच देव दर्शनाला जातात. देशभरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत.त्यातही महाराष्ट्रात तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे.एन.पी.टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे.न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
           या गावाधील गावदेवीची यात्रा चैत्र कृष्ण पक्ष-१  दि.३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळा दि.४ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. गावामधील ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी झाली आहे. ग्रामसुधारक मंडळ न्हावे कमिटीचे अध्यक्ष राजेश काळूराम घरत, उपाध्यक्ष जयेंद्र जनार्दन पाटील, नितीन भरत भोईर, सतीष दत्ताराम भोईर, सुशांत बांद्रे, खजिनदार निलेश हरिश्चंद्ध भोईर, सहखजिनदार अनंत लहु म्हात्रे, चेतन लक्ष्मण कडू, समाधान सदानंद म्हात्रे, सरपंच विजेद्र गणेश पाटील, उपसरपंच शैलेश विठ्ठल पाटील आणि सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पहावे. असे आवाहन पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक दामू भोईर यांनी केले आहे.

Sunday, 29 March 2026

ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे मौजे बोकडवीरा येथील जमीनीला मिळाला प्रति चौ.मी.१७२५ /- रू.भरघोस भाव !

ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे मौजे बोकडवीरा येथील जमीनीला मिळाला प्रति चौ.मी.१७२५ /- रू.भरघोस भाव !

** भरघोस भाव मिळवून दिल्याबद्दल ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार.


उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) :
सिडकोने २४/०९/१९८६ रोजी कवडीमोल भावाने उरण तालुक्यातील मौजे बोकडवीरा येथील जमीन संपादित केली होती.मात्र जमीन संपादन करतानाचा भाव, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मान्य नव्हता.त्यातील एक शेतकरी भालचंद्र म्हात्रे यांनी कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय घेत उरण मधील वकील ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे(फुंडे )यांच्याशी संपर्क साधला.व पुढील लढा लढण्याची तयारी दर्शविली.ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे (फुंडे) यांची मा.आलिबाग कोर्टात उपजिल्हाधिकारी,मेट्रो सेंटर उरण यांच्या विरोधात वाढीव भावासाठी केस कामी वकील म्हणून नेमणूक केली होती.परंतु दोनच महिन्यापूर्वी मौजे बोकडवीरा येथील काही शेतकऱ्यांना मा.अलिबाग कोर्टाने फक्त ७००/- रू.प्रति.चौ.मी.एवढाच अत्यल्प भाव मिळाला तसा निकाल लागला होता तशी बातमी वृत्तपत्रात, पेपरमधे शेतकऱ्यांनी वाचली त्यामुळे शेतकरी निराश झाले होते.परंतु ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे यांनी आपले कौशल्य पणाला लावून कायद्याच्या चौकटीत दोनच महिन्यात शेतकऱ्याची मौजे बोकडवीरा जमीनीला दिनांक २४/०३/२०२६ रोजी १७२५/- रू.प्रति.चौ.मी.असा भरघोस वाढीव भाव मिळवून दिला.तसा निकाल मा.अलिबाग कोर्टाने दिला. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व शेतकरी यांनी ॲड.कैलास भालचंद्र म्हात्रे ( फुंडे )यांचे जाहीर आभार व्यक्त केले.वकील कैलास भालचंद्र म्हात्रे यांनी अशाप्रकारच्या अनेक शेतकऱ्यांच्या केसेसमधे जास्तीत जास्त भाव मिळवून सिडकोकडून पैसे तत्काळ मिळवून शेतकऱ्यांना दिले आहेत म्हणूनच आमचा वकिलसाहेबांवर संपूर्ण विश्वास होता आणि आहे. ॲड. कैलास भालचंद्र म्हात्रे यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे  असे मत प्रकल्पग्रस्त शेतकरी भालचंद्र लक्ष्मण म्हात्रे व ईतर शेतकरी यांनी व्यक्त केली आहे.ऍड कैलास म्हात्रे यांनी आजपर्यंत आपल्या वकिलीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. उरण मधील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रायगड ही शिवरायांची भूमी : डॉ. रागिणी नायक

रायगड ही शिवरायांची भूमी : डॉ. रागिणी नायक 

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्याची शान राखली : महेंद्रशेठ घरत 

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : "कॉंग्रेस हा जनता जनार्दनाचा पक्ष आहे. सद्यःस्थितीत देशाचे नेते राहुल गांधी सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. प्रियांका गांधी मोदींना जशास तसे उत्तर देत आहेत. मोदीजी फक्त मन की बात करतात, जनतेला मात्र वार्यावर सोडतात. ही आजची सत्य परिस्थिती आहे. महागाई गगनाला भिडली आहे. मात्र मोदी सरकारला त्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटनावर आणि जनतेच्या समस्यांवर काम करत आहे. यापुढे जिल्हाध्यक्षांना अधिकाधिक अधिकार असतील. कॉंग्रेसचे पदाधिकारी निवडीचे निर्णय वातानुकूलित दालनात बसून दिल्लीतून होणार नाहीत, तर जनतेशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेऊन होतील. रायगड ही शिवरायांची भूमी आहे. शिवाजी महाराज यांची ख्याती जगभर आहे. त्यामुळे रायगडमध्ये कॉंग्रेसचेच वर्चस्व राहील, यासाठी आम्ही काम करून कार्यकर्त्यांना बळ देऊ," असे प्रतिपादन कॉंग्रेसच्या दिल्लीतून आलेल्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि निरीक्षक डॉ. रागिणी नायक यांनी अलिबाग येथे केले आहे. त्या पुढे म्हणाल्या, "शिवरायांच्या भूमीत आल्याचा मला आनंद आहे. 'सृजन संघटन अभियान' जो देशभर राबविला त्याची वीट मजबूत करण्यासाठी मी आली आहे." असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (या. २९) अलिबाग येथील 'कॉंग्रेस भवन' येथे पार पडली. यावेळी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि निरीक्षक डॉ. रागिणी नायक, प्रदीप राव, मनोज गणोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "रायगडमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगले काम केले आहे. वर्षांनुवर्षे जिल्हा परिषदेत शेकापचे वर्चस्व असायचे, यंदा त्यांना चक्क शून्य जागा मिळाल्या. मात्र कॉंग्रेसने तीन जागा लढवून दोन जिंकल्या. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्याची शान राखली, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो."
यावेळी रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य डॉ. मनीष पाटील, अविनाश ठाकूर यांचा रागिणी नायक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. डॉ. रागिणी नायक आणि जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षाविषयी भावना ऐकून घेतल्या.

यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड.श्रद्धा ठाकूर, नाना म्हात्रे, युवा अध्यक्ष निखिल ढवळे, अलिबाग कॉंग्रेसचे राजाभाऊ ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अलिबाग, मुरूड पदाधिकारी उपस्थित होते.

सुधीर मुंबईकर आदर्श व्यक्तिमत्व - जे एम म्हात्रे.

सुधीर मुंबईकर आदर्श व्यक्तिमत्व - जे एम म्हात्रे. उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :  शिक्षकाचे काम देश घडविण्याचे आहे, विद्यार्थ्या...