Saturday, 23 May 2026

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी !

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी !

जून, जुलै महिन्यात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट.

मच्छिमार बांधवांना आंध्रप्रदेश सरकार प्रमाणे पॅटर्न राबवून दिलासा देण्याची मागणी.

उरण दि २३,'(विठ्ठल ममताबादे) :
मच्छिमार कुटूंबियांना माहे जुन व माहे जुलै दोन महिन्यांचा उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावे अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व संबंधित विभागाना करण्यात आली आहे.

सरकारी आदेशानुसार कोकण किनारपटटीवरील मच्छिमारी १ जुन ते ३१ जुलै कालावधीकरीता बंद करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा आदेश सहा. मत्स्यव्यवसाय विभागाने जाहीर केलेला आहे. या दोन महिन्यांत माश्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे तसेच जोरदार पाऊस व वादळाचा धोका यामुळे मच्छिमारी बंद ठेवणे योग्यच आहे. परंतु कोकण किनारपटट्टी वरील मच्छिमाऱ्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह संपुर्ण मच्छिमारीवर चालतो. पुढील २ महिन्यांमध्ये त्यांना कुठलेही उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण होत असतो व आताही झालेला आहे. त्यांना या २ महिन्यांकरीता उदरनिर्वाह भत्ता अथवा आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

नुकताच आंध्र प्रदेश सरकारने त्या राज्यातील मच्छिमारांच्या कुटूंबियांना दोन महिन्यासाठी प्रतिमहिना २०,०००/- रू. देण्याचे मान्य केले आहे व त्याचे वाटप सुध्दा चालु आहे. महाराष्ट्र राज्य हे मच्छिमारी व्यवसायातुन मोठया प्रमाणात महसुल गोळा करते. तरी या सारख्या आर्थिक सधन राष्ट्राने गरजु मच्छिमारांसाठी आर्थिक मदत देणे क्रमप्राप्त आहे.असे संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे मच्छिमारांच्या प्रत्येक कुटूंबाला प्रतिमहिना रू. २५,०००/- प्रमाणे दोन महिन्याचे ५०,०००/-आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.या संदर्भात कामगार नेते तथा संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार कॉम्रेड भूषण पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिले व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.यावेळी तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कोट (चौकट ):- 

कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत की महाराष्ट्रातील मच्छिमारांना ५०, ०००/- उदरनिर्वाह भत्ता द्या.१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यामध्ये माशांचा प्रजनन काळ व जोरदार पाऊस या कारणास्तव मच्छिमारी बंद करण्याचे आदेश मच्छिमार आयुक्ताने काढला आहे त्यामुळे मच्छिमारांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.नुकतेच आंध्रप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील मच्छिमारांना उदरनिर्वाह रु ४०, ०००/-भत्ता दिला आहे त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारणे सुद्धा द्यावा हि मागणी करीत आहोत .
   - कॉम्रेड भूषण पाटील,कामगार नेते तथा मार्गदर्शक कोकण किनारा मच्छिमार संघटना.

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे !

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे  !

** पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण  ;  सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )
काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार व्हावा, उत्तमपणे संघटनात्मक बांधणी व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय समितीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी काँग्रेसच्या कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्या असलेल्या व गोर गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमी झटणाऱ्या श्रुती शाम म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्त्या म्हणून श्रुती म्हात्रे यांची ओळख आहे. शिवाय प्रसिद्ध महिला सामाजिक कार्यकर्त्या व कामगार नेत्या म्हणूनही त्या सर्वांना सुपरिचित आहेत. श्रुती म्हात्रे यांना त्यांचे वडिल  कामगार नेते, काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व. शाम म्हात्रे यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला. वडिलांचा विचार कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रुती म्हात्रे सुरवातीपासूनच कार्यरत आहेत. श्रुती म्हात्रे यांनी आजपर्यंत हजारो कामगारांना, गोर गरीब जनतेला न्याय दिला आहे. काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार केला आहे. काँग्रेस पक्षाची उत्तम संघटनात्मक बांधणी केली आहे.सध्या श्रुती म्हात्रे या कोकण श्रमिक संघाच्या अध्यक्षा, शाम म्हात्रे फॉउंडेशनच्या अध्यक्षा, एकता कॅटलीस्ट संघटनेचे अध्यक्षा, आगरी शिक्षण संस्थेचे सहसचिव, आगरी शिक्षण संस्था शाळा समितीचे अध्यक्षा, हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सदस्य असे अनेक पदे भुषवित आहेत. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. त्यांच्या या सर्वच कार्याची दखल घेत त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने श्रुती म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आनंद व समाधान व्यक्त करत पेढे वाढून या निर्णयाचे व निवडीचे स्वागत केले. सर्वच राजकीय पक्षाशी चांगले संबंध असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्रुती म्हात्रे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रुतीताई म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी  माझी निवड घोषित करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी साहेब, AICC सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल साहेब, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनीथला साहेब, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, संघटन सृजन अभियान निरीक्षक रागिणी नायक मॅडम, गटनेते विजय वडेट्टीवार साहेब, गटनेते सतेज पाटील साहेब, CWC सदस्य बाळासाहेब थोरात साहेब, मार्गदर्शक गणेशजी पाटील साहेब, मार्गदर्शक संध्याताई सव्वालाखे मॅडम, पर्यवेक्षक तौफिक मुलानी साहेब, श्रीरंग बर्गे साहेब, आमचे मार्गदर्शक  आर.सी घरत साहेब, प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर साहेब, नंदाताई म्हात्रे, श्रद्धा ताई ठाकूर या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.काँग्रेस पक्षाची विचारधारा, संघटन मजबूत करण्यासाठी मी या पदाचा पुरेपूर वापर करेन. ज्येष्ठाचे मार्गदर्शन घेवून, सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेवून सर्व समजघटकांसाठी कार्यरत राहीन.असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला

आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
भूपाळी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उरण येथे आरोग्य शिबिर राबविण्यात आले . भूपाळी मध्ये वंचित बहुजन आघाडी उरण तालुका उपाध्यक्ष तुषार उत्तम गायकवाड  यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उरण क्रोप्रोली सरकारी दवाखाना मार्फत वैद्यकीय चिकित्सा डॉक्टर  डॉ. पुजा पाटील यांनी नागरिकांना तपासणी केली आणि औषध उपचार करण्यात आले. 

सेक्टर १२ द्रोणागिरी नोड रहिवाशी, भूपाळी सोसायटी द्रोणागिरी नवी मुंबई मधील रहिवाशी, भूपाळी सोसायटी द्रोणागिरी नवी मुंबई मधील रहिवाशी, भैरवी सोसायटी मधील रहिवाशी,भूपाळी गृहसंकूल, मल्हार गृहसंकूल, भैरवी गृहसंकूल आणि सेक्टर १२ मधील रहिवाशांनी महिलांनी  वृध्द व्यक्तींनी शिबीराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला. या शिबिराला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला.क्रोप्रोली सरकारी दवाखाना मधील  डॉ पुजा पाटील,आरोग्य सेवक संदीप पारस्वले, सीमा बंडा आशा सेविका नवघर, अर्पणा बंडा आशा सेविका नवघर,आरोग्य सेवक हेमंत यांचे विशेष सहकार्य लाभले

डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्यावर चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री सचिवालयाकडून कारवाईच्या सूचना !!

डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्यावर चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री सचिवालयाकडून कारवाईच्या सूचना !!

कल्याण , संदीप शेंडगे : कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कथित अनागोंदी कारभार, दलालांचे वाढते हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कामकाजाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्याने मुख्यमंत्री सचिवालयाने याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 

राष्ट्रीय मानव हक्क मंचाचे अध्यक्ष शरद काशिनाथ धुमाळ यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे सादर केलेल्या निवेदनात डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत. कार्यालयात नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असून दलालांच्या माध्यमातूनच कामे होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

प्रशासनिक कामकाजात पारदर्शकतेचा अभाव, कर्तव्यातील दुर्लक्ष, नागरिकांशी गैरवर्तणूक आणि शासकीय नियमांचे उल्लंघन यासंदर्भातही तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, कोकण विभाग यांनी परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आदेश प्राप्त झाल्यानंतर कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चौकशीदरम्यान कार्यालयातील व्यवहार, दलालांची साखळी आणि नागरिकांच्या तक्रारींची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी आरटीओ कार्यालयातील कारभार अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टिटवाळा येथील म्हारळ‘ गावात पिंटया उर्फ डोक्या’ची धारदार शस्त्रान हत्या !!

टिटवाळा येथील म्हारळ‘ गावात पिंटया उर्फ डोक्या’ची धारदार शस्त्रान हत्या !!

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण तालुका पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या  म्हारळगाव परिसरात गुरुवारी रात्री भीषण हत्याकांड घडले यात रविंद्र उर्फ डोक्या यशवंत अहिरे या ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मृत रविंद्र अहिरे हा म्हारळगाव परिसरात वास्तव्यास होता. त्याचा भाऊ राहुल अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक सुखदेव डांगे याच्यासह विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांविरोधात खूणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक एक दीपक डांगे याच्याविरोधात लता माळी नावाच्या महिलेला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास रविंद्र अहिरे याने सांगितल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणातून आरोपींनी कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शुक्रवार दिनांक २२ में रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास म्हारळगाव येथील मलखांब कंपाऊंड परिसरात रविंद्र अहिरे याच्यावर तिघांनी जीवघेणा हल्ला केला.

आरोपींनी धारदार शस्त्राने रविंद्रच्या पोटावर, डोक्यावर, पाठीवर चेहऱ्यावर तसेच शरीराच्या विविध भागांवर सपासप अतिशय निर्गुणपने वार केले. या भीषण हल्ल्यात रविंद्र गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रविंद्रला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि हालचालींचा मागोवा पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

Friday, 22 May 2026

जासई गावाला ऐतिहासिक दिलासा ; मा. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर ठरवले !!


जासई गावाला ऐतिहासिक दिलासा ;  मा. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर ठरवले !!

** बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारे होणारी पाडकाम कारवाई थांबणार, ४०० हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
नवी मुंबई परिसरातील जमीनमालकांसाठी दूरगामी परिणाम करणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयामध्ये, बॉम्बे हाय कोर्ट यांनी उरण तालुक्यातील जासई गावासंदर्भात सिडको यांनी राबविलेली भूसंपादन प्रक्रिया सुरुवातीपासूनच बेकायदेशीर व शून्य (Void Ab Initio) असल्याचे घोषित केले असून, अनेक वर्षांपासून आपल्या मालमत्ता हक्कांवर होत असलेल्या बेकायदेशीर हस्तक्षेपाविरोधात लढा देणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या संपूर्ण कायदेशीर लढ्याचे नेतृत्व अँड. संकेत दिपक ठाकूर यांनी केले. त्यांनी प्रभावित जमीनमालकांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत, योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता करण्यात आलेले भूसंपादन, बेकायदेशीर फेरफार नोंदी, तसेच ग्रामस्थांवर करण्यात आलेल्या दबावतंत्राला आव्हान दिले. शशिकला भोलनाथ पाटील, गोगरी कुटुंब आणि एन. जी. ठाकूर यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या वतीने दाखल करण्यात आलेली ही याचिका आता नवी मुंबई परिसरातील भूसंपादन प्रकरणांमधील एक महत्त्वपूर्ण कायदेशीर विजय मानली जात आहे.

नवी मुंबई प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनांनंतर सिडकोने जासई गावातील मोठ्या प्रमाणातील जमिनी स्वतःच्या नावावर ७/१२ उताऱ्यांमध्ये व महसुली नोंदींमध्ये दाखल करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण झालेली नसताना आणि अनेक जमीनमालकांना कोणतीही नुकसानभरपाई न देता या नोंदी करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर, अशा वादग्रस्त फेरफार नोंदींच्या आधारे पाडकाम नोटिसा बजावण्यात आल्या व ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण गावामध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

ग्रामस्थांचा आरोप असा होता की, सिडकोने या बेकायदेशीर भूसंपादन फेरफार नोंदींचा वापर करून नागरिकांवर तथाकथित “२२.५% योजना” स्वीकारण्यासाठी दबाव निर्माण केला. ग्रामस्थांच्या मते, या योजनेअंतर्गत जमीनमालकांना Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 अंतर्गत मिळणाऱ्या बाजारभावाच्या चारपट नुकसानभरपाईसह २०% विकसित जमीन या कायदेशीर हक्कांपासून वंचित केले जात होते. अनेक ग्रामस्थांनी असा आरोप केला की, चुकीच्या महसुली नोंदी, पाडकामाची भीती आणि प्रशासनिक दबाव यांच्या माध्यमातून जमीनमालकांना संमती देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

अँड .संकेत ठाकूर यांनी  मुंबई उच्च न्यायालयात भूसंपादन प्रक्रियेच्या वैधतेलाच आव्हान देत मांडणी केली की, सिडको व संबंधित प्रशासनाने कायदेशीर तरतुदी, घटनात्मक हक्क आणि सक्तीच्या प्रक्रियांचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. महसुली नोंदींमध्ये नाव चढविणे म्हणजे मालकी हक्क प्राप्त होणे नाही, जोपर्यंत कायदेशीर आणि वैध भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होत नाही, असा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला.

दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये उच्च न्यायालयाने भूसंपादन प्रक्रिया लॅप्स झाल्याचे घोषित करत ती कायद्यानुसार शून्य ठरविली. न्यायालयाने मूळ जमीनमालकांच्या नावे महसुली नोंदी पुनर्स्थापित करण्याचे तसेच सिडकोच्या नावाने करण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले.

तथापि, न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही, संबंधित बेकायदेशीर भूसंपादन नोंदी महसुली अभिलेखांमध्ये कायम राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे ग्रामस्थांना सतत त्रास, मानसिक दबाव आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागत होते. यानंतरअँड.संकेत ठाकूर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली.

दि. ०८ मे २०२६ रोजी मा. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य प्रशासन आणि सिडकोवर तीव्र नाराजी व्यक्त केली व चार आठवड्यांच्या आत बेकायदेशीर भूसंपादन फेरफार नोंदी हटविण्याचे आदेश दिले. तसेच आदेशाचे पालन न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहावे लागेल आणि संबंधित विभागावर खर्च (Costs) लादला जाऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला.

या निर्णयानंतर आता बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारावर सुरू करण्यात येणारी घरांची व संरचनांची पाडकाम कारवाईही थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण सिडकोकडून करण्यात येणाऱ्या अनेक कारवाया या वादग्रस्त महसुली नोंदींवर आधारित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी सातत्याने केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर अशा नोंदींचा कायदेशीर आधारच संपुष्टात आल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाच्या या हस्तक्षेपानंतर आता राज्य प्रशासनाने संपूर्ण जासई गावातील ७/१२ उतारे, फेरफार नोंदी आणि इतर महसुली अभिलेखांमध्ये दुरुस्ती व बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे ४०० हून अधिक प्रभावित कुटुंबांना थेट दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून वादग्रस्त भूसंपादन नोंदींमुळे निर्माण झालेला मालकी हक्कांवरील प्रश्न आता दूर होत आहे. अनेक ग्रामस्थांसाठी ही महसुली दुरुस्ती म्हणजे त्यांच्या कायदेशीर मालकी हक्कांची अधिकृत पुनर्स्थापना मानली जात आहे.

हा निर्णय केवळ जासई गावापुरता मर्यादित नसून, नवी मुंबईतील इतर अधिसूचित गावांमधील जमीनमालकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे कोणतीही विकास प्राधिकरणे कायदेशीर भूसंपादन, नुकसानभरपाई आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण न करता केवळ महसुली नोंदी बदलून खाजगी जमिनींवर हक्क सांगू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

अँड.संकेत ठाकूर यांनी सांगितले की, सिडकोसारख्या प्राधिकरणांकडून होत असलेल्या बेकायदेशीर भूसंपादन आणि मनमानी कारभाराविरोधातील लढा अद्याप सुरू असून, हा निर्णय ही केवळ सुरुवात आहे. ग्रामस्थांना दबावाखाली संमती देण्यास भाग पाडणे, वादग्रस्त फेरफार नोंदींचा आधार घेऊन पाडकामाची भीती निर्माण करणे आणि कायद्याला बगल देणे, अशा प्रकारांविरोधात पुढेही कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जासई ग्रामस्थांसाठी हा निर्णय अनेक वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर त्यांच्या सन्मान, मालकी हक्क आणि सुरक्षिततेची पुनर्स्थापना करणारा ठरला आहे. ग्रामस्थांच्या मते, हा निर्णय म्हणजे बेकायदेशीर भूसंपादन आणि चुकीच्या महसुली नोंदींच्या आधारावर सुरू असलेल्या दडपशाहीतून मिळालेली ऐतिहासिक मुक्तता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत 100 हून अधिक अनधिकृत खोल्या तसेच सुमारे 70 जोते जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोरसे तसेच सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या उपस्थितीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पथक आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.

पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामे परवानगीशिवाय उभारण्यात आली होती. वारंवार नोटिसा देऊनही बांधकामे हटविण्यात आली नसल्याने अखेर ही कठोर कारवाई करण्यात आली.

 या मोहिमेत जेसीबी आणि इतर यंत्रांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी !

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी ! जून, जुलै महिन्य...