Tuesday, 11 August 2026

2017/22 सालातील जीएसटी एमआयडीसी कडून वसुली ! उद्योजक, निवासी त्रस्त !!

2017/22 सालातील जीएसटी एमआयडीसी कडून वसुली ! उद्योजक, निवासी त्रस्त !!

           डोंबिवलीसह महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक, व्यापारी आणि निवासी मधील काही ग्राहकांना एमआयडीसी कडून नोटीस पाठवण्यात येत असून ज्यांनी भूखंडाचा विकास, हस्तांतरण व इतर सेवा या 01/07/2017 ते 04/09/2022 या मुदतीत घेतल्या असतील त्यांच्याकडून त्यावेळी न घेतलेली जीएसटी ही आता व्याज्यासहीत एमआयडीसी आता वसूल करीत असल्याचे दिसत आहे. साधारण ही अंदाजित रक्कम कमीतकमी रुपये 5000/- ते 90000/- (नव्वद हजार) एवढी येत असल्याचे माहिती पडत आहे. सर्व महाराष्ट्रातून यामुळे करोडो रुपये हे उद्योजकांना आणि निवासी, व्यापारी भुखंड धारकांना द्यावे लागणार आहेत.
       आपल्या देशात जीएसटी कर घेण्यास 1 जुलै 2017 पासून सुरवात झाली होती. हा कर एमआयडीसीने त्यावेळी भुखंड धारकांकडून घेतला गेला नाही. सरकारच्या जीएसटी खात्याने नोटीस द्वारे लक्षात आणून दिल्यावर एमआयडीसीने दिनांक 05/09/2022 पासून हा कर भुखंडधारकांकडून घेण्यास सुरुवात केली. यात भुखंड धारकांची काहीच चूक नव्हती. त्यांनी त्यावेळच्या लागणाऱ्या शुल्काप्रमाणे एमआयडीसीला रक्कम अदा केली होती. मात्र ही चूक एमआयडीसी आणि सरकारी प्रशासनाची असताना भुर्दंड मात्र भुखंड धारकांना बसला आहे. खरे तर त्यावेळी हा न घेतलेला कर प्रशासनाने आता माफ केला पाहिजे होता. शिवाय या जीएसटी रक्कमेवर भुखंड धारकांची काहीच चूक नसतांना व्याज लावले आहे.
           गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली एमआयडीसीच्या विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) कडून या नोटीसा पाणी बिलासोबत पाठविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटीस वर दिलेल्या तारखेनंतर एक महिन्यानंतर ही नोटीस मिळत असल्याने नागरिक संतापलेले आहेत. कारण हे पैसे भरण्यासाठी नोटीसमध्ये 30 दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे ही मुदत निघून गेलेली आहे. 
           साधारण मागील दीड दोन वर्षापूर्वी अशाच काही नोटीसा एमआयडीसी कडून पाठविण्यात आल्या होत्या. त्यावेळी डोंबिवली मधील काही निवासी भुखंडधारक, निवासी सोसायट्या आणि औद्योगिक संघटना यांनी हरकती घेऊन एमआयडीसीला पत्रे दिली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी माननीय उद्योगमंत्री याना विनंती केली होती. उद्योगमंत्र्यानी पण यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. आता हा प्रश्न पुन्हा एमआयडीसी नोटिसाने उपस्थित झाला असून स्थानिक लोकप्रतिनिधी हा प्रश्न आता कसा सोडविणार की मंत्र्यांच्या आश्वासनावर बोळवण होणार हे पाहावे लागेल. 

वृत्त - समाजसेवक राजू नलावडे (डोंबिवली)

कवयित्री, लेखिका सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांना विशेष गौरव पुरस्कार !!

कवयित्री, लेखिका सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांना विशेष गौरव पुरस्कार !!

शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीच्या संचालिका सन्माननीय उषा शिलवंत घोडेस्वार यांना मनाचे खेळ सायकॉलॉजी ३६५ विवर ऑफ दि मंथ विशेष गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले. 
          परिस फाऊंडेशन सांगली तर्फे आयोजित "मनाचे खेळ – सायकॉलॉजी 365" जुलै महिना या मानसशास्त्रीय मालिकेतील "विवर ऑफ दि मंथ" म्हणून सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांची निवड करण्यात आली. मानसशास्त्राविषयी ज्ञानार्जन, व्हिडिओ नियमित पाहणे, लाईक, कमेंट, शेअर करून सातत्यपूर्ण व सकारात्मक सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांना हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला आहे. सन्मानामध्ये "मनाचे खेळ – सायकॉलॉजी ३६५" पुस्तक (भेट स्वरूपात) प्रदान करण्यात आले. विवर ऑफ दि मंथ सन्मानपत्र तसेच परिस फाऊंडेशन कडून विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला.
       सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांच्या सकारात्मक सहभागामुळे, व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य जनजागृतीच्या कार्याला नवी प्रेरणा मिळत आहे. दररोज एक विचार... मनाला नवा दृष्टिकोन असा विचार ठेवून ही मानसशास्त्रीय मालिका सुरू आहे.
      परिस फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉ अजित पाटील सर व त्यांची संपूर्ण टीम तसेच आयोजक समिती यांच्या नेतृत्वाखाली हा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
          सामाजिक, साहित्यिक व मानसिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना हा विशेष गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत असते सर्वांच्या परीक्षणेतून या सन्मानाची अतिशय सुरळीतपणे निवड करण्यात आली.

Monday, 10 August 2026

ठाणे जिल्ह्याला दिलासा : बारवी धरण ओसंडून वाहू लागले; कल्याणसह परिसराचा पाणीप्रश्न सुटणार‌ !!

ठाणे जिल्ह्याला दिलासा : बारवी धरण ओसंडून वाहू लागले; कल्याणसह परिसराचा पाणीप्रश्न सुटणार‌ !!

*ठाणे, प्रतिनिधी* : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे पाणीपुरवठा स्रोत असलेले बारवी धरण अखेर ओसंडून वाहू लागले आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली आहे.

*पाणी पातळी 72.60 मीटरवर*  
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बारवी धरणाची पाणी पातळी ओसंडून वाहण्याच्या पातळीपर्यंत म्हणजेच 72.60 मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

*कल्याणच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर*  
बारवी धरण हा कल्याण, डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस कमी झाल्याने पाणीसाठ्याबाबत जी चिंता व्यक्त केली जात होती, ती आता दूर झाली आहे. धरण ओसंडून वाहू लागल्याने पुढील काही महिन्यांसाठी पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.

*प्रशासन सतर्क*  
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पडणाऱ्या पावसावर आणि धरणाच्या पाणी पातळीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.

धरण ओसंडून वाहू लागल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या टंचाईची शक्यता आता टळली असून जलसंपत्तीच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर !!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर !!
 
** उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) : हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे  युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे  यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर मार्गदर्शनानुसार जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी  फते खान सोंडे व युवतीसेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांच्या नियुक्या जाहीर केले आहेत.

शिवसेना उरण शहर शहराच्या वतीने आयोजित जाहीर कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव  यांच्या शुभहस्ते हे नियुक्त पत्र देऊन या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे, तसेच जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नियुक्ती पत्रात संघटना बांधणीसाठी व पक्ष वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागा अशा शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, उपजिल्हाप्रमुख  नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष  गणेश शिंदे, तालुका संपर्कप्रमुख  दीपक भोईर, शहर प्रमुख  विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे,शिवसेना ग्राहक कक्ष प्रमुख उरण शहर - संदीप जाधव,उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका भावना म्हात्रे,पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्ते उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोकण ग्रुप तर्फेही त्यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत

Sunday, 9 August 2026

४० वर्षांचा अन्याय आता निर्णायक लढाईत ; हनुमान कोळीवाडा(शेवा कोळीवाडा )व नवीन शेवेच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांचा एल्गार !!

४० वर्षांचा अन्याय आता निर्णायक लढाईत ; हनुमान कोळीवाडा(शेवा कोळीवाडा )व नवीन शेवेच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांचा एल्गार !!


बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश ; १५ ऑगस्टला जेएनपीए प्रशासन भवनासमोर उपोषण 

** बनावट व चुकीची २ आज्ञापत्रे रद्द करा; विस्थापितांना न्याय द्या, पूर्ण पुनर्वसन करा!” विस्थापितांची मागणी.

हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.


उरण, दि. १० (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा (शेवा कोळीवाडा) व नवीन शेवे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांचा संताप आता उफाळून आला आहे. जेएनपीए प्रकल्पासाठी स्थानिकांनी जमीन, घरे देऊन आणि पारंपरिक उपजीविकेवर परिणाम सहन करूनही पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप पूर्णत्वास न गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता “आश्वासन नको, निर्णायक निर्णय हवा!” अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी आंदोलनाची घोषणा केली आहे.

नवीन शेवा व शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता श्री शांतेश्वरी मंदिर नवीन शेवा येथे महत्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रोजी जेएनपीए प्रशासन भवन समोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठक प्रसंगी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, पंचायत समिती सदस्य दिपक भोईर, सरपंच सोनल घरत,नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळचे अध्यक्ष कमळाकर पाटील,उपाध्यक्ष लक्ष्मण म्हात्रे, भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत,तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा घरत,सल्लागार बाळकृष्ण पाटील,शाखाप्रमुख शैलेश भोईर,सल्लागार पंडित घरत, काँग्रेसचे जेष्ठ नेते कमळाकर घरत,शिवसेनेचे गणेश म्हात्रे,ग्रामसुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा अध्यक्ष सुरेश कोळी,खजिनदार नितीन कोळी,माजी सरपंच परमानंद कोळी, सामाजिक कार्यकर्ते हरेश कोळी,नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे सल्लागार हेमंत म्हात्रे, एकनाथ घरत, नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा गावचे प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर महत्वाच्या बैठकीत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर,नवीन शेवा ग्रामपंचायत सरपंच सोनल घरत,  नवीन शेवा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष  कमळाकर पाटील,भाजपचे चंद्रकांत घरत, सल्लागार पंडीत घरत,शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी, माजी सरपंच परमानंद कोळी आदी पदाधिकारी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या बैठकीत पुनर्वसनाच्या प्रक्रियेत गेल्या ४० वर्षांपासून अन्याय व फसवणूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थ व विस्थापितांमार्फत करण्यात आला आहे. तसेच २ बनावट अथवा चुकीचे आज्ञापत्रे तयार करून जेएनपीए (एनएसपीटी) व शासनाने दोन्ही गावांची फसवणूक केल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी बैठकीत सर्वानुमते करण्यात आली आहे.
“बनावट आज्ञापत्रांमागील सत्य बाहेर काढा!”अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आले.

ग्रामस्थांच्या तीन प्रमुख मागण्या उपोषणाच्या केंद्रस्थानी आहेत. बनावट व चुकीची २ आज्ञापत्रे रद्द करा तसेच त्या आज्ञापत्राने दिशाभूल करणाऱ्या कारभाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी पहिली मागणी आहे.
दुसरी विस्थापितांची फसवणूक केल्याच्या आरोपांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर १५ दिवसांत कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर सर्वांत महत्त्वाची मागणी म्हणजे नवीन शेवा आणि शेवा कोळीवाडा गावांचे न्याय्य व पूर्ण पुनर्वसन तातडीने करावे.अशा तीन मागण्या करण्यात आले.

१५ ऑगस्टला जेएनपीए प्रशासन भवनासमोर उपोषण करण्यात येणार आहे.ग्रामस्थांनी आता आंदोलनाची ठोस दिशा जाहीर केली असून शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता जेएनपीए प्रशासन भवन समोर उपोषण करण्यात येणार आहे.
“४० वर्षांचा अन्याय... आता निर्णायक लढा!” असा निर्धार व्यक्त करत हजारोंच्या संख्येने विस्थापित ग्रामस्थांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. न्यायासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

पुनर्वसनाचा प्रश्न केवळ प्रशासकीय फाईलमध्ये अडकवून ठेवण्याची वेळ आता संपली पाहिजे, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर शासन आणि जेएनपीए प्रशासनाने कालबद्ध निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला आहे.विस्थापित तसेच 
ग्रामस्थांच्या मते, पुनर्वसनाशी संबंधित सर्व आदेश, आज्ञापत्रे, नोंदी आणि कागदपत्रांची पारदर्शक तपासणी करून पात्र विस्थापितांना कायद्यानुसार न्याय मिळणे गरजेचे आहे. संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )आणि नवीन शेवेच्या ग्रामस्थांनी एकजूट, संघर्ष आणि विजय या निर्धाराने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. १५ ऑगस्टच्या आंदोलनातून चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला निर्णायक वळण देण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे.“४० वर्षे अन्याय सहन केला; आता आणखी प्रतीक्षा नाही.असा संकल्प करण्यात आला असून बनावट व चुकीच्या आज्ञापत्रांच्या आरोपांची चौकशी करा, दोषींवर कारवाई करा आणि शेवा कोळीवाडा गावातील २५६ कूटूंबांचे व शेवा गावातील ३६५ कूटूंबांचे शासनाचे मापदंडाने दि.१२/११/१९८२ते १५/०१/१९८८ सालात पायरी पायरीने मंजूर असलेले पूर्ण व न्याय्य पुनर्वसन करा,” अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.आता या आंदोलनाची दखल घेऊन जेएनपीए प्रशासन, राज्य शासन आणि केंद्र शासन कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे उरण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

*मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ*

*मराठा समाज  विद्यार्थी गुणगौरव समारंभ*

मुंबई, (पी. डी पाटील) : सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई,  यांच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळगाव असलेली व मराठा ज्ञातीतील ज्या मुला/मुलीनी मुंबई शहर व उपनगर परिसरातील शाळा-कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना सन २०२५-२६ या  शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, इ. १० वी च्या परीक्षेत ८० टक्के, १२ वीत ७५ टक्के (विज्ञान व वाणिज्य शाखा), ७० टक्के ( कला शाखा ) व त्याहून अधिक गुण संपादन केले आहेत, विविध शाखेतील पदविका, पदवी व उच्च पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना, संस्थेच्या वार्षिक स्नेह-संमेलनात रोख रक्कमेची पारितोषिके, सन्मान चिन्हे, प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात  येणार आहे. 


तरी वरील प्रमाणे यश संपादन केलेल्या विद्यार्थांनी आपल्या गुण पत्रिकेची छायांकित प्रत, संपूर्ण नाव, मुंबईतील पत्ता, गावचा  पत्ता, टेलीफोन क्र /मोबाईल क्र. मराठी  मध्ये दि. ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी, सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, स्टार मॉल, ३रा मजला, न. चिं. केळकर मार्ग, दादर (पाश्चिम), मुंबई ४०००२८ या पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहिती साठी संपर्क ( सोमवार सोडून ) बाळा पाताडे - 9137469348( सायं.३ ते ६ ) यांना करावा.

आता उठवू सारे रान -: युवकांचा आवाज..

आता उठवू सारे रान -: युवकांचा आवाज..

गेल्या अनेक दिवसापासून चालू असणारे शैक्षणिक लढा हा शिक्षणा पुरता मर्यादित न राहता अनेक समस्यांचा आवाज झाला आहे. अनेक युवकांनी मांडलेले प्रश्न आज जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अंतर्गत लक्ष परिवर्तन संस्था युवकांच्या आवाज या कार्यक्रमात दिसले.

     शिक्षण, वाढती बेरोजगारी, पेपर फुटी, चॅट जिटीपी, ए आय, व्यसन, शिक्षण व्यवस्था, नीट परीक्षा, खेळाडूवरील अत्याचार, आत्महत्या, E20 पेट्रोल आणि इथेनॉल, अशा विविध प्रश्नातून युवकांनी आपले विचार मांडण्याच्या प्रयत्न केला. आज आपण बघतोय, पाहतोय पण यावर आपण बोलायला तयार नाही का? एकाची समस्या आहे का ? तर नाही ती समस्या प्रत्येकाची आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणे देखील आपले कर्तव्य आहे. 

शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे, आर्थिक फी यावर सरकारने विचार करायला हवे. जेणे करून सर्वांना शिक्षणात संधी मिळाले पण वाढती फी बघता १० नंतर ४० टक्के मुलांचे शिक्षण घटल्याचे समोर आले आहे. तरी आपण त्यावर शांत आहोत ? तसेच प्रश्न अत्याचाराच्या, तरुणांनी आपल्या आजूबाजूच्या आणि स्वतःच्या आयुष्यातील समस्या मांडल्या, तसेच त्या समस्यांवर उपाय शोधण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे ही चर्चा केवळ समस्या मांडण्यापुरती मर्यादित न राहता त्यातून पुढे काय करता येईल, याचाही विचार करणारी ठरली. चर्चेदरम्यान AI मुळे मुलांमध्ये आळशीपणा वाढत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. आजच्या काळात AI चा योग्य वापर आणि त्यावरील अतिनिर्भरता याबाबत तरुणांनी विचार करणे किती आवश्यक आहे, हेही या चर्चेतून जाणवले. मोबाईल मधील AI चा अती वापर तसेच इतर अँप चा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेकाना वेगवेगळ्या प्रश्नांना समोरे जाऊन तणावाला बळी पडताना दिसत आहेत पण आपण त्यावर उपाय करण्यापेक्षा आजुन नवीन कसे अँप व मूल गुंतून कसे बसतील यांच्या विचार आपण करतो.

सरकार नागरिकांच्या प्रश्नावर उपाय कधी शोधणार ? कधी त्यांना न्याय देणार ? आज अनेक आमदार खासदार, नगरसेवक आहेत जे पैशाच्या जोरावर, पदावर नागरिकांच्या छळ करताना दिसत आहे. पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही. आमली पदार्थाचे सेवन वयाच्या ६ वर्षापासून गलो गल्ली होताना दिसत आहे तरी देखील पोलिस प्रशासन गप्पा का ? आजुन किती लहान मुलांचे बळी घेणार आहे. असे असंख्य प्रश्न युवकांच्या मनात आहे आता त्यांना संधी मिळाली आहे आणि ते आवाज उठवून नागरिकांना जागे करून आपल्या हक्काच्या आवाज होण्यास तयार आहे. "हम सब एक हे" च्या घोषणेने तरुणांना लढण्याची ऊर्जा मिळाली. युवकांच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडू शकतात त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे देखील गरजेचे आहे. 


कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय डॉ. संजय मंगला गोपाळ, श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, वी नीड यू सोसायटी सचिव अभय कांता, समता विचार प्रसारक संस्थेचे सचिव लतिका सुप्रभा मोतीराम, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अजय भोसले तसेच लक्ष परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष गोरख हिवाळे, योगेश कांबळे व इतर सदस्य उपस्थित होते.

हा कार्यक्रम सुंदर झाला याचा आम्हाला आनंद आहे. भविष्यात तो आणखी मोठ्या स्वरूपात व्हावा, अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावा आणि समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांना विचार करण्यासाठी, बोलण्यासाठी व कृती करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ मिळावे. कारण समाजात बदल घडवायचा असेल तर केवळ समस्या मांडून उपयोग नाही; प्रश्न विचारावे लागतील, विचार मांडावे लागतील, उपाय शोधावे लागतील आणि त्या उपायांवर कृतीही करावी लागेल. आजच्या या चर्चेतून एक आशा नक्कीच निर्माण झाली आहे की तरुणांना योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाले, तर ते समाजात नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतात.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे वी नीड यू सोसायटी सदस्या कल्पना ताई, मनिषा ताई, रोनित व इतर सदस्य यांनी मेहनत घेतली.

2017/22 सालातील जीएसटी एमआयडीसी कडून वसुली ! उद्योजक, निवासी त्रस्त !!

2017/22 सालातील जीएसटी एमआयडीसी कडून वसुली ! उद्योजक, निवासी त्रस्त !!            डोंबिवलीसह महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसी क्षेत्...