“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!
** स्पर्धेत भरत गोसावी प्रथम
पालघर, प्रतिनिधी
मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. “मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” हा स्पर्धेचा विषय होता. शिक्षक म्हणून कार्यरत असताना स्वतःच्या विद्यार्थी जीवनातील अपेक्षा आणि आज शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, या अनुषंगाने शिक्षकांनी आपल्या अनुभवांना व विचारांना लेखणीतून व्यक्त केले.
स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदा एकूण ४२ शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. मुंबई येथील प्रा. सचिन परब यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेत श्री. भरत गोसावी यांनी प्रथम क्रमांक, सौ. अमृता रोशन धुमाळ यांनी द्वितीय क्रमांक, तर श्री. पंकज शंकर चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
विजेत्यांना त्यांच्या आवडीची ₹५०० किमतीची पुस्तके, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमाच्या ऑक्टोबर महिन्यातील कार्यक्रमात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
लेखणीपेक्षा ‘स्वतःचा विचार’ महत्त्वाचा!
या स्पर्धेच्या निकालासोबतच आयोजकांनी एक महत्त्वाची खंतही व्यक्त केली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या काही शिक्षकांनी निबंध लेखनासाठी एआयचा (Artificial Intelligence) वापर केल्याचे निदर्शनास आले. शिक्षकांच्या अनुभवांवर आणि त्यांच्या विद्यार्थी-शिक्षक प्रवासावर आधारित असलेल्या या विषयात प्रत्येक शिक्षकाचा स्वतःचा अनुभव, विचार, भावना आणि चिंतन अपेक्षित होते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेताना स्वतःची सर्जनशीलता आणि लेखनविचार यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
“स्पर्धेचा उद्देश केवळ क्रमांक मिळविणे नसून शिक्षकांनी स्वतःच्या विद्यार्थी जीवनाकडे पुन्हा एकदा पाहावे आणि ‘माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी कसा शिक्षक आहे?’ याचे आत्मपरीक्षण करावे, हा आहे,” असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे मनोविकास ग्रंथोत्सवचे अमोल पाटकर आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांच्या वतीने आभार मानण्यात आले. पुस्तक वाचन, चिंतन आणि लेखनातून शिक्षकांच्या विचारविश्वाला समृद्ध करण्याचा हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे यावेळी देण्यात आली.
वृत्त - पंकज चव्हाण (वसई)