Sunday, 17 May 2026

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल*

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल*

*मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी*

मुंबई, (विलासराव कोळेकर सर) :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष पटकारे यांनी महाराष्ट्र शासन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

१५ मेपासून खारपाडा टोलनाका अचानक सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता टोल वसुली सुरू करण्यात आल्याचा आरोप पटकारे यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या व अपूर्ण अवस्थेतील मुंबई-गोवा महामार्गामुळे शेकडो अपघात झाले असून हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या ८४ किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण आजही पूर्ण झालेले नाही. २००९ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सुरुवातीला ९२२ कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प खर्च वेळेत काम पूर्ण न झाल्याने तब्बल १२०० कोटींवर पोहोचल्याचे पटकारे यांनी नमूद केले. निकृष्ट दर्जाचे काम व रखडलेले बांधकाम यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग संघर्ष समितीचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

खारघर टोलनाक्याप्रमाणे या टोलनाक्यावरही खाजगी वाहनांना संपूर्ण टोलमुक्ती देण्यात यावी, अशी मागणी करत समस्त कोकणवासीयांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची वेळ आल्याचे पटकारे यांनी म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो प्रवासी दरवर्षी गोव्याकडे प्रवास करतात. त्यामुळे महाराष्ट्र शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून कोकणवासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी संतोष पटकारे यांनी केली आहे.

जेएनपीए शाळा प्रकरण: हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासनाची नरमाई; पण माध्यमांच्या विभाजनामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण !!

जेएनपीए शाळा प्रकरण: हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासनाची नरमाई; पण माध्यमांच्या विभाजनामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण !!

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथेरिटी (JNPA) परिसरातील दोन नामांकित शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर जेएनपीए प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे. न्यायालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवतानाच, आता या वादात शिक्षकांच्या नोकरीचा आणि पगाराचा एक नवा गंभीर पेच समोर आला आहे.

      पुढील सुनावणीपर्यंत शाळा बंद करण्याबाबत किंवा पालकांवर कोणतीही सक्तीची कारवाई करणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिले. शाळेचे व्यवस्थापन स्वीकारण्यास कोणत्या संस्था इच्छुक आहेत, त्यांचे अधिकृत पत्र रेकॉर्डवर आणण्यासाठी प्रशासनाने कोर्टाकडे वेळ मागितला आहे. न्यायमूर्ती रिया छागला आणि अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने १३ मे नंतर मुलांचे शिक्षण विस्कळीत होऊ नये म्हणून पालकांची विनंती मान्य करत पुढील सुनावणी ११ जून निश्चित केली आहे

       न्यायालयीन लढाईत २२०० विद्यार्थ्यांचे भविष्य तूर्तास सुरक्षित झाले असले, तरी शाळा चालवण्यासाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी वेगवेगळ्या संस्था आल्यास शिक्षकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे:

      सध्या मराठी माध्यमाचे काही अनुभवी शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या वर्गांनाही शिकवत आहेत. संस्था वेगवेगळ्या झाल्यास या शिक्षकांचे समायोजन धोक्यात येईल. नवीन संस्था आल्यास त्या केवळ आपल्या  अखत्यारीतील मान्यता प्राप्त शिक्षकांचाच विचार करतील त्यामुळे जुन्या शिक्षकांच्या पगार आणि सेवाशर्ती रखडण्याची दाट शक्यता आहे. मराठी माध्यम आमचे नाही इंग्रजी माध्यम आमचे नाही अशी भूमिका घे दोन्ही संस्था शिक्षकांकडे दुर्लक्ष करू शकतात ज्यामुळे शिक्षकांना वालीच उरणार नाही. 

     शिक्षकांच्या मते गेल्या ३५ वर्षांपासून दोन्ही माध्यमे एका संस्थेच्या छत्राखाली यशस्वीपणे कार्यरत आहेत त्यामुळे भविष्यातही शाळा कोणत्याही एकाच सक्षम आणि सर्वसमावेशक संस्थेकडे सोपवण्यात यावी. एका संस्थेकडे नियंत्रण राहिल्यास दोन्ही माध्यमातून शिक्षकांचे समन्वय टिकून राहील कोणावरही अन्याय होणार नाही. ११ जून रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीत हायकोर्ट विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतच या शिक्षकांच्या रोजगाराबाबत काही निर्देश देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑनलाईन औषध विक्री विरोधात २० मे रोजी उरणसह देशभरातील केमिस्टचा 'एक दिवसीय बंद'; शासकीय कार्यालयांना दिले निवेदन !

ऑनलाईन औषध विक्री विरोधात २० मे रोजी उरणसह देशभरातील केमिस्टचा 'एक दिवसीय बंद'; शासकीय कार्यालयांना दिले निवेदन !

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
केंद्र सरकारच्या ऑनलाईन औषध विक्री धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी भारत देशातील सर्व केमिस्ट दुकानदारांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे अंमली पदार्थांसारखी नशा आणणारी व व्यसन जडवणारी औषधे सहज उपलब्ध होण्याची भीती असून, याचा समाजावर अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतो. या धोक्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, उरण येथील 'हॉटेल आनंदी' येथे 'उरण तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन'ची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. 

       रायगड जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष लीलाधर पाटील आणि जिल्हा सचिव प्रवीण नावंदर यांच्या सूचनेनुसार, बंद दरम्यान नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून केवळ 'इमर्जन्सी पेशंट' (अतितातडीचे रुग्ण) यांच्यासाठी औषध पुरवठा सुरू ठेवण्याची विशेष सूचना करण्यात आली आहे. 

       उरण तालुक्यातील हॉटेल आनंदी येथील बैठकीत उरण तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष उमाकांत पानसरे, तालुका सचिव राजेश्वर पाटील आणि तालुका ओबीसी प्रतिनिधी मनोज ठाकूर यांनी उपस्थित सर्व सभासदांना या आंदोलनाचे गांभीर्य पटवून देत सविस्तर मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील सर्व केमिस्ट सभासदांनी या बंदला जाहीर सहमती दर्शवली. बैठकीच्या शेवटी सर्व औषध विक्रेत्यांनी 'केमिस्ट एकता जिंदाबाद' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. 

    या बंद आंदोलनाची अधिकृत माहिती आणि जिल्हा असोसिएशनचे निवेदन उरण मधील प्रमुख शासकीय कार्यालयाने देण्यात आले. यामध्ये  आमदार कार्यालय उरण,तहसीलदार कार्यालय, उरण पोलीस स्टेशन उरण या सर्व कार्यालयामध्ये २० मे रोजीच्या भारत बंद बाबत अधिकृत निवेदन सुपूर्द  करण्यात आली आहे. त्याप्रसंगी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी केमिस्ट असोसिएशनला प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचा असा कार्यात्मक आश्वासन दिले नागरिकांनीही राष्ट्रीय जनहितार्थ बंदला सहकार्य करावे असे आवाहन असोसिएशन  तर्फे करण्यात आले आहे.

मोरा मत्स्यव्यवसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न !!

मोरा मत्स्यव्यवसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न !!

** माजी आमदार  मनोहरशेठ भोईर, उरण नगराध्यक्ष  भावना घाणेकर व माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील मोरा येथील मोरा मत्स्यव्यवसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित यांच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास उरण चे माजी आमदार  मनोहरशेठ भोईर, उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे, उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, गटनेते व नगरसेवक  अतुल ठाकूर,नगरसेविका नायदा ठाकूर, नगरसेविका श्रीमंती वंदना पवार, उपशहरप्रमुख  कैलास पाटील, डॉ नयना ठाकुर, विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ व मान्यवर पदाधिकाऱ्याची शिबिरास उपस्थिती लाभली होती, न्यू इंग्लिश स्कूल मोरा कोळीवाडा, उरण येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव  नारायण पांडुरंग कोळी यांच्या हस्ते करण्यात आले, शुश्रुषा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, पनवेल, मॅक्स विजन सुपर स्पेशलिस्ट आय हॉस्पिटल, द्रोणागिरी व श्री पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, उरण यांच्या सहकार्याने आयोजित केलेला या शिबिरात ई सी जी तपासणी, रक्ताच्या विविध चाचण्या तपासणी, नेत्र तपासणी, शुगर व बीपी तपासणी करण्यात आली या शिबिरास मोरा विभागातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला
 
सदर मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन मोरा मत्स्यव्यवसायिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादितचे अध्यक्ष  राकेश नामदेव कोळी, उपाध्यक्ष कल्पना जितेंद्र मोरेकर, सचिव  नारायण पांडुरंग कोळी, सदस्य  हेमंत गोविंद कोळी,  शेखर रामा कोळी, सुनील भगवान कोळी, प्रशांत दत्ताराम कोळी,  सुहास भरत कोळी,  नंदादीप मोरेश्वर कोळी,  गजेंद्र कैलास कोळी, मयूर राम पांचाळ,  जयेश हरीचंद्र कोळी, पूजा सदानंद कोळी,  आरती शेखर कोळी, मार्गदर्शक  सुनील गायकवाड व कार्यकर्ते यांनी केले होते.

अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाची बैठक उत्साहात संपन्न !!

अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाची बैठक उत्साहात संपन्न !!

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाची बैठक उरण मध्ये संपन्न झाली. देशातील प्रमुख ११ बंदरात काम करणाऱ्या कामगार महासंघाची बैठक नागाव उरण मध्ये संपन्न झाली. बैठक नाव्हा शेवा बंदर कामगार संघटना ( अंतर्गत ) तर्फे आयोजित करण्यात आले होते. या बैठकी मध्ये देशातील प्रमुख बंदरात काम करणाऱ्या कायम स्वरूपी व कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाबतीत सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्यक्रम ठरविण्यात आले. संरक्षणच्या व आयात निर्यात व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचा उद्योग देशी व विदेशी कंपन्यांना देण्यात येत आहे. कायम स्वरूपी कामगार कमी करून त्यांचे जागेवर सर्वत्र कंत्राटी कामगार भरण्यात येत आहेत. समान काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तुटपुंजा पगार देउन रबावले जात आहे. तसेच देशातील अनेक खाजगी विदेशी कंपन्याच्या बंदरात कामगारांना कमी पगारावर रबावले जात आहे. 

जेएनपीटी (जेएनपीए) मधील सिंगापूर पोर्ट, गुजरात मधील अदानीचे मुंद्रा पोर्ट येथे कामगारांचे मोठया प्रमाणात शोषण होतं आहे या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील पोर्ट व डॉक कामगारांचा चालू वेतन करार ३१ डिसेम्बर २०२६ रोजी संपणार आहे.१ जानेवारी २०२७ ते ३१ डिसेंबर २०३१ या ५ वर्षाच्या नवीन वेतन करारासाठी मागणी पत्रक बनविण्यात येणार आहे. कायम स्वरूपी कामगारांना तसेच कंत्राटी कामगारांना पगार वाढीसाठी कामगार महासंघ प्रयत्न करणार आहे अशी माहिती महासंघाचे सचिव कॉ. भूषण पाटील यांनी दिली. या मिटिंग मध्ये जेष्ठ कामगार नेते माजी खासदार कॉ. तपन सेन व सिटू राष्ट्रीय सचिव कॉ. करुमालायन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.मिटिंगचे काम महासंघाचे अध्यक्ष कॉ. सी डी नंदकुमार यांनी केले तर अहवाल सरचिटणीस कॉ. टी नरेंद्र राव यांनी सादर केला.देशातील विविध भागातून आलेल्या प्रतिनिधिनीं त्यावर चर्चा केली. महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन ऑक्टोबर महिन्यात चेन्नई बंदरात घेण्यात येणार आहे. या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकी साठी जेनपिटी अंतर्गत युनियन कार्याध्यक्ष गणेश घरत, अध्यक्ष दिनेश घरत, सचिव राजेश घरत व नंदू म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली.

कोकणातील ज्येष्ठ लोकशाहीर मोरेश्वर म्हात्रे यांचे निधन !!

कोकणातील ज्येष्ठ लोकशाहीर  मोरेश्वर म्हात्रे यांचे निधन !!

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
 उरण पूर्व विभागातील खोपटे (धसाखोशी) गावातील ज्येष्ठ लोकशाहीर मोरेश्वर सिताराम म्हात्रे (वय ८८) यांचे शुक्रवार दिनांक १६ मे २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने उरण परिसरासह संपूर्ण कोकणातील लोककला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

कै. मोरेश्वर म्हात्रे यांनी १९७० च्या दशकात आपल्या दमदार लोकगीत गायनातून संपूर्ण कोकणपट्टा अक्षरशः पिंजून काढला होता. पारंपरिक लोककला, कोकणी संस्कृती आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या गीतांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असे. त्यांच्या आवाजाची आणि सादरीकरणाची खास शैली लोकांच्या मनात आजही कायम आहे.

ते थोर कवीगायक तथा “रेडिओ स्टार” म्हणून प्रसिद्ध असलेले कै. काशिनाथ म्हात्रे यांचे शिष्य होते. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकसंगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या पश्चात चार विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या असा परिवार आहे. विशेष म्हणजे, त्यांनी जोपासलेली लोकगीतांची परंपरा त्यांचे दोन पुत्र आजही अविरतपणे पुढे चालवित आहेत.

कै. मोरेश्वर म्हात्रे यांच्या अंत्यविधीसाठी उरण पूर्व पंचकोशीतील शेकडो नागरिक, लोककलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

भारतीय जनता पार्टी – उत्तर रायगड जिल्हा प्रशिक्षण वर्ग २०२६ संपन्न !!

भारतीय जनता पार्टी – उत्तर रायगड जिल्हा प्रशिक्षण वर्ग २०२६ संपन्न !!

विचार, संघटन आणि राष्ट्रसेवेचा प्रेरणादायी संगम!"

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
दि. १६ व १७ मे २०२६ रोजी आयोजित उत्तर रायगड जिल्हा प्रशिक्षण वर्ग उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांना संघटन कौशल्य, विचारधारा, सोशल मीडिया, कार्यपद्धती, इतिहास, विकास, राजकीय व सामाजिक भान तसेच कार्यकर्ता विकास यांसारख्या विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

या प्रशिक्षण वर्गास  आमदार महेश बालदी यांचे विशेष सहकार्य व शुभेच्छा लाभले. अविनाश कोळी  जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी रायगड यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण वर्गाचे प्रभावी आयोजन करण्यात आले. निरंजन डावखरे (प्रदेश सरचिटणीस), आमदार प्रशांत ठाकूर (प्रदेश चिटणीस), माधव भंडारी  मुख्य प्रवक्ते, भाजपा महाराष्ट्र,केशव उपाध्ये प्रदेश उपाध्यक्ष, गणेश हाकेकर प्रवक्ते, भाजपा महाराष्ट्र, भारत आदमपुरे विवेक विचार मंच, मकरंद मुळे पत्रकार, समीर गुरव आयटी संयोजक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश, नरेंद्र पवार माजी आमदार तथा प्रदेश संयोजक, भटके विमुक्त आघाडी, तसेच इतर मान्यवरांनी आपल्या प्रभावी विचारांतून कार्यकर्त्यांना नवी दिशा आणि प्रेरणा दिली. या प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक स्पष्टता, संघटनात्मक शिस्त, समाजसेवेची जाणीव आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा निर्माण झाली.

“राष्ट्र प्रथम, संघटन सर्वोच्च, समाजसेवा हाच संकल्प” 
या विचाराने प्रेरित होत या प्रशिक्षणात प्रत्येक कार्यकर्ता अधिक सक्षम, सजग आणि कटिबद्ध बनला.अशा प्रकारे सदर प्रशिक्षण वर्ग मोठया उत्साहात संपन्न झाले.

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल*

*“अर्धवट महामार्गावर टोल कशासाठी ?” — संतोष पटकारे यांचा सरकारला थेट सवाल* *मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी* ...