Friday, 17 April 2026

गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न

गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न !

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे)

प्रजापिता ब्रह्माकुमारीज माऊंट आबू तर्फे तसेच समाज सेवा प्रभाग (RERF) यांच्या सहकार्याने पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे ‘संगम – गौरवपूर्ण वृद्धावस्था एवं सन्मानित जीवन’ हा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक सभेच्या उपाध्यक्ष श्रीमती माधुरी गोसावी, सचिव सुनील खेडेकर तसेच पनवेल ब्रह्माकुमारीजच्या मुख्य संचालिका राजयोगिनी बीके तारा दीदी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बीके डॉ. सचिन परब उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. सचिन परब यांचे ज्येष्ठ नागरिक सभेतर्फे व पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. सचिन परब यांनी ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत मोलाचे विचार दिले. “उबुन्टु” या संकल्पनेद्वारे “आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहणे आवश्यक आहे” हा संदेश त्यांनी प्रभावीपणे मांडला. आजच्या काळात अनेक वृद्धांना वृद्धाश्रमात राहावे लागते याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत, एकटेपणा टाळण्यासाठी एकमेकांशी संवाद साधा, भावना व्यक्त करा आणि मन मोकळे ठेवा, असे आवाहन केले.

ज्येष्ठ नागरिक सभेचे १००० हून अधिक सभासद असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन करत, त्यामुळे एकटेपणाची भावना कमी होण्यास मदत होईल असे नमूद केले. तसेच या वयात भावनिक गुंतवणूक कमी ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला, कारण त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख कमी होते.

मनात काहीही दडवून न ठेवता व्यक्त होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी “मनात गाठी तयार करू नका” हा संदेश दिला. यावेळी त्यांनी उपस्थितांना हात उंच करून मूठ घट्ट बंद करून नंतर हळूहळू सैल सोडण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले आणि मूठ सैल सोडल्यावर कसे हलके वाटते हे त्यांनी समजावून सांगितले.

विज्ञानानेही हे मान्य केले आहे की मनातील ताणतणावाचा शरीरावर परिणाम होतो, असे सांगत त्यांनी हृदयविकार आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचावासाठी सकारात्मक विचार आणि मोकळेपण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच वाढत्या वयात खळखळून हसणे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. वयोमानानुसार स्मरणशक्ती घटण्याच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी नियमित राजयोग मेडिटेशन करण्याचा सल्ला दिला.

मृत्यूबद्दलचे भय कमी करण्यासाठी त्यांनी आत्म्याबद्दल मार्गदर्शन करत “आपण शरीर नसून आत्मा आहोत” हा आध्यात्मिक दृष्टिकोन स्पष्ट केला. आत्मा अमर असून एक शरीर सोडून दुसरे धारण करतो, हा आत्म्याचा प्रवास आहे, असे त्यांनी सांगितले. ध्यान (Meditation) करून घेतल्यानंतर उपस्थितांनी शांत, हलके आणि आनंदी वाटल्याची भावना व्यक्त केली.

यानंतर राजयोगिनी बीके तारा दीदी यांनी एकटेपणा दूर करण्यासाठी परमपिता परमात्म्याशी नाते जोडण्याचे महत्त्व सांगितले. त्याच्याशी विविध नात्यांनी जोडल्यास जीवनात खरे सुख, शांती आणि आनंद मिळतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच राजयोग मेडिटेशन कोर्स करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजयोगिनी बीके शकुंतला दीदी यांनी सुरेखरीत्या केले. शेवटी उपाध्यक्ष माधुरी गोसावी व सचिव सुनील खेडेकर यांनी प्रमुख पाहुणे व आयोजकांचे आभार मानले.

पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे सर्व ज्येष्ठ नागरिकांचा टिळा लावून सन्मान करण्यात आला तसेच ‘ब्लेसिंग कार्ड’ देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना चहा व बिस्किटे देण्यात आली.

हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ सन्मानाचा नव्हे, तर मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करणारा ठरला. उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण करून आनंदी, निरोगी आणि सन्मानित जीवन जगण्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला

Thursday, 16 April 2026

न्यायहक्काच्या कामगार धोरणासाठी भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा !!

न्यायहक्काच्या कामगार धोरणासाठी भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा !!

** कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करण्याची मागणी.

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) :
वीज, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला, युवा उद्योग अशा विविध धोरणाप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमिक कामगारांचे देखील धोरण तयार करून, कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त सेवेसाठी हरियाणा पॅटर्न लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने आपल्या विविध उद्योगातील कामगारांचा आज मुंबईतील वांद्रे स्थित कामगार आयुक्त कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता, या भव्यदिव्य अशा मोर्चामध्ये घरेलू, बांधकाम, वीज, अंगणवाडी, आशा वर्कर, रिक्षा टॅक्सी चालक, फेरीवाले, विडी कामगार, जलसेवा, गरपालिका, सहकारी बँका, राष्ट्रीय बैंक, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, संरक्षण, माथाडी, एसटी महामंडळ, रुग्णालय, टोल आदी आस्थापनातून सुमारे १०,००० कामगार सहभागी झाले होते, कामगार संघटनांच्या या मागण्यांबर तातडीने विचार करू आणि सर्व उद्योगाशी संबंधित मंत्र्यांच्या बैठका मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन कामगारांचे हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन कामगारमंत्री  आकाश फुंडकर यांनी दिले शिष्ट मंडळाला दिले.

मागील अनेक वर्षांपासून राज्यातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या न्यायहक्कांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, ईएसआय रुग्णालय सेवा, विमा संरक्षण, बोनस आणि उपदान असे अनेक प्रश्न कायम प्रलंबित असून कामगाराची विविध आस्थापनातील मालकांकडून कायम पिळवणूक झालेली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच कामगार आयुक्तालयावर या आक्रोश मोर्चाचे आयोजण केले गेले होते. या मोर्चाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री  सुरेंद्र पांडे, प्रदेश अध्यक्ष ऍड.अनिल ढुमणे आणि सरचिटणीस किरण मिलगीर, क्षेत्र संघटक सी व्ही राजेश, बाळासाहेब भुजबळ, हरी चव्हाण यांनी केले.

याप्रसंगी परेलू अशा विविध कामगार संघटनांच्या  सुरेंद्र पांडे, ऍड अनिल ढुमणे, किरण मिलगीर, सी व्ही राजेश बाळासाहेब भुजबळ, अरुण पिवळ, संदीप कदम, हरी चव्हाण, बाळासाहेब कांबळे, अनिता चव्हाण, ज्योती तावरे, निलेश खरात, सचिन मेंगाळे, अनिल पारधी, सागर पवार, संजन वाडकर, राजेश सिंघ, संजय कांबळे आदींच्या शिष्ट मंडळाने कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांची ३२ निवेदन देण्यात आली. या प्रसंगी कामगार आयुक्त हनुमंत तुम्मोड आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या मागण्यांमध्ये महाराष्ट्रात कामगारांचे धोरण तयार करावे, कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करावा, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य रुग्णालय सुरु करावे, बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, आशा आणि अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, राज्यातील ईपीएस ९५ पेन्शन धारकांना राज्य सरकाने दरमहा ३००० रुपये द्यावेत, घरेलू मंडळाच्या योजना सुरु कराव्यात, फेरीवाल्यांचे व्यवसाय पुन्हा सुरु करू द्यावे, बँकांना ५ दिवसाचा आठवडा करावा आदी मागण्याचा समावेश होता.

या मोर्चाला संबोधित करताना महामंत्री  सुरेंद्रजी पांडे यांनी राज्य सरकारने कामगारांच्या प्रश्नावर संवेदनशील राहणे आवश्यक असून अनेक राज्यात सरकारच्या असंवेदनशीलतेमुळेच कामगारांचा असंतोष उफाळून आला आहे, तशी स्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये याची सरकारने काळजी घेऊन लेबर कोड कायद्याचा प्रत्यक्ष लाभ कामगारांना मिळण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. तर मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष ऍड अनिल ढुमणे यांनी राज्यातील कामगारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही सरकार कायम दुर्लक्ष करत असल्याने या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे, म्हणूनच सरकारने वेळीच लक्ष घालून कामगारांवरील अन्याय दूर करावा असे आवाहन केले. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. या प्रसंगी विविध संघटनाच्या ३८ प्रतिनिधींची भाषणे झाली

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !!

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !!

श्री प्रवीण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलनाचे वतीने श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चे वतीने चांदवड नाशिक येथे प्रवीण काकडे संस्थापक अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवीण काकडे हे शैक्षणिक चळवळीला महत्त्व देण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आता पर्यंत ५००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप डोंगर द-या खोऱ्यातील जंगलातील दुर्गम भागातील महिलांना साडी वाटप, सॅनिटरी पॅड वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा  आहे. महाराष्ट्रातील काही दुर्गम भागातील विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील दुर्गम भागात सक्रिय काम केले आहे. आपली नोकरी करत करत काम करत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रि शताब्दी जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करुन महिलांचा यथोचित सन्मान केला त्यामध्ये कराडला १४५ पुणे ९० मुंबई मध्ये १४२ व एकाच वेळी २४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक चळवळीला महत्त्व देण्यासाठी कराड येथे शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मा श्रीमंत अमरजीत राजे जाहीगरदार तळोदा संस्थान नंदुरबार अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ चे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर खासदार रामराव वडकुते आमदार गोपीचंद पडळकर आमदार राहुल आहेर डॉ अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन श्री सदगुरु सहकारी साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर ‌, श्री विजयराव हाके, डॉ नरेंद्र बागुल, प्राचार्य मधुकर सलगरे लातूर,  श्री दिपक राहीज युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संपतराव शेंडगे, प्रा शितल काकडे, हेडाम कादंबरी चे नागु वीरकर, शेखर कुंवर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष  बन्सीलाल भागवत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष फादर बॉडी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रा बाळासाहेब माने येवला, भास्करराव जाधव, राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रा गणेश हजारे, बापुसाहेब शिंदे शिवाजीराव ढेपले, संभाजी राव सुळ, सचिन सागोरे, जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

भिमप्रेरणा सामाजिक संस्था यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पाणी व लाडू वाटप कार्यक्रम संपन्न !!

भिमप्रेरणा सामाजिक संस्था यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पाणी व लाडू वाटप कार्यक्रम संपन्न !!

घाटकोपर, (केतन भोज) : भिमप्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विक्रोळी पार्कसाईट याठिकाणी पाणी व लाडू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक योगेश शिंदे यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमाला एसीपी प्राची विनायक कर्णे तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करत पुढे देखील तुम्ही असे चांगले उपक्रम राबवत राहा असे संस्थेचे पाधिकारी यांना मार्गदर्शन करत,संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
        यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुगत साळवे,महादेव ढीवरे,प्रमोद कांबळे, रोहित सावंत, महेंद्र दानाने, सुभाष कांबळे, सिद्धेश घोरपडे, सुनिल कांबळे, सुनिल मोहिते, तेजस दळवी, सुमित गमरे आदि संस्थेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 15 April 2026

AIMIM च्या नगरसेविका समर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात !!

AIMIM च्या नगरसेविका समर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात !!

ठाणे महापालिका निवडणुकीत ‘कैसा हराया’ म्हणत चर्चेत आलेल्या एआयएमआयएम (AIMIM) च्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा अहवाल ठाणे तहसीलदारांनी दिला आहे.

ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालात सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे समोर आले असून, या निष्कर्षामुळे त्यांचे नगरसेविका पद धोक्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

या प्रकरणाची सुरुवात अहमद सिद्दीकी यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली होती. सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर त्यांनी आक्षेप घेतला होता. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली आणि तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालात या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याची नोंद आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यातील रहिवासी असताना महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेतल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पुढील तपासानंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सहर शेख या अपात्र ठरून त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता आहे.

Tuesday, 14 April 2026

उरण तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती उत्साहात साजरी !

उरण तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती उत्साहात साजरी !

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यंदा सालाबाद प्रमाणे १४ एप्रिल २०२६ रोजी उरण मध्ये उत्साहात साजरी झाली आहे.  राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा, सिद्धार्थ नगर, संघर्ष नगर मांगीरदेव येथे अध्यक्ष संजय गायकवाड, उरणचे नगराध्यक्ष भावना घाणेकर, सहायक पोलिस आयुक्त किशोर गायके, उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक हणीफ मुलाणी, बौद्धजन पंचायत समिति अध्यक्ष प्रकाश कांबळे, संतोष शेठ भोईर, अमृत शेठ म्हात्रे, पुष्कर पाटील, भूपेन शेठ घरत, राजू शेठ पंडित, कुंदन म्हात्रे, इत्याक शेख, अमित खारकर, सतीश तायडे, आरपीआयचे सुरेंद्रकुमार शिंदे, खालीक शेख, परशुराम शिवशरण, सुनील कोल्हे, शिलेश मुलके, लक्ष्मण वाल्मिकी, दिनेश गायकवाड, हरेश भोईर, सुरेश ढवळे, वैभव कडू, अनिकेत ससे, देवेंद्र घरत, राष्ट्रवादी संतोष घरत, चिंतामण गायकवाड, विजय पवार, नंदकुमार पाटील, धनेश भोंरे मनसे, कॉ. नयन म्हात्रे, प्रयद्यापाक एल बी पाटील, नगरसेवक मंगेश कासारे, विक्रम म्हात्रे, वंदना पवार, अमित म्हात्रे, अतुल ठाकूर, प्रमिला पवार,  तनिशा पाटील, पार्थना म्हात्रे, बौद्धाचार्य महेंद्र साळवी, उरण तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष घनःश्याम कडू , दि उरण तालुका बार असोशिएशन चे अध्यक्ष ॲड विजय पाटील, ज्येष्ठ अधिवक्ता आणि माजी अध्यक्ष ॲड पराग म्हात्रे, ॲड संघश्री गायकवाड, ॲड स्वाती कांबळे, ॲड निकिता कासारे, ॲड श्रीधर कवडे, आदीसह मान्यवर उपस्थित होते. यानंतर मागासवर्गीय समाजासह इतर समाजातील नागरिकांसह अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मिरवणूक सिद्धार्थनगर बौद्धवाडा मोरा येथून उरण नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे येऊन परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

यावेळी अध्यक्ष संजय गायकवाड, यांच्यासह सिद्धार्थ नगर नागनाथ गजधाने उच्चपा दहिसर, राजरत्न गायकवाड, परशुराम शिवशरण, शबाना शर्वे, बसवराज दहिसर, धुळप्पा बनसोडे, प्रफुल साबळे, वाल्मिकी, सुनील कोल्हे,  लख्खन गायकवाड, चंद्रकांत गजधाने, सुरज गजधाने, रतन साबळे, प्रकाश भोसले, ऍडव्होकेट सुभाष बनसोडे, दिनेश गायकवाड, संतोष मोघे, संघर्ष नगर मांगीर देव  खलील शेख, लाल शेख, लक्ष्मण वाल्मिकी, दीपक साबळे, जयभीम झळकी, महेश कदम, बाबू दुर्गांना, हनुमंता पोतेनैऋ, दीपक बल्लूरंगी, प्रकाश धसाडे, सागर पोतेनेरु, सुभाष बुलंद, प्रशांत भागा, राकेश गायकवाड, रवी आरेकर, प्रकाश गुलद, स्वप्नील साळवे,एन जी एल गेट अध्यक्ष देवेंद्र कोळी, करण कांबळे, अमर कऱ्हाळे, हेमंत मुदर, अरविंद थोरात, खाजुद्दीन शेख, चारफाटा येथील भानुदास झिने, शैलेश मूलके, अशोक मूलके,लहू शिंदे, बौद्धवाडा येथील विशाल कवडे, अनिल कासारे,धनेश कासारे,  मंगेश कासारे, शिवाजी कासारे, सागर मोहिते, सुनील जाधव, कुणाल जाधव, मनोज ओव्हाळ, सुजल तायडे, आकाश कांबळे, विश्वनाथ जाधव, अमर गायकवाड ,आकाश कवडे, अनिकेत गायकवाड, साहिल गायकवाड, अतिश गायकवाड,  महेश गायकवाड, आशिष गायकवाड, करण  गायकवाड, दीक्षित गायकवाड, सुयोग गायकवाड आदींसह  सिद्धार्थनगर मोरा, संघर्षनगर भवरा, मांगीरदेव, बौद्धवाडा, चारफाटा, एनजीएल गेट भीम नगर, सावित्री बाई फुले, नाईक नगर तसेच उरण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जेएनपीएत अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार नेत्यांची बैठक !!

जेएनपीएत अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार नेत्यांची बैठक !!

** बंदर कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी.

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगारांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक जेष्ठ कामगार नेते एस.के. शेट्टे यांच्या अध्यक्षतेखाली जेएनपीएच्या विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने बंदर कामगारांच्या वेतन आणि बोनस,बढती तसेच भविष्य निर्वाह निधीतील वाढ या मागण्यांवर सरकार आणि बंदर प्रशासनाने लवकरात निर्णय घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या बैठकीसाठी देशातील अकरा बंदरातील पाच बंदर कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जेएनपीएचे कामगार नेते व भारतीय मजदूर संघांचे  राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील,विश्वस्त दिनेश पाटील,रवींद्र पाटील,माजी विश्वस्त कॉ. भूषण पाटील,कामगार नेते सुधीर घरत,गणेश घरत आदीजन उपस्थित होते. बंदर विभागाकडून २०२० -२१ ते २०२५-३६  या पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू होणारा बोनस करार मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. यामध्ये उचल वजा करून उर्वरित रक्कम संबंधितांना परत देण्याचेही मान्य करण्यात आले आहे.

   या बैठकीला भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ,ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, इंडिया फोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन, पोर्ट डॉक अँड वॉटर फ्रंट फेडरेशन ऑफ इंडिया यांचे नेते उपस्थित होते. बंदर कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित असून देशातील सहा बंदर कामगार महासंघाच्या वतीने सरकार आणि  बंदर व्यवस्थापनाशी चर्चा करूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही. प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अनेकवर्षापासून कामगारांच्या बढती थांबल्या आहेत. या विरोधात कामगारांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता

गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न

गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न ! उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) प्रजापिता ब्रह्माकुमारीज माऊ...