नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय !
'देरे हरी खाटल्यावरी' हे चालणार नाही : महेंद्रशेठ घरत
उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसच्या कविता संतोष पाटील यांची बहुमताने निवड झाली. भाजपच्या प्राची पाटील विरुद्ध महाविकास आघाडीच्या कविता पाटील यांच्यात थेट लढत झाली. त्यात काँग्रेसच्या कविता पाटील या दणदणीत मतांनी विजयी झाल्या. यावेळी सरपंच सविता मढवी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने विजयाचा जल्लोष करण्यात आला. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नवनियुक्त उपसरपंच कविता पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "गावातील विकासकामे व्हायला हवीत. रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला मिळायलाच हव्यात. त्यासाठी सिडकोसोबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा करायला हवा. मी आपल्यासाठीच आहे, पण 'देरे हरी खाटल्यावरी' हे चालणार नाही. आपण लढलो पाहिजे. दिबांनी आपल्याला १९८४ च्या शेतकऱ्यांच्या गौरवशाली व शौरशाली लढ्याने न्याय हक्क दिला आहे. सिडकोने ५ टक्के निधी प्रत्येक गावाला द्यायला हवा, पण तसे होताना दिसत नाही. लढल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही, हा भूमिपुत्रांचा इतिहास आहे. त्यामुळे दि. बा. पाटील साहेबांची हक्कांसाठी लढण्याची भूमिका आपल्याला विसरून चालणार नाही. सिडकोसोबत लढताना परिस्थितीनुसार रस्त्यावर उतरावे लागेल. आजचा विजय हा महाविकास आघाडीचा असून उरणमध्ये आगामी काळात परिवर्तनाची ही नांदी आहे."
यावेळी काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा रेखा घरत, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, संतोष पाटील, उरण शिवसेना तालुका प्रमुख बी. एन. डाकी, अविनाश म्हात्रे, विश्वास तांडेल, रवी पाटील, महादेव बंडा, मुरलीधर ठाकूर, नितीन मढवी, आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कविता पाटील यांची निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.