“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न !!
जुचंद्र (प्रतिनिधी) –ता. २, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एम. पी. ज्युनिअर कॉलेज, जुचंद्र येथील वरिष्ठ लिपिक मा. श्री. सुरेश तुकाराम राऊत सर (एम.ए. स्टेनो) यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार समारंभ दि. ३० एप्रिल २०२६ रोजी विद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला.
सुमारे ३४ वर्षे ६ दिवस प्रदीर्घ, प्रामाणिक, समर्पित आणि आदर्श सेवेनंतर वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्या श्री.सुरेश राऊत यांनी आपल्या जिद्द, कर्तृत्व आणि सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिव्यांग असूनही त्यांनी यांच्या जिद्दीच्या जोरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत अनेक पदके, पुरस्कार व सन्मान प्राप्त केले असून विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. आज त्यांचे नॅशनल ट्रष्टच्या माध्यमातून दिव्यांग अर्थात मतिमंद मुलांसाठीचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
तसेच ते २० वर्षापासुन दिव्यांग कर्मचारी किंवा ईतर दिव्यांग व्यक्तिच्या समस्या, कोणत्याही अडचणी असोत त्या सोडविण्याचे प्रेरणादायी कार्य ते करत आहेत. आज पर्यन्त ते जिल्हा व राज्यस्तरीय दिव्यांग व्यक्तिचे नेतृत्व करीत आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती, जुचंद्रचे अध्यक्ष मा. श्री. पुरुषोत्तम पाटील साहेब हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. मनोज रानडे साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. पालघर मा. श्री. अशोक पाटील साहेब, अध्यक्ष, सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर चे श्री बाळाशेठ पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. श्री. विनयजी पाटील साहेब, स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष मा. श्री. विवेकानंद पाटील साहेब तसेच वसई विरार महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री. कन्हैया भोईर साहेब व स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री. जनार्दन म्हात्रे, मा.श्री. हरिहर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कारमूर्ती श्री सुरेश राऊत सर यांचे कुटुंबीय कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामध्ये त्यांचे मोठे बंधू श्री. शांताराम तुकाराम राऊत, पुतणे श्री. विश्वनाथ राऊत, श्री. प्रकाश राऊत, जावई पंढरीनाथ ठाकरे, संकेत तारमळे, नातवंडे तसेच सायली तारमळे (राऊत), सुरज राऊत, शुभम राऊत यांच्यासह मित्रपरिवार, सासरकडील मेव्हणे, साडू व अन्य आप्तेष्ट उपस्थित होते.
यावेळी श्री. सुरेश राऊत यांच्या धर्मपत्नी सौ. सुप्रिया सुरेश राऊत यांनी आपल्या मनोगतातून विवाहापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा जीवनप्रवास अत्यंत भावुकतेने उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या संघर्षमय आयुष्याच्या अनेक आठवणी सांगताना सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले.
तसेच त्यांची कन्या सायली राऊत उर्फ सायली तारमळे हिने आपल्या मनोगतातून “माझे वडील माझ्यासाठी हिरो आहेत आणि ते कायम हिरोच राहतील,” अशा भावना व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री भोईर सर व उप शिक्षक श्री म्हात्रे सर यांनी श्री. सुरेश राऊत सर हे जिद्दी व कर्तुत्ववान कसे आहेत हे त्यांच्या मनोगतात सांगितले.
विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, श्री. नाडेकर सर, पर्यवेक्षिका सौ.कविता पाटील मॅडम, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. अनेक मान्यवरांनी तसेच आप्तेष्टांनी श्री. सुरेश राऊत यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, कष्टाळूपणा व सेवाभावी वृत्तीचा विशेष उल्लेख केला.
यावेळी त्यांचे पुतणे श्री. विश्वनाथ राऊत यांनी स्वतः शब्दबद्ध केलेल्या मानपत्राचे प्रभावी वाचन करून श्री. सुरेश राऊत (नाना) यांच्या संपूर्ण सेवाकाळाचा, जीवनप्रवासाचा व सामाजिक कार्याचा भावनिक आढावा घेतला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
समारोपाच्या मनोगतात श्री. सुरेश तुकाराम राऊत यांनी आपल्या जन्मापासूनचा खडतर जीवनप्रवास अत्यंत भावुक शब्दांत उपस्थितांसमोर मांडला. लहानपणी दिव्यांग असल्यामुळे आई-वडिलांना आपल्या भवितव्याची मोठी चिंता वाटत होती. “माझ्या मुलाला नोकरी कशी लागेल, शिक्षण कसे पूर्ण होईल,” अशी काळजी त्यांना सतावत असे, असे सांगताना ते भावुक झाले.
गावापासून दूर असलेल्या शाळेत जाण्यासाठी पायाने दिव्यांग असूनही दररोज पडत-उठत तीन किलोमीटरचा प्रवास करून रेल्वे स्टेशन गाठत शिक्षण पूर्ण केले आणि आई-वडिलांचे स्वप्न साकार केले, असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि सभागृहही भावनांनी भारावून गेले.
तसेच त्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच सर्वांचे भले कसे होईल, याचाच विचार केला. सुख-दुःखात राऊत कुटुंबासोबत राहून योग्य मार्गदर्शन केले, मित्रपरिवार जपला, चांगली माणसे जोडली आणि ज्या-ज्या ठिकाणी नोकरी केली तेथील लोकांना आपण “हवेहवेसे” वाटलो, अशा भावना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सौ. जान्हवी भोसले मॅडम यांनी उत्कृष्ट केले. शेवटी सर्वांचे आभार मानण्यात आले व विद्यालयाच्या उप शिक्षिका सौ स्मिता पाटील मॅडम यांच्या पसायदानाने समारंभाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात पार पडला.
सौजन्य / वृत्तांकन - विश्वनाथ राऊत (सर)