Friday, 4 September 2026

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

(रस्ते दुरुस्ती मध्ये नागरिकांचा कराचा पैसा केडीएमसी ठेकेदाराला खड्डे भरण्यासाठी चे पैसे देणार कि खड्ड्यांच्या नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण दुरुस्तीचे पैसे देणार शिल्पा बजरंग तांगडकर यांचा सवाल)

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण परिसरामध्ये सर्व ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे या रस्त्या दुरुस्ती करण्यामध्ये फक्त खड्डे पडलेल्या जागेवर डांबरीकरणाचा मुलामा  देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा  प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकडे करून  येत आहे ,शिल्पा   बजरंग तांगडकर यांच्या वतीने टावरी पाडा ,बारावी परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर ऑनलाइन पत्रा सोबत कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता यावर तत्काळ दिलेल्या कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली नाही परंतु आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर टावरीपाडा वॉटर फिल्टर रोड डांबरीकरणाचे काम करण्यात आले परंतु हे काम संपूर्ण रस्त्याचे काम केले नसून फक्त खड्डे पडले होते त्या ठिकाणी पॅच मारुन डांबरीकरण करण्यात आले, तसेच अजून  बारावे पाइपलाइन ,गोदरेज हिल परिसरातील रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे.

नागरिकांचा करातील पैसा केडिएमसी खड्डे बुजवल्यानंतर कंत्राटदाराला फक्त त्या खड्डे बुजवले त्याचे पैसे देणार कि रस्ता दुरुस्ती नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण चे पैसे देणार हा प्रश्न शिल्पा तांगडकर यांचा वतीने विचारण्यात येत आहे.

रायते पिपंळोली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा आमदार, खासदारांकडून सत्कार, पत्रकारांनीही केला सन्मान !!

रायते पिपंळोली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा आमदार, खासदारांकडून सत्कार, पत्रकारांनीही केला सन्मान !!

कल्याण, (संजय कांबळे) : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कल्याण तालुक्यातील रायते पिपंळोली ग्रुप ग्रामपंचायचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी, म्हणून खासदार बाळ्या मामा म्हात्रे, आणि आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, डेप्युटी सीईओ (साप्र) अविनाश फडतरे, ग्रामपंचायत डेप्युटी सीईओ प्रमोद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्रक, सन्मान पदक देऊन गौरव करण्यात आला, तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुल्यमापन समितीचे सदस्य तथा पत्रकार संजय कांबळे यांनी ही कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान केला.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासात्मक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपातळीवरील प्रशासन अधिक सक्षम करण्यामध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ग्रामस्थांच्या गरजा, स्थानिक समस्या आणि विकासाच्या प्राधान्यक्रमांचा विचार करून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत, जिल्हा परिषद, ठाणेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गुणगौरव सोहळा’ उत्साहात पार पडला.
उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत विभागातील ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) व आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये रायते पिपंळोली ग्रुपचे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचाही समावेश असून त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच कल्याण तालुक्यातील पत्रकार तथा समिती सदस्य संजय कांबळे यांनी रायते ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरवसे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच इतर ग्रामपंचायत अधिकां-यांचेही अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची दखल, रायते पिपंळोली ग्रामपंचायतीकडून विसर्जन घाटांची साफसफाई !

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची दखल, रायते पिपंळोली ग्रामपंचायतीकडून विसर्जन घाटांची साफसफाई !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात,तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास सुमारे ९३ सार्वजनिक आणि ४ हजार ५०० घरगुती गणेशोत्सव साजरे होणार असून यासाठी १९ गणेशघाटावर 'श्री, चे विसर्जन होणार आहे. या करिता ८६ अंमलदार, १० पोलीसअधिकारी, होमगार्ड, पोलीस पाटील हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु विसर्जन घाट, रस्त्यावरील खड्डे चिखल पाहता इतर विभागाचे काय? असा प्रश्न उपस्थित करून पत्रकार संजय कांबळे यांनी 'एस न्यूज महाराष्ट्र, तसेच दैनिक सागर, माझा बातमीदार, आदी विविध दैनिकामधून प्रसिद्ध करताच याची दखल तालुक्यातील 'रायते पिपंळोली ग्रुप ग्रामपंचायतीने घेऊन तात्काळ या घाटांची साफसफाई केली, त्यामुळे पत्रकार श्री कांबळे यांनी त्यांचे आभार मानून सन्मान केला.

महाराष्ट्रात विशेष:त मुंबई, ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, शिवाय शासनाने हा महाराष्ट्र उत्सव म्हणून घोषित केला आहे. यावेळी पोलीस यंत्रणेवर प्रंचड ताण येतो, केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी ८० ते ९० कर्मचारी आहेत, अशातच आता गणेशोत्सव तोडांवर आला आहे, या पोलीस ठाण्यातंर्गत ९३ सार्वजनिक तर ४ हजार ५०० घरगुती गणेशाची स्थापना होणार आहे, बाप्पाच्या विसर्जनासाठी उल्हास, काळू, भातसा आणि बारवी नदीच्या काठावर तसेच काही ठिकाणी गाव तलावात विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत, असे १९ घाट आहेत, परंतु या घाटांची सध्याची परिस्थिती पाहिली तर हे विसर्जन घाटआहे की एखादे दलदल खाडी, अशी स्थिती दिसून येत आहे. काही ठिकाणी या घाटाच्या लाद्या तुटलेल्या, फुटलेल्या, उखडलेल्या दिसून येत आहेत, मागील काही वर्षाचा विचार केला तर गणेश विसर्जन दरम्यान अनेक गणेशभक्त बुडवून मरण पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत असेल अथवा महसूल विभाग असेल यांनी गणेशोत्सवापूर्वी या घाटांची दुरुस्ती, दिवाबत्ती ची सोय, जीवरक्षक नेमणे, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवने, वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी उपाययोजना वेळीच केल्या तर यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकतो, अशा प्रकारे बातमी एस न्यूज महाराष्ट्र, दैनिक सागर, बातमीदार माझा, अशा विविध माध्यमातून प्रसिद्ध केली होती. याची दखल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरोशे, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी घेऊन जेसीबीच्या माध्यमातून हा चिखल बाजूला केला आहे, शिवाय नदीमध्ये मोटार लावून पाण्याने संपर्क घाट स्वच्छ करणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांनी सांगितले. त्यामुळे पत्रकार कांबळे यांनी त्यांचे कार्यालयात जाऊन आभार मानले व त्यांचा सन्मान केला. तसेच असेच काम इतरही यत्रणांनी करावे असे कांबळे यांनी सांगितले.

Thursday, 3 September 2026

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

*कल्याण, प्रतिनिधी :* कल्याण पूर्व मतदारसंघातील पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाशी संबंधित मूलभूत प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन सविस्तर बैठक घेतली.

या बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर चर्चा करून प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कालबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

*बैठकीतील प्रमुख मागण्या व निर्णय :*

*🔹 पाणी प्रश्न :* 27 गावांतील नागरिकांना पाणी जोडणीसाठी मालमत्ता कर पावतीची अट 2022 ऐवजी 2025 पर्यंत शिथिल करणे, आशेळे-माणेरे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, चिंचपाडा, द्वारली, नांदिवली, वसार येथील अमृत योजनेतील जलवाहिनी व जलकुंभाची कामे वेगाने पूर्ण करणे आणि वाढीव पाणी बिलांची तपासणी करून कपात करणे.

*🔹 रस्ते व स्वच्छता :* गणेशोत्सवापूर्वी सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, सिद्धार्थनगर ते कल्याण स्टेशन स्कायवॉकची स्वच्छता व रंगरंगोटी, दुर्गाडी व उंबर्डे डंपिंग ग्राउंडवरील NACOF व ITCON कंपनीच्या कामाची चौकशी.

*🔹 आरोग्य व सार्वजनिक सुविधा :* 100 फुटी रोडवरील आरक्षण क्र. 283 मधील 30,000 चौ.मी. जागेवर अद्ययावत रुग्णालयासाठी निधी प्रस्ताव, आरक्षण क्र. 279 मधील क्रीडासंकुलाचे अधिग्रहण, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व स्वच्छता, चिंचपाडा 100 फुटी रोडवर नवीन शौचालय उभारणे.

*🔹 सुरक्षा व इतर :* भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, नादुरुस्त CCTV दुरुस्ती, सार्वजनिक विहिरींवर लोखंडी जाळी बसवणे, खडेगोळवली प्रभाग कार्यालयात 24 तास अग्निशमन वाहन व स्वर्गरथ उपलब्ध करणे, दादासाहेब गायकवाड मैदानात खेळाडूंसाठी सुविधा, द्वारलीपाडा, वसार, नेवाळी नाका येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई.

तसेच कल्याण पूर्वसाठी नवीन शिधावाटप कार्यालयासाठी महापालिकेच्या वास्तूत जागा देणे, परिवहन उपक्रमातील 59 कायम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे आणि महापालिकेचे गाळे महिला बचत गट व सेवाभावी संस्थांना नाममात्र दरात देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

"नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे आणि कल्याण पूर्वचा नियोजनबद्ध विकास हीच आमची प्राथमिकता आहे. प्रश्न केवळ मांडणे नाही तर त्याचा पाठपुरावा करून तोडगा काढणे यासाठी प्रयत्न सुरू राहतील," असे आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

गोवंडी येथे कवी सुभाष आढाव यांच्या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

गोवंडी येथे कवी सुभाष आढाव यांच्या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

.                          कवी सुभाष आढाव (रा. गोवंडी, मुंबई)

*मुंबई : प्रतिनिधी*

मिरांश ममता मयूर आढाव यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त कवी सुभाष आढाव यांच्या ‘रानपाखरं’ या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा प्रकाशन सोहळा पत्रकार मधु कांबळे यांच्या हस्ते *मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ४.०० वाजता श्री गोवंडी गावदेवी ट्रस्ट, बालवाडी, गोवंडी, मुंबई* येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक बी. अनिल तथा अनिल भालेराव, नगरसेवक - गटनेता (बृ.मुं.म.पा.) विजय उबाळे, विजय पाटील (शिवसेना संपर्कप्रमुख, शिराळा-वाळवा विधानसभा), विलास कांबळे (विश्वस्त - कुमुद मेमोरियल फंड), सुनीता कोळी (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका - कुमुद विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभाग), डॉ. सत्तार खान (सरचिटणीस - मुंबई काँग्रेस, रोजगार व स्वयंरोजगार विभाग), ॲड. प्रफुल्ल चव्हाण (अधिवक्ता, उच्च न्यायालय), जे. के. कांबळे (संपादक - महाराष्ट्र सिव्हिल टाईम्स), सागर तायडे (अध्यक्ष - स्वतंत्र मजदूर युनियन), भिमसेन तपासे (संस्थापक - लुम्बिनी वृक्ष संवर्धन समिती) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

अनेक मान्यवर साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा दिमाखदार स्वरूपात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर संभाजी भोरे करणार आहेत.

कार्यक्रमाचे निमंत्रक ॲड. मयूर सुभाष आढाव, ममता मयूर आढाव, विवेक सुभाष आढाव यांनी वाचक-रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

पुण्यातील डॉल्बीविरोधी कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा अंनिसकडून तीव्र निषेध; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी !!

पुण्यातील डॉल्बीविरोधी कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा अंनिसकडून तीव्र निषेध; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी !!

_प्रतिनिधी_ *(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)*
*पुणे/ठाणे* पुण्यात डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला विरोध करत विवेकी आणि पर्यावरणपूरक भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत, राजेश देवरुखकर, ॲड. तृप्ती पाटील, मच्छिंद्रनाथ मुंडे, सुशीला मुंडे यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, डॉल्बीच्या वापराला विरोध करत विद्यानंद बापट हे अतिशय स्पष्टपणे, मुद्देसूदपणे आणि संदर्भांसह आपली भूमिका मांडत होते. त्यांच्या या विवेकी भूमिकेला वैचारिक उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर मारहाण करून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करणे हा लोकशाही मूल्यांचा आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान आहे.

"आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट वारंवार दिसून येते की, धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा आणि रूढींना प्रश्न विचारणाऱ्या, शंका उपस्थित करणाऱ्या व्यक्तींना वैचारिक प्रतिवाद करण्याऐवजी हिंसेने गप्प करण्याचे प्रयत्न झाले आहेत. गौतम बुद्धांच्या विचारांना विरोध करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कट रचले गेले. महात्मा ज्योतिराव फुले यांना ठार मारण्यासाठी मारेकरी पाठवले गेले. महात्मा गांधींची हत्या झाली. आणि आधुनिक काळात हा हिंसक प्रवाह डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांपर्यंत येऊन पोहोचला. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नसेल, तर हिंसेचा आधार घेणे ही विवेकविरोधी मानसिकतेची लक्षणे आहेत," असे अंनिसने म्हटले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातत्याने पर्यावरणपूरक आणि विवेकवादी भूमिका घेतली आहे. ध्वनिप्रदूषण, पर्यावरणाचे नुकसान आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत न्यायालयांनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी मार्गदर्शक भूमिका आणि निर्देश दिलेले आहेत. विद्यानंद बापट यांची भूमिका याच व्यापक पर्यावरणपूरक आणि विवेकवादी भूमिकेशी सुसंगत आहे.

म्हणून शासनाने स्वतःच्या कायदेशीर आणि पर्यावरणपूरक भूमिकेचा पुरस्कार करणाऱ्या नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. धर्माच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट संदेश द्यावा की, हिंसेला कोणत्याही परिस्थितीत माफी नाही, अशी मागणीही करण्यात आली आहे.

*मागण्या:*

*1.* या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची त्वरित ओळख पटवून त्यांना अटक करावी.
*2.* त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
*3.* विवेकी भूमिका मांडणाऱ्या नागरिकांना शासनाने संरक्षण द्यावे.

या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का बसला असून, या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

प्रा. व्हि.एस.इंदुलकर सर सेवानिवृत्त !!

प्रा. व्हि.एस.इंदुलकर सर सेवानिवृत्त !!

उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. व्ही.एस. इंदुलकर सर ३५ वर्षाच्या सेवा कालानंतर निवृत्त झाले. त्यातील १९९१ ते  १९९३ पर्यंत जे एस एम कॉलेज अलिबाग येथे सुरुवातीची अडीच वर्ष वाणिज्य व्याख्याता म्हणून म्हणून सेवा केली. त्यांचे शिक्षण जे.एस. एम.कॉलेज अलिबाग येथे झाले. त्यानंतर म्हणजे डिसेंबर १९९३ ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत गेली ३३ वर्ष उरण महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख सेवा पूर्ण केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण ज्ञानपीठ संस्थेचे सीईओ प्रदीपचंद्र शिंगारपुरे हे होते. तर प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाचे डायरेक्टर  प्रा. डॉ.बळीराम गायकवाड उपस्थित होते. प्रा.व्हि.एस. इंदुलकर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ प्राध्यापक असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले असे सांगितले. गेली २५ वर्ष डी एल एल ई या विभागात योगदान दिले. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून चेंबूर सर्वांकष शिक्षण संस्था बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर चक्रधर हे उपस्थित होते. तर प्राचार्य चक्रदेव यांनी डी एल एल ई आणि  वाणिज्य विभागातील त्यांचे विद्यापीठ पातळीवरचे कार्य ठसा उमटवणारे असल्याचे सांगितले. उरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शिस्त आणि नियोजन त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचे प्रतिपादन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रदीपचंद्र शृंगारपुरे यांनी कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या विकासात त्यांनी दिलेली योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. डॉ. ए.आर.चव्हाण यांनी प्रा.इंदुलकर यांचा जीवन परिचय सांगितला. याप्रसंगी रमेश ठाकूर,शुभांगी जाधव मावशी, डॉ. आनंद गायकवाड, डॉ. एच के जगताप, डॉ.एम.जी. लोणे, कुमार विनय इंदुलकर, माजी विद्यार्थी मनोज ठाकूर, आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी कृतज्ञता भाव व्यक्त करताना प्रा. व्हि.एस इंदुलकर सर यांनी वर्तमान शिक्षण पद्धती,विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांच्या समोरील आव्हाने, रोजगाराच्या संधी , परदेशी विद्यापीठांची आव्हाने व स्पिरीचल शिक्षणाचे महत्त्व याविषयी आपले मत व्यक्त केले व सर्वांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त केला. याप्रसंगी  शुभदा इंदुलकर, श्रीमती मीराताई पाटील, कवी राजेंद्र नाईक इत्यादी अनेक नातेवाईक व मित्र महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. पराग कारुळकर यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ.दत्ता हिंगमिरे यांनी केले. सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा सिल्वर ओक रिसॉर्ट नागाव उरण येथे मोठया उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम.. (रस्ते दुरुस्ती मध्ये नागरिकांचा कराचा पैसा केडीएमसी ठेकेद...