Wednesday, 16 September 2026

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान

२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’

अभियानाचा लाभ घेण्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. शिवाय हे अभियान नियमित प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

या अभियानासाठी महसूल विभाग, योजनांशी संबंधित विविध शासकीय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.

अभियानात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी संबंधित यंत्रणा शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत.

शिबीरापूर्वी वस्तीस्तरावर लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.

अभियानाचे उद्घाटन संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. जिल्हाधिकारी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय साधतील. शिबिरांचे ठिकाण आणि वेळ याबाबतची माहिती संबंधित जिल्हा व तालुका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

#भटकेविमुक्त #हक्कआणिप्रमाणपत्र #विशेषअभियान #शासकीययोजना #जनसेवा #OBCBahujanWelfare #maharashtra #atulsave #VJNT #GovernmentSchemes #लोकसेवा

Tuesday, 15 September 2026

सरकारी फाईल्सच्या दिरंगाईला चाप; वेळेत काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार !!

सरकारी फाईल्सच्या दिरंगाईला चाप; वेळेत काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार !!

*मुंबई, प्रतिनिधी :* शासकीय कामकाजात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. 11 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, फाईल निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून विलंब करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

*फाईल निकाली काढण्यासाठी कालमर्यादा :*

🔹 *साधारण फाईल :* 7 कामकाजाच्या दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित ठेवू नये.
🔹 *तात्काळ स्वरूपाची फाईल :* शक्य तितक्या जलद, एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत निकाली काढावी.
🔹 *तातडीच्या स्वरूपाची फाईल :* 4 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा.
🔹 *इतर विभागाकडे पाठवण्याची गरज नसलेली फाईल :* 25 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा.
🔹 *इतर विभागाकडे विचारार्थ पाठवायची फाईल :* 3 महिन्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करावी.

*विलंब झाल्यास कारवाई*
विहित कालमर्यादेत कार्यवाही न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

सर्व विभागप्रमुख आणि कार्यालयप्रमुखांनी दरमहा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन जलद निपटारा करावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सव देखाव्यातून तिसरी मुंबई विरोधात जनजागृती !!

गणेशोत्सव देखाव्यातून तिसरी मुंबई विरोधात जनजागृती !!

शहरी आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शवून शेती जमीन न विकण्याचे आणि सरकारच्या तिसरी मुंबई प्रकल्पाच्या विरोधात लढण्याचे केले आवाहन.

उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे) : राज्य सरकारच्या तिसरी मुंबई विरोधात उरण पनवेल पेण तालुक्यातील १२४ गावातून प्रखर विरोध केला जात आहे. सरकारने भूसंपादन प्रक्रिया सुरू केल्यापासून या विरोधकाला अधिक गती मिळाली आहे. एकीकडे सरकार तिसरी मुंबईचा हट्ट कायम ठेवत आहे तर दुसरीकडे शेतकरी संघटना १२४ गाव पिंजून काढत विरोधाची धार वाढवत आहेत. आता हा विरोध गणपती देखाव्यातून पाहायला मिळत आहे.  याद्वारे तिसरी मुंबईला कोणत्याही प्रकारे जमीन न देण्याची व तरुण पिढीला या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. 

    एमएमआरडीए केएससी नवनगर तिसरी मुंबई विरोधी शेतकरी समिती रायगड चे सरचिटणीस रूपेश पाटील यांनी गणपती देखाव्यातून शहरी आणि ग्रामीण जीवनातील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एक शेतकरी गणपती बाप्पाला आवाहन करत असून  तिसरी मुंबईतून हद्दपार झालो तर तुझे सण आणि उत्सव कसे साजरे करणार अशी आर्त विनवणी करत आहे. मुंबई नवी मुंबईत स्थानिक आगरी कोळी कराडी कुणबी समाज भूमिहीन होऊन उध्वस्त झाला असून उपऱ्यांनी हातपाय पसरले आहेत. त्यांनी स्थानिकांचे सामाजिक व राजकीय स्थान धोक्यात आणले आहे. शहरांमुळे स्थानिक समाजसंस्कृती बोलीभाषा व्यवसाय रोजगार यावर परप्रांतीयांचे आक्रमण झाले आहे. शहरातील सिमेंटची जंगले, टॉवर संस्कृतीमुळे नागरी सुविधावर ताण पडतो. याशिवाय गुन्हेगारी फोफावली असल्याचे मुंबईत नवी मुंबईत बघायला मिळते. श्रीमंतांना मोकळा श्वास देण्यासाठी तिसरी मुंबई उभारण्याच्या सरकारी धोरणाने ग्रामीण शेतकरी उध्वस्त  होणार आहे. उदरनिर्वाहाची शेती काढून  त्यांचा श्वास कोंडवणारी कृती सरकारची असून मुख्यमंत्री फडणवीस आपल्या जन्मभूमी नागपूरात दुसरे नागपूर तिसरे नागपूर उभे करतील का असा प्रश्न केला जात आहे. या देखाव्यातून शेती जमीन घरे आणि गावे वाचवण्यासाठीच्या लढाईत जेन झी आणि जेन अल्फा पिढीने आपल्या भविष्य डोळ्यासमोर ठेवून उतरण्याचे आवाहन केलं आहे.  तिसऱ्या मुंबई विरोधात सहभागी होण्याची सुबुद्धी गणपती बाप्पाने शेतकरी आणि युवा पिढीला द्यावी अशीही साद घालण्यात आली आहे. सेझ आंदोलनातील प्रमुख मार्गदर्शक दिवंगत माजी न्यायमूर्ती पी बी सावंत, लोकनेते दत्ता पाटील, कॉम्रेड विलास सोनावणे यांचे स्मरण करण्यात आले आहे. याशिवाय सेझ आंदोलनातील मार्गदर्शक आणि तिसरी मुंबई विरोधी लढ्याचे प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनाही देखाव्यात स्थान दिले आहे. तिसरी मुंबई विरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्याला महाराष्ट्रातील अनेक नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिली त्या सर्व वृत्तपत्रांच्या बातम्यांची कात्रणे देखील देखाव्यात लावण्यात आली आहेत.

धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !!

धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !!

वसई (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील धोबीघाट रोड, राजवली, बोयदा पाडा येथे सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदार विष्णू गुप्ता यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. पृथ्वीराज बी.पी. साहेब तसेच सीयूसी (CUC) प्रमुख मा. विशाखा मोडगडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

गेल्या चार दिवसांपासून या अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेकडे सातत्याने तक्रारी नोंदवण्यात येत आहेत. मात्र, संबंधित यंत्रणेकडून कोणताही ठोस प्रतिसाद किंवा प्रत्यक्ष कारवाई करण्यात आलेली नाही. प्रभाग समितीतील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे किंवा संगनमतानेच अशा अवैध बांधकामांना खतपाणी घातले जात असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.

तक्रारदाराच्या मुख्य मागण्या:
 * परवानग्यांची तपासणी: संबंधित बांधकामासाठी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी, मंजूर नकाशा व इतर वैध कागदपत्रे आहेत का, याची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी व्हावी.
 * MRTP कायद्यांतर्गत कारवाई: बांधकाम अनधिकृत आढळल्यास एमआरटीपी (MRTP) कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल करून बांधकाम तात्काळ निष्कासित (तोडण्यात) यावे.
 * CUC प्रमुखांची विशेष मध्यस्थी: सीयूसी प्रमुख विशाखा मोटघरे यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून घटनास्थळाची पाहणी करावी आणि तातडीने तोडक कारवाईचे आदेश द्यावेत.
 * अधिकाऱ्यांची चौकशी: चार दिवस तक्रारी येऊनही दुर्लक्ष करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

वारंवार तक्रारी करूनही बांधकाम सुसाट सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता पालिका आयुक्त आणि सीयूसी प्रमुख या अनधिकृत बांधकामावर काय पावले उचलतात आणि दोषींवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तक्रारदाराने या प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याचीही विनंती पत्रात केली आहे.

Monday, 14 September 2026

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार ; वैभव कडू यांची स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी !!

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार !!

वैभव कडू यांची स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी.

समुद्रकिनारी विसर्जनचा रस्ता करून दिला मोकळा 

उरण, दि. १३ (विठ्ठल ममताबादे) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नागांव तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पिरवाड समुद्रकिनारी विसर्जनासाठी येत असतात. मात्र, समुद्राच्या लाटांमुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दगड जमा झाल्याने विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ही बाब लक्षात घेऊन नागांव गावातील नागरिकांनी नागांव-म्हातवळी प्रकल्पग्रस्त अध्यक्ष तथा समाजसेवक वैभव यशवंत कडू यांच्याकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. नागरिकांची अडचण लक्षात घेत वैभव कडू यांनी कोणाचीही वाट न पाहता स्वखर्चाने समुद्रकिनारी विसर्जनासाठी जाणारा मार्ग मोकळा करून दिला.
‘गावकऱ्यांची अडचण ही आपलीच अडचण’ या भावनेतून केलेल्या या पुढाकारामुळे गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध व्हावा, हाच या कामामागील उद्देश असल्याचे वैभव कडू यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकी जपत कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता स्वखर्चातून केलेल्या या उपक्रमाचे नागांव तसेच परिसरातील नागरिक आणि भाविकांकडून कौतुक होत असून, वैभव यशवंत कडू यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. माणुसकीतून केलेली ही सेवा गणेशभक्तांसाठी खऱ्या अर्थाने ‘बाप्पाची सेवा’ ठरली आहे.

समाजजोडो अभियान गतिमान करा - अण्णासाहेब कटारे

*समाजजोडो अभियान गतिमान करा - अण्णासाहेब कटारे*

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थित पुण्यात भव्य प्रवेश व पत्रकार परिषद संपन्न..*

पुणे (प्रतिनिधी): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे पुणे दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत पुण्यातील अनेक पक्ष संघटनेतील कार्यकर्ते महिलांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. 

प्रवेश सोहळ्यानंतर पुणे येथील श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ साबळे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जोमाने वेगाने सुरू आहे दररोज महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील अनेक नामावंत व्यक्ती विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे. राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षाने नेहमीच गोरगरीब/ दलित /बौद्ध/मागासवर्गीय/ अल्पसंख्यांक /आदिवासी/ ओबीसी/ भटके विमुक्त समूहाच्या जीवन मरणाच्या प्रश्नांकडे नेहमीच डोळे झाक केलेली दिसते. स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही या घटकांची कोणत्याही क्षेत्रात सर्वांगीण प्रगती नाही अजूनही त्यांना मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी संघर्ष करावा लागत आहे म्हणून राज्यातील आता हे सर्व समाज घटक प्रस्थापित पक्षांना कंटाळले असून ते पर्यायच शोधत आहे त्यांच्या सर्वच प्रश्नांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे असेही कटारे यांनी शेवटी सांगितले.

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केलेले नामवंत खालील प्रमाणे - उदय खांडके (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी) संगीता ननावरे (परीट धोबी पुणे जिल्हा अध्यक्षा), नम्रता अहेर, (अध्यक्षा रणरागिणी प्रतिष्ठान), शुभांगी बहुलेकर (शिंपी समाज प्रमुख पुणे जिल्हा), परेशभाई कटारीया (जैन समाज नेते व व्यापारी असोसिएशन), मनोज अष्टेकर (साळी समाज अध्यक्ष पुणे), मुदस्सर भाई (मदारी समाज नेते पुणे), अभिषेख वैराट (सामाजिक कार्यकर्ते), सचिन बतूल (तेलगू संघटना),धनंजय मालुसरे (सामाजिक कार्यकर्ते) गणेश काची (शिवसेना नेते पुणे), येशुराज बेल्ली (मेरी चर्च मुंबई रिजनल कॉन्फरन्स)

प्रामुख्याने या प्रवेश सोहळ्यास व पत्रकार परिषदेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्कप्रमुख सचिनभाऊ नांगरे, येवला युवा नेते तुषार वाघ, युवा संपर्कप्रमुख संतोष राजगुरू, युवा नेते बबन वाघ, युवा नेते प्रशांत कटारे, अभिनव निकम, सिद्धांत कटारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा संघटक अक्षय वाघमारे, पुणे जिल्हा सचिव कुणाल चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी प्रीती जगताप, पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी प्राजक्ता शिंदे माधवीताई अवसरकर, कल्पना जोशी, रेश्मा ताई पोकळे, प्रतिभा आजबे, संतोष निरगुडे, नम्रता अहिरे आदींनी परिश्रम घेतले.

नवी मुंबईत नागरी संरक्षणाच्या प्राथमिक प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

नवी मुंबईत नागरी संरक्षणाच्या प्राथमिक प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*प्रशिक्षणार्थींना व्याख्याने व प्रात्यक्षिकांद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे*

*नवी मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२६ :*

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. १७/२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण वर्ग दि. ०७ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १२.०० ते ४.३० या वेळेत मॉडर्न कॉलेज, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या प्रशिक्षण वर्गात एकूण ४९ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्तीच्या काळात स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक ज्ञान, कौशल्ये आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच अनुषंगाने या प्राथमिक प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर सैद्धांतिक मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणाच्या एका सत्रात श्री. अनिल गावित, सहाय्यक उपनियंत्रक तसेच डॉ. राहुल घाटवळ, मानसेवी निदेशक तथा विभागीय क्षेत्ररक्षक यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण व्याख्याने दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिके सादर करून प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी श्री. धैर्यशील जाधव, निवृत्त अतिरिक्त नियंत्रक, बृहन्मुंबई यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शनपर व्याख्यान सादर केले. त्यांच्या अनुभवातून प्रशिक्षणार्थींना नागरी संरक्षणाच्या कार्यपद्धतींबरोबरच आपत्तीच्या प्रसंगी शांतपणे, शिस्तबद्ध पद्धतीने आणि तत्परतेने कार्य करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे सहभागी ४९ प्रशिक्षणार्थींमध्ये आपत्ती व्यवस्थापन, बचावकार्य, सुरक्षितता आणि नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबत जागरूकता व आत्मविश्वास निर्माण होत आहे. नागरी संरक्षणाच्या या उपक्रमामुळे प्रशिक्षित स्वयंसेवकांची संख्या वाढण्यास तसेच भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये सक्षमपणे मदतकार्य करण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

वृत्त - विश्वनाथ राऊत सर

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...