केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या (केडीएमटी) डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील बाजीप्रभू चौक मधील मुख्य बस स्थानक हे गैरसोय, असुविधा मुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. येथून एमआयडीसी निवासी, कल्याण आणि डोंबिवली ग्रामीण परिसरात जाणाऱ्या बसेस सुटतात. पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्री उशिरा पर्यंत येथून बसची येजा चालू असते. हजारो प्रवासी येथून ये जा करीत असतात. केडीएमटीचा दृष्टीने सर्वात गर्दीचा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे एमआयडीसी निवासी हा होय. निवासी येथे जाण्यासाठी या बाजीप्रभू चौकातील स्थानकात एक बस थांबा उभा केला आहे. परंतु हा बस थांबा प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीने, असुविधेने असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. याच निवासी थांब्यावर सकाळ, सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते तरी केडीएमटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी, सुविधा देण्यात चालढकल/निष्काळजीपणा होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे तेथे केडीएमटी वाहतूक नियंत्रक यांची केबिन आहे, त्यातील कर्मचारी हा प्रवाशांना होणारा त्रास मुकाटपणे बघत असतात.
१) सद्या पावसाळा सुरू आहे, पाऊस पडल्यावर बस थांब्यासमोर पाणी साचते. थांब्यावर बस उभी राहिल्यावर प्रवासी त्या पाण्यातूनच बस मध्ये चढत असतात. २) केडीएमटी बस स्थानकाच्या जवळ रिक्षावाले, फेरीवाले, टपरीवाले यांच्या गराडा असतो. जर बस वेळेवर आल्या नाहीत तर रिक्षावाले बिनधास्तपणे थांब्याजवळ उभे राहून प्रवासी घेत असतात. ३) निवासी बस थांबा छोटा असल्याने प्रवाशांची गर्दी झाली किंवा रांग वाढली तर प्रवाशांना बस थांब्याबाहेर भर पावसात, उन्हात उभे राहावे लागते. ४) महिला , पुरुष प्रवाशांसाठी येथे जवळच प्रसाधन /स्वच्छता गृह याची व्यवस्था नाही आहे. ५) जर जोरात पाऊस आला तर बस थांब्यापुढे शेड/पत्रा नसल्याने पावसाच्या सरी अंगावर येऊन भिजायला होते.
उपरोक्त बाबतीत प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. आता प्रवाशांना याविषयी आंदोलन करावे लागेल असे दिसते असे डोंबिवलीतील समाजसेवक राजू नलावडे यांनी सांगितले.
एमआयडीसी निवासी मधील रहिवाशांनी यावर दिलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :-
१. अनेकदा रिक्षा किंवा इतर बस मधे असल्याने निवासी बस स्टॉपच्या मागे किंवा पुढे थांबते व रांग मोडून सर्व प्रवासी चढायला चेंगराचेंगरी करतात. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना फार त्रास होतो.
2. बस स्टॉप वर लाईन सुरु होण्याच्या जागेच्या आधी अनेक घुसखोर प्रवासी घोळक्याने उभे रहातात व बसमध्ये घुसतात. लाईनीत उभे असणारे मागे रहातात.
3. बस स्टॉपच्या शेजारी अतिक्रमित चायनीज टपरी च्या अती उग्र वासाने प्रवासी हैराण होतात.
4. ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी राखीव आसने दर्शवण्यासाठी असलेल्या पट्ट्या अनेक बसमध्ये गायब झाल्या आहेत.
5. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी (समुहात नसलेल्या) वेगळे तिकीट न देता एकाच नागरीकाच्या हातात अनेक जणांसाठीचे तिकीट दिले जाते.
👆 मुकुंद साबळे ( व्यवसाय सीए, वय 65 वर्षे )
बाजीप्रभू चौक निवासी बस स्टॉप च्या बाजूलाच पान टपरी आहे आणि त्यामुळे तिथे अनेक लोक सिगारेट ओढत असतात त्यामुळे तिथे तो धूर होतो आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो एवढी सगळ्या वयाची लोकांची तिथे गर्दी असते त्या गर्दीच्या ठिकाणी सिगारेटचा धूर नसावा. तसेच त्या चायनीजच्या दुकानातून देखील वास येतो त्यामुळे त्या बसस्टॉप वर थांबणे असहाय्य होते. तसेच पावसामुळे तिथे खूप पाणी साचते ज्यामुळे तिकडे उभे सुधा राहता येत नाही. तसेच त्या बसस्टॉप वर बसचे एक वेळापत्रक असावे. बऱ्याच वेळा गाडी अर्धा अर्धा तास येत नाही ते का होते ते ही बघावे व अस होऊ नये ह्याचीही दक्षता घेण्यात यावी.
👆 मीनाक्षी नेरकर, गृहिणी, वय 74 वर्षे
केडीएमटीची बस सर्विस खूपच अनियमित झाली आहे. तासभर बस येत नाही.
बाजी प्रभू चौकात निवासी विभाग बस स्टॉप वर खूप पाणी साचलेले असते. त्या पाण्यातून बस मधे चढावे लागते.
👆 राजीव देशपांडे, निवृत्त, वय 70 वर्षे
मला नोकरीसाठी रोजच प्रभादेवी, मुंबई येथे रेल्वेने जावे लागते. त्यासाठी प्रथम मला सकाळी 6.20 वाजताची बस निवासी बस थांबा येथून आणि सायंकाळी/रात्री बाजीप्रभू चौक थांबा येथून केडीएमटी बस पकडावी लागते. सकाळची 6.20 आणि 6.25 वाजताची बस कधीच वेळेवर येत नाही. अनियमित बस सेवेमुळे अनेक वेळा मला रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागतो. सद्या असलेल्या बस या देखभाल दुरुस्ती व्यवस्थित न ठेवता तशाच पाठविल्या जात आहेत. प्रशासनाने सुस्थितीतील बस पाठवाव्यात जेणेकरून प्रवाशांना आणि चालक, वाहक यांना त्रास होणार नाही. वातानुकूलित बस सेवा का बंद केल्या हे समजत नाही, त्या पुन्हा चालू कराव्यात ही विनंती. जर बस सेवेत सुधारणा झाली नाही तर आम्हा Gen z तरुणांना यासाठी उग्र आंदोलन करावे लागेल.
👆 निहाल आंबेरकर, पदवीधर नोकरदार, वय 30 वर्षे