Thursday, 16 July 2026

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

*कल्याण : (दिपक मागाडे)* दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी कल्याण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे कराडकर चाळ, शिवाजी नगर बेतुरकर पाडा, कल्याण येथील एका कुटुंबाचे राहते घर पूर्णपणे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवलेले आहे.

ही घटना घडून आठ दिवसांहून अधिक काळ लोटला असूनही कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीची दखल घेतली गेली नसल्याची व पिडित कुटुंबाला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप पिडित कुटुंबाकडून केला आहे.

'क' प्रभाग क्षेत्रातील सहाय्यक आयुक्त यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असतानाही महापालिकेकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला नाही. घटनेच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काही कर्मचारी फक्त येऊन बघून गेले, परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे.

यासंदर्भात पीडितांनी १६/०७/२०२६ रोजी कडोमपा आयुक्तांना लेखी अर्ज दिला आहे. अर्जात म्हटले आहे की, "स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी 'आमच्याकडे अशी तरतूद उपलब्ध नाही' असे उत्तर दिले. त्यामुळे आम्हाला शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागत आहे."

पीडित कुटुंबाने महापालिका आयुक्तांना, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार कल्याण यांना विनंती केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पंचनामा करून नुकसानाची नोंद घ्यावी आणि शासनाच्या नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत व नुकसान भरपाई मंजूर करावी.

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली असून, मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबाला लवकरच न्याय मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मिलापनगर तलावाचे पाणी पुन्हा झाले खराब; जलचरांच्या जीवाला धोका !

मिलापनगर तलावाचे पाणी पुन्हा झाले खराब; जलचरांच्या जीवाला धोका !

*डोंबिवली, प्रतिनिधी* : डोंबिवलीतील मिलापनगर येथील तलावाचे पाणी पुन्हा एकदा खराब झाले आहे. कचरा आणि निर्माल्य टाकल्याने तलावाला उकिरड्याचे स्वरूप आले असून यामुळे जलचरांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे.

*जूनमध्येही घडली होती दुर्घटना*  
मागील जून महिन्यात 03 ते 05 तारखेदरम्यान याच तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले होते. कडक उष्मा, निर्माल्य, कचरा आणि पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता यामुळे मासे मृत झाल्याचे समोर आले होते. 

त्यानंतर बातम्या प्रसिद्ध झाल्यावर केडीएमसीचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. रामदास कोकरे यांनी पाहणी केली होती. त्यावेळी पर्यावरण अभ्यासक वास्तुविशारद श्री. राजीव तायशेटे, पर्यावरण तज्ज्ञ श्री. विजय घोडेकर आणि स्थानिक रहिवासी राजू नलावडे उपस्थित होते. 

राजीव तायशेटे यांच्या सूचनेनुसार मोटर पंपद्वारे तलावातील पाण्याचे एरिएशन करण्यात आले. केडीएमसी कर्मचाऱ्यांनी मृत मासे आणि कचरा काढून तलाव स्वच्छ केला होता. स्थानिक नागरिकांनी "सक्त सूचना व इशारा" असा फलक लावून निर्माल्य व कचरा टाकण्यास मनाई केली होती.

*नियम न पाळल्याने पाणी पुन्हा खराब*  
मात्र गेल्या काही दिवसांपासून काही बेशिस्त नागरिकांकडून पुन्हा तलावात निर्माल्य, कचरा, प्लास्टिक टाकले जात आहे. केडीएमसीचे सफाई कर्मचारी ते काढत असले तरी पाणी खराब झाले आहे.

*स्थानिकांच्या मागण्या प्रलंबित*  
जलचरांचे संरक्षण व्हावे यासाठी स्थानिक जागरूक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केडीएमसीला यापूर्वीच 6 सूचना दिल्या होत्या:  
1.  *कायमस्वरूपी सुरक्षारक्षक/सफाई कर्मचारी* : दिवसासाठी एक कंत्राटी कर्मचारी नेमावा.
2.  *सीसीटीव्ही कॅमेरे* : तलाव परिसरात बसवावेत.  
3.  *इशारा फलक* : निर्माल्य-कचरा टाकू नये यासाठी फलक लावावा.  
4.  *गाळ उपसा* : स्लज पंपाने तळाशी साचलेला गाळ काढावा.  
5.  *नियमित स्वच्छता* : तलावाची नियमित साफसफाई करावी.  
6.  *ताबा देणे* : देखरेखीसाठी तलाव रोटरी क्लब/मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन यांच्याकडे द्यावा.  

परंतु यापैकी एकाही सूचनेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

*केडीएमसीला पुन्हा आवाहन*  
यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी केडीएमसीला तातडीने वरील सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. वेळीच उपाय न झाल्यास तलावातील जलचरांचे जीवन धोक्यात येईल आणि भविष्यात हा तलाव नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वृत्त - राजू नलावडे

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी’ प्रकल्पाचे कौतुक !!

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी’ प्रकल्पाचे कौतुक !!

** रस्ता सुरक्षा व साक्षरतेचा संदेश

विशेष प्रतिनिधी : 
संदीप शेंडगे

महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी-२०२६’ उपक्रमाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी बारामती तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देत शुभेच्छा दिल्या. साक्षरता, नशामुक्ती आणि रस्ता सुरक्षा यांसारख्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, उपशिक्षण अधिकारी सचिन अनंतकवळस आणि भाऊसाहेब सरक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे विभागीय नोडल अधिकारी डॉ. मणिलाल शिंपी यांनी RSP अधिकारी-शिक्षक युनिटच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, रस्ता सुरक्षेची जाणीव आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘ट्रॅफिक सेन्स’ विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी RSP अधिकारी-शिक्षक युनिटच्या कार्याचे विशेष कौतुक करत, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अधिक प्रभावीपणे राबवून समाजात वाहतूक नियमांविषयी जनजागृती वाढविण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांमार्फत रस्ता सुरक्षा संस्कार रुजविल्यास भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात केंद्रप्रमुख अजित नांगरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, स्वयंसेवक राजेंद्र जगे, ह.भ.प. गणेश महाराज भगत, जोशी महाराज, RSP अधिकारी संजय खैरनार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी’ उपक्रमाचे उद्दिष्ट, नियोजन आणि समाजातील विविध घटकांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन करत हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले.

Wednesday, 15 July 2026

NAMASTE दिन उत्साहात साजरा; कचरा वेचक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर !!

NAMASTE दिन उत्साहात साजरा; कचरा वेचक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर !!

भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीत जनजागृती व प्रोफायलिंग उपक्रम संपन्न

ठाणे, दि. १५ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 'NAMASTE Rural (National Action for Mechanised Sanitation Ecosystem)' अभियानांतर्गत NAMASTE दिन मंगळवार, दि. १४ जुलै, २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश कचरा वेचक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रोफायलिंग करून त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण, कौशल्य विकास आणि सन्मानजनक उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता.

NAMASTE Rural ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपाययोजना या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहेत. यामध्ये कचरा वेचकांचे सर्वेक्षण व प्रोफायलिंग, क्षमता विकास, सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी राज्यस्तरावरून प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन, गट विकास अधिकारी, जिल्हा सल्लागार, विस्तार अधिकारी, गट समन्वयक व समूह समन्वयक यांचे आभासी माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामपंचायत अधिकारी (सर्वेअर) यांचेही ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून त्यानुसार प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षण व जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.

कोन ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमास सरपंच रेखा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा सल्लागार दत्तात्रय सोळंके, मास्टर ट्रेनर ज्ञानेश्वर चंदे तसेच मोठ्या संख्येने कचरा वेचक व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना NAMASTE योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यांचे प्रोफायलिंग करण्यात आले.

योजनेअंतर्गत मिळणारे प्रमुख लाभ
NAMASTE योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत –
• NAMASTE ओळखपत्र 
• वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE Kit) 
• आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा संरक्षण 
• लाभार्थ्यांच्या मुलांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती 
• व्यावसायिक सुरक्षा व कौशल्य विकास प्रशिक्षण 
• District Waste Collection Centres (DWCCs) च्या माध्यमातून उद्योजक म्हणून विकसित होण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य 

कल्याण येथील घोलपनगर मधील धोकादायक इमारतीचे बेकायदेशीर पाडकाम !!

कल्याण येथील घोलपनगर मधील धोकादायक इमारतीचे बेकायदेशीर पाडकाम !!

** मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण पश्चिम घोलप नगर परिसरात धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीचे सुरक्षेचे सर्व नियम डावलून खाजगी बिल्डरकडून पाडकाम करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पाडकामादरम्यान इमारतीचा काही भाग थेट रस्त्यावर तसेच महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीवर कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सदर इमारत शेतकरी सहकारी संस्थेच्या मालकीची असून एकूण १४ धोकादायक इमारती आहेत त्यापैकी एका इमारतीवर बिल्डरने जेसीबीच्या साह्याने पाडकाम सुरू होते पाडकामावेळी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तज्ञ आणि अनुभवी अभियंत्यांमार्फत धोकादायक इमारतीचा अहवाल घेण्यात आला नव्हता तसेच सुरक्षित अंतरावर लाईन मार्किंग आणि आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करणे आवश्यक होते तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना इमारतीच्या पालकांना बाबत सूचना करणे गरजेचे होते. या सर्वांना  डावलून बिल्डरने मनमानीपणे इमारतीचे पाडकाम केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता मोठी जीवित व वित्तहानी झाली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने संबंधित बिल्डरला नोटीस बजावली आहे. मात्र यानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.


धोकादायक इमारतींच्या पाडकामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अधिकृत निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नियुक्ती केली असताना, खाजगी बिल्डरला हे पाडकाम करण्याची परवानगी कोणी दिली? अधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाराखाली ही परवानगी दिली? सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत पाडकाम का करण्यात आले? अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
त्यामुळे धोकादायक इमारती पाडकाम प्रकरणी पालखीने एसओपी तयार करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मान्य आहे.
या प्रकाराबाबत प्रभारी सहाय्यक आयुक्त थोरात यांना विचारले असता "संबंधित धोकादायक इमारतीच्या पाडकाम प्रकरणी बिल्डरला नोटीस काढण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला जाईल असे थोरात यांनी सांगितले."


या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि जीवघेण्या पाडकामांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Tuesday, 14 July 2026

द्रोणागिरीतील सलूनमध्ये महिलेचा विनयभंग! "युनिक युनिसेक्स सलून" तात्काळ बंद करा - नागरिकांची संतप्त मागणी

द्रोणागिरीतील सलूनमध्ये महिलेचा विनयभंग! "युनिक युनिसेक्स सलून" तात्काळ बंद करा - नागरिकांची संतप्त मागणी 

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
 महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उरण पोलीस ठाणे हद्दीतील द्रोणागिरी येथील देवकृपा बिल्डिंगमध्ये असलेल्या "युनिक युनिसेक्स सलून" या दुकानात हेअर वॉशसाठी गेलेल्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १२/०७/२०२६ रोजी सकाळी ११ ते ११:३० वा.च्या दरम्यान सदर महिला सलूनमध्ये हेअर वॉश करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे काम करणाऱ्या सोहेल शमशाद शेख, वय २१ वर्ष, राहणार द्रोणागिरी या इसमाने महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीनंतर उरण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

या घटनेमुळे द्रोणागिरी आणि परिसरातील महिला वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. "युनिसेक्स" च्या नावाखाली महिला आणि पुरुष दोघांसाठी एकाच ठिकाणी सेवा देणे हेच मुळात धोकादायक आहे. अशा ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या अब्रूला धोका आहे. 

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, महिलांसाठी स्वतंत्र केबिन, महिला कर्मचारी किंवा किमान सी सी टी व्ही सारख्या मूलभूत सुरक्षा व्यवस्था नसताना अशा सलूनना परवानगी कशी मिळते ? पैशासाठी महिलांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे.

या प्रकरणानंतर उरण आणि द्रोणागिरीतील नागरिकांनी मागणी केली आहे की, "युनिक युनिसेक्स सलून" सारखी सर्व अनधिकृत आणि असुरक्षित सलून तात्काळ बंद करावीत. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व सलूनची तपासणी करून कठोर नियम लागू करावेत.सध्या तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही, मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामविकास अधिकारी वैभव पाटलांवर फौजदारी दाखल करा, अन्यथा बीडीओंवर कारवाई !!

ग्रामविकास अधिकारी वैभव पाटलांवर फौजदारी दाखल करा, अन्यथा बीडीओंवर कारवाई !!

** सीईओ नेहा भोसलेंचा खालापूर पंचायत समितीला दणका

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
खालापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केगांव येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव बाळकृष्ण पाटील यांच्यावर शासकीय निधीचा अपहार आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिले आहेत. यासोबतच, आदेश देऊनही त्यांना अद्याप कार्यमुक्त न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून सुधागड येथील नवघर ग्रामपंचायतीत हजर करण्याचे आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचे निर्देश खालापूरच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

​ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांनी केगांव ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना ग्रामनिधीतून वसूल केलेली रक्कम शासकीय तिजोरीत जमा न करता स्वतः परस्पर खर्च केली तसेच ग्रामपंचायतीच्या मूळ दस्तऐवजांमध्ये बनावट कागदपत्रांचा समावेश करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत १ जुलै २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत संतप्त पडसाद उमटले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी गट विकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आदेशात स्पष्ट बजावले आहे की, वैभव पाटील यांना तात्काळ कार्यमुक्त करून त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि तसा अहवाल तात्काळ जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावा. जर या आदेशाचे विहित मुदतीत पालन झाले नाही, तर गट विकास अधिकाऱ्यांवरही 'महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९' मधील नियम १० अन्वये शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये, असा सज्जड दमही या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल *कल्याण : (दिपक मागाडे)* द...