Thursday, 30 July 2026

भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी !!

भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी !!

*मुंबई (पी. डी. पाटील ):* श्री सरस्वती विद्यामंदिर, भांडूप (प) या शाळेत बुधवार दि.२९ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आईवडील, शिक्षक यांच्यावर निष्ठा व विश्वास असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर शिक्षकांनी आताच्या डिजिटल युगात विद्यार्थी व शिक्षक यांच्यात दुरावा होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षा संस्थेच्या संचालिका वर्षा वसंत सावंत होत्या. त्यांनी प्रा. पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गोळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच आपल्या मधुर स्वरात ' गुरूने दिला ज्ञानरूपी वसा ' गीताने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या गायन, भाषण, नृत्य, कवितांतून गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. स्वामी समर्थ केंद्राचे प्रकाश गोडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

तसेच याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांना शाळेला देणगी देऊन सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडनेरे मॅडम यांनी केले तर पर्यवेक्षक नरेंद भारंबे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.

एसटी महामंडळाच्या अधिकृत केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड शिबिराला सुरुवात !!

एसटी महामंडळाच्या अधिकृत केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड शिबिराला सुरुवात !!

*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन*  

*डोंबिवली, दि. 30 जुलै 2026*

65 वर्षांवरील पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या अधिकृत नोंदणी केंद्रामार्फत NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला आज डोंबिवली एमआयडीसी येथील एसटी डेपोमध्ये सुरुवात झाली. 

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या प्रयत्नातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

*पहिल्याच दिवशी 100 जणांचा प्रतिसाद*  
शिबिराचा शुभारंभ आज गुरुवार दि. 30 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी सुमारे 100 ज्येष्ठ पुरुष नागरिकांनी शासनाने निश्चित केलेले ₹199 शुल्क भरून स्मार्ट कार्डचा लाभ घेतला.

*सवलतीबाबत माहिती*  
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 65 वर्षे पूर्ण झालेल्या पुरुष ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात 50 टक्के भाडे सवलत मिळण्यासाठी हे NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. 
याशिवाय, राज्यातील सर्व महिलांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 100 टक्के मोफत प्रवासाची सुविधा आहे.

*शिबिराचे वेळापत्रक आणि कागदपत्रे*  
हे विशेष नोंदणी शिबिर 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत एसटी डेपो, जिमखाना रोड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथे सुरू राहणार आहे.

तसेच 3 ऑगस्ट 2026 पासून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत दररोज दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत सशुल्क NCMC स्मार्ट कार्ड सेवा नियमितपणे उपलब्ध राहणार आहे.

*आवश्यक कागदपत्रे*: आधार कार्ड, OTP साठी स्वतःचा मोबाईल, 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणि ज्येष्ठ नागरिकाची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे. शुल्क ₹199 आहे. हरवले किंवा खराब झालेले कार्डही नियमानुसार शुल्क भरून बदलून मिळेल.

*मान्यवरांची उपस्थिती*  
कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, उपशहर प्रमुख सुनील भोसले, विभाग प्रमुख तेजस पाटील, कार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, एसटी विभाग नियंत्रक कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी धनंजय शिंदे, आगार व्यवस्थापक चेतन देवधर, खासदार कार्यालयाचे प्रतिनिधी प्रकाश माने यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या वतीने 65 वर्षांवरील सर्व पात्र पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Wednesday, 29 July 2026

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ.

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) :: नवतरुण मित्र मंडळ, पाणजे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा सहलीचे औचित्य साधून वृक्षारोपण तसेच शिवमंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या सदस्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच शिवमंदिर परिसराची स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा आदर्श निर्माण केला आहे.यावेळी अक्कादेवी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

या उपक्रमात आर. झुंजारवाला ट्रस्टचे डॉक्टर व सहकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच  लकपती पाटील, माजी उपसरपंच अविनाश पाटील, मंडळाचे अध्यक्ष दर्शन पाटील, कार्याध्यक्ष हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ पाटील, सदस्य अरुण पाटील, जितेंद्र पाटील, ॲड. विक्रम पाटील, मिलिंद पाटील, मंजीत पाटील, दीपेश पाटील, नंदलाल पाटील, सुशांत पाटील, सुनील पाटील, सचिन भोईर, महेंद्र पाटील, प्रकाश पाटील, लहुराज भोईर मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.४२ वर्षे परंपरा जोपसणारे नवतरुण मित्र मंडळाच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, युवकांनी केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला

पागोटे येथे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी सोहळा उत्साहात संपन्न.!!

पागोटे येथे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी सोहळा उत्साहात संपन्न.!!

उरण, दि. २८, (विठ्ठल ममताबादे) : कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था व शिवसेना शाखा पागोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पागोटे येथे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री गणेश हनुमान मंदिर, पागोटे येथे हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमांतर्गत नवघर जिल्हा परिषद शाळांमधील आदर्श व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, तसेच उरण तालुक्यातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

यासोबतच पागोटे गावातील निराधार व गरजू महिलांना वस्तू वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रमही यावेळी राबविण्यात  आला. शिक्षण आणि सामाजिक सेवा यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कार्यक्रमाला विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.विशेषत: मनोहरशेठ भोईर माजी आमदार,गणेश शिंदे उरण माजी नगराध्यक्ष, अतुल ठाकूर नगरसेवक गटनेता, अमित ठाकूर नगरसेवक,प्रेरणाताई पाटील जिल्हा परिषद सदस्य, परेश ठाकूर उपसभापती, दीपक भोईर पंचायत समिती सदस्य, संतोष पवार उरण सामाजिक संस्था सेक्रेटरी, महादेव बंडा माजी उपसभापती, सुनील तांडेल राष्ट्रवादी काँग्रेस नवघर पंचायत समिती, सुजित काशिनाथ पाटील काँग्रेस अध्यक्ष पागोटे, महेंद्र पाटील शिवसेना शाखा प्रमुख पागोटे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार, वस्तू वाटप आणि अन्य सामाजिक उपक्रम पार पडला.या उपक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा कुणाल पाटील तसेच पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल अरुण पाटील यांच्यासह शिवसेना शाखा पागोटे व ग्रामस्थ मंडळ पागोटे यांचे सहकार्य लाभले आहे.विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याला प्रोत्साहन देणे आणि गरजू महिलांना मदतीचा हात देणे, या दुहेरी उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम पागोटे परिसरातील सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजन असल्यामुळे उपस्थित मान्यवर,नागरिकांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे व आयोजकांचे कौतुक केले.

भारतीय मजदूर संघाचा १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशव्यापी जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाचा निर्णय !!

भारतीय मजदूर संघाचा १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशव्यापी जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाचा निर्णय !!

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक दि. २६, २७ व २८ जुलै २०२६ रोजी सरला बिर्ला विद्यापीठ, रांची (झारखंड) येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली. देशभरातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यसमितीने केंद्र सरकारला वरील सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. कामगारांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास देशभरात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष एस. मल्लेशम होते. यावेळी अखिल भारतीय महामंत्री सुरेंद्र कुमार पांडे, संघटन मंत्री  बी. सुरेंद्रन, माजी अखिल भारतीय अध्यक्ष  सी. के. साजी नारायणन,  हिरण्मय पंड्या, महाराष्ट्राचे केंद्रीय सचिव अनिल ढुमणे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस  सचिन मेंगाळे,  अण्णा धुमाळ,  बंदरे उद्योग,  , परिवहन महासंघाचे महामंत्री  राजू भालेराव, प्रवासी कामगार प्रकोष्ठाचे प्रभारी  श्रीपाद कुटासकर,  बॅक प्रभारी रामनाथ किणी , श्रीमती तृप्ती आळती, रेल्वे उद्योग मंगेश देशपांडे,  बाळासाहेब भुजबळ  यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे २० वरिष्ठ पदाधिकारी तसेच देशभरातील विविध उद्योग महासंघांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुधांशू रानडे आणि प्रदेश सरचिटणीस श्री किरण मिलगीर यांनी राज्यातील सर्व संलग्न संघटना, पदाधिकारी आणि हजारो कामगारांना दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित देशव्यापी धरणे आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.



या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत :

1. ईएसआयसी (ESIC) वेतन मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करण्यात यावी.
2. ईपीएफ (EPF) अंतर्गत किमान पेन्शन ₹१,००० वरून ₹७,५०० प्रतिमहिना करण्यात यावी.
3. ईपीएफ वेतन मर्यादा ₹१५,००० वरून ₹३०,००० करण्यात यावी.
4. बोनस गणनेसाठी वेतन मर्यादा ₹७,००० वरून ₹१८,००० करण्यात यावी.
5. बोनस पात्रतेची वेतन मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करण्यात यावी.
6. सर्व योजना (Scheme) कामगारांचे मानधन भरीव प्रमाणात वाढविण्यात यावे.
7. कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना "समान काम – समान वेतन" या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
8. श्रमसंहितांमधील (Labour Codes) कामगारविरोधी तरतुदी रद्द अथवा आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात.
9. बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील पाच दिवसांचा कामकाजाचा नियम तातडीने लागू करण्यात यावा.
10. ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा ₹२० लाखांवरून ₹४० लाखांपर्यंत वाढविण्यात यावी तसेच सर्व पात्र कामगारांना ग्रॅच्युइटीचा लाभ सुनिश्चित करण्यात यावा.
11. देशातील सर्व कामगारांसाठी किमान वेतन ₹३०,००० प्रतिमहिना निश्चित करण्यात यावे.

सेंट पीटर ज्युनियर कॉलेजमध्ये महिला कर्करोग जनजागृती व्याख्यान उत्साहात संपन्न !!

सेंट पीटर ज्युनियर कॉलेजमध्ये महिला कर्करोग जनजागृती व्याख्यान उत्साहात संपन्न !!

वसई प्रतिनिधी/ मयुरी चव्हाण

महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए३ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ वसई  यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट पीटर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, दिवाणमान, वसई (प.) येथे बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी महिला कर्करोग जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला विद्यार्थिनी, महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विश्वस्त श्री. राहुल जोसेफ आणि प्राचार्या सौ. लता के. सौंदाणे, प्रमुख पाहुण्या म्हणून लायन्स क्लब ऑफ वसई च्या भारती पवार (सॅटेलाइट को-ऑर्डिनेटर), डॉ. जुली सिंह (डीसी – महिला व बालकल्याण) तसेच हनुमंत भोसले (डीएफए – एचपीव्ही सर्व्हायकल कर्करोग लसीकरण) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी गेल्या १५ वर्षांपासून मीरा-भाईंदर परिसरात प्रख्यात स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंध, जनजागृती आणि एचपीव्ही लसीकरण  तसेच  इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्याच्या संबंधित समितीच्या संयोजक म्हणूनही कार्यरत असणाऱ्या डॉ. नवनीत देसाई  यांनी आपल्या मार्गदर्शनात स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत सविस्तर माहिती दिली. कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, योग्य वेळेत निदानाचे महत्त्व, नियमित आरोग्य तपासणीची आवश्यकता, उपलब्ध आधुनिक उपचारपद्धती तसेच एचपीव्ही (HPV) लसीचे महत्त्व, लस घेण्याचे योग्य वय आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणामधील तिची भूमिका याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहावे, नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

व्याख्यानानंतर विद्यार्थिनी, महिला शिक्षक, कर्मचारी आणि उपस्थित पालक यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या संवादात्मक सत्रामुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मोलाची मदत झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर लायन श्रद्धा मोरे व लायन वनिता निनावकर, एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन चे प्रतिनिधी मनोज परब, शाहीन शेख तसेच सेंट पीटर ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन गेल्या आठ वर्षापासून कर्करोगाचे लवकर निदान, योग्य उपचार आणि जनजागृतीसाठी कार्यरत आहे. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, कर्करोगाचे वेळेत निदान व प्रतिबंधाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण, उपयुक्त आणि समाजोपयोगी असल्याची भावना व्यक्त केली.

Tuesday, 28 July 2026

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

            कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या (केडीएमटी) डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील बाजीप्रभू चौक मधील मुख्य बस स्थानक हे गैरसोय, असुविधा मुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. येथून एमआयडीसी निवासी, कल्याण आणि डोंबिवली ग्रामीण परिसरात जाणाऱ्या बसेस सुटतात. पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्री उशिरा पर्यंत येथून बसची येजा चालू असते. हजारो प्रवासी येथून ये जा करीत असतात. केडीएमटीचा दृष्टीने सर्वात गर्दीचा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे एमआयडीसी निवासी हा होय. निवासी येथे जाण्यासाठी या बाजीप्रभू चौकातील स्थानकात एक बस थांबा उभा केला आहे. परंतु हा बस थांबा प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीने, असुविधेने असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. याच निवासी थांब्यावर सकाळ, सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते तरी केडीएमटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी, सुविधा देण्यात चालढकल/निष्काळजीपणा होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे तेथे केडीएमटी वाहतूक नियंत्रक यांची केबिन आहे, त्यातील कर्मचारी हा प्रवाशांना होणारा त्रास मुकाटपणे बघत असतात.
१) सद्या पावसाळा सुरू आहे, पाऊस पडल्यावर बस थांब्यासमोर पाणी साचते. थांब्यावर बस उभी राहिल्यावर प्रवासी त्या पाण्यातूनच बस मध्ये चढत असतात. २) केडीएमटी बस स्थानकाच्या जवळ रिक्षावाले, फेरीवाले, टपरीवाले यांच्या गराडा असतो. जर बस वेळेवर आल्या नाहीत तर रिक्षावाले बिनधास्तपणे थांब्याजवळ उभे राहून प्रवासी घेत असतात. ३) निवासी बस थांबा छोटा असल्याने प्रवाशांची गर्दी झाली किंवा रांग वाढली तर प्रवाशांना बस थांब्याबाहेर भर पावसात, उन्हात उभे राहावे लागते. ४) महिला , पुरुष प्रवाशांसाठी येथे जवळच प्रसाधन /स्वच्छता गृह याची व्यवस्था नाही आहे. ५) जर जोरात पाऊस आला तर बस थांब्यापुढे शेड/पत्रा नसल्याने पावसाच्या सरी अंगावर येऊन भिजायला होते.

       उपरोक्त बाबतीत प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. आता प्रवाशांना याविषयी आंदोलन करावे लागेल असे दिसते असे डोंबिवलीतील समाजसेवक राजू नलावडे यांनी सांगितले.

       एमआयडीसी निवासी मधील रहिवाशांनी यावर दिलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :-

१. अनेकदा रिक्षा किंवा इतर बस मधे असल्याने निवासी बस स्टॉपच्या मागे किंवा पुढे थांबते व रांग मोडून सर्व प्रवासी चढायला चेंगराचेंगरी करतात. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना फार त्रास होतो.
2. बस स्टॉप वर लाईन सुरु होण्याच्या जागेच्या आधी अनेक घुसखोर प्रवासी घोळक्याने उभे रहातात व बसमध्ये घुसतात. लाईनीत उभे असणारे मागे रहातात.
3. बस स्टॉपच्या शेजारी अतिक्रमित चायनीज टपरी च्या अती उग्र वासाने प्रवासी हैराण होतात.
4. ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी राखीव आसने दर्शवण्यासाठी असलेल्या पट्ट्या अनेक बसमध्ये गायब झाल्या आहेत. 
5. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी (समुहात नसलेल्या) वेगळे तिकीट न देता एकाच नागरीकाच्या हातात अनेक जणांसाठीचे तिकीट दिले जाते. 

👆 मुकुंद साबळे ( व्यवसाय सीए, वय 65 वर्षे )

बाजीप्रभू चौक निवासी बस स्टॉप च्या बाजूलाच पान टपरी आहे आणि त्यामुळे तिथे अनेक लोक सिगारेट ओढत असतात त्यामुळे तिथे तो धूर होतो आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो एवढी सगळ्या वयाची लोकांची तिथे गर्दी असते त्या गर्दीच्या ठिकाणी सिगारेटचा धूर नसावा. तसेच त्या चायनीजच्या दुकानातून देखील वास येतो त्यामुळे त्या बसस्टॉप वर थांबणे असहाय्य होते. तसेच पावसामुळे तिथे खूप पाणी साचते ज्यामुळे तिकडे उभे सुधा राहता येत नाही. तसेच त्या बसस्टॉप वर बसचे एक वेळापत्रक असावे. बऱ्याच वेळा गाडी अर्धा अर्धा तास येत नाही ते का होते ते ही बघावे व अस होऊ नये ह्याचीही दक्षता घेण्यात यावी.

👆 मीनाक्षी नेरकर, गृहिणी, वय 74 वर्षे 

केडीएमटीची बस सर्विस खूपच अनियमित झाली आहे. तासभर बस येत नाही.
बाजी प्रभू चौकात निवासी विभाग बस स्टॉप वर खूप पाणी साचलेले असते. त्या पाण्यातून बस मधे चढावे लागते. 

👆 राजीव देशपांडे, निवृत्त, वय 70 वर्षे

   मला नोकरीसाठी रोजच प्रभादेवी, मुंबई येथे रेल्वेने जावे लागते. त्यासाठी प्रथम मला सकाळी 6.20 वाजताची बस निवासी बस थांबा येथून आणि सायंकाळी/रात्री बाजीप्रभू चौक थांबा येथून केडीएमटी बस पकडावी लागते. सकाळची 6.20 आणि 6.25 वाजताची बस कधीच वेळेवर येत नाही. अनियमित बस सेवेमुळे अनेक वेळा मला रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागतो. सद्या असलेल्या बस या देखभाल दुरुस्ती व्यवस्थित न ठेवता तशाच पाठविल्या जात आहेत. प्रशासनाने सुस्थितीतील बस पाठवाव्यात जेणेकरून प्रवाशांना आणि चालक, वाहक यांना त्रास होणार नाही. वातानुकूलित बस सेवा का बंद केल्या हे समजत नाही, त्या पुन्हा चालू कराव्यात ही विनंती. जर बस सेवेत सुधारणा झाली नाही तर आम्हा Gen z तरुणांना यासाठी उग्र आंदोलन करावे लागेल.
 
👆 निहाल आंबेरकर, पदवीधर नोकरदार, वय 30 वर्षे

भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी !!

भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी !! *मुंबई (पी. डी. पाटील ):* श्री सरस्वती विद्यामंदिर, भांडूप (प) या शा...