Thursday, 4 June 2026

आ. रोहित पवार यांनी दिली करंजा बंदराला भेट ; मच्छिमार बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या !

आ. रोहित पवार यांनी दिली करंजा बंदराला भेट ; मच्छिमार बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या !

** समस्या सोडविण्याचे रोहित पवार यांचे आश्वासन.

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे )
दिनांक ३/६/२०२६ रोजी आमदार रोहित दादा पवार यांनी उरण तालुक्यातील करंजा गावाला भेट देऊन करंजा येथील प्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी मातेच्या मंदीराला भेट देऊन दर्शन घेतले. आणि द्रोणागिरी मंदाराला मिळालेला पर्यटनाचा दर्जा बाबत तसेच मंदीर परीसर शुशोभिकरणा बाबत ग्रामस्थांकडून सविस्तर माहीती घेतली. मच्छीमार समाजाचे तसेच शेतकरी वर्गाचे प्रश्न  समजुन घेतले. मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्सा बाबत करंजा मच्छीमार सोसायटी च्या कार्यालयाला भेट देऊन डिझेल कोटा, डिझेल परतावा, करंजा बंदरात मच्छीमारांना भेडसवणाऱ्या विविध समस्या ,मच्छीमारांच्या गावठान विस्ताराचा प्रश्न, मच्छीमारांची व्यापारी वर्गा कडून होणारी फसवणूक, शासना कडून नव्यानेचं मिळालेला शेतकरी दर्जा परंतु आत्ता पर्यंत मच्छीमार समाजाला याचा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही  या बाबत तसेच विवीध समस्स्यां बाबत सविस्तर माहीती घेतली. नव्यानेच सुरू असलेल्या करंजा रेवस पुलाची बोटीतुन पहाणी केली  या पुलाच्या कामामुळे बाधीत मच्छीमार आणी शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या नुकसान भरपाई बाबतीत तसेच या पुलाच्या कामामुळे होणाऱ्या अन्याया बाबतीत ग्रामस्थांसोबत चर्चा केली.

 या सर्व समस्या बाबत आणि करंजा पोर्ट बाबत येणाऱ्या पावसाळी आधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याबाबत आणि या सर्व प्रश्नाना मार्गी लावण्याबाबत मच्छीमार तसेच शेतकरी वर्गाला आश्वासित केले. या दौऱ्याचे आयोजन उरण नगपालिकेच्या नगराध्यक्षा  भावना ताई घाणेकर यांनी यांनी केले.या वेळी  सिताराम नाखवा,  मार्तंड नाखवा, के एल कोळी,   रमेश भगत, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयेंद्र नाखवा  नरेश कोळी, उरण नगरपालिकेचे राट्रवादी पक्षाचे सर्व  नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते  सचिन रमेश डाऊर, कल्पेश थळी, मधुकर थळी, कॉंग्रेस नेते भालचंद्र घरत. मनोहर थळी, शैलेश डाऊर, देवदास थळी, मुकेश थळी , परेश म्हात्रे आणि मोठ्या संखेने करंजा ग्रामस्थ उपस्थित होते.

पनवेल जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतूक मुळे होत आहेत अपघात !!

पनवेल जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतूक मुळे होत आहेत अपघात !!

विरुद्ध दिशेने वाहने न सोडण्याची सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांची मागणी.

त्वरित कारवाई न केल्यास अजित म्हात्रे यांचा आंदोलनाचा इशारा.

उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )
पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात वैष्णो लॉजिस्टिक या आस्थापने अंतर्गत चालणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बेकायदेशीर वाहतुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच विरुद्ध दिशेने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. परिसरातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा विशेष त्रास होत आहे.तरी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वैष्णो लॉजिस्टिक अंतर्गत चालणाऱ्या अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे. त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा अजित म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.

आज पर्यंत उरण मध्ये बेकायदेशीर व अवैध वाहतूक मुळे अनेक जणांचे विनाकारण मृत्यू झाले आहे. तर काही ठिकाणी अपघात होऊन महत्वाचे हात पाय कायमचे निकामी झाले आहेत. अपघातामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे गोर गरीब जनतेची, नागरिकांची मागणी व त्यांच्या समस्या लक्षात घेता पर्यावरणवादी तथा सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी सदर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर समस्या त्वरित सुटली नाही तर नागरिकांचा मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच यावर त्वरित कारवाई करण्याची व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आह

"अपघात होण्यापूर्वी जागे व्हा! खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा"

"अपघात होण्यापूर्वी जागे व्हा! खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा"

खोपटे-कोप्रोली काँक्रेट रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थ मंडळ खोपटे यांची मागणी


उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील खोपटे-कोप्रोली या नव्याने काँक्रेटीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी या मार्गावर तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उरण-खोपटा हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग मानला जातो. रस्त्यालगत अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. नुकतेच रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे याच मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण प्रवास करत असतात. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने यापूर्वी किरकोळ अपघात घडले असून भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थ मंडळाने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात कारवान गोडाऊन जवळ,धसाखोशी /द.पी. पाडा बस स्टॅन्ड, म्हात्रेपाडा बस स्टॅन्ड,आणि विरगो बस स्टॅन्ड. या ठिकाणी तातडीने गतिरोधक व वाहतूक सूचना फलक उभारण्याची मागणी केली आहे.

यावेळी ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव  कुमार ठाकूर, धसाखोशी अध्यक्ष कमलाकर म्हात्रे तसेच ग्रामस्थ मंडळाचे सल्लागार  कल्पेश ठाकूर (गुरुजी) उपस्थित होते.

"रस्त्यांचा विकास स्वागतार्ह आहे; मात्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा निष्पाप जीव गमावण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांना संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे

चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा..

चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा..

मुरबाड (प्रतिनिधी) : कामगार चळवळ, पत्रकारिता आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार तथा कामगार नेते मंगल दादा डोंगरे यांनी तब्बल ३९ वर्षे ९ महिने आणि १७ दिवसांच्या सेवेनंतर ३१ मे रोजी सेवेतून निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त मुरबाड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

मुरबाड तालुक्यातील गोरख मचिंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेल्या "खोपीवली"या  गावी,, ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रवास सुरू करणाऱ्या मंगल डोंगरे यांनी १३ ऑगस्ट १९८७ रोजी मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील ब्लास्ट कार्बो ब्लॉक्स प्रा. लि. कंपनीत नोकरीला सुरुवात केली. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी पत्रकारिता, कामगार चळवळ आणि समाजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

कामगारांच्या न्यायहक्कांसाठी लढा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, गोरगरिबांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत नेणे, तसेच सामाजिक अडचणींमध्ये मदतीचा हात देणे ही त्यांची कार्यशैली राहिली. कोरोना काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक गरजूंना मदत केली.

पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया, पत्रकार सुरक्षा समिती, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ यांसारख्या संघटनांमध्ये विविध पदांवर काम करत शेकडो पत्रकारांना संघटित केले. तर कामगार क्षेत्रात महाराष्ट्र मजदूर संघासह विविध संघटनांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळली.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आदर्श पत्रकार, समाजभूषण, समाजरत्न यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तर शिर्डी येथे तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार, तसेच पंढरपूर येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या सहा जिल्हाध्यक्ष मध्ये कोकण मुंबई विभागातून उत्कृष्ट जिल्हा अध्यक्ष म्हणून राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याला राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला.

सेवापूर्ती निमित्त कंपनीत आयोजित सत्कारानंतर मित्रपरिवार, नातेवाईक,सहकारी, पत्रकार, आणि सामाजिक कार्यकर्ते व कुटुंबीयांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून त्यांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत, समाजसेवेची त्यांची वाटचाल अशीच अविरत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

"नोकरीतून निवृत्ती झाली असली तरी समाजसेवेच्या प्रवासातून नाही," अशा शब्दांत उपस्थितांनी मंगल डोंगरे यांच्या कार्याचा गौरव केला.

कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू ; विविध योजनांसह 50 कोटींचा निधी मंजूर !!

कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू ; विविध योजनांसह 50 कोटींचा निधी मंजूर !!

नवी मुंबई दि. ०३, :- ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा आणि सन्मानाचा घालवता यावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय कोकण भवन येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक यांनी दिली आहे. 

या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे सामाजिक जीवन सुसह्य करणे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राखणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांना हक्काचे विमा संरक्षण आणि वैद्यकीय मदत मिळवून देणे शक्य होणार आहे. याशिवाय वृद्धापकाळात होणारी छळवणूक, जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण आणि निवारा यांसारख्या अत्यंत संवेदनशील बाबींवरही हे महामंडळ विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१११/महामंडळे, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ अन्वये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी या स्वतंत्र महामंडळाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता नवी मुंबईतील सी.बी.डी. बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमधील ६ व्या मजल्यावर, रूम नंबर ६१९ मधील प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण (मुंबई विभाग) यांच्या कार्यालयात हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांच्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.

या महामंडळाच्या सुचारू कामकाजासाठी शासनाकडून ५० कोटी रुपयांचे भरीव भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. कोकण भवन येथील या कार्यालयाशी ज्येष्ठ नागरिकांना थेट संपर्क साधता यावा, यासाठी ०२२-२७५७५९७९ हा अधिकृत दूरध्वनी क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अडचणींसाठी व शासकीय योजनांच्या लाभासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

म्यानमारचे राष्ट्रपती जेएनपीएच्या दौऱ्यावर !

म्यानमारचे राष्ट्रपती जेएनपीएच्या दौऱ्यावर !

** बंदराच्या पायाभूत सुविधांची आणि भावी विस्तार योजनांची घेतली माहिती.

उरण ३, (विठ्ठल ममताबादे) : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे मंगळवार, २ जून २०२६ रोजी म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम  मिन आंग ह्लाइंग यांच्या भेटीचा सन्मान लाभला. या भेटीदरम्यान महामहिम राष्ट्रपती यांच्यासमवेत ६७ सदस्यीय अधिकृत शिष्टमंडळ उपस्थित होते.जेएनपीएमध्ये आगमनानंतर, म्यानमारच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, भा. प्र. से. आणि जेएनपीएच्या विभागप्रमुखांनी उत्साहपूर्ण व आदरपूर्वक स्वागत केले.

भेटीदरम्यान शिष्टमंडळाला जेएनपीएच्या बंदर पायाभूत सुविधा, कार्यक्षमता, क्षमता विस्तार उपक्रम, धोरणात्मक विकास प्रकल्प, शाश्वतता उपाययोजना तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक म्हणून विकसित होत असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाची माहितीही देण्यात आली. हा प्रकल्प प्रादेशिक सागरी व्यापार वृद्धीस चालना देणारा आणि देशाच्या सागरी क्षेत्रातील महत्त्वाचा विकास टप्पा मानला जात आहे.

यावेळी महामहिम राष्ट्रपती यांनी जेएनपीएने भारतातील क्रमांक एकचे बंदर म्हणून मिळवलेले स्थान हे त्याच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचे आणि सक्षम सेवा क्षमतेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. त्यांनी आपल्या देशातही बंदर विकास उपक्रमांना गती देण्याची इच्छा व्यक्त केली तसेच बंदर क्षेत्राविषयी अधिक माहिती जाणून घेणे, जेएनपीएच्या अनुभवातून शिकणे आणि ज्ञानविनिमय व परस्पर सहकार्याच्या संधींचा आढावा घेणे याबाबत शिष्टमंडळाची विशेष उत्सुकता असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, भा. प्र. से. म्हणाले, “म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम  मिन आंग ह्लाइंग आणि त्यांच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएमध्ये स्वागत करण्याचा आम्हाला सन्मान लाभला. या भेटीमुळे भारताच्या सागरी क्षेत्रातील क्षमता, जेएनपीएची उत्कृष्ट कार्यक्षमता तसेच वाढवण बंदर प्रकल्पासह भविष्योन्मुख विकास उपक्रम सादर करण्याची एक उत्तम संधी मिळाली. भारत आणि म्यानमार यांच्यातील सागरी व व्यापारविषयक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी तसेच प्रादेशिक संपर्क, आर्थिक विकास आणि परस्पर प्रगतीस चालना देणाऱ्या नव्या सहकार्याच्या शक्यतांचा वेध घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

यावेळी शिष्टमंडळाने बंदर परिसराला भेट देऊन बंदराची कार्यक्षम कामकाज पद्धती, माल हाताळणी प्रक्रिया तसेच एकात्मिक लॉजिस्टिक्स परिसंस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीद्वारे जेएनपीएच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यामधील त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली.
व्यापार, संपर्कक्षमता आणि शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी व्यापक इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सहकार्य आणि प्रादेशिक भागीदारीची भूमिका अधिक बळकट होत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.

उरणच्या ८ खेळाडूंची गरुडझेप ; महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड !

उरणच्या ८ खेळाडूंची गरुडझेप ; महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड !

** राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे प्रतिनिधित्व

उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : औद्योगिक आणि किनारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्याच्या क्रीडा इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे. उरणमधील तब्बल आठ खेळाडूंनी महाराष्ट्र आईस हॉकी संघात स्थान मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून, ते उत्तराखंडमधील देहरादून येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
आईस हॉकीसारख्या प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या आणि विशेष कौशल्याची गरज असणाऱ्या खेळात उरणसारख्या किनारपट्टीच्या भागातून खेळाडू तयार होणे ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब मानली जात आहे. 

१२ वर्षांखालील गट: वरदा आसरकर, शिवांश तांडेल १५ वर्षांखालील गट: अर्थ सावंत, रुद्र घरत, रेवा पाटील. १८ वर्षांखालील गट: सुरज करण.सीनियर गर्ल्स गट: स्नेहा शेळके, शर्वणी या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

या खेळाडूंच्या यशामागे 'श्री स्केटिंग अकॅडमी'चे संस्थापक व प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी घेतलेले अपार परिश्रम, सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन आणि खेळाडूंमध्ये निर्माण केलेली जिद्द यामुळेच उरणच्या खेळाडूंनी ही गरुडझेप घेतली आहे. बर्फावर खेळल्या जाणाऱ्या या अत्यंत वेगवान आणि रोमांचक खेळात शारीरिक तंदुरुस्ती, विवेक संतुलन आणि चपळ निर्णयक्षमतेची गरज असते. महाराष्ट्रात स्केटिंगच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार वेगाने वाढत आहे.
या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे  प्रतिनिधी प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करावी आणि उरणच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरावा अशी अपेक्षा आणि विश्वस्ताने क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे .सद्यस्थितीत सर्व खेळाडूंवर सर्वच क्षेत्रातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

आ. रोहित पवार यांनी दिली करंजा बंदराला भेट ; मच्छिमार बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या !

आ. रोहित पवार यांनी दिली करंजा बंदराला भेट ; मच्छिमार बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या ! ** समस्या सोडविण्याचे रोहित पवार यांचे आश्वासन. ...