Tuesday, 15 September 2026

धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !!

धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !!

वसई (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील धोबीघाट रोड, राजवली, बोयदा पाडा येथे सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदार विष्णू गुप्ता यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. पृथ्वीराज बी.पी. साहेब तसेच सीयूसी (CUC) प्रमुख मा. विशाखा मोडगडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

गेल्या चार दिवसांपासून या अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेकडे सातत्याने तक्रारी नोंदवण्यात येत आहेत. मात्र, संबंधित यंत्रणेकडून कोणताही ठोस प्रतिसाद किंवा प्रत्यक्ष कारवाई करण्यात आलेली नाही. प्रभाग समितीतील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे किंवा संगनमतानेच अशा अवैध बांधकामांना खतपाणी घातले जात असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.

तक्रारदाराच्या मुख्य मागण्या:
 * परवानग्यांची तपासणी: संबंधित बांधकामासाठी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी, मंजूर नकाशा व इतर वैध कागदपत्रे आहेत का, याची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी व्हावी.
 * MRTP कायद्यांतर्गत कारवाई: बांधकाम अनधिकृत आढळल्यास एमआरटीपी (MRTP) कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल करून बांधकाम तात्काळ निष्कासित (तोडण्यात) यावे.
 * CUC प्रमुखांची विशेष मध्यस्थी: सीयूसी प्रमुख विशाखा मोटघरे यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून घटनास्थळाची पाहणी करावी आणि तातडीने तोडक कारवाईचे आदेश द्यावेत.
 * अधिकाऱ्यांची चौकशी: चार दिवस तक्रारी येऊनही दुर्लक्ष करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

वारंवार तक्रारी करूनही बांधकाम सुसाट सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता पालिका आयुक्त आणि सीयूसी प्रमुख या अनधिकृत बांधकामावर काय पावले उचलतात आणि दोषींवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तक्रारदाराने या प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याचीही विनंती पत्रात केली आहे.

Monday, 14 September 2026

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार ; वैभव कडू यांची स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी !!

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार !!

वैभव कडू यांची स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी.

समुद्रकिनारी विसर्जनचा रस्ता करून दिला मोकळा 

उरण, दि. १३ (विठ्ठल ममताबादे) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नागांव तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पिरवाड समुद्रकिनारी विसर्जनासाठी येत असतात. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दगड जमा झाल्याने विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ही बाब लक्षात घेऊन नागांव गावातील नागरिकांनी नागांव-म्हातवळी प्रकल्पग्रस्त अध्यक्ष तथा समाजसेवक वैभव यशवंत कडू यांच्याकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. नागरिकांची अडचण लक्षात घेत वैभव कडू यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वखर्चाने समुद्रकिनारी विसर्जनासाठी जाणारा मार्ग मोकळा करून दिला.
‘गावकऱ्यांची अडचण ही आपलीच अडचण’ या भावनेतून केलेल्या या पुढाकारामुळे गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध व्हावा, हाच या कामामागील उद्देश असल्याचे वैभव कडू यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकी जपत कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता स्वखर्चातून केलेल्या या उपक्रमाचे नागांव तसेच परिसरातील नागरिक आणि भाविकांकडून कौतुक होत असून, वैभव यशवंत कडू यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. माणुसकीतून केलेली ही सेवा गणेशभक्तांसाठी खऱ्या अर्थाने ‘बाप्पाची सेवा’ ठरली आहे.

समाजजोडो अभियान गतिमान करा - अण्णासाहेब कटारे

*समाजजोडो अभियान गतिमान करा - अण्णासाहेब कटारे*

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थित पुण्यात भव्य प्रवेश व पत्रकार परिषद संपन्न..*

पुणे (प्रतिनिधी): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे पुणे दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत पुण्यातील अनेक पक्ष संघटनेतील कार्यकर्ते महिलांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. 

प्रवेश सोहळ्यानंतर पुणे येथील श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ साबळे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जोमाने वेगाने सुरू आहे दररोज महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील अनेक नामावंत व्यक्ती विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे. राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षाने नेहमीच गोरगरीब/ दलित /बौद्ध/मागासवर्गीय/ अल्पसंख्यांक /आदिवासी/ ओबीसी/ भटके विमुक्त समूहाच्या जीवन मरणाच्या प्रश्नांकडे नेहमीच डोळे झाक केलेली दिसते. स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही या घटकांची कोणत्याही क्षेत्रात सर्वांगीण प्रगती नाही अजूनही त्यांना मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी संघर्ष करावा लागत आहे म्हणून राज्यातील आता हे सर्व समाज घटक प्रस्थापित पक्षांना कंटाळले असून ते पर्यायच शोधत आहे त्यांच्या सर्वच प्रश्नांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे असेही कटारे यांनी शेवटी सांगितले.

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केलेले नामवंत खालील प्रमाणे - उदय खांडके (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी) संगीता ननावरे (परीट धोबी पुणे जिल्हा अध्यक्षा), नम्रता अहेर, (अध्यक्षा रणरागिणी प्रतिष्ठान), शुभांगी बहुलेकर (शिंपी समाज प्रमुख पुणे जिल्हा), परेशभाई कटारीया (जैन समाज नेते व व्यापारी असोसिएशन), मनोज अष्टेकर (साळी समाज अध्यक्ष पुणे), मुदस्सर भाई (मदारी समाज नेते पुणे), अभिषेख वैराट (सामाजिक कार्यकर्ते), सचिन बतूल (तेलगू संघटना),धनंजय मालुसरे (सामाजिक कार्यकर्ते) गणेश काची (शिवसेना नेते पुणे), येशुराज बेल्ली (मेरी चर्च मुंबई रिजनल कॉन्फरन्स)

प्रामुख्याने या प्रवेश सोहळ्यास व पत्रकार परिषदेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्कप्रमुख सचिनभाऊ नांगरे, येवला युवा नेते तुषार वाघ, युवा संपर्कप्रमुख संतोष राजगुरू, युवा नेते बबन वाघ, युवा नेते प्रशांत कटारे, अभिनव निकम, सिद्धांत कटारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा संघटक अक्षय वाघमारे, पुणे जिल्हा सचिव कुणाल चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी प्रीती जगताप, पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी प्राजक्ता शिंदे माधवीताई अवसरकर, कल्पना जोशी, रेश्मा ताई पोकळे, प्रतिभा आजबे, संतोष निरगुडे, नम्रता अहिरे आदींनी परिश्रम घेतले.

नवी मुंबईत नागरी संरक्षणाच्या प्राथमिक प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

नवी मुंबईत नागरी संरक्षणाच्या प्राथमिक प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*प्रशिक्षणार्थींना व्याख्याने व प्रात्यक्षिकांद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*

*नवी मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२६ :*

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. १७/२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण वर्ग दि. ०७ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १२.०० ते ४.३० या वेळेत मॉडर्न कॉलेज, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या प्रशिक्षण वर्गात एकूण ४९ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्तीच्या काळात स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक ज्ञान, कौशल्ये आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच अनुषंगाने या प्राथमिक प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर सैद्धांतिक मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणाच्या एका सत्रात श्री. अनिल गावित, सहाय्यक उपनियंत्रक तसेच डॉ. राहुल घाटवळ, मानसेवी निदेशक तथा विभागीय क्षेत्ररक्षक यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण व्याख्याने दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिके सादर करून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी श्री. धैर्यशील जाधव, निवृत्त अतिरिक्त नियंत्रक, बृहन्मुंबई यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शनपर व्याख्यान सादर केले. त्यांच्या अनुभवातून प्रशिक्षणार्थींना नागरी संरक्षणाच्या कार्यपद्धतींबरोबरच आपत्तीच्या प्रसंगी शांतपणे, शिस्तबद्ध पद्धतीने आणि तत्परतेने कार्य करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे सहभागी ४९ प्रशिक्षणार्थींमध्ये आपत्ती व्यवस्थापन, बचावकार्य, सुरक्षितता आणि नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबत जागरूकता व आत्मविश्वास निर्माण होत आहे. नागरी संरक्षणाच्या या उपक्रमामुळे प्रशिक्षित स्वयंसेवकांची संख्या वाढण्यास तसेच भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये सक्षमपणे मदतकार्य करण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

वृत्त - विश्वनाथ राऊत सर

Sunday, 13 September 2026

बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी विचारांचे प्रशिक्षण; ठाण्यात तहसीलस्तरीय शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद !!

बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी विचारांचे प्रशिक्षण; ठाण्यात तहसीलस्तरीय शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*उल्हासनगर / सुरेश जगताप :*

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीवादी जयंती पर्वाच्या निमित्ताने तसेच महाड मानवमुक्ती संग्रामाच्या शताब्दी वर्षानिमित्त बामसेफच्या वतीने रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी आणि एकाच क्षणी एकदिवसीय तहसीलस्तरीय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे प्रशिक्षण शिबिरे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या प्रशिक्षण शिबिरांमध्ये बहुजन समाजासमोरील वर्तमान सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांची कारणमीमांसा, तसेच या प्रश्नांच्या मुळाशी असलेले वास्तव समजून घेण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. केवळ समस्या मांडण्यापेक्षा त्या समस्यांची कारणे शोधून त्यावर संघटितपणे विचार करण्याची आवश्यकता या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली.

कल्याण येथे बामसेफ प्रशिक्षक ॲड. पंकज जाधव, उल्हासनगर येथे प्रा. मनोज साडेगावकर, तर अंबरनाथ येथे दिलीप कांबळे यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. या शिबिरास बहुजन समाजातील कार्यकर्ते, युवक-युवती, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच परिवर्तनवादी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षणातून सामाजिक परिवर्तनासाठी वैचारिक प्रबोधन आणि संघटनात्मक बांधणी यावर भर देण्यात आला.

*समस्या केवळ समजून न घेता मुळाशी जाण्याची गरज*

आजच्या बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत बहुजन समाजाने आपल्या प्रश्नांकडे केवळ तात्कालिक समस्या म्हणून न पाहता त्यांच्या मुळातील कारणे, व्यवस्था आणि त्यामागील सामाजिक वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वैचारिक प्रशिक्षण, जनजागृती आणि संघटनात्मक एकजूट ही काळाची गरज असल्याचा संदेश या प्रशिक्षण शिबिरातून उमटला.

बहुजन समाजातील बुद्धिजीवी, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

*इतर तालुक्यांतही प्रशिक्षण शिबिरांची मालिका*

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरानंतर आता लवकरच जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बामसेफचे जिल्हाध्यक्ष गणेश देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बहुजन समाजाला वैचारिकदृष्ट्या सक्षम करून संघटित करण्याच्या उद्देशाने ही प्रशिक्षण शिबिरांची मालिका पुढे नेण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात तळागाळापर्यंत वैचारिक आणि संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“एक दिवस विचारांसाठी द्या, विचार समजून घ्या, संघटित व्हा आणि परिवर्तनाच्या चळवळीला बळ द्या,” या संदेशातून प्रशिक्षण शिबिराचा उद्देश स्पष्ट करण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीवादी विचारांना आणि महाड मानवमुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक संघर्षाला अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ठाणे जिल्ह्यात बहुजन समाजाच्या वैचारिक आणि संघटनात्मक चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सुरेश जगताप (दैनिक आवाज सम्राट)

Saturday, 12 September 2026

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !!

उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा; २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश !!

*४० वर्षांच्या संघर्षाला न्यायालयीन लढ्यामुळे निर्णायक दिशा*

*उरण, दि. १३ (विठ्ठल ममताबादे) :*

उरण परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे.

जेएनपीटी (जेएनपीए) हे जागतिक बंदर रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात समुद्रकिनारी असून हे बंदर स्थापन होताना येथील मूळ स्थानिक रहिवासी असलेल्या नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी कायमचे योग्य पुनर्वसन न करता तात्पुरते इतर ठिकाणी हलवले. जुना शेवा कोळीवाडा येथे बंदरासाठी जागा संपादित केली, त्यामुळे येथील रहिवाशांना अनुक्रमे हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा येथे तात्पुरते पुनर्वसन केले. पुनर्वसन केलेल्या जागी आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाने कोणत्याही मूलभूत सेवा-सुविधा पुरविल्या नाहीत व योग्य ते पुनर्वसन सुद्धा केले नाही.

त्यामुळे अनेक वेळा वारंवार संप, उपोषण, आंदोलन, लोकशाही व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करूनसुद्धा ४० वर्षे उलटूनही आजही विस्थापितांना, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही. त्यांचे योग्य पुनर्वसन झाले नाही. त्यांच्या सर्व मागण्या सुरुवातीपासूनच प्रलंबित राहिल्या. केंद्र व राज्य शासन कोणतीही दाद देत नसल्याने सदर प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात गेला. व तिथे या प्रश्नावर कायदेशीर लढाई सुरू झाली. याबाबतीत केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर व प्रकल्पग्रस्त, विस्थापित यांच्यावर ४० हून जास्त वर्षे होत असलेल्या अन्यायाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

*न्यायालयाचा आदेश काय?*

महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियन व अन्य विरुद्ध जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण व अन्य या रिट याचिका क्र. ८६५५/२०२५ प्रकरणात ११ सप्टेंबर २०२६ रोजी न्यायमूर्ती मनिष पितळे व न्यायमूर्ती श्रीराम व्ही. शिरसाट यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रकल्पग्रस्त/लाभार्थी कुटुंबांच्या पात्रतेची पडताळणी प्रक्रिया २०२३ मध्येच पूर्ण झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. पनवेलचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांनी २ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी (पुनर्वसन), रायगड यांना पाठविलेल्या पत्रासोबत २५६ प्रकल्पग्रस्त कुटुंबांची यादी पाठविण्यात आली होती. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयास १७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्राप्त झाल्याचेही न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.

या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने स्पष्ट निर्देश देत २ फेब्रुवारी २०२३ रोजी एसडीओ यांनी पाठविलेली २५६ कुटुंबांची यादी ही नव्या ठिकाणी पुनर्वसित करण्यात येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची अंतिम यादी म्हणून ग्राह्य धरावी, असे आदेश दिले आहेत.

तसेच, आदेशाच्या तारखेपासून एका आठवड्याच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन गावठाणात जाण्यास १८० कुटुंबांनी संमती दिली आहे त्या कुटुंबांची अंतिम यादी जेएनपीटी (जेएनपीए) कडे द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर जेएनपीएने केंद्र सरकारच्या संबंधित विभागाला आवश्यक बाबींची पूर्तता झाल्याबाबत कळविण्याची कार्यवाही दोन आठवड्यांत पूर्ण करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर २०२६ रोजी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाला आता निर्णायक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

सातारा, प्रतिनिधी :  शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची वाढती संख्या व उ‌द्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उ‌द्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती   कार्यक्रम योजना राबविण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राकडून करण्यात आले आहे.

 प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु. 100 लक्ष व सेवा उ‌द्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी रु. 50 लक्ष योजनेअंतर्गत प्रकल्प किंमत मर्यादा असणार आहे.  सर्वसाधारण अर्जदाराचे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे. शिक्षण 8 वी पास आवश्यक आहे. ही योजन व्यक्तीक, भागिदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट / संस्था सोसायटी / स्वयंसहाय्यता बचत गट नविन उ‌द्योगासाठी योजना लागू आहे. कुटूंबातील एक व्यक्तीस (पती किंवा पत्नी) लाभ घेता येईल. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी   www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर करावा. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उ‌द्योग केंद्र, फुलोरा हॉटेल जवळ, कामगार वसाहत जुनी एमआयडीसी, सातारा, ता दुरध्वनी क्र. 02162-244655, ई-मेल-didic.satara@maharashtra.gov.in येथे संपर्क करावा.

धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !!

धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !! वसई (प्रतिनिधी) : ...