Tuesday, 2 June 2026

उरण येथे महिला काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन !!

उरण येथे महिला काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन !!

 उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :: केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर यांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे सामान्य जनता भरडली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत यांच्या अध्यक्षतेखाली उरण तालुक्यातील फुंडे पेट्रोल पंपावर रविवारी (ता. ३१) आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोदी सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.

सध्याचे भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. नीट पेपर लिक झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरच टांगती तलवार आहे. त्यामुळे भाजप सरकारचा निषेध करावा तेव्हढा थोडा आहे. आता तरी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर यांच्या किमती तातडीने कमी कराव्यात आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही रायगड जिल्हा महिला काँग्रेसतर्फे यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष रेखा घरत, योगसाधना पाटील, अश्रया शिवकर, निर्मला पाटील, सोनाली पाटील, मनीषा पाटील, प्रमिला पाटील, पार्वती पंडित, माला पाटील, वर्षा पाटील आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

डोंबिवलीतील ५२ चाळ रेल्वे मैदानावरील कामाला स्थगिती; नागरिकांना दिलासा !!

डोंबिवलीतील ५२ चाळ रेल्वे मैदानावरील कामाला स्थगिती; नागरिकांना दिलासा !!

डोंबिवली, (संदीप शेंडगे) : डोंबिवली पश्चिमेतील ऐतिहासिक ५२ चाळ रेल्वे मैदानावर उभारण्यात येणाऱ्या गेमिंग झोनचे काम तातडीने थांबवण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे आणि आमदार राजेश मोरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा निर्णय झाल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे.

रेल्वेच्या मालकीच्या या मैदानावर गेमिंग झोन उभारण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक खेळाडू, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते. हे मैदान क्रीडा सराव, फेरफटका आणि सामाजिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र आहे.

खासदार शिंदे यांच्या निर्देशानुसार आमदार मोरे आणि स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन मैदानाचे महत्त्व पटवून दिले. नागरीकरणामुळे मोकळ्या जागांची कमतरता असल्याचे सांगून मैदान जतन करण्याची मागणी केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सध्या सुरू असले काम थांबवले.

येत्या काळात दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन ५२ चाळ मैदान कायमस्वरूपी जतन करण्याबत आणि क्रीडा व सार्वजनिक हितासाठी विकास करण्याबत प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा; तेलीपाडा आणि नवीन शेवा येथील गतिरोधकांबाजूच्या खड्ड्यांमुळे अपघाताची दाट शक्यता !!

उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा; तेलीपाडा आणि नवीन शेवा येथील गतिरोधकांबाजूच्या खड्ड्यांमुळे अपघाताची दाट शक्यता !!

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :
उरण-पनवेल या मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी तेलीपाडा आणि नवीन शेवा गावच्या हद्दीतील गतिरोधक गेल्या कित्येक महिन्यांपासून अत्यंत धोकादायक बनले आहेत. या मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांना लागूनच मोठे खड्डे पडले असून, विशेषतः तेलीपाडा येथील एका गतिरोधकाच्या बाजूला पाइपलाइन टाकताना खोदलेला मोठे चर कंत्राटदाराने तसेच ठेवून दिले आहेत. हे खड्डे आणि चर चुकवण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनांशी थेट धडक होऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अवघ्या चार दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असून, त्यापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास येथे गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

    उरण तालुक्यातील तेलीपाडा येथील एका गतिरोधकाच्या बाजूने उकरलेला रस्ता आणि तो चर योग्य रीतीने न बुजवल्यामुळे तो तशाच धोकादायक स्थितीत राहिला आहे, तर मुख्य रस्त्यावरील इतर गतिरोधकांच्या बाजूला मोठमोठाले खड्डे पडले आहेत. वेग मर्यादित करण्यासाठी असलेल्या गतिरोधकांवरच गाड्या आदळत असल्याने आणि ते वाचवताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.

     उरण रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजू अजूनही प्रवाशांसाठी पूर्ण क्षमतेने खुल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे तेलीपाडा, करंजा, चाणजे आणि  नवीन शेवा परिसरातील शेकडो प्रवाशांना लोकल ट्रेन पकडण्यासाठी उरण बाजारपेठेतून जाण्याऐवजी द्रोणागिरी स्टेशन गाठावे लागते. द्रोणागिरी स्टेशनवर यायचे असल्याने नागरिक याच उरण पनवेल मुख्य रस्त्याचा मार्ग निवडतात. सकाळी आणि संध्याकाळी ट्रेन पकडण्याच्या घाईत असणारे नोकरदार आणि वाहन चालक या मुख्य रस्त्यावरील खोदलेल्या चरांमुळे आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. 
     येत्या चार दिवसात पाऊस पडल्यानंतर या खोल चरांमध्ये आणि खड्ड्यांमध्ये पाणी साठणार आहे अशावेळी  मुख्य रस्त्यावर वाहन चालकांना खोलीचा अंदाज येणार नाही त्यामुळे गाड्या घसरून गंभीर अपघात होऊ शकतात. पाऊस पडण्यापूर्वी वाहन चालकांची या त्रासातून सुटका करावी आणि रस्ता प्रभावी बनवून द्यावा अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे

Monday, 1 June 2026

भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत माती, दगड, व मुरुमाची बेकायदेशीर भरणी, व केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक !!

भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत माती, दगड, व मुरुमाची बेकायदेशीर भरणी, व केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक !!

** तलाठी सूर्यवंशी कारवाई करण्यास करतात टाळाटाळ ; संशयाला ऊत

मौजे कोपर येथील सरकारी खांजण जमीन सर्वे नं ६६/१या खाडी नाल्यात केलेली बेकायदेशीर भरणी मोजताना कोपर गावचे उपसरपंच श्री.संजय पाटील व ग्राम महसूल अधिकारी श्री.रमेश सूर्यवंशी


*भिवंडी, दि. 2 मे 2026, (अरुण पाटील)*

भिवंडी तालुक्यातील मौजे कोपर गाव येथील सरकारी खांजण जमिनीत बेकायदेशीर माती, दगड व मुरुमाची भरणी तसेच केवणी खाडी किनाऱ्यावरून रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. महसूल खात्याला माहिती असूनही कारवाई होत नसल्याने तलाठी रमेश सूर्यवंशी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

*सरकारी जमिनीत बेकायदेशीर भरणी*  
मौजे कोपर येथील सर्वे क्रमांक 66/1 या सरकारी खांजण खाडी नाल्यात बेकायदेशीररीत्या माती, दगड व मुरुमाची भरणी सुरू असल्याची माहिती पत्रकार अरुण पाटील यांनी ग्रामसभेत उपस्थित केली. याबत सरपंच हेमंत घरत यांनी तलाठी रमेश सूर्यवंशी यांना फोनवरून कळवले होते. त्यानुसार 30 मार्च 2026 रोजी तलाठ्यांनी स्थळ पाहणी करून मोजणी केली. यावेळी कोपर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्वे क्रमांक 65/अ या खाडी नाल्यातही बेकायदेशीर भरणी झाल्याचे आढळून आले.

*कारवाईबाबत उदासीनता*  
या दोन्ही ठिकाणी किती ब्रास बेकायदेशीर भरणी झाली आणि त्यामागे भूमाफिया कोण आहेत, याची माहिती असूनही तलाठ्यांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच माहिती मागितली असता ती लपवण्याचा प्रयत्न केल्याने आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामसभेत हा विषय मांडूनही ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी आशिष चव्हाण यांनी त्याचा अहवाल प्रशासनाला कळवला की नाही, याची माहिती मिळू शकली नाही.

*पावसाळ्यात पूराचा धोका*  
नाल्यात केलेली बेकायदेशीर भरणी न काढल्यास पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्याला कोपर ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

*केवणी येथे रेतीची चोरटी वाहतूक*  
मौजे केवणी दिवे येथील सर्वे क्रमांक 181/ब या खाडी किनाऱ्यावरून दररोज लाखो ब्रास रेतीची स्वामित्व धन न भरता बेकायदेशीर वाहतूक होत आहे. वाळू माफिया कोण आहेत याची माहिती असूनही तलाठी रमेश सूर्यवंशी कोणतीही कारवाई करत नसल्याने मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यामुळे शासनाचे दररोज लाखो रुपयांचे महसूल बुडत असल्याने तलाठ्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी जाणकारांनी केली आहे.

*प्रतिबंधात्मक आदेश असूनही तस्करी*  
तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी भिवंडी यांनी 15 एप्रिल ते 25 मे 2026 या कालावधीत नदी व खाडी पत्रातून उत्खन वाळू चोरी रोखण्यासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस कर्मचारी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र कारवाईची मुदत संपल्याने केवणी खाडी किनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी कोपर व केवणीचे तलाठी रमेश सूर्यवंशीच जबाबदार असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

*ग्रामस्थांची मागणी*  
वाळू माफियांना या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये मिळत असल्याने ते वरिष्ठ पातळीवर वाटप करतात आणि त्यामुळे पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना घाबरत नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. आतापर्यंत कोणत्या स्थानिक वाळू माफियांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, हे पोलीस व महसूल खात्याने दाखवून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. सध्या गुन्हे दाखल झाले असतील तर ते केवळ बार्ज व सक्शन पंपावर काम करणाऱ्या गरीब कामगारांवरच झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तिसऱ्या मुंबई विरोधात ७ जून रोजी चिरनेर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा !!

तिसऱ्या मुंबई विरोधात ७ जून रोजी चिरनेर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा !!

** जमीन, घरे, गावे, समाज वाचविण्यासाठी तिसऱ्या मुंबई विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन.


उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :
०४ मार्च २०२४ च्या अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील उरण-पनवेल-पेण तालुक्यातील १२४ गावे केएससी नवनगर अर्थात तिसऱ्या मुंबई प्रकल्पात समाविष्ट केली. ही अधिसूचना प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांत प्रचंड चीड, संताप आणि असंतोष निर्माण झाला. कारण सरकारने येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वराज्य संस्था आणि शेतकरी यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही. त्यामुळे १२४ गावांतील सुमारे पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आपल्या लेखी हरकती सरकारकडे दाखल केल्या.

परंतु शेतकऱ्यांनी एवढ्या प्रचंड संख्येने दाखल केलेल्या हरकतींची दखल न घेताच सरकारने दि. १६ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाद्वारे शेतकऱ्यांच्या जमीनी २२.५% ची फसवी योजना लागू करून संपादन करण्याचा इरादा स्पष्ट केला. शासनाची ही कृती निश्चितच लोकशाही विरोधी आहे.

ही अधिसूचना प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना दि. ०५/०२/२०२५, दि. २३/०२/२०२६, दि. ३०/०३/२०२६ च्या पत्रान्वये शेतकऱ्यांची,जमीन मालकांची म्हणणे ऐकून घेण्यासाठी विनंती केली. परंतु सरकारने आजपर्यंत  शेतकऱ्यांना, जमीन मालकांना कुठल्याही प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही.या मुळे स्थानिक भूमीपुत्र असलेल्या शेतकरी, जमीन मालक  यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, आता शेतकरी व जमीन मालक यांना जमीन, घरे, गावे आणि समाज वाचविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नाही.त्यामुळे सर्वांनी एकत्र येत या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेच एक भाग म्हणून तसेच सदर लढा तीव्र करण्यासाठी,या संघर्षाची घोषणा करण्यासाठी रविवार दि. ७ जून २०२६ रोजी संध्या. ४.०० वाजता मा. न्यायमूर्ती  बी. जी. कोळसे-पाटील  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील चिरनेर येथील हुतात्मा स्मारक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी न्यायमूर्ती यांचे विचार ऐकण्यासाठी व या लढ्यात सक्रिय होण्यासाठी स्थानिक भूमीपुत्रांनी, शेतकरी, जमीन मालकांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समिती, रायगड च्या वतीने करण्यात आले आहे.

६ जून रोजी उरण मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन. !

६ जून रोजी उरण मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन. !


** सजग नागरिक म्हणून एकत्र येण्याचे आवाहन.

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे ) : माहिती अधिकार कार्यकर्ता संघ — उरण तालुकाच्या वतीने उरण तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या सदस्यांसाठी तसेच नवीन नोंदणीसाठी फॉर्म भरलेल्या कार्यकर्त्यांसाठी शनिवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठिक ५ वाजता एकदंत अपार्टमेंट उरण शहर येथे विशेष विचारविनिमय बैठक व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर, कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे निराकरण, अर्ज, अपील व तक्रार प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, संघटनात्मक कामकाज व पुढील नियोजन, नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .तरी उरण तालुक्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा व जास्तीत जास्त मोठया संख्येने या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शेळके दत्तात्रय  8369111167, सुनील जोशी 8286442067, विश्वास पटवर्धन 8452085330

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत - - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत -  - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक


रत्नागिरी, प्रतिनिधी : खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

श्री. सरनाईक यांनी ३० मे पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. शनिवारी संध्याकाळी त्यांनी संगमेश्वर येथील नव्या एसटी बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील अंतर्गत व्यवस्था आणि प्रवासी सुविधांचा थेट आढावा घेतला.

रात्री धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांना अधिकृत स्थानकांवरील उपाहारगृहात थांबवणे बंधनकारक असतानाही काही चालक-वाहक खासगी धाब्यांवर गाड्या थांबवतात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मंत्री सरनाईक यांनी अशा मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य पातळीवरून विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असे सांगितले. खासगी धाबाचालकांशी संधान साधून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

बसस्थानक पाहणी दरम्यान मंत्र्यांनी परिसर, प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष आणि कर्मचारी निवासस्थानांची बारकाईने पाहणी केली. चकाचक व्यवस्था आणि स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. हिरकणी कक्षात २४ तास वीज, पाणी आणि सुरक्षा राखण्याच्या तसेच दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना दिल्या.

उपाहारगृहात जाऊन त्यांनी स्वयंपाकघराची पाहणी केली आणि स्वतः वडापावचा आस्वाद घेतला. व्हीआयपी संस्कृती बाजूला सारत त्यांनी बिलाचे पैसे स्वतः रोखीत दिले.

दरम्यान, संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत मंत्र्यांनी तत्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश एसटी अधिकाऱ्यांना दिले.

उरण येथे महिला काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन !!

उरण येथे महिला काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन !!  उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :: केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅ...