Friday, 3 July 2026

12 तासांत प्रशासनाची धावपळ! पत्रकार विशाल कुरकुटे यांच्या बातमीचा प्रभाव; कल्याण तहसील कार्यालय परिसर अखेर स्वच्छ !!

12 तासांत प्रशासनाची धावपळ! पत्रकार विशाल कुरकुटे यांच्या बातमीचा प्रभाव; कल्याण तहसील कार्यालय परिसर अखेर स्वच्छ !!  

*कल्याण, विशाल कुरकुरे :

कल्याण तहसील कार्यालयाच्या आवारात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांबाबत पत्रकार विशाल कुरकुटे यांनी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. अवघ्या 12 तासांत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

*कचरा आणि दुर्गंधीमुळे त्रस्त नागरिक*  
तहसील कार्यालय परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग साचले होते. सर्वत्र अस्वच्छता, दुर्गंधी आणि घाणीमुळे नागरिक तसेच कार्यालयात येणारे कर्मचारी त्रस्त झाले होते. या गंभीर परिस्थितीबाबत पत्रकार विशाल कुरकुटे यांनी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

.          बातमी प्रसिद्ध करायच्या आधीचे चित्र 

*तातडीची कारवाई*  
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदार विकास गारुडकर यांनी तातडीने दखल घेत स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले. संबंधित यंत्रणेने त्वरित कारवाई करत कचऱ्याचे ढीग हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

*नागरिकांची प्रतिक्रिया*  
या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत केले आहे. मात्र, ही स्वच्छता कायमस्वरूपी राखण्यासाठी नियमित साफसफाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोकण विभाग पत्रकार संघ आणि राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीयांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. !!

कोकण विभाग पत्रकार संघ आणि राष्ट्रीय पत्रकार विकास महासमिती
यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. !!

कल्याण, प्रतिनिधी : राष्ट्रीय पत्रकार विकास महासमिती, आणि कोकण विभागीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २ जुलै रोजी गरीब होत करू आणि आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना 'शालेय साहित्य वाटप करण्यात आले. खाकरवाडी येथील आदिवासी महिलांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात आले. रायते, नडगाव- खाकरखाडी आणि बेलपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीब गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल कंपास पेटी तसेच इतर शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवरूपानंद स्वामी म्हणाले गोरगरिबांना मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे गोरगरीब होतकरू आदिवासी मुलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे शिक्षणातून आपली प्रगती करून घ्यावी असे शिवरूपानंद स्वामिनी मार्गदर्शन केले. 

कोकण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे म्हणाले शिक्षण हे प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे आदिवासी गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून अभ्यासात प्रगती केली पाहिजे शिक्षण घेऊन आपली व आपल्या समाजाची प्रगती करावी उन्नती करावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल समाजसेवक पत्रकार सुदाम पाटील आणि नारायण सुरोशे यांचे अभिनंदन केले तसेच स्वामींनी विद्यार्थ्यांना भरीव मदत केल्याबद्दल स्वामींचे आभार व्यक्त केले.

या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

मुरबाड मतदार संघाचे आमदार किसन कथोरे आणि कल्याण उपविभागीय अधिकारी प्रांत म्हस्के पाटील हे महत्त्वाची मीटिंग असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी फोन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार सुदाम पाटील, कोकण विभागीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे, कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष संदीप शेंडगे, सरपंच अरुणा चौधरी, पोलीस पाटील जगदीश वामन लोणे, रायते ग्राम पंचायतचे सरपंच समिता संतोष सुरेशी, सतीश चौधरी माजी सरपंच संतोष सुरोशे रायते ग्रामपंचायत शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा बोंदे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख नरेश अनंता सुरोशे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा 'महाराष्ट्र क्रांती'चे संपादक नारायण सुरेशी आणि पत्रकार तानाजी लोणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम पुढील काळातही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कल्याणात 'सुसंगती सदा घडो' जनजागृती कार्यक्रम !!

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कल्याणात 'सुसंगती सदा घडो' जनजागृती कार्यक्रम !!

कल्याण, प्रतिनिधी :

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गुरुवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात 'सुसंगती सदा घडो' या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे पोलिस आयुक्तालय, कल्याण परिमंडळ-3 आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.

*विद्यार्थी, पालक, शिक्षकांची भूमिका महत्त्वाची*  
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्यावर भाष्य केले. दुष्परिणामांसह त्यापासून दूर राहण्याचे उपाय समजावून देणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांची भूमिका युवकांना व्यसनापासून वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

*डॉ. दीपा शुक्ल यांचे मार्गदर्शन*  
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना मित्रांच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले. "तुमचे शरीर आणि मन हीच तुमची खरी संपत्ती आहे. व्यसनामुळे ती नष्ट होते. मन अस्वस्थ असल्यास शिक्षक, समुपदेशक किंवा हेल्पलाईनची मदत घ्या. व्यसन हा आजार आहे आणि तो बरा होऊ शकतो," असे त्या म्हणाल्या.

*मान्यवरांची उपस्थिती*  
कार्यक्रमाला पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने, सुहास हेमाडे, डॉ. दीपा शुक्ल यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

*विद्यार्थ्यांचा प्रतिसाद*  
कार्यक्रमाला परिमंडळ 3 मधील ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे शिक्षकांसह 700 ते 800 विद्यार्थी उपस्थित होते. मित्रांच्या दबावाला "नाही" म्हणण्याची हिंमत मिळाली असून आम्ही इतरांनाही जागरूक करू, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

Thursday, 2 July 2026

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तिघांना अटक !

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तिघांना अटक !

जम्मू व बिहारमधून आरोपींना ताब्यात; पेपरफुटी रॅकेटचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता

प्रतिनिधी, भिवंडी 
गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 

 महाराष्ट्रातील बहुचर्चित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या अटकेमुळे या गाजलेल्या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दीर्घकाळ फरार असलेल्या कपिल दहिया याच्याविरुद्ध यापूर्वीच 'लुकआऊट सर्क्युलर' जारी करण्यात आले होते. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला जम्मू येथून अटक केली. तसेच या प्रकरणाशी संबंधित सोनू सिंह आणि मिथुन सिंह या दोघांना बिहारमधील पटणा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात सोनू सिंह आणि मिथुन सिंह हे या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याचे निकटवर्तीय सहकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, पटणा येथे बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हे दोघेही सहभागी होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करून त्यांचा शोध सुरू ठेवला होता.

तपासादरम्यान पेपरफुटीचा कट नेमका कोणत्या स्तरावर रचण्यात आला, प्रश्नपत्रिका एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कोणत्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सहभागी होते, याचा सखोल तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स, डिजिटल पुरावे आणि बँक खात्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

यापूर्वी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिलाही बिहारमधून अटक करण्यात आली होती. तिच्या चौकशीत मिळालेल्या तांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारेच पोलिसांनी पुढील तपासाला गती देत या तिन्ही आरोपींपर्यंत मजल मारली.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुद्रणालयातून बेकायदेशीररीत्या बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर त्या दिल्लीमार्गे महाराष्ट्रात आणून नियोजनबद्ध पद्धतीने पेपरफुटी करण्यात आली. या संपूर्ण रॅकेटमध्ये अनेक राज्यांतील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय असून, त्यामुळे तपासाचे जाळे अधिक व्यापक करण्यात आले आहे.

सध्या अटक करण्यात आलेले कपिल दहिया, सोनू सिंह आणि मिथुन सिंह हे भिवंडी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यासाठी पोलिस न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

या ताज्या कारवाईनंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अद्याप फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये पोलिसांची पथके सातत्याने छापेमारी करत असून, या गाजलेल्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.

छत्रपतींच्या विचाराने वाटचाल करणारे सर्वमान्य नेतृत्व : संजय हंडोरे पाटील

व्यक्ती विशेष __

छत्रपतींच्या विचाराने वाटचाल करणारे सर्वमान्य नेतृत्व : संजय हंडोरे पाटील

शब्दांकन :-
जयेश शेलार पाटील, 
महासचिव (अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश)

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांचा वाढदिवस ५ जुलै रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याचा घेतलेला हा आढावा.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मौजे भादाणे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजय हंडोरे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना जीवनाचे ध्येय मानत आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची सुरुवात केली. गावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचला असून तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

निडर आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व

संजय हंडोरे पाटील हे लहानपणापासूनच निडर आणि परोपकारी वृत्तीचे होते. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी गावाजवळील टेकडीचे भूस्खलन होऊन भीषण दरड कोसळली. या दुर्घटनेत तीन व्यक्ती दरडीखाली अडकल्या असताना त्यांनी धैर्य, प्रसंगावधान आणि साहस दाखवत गावकऱ्यांच्या मदतीने तिघांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

तसेच वयाच्या १६ व्या वर्षी गावातील एक व्यक्ती विहिरीत बुडाल्याची घटना घडली असता त्यांनी बेधडक विहिरीत उडी मारून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी वृत्तीची आजही गावात आठवण काढली जाते.

सामाजिक कार्य आणि सरपंच म्हणून उल्लेखनीय कामगिरी

संजय हंडोरे  पाटील यांनी साई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक म्हणून जवळपास २० वर्षे व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केले. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली.

महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळावा यासाठी घरपट्टीवर पती-पत्नी यांच्या संयुक्त नावाची नोंद करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी राबवली. गावातील मोकळ्या जागांवर सुमारे ३० हजार साग वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.

गणेश जयंतीनिमित्त इको-फ्रेंडली मखर स्पर्धा, दीपावलीतील किल्ले सजावट, रांगोळी व आकाशकंदील स्पर्धा, शिवजन्मोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी आनंद उत्सव, उन्हाळी कडधान्य उत्पादन स्पर्धा, तसेच मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

त्यांच्या कार्यकाळात दरवर्षी सात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आणि एकही ग्रामसभा तहकूब झाली नाही. ग्रामसभेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामस्थांना संधी देण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांना ओळखपत्रे देण्यात आली. गावात अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवातही त्यांच्या पुढाकारातून झाली.

‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ची राज्यभर दखल

दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पालकांसह शाळेचे ध्वजारोहण करण्याचा अभिनव निर्णय भादाणे गावात त्यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध झालेला हा उपक्रम आज अनेक ठिकाणी राबविला जात आहे.

सन २०२४ मध्ये लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या स्वागत व सत्काराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. याच कार्यक्रमात उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री आशिष पटेल यांच्या हस्ते ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ उपक्रमाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

झुंजार आंदोलक आणि प्रभावी संघटक

२००९ मध्ये स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनादरम्यान त्यांना अटकही झाली होती.

कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. कला क्षेत्रातही ते सक्रिय असून वेस्टर्न इंडिया मोशन पिक्चर अँड टीव्ही प्रोड्युसर्स असोसिएशन (WIFPA)  संलग्न फ्रेंड्स फिल्म क्रिएशनचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.

व्यायामशाळा उभारणीसाठी विशेष योगदान

ठाणे जिल्हा सार्वजनिक व्यायामशाळा संघाची स्थापना करून अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना शासनाकडून व्यायाम साहित्य व व्यायामशाळा इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

राजकीय क्षेत्रातील सहभाग

सामाजिक कार्यासोबतच त्यांनी २००४ मध्ये विधानसभा निवडणूक तसेच २०१२ मध्ये कोकण पदवीधर विधान परिषद निवडणूक लढविली. सर्वसामान्य तरुणांनाही राजकारणात संधी मिळू शकते, हा संदेश त्यांनी दिला.

राष्ट्रीय स्तरावरील कार्य

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून संजय पाटील यांनी राज्यभर संघटन विस्ताराचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. १३२ वर्षांची परंपरा असलेल्या आणि छत्रपती शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी बहाल करणाऱ्या या ऐतिहासिक संघटनेच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.

शिर्डी राष्ट्रीय अधिवेशन, दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांमधील राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. मिर्झापूर, विजयवाडा, मेहसाणा, अयोध्या आणि जबलपूर येथे झालेल्या विविध राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडले.

सन २०२६ मध्ये जबलपूर येथे राष्ट्रीय मंचावरून ‘कुर्मी जोडो अभियान’ची घोषणा करून त्यांनी समाज एकत्रीकरणाची चळवळ सुरू केली. शिवराज्याभिषेक दिनी रायगड जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात करून विविध उपजातींना जोडण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

आज महाराष्ट्रात महिला महासभा, युवक महासभा, उद्योग महासभा, पुरोहित महासभा, मीडिया महासभा, साहित्य महासभा आणि कृषी महासभा यांसारख्या विविध संघटनात्मक विंग्स राज्यभर कार्यरत आहेत.

सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य, नेतृत्वगुण आणि जनसंपर्काच्या बळावर संजय पाटील यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत असून पुढील काळातही त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळावे, ह्याच शुभेच्छा..

ग्रामीण महाराष्ट्र
संपादक : जयेश शेलार पाटील
मो. ७६२०२५६७५०

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या अभ्यास वर्गाला आणि चित्रकला ग्रेड परीक्षा सराव वर्गाला सुरुवात !!

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या अभ्यास वर्गाला आणि चित्रकला ग्रेड परीक्षा सराव वर्गाला सुरुवात !!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी उज्वल निकालाची परंपरा असलेल्या साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या अभ्यास वर्गाचे आणि चित्रकला ग्रेड परीक्षा अभ्यास वर्गाचे उद्घाटन साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या शुभहस्ते झाले.

       यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड , माध्यमिक विभाग मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक  गिरीश पाटील , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  भूषण जाधव , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  अंकुश जोगळे ,इयत्ता दहावीचे विषय शिक्षक आणि चित्रकला शिक्षक उपस्थित होते. 

        अभ्यास वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  नरसू पाटील यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही तसेच स्पर्धा स्वतःशी करा असे म्हटले. येथील गुणवत्तावान शिक्षक शालेय वेळेव्यतिरिक्त वेळेत आपणाला मार्गदर्शन करणार आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यावा असे म्हटले. तर शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मेहनत घेऊन साई ट्रस्टचे नाव मोठं करावं अशी शुभेच्छा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक  राजेंद्र ठाकूर  यांनी केले. यावेळी जगदीश गावंड , श्रीमती सरोज पाटील , श्रीमती प्रमिला पवार , श्रीमती सुरेखा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते

विद्यार्थिनींना मासिक पाळी, आरोग्याविषयी मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप.!!

विद्यार्थिनींना मासिक पाळी, आरोग्याविषयी मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप.!!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
उरण येथील एन. आय. हायस्कूल येथे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था, उरण आणि शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता, आरोग्याची काळजी, योग्य सॅनिटरी नॅपकिनचा वापर तसेच गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ९५ विद्यार्थिनींना कॉटनचे सॅनिटरी नॅपकिन मोफत वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमास श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा समाजसेविका रायगड भूषण संगीता सचिन ढेरे, उपाध्यक्ष मीनाक्षी कोळी व शिलश्मी सोशल फाउंडेशन यांच्या अध्यक्ष रजनी ताजणे. हृदया ,भैरवी व चौधरी सर त्याचप्रमाणे शाळेच्या ज्येष्ठ व माजी शिक्षिका कुमार मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक  एल. एम . भोये, शाळेचे पर्यवेक्षक  भूषण झोपे, पर्यवेक्षिका जगताप मॅडम, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या शिक्षिका दिपाली पाटील, सहाय्यक शिक्षक  खरमाटे एस . बी , कवितके मॅडम उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी या उपयुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

12 तासांत प्रशासनाची धावपळ! पत्रकार विशाल कुरकुटे यांच्या बातमीचा प्रभाव; कल्याण तहसील कार्यालय परिसर अखेर स्वच्छ !!

12 तासांत प्रशासनाची धावपळ! पत्रकार विशाल कुरकुटे यांच्या बातमीचा प्रभाव; कल्याण तहसील कार्यालय परिसर अखेर स्वच्छ !!   *कल्याण, ...