Friday, 22 May 2026

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत 100 हून अधिक अनधिकृत खोल्या तसेच सुमारे 70 जोते जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोरसे तसेच सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या उपस्थितीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पथक आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.

पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामे परवानगीशिवाय उभारण्यात आली होती. वारंवार नोटिसा देऊनही बांधकामे हटविण्यात आली नसल्याने अखेर ही कठोर कारवाई करण्यात आली.

 या मोहिमेत जेसीबी आणि इतर यंत्रांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

कल्याण परिमंडळ ०३ ची आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई; तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त !!

कल्याण परिमंडळ ०३ ची आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई; तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त !!

डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा मोठा घाव

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण परिमंडळ ०३ अंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल ३४ कोटी १८ लाख ५४ हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. ही कारवाई परिमंडळ ०३ मधील आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई मानली जात असून, यामुळे अमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले आहेत.

डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कल्याण परिसरात पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील स्मशानभूमी परिसर आणि सांगळे वाडी मार्गावर अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना दोन संशयित इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले.

पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही जागीच ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात हेरॉईन (गर्द) जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत तब्बल ३४ कोटींहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कासिम अब्दुल सतार (वय ३८, शाहापूर, ठाणे) आणि कृष्णा नागण्णा हक्केमणी वय ३६, (सायन कोळीवाडा, मुंबई) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणातील मुख्य पुरवठादार आणि इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. दयानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे कल्याण परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले असून, अमली पदार्थ तस्करांविरोधातील मोहिम आणखी तीव्र करण्याची मागणी होत आहे.

Thursday, 21 May 2026

संत एकनाथ रंगमंदिर येथे २३ मे रोजी 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन !!

संत एकनाथ रंगमंदिर येथे २३ मे रोजी 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन !!

छ. संभाजीनगर (प्रतिनिधी):

शहरात प्रथमच आगळ्या वेगळ्या धाटणीतील 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि गुणगानाचे लोककलेच्या माध्यमातून सादरीकरण करणारा हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे रंगणार आहे.

महाराष्ट्रभर या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, लोककला आणि शिवचरित्र यांचा संगम असलेल्या या आख्यानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कार्यक्रमातील प्रत्येक गीतावर तरुणाई आणि महिला उत्स्फूर्तपणे नृत्य व गायनात सहभागी होत असल्याचा अनुभव आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमात वासुदेव, हलगी, ढोलक, डफ, बासरी, तुणतुणे यांसारख्या पारंपरिक आणि देशी वाद्यांच्या साथीने - छत्रपती शिवाजी महाराजांचे ने गुणगान सादर करण्यात येणार - आहे. लोप पावत चाललेल्या

अनेक लोकवाद्यांचे पुनर्जीवन या कार्यक्रमातून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच गण, गौळण, जोगवा यांसारख्या लोकपरंपरांसह मृदंग आणि बासरीची सुंदर जुगलबंदीही रसिकांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाचे निर्माते, गीतलेखक आणि संगीतकार योगेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचावेत यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. कार्यक्रमातील सर्व कलाकार महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भाग, वाडी-वस्ती आणि दुर्गम क्षेत्रांतून सहभागी झाले असून, प्रत्येक कलाकाराने आपल्या कलेत जीव ओतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ग्रामीण आणि लोककलावंतांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनोख्या लोककला सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कॉंग्रेसच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !

कॉंग्रेसच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
 रायगड जिल्हा हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन भूमी आहे. राजकारणातील सारीपटात कॉंग्रेसने वरिष्ठ पातळीवर दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड असे रायगड जिल्ह्याचे दोन तुकडे केले आहेत. त्यामुळे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. मनीष पाटील आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजाभाऊ ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. मनीष पाटील हे सध्या रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे रायगडचे मावळते जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी 'सुखकर्ता' बंगल्यावर डॉ. मनीष पाटील यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.डॉ मनीष पाटील,राजाभाऊ ठाकूर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ पुणे येथे किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष गणेश ताठे यांची सदिच्छा भेट !!

विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ पुणे येथे किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष  गणेश ताठे यांची सदिच्छा भेट !!

विज उद्योगातील कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा.

विविध जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित.

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
भारतीय मजदूर संघ संलग्न विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ, पुणे कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) गणेश ताठे यांची सदिच्छा भेट घेऊन विविध प्रलंबित कामगार प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.

बैठकीदरम्यान विज उद्योगामध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना अत्यंत प्रतिकूल व जोखमीच्या परिस्थितीत काम करावे लागत असून, त्यांच्या कामाचे स्वरूप, तांत्रिक जबाबदाऱ्या व जीविताचा धोका लक्षात घेता विज उद्योगातील कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र किमान वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.

यावर अध्यक्ष  गणेश ताठे यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करत संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तसेच पुणे मेट्रो रेल कामगार संघ यांच्या माध्यमातून पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये कार्यरत कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार वेतन देण्यात यावे, तसेच कामगारांना सर्व कायदेशीर सुविधा तातडीने लागू करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली.

कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

या प्रसंगी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मज़दूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, संघटन सचिव उमेश आणेराव, पुणे मेट्रो रेल कामगार संघ अध्यक्ष राम सुरवसे, तसेच निखील टेकवडे, सुमीत कांबळे व चंद्रकांत नागरगोजे उपस्थित होते.विविध जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यातील महत्वाचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन छेडणार !

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन छेडणार ! 

** रायगड जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांचा इशारा


उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मुळापासून उखडून टाकणारा आहे. या कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी असून, तो हिंदू धर्माच्या धार्मिक व मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणारा आहे. या लोकशाहीविरोधी मसुद्याचा रायगड जिल्ह्यातील अनेक मंदिर विश्वस्तांनी तीव्र निषेध केला असून सरकारने प्रस्तावित अधिनियम विनाशर्त मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. याविषयीचे निवेदने २० आणि २१ मे या दिवशी रायगडमधील मंदिर विश्वस्तांनी सुधागड तहसील कार्यालयात तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिली.

   सदर निवेदने देताना पाली येथील अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांच्या नेतृत्वाखाली श्री उद्धर रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप तुकाराम लांगी, बल्लाळेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष  वैभव आपटे, रामवाडी देवस्थानचे  राजू पातेंरे, विष्णू देवस्थानचे  योगेश उपाध्ये, पाली देवस्थानचे प्रमोद पावगी, मारुती देवस्थानचे अध्यक्ष  अभिजित चांदोरकर, मरी माता मंदिराचे अध्यक्ष  संजय घोसाळकर आणि महाकाली देवस्थानचे विश्वस्त महादेव पिंपळे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी राजेंद्र पावसकर यांच्यासह ६० हून अधिक भक्तगण आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

  'प्रस्तावित मसुद्यातील तरतुदींनुसार, महाराष्ट्रातील सर्व देवस्थानांच्या मालकीच्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींवरून देवस्थानांचे मालकी हक्क संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे," अशी तीव्र चिंता  जितेंद्र गद्रे यांनी यावेळी व्यक्त केली. देवस्थानांचे अस्तित्व आणि त्यांच्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी सर्व मठ-मंदिरे एकजुटीने विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर श्री उद्धर रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप लांगी म्हणाले, 'इतर देवस्थानच्या अध्यक्षांनी जी भूमिका घेतली आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. समस्त रायगडमध्ये या कायद्याचे तीव्र निषेध आम्ही करणार आहोत. वेळ पडल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन आंदोलन छेडण्यात येईल'.

    एकीकडे वक्फ मालमत्तांना विशेष संरक्षण दिले जात असताना, दुसरीकडे मंदिरांच्या जमिनी बळकावण्यासाठी कायदा करणे, हा दुजाभाव निषेधार्ह आहे. मंदिरांची भूमी ही केवळ जमीन नसून तो हिंदू संस्कृतीचा आणि आस्थेचा पवित्र वारसा आहे. सरकारने जर हिंदू समाजाच्या भावना पायदळी तुडवून हा कायदा रेटण्याचा प्रयत्न केला, तर धार्मिक संस्था, संप्रदाय आणि भाविकांना सोबत घेऊन रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्तांनी दिला

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचे सिडको प्रशासनाला निर्देश !!

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचे सिडको प्रशासनाला निर्देश !!

सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले सह-व्यवस्थापकीय संचालकांना सविस्तर बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आदेश.

ठाणे, उरण आणि पनवेल तालुक्यातील ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांचे विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित.

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
नवी मुंबई शहराच्या उभारणीसाठी आपल्या जमिनींचा त्याग करणाऱ्या ठाणे, उरण आणि पनवेल तालुक्यातील ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी  सिडको भवन येथे एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार  सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (MD)  विजय सिंघल यांची सिडको भवन, बेलापूर येथे भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले.

या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध न्याय्य मागण्यांवर आक्रमकपणे बाजू मांडली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांनी सह-व्यवस्थापकीय संचालक (JMD) गणेश देशमुख यांना प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर तातडीने एक विशेष बैठक आयोजित करून हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.

या बैठकीला खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे  यांच्यासह, सीए निलेश ज्ञानेश्वर पाटील (अध्यक्ष आगरी कोळी यूथ फाउंडेशन, अध्यक्ष आगरी व कोळी समाज सेल महाराष्ट्र प्रदेश NCP-SP), अतुल नंदकुमार म्हात्रे - मास्टर ऑफ आर्किटेक लंडन खजिनदार शेकाप महाराष्ट्र, उरणचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, उरण मधील कामगार नेते भूषण पाटील, उरण मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, ॲड.रोशन मारुती पाटील, सिडको युनियन अध्यक्ष संजय पाटील, मयूर तांडेल, अविनाश सुतार, संजय पाटील हिमांशु पाटील, रवी मढवी, संतोष घरत, राज पाटील आणि इतर प्रमुख प्रकल्पग्रस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनातील प्रमुख मागण्या आणि जिव्हाळ्याचे विषय पुढीलप्रमाणे:- 

१. गरजेपोटी केलेल्या बांधकामांचे नियमितीकरण: नगरविकास विभागाच्या २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाची (GR) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रक्रिया स्पष्ट करणारी सविस्तर नियमावली सिडकोने तातडीने प्रसारित करून अंमलबजावणी सुरू करावी.
२. १२.५% योजनेतील सामाजिक सुविधांचे भूखंड: सामायिक सोयी-सुविधांसाठी राखून ठेवलेले ३०% (म्हणजेच एकूण योजनेच्या ३.७५%) भूखंड प्रकल्पग्रस्तांना सामायिक किंवा वैयक्तिक स्वरूपात वाटप करण्यात यावेत.
३. रोजगार व व्यवसायात प्राधान्य: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिडकोच्या इतर मोठ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये प्राधान्य देणारी यंत्रणा उभी करावी.
४. कंत्राटी व इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न: सिडकोत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे; सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे सामावून घ्यावे, तसेच फायर सर्व्हिसमधील सुप्रीम कोर्टात जिंकलेल्या कर्मचाऱ्यांना रिव्ह्यू पेटिशन दाखल न करता कोर्टाच्या आदेशानुसार त्वरित रुजू करून घ्यावे.
५. BMTC कामगारांचे गाळे वाटप: नुकसान भरपाई म्हणून १०० फुटांचे गाळे स्वीकारलेल्या BMTC कामगारांना तातडीने गाळ्यांचे वाटप सुरू करावे.
६. मावेजा (वाढीव मोबदला) वसुली पद्धतीत सुधारणा: प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देतानाच त्यातून मावेजाची रक्कम वजा करून घ्यावी, जेणेकरून भूखंडधारक किंवा सोसायट्यांना नाहक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्यासाठी सिडकोचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
७. बांधकाम कालमर्यादेची अट शिथिल करणे: १२.५% व २२.५% योजनेअंतर्गत वाटप केलेल्या भूखंडांवर बांधकाम करण्यासाठी लावलेली कालमर्यादेची अट पूर्णपणे शिथिल करण्यात यावी.
८. आंतरराष्ट्रीय मत्स बाजारपेठ (Fish Market) उभारणी: नवी मुंबईत एपीएमसीच्या धर्तीवर आगरी-कोळी व स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी ओल्या व सुक्या माशांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ व भूखंड उपलब्ध करून द्यावा.
९. प्रकल्पग्रस्त संस्थांचे शुल्क माफ करणे: उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेला द्रोणगिरी नोड (सेक्टर १५, प्लॉट क्र. २) मधील २०,००० चौ.मी. भूखंडावर आकारलेले डेव्हलपमेंट चार्जेस व इतर फी पूर्णपणे माफ करावी.
१०. समुद्रगर्क व इतर प्रलंबित भूखंड वाटप: ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचा मोबदला निश्चित झाला आहे, मात्र 'समुद्रगर्क' वर्गीकरणामुळे १२.५% वाटप थांबले आहे, त्यांचे वाटप तातडीने सुरू करावे. तसेच, काही कारणास्तव संचिका तयार असूनही वाटप न झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे भूखंड सुरक्षित (राखून) ठेवावेत.



प्रतिक्रिया(कोट /चौकट ):- 


"नवी मुंबई शहरासाठी आपल्या हक्काच्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यांच्या गरजेपोटीच्या घरांचा प्रश्न असो, हक्काचा रोजगार असो की भूखंड वाटप, हे सर्व विषय सिडको प्रशासनाने वेळेत सोडवले पाहिजेत. आजच्या बैठकीत व्यवस्थापकीय संचालकांनी सकारात्मक निर्णय घेतला असून, जेएमडी ह्यांना प्रत्येक विषयावर स्वतंत्र बैठक देण्याचे निर्देश दिले असून त्यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत सर्व विषयावर सकारात्मक तोडगा निघेल अशी आम्हाला खात्री आहे."    
      -  खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !! कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या अ प्र...