Wednesday, 10 June 2026

मा. न्यायालय व महसूल मंत्र्यांचे आदेश असतानाही काल्हेर ग्रामपंचायतीची टाळाटाळ; गुरुचरण व स्मशान भूमीवरील अतिक्रमणे कायम, तक्रारदार करणार जनहित याचिका !!

मा. न्यायालय व महसूल मंत्र्यांचे आदेश असतानाही काल्हेर ग्रामपंचायतीची टाळाटाळ; गुरुचरण व स्मशान भूमीवरील अतिक्रमणे कायम, तक्रारदार करणार जनहित याचिका !!

(भिवंडी तालुक्यातील ग्राम पंचायत, काल्हेर,येथील जमीन सर्वे नंबर २५१/१ गुरुचरण, जमीन सर्वे नंबर २५१/२ स्मशान भूमी व जमीन सर्वे नंबर २५८/१/अ/१ गुरुचरण या जमिनीवर "भू"माफियानी अतिक्रमण करून केलेले अनधिकृत बांधकामे)

भिवंडी, दिं,१०/६/१०२६,अरुण पाटील (कोपर)
राज्यातील सर्व महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत व ग्राम पंचायत क्षेत्रातील गुरुचरण (गायरन) जमिनीवरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याचे आदेश मा.उच्च न्यायालय व राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिले आहेत. मात्र तरी देखील भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत, काल्हेर ही त्यांच्या हद्दीत असलेल्या गुरुचरण (गाय रान) जमिनीवर व स्मशान भूमीच्या जमिनीवर "भू"माफियांनी अतिक्रमण करून केलेली अनधिकृत बांधकामे हटविण्या बाबत टाळा टाळ करत आहे. या बाबत तक्रारदार यांनी गेल्या कित्येक वर्षा पासून पाठ पुरावा करूनही अतिक्रमण हटत नसल्याने व योग्य कारवाई होत नसल्याने अखेर तक्रारदार आता मा.उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. 

या विषया बाबत तक्रारदार यांनी पुन्हा दिं,२७/२/२०२६ रोजी मा.गट विकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी यांना लेखी निवेदन दिल्याने त्यांनी ग्राम पंचायत, काल्हेर यांना तत्काळ चौकशी करून ग्राम पंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार नियमोचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा स्वयंमस्पष्ट अभिप्रायासह अहवाल संबंधित अर्जदारास सादर करावा असे निर्देश दिले आहेत.मात्र आज पर्यंत तसे झाले नाही. 

मात्र त्या अनुषंगाने काल्हेर ग्राम पंचायतीने संबंधित बांधकाम व्यावसायिकांना बांधकामे हटविण्या बाबत थातूर मातुर नोटिसी बजावल्या आहेत.परंतु संबंधित "भू" माफियानी तथा बांधकाम धारकांनि/व्यावसायिकांनी सदर नोटिसिना केराची टोपली दाखवत बांधकामे हटविण्यासं नकार दिल्याचे समजले आहे. 

सविस्तर हकिगत अशी.की, काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण, व स्मशान भूमीच्या जमिनीवर "भू" माफियांनी तथा बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण करून खुलेआम अनधिकृत बांधकामे केली असून त्या बाबत काल्हेर ग्राम पंचायतीने संबंधित बांधकाम व्यावसायिक/ धारकांना केलेले अनधिकृत बांधकामे हटवण्या बाबत नोव्हेंबर २०२५ मध्ये नोटीसी निर्गमित केल्या आहेत. 

मात्र आज पर्यंत संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांनी काल्हेर ग्रामपंचायतीच्या नोटीसीना कोणताच प्रतिसाद दिला नाही. तरी देखील काल्हेर ग्रामपंचात कमिटी व ग्राम सेवक तथा ग्राम विकास अधिकारी श्री .रमेश राठोड यांनी या बाबत आज पर्यंत कोणतीच ठोस "तोडक" कारवाई केली नसून सदर अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करत असल्याने यात मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

तसेच या काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षापासून मागील तारखेच्या (बॅक (डेट) परवानग्यांनी बांधकामे झाली आहेत व सद्या सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांमधुन होत आहे. मुख्य म्हणजे वरील सर्वे नंबरच्या बाजूला असलेल्या सर्वे नं २५० या जागेत अनधिकृत बांधकामा बाबत एम .एम.आर.डी. ए.या प्राधिकरणाने नोटीसही बजावली आहे.जर भविष्यात तोडक कारवाई झाल्यास तर सर्वसामान्य रहिवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.व ते आज ना उद्या होणारच आहे त्यामुळे त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता निर्माण झाला आहे.त्यामुळे आता भविष्यात होणाऱ्या अशा पुढील सर्व अनधिकृत बांधकामांना नोटिसी बजावून त्यांची सबळ कागदपत्रे तपासूनच योग्य सदनिकांना घरपट्टी आकारणी व ८/अ हा उतारा द्यावा असे जानकारांचे म्हणणे आहे. 

येथील तलाठी सजा काल्हेर, व मौजे काल्हेर मधील जमीन सर्वे नंबर ,२५१/१ गुरुचरण काल्हेर, व २५१/२ स्मशान भूमी - काल्हेर या जागेत "भू" माफियानी अतिक्रमण करून केलेल्या अनधिकृत बांधकामान बाबत तक्रारदार यांनी मा.तहसीलदार,भिवंडी यांना दिं,३१/०१/२०१३, मा.उपविभागीय अधिकारी यांना दीं. २/२/२०१३व तलाठी सजा - काल्हेर यांना दीं, ११/२/२०१३ रोजी पत्र दिले आहे. तसेच ग्राम पंचायत काल्हेर यांना दिं. १३/५/२०१६ व दिं,२८/३/२०२२ रोजी दोन पत्र देवून व २१/६/२०२२ रोजी स्मरण पत्र दिले आहेत. 

तसेच त्यानंतर देखील मा.विभागीय कोकण आयुक्त, कोकण भवन,नवी मुंबई यांना दिं‌ ,१६/३/२०२६, रोजी मा.मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO), ठाणे, यांना व जिल्हाधिकारी, ठाणे डॉ.श्री.कृष्णनाथ पांचाळ साहेब यांना दिं‌,१३/४/२०२६ रोजी तसेच मा.तहसीलदार, भिवंडी, श्री. अभिजीत खोले साहेब,यांना दिं,५/६/२०२६ रोजी, निवेदन सादर केले आहे.यांना देखील ग्रामपंचायत, काल्हेर, व ग्राम सेवक काल्हेर हे घाबरत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

या विषया बाबत काल्हेर ग्रामपंचायतिचे ग्राम सेवक तथा ग्राम विकास अधिकारी श्री.रमेश राठोड साहेब हे एप्रिल,२०१८ रोजी रुजू झाले तेंव्हा पासून ते आज पर्यंत जवळपास आठ वर्षापासून (८वर्ष) त्यांना वारंवार प्रत्यक्षात भेटून या गुरुचरण व स्मशान भूमीच्या जागेवर"भू" माफियानी केलेले अतिक्रमण हटवण्या बाबत व अनधिकृत बांधकामानवर कारवाई करण्या बाबत वारंवार विचारणा केली.मात्र आज पर्यंत श्री.रमेश राठोड साहेबांन कडून कारवाई तर झालीच नाही व त्या विषया बाबत समाधान कारक उत्तरही मिळू शकले नाही. उलट मी हातोडी घेऊन बांधकाम तोडू का? असे "उद्धट"उत्तर श्री.रमेश राठोड यांनी तक्रारदार यांना दिल्याने तक्रारदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. 

त्यामुळे आता त्या ठिकाणी तेरा वर्षा पूर्वी सुरू असलेली अनधिकृत बांधकामे आज मितीस पूर्ण होऊन तेथील सदनिकांना अधिकृत "घर पट्टी" आकारनीही होऊन त्या ठिकाणी रहिवाशी राहू लागली आहेत. ही सर्व बांधकामे मागील तारखेच्या (बॅक डेट) बनावट व बोगस परवानग्यांनी पूर्ण केल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून त्यामुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

यात ग्रामपंचायतींनी कागदपत्रांची शहानिशा "न"करताच घर पट्ट्या लावल्या त्यामुळे ग्रामपंचायतीनेच मोठ्ठा आर्थिक व्यवहार करून या मागील (बॅक डेट) परवानग्या दिल्याचा संशय ग्रामस्थ मधून व्यक्त होत आहे.त्यामुळे येथील सर्व अनधिकृत बांधकामांना लावलेल्या "घर"पट्ट्याची तपासणी करणे आवश्यक आहे. 

यात विषयात "भू" माफियानी गुरुचरण (गायरान) व स्मशान भूमीच्या जमिनीवर अतिक्रमण करून केलेली अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त झाली तर या सर्व घर - फ्लॅट धारकांनचे होणारे नुकसान कोण भरून देणार व त्याला जबाबदार कोणाला धरायचे असाही प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

या विषयाबाबत तक्रारदार यांनी या पूर्वीच ग्राम पंचायत विभाग जिल्हा परिषद ठाणे यांना दिलेले पत्र.
(१) दिं,१३/५/२०१६ रोजी पत्र .
(२) दिं, १४/१०/२०२२ रोजी‌ स्मरण पत्र सादर केले होते.
तसेच या बाबतचे स्मरण पत्र.     
(३)दिं,२३/६/२०२२ रोजी पंचायत समिती भिवंडी, 
(४)दिं, १९/१०/२०२२ रोजी जिल्हा परिषद ठाणे,
(५) दिं,‌‌ १४/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी ठाणे,  

तसेच जमीन सर्वे नं २५८/१/अ/१ महाराष्ट्र शासन ,गुरुचरण या जागेवर झालेल्या अतिक्रमणा बाबत गोपाल रामभाऊ पाटील रा. काल्हेर यांनी २४/३/२०२५ रोजी व जगदीश लालचंद्र पाटील, रा.कोपर यांनी २२/४/२०२५ रोजी पंचायत समिती,भिवंडी यांना पत्राद्वारे कळविले होते. 

या बाबत ग्राम पंचायत, काल्हेर यांनी दिं,२७/५/२०२५ रोजी मा. उपअधीक्षक भूमी अभिलेखा, भिवंडी यांच्या मार्फत रोवर मशिनच्या साहाय्याने वरील सर्व जमिनीची शासकीय मोजणी करून हद्द निश्चित केली होती.त्यात वरील सर्व जमिनीवर अतिक्रमण होऊन अनधिकृत बांधकामे झाल्याचे निश्चित झाले आहे. 

त्या अनुषंगाने ग्रामपंचायत काल्हेर कमिटीने त्या बाबत नोटिसी खालील प्रमाणे निर्गमित केल्या आहेत.
(१) स्थानिक पोलीस स्टेशन, नारपोली,भिवंड 
(२) अनधिकृत अतिक्रमण धारक.
       प्रति, मारुती अपार्टमेंट/बांधकाम धारक,
(३)प्रति, आरोही बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 
(४)प्रति, रिद्धी सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
(५) प्रति,मौर्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.फेज ८, बि. नं ३,४ तसेच या बिल्डरला एम.एम.आर.डी ए.प्राधिकरणाने देखील नोटीस बजावली आहे.
(६) प्रति,मौर्या बिल्डर्स 
(७)प्रति, पॅरिस प्रकाश पाटील.

या सर्वांना दिं,११/११/२०२५ व दिं, १२/११/२०२५ रोजी नोटीसी निर्गमित करून त्यात असे म्हटले आहे की, वरील सर्व जागेमध्ये आपले अतिक्रमित बांधकामे आढळून येत असल्याने सदर नोटीस मिळताच ३ दिवसांच्या आत आपण सदर बांधकाम काढून घ्यावे अन्यथा सदर बांधकाम ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्राम पंचायत मार्फत निष्कासित करणेत येईल व त्यासाठी येणारा खर्च जमीन महसूल अधिनियम कायद्यानुसार आपणा कडून वसूल करणेत येईल याची नोंद घ्यावी असे म्हणण्यात आले आहे. 

त्यानंतर तक्रारदार यांनी पाठपुरावा म्हणून सन २०१३ पासून ते आज पर्यंत तत्कालीन मा.गट विकास अधिकारी व मा.विस्तार अधिकारी, पंचायत समिती भिवंडी व विद्यमान मा.गट विकास अधिकारी श्री.गोविंद खामकर साहेब यांना व मा.विस्तार अधिकारी श्री. राजू भोसले साहेब या सर्वांना आजपर्यंत प्रत्यक्षात शंभर ते दीडशे वेळा वारंवार भेटून कारवाई बाबत विचारणा केली असता त्यांनी देखील समाधानकारक उतर दिले नाही. 

तसेच आजपर्यंत जवळपास सहा/सात महिने झाले असतान देखील ग्रामपंचायत कमिटी, काल्हेर यांनी देखील संबंधित "भू" माफियांवर कोणतीच ठोस कारवाई अथवा पाठपुरावा केला गेला नसल्याने अखेर या बाबत तक्रारदार याने व्यथित होऊन ग्राम पंचायत - काल्हेर येथे ग्राम विकास अधिकारी तथा जण माहिती अधिकारी यांच्याकडे दिं,२४/११/२०२५ रोजी माहितीचा अधिकार दाखल केला,मात्र मुदत संपूनही माहिती मिळाली नसल्याने या बाबत पुन्हा व्यथित होऊन तक्रारदार यांनि विस्तार अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील दिं,१६/०१/२०२६ रोजी दाखल केले, व त्यातही मुदत संपून गेल्या नंतरही माहीत उपलब्ध करून दिलीं नाही.त्यामुळं या अनधिकृत बांधकामा बाबत खरी माहिती "न"देता ती लपवण्याचा प्रयत्न केल्याने त्या बाबत मा. गट विकास अधिकारी, भिवंडी श्री.खामकर साहेबांनी यात लक्ष घालने आवश्यक आहे. 

या विषयात ग्राम सेवक /ग्राम विकास अधिकारी कारवाई करत नाही ,माहिती देत नाही ,माहिती लपविण्याचा प्रयत्न करत असल्याने यात ग्राम विकास अधिकारी यांनी आर्थिक व्यवहार तर केला नाही ना? असा संशय ग्रामस्थांन मधून निर्माण होत आहे.जर ग्रामपंचायत कमिटीने संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांना खुला पाठिंबा देवून कोणतीच ठोस कारवाई केली नाही तर त्या बाबत स्वतः तक्रारदार हे मा.ग्रामपंचायत काल्हेर व संबंधित "भू" माफिया व बांधकाम धारक यांच्या विरोधात एक जन हित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.

Tuesday, 9 June 2026

वसई- मनमाड- शिर्डी - इंटर सिटी रेल्वे सुरू करण्याची बहुजन विकास आघाडीची मागणी.....

वसई- मनमाड- शिर्डी -  इंटर सिटी रेल्वे सुरू करण्याची बहुजन विकास आघाडीची मागणी.....

नालासोपारा ता, ९ :- वसई ते मनमाड- शिर्डी इंटरसिटी रेल्वेची मागणी प्रलंबित आहे. ही नवीन  ट्रेन वसई मार्गे सुरु केल्यास व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि साई भक्तांना याचा फायदा होणार आहे. दररोज वसई ते शिर्डी प्रवास करीत असताना महामार्गावर वाहतूक कोंडी अपघात आणि बराच वेळ प्रवासात जातो. शिर्डी ला जाणार्‍या ट्रेन या मुंबई वरुन असल्याने प्रवासाची गैरसोय होत असते.
साई भक्तांसाठी वसई मार्गे साईनगर शिर्डी पर्यंतच्या गाडीची मागणी करताना विविध साईभक्त मंडळांकडून आलेली  निवेदने व त्याला पत्र जोडून बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक महेश निकम यांनी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब यांची भेट घेत निवेदन सादर केले.

आप्पांनी ही त्वरित दखल घेत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व त्वरित यासंदर्भात पत्र बनवून DRM यांना देतो असे सांगितले

कुर्मी समाज एकत्र आल्यास महाराष्ट्रात नवी सामाजिक ताकद निर्माण होईल – एल. पी. पटेल

कुर्मी समाज एकत्र आल्यास महाराष्ट्रात नवी सामाजिक ताकद निर्माण होईल – एल. पी. पटेल

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या “कुर्मी जोडो अभियान”चा शिवराज्याभिषेक दिनी भव्य शुभारंभ

कर्जत (रायगड), दि. ६ जून : कुणबी, मराठा, पटेल, पाटीदार, कनबी, कुळंबी यांसह देशभरातील विविध समाज राष्ट्रीय स्तरावर कुर्मी समाजाच्या व्यापक ओळखीखाली जोडले गेले आहेत. या सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन संघटितपणे कार्य केल्यास महाराष्ट्रात एक प्रभावी सामाजिक व संघटनात्मक शक्ती निर्माण होऊ शकते, असा विश्वास अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय संरक्षक व माजी राष्ट्रीय अध्यक्ष एल. पी. पटेल यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील किरवली येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेतर्फे आयोजित “कुर्मी जोडो अभियान” शुभारंभ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी मध्यप्रदेशचे माजी मंत्री रामखिलावन पटेल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आणि पूजनीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या विचारांचा व आदर्शांचा वारसा पुढे नेत समाजाने संघटितपणे प्रगतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

हरियाणातील धनुष्यधारी वीर मराठा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भोसले यांनी पानिपतच्या युद्धानंतर हरियाणात स्थायिक झालेल्या समाजाने आजही आपली कुणबी-मराठा संस्कृती आणि परंपरा कशा जतन केल्या आहेत, याची माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान कुणबी, मराठा आणि कुर्मी समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी कार्य करणारे दिवंगत समाजसेवक स्व. बाबुलाल सिंह यांच्या स्मरणार्थ मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात किरवली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाली. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे साईकृपा शेळके बंधू सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला. शाहिरी पोवाड्याच्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली.

या सोहळ्यास शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. केशरीलाल वर्मा, गुजरातचे निवृत्त जिल्हाधिकारी सी. जे. पटेल, आयएएस अकादमीचे वज्र पटेल, तेलंगणा कापू समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कोंडा देवय्या, संघानी पटेल, कोठा लक्ष्मण पटेल, रवी चंदे, प्रा. जयपाल पाटील, प्रा. बी. एल. पाटील, महासभेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश संरक्षक ॲड. गोपाल शेळके, महासचिव जयेश शेलार पाटील, शंकर थोरवे, समीर पाटील, प्रमोद ठोंबे पाटील यांच्यासह ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील कुणबी व मराठा समाज संघटनांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमात दिवंगत सामाजिक कार्यकर्ते व्ही. जी. पाटील यांना जाहीर झालेला मरणोत्तर “कुर्मी भूषण” पुरस्कार त्यांच्या पत्नी वंदना पाटील आणि कन्या डॉ. नूतन मोकाशी यांना प्रदान करण्यात आला.

याशिवाय दिव्यांग असूनही अनेक गड-किल्ले सर करणारे जनार्दन पानमंद (पोखरवाडी, कर्जत), उद्योग व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे गजानन जाधव (मुंबई), सहकार व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सदानंद सुरोशे (बदलापूर), बँकिंग क्षेत्रातील योगदानासाठी सीताराम पाटील तसेच कला क्षेत्रातील योगदानासाठी निलेश पाटील (कोळीवली, भिवंडी) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी केले, तर जयेश शेलार पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. रामदास घरत यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभाकर शेळके, रामदास घरत आणि दिलीप ताम्हाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

“कुर्मी जोडो अभियान”च्या शुभारंभामुळे समाजात एकात्मता, संघटन आणि सामाजिक समन्वयाचा नवा संदेश देण्यात आला असून, महाराष्ट्रातील विविध समाजघटकांना एकत्र आणण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सौजन्य/प्रसिद्धी - संजय पाटील 
संस्थापक/अध्यक्ष - कोकण विभाग पत्रकार संघ 
प्रदेशाध्यक्ष - (अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा)

26 वर्षांनंतर बी.एड. मित्रमंडळींचा अविस्मरणीय स्नेहमेळावा कोलाड येथे उत्साहात संपन्न* !!!

26 वर्षांनंतर बी.एड. मित्रमंडळींचा अविस्मरणीय स्नेहमेळावा कोलाड येथे उत्साहात संपन्न* !!!

कोलाड, दि. ७ जून २०२६ :

सन १९९९ ते २००० या कालावधीत भा. अ. तथा भाईसाहेब अध्यापक महाविद्यालय, सावर्डे (ता. चिपळूण) येथे बी.एड. शिक्षण घेतलेल्या मित्र-मैत्रिणींचा तब्बल २६ वर्षांनंतर कोलाड येथे भव्य स्नेहमेळावा (Get-Together) मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणी आपापल्या संसारात व नोकरीच्या व्यापात व्यस्त झाले. त्यावेळी मोबाईल किंवा सोशल मीडियासारखी संपर्क साधने उपलब्ध नसल्याने अनेक वर्षे एकमेकांचा संपर्क तुटला होता. गेल्या काही वर्षांत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्वजण पुन्हा संपर्कात आले; मात्र प्रत्यक्ष भेटीचा योग जुळून येत नव्हता.

यावेळी शांताराम चव्हाण सर, सागर शिंदे आणि नितीन गाढे यांच्या पुढाकारातून स्नेहमेळाव्याचे नियोजन करण्यात आले. यास निमित्त ठरले ते मैत्रीण दवणे मॅडम यांची वेतन अधीक्षक पदावर झालेली पदोन्नती. त्यांच्या सत्कारासाठी आणि सर्व मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी कोलाड येथील सागर शिंदे यांच्या मित्राच्या फार्महाऊसची निवड करण्यात आली.

मुंबई, कल्याण, कर्जत, महाड, अलिबाग, महाबळेश्वर तसेच इतर विविध ठिकाणांहून मित्र-मैत्रिणी उपस्थित राहिले. सर्वांनी एकत्रित योगदान देऊन कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमात दवणे मॅडम यांचा शाल, साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मित्र-मैत्रिणींचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान प्रत्येकाने सावर्डे महाविद्यालयातील आठवणी, विद्यार्थी जीवनातील प्रसंग, आजच्या जीवनातील अनुभव, यश-अपयश आणि जीवनप्रवास याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शांताराम सर यांनी घेतलेल्या संवादपर मुलाखतीमुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गाणी, नृत्य, विनोद, खेळ आणि मनमोकळ्या संवादामुळे वातावरण अतिशय आनंदी झाले.

विशेष म्हणजे, २६ वर्षांनंतर भेटूनही कोणालाही परकेपणा जाणवला नाही. जणू कालच महाविद्यालयात भेटलो होतो, अशी भावना सर्वांच्या मनात होती. जे मित्र-मैत्रिणी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचीही सर्वांनी आवर्जून आठवण काढली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शिंदे यांनी केलेल्या मेहनतीचे सर्वांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या कुटुंबीयांचे, विशेषतः शिंदे वहिनींचेही उपस्थितांनी मनःपूर्वक आभार मानले.

स्नेहमेळाव्याच्या शेवटी सर्वांनी पुढील काळातही अशा भेटीगाठी नियमित आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि मैत्रीचे हे बंध अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचा समारोप पुढील भावस्पर्शी ओळींनी करण्यात आला—

> क्षण हे जातील, आठवणी राहतील,
चेहरे बदलतील, मैत्री मात्र कायम राहील...
पुन्हा भेटण्याच्या एका हाकेसाठी,
मनातील आपुलकी सदैव जिवंत राहील...

हा स्नेहमेळावा सर्वांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि भावनिक क्षण ठरला असून, २६ वर्षांची मैत्री नव्या उत्साहाने पुन्हा फुलल्याची भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.

शब्दांकन - विश्वनाथ राऊत सर 

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

डोंबिवली, संदीप शेंडगे : महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित जमीनप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सोमवारी रात्री डोंबिवलीत झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जमीन पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्याचा निर्णय जाहीर केला.

“पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरासाठी सुरू असलेल्या प्रदीर्घ संघर्षाला आज पूर्णविराम मिळाला असून यात सर्व महादेव भक्तांचा विजय झाला आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरात विधीवत महापूजा झाली आणि भक्त मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, माजी खासदार कपिल पाटील, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, मंदिराचे विश्वस्त आणि हजारो भाविक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पवित्र कार्य पूर्ण झाले. मात्र आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. जे कार्य करायचे असते ते महादेवच करवून घेतात. या यशाचे संपूर्ण श्रेय भगवान महादेवालाच जाते.”

पिंपळेश्वर मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून तोच सुवर्ण इतिहास पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम शासन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी मांडलेल्या मंदिर परिसराच्या विकासाच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंदिरासाठी झालेल्या आंदोलनाचा इतिहास सांगितला, तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा क्षेत्रातील पुढील विकास आराखडा मांडला.

Monday, 8 June 2026

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

येत्या खरीप हंगाम २०२६ मध्ये कृषी विभागाच्या विविध निविष्ठा व लाभाच्या योजनांपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अद्याप फार्मर आयडी न काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी (पी.एम. किसान व वनपट्टाधारक शेतकरी सहित) तात्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा संबंधित यंत्रणेमार्फत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

अॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात केली जात आहे. राज्यातील अंदाजे १७१ लाख खातेदार शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी देण्यात येणार असून विशेषतः राज्यातील ११९ लाख पीएम किसान लाभार्थी शेतक-यांना ओळखपत्र प्रदान करून या योजनेअंतर्गत सामावून घेण्याचे उदिष्ट आहे.

राज्यात कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ पारदर्शक आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण करण्यात येत असून त्याद्वारे विविध कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील उपलब्ध माहितीनुसार राज्यात एकूण १७१ लाख खातेदार असून त्यापैकी १३३ लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी प्राप्त केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील एकूण नोंदणीकृत लाभार्थी ११९ लाख लाभार्थी असून त्यामधील ९१.२७ लाख सक्रिय लाभार्थी असून त्यापैकी ८० लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. याशिवाय अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणीसाठी उपलब्ध एकूण १ लाख ३ हजार वनपट्टाधारक शेतक-यांपैकी ८ हजार ३१५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली आहे.

कृषी विभागाचे सचिव यांच्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलेले नाहीत अशा पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी व वनपट्टा धारक शेतकरीसहित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी ३० जून २०२६ पूर्वी काढून घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापक मोहीम हाती घेऊन या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढून घेण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची फार्मर आयडी नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून या मोहिमेस सर्व संबंधित विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक ॲग्रीस्टॅक अंकुश माने यांनी केले आहे.

पंधरा वर्षापासून पावभाट बोरी येथील विजेची समस्या न सुटल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण !

पंधरा वर्षापासून पावभाट बोरी येथील विजेची समस्या न सुटल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण !

मागणी पूर्ण न झाल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा.

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील पाव भाट बोरी येथील रहिवाशी १५ वर्षांपासून विजेच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.बोरी पाव भाट येथे सिंगल फेज विद्‌युत नागरिकांना मिळत आहे गेले पंधरा वर्षापासून हे नागरिक एमएसईबी उरण येथे  ट्रिपल फेस विद्युत पुरवठा मिळावा म्हणून मागणी करत आहेत . नागरिकांकडे सिंगल फेज असल्यामुळे फ्रीज टीव्ही व इतर उपकरणे व्यवस्थित चालत नाही. विद्युत पुरवठा कमी असल्यामुळे अनेक वेळा अनेक उपकरणे बिघडून जात आहे. याबाबत अनेक वेळा त्यांनी तक्रार केली आहे बैठका झाल्या आहेत, पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडे थ्री फेज लाईन आली नाही स्थानिक एक कुटुंबाचा विरोध आहे की त्यांच्या घरा च्या समोर च्या रस्त्यावरून लाईन टाकू देत नाही. एमएसईबी चे कर्मचारी पोल टाकायला येतात आणि हे कुटुंब त्याला विरोध करतो एमएसईबीचे लोक निघून जातात यावरून अनेक वेळा तणावाचे वातावरण झाले आहे.याचा त्रास इतर नागरिकांना होत आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठपुरावा सुरु केला आहे.मागणी मान्य न झाल्यास ५ जून रोजी काँग्रेसच्या वतीने कोटनाका येथील एम एस ई बी वीज महावितरणच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.

वास्तविक पाहता जी काय अडचण असेल ती एमएसईबी पोलिसांच्या सहकायनि दूर करून आम्हाला थ्री फेस लाईन टाकून दिली पाहिजे. प्रशासनाने लक्ष घालून एमएसईबी व उरण पोलीस यांची बैठक बोलून यातून मार्ग काढावा अशी मागणी काँग्रेस तर्फे माजी नगरसेवक बबन कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी  प्रशासनाकडे केली आहे.प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

मा. न्यायालय व महसूल मंत्र्यांचे आदेश असतानाही काल्हेर ग्रामपंचायतीची टाळाटाळ; गुरुचरण व स्मशान भूमीवरील अतिक्रमणे कायम, तक्रारदार करणार जनहित याचिका !!

मा. न्यायालय व महसूल मंत्र्यांचे आदेश असतानाही काल्हेर ग्रामपंचायतीची टाळाटाळ; गुरुचरण व स्मशान भूमीवरील अतिक्रमणे कायम, तक्रारदार करणार जनह...