Wednesday, 1 July 2026

बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी !!

बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व गुणांच्या कौशल्याने कामगारांना न्याय देण्यात सातत्याने यशस्वी होत आहेत. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून यावर्षातील पाचवा पगारवाढीचा करार सोमवार दिनांक २९ जून रोजी करण्यात आला. मे. बाल्मर लॉरी CFS भेंडखळ येथील मे. बिपिन मरीन सर्व्हिसेस या कंत्राटाअंतर्गत काम करत असलेल्या सर्व्हेअर कामगारांसाठी हा तिन वर्षासाठी पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ, यामधे पहिल्या वर्षी ५००० रुपये, दुसऱ्या वर्षी १२५० रुपये व तिसऱ्या वर्षी १२५० रुपये तसेच ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, ३० हजार ते ५१००० हजार बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारानुसार कामगारांना १ मार्च २०२५ पासून पगारवाढीच्या फरकाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, सरचिटणीस वैभव पाटील, बाल्मर लॉरी कंपनीचे एच. आर. हेड सतिश आंदेगावकर, ऑपरेशन सिनियर मॅनेजर रमेश व्ही. आर, बिपिन मरीन सर्व्हिसेस चे डायरेक्टर  बी.डी. पाटील, कामगार प्रतिनिधी अजित ठाकूर, मनोहर ठाकूर, शक्ती पाटील, संदीप वर्तक, सचिन भोईर, सनी भोईर, आदी उपस्थित होते. कामगारांनी याप्रसंगी संघटनेचे आभार मानले

'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान' योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज !!

'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान' योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज !!

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना अंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा रु. ५,००० मानधन देण्यात येते. अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक (दिव्यांगांसाठी ४० वर्षे), कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे योगदान, वार्षिक उत्पन्न रु. ६० हजारांपेक्षा कमी तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इच्छुकांनी महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' पोर्टलवर ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत वय, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला , बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), भूषण जोशी यांनी केले आहे.

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा; हजारो भीमसैनिकांचा एल्गार !!

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा; हजारो भीमसैनिकांचा एल्गार !!

*मुंबई, संदीप शेंडगे* : अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत मुंबईतील आझाद मैदान येथे सोमवारी भव्य 'विराट मोर्चा' काढण्यात आला. राज्याच्या विविध भागांतून हजारो भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

*आनंदराज आंबेडकर, अशोक आंबेडकर यांचे नेतृत्व*  
या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर आणि अशोक आंबेडकर यांनी केले. उपवर्गीकरणाच्या प्रस्तावामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडेल व संविधानाने दिलेल्या समान हक्कांवर परिणाम होईल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

*घोषणांनी दणाणले आझाद मैदान*  
मोर्चादरम्यान "संविधान बचाव", "अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा", "सामाजिक न्याय अबाधित ठेवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र व राज्य शासनाने आरक्षण व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

*शासनाला निवेदन*  
मोर्चानंतर शासन प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, संविधानातील सामाजिक न्यायाची संकल्पना कायम ठेवावी आणि समाजात फूट पाडणारे निर्णय तातडीने थांबवावेत, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

*राज्यभरातून भीमसैनिकांची उपस्थिती*  
बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, ठाणे, पनवेल, कल्याण, भिवंडी, अमरावती अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक सहभागी झाले होते. आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात पंचशील ध्वज, निळा ध्वज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा होत्या.

शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चामुळे आझाद मैदान परिसरात दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे आंबेडकरी समाजातील विविध संघटना मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संगीतमय सुरसंगमात महापुरुषांना मानवंदना; कल्याणात प्रबोधनाचा जागर, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव !!

संगीतमय सुरसंगमात महापुरुषांना मानवंदना; कल्याणात प्रबोधनाचा जागर, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव !!

*कल्याण, दि. 1 जुलै 2026*

कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात "महापुरुषांना संगीतमय मानवंदना" आणि "समाजभूषण पुरस्कार" वितरण सोहळा मंगळवार दि. 30 जून रोजी उत्साहात संपन्न झाला. समाजप्रबोधन आणि मनोरंजनाचा अनोखा संगम यावेळी अनुभवायला मिळाला.

*महापुरुषांच्या विचारांचा जागर*  
विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पत्रकार तसेच नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम दिमाखात पार पडला. गीत, संगीत, निवेदन आणि प्रेरणादायी सादरीकरणाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. संपूर्ण सभागृह देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेले.

*समाजभूषण पुरस्कार वितरण*  
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. 

*सन्मानित मान्यवर*: ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरुद्ध संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष दिलीप मालवणकर, प्रशासकीय अधिकारी प्रशांत मानकर, राजेंद्र साळुंखे, नगरसेवक महेश गायकवाड, समाजसेवक रामजीत जीतू गुप्ता, सुरेश सोनवणे, पुष्पा कांबळे, लताताई एस पडघान. 

*व्हॉईस ऑफ मीडिया पुरस्कार*: पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सचिन बुटाला, सुरेश जगताप, सलीम मन्सूरी, गौतम गवई, संदीप शेंडगे, प्रशांत ढोणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*विशेष उपस्थिती*  
कार्यक्रमाला बिग बॉस मराठी फेम लोकप्रिय कलाकार संतोष चौधरी उर्फ दादूस यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच संघर्षयोद्धा निलेशदादा येलवे, अतुल भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांचे विचार देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला. सामाजिक जाणीव जागृत ठेवत महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tuesday, 30 June 2026

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, प्रतिनिधी :
अन्न व औषध प्रशासनाने 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला.

शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करून संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्टमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन होत असल्याने १८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करून परवाना निलंबित करण्यात आला.

याशिवाय, ताथवडे (पुणे) येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; शाळा प्रवेशासाठी लाच घेताना दोघे जाळ्यात !!

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; शाळा प्रवेशासाठी लाच घेताना दोघे जाळ्यात !!

*ठाणे, दि. २९ जून* : ठाण्यातील एका खासगी शाळेत इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी लाच मागून त्यातील रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे खासगी शैक्षणिक प्रवेशातील गैरप्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राबोडी येथील तक्रारदार महिलेच्या मुलीचा घोडबंदर रोड परिसरातील खासगी शाळेत प्रवेश करून देण्यासाठी आरोपींनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

तडजोडीनंतर आरोपींनी लाचेच्या रकमेपैकी ७७ हजार ३०० रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. फातिमा अन्सारी (वय ३५, रा. राबोडी, ठाणे) आणि चैतन्य प्रदीप प्रधान (रा. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुधाकर शिंदे आणि उपअधीक्षक भगवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष नावलगी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलच्या वतीने नितीन ठाकरे यांना शुभेच्छा !

रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलच्या वतीने नितीन ठाकरे यांना शुभेच्छा !

*उरण, दि. ३० (विठ्ठल ममताबादे)* : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदी पदोन्नती झाल्याबद्दल तसेच वाढदिवसानिमित्त रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे, पनवेलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी चंद्रकांत महादेव गुजर, रमेश आगरे, संजय चाळके, प्रशांत भेकरे, अमोल धुमाळी व वसंत सोनावणे उपस्थित होते. नितीन ठाकरे यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी !!

बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी !! उरण दि ३०...