Sunday, 7 June 2026

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!

अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ येथील विश्वजीत ग्रीन सोसायटीच्या एफ विंगमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

संपूर्ण विश्वजीत ग्रीन परिसरात पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना केवळ एफ विंगमधील रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच दैनंदिन गरजांसाठी रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर समस्येची तात्काळ चौकशी करून पाणीपुरवठा खंडित होण्यामागील कारण शोधावे तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने लक्ष देऊन एफ विंगमधील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.

Saturday, 6 June 2026

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा !!

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा !!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन लोकाभिमुख प्रशासन उभारूया – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

ठाणे, दि. ६ (संदीप शेंडगे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे आज, दि. ०६ जून, २०२६ रोजी शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य, स्वाभिमान, लोककल्याण आणि सुशासनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ राज्यभर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर मानाची स्वराज्य गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. शिक्षक रविंद्र तरे आणि सहशिक्षक यांनी पोवाडा गायन केले तसेच “जय भवानी, जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमादरम्यान शिवचरित्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याण, न्याय, पारदर्शकता आणि सुशासन यांचे जे आदर्श निर्माण केले, ते आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी राज्यकारभाराची संकल्पना महाराजांनी प्रत्यक्षात उतरविली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक स्मृतीदिन नसून सुशासन, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा दिवस आहे.”

कल्याण वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा वाद चिघळला !!

कल्याण वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा वाद चिघळला !!

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या कामामुळे बाधित होत असलेल्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुद्धभूमी फाउंडेशनला भेट दिली. मात्र, या भेटीदरम्यान उपस्थित भीमसैनिक आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद निर्माण झाला. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या कामासाठी बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा काही भाग बाधित होत आहे. संबंधित जागेबाबत अद्यापही महापालिकेकडून नुकसानभरपाई किंवा टीडीआर देण्यात आलेला नसल्याचा आरोप बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य बौद्ध  भिख्खू गौतमरत्न महाथेरो आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. गौतमरत्न महाथेरो आणि आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा झाली मात्र, काही भीमसैनिकांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त करत प्रशासनाविरोधातील तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली सोबतच या प्रकरणातील खासदार आणि पालिका प्रशासनाची बाजू घेत असल्याचा आरोप करत विविध घडामोडींवर आक्षेप नोंदवले. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले.

या गोंधळात रिपब्लिकन सेनेच्या नगरसेविका माया कांबळे यांनाही कार्यकर्त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला असून त्यांना तेथून निघून जावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बुद्धभूमी फाउंडेशन ही केवळ एक संस्था नसून सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीशी निगडित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला असून, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.

सध्या या प्रकरणाकडे आंबेडकरी समाजासह कल्याणकरांचे लक्ष लागले असून, महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि बुद्धभूमी फाउंडेशन यांच्यातील चर्चेतून मार्ग निघतो की संघर्ष आणखी तीव्र होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाच्या विकासकामांसोबतच बाधित संस्थांना योग्य नुकसानभरपाई व न्याय मिळावा, अशी भूमिका विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.

कल्याण-मोहने परिसरात मध्यरात्री गोळीबार !!

कल्याण-मोहने परिसरात मध्यरात्री गोळीबार !!

तीन आरोपी अटकेत

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने-अटाळी परिसरातील पाटील नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक उर्फ अभी पवार आणि त्याचे काही साथीदार पाटील नगर परिसरातून जात असताना मोनू फुलोरे यांच्यात जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर मोनू फुलोरे यांच्या दिशेने दोन राऊंड फायरिंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

गोळीबारानंतर घाबरलेल्या मोनू फुलोरे यांनी तात्काळ खडकपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या फुलोरे यांच्या म्हणण्यानुसार, अभि पवार यांनी आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी  स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. 

प्राथमिक तपासात व्हॉट्सॲप स्टेटसवरून सुरू झालेला वाद आणि पूर्वीचे मतभेद हे या घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आंधळे करीत असून गोळीबारामागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे.

या घटनेमुळे मोहने-अटाळी परिसरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Friday, 5 June 2026

अतिभार व अवैध मालवाहतुकीविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम !

अतिभार व अवैध मालवाहतुकीविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम !

मुंबई, दि. ४ जून २०२६ : राज्यातील रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार (ओव्हरलोड) व इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश देत सांगितले आहे की, अतिभार वाहतुकीबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अशा वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. ६ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीत विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली असून दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

तपासणीसाठी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या पथकांना संबंधित कार्यालयांनी ई-चलन मशीन, वाहन तपासणीसाठी आवश्यक साधने तसेच वाहन व चालक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कारवाईचा सविस्तर अहवाल २२ जून २०२६ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावा लागणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील अतिभार व अवैध मालवाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा या विशेष मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशन वादावर खासदार शिंदे आक्रमक; विशेष चौकशी समितीची मागणी !

कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशन वादावर खासदार शिंदे आक्रमक; विशेष चौकशी समितीची मागणी !

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या जागेचा वाद चिघळत असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फाऊंडेशनच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर खासदार शिंदे यांनी या प्रकरणाची विशेष समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

खासदार शिंदे यांनी आपल्या निवेदनात १० प्रमुख मागण्या केल्या आहेत:

१. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (ST) स्थापन करावी.  
२. बुद्धभूमी फाऊंडेशन आणि विवादित जमिनीचा सातबारा व नावनोंदणीबाबत उचित तपासणी करून कार्यवाही करावी.  
३. जमिनीसंदर्भात दिलेल्या हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) बाबत समिती गठीत करून तपासून कायदेशीर कारवाई करावी.  
४. उड्डाणपुलाच्या अलाइनमेंटबद्दल पुनर्निरीक्षण करून फाऊंडेशनची मागणी तपासावी.  
५. येथे विपश्यना केंद्र, शैक्षणिक केंद्र किंवा समाजोपयोगी रुग्णालय, शाळेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याबत तपासून कार्यवाही करावी.  
६. जमिनीचे आरक्षण बदलण्याबत तपासून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.  
७. उड्डाणपुलाच्या नावाबत फाऊंडेशनची मागणी तपासून शासनास प्रस्ताव सादर करावा.  
८. संरक्षण भिंत आणि पोहोच रस्ता बांधण्याबत फाऊंडेशनच्या मागणीची तपासणी करून कार्यवाही करावी.  
९. जमीन भूसंपादन आणि नुकसान भरपाईबाबत जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करून कार्यवाही करावी.  
१०. ३० मे रोजीच्या कारवाईदरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य झाले असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.

बुद्धभूमी फाऊंडेशनच्या मागण्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने खासदार शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रकरणाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

ठाण्यात जिल्हा परिषदेत अचानक पाहणी : अधिकाऱ्यांना नोटीस !!

ठाण्यात जिल्हा परिषदेत अचानक पाहणी : अधिकाऱ्यांना नोटीस !!

*ठाणे, दि. 5 जून 2026*

जिल्हा परिषदेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी आज ठाणे जिल्हा परिषद कार्यालयाला अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

या पाहणीत गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे नोंदवून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. उपस्थिती नोंदवहीची तपासणी करताना गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रणजित यादव यांनी सांगितले की, नागरिकांना वेळेवर सेवा देणे हे जिल्हा परिषदेचे कर्तव्य आहे. कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यापुढेही अशा अचानक तपासण्या सुरू राहतील.

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !! अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ येथील विश्वजीत ग...