Wednesday, 2 September 2026

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

*मुंबई, दि. २ सप्टेंबर २०२६*

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील आरोग्यविषयक माहितीचे केवळ संकलन न करता या माहितीचा वापर लोकहितासाठी व्हावा. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने काम करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच आरोग्य विभागाच्या तंत्रज्ञानाधारित आणि नागरिककेंद्री उपक्रमांचे कौतुक केले.

*डेटावर आधारित निर्णयांसाठी एकात्मिक डॅशबोर्ड*

- आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी ४० हून अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत.
- पोर्टलवरील महत्त्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे.
- डॅशबोर्डवर माता व बाल आरोग्य, क्षयरोग नियंत्रण, असंसर्गजन्य आजारांची तपासणी आदी कार्यक्रमांशी संबंधित प्रमुख निर्देशांकांचे राज्य तसेच जिल्हानिहाय विश्लेषण उपलब्ध होणार आहे.
- यामुळे आरोग्यविषयक आव्हाने तातडीने ओळखणे, जिल्हानिहाय कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि आवश्यक ठिकाणी परिणामकारक उपाययोजना करणे अधिक सुलभ होणार आहे.
- आरोग्यविषयक माहितीचे रूपांतर कृतीयोग्य डेटामध्ये होऊन प्रशासकीय निर्णय अधिक अचूक आणि गतिमान होणार आहेत.

*नागरिकांशी थेट संवादासाठी एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र*

- एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून ‘१०४’ कॉल सेंटरचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे.
- नागरिकांकडून येणाऱ्या दूरध्वनींसह आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या संपर्क कॉल्सचेही नियोजन केले जाणार आहे.
- अतिजोखमीच्या गर्भवती माता, प्रसूतीनंतरच्या माता, क्षयरुग्ण तसेच असंसर्गजन्य आजारांशी संबंधित नागरिकांचा पाठपुरावा केला जाणार आहे.
- रुग्णालयातील सेवांविषयी नागरिकांचे अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.
- केंद्रात दैनंदिन सुमारे एक हजार कॉल्स हाताळण्याची व्यवस्था असून प्रशिक्षित ऑपरेटर्स कार्यरत आहेत.
- गंभीर अथवा तातडीच्या प्रकरणांची माहिती संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना तत्काळ कळविण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

*आरोग्य संस्थांच्या गुणवत्तावाढीसाठी स्टार रेटिंग*

- राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या सेवांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्तावाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
- विशेष सेवांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, सुविधांची उपयुक्तता आणि रुग्णांचे अभिप्राय अशा विविध निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यमापन केले जाणार आहे.
- या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळणार आहे.
- नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीवर आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर तातडीने कार्यवाही करण्याची तसेच त्यानंतर नागरिकांशी संपर्क साधून सेवा मिळाल्याची खात्री करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

खराब रस्त्यांविरोधात मोहने-आंबिवली रिक्षाचालकांचे उद्या रिक्षा बंद आंदोलन. !!

खराब रस्त्यांविरोधात मोहने-आंबिवली रिक्षाचालकांचे उद्या रिक्षा बंद आंदोलन. !!

रिक्षा युनियन अध्यक्ष शिवाजी पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

मोहने येथे खराब रस्त्यांमुळे रिक्षातच महिलेची झाली प्रसूती

कल्याण : संदीप शेंडगे 

कल्याण : मोहने, आंबिवली आणि शहाड परिसरातील खड्डेमय व खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालक-मालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोहने-आंबिवली शहाड रिक्षाचालक-मालक संघटनेने उद्या 3 सप्टेंबर रोजी गुरुवारी रिक्षा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामुळे परिसरातील रिक्षा वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असून, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तयारीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मोहने, आंबिवली, शहाड परिसरातील अनेक रस्त्यांची गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या खड्ड्यांमधून दररोज रिक्षा चालवताना वाहनांचे नुकसान होत असून, रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे.

खड्ड्यांमुळे रिक्षातच महिलेची प्रसूती

खराब रस्त्यांच्या गंभीर परिणामाचे उदाहरण म्हणून मोहने परिसरात एका महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार रिक्षाचालकांनी समोर आणला आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण होत असल्याने नागरिकांच्या जीविताशी प्रशासन खेळत असल्याचा संताप रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे.

रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना या खराब रस्त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने अखेर रिक्षाचालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

प्रशासनाला शिवाजी पाटील यांचा इशारा

मोहने-आंबिवली-शहाड रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिक आणि रिक्षाचालकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

“रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. रिक्षा चालवताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी. अन्यथा रिक्षाचालकांचा संघर्ष आणखी तीव्र होईल,” असा इशारा शिवाजी पाटील यांनी दिला.

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला प्रवाशांची गैरसोय

दरम्यान, उद्या रिक्षा बंद आंदोलन होणार असल्याने श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. बाजारपेठा, वपरिसर तसेच इतर ठिकाणी खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असताना रिक्षा सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

रिक्षाचालकांच्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण होणार असला, तरी त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांवर होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रिक्षाचालकांच्या मागण्यांची दखल घेऊन रस्त्यांची पाहणी व दुरुस्तीची ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

खड्ड्यांमुळे रिक्षाचालक त्रस्त, प्रवासी हैराण आणि आता आंदोलनाचा इशारा; प्रशासन या समस्येवर कधी कायमस्वरूपी तोडगा काढणार, याकडे मोहने-आंबिवली परिसराचे लक्ष लागले आहे.

Tuesday, 1 September 2026

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन;अफवांवर ठेवू नये विश्वास !!

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन;अफवांवर ठेवू नये विश्वास !!

*प्रशासकीय नियंत्रण, मालकी व व्यवस्थापन शासनाकडेच; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्थेसोबत सामंजस्य करार

मुंबई प्रतिनिधी : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात आल्याच्या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नसून, ही माहिती गैरसमजातून प्रसारित झालेली असल्याचे आदिवासी विकास विभागाने स्पष्ट केले आहे. वसतिगृहांची मालकी, नियंत्रण आणि संपूर्ण प्रशासकीय कारभार शासनाकडेच असून, कोणत्याही खासगी संस्थेला वसतिगृहांच्या इमारती, मालमत्ता अथवा प्रशासकीय व्यवस्थापनाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत.

राज्यात आदिवासी विकास विभागाची ४९० शासकीय वसतिगृहे असून, त्यांची विद्यार्थी क्षमता ६५ हजार ८४ इतकी आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने नागपूर येथील कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचा कालावधी १५ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२८ असा तीन वर्षांचा आहे.

या करारानुसार संबंधित संस्था स्वयंप्रेरणेने आणि कोणताही मोबदला न घेता विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार आहे. यामध्ये उद्योजकता विकास कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक योजना व शिष्यवृत्तीची माहिती, विद्यार्थी विकास मेळावे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्पोकन इंग्लिश, व्यसनमुक्ती, आर्थिक साक्षरता, संविधान अभ्यास वर्ग, महापुरुष जयंती कार्यक्रम, विविध स्पर्धा, अभ्यास व निसर्ग पर्यटन सहली, सेवा शिक्षण उपक्रम, संस्था भेटी तसेच अनुसूचित जमातींसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देणे आदी १८ मोफत उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तसेच वसतिगृहांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी आवश्यक समन्वय आणि पाठपुरावा करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करणे, यासारखे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

या संस्थेचे सर्व उपक्रम संबंधित प्रकल्प अधिकारी आणि गृहपाल (वॉर्डन) यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली वसतिगृह परिसरातच आयोजित केले जाणार आहेत. मुलींच्या वसतिगृहांमध्ये केवळ महिला प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार असून, महिला गृहपालांच्या उपस्थितीतच संबंधित वर्ग व उपक्रम घेतले जाणार आहेत.

विद्यार्थी, पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

आदिवासी वसतिगृहांचे कोणतेही खासगीकरण झालेले नाही. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना मोफत व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी वसतिगृहांच्या खासगीकरणाबाबतच्या अफवा अथवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले आहे.

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात, तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास सुमारे ९३ सार्वजनिक आणि ४ हजार ५०० घरगुती गणेशोत्सव साजरे होणार असून यासाठी १९ गणेशघाटावर 'श्री, चे विसर्जन होणार आहे. या करिता ८६ अंमलदार, १० पोलीसअधिकारी, होमगार्ड, पोलीस पाटील हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु विसर्जन घाट, रस्त्यावरील खड्डे चिखल पाहता इतर विभागाचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात विशेष:ता मुंबई, ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, यावेळी पोलीस यंत्रणेवर प्रंचड ताण येतो, केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी ८० ते ९० कर्मचारी आहेत, अशातच आता गणेशोत्सव तोडांवर आला आहे, या पोलीस ठाण्यातंर्गत ९३ सार्वजनिक तर ४ हजार ५०० घरगुती गणेशाची स्थापना होणार आहे, बाप्पाच्या विसर्जनासाठी उल्हास, काळू, भातसा आणि बारवी नदीच्या काठावर तसेच काही ठिकाणी गाव तलावात विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत, असे १९ घाट आहेत, परंतु या घाटांची सध्याची परिस्थिती पाहिली तर हे विसर्जन घाटआहे की एखादे दलदल खाडी, अशी स्थिती दिसून येत आहे. काही ठिकाणी या घाटाच्या लाद्या तुटलेल्या, फुटलेल्या, उखडलेल्या दिसून येत आहेत, मागील काही वर्षाचा विचार केला तर गणेश विसर्जन दरम्यान अनेक गणेशभक्त बुडवून मरण पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत असेल अथवा महसूल विभाग असेल यांनी गणेशोत्सवापूर्वी या घाटांची दुरुस्ती, दिवाबत्ती ची सोय, जीवरक्षक नेमणे, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवणे, वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी उपाययोजना वेळीच केल्या तर यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकतो, यासाठी प्रशासनासह नागरिक व गणेश भक्तांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास ढगे यांनी केले आहे.

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांसाठी आठवडाभर मोफत रेबीज लसीकरण मोहीम !!

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांसाठी आठवडाभर मोफत रेबीज लसीकरण मोहीम !!

डोंबिवली, राजू नलावडे : रेबीजचा धोका कमी करण्यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी मोफत अँटी-रेबीज लसीकरण मोहीम डोंबिवलीत ६ ते १२ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. २८ सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येत असतो. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउनतर्फे या आठवडाभराच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्व व पश्चिमेसह रीजन्सी अनंतम/इस्टेट, पलावा आणि रुणवाल परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे.

या उपक्रमात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC), व्हेटरिनरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन, शाळा-महाविद्यालये, NSS पथके, पशुवैद्यकीय विद्यार्थी आणि प्राणीप्रेमी सहभागी होणार आहेत.

मोहिमेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी नागरिक आणि प्राणीप्रेमींनी आपल्या परिसरातील लसीकरण आवश्यक असलेल्या भटक्या कुत्र्यांची अंदाजे संख्या आयोजकांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे आठवडाभराचे दिवसनिहाय नियोजन करून जास्तीत जास्त कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

मोहिमेचे समन्वयक डॉ. मनोहर अकोले यांच्याशी ९८२१०४०३३७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. किशोर अढळकर आणि प्रकल्प प्रमुख श्री कल्पेश पाटील यांनी असे आवाहन केले आहे की, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे.

Monday, 31 August 2026

पत्रकाराला कथित धमकीप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया आक्रमक; अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट !

पत्रकाराला कथित धमकीप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडिया आक्रमक; अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट !

*संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन*

*ठाणे, दि. ३१ ऑगस्ट २०२६*

डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामगाराच्या मृत्यूशी संबंधित गंभीर प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारासोबत कथितरित्या अरेरावी, शिवीगाळ तसेच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून व्हॉईस ऑफ मीडियाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या प्रकरणी आज सोमवारी दुपारी व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची स्पष्ट भूमिका मांडली. पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकारी संजय जाधव यांनी दिल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

*काय आहे प्रकरण?*

कामगाराच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी आणि तपासातील महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळावी या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया सदस्य तथा ‘राष्ट्रभूमी भरारी’चे संपादक गौतम गवई हे रामनगर पोलीस ठाण्यात गेले होते.

तपासाबाबत माहिती घेण्यासाठी व काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी संबंधित तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांनी कथितरित्या अरेरावी व दादागिरीची भाषा वापरून शिवीगाळ केली, तसेच पत्रकाराविरोधात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पत्रकारांशी अशा प्रकारे गैरवर्तन होणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासाठी गंभीर बाब असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाने केली आहे.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व ठाणे जिल्हा सुप्रिमो गौतम वाघ, महाराष्ट्र राज्य सहसंघटक सुरेश जगताप, जगन्नाथ जावळे, संतोष क्षेत्रे, रजनीकांत गायकवाड, ताराचंद तायडे, प्रशांत ढोणे, राजू दोंदे, देवानंद पाढेन, राजदीप जगताप यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते.

या प्रकरणी संघटनेच्या भूमिकेला पाठिंबा देत उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकारांचे व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन !

*दुःखद निधन*

*अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन*

*अमरावती, दि. 30 ऑगस्ट 2026*

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे वयाच्या 92 व्या वर्षी रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने गिरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व गिरी परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

*शोकाकुल - गिरी परिवार, अमरावती*

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ! *मुंबई, दि. २ सप्टेंबर २०२६* सार्वजनि...