Sunday, 5 July 2026

रामनगर ट्रान्झिट कॅम्प येथे वडाचे विशाल झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली !!

रामनगर ट्रान्झिट कॅम्प येथे वडाचे विशाल झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली !!

घाटकोपर, (केतन भोज) : सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाटकोपर (पश्चिम) येथील रामनगर अ ट्रान्झिट कॅम्प परिसरात रविवारी वडाचे मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.रामनगर 'अ' हा परिसर मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.झाड कोसळण्याच्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.मात्र,सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मुके आणि करण इंगवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.तसेच त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागाला घटनेची माहिती देत झाड हटविण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.या घटनेमुळे परिसरातील रहदारी व वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Saturday, 4 July 2026

मुसळधार पावसामुळे उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन जलमय ; रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांचा तीव्र संताप !!

मुसळधार पावसामुळे उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन जलमय ;  रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांचा तीव्र संताप !!

उरण, दि. ३ , (विठ्ठल ममताबादे) :: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि ढिसाळ नियोजनाचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

स्टेशन परिसरातील जिने, पायऱ्या आणि प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने रेल्वे प्रशासनाचा कारभार केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

उरण परिसरात रेड अलर्ट असतानाही स्टेशन परिसरात पाणी साचण्याची समस्या कायम राहिल्याने प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असताना कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेशी सर्रास खेळ केला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, हजारो प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करत असताना त्यांच्या जीविताची कोणतीही पर्वा नसल्याचे चित्र दिसत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत रेल्वेत चढावे लागत असून, एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला तातडीने जागे होण्याचे आवाहन करत स्टेशन परिसरातील पाणी निचऱ्याची सक्षम व्यवस्था करावी, दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई - आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई - आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

रक्तसाठ्याच्या अद्ययावत माहितीचा मुद्दा विधिमंडळात; आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष 

उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्यातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी सर्व रक्तपेढ्यांनी त्यांच्या रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असतानाही काही रक्तपेढ्यांकडून ही माहिती वेळेवर अद्ययावत केली जात नसल्याचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित करत या महत्वाच्या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. 

      या प्रश्नात मालेगाव शहरातील मालेगाव रक्तपेढी, सेवा रक्तपेढी, अन्सार रक्तपेढी, सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी तसेच मुंबईतील शासकीय रक्तपेढी आणि सर जे. जे., सेंट जॉर्ज, केईएम, सायन, नायर व राजावाडी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा अपुरा पडत असल्याने थॅलेसेमिया रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे अनेक रुग्णांना स्वखर्चाने खासगी रक्तपेढ्यांकडे जावे लागत असल्याची बाबही त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणली.  

         या प्रश्नाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, राज्यातील काही रक्तकेंद्रांकडून रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत केली जात नसल्याचे अंशतः खरे आहे. मात्र, या कारणामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक रक्त मिळण्यात अडचणी आल्याची कोणतीही तक्रार राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्राप्त झालेली नाही. मालेगाव (जि. नाशिक) येथील मालेगाव रक्तपेढी, सेवा रक्तपेढी, अन्सार रक्तपेढी, सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी तसेच मुंबईतील शासकीय रक्तपेढी, सर जे. जे., सेंट जॉर्ज, केईएम, सायन, नायर आणि राजावाडी रुग्णालयांमधील रक्तसाठ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत मुंबई व नाशिक जिल्ह्यातील संबंधित रक्तकेंद्रांमध्ये एकूण २५,३३४ युनिट रक्तसाठा उपलब्ध होता. त्यापैकी २४,४४६ युनिट रक्ताचा वापर करण्यात आला असून आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करण्यात आला आहे. थॅलेसेमिया रुग्णांना रक्त उपलब्धतेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र शासनाच्या १२ फेब्रुवारी २०१४ च्या निर्देशांनुसार तसेच राज्य शासनाच्या १८ जून २०१४ च्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व अशासकीय रक्तकेंद्रांनी थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. राज्यातील रक्तसाठ्याची रिअल-टाईम माहिती उपलब्ध राहावी यासाठी केंद्र शासनाच्या ई-रक्तकोष तसेच राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची माहिती नियमित अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध असून सर्व रक्तकेंद्रांकडून वेळेवर माहिती भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले. याशिवाय, रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर शासन निर्णय दिनांक २ डिसेंबर २०२० नुसार प्रति दिन एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार सन २०२५-२६ मध्ये एकूण ३२ लाख ६७ हजार रुपयांचा दंड संबंधित रक्तकेंद्रांवर आकारण्यात आल्याची माहितीही त्यांनी लेखी उत्तरात दिली

उरणमध्ये मुसळधार पाऊस; पूरपरिस्थितीत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर स्वतः रस्त्यावर, नागरिकांना दिली मोठी मदत !!

उरणमध्ये मुसळधार पाऊस; पूरपरिस्थितीत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर स्वतः रस्त्यावर, नागरिकांना दिली मोठी मदत !!

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात, शहरात सतत जोरदार पाऊस सुरु असून उरण शहरात आज झालेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता थेट मैदानात उतरून मदतकार्य सुरू केले आहे.

सत्र न्यायालय (सेशन कोर्ट) परिसर आणि उरणमधील इतर गंभीर पूरग्रस्त भागांमध्ये  भावनाताई घाणेकर यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला गती देणे, यासाठी त्या स्वतः जागोजागी धावपळ करताना दिसत आहेत.

नगराध्यक्षांच्या या धाडसी भूमिकेमुळे 'प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण ताकदीने नागरिकांच्या पाठीशी उभी असून, कोणीही घाबरून जाऊ नये,' असे आवाहन यावेळी नगराध्यक्षांनी केले आहे.

माननीय सुनील सिताराम उत्तेकर यांचा मुंबईत सत्कार सोहळा !

माननीय सुनील सिताराम उत्तेकर यांचा मुंबईत सत्कार सोहळा !
  
*शिवभक्त कोकण प्रतिष्ठान तर्फे समाजकार्याचा गुणगौरव*  

*मुंबई, दि. 4 जुलै 2026*

शिवभक्त कोकण प्रतिष्ठान संगमेश्वर तालुकातर्फे माननीय सुनील सिताराम उत्तेकर यांच्या समाजकार्याचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार दि. 5 जुलै 2026 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

*कार्यक्रमाची माहिती*  
हा सत्कार सोहळा दादर पश्चिम येथील सद्गुरू हॉल येथे सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय निलेश करंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होईल.

*सुनील उत्तेकर यांचे योगदान*  
शिवभक्त कोकण प्रतिष्ठान कोकणातील नमन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे. प्रतिष्ठानच्या सर्व नमन कलाकारांचा परदेश दौरा यशस्वी होण्यासाठी सुनील उत्तेकर यांनी सतत मार्गदर्शन आणि सहकार्य केले आहे. याच सहकार्याबद्दल संस्थेने त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे.

गेल्या 35 वर्षांपासून सुनील उत्तेकर कोकणातील रेल्वे वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. तसेच पर्यावरण रक्षणासाठी वालधुनी नदी स्वच्छता अभियान आणि वारकरी संप्रदायाच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत.

या सर्वांगीण सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय कार्याची दखल घेऊन शिवभक्त कोकण प्रतिष्ठानने सुनील उत्तेकर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय; बदलली ठाणे-पालघरची राजकीय समीकरणे !

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय; बदलली ठाणे-पालघरची राजकीय समीकरणे !

*दिग्गज पॅनलसमोर 'टायगर' एकटा लढला*  

    

*ठाणे, संदीप शेंडगे :

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या आणि राजकारणात नवी समीकरणे ठरविणाऱ्या ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने यंदा अनेक नवे राजकीय संदेश दिले आहेत. महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाच, शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांनी मात्र अपक्ष उमेदवार म्हणून दिलेल्या दमदार लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या निवडणुकीमुळे ठाणे-पालघरच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. 

या निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून पत्रकार परिषद घेत 'परिवर्तन पॅनल'ची घोषणा केली होती. तसेच बँकेचे माजी अध्यक्ष तथा मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बाबाजी पाटील हे देखील या पॅनलमध्ये संपूर्ण ताकदीनिशी सक्रिय होते. गणेश नाईक प्रत्यक्ष संयोजक नसले तरी या पॅनलमधील त्यांचा रस राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. 

सुरुवातीला भाजपच्या पुढाकारातून आमदार किसन कथोरे यांच्या पाठिंब्याने 'सहकार पॅनल' उभे राहिल्याची चर्चा होती. मात्र, महायुतीतील मतभेदानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पॅनलला पाठिंबा दिल्याने निवडणुकीत अधिक चुरस वाढली. या संपूर्ण प्रक्रियेत महायुतीतील अंतर्गत राजकारणही उघड झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याचे पहावयास मिळाले. 

एवढे असतानाही निलेश सांबरे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आरोग्य शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणे हा स्वभाव मतदारांना भावला तसेच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केलेली जनतेची सेवा कामी आली आणि त्यांचा विक्रमगड मधून बिनविरोध निवडून येण्याचा मान त्यांनी पटकावला. 

दरम्यान, गेल्या काही वर्षांत शिवसेनेत अनेक मोठे राजकीय नेते दाखल झाले. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधानपरिषदेच्या सभापतीपदाची संधी मिळाली, रवींद्र फाटक यांचीही योग्य दखल घेण्यात आली, तर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यासह अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. नुकत्याच राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत सहा खासदारांचा पक्षप्रवेशही चर्चेत राहिला. काही आमदारही शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाही शिवसेनेच्या उपनेतेपदावर असतानाही निलेश सांबरे यांना पक्षाने कोणतीही संधी उपलब्ध करून दिली नाही अनेक नेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले परंतु निलेश सांबरे यांना मात्र पक्षाने वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, याच काळात ठाणे, पालघर, रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा प्रभाव निर्माण करणारे शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांना मात्र शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आणि खदखद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. 

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या निलेश सांबरे यांनी केवळ विरोधकांवर टीका न करता, निवडून आल्यास बँकेसाठी काय करणार याचा ठोस आणि वास्तववादी आराखडा मतदारांसमोर मांडला. विशेषतः बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या प्रचारामुळे निवडणुकीत वेगळे वातावरण निर्माण झाले. 

इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघात त्यांनी प्रस्थापित उमेदवाराला कडवी झुंज देत अवघ्या शंभर मतांनी पराभव स्वीकारला, तर विक्रमगड तालुका सेवा संस्था मतदारसंघातून निर्विवाद विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. या निकालाने राजकीय विश्लेषकांचेही लक्ष वेधून घेतले. 

निलेश सांबरे यांचा जनाधार यापूर्वीही स्पष्ट झाला होता आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी तब्बल २ लाख ३१ हजार ४१७ मते मिळवली होती. त्या निवडणुकीत दोन वेळा खासदार राहिलेले कपिल पाटील यांचा ६५ हजार ६५७ मतांनी पराभव झाला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे विजयी झाले होते. कपिल पाटील यांच्या पराभवामागे निलेश सांबरे यांच्या मतविभाजनाचा मोठा प्रभाव असल्याचे विश्लेषण त्यावेळी करण्यात आले होते. तर कपिल पाटील यांच्या पराभव केवळ निलेश सांबरे यांच्या मुळेच झाला असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. 

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी ठाणे-पालघर परिसरात व्यापक सामाजिक कार्य उभे केले आहे. मोफत सीबीएसई शाळा, मोफत रुग्णालये, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे यांसारख्या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांपर्यंत ते पोहोचले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक युवक-युवती प्रशासकीय सेवेत आणि पोलीस दलात दाखल झाले असून, त्यामुळे त्यांच्याभोवती मोठा समर्थक वर्ग तयार झाला आहे. तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट) अडचणीच्या काळात पक्षप्रवेश करून शिवसेनेला ठाणे पालघर जिल्ह्यात मोठी ताकद मिळवून दिली होती. 

अशा प्रभावी सामाजिक आणि राजकीय कामगिरीनंतरही शिवसेनेच्या उपनेत्यालाच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते परिणामी, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून लढण्याची वेळ त्यांच्यावर आली. परंतु स्वतःवर असलेला विश्वास आणि जनतेची केलेली कामे पाहून जनता अधिकृत अनधिकृत पाहणार नाही केवळ विकासाला मध्ये या एकाच विश्वासाने निलेश सांबरे निवडणुकीला सामोरे गेले आणि अधिकृत उमेदवाराचा पराभव करून बिनविरोध निवडून गेले. 

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीत दोन्ही बाजूंना अनुभवी आणि मातब्बर राजकीय नेते असतानाही निलेश सांबरे यांनी दिलेली कडवी लढत ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेना सातत्याने ऑपरेशन टायगर राबवत आहे परंतु एकटा लढणाऱ्या या ठाणे पालघरच्या टायगर मात्र दुर्लक्षित होत चालला आहे 

या निवडणुकीने ठाणे आणि पालघरच्या राजकारणात नवे राजकीय संकेत दिले असून, पुढील काळात 'निलेश सांबरे फॅक्टर' अधिक प्रभावी ठरणार का, त्यामुळे ऑपरेशन टायगर राबवीत असताना आपला हा टायगर निसटून तर जाणार नाही ना याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
.

Friday, 3 July 2026

आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

** १०११ विद्यार्थ्यांचा सहभाग; स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवरील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat), कोल्हापूर तसेच प्रफुल्लित केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा परिचय व्हावा, भारतीय संविधानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी तसेच शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाला परिसरातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १०११ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून ज्ञान, कौशल्य व स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडविले.स्पर्धेची रचना स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा, ऑनलाइन परीक्षांचा अनुभव मिळावा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत गुणवत्तापूर्ण मूल्यमापन व्हावे, या दृष्टीने प्रश्नमंजुषेचे विशेष रचना करण्यात आली होती.

या ऑनलाइन परीक्षेचे एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा पूर्ण केल्यानंतर त्यांना तत्काळ निकाल, गुणपत्रिका,सहभागाचे प्रमाणपत्र, आंतर शालेय क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

स्पर्धेतील प्रत्येक सहभागी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या संबंधित शाळेत जाऊन पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभास मेरा युवा भारतचे सहाय्यक निलेश कांबळे, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील, अध्यक्षा तसेच महाराष्ट्र शासन जिल्हा युवती पुरस्कार विजेत्या डॉ.अल्फिया बागवान,संचालिका बिस्मिल्ला नदाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची ओळख करून देणे आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करणे या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

वृत्त - डॉ प्रफुल्ल पाटील 

रामनगर ट्रान्झिट कॅम्प येथे वडाचे विशाल झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली !!

रामनगर ट्रान्झिट कॅम्प येथे वडाचे विशाल झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली !! घाटकोपर, (केतन भोज) : सतत सुरू असलेल्या पावसामुळे...