Tuesday, 19 May 2026

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

*रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त*

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने येथील मुख्य बाजारपेठ ते स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा वाढल्याने नागरिकांसह रिक्षाचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेते, फळ विक्रेते, आईस्क्रीम विक्रेते, भेळपुरी मोमोज आणि शोरमा विक्रेते आणि विविध हातगाडीधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
या फेरीवाल्यांविरोधा रिक्षा चालक मालक असोसिएशन आंबिवली मोहने विभागीय अध्यक्ष शिवाजी पाटील आक्रमक झाले असून त्यांनी थेट पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.


विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मोहने मुख्य बाजारपेठ परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. हातगाड्यांमुळे रस्ते अरुंद झाले असून रिक्षा वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे रिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

अनधिकृत फेरीवाला पथकाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवाजी पाटील यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचे रिक्षा चालक आक्रमक झाले आहे. 
मोहने परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवर कठोर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थी महिला व वृद्ध आणि नोकरदार वर्गांने अशा रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडून बसलेल्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होत असून भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Monday, 18 May 2026

वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या - अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष*

वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा द्या - अजित पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष

   *नीट (NEET)* वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या प्रचंड गैरव्यवहारामुळे आज देशातील तब्बल बावीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. ही केवळ एका परीक्षेची गोपनीयता धोक्यात येण्याची बाब नसून, देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेली शिक्षण माफियांची कीड यातून उघड झाली आहे. या घोटाळ्यामुळे नैराश्यातून चार निष्पाप विद्यार्थ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागली आहे, परंतु हा आत्महत्येचा प्रकार नसून भ्रष्ट यंत्रणेने घेतलेला तो बळी आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, देशातील या सर्वात मोठ्या परीक्षेचे पवित्र्य राखण्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. घोटाळा समोर आल्यानंतर सुरुवातीला तो पूर्णपणे नाकारणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी नेहमीप्रमाणे आपली नैतिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा देणे गरजेचे होते, परंतु त्यांनी तसे न केल्यामुळे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच धारिष्ट्य दाखवून शिक्षण मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्रातील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सर्व घोटाळेबाजांना आणि शिक्षण माफियांना थेट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी आता राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

वृत्तांकन - विलासराव कोळेकर सर 

** २० मेच्या मेडिकल संपाला नागरिकांचा तीव्र विरोध !!

** २० मेच्या मेडिकल संपाला नागरिकांचा तीव्र विरोध !!

*“संपात सहभागी होणाऱ्या मेडिकल दुकानांचे परवाने रद्द करा” — नागरिकांची मागणी*

संदीप शेंडगे.....
कल्याण : २० मे रोजी पुकारण्यात आलेल्या ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या देशातील सर्व मेडिकल दुकानांच्या संपाला नागरिकांकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत असून, अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या मेडिकल सेवा बंद ठेवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे अयोग्य असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संपात सहभागी होणाऱ्या मेडिकल दुकानांवर शासनाने कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असून त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला असून पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे महागाईने उच्चांक गाठला असून नागरिक कठीण परिस्थितीला सामोरे जात आहेत त्यातच मेडिकल असोसिएशनने बंदची हाक दिल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राज्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात आवश्यक तेवढा सर्वसामान्य पुरेल इतका मेडिकलचा साठा उपलब्ध नाही याचाच परिणाम रुग्णांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हलवण्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. वर्षाचे ३६५ दिवस मोठ्या प्रमाणात नफा कमावणारे अनेक मेडिकल चालक आता स्वतःच्या आर्थिक हितासाठी संपाचा मार्ग अवलंबत असून, रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करत आहेत. मूळ किमतीपेक्षा दोनशे ते तीनशे टक्के जादा दराने औषध विक्री होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मेडिकल औषध निर्माण कंपन्या मेडिकल दुकानदारांना मोठ्या प्रमाणात एमआरपी पेक्षा जास्त किंमत ठेवून औषध विक्री करायला सांगतात औषधांवर लिहिलेली किंमत पाहून ग्राहक असेल ती किंमत देऊन औषधे खरेदी करतो.

हे मेडिकल दुकानदार स्वस्त व परिणामकारक असलेल्या जेनेरिक औषधांना सुरुवातीपासून विरोध करीत आले आहेत. आजही अनेक मेडिकल दुकानांमध्ये जाणीवपूर्वक जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना महागडी ब्रँडेड औषधे खरेदी करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

डायबिटीस, बीपी, पेनकिलर यांसारख्या नियमित लागणाऱ्या औषधांमधून मोठ्या प्रमाणावर नफा कमावला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरने लिहून दिलेली औषधे घ्यावी लागत असल्याने मेडिकल चालक मनमानी करत आहेत,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

प्रत्येक मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट नियुक्त करणे हा शासकीय नियम असतानाही हेच मेडिकल चालक फार्मासिस्ट ठेवत नाहीत तसेच एकाच लायसनवर परवाण्यावर अनेक मेडिकल दुकाने चालवली जातातकाही शहरी व ग्रामीण भागातील मेडिकल चालक हे अशिक्षित दहावी बारावी शिकलेले व्यक्ती दुकानात असतात मेडिकल डिग्री न घेतलेले म्हणजेच बी फार्मसी किंवा एम फार्मसी कोर्स न केलेले आढळून येतात.

काही ठिकाणी बंदी असलेल्या सेक्स वर्धक गोळ्या तसेच गर्भपाताच्या गोळ्यांचीही बेकायदेशीर विक्री होत असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“अत्यावश्यक सेवा बंद ठेवून नागरिकांना त्रास देण्याचा अधिकार कोणालाही नाही. २० मेच्या संपाला नागरिकांचा पूर्ण विरोध असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध !

चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध !

** आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) ::उरण तालुक्यातील चिर्ले ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश ज्ञानेश्वर पाटील हे सोमवारी (ता. १८) बिनविरोध निवडून आले. गावठाण, जांभूळपाडा आणि चिर्ले अशा तीन गावांची मिळून चिर्ले ग्रामपंचायत आहे. ते मूळचे जांभूळपाडा गावचे आहेत. कॉंग्रेसचे ते गाव अध्यक्ष आहेत. राजेश पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांची  बॅंजोच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील (काका पाटील), तसेच चिर्ले ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणेश पाटील, समीर मढवी, विनोद पाटील, प्रफुल्ल माळी आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचा उपसरपंच झाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीत जांभूळपाडा ग्रामस्थांनी उपसरपंचांचे स्वागत केले

साहित्यिक आणि समाज सेवकांचा कोमसाप उरणचा मधुबन कट्टा प्रेरणास्थान - नागेंद्र म्हात्रे

साहित्यिक आणि समाज सेवकांचा कोमसाप उरणचा मधुबन कट्टा प्रेरणास्थान - नागेंद्र म्हात्रे 

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : साहित्यिकांच्या आणि समाज सेवकांच्या कार्याचा गौरव करून सतत साडे दहा वर्षे कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप )मधुबन कट्ट्यावर नवोदितांना प्रेरणा देण्याचे कार्य अभिनंदनीय आहे,असे विचार कोमनादेवी संस्थेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी अध्यक्षीय भाषणात विचार मांडले. ते कट्ट्याच्या १२७ व्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील, चंद्रकांत मुकादम,प्रकाश म्हात्रे,बाजी घरत,भुवनेश पाटील,दत्ता निळवर्ण, रमाकांत घरत, अनंत पाटील,सुरेश गायकवाड ,मिना बिस्ट,श्रुती म्हात्रे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समाजसेवक रमाकांत जयराम घरत, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र म्हात्रे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पत्रकार विठ्ठल ममताबदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ता विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, मधुबनचे अध्यक्ष राम म्हात्रे,सचिव अजय शिवकर, केंद्रीय सचिव संजय होळकर यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.सूत्रसंचालन
शिवप्रताप पंडित यांनी केले. 

या प्रसंगी "सागर किनारा "या विषयावर कविसंमेलन घेण्यात आले, त्यावेळी बालकवी अनुप शिवकर, भरत पाटील,अनिल भोईर, संपदा ठाकूर, संजीव पाटील, न.ग. पाटील, मारुती तांबे, नामदेव पाटील अजय शिवकर, भालचंद्र म्हात्रे, संग्राम तोगरे, सुरेश मेस्त्री इ.१६ कवींनी कविता सादर केल्या.होळकर संजय यांनी आभार मानले

द्रोणागिरीत सकल हिंदू समाजच्या वतीने विराट हिंदूं संमेलन ; 'विराट हिंदू संमेलनात’ हजारो हिंदूंची ऐतिहासिक उपस्थिती !

द्रोणागिरीत सकल हिंदू समाजच्या वतीने विराट हिंदूं संमेलन ; 'विराट हिंदू संमेलनात’ हजारो हिंदूंची ऐतिहासिक उपस्थिती !

🙏🙏 'जय श्रीराम'च्या घोषणांनी परिसर दणाणला! 

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
हिंदू धर्मा विषयी जनजागृती व्हावी, हिंदू धर्मातील व्यक्ती, नागरिकांनी एकत्र यावे, हिंदू समाजाचे मजबूत संघटन उभे राहावे या दृष्टीकोणातून तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभर हिंदू संमेलनांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, सकल हिंदू समाज द्रोणागिरी उरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 'विराट हिंदू संमेलन' प्रचंड जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाले. १७ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजता, सेक्टर ५०, द्रोणागिरी येथील देवकृपा सोसायटीसमोर हा भव्य सोहळा पार पडला. या संमेलनाला द्रोणागिरी आणि उरण परिसरातील हिंदू समाज अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होता.
      या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले म्हणजे यात कोणताही राजकीय पक्ष किंवा मान-सन्मान हा विषय नव्हता. कोणत्याही राजकीय हेतू अजंठा बाजूला ठेवून केवळ आणि केवळ हिंदू धर्माबद्दल कमालीचा आदर आणि धर्माप्रती असलेली निष्ठा जपण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जे या संमेलनाचे सर्वात मोठे यश ठरले.

     कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेच्या भव्य दिंडी सोहळ्याने झाली. या दिंडीसोबत सुरू असलेला हरिपाठ, अभंगांचे सूर  आणि हातात घेतलेले भगवे झेंडे यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय  झाले होते. या दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण द्रोणागिरी मध्ये एक अभूतपूर्व भगवे चैतन्य निर्माण झाले होते. दिंडी परतल्यानंतर व्यासपीठावर राम भक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम बालचमूंनी सादर केले. शंख वादन गणेश वंदनेने उपस्थितांची  मने जिंकली. "जय श्रीराम""गर्व से कहो हम हिंदू है_" छत्रपती शिवाजी महाराज की जय" आणि "छत्रपती संभाजी महाराज की जय" या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण द्रोणागिरी परिसर दणाणून गेला होता. या कार्यक्रमात डॉ निवेदिता भदाणे यांनी सादर केलेला अप्रतिम कथक नृत्य आविष्कार सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. 

    संमेलनात उपस्थित प्रमुख वक्त्यांनी सनातन हिंदू धर्मावर आणि सद्यस्थितीवर प्रखर विचार मांडले. रमेश यादव महाराज यांनी सनातन हिंदू धर्म विषयी प्रखर विचार मांडले तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातील रचनेचा दाखला देत त्यांनी उपस्थित त्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले महामंडलेश्वर रामकृष्ण सरस्वती महाराज यांनी हिंदू धर्माला वाचवण्यासाठी हिंदूंनी काय करावे लागेल यावर सखोल प्रकाश टाकला परप्रांतीयांचा आपल्या हिंदु राष्ट्रात वाढणारा वावर आणि त्याचे होणारे परिणाम यावर त्यांनी आपले अत्यंत घनाघाती विचार मांडले राजेश कुंटे धर्म जागरण प्रमुख कोकण प्रांत यांनी अत्यंत समावेशक मुद्दे मांडले हिंदू धर्म संस्कृती आणि पर्यावरण यांचा कसा कनिष्ठ संबंध यावर अभ्यासपूर्ण आणि अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले. 

    या ऐतिहासिक संमेलनाला उपस्थित राहिलेल्या सर्व हिंदू बांधवांसाठी आयोजकांच्या वतीने स्वागत पेय आणि महाप्रसादाची अत्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली या भूतपूर्व सोहळ्यांनी द्रोनागिरी परिसरातील प्रत्येक हिंदूंच्या रोमा रोमात असताना तर हिंदू धर्माबद्दलचा कमानीचा गर्व जागा केला हातवे वेळी कार्यक्रम नव्हता तर हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या ज्या अस्मितेसाठी पेटलेली एक वजन होती हिंदू ने आपल्या अस्तित्वासाठी सुरक्षेसाठी हिंदू राष्ट्राच्या कल्पनेसाठी एकजूट करून हिंदू धर्मावर येणारे प्रत्येक संकट परतवून लावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असा संदेश या विराट संमेलनातून संपूर्ण देशभर गेला. आयोजकांकडून आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आतिश पाटील यांनी केले होते.एकंदरीत  विराट हिंदू संमेलन मोठया उत्साहात संपन्न झाले.

जेएनपीएचे चेअरमन गौरव दयाळ यांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

जेएनपीएचे चेअरमन गौरव दयाळ यांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : आशिया खंडातील सर्वात मोठे बंदर असलेले उरण येथील सुप्रसिध्द जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण या बंदराचे (जेएनपीए) चेअरमन म्हणून गौरव दयाळ यांची नियुक्ती झालेली आहे. गौरव दयाळ हे २००४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करतात. त्यामुळे जेएनपीएचे चेअरमन गौरव दयाळ यांची नुकतीच भेट घेऊन महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधून जेएनपीएतील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधण्यात आला. यावेळी किरीट पाटील आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !!

मोहने परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रिक्षा युनियन आक्रमक !! *रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचा विळखा; नागरिक आणि रिक्षाचालक त्रस्त* ...