Saturday, 9 May 2026

उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन !;

उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन !

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : उरण पोलीस ठाणे हद्दीतील जांभुळपाडा, जासई येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसम करण लक्ष्मण सिंग याचा सायन हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन उरण पोलिसांनी केले आहे. पोलीस ठाणे उरण येथे अकस्मात मृत्यु रजि. नं. २१/२०२६ भा.ना.सु. संहिता कलम १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर देणार पंढरीनाथ वामन पाटील, वय ५२, रा. वंशेणी, ता. उरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत करण लक्ष्मण सिंग याला १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास राहत्या गावाजवळ चक्कर येऊन तो पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर त्याला तातडीने यमुनाबाई रुग्णालय, चिर्ले येथे प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मनपा हॉस्पिटल, वाशी येथे हलवण्याचा सल्ला दिला. वाशीत उपचार घेतल्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री १.३० वाजता त्याला सायन हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले. सायन हॉस्पिटलच्या वॉर्ड नं. ०५ मध्ये त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना १९ मार्च २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजता कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयताचे वय अंदाजे ४३ वर्षे, उंची ५ फूट ४ इंच, केस काळे-पांढरे असून तो फिरस्ता होता व जांभुळपाडा, जासई येथे राहत होता. या प्रकरणाचा तपास पोहवा सचिन दत्तात्रेय पाटील करत असून दाखल अधिकारी सपोनि सतिश गोरे आहेत. मयताच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने उरण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, करण लक्ष्मण सिंग याच्या नातेवाईकांबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी उरण पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. ९५५२५९८९७७७ किंवा तपास अधिकारी पोहवा सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधावा.सदर व्यक्तीचे मार्च मध्ये निधन झाले तरी त्याच्या नातेवाईकांचा अजूनही शोध लागला नाही म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांनी सहकार्य करावे, अशी विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांच्या मार्फत करण्यात आली आहे.

पुण्यातील ४ वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचार-हत्या प्रकरणी पत्रकार उत्कर्ष समितीची नराधमास फाशीच्या शिक्षेची मागणी...

पुण्यातील ४ वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचार-हत्या प्रकरणी पत्रकार उत्कर्ष समितीची नराधमास फाशीच्या शिक्षेची मागणी...

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) :
 पुणे शहरात ६४ वर्षीय वृद्ध नराधमाने केवळ ४ वर्षांच्या निरागस मुलीवर अमानुष बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानवीय, क्रूर व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ उरण तालुक्यातील सुजाण नागरिकांच्या वतीने ‘पत्रकार उत्कर्ष समिती’ मार्फत उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले. सदर नराधम आरोपीचा खटला ‘फास्ट ट्रॅक न्यायालयात’ चालवून ६ महिन्यांत निकाल लावत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.  

निवेदनात म्हटले आहे की, ४ वर्षांची चिमुकली, जिचे जग पाहणेही सुरू झाले नव्हते, तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करून तिचे जीवन संपवणारा नराधम माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. अशा विकृत प्रवृत्तीला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पालकांच्या मनात प्रचंड भीती व संतापाची लाट उसळली आहे.  

आरोपीला फाशी झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल व अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ व कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

उरणच्या तहसीलदारांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन ते मा. जिल्हाधिकारी, रायगड व मा. गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे तात्काळ पाठवून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ‘पत्रकार उत्कर्ष समिती’च्या वतीने पूजा चव्हाण यांनी केली आहे.  

या घटनेमुळे उरण तालुक्यातही संतापाची लाट पसरली असून, “जग पाहण्याआधीच चिमुकलीचा बळी घेणाऱ्या नराधमाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नकोच,” अशी एकमुखी मागणी नागरिकांमधून होत आहे.


निवेदनातील प्रमुख मागण्या : 

१. सदर खटला ‘फास्ट ट्रॅक न्यायालयात’ चालवून ६ महिन्यांच्या आत निकाल लावण्यात यावा.  

२. आरोपीला भारतीय न्याय संहिता व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत कठोरात कठोर, म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील नेमावा.  

३. पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक व मानसिक मदत शासनामार्फत देण्यात यावी.  

४. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळा, अंगणवाडी व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही व पोलीस गस्त वाढवण्यात यावी

Friday, 8 May 2026

ऐरोली-काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात: भूसंपादनाची प्रक्रिया सुरु !!

ऐरोली-काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात: भूसंपादनाची प्रक्रिया सुरु !!

*कल्याण, प्रतिनिधी*

मुंबई फ्रीवेच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या आणि नवी मुंबई ते डोंबिवली अंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांवर आणणाऱ्या *ऐरोली-काटई मुक्त मार्गाच्या* उर्वरित कामाला गती मिळणार आहे.

*भूसंपादनाची प्रक्रिया सुरु*  
ठाणे महापालिका क्षेत्रातील या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस जाहीर केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

*18.33 हेक्टर जागा आवश्यक*  
उर्वरित कामासाठी देसाई गाव 10.3 हेक्टर, डावले 4.92 हेक्टर, शीळ 2.12 हेक्टर, कौसा 0.57 हेक्टर, डोखाळ 0.42 हेक्टर अशा एकूण *18.33 हेक्टर जमिनीचे* भूसंपादन होणार आहे. ही जागा खुली असल्याने कोणाचेही विस्थापन किंवा पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवणार नाही.

*प्रकल्पाचा आढावा*  
*एकूण लांबी*: 12.71 किमी, 3+3 लेन कॅरेजवे  
*टप्पा I*: ठाणे-बेलापूर रोड ते NH-04, लांबी 3.43 किमी. यात 1.69 किमीचा दुहेरी बोगदा व 0.94 किमी उन्नत मार्ग. नागरी कामे 92 टक्के पूर्ण.  
*टप्पा II*: ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड, लांबी 2.57 किमी. काम 100 टक्के पूर्ण.  
*टप्पा III*: NH-04 ते काटई नाका, लांबी 6.71 किमी. काम 10 टक्के पूर्ण. पूर्णत्वाचे लक्ष्य ऑक्टोबर 2028.

*मुख्य फायदे*  
*अंतरात बचत*: मुलुंड ते काटई नाका दरम्यान 7 ते 8 किमी अंतराची बचत.  
*वेळेत बचत*: प्रवासाचा वेळ 30 ते 45 मिनिटांनी कमी होणार.  
*वाहतूक कोंडी कमी*: ऐरोलीतील अंतर्गत रस्ते, ठाणे-बेलापूर रोड, महापे रोड, शिळफाटा जंक्शन, कल्याण फाटा व कल्याण-शीळ रोडवरील ताण कमी होईल.

खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने मेट्रो 12, मेट्रो 5 चा विस्तार, उड्डाणपूल, सॅटिस यांसारखे मेगा प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात राबवले जात आहेत. ऐरोली-काटई फ्रीवे पूर्ण झाल्यावर प्रादेशिक संपर्क अधिक सुलभ होऊन लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास वेगवान होणार आहे.

दहावीचा निकाल 92.09 टक्के: कोकण विभाग सलग अव्वल, मुलींची पुन्हा बाजी !!

दहावीचा निकाल 92.09 टक्के: कोकण विभाग सलग अव्वल, मुलींची पुन्हा बाजी !!

*मुंबई, दि. 15 मे 2026*

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला. यंदाही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

*राज्याचा निकाल 92.09 टक्के*  
यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी *14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी* यशस्वी झाले आहेत. निकाल जाहीर होताच विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

*कोकण विभाग सलग अव्वल*  
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने सलग उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल *97.62 टक्के* इतका नोंदवला गेला. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी *88.41 टक्के* लागल्याची माहिती मंडळाने दिली.

*मुलींची पुन्हा सरशी*  
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आपली सरशी कायम ठेवली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का *94.96* इतका नोंदवण्यात आला असून, मुलांचा निकाल *89.56 टक्के* लागला आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत *5.40 टक्क्यांनी अधिक* ठरला आहे. शिक्षण क्षेत्रात मुली सातत्याने पुढे येत असल्याचे चित्र या निकालातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

*पुढील वाटचालीला सुरुवात*  
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तयारी सुरू केली आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा निकाल भविष्यातील करिअरची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्यभरात आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्साह, आनंद आणि नव्या स्वप्नांची सुरुवात ठरत आहे.

Thursday, 7 May 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सैतवडे बलभिमवाडी येथे 10 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सैतवडे बलभिमवाडी येथे 10 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन  रविवार दिनांक १० मे रोजी रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी रात्री ०९:०० वाजता लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स, त्यानंतर सभा, सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी  दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक व  महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर  यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच  "हा छंद प्रियेचा" हा नाट्यप्रयोग रात्री ठीक १०:३० वाजता आयोजित केला आहे.  लोकप्रिय दिग्दर्शक, प्रसाद धोपट व रणरागिणी ताराराणी नाटक फेम, स्टार प्रवाह वरील 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेमधील 'पूजा' अभिनेत्री 'ज्योती निमसे आदी नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. या सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन लॉर्ड बुद्धा फाउंडेशन सैतवडे बलभिमवाडी यांनी केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचे भव्य पटांगणात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

सौजन्य/ वृत्त - विलासराव कोळेकर सर 

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

उरण मध्ये फसवणूक करून जमीन विक्री करणारी बनावट टोळी सक्रिय.

सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; उरण तालुक्यातील विंधणे वशेणी वेश्वी येथील जमीनीची जाहिरातबाजी.

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : 
उरण तालुक्यातील मोकळे भूखंड विकत देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने १५ गुंतवणूकदारांकडून तब्बल ५७ लाख ३६ हजार रुपये उकळले आहे . त्यांना प्लॉट अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी बेलापूर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तेजस डाकी व त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील टोळीने जून २०२२ मध्ये सीबीडी परिसरात मे. लैंडलॉर्डस् रिअलटर्स या कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी उरण तालुक्यांतील विंधणे , वशेणी व पुनाडे या भागातील मोकळे प्लॉट विकत देण्याची जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीला भुलून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीकडे धाव घेतली. आरोपींनी या गुंतवणूकदारांकडून प्लॉटच्या मोबदल्यात मोठी रक्कम घेतली. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी प्लॉटचा दिला नाही आणि गुंतवणूकदारांचे पैसेही परत केले नाहीत.त्यामुळे गुंतवणूकदारांची मोठया प्रमाणात फसवणूक झाली.

या प्रकरणात फसवणूक झालेल्यांमध्ये पुष्करसिंग रावत याच्यासह प्रवीण चंदनशिव, प्रदीप भाटकर, सुनील वाडकर, कांतीलाल पटेल, गौरव वरसोलकर, राजिंदर सिंग, हफिज अन्सारी, मनोज होळकर, नानी मंडल, तुकाराम ढेपे, सचिन शहाणे, सुनील शेट्टी व इतरांचा समावेश आहे. या सर्वांना मिळून ५७लाख ३६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून या १५ गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.आर्थिक फसवणूक करून खोट्या जमीन खरेदी विक्री करणाऱ्या टोळ्या उरण तालुक्यात सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

संग्राम तोगरे आदिवासी वाडीला आनंद देणारा एक मोठ्या मनाचा माणूस - साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

संग्राम तोगरे आदिवासी वाडीला आनंद देणारा एक मोठ्या मनाचा माणूस - साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : समाज सेवेचे व्रत अंगी घेतलेले कवी संग्राम तोगरे हे मागील कित्येक वर्षांपासून विविध ठिकाणच्या डॉक्टरांकडे शिल्लक राहिलेली आणि गरीब पेशंटना उपयुक्त ठरणारी औषधे गोळा करून योग्य जागी पोहोचविण्यात तोगरे सतत सेवा करीत राहिले आहेत.ते सेवेचे व्रत करतांना त्यांनी काही दात्यांकडून धान्य, डाळ, कपडे गोळा करून गरजूंना दिले आहे. यावेळी आपल्या  ७९ व्या वाढदिवशी तेली पाडा ( मुळेखंड ) येथील नव्या आदिवासी वस्तीवर जाऊन ४० घरकुलांना वरील वस्तूंचे वाटप केले , त्यामुळे वाडीला आनंद देणारा एक माणूस आहेत असा विचार साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल बी पाटील यांनी वाटप प्रसंगी उपस्थितांसमोर मांडला.

दाते चंद्रकांत ठक्कर यांनी ही संग्राम यांचे विषयी गौरवोद्गार काढून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजसेवेत मदत करणा-या संग्राम यांच्या पत्नी सुमन तोगरे, कार्यकर्ते रवी काटे (केगांव), नक्षत्रा संग्राम, उमाजी लक्ष्मण पवार इत्यादी प्रमुखांची उपस्थिती होती. वाडीवरच्या तेथील उपस्थितांनी संग्राम तोगरे दांपत्याला भरभरून सदिच्छा दिल्या.

उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन !;

उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन ! उरण दि ८, (विठ्ठल ममताबा...