Thursday, 3 September 2026

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !!

*भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !!

*ठाणे, प्रतिनिधी :* भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या लोकहिताच्या प्रश्नांवर खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.

*बैठकीतील प्रमुख मुद्दे :*

*🔹 टोरेंट पॉवरचा प्रश्न :* भिवंडीतील 90% ग्राहकांचा टोरेंट पॉवर कंपनीला विरोध असून तिची मान्यता रद्द करून इतर पर्यायी वीज वितरण कंपनी नेमण्याबाबत चर्चा झाली.

*🔹 नवीन अंबाडी तालुका निर्मिती :* भिवंडी तालुक्यातील नवीन अंबाडी तालुका निर्मितीच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी करण्यात आली.

*🔹 केंद्रीय विद्यालय व ग्रामपंचायतींचे प्रश्न :* दापोडे (सर्व्हे क्र. 115) येथे केंद्रीय विद्यालय उभारण्याची मागणी आणि इतर ग्रामपंचायतींच्या प्रलंबित समस्या मांडण्यात आल्या.

*🔹 विरार-अलिबाग कॉरिडोअर :* या प्रकल्पातील भूसंपादन आणि मूल्यांकनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यावर चर्चा झाली.

*🔹 सरवली MIDC व डंपिंग :* कोनगाव अंतर्गत रस्ता व डंपिंग प्रश्नाबाबत 2013 मधील इतिवृत्तानुसार अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

*🔹 भावली धरण योजना :* शहापूर येथील भावली धरण Y Piece Tapping संदर्भात चर्चा झाली.

*🔹 बिरसा मुंडा स्मारक :* शहापूर येथील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मारकाच्या जागेच्या मागणी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आला.

*🔹 मुरबाड रेल्वे प्रकल्प :* मुरबाड रेल्वेच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याबाबत चर्चा झाली.

आंबिवली स्थानकात संतप्त प्रवाशांचा स्टेशन मॅनेजरला घेराव !!

आंबिवली स्थानकात संतप्त प्रवाशांचा स्टेशन मॅनेजरला घेराव !!

कल्याण : संदीप शेंडगे 

आंबिवली रेल्वे स्थानकातून वेळेवर लोकल ट्रेन न सुटल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी गुरुवारी रेल्वे स्थानकातील स्टेशन मॅनेजरचा घेराव करत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकल तब्बल दीड तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

आंबिवली स्थानकातून मुंबईच्या दिशेने तसेच कल्याणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दररोज रेल्वेच्या विलंबाचा फटका बसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकल गाड्या सातत्याने उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मालगाड्या आणि एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य देताना लोकल गाड्यांना मात्र वारंवार बाजूला काढले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गुरुवारी आंबिवली स्थानकातून अपेक्षित वेळेत लोकल न सुटल्याने प्रवाशांचा संयम सुटला. संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजरला घेराव घालत रेल्वे प्रशासनाच्या कारभाराबाबत जाब विचारला. लोकल गाड्या वेळेवर का सोडल्या जात नाहीत, प्रवाशांना वारंवार विलंबाचा सामना का करावा लागतो, तसेच मालगाड्या आणि एक्स्प्रेसला लोकलपेक्षा प्राधान्य का दिले जाते, असे सवाल प्रवाशांनी उपस्थित केले.

दररोजच्या प्रवासावर परिणाम होत असल्याने रेल्वे प्रशासनाने आंबिवली स्थानकातील लोकल वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लोकल वेळेत सोडाव्यात आणि वारंवार होणारा विलंब तातडीने थांबवावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ सावर्डे आयडीयल संस्थेतर्फे रिजन ५ मधील GAT व LCIF कॉन्क्लेव्ह चर्चासत्र उत्साहात संपन्न !

इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ सावर्डे आयडीयल संस्थेतर्फे रिजन ५ मधील GAT व LCIF कॉन्क्लेव्ह चर्चासत्र उत्साहात संपन्न !

चिपळूण - ( दिपक कारकर )

लायन्स इंटरनॅशनल, प्रांत ३२३४ डी १ मधील रिजन ५ च्या वतीने नुकतीच GAT आणि LCIF Conclave तसेच पहिली रिजन स्टाफ मीटिंग रविवार, दि.३० ऑगस्ट २०२६ रोजी चिपळूण येथील हॉटेल ग्रँड अतिथी येथे रिजन चेयरपर्सन लायन डॉ निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांतपाल लायन राजेंद्र शाह कासवा, प्रथम उपप्रांतपाल लायन डॉ. किरण खोराटे, द्वितीय उपप्रांतपाल लायन मंगेश दोषी तसेच माजी प्रांतपाल लायन डॉ.वीरेंद्र चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्रांतपाल लायन वासुदेव वालावलकर (गोवा) आणि लायन चंद्रकांत सोनटक्के (नागपूर) यांनी उपस्थित राहून GAT, LCIF, नेतृत्व विकास, सभासद वाढ आणि सेवा कार्याबाबत लायन्स सदस्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून रिजन ५ मधील सर्व कॅबिनेट मेंबर्स, झोन चेअरपर्सन्स लायन डॉ.शमीना परकार,लायन शिल्पा पानवलकर व लायन निलेश हेदूकर, तसेच विविध क्लबचे अध्यक्ष,पदाधिकारी तसेच लायन्स सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमातील स्तुत्य उपक्रम म्हणजे धाडसी १० वर्षीय तरुणी कु.स्वर्णी पवार हिच्या शौर्याचा विशेष सन्मान करण्यात आला. संकटसमयी धाडस दाखवून आपल्या आईचे प्राण वाचविणाऱ्या स्वर्णीच्या शौर्याचे विशेष कौतुक करून तिला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. सोबत तिला शाळेत जाण्यासाठी सायकल भेट देण्यात आली.या उपक्रमातून लायन्सच्या ‘We Serve’ या सेवाभावनेचा प्रत्यय उपस्थितांना आला.

GAT कॉन्क्लेव्हच्या पहिल्या सत्रामध्ये GLT, GST, GET आणि GMT या विभागांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डिस्ट्रिक्ट GAT टीममधील GST को-ऑर्डिनेटर लायन सर्जेराव पाटील, GET को-ऑर्डिनेटर लायन कल्पेश मालू आणि GMT Women & Family को-ऑर्डिनेटर लायन श्रेया केळकर यांनी उपस्थित सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रामध्ये रिजन ५ ची पहिली रिजन स्टाफ बैठक घेण्यात आली.या बैठकीत रिजनमधील विविध क्लबच्या अध्यक्षांनी आपल्या क्लबमध्ये भविष्यात राबविण्यात येणाऱ्या नवीन कायमस्वरूपी (Permanent) प्रकल्प व विविध सेवा उपक्रमांबाबत आपले विचार मांडले.तसेच प्रत्येक झोनमध्ये नवीन लायन्स क्लब स्थापन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी,संभाव्य क्षेत्रे आणि क्लब विस्ताराच्या मार्गातील अडचणी यावर सविस्तर चर्चा झोन चेयरपर्सन यांच्या मार्फत आली. या अडचणींवर उपाययोजना करून नवीन क्लब विस्ताराला गती देण्यासाठी उपस्थितांनी विविध सूचना मांडल्या.

या संपूर्ण कार्यक्रमामुळे रिजन ५ मधील लायन्स सदस्यांना Service, Membership, Leadership आणि LCIF या लायन्स इंटरनॅशनलच्या प्रमुख आधारस्तंभांवर प्रभावी मार्गदर्शन मिळाले.सेवा कार्य अधिक व्यापक करणे,सभासदसंख्या वाढविणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि LCIF च्या माध्यमातून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिजन चेअरपर्सन लायन डॉ. निलेश पाटील,रिजन सेक्रेटरी लायन अक्षदा रेळेकर तसेच रिजन ५ मधील सर्व कॅबिनेट मेंबर्स, झोन चेअरपर्सन्स,क्लब पदाधिकारी आणि लायन्स सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिजन सेक्रेटरी लायन अक्षदा रेळेकर यांनी उत्तमरीत्या केले.

नागरी संरक्षण मूलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. १६/२०२६ उत्साहात संपन्न !!

नागरी संरक्षण मूलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. १६/२०२६ उत्साहात संपन्न !!

 एस. के. व्हॅली, मुंब्रा येथे २३ प्रशिक्षणार्थींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा....

मुंब्रा | ३१ ऑगस्ट २०२६ : नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयामार्फत आणि मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक २७ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एस. के. व्हॅली, मुंब्रा येथे नागरी संरक्षण मूलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. १६/२०२६ आयोजित करण्यात आला होता. 

या प्रशिक्षण पाठ्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना नागरी संरक्षणाचे कार्य, आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्याच्या पद्धती, सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच विविध प्रत्यक्ष कार्यपद्धतींबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध उपक्रमांचे प्रशिक्षण घेतले. 
प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी वेळापत्रकानुसार प्रशिक्षणार्थींची लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी एकूण २३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.  प्रशिक्षण कालावधीत शिकविण्यात आलेल्या विविध विषयांचे ज्ञान आणि प्रत्यक्ष कार्य करण्याची क्षमता यांचे मूल्यमापन या परीक्षेद्वारे करण्यात आले. सहभागी स्वयंसेवकांना नागरी संरक्षण संघटनेत सहभागी होण्यासाठी सभासदत्वाची शपथ देण्यांत आली. 

सदर प्रशिक्षण पाठ्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. राहुल घाटवळ, मानसेवी निदेशक तथा विभागीय क्षेञरक्षक तसेच श्री. अशोक धांधा, उ वि क्षे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थींना नागरी संरक्षणाच्या विविध कार्यपद्धतींचे प्रभावी प्रशिक्षण मिळाले. 

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींमध्ये शिस्त, सेवाभाव, आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने कार्य करण्याची क्षमता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यावर भर देण्यात आला. प्रशिक्षित स्वयंसेवक भविष्यात आपत्तीच्या परिस्थितीत प्रशासनासोबत समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मूलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. १६/२०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि नियोजित वेळापत्रकानुसार यशस्वीरित्या संपन्न झाला.

*उपनियंत्रक*
नागरी संरक्षण, नवीमुंबई समूह, ठाणे.

Wednesday, 2 September 2026

केडीएमटी बस आणि कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही !!

केडीएमटी बस आणि कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही !!


*डोंबिवली, दि. २ सप्टेंबर २०२६*

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात आज मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कावेरी चौक / ICICI बँकेजवळ केडीएमटी बस आणि कार यांची एकमेकांना घासून अपघात झाला.

या अपघातात कारचे आणि बसचे किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

सदर चौकात फेरीवाल्यांची गर्दी असल्याने हा परिसर कायम वर्दळीचा असतो. त्यामुळे वाहनांना मार्ग काढणे कठीण जात असते.

या अपघातामुळे वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून याबाबत मानपाडा पोलिसांना कळविण्यात आले आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

एमआयडीसीत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर ! यापूर्वी अपघातात एक बळी गेला आता दुसरा बळी जाण्याची वाट पहात आहात का !!

एमआयडीसीत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर ! यापूर्वी अपघातात एक बळी गेला आता दुसरा बळी जाण्याची वाट पहात आहात का !!

           डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये खासकरून कावेरी चौक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण झाला असून फेरीवाल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे तसेच नवीन नवीन टपऱ्या पण वाढत आहे. याच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे दीड वर्षापूर्वी एक शालेय विद्यार्थ्याचा अपघातात बळी गेला होता. फेरीवाल्यांमुळे रस्ता आणखी अरुंद झाल्याने दोन मोठी वाहने समोरासमोरून आल्यास पादचाऱ्यांना चालण्यास जागाच मिळत नाही. त्यात आता गणेशोत्सव, दहीहंडी याच्या कमानी या कावेरी चौकात लावण्यात आल्या आहेत. शाळा सुटण्याच्या, भरण्याच्या वेळेत ट्रॅफिक समस्या अधिक बिकट होते. मागील मंगळवारी सायंकाळी केडीएमटी बस आणि कार हे एकमेकाला घासून गेल्याने कावेरी चौकात मोठा अपघात होता होता वाचला. सुदैवाने त्यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र प्रशासनाला पुन्हा आणखी कोणाचा बळी पाहिजे आहे का ? 

             सदर हे अनधिकृत फेरीवाल्यांना राजाश्रय मिळत असल्याने ते बिनधास्त झाले आहेत. राजकीय, प्रशासनातील उच्च व खालचे कर्मचारी यांच्या त्यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. जर एखाद्या दिवशी कारवाई होणार असेल तर त्या फेरीवाल्यांना आधीच माहिती पडते. जेव्हा मागे एका शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यू झाला होता तेव्हा मात्र नागरिकांच्या दबावाने काही दिवस कावेरी चौकातील फेरीवाल्यांना केडीएमसीने हटविले होते. थोड्या दिवसांनी पुन्हा फेरीवाले ऐटीत बसू लागले. येथील रहिवाशांना आता फेरीवाल्यांवर तात्पुरती, दिखाऊ कारवाई नको,  कायमस्वरूपी कारवाई पाहिजे आहे. केडीएमसी बरोबर येथे विशेष नियोजन प्राधिकरण हे एमआयडीसी असल्याने तसेच येथील भूखंडाची मालकी त्यांच्याकडे असल्याने तेही या अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या यांच्यावर कारवाई करू शकतात. यापूर्वी तशी कारवाई एमआयडीसी कडून झाली आहे. बघूया आता ही कारवाई कधी होणार की राजाश्रय मिळालेले फेरीवाले कायमस्वरूपी येथे स्थिरावणार हे पहावे लागेल.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

वर्तक महाविद्यालयात ‘विकसित भारत @2047’ आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात !!

वर्तक महाविद्यालयात ‘विकसित भारत @2047’ आंतरराष्ट्रीय ई-परिषद उत्साहात !!

कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अर्थव्यवस्था, नवोन्मेष आणि शाश्वत विकासावर देश-विदेशातील तज्ज्ञांचे विचारमंथन

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण.

वसईतील विद्यावर्धिनीच्या अण्णासाहेब वर्तक कला महाविद्यालय, केदारनाथ मल्होत्रा वाणिज्य महाविद्यालय आणि ई. एस. अंड्राडिस विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने ‘Viksit Bharat @2047: Empowering India’s Digital Future through Artificial Intelligence, Digital Economy, Commerce, Innovation, and Sustainable Development’ या विषयावर एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले. लेखाशास्त्र व अर्थशास्त्र विभागाने IQAC च्या सहकार्याने आणि Global Foundationच्या सहयोगाने ही परिषद आयोजित केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था, वाणिज्य, नवोन्मेष, फिनटेक, उद्योजकता, गिग इकॉनॉमी आणि शाश्वत विकास अशा समकालीन विषयांवर देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेत विचारमंथन केले. संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे, हा परिषदेचा प्रमुख उद्देश होता.

उद्घाटन सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य व परिषदेचे संचालक डॉ. अरविंद वा. उबाळे यांनी स्वागत केले. परिषदेच्या समन्वयक प्रा. वंदना केडिया यांनी प्रास्ताविकातून परिषदेची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास वर्तक यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले.

अमेरिकेतील Salisbury Universityचे Visiting Professor डॉ. प्रवीण जी. सप्तर्षी यांनी बीजभाषणातून विकसित भारताच्या डिजिटल भविष्यासाठी तंत्रज्ञान, ज्ञान आणि नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. सोमनाथ विभुते, प्राचार्य, जी. जी. कॉलेज, वसई यांनी भूषविले.
परिषदेत पाच प्रमुख तज्ज्ञ सत्रांचे आयोजन करण्यात आले. प्रा. (डॉ.) मदन मोहन गोयल, कुलगुरू व निवृत्त प्राध्यापक, अर्थशास्त्र, कुरुक्षेत्र विद्यापीठ; डॉ. मुन्थेर मोहद इब्राहिम झ्युद, प्राध्यापक, Al-Quds Open University, Palestinian Territory; डॉ. जावेद आलम, माजी सहयोगी प्राध्यापक, Department of Psychology, College of Behavioral Sciences, Addis Ababa University, Ethiopia; प्रा. (डॉ.) एफ. एम. नदाफ, प्राचार्य, Government Government College, Borda Margao, Goa; तसेच डॉ. ज्योतिराम सी. मोरे, प्राध्यापक व भूगोल विभागप्रमुख, Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science and Commerce College यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या पाच तज्ज्ञ सत्रांचे अध्यक्षस्थान अनुक्रमे डॉ. विष्णू यादव, डॉ. विकास उबाळे, डॉ. कुलदीप सिंह राठोड, डॉ. अनिलकुमार शेळके आणि डॉ. हिरानंद खांबायत यांनी भूषविले. दुपारच्या सत्रात तीन तांत्रिक सत्रांमध्ये संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. या सत्रांचे अध्यक्षस्थान अनुक्रमे डॉ. विजयानंद बनसोडे, डॉ. भीमराव होनपारखे आणि डॉ. मनीष तिरपुडे यांनी भूषविले. विविध राज्यांतील संशोधक व विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्थिक समावेशन, डिजिटल प्रशासन, ग्रामीण रोजगार, डिजिटल फायनान्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकास यांसारख्या विषयांवरील संशोधनपर निबंध सादर केले. एकंदर २६४ अभ्यासकांनी या परिषदेत आपला सहभाग नोंदवला

परिषदेचे संचालक प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, समन्वयक प्रा. वंदना केडिया आणि सहसमन्वयक व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. विनायक निकस यांनी आयोजन समितीतील सदस्यांच्या सहकार्याने परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या आंतरराष्ट्रीय ई-परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, संशोधन, उद्योग, तंत्रज्ञान आणि धोरणनिर्मिती यांच्यातील परस्परसंबंध अधिक दृढ करण्याचा, तसेच ज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेला व्यापक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !!

*भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !! *ठाणे, प्रतिनिध...