Sunday, 28 June 2026

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका मा. सौ. माया कांबळे यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी व पाणी दौरा केला. या दौऱ्यात नदीच्या विविध पाच ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

नदीतील वाढलेले प्रदूषण, साचलेला गाळ, दुर्गंधी आणि नदीची झालेली दयनीय अवस्था पाहून सौ. माया कांबळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. "कल्याण हे एक सुंदर शहर असून शहरातील नदीची अशी अवस्था असणे दुर्दैवी आहे. आपण सर्वांनी मिळून ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारली पाहिजे. नदी ही आपली आई आहे आणि तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे," असे त्या म्हणाल्या.

वालधुनी नदीच्या पुनर्जीवनासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाशी चर्चा करून येणाऱ्या सभागृहात हा विषय लक्षवेधी स्वरूपात मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात संस्थेचे प्रमुख सदस्य श्री. अनिल गायकवाड, श्रीमती सुनीता खेताडे, श्री. अनिल सरदार, श्री. किरण म्हात्रे, श्री. दिलीप दादा गायकवाड तसेच संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीर उदयकर यांनी नदीची सद्यस्थिती, प्रदूषणाची  आणि पुनर्जीवनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देऊन प्रशासनाने लवकरात लवकर काम सुरू करण्याची विनंती केली.

दौऱ्याच्या शेवटी सौ. माया कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

" राजर्षी शाहू महाराजांची १५२वी जयंती विक्रोळीतील रत्नबोधी बुद्ध विहारात उत्साहात संपन्न " !!

" राजर्षी शाहू महाराजांची १५२वी जयंती विक्रोळीतील रत्नबोधी बुद्ध विहारात उत्साहात संपन्न " !!

बौद्धजन सेवा संघ, रत्नबोधी बुद्ध विहार व्यवस्थापन  समितीने शुक्रवार, दि. २६/६/२०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या १५२वी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयात विद्यावाचस्पती पदवी (Ph.D.) प्राप्त केलेल्या व विद्यादानच्या पवित्र सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्यांच्या सत्काराचे नियोजन केले होते. विशेष म्हणजे एकूण ७ निवडक सत्कारमूर्तीमध्ये ५ महिला प्राध्यापिका /संशोधकांचा समावेश होता. 

यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. लक्ष्मी साळवे, डॉ.‌ जयश्री खंडागळे, ठाणे येथील के. बी. महिला महाविद्यालयाच्या साहयक प्राध्यापिका डॉ. उषा भंडारे, सावित्रीबाई फुले बी.एड. कॉलेजच्या प्राध्यापिका रुपाली सदरे-पवार, तसेच भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव डॉ. एस. के. भंडारे व सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु ज. भंडारे यांचा  बौद्धजन सेवा संघांच्या विश्र्वस्तांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व जेष्ठ साहित्यिक आयु. प्रेमानंद गज्वी लिखित 'बोधी संस्कृती' हा ग्रंथ भेट देऊन सर्वाना सन्मानित केले. 

त्यानंतर प्रत्येकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना बहूजन समाजातील महिला व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांसह, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निस्वार्थीपणे केलेल्या समाजकार्याचा आढावा सादर केला. 

आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत संविधानाचे महत्व व गौरवशाली परंपरेचा मागोवा घेताना, त्यांनी  समता, स्वातंत्र, बंधूभाव, सामाजिक न्याय व‌ नैतिक आचरण अशा समस्त प्राणीमात्राच्या कल्याणसाठी सर्वश्रेष्ठ मुल्यांवर आधारित शासनव्यवस्था चालवण्यासाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली तरच येणाऱ्या काळात देशातील अनेक गंभीर प्रश्न सुटतील व बहूजनांचा जगण्याचा मार्ग सुकर होईल. चातुर्वण व्यवस्थेमुळे हजारो वर्षांपासून माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आमच्या पुर्जजाना नाकारल्यामुळेच आजपर्यंत आमच्या दोन पिढ्या प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आहेत, असे सकारात्मक विश्लेषण एका वक्त्याने केले.

आज‌ बहूजन‌ समाजातील महिला व‌ पुरुष विविध क्षेत्रात उच्चपदस्थ पहायला मिळताना दिसतात, तसेच त्यांच्या पुढच्या पिढीतील तरूणदेखिल व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योजक, प्रशासकिय‌ अधिकारी, वैद्यकीय डॉक्टर, अभियंता, संगणक व आय. टी. तज्ञ होताना दिसत आहे. अलीकडे काहीजण स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योजक बनताना दिसत आहेत, हे सर्व शिक्षण व आपल्या मुलांना मिळालेल्या संविधानिक हक्क व अधिकारांमुळे शक्य झाले आहे, असेही एका वक्त्याने नम्रपणे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौध्दजन सेवा संघ, रत्नबोधी विहार संचालक मंडळाचे विश्र्वत-अध्यक्ष आयु. प्रविण केदारेसर होते, त्यांनी येणाऱ्या काळात रत्नबोधी विहारात समाजप्रबोधनाचे अनेक उत्तम उपक्रम राबविण्याचे वेळापत्रकच थोडक्यात सादर केले. तसेच जुलैपासून सुरू होणार्या वर्षावासाच्या प्रवचन मालिकेत यावेळी १००% विविध क्षेत्रातील महिलांना व्याख्यानासाठी आमंत्रित करुन त्यांचा गौरव करण्याचा मनोदय देखील त्यांनी बोलून दाखविला. 

संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. दिपक पगारे सरांनी केले व संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस आयु. जगदीश गवारे, उपाध्यक्ष आयुनी निर्मलाताई गवळी, खजिनदार आयु. भूपेंद्र हिरे, चिटणीस आयु. आनंद घोक्षे , आयुनी. सुवर्णाताई टिळक आयु. अरविंद जाधव, ऍड. वैभव झेंडे, आयु. विशाल कांबळे, आयु. राजेश साळवे, आयु. शशिकांत गांगुर्डे, आयु. महेंद्र कदम, आयु. दशरथ गायकवाड यांनीदेखील भरपूर मेहनत घेतली. याशिवाय संस्थेचे आजीव सभासद व हितचिंतकांचेही सहकार्य लाभले.

*-आयु. प्रविण केदारे (अध्यक्ष)* 
बौद्धजन सेवा संघ, रत्नबोधी बुद्ध विहार, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई

प्रसिद्धी/वृत्तांकन - अश्विनी निवाते 

टिटवाळा इंदिरानगर येथे पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या तीन मुलांना भरधाव कारने उडवले !!

टिटवाळा इंदिरानगर येथे पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या तीन मुलांना भरधाव कारने उडवले !!

जलजीवन मिशन योजना कागदावरच

टिटवाळा (संदीप शेंडगे) : टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरात पाणी भरण्यासाठी जात असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात तिन लहान मुले जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने घरी गॅलनमध्ये पाणी घेऊन जाणाऱ्या तीन मुलांना जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरदार होती की कार रस्त्यालगत असलेल्या गाळ्यात शिरली. या अपघातात गाळ्याचे तसेच तेथे उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले.

हर घर जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा पुरवणे सरकारचे उद्दिष्ट असून अध्याप हे टिटवाळा सारख्या शहरी भागात उद्दिष्ट पूर्ण न झाल्याचे दिसत आहे. ही योजना कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजही येथील नागरिकांना टँकर ने किंवा सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागत आहे.

या अपघातात किशन आनंद (१२), अनीकेत कुमार (१३) आणि रिषभ शर्मा (१३) हे तिघे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे टिटवाळा परिसरातील पाणीटंचाई, नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट आणि भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यासह आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सुभाष टेकडी येथे महामोर्चासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन !!

सुभाष टेकडी येथे महामोर्चासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन !!
उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसरात आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 29 तारखेला होणाऱ्या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी बुद्धभूमी प्रकरणावर आपली भूमिका ठामपणे मांडत जोरदार घोषणा दिल्या.

"बुद्धभूमी आमच्या हक्काची आहे, कोणाच्या बापाची नाही" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी बुद्धभूमीच्या संरक्षणासाठी आणि आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. तसेच 29 तारखेला होणारा महामोर्चा शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामोर्चामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन करण्यात आले.

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आयोजकांनी सर्व समाजबांधवांना 29 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सुप्रसिद्ध सिने कलाकार गायत्री मोरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक शहर अध्यक्षा युवती आघाडी (सांस्कृतिक विभाग) पदी निवड !!

सुप्रसिद्ध सिने कलाकार गायत्री मोरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक शहर अध्यक्षा युवती आघाडी (सांस्कृतिक विभाग) पदी निवड !!

नाशिक (सचिन ननगरे) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अतिशय जोमाने संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. नाशिक शहरात देखील पक्ष प्रवेश जोमाने सुरू आहे त्याच अनुषंगाने टी.व्ही सिरीयल मधील सिने अभिनेत्री गायत्रीताई मोरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक शहर युवती आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर केली. गायत्रीताई मोरे यांनी विविध मराठी मालिकांमध्ये उत्कृष्टरित्या भूमिका साकारली आहे, सध्या देखील त्या स्टार प्रवाह चॅनेल च्या मालिकांमध्ये काम करत आहे. गायत्री ताई मोरे यांच्या जनसंपर्क समस्त युवा/युवतींमध्ये दांडगा असून संपूर्ण नाशिक शहरात युवक आघाडी लवकरच जोमाने मोठ्या ताकदीने उभी राहणार असे आश्वासन निवडी प्रसंगी गायत्री ताई मोरे यांनी दिले.

गायत्री ताई मोरे यांच्या निवडीने समस्त नाशिक शहरातील यांच्या संपर्कातील नागरिकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच गायत्री ताई यांच्या माध्यमातून नाशिक शहरात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे "युवा जोडो" अभियानाला सुरुवात करून शहरातील युवा युवतींचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

निवडी प्रसंगी युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य बिपीन कटारे, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल, सातपूर महिला अध्यक्षा मायाताई कांबळे, नितीन बोबडे आदी उपस्थित होते.

एसटी सवलतीच्या प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना नवा नियम !!

एसटी सवलतीच्या प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना नवा नियम !!

** डिजिटल व्यवस्थापनाला चालना; बनावट लाभार्थ्यांवर बसणार आळा, सवलतीची पडताळणी होणार अधिक सुलभ

मुंबई | सचिन ननगरे : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने सवलतीच्या प्रवासात अधिक पारदर्शकता, अचूक पडताळणी आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य करण्यात येणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या प्रवाशांसाठी केली जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात विद्यार्थी, दिव्यांग, विविध पुरस्कारार्थी तसेच इतर सर्व सवलतधारक प्रवाशांनाही एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या या नव्या धोरणामुळे सवलतीच्या प्रवासाची पडताळणी अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. तसेच बनावट लाभार्थ्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा देण्याचा उद्देश असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे :
१ ऑगस्टपासून सवलतीच्या एसटी प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य.

सुरुवातीला महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना नियम लागू.

पुढील टप्प्यात विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर सर्व सवलतधारकांनाही कार्ड बंधनकारक.

सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता, अचूक पडताळणी आणि डिजिटल व्यवस्थापनाला चालना मिळणार.

अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणी घोटाळ्यावर सरकारचा मोठा प्रहार; दोषी अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फीची कारवाई, १० ते २० हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी !!

अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणी घोटाळ्यावर सरकारचा मोठा प्रहार; दोषी अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फीची कारवाई, १० ते २० हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी !!

नवी मुंबई |  सचिन ननगरे : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

यासोबतच मुद्रांक शुल्काशी संबंधित अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभर झालेल्या सर्व दस्त नोंदणी प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या चौकशीतून राज्यातील १० ते २० हजार कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभेत ज्येष्ठ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने ही भूमिका स्पष्ट केली.

या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, दस्त नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !! वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सि...