Friday, 10 April 2026

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!

युद्ध सुरु असतानासुद्धा भारताची रणनीती ठरली यशस्वी.

उरणच्या जेएनपीए मध्ये ग्रीन आशा जहाजचे स्वागत.

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) :
पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर, 'ग्रीन आशा' हे एलपीजी वाहून नेणारे भारतीय जहाज यशस्वीरित्या भारत देशात दाखल झाले आहे. सुमारे १५ हजार टन एलपीजी घेऊन आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली सुरक्षित मार्गक्रमण मुंबईलगतच्या उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरात सुरक्षितपणे पोहोचले. 

गेल्या सुमारे ४० दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्धस्थितीत या जहाजाचे सुरक्षित आगमन हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 'ग्रीन आशा'ने इराणमधील लारक, केशम आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संवेदनशील सागरी मार्ग यशस्वीरित्या पार केला. होर्मुझचा तणावपूर्ण मार्ग जहाजाने कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केला आहे.भारतच्या रणनीती मुळे इंधन व कर्मचारी सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहेत.

जेएनपीए बंदरातील बीपीसीएलच्या लिक्विड जेट्टीवर हे जहाज उभे करण्यात असून हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आखातात व्रातात युद्धाला सुरुवात झाल्यापासून जेएनपीए बंदरात पोहोचलेले एलपीजी वाहून आणणारे हे पहिलेच जहाज आहे.

'ग्रीन आशा' जहाजाच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने सतत निरीक्षण ठेवले होते. नौदलाच्या मार्गदर्शनाखाली हे जहाज सुरक्षित भारतात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे सुरक्षित पोहोचलेले हे नववे भारतीय जहाज असल्याची माहिती देण्यात आली. 'ग्रीन आशा'चे सुरक्षित आगमन हे केवळ एक यशस्वी सागरी ऑपरेशन नाही, तर भारताच्या ऊर्जासुरक्षेचा मजबूत आधार असल्याचे सांगण्यात आले.या जहाजचे जेएनपीए मध्ये मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले

कोप्रोली आरोग्य केंद्रात रिक्त पदामुळे रुग्णांची हेळसांड !!

कोप्रोली आरोग्य केंद्रात रिक्त पदामुळे रुग्णांची हेळसांड !!

** दोन डॉक्टर, २३ आरोग्य सेविकांची पदे रिक्त ; कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र 'सलाईन'वर

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील आरोग्य विभागाची अतिशय दुर्दशा झाली आहे. अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यां अनास्थे मुळे उरण मधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर आहे.आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर गेले आहे. कोप्रोली केंद्रात  डॉक्टर आणि आरोग्य सेविका व इतर कर्मचारी अशी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उरण ग्रामीण भागातील हजारो गर्भवती महिला, नवजात बालकांची तपासणी आणि इतर कामांचा भार अवघ्या तीन आरोग्य सेविकांवर आहे.

उरण तालुक्यातील दोन लाख लोकसंख्येसाठी येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. उरणच्या पूर्व भागातील सुमारे एक लाख गोरगरीब नागरिक उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. मात्र मागील आठवड्यात उद्भवलेली पाणदिव्यातील डेंग्यूची साथ आटोक्यात आल्यानंतर आता कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक उणिवा समोर आल्या आहेत.

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी ३, महिला आरोग्य परिचारिका २, आरोग्य सेविका २६, शिपाई २ आदी ३३ पदे मंजूर आहेत. यामध्ये आवश्यकता असलेल्या तीन सुरक्षारक्षकांचा समावेश नाही. मात्र यापैकी वैद्यकीय अधिकारी २, महिला आरोग्य परिचारिका १, आरोग्य सेविका २३, शिपाई २ अशी एकूण २७ पदे रिक्त आहेत.

रुग्ण तपासणीचा भार केवळ तीन आरोग्य सेविकांवर असल्यामुळे येथील आरोग्य सेवेचा परिणाम रुग्णावर होत आहे.रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे.रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. 


कोट (चौकट):-
शासना कडे रिक्त पदा बाबत यापूर्वी ही पाठपुरावा करण्यात आला आहे.मात्र कर्मचारी यांची भरती होत नाही.कोप्रोली आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी दरमहा होणाऱ्या प्रत्येक बैठकीत मागणी केली जाते.

   - डॉ वंदन कुमार पाटील,उरण  तालुका आरोग्य अधिकारी

उरणमधील प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर कचरा डंपिंग !!

उरणमधील प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर कचरा डंपिंग !!

 ** नगरसेविका प्रमिला पवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) :
 उरण नगरपरिषद हद्दीतील श्री.हरिश्चंद्र गावंड उद्यानामागील प्रतिबंधित डंपिंग ग्राउंडच्या जागेवर बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात असल्याची गंभीर बाब नगरसेविका प्रमिला संतोष पवार यांनी उघडकीस आणली आहे. 

प्रमिला पवार यांनी मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर डंपिंग ग्राउंड मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनामुळे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. असे असतानाही काही अज्ञात व्यक्तींकडून खाजगी जागेवर बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात आहे. हा कचरा NAD (नेवल आर्मामेंट डेपो) मधून कचरा भरलेली गाड्यांद्वारे आणून टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

हा प्रकार केवळ पर्यावरणाचे नुकसान करणारा नसून  उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा आहे, असे प्रमिला पवार यांनी नमूद केले.या प्रकरणी तातडीने खातरजमा करून कठोर कारवाई करण्याची मागणी  प्रमिला पवार यांनी केली आहे. सदर पत्राच्या प्रती नगराध्यक्ष, उरण नगरपरिषद व पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.


नगरसेविका प्रमिला पवार यांच्या प्रमुख मागण्या:- 

१)  सदर जागेची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून खाजगी जागेवर विना परवानगी बेकायदेशीर कचरा टाकणे त्वरित थांबवावे.
२)या बेकायदेशीर कृत्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ एफ.आय.आर. (FIR) दाखल करावा.
३)  जर हा कचरा एन ए डी मधून येत असेल, तर त्यांनाही या कायदेशीर उल्लंघनाबाबत लेखी कळवावे आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल द्यावा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी !!

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी !!

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात एम.कॉम. च्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी हृषीकेश संजय मेहेर याने शरीरसौष्ठव क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

२०२४ पासून ‘मिस्टर ऑलिम्पिया’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या शैक्षणिक वर्षात त्याने विविध स्पर्धांमध्ये दमदार कामगिरीची नोंद केली. मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेत ‘बेस्ट फिजिक मेन्स’ (८० किलो गट) मध्ये रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा १३ फेब्रुवारी २०२६ रोजी डोंबिवली (पूर्व) येथील प्रगती महाविद्यालयात पार पडली.

तसेच, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मालाड (पूर्व) येथे झालेल्या ‘मुंबई श्री’ ज्युनिअर बॉडीबिल्डिंग स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळवला. पुढे पिंपरी-चिंचवड, पुणे येथे २८ ते ३० मार्चदरम्यान पार पडलेल्या ६३व्या आयबीबीएफ ज्युनिअर नॅशनल, मास्टर व फिजिक चॅलेंज स्पर्धेत त्याने ‘मेन्स क्लासिक (१८० से.मी. वरील उंची)’ आणि ‘मेन्स फिजिक (१८० से.मी. वरील उंची)’ या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ८० किलो गटात एकूण तृतीय क्रमांक मिळवून चमकदार कामगिरी केली.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष हसमुखभाई शहा यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ अरविंद उबाळे यांच्या हस्ते महाविद्यालयातर्फे त्याचा सत्कार  व अभिनंदन करण्यात आले.

कोपरखैरणे, नवीमुंबई येथे नागरी संरक्षण दलाची भव्य हवाई हल्ला व ब्लॅकआऊट मॉकड्रील यशस्वी !!

कोपरखैरणे, नवीमुंबई येथे नागरी संरक्षण दलाची भव्य हवाई हल्ला व ब्लॅकआऊट मॉकड्रील यशस्वी !!

** उपशीर्षक : ४ हजारांहून अधिक नागरिक, विद्यार्थी आणि विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग 

नवी मुंबई, दि. ९ एप्रिल २०२६ : मा. महासंचालक, नवी दिल्ली तसेच नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयामार्फत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वाखाली गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सायं. ४.०० वाजता माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदान, बोनकोडे गांव, सेक्टर-११, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे हवाई हल्ला आणि ब्लॅकआऊट मॉकड्रीलचे भव्य आयोजन करण्यात आले.

      या मॉकड्रीलला मा. आमदार संजय केळकर, मुख्य क्षेत्ररक्षक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे तसेच स्थानिक नगरसेविका श्रीमती भारती पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नागरी संरक्षण दलाने हवाई हल्ला प्रतिसाद, प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन, हायराईज रेस्क्यू यांसारख्या विविध आपत्कालीन प्रात्यक्षिकांचे प्रभावी सादरीकरण केले. यासोबतच ब्लॅकआऊटचीही यशस्वी कवायत घेण्यात आली.

      सदर उपक्रमात नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी १५४, होमगार्ड जवान ५०, नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी वाहनासह-११, आरोग्य विभाग ४, विविध अग्निशमन केंद्रांचे कर्मचारी-वाहनांसह, पोलीस BDS पथक, TDRF टीम-वाहनासह, कल्याण-डोंबिवली मनपाचे कर्मचारी-वाहनासह व उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी, तसेच पी. एम. श्री स्कूलचे १८३५ विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय सुमारे २५०० स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

     सदर कार्यक्रमास मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण, तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.          
     मॉकड्रीलच्या यशस्वी आयोजनात चारही उपमुख्य क्षेत्ररक्षक, १५ हून अधिक विभागीय क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या उपविभागीय क्षेत्ररक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

     प्रात्यक्षिकानंतर मा. श्री.संजय केळकर, मुख्य क्षेञरक्षक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत नागरी संरक्षण दलाच्या सर्व पथकांचे कौतुक केले. “आपत्ती व्यवस्थापनात अशा प्रकारच्या मॉकड्रीलमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होते आणि प्रत्यक्ष संकटसमयी सज्जता वाढते,” असे त्यांनी सांगितले. सर्व सहभागी पथकांचे आभार मानून त्यांनी मॉकड्रीलच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

     कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली, तद्नंतर ९ मिनिटाचे पथनाट्य मातृबेन काशिबाई पटेल महाविद्यालयाच्या नागरी संरक्षण स्वयंसेवकांनी सादर केले. ज्यामध्ये समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी केंव्हा? कधी? कुठे? कसे? व कां? नागरी सरक्षण दलाच्या विविध पाठ्यक्रमांचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे हा अर्थबोध होतो. तर समारोप वंदे मातरमने करण्यात आला. 

     त्यानंतर सायं. ७.०० वाजता तुलशी दर्शन सोसायटी A-B विंग व परिसरात ब्लॅकआऊटचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष ब्लॅकआऊटची (प्रकाशबंदी) अंमलबजावणी करण्यात आली.

  नवीमुंबई मनपा आपत्ती व्यस्थापन विभागांनी सहभागी जवानांकरिता मुबलक प्रमाणात पाणी व अल्पोपहारासह सर्व व्यवस्था केली होती.

     या यशस्वी मॉकड्रीलमुळे नागरिकांमध्ये आपत्कालीन परिस्थितीतील सज्जता, समन्वय आणि नागरी संरक्षणाबाबत जागरूकता अधिक दृढ झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

— DCCD, NMC, Thane 

सौजन्य- विश्वनाथ राऊत सर

कल्याण येथे नागरी संरक्षण दलाचा हवाई हल्ला प्रात्यक्षिक सराव उत्साहात संपन्न !!

कल्याण येथे नागरी संरक्षण दलाचा हवाई हल्ला प्रात्यक्षिक सराव उत्साहात संपन्न !!

दैनिक बातमीदार, कल्याण प्रतिनिधी : ता. १०, मा. श्री. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सुभाष मैदान, कल्याण (प.) येथे दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हवाई हल्ला प्रात्यक्षिक सराव उत्साहात पार पडला. 

या सरावावेळी सेवा ज्येष्ठ सहाय्यक उपनियंत्रक श्रीम. दीपा घरत, सहाय्यक उपनियंत्रक श्री.आननसिंग गढरी, तसेच उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र-१ श्री. बिमल नथवाणी, क्षेत्र-२ श्री. रमेश गोरे आणि क्षेत्र-३ चे श्री. कमलेश श्रीवास्तव उपस्थित होते. 

सरावाच्या पहिल्या दिवशी विभागीय क्षेत्ररक्षक श्री. हनुमंत चौधरी यांनी ग्राउंड डेमोची प्रभावी तयारी करून घेतली. तसेच उपमुख्य क्षेत्ररक्षक श्री. बिमल नथवाणी यांनी विभागीय क्षेत्ररक्षक व उपविभागीय क्षेत्ररक्षकांकडून रिपोर्टिंग कशा पद्धतीने करावी याचा विशेष सराव करून घेतला. उपस्थित स्वयंसेवकांनी सांगितले की, “रिपोर्टिंगचा असा पद्धतशीर सराव यापूर्वी कधीच झाला नव्हता. आजच्या प्रशिक्षणातून आम्हाला नवीन ज्ञान मिळाले आणि त्याचे समाधान वाटले.” 

या पहिल्या दिवसाच्या सरावात विभागीय क्षेत्ररक्षक हनुमंत चौधरी, भारती देशमुख, मनीष धुरी, लक्ष्मीकांत पोपळे, तसेच उपविभागीय क्षेत्ररक्षक नितीन कापसे, अनिल शेलार, संदीप मसकर, जयेश अहीरे, परेश पाठारे, मनोज झिमरे आणि स्वयंसेवक असे एकूण ३१ जण सहभागी झाले होते. 

दि. ८ एप्रिल २०२६ रोजीही याच सुभाष मैदानावर मॉकड्रिल सराव होणार असून, गुरुवार दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सर्व समावेशक नवीमुंबई समुह ठाणे जिल्यातील स्टेक होल्डर, शासकीय, निमशासकीय, NGO, महसुल विभाग, पोलिस यंञणा, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी कर्मचारी इतर वेग-वेगळ्या आस्थापना व NCC, NSS, TDRF, होमगार्ड्स् आणि नागरी संरक्षण या First Responders (प्रथम प्रतिसादक)  यांचा समावेश राहणार असुन, स्थानिक रहीवाश्यांनी घाबरुन जाऊ नये तथा कसलीही भिती बाळगु नये. हे सराव म्हणजे आपत्तीत किंवा दुर्घटनेच्यावेळी शासकीय यंञणा संकटाला तोंड देण्यासाठी किती व कशी सक्षम आहे हे तपासणे / पडताळणे याचाच एक भाग आहे. 

सदरचे मॉकड्रील सराव माजी सरपंच स्व. गणपतशेठ फकीरजी नाईक मैदान, बोनकोडे गाव, सेक्टर ११, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आपत्ती व्यवस्थापन विभाग, नवीमुंबई महानगर पालिका यांचे सहाय्य व समन्वयाने आयोजित करण्यात आली आहे. 

या मॉकड्रील सरावामध्ये स्थानिक रहीवाशी व सामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, व इतिसाहासाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन नागरी संरक्षण दलाच्या वतीने श्री.विजय जाधव, उपनियंञक, यांचेकडुन करण्यात येत आहे.

सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

Thursday, 9 April 2026

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

पेण (पंकज पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथसंप्रदायातील श्री.गोरक्षनाथ महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सोमवार दि.१३ एप्रिल २०२६ रोजी चैत्र-वरूथिनी एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने अन् उत्साहात साजरा होणार आहे. 

यावेळी उत्सवात दोन दिवस चालणाऱ्या  किर्तनकार हभप प्राची मंदार व्यास (डोंबिवली) यांच्या कीर्तनाला हार्मोनियम साथ किशोर अनंत म्हात्रे (दिवा) तर तबलासाथ जितेंद्र अनंत म्हात्रे यांची लाभणार  आहे. सोमवारी ठीक दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी श्रींवर फुले उधळली जातील व त्यानंतर  दुपारी १:०० वा.महाप्रसादाची सुरुवात होईल. 

यावर्षी उत्सवातील महाप्रसाद - कै काशिनाथ मऱ्या पाटील यांच्या स्मरणार्थ नातू मितेश सुर्याजी पाटील व साहिल सुर्याजी पाटील (घोडाबंदर) यांच्यामार्फत दिला जाणार आहे. 

दुपारी १:३० वा. श्री अजित दिनकर ठाकूर यांच्या सौजन्याने भजन जोस्तनाई म्युझिकल ग्रुप गणपतीवाडी, पेण, गायिका- सौ.सायली विकी मानकवळे, पखवाज वादक श्री.विकी मानकवळे व सहकारी यांचा कार्यक्रम होईल. तसेच - कै. विठोबा महादू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सून- जयप्रभा प्रफुल्ल म्हात्रे (मा सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती पेण) विठ्ठलनगर यांच्या सौजन्याने  सायं ०६:०० वा श्री सिध्दीविनयाक प्रासादिक संगित भजन मंडळ, शिंगणवट, गुरूवर्य संगितरत्न केशवराव बुवा पाटील कळवेकर, गुरूवर्य भजन सम्राट दत्तात्रेय बुवा ओढांगीकर यांचे शिष्य रायगड भूषण पुरस्कार व कोकण संगितरत्न पुरस्कार सन्मानित, संगित विशारद बुवा कु. ओंकार नंदकुमार पाटील (बोरी पेण) यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ १२:०० वा श्रींचा प्रदक्षिणा कार्यक्रम संपन्न  होईल. 

या उत्सवाच्या कार्यक्रमासाठी श्री. गोरक्षनाथ महिला मंडळ तसेच श्री गोरक्षनाथ क्रीडा मंडळ विठ्ठलनगर यांच्याकडून दरवर्षी आर्थिक मदत व संपुर्ण सहकार्य केले जाते. तसेच उत्सवाचे  व्यवस्थापन व नियोजन विठ्ठलनगर, घोडाबंदर, मळेघरवाडी, मंत्रीवाडी, जनवली, ठाकूरबेडी, पैराणकरवाडी, तामषीबंदर, बोरकरवाडी, बहिरामकोटक, लाखोले, म्हात्रे ठाकूरवाडी व सर्व बेडेकर मंडळी यांच्या सहकार्याने होते. 

तरी या उत्सवाला भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून श्री. दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री गोरक्षनाथ संस्था, मु. विठ्ठल नगर  ता. पेण- रायगड यांनी कळविले आहे.

(बातमीदार संपर्क :9833127069)

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !! युद्ध सुरु असतानासुद्धा भारताची रणनीती ठरली यशस्वी. उरण...