भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत माती, दगड, व मुरुमाची बेकायदेशीर भरणी, व केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक !!
** तलाठी सूर्यवंशी कारवाई करण्यास करतात टाळाटाळ ; संशयाला ऊत
मौजे कोपर येथील सरकारी खांजण जमीन सर्वे नं ६६/१या खाडी नाल्यात केलेली बेकायदेशीर भरणी मोजताना कोपर गावचे उपसरपंच श्री.संजय पाटील व ग्राम महसूल अधिकारी श्री.रमेश सूर्यवंशी
*भिवंडी, दि. 2 मे 2026, (अरुण पाटील)*
भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत बेकायदेशीर माती, दगड व मुरुमाची भरणी तसेच केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महसूल खात्याला माहिती असूनही कारवाई होत नसल्याने तलाठी रमेश सूर्यवंशी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
*सरकारी जमिनीत बेकायदेशीर भरणी*
मौजे कोपर येथील सर्वे क्रमांक 66/1 या सरकारी खांजण खाडी नाल्यात बेकायदेशीररीत्या माती, दगड व मुरुमाची भरणी सुरू असल्याची माहिती पत्रकार अरुण पाटील यांनी ग्रामसभेत उपस्थित केली. याबत सरपंच हेमंत घरत यांनी तलाठी रमेश सूर्यवंशी यांना फोनवरून कळवले होते. त्यानुसार 30 मार्च 2026 रोजी तलाठ्यांनी स्थळ पाहणी करून मोजणी केली. यावेळी कोपर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्वे क्रमांक 65/अ या खाडी नाल्यातही बेकायदेशीर भरणी झाल्याचे आढळून आले.
*कारवाईबाबत उदासीनता*
या दोन्ही ठिकाणी किती ब्रास बेकायदेशीर भरणी झाली आणि त्यामागे भूमाफिया कोण आहेत, याची माहिती असूनही तलाठ्यांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच माहिती मागितली असता ती लपवण्याचा प्रयत्न केल्याने आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामसभेत हा विषय मांडूनही ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी आशिष चव्हाण यांनी त्याचा अहवाल प्रशासनाला कळवला की नाही, याची माहिती मिळू शकली नाही.
*पावसाळ्यात पूराचा धोका*
नाल्यात केलेली बेकायदेशीर भरणी न काढल्यास पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याला कोपर ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
*केवणी येथे रेतीची चोरटी वाहतूक*
मौजे केवणी दिवे येथील सर्वे क्रमांक 181/ब या खाडी किनाऱ्यावरून दररोज लाखो ब्रास रेतीची स्वामित्व धन न भरता बेकायदेशीर वाहतूक होत आहे. वाळू माफिया कोण आहेत याची माहिती असूनही तलाठी रमेश सूर्यवंशी कोणतीही कारवाई करत नसल्याने मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यामुळे शासनाचे दररोज लाखो रुपयांचे महसूल बुडत असल्याने तलाठ्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी जाणकारांनी केली आहे.
*प्रतिबंधात्मक आदेश असूनही तस्करी*
तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी भिवंडी यांनी 15 एप्रिल ते 25 मे 2026 या कालावधीत नदी व खाडी पत्रातून उत्खन वाळू चोरी रोखण्यासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस कर्मचारी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र कारवाईची मुदत संपल्याने केवणी खाडी किनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी कोपर व केवणीचे तलाठी रमेश सूर्यवंशीच जबाबदार असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
*ग्रामस्थांची मागणी*
वाळू माफियांना या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये मिळत असल्याने ते वरिष्ठ पातळीवर वाटप करतात आणि त्यामुळे पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना घाबरत नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. आतापर्यंत कोणत्या स्थानिक वाळू माफियांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, हे पोलीस व महसूल खात्याने दाखवून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. सध्या गुन्हे दाखल झाले असतील तर ते केवळ बार्ज व सक्शन पंपावर काम करणाऱ्या गरीब कामगारांवरच झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.