Friday, 11 September 2026

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

*चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :*

"दिसता चट्टा, डॉक्टरांना भेटा..! येता कण-कण तापाची, करा तपासणी रक्ताची..! सावध राहा, सुरक्षित राहा, एड्सपासून दूर राहा. टीबीला हरवायचे आहे, देश स्वस्थ करायचा आहे."

अशा विविध आरोग्य संदेशांचा संदर्भ घेत चाळीसगाव शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप इत्यादी कीटकजन्य आजार तसेच इतर साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी आणि कुष्ठरोग, क्षयरोग, एचआयव्ही-एड्स जनजागृतीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दिनांक ११/०९/२०२६, वार शुक्रवार रोजी नालंदा माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथे डेंग्यू व इतर कीटकजन्य, जलजन्य आजार, साथीचे आजार, एचआयव्ही/एड्स आणि कुष्ठरोग, क्षयरोग या विषयावर जनजागृतीपर आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले.

सहायक संचालक (हिवताप) नाशिक आदरणीय डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ डॉ. राजेंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ डॉ. वैदेही पंडित, डॉ. मंथन, डॉ. बागडे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खैरनार, चाळीसगाव नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. बांगर, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. सोनवणे, हिवताप पर्यवेक्षक श्री. किरण बेलदार, श्री. ममराज राठोड, श्री. रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील कुष्ठरोग अवैद्यकीय सहायक महेश सूर्यवंशी, समुपदेशक नामदेव अहिरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सचिन महाले, आरोग्य सेवक दीपक ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिरात डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे व उपाय, जलजन्य व साथीच्या आजारांपासून घ्यावयाची काळजी, तसेच एचआयव्ही-एड्स आणि कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले. सर्व आजारांविषयी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अनुसूचित जाती व तृतीयपंथी नागरिकांनी एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन !!

अनुसूचित जाती व तृतीयपंथी नागरिकांनी एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन !!

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक पात्र नागरिकाचा अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक अधिकार आहे. अनुसूचित जाती तसेच तृतीयपंथी समाजातील पात्र नागरिकांनी विशेष सखोल व पुनरिक्षण प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

आपल्या मताच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या मतदार यादीमध्ये नाव नसल्यास पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांसह आपल्या मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून मतदार नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, लिंग किंवा अन्य तपशीलात काही त्रुटी असल्यास आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी.

स्थलांतरित नागरिकांनी नवीन पत्त्यानुसार मतदार नोंदणी अथवा पत्ता बदलाची प्रक्रिया पूर्ण करावी. नव्याने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी अथवा त्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७, तर नाव, पत्ता व इतर तपशीलातील दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरता येईल. ऑनलाइन अर्जासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

ऑफलाइन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार आहेत. मतदार यादी दुरुस्तीच्या कामकाजाबाबत ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

मतदार यादीत आपले नाव असणे म्हणजे आपल्या लोकशाही हक्काचे संरक्षण होय. त्यामुळे अनुसूचित जाती व तृतीयपंथी समाजातील प्रत्येक पात्र नागरिकाने एसआयआर प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपली मतदार नोंदणी तपासावी व आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. तसेच कुटुंबातील, परिसरातील आणि समाजातील पात्र नागरिकांनाही याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गावात शिक्षकांना आदर राहिला नाही, तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आमदार किसन कथोरे यांचे परखड मत !

'गावात शिक्षकांना आदर राहिला नाही, तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आमदार किसन कथोरे यांचे परखड मत !

कल्याण, (संजय कांबळे) : शिक्षकांना पुरस्कार मिळाला,त्यांचा गौरव झाला तर त्यांच्या मध्ये उमेद तयार होते, ते पिढी घडवतात, परंतु सध्या पिढीला घडविणेसोपे राहिले नाही, आता गावात शिक्षक कधी येतो कधी जातो हेच कळत नाही, पुर्वी गावात गुरुजी आले तर रस्त्यावर खेळणारी मुले घरात जाऊन बसत होते, असा आदर होता, परंतु आता तो आदर राहिला नाही, परिस्थिती बदलली आहे, असे परखड मत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी, कल्याण तालुका आदर्श पुरस्कार गुणगौरव सोहळ्यात व्यक्त केले, यावेळी त्यांच्या हस्ते तालुक्यातील ८ शिक्षकांना'आदर्श शिक्षक, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, गटशिक्षणाधिकारी सुनीता मोटघरे मँडम, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, बाजार समितीचे संचालक श्री भांगरे, भाजपाचे शेखर लोणे, जेष्ठ शिवसैनिक सुदाम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

दिपप्रज्वलानंतर कांबा जिल्हा परिषदेच्या मुलींनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, यानंतर आमदार कथोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते खोणी, सोनारपाडा, दहिसर, गोवेली, म्हारळ, मामणोली, खडवली, गुरवली या जिप शाळेतील श्रीमती विद्या-हावकर, शोभा महाजन, जनार्दन देशमुख, सुनिता ठुबे, दिलशाद शेख, प्रिती महाजन, ज्योती खेडकर, सुनिता देसाई यांचा२०२६-२७चा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एका शिक्षकेला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी सुनीता मोटघरे यांनी सांगितले की, तालुक्यात १२० शाळा असून ४०७ शिक्षकांची पदे मंजूर आहेत, त्यापैकी २७२ कार्यरत आहे. ३७ शाळा एकशिक्षकी तर ३ शाळांना शुन्य शिक्षक आहेत, सन२०२५-२६या शैक्षणिक वर्षात वरप, शिरढोण, नडगाव, हेदूटणे, गुरवली, मानिवली, सोनारपाडा, या शाळेतील १० विद्यार्थ्यांना मिशन भरारी अंतर्गत इस्त्रोमध्ये जाण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

तर गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांनी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन करून मला एका वरीष्ठ अधिका-याचा फोन आला की, एका या शिक्षकाला पुरस्कार द्या, परंतु ही नावे निश्चित झाल्याने त्यांंनी नाराज होऊ नये, पुढील वर्षी त्यांना देण्यात येईल असे मी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सभागृहात मोठ्या प्रमाणात शिक्षक व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Thursday, 10 September 2026

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!

    'शिक्षण संजीवनी' मासिका तर्फे दरवर्षी साहित्य निर्मितीला  विशेष पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा हा पुरस्कार 'राजयुवा प्रकाशन' ने प्रकाशित केलेल्या वसुधा वैभव नाईक, पुणे यांच्या 'आईचे हळवे मन' या लघुकथा संग्रहास 'उत्कृष्ट साहित्य निर्मिती' हा पुरस्कार प्राप्त झाला.
   हा पुरस्कार पुणे येथील पत्रकार भवन,नवी पेठ येथे प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष मा.श्री. एकनाथ आव्हाड (बालसाहित्यिक आणि लेखक) प्रमुख पाहुणे मा. स्वाती महाळंक (प्रमुख कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) तसेच माधुरी गोखले,श्रुती कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी,अविनाश सकुंडे, शिक्षण संजीवनी मासिकाचे संपादक देविदास लिमये आणि कार्यकारी संपादक डॉक्टर संजय दत्त जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा उत्तम पार पडला.
    या मासिकातर्फे महाराष्ट्रातील बाल साहित्यिक तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांना विविध पुरस्कार दिले जातात.

    'आईचे हळवे मन' या लघुकथा संग्रहामध्ये शिक्षकांच्या जीवनातील अनुभव, आई म्हणून मुलांचे आलेले अनुभव आणि समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचे आलेले अनुभव यावर  लहान कथा लिहिलेल्या आहेत. ललित लेख म्हटले तरी चालेल.
   हा कथासंग्रह आपल्याला निश्चितच आवडेल आणि रसिकांच्या मनावर राज्य करणार हे मात्र नक्कीच. यातील भाषाशैली साधी  आहे. मनाला भावणारी आहे.
   'आईचे हळवे मन' या कथासंग्रहास मिळालेल्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्र, साहित्यक्षेत्र,सामाजिक क्षेत्र यातून अभिनंदनाचा  आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वृत्त - प्रमोद सुर्यवंशी (पुणे)

समेळपाड्यात मा. नगरसेवक व भावाचे अनधिकृत बांधकामे !!

समेळपाड्यात मा. नगरसेवक व भावाचे अनधिकृत बांधकामे !!

*नालासोपारा, दि. १० सप्टेंबर २०२६ :*

अनधिकृत बांधकाम रोखण्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे करत असल्याचे आढळून येते.

समेळपाडा येथील सर्व्हे क्रमांक २१/४ व २१/५ मधील बांधकाम परवानगीपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकाम हटविण्याची जबाबदारी असणाऱ्या पालिका प्रशासनाने वारंवार तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली आहे.

माजी नगरसेवक राजेश ढगे व भाऊ यतीन ढगे यांनी देवगड तालुक्यातील तिर्लोट गावात आईच्या नावे खोटा सातबारा तयार करून शेतकरी असल्याचे दाखवून समेळपाडा येथे जमिनी विकत घेतल्या, असा आरोप आहे.

विकत घेतलेल्या जागेवर पहिला महसूल खात्यात खोटे दस्तऐवज केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल आहे. अनधिकृत इमारती उभ्या करून नागरिकांची, महसूल, नगररचना, सिडको, महानगरपालिका यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून अनधिकृत वाढीव बांधकाम केले असल्याचा आरोप माहिती अधिकारातून बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक यांनी केला आहे.

तसेच काही ठिकाणी बांधलेल्या इमारती या १५ वर्षातच पडायला आल्याने महापालिकेने नोटीस देऊन धोकादायक इमारत घोषित केले आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रहिवाशांवर अवघ्या १५ वर्षातच बेघर होण्याची वेळ आली आहे.

या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार पालिका आयुक्त, संबंधित सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यावर संबंधित तक्रारीची शहानिशा, चौकशी आणि कारवाई करून अहवाल देण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे उत्तर पालिकेकडून देण्यात आले आहे.

Wednesday, 9 September 2026

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !!

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !!

विरार प्रतिनिधी/पंकज चव्हाण

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ आयोजन व नियोजनाची सभा सन्माननीय महापौर श्री. अजीवजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेस वसई तालुक्यातील २०८ शाळा व महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गतवर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हास्तरावर ४४ क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये तब्बल २७,६४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून वसई-विरारच्या क्रीडा क्षेत्रातील उत्साह अधोरेखित केला.

राष्ट्रीयस्तरीय खेळाडूंचा गौरव

या प्रसंगी राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय प्राविण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंचा महापौर श्री. अजीवजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कु. मानसी प्रमोद गायकवाड – बेसबॉल
कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विरार (पश्चिम)

कु. प्रणय प्रशांत शिंदे – नॅशनल इंग्लिश स्कूल, विरार (पश्चिम)

कु. संस्कार जितेंद्र बिरवटकर – यु. एस. ओसवाल ॲकॅडमी स्कूल, नालासोपारा

या गुणवंत खेळाडूंच्या कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावर्षी तीनही विभागांत शालेय क्रीडा महोत्सव

क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करताना महापौर श्री. अजीवजी पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर श्री. सुहास व्हनमाने यांनी शालेय क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या भाषणात महापौरांनी यावर्षी वसई तालुक्यातील तिन्ही विभागांमध्ये शालेय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तसेच जिल्हास्तरावरील विजेत्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पदकांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर सहभागी होणाऱ्या खेळाडूंना महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचेही त्यांनी स्वागत केले.

स्पर्धांचे उत्तम आयोजन व नियोजन केल्याबद्दल क्रीडा शिक्षकांनी महानगरपालिका व आयोजन समितीचे आभार मानले.

उपस्थित मान्यवर
सभेस सभागृह नेते श्री. प्रफुलजी साने, आरोग्य समिती सभापती श्री. निलेश देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते (कबड्डी) श्री. गिरीश इरनाक, उपायुक्त क्रीडा विभाग श्री. अजित मुठे, सहाय्यक क्रीडा आयुक्त सौ. नीता कोरे, जिल्हा क्रीडा प्रमुख प्रा. योगेश चौधरी, प्रमुख सल्लागार श्री. गोविंद शिंदे, सल्लागार श्री. माणिक दोतोंडे, उपप्रमुख श्री. जितेंद्र पाटील, तांत्रिक क्रीडा समन्वयक श्री. जयेश वैती, क्रीडा समन्वयक श्री. प्रमोद गोयल व श्री. अमित मोदी उपस्थित होते. तसेच क्रीडा समिती सदस्य श्री. संदेश नामदे, श्री. गौरव राऊत, श्री. देवेंद्र दांडेकर व श्री. स्वप्निल पाटील यांचीही उपस्थिती होती.

सभेचे सूत्रसंचालन श्री. जितेंद्र राऊत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना व्यासपीठ, गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन आणि वसई-विरारच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्याचा संकल्प या सभेतून अधोरेखित झाला.

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत व्हावे; नागरिकांची मागणी !!

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत व्हावे; नागरिकांची मागणी !!

*डोंबिवली, राजू नलावडे* :

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत असणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, कारण डोंबिवली आणि २७ गावांमध्ये मेट्रो, रस्ते आदी अनेक विकासकामे एमएमआरडीएकडून सुरू आहेत.

या कामांच्या संदर्भात जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. ठेकेदाराकडून अनेक चुका व हलगर्जी होत असल्याने कधीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच मंगळवारी (०८/०९/२०३६)  कल्याण-शीळ रोडवरील सोनरपाडा येथे बांधकाम गॅलरी कोसळण्याची घटना घडली आहे. मागील वर्षभरात मेट्रोच्या कामात दोन दुर्घटना झाल्या असून सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवली आहे. एमएमआरडीएकडून काँक्रीट रस्ते बनविताना अनेक चुका झाल्या असून त्या दुरुस्त करणे आवश्यक आहे.

जर एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवली किंवा २७ गावांत आणले गेले तर उपरोक्त संदर्भातील तक्रारी जनतेला थेट देता येतील, तसेच केडीएमसी, एमआयडीसी, वाहतूक पोलीस आदी सरकारी प्रशासनाला त्यांच्याशी समन्वय साधून काम करता येईल.

सध्या २७ गावांमध्ये भूसंपादनाचा तिढा निर्माण झाला आहे. ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी ग्रामस्थांना आपली कैफियत मांडण्यासाठी आणि कागदपत्रे देण्यासाठी जवळच एखादे कार्यालय असेल तर एमएमआरडीए आणि ग्रामस्थ या दोघांसाठीही ते सोयीचे होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे (डोंबिवली) यांनी केले.

सध्या एमएमआरडीएचे मुख्य कार्यालय वांद्रे, मुंबई येथे आहे. ठाणे येथे जसे उपकार्यालय सुरू केले आहे, तसे उपकार्यालय डोंबिवली किंवा २७ गावांत सुरू केल्यास अनेक प्रश्न तातडीने सोडविता येतील. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...