Monday, 15 June 2026

उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वासार्ह पर्याय !!

उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वासार्ह पर्याय !!

तळसंदेतील डी. वाय. पाटील विद्यापीठ **
** हे उद्योगाभिमुख शिक्षण, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि करिअरच्या व्यापक संधींचा संगम : डॉ. शंकर पुजारी . 

तळसंदे : 
 बदलत्या जागतिक शैक्षणिक व औद्योगिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे (ता. हातकणंगले) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यावर्षी  डिझाईन आणि कायदा शिक्षण देणारे अभ्यासक्रम त्याचबरोबर दहावीनंतर अभियांत्रिकी पदवी देणारा सहा वर्षांचा इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आल्याची माहिती प्रवेश प्रक्रिया संचालक प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी दिली.

कुलपती डॉ. संजय डी.पाटील, प्र- कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाची शैक्षणिक, संशोधन आणि कौशल्यविकास क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

डॉ. पुजारी म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये, संशोधनवृत्ती, नेतृत्वगुण, संवाद कौशल्ये आणि उद्योग क्षेत्राशी सुसंगत ज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. याच दृष्टीने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची रचना केली आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड बी.टेक. (डिप्लोमा + डिग्री) हा अभिनव अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यामुळे कमी कालावधीत तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळण्यास मदत होते. यामध्ये ६ वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून अभियंता बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

व्यवस्थापन क्षेत्रात बीबीए, एमबीए, अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए (फार्मास्युटिकल मॅनेजमेंट),  बीबीए,  एमबीए तसेच ग्लोबल एमबीए हे अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, उद्योजकता, आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि नेतृत्व विकासाच्या संधी उपलब्ध होतात.

कायदा क्षेत्रात बी.ए. एल.एल.बी. व एल.एल.बी. त्याचबरोबर बीसीए व एमसीए, तर सर्जनशील क्षेत्रात बॅचलर ऑफ डिझाईन अंतर्गत व्हिज्युअल कम्युनिकेशन, यूआय/यूएक्स, अॅनिमेशन, प्रॉडक्ट डिझाईन तसेच इंटिरिअर अँड स्पेस डिझाईन यांसारखे अभ्यासक्रम नव्या युगातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देत आहेत 

याशिवाय बी.एस्सी. डेटा सायन्स, एम.एस्सी. ऑर्गेनिक केमिस्ट्री, अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांसारखे आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम संशोधन व उद्योग क्षेत्रातील संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहेत.

विद्यापीठामध्ये आधुनिक प्रयोगशाळा, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्राशी असलेले सहकार्य, इंटर्नशिप, प्लेसमेंट सहाय्य, संशोधनाच्या संधी तसेच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध मेरिट स्कॉलरशिप योजनाही उपलब्ध आहेत.

करिअरला योग्य दिशा देणारे शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि जागतिक स्तरावरील संधी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी डी. वाय. पाटील ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे येथे भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन डॉ. पुजारी यांनी केले.  प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी : डॉ. शंकर पुजारी, ( डायरेक्टर  ऍडमिशन्स ) : 9922772522  या नंबर वर संपर्क साधावा.

प्रसिद्धी - विलासराव कोळेकर सर 

Sunday, 14 June 2026

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह !

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह !

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
जेएनपीटीच्या JSW ऑइल जेट्टीवर आज सकाळी तेलवाहिनी पिगिंगचे काम सुरू असताना BPCL जेटीवर ग्रॅसचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. करावली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील रहिवासी राजेंद्र शिंदे, गणेश बेन्झोप्लास्ट कंपनीचे अधिकारी, आणि उरण तालुक्यातील पिरकोन येथील जगन्नाथ गावंड, कंत्राटी कामगार, यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. दोन्ही मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.  

घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिगिंगसारखे अत्यंत धोकादायक काम सुरू असताना GBL कंपनी आणि संबंधित ठेकेदाराने सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नसल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. हेल्मेट, परमिट टू वर्क, सेफ्टी ऑडिट, गॅस टेस्टिंग यासारख्या मूलभूत सुरक्षा उपायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हा स्फोट झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. "GBL कंपनी आणि ठेकेदाराला कामगारांच्या जीवाची किंमतच नाही. फक्त उत्पादन आणि नफा हेच त्यांचे उद्दिष्ट आहे," अशी टीका संघटनांनी केली आहे.  

अपघाताची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांची कारवाई अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचण्याआधीच GBL कंपनी आणि ठेकेदार यांच्यात 'जुळवाजुळव' झाल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे. या प्रकरणात 'सेटलमेंट' करून फाईल बंद केली जाईल की काय, अशी भीती पीडित कुटुंबीय आणि स्थानिक व्यक्त करत आहेत. "दोन जीव गेले तरी GBL कंपनी आणि ठेकेदारावर ठोस कारवाई होत नाही. पोलीस तपास फक्त कागदावरच राहतो का?" असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  

जेएनपीटी प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून दोषी GBL कंपनी आणि ठेकेदाराला वाचवले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेमुळे जेट्टीवरील काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. परंतु, "काम थांबवून काय उपयोग? दोषींवर गुन्हा कधी दाखल होणार आणि शिक्षा कधी मिळणार? पोलीस पुढील तपास करतात की दबावाखाली फाईल बंद करतात, हे आता पाहावे लागेल," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ईश्वरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व जनसागर !!

ईश्वरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व जनसागर !!

.                                      आ.गोपीचंद पडळकर मार्गदर्शन करताना

ईश्वरपूर, प्रतिनिधी :

ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा व जाहीर सभेला उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधला. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाजबांधव, माता-भगिनी आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण ईश्वरपूर नगरी अहिल्यामातेच्या जयघोषाने दुमदुमून गेली.

पुण्यश्लोक अहिल्यामाता यांचे कार्य, त्याग, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी विचार हे आजही समाजाला दिशा देणारे आहेत. इस्लामपूरचे 'ईश्वरपूर' आणि अहमदनगरचे 'अहिल्यानगर' झाल्यानंतर स्वाभिमानी ईश्वरपूरच्या भूमीत साजरी झालेली ही जयंती केवळ उत्सव नव्हे, तर समाजशक्ती, स्वाभिमान आणि संघटनशक्तीचे विराट दर्शन ठरली.अहिल्यामातेचे भव्य स्मारक कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या उपकारातून नव्हे, तर समाजबांधव आणि माता-भगिनींच्या लोकवर्गणीतून स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यामाता यांच्या जन्मभूमी चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने मंजूर केलेला ₹१००० कोटींचा विकास आराखडा हा ऐतिहासिक निर्णय असून आचारसंहिता संपताच त्यावरील कामांना गती मिळणार आहे.धनगर समाजाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी प्रत्येक 'क' वर्ग तीर्थक्षेत्राला ₹५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला असून आरेवाडी देवस्थानचा ₹१५० कोटींचा विकास आराखडाही शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

मेंढपाळ बांधवांवर होणारा अन्याय, दडपशाही आणि जुलूमशाही आता सहन केली जाणार नाही. संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी, एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि धनगर समाजाच्या न्याय्य अधिकारांसाठी आमचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील. ही पिढी केवळ तमाशा पाहण्यासाठी नाही, तर इतिहास घडवण्यासाठी आणि समाजाचा स्वाभिमान प्रस्थापित करण्यासाठी मैदानात उतरली आहे.

यावेळी राज्यसभा खासदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते डॉ. अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, सम्राटबाबा महाडिक, माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध देवस्थानांचे संत, महंत, पुजारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.

शब्दांकन - विलासराव कोळेकर सर 

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ !

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ !

१३ ते १९ जूनपर्यंत अर्जदारांना प्रवेशाची संधी; हा दुसरा टप्पा अंतिम

ठाणे, दि. १३ : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (RTE) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ देण्यात आली असून, आता ही प्रवेश प्रक्रिया दिनांक १३ जून २०२६ ते १९ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

यापूर्वी प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेशाची मुदत दिनांक १२ जून २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संबंधित विभागामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ केवळ दुसऱ्या टप्प्यासाठी असून, हा अंतिम टप्पा असल्याची नोंद सर्व संबंधित पालकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरटीई कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद ठाणे प्रशासनामार्फत पालकांना वेळेत प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्यात येत असून, संबंधित यंत्रणांना प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही विलंब होऊ नये तसेच पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी पालकांनी अंतिम मुदतीपूर्वीच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे‌.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही सामाजिक समावेशकता आणि प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम असून दिलेल्या मुदतवाढीत पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे

Saturday, 13 June 2026

मोहने येथील प्रसिद्ध रील स्टार प्रेम भाटी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू !!

मोहने येथील प्रसिद्ध रील स्टार प्रेम भाटी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू !!

** अपघात रस्त्यावरील खडेमुळे झाल्याचा रिक्षा युनियनच्या अध्यक्ष शिवाजी पाटील यांचा आरोप.

मोहने, संदीप शेंडगे : मोहने परिसरातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला आणि सोशल मीडियावर आपल्या रील्समुळे ओळख निर्माण करणारा प्रेम भाटी याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेम हा कमल हेअर स्टाईलचे मालक सोहन भाटी यांचा मुलगा होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रेम भाटी हा आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे आणि सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे परिसरातील युवकांमध्ये विशेष लोकप्रिय होता. त्याच्या रील्सना हजारो लोक पसंती देत होते. नेहमी हसतमुख, मनमिळावू आणि सर्वांना आपलंसं करणारा प्रेम आज अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मोहने शिवसेना शाखेजवळील मोमोजच्या गाडीसमोर रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे हा अपघात घडला. संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने खडी आणि बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरलेले होते. याच कारणामुळे वाहनाचा ताबा सुटून अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर आणि सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेंचुरी रेहान वर्कर्स युनियनचे व्हाईस चेअरमन आणि रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी या दुर्घटनेसाठी संबंधित ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. "रस्त्यावरील खडी वेळेत हटवली असती आणि योग्य खबरदारी घेतली असती तर एका तरुणाचा जीव वाचू शकला असता," तसेच असे त्यांनी रस्त्यावर खडी टाकणाऱ्या ठेकेदार आणि दुर्लक्ष करणारे पालिका अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.

प्रेम भाटीच्या निधनामुळे मोहने परिसरातील वातावरण शोकमग्न झाले आहे. सोशल मीडियावरही त्याला श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्टचा पूर आला असून, मित्रपरिवाराने त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनेकांनी "हसतमुख प्रेम आता कायमचा निघून गेला" अशा भावना व्यक्त करत दुःख व्यक्त केले.

प्रेमच्या पश्चात आई-वडील, कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. एका उमद्या, स्वप्नाळू आणि लोकप्रिय तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने संपूर्ण मोहने परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

Friday, 12 June 2026

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

महेंद्रशेठ घरत यांचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार !!

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
आंतरराष्ट्रीय कामगार नेते  महेंद्रशेठ घरत हे आंतरराष्ट्रीय कामगार शिखर परिषदेसाठी आपल्या वाढदिवसासह सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून जिनेव्हा येथे गेले होते. कारण तेथे जगातील कामगारांच्या हक्कांसाठी कायदे बनविले जातात. ही संधी महेंद्रशेठ घरत यांना दुसऱ्यांदा मिळाली. साहजिकच वाढदिवसानिमित्त त्यांना प्रत्यक्ष भेटून अनेकांना शुभेच्छा देता आल्या नाहीत. महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी महेंद्रशेठ घरत हे वहाळच्या साई मंदिरात अन्नदान करतात. त्यामुळे गुरुवारी (ता.११) महेंद्रशेठ घरत हे साई मंदिरात आरती आणि अन्नदान उपक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी साई मंदिर वहाळतर्फे त्यांचा आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले त्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त मो. का. मढवी गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एमटीएचएलचे चिफ रेसिडेंट इंजिनियर रतनलाल देशमाने यांचाही यथोचित सन्मान साई मंदिरतर्फे करण्यात आला. 

यावेळी राधाकृष्ण बालगोपाल भजन मंडळ हरिग्राम (पनवेल) यांचे सुश्राव्य भजन झाले. गायिका प्रतिज्ञा सुरेश पाटील यांनी अप्रतिम भजन सादर करून साईभक्तांना जिंकले. त्यांना प्रसाद पाटील यांनी पखवाजवर साथ केली, तसेच प्रज्ञा, आर्या, तनिष्का, खुशी यांनी कोरस म्हणून उत्तम साथ दिली. त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते गायिका प्रज्ञा पाटील हिचा सन्मान करण्यात आला. यावेळी साईबाबांचे मंगलस्नान करण्याचा मान आनंद नारायण ठाकूर आणि नयना आनंद ठाकूर यांना मिळाला होता; तर अन्नदान महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी साई मंदिर व्यवस्थापन सांभाळण्यासाठी सक्रिय असणाऱ्या सेवाभावी भक्तांची दखलही महेंद्रशेठ घरत यांनी घेतली. यावेळी साई मंदिराचे अध्यक्ष रविशेठ पाटील, मो. का. मढवी गुरुजी, विश्वास पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून जेएनपीएची मान्यता कायम !

भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून जेएनपीएची मान्यता कायम;

 जागतिक बँकेच्या सीपीपीआय 2025 निर्देशांकात जागतिक स्तरावर 22वे स्थान

पाच वर्षांत लक्षणीय प्रगती;

 2020-2025 दरम्यान सर्वाधिक सुधारणा करणाऱ्या जागतिक 20 बंदरांमध्ये जेएनपीए 14व्या स्थानावर

उरण दि 12, (विठ्ठल ममताबादे) :
 भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून आपले स्थान कायम राखत जागतिक बँक आणि एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स यांनी प्रकाशित केलेल्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स (सीपीपीआय) २०२५ मध्ये जागतिक स्तरावर २२वा क्रमांक पटकावला आहे.

सीपीपीआय 2025 अहवालानुसार, जेएनपीएने बंदराच्या एकूण कार्यकालापैकी 75% बर्थ ऑक्युपन्सी शेअर नोंदविला आहे. तसेच, स्टॅटिस्टिकल इंडेक्स मध्ये 58.9 आणि प्रशासकीय इंडेक्स मध्ये 138.0 गुण प्राप्त करत जेएनपीएने जगातील कंटेनर बंदरांमध्ये 22वा क्रमांक मिळविला आहे.

अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, 2020 ते 2025 या कालावधीत सर्वाधिक सुधारणा नोंदविणाऱ्या जगातील अव्वल 20 बंदरांमध्ये जेएनपीएने 14वे स्थान मिळविले आहे. या कालावधीत जेएनपीएच्या क्रमवारी गुणांकनात 32 गुणांची वाढ झाली असून, 2020 मधील 66 गुणांवरून 2025 मध्ये ते 98 गुणांपर्यंत पोहोचले आहे. या लक्षणीय सुधारणेमुळे कामगिरीत सर्वाधिक प्रगती करणाऱ्या जागतिक बंदरांमध्ये जेएनपीएने 14वे स्थान पटकावले आहे.

या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जेएनपीएचे अध्यक्ष श्री. गौरव दयाल, भा. प्र. से., म्हणाले, “भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून जेएनपीएला पुन्हा मिळालेली मान्यता आणि सीपीपीआय 2025 मध्ये सुधारलेले जागतिक स्थान हे कार्यक्षमता विस्तार, जहाजांच्या टर्नअराउंड वेळेत सुधारणा आणि बंदराधारित लॉजिस्टिक्स अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. हा सन्मान संपूर्ण पोर्ट समुदायासाठी अभिमानाचा विषय असला, तरी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम बंदरांच्या बरोबरीने स्वतःचे सातत्याने मूल्यमापन करत कामगिरी अधिक उंचावण्याची जबाबदारीही त्यातून वाढते. या उल्लेखनीय यशासाठी मी आमचे सर्व टर्मिनल ऑपरेटर्स, शिपिंग लाईन्स, लॉजिस्टिक्स भागीदार, सीमाशुल्क विभाग, कर्मचारी आणि जेएनपीए परिसंस्थेशी निगडित सर्व भागधारकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”

सीपीपीआय (कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स) मध्ये कंटेनर बंदरांच्या कामगिरीचे मूल्यमापन बंदरात जहाजांनी घालविलेल्या प्रत्यक्ष वेळेच्या आधारे केले जाते. या मूल्यांकनात जहाजांचा माप आणि पोर्ट कॉलची वैशिष्ट्ये विचारात घेतली जातात. हे मूल्यांकन प्रामुख्याने ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम (एआयएस) आधारित पोर्ट कॉल रेकॉर्ड्सवर आधारित असून, त्यासोबत पोर्ट आणि टर्मिनल्सकडील प्रोपायटरी डेटाची जोड दिली जाते. स्टॅटिस्टिकल आणि प्रशासकीय या दोन्ही पद्धतींमधून प्राप्त झालेल्या निष्कर्षांचे एकत्रीकरण करून प्रत्येक बंदरासाठी एकच सीपीपीआय स्कोअर निश्चित केला जातो.

सीपीपीआयची कार्यपद्धती जहाजांच्या टर्नअराउंड परफॉर्मन्सच्या आधारे बंदरांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करते. यामध्ये बंदरातील एकूण वेळेचे तीन प्रमाणित घटकांमध्ये विभाजन केले जाते - अरायव्हल टाइम, बर्थ टाइम आणि डिपार्चर टाइम. इंडेक्सची गणना प्रामुख्याने अरायव्हल टाइम आणि बर्थ टाइम यांच्या आधारे केली जाते, जे ऑपरेशनल कार्यक्षमता आणि सेवा वितरणाचे महत्त्वपूर्ण निर्देशक मानले जातात.
भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आणि देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून जेएनपीए क्षमता विस्तार, ऑपरेशनल उत्कृष्टता, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाच्या बळावर आपल्या विकासाच्या वाटचालीला अधिक गती देण्यासाठी कटिबद्ध आहे

उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वासार्ह पर्याय !!

उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वासार्ह पर्याय !! तळसंदेतील डी. वाय. पाटील विद्यापीठ ** ** हे उद्योगाभिमुख शिक्षण, जा...