Saturday, 22 August 2026

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

डोंबिवली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयाच्या संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता केंद्र (Centre for Research, Innovation and Entrepreneurship – Start-up & Incubation Cell) यांच्या वतीने ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे, संशोधन व नवोपक्रमाला चालना देणे तसेच समाजातील समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्स उभारण्यासाठी प्रेरित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरात इव्हॉनिक्स टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच क्विककार्टचे सह-संस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. निलाद्री रॉय यांनी “Innovation Starts With You – Cultivating the Entrepreneurial Mindset” या विषयावर मार्गदर्शन केले. “मोठी कल्पना शोधण्यापेक्षा समस्या शोधा” आणि “समस्येतच उद्योजकतेची संधी दडलेली असते” हा प्रभावी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांचे निरीक्षण करून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचे आवाहन केले.

यानंतर झायडस वेलनेस लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (DGM) डॉ. रवींदर वर्मा यांनी “Building Your First Startup – Idea to Launch” या विषयावर मार्गदर्शन करताना यशस्वी स्टार्ट-अप उभारण्यासाठी ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, कल्पनेची पडताळणी करणे, सातत्याने प्रयोग करणे आणि समस्येवर आधारित उपाय विकसित करणे किती महत्त्वाचे आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

यावेळी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हर्षल लवंगारे यांनी आपल्या मनोगतात संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता केंद्र स्थापन करण्यामागील दूरदृष्टी स्पष्ट केली. “महाविद्यालय हे केवळ पदवी देणारे केंद्र नसून समाजातील समस्या घेऊन येणारे आणि त्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेच्या माध्यमातून उपाय शोधणारे केंद्र व्हावे,” हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

डोंबिवली व परिसरातील वाहतूक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, स्थानिक उद्योग, डिजिटल सेवा, पाणी व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांतील समस्यांवर संशोधन करून त्यातून उद्योजकीय संधी निर्माण करणे, हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या संकल्पनेला डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापन समितीने दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आपल्या उद्योजकीय प्रवासाचा उल्लेख करताना श्री. लवंगारे यांनी श्री. निलाद्री रॉय यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण करून दिली. कोविड काळात रोहन जोशी यांच्यासह “कक्षा” या K-12 एडटेक स्टार्ट-अपवर एकत्रितपणे काम करताना मिळालेला अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. “उद्योजकता म्हणजे केवळ कल्पना नव्हे, तर समस्येचे सातत्याने निराकरण करण्याची वृत्ती,” असे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या आगामी उपक्रमांचीही माहिती दिली. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) यांच्या सहकार्याने एक दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहा दिवसीय ‘इनोव्हेशन अँड करिअर फेस्टिव्हल’ आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. या महोत्सवात करिअर फेस्टिव्हल, स्टार्ट-अप फेस्टिव्हल आणि मेगा जॉब फेअर आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या ‘द बायोस्कोप बग्स’ या इन-हाऊस फिल्म सोसायटीचे उद्घाटन होणार असून, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व चित्रपट दिग्दर्शक अक्षय शिंपी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार (Critical Thinking), समस्या निराकरण क्षमता (Problem Solving Skills), संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या व्यापक उद्दिष्टातून संशोधन, उद्योजकता, करिअर विकास, उद्योग सहकार्य आणि फिल्म सोसायटी यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे संकल्पनाकार व संयोजक श्री. हर्षल लवंगारे, तर सहसंयोजक म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. कैलास जगदेव आणि स्ववित्त विभागाच्या उपप्राचार्या डॉ. रिया रुपाणी यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संशोधन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुमन सात्याराम आणि डॉ. अमला पटवर्धन यांनी केलेल्या अथक परिश्रम, उत्कृष्ट नियोजन व प्रभावी समन्वयाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.

या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेची संस्कृती महाविद्यालयात अधिक दृढ करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून, भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे विचारशील, नाविन्यपूर्ण आणि उद्योजकीय नेतृत्व असलेले विद्यार्थी घडविण्याच्या महाविद्यालयाच्या ध्येयाला या कार्यक्रमाने नवी दिशा दिली.

प्रसिद्धी/वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

डोंबिवली एमआयडीसीत नाल्यात बॅग्स भरून कचरा; उघड्या चेंबर्समुळे रोगराईची भीती !!

डोंबिवली एमआयडीसीत नाल्यात बॅग्स भरून कचरा; उघड्या चेंबर्समुळे रोगराईची भीती !!

** बेजबाबदार लोकांची करामत

*डोंबिवली, दि. 21 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नाले आणि गटारांची अवस्था अतिशय भयानक झाली असून नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आणि अर्धवट विकासकामांमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

*नवीन बॅग्समध्ये कचरा भरून नाल्यात टाकला*  
कावेरी चौक जवळील एकदंत हेरिटेज आणि कोयना सोसायटीच्या मधून जाणाऱ्या नाल्यात नवीन बॅग्समध्ये भरून कचरा आणि प्लास्टिक फेकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तसेच सांडपाणी वाहिन्यांच्या अनेक चेंबर्सवर झाकणे नसल्याने त्या उघड्या चेंबर्समध्येही काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत.

ही बाब येथील ज्येष्ठ जागरूक नागरिक श्रीमती पुष्पा फाटक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

*अर्धवट नाले, साचलेले पाणी, डासांची उत्पत्ती*  
निवासी भागात नवीन नाले आणि गटारे बांधण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र येऊन साचून राहत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे.

यामुळे डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर आणि कावीळ यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक रुग्ण आढळून येत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. उघड्या चेंबर्समधून कोणतीही व्यक्ती पडून अपघात होण्याचीही शक्यता आहे.

*दोन यंत्रणांमध्ये कामाची विभागणी*  
सध्या सांडपाणी वाहिन्या आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती तसेच नवीन नाले-गटारांचे बांधकाम एमआयडीसी पाहत आहे. तर स्वच्छता आणि साफसफाईचे काम केडीएमसीकडे आहे.

पुढील काही दिवसांत मोठे सण आणि उत्सव येणार असल्याने प्रशासनाने या विषयात गंभीरतेने लक्ष घालून तातडीने कारवाई करावी आणि बेजबाबदारपणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

*सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन मागे घ्या; कोकण विभागीय पत्रकार संघाची मागणी*

*सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन मागे घ्या; कोकण विभागीय पत्रकार संघाची मागणी*

कल्याण, संदीप शेंडगे : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्यावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी करण्यात आलेली निलंबनाची बेकायदेशीर केलेली कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे यांनी केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापालिकेत पालिका अधिकारी असलेल्या एका क्लास-वन अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने निलंबनाची कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या ‘अ’ प्रभागात भविष्यात अधिकारी जबाबदारी स्वीकारण्यास धजावतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जयवंत चौधरी यांनी ‘अ’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून सुमारे दहा ते अकरा महिन्यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने कारवाई केली आहे विशेषतः बल्याणी विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत शेकडो खोल्या, गाळे आणि जोते जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

चौधरी यांच्या कार्यकाळात अ प्रभाग क्षेत्रात सर्वच प्रभागात ४०० हून अधिक अनधिकृत घरगुती खोल्या व गाळे तसेच ८०० हून अधिक जोत्यांवर कारवाई करण्यात आली असून अनेक व्यावसायिक आणि घरगुती खोल्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः पत्रकार परिषदेत आपली पाठ थोपटून घेतली होती.

*अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती कारवाईची भीती*

‘अ’ प्रभागातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौधरी यांनी तात्काळ प्रभाग पातळीवर कारवाई केल्याचे सातत्याने पाहावयास मिळाले आहे. बल्ल्यानी टिटवाळा मांडा मोहने अटाळी वडवली आदी भागात सातत्याने कारवाई करण्यात आली होती त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये चौधरी यांच्या कारवाईची भीती निर्माण झाली होती,

यापूर्वी अटाळी-वडवली परिसरात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीतही चौधरी यांनी आपली जबाबदारी पार पाडत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. 
पालिका कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना संरक्षण पुरवून अनेक ठिकाणी त्यांनी धाडसी कारवाई केल्याचे पहावयास मिळते.

अनधिकृत बांधकामाची जबाबदारी केवळ सहाय्यक आयुक्तांचीच का?

दरम्यान, ‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांसाठी केवळ सहाय्यक आयुक्तांनाच जबाबदार धरणे योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या मुख्यालयात बसून अनधिकृत बांधकाम नियंत्रणाचे काम पाहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई अपेक्षित असेल, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या अधिकारक्षेत्रातील जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे, केवळ खालच्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवणे योग्य नाही मग अनधिकृत बांधकाम उपयुक्त पदाचा उपयोग काय असा सवाल संदीप शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

शुक्रवारी कारवाई, सोमवारी पुन्हा बांधकाम?

‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांबाबत आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेकडून शुक्रवारी एखाद्या बांधकामावर कारवाई केली जाते; मात्र त्यानंतर काही तासांतच त्याच ठिकाणी पुन्हा खोल्या अथवा गाळ्यांचे बांधकाम उभे राहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक नवीन बांधकामावर सतत लक्ष ठेवायचे का? त्यांच्यावर इतर प्रशासकीय कामांची जबाबदारी नाही का? असा सवाल करत अनधिकृत बांधकाम पुन्हा उभे राहण्यामागील यंत्रणेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे पत्रकार संघाने म्हटले आहे. अनधिकृत फेलेवाल्यांचा प्रश्न अतिशय बिकट असताना मांडा टिटवाळ्यातील बल्यानी येथील मोहने विभागातील फेरीवाल्यांचा प्रश्न त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून फेरीवाल्यांना रस्त्याच्या मागे बसण्यास आदेशित केले होते.

निवडणूक काळातही चौधरी यांच्या कामाचे कौतुक

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या (२०२५- २६) या काळातही ‘अ’ प्रभागात सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडला असून निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रभागातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे सर्वांनी पाहिले आहे त्याचप्रमाणे एस आय आर (SIR) योजनेतही त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण प्रभाग क्षेत्रात नागरिकांची गणना करून घेतली आहे. याच कामात त्यांचा बहुतांश वेळ गेल्याने काही प्रमाणात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी वाढल्याचे पहावयास मिळाले आहे

निवडणुकीनंतरही नवनिर्वाचित नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन मोठ्या प्रमाणावर खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. जयवंत चौधरी यांनी बल्यानी मांडा टिटवाळा परिसरात धाडसी कारवाई करत अनेक दिग्गज राजकीय वरदहत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केलेली आहे.

‘कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला संरक्षण मिळाले पाहिजे’

अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यालाच निलंबित केल्यास भविष्यात इतर अधिकारी अनधिकृत बांधकाम सहाय्यक आयुक्त या पदावर काम करण्यास घाबरतील अशी भीती पत्रकार संघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे केली आहे. तसेच याबाबत सोमवारी पालिका आयुक्त उपयुक्त यांना पत्र देऊन निलंबन मागे घेण्याची विनंती करणार आहे.

दरम्यान, निलंबनाची नेमकी कारणे, चौधरी यांच्यावरील आरोप आणि महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका याबाबत स्वतंत्रपणे स्पष्टता होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बाजू ऐकूनच अंतिम निष्कर्ष काढला जावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरच कारवाई का? त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या 
त्यांच्याकडून खुलासा मागून घ्या त्यांना बोलण्याची संधी तरी द्या.
अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे यांनी केली आहे

कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यानाच्या विकासाला गती; 2 एकर जागेसाठी आरक्षण बदलाचे निर्देश !!

कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यानाच्या विकासाला गती; 2 एकर जागेसाठी आरक्षण बदलाचे निर्देश !!

*मुंबई, दि. 20 ऑगस्ट 2026*

कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विधानसभा उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

*आरक्षण बदलाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश*  
उद्यानाच्या लगत असलेली सुमारे 2 एकर जागा विकासासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला दिले.

उद्यानाच्या विकासाला गती मिळावी आणि स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित सुशोभीकरणाचे काम प्रभावीपणे पूर्ण व्हावे यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

*बैठकीला कोण होते उपस्थित*  
या बैठकीला नगरविकास विभागाचे अधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे कल्याणमधील महत्त्वाचे उद्यान असून त्याचा विकास झाल्यास नागरिकांसाठी मोकळी आणि प्रेरणादायी जागा उपलब्ध होणार आहे.

Friday, 21 August 2026

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

*डोंबिवली, दि. 20 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात काँक्रिट रस्ते, नाले आणि गटारींची विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र नियोजनाच्या अभावामुळे त्याचा फटका नागरिकांसह महावितरणलाही बसत आहे. अनेक ठिकाणी केबल फॉल्ट झाल्याने नवनवीन काँक्रिट रस्ते तोडण्याची वेळ येत आहे.

*षटकार इमारतीजवळ फॉल्ट, वीजपुरवठा खंडित*  
आज मिलापनगर तलाव रस्त्यावरील षटकार इमारतीसमोर RL 40 येथे महावितरणच्या भूमिगत केबलमध्ये फॉल्ट निर्माण झाला. त्यामुळे आजूबाजूच्या काही इमारती आणि बंगल्यांचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला.

महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता काँक्रिट रस्त्याच्या खालून जाणाऱ्या केबलमध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले. ग्राहकांना तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला पर्यायाने काँक्रिटचा रस्ता तोडावा लागला.

*विकासकामांमुळे केबल्सना धक्के*  
एमआयडीसी निवासीतील काँक्रिट रस्ते आणि नाले-गटारी बनविताना वीज, पाणी यांच्या भूमिगत वाहिन्यांना धक्के बसल्याने अशा प्रकारचे केबल फॉल्ट वारंवार होत असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नियोजनाअभावी एकीकडे करोडो रुपये खर्च करून बनवले रस्ते पुन्हा तोडावे लागत आहेत. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असून नागरिकांनाही खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी मागणी केली आहे की, पुढील विकासकामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवून एकात्मिक आराखडा तयार करावा. म्हणजे नवीन रस्ते बनल्यानंतर लगेच ते फोडण्याची वेळ येणार नाही.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

डॉ. महेंद्र घरत यांना ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार’ प्रदान !!

डॉ. महेंद्र घरत यांना ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार’ प्रदान !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट, समर्पित आणि प्रेरणादायी योगदानाची दखल घेत विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. महेंद्र लक्ष्मण घरत यांना यंदाच्या ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता ईटाँस एम्पोरियल, नंदुरबार येथे संपन्न झाला. नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोरख देवरे यांच्या हस्ते डॉ. घरत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. महेंद्र घरत यांनी अध्यापनासोबतच शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक संशोधन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत आयोजित राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता तसेच निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी या विषयांसाठी त्यांची मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता सहावीच्या ‘व्यवसाय शिक्षण’ विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षणासाठी बालभारती येथेही त्यांची निवड झाली आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील पीएम श्री शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

केंद्रशासित प्रदेशाच्या वतीने आयोजित पीजीटी व टीजीटी शिक्षकांच्या क्षमता वृद्धी प्रशिक्षणासाठी दीव-दमण येथे समन्वयक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आतापर्यंत प्रशिक्षक म्हणून त्यांनी एक हजाराहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव मानला जात आहे. पुरस्काराबद्दल  संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या श्रीमती चित्रा ठाकूर, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी डॉ. महेंद्र घरत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्वप्नांशी तडजोड करू नका; राष्ट्र प्रथम ठेवा’ : पृथ्वीराज बी. पी.

स्वप्नांशी तडजोड करू नका; राष्ट्र प्रथम ठेवा’ : पृथ्वीराज बी. पी.

(लोकनेत्या तारामाई वर्तक जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात विविध उपक्रम)

वसई प्रतिनिधी/पंकज चव्हाण

“आपल्या आकांक्षा उंच ठेवा, परिस्थितीशी संघर्ष करताना स्वप्नांशी तडजोड करू नका. अपयशातून शिका आणि उपलब्ध वेळेचा सदुपयोग करा; कारण वेळ हे पुन्हा न मिळणारे संसाधन आहे. कोणतेही कार्य करताना ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना केंद्रस्थानी असावी,” असा संदेश वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी विद्यार्थ्यांना दिला. अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात थोर लोकनेत्या तारामाई वर्तक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘तारामाई वर्तक जन्मशताब्दी महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी चिकाटीने आणि कठोर परिश्रमाने प्रयत्न करावेत, अपयशाला शिकण्याची संधी मानावे आणि प्रत्येक क्षेत्रातील संधी ओळखून त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या या पंचसूत्रीसोबतच कोणत्याही व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी तिचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘Educate, Organise, Agitate’ या विचारांचीही त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करून दिली.

हे व्याख्यान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षातर्फे आयोजित करण्यात आले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. विकास वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महोत्सवाला संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग गजानन नाईक, सचिव रवी मोहोळ, कोषाध्यक्ष हसमुखभाई शाह, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, विद्यावर्धिनी परिवारातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

तारामाई वर्तक यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण, त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात तारामाई वर्तक मेमोरियल अकादमीच्या शिक्षिकांनी सादर केलेल्या गौरवगीताने आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘असीम तारा’ या नाटुकलीने उपस्थितांची मने जिंकली. तारामाईंचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्य, त्यांचा संघर्ष, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा ध्यास या नाट्यप्रस्तुतीतून प्रभावीपणे उलगडला.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी तारामाईंच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची पुनर्भेट घडवून आणली. केवळ पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे संस्था उभारणे नव्हे, तर परिवर्तनाचा ध्यास आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे हा खरा संस्थात्मक वारसा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी तारामाईंच्या स्मृतींना अभिवादन केले.
उपाध्यक्ष पांडुरंग गजानन नाईक यांनी अण्णासाहेब व भाऊसाहेब वर्तक यांच्या कार्यपरंपरेच्या पार्श्वभूमीवर तारामाईंच्या कर्तृत्वाचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात विकास वर्तक यांनी तारामाईंच्या स्त्री सबलीकरण, बालशिक्षण, पाणीप्रश्न आणि तंत्रशिक्षणातील योगदानाच्या विविध पैलूंना उजाळा दिला. पापडखिंडी धरणाच्या संकल्पापासून तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून बोईसर औद्योगिक परिसरासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यापर्यंत त्यांची दूरदृष्टी दिसून येते. समाजाची गरज ओळखून त्यानुसार शैक्षणिक संस्था उभारण्याच्या त्यांच्या कार्यामुळे अनेकांना शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम डोंगरे व प्रा. अदिती यादव यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. महिला विकास कक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी १५० हून अधिक विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, लायन्स क्लबच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेना यांच्या समन्वयातून आयोजित रक्तदान शिबिरात ९६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला जन्मशताब्दी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या उपक्रमांमधून तारामाई वर्तक यांच्या समाजाभिमुख आणि मानवकेंद्री कार्यविचारांना कृतीची जोड देण्यात आली.

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !! डोंबिवली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : डोंबिवली शिक्...