धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !!
वसई (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील धोबीघाट रोड, राजवली, बोयदा पाडा येथे सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदार विष्णू गुप्ता यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. पृथ्वीराज बी.पी. साहेब तसेच सीयूसी (CUC) प्रमुख मा. विशाखा मोडगडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून या अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेकडे सातत्याने तक्रारी नोंदवण्यात येत आहेत. मात्र, संबंधित यंत्रणेकडून कोणताही ठोस प्रतिसाद किंवा प्रत्यक्ष कारवाई करण्यात आलेली नाही. प्रभाग समितीतील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे किंवा संगनमतानेच अशा अवैध बांधकामांना खतपाणी घातले जात असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.
तक्रारदाराच्या मुख्य मागण्या:
* परवानग्यांची तपासणी: संबंधित बांधकामासाठी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी, मंजूर नकाशा व इतर वैध कागदपत्रे आहेत का, याची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी व्हावी.
* MRTP कायद्यांतर्गत कारवाई: बांधकाम अनधिकृत आढळल्यास एमआरटीपी (MRTP) कायद्यानुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल करून बांधकाम तात्काळ निष्कासित (तोडण्यात) यावे.
* CUC प्रमुखांची विशेष मध्यस्थी: सीयूसी प्रमुख विशाखा मोटघरे यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून घटनास्थळाची पाहणी करावी आणि तातडीने तोडक कारवाईचे आदेश द्यावेत.
* अधिकाऱ्यांची चौकशी: चार दिवस तक्रारी येऊनही दुर्लक्ष करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
वारंवार तक्रारी करूनही बांधकाम सुसाट सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता पालिका आयुक्त आणि सीयूसी प्रमुख या अनधिकृत बांधकामावर काय पावले उचलतात आणि दोषींवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तक्रारदाराने या प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याचीही विनंती पत्रात केली आहे.