Friday 26 July 2024

रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!

रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!

चोपडा, प्रतिनिधी - येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शहरातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या पाठीवरील ही शाबासकीची थाप त्यांचा भविष्यकालीन प्रवास आणखी उत्साहाने पूर्ण करण्यास नक्कीच प्रेरक ठरेल, असा विश्वास यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 

शहरातील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे डॉ. प्रा. ईश्वर सौंदाणकर हे होते. तर विशेष अतिथी म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध वक्ते रामचंद्र पाटील, प्रमुख अतिथी म्हणून महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे सहसचिव नितीन अहिरराव यांच्यासह क्लबचे सचिव भालचंद्र पवार, सहसचिव संजय बारी, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील, प्रकल्प प्रमुख अरिफ शेख, सहप्रकल्प प्रमुख पृथ्वीसिंह राजपूत, सदस्य विलास पाटील, विलास पी. पाटील, जगदीश महाजन, चंद्रशेखर साखरे, लीना पाटील हे मंचावर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी 'चला उंच भरारी घेऊया या' विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करताना रामचंद्र पाटील यांनी सांगितले की, आयुष्यात नेहमीच व्यक्तीचा नव्हे तर व्यक्तिमत्वाचा, त्याच्या चांगुलपणाचा सत्कार होत असतो. आपण चांगली कृती केल्यास आपला अवश्य सत्कार होतो. चांगले काम म्हणजे जे काम करताना आपल्या मनाला लाज वाटत नाही असे काम होय. जो कुठले तरी सोंग घेऊन समाजात वावरत असतो त्याचा कधीही विकास होत नाही. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो आणि जगात कुठलाही जादूचा दिवा किंवा सोनपरी अस्तित्वात नाही. आपली मेहनतच आपल्याला यशाकडे नेत असते, म्हणून भान ठेवून नियोजन करावे आणि बेभान होऊन काम करावे यातच यश दडलेले आहे.

या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक रोटे. ईश्वर सौंदाणकर यांनी तर सूत्रसंचालन वनराज महाले यांनी व आभार प्रदर्शन पृथ्वीसिंह राजपूत यांनी केले. कार्यक्रमास शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परेश चित्ते, अजय भाट, देवेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

देशाच्या संरक्षण विभागात सहभागी होणे हीच खऱ्या अर्थाने वीरांना सलामी- डॉ. नंदकुमार झांबरे

देशाच्या संरक्षण विभागात सहभागी होणे हीच खऱ्या अर्थाने वीरांना सलामी- डॉ. नंदकुमार झांबरे 

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात २६ जुलैच्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या शूर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि यशाची गाथा सांगणारा 'वीरांना सलामी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदकुमार झांबरे, विभागप्रमुख, राष्ट्रीय छात्र सेना व सहाय्यक प्राध्यापक, संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शहीद जवान आणि वीरांसाठी कला विभागातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक प्रा. योगेश राजपूत यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले. मुलांना आणि मुलींना सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या विविध संधीबद्दल प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक तरुणांनी संरक्षण दलामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावा आणि खऱ्या अर्थाने देशाची सेवा करावी असा मोलाचा संदेश डॉ. नंदकुमार झांबरे यांनी दिला. 

विद्यार्थ्यांनी लष्करासारखी शिस्त आणि वर्तणूक ठेवली तर आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते असे प्राचार्या श्रीमती. मुग्धा लेले यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य सुभाष शिंदे, कला विभाग प्रमुख प्रा. विनोद जंगले, कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनासाठी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी नेहमीच पाठीशी उभे राहून सहकार्य करतात त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकतो असे मत प्राचार्या आणि उपप्राचार्यानी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुसुम नाईक यांनी तर सूत्रसंचालन डॉ. महादेव इरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पूनम चौधरी यांनी केले. कला विभागातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून आक्षेपार्ह बॅनर प्रसिद्ध करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !!

आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून आक्षेपार्ह बॅनर प्रसिद्ध करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !!

🔸 वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा)  यांच्यावतीने पोलिस निरीक्षक दत्तात्रेय कींद्रे यांना दिले निवेदन

वाडा, प्रतिनिधी : शहापूर विधानसभेचे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांना उद्देशून आक्षेपार्ह मजकूर असणारा बॅनर शहापुर लावण्यात आला आहे. सदरचा बॅनर शहापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून लावण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. 

यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. याबाबत वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा) यांच्याकडून संबंधित बॅनर लावणाऱ्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांना शुक्रवारी (26 जुलै) निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद पालघर महिला व  बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, पंचायत समिती सदस्य जगदीश पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र पटारे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ साबळे, नंदकुमार वेखंडे, संगीत मेने, पंढरीनाथ मराडे, पंडित पटारे, युवक तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष सदानंद थोरात, युवक कार्याध्यक्ष नितीन देसले, उपाध्यक्ष वैभव पटारे यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहापूर येथे लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) असा स्पष्ट उल्लेख असून या प्रकाराची सर्वसी जबाबदारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहापूर तालुका  व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तर सदरचा आक्षेपार्ह बॅनर राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरवरही प्रसारित करण्यात आला आहे. या  प्रकाराबाबत राष्ट्रवादी (अजितदादा) पक्षाच्या  कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून यामुळे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रतिक्रिया :

आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून शहापूरमध्ये बदनामीकारक मजकूर असणारा आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आला असून त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. हा बॅनर लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी,  यासाठी वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्यावतीने वाडा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
जयेश शेलार
वाडा तालुका अध्यक्ष
राष्ट्रवादी (अजितदादा)

Thursday 25 July 2024

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा !!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा !!
 
** नागरिकांनी घाबरुन जावू नये, प्रशासनास सहकार्य करावे-अजित पवार

पुणे, प्रतिनिधी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला.  यावेळी जिल्ह्यातील परिस्थिती बघता आवश्यक त्या उपाययोजना करुन नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

यावेळी यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पृथ्वीराज, भारतीय सैन्यदलाचे अमितेश पांण्डेय, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले,  पुणे शहरातील एकतानगर सिहंगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पुल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरात भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएचे पथक तैनात करण्यात आले असून बचाव व मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.  धरणातील पाण्याचा विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता तसेच त्यांना करण्यात येणाऱ्या मदत व बचाव कार्यास अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता शक्यतो धरणातून दिवसा पाण्याचा विसर्ग वाढवावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून टंचाई भागातील तलाव भरून घ्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

श्री.पवार म्हणाले, पुरबाधित परिसरातील नागरिकांना मदतकार्य सुरू असून ज्या गृहनिर्माण संस्थांच्या पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरले आहे तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग नियंत्रित करून पूर नियंत्रणाचे प्रयत्न करण्यात येत आहे. पुरामुळे अन्नधान्य खराब झाले असलेल्या बाधितांच्या घरी शिधा पोहोचविण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना पूरस्थितीतमुळे दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही त्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल. स्थलांतंरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

अतिवृष्टीच्या काळात दुर्घटनेत जखमी व्यक्तींचा उपचाराचा खर्च शासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. पूर परिस्थती आटोक्यात आण्याकरीता जिल्हा प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी व्हावे. पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी द्यावे. 

लवासा येथे दरड कोसळलेल्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली असून बंदी असलेल्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरुन जावू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे,  असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले. 

यावेळी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे आणि शहरातील परिस्थितीबाबत मनपा आयुक्त डॉ. भोसले यांनी माहिती दिली.

राष्ट्रपती यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!

राष्ट्रपती यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!

पुणे, प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २८ जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते २९ जुलै दुपारी ४ वाजेपर्यंत मौजे नांदेगांव-सनीजवर्ल्ड व सुसमार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड़, अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. 

मौजे नांदेगांव- सनीजवर्ल्ड व सुस मार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड अवजड वाहनांची वाहतुक बंद करुन ती नांदेगांव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगांव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे या पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली येतील. नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे वसई येथे निष्पाप बालकाचा बळी तर खारवली (वाडा) येथील शेतकऱ्याचे नुकसान !!

महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे वसई येथे निष्पाप बालकाचा बळी तर खारवली (वाडा) येथील शेतकऱ्याचे नुकसान !!


वाडा, प्रतिनिधी :  महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना महाराष्ट्रात नवीन नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. गुरुवारी वसईतील भास्कर आळी नजीक नऊ वर्षाच्या मुलाचा खेळताना डीपी बॉक्सला हात लागून जागीच मृत्यू झाला. तर अशीच घटना खरिवली येथील शेतकरी शिवाजी अधिकारी यांच्या स्वतःच्या शेतात चिखल करत असताना अचानपणे लाईट चा पोल ट्रॅक्टर चालू असताना पोल ट्रॅक्टर वर पडून नुकसान झाले.

पावसाळ्यापूर्वी तब्बल अनेक तासांचे शट डाऊन करून वीज दुरुस्त्या केल्या जातात. विज व्यवस्था निर्धोक, सुरळीत राहील असा दावा केला जातो. प्रत्यक्षात तक्रारी देऊनही योग्य कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरीकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. अशा पद्धतीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणने शहरात उघड्यावर असलेल्या वीजतारा, सैल झालेले पोल, डीपी बॉक्स यांची काळजी घ्यावी, अशी मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सामान्य नागरिक यांच्याकडून सातत्याने होते. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, किंबहुना त्यात हलगर्जीपणा दाखविला जातो.

अपघात झालेल्या घटनांची चौकशी करून अपघातास जबाबदार महावितरणचे अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे, अशी कारवाई झाली तर पुढील घडणाऱ्या अनर्थ घटनांना आळा बसेल.


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम देण्याचे आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांचे श्रमिक जनता संघ युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन !



कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम देण्याचे आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांचे श्रमिक जनता संघ युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन !

कल्याण, दि.२५ जुलै -

२४ फेब्रुवारी २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना सुधारित किमान वेतन, भत्ते लागू केले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेने २०१५ ते २०२३ पर्यंत फरकाची थकीत रक्कम सुमारे सहा कोटी पंच्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा हिशोब महिन्याभरात तपासून अदा करण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन श्रमिक जनता संघाचे शिष्टमंडळाला आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांनी बैठकीत दिले. 

जे कामगार वयोमानानुसार कामावरून कमी करण्यात आले आहे त्यांना नियमानुसार उपदानाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले. कामगारांच्या वेतनातून ठेकेदार मेसर्स सिक्युअर वन सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून बेकायदेशीर कपात करण्यात येत असल्याची बाब लक्षात आणून देण्यात आली तसेच पगारातून दरमहा PPE च्या नावाखाली वेतनातून कपात करण्यात येणारे हजारो रुपये कोणत्या कारणासाठी कपात केली जाते? यांचे स्पष्टीकरण मिळावे अशी भूमिका युनियन तर्फे मांडल्यानंतर सदर प्रकरणी ताबडतोब चौकशी करून अहवाल सादर करण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला. काम करूनही वेतन अदा न केलेल्या कामगारांची हजेरीचे रिकार्ड तपासून योग्य असल्यास वेतन अदा करण्यात येईल. या व इतर प्रलंबित मागण्यांकडे युनियन तर्फे महापालिका प्रशासनाचे लक्ष या वेळी वेधण्यात आले. युनियनच्या स्थानिक कामगार प्रतिनिधींशी प्रशासन संपर्क साधून विविध समस्या सोडविण्यासाठी सूचना आयुक्त यांनी दिली. 

कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयुक्तांचे दालनात आयोजित बैठकीत महापालिका आयुक्त डॉ इंदूराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त श्री प्रल्हाद रोडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीम. गाडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे श्री.वसंत देगलूरकर आणि श्रमिक जनता संघ युनियन तर्फे महासचिव जगदीश खैरालिया, सचिव सुनील कंद आणि कामगार प्रतिनिधी श्री बापू ओव्हाळ, समीर दरेकर, आणि राजू धायफुले आदी शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

सुनील कंद, 
सचिव, श्रमिक जनता संघ.

रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!

रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी केला दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !! चोपडा,...