Monday, 1 June 2026

भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत माती, दगड, व मुरुमाची बेकायदेशीर भरणी, व केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक !!

भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत माती, दगड, व मुरुमाची बेकायदेशीर भरणी, व केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक !!

** तलाठी सूर्यवंशी कारवाई करण्यास करतात टाळाटाळ ; संशयाला ऊत

मौजे कोपर येथील सरकारी खांजण जमीन सर्वे नं ६६/१या खाडी नाल्यात केलेली बेकायदेशीर भरणी मोजताना कोपर गावचे उपसरपंच श्री.संजय पाटील व ग्राम महसूल अधिकारी श्री.रमेश सूर्यवंशी


*भिवंडी, दि. 2 मे 2026, (अरुण पाटील)*

भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत बेकायदेशीर माती, दगड व मुरुमाची भरणी तसेच केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महसूल खात्याला माहिती असूनही कारवाई होत नसल्याने तलाठी रमेश सूर्यवंशी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

*सरकारी जमिनीत बेकायदेशीर भरणी*  
मौजे कोपर येथील सर्वे क्रमांक 66/1 या सरकारी खांजण खाडी नाल्यात बेकायदेशीररीत्या माती, दगड व मुरुमाची भरणी सुरू असल्याची माहिती पत्रकार अरुण पाटील यांनी ग्रामसभेत उपस्थित केली. याबत सरपंच हेमंत घरत यांनी तलाठी रमेश सूर्यवंशी यांना फोनवरून कळवले होते. त्यानुसार 30 मार्च 2026 रोजी तलाठ्यांनी स्थळ पाहणी करून मोजणी केली. यावेळी कोपर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्वे क्रमांक 65/अ या खाडी नाल्यातही बेकायदेशीर भरणी झाल्याचे आढळून आले.

*कारवाईबाबत उदासीनता*  
या दोन्ही ठिकाणी किती ब्रास बेकायदेशीर भरणी झाली आणि त्यामागे भूमाफिया कोण आहेत, याची माहिती असूनही तलाठ्यांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच माहिती मागितली असता ती लपवण्याचा प्रयत्न केल्याने आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामसभेत हा विषय मांडूनही ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी आशिष चव्हाण यांनी त्याचा अहवाल प्रशासनाला कळवला की नाही, याची माहिती मिळू शकली नाही.

*पावसाळ्यात पूराचा धोका*  
नाल्यात केलेली बेकायदेशीर भरणी न काढल्यास पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याला कोपर ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

*केवणी येथे रेतीची चोरटी वाहतूक*  
मौजे केवणी दिवे येथील सर्वे क्रमांक 181/ब या खाडी किनाऱ्यावरून दररोज लाखो ब्रास रेतीची स्वामित्व धन न भरता बेकायदेशीर वाहतूक होत आहे. वाळू माफिया कोण आहेत याची माहिती असूनही तलाठी रमेश सूर्यवंशी कोणतीही कारवाई करत नसल्याने मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यामुळे शासनाचे दररोज लाखो रुपयांचे महसूल बुडत असल्याने तलाठ्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी जाणकारांनी केली आहे.

*प्रतिबंधात्मक आदेश असूनही तस्करी*  
तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी भिवंडी यांनी 15 एप्रिल ते 25 मे 2026 या कालावधीत नदी व खाडी पत्रातून उत्खन वाळू चोरी रोखण्यासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस कर्मचारी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र कारवाईची मुदत संपल्याने केवणी खाडी किनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी कोपर व केवणीचे तलाठी रमेश सूर्यवंशीच जबाबदार असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

*ग्रामस्थांची मागणी*  
वाळू माफियांना या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये मिळत असल्याने ते वरिष्ठ पातळीवर वाटप करतात आणि त्यामुळे पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना घाबरत नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. आतापर्यंत कोणत्या स्थानिक वाळू माफियांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, हे पोलीस व महसूल खात्याने दाखवून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. सध्या गुन्हे दाखल झाले असतील तर ते केवळ बार्ज व सक्शन पंपावर काम करणाऱ्या गरीब कामगारांवरच झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तिसऱ्या मुंबई विरोधात ७ जून रोजी चिरनेर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा !!

तिसऱ्या मुंबई विरोधात ७ जून रोजी चिरनेर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा !!

** जमीन, घरे, गावे, समाज वाचविण्यासाठी तिसऱ्या मुंबई विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन.


उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :
०४ मार्च २०२४ च्या अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील उरण-पनवेल-पेण तालुक्यातील १२४ गावे केएससी नवनगर अर्थात तिसऱ्या मुंबई प्रकल्पात समाविष्ट केली. ही अधिसूचना प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांत प्रचंड चीड, संताप आणि असंतोष निर्माण झाला. कारण सरकारने येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वराज्य संस्था आणि शेतकरी यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही. त्यामुळे १२४ गावांतील सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आपल्या लेखी हरकती सरकारकडे दाखल केल्या.

परंतु शेतकऱ्यांनी एवढ्या प्रचंड संख्येने दाखल केलेल्या हरकतींची दखल न घेताच सरकारने दि. १६ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाद्वारे शेतकऱ्यांच्या जमीनी २२.५% ची फसवी योजना लागू करून संपादन करण्याचा इरादा स्पष्ट केला. शासनाची ही कृती निश्चितच लोकशाही विरोधी आहे.

ही अधिसूचना प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना दि. ०५/०२/२०२५, दि. २३/०२/२०२६, दि. ३०/०३/२०२६ च्या पत्रान्वये शेतकऱ्यांची,जमीन मालकांची म्हणणे ऐकून घेण्यासाठी विनंती केली. परंतु सरकारने आजपर्यंत  शेतकऱ्यांना, जमीन मालकांना कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही.या मुळे स्थानिक भूमीपुत्र असलेल्या शेतकरी, जमीन मालक  यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, आता शेतकरी व जमीन मालक यांना जमीन, घरे, गावे आणि समाज वाचविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नाही.त्यामुळे सर्वांनी एकत्र येत या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेच एक भाग म्हणून तसेच सदर लढा तीव्र करण्यासाठी,या संघर्षाची घोषणा करण्यासाठी रविवार दि. ७ जून २०२६ रोजी संध्या. ४.०० वाजता मा. न्यायमूर्ती  बी. जी. कोळसे-पाटील  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील चिरनेर येथील हुतात्मा स्मारक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी न्यायमूर्ती यांचे विचार ऐकण्यासाठी व या लढ्यात सक्रिय होण्यासाठी स्थानिक भूमीपुत्रांनी, शेतकरी, जमीन मालकांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगड च्या वतीने करण्यात आले आहे.

६ जून रोजी उरण मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन. !

६ जून रोजी उरण मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन. !


** सजग नागरिक म्हणून एकत्र येण्याचे आवाहन.

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे ) : माहिती अधिकार कार्यकर्ता संघ — उरण तालुकाच्या वतीने उरण तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या सदस्यांसाठी तसेच नवीन नोंदणीसाठी फॉर्म भरलेल्या कार्यकर्त्यांसाठी शनिवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठिक ५ वाजता एकदंत अपार्टमेंट उरण शहर येथे विशेष विचारविनिमय बैठक व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर, कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे निराकरण, अर्ज, अपील व तक्रार प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, संघटनात्मक कामकाज व पुढील नियोजन, नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .तरी उरण तालुक्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा व जास्तीत जास्त मोठया संख्येने या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शेळके दत्तात्रय  8369111167, सुनील जोशी 8286442067, विश्वास पटवर्धन 8452085330

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत - - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत -  - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक


रत्नागिरी, प्रतिनिधी : खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

श्री. सरनाईक यांनी ३० मे पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी संगमेश्वर येथील नव्या एसटी बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील अंतर्गत व्यवस्था आणि प्रवासी सुविधांचा थेट आढावा घेतला.

रात्री धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांना अधिकृत स्थानकांवरील उपाहारगृहात थांबवणे बंधनकारक असतानाही काही चालक-वाहक खासगी धाब्यांवर गाड्या थांबवतात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मंत्री सरनाईक यांनी अशा मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य पातळीवरून विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असे सांगितले. खासगी धाबाचालकांशी संधान साधून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

बसस्थानक पाहणी दरम्यान मंत्र्यांनी परिसर, प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष आणि कर्मचारी निवासस्थानांची बारकाईने पाहणी केली. चकाचक व्यवस्था आणि स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. हिरकणी कक्षात २४ तास वीज, पाणी आणि सुरक्षा राखण्याच्या तसेच दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना दिल्या.

उपाहारगृहात जाऊन त्यांनी स्वयंपाकघराची पाहणी केली आणि स्वतः वडापावचा आस्वाद घेतला. व्हीआयपी संस्कृती बाजूला सारत त्यांनी बिलाचे पैसे स्वतः रोखीत दिले.

दरम्यान, संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत मंत्र्यांनी तत्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश एसटी अधिकाऱ्यांना दिले.

अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम; एकाच दिवशी होणार 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित !!

अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम; एकाच दिवशी होणार 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित !!

‘आई’ विषयावर 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह; लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद

12100 कविता, 115 जागतिक विक्रम, 3180 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 150 मानद डॉक्टरेटने साहित्यविश्‍वात निर्माण केली वेगळी ओळख

अहिल्यानगर (प्रतिनिधी) - हिंदी आणि मराठी साहित्य क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करत अहिल्यानगरचे सुपुत्र सीए (डॉ.) प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांनी जागतिक स्तरावर नवा इतिहास घडविला आहे. एकाच दिवशी तब्बल 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर नोंदविला असून, ‘आई’ या विषयावर 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची ऐतिहासिक कामगिरीही त्यांनी केली आहे.
साहित्य, समाजकार्य आणि विक्रमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सीए शंकर अंदानी यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच भारतातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थांनी घेतली असून त्यांच्या कार्याची अधिकृत नोंद होणार आहे.

‘मा की ममता  मा अनेकता की शक्ति’ या नावाने प्रकाशित होत असलेल्या भव्य हिंदी काव्यसंग्रहात संपूर्ण भारतातील 140 कवींनी लिहिलेल्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तब्बल 5121 कवितांचा हा संग्रह जगातील सर्वात मोठा मातृत्वविषयक हिंदी काव्यसंग्रह मानला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य संकलन आणि संपादनाचे कार्य आजवर जगात कुणीही केले नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

याचबरोबर सीए शंकर अंदानी यांनी स्वतः लिहिलेल्या एकूण 12100 कवितांचे विविध पुस्तकांमध्ये प्रकाशन होत असून, हा देखील एक जागतिक विक्रम ठरत आहे. साहित्यविश्‍वात सर्वाधिक कविता प्रकाशित करण्याचा मान देखील त्यांच्या नावावर नोंदविला जात आहे. मराठी साहित्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. ‘वडील  बाबा अबोल जीवनाचे कोडे’ या नावाने महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1161 कवितांचे संकलन असलेला मराठी कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. तसेच ‘बहिण माझी प्रिय ताई’ या नावाने बहिणीवरील 1161 कवितांचा स्वतंत्र संग्रह प्रकाशित केला जात आहे.

या सर्व उपक्रमांमुळे एकाच दिवशी तब्बल पाच जागतिक विक्रम सीए शंकर अंदानी यांच्या नावावर नोंदविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर भव्य प्रकाशन सोहळा 30 मे 2026 रोजी पुणे येथे होणार असून, विविध क्षेत्रातील नामवंत राजकीय नेते, साहित्यिक, लेखक, कवी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

सीए शंकर अंदानी हे केवळ साहित्यिक नसून समाजसेवक म्हणूनही त्यांनी मोठे कार्य केले आहे. अनेक मंदिरे, धर्मशाळा, सामाजिक संस्था, चर्च, मस्जिद तसेच विविध सामाजिक संघटनांचे आर्थिक व करसल्लागार कामकाज त्यांनी अत्यंत अल्प दरात किंवा विनामूल्य केले आहे. 2022 मध्ये त्यांनी 364 मंदिरे, मस्जिद, चर्च आणि सामाजिक संस्थांचे कामकाज केल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली होती. याबाबतची माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था देशभरातील उल्लेखनीय कार्य आणि विक्रमांची काटेकोर तपासणी करूनच नोंद करते. अत्यंत मर्यादित व्यक्तींना या संस्थेकडून अधिकृत मान्यता दिली जाते. त्यामुळे सीए शंकर अंदानी यांच्या कार्याला मिळालेली ही दखल विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

सीए शंकर अंदानी यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. युनायटेड नेशन अमेरिका तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून त्यांना “मेडल ऑफ एक्सलन्स” हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत तब्बल 3180 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नोंद असून, 115 जागतिक विक्रम आणि 150 मानद डॉक्टरेट मिळाल्या आहेत. व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले सीए शंकर अंदानी हे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी येथे मागील 18 वर्षांपासून करसल्लागार म्हणून कार्यरत होते. तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेचे मागील 20 वर्षांपासून करसल्लागार म्हणून ते कार्य करत आहेत. अनेक शासकीय संस्था, बँका आणि पतसंस्थांचे ते लेखापरीक्षक व करसल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, संगमनेरचे आ. सुधीर तांबे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, आमदार संग्राम अरुणकाका जगताप, अहमदनगर सिंधी समाज अध्यक्ष महेश मध्यान यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, सीए शंकर अंदानी यांना “डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2022” ने देखील गौरविण्यात आले आहे. डॉक्टर बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठान, नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला. देशभरातून आणि परदेशातून प्राप्त झालेल्या सुमारे 1000 अर्जांमधून केवळ 40 जणांची निवड करण्यात आली होती. उत्कृष्ट समाजसेवेबद्दल हा पुरस्कार 11 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये पद्मश्री जितेंद्र सिंग शनटी, भाजप राष्ट्रीय सचिव व खासदार दुष्यंत गौतम, दिल्ली पोलिसांचे एसपी तोमर आणि भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल राजीव भल्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. साहित्य, समाजकार्य, विक्रम आणि सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्यरत राहून सीए डॉ. प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांनी अहिल्यानगरचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

वृत्तांकन/प्रसिद्धी - विलासराव कोळेकर सर 

Sunday, 31 May 2026

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

ठाणे, प्रतिनिधी :
जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सत्यमेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य व मासिक पाळी जनजागृती विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवाती चे वातावरण हलके-फुलके आणि संवादात्मक करण्यासाठी "आइस ब्रेकिंग गेम" ने करण्यात आली. "Passing the Sentence" या खेळामध्ये एका महिलेच्या कानात एक वाक्य सांगण्यात आले आणि तेच वाक्य पुढील सहभागीच्या कानात सांगण्यास सांगितले गेले. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना त्या वाक्यात झालेला बदल सर्वांसमोर मांडण्यात आला. या उपक्रमातून माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाताना त्यामध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो, याची जाणीव सहभागी महिलांना करून देण्यात आली,ह्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पवन जोहारे  ह्यांनी ही माहिती दिली.

जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अर्जुन बनसोडे यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ग्रामीण व शहरी वस्त्यांमधील महिला, मुले आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती संस्थेचे सचिव राहुल बनसोडे ह्यांनी सागितले.

कार्यक्रमाच्या मुख्य सत्रामध्ये संस्थेच्या सदस्या अस्मिता कहाळे यांनी महिलांशी संवाद साधत मासिक पाळीविषयी चर्चा सुरू केली. त्यांनी उपस्थित महिलांना आणि मुलींना त्यांच्या मासिक पाळीची पहिली तारीख, तसेच पाळीबाबतची पहिली माहिती त्यांना कोणी दिली, असे प्रश्न विचारून विषयाची सुरुवात केली. या संवादातून महिलांच्या अनुभवांना वाव मिळाला आणि अनेकांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडले.यानंतर त्यांनी मासिक पाळीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मासिक पाळीची सुरुवात कशी होते, मासिक पाळीचे चक्र कसे असते, पाळी किती दिवस येणे सामान्य मानले जाते, तसेच सॅनिटरी पॅडचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच मासिक पाळी ही कोणतीही लाजिरवाणी किंवा वाईट गोष्ट नसून ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि आवश्यक शारीरिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महिलांनी आणि मुलींनी या विषयाबाबत खुलेपणाने बोलणे आणि योग्य माहिती मिळवणे अत्यंत गरजेचे असल्याचा संदेशही देण्यात आला, महिलांच्या आरोग्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्तन कर्करोग (Breast Cancer) यावरही मार्गदर्शन करण्यात आले. स्तन कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात, त्याची वेळेत ओळख का महत्त्वाची आहे, तसेच महिलांनी स्वतः घरच्या घरी स्तनांची तपासणी कशा प्रकारे करावी याबाबत माहिती देण्यात आली. नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार केल्यास स्तन कर्करोगावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते, याबाबत उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली,अशी माहिती अस्मिता कहाले यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी शंकांचे निरसन करून घेतले. महिलांच्या आरोग्याबाबत योग्य माहिती, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा प्रकारचे उपक्रम समाजात आरोग्यविषयक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत संस्थेची सदस्य श्वेता पाटील ह्यांनी व्यक्त केले. अशी माहिती सत्यमेव जयते फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय भोसले यांनी दिली.

फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान; शासकीय योजनांचा लाभ घेऊन नवे उद्योग उभारा - महाराष्ट्र वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे

फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान; शासकीय योजनांचा लाभ घेऊन नवे उद्योग उभारा - महाराष्ट्र  वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे

“जागतिक संधींसाठी सक्षम आणि उद्योजकतेकडे वाटचाल करणारे विद्यार्थी तयार करणे हेच आमचे ध्येय” – संचालिका संगीता पाटील

जळगाव, दि. 30 मे 2026 (राहुल बैसाणे) :
एन. आय. एफ. ग्लोबल - संगीता अकॅडेमी, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” हा भव्य पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, महापौर दीपमाळा काळे व संचालिका संगीता पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वस्त्रोद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे महत्त्व व राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी उद्योग उभारावेत व रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले, तसेच बोलताना सावकारे यांनी जळगावसारख्या शहरात एन. आय. एफ. ग्लोबलसारखी संस्था कार्यरत असून येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. गेल्या 21 वर्षांत संस्थेने 15 हजारांहून अधिक विद्यार्थी घडविले असून, त्यापैकी अनेकांनी फॅशन आणि डिझाईन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लॅक्मे फॅशन वीक, लंडन फॅशन वीक, न्यूयॉर्क फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीक यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्यासपीठांवर जळगावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवून शहराचे नाव देश-विदेशात पोहोचविले असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी फॅशन आणि डिझाईन क्षेत्रात करिअरच्या वाढत्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी एन. आय. एफ. ग्लोबल- संगीता अकॅडेमीच्या कार्याचे तसेच संस्थेचे शिक्षकवृंद व संचालिका संगीता पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे असून त्यांना मोठी प्रेरणा देतात, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी अकॅडेमीच्या 21 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर उद्योगक्षेत्राशी जोडणारे व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इंटिरियर डिझाईन मधून मुकेश तोष्णीवाल, योगिता शर्मा, रितेश तुलसाणी, चार्मी नथाणी, विराज पटेल, पार्थ पटेल, अक्षता बखतवाणी, फिल्झा शेख, मयूर जाधव,सप्रसाद अकोले, जयेश जैन, पूजा बोरसे, अंजली जोशी, रुपेश पाटील, प्रफुल चौधरी, रितू मकडीया, कोमल ओझा, खुशी डहाळे, मयूर हिंगे, आचल बयास, झैन पटेल, शुभांगी वानखेडे, शारिक हुसेन, विवेक दांडगे, मानस जैन, चचंल साहित्या, तन्मय बेलोकार, खुशबू पाटील, चैताली चौधरी, रिया चोथवे, निशांत चवराई, विवेक सपाटे, शुभम गोरे, विशाल मधयानी, आयुष पटेल, विवेक सोनार, प्रज्वल अग्रवाल, रोहित साहनी, कार्तिक पटेल, पूजा पाटील, कार्तिक जैन, हर्षल सिखवाल आणि फॅशन डिझाईन मधून स्नेहा मोरे, मयुरी बोहरे, शेजल गोपालदास, मानसी मलिचकर, रुणाली पाटील, तानिया कुकरेजा, भुवनेश्वरी करंकाल, दिव्यानी देशमुख, कोयल कोळी, स्नेहल ब्राह्मणकर, अरुण अर्जुन भिल, केसर जोशी, नेहा देसले, भाग्यश्री ठाकूर, अनम अन्सारी या गुणवंत विद्यार्थ्यांना “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना प्रेरित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानसी जैन व तेजस्विनी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सेदुलक्ष्मी मलबारी यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला असून, जळगावच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या यशाचा अभिमान व्यक्त करण्याचा हा संस्मरणीय क्षण ठरला.

भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत माती, दगड, व मुरुमाची बेकायदेशीर भरणी, व केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक !!

भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत माती, दगड, व मुरुमाची बेकायदेशीर भरणी, व केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाह...