Tuesday, 23 June 2026

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !!

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !!

संग्रहित फोटो - (वाळू तस्करी करताना डंपर मध्ये "जेसीबी"यंत्राच्या सहाय्याने वाळू भरताना)

भिवंडी, दिं, २३जून२०२६, अरुण पाटील (कोपर) :

भिवंडी तालुक्यातून शनिवार, रविवार या साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर खुलेआम बेकायदेशीर रित्या रेती बंदर येथून वाळू, व दगड खाणीतून दगड ,मातीची/ मुरुमाची रॉयल्टी "न "(स्वामित्व धन) भरता चोरून चोरटी वाहतूक होत असून या बाबतची माहिती काही महसूल व पोलीस अधिकार्यांना असून देखील कारवाई करत नसल्याने या मुळे शासनाचे या सुट्टीच्या दिवशी लाखो रुपयांचे महसूल बुडत असून याला जबाबदार असणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांन कडून बोलले जात आहे. 

सविस्तर वृत्त असे आहे कि, भिवंडी तहसीलदार अधिकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दगड, माती खाणी आहेत. या खाण पट्ट्यातून दररोज हजारो ब्रास दगड, माती व मुरुम उत्खनन होत आहे. या पैकी काही ठिकाणी रॉयल्टी "न" (स्वामित्व धन) भरता बेकायदेशीर रित्या उत्खनन करून त्याची बेकायदेशीरपणे चोरटी वाहतूक होत असून या पैकी बहुतांश भाग हा "तालुका पोलिस" ठाणे व "नारपोली पोलिस" ठाण्याच्या हद्दीत येत आहे.

तसेच या तालुक्याला  मोठा खाडी किनारा लाभला आहे. त्या पैकी मंडळ अधिकारी - खारबाव यांच्या कार्य क्षेत्रातील केवणी रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, कशेळी रेती बंदर व खारबाव खाडी या ठिकाणावरून वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पैकी तलाठी सजा कोपर/ केवणी यांच्या अधिकारात येत असलेल्या केवणी रेती बंदर या ठिकाणावरून प्रतिबंध असलेल्या सक्शन पंपाद्वारे उत्खनन केलेली वळूची सर्वात जास्त तस्करी/चोरी व चोरटी वाहतूक होत असून ही वाहतूक "तालुका पोलिस" ठाणे व "नारपोली पोलीस" ठाणे यांच्या हद्दीतून होत आहे. 

तसेच अंजुर खाडी, कोन गाव रेती बंदर व इतर  खाडी पत्रातून देखील दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर  बेकायदेशीर रित्या सक्शन पंपा द्वारे वाळू उत्खनन होत आहे. व नंतर ही वाळू येथील वाळू माफिया हे काही महसूल अधिकारी, काही पोलिस अधिकारी यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करून शासनाची रॉयल्टी "न"(स्वामित्व धन) भरता  चोरटी वाहतूक करत आहेत. त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणारे वाळू व दगड, माती माफिया हे तर गब्बर झालेच आहेत त्यांच्या बरोबरच काही पोलिस व महसूल अधिकारी देखील गब्बर झाले आहेत. 

मुख्य म्हणजे शानीवार, रविवार या साप्ताहिक व ईतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी  दिवस व रात्र खुले आम  मोठ्या प्रमाणावर चोरटी "गौण खनिज" वाहतुक सुरू असते त्यामुळे शासनाचे महसूल रूपाने या दिवसात लाखो/करोडो रुपयांचे महसूल बुडत आहे.त्यामुळे या बाबत वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन नागरिकान कडून होत आहे. 

या वाळू तस्करांची/चोरांची दहशत इतकी आहे की,यांना पोलिस प्रशासन व महसूल विभागातील काही अधिकारी घाबरत असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही. त्यामुळे सर्व सामान्य स्थानिक नागरिकही यांच्या विरोधात तक्रार देण्यास घाबरतात.जर कारवाई करायची असेल तर "तालुका पोलीस" ठाणे भिवंडी व महसूल खाते भिवंडी यांनी केवणी रेती बंदर येथे संध्याकाळी ७ वा. ते सकाळी ७ वाजे दरम्यान हायवा डंपरमध्ये "जेसीबी" यंत्राद्वारे वाळू भरणाऱ्या वाळू तस्करांवर छापा टाकून त्यांच्यावर कारवाई  करून यंत्र सामुग्री जप्त कारूनच दाखवावी असे आवाहन येथील स्थानिक नागरिकांनी या दोन्ही प्रशासनाला केले आहे. 

जर यदा कदाचित कारवाई झालीच तर ती येथील सक्शन पंपावर व बार्ज वर काम करणाऱ्या गरीब कामगारावरच करण्यात आल्याचे येथील ग्रामस्थ बोलत आहे. त्यामुळं आता वारंवार चोरीचा गुन्हा करून वारंवार वाळू तस्करी व चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर वाहन चालकांवर जर कायद्यात तरतूद असेल तर त्यांच्यावर "मकोका"(महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा)अंतर्गत गुन्हा दाखल करावा व हायवा डंपर व वाळू भरून देणाऱ्या "जेसीबी" यंत्र जप्त करावेत असे सर्व सामन्यांचे मत आहे. 

त्यामुळे आता केवणी रेती बंदर येथून वाळू तस्करी करणारे केवणी व दिवे गावचे वाळू तस्कर कोण? यांची गोपनीय शोध मोहीम आता वरिष्ठ कार्यालया मार्फत सुरू झाली असून यात आरोप सिद्ध झाल्यास तस्करांवर "मकोका" (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागणार असल्याचे गोपनीय सूत्रांकडून समजले आहे.

Monday, 22 June 2026

योगातून निरोगी जीवनाचा संदेश : उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !!

योगातून निरोगी जीवनाचा संदेश : उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक २० जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षित योगतज्ज्ञ श्रीमती रुपाली नाईक आणि प्रा. डॉ. महेंद्र घरत यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्याचा इतिहास, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच सूर्यनमस्कार यांचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करत प्रत्येक आसनाचा आपल्या शरीरावर त्याचा कसा फायदा होतो या बद्दल संक्षिप्त माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली. प्रशिक्षकांनी योग्य सराव सुनिश्चित करण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिले.

या कार्यक्रमात इयत्ता बारावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमास प्राचार्या श्रीमती चित्रा ठाकूर, उपप्राचार्या श्रीमती कुसुम नाईक, श्रीमती हेमा पाटील, उपप्राचार्य श्री रमेश पाटील, समन्वयक कल्पना राऊत
सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. स्वाती जयकर, डॉ. महादेव दिनकर तसेच विविध विभागांतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

योग ही केवळ व्यायामपद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आरोग्यदायी भविष्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर तसेच संस्थेच्या सर्व विश्वस्तांचे मोलाचे सहकार्य लाभले. योगाच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी*

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी*

*बदलापूर, दि. २१, प्रतिनिधी* : वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाड गावाजवळ रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. टिटवाळा दिशेकडून बदलापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटली. या अपघात एक पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे.

*२५१ किमी वेगाने कार, चुराडा*  
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात पहाटे सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान घडला. रस्ता मोकळा असल्याने बीएमडब्ल्यू कार तब्बल २५१ किमी प्रतितास वेगाने धावत होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर आदळली. धडकेची तीव्रता इतकी होती की बीएमडब्ल्यू कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघातानंतर वाहनाचे सुटे भाग आणि मृत व्यक्तींच्या अवयवांचे तुकडे रस्त्यावर दूरपर्यंत विखुरले होते, असे घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनी सांगितले. कारच्या धडकेचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

Sunday, 21 June 2026

रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांचे अवैध व अमली पदार्थच्या तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!

रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांचे अवैध व अमली पदार्थच्या तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!

** कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा प्रशासनाचा इशारा.

उरण, (विठ्ठल ममताबादे) : जेएनपीटी बंदरातून होणारी अवैध ई-सिगारेट, अमली पदार्थ व इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा दि. २५ जुलै २०२६ रोजी जेएनपीटी बंदरावर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा पत्रव्यवहाराद्वारे रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सुद्धा दिले आहे.जेएनपीटी बंदरातून होणारी अवैध ई-सिगारेट, अमली पदार्थ व इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी रोखून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस अधीक्षक रायगड, जेएनपीए अध्यक्ष,सीमा शुल्क आयुक्त न्हावा शेवा,महसूल गुप्तचर संचालनालय या ठिकाणी सुद्धा पत्रव्यवहार केला आहे.

समाधान म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की रायगड जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमली पदार्थाचे सेवन, खरेदी-विक्री, रेव्ह पार्टी आणि विविध प्रकारच्या व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे युवक, विद्यार्थी आणि नव्या पिढीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून समाजासमोर गंभीर सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अलीकडेच प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू बंदर) येथे फर्निचरच्या नावाखाली आयात करण्यात आलेल्या कंटेनरमधून तब्बल ९२.८० कोटी रुपये किंमतीच्या सुमारे १.१६ लाख प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक सिगारेट (व्हेप्स) जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) व सीमाशुल्क विभागाने केली असल्याचे वृत्तात नमूद आहे. फर्निचर असल्याचे घोषित केलेल्या मालामध्ये ई-सिगारेट लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ही घटना अत्यंत गंभीर असून बंदरातून अवैध माल देशात कसा प्रवेश करतो, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर तस्करीचा प्रयत्न होत असताना संबंधित व्यापारी, आयातदार, क्लिअरिंग एजंट, बंदरातील अधिकारी व इतर संबंधित घटकांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच अशा मालाला परवानगी देणारे किंवा दुर्लक्ष करणारे अधिकारी यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्या संपत्तीची व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी समाधान म्हात्रे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास अथवा तस्करी करणाऱ्या संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र  पवार पक्षाचे रायगड युवक जिल्हाध्यक्ष समाधान म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे

जय जवान क्रीडा मैदान कचऱ्याच्या विळख्यात; मनपा एन विभाग घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !!

जय जवान क्रीडा मैदान कचऱ्याच्या विळख्यात; मनपा एन विभाग घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !!

घाटकोपर,(केतन भोज) : प्रभाग क्र.१२३ रामनगर ब मायकल डिसोजा चाळीच्या वरील बाजूस डोंगराळ भागात जय जवान क्रीडा मैदान हे परिसरातील मुलांसाठी उपलब्ध असलेले एकमेव मैदान असून, सध्या ते कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, मैदानाच्या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागांतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या वस्ती स्वच्छता योजना आणि डीप क्लिनिंग ड्राईव्ह योजनेची कामे प्रभावीपणे होत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रविण धुमाळ यांचा असा आरोप आहे की,मनपा एन विभाग संबंधित घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे मैदानाचे स्वरूप आता क्रीडांगणा ऐवजी डम्पिंग ग्राऊंडसारखे झाले आहे. मैदानाच्या विविध भागांत कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक, बांधकामातील अवशेष आणि इतर घनकचरा मोठ्या प्रमाणावर साचला असून खेळाडू आणि नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, रामनगर आणि आसपासच्या डोंगराळ परिसरात मुलांना खेळण्यासाठी पर्यायी मैदान उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत या एकमेव मैदानाची ही अवस्था झाल्याने मुलांच्या शारीरिक विकासावर आणि क्रीडा संस्कृतीवर विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे मैदानाची तात्काळ स्वच्छता करून नियमित डीप क्लिनिंग ड्राइव्ह तसेच वस्ती स्वच्छता योजना मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. 

"एकीकडे मनपा प्रशासनाकडून खेळांना प्रोत्साहन देण्याच्या घोषणा केल्या जातात,तर दुसरीकडे मुलांसाठी उपलब्ध असलेले एकमेव मैदान कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबले जात आहे. अखेर स्थानिक मुलांनी खेळायचे कुठे?" असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

*कल्याण, प्रतिनिधी* : कल्याण पूर्व आणि श्री मलंग विभागातील वीजपुरवठा, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व तक्रारींबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कल्याण पूर्वच्या भाजपाच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी पावसाळ्यात अखंड वीजपुरवठा आणि भविष्यातील वीज प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत कल्याण पूर्वमधील प्रस्तावित स्विचिंग स्टेशन, RDSS योजनेअंतर्गत नवीन वीज प्रकल्प, विविध भागांतील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण, स्मार्ट सोलर योजना आणि पावसाळ्यात खंडित होणारा वीजपुरवठा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. वारंवार होणारे बिघाड, ट्रान्सफॉर्मरचे ओव्हरलोडिंग आणि गळतीच्या तक्रारींवर तातडीने उपाय करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

कल्याण पूर्वमधील नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची बांधिलकी यावेळी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी स्थानिक यंत्रणेशी समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.

यावेळी MSEDCL चे मुख्य अभियंता श्री. जगदीश बोडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सुनील राठोड आणि उपकार्यकारी अभियंता श्री. अमोल चौधरी उपस्थित होते.

Saturday, 20 June 2026

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून यलो अलर्ट !

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून यलो अलर्ट !

*मुंबई, प्रतिनिधी 

सोमवारपासून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवत या तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

*पावसाचा अंदाज*  
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत किनारपट्टीच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार सरी पडतील. सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्र खवळण्याची शक्यता आहे.

*यलो अलर्ट म्हणजे काय*  
यलो अलर्ट म्हणजे हवामान विभागाने दिलेला 'सतर्क राहा' इशारा आहे. यामध्ये हलका ते मध्यम पाऊस, विजा व सोसाट्याचे वारे अपेक्षित असतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

*प्रशासन सज्ज*  
मुंबई महापालिका, ठाणे व रायगड जिल्हा प्रशासनाने पावसाळी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. निचऱ्या भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पंपिंग स्टेशन व आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. समुद्रकिनारी जाणे टाळावे व झाडाखाली थांबू नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

पुढील 48 तासांत पावसाच्या तीव्रतेनुसार अलर्टमध्ये बदल होऊ शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !!

शनिवार ,रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खुलेआम होते बेकायदेशीर "गौण खनिज"ची चोरटी वाहतूक !! संग्रहित फोटो - (वाळू तस...