Thursday, 13 August 2026

*धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला पुन्हा टाळे; निवासी नागरिक वैतागले, 26 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा !!

*धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला पुन्हा टाळे; निवासी नागरिक वैतागले, 26 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा !!

*डोंबिवली, दि. 13 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील केडीएमसीच्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला गेल्या वर्षभरात वारंवार टाळे लावून बंद ठेवले जात असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. येथील नागरिक धर्मवीर आनंद दिघे यांचे नुसते नाव घेऊन सध्याच्या राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी आतातरी थोडी लाज बाळगत या उद्यानावर लक्ष द्यावे असे म्हणत आहेत तसेच हे उद्यान तातडीने नियमितपणे सुरू न केल्यास 26 ऑगस्टला धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25 व्या पुण्यतिथीला उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी दिला आहे. 

*उद्यानाचा इतिहास*  
धर्मवीर आनंद दिघे उद्यानाची उभारणी 2002 साली तत्कालीन शिवसेना नगरसेवक श्री. भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून झाली होती. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार श्री. राजू पाटील यांनी सुशोभीकरणासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी दिला होता. यात जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांची खेळणी आणि विविध झाडे लावण्यात आली होती. केडीएमसीने यासाठी एक कंत्राटी सुरक्षा रक्षकही नेमला होता.

*गेल्या वर्षभरापासून बंदची समस्या*  
गेल्या वर्षभरापासून सुरक्षा रक्षकाचा ठेका संपल्याने उद्यान सकाळ-संध्याकाळ उघडले जात नव्हते. मध्यंतरी काही दिवस स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जबाबदारीवर उद्यान सुरू ठेवले. मात्र साफसफाई, झाडांना पाणी न मिळाल्याने आणि उद्यानात प्रेमी युगल व नशेखोर व्यक्तींचा वावर वाढल्याने पुन्हा उद्यान बंद करण्यात आले. त्यामुळे बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांना फटका बसत आहे.

*आश्वासनानंतरही परिस्थिती जैसे थे*  
काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियावर उद्यानात सुरक्षा रक्षक नेमल्याचे पत्र आणि फोटो शेअर केले होते. त्यामुळे उद्यान आता नियमित सुरू राहील अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा उद्यान बंद असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे.

*नागरिकांच्या प्रमुख मागण्या*
1. उद्यान दररोज सकाळ आणि संध्याकाळ नियमित वेळेत सुरू ठेवावे
2. उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ दर्शवणारा फलक प्रवेशद्वारावर लावावा
3. उद्यानातील वाढलेले गवत आणि झाडी झुडपे कापून साफसफाई करावी
4. कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी

*26 ऑगस्टला आंदोलन*  
उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे, शाखाप्रमुख सागर पाटील, महिला आघाडी विभाग संघटक सौ. रजनी कुचे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी विभाग प्रमुख राजू नलावडे आणि असंख्य शिवसैनिक 26 ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25 व्या पुण्यतिथी दिवशी उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहून त्यानंतर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात इतर स्थानिक सामाजिक संघटना आणि नागरिकही सहभागी होणार आहेत.

वृत्त - समाजसेवक राजू नलावडे (डोंबिवली)

Wednesday, 12 August 2026

राष्ट्रीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न !!

राष्ट्रीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न !!

चाळीसगाव (प्रतिनिधी) :

स्थानिक राष्ट्रीय महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून डेंग्यू, कीटकजन्य व जलजन्य आजार तसेच एच.आय.व्ही./एड्स आणि कुष्ठरोग जनजागृतीपर आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले.

सहायक संचालक हिवताप _ नाशिक डॉ.विवेक खतगावकर,
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार तसेच नगर परिषद मुख्याधिकारी हनुमंत बांगर व हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील समुपदेशक (कौन्सेलर) नामदेव अहिरे, LSO सचिन महाले, दीपक ठाकरे, चंद्रकांत चौधरी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे व उपाय, जलजन्य व साथीच्या आजारांपासून घ्यावयाची काळजी, तसेच एच.आय.व्ही. एड्स आणि कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परिसरातील विद्यार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

झेंडावंदनाचा 'भादाणे पॅटर्न' ठरतोय देशपातळीवर आदर्श; विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर चर्चेत !!

झेंडावंदनाचा 'भादाणे पॅटर्न' ठरतोय देशपातळीवर आदर्श; विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर चर्चेत !!

.               भादाणे गावाचे मा. सरपंच श्री संजय हांडोरे पाटील 

*ठाणे, प्रतिनिधी :

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे यावरून अनेक ठिकाणी वाद होतात. मात्र ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावाने यावर क्रांतिकारी तोडगा काढला आहे. गावात राबवला जाणारा 'भादाणे पॅटर्न' आता महाराष्ट्राबाहेरही आदर्श म्हणून पाहिला जात असून सामाजिक संघटनांकडून हा राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

*काय आहे 'भादाणे पॅटर्न'?*  
ऑगस्ट 2015 मध्ये भादाणे गावातील जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीने ऐतिहासिक ठराव मंजूर केला. त्यानुसार शाळेतील ध्वजारोहणाचा पारंपारिक अधिकार लोकप्रतिनिधी किंवा सरपंचांऐवजी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आला.

नियम पुढीलप्रमाणे:
- *इयत्ता 10 वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण*
- *इयत्ता 12 वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण*  
हे ध्वजारोहण विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांसोबत केले जाते.

भादाणे गावाचे माजी सरपंच आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. संजय हंडोरे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि तत्कालीन मुख्याध्यापक राजाराम कंटे सर यांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू झाला.

*परराज्यातही गाजला भादाणे पॅटर्न*  
या अनोख्या उपक्रमाची दखल थेट उत्तर प्रदेशमध्येही घेण्यात आली. उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री मा. आशिष पटेल यांनी 4 फेब्रुवारी 2024 रोजी लखनौ येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात 'भादाणे पॅटर्न'चे जाहीर कौतुक केले. यावेळी या संकल्पनेचे जनक संजय हंडोरे पाटील यांचा सन्मानही करण्यात आला.

ठाणे जिल्हा परिषदेनेही सर्वसाधारण सभेत या निर्णयाचे कौतुक करून हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा अशी विनंती राज्य शासनाकडे केली आहे.

*गावात उमटले सकारात्मक पडसाद*
1. *गुणवत्तेत वाढ*: ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे.
2. *वादाला पूर्णविराम*: ध्वजारोहण कोण करणार यावरून होणारे राजकीय वाद थांबले आहेत.
3. *निकोप स्पर्धा*: परीक्षेत प्रथम येण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे.
4. *पालकांचा सन्मान*: गुणवंत मुलांमुळे आई-वडिलांना जाहीर व्यासपीठावर मान मिळत आहे.
5. *आत्मविश्वास*: ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढला आहे.

देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय असल्याने विविध सामाजिक संघटनांकडून हा पॅटर्न राज्यातील आणि देशातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये बंधनकारक करावा अशी आग्रही मागणी शासनाकडे केली जात आहे. 

शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख श्री. काशिनाथ हिरु शेलवले यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tuesday, 11 August 2026

‘कनेक्टिंग लिंक’वर बुधवारी तीन तास वाहतूक बदल !

‘कनेक्टिंग लिंक’वर बुधवारी तीन तास वाहतूक बदल !

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’च्या पुणे ते मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत देखभाल-दुरुस्तीचे काम तसेच मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

वाहनचालकांनी नियोजित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीदरम्यान काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

2017/22 सालातील जीएसटी एमआयडीसी कडून वसुली ! उद्योजक, निवासी त्रस्त !!

2017/22 सालातील जीएसटी एमआयडीसी कडून वसुली ! उद्योजक, निवासी त्रस्त !!

           डोंबिवलीसह महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक, व्यापारी आणि निवासी मधील काही ग्राहकांना एमआयडीसी कडून नोटीस पाठवण्यात येत असून ज्यांनी भूखंडाचा विकास, हस्तांतरण व इतर सेवा या 01/07/2017 ते 04/09/2022 या मुदतीत घेतल्या असतील त्यांच्याकडून त्यावेळी न घेतलेली जीएसटी ही आता व्याज्यासहीत एमआयडीसी आता वसूल करीत असल्याचे दिसत आहे. साधारण ही अंदाजित रक्कम कमीतकमी रुपये 5000/- ते 90000/- (नव्वद हजार) एवढी येत असल्याचे माहिती पडत आहे. सर्व महाराष्ट्रातून यामुळे करोडो रुपये हे उद्योजकांना आणि निवासी, व्यापारी भुखंड धारकांना द्यावे लागणार आहेत.
       आपल्या देशात जीएसटी कर घेण्यास 1 जुलै 2017 पासून सुरवात झाली होती. हा कर एमआयडीसीने त्यावेळी भुखंड धारकांकडून घेतला गेला नाही. सरकारच्या जीएसटी खात्याने नोटीस द्वारे लक्षात आणून दिल्यावर एमआयडीसीने दिनांक 05/09/2022 पासून हा कर भुखंडधारकांकडून घेण्यास सुरुवात केली. यात भुखंड धारकांची काहीच चूक नव्हती. त्यांनी त्यावेळच्या लागणाऱ्या शुल्काप्रमाणे एमआयडीसीला रक्कम अदा केली होती. मात्र ही चूक एमआयडीसी आणि सरकारी प्रशासनाची असताना भुर्दंड मात्र भुखंड धारकांना बसला आहे. खरे तर त्यावेळी हा न घेतलेला कर प्रशासनाने आता माफ केला पाहिजे होता. शिवाय या जीएसटी रक्कमेवर भुखंड धारकांची काहीच चूक नसतांना व्याज लावले आहे.
           गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली एमआयडीसीच्या विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) कडून या नोटीसा पाणी बिलासोबत पाठविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटीस वर दिलेल्या तारखेनंतर एक महिन्यानंतर ही नोटीस मिळत असल्याने नागरिक संतापलेले आहेत. कारण हे पैसे भरण्यासाठी नोटीसमध्ये 30 दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे ही मुदत निघून गेलेली आहे. 
           साधारण मागील दीड दोन वर्षापूर्वी अशाच काही नोटीसा एमआयडीसी कडून पाठविण्यात आल्या होत्या. त्यावेळी डोंबिवली मधील काही निवासी भुखंडधारक, निवासी सोसायट्या आणि औद्योगिक संघटना यांनी हरकती घेऊन एमआयडीसीला पत्रे दिली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी माननीय उद्योगमंत्री याना विनंती केली होती. उद्योगमंत्र्यानी पण यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. आता हा प्रश्न पुन्हा एमआयडीसी नोटिसाने उपस्थित झाला असून स्थानिक लोकप्रतिनिधी हा प्रश्न आता कसा सोडविणार की मंत्र्यांच्या आश्वासनावर बोळवण होणार हे पाहावे लागेल. 

वृत्त - समाजसेवक राजू नलावडे (डोंबिवली)

कवयित्री, लेखिका सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांना विशेष गौरव पुरस्कार !!

कवयित्री, लेखिका सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांना विशेष गौरव पुरस्कार !!

शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीच्या संचालिका सन्माननीय उषा शिलवंत घोडेस्वार यांना मनाचे खेळ सायकॉलॉजी ३६५ विवर ऑफ दि मंथ विशेष गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले. 
          परिस फाऊंडेशन सांगली तर्फे आयोजित "मनाचे खेळ – सायकॉलॉजी 365" जुलै महिना या मानसशास्त्रीय मालिकेतील "विवर ऑफ दि मंथ" म्हणून सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांची निवड करण्यात आली. मानसशास्त्राविषयी ज्ञानार्जन, व्हिडिओ नियमित पाहणे, लाईक, कमेंट, शेअर करून सातत्यपूर्ण व सकारात्मक सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांना हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला आहे. सन्मानामध्ये "मनाचे खेळ – सायकॉलॉजी ३६५" पुस्तक (भेट स्वरूपात) प्रदान करण्यात आले. विवर ऑफ दि मंथ सन्मानपत्र तसेच परिस फाऊंडेशन कडून विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला.
       सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांच्या सकारात्मक सहभागामुळे, व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य जनजागृतीच्या कार्याला नवी प्रेरणा मिळत आहे. दररोज एक विचार... मनाला नवा दृष्टिकोन असा विचार ठेवून ही मानसशास्त्रीय मालिका सुरू आहे.
      परिस फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉ अजित पाटील सर व त्यांची संपूर्ण टीम तसेच आयोजक समिती यांच्या नेतृत्वाखाली हा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
          सामाजिक, साहित्यिक व मानसिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना हा विशेष गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत असते सर्वांच्या परीक्षणेतून या सन्मानाची अतिशय सुरळीतपणे निवड करण्यात आली.

Monday, 10 August 2026

ठाणे जिल्ह्याला दिलासा : बारवी धरण ओसंडून वाहू लागले; कल्याणसह परिसराचा पाणीप्रश्न सुटणार‌ !!

ठाणे जिल्ह्याला दिलासा : बारवी धरण ओसंडून वाहू लागले; कल्याणसह परिसराचा पाणीप्रश्न सुटणार‌ !!

*ठाणे, प्रतिनिधी* : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे पाणीपुरवठा स्रोत असलेले बारवी धरण अखेर ओसंडून वाहू लागले आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली आहे.

*पाणी पातळी 72.60 मीटरवर*  
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बारवी धरणाची पाणी पातळी ओसंडून वाहण्याच्या पातळीपर्यंत म्हणजेच 72.60 मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

*कल्याणच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर*  
बारवी धरण हा कल्याण, डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस कमी झाल्याने पाणीसाठ्याबाबत जी चिंता व्यक्त केली जात होती, ती आता दूर झाली आहे. धरण ओसंडून वाहू लागल्याने पुढील काही महिन्यांसाठी पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.

*प्रशासन सतर्क*  
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पडणाऱ्या पावसावर आणि धरणाच्या पाणी पातळीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.

धरण ओसंडून वाहू लागल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या टंचाईची शक्यता आता टळली असून जलसंपत्तीच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे.

*धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला पुन्हा टाळे; निवासी नागरिक वैतागले, 26 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा !!

*धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला पुन्हा टाळे; निवासी नागरिक वैतागले, 26 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा !! *डोंबिवली, दि. 13 ऑगस्ट 2026* डों...