Thursday, 5 February 2026

उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव !

उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव !

** भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा दिव्य संगम

जळगाव, प्रतिनिधी, राहुल बैसाणे :

अमळनेर तालुक्यातील उदयनगर (डांगर बु.) येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह यंदा रौप्य महोत्सवाच्या मंगलमय पर्वात प्रवेश करत आहे. दि. ९ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी नटलेला हा सप्ताह संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा अद्वितीय संगम घडवणार आहे.

या पवित्र सप्ताहाचे प्रेरणास्थान स्वर्गीय उदयबापू असून त्यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या विचारांना अभिवादन म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने आयोजित केला जातो. गेल्या पंचवीस वर्षांत या कार्यक्रमाने गावाच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा दिली असून उदयनगर हे परिसरातील एक महत्त्वाचे अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करू लागले आहे.

भव्य उद्घाटन सोहळा व मान्यवरांची उपस्थिती...
रौप्य महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी पार पडणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी खासदार सौ. स्मिताताई उदयजी वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन,
श्री. दुशन्त वाघ यांच्या हस्ते कलशपूजन,
तर सरपंच श्री. प्रकाश रंगराव वाघ यांच्या हस्ते विना पूजन संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यापासूनच संपूर्ण सप्ताहात भक्तीमय आणि मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे.

दैनंदिन धार्मिक कार्यक्रम – भक्तीचा अखंड प्रवाह
या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण गावात सतत नामस्मरणाचा गजर ऐकू येणार आहे.
काकडा आरती: पहाटे ५.०० ते ६.००
भागवत कथा: सकाळी ८.०० ते ११.००
हरिपाठ: सायंकाळी ५.०० ते ६.००
हरिकीर्तन: रात्री ९.०० ते ११.००
या माध्यमातून गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच भाविक अध्यात्मिक अनुभूती घेत आहेत.

नामवंत कीर्तनकारांची पर्वणी
या रौप्य महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यातील नामवंत व अनुभवी कीर्तनकारांची कीर्तन सेवा. या कीर्तनांमुळे भक्तीबरोबरच प्रबोधन, समाजजागृती आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळणार आहे.
दि. ९/२/२०२६: ह.भ.प. चेतन महाराज, मालेगाव
दि. १०/२/२०२६: ह.भ.प. भगवान महाराज
(मानकरी – प्रकाश वसंतराव पाटील)
दि. ११/२/२०२६: ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज
(मानकरी – प्रकाश महादू पाटील)
दि. १२/२/२०२६: ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज
(मानकरी – रोहिदास तुकाराम पाटील)
दि. १३/२/२०२६: ह.भ.प. रविकिरण महाराज
(मानकरी – आई तुळजाभवानी मित्रमंडळ, बाप्पा गल्ली)
दि. १४/२/२०२६: ह.भ.प. गजानन महाराज
(मानकरी – सुभाष नामू पाटील)
दि. १५/२/२०२६: ह.भ.प. विश्वनाथ महाराज
(मानकरी – परशुराम आत्मराम पाटील)
दि. १६/२/२०२६: काल्याचे कीर्तन – ह.भ.प. आदिनाथ महाराज
(मानकरी – किशोर भिकनराव वाघ)
पालखी सोहळा – भक्तीचा जनसागर

रौप्य महोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे दि. १५ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत आयोजित भव्य पालखी सोहळा. या सोहळ्यात गावातील व परिसरातील हजारो भाविक सहभागी होणार असून टाळ-मृदंगांच्या गजरात, हरिनामाच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तीमय होणार आहे.

महाप्रसाद व भंडारा – सेवा आणि समतेचे दर्शन
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी भोजन खुले राहणार आहे. या उपक्रमातून सेवा, समता, बंधुता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जाणार आहे.
ग्रामस्थांचे अतुलनीय योगदान

या रौप्य महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण वर्ग, महिला मंडळ तसेच असंख्य स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेत आहेत. नियोजन, सजावट, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, निवास व्यवस्था, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, आरोग्य सेवा आदी प्रत्येक बाबीसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संपूर्ण गाव एकजुटीने हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत असून त्यामुळे सामूहिक सहभाग, सामाजिक बांधिलकी व संघटनेचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे.

त्याचप्रमाणे भागवत कथा मानकरी हनुमंत महारु कापडणे त्याचप्रमाणे दहीहंडी काल्याचे कीर्तन मानकरी  गोकुळ महारु पाटील त्याचप्रमाणे महाप्रसाद मानकरी सुभाष अभिमन पाटील त्याचप्रमाणे साउंड सिस्टम मानकरी दीपक बारकू सोनवणे त्याचप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती पहाटे 5ते 6 त्याचप्रमाणे भागवत कथा सकाळी 8 ते 11 हरिपाठ सायंकाळी 5ते 6 त्याचप्रमाणे हरिकीर्तन रात्रीं 9ते 11 त्याचप्रमाणे  भागवत कथाकार ह.भ. प चेतन महाराज मालेगाव गावातील जेष्ठ मार्गदर्शक व तरुण वर्ग व गावातील समस्त गावकरी मंडळी त्याचप्रमाणे धुडकू अभिमन पाटील, शांताराम सिताराम, प्रकाश दगडू पाटील, संजय दगडू पाटील, रविंद्र माधवराव पाटील, वासुदेव रामभाऊ पाटील  विजय तोताराम खैरनार, देविदास खैरनार, राजेंद्र भबुता वाघ, सुक्राम सोनवणे तलाठी, आप्पा बन्सीलाल बुधा, सोनवणे महेश, श्रीराम किशोर सोनवणे, परशुराम आनंदा व चुडामन हरी पाटील, भटू कौतिक किरण महाराज, सतिश भाईदास, श्याम वाघ, राजेंद्र खैरनार  जितेंद्र पाटील  एकनाथ बाबूलाल पाटील, अशोक धुडकू भिल, उदय कापडणे, नरेंद्र कापडणे, गणेश बुधा पाटील, गोरख महादू, राकेश दामू  वसंत सुतार, हिरामण परभत पाटील, बापू लॅक्समन पाटील, प्रकाश वंजारी  रोहिदास वंजारी, धनराज वंजारी, प्रवीण माधवराव पाटील, नरेंद्र शांताराम पाटील, कैलास पोपट पाटील, पुंजू दयाराम पाटील, धर्म राज भिका वाघ, अशोक गोपीचंद मोरे, संभाजी बैसाने, संतोष बैसाने, मधुकर दशरथ भिल, दगडू खैरनार, मांचीनद्र भिल, सुपडू दगडू भिल, चंद्रकांत कापडणे, तुषार कापडणे लोटन निबा, आनंदा गोरख कापडणे,  भालेराव चैत्राम, राजेंद्र चिंधा, भटू सोनार, बन्सीलाल बोरसे  कैलास खैरनार, अनिल गंगाराम पाटील, विलास नेरकर, बापू राजाराम बाविस्कर, विनायक सोनवणे, सुदाम शिवा सोनवणे, संपत बोरसे, सुधाकर बोरसे, रघुनाथ ना मु पाटील, शांताराम सोनवणे, जितेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर शिवाजी पाटील, गुलाब दिगंबर, विनायक नामदेव, सुभाष वाणी, राजेंद्र वाणी, बाबाजी वाणी, भटू शिवाजी, रामदास बापू, योगेश कापडणे, गोकुळ येवले अश्या प्रकारे असंख्य कार्यकर्ते ह्या रौप्य मोहस्तव कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी चिकाटीने मेहनत घेत आहे सर्व गावकरी मंडळ व महिला मंडळ  रौप्य अखंड हरिनाम कीर्तन सेवा आनंदाचे वातावरण पसरले आहे 

भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या पवित्र रौप्य महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

पडघे गावाच्या मुख्य वळणावर पथदिव्यांचा अभाव; अपघाताचा धोका वाढला !

पडघे गावाच्या मुख्य वळणावर पथदिव्यांचा अभाव; अपघाताचा धोका वाढला !

** लोकधारा प्रतिष्ठानकडून तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव) 

भिवंडी तालुक्यातील पडघे गावाच्या मुख्य वळणावर अद्यापही पथदिव्यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील पडघा टोल नाक्यापासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर असलेल्या पडघे गावाच्या मुख्य वळणावर, बिकानेर दुकानासमोर तसेच नाशिककडून येताना शेरेकर पाडा मार्गे पडघे गावात प्रवेश करताना रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार पसरलेला असतो. या मार्गावरून नाशिक–भिवंडी दरम्यान मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहने सातत्याने ये-जा करत असतात. महामार्गावरून अचानक पडघे गावाकडे वळण घेताना योग्य प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली असून स्थानिक नागरिक, पादचारी, विद्यार्थी तसेच रात्री कामावरून घरी परतणारे कामगार यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला अनेक वर्षे उलटून गेली असतानाही या महत्त्वाच्या वळणांवर अद्याप पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही, ही बाब आश्चर्यकारक आणि चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी पथदिवे नसणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन लोकधारा प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पडघा टोल नाक्यापासून सुमारे १०० ते २०० मीटर परिसरातील दोन्ही बाजूंच्या पडघे मुख्य वळणांवर तातडीने पथदिवे बसवावेत, अशी ठाम मागणी लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग क्रमांक ३ चे प्रकल्प संचालक यांच्याकडे ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन सादर करून सदर ठिकाणी त्वरित प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. पथदिवे बसविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Wednesday, 4 February 2026

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार !

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार !

मुंबई (शांताराम गुडेकर)
                शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभाच्यावतीने शिवसेना नेते,खासदार,  ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा.श्री.अनिल भाऊ देसाई साहेब यांच्या आदेशानुसार तसेच ग्रा.सं.क. सचिव मा.श्री.निखिलजी सावंत साहेब व अशोक शेंडे साहेब यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका एन  विभागामधील झालेल्या २०२६ मुंबई महानगरपालिका मधील निवडणुकीमध्ये निवडून आलेले घाटकोपर पश्चिम मधील शाखा क्रमांक १२३  नगरसेवक पदी निवडून आलेले मा.श्री सुनीलजी मोरे साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकारी यांच्यावतीने श्री.सुनील मोरे साहेब यांना अभिनंदन करण्यात आले.
              तसेच कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत खोपकर यांच्या माध्यमातून वार्ड क्र १२३ कक्ष प्रतिनिधी यांना नियुक्ती पत्र देऊन नगरसेवक श्री. सुनील मोरे साहेब यांच्या हस्ते ग्रा.स.क.  नवीन  प्रतिनिधी,श्री.रियाज शेख,श्री.प्रमोद जाधव,श्री.सचिन भालेकर, यांना नियुक्तीपत्र पत्रक देऊन नियुक्ती करण्यात.
            यावेळी घाटकोपर पश्चिम कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत वि. खोपकर, कक्ष प्रसारक श्री. अनंत पवार, कक्ष उपसंघटक श्री.राजेंद्र पेडणेकर १२३,१२४, श्री.संतोष चांदे वार्ड संघटक १२३,कक्ष प्रतिनिधी रियाज शेख, प्रमोद जाधव, सचिन भालेकर  उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा !!

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा !!

महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याची सर्वत्र चर्चा.

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : नवघर जिल्हा परिषद गटातून उभे असलेल्या प्रेरणा कुणाल पाटील, भेंडखळ पंचायत समिती गणातून उभे असलेले उमेदवार दीपक सुरेश भोईर,नवघर पंचायत समिती गणातून उभे असलेले उमेदवार परेश धनाजी ठाकूर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून या तिन्ही उमेदवारांची निशाणी मशाल आहे.या तिन्ही उमेदवारांनी आपापल्या परिसरात, विभागात जोरदार प्रचार सुरू केला असून गावोगावी घराघरात जाऊन नागरीकांशी,जनतेशी उत्तम संवाद साधत आहेत. या प्रचारादरम्यान जनतेचाही उत्कृष्ट प्रतिसाद पाहायला मिळत असून या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत आहे. दिवसेंदिवस हा पाठिंबा वाढतच चालला आहे. 

जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे व जनतेच्या समस्या सोडणारे हे उमेदवार असल्याने नागरिकांनी या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.प्रेरणा पाटील, दीपक भोईर, परेश ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून या उमेदवारांचा विजय हा निश्चित मानला जात आहे.गावोगावी घरोघरी  नागरिक, ग्रामस्थ महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रेमाने आपुलकीने स्वागत करीत आहेत.त्यांना जिंकून येण्यासाठी आशीर्वाद देत आहेत. आता मतदान काही दिवसावर आले असताना प्रचार रंगात आलेला आहे. नवघर गावात झालेल्या प्रचारात प्रेरणा पाटील,परेश ठाकूर व भेंडखळ, हनुमान कोळीवाडा आदी विविध गावा मध्ये दीपक भोईर यांनी केलेल्या प्रचारात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.प्रेरणा पाटील, दीपक भोईर, परेश ठाकूर हे बहुमताने निवडून येतील अशी चर्चा संपूर्ण उरण तालुक्यात सर्वत्र सुरू आहे

महाविकास आघाडीवर मनसेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची नाराजी !

महाविकास आघाडीवर मनसेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची  नाराजी !

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आम्हाला विश्वासात न घेता ते जर का जाणून बुजून आम्हाला टाळत असतील तर हा आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा अपमान आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत आमचा काहीही संबंध नाही. भविष्यात जो पक्ष आम्हाला संधी देईल. त्याच पक्षाला आम्ही या निवडणुकीत मदत करणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी मंगळवारी (दि.३) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एका विशिष्ट उद्दिष्टासाठी आम्हाला हा निर्णय घेणे हिताचे वाटते. त्यासाठी प्रसंगी भाजपसोबत जरी जावे लागले तरी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असेही संदेश ठाकूर व सत्यवान भगत व  यांनी सांगितले.

 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ७ फेब्रुवारीला  पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, प्रचारात रंगत आली आहे. प्रचारही जवळजवळ अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आम्हाला प्रचारात सहभागी करून घेत नाहीत. किंवा महत्त्वाच्या सभा, बैठकांनाही  बोलवत नाहीत. त्यामुळे येथील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, महाविकास आघाडी ताकद दाखविण्यासाठी आमच्या मनसेच्या पक्षाचे झेंडे,  चिन्ह, फोटो प्रचारात वापरत असल्यामुळे, मनसेचे कार्यकर्ते संतापले आहेत.
प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आमची भूमिका मांडण्यासाठी हे आम्ही पाऊल उचलले असून आमचा त्यांच्याशी या निवडणुकीत कोणताही संबंध नाही. त्यासाठी हि तातडीने पत्रकार परिषद घेतली असून, बातमीच्या माध्यमातून हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. महाविकास आघाडी आम्हाला विश्वासात घेत नाही. यासाठी आम्ही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांशी मोबाईलद्वारे वेळोवेळी संपर्क साधला. मात्र संपर्क करत असताना संपर्क झालाच नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या महाविकास आघाडीच्या लोकांकडून आमच्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण झाल्या नसून आमचा भ्रमनिरास झाला आहे. आम्हाला जर सोबत घेऊन प्रचाराचे काम करत नसाल तर आमच्या पक्षाचे प्रचारात झेंडे, चिन्ह, फोटो वापरण्याचा अधिकार तुम्हाला नाही. यासाठी आम्ही त्यांच्या वरिष्ठांना लेखी पत्र व्यवहार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील भगत यांनी सांगितले. घटक पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो. परंतु तुम्हाला आमची गरजच भासत नसेल तर आम्ही तुम्हाला का मदत करायची? आवरे पंचायत गणातून मनसेतून आम्ही सुषमा अनिल गावंड यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी आवरे गणात आम्ही जोरदार प्रचारही सुरू केला आहे. तिरंगी लढत होऊन आमचा विजय कसा होईल. हे आम्ही दाखवून देणार आहोत. तालुक्यात ग्रामपंचायतींमध्ये आमचे पाच ते सात सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी काहींना उपसरपंच पदे मिळाली आहेत. त्यामुळे तालुक्यात आमची  ताकद आहे. भविष्यात आम्हाला यापेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत. त्या जपायला हव्यात. त्यासाठी हा निर्णय घेतला आहे.  मनसे  ज्या पक्षाच्या सोबत जाईल तिथे आम्ही किंग मेकर राहणार आहोत. असेही भगत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मनसेच्या उमेदवार सुषमा गावंड यांचे पती अनिल गावंड उपस्थित होते.

उरणला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन

उरणला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन 

** शोकसभेला सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी, अजितदादा यांना वाहिली श्रद्धांजली, अजितदादांच्या आठवणीला दिला उजाळा.

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला लोकनेता हरपला असल्याच्या भावना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नुकतेच मुंबईहून बारामतीकडे जाताना बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. या घटनेने महाराष्ट्रसह देशभर शोक व्यक्त केला जात असताना, उरण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(अजित पवार गट) उरण तालुका अध्यक्ष परिक्षित ठाकूर यांच्या वतीने उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये अस्थिकलश पूजन व शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वेळी महेंद्र ठाकूर हे आपल्या शोक भावना व्यक्त करताना बोलत होते. 

यावेळी अस्थि कलशाचे पूजन करून, माणकेश्वर येथील समुद्रात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यापुढे बोलताना महेंद्र ठाकूर यांनी दादांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रशासनावर त्यांची पकड होती. दादांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी संपूर्ण महाराष्ट्राची हानी झाली आहे. असे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी राजकारणातील धुरंदर लोकाभिमुख नेतृत्व महाराष्ट्रने गमावले आहे. दादा हे दादाच होते. दादांच्या विशेष योगदानामुळे ते नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहतील.अशा संतोष ठाकूर यांनी शोक भावना व्यक्त केल्या.युवा नेते तेजस डाकी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादा यांच्या आठवणीना उजाळा दिला. अजितदादा सारखे नेते पुन्हा होणार नाही दादा एक आदर्श राजकारणी होते असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित परीक्षित ठाकूर यांनीही अजितदादा यांच्या अनेक आठवणी सांगितल्या अजितदादा यांची काम करण्याची पद्धत आदर्श होती. कोणतेही काम लगेच करायचे. दादांचे कार्य सर्वांना कायम लक्षात राहिल. अजितदादा सर्वांच्या हृदयात राहतील अजितदादा यांच्या जाण्याने राज्याचे, पक्षाचे व व्यक्तिशः माझेही नुकसान झाले आहे. अजितदादा यांची उणीव नेहमी भासत राहिल. अजितदादा यांच्या जाण्याने देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे मत परीक्षित ठाकूर यांनी व्यक्त केले.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांबरोबर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक स्पष्ट व निर्भीड व्यक्तिमत्व आपल्यातून हरपल्याच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, उपनगराध्यक्ष रवि भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान म्हात्रे, राजिप माजी सदस्य वैजनाथ ठाकूर, राजिप माजी सदस्या कुंदा ठाकूर, राजिप माजी सदस्य विजय भोईर,आदर्श शेतकरी प्रकाश ठाकूर,ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो, पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र घरत, प्रकाश ठाकूर,सीमा घरत, अँड भार्गव पाटील, मनोज भगत, चिंतामण गायकवाड, युवा नेते तेजस डाकी, रमाकांत म्हात्रे, नरेश घरत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहुन त्यांच्या आत्म्यास चिरशांतीसाठी प्रार्थना केली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी अस्थी कलश पूजन व शोक सभेचे आयोजन केले होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात शोक सभा संपन्न झाली

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा..

** कर्मचारी घरी बसून घेत आहेत पगार.. 


कल्याण | प्रतिनिधी गोविंद प्रजापती

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागामुळे शहरातील स्वच्छतेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे.
एकीकडे नागरिकांकडून युजर चार्जेस घेतले जातात,

पण दुसरीकडे अनेक सफाई कर्मचारी कामावर न येता घरी बसून पगार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, १० प्रभागांमध्ये तब्बल ४९ कर्मचारी पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ गैरहजर असल्याचे उघड झाले आहे.

महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५६ अंतर्गत कारवाई होते, असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात फक्त नोटीस देऊन कर्मचाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप आहे.

काही कर्मचारी राजकीय वरदहस्ताचा वापर करून काम टाळतात, अधिकाऱ्यांना दमदाटी करतात आणि त्यामुळे रस्त्यांवर कचरा साचतो, गटारे तुंबतात.

४०० ते ५०० कर्मचारी इतर खात्यांत काम करत असल्याने
स्वच्छतेचा भार काही मोजक्याच कर्मचाऱ्यांवर पडतो.

आता नागरिकांचा सवाल एकच —
👉 काम न करणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी?
👉 घरी बसून पगार घेणाऱ्यांना सेवेतून काढणार का?

नवीन महापौर–उपमहापौरांकडून
कल्याण–डोंबिवलीकरांना ठोस बदलाची अपेक्षा आहे.
— कल्याण प्रतिनिधी








उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव !

उदयनगर (डांगर बु.) येथे २५ वा अखंड हरिनाम सप्ताह व रौप्य महोत्सव ! ** भक्ती , परंपरा आणि सामाजिक एकतेचा दिव्य संगम जळगाव, प्रतिन...