Monday, 25 May 2026

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!

*२० वर्षांच्या आरोग्यसेवेचा मानाचा टप्पा; ‘Code QRT 2.0’ उपक्रमाची घोषणा*

कल्याण, संदीप शेंडगे (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ परिसरात गेली २० वर्षे सातत्याने आरोग्यसेवा देणाऱ्या फोर्टिस हॉस्पिटल कल्याणने अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन करत आरोग्यसेवेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावेळी “Code QRT 2.0” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून, परिसरातील २५ स्थानिक रुग्णालयांना जोडून आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा संकल्प रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला.

या उद्घाटनप्रसंगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, फोर्टिस हॉस्पिटल्स महाराष्ट्रचे बिझनेस हेड डॉ. एस. नारायणी, फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. आयुषोत पांडे तसेच ट्रॉमा आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. सुधीर गोरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी फोर्टिस हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “आरोग्यसेवा ही कोणत्याही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाल्यास नागरिकांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यास मोठी मदत होते. फोर्टिस हॉस्पिटलने सुरू केलेले ‘Code QRT 2.0’ हे नेटवर्क भविष्यात शहरातील आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि वेगवान बनवेल.”

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणच्या आपत्कालीन विभागाने गेल्या २० वर्षांत ६० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. यामध्ये हृदयविकार, श्वसनविकार, मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर रुग्णांचा मोठा समावेश आहे. या अनुभवाच्या आधारे नव्या विभागाची उभारणी करण्यात आली असून जलद तपासणी, अत्याधुनिक बेडसाईड डायग्नोस्टिक्स आणि विविध तज्ज्ञांमधील समन्वयावर विशेष भर देण्यात आला आहे. 

नवीन विभागात चार अत्याधुनिक आपत्कालीन बेड, निगेटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम, सतत हृदय मॉनिटरिंग, व्हेंटिलेशन आणि डिफिब्रिलेशन सुविधा उपलब्ध आहेत. तसेच डिजिटल ट्रायज सिस्टम आणि रिअल-टाइम बेड मॅनेजमेंट डॅशबोर्डमुळे आपत्कालीन प्रतिसाद अधिक जलद आणि कार्यक्षम होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

या विभागात इमर्जन्सी फिजिशियन, हृदयरोगतज्ज्ञ, न्युरोलॉजिस्ट, ट्रॉमा तज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर विशेषज्ञ एकत्रितपणे सेवा देणार आहेत. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अपघात, सेप्टिक शॉक, पल्मनरी एम्बोलिझम, सर्पदंश तसेच रेल्वे किंवा रस्ते अपघातातील गंभीर रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे. 

“Code QRT 2.0” या उपक्रमाद्वारे आपत्कालीन सेवा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित न ठेवता शहरभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांना गंभीर रुग्णांची ओळख पटवणे आणि रुग्णालयात हलवण्यापूर्वी रुग्णांची स्थिती स्थिर ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

तसेच परिसरातील २५ प्रमुख रुग्णालयांना एकाच नेटवर्कमध्ये जोडून इमर्जन्सी डॉक्टर, फर्स्ट रिस्पॉन्डर्स आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. गंभीर रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविताना उपचारांमध्ये कोणताही विलंब होऊ नये आणि ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे फोर्टिस प्रशासनाने स्पष्ट केले.

जनगणनेमध्ये ओबीसी प्रवर्गाला कोणतेही स्थान नसल्याने शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी केला निषेध !

जनगणनेमध्ये ओबीसी प्रवर्गाला कोणतेही स्थान नसल्याने शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी केला निषेध.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना.

जणगणनेत फक्त एस सी,एस टी प्रवर्गाचा उल्लेख. इतर जातीचा उल्लेख नाही.

ओबीसी नेते नाराज ; ओबीसी समाजात तीव्र संताप.

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे) : सध्या सर्वत्र जणगणना सुरु आहे. मात्र या जणगनणेत एस सी, एस टी प्रवर्गचा उल्लेख आहे मात्र ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख नसल्याने शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख श्री जगजीवन भोईर यांनी तीव्र संताप व्यक्त करत या गोष्टीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे.त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बिहार निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने जनगणना करताना ओबीसींची स्वतंत्र गणना केली जाईल, असे जाहीर केले होते. बिहार निवडणुकीत ओबीसींना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने ही घोषणा केली होती. आता त्या नंतर मात्र प्रत्यक्षात जनगणना सुरू झाल्यानंतर जनगणना फॉर्ममध्ये ओबीसीचा (0) ओ देखील उच्चारला जात नाही किंवा तशा चौकशाही प्रगणकाकडून केल्या जात नाहीत. मग जणगणना कोणासाठी व कशासाठी केली जात आहे असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते जगजीवन भोईर यांनी उपस्थित केला आहे.


इतर मागासवर्गीयांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न या जनगणनेच्या माध्यमातून केला जात आहे. असेही भोईर यांनी म्हटले आहे. जर ही ओबीसींची स्वतंत्र गणना झाली नाही तर विश्वनाथ प्रताप सिंग, महाराष्ट्रातील नेते ओबीसीचे आणि आगरी समाजाचे नेते दिवंगत  दि. बा. पाटील साहेब यांनी रुजवलेली ओबीसी चळवळ मातीत गाडली जाईल आणि ओबीसींचे आरक्षण नष्ट केले जाईल.बहुजन नेते कांशीराम यांनी जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी  असे म्हटले होते. त्यांची ही घोषणा पुढे न्यावीच लागेल. जर ओबीसींची गणना करायची नसेल तर ही जनगणनाच करू नका ! ओबीसींची. स्वतंत्र गणना झालीच पाहिजे !! अशी मागणी जगजीवन भोईर यांनी केली आहे.केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय समाजाला फसवण्याचे धंदे बंद करावेत. असे शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला ठणकावले आहे.

 जगजीवन भोईर यांनी सांगितले की कालच जनगणना अधिकाऱ्याला फोनवर मी एक प्रश्न विचारला . त्यांना विचारलं की मी ओबीसी - आगरी आहे . तर ह्या जनगणना पत्रकात माझ्या ह्या संविधानिक प्रवर्गाचा उल्लेख आहे का ? तर त्यांनी सांगितलं की एस्सी व एस्टी ह्या दोनच प्रवर्गाचा उल्लेख आहे आणी जे अन्य प्रवर्ग किंवा जातीचे प्रवर्ग अर्थात ओबीसी वगैरे आहेत , त्यांचा " इतर " म्हणून उल्लेख आहे , ओबीसी म्हणून उल्लेख नाही . 
 
तेव्हा सदर अधिकारी मला म्हणाला की साहेब , ओबीसी समाज अक्षरशः झोपलेला आहे , त्याला ह्या महत्वपूर्ण मुद्द्याशी काहीच घेणदेण नाही . आज मला बरेच दिवस झालेत , मात्र ओबीसी सामाजाइतका सुस्त आणी मस्त समाज मी कधीच बघितला नाही . 

जनगणनेत जर ५२% असणाऱ्या ओबीसी समाजाचा उल्लेखच नाही , तर मग तुम्ही आम्हा ओबीसीला कुठ गृहीत धरत आहात ? आमचा काय म्हणून वापर करून घेत आहात ? आमचे मूर्ख नेते काय करत आहेत ? 

फक्त २२. ५ % एस्सी एस्टी समाजाचा उल्लेख जनगणनेत होतोय व आमचा नाही , ही किती भयंकर आणी निंदनीय बाब आहे . ज्या देशाचा प्रधानमंत्री स्वतःला ओबीसी म्हणतो , त्या प्रधानमंत्र्याच्या प्रवर्गाचा जनगणनेत उल्लेखच नसणे ही सामान्य बाब नाही . ह्याचा नाही ओबीसीचा फक्त आणी फक्त जातीय ध्रुवीकरणासाठी वापर केला जातो , कधी मुसलमानाच्या विरोधात , कधी एसीच्या तर कधी एस्टीच्या विरोधात . 

आमची जर जातनिहाय जनगणना होतच नाही , तर मग आमच्या समस्या कुठल्या , आमच्यात शिक्षणाच प्रमाण किती , आमच्यात नोकऱ्यांच प्रमाण किती , आमचा आर्थिक स्तर काय आहे ? ह्यासारख्या प्रश्नांच उत्तर कधी मिळणार ? 

बर , ह्या संविधानिक मुद्द्यावर कोणीही एक चकार शब्दही काढत नाही . आणी मग आमच्या मुलांना १२ वी नंतर ऍडमिशनचे प्रॉब्लेम झाले की आम्ही आमच्या अपयशाच खापर एस्सी एस्टी समाजावर फोडायला मोकळे होतो . काय ? तर त्यांना देऊन ठेवलय , आम्हाला नाही . पण तुम्हांला सुद्धा आहे , मात्र तुमचा हक्क मिळवण्यासाठी कधी तुम्ही रस्त्यावर येता का ? कधी सरकारला जाब विचारता का ? त्यासाठी कधी एकत्र येता का ? 

इतका निर्बुद्धपणा जगात कुठे शोधून सापडणार नाही . आतापर्यंत व्यवस्थेचे "अनपेड पोलीस " म्हणून आम्ही ओबीसीनी आमची जबाबादारी मोठ्या इमानेइतबारे पार पाडली , आणी ह्यापुढेही पार पाडू ! अशा भावना शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी व्यक्त केल्या आहेत

आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत

आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत

**0कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शानदार उदघाटन

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) ::कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वातानुकूलित भव्य अशा सभागृहाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी (ता. २३) मोठया उत्साहात उदघाटन करण्यात आले. या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे संपूर्ण अत्याधुनिक नूतनीकरण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी १२ लाख ५० हजार रुपये सढळ हस्ते केलेल्या देणगीतून करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. "महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे अवलिया आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, याचा कर्जतच्या आगरी समाजाला अभिमान आहे," असे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मला आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपला समाज मेहनतीने आणि सन्मानाने जगण्याला अधिक प्राधान्य देतो. कुणापुढे कारण नसताना झुकत नाही. ताठ कण्याचा आपला समाज मला प्रिय आहे. त्यामुळे आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करतो. समाजाच्या मागे मी कायमच खंबीरपणे उभा आहे आणि राहीन. कर्जतचा आगरी समाज संघटित होऊन समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कर्जतच्या आगरी समाजावर माझे विशेष प्रेम आहे. त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात कायमच राहील. मी जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे जगभर फिरतो; परंतु मी माझ्या गावाच्या विकासाबाबत संवेदनशील आहे. आज राज्यात रोल मॉडेल ठरेल, असा माझ्या शेलघर गावाचा सुनियोजित विकास मी करून घेतला आहे. आज तिथे ग्रामस्थांना बोट ठेवायला जागा नाही. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जलकुंभ बांधून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतविला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर अभ्यास करून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आणि विकासात्मक कामे करून घेतली. रायगडमध्ये सी. डी. देशमुख यांच्यानंतर मी जगाच्या व्यासपीठावर नावलौकिक मिळवतोय. तिथेही मी त्या त्या देशांच्या कामगार नेत्यांवर वचक ठेवून आहे."  

या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, नितीन धुळे, रेश्माताई जोशी, मंगेश म्हसकर, विपूल पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. हा समारंभ हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृह नेरळ-बोपेले येथे पार पडला. यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष नागो गवळी, एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, निखिल ढवळे आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर भरत भगत यांनी प्रास्ताविक केले.

आंबिवलीतील नागरिकांचा पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात ठिय्या !!

आंबिवलीतील नागरिकांचा पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात ठिय्या !!

** संतप्त महिलांनी बेकायदेशीर नळ जोडण्या खंडीत करण्याची केली मागणी 

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आंबिवली परिसरात गेल्या चार महिन्यांपासून पाणीपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त महिला व नागरिकांनी अ प्रभाग कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले.

आंबिवली अटाळी परिसरातील शंभू पाटील चाळ साईकृपा चाळ धर्मात्मा नगर ज्योतिर्लिंग चाळ आदी भागात अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

येथील काही भागांमध्ये बेकायदेशीर नळ जोडणी मोठ्या प्रमाणात झाल्या असून अनधिकृत बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जात असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. आम्ही नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असूनही आम्हाला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे रेशमा बोत्रे जयश्री ढेकळे यांनी सांगितले.

“घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या आंदोलन करणाऱ्या महिलांची पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी भेट घेऊन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे  पाणी समस्या मार्गी न लागल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

टिटवाळ्यात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या !!

टिटवाळ्यात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या !!

**आरोपी पतीविरोधात वडिलांची फाशीची मागणी
कल्याण, संदीप शेंडगे : टिटवाळा येथील बल्याणी परिसरात घरगुती भांडणाचे रूपांतर थेट रक्तरंजित घटनेत झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीला अमानुष मारहाण करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे नाव सतीश काळूराम वाघे असून मृत महिलेचे नाव सारिका उर्फ रुखसार असे आहे. पत्नी माहेरी वडिलांकडे होती गोड बोलून सतीश ने पत्नीला आपल्या घरी बोलाविले. त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले घरगुती वादाच्या रागातून सतीश वाघे याने पत्नीला बेदम मारहाण केली. संतापाच्या भरात त्याने पाण्याने भरलेला हंडा तिच्या डोक्यात घातल्याचे तसेच भिंतीवर डोके आपटत अमानुष अत्याचार केल्याचे वडिलांनी सांगितले. या क्रूर मारहाणीमध्ये गंभीर जखमी अवस्थेतील रुखसारला तातडीने जवळील महागणपती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे कारण देत जखमी महिलेला इतरत्र हलविण्यास सांगण्यात आले. टिटवाळा सारख्या शहरात एका खाजगी दवाखान्यात ऑक्सिजन उपलब्ध नाही त्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप रुखसारच्या वडिलांनी केला आहे 

     या प्रकरणी रुखसार चे वडील सुलतान अकबर अन्सारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपी सतीश वाघे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच, कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या प्रकरणात अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा गंभीर आरोपही अन्सारी यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे टिटवाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी होत आहे.

Saturday, 23 May 2026

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी !

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी !

जून, जुलै महिन्यात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट.

मच्छिमार बांधवांना आंध्रप्रदेश सरकार प्रमाणे पॅटर्न राबवून दिलासा देण्याची मागणी.

उरण दि २३,'(विठ्ठल ममताबादे) :
मच्छिमार कुटूंबियांना माहे जुन व माहे जुलै दोन महिन्यांचा उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावे अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व संबंधित विभागाना करण्यात आली आहे.

सरकारी आदेशानुसार कोकण किनारपटटीवरील मच्छिमारी १ जुन ते ३१ जुलै कालावधीकरीता बंद करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा आदेश सहा. मत्स्यव्यवसाय विभागाने जाहीर केलेला आहे. या दोन महिन्यांत माश्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे तसेच जोरदार पाऊस व वादळाचा धोका यामुळे मच्छिमारी बंद ठेवणे योग्यच आहे. परंतु कोकण किनारपटट्टी वरील मच्छिमाऱ्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह संपुर्ण मच्छिमारीवर चालतो. पुढील २ महिन्यांमध्ये त्यांना कुठलेही उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण होत असतो व आताही झालेला आहे. त्यांना या २ महिन्यांकरीता उदरनिर्वाह भत्ता अथवा आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

नुकताच आंध्र प्रदेश सरकारने त्या राज्यातील मच्छिमारांच्या कुटूंबियांना दोन महिन्यासाठी प्रतिमहिना २०,०००/- रू. देण्याचे मान्य केले आहे व त्याचे वाटप सुध्दा चालु आहे. महाराष्ट्र राज्य हे मच्छिमारी व्यवसायातुन मोठया प्रमाणात महसुल गोळा करते. तरी या सारख्या आर्थिक सधन राष्ट्राने गरजु मच्छिमारांसाठी आर्थिक मदत देणे क्रमप्राप्त आहे.असे संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे मच्छिमारांच्या प्रत्येक कुटूंबाला प्रतिमहिना रू. २५,०००/- प्रमाणे दोन महिन्याचे ५०,०००/-आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.या संदर्भात कामगार नेते तथा संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार कॉम्रेड भूषण पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिले व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.यावेळी तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कोट (चौकट ):- 

कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत की महाराष्ट्रातील मच्छिमारांना ५०, ०००/- उदरनिर्वाह भत्ता द्या.१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यामध्ये माशांचा प्रजनन काळ व जोरदार पाऊस या कारणास्तव मच्छिमारी बंद करण्याचे आदेश मच्छिमार आयुक्ताने काढला आहे त्यामुळे मच्छिमारांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.नुकतेच आंध्रप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील मच्छिमारांना उदरनिर्वाह रु ४०, ०००/-भत्ता दिला आहे त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारणे सुद्धा द्यावा हि मागणी करीत आहोत .
   - कॉम्रेड भूषण पाटील,कामगार नेते तथा मार्गदर्शक कोकण किनारा मच्छिमार संघटना.

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे !

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे  !

** पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण  ;  सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )
काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार व्हावा, उत्तमपणे संघटनात्मक बांधणी व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय समितीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी काँग्रेसच्या कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्या असलेल्या व गोर गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमी झटणाऱ्या श्रुती शाम म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्त्या म्हणून श्रुती म्हात्रे यांची ओळख आहे. शिवाय प्रसिद्ध महिला सामाजिक कार्यकर्त्या व कामगार नेत्या म्हणूनही त्या सर्वांना सुपरिचित आहेत. श्रुती म्हात्रे यांना त्यांचे वडिल  कामगार नेते, काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व. शाम म्हात्रे यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला. वडिलांचा विचार कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रुती म्हात्रे सुरवातीपासूनच कार्यरत आहेत. श्रुती म्हात्रे यांनी आजपर्यंत हजारो कामगारांना, गोर गरीब जनतेला न्याय दिला आहे. काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार केला आहे. काँग्रेस पक्षाची उत्तम संघटनात्मक बांधणी केली आहे.सध्या श्रुती म्हात्रे या कोकण श्रमिक संघाच्या अध्यक्षा, शाम म्हात्रे फॉउंडेशनच्या अध्यक्षा, एकता कॅटलीस्ट संघटनेचे अध्यक्षा, आगरी शिक्षण संस्थेचे सहसचिव, आगरी शिक्षण संस्था शाळा समितीचे अध्यक्षा, हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सदस्य असे अनेक पदे भुषवित आहेत. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. त्यांच्या या सर्वच कार्याची दखल घेत त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने श्रुती म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आनंद व समाधान व्यक्त करत पेढे वाढून या निर्णयाचे व निवडीचे स्वागत केले. सर्वच राजकीय पक्षाशी चांगले संबंध असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्रुती म्हात्रे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रुतीताई म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी  माझी निवड घोषित करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी साहेब, AICC सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल साहेब, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनीथला साहेब, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, संघटन सृजन अभियान निरीक्षक रागिणी नायक मॅडम, गटनेते विजय वडेट्टीवार साहेब, गटनेते सतेज पाटील साहेब, CWC सदस्य बाळासाहेब थोरात साहेब, मार्गदर्शक गणेशजी पाटील साहेब, मार्गदर्शक संध्याताई सव्वालाखे मॅडम, पर्यवेक्षक तौफिक मुलानी साहेब, श्रीरंग बर्गे साहेब, आमचे मार्गदर्शक  आर.सी घरत साहेब, प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर साहेब, नंदाताई म्हात्रे, श्रद्धा ताई ठाकूर या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.काँग्रेस पक्षाची विचारधारा, संघटन मजबूत करण्यासाठी मी या पदाचा पुरेपूर वापर करेन. ज्येष्ठाचे मार्गदर्शन घेवून, सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेवून सर्व समजघटकांसाठी कार्यरत राहीन.असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !! *२० वर्षांच्या आरोग्यसेवेचा मानाचा टप्पा; ‘Code QRT 2.0’ उपक्रमाची घोष...