Monday, 13 July 2026

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

** भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा फेरीतील घटना; काही मिनिटांत बस जळून खाक, जीवितहानी टळली; शैलेश जाधव यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक

प्रतिनिधी भिवंडी 
रविवार दिनांक 12 जुलै 2020 

भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा या नियमित फेरीवरील एसटी बसला शनिवारी (दि. ११) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास खडवली येथे अचानक भीषण आग लागल्याने काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र, स्थानिक रिक्षाचालक शैलेश जाधव यांच्या सतर्कतेमुळे बसचालकाला वेळेत आग लागल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बसमधील सुमारे ३० ते ३५ प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडवली–पडघा या सायंकाळी ६ वाजताच्या नियमित फेरीवरील एसटी बस खडवली परिसरातून जात असताना रिक्षाचालक शैलेश जाधव यांच्या निदर्शनास बसच्या पुढील भागातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ बसचालकाला गाडीला आग लागल्याची सूचना दिली.

बसचालकानेही प्रसंगावधान राखत बस तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वाहकाच्या मदतीने दोन्ही दरवाज्यांतून सर्व प्रवाशांना त्वरित खाली उतरवले. प्रवासी सुरक्षित बाहेर पडताच काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बसला वेढा घातला.

बसमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने बसचालकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वेगाने पसरल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

घटनेनंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच कल्याण येथून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी बसचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार बसच्या इंजिन विभागात तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासानंतरच याबाबतचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेत वेळीच सतर्कता दाखवून बसचालकाला सूचना देणारे रिक्षाचालक शैलेश जाधव हे संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यात महत्त्वाचे ठरले. त्यांच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया :
शैलेश जाधव (रिक्षाचालक, खडवली) :
"बसच्या पुढील भागातून धूर आणि आग दिसताच मी तात्काळ बसचालकाला गाडीला आग लागल्याची सूचना दिली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले. वेळेत सूचना दिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, याचे समाधान वाटते."
कंचन कुंभार (प्रवासी, पडघा) :
"मी खडवली–पडघा या बसमधून प्रवास करत होते. बसला आग लागताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. त्या गोंधळात मी एका लहान बाळाला सुरक्षित बाहेर काढले. मात्र, अशा प्रसंगी बसचालक व संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे."

भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर आठ दिवसांपासून अंधारात; पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त !!

भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर आठ दिवसांपासून अंधारात; पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त !!

मीटर जळाल्यामुळे वार्ड क्रमांक २० मधील रस्ते अंधारात; घरफोडी-चोरीची भीती, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाल; तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी 

प्रतिनिधी भिवंडी 
सोमवार दिनांक 13 जुलै 2026

भिवंडी महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्रमांक २० मधील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात मागील आठ दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. मीटर जळाल्यामुळे रस्त्यावरील पथदिवे बंद असून नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अण्णाभाऊ साठे नगर हा डोंगरमाथ्यावर व झोपडपट्टी परिसर असल्याने येथे अरुंद गल्लीबोळ आहेत. रात्रीच्या वेळी अंधारामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी, चोरी तसेच इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली असून परिसरातील सुरक्षेबाबतही चिंता वाढली आहे.

परिसरात सार्वजनिक शौचालय असून तेथेही वीजपुरवठा नसल्याने शौचालय पूर्णपणे अंधारात आहे. विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी शौचालयाचा वापर करताना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून त्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप केला आहे. महानगरपालिकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन जळालेला मीटर त्वरित बदलून पथदिवे सुरू करावेत आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी अण्णाभाऊ साठे नगरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तिसऱ्या मुंबईच्या विविध त्रुटीचे चौकशीचे आदेश ; अखेर प्रस्तावित नवनगर प्रकल्पातील गैरकारभाराची चौकशी करण्याचे शासनाचे आदेश !!

तिसऱ्या मुंबईच्या विविध त्रुटीचे चौकशीचे आदेश ; अखेर प्रस्तावित नवनगर प्रकल्पातील गैरकारभाराची चौकशी करण्याचे शासनाचे आदेश !!

** सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांच्या पाठपुराव्यास यश.

**न्याय न मिळाल्यास रमाकांत पाटील दाखल करणार जनहित याचिका.

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
पनवेल उरण पेण तालुक्यात एमएमआरडीए मार्फत प्रस्तावित नवनगर प्रकल्पातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन, पुनर्वसनातील त्रुटी,शासकीय कारभार,शेतकऱ्यांचे होणारे विस्थापन व फसवणूक तसेच जैवविविधतेचा होणारा ऱ्हास याबाबत सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांनी  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांच्याकडे ३ मे २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती.

 सदर तक्रारीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भूसंपादन रायगड यांनी कार्यकारी अभियंता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना सदर प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तक्रारदाराने नमूद केलेल्या मुद्द्यांची सखोल चौकशी करून तसेच तातडीने  नियमोचित कार्यवाही करण्याबाबत लेखी पत्र द्वारे आदेशित केले आहे 

सदर आदेशात उक्त  चौकशीत विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत व केलेल्या  कार्यवाहीचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष  कोकण विभाग यांना सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

आपल्या तक्रारीची गंभीर दखल शासनाने  घेतली असून प्रस्तावित प्रकल्पामधून होणारे शेतकऱ्यांचा नुकसान  तसेच  पर्यावरण जैवविविधता यांचे नुकसान  या बाबत योग्य सुधारणा न झाल्यास व शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास न्याय मिळवण्यासाठी मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे याचिका दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील यांनी घोषित केले आहे.


कोट (चौकट ):- 

प्रस्तावित तिसऱ्या मुंबई विरोधात पनवेल उरण पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.तिसऱ्या मुंबईला विरोध म्हणून उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे (पाटील )यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील चिरनेर येथे शेतकऱ्यांची सभा झाली होती. या सभेत शेतकऱ्यांनी तिसऱ्या मुंबईला तीव्रपणे विरोध केला होता.शेतकऱ्यांना, स्थानिक भूमीपुत्रांना विश्वासात न घेता, त्यांच्या कोणत्याही मागण्यांची दखल न घेता शासन तिसरी मुंबई प्रकल्प जबरदस्तीने शेतकऱ्यांवर लादत आहे. शासनाचे एकतर्फी व मनमानी कारभार सुरु असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर जीआरपी पोलीस ठाणे तातडीने सुरू करा !!

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर जीआरपी पोलीस ठाणे तातडीने सुरू करा !!

** महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अंबरनाथ शहर रेल्वे अध्यक्ष दिपक तेली यांची मागणी

*अंबरनाथ, विशाल कुरकुटे :

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि चोरी व इतर गुन्ह्यांच्या घटना लक्षात घेऊन अंबरनाथ रेल्वे स्थानकावर स्वतंत्र शासकीय रेल्वे पोलीस अर्थात जीआरपी पोलीस ठाणे तातडीने सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अंबरनाथ शहर रेल्वे स्टेशन अध्यक्ष दीपक तेली यांनी केली आहे.

*लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा*  
दीपक तेली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबरनाथ हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक आहे. येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आणि रेल्वे परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यांवर तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र जीआरपी पोलीस ठाणे आवश्यक आहे.

*तातडीची मदत मिळत नाही*  
सध्या कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास प्रवाशांना त्वरित पोलीस मदत मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने अंबरनाथ रेल्वे स्थानकावर जीआरपी पोलीस ठाणे तातडीने सुरू करून आवश्यक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन अंबरनाथमधील लाखो प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही दीपक तेली यांनी व्यक्त केली आहे.

पंढरपूरच्या यावेळच्या सायकल दिंडीत विक्रमी 7000 जण सहभागी ! डोंबिवलीकर 100 जण सहभागी !!

पंढरपूरच्या यावेळच्या सायकल दिंडीत विक्रमी 7000 जण सहभागी ! डोंबिवलीकर 100 जण सहभागी !!

           पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी वारी निमित्ताने होत असलेल्या सायकल वारी रिंगण संमेलन सोहण्यात यावेळी अंदाजे विक्रमी 7000 जण राज्यभरातून सहभागी झाल्याचे समजले आहे. त्यात डोंबिवलीहून 100 जण या सायकल वारी दिंडी साठी गेले होते. सायकलने 50 जण स्री पुरुष त्यात तरुणांपासून 72 वर्षे वृद्धापर्यंत गेले होते तर 50 जण बसने गेले होते. सायकल सखी ग्रुप, डोंबिवली सायकल ग्रुप, एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप यांच्या वतीने हे सर्वजण डोंबिवलीहून पंढरपूर सायकल वारी दिंडी साठी गेले होते. यासर्वांनी पंढरपूर येथे पोहचल्यावर प्रथम विठुरायाचे दर्शन घेऊन नंतर तेथील सायकल रिंगण सोहळ्यासह सर्व कार्यक्रमाला हजेरी लावली. सदर सायकल रिंगण सोहळ्यात भाग घेणाऱ्या ग्रुपला आयोजकांतर्फे विठुरायाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

          सदर ही पंढरपूर मधील सायकल वारी ही पारंपरिक वारी सोबत आधुनिक पद्धतीने साजरी होत असलेली वारी पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि भक्तीचा अनोखा संगम ठरल्याने एक वेगळीच रंगत प्राप्त झाली होती. रविवार दिनांक 12 जुलै रोजी पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर हा रिंगण सोहळा झाला होता. यावेळी विविध कार्यक्रमाने सादर झालेल्या या रिंगण सोहळ्याचा सर्वांनी आनंद घेतला. डोंबिवलीहून गेलेले हे सर्वजण रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास परतले असून त्या सर्वांचा सत्कार आणि महाप्रसाद भोजनाचा कार्यक्रम हा सायकल सखी ग्रुप, एमआयडीसी निवासी तर्फे आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सायकल वारीसाठी गेलेले वरिष्ठ नागरिक मुकुंद कुलकर्णी 72 वर्षे, शंभू नारायण सिंग 72 वर्षे, श्रीमती नयना आगरकर 64 वर्षे, प्रशांत विसपुते 63 वर्षे, श्रीमती वर्षा महाडिक 59 वर्षे आणि इतरांचे विशेष कौतुक सर्व थरातून होत आहे.

वृत्तांकन - राजू नलावडे, डोंबिवली 

Sunday, 12 July 2026

मुंब्रा विभागात ४० हजार बोगस मतदारांचा आरोप !!

मुंब्रा विभागात ४० हजार बोगस मतदारांचा आरोप !!

** एसआयआर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे किरीट सोमय्या यांचे आवाहन

कल्याण, संदीप शेंडगे : मुंब्रा विधानसभा क्षेत्रात सुमारे ४० हजार बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सध्या बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मोहीम सुरू असून, पात्र नागरिकांनी तातडीने एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अन्यथा त्यांची नावेही मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

कल्याण येथे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एसआयआर फॉर्म कसा भरायचा, नागरिकांना त्याबाबत कसे मार्गदर्शन करायचे आणि मतदार पडताळणीची प्रक्रिया प्रभावीपणे कशी राबवायची याविषयी किरीट सोमय्या यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विदर्भ, नागपूर आणि मराठवाडा विभागात एसआयआर प्रक्रिया समाधानकारक वेगाने सुरू आहे. मात्र कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ठाणे आणि मुंबई या भागांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत मंद गतीने सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या भागातील नागरिकांनी वेळ न दवडता आवश्यक कागदपत्रांसह एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या मार्गदर्शन कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, आमदार सुलभा गायकवाड, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

खानदेश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार !!

खानदेश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार !!


उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
खानदेश विकास मंडळ, उरण यांच्या तर्फे उरण तालुका पोलीस ठाण्यात खानदेशवाशी नामांकित व कर्तबगार, अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले जगदीश शेलकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उरण येथे नेमणूक झाली म्हणून मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत व अभिनंदन उरण तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष  प्रकाश चित्ते यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्याध्यक्ष सुनील भाऊ चौधरी, खजिनदार  वामनराव राठोड, उपाध्यक्ष आनंद कुमावत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोबत मंडळ सहकारी सेक्रेटरी सचिन खैरनार,भरत पाटील, संजय पाटील,  झोपे सर, दत्तु महाले आणि महिला प्रतिनिधी जयश्री महाजन ताई, राजेश्री वाडेकर व गोकुळ धाडी आदी पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व सभासदांनी एकमेकांना परिचय व ओळख करून दिली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी सुद्धा आपला परिचय व थोडक्यात आपल्या कार्याचा आढावा दिला व जिवनात सुख कसं निर्माण करता येईल याचा मुलमंंत्र सांगीतला.

     उरण पोलीस ठाण्यात नवीनच हजर झालेले पोलिस निरीक्षक ( गुन्हे शाखा ) राहुल रा.काटवाणी हे सुद्धा अमळनेर येथील रहिवासी असल्याचे समजल्यानंतर सर्व पदाधिकारी मंडळींनी त्यांचीही सदिच्छा भेट घेतली व अभिनंदन केले. त्यांनीही यावेळी आनंद व्यक्त केला. अशा प्रकारे कार्यक्रमची आनंदाने सांगता झाली.

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !! ** भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा फेरीतील ...