Tuesday, 10 March 2026

जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !!

जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !!

उपसरपंच निवडीने कॉंग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान :  महेंद्रशेठ घरत 

उरण दि १० (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील जासईच्या उपसरपंचपदी महाविकास आघाडीच्या सुलोचना पद्माकर घरत (कॉंग्रेस) यांची मंगळवारी (ता. १०) बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच संतोष घरत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुलोचना घरत यांचा एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "नवनिर्वाचित उपसरपंच सुलोचना घरत आणि त्यांचे पती दिवंगत पद्माकर घरत हे धडाडीचे कार्यकर्ते, परंतु दुर्दैवाने पद्माकर घरत या कार्यकर्त्याचे अकाली निधन झाले. सुलोचनाताईंनी पती आजारी असताना उत्तम साथ दिली, याची मला जाणीव आहे. त्यामुळे जेव्हा उपसरपंच पदाची  निवडणूक जाहीर होताच मी सुलोचनाताईंना उपसरपंचपदी बसवा, अशी विनंती केली. महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी, नेत्यांनी मनावर घेतले. त्यामुळे सुलोचना ताई उपसरपंचपदी विराजमान झाल्या. यामुळे मला माझ्या कॉंग्रेस कार्यकर्त्याचा सार्थ अभिमान आहे. शेकाप आणि महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या, पदाधिकारी यांच्या मेहनतीने आणि उत्तम सहकार्याने उरणमध्ये आज आपली ताकद दाखवून दिली आहे. लढाऊ महिला निवडून आल्या. कॉंग्रेसमध्ये सर्वांना सन्मान आहे. आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मी आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहे." 

यावेळी पतीच्या आठवणीने उपसरपंच सुलोचना घरत भाऊक झाल्या होत्या. महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, पंचायत समिती सदस्य निर्मलाताई घरत, नरेश घरत, कॉंग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, संजय ठाकूर, आदित्य घरत आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर सुलोचना घरत यांचे अभिनंदन केले.

मध्यपूर्वेकडे निर्यात होणाऱ्या कंटेनर्ससाठी जेएनपीएकडून दिलासा; स्टोरेज, ड्वेल टाइम आणि रीफर प्लग-इन शुल्क माफ !!

मध्यपूर्वेकडे निर्यात होणाऱ्या कंटेनर्ससाठी जेएनपीएकडून दिलासा; स्टोरेज, ड्वेल टाइम आणि रीफर प्लग-इन शुल्क माफ !!

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) :
 भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या राजकीय अशांततेमुळे बंदर वापरकर्त्यांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी मंगळवारी सर्व संबंधितांना तात्काळ पालन करण्यासाठी एक व्यापार सूचना जारी केली आहे.

बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, जेएनपीए सध्याच्या संकटाचा परिणाम कमी करण्यासाठी आयात निर्यात समुदायाला पाठिंबा देत आहे. बंदराने अडकलेल्या निर्यात कंटेनरसाठी ग्राउंड रेंट आणि रीफर प्लग-इन शुल्क यासारख्या शुल्कात सवलत जाहीर केली आहे.

जेएनपीएने आधीच हाती घेतलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त, जसे की बीटीटी उपक्रम आणि तात्पुरती ट्रान्सशिपमेंट सुविधा, जेएनपीएने त्यांच्या टर्मिनल ऑपरेटर्सशी समन्वय साधून, मध्य पूर्वेतील बंदरे आणि टर्मिनल्सकडे जाणाऱ्या मालवाहतुकीवर अलिकडच्या राजकीय अशांततेचा परिणाम झाला आहे अशा निर्यातदारांवरील भार कमी करण्यासाठी खालील अतिरिक्त उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे:

28 फेब्रुवारी 2026 पासून टर्मिनल्समध्ये पडून असलेल्या किंवा 08.03.2026 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत गेट केलेल्या कंटेनरसाठी सर्व टर्मिनल ऑपरेटर 15 दिवसांपर्यंत (28.02.2026 रोजी सकाळी 0000 तासांपासून ते 14.03.2026 रोजी रात्री 2400 तासांपर्यंत) ग्राउंड रेंट / राहण्याचा वेळ शुल्क 100% सूट देतील.

सर्व टर्मिनल ऑपरेटर नाशवंत वस्तूंनी भरलेल्या अडकलेल्या रीफर कंटेनरना, जे 28 फेब्रुवारी 2026 पासून आत पडले होते किंवा जे फक्त 08.03.2026 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत गेट इन केले होते, त्यांना 15 दिवसांपर्यंत (28.02.2026 रोजी सकाळी 0000 ते 14.03.26 रोजी रात्री 2400 पर्यंत) रीफर प्लगइन शुल्काच्या 80% माफ करतील. शिपिंग लाईन्स, एनव्हीओसीसी, फ्रेट फॉरवर्डर्सना हे फायदे प्रत्यक्ष निर्यातदारांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयावर आपले मत व्यक्त करताना, जेएनपीएचे अध्यक्ष  गौरव दयाल, भा. प्र. से. म्हणाले, “मध्य पूर्वेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जेएनपीए आयात निर्यात समुदायाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. निर्यातदारांवर होणारा परिणाम कमी करणे आणि व्यापाराची सातत्य सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे, तसेच कोणत्याही एका उद्योगावर किंवा समुदायावर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही याची खात्री करणे हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही व्यापार सुलभ करण्यासाठी आणि आयात निर्यात परिसंस्थेला पाठिंबा देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजनांचा पर्याय तपासत राहू.”

निर्यातदार आणि व्यापार भागधारकांना वरील मदत उपायांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या संबंधित टर्मिनल ऑपरेटर आणि शिपिंग लाइन्सशी समन्वय साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जेएनपीए परिस्थितीचा आढावा घेत राहील आणि गरज पडल्यास व्यापाराच्या हितासाठी आवश्यक असलेली पुढील पावले उचलेल असेही त्यांनी सांगितले

वीर वाजेकर महाविद्यालयात मुलींसाठी आरोग्य जागृती कार्यक्रम !!

वीर वाजेकर महाविद्यालयात मुलींसाठी आरोग्य जागृती कार्यक्रम !!

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे च्या हेल्थ क्लब व तु. ह. वाजेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल  यांच्या सयुंक्त विद्यमाने मुलींच्या विविध आरोग्य समस्या संदर्भात जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्र.प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर, प्राचार्य  साळुंखे बी बी, थोरात मॅडम, श्री.पाटोळे तसेच प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रणाली नामदेव दांडेकर, एम.डी. (स्त्रीरोग व प्रसूती – आयुर्वेद),सहाय्यक प्राध्यापक,प्रसूती तंत्र व स्त्री रोग विभाग, डॉ.जी.डी.पोल फाउंडेशन,YMT आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खारघर, नवी मुंबई हे उपस्थित होते.

   प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर यांनी मुलींच्या समस्या महत्वाच्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नये व जनजागृती वाढवणे गरजेचे असल्याचे मत मांडले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रणाली दांडेकर यांनी PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) ही पुनरुत्पादक वयातील महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य हार्मोनल स्थिती बद्दल माहिती दिली. अनियमित किंवा अनियंत्रित मासिक पाळी, चेहऱ्यावर/शरीरावर अतिरिक्त केस येणे, मुरुमे येणे, केस गळणे, वजन वाढणे आणि वंध्यत्व या प्रकारची लक्षणे PCOD मध्ये आढळतात असे नमूद केले. खराब जीवनशैली, ताणतणाव, शारीरिक निष्क्रियता आणि अनुवांशिक घटक यामुळे PCOD होण्याची शक्यता बळावते. वेळीच उपचार न केल्यास टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग (endometrial cancer) यांचा धोका वाढू शकतो. कमी कर्बोदके, फायबरयुक्त आहार घेणे, नियमित व्यायाम, योगासने आणि वजन नियंत्रण करणे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेऊन यावर नियंत्रण मिळवता येते असे नमूद केले. तसेच कॅन्सर सारखे गंभीर आजार आणि त्यांची लक्षणे, कारणे, प्रतिबंध, उपचार याबद्दल सखोल माहिती दिली. चर्चा सत्रात देण्यात आली. विद्यार्थिनींच्या  आरोग्याबद्दलच्या शंकांचे निरसन केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतोष देसाई यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.योगेश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमालाश्री किशोर पाटीलश्री.धुरी, श्री देवरे, खेडकर, सुहास नाईक १५० पेक्षा जास्त विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पंचरत्न मित्र मंडळ,चेंबर तर्फे जागतिक महिला दिन चेंबूर येथे उत्साहात साजरा !

पंचरत्न मित्र मंडळ,चेंबर तर्फे जागतिक महिला दिन चेंबूर येथे उत्साहात साजरा !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
        समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी. एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, खजिनदार सचिन साळूखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ. स्नेहा नानीवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावंड आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड व परिसरात आपल्या कार्याचे जाळे विणणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित पंचरत्न मित्र मंडळातर्फे चेंबूर विभागातील वाशीग्राम सेवा मंडळ सभागृहात दि. ९  मार्च २०२६रोजी दु. २.३० या वेळेत जागतिक महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला. 
         उपरोक्त कार्यक्रमात व्यासपीठावर विशेष पाहुणे सूश्री सौ. नंदा कुळकर्णी मॅडम (कार्यकारी संचालकपदी आर. सी. एफ् कं लि.), सुश्री संजय पेटकर साहेब(महाव्यवस्थापक आर. सी. एफ्. कं. लि.), कॅप्टन सौ. क्षमा भालेराव मॅडम (भारतीय लष्कर)  सिने अभिनेत्री सानिका मोजर, सुश्री. सौ. कविता शिकतोडे मॅडम (एस्. एन्. डी. टी. युनिव्हर्सिटी मुख्य संचालिका) तसेच स्थानिक नगरसेविका सौ. स्नेहल विष्णू शिवकर. माजी विभागप्रमुख संघटिका श्रीमती विजयाताई पवार  मॅडम म्हणून उपस्थित होते. 
         कार्यक्रमाच्या सुरवातीला झी.टि.व्ही फेम श्री. सूशील मेस्त्री. यांनी महिलांसाठी "साज पैठणीचा मान वहिनींचा' ह्या खेळात महिलांना खेळ खेळवून कार्यक्रमाला खूप रंगत आणली. महिला अगदी उत्साहाने खेळल्या.  विशेष पाहुण्यांचे आगमन झाल्यावर पाहुण्यांचे स्वागतव ओळख सौ. स्नेहा नानिवडेकर मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. महिलांना महिला दिनानिमित्त अंत्यत मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
         विविध स्पर्धा मध्ये विजयी झालेल्या महिलांना देखील बक्षीस देण्यात आले. पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण झाल्यावर महिलांना पंचरत्न मित्र मंडळाकडून प्रत्येक महिलेला प्रवासी बॅग भेट व अल्पोपहार चहा वाटला.पहिली पैठणी चा मान सौ. माया गौरव पाटील (वाशी गाव) या वहिनींनी पटकावला. तर दुसरा मान सौ.भावना संकेत गावंड या वहिनींनी मिळवला. तृतीय क्रमांक सौ.शेजवळ वहिनींनी मिळवला.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहा नानिवडेकर आणि सुशिल मेस्त्री यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोकजी भोईर, सेक्रेटरी श्री. प्रदीप गावंड. श्री. रमेश पाटील, श्री. वैभव घरत. मंदार भोपी. मिश्राजी, पुरू पाटसावकर, रमाकांत गावंड, संदीप पाटील, प्रकाश शेजवळ, सौ. निलम गावंड, सौ, नीता पाटील सौ. स्वाती पाटील, सौ. सविता जाधव, सौ. अंजली मौर्या. व इतर मंडळींनी खूप परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे फोटोग्राफी श्री. मॅथ्यू डिसोझा यांनी केले.सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी सौ. सविता जाधव व नीता पाटील यांनी छानशी रांगोळी काढली. कु. सानिका पाटील हिने स्वहस्ते महिलांकरता वुमन्स डे लिखित चाॅकलेट बनवून वाटप केले.शेवटी आयोजकांचे, मान्यवरांचे, उपस्थितांचे तसेच मदत करण्यासाठी सहभागी कार्यकर्त्यांचे. सर्वांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचरत्न मित्र मंडळाला सहकार्य करणारे सर्व देणगीदार,हितचिंतक तसेच आर.सी.एफ प्रशासन यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत यापुढेही तुम्हां सर्वांचे असेच सहकार्य मंडळाला लाभेल या अपेक्षेसह कार्यक्रमाची सांगता केली.

सामाजिक कार्यकर्त्या सौ.रसिका राजेंद्र बागवे यांचा पुरस्काराने सन्मान !!

सामाजिक कार्यकर्त्या सौ.रसिका राजेंद्र बागवे यांचा पुरस्काराने सन्मान !!

कल्याण, प्रतिनिधी :
उल्हासनगर येथील शिवशक्ती महिला मंडळ, उल्हासनगर यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ.रसिका राजेंद्र बागवे यांचा सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

सौ.रसिका राजेंद्र बागवे या मागील वीस वर्षांपासून उल्हासनगर शहरामध्ये महिला बचत गट, महिला सक्षमीकरण तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी अनेक सर्वसामान्य महिलांना वैद्यकीय सेवा, शासकीय व निमशासकीय कार्यालयांची माहिती देणे तसेच बचत गटांद्वारे योग्य मार्गदर्शन करून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे.

तसेच त्या रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण–सावंतवाडी यांच्या प्रमुख मार्गदर्शक असून वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था यांच्या प्रमुख सदस्य म्हणून पर्यावरण संवर्धनाबाबतही सक्रिय कार्य करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक व पर्यावरणीय कार्याचा गौरव म्हणून शिवशक्ती महिला मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मान्यवर सुनील सिताराम उतेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला रेखा दिविलकर, सुनिता खेताडे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण आणि रामशेठ ठाकूर अकरा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार

शेलघर येथे 'यमुना स्त्री सन्मान' पुरस्काराचे वितरण 

** पृथ्वीराज चव्हाण आणि रामशेठ ठाकूर अकरा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार.
  
उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) : कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय अशा समाजाशी निगडित विविध  क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना गेल्या अकरा वर्षांपासून 'यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'तर्फे 'यमुना स्त्री सन्मान' पुरस्कार दिला जातो. हा समारंभ बुधवारी (ता. ११ मार्च), उलवे नोड येथे शेलघर येथील 'सुखकर्ता' बंगल्याच्या गार्डनवर होणार आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. यंदा पुरस्काराचे बारावे वर्षे आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील १२ महिलांना या वेळी गौरविण्यात येईल. त्यात नवी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील, पनवेलच्या उपमहापौर प्रमिला पाटील, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर अशा राजकीय क्षेत्रांत भरारी घेणाऱ्या महिलांचाही समावेश आहे. पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर सुमारे अकरा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवा अध्यक्ष शिवराज मोरे, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, तसेच सिनेअभिनेत्री सायली संजीव उपस्थित राहाणार आहेत.

Monday, 9 March 2026

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ‘स्त्रियांची शतपत्रे’ अभिवाचन कार्यक्रम !

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ‘स्त्रियांची शतपत्रे’ अभिवाचन कार्यक्रम !

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष आणि अंतर्गत दर्जा हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रंगवेध नाट्यसंस्था निर्मित ‘स्त्रियांची शतपत्रे’ हा साहित्यिक अभिवाचन कार्यक्रम शनिवार, दिनांक ७ मार्च रोजी महाविद्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत आदरणीय तारामाई वर्तक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य आणि प्रस्तावना महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. बीना पाटील यांनी मांडली. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व सांगताना स्त्रियांच्या हक्क, समानता आणि स्वाभिमानाच्या लढ्याची ऐतिहासिक परंपरा अधोरेखित केली. प्राचार्य डॉ अरविंद उबाळे यांनीही महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणासंदर्भात विचारप्रवृत्त होण्याचा संदेश उपस्थितिदांना दिला.

श्री. विलास पागार यांनी दिग्दर्शित केलेल्या या कार्यक्रमात १८५० ते १९५० या कालखंडातील स्त्रियांची मनोगते, आकांक्षा, कैफियती आणि विचार व्यक्त करणाऱ्या निवडक १५ पत्रांचे प्रभावी अभिवाचन सुमित्रा देवधर, दीपाली शहाणे, नमिता तेंडुलकर आणि नेहा किणी- सैंदाणे यांनी सादर केले. स्त्रीच्या अनुभवविश्वाला शब्दरूप देणाऱ्या या अभिवाचनाने उपस्थितांना भावनिक आणि विचारप्रवर्तक अनुभव दिला.

अभिवाचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर रानडे यांनी केले.
यावेळी महिला विकास कक्षातर्फे आयोजित विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. बीना पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. वैखरी नवेले यांनी करून दिला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश औटी यांनी केले. 
महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच वसई आणि परिसरातील कला, साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील नामवंतांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !!

जासईच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या सुलोचना घरत यांची बिनविरोध निवड !! उपसरपंच निवडीने कॉंग्रेस कार्यकर्त्याचा सन्मान :  महेंद्रशेठ घरत  ...