Thursday, 18 June 2026

'राष्ट्रभूमी भरारी'चा पहिला अंक प्रकाशित; निर्भीड पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात !!

'राष्ट्रभूमी भरारी'चा पहिला अंक प्रकाशित; निर्भीड पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात !!

*डोंबिवली, महेंद्र (अण्णा) पंडित, दि. १२/०६/२०२६

समाजातील वंचित, शोषित व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा संकल्प बाळगणाऱ्या मराठी साप्ताहिक 'राष्ट्रभूमी भरारी'च्या पहिल्या अंकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी डोंबिवलीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

*मान्यवरांची उपस्थिती*  
प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी अरुण साळुंखे, श्रमिक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र उर्फ अण्णा पंडीत, सुप्रसिद्ध गायक सुतार, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा प्रवक्ते सोनू पवार, 'दैनिक बातमीदार'चे विभागीय संपादक सचिन बुटाला, 'दैनिक महासागर'चे ठाणे आवृत्तीचे सहसंपादक अरुण ठोंबरे व गौतम वाघ, पत्रकार सुनील पगारे व अॅड. रजनी आगळे उपस्थित होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष विशाल पावशे, युवा नेत्या अश्विनीताई धुमाळ व सुरेखाताई जाधव, रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे, आंबेडकरवादी जनहित संघटनेचे संदीप गजघट यांचीही विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

*निर्भीड पत्रकारितेचा गौरव*  
प्रकाशनानंतर उपस्थित मान्यवरांनी साप्ताहिकाचे संस्थापक संपादक गौतम नामदेव गवई यांच्या निर्भीड पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी व जनहितासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव केला. सत्यनिष्ठ पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करणारी असून, 'राष्ट्रभूमी भरारी' हे साप्ताहिक समाजातील दुर्लक्षित प्रश्नांना न्याय देणारे प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

*कार्यक्रमाचे नियोजन*  
कार्यक्रमाचे नियोजन रोहन माने, राहुल जाधव, वैभव वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने केले. समारोपप्रसंगी संपादक गौतम गवई यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानले. 'राष्ट्रभूमी भरारी' समाजहिताच्या भूमिकेतून निडरपणे कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाने सामाजिक, राजकीय व जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे भाष्य करणाऱ्या नव्या माध्यमाचा शुभारंभ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Wednesday, 17 June 2026

अनुसूचित जाती व नवबौध्द स्वयंसहायता बचत गटांसाठी*मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन !!

अनुसूचित जाती व नवबौध्द स्वयंसहायता बचत गटांसाठी*मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ; ३१ ऑगस्टपर्यंत अर्जाचे आवाहन !!

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत किमान ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी प्रति पात्र बचत गटास रु. ३.१५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा पुणे कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्व्हे क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे-४११००६ येथे स्वीकारले जातील. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट नोंदणीकृत असणे, गटाच्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे, गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे, सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे तसेच गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे आवश्यक आहे. पात्र स्वयंसहायता बचत गटांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे सामूहिक व्यसनमुक्ती शपथ !

'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे सामूहिक व्यसनमुक्ती शपथ !

व्यसनमुक्त, निरोगी आणि सशक्त समाज निर्मितीसाठी जनजागृती उपक्रम

ठाणे, प्रतिनिधी : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत देशातील अमली पदार्थांचे सेवन रोखणे, मादक पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे तसेच नागरिकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 'मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना' राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दि. १७ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद, ठाणे येथील सभागृहात 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत सामूहिक व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा केली.

या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत १५ ऑगस्ट २०२० रोजी सुरू करण्यात आलेले 'नशा मुक्त भारत अभियान' आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आले आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत दरवर्षी २६ जून हा आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने यावर्षी १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत 'नशा मुक्त भारत अभियान – विकसित भारत की पहचान' या संकल्पनेवर आधारित विविध जनजागृती कार्यक्रम, उपक्रम, शपथविधी, सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार व प्रसिध्दी मोहिमा राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी घेण्यात आलेल्या शपथेमध्ये, "मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करीन तसेच इतरांनाही व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन. व्यसनमुक्त, निरोगी समाज घडविण्यासाठी कटिबद्ध राहीन आणि एकत्र येऊन नशामुक्त भारत घडविण्यास हातभार लावीन," असा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करून युवकांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व असल्याचे यावेळी नमूद करण्य

उल्हासनगरातील वालधुनी नदीची सफाई शून्य; कोणार्क कंपनीवर कारवाईची मागणी !!

उल्हासनगरातील वालधुनी नदीची सफाई शून्य; कोणार्क कंपनीवर कारवाईची मागणी !!

*उल्हासनगर, संदीप शेंडगे* : उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीला कचऱ्याचा विळखा पडला असून नदीची सफाई अद्याप झालेली नाही. नदी एखाद्या नाल्याप्रमाणे घाण कचरा आणि सांडपाणी घेऊन वाहत आहे. सफाईचे कंत्राट मिळालेल्या कोणार्क कंपनीने काम न केल्याने महापालिकेने कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी समाजसेवक फिरोजखान यांनी केली आहे.

शहरातील वालधुनी नदी घाणीच्या विळख्यात सापडली आहे. आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. नदीची सफाई करण्याचे काम शहरातील नामांकित कोणार्क कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीने नदीत केवळ पोकलेन मशीन उतरवून वरवरचा कचरा इकडे-तिकडे करत सफाईचा देखावा केला आहे.

रेल्वेने नदीत मातीचा भराव करून वाहने जाण्यासाठी तात्पुरता पूल बांधला होता. तो भराव व मातीचा पूल अद्याप काढण्यात आलेला नाही. वडोलगावपासून संजय गांधीनगर, खेती विभाग, हिराघाट, पंचशील नगर, शांतीनगरपर्यंत नदीची कोणतीही सफाई झालेली नाही, असा आरोप फिरोजखान यांनी केला आहे.

महापालिका ठेकेदाराला करोडो रुपये देऊनही नदीची स्थिती ‘जैसे थे’ आहे. कोणार्क कंपनीने सफाई केलेली नसल्याने त्यांना कोणतेही देयक देऊ नये व कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी समाजसेवक फिरोजखान यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय भोईर यांची महावितरणकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी !!

आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय भोईर यांची महावितरणकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी !!

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे व व्होल्टेजमध्ये सतत चढ-उतार होत असल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय राजाराम भोईर यांनी महावितरण प्रशासनाकडे उपस्थित केला आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण उरण विभाग यांना निवेदन दिले.

या निवेदनात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याने तातडीने दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत यंत्रणेची तपासणी करून संभाव्य अपघात टाळावेत, तसेच नुकसानग्रस्त ग्राहकांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, या संदर्भातील निवेदन ऊर्जा विभागाच्या मंत्र्यांनाही ई-मेलद्वारे पाठविण्यात आले असून उरणकरांना सुरक्षित, दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी अपेक्षा विजय भोईर यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीवर अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची नियुक्ती !!

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीवर अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची नियुक्ती !!

शतक महोत्सवी वर्षात मानाचा बहुमान; शंभर वर्षांच्या इतिहासातील सर्वात तरुण सदस्य म्हणून नोंद

राहुल बैसाणे (प्रतिनिधी) :

महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी व उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शतकोत्तर परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) च्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी उद्योजक वेदांशू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी आपल्या विशेष अधिकारातून ही नियुक्ती केली असून, चेंबरच्या शतक महोत्सवी वर्षात झालेल्या या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र चेंबरची व्यवस्थापन समिती ही संस्थेतील सर्वोच्च धोरणात्मक निर्णय घेणारी समिती आहे. या समितीमध्ये अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, विविध विभागांचे उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, ट्रस्ट बोर्ड चेअरमन, सेक्रेटरी जनरल यांचा समावेश असतो. महाराष्ट्र चेंबरच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, संस्थेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणे आणि भावी दिशा निश्चित करणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी असते.

विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्षांच्या विशेष अधिकारातून केवळ एका सदस्याची या समितीवर नियुक्ती केली जाते. यंदा ही जबाबदारी वेदांशू पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

वेदांशू पाटील हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, शिक्षण, मनोरंजन तसेच ई-कॉमर्स अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. विविध व्यवसाय क्षेत्रांतील त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य आणि उद्योजकीय दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे समजते.

महाराष्ट्र चेंबरच्या जवळपास शंभर वर्षांच्या इतिहासात व्यवस्थापन समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांपैकी सर्वात तरुण सदस्य म्हणून वेदांशू पाटील यांची नोंद होणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या नियुक्तीकडे उद्योग व व्यापारी क्षेत्रात विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे.

अलीकडेच पार पडलेल्या 2026-28 च्या निवडणुकीत अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली असून, राज्यातील सर्व उपाध्यक्ष आणि सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांची बिनविरोध तर काहींची निवडणुकीद्वारे विजय प्राप्त करून एक हाती सत्ता प्रस्थापित झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या नेतृत्वासोबत युवा उद्योजकांना संधी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना वेदांशू पाटील यांनी अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी तसेच महाराष्ट्र चेंबरच्या सर्व नेतृत्वाचे आभार मानले. महाराष्ट्र चेंबरच्या विकासासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात नवे उपक्रम राबविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र चेंबरच्या शतक महोत्सवी वाटचालीत युवा नेतृत्वाचा सहभाग वाढविण्याच्या दिशेने ही नियुक्ती एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, उद्योग-व्यापार क्षेत्रात नव्या पिढीच्या प्रतिनिधित्वालाही यामुळे बळ मिळणार आहे.

शिक्षणाच्या शस्त्राने घडवूया नवे स्वराज्य'; अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनतर्फे ठाण्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!

'शिक्षणाच्या शस्त्राने घडवूया नवे स्वराज्य'; अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनतर्फे ठाण्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!

ठाणे, प्रतिनिधी :
"ज्या मातीत उद्याचे नेतृत्व घडते, ती माती धन्य असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावर स्वराज्य स्थापन केले, त्याच परंपरेला साजेसे काम आज आपण शिक्षणाच्या शस्त्राने करत आहोत," असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (मुंबई-ठाणे विभाग) च्या वतीने १४ जून २०२६ रोजी ठाणे येथे आयोजित 'गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि भव्य करिअर मार्गदर्शन मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवित यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांची चमक आणि पालकांच्या चेहऱ्यावर पसरलेला अभिमान यांमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली होती.

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस दिशा मिळावी, या उद्देशाने विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने:

श्री. रुपेश घाग (माजी सैनिक): संरक्षण आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व.

श्री. किरण गांगुर्डे (दिग्दर्शक): कला व माध्यम क्षेत्रातील संधी.

श्री. ज्ञानेश्वर देशमुख (वकील): कायदा क्षेत्रातील करियरच्या वाटा.

श्री. महेश सावंत (ध्रुव अकॅडमी): करियर आणि व्यक्तिमत्व विकास.

डॉ. किरण तामखाने (कर्करोग तज्ज्ञ): वैद्यकीय क्षेत्र व NEET परीक्षेचे नियोजन.

डॉ. सागर मर्गज (मर्गज इन्स्टिट्यूट): व्यवस्थापन व तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक कल.

'आज एक विद्यार्थी, उद्या समाज'
"यश हे केवळ एका व्यक्तीचे नसून ते संपूर्ण समाजाचे असते. आज एक विद्यार्थी घडला की उद्या संपूर्ण समाज खंबीरपणे उभा राहतो," असा आशावाद फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार झाला असून, करिअर निवडीबाबत त्यांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

ठाण्यातील या ऐतिहासिक सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
संस्थेचे ठाणे जिल्हा ॲडमिन अभिजित ढेरे, भूषण खैरनार, गणेश ठाकरे,  तृप्ती वाळुंजपाटील, अक्षय गाढवे, अजय भोसले यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

'राष्ट्रभूमी भरारी'चा पहिला अंक प्रकाशित; निर्भीड पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात !!

'राष्ट्रभूमी भरारी'चा  पहिला अंक प्रकाशित; निर्भीड पत्रकारितेच्या नव्या पर्वाची सुरुवात !! *डोंबिवली, महेंद्र (अण्णा) पं...