Wednesday, 18 March 2026

ठाण्यात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल; नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरण !!

ठाण्यात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल; नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरण !!

     बातमीदार प्रतिनिधी, ठाणे: ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. १७ मार्च २०२६ रोजी दुपारी १४.०० ते १८.३० या वेळेत बांदोडकर महाविद्यालय, ठाणे येथील सायन्स इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पतंजली सभागृहात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल घेण्यात आला.

     या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनियुक्त विभागीय क्षेत्ररक्षक व उपविभागीय क्षेत्ररक्षक यांना मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माँ सरस्वतीच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

     यावेळी मानसेवी निदेशक तथा मास्टर ट्रेनर डॉ. राहुल घाटवळ यांनी “Whome & How to Report to Seniors” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. श्रीमती प्रमोदिनी जाधव यांनी आपले अनुभव शेअर केले. श्रीमती गोलतकर यांनी संघटनेने दिलेल्या जबाबदारीची जाणीव व्यक्त करत कार्यशाळांद्वारे सातत्याने मार्गदर्शन करण्याची विनंती केली. डॉ. किशोरजी आढळकर यांनी दिलेल्या जबाबदारीचे यशस्वीपणे पालन करण्याची ग्वाही दिली.

     तसेच श्री. बिमल वसंत नथवाणी, उपमुख्य क्षेत्ररक्षक (क्षेत्र-१, ठाणे) व मानसेवी निदेशक यांनी संघटनेची रचना व अहवाल सादरीकरण याबाबत सविस्तर माहिती दिली. मा. विजय जाधव यांनी संघटना अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करत, आपत्कालीन प्रसंगी आवश्यक स्वयंसेवकांची संख्या लक्षात ठेवून प्रत्येकाने किमान एक स्वयंसेवक सोबत आणावा, असे आवाहन करुन सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी भर भरुन शुभेच्छा दिल्यात.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल गावित, सउनि यांनी केले. बांदोडकर महाविद्यालय व्यवस्थापनाने अल्पावधीत विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

- DCCD, NMC, ठाणे

Tuesday, 17 March 2026

उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी !

उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी !

            
समाजासमोर दोन्ही अधिकारी भावांनी आदर्श निर्माण केला, त्यांनी ज्या प्रमाणे हा निर्णय घेतला आहे तसाच निर्णय इतर अधिकारी यांनी घ्यावा व सामाजिक बांधिलकी जपावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे यांनी केले, कै जिजाबाई निवृत्ती वाघमोडे रा. वाघमोडेवाडी, ता. माण, जिल्हा सातारा यांचे प्रथम स्मृतिदिनानिमित्त डोंगर दऱ्याखोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी व महिलांना साडी वाटप कार्यक्रम शाहुवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणारे कळमतळी व अंबाईवाडा येथे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले व ११५ महिलाना साडी वाटप करण्यात आले या साहित्य वाटप करणेचा शुभारंभ मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पटकारे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण काकडे म्हणाले की जिजाबाई वाघमोडे या नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते त्या शिक्षित होत्या काबाडकष्ट करून प्रपंचाचा गाडा हाकत कायमचा दुष्काळ अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण दिले अनिता या मुंबई महापालिका मोठ्या पदावर काम करत आहे दुसरी बहिण सुनीता ग्रॅज्युएशन केलं   संजय वाघमोडे उपवनसंरक्षक कोल्हापूर व उल्हास हे भुमी अभिलेख अधिकारी मुंबई.  आयुष्यात बदल संस्कार घडवण्याची किमया आईने केली आहे शिक्षण नसतं तर  अधिकारी झाले नसतोम्हणून  आमच्या ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग समाजातील गोरगरीब डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी होण आवश्यक आहे म्हणून आम्ही इतर अनाठायी खर्च कमी करुन ५१००० रुपये चे साहित्य श्री प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांचे कडे दिले शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही समाजात बदल घडवायचा असेल तर शिक्षण काळाची गरज आहे आम्ही नेहमीच आमच्या आईच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा उपक्रम सुरू ठेवला जाईल. असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पटकारे, मुंबई चे सामाजिक कार्यकर्ते मारुती झोरे, काडवण चे नामदेव लांबोर, विठ्ठल येडगे, विठ्ठल गावडे सुशांत माळी, अर्जुन चव्हाण उपस्थित होते.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

तळगाव राणेवाडी, तालुका राजापूर येथे शिमगोत्सव आणि सत्यनारायण महापूजा थाटामाटात संपन्न !!

तळगाव राणेवाडी, तालुका राजापूर येथे शिमगोत्सव आणि सत्यनारायण महापूजा थाटामाटात संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर )
           दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तळगाव राणेवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे शिमगोत्सव आणि त्या निमित्ताने सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी तळगाव राणेवाडी मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांच्या अमूल्य सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. मंडळाचे अध्यक्ष दिलीप राणे, सचिव संतोष शांताराम राणे, कार्याध्यक्ष विश्वास बाळा तेली तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला त्याबद्दल मंडळ मुंबई /ग्रामीण  पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक, महिला वर्ग, तरुण -तरुणी आणि लहान मुलं यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत, न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !!

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत,  न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाचा भव्य  ‘कामगार आक्रोश मोर्चा’ !!

** १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चा’ ;  पुण्यातील कार्यकारिणीत घोषणा

राज्यातील विविध उद्योगांतील हजारो कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार ; 
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींची उपस्थिती

उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )
कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत, न्याय मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघाची कार्यकारिणी बैठक दि १४ व १५ मार्च २०२६ रोजी विश्वकर्मा भवन शनिवार पेठ पुणे येथे उत्साहात  संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील २४ जिल्ह्यांमधील संघटीत व असंघटित क्षेत्रातील सरकारी विविध उद्योग, आस्थापना व सेवा क्षेत्रांचे प्रतिनिधी, जिल्हा  पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत राज्यातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी, प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी, वाढत्या कंत्राटीकरणामुळे होणाऱ्या शोषणाविरोधात तसेच राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चा’ काढण्याचा ठाम निर्धार या बैठकीत करण्यात आला.

हा मोर्चा १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता कामगार आयुक्त कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे काढण्यात येणार असून राज्यातील विविध उद्योगांतील हजारो कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.या बैठकीस भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड अनिल ढुमणे होते . अखिल भारतीय उपाध्यक्ष राजेंद्र शर्मा, क्षेत्र संघटन मंत्री सी. व्ही. राजेश, क्षेत्र सहसंघटन मंत्री मोहन येणुरे , प्रदेश महामंत्री किरण मिलगीर आणि प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ  , अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे , बँक क्षेत्र अधिकारी संघटना  अध्यक्ष श्रीमती तृप्ती आळती , राष्टीय उद्योग प्रमुख अण्णा धुमाळ,  कामगार महासंघ संघटक सुरेश जाधव,  कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात,  अंगणवाडी कामगार संघ अध्यक्ष श्रीमती वनिता सावंत , बांधकाम कामगार अध्यक्ष हरी चव्हाण , बीडी मजदूर महासंघ उमेश विश्वाद यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून राज्यातील कामगार चळवळीला अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. या मोर्चात जिल्ह्यातील विविध आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय मजदूर संघांच्या वतीने करण्यात आले . 

बैठकीत २४ जिल्ह्यांमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्रातील कामगारांच्या समस्या, वेतन, सामाजिक सुरक्षा, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी तसेच प्रलंबित मागण्या याबाबत सविस्तर मांडणी केली. यावर गांभीर्याने चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता कामगार आयुक्त कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे भव्य  आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यातील सर्व संलग्न संघटना, विविध उद्योगातील कामगार आणि पदाधिकाऱ्यांना या भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चात’ हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

कोट (चौकट ):- 

महत्वपूर्ण मागण्यां - 

१) असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या करिता सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात याव्यात ,  या करिता बजेट मधे तरतुद करण्यात याव्यात. स्किम वर्कर्स ला कामगार दर्जा देण्यात येवुन त्यानुसार लाभ देण्यात यावेत.
फवारणी कामगारांना ६ व्या वेतन आयोग फरक मिळावा , कायम सेवेत सामावून घेऊन पेंशन मिळावे.  घरेलू कामगारांकरिता कल्याणकारी योजनांअंतर्गत लाभ देण्यात यावेत.  
२) राज्यातील,  वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या करिता हरियाणा पॅटर्न नुसार कंत्राटदार मुक्त रोजगार धोरण व नोकरीत स्थैर्य देण्यात यावे .
३) बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांअंतर्गत वस्तु रुपात लाभ न देता कामगारांना आर्थिक लाभ देण्यात यावेत.  
४) प्रलंबित ४० उद्योगांचे किमान वेतन  त्वरित घोषित करण्यात यावे . 
५) राज्यस्तरीय भविष्य निर्वाह निधी व कामगार विमा योजना या मधे गेल्या १५ वर्षांपासून रीजनल कमिटी अस्तित्वात नाहीत.  त्रिपक्षीय संवाद करिता त्वरित रिजनल कमिटी स्थापन करण्यात यावीत.  
६) बीडी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे. 
७) वीज उद्योगातील खाजगीकरण रद्द करून रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे .
८ ) महानगर पालिका व नगरपालिका रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत,  जुनी पेंशन योजनांअंतर्गत लाभ देण्यात यावेत.  
लोकसंख्येच्या प्रमाणात पद निर्माण करण्यात येवुन या ठिकाणी कार्यरत  कंत्राटी कामगार,  सफाई कामगारांनी कायम सेवेत समाविष्ट करण्यात यावे. 
९) मेट्रो रेल मधील कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार फरकासह वेतन देण्यात यावेत.

उरण मध्ये जेएनपीटी परिसरात गंभीर स्वरूपी अपघात ; धडा पासून शीर अलग !!

उरण मध्ये जेएनपीटी परिसरात गंभीर स्वरूपी अपघात ; धडा पासून शीर अलग !!

** आरोपीचा न्हावा शेवा पोलिसांकडून शोध सुरु.

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील  न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गणेश बेंझोप्लास्ट कंपनीच्या समोरील रस्त्यावर जेएनपीटी कडून पीयूबी इमारतीकडे जाण्याच्या वाय जंक्शन रोडवर मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सुषिलकुमार भैय्यालाल यादव वय ३३ वर्षे  व्यवसायाने चालक, राहणार अहीरोली, कुथुपूर, मढीयाहूं, जि. जौनपूर, राज्य उत्तरप्रदेश  यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका भयंकर स्वरूपाचा होता कि सदरच्या अपघतामध्ये सुषिलकुमार यादव याचे शीर धडापासून वेगळे झाले होते. 

       अपघाताची माहिती पोलीस कर्मचारी गणेश बासरे यांनीं न्हावाशेवा पोलीस ठाण्यात दिली असता  कोणताही विलंब न लावता न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीकांत नायडू यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत   घटनास्थळाला भेट दिली. मृत व्यक्तीच्या अंगावर आधार कार्ड, अनुज्ञप्ती आणि वन प्लस कंपनीचा मोबाईल सापडला घटनेची प्राथमिक तपासणी  नायडू यांनी करून अज्ञात वहानाने सदरच्या इसमास जोरदारपणे ठोकर मारून कोणत्याही प्रकारची माहिती न देता पळून गेला असल्याचे नमूद करून उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉक्टरानी त्यास दाखलपूर्व मयत म्हणून घोषित केले. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात या आपघाताची नोंद अ.मृ.रजी.क्र.03/2026 अशी कलम 194 BNSS अन्वये करण्यात आली असून न्हावाशेवा पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत .

महाविकास आघाडीचे उरणचे नेते आजारी कार्यकर्त्यांच्या भेटीला !!

महाविकास आघाडीचे उरणचे नेते आजारी कार्यकर्त्यांच्या भेटीला !!

** माजी आमदार मनोहर भोईर, भावना घाणेकर, महेंद्रशेठ घरत यांचा एकाच मोटारीने प्रवास

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : कार्यकर्ते हेच राजकीय पक्षांचे खरे बळ असते; परंतु बऱ्याच वेळा निवडणुका झाल्या की कार्यकर्ते अडगळीत पडतात. त्यांना फारसे कुणी विचारतेच असे नाही. मात्र याला अपवाद उरणमधील महाविकास आघाडीचे नेते ठरले आहेत. क्रिकेटप्रेमी आणि पेट्रोलियम युनियनचे सरचिटणीस किरीट पाटील यांचा अलीकडेच पाय मुरगळा आहे. त्यामुळे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केलेली आहे. सध्या ते बेडरेस्टवर आहेत. तसेच अखलाख शिलोत्री हे ज्येष्ठ कार्यकर्तेही आजारी असल्याचे महेंद्रशेठ घरत यांना समजले. नुकतेच शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, नगराध्यक्षा भावना घाणेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत उरण तालुक्यातील बोकडविरा येथे कबड्डी सामन्यांच्या उदघाटनप्रसंगी एकत्र आले होते. कबड्डी हा मातीतला खेळ, बोलता बोलता महेंद्रशेठ घरत यांनी किरीट पाटील आणि अखलाख शिलोत्री आजारी असल्याचा विषय औपचारिक गप्पांत काढला. त्यामुळे मी लवकर निघतो, असेही म्हणाले. परंतु शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर आणि नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीही आपण सोबत येत असल्याचे सांगितले. त्यानंतर चक्क महाविकास आघाडीचे तिघे नेते एकाच गाडीने अखलाख शिलोत्री आणि त्यानंतर किरीट पाटील यांच्या घरी  रात्री नऊच्या दरम्यान पोहोचले. तेव्हा आजारी असलेल्या कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले, आपल्या तब्बेतीविषयी चौकशी करण्यासाठी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, महेंद्रशेठ घरत एकत्र आल्याने आजारी कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आनंद झाला. त्यानंतर नेते आणि कार्यकर्ते मस्त गप्पांत रमले. ख्यालीखुशाली विचारून महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते यांनी अशीच वज्रमूठ ठेवून उरणच्या विजयाची पताका फडकवू या, असा आशावाद व्यक्त केला. विशेष म्हणजे उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचा निवडणुकीदरम्यान स्वतःचाच पाय मुरगळला आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रियाही होणार आहे; परंतु त्या अशा अवस्थेत स्वतःला विसरून आजही अनेक कार्यक्रमांत सहभागी होतात, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखातही जातात. यामुळे समाजात त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे

आसनगाव येथे नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०७/२०२६ यशस्वीरीत्या संपन्न !!

आसनगाव येथे नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०७/२०२६ यशस्वीरीत्या संपन्न !!

बातमीदार प्रतिनिधी : ता. १६, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा.उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली दि. ०९ ते १३ मार्च २०२६ या कालावधीत शिवाजीराव स. जोंधळे इंजिनीअरिंग काॅलेज, आसनगाव, जि. ठाणे येथे प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०७/२०२६ आयोजित करण्यात आला होता. हा प्रशिक्षण वर्ग दररोज सकाळी ०९.३० ते दुपारी १४.०० या वेळेत पार पडला.

या प्रशिक्षण वर्गात एकूण १४६ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाच्या अंतिम व शेवटच्या दिवशी श्री. अनिल गावित (सहाय्यक उपनियंञक) व मानसेवी निदेशक श्री.रामबरन यादव यांनी प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. तसेच प्रशिक्षणार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मा.वि,जय जाधव, उपनियंत्रक, नागरी सरक्षण यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन उपस्थित स्वयंसेवकांना नागरी संरक्षण सभासदत्वाची शपथ दिली व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

समारोपीय कार्यक्रमास, काॅलेजच्या प्राचार्य मॅडम, HoD मॅडम, उपप्राचार्य डायमा सर व समन्वयक प्रा.श्री,राठोड सर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

ठाण्यात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल; नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरण !!

ठाण्यात नागरी संरक्षणाचा स्नॅप रोल कॉल; नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश वितरण !!      बातमीदार प्रतिनिधी, ठाणे: ता. १८, नाग...