Sunday, 8 March 2026

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना गुलाब व मिठाई वाटप !

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना गुलाब व मिठाई वाटप !

प्रतिनिधी, (विशल कुरकुटे)

आज दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने Railway Protection Force (RPF) अंबरनाथ चौकीच्या प्रभारी सोनाली नंदेश्वर यांच्या पुढाकाराने Ambarnath Railway Station येथे विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

या वेळी महिला प्रवाशांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत गुलाब पुष्प व मिठाई वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF सदैव तत्पर आहे, याची माहिती देत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सुरक्षा उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात आली.

या वेळी विशेष उपस्थिती म्हणून जगदीश देसले साहेब व रमेश पाटील साहेब यांनी चौकी प्रभारी सोनाली नंदेश्वर मॅडम यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

तसेच कार्यक्रमाला दिनेश बुचडे, दिपक तेली, संजय गुप्ता सौ रेखा उत्तरदे  आशा डिसोझा कांचन कुलकर्णी  तसेच मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष प्रवासी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये महिला सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

विकास आणि एकतेची नवी ओळख : नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार !

विकास आणि एकतेची नवी ओळख : नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ पुरस्कार !

मुंबई (शांताराम गुडेकर /दीपक मांडवकर) :
                 रायगड किल्ल्यापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले नळेफोडी गाव आपल्या एकजुटीमुळे आणि विकासकामांमुळे विशेष ओळख निर्माण करत आहे. गावातील श्री विघ्नहर्ता मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे मंदिर म्हणून त्याची ख्याती आहे.
                गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांमधील दृढ एकता. कोणत्याही राजकीय मतभेदांना दूर ठेवत सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे गावाच्या प्रगतीसाठी कार्य करत आहेत. सर्वानुमते निर्णय घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
                गावातील ज्येष्ठ मंडळी श्री वामन महादे श्री.चंद्रकांत महादे, श्री.लक्ष्मण महादे तसेच गावचे उपसरपंच श्री. नथुराम चाचले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या सहकार्याने विविध विकासकामे करण्यात आली आहेत. बसथांब्यापासून शाळेपर्यंत रस्त्यालगत प्रकाश व्यवस्था, सौरऊर्जा प्रकल्प, गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ऑनलाईन सुविधांसाठी मोफत वाय-फाय, तसेच पाण्यासाठी विहीर आणि धरण बांधकाम अशी अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत.
                 गाव आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना ग्रामस्थांनी स्वकष्टाने अनेक उपक्रम राबवून विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वदेश फाउंडेशनच्या वतीने नळेफोडी गावाला ‘स्वप्नातील गाव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून भविष्यातही गावाच्या प्रगतीसाठी अशाच उपक्रमांना गती देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ती... (एक समर्पित काव्य)

ती... (एक समर्पित काव्य)

स्त्री- अपेक्षविना घडविते विश्व,
प्रेमांकुराने समर्पिते सर्वस्व ।
अनुभवाची शिदोरी वाहते अखंड,
निंदा नालस्तीनेही त्रस्त असे *ती*

जगण्याची आणि जगविण्याची आशा प्रचंड,
आयुष्याशी ही करते बंड।
माया आणि ममतेचा त्रिखंड
मृत्यूला ही शाश्वत नमविते *ती*

नातेसंबंधांची राखणदार,
स्त्रीत्वाचे प्रेम असते अपरंपार।
काबाडकष्ट अनेक करता
स्वतःला सावरणे विसरते *ती*

कधी रामाची वैदेही, कधी गणेशाची रिद्धी सिद्धी, कधी शंकराची पार्वती, तर कृष्णाची राधा राणी,
त्रैलोकांत आपले दायित्व अखंड साकारते ती।

*त्रैलोकांत आपले दायित्व अखंड साकारते *ती*।

 - सौ.शिल्पा चंद्रकांत निमकर 
घाटकोपर मुंबई.

Saturday, 7 March 2026

एक निरागस काव्य ....

एक निरागस काव्य ....
---------------------------

     सायली माझी लाडाची
           आईच्या प्रेमाची 
           पप्पांच्या चेहे~याची
           निरागस मनाची 
     सायली माझी लाडाची
           बोलक्या डोळ्यांची 
            गुलाबी ओठांची
           लांबसडक केसांची
     सायली माझी लाडाची
            शांत स्वाभावाची
            गोड हृदयाची
           स्वाभिमानी बाण्याची 
       सायली माझी लाडाची
           आवड स्वयंपाकाची
           निरनिराळ्या पदार्थांची 
           घरच्यांच्या मायेची
         सायली माझी लाडाची

   सौ. शिल्पा चंद्रकांत निमकर 
         घाटकोपर मुबंई.

🪷 कोकण रहिवाशी मंडळ, टिटवाळा (रजि.) यांचा स्नेहमेळावा डि. जि. वन येथे उत्साहात संपन्न !!

🪷 कोकण रहिवाशी मंडळ, टिटवाळा (रजि.) यांचा स्नेहमेळावा डि. जि. वन येथे उत्साहात संपन्न !!

रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा रजि. मंडळाचा स्नेहमेळावा कार्यक्रम सायंकाळी ३ ते ७ या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराज मठ,  डि जि वन, येथे थाटामाटात पार पडला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत सदाशिव परब बुवा, उपाध्यक्ष श्री शंकर पेंडुरकर, कार्याध्यक्ष श्री प्रवीण टोले, सचिव श्री निलेश राणे, खजिनदार श्री गुणाजी नंदकुमार गावडे, सहखजिनदार श्री योगेश टोले, कमिटी सदस्य श्री नामदेव पिचुर्ले, श्री प्रकाश चौगुले, सौ सीमा पिंपुटकर, सल्लागार श्री संतोष राणे यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. 

श्री गणेशाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजाचे कृपाशीर्वादाने दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मंडळाचे जेष्ठ सभासद श्री दिलिप चिपकर काका, श्री भिवाजी धुरे काका, श्री नितीन कदम काका, श्री दळवी काका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मंडळाचे सभासद श्री मनोहरजी टेमकर यांनी सुत्रसंचलन जबाबदारी स्वीकारून कार्यक्रमाची रंगत वाढली श्री राजन गावडे यांनी आपल्या भारदस्त आवाजाने श्री मनोहर टेंमकर यांना सुत्रसंचलना मध्ये साथ दिली. होळी सणासाठी गावी जाण्याची लगबग सुरू असताना हि मेळाव्याला चांगली उपस्थिती होती.

मंडळाच्या वतीने उपस्थित जेष्ठ नागरिकांना पदाधिकारी व सभासदांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उपस्थित पहिली वर्ग ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने वह्या व पेन भेट देऊन पुढील शैक्षणिक प्रवासा साठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्नेहमेळाव्याला विशेष अतिथी म्हणून १) कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे टिटवाळ्यातिल नवनिर्वाचित नगरसेवक सन्मानिय श्री बंदेशजी जाधव साहेब तसेच प्रमुख अतिथी १) कुणबी समाज मंडळ टिटवाळा चे अध्यक्ष सन्मानिय श्री मोहन कणेरी साहेब २ ) कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सन्मानिय श्री सुनील उतेकर साहेब ३ ) ज्ञान साधना कोचिंग क्लासेस सर्वेसर्वा सन्मानिय श्री विशाल पातेरे सर ४ ) शिवसेना महिला संघटक टिटवाळाच्या सन्मानिय सौ श्रेया जाधव ताई यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करुन कोकण रहिवाशी मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मंडळाच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करुन आभार मानले 🙏🏼 उपस्थित महिलांना मंडळातील महिला पदाधिकारी व सभासदांनी हळदीकुंकू चा मान देऊन सन्मानित करण्यात आले. स्नेहमेळावा कार्यक्रम ला देणगी स्वरूपात तसेच वस्तू स्वरूपात मदत केलेल्या सर्वांचे कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळाच्या वतीने आभार माणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

श्री. संतोष भोसले, श्री गोपीचंद घाटीये, श्री रंजीत पुसाळकर, श्री सुरेश वारंग, श्री संदेश सावंत, श्री अमित पांचाळ, सौ. शितल पेंडुरकर, सौ. करुणा परब ,सौ. पूर्वा टोले, सौ. प्रियांका चौगुले, सौ. रूपा पुसाळकर, सौ. समिक्षा गवस, सौ. सुप्रिया पवार, सौ. सुष्मिता तावडे, सौ. वर्षा मेस्त्री, सौ. सई वारंग, सौ. दिपाली नाईक, सौ. प्रिया बने,या सर्व सभासदांनचे कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

सौजन्य/वृत्त -
✍🏻 श्री गुणाजी नंदकुमार गावडे (मिलिंद)
कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा

Friday, 6 March 2026

विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !!

विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं' हे अधोरेखित करणाऱ्या विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विरार पश्चिमेच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मराठी माध्यमात  करण्यात आले होते. 

मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात भाषा' हा  दर्जा टिकवण्यासाठी उत्कर्ष विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग नेहमीच प्रयत्न करीत असतात. विद्यार्थ्यांना मातृभाषा बोलता यावी यासाठी केवळ मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त पुरेसे नाही तर उत्कर्ष विद्यालयात वर्षभर प्रयत्न केले जातात. पथनाट्य,  शब्दखेळ, कविता व गीत गायन, सामुदायिक पसायदान यांतून मराठी भाषेचा गौरव करून मराठी भाषा कशी टिकवावी याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. 

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक मॅडम यांच्या नियोजनानुसार शाळेत नेहमीच मराठी भाषा संवर्धनात्मक उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर कार्यक्रमासाठी शाळेत भाषा शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली होती. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनीच केले.

सामाजिक क्षेत्रातील सक्रिय महिला सामाजिक कार्यकर्त्या - भूमिका सिंह

महिला दिना निमित्त लेख.

सामाजिक क्षेत्रातील सक्रिय महिला सामाजिक कार्यकर्त्या -  भूमिका सिंह 

भूमिका सिंह या लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी आणि द्रोणागिरी फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून समाजाच्या उन्नतीसाठी आपला वेळ, ऊर्जा आणि नेतृत्व समर्पितपणे देत आहेत. त्यांच्या कार्यातून समाजाबद्दलची जबाबदारी आणि गरजूंबद्दलची संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते.

त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कपडे वाटप उपक्रम, बीच स्वच्छता अभियान आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण यांसारख्या साध्या पण अर्थपूर्ण उपक्रमांपासून झाली. छोट्या स्तरावर सुरू झालेले हे कार्य हळूहळू व्यापक मानवतावादी चळवळीत रूपांतरित झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सामाजिक परिवर्तन घडून आले.

शिक्षण आणि बालकल्याण हे त्यांच्या कार्याचे प्रमुख क्षेत्र ठरले. झोपडपट्टीतील मुलांना मोफत शिक्षण देणे, दर रविवारी शैक्षणिक उपक्रम आयोजित करणे, गरजू मुलांना मोफत अन्न वितरण करणे तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांची शाळेची फी भरणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचा ठाम विश्वास आहे की शिक्षण हे गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे.
भूमिका सिंह या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठीही कटिबद्ध आहेत. निराधार व गरजू वृद्धांना आधार देऊन त्यांना वृद्धाश्रमात सन्मानाने स्थायिक करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना योग्य काळजी, सन्मान आणि भावनिक आधार मिळावा यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी विविध मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करून गरजू नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे.
तरुणांना योग्य दिशा देणे हे त्यांच्या कार्याचे आणखी एक महत्त्वाचे अंग आहे. त्या नियमितपणे NSS सत्रे, नेतृत्व विकास कार्यशाळा आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करून युवकांना सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रेरित करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवक आणि ज्येष्ठ नागरिक समाजकार्यात सक्रिय सहभागी झाले आहेत.

लायन्स क्लबच्या सहकार्याने त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रभावी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वाखाली ३५० हून अधिक हेल्मेटचे वाटप करून रस्ते सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. सामाजिक सेवेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांचे समर्पण, करुणा आणि नेतृत्वगुण हे समाजात सकारात्मक व दीर्घकालीन बदल घडवण्याच्या त्यांच्या ध्येयाचे प्रतीक आहेत.


लेखन / शब्दांकन - विठ्ठल ममताबादे, उरण

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना गुलाब व मिठाई वाटप !

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना गुलाब व मिठाई वाटप ! प्रतिनिधी, (विशल कुरकुटे) आज दिनांक ०८ मार्च २०...