Tuesday, 14 July 2026

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!

*डोंबिवली, राजू नलावडे 

डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. 15 दिवस आधी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसून, ग्राहकांना न कळवता बुकिंग रद्दही केले जात असल्याचा आरोप आहे.

*घरपोच सेवा बंद, नागरिकांना हाल*  
अनेक भागात घरपोच डिलिव्हरी बंद असल्याने नागरिकांना स्वतः एजन्सीच्या गोडाऊनवर जावे लागत आहे. डोंबिवली आजदे, सागर्ली येथील रहिवासी एमआयडीसीतील उस्मा पेट्रोल पंपाजवळील चैतन्य गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर गर्दी करत आहेत. येथे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना गॅससाठी 4-4 तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

पावतीसाठी आधी नेहरू मैदानजवळील ऑफिसमध्ये जावे लागते. त्यासाठी आणि सिलेंडर वाहतुकीसाठी किमान 100 रुपये रिक्षा खर्च येत आहे. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांवर हा अतिरिक्त भुर्दंड पडत आहे.

*काळाबाजाराचा संशय*  
आजदे गावातील योगिता थोटांगे यांचे बुकिंग असूनही गॅस मिळाला नाही. एजन्सीला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. विद्यार्थी आणि नोकरी करणारे युवकही रजा घेऊन सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. काही नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. गॅसचा काळाबाजार होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

*मागणी*  
महागाई आणि दरवाढीने त्रस्त नागरिकांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि आजदे, सागर्ली सारख्या ग्रामीण भागात महानगर गॅस पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा ! रहिवासी भयंकर त्रस्त !!

भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा ! रहिवासी भयंकर त्रस्त !!

               डोंबिवली आणि विशेष करून ग्रामीण परिसरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून १५ दिवस आधी बुकिंग करून सुद्धा गॅस येत नाही. शिवाय हे बुकिंग ग्राहकांना न कळविता किंवा मेसेज न पाठविता कॅन्सल करीत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी घरपोच डिलिव्हरी बंद केल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. घरपोच डिलिव्हरी बंद होण्याचे कारण की सद्या कर्मचारी उपलब्ध नसल्याचे समजले आहे. तएकंदर गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीची यंत्रणा , व्यवस्था बरोबर नसल्याने हा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे असे समजले आहे.

               डोंबिवली आजदे, सागर्ली इत्यादी गावातील रहिवाशी हे भारत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी एमआयडीसी मधील उस्मा पेट्रोल पंप जवळील चैतन्य गॅस एजन्सीचा गोडाऊनवर लोक गर्दी करीत आहेत. येथे महिला, ज्येष्ठ नागरिकांना येथे गॅस मिळण्यासाठी चार चार तास थांबावे लागत आहे. शिवाय पावती बनविण्यासाठी प्रथम त्यांना चैतन्य गॅस एजन्सीचा डोंबिवली मधील नेहरू मैदान जवळील ऑफिस मध्ये जावे लागते. तेथे जाण्यासाठी आणि सिलेंडर वाहतुकीसाठी रिक्षा करावी लागत आहे. त्यात त्यांचे कमीतकमी रुपये १००/- जात आहेत. हे सर्व ग्राहक अल्प उत्पन्नातील मध्यमवर्गीय लोक आहेत. आजदे गावात राहणाऱ्या सौ योगिता थोटांगे या आपला घरातील गॅस सिलेंडर संपल्यावर नोंदणी करून सुद्धा गॅस न आल्याने त्या सकाळी गॅस गोडाऊन वर गेल्या होत्या तेव्हा त्याना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला असून त्यानी गॅस एजन्सीला याचा जाब विचारला. परंतु गॅस एजन्सी कडून कुठलेही समर्पक उत्तर मिळाले नाही आहे. आशिष नेवाळकर हा युवक शिक्षण चालू ठेवून नोकरी करीत आहे पण तोही दांडी मारून गॅस सिलेंडर मिळण्यासाठी आला होता. काहींनी या त्रासाबद्दल नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. सदर गॅस सिलेंडर मिळण्यासाठी मोठा काळाबाजार होत असल्याचे समजले असून संबंधित सरकारी प्रशासनाने याची दखल घेऊन कडक कारवाई केली पाहिजे. 
         आधीच महागाईने आणि गॅस सिलेंडर भाववाढीने जनता त्रस्त झाली आहे. त्यात रहिवाशी गॅस सिलेंडर ग्राहकांना चार चार तास थांबून वाहतुक खर्चाचा भुर्दंड बसत आहे. त्यात जास्त करून महिलांना (लाडक्या बहिणींना) याचा फटका बसत आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी याचा जरूर विचार करावा तसेच शक्यतो आजदे, सागर्ली अशा ग्रामीण भागात महानगर गॅस पुरवठा चालू करण्यासाठी प्रयत्न करावा.

वृत्त - राजू नलावडे, डोंबिवली 

Monday, 13 July 2026

"संविधानाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र यावे" - अण्णासाहेब कटारे

"संविधानाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र यावे" - अण्णासाहेब कटारे

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा*  

*छत्रपती संभाजीनगर, सचिन ननगरे 

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले. मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोष मोकळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

*संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन*  
यावेळी मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे म्हणाले की, देशात संविधानविरोधी धोरणे राबवली जात आहेत. परिणामी मागास, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे जीवनमान खालावत आहे. अशा परिस्थितीत संविधानाचे समतेचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांवर आहे. 

देशात धर्मनिरपेक्ष शक्ती कमकुवत होत असताना धर्मांध शक्ती सत्तेच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. हे थोपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतील संघटित शक्ती उभी करणे गरजेचे आहे. नेत्यांमधील हेवेदाव्यांमुळे आंबेडकरी चळवळीला खीळ बसू नये, असेही त्यांनी सांगितले.

संघटित रिपब्लिकन आंबेडकरी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला असल्याचे कटारे यांनी स्पष्ट केले.

*पदाधिकारी उपस्थित*  
या बैठकीत विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला बिपीन कटारे, सचिन नांगरे, आर.बी. जगताप, संदीप गायकवाड, अंबादास बावस्कर, राजू राक्षे, दर्शन कुमार इंगळे, अनिल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज - अण्णासाहेब कटारे

संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज - अण्णासाहेब कटारे

*"छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात*

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोषजी मोकळे यांच्या वतीने करण्यात आले होते. 

यावेळी मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की देशात भारतीय राज्यघटना आणि संविधान विसंगत ध्येयधोरणे राबविले जात आहेत. संसदेच्या पायऱ्यांवर डोके ठेवून देशाचा कारभार करण्याचे आश्वासन भारतीयांना देण्यात आलं होतं.परंतु त्याच संविधानाची अवहेलना होण्याचे प्रसंग वाढत आहेत, परिणामी देशातील मागास दलित, आदिवासी, ओ.बी.सी. मुस्लिम अल्पसंख्यांक, भटके विमुक्त आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान खालवत जात असून मूठभर साम्राज्यवादी लोकांची सत्ता प्रस्थापित होत आहे. अशा परिस्थितीत देशात पुन्हा एकदा संविधानाचे सन्मानाचे समतेचे राज्य निर्माण करण्याची जबाबदारी संविधानवादी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांची व पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष संघटनांची आहे. देशात व राज्यात धर्मनिरपेक्षवादी पक्षांची वाताहात होत असतांना धर्मांधशक्ती सत्तेच्या बळावर साम्राज्यवाद प्रस्थापित करू पाहत आहे याला केवळ थोपवून नव्हे तर नेस्तानाबूत करण्याचे सामर्थ्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या आंबेडकरी विचारधारेतच असून, आजमितिस, शोषित, पीडित, असलेला समाज संघटित होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता त्याला नेत्यांमधील हेव्यादाव्यांमुळे खिळ बसू नये आणि रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा जोमाने उभी करून संघटित शक्ती उदयास यावी,अशी आशा यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी व्यक्त केली.

संघटित रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे असे अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगितले. या बैठकीच्या वेळेस विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.

या बैठकीस युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य बिपीन कटारे, महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव आर.बी.जगताप छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष अंबादास बावस्कर, जालना संपर्कप्रमुख राजू राक्षे, मराठवाडा संघटक कांतिलाल सोनवणे, मराठवाडा सरचिटणीस दर्शन कुमार इंगळे, मराठवाडा नेते राजेंद्र बनसोडे, संभाजीनगर कामगार आघाडी अध्यक्ष अनिल शिंदे, जनसंपर्क प्रमुख दादासाहेब मोकळे ,जिल्हा उपाध्यक्ष महेश विधाटे, संभाजीनगर युवा शहराध्यक्ष मनीष बोर्डे, संघटक संदीप काकडे, वैजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब दिवेकर,येवला नेते शिवाजी गायकवाड, युवा नेते तुषार भाऊ वाघ, प्रशांत कटारे,  प्रसिद्धी प्रमुख वाल्मीक खरात, लक्ष्मीताई राक्षे, रमाताई दिवेकर, वैशालीताई पठारे, राजू रगडे, सागर हिवाळे, अभिनव निकम, अंबादास हिवाळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

वृत्त - सचिन ननगरे 

राष्ट्रीय स्तरावरील संघ व्यवस्थापक म्हणून गौरव; प्रा. योगेश चौधरी यांचा पालघर जिल्ह्यात सत्कार !!

राष्ट्रीय स्तरावरील संघ व्यवस्थापक म्हणून गौरव; प्रा. योगेश चौधरी यांचा पालघर जिल्ह्यात सत्कार !!

पालघर, प्रतिनिधी ( पंकज चव्हाण) : 

पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०२६-२७ च्या शासकीय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रशिक्षण सभेत जागतिक व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह संघ व्यवस्थापकांचा गौरव करण्यात आला.

यावेळी वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रा. योगेश किशोरी किशोर चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीयस्तरीय ट्रायबल क्रीडा स्पर्धेत त्यांनी संघ व्यवस्थापक म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, पालघर शिक्षणाधिकारी अशोक पाटील, तसेच जिल्ह्यातील विविध क्रीडा शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

याचबरोबर प्रा. योगेश चौधरी यांची पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी सलग आठव्यांदा जिल्हा क्रीडा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रा. योगेश चौधरी यांच्या या दुहेरी सन्मानामुळे वसई-विरारसह पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थी व क्रीडापटूंना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

खडवली येथे धावत्या एसटी बसला भीषण आग; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले !!

** भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा फेरीतील घटना; काही मिनिटांत बस जळून खाक, जीवितहानी टळली; शैलेश जाधव यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक

प्रतिनिधी भिवंडी 
रविवार दिनांक 12 जुलै 2020 

भिवंडी आगाराच्या खडवली–पडघा या नियमित फेरीवरील एसटी बसला शनिवारी (दि. ११) सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास खडवली येथे अचानक भीषण आग लागल्याने काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र, स्थानिक रिक्षाचालक शैलेश जाधव यांच्या सतर्कतेमुळे बसचालकाला वेळेत आग लागल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बसमधील सुमारे ३० ते ३५ प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडवली–पडघा या सायंकाळी ६ वाजताच्या नियमित फेरीवरील एसटी बस खडवली परिसरातून जात असताना रिक्षाचालक शैलेश जाधव यांच्या निदर्शनास बसच्या पुढील भागातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ बसचालकाला गाडीला आग लागल्याची सूचना दिली.

बसचालकानेही प्रसंगावधान राखत बस तातडीने रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वाहकाच्या मदतीने दोन्ही दरवाज्यांतून सर्व प्रवाशांना त्वरित खाली उतरवले. प्रवासी सुरक्षित बाहेर पडताच काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बसला वेढा घातला.

बसमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशामक यंत्राच्या सहाय्याने बसचालकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वेगाने पसरल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

घटनेनंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच कल्याण येथून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एसटी बसचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार बसच्या इंजिन विभागात तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासानंतरच याबाबतचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेत वेळीच सतर्कता दाखवून बसचालकाला सूचना देणारे रिक्षाचालक शैलेश जाधव हे संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यात महत्त्वाचे ठरले. त्यांच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया :
शैलेश जाधव (रिक्षाचालक, खडवली) :
"बसच्या पुढील भागातून धूर आणि आग दिसताच मी तात्काळ बसचालकाला गाडीला आग लागल्याची सूचना दिली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले. वेळेत सूचना दिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, याचे समाधान वाटते."
कंचन कुंभार (प्रवासी, पडघा) :
"मी खडवली–पडघा या बसमधून प्रवास करत होते. बसला आग लागताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. त्या गोंधळात मी एका लहान बाळाला सुरक्षित बाहेर काढले. मात्र, अशा प्रसंगी बसचालक व संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे."

भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर आठ दिवसांपासून अंधारात; पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त !!

भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर आठ दिवसांपासून अंधारात; पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त !!

मीटर जळाल्यामुळे वार्ड क्रमांक २० मधील रस्ते अंधारात; घरफोडी-चोरीची भीती, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाल; तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी 

प्रतिनिधी भिवंडी 
सोमवार दिनांक 13 जुलै 2026

भिवंडी महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्रमांक २० मधील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात मागील आठ दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. मीटर जळाल्यामुळे रस्त्यावरील पथदिवे बंद असून नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अण्णाभाऊ साठे नगर हा डोंगरमाथ्यावर व झोपडपट्टी परिसर असल्याने येथे अरुंद गल्लीबोळ आहेत. रात्रीच्या वेळी अंधारामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी, चोरी तसेच इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली असून परिसरातील सुरक्षेबाबतही चिंता वाढली आहे.

परिसरात सार्वजनिक शौचालय असून तेथेही वीजपुरवठा नसल्याने शौचालय पूर्णपणे अंधारात आहे. विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी शौचालयाचा वापर करताना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून त्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप केला आहे. महानगरपालिकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन जळालेला मीटर त्वरित बदलून पथदिवे सुरू करावेत आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी अण्णाभाऊ साठे नगरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !! *डोंबिवली, राजू नलावडे  डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात ...