Wednesday, 9 September 2026

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !!

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !!

विरार प्रतिनिधी/पंकज चव्हाण

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ आयोजन व नियोजनाची सभा सन्माननीय महापौर श्री. अजीवजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेस वसई तालुक्यातील २०८ शाळा व महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गतवर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर ४४ क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये तब्बल २७,६४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून वसई-विरारच्या क्रीडा क्षेत्रातील उत्साह अधोरेखित केला.

राष्ट्रीयस्तरीय खेळाडूंचा गौरव

या प्रसंगी राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय प्राविण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंचा महापौर श्री. अजीवजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कु. मानसी प्रमोद गायकवाड – बेसबॉल
कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विरार (पश्चिम)

कु. प्रणय प्रशांत शिंदे – नॅशनल इंग्लिश स्कूल, विरार (पश्चिम)

कु. संस्कार जितेंद्र बिरवटकर – यु. एस. ओसवाल ॲकॅडमी स्कूल, नालासोपारा

या गुणवंत खेळाडूंच्या कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावर्षी तीनही विभागांत शालेय क्रीडा महोत्सव

क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करताना महापौर श्री. अजीवजी पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर श्री. सुहास व्हनमाने यांनी शालेय क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या भाषणात महापौरांनी यावर्षी वसई तालुक्यातील तिन्ही विभागांमध्ये शालेय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तसेच जिल्हास्तरावरील विजेत्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पदकांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर सहभागी होणाऱ्या खेळाडूंना महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचेही त्यांनी स्वागत केले.

स्पर्धांचे उत्तम आयोजन व नियोजन केल्याबद्दल क्रीडा शिक्षकांनी महानगरपालिका व आयोजन समितीचे आभार मानले.

उपस्थित मान्यवर
सभेस सभागृह नेते श्री. प्रफुलजी साने, आरोग्य समिती सभापती श्री. निलेश देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते (कबड्डी) श्री. गिरीश इरनाक, उपायुक्त क्रीडा विभाग श्री. अजित मुठे, सहाय्यक क्रीडा आयुक्त सौ. नीता कोरे, जिल्हा क्रीडा प्रमुख प्रा. योगेश चौधरी, प्रमुख सल्लागार श्री. गोविंद शिंदे, सल्लागार श्री. माणिक दोतोंडे, उपप्रमुख श्री. जितेंद्र पाटील, तांत्रिक क्रीडा समन्वयक श्री. जयेश वैती, क्रीडा समन्वयक श्री. प्रमोद गोयल व श्री. अमित मोदी उपस्थित होते. तसेच क्रीडा समिती सदस्य श्री. संदेश नामदे, श्री. गौरव राऊत, श्री. देवेंद्र दांडेकर व श्री. स्वप्निल पाटील यांचीही उपस्थिती होती.

सभेचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र राऊत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना व्यासपीठ, गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन आणि वसई-विरारच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्याचा संकल्प या सभेतून अधोरेखित झाला.

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत व्हावे; नागरिकांची मागणी !!

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत व्हावे; नागरिकांची मागणी !!

*डोंबिवली, राजू नलावडे* :

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत असणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, कारण डोंबिवली आणि २७ गावांमध्ये मेट्रो, रस्ते आदी अनेक विकासकामे एमएमआरडीएकडून सुरू आहेत.

या कामांच्या संदर्भात जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. ठेकेदाराकडून अनेक चुका व हलगर्जी होत असल्याने कधीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच मंगळवारी (०८/०९/२०३६)  कल्याण-शीळ रोडवरील सोनरपाडा येथे बांधकाम गॅलरी कोसळण्याची घटना घडली आहे. मागील वर्षभरात मेट्रोच्या कामात दोन दुर्घटना झाल्या असून सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवली आहे. एमएमआरडीएकडून काँक्रीट रस्ते बनविताना अनेक चुका झाल्या असून त्या दुरुस्त करणे आवश्यक आहे.

जर एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवली किंवा २७ गावांत आणले गेले तर उपरोक्त संदर्भातील तक्रारी जनतेला थेट देता येतील, तसेच केडीएमसी, एमआयडीसी, वाहतूक पोलीस आदी सरकारी प्रशासनाला त्यांच्याशी समन्वय साधून काम करता येईल.

सध्या २७ गावांमध्ये भूसंपादनाचा तिढा निर्माण झाला आहे. ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी ग्रामस्थांना आपली कैफियत मांडण्यासाठी आणि कागदपत्रे देण्यासाठी जवळच एखादे कार्यालय असेल तर एमएमआरडीए आणि ग्रामस्थ या दोघांसाठीही ते सोयीचे होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे (डोंबिवली) यांनी केले.

सध्या एमएमआरडीएचे मुख्य कार्यालय वांद्रे, मुंबई येथे आहे. ठाणे येथे जसे उपकार्यालय सुरू केले आहे, तसे उपकार्यालय डोंबिवली किंवा २७ गावांत सुरू केल्यास अनेक प्रश्न तातडीने सोडविता येतील. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी !!

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी !!

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

प्रतिनिधि - 

ठाणे | ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकमान्य नगर–सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत लोकमान्य नगर बस डेपोसमोर असलेल्या एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावर सुरू असल्याचा आरोप असलेल्या अनधिकृत रिक्षा पार्किंग तसेच दर मंगळवारी रस्त्यालगत भरवण्यात येणाऱ्या आठवडी बाजारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर युवा अध्यक्ष पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांनी लोकमान्य नगर–सावरकर नगर प्रभाग समितीचे आयुक्त श्री. बनसोडे यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.

खरात यांच्या तक्रारीनुसार, एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून अनधिकृतपणे रिक्षा पार्किंग करण्यात येत आहे. या ठिकाणी असामाजिक प्रवृत्तींचा वावर वाढल्याचा तसेच चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

दर मंगळवारी भरवण्यात येणाऱ्या आठवडी बाजारामुळे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी होत असल्याचेही खरात यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकाराची महापालिका प्रशासनाने पाहणी करून अनधिकृत रिक्षा पार्किंग आणि आठवडी बाजारावर नियमानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी साईनाथ खरात यांनी केली आहे.

दरम्यान, संबंधित प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास नागरिकांच्या प्रश्नांसाठी उपोषण करण्याचा इशाराही खरात यांनी दिला आहे. त्यामुळे या तक्रारीनंतर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वृत्त - साईनाथ खरात (ठाणे)

Tuesday, 8 September 2026

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

*कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर २०२६ :*

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ च्या प्रारूप मसुद्यावर राज्यभरातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दि. ०७ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत ‘जाहीर प्रकटन’ काढून हरकती व सूचना नोंदवण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६, सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत वाढविल्याचे घोषित केले आहे. शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दि. ०७ सप्टेंबरपर्यंत राज्यभरातून ११ हजार ४१० अधिकृत सूचना व हरकती नोंदवण्यात आल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर प्रकटनानुसार, या मसुद्यावर प्रारंभी दि. ०४ सप्टेंबर २०२६ पर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र, अवघ्या काही दिवसांत राज्यभरातील शिक्षक, क्लास चालक, पालक व विद्यार्थ्यांकडून तब्बल ११,४१० लेखी हरकती व ई-मेल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले. हरकतींचा हा वाढता ओघ आणि विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन शासनाने ही मुदत आता १५ सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली असून, नागरिकांनी *doesecondary1@gmail.com* या अधिकृत ई-मेलवर आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन केले आहे.

*"कायद्याला नव्हे, तर जाचक व अव्यवहार्य अटींना विरोध"*

या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर, खाजगी कोचिंग क्लास संरक्षण महा-अभियानचे डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी ठाम भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "खाजगी शिक्षण व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी नियमन हवेच; आमचा संपूर्ण कायद्याला किंवा शासनाच्या भूमिकेला अजिबात विरोध नाही. मात्र, मसुद्यातील ज्या तरतुदी अत्यंत जाचक, अव्यवहार्य आणि भारतीय संविधानाच्या कलम १४, १९(१)(g) आणि २१ च्या चौकटीत बसत नाहीत, त्यांना आमचा ठाम कायदेशीर आक्षेप आहे. किरकोळ त्रुटींसाठी १० ते ५० लाखांचा अवाजवी दंड, लहान शिक्षकांनाही वेठीस धरणारी २५ विद्यार्थ्यांची मर्यादा, दाट वस्तीत भाड्याच्या जागेत १ चौ.मी. जागा व स्वतंत्र पार्किंगची अशक्य सक्ती आणि १३ वर्षांखालील मुलांच्या शिकवणीवर थेट बंदी यामुळे ग्रामीण व मध्यमवर्गीय शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होईल. शासनाने मुदतवाढ देऊन सकारात्मक पाऊल उचलले आहे, आता या जाचक अटी शिथिल करून सुटसुटीत धोरण आखावे, हीच आमची सनदशीर मागणी आहे."

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दीपक खोत यांनी स्पष्ट केले की, "शासनाने दिलेली मुदतवाढ हा खाजगी शिक्षक व पालकांच्या एकजुटीचा पहिला सकारात्मक विजय आहे. शासनाने अधिकृतपणे ११ हजारांहून अधिक हरकतींची नोंद घेतली असली, तरी प्रत्यक्ष ई-मेल व निवेदनांची संख्या याहूनही मोठी आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीतून आम्ही हा लढा आणखी तीव्र आणि व्यापक करणार आहोत."

शासनाने हरकती नोंदवण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत वाढवून दिल्याने, जे क्लास संचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी तांत्रिक कारणामुळे आपली हरकत नोंदवू शकले नव्हते, त्यांना आता दुसरी संधी मिळाली आहे. या वाढीव वेळेत जास्तीत जास्त हरकती नोंदवून लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शवण्याचे आवाहन संघटनांकडून करण्यात येत आहे. आता शासन या ११ हजारांहून अधिक हरकतींचे परीक्षण करून मसुद्यात नेमके काय बदल करते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Monday, 7 September 2026

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश; ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक !!

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश; ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक !!

*कल्याण, महेंद्र (अण्णा) पंडित 

कल्याण रेल्वे पोलिसांनी ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करत ५ आरोपींना अटक केली आहे.

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ६८२/२०२६, कलम ८(c), २०(b)(ii)(C) व २९, NDPS Act, १९८५ अन्वये दिनांक ०१/०६/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपी निक्कीकुमार हरदेव शाह (वय १९ वर्षे, रा. बेगुसराई, बिहार) व कुलदीप राजू महतो मंडल (वय २६ वर्षे, रा. बेगुसराई, बिहार) यांच्याकडून कोणार्क एक्स्प्रेसच्या डब्यातून एकूण २१.९५ किलो गांजा (Commercial Quantity) विक्रीसाठी वाहतूक करीत असताना जप्त करण्यात आला होता.

सदर आरोपींकडे कसून चौकशी व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त केली असता, सदर गांजा हा ओडिशा राज्यातून आणून गोवा राज्यात पुरवठा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

सदर गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी वपोनी अर्चना दुसाने, कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विठ्ठल वाणी यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठीत करण्यात आले.

*गोवा राज्यात तपास व आरोपीस अटक :*

तपासादरम्यान आरोपींचे जबाब, मोबाईल CDR, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण, बँकेचे आर्थिक व्यवहार तसेच इतर उपलब्ध पुराव्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले.

दिनांक १८/०७/२०२६ ते २२/०७/२०२६ या कालावधीत विशेष पथकाने गोवा राज्यात जाऊन तपास केला. Maina Curtorim Police Station, South Goa येथील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तपासाची पुढील कार्यवाही करण्यात आली.

तपासात अटक आरोपींकडून सदर गांजा हा गोवा राज्यातील आशरोफ सुनार खान (वय २१ वर्षे, रा. दक्षिण गोवा) याला पुरवठा करण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मोबाईल लोकेशन व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्यास मडगाव, गोवा येथून अटक करण्यात आली. आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून सदर आरोपीस कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणून PCR घेण्यात आला.

*ओडिशा राज्यातील गांजा पुरवठादारांचा शोध :*

गोवा येथील आरोपीकडून प्राप्त माहिती व तांत्रिक तपासातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गांजाचा मूळ पुरवठादार शोधण्यासाठी विशेष पथकाने दिनांक २४/०७/२०२६ ते ३१/०७/२०२६ या कालावधीत कंधमाल जिल्हा, ओडिशा येथे जाऊन तपास केला.

Daringbadi Police Station, Odisha येथील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तपासाची कार्यवाही करण्यात आली. तपासात अटक आरोपींनी सदर गांजा हा विद्याधर लक्ष्मीधर नायक (वय ४३ वर्षे, रा. दंडीमहा, पो. सरनिकेता, जि. कंधमाल, ओडिशा) यांच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

पुढील तपासात विद्याधर लक्ष्मीधर नायक याने सदर गांजा हा जंगल परिसरात गांजाची शेती करणारा श्रीकांत मंदार प्रधान (वय ३८ वर्षे, रा. सुजामाजु, ता. डांरींगबाडी, जि. कंधमाल, ओडिशा) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

श्रीकांत मंदार प्रधान हा अतिदुर्गम जंगल परिसरात राहत असून सदर भाग नक्षलप्रभावित क्षेत्रात येत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. तथापि, स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने विशेष पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने तपास करून त्याचा शोध घेतला व त्यास अटक करण्यात यश मिळविले.

दोन्ही आरोपींना JMFC Court, Daringbadi, Odisha येथे हजर केले असता मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ०५ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड (PCR) घेण्यात आला आहे.

*आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा उलगडा :*

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत एकूण ०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींचे जबाब, मोबाईल CDR, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण, आर्थिक व्यवहार व इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ओडिशा → गोवा → महाराष्ट्र या मार्गावरील आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा महत्त्वपूर्ण उलगडा करण्यात आला आहे. गांजाचा स्रोत, पुरवठादार, मध्यस्थ व प्राप्तकर्ता यांच्यातील परस्पर संबंध उघडकीस आणण्यात यश आले असून, या गुन्ह्याशी संबंधित इतर व्यक्ती, आर्थिक व्यवहार व तस्करीच्या नेटवर्कबाबत पुढील तपास सुरू आहे.

सदर तपासादरम्यान महाराष्ट्र, गोवा व ओडिशा या तीन राज्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन स्थानिक पोलिसांशी समन्वय साधत तपास करण्यात आला. विशेषतः ओडिशा राज्यातील अतिदुर्गम व नक्षलप्रभावित जंगल परिसरात प्रतिकूल परिस्थितीत नियोजनबद्ध व धाडसी पद्धतीने कारवाई करून गांजा पुरवठा साखळीतील महत्त्वाच्या आरोपींपर्यंत पोहोचण्यात विशेष पथकास यश आले.

सदर संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, श्री. राकेश कलासागर, मा. पोलीस उपायुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे व मा. पोलीस उपायुक्त श्रीमती निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

*विशेष पथक -*
१. वपोनी अर्चना दुसाने 
२. पोनी कैलास रामदास वानखडे 
३. सपोनी विठ्ठल किसन वाणी 
४. पोहेवा/३२७३ अमित अशोक बडेकर 
५. पोहेवा/२२०६ हेमंत राजेंद्र पाटील 
६. पोशि/६३३ अमोल मोठाभाऊ सूर्यवंशी 
७. पोशि/१७३७ अंकुश व्यंकट धायगोडे

या अधिकारी व अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परस्पर समन्वयाने तसेच महाराष्ट्र, गोवा व ओडिशा राज्यातील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

कल्याण लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई; ओडिशा-गोवा-महाराष्ट्र आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश, 05 जणांना अटक !!

कल्याण लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई; ओडिशा-गोवा-महाराष्ट्र आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश, 05 जणांना अटक !!

*प्रतिनिधी/पत्रकार (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)*
*कल्याण. -* कल्याण रेल्वे पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ओडिशा राज्यातून गांजा आणून गोवा आणि महाराष्ट्रात पुरवठा करणाऱ्या टोळीतील 05 आरोपींना पोलिसांनी महाराष्ट्र, गोवा आणि ओडिशाच्या नक्षलप्रभावित जंगलातून शोधमोहीम राबवून अटक केली आहे.

*कोणार्क एक्सप्रेसमध्ये 21.95 किलो गांजा जप्त*

कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 682/2026, कलम 8(c), 20(b)(ii)(C) व 29 NDPS Act 1985 अन्वये दिनांक 01/06/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यात कोणार्क एक्सप्रेसच्या डब्यातून प्रवास करणारे दोन आरोपी - *निक्कीकुमार हरदेव शाह (वय 19, रा. बेगुसराई, बिहार)* आणि *कुलदीप राजू महतो मंडल (वय 26, रा. बेगुसराई, बिहार)* यांच्याकडून पोलिसांनी *21.95 किलो गांजा (Commercial Quantity)* जप्त केला होता. हा गांजा ते विक्रीसाठी घेऊन जात होते.

*तांत्रिक तपासातून ओडिशा ते गोवा कनेक्शन उघड*

अटक आरोपींकडे कसून चौकशी आणि मोबाईल CDR, लोकेशन, बँक व्यवहारांच्या तांत्रिक विश्लेषणातून हा गांजा ओडिशा राज्यातून आणून गोवा राज्यात पुरवठा करण्यासाठी नेला जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन करण्यात आले.

*पहिली कारवाई - गोव्यातून मुख्य खरेदीदाराला अटक*

दि. 18/07/2026 ते 22/07/2026 या कालावधीत विशेष पथकाने गोवा राज्यात जाऊन तपास केला. Maina Curtorim Police Station, South Goa येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा गांजा गोव्यातील *आशरोफ सुनार खान (वय 21, रा. दक्षिण गोवा)* याला पुरवठा केला जाणार असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मोबाईल लोकेशनवरून शोध घेऊन त्याला मडगाव, गोवा येथून अटक करण्यात आली आणि कल्याणला आणून त्याची पोलीस कोठडी (PCR) घेण्यात आली.

*दुसरी कारवाई - ओडिशाच्या नक्षलग्रस्त जंगलातून पुरवठादार जेरबंद*

गोवा येथील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून गांजाचा मूळ स्रोत शोधण्यासाठी विशेष पथकाने दि. 24/07/2026 ते 31/07/2026 दरम्यान ओडिशा राज्यातील कंधमाल जिल्ह्यात तपास मोहीम राबवली. Daringbadi Police Station च्या सहकार्याने तपास करताना अटक आरोपींनी हा गांजा *विद्याधर लक्ष्मीधर नायक (वय 43, रा. दंडीमहा, पो. सरनिकेता, जि. कंधमाल, ओडिशा)* याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गांजा जंगल परिसरात गांजाची शेती करणाऱ्या *श्रीकांत मंदार प्रधान (वय 38, रा. सुजामाजु, ता. दारिंगबाली, जि. कंधमाल, ओडिशा)* याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

श्रीकांत प्रधान हा अतिदुर्गम जंगल परिसरात राहत असून सदर भाग नक्षलप्रभावित क्षेत्रात येत असल्याने त्याचा शोध घेणे मोठे आव्हानात्मक होते. मात्र स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने कारवाई करून पथकाने त्यालाही अटक करण्यात यश मिळवले.

दोन्ही आरोपींना JMFC Court, Daringbadi, Odisha येथे हजर केले असता न्यायालयाने 05 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर दोघांनाही कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

*साखळीचा उलगडा*

या तपासात आतापर्यंत एकूण 05 आरोपींना अटक करण्यात आली असून *ओडिशा → गोवा → महाराष्ट्र* या मार्गावरील आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा महत्त्वपूर्ण उलगडा झाला आहे. गांजाचा स्रोत, पुरवठादार, मध्यस्थ आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध उघड झाले असून या नेटवर्कमधील इतर व्यक्ती आणि आर्थिक व्यवहारांबाबत पुढील तपास सुरू आहे.

*वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि विशेष पथक*

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई श्री. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे आणि पोलीस उपायुक्त श्रीमती निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, पोलीस निरीक्षक कैलास रामदास वानखडे, सपोनि विठ्ठल किसन वाणी, पोहेवा/3273 अमित अशोक बडेकर, पोहेवा/2206 हेमंत राजेंद्र पाटील, पोशि/633 अमोल मोठाभाऊ सूर्यवंशी, पोशि/1737 अंकुश व्यंकट धायगोडे यांनी सहभाग घेतला.

तीन राज्यांमध्ये जाऊन, स्थानिक पोलिसांशी समन्वय साधत आणि विशेषतः नक्षलप्रभावित दुर्गम जंगलात प्रतिकूल परिस्थितीतही या पथकाने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार !!

*भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार !!

*शिक्षण अन् पाककलेतील १३ गुणवंतांचा मुंबईत दिमाखदार गौरव*

मुंबई, पी. डी. पाटील 
गेल्या २४ वर्षांपासून शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान टिकवून असणाऱ्या ‘भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई’ या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने गुरुवार दि. ३ सप्टेंबर रोजी एक भव्य व दिमाखदार राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. दादर (पश्चिम) येथील ‘गुरुकुल सभागृह’ येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात शिक्षण आणि पाककला या क्षेत्रांत अद्वितीय व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील १३ गुणवंतांना राष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये पाककलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ विविध प्रयोग करून या कलेला नवी उंची मिळवून देणाऱ्या गृहिणींचा ‘अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला, तर शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल विशेष ‘ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त गुणवंतांची यादी -

अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ (१२ विजेत्या) :
 * सौ. स्वाती सतीश श्रीवर्धनकर
 * सौ. स्वाती ऐलेश जोशी
 * सौ. भावना खंडारे
 * सौ. मनीषा सचिन पाळेकर
 * सौ. तृप्ती सगुण माणगावकर
 * सौ. नीता जितेंद्र पाठारे
 * अरुणा गोपाळ चरपे
 * सौ. वंदना सुनील भुजाडे
 * सौ. रत्नप्रभा सुधाकर सानप
 * सौ. मोहिनी मोहित घरत
 * सौ. भाविका भरत गोंधळी
 * वैशाली संतोष सुतार

ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६ - * सौ. रंजना राजेंद्र शिंदे (शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य कार्याबद्दल)

संस्थेची २४ वर्षांची उज्ज्वल परंपरा
२००३ सालापासून मुंबई, पुणे व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था ही स्वतः उच्चविद्याविभूषित असलेले अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली निरंतर सामाजिक व शैक्षणिक कार्य करत आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, योग, निसर्गोपचार, कृषी, देशी गो-संवर्धन, वृक्ष संवर्धन व साहित्य या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करते. तसेच संस्थेमार्फत वैदिक वास्तू, डाऊझिंग आणि विविध वैकल्पिक शास्त्रांचे शासनमान्य प्रशिक्षण दिले जाते.

शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान आणि पाककलेच्या माध्यमातून जपलेली पारंपरिक व आधुनिक संस्कृती या दोन्ही क्षेत्रांतील गुणवंतांच्या अद्वितीय कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुखांनी दिली.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्यासह श्री शिवपद्म वडाळकर, डॉ. चंद्रमोहन विष्णू रानडे, मा. सौ. सुनीता पाटील, ज्येष्ठ शिक्षिका नंदाताई शिंगरे, हिलर प्रा. भाऊ म्हात्रे, श्री मनोज वैद्य, हिलर सचिन तावरे, श्री संदेश कदम आणि शिक्षिका सौ. भावना खंडारे, श्री. आर. विजयसिंह यांचे विशेष सहकार्य व योगदान लाभले. उपस्थितांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले.

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !!

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !! विरार प्रतिनिधी/पंकज चव्हाण वसई-विरार शहर महानगरपा...