पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आठवणी जपणाऱ्या हिराबाई सोनावणे यांचे निधन
** पाणी सत्याग्रह आणि समतानगरमधील भेटीच्या आठवणींची साक्षीदार काळाच्या पडद्याआड; परिसरात शोककळा
भिवंडी, प्रतिनिधी (मिलिंद जाधव)
भिवंडी तालुक्यातील समतानगर , पडघे परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी जपणाऱ्या आणि त्या घटनेच्या एकमेव साक्षीदार असलेल्या हिराबाई दुंदांजी सोनावणे (वय ९६) यांचे शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्यांच्या निधनामुळे समतानगर व परिसरात शोककळा पसरली असून सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हिराबाई सोनावणे या पडघ्यातील सतीच्या विहिरीवर झालेल्या ऐतिहासिक पाणी सत्याग्रहाच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीच्या जिवंत साक्षीदार होत्या. त्यांनी अनेक वेळा आपल्या आठवणी सांगताना नमूद केले होते की, त्या लहान असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडघ्यात आले होते. सतीच्या विहिरीवर त्यांनी पाणी सत्याग्रह केला होता आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या सत्याग्रहामुळे सामाजिक समतेचाआणि हक्कांच्या लढ्याचा संदेश परिसरात पोहोचला होता. त्यावेळी पडघा येथील एका शिसवीच्या झाडाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी नागरिकांना आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे आवाहन केले होते. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्यांच्या विचारांचा प्रभाव त्या काळात पडघा परिसरातील नागरिकांवर झाला होता. पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. समतानगर येथील काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चहापाण्यासाठी थांबले होते. ही बातमी त्या काळात संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. या ऐतिहासिक घटनेच्या आठवणी समतानगर येथिल पत्रकार मिलिंद जाधव यांना हिराबाई दुंदाजी सोनावणे यांनी अनेकदा सांगितल्या होत्या. त्यांच्या या आठवणींवर आधारित अनेक बातम्या आणि लेखही मिलिंद जाधव यांनी प्रसिद्ध केले होते. हिराबाई सोनावणे यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर समतानगर येथील बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या स्मरणार्थ रविवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता समतानगर, पडघा येथील त्यांच्या राहत्या घरी पुण्यानुमोदन कार्यक्रम आणि आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.
हिराबाई सोनावणे यांच्या निधनामुळे पडघा परिसराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी सांगणारा एक महत्त्वाचा साक्षीदार गमावला असून, त्यांच्या आठवणी इतिहासाचा अमूल्य ठेवा म्हणून कायम स्मरणात राहतील.