Thursday, 27 August 2026

२०२६ च्या पहिल्या सहामाहीच्या आढावा अहवालात जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीए २१व्या स्थानी !!

२०२६ च्या पहिल्या सहामाहीच्या आढावा अहवालात जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीए २१व्या स्थानी !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) अल्फालायनरच्या २०२६च्या पहिल्या सहामाहीतील (H1 २०२६) जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांच्या आढावा अहवालात २०२५ मधील २८ व्या स्थानावरून २१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. जेएनपीएने २०२५ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत १३. ६ टक्के वाढ नोंदवली आहे.

गेल्या वर्षभरात कार्यात्मक कार्यक्षमता, जलद मालवाहतूक व निर्गमन, जहाज हाताळणीतील सुधारणा आणि बहुविध वाहतूक जोडणी अधिक सक्षम करण्यावर जेएनपीएने सातत्याने भर दिला आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळीसमोर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही जेएनपीएने मालाची अखंडित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना राबवल्या. वाढलेल्या कार्यात्मक गरजांचे सक्षम व्यवस्थापन करत आयात-निर्यात व्यापाराची गती आणि सातत्य कायम ठेवण्यात जेएनपीए यशस्वी ठरले. आव्हानात्मक परिस्थितीतही व्यापार सुरळीत ठेवण्याची जेएनपीएची कार्यक्षमता आणि तत्परता ही जागतिक दर्जाच्या बंदरसेवांच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे द्योतक आहे.

जेएनपीएच्या या जागतिक क्रमवारीतील कामगिरीबाबत बोलताना, गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए म्हणाले, “जेएनपीएने जागतिक क्रमवारीत २१वे स्थान मिळवणे हे आमच्या टर्मिनल ऑपरेटर्स, भागधारक आणि संपूर्ण बंदर समुदायाच्या सामूहिक कार्यक्षमतेचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे जागतिक व्यापारातील वर्षभरातील आव्हानात्मक परिस्थितीतही विश्वासार्ह आणि कार्यक्षम माल हाताळणी सेवा देण्याची जेएनपीएची क्षमता अधिक बळकट झाली आहे. या गतीला पुढे नेत, जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे स्थान आणखी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू."

अल्फालायनर ही लाइनर शिपिंग क्षेत्रातील डेटा व व्यावसायिक माहिती सेवा पुरवणारी आघाडीची जागतिक संस्था असून, ती कंटेनर हाताळणीच्या प्रमाणाच्या आधारे जगातील बंदरांच्या कामगिरीचे मूल्यमापन करते.

या क्रमवारीत झालेली सुधारणा जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीएचे वाढते स्थान अधोरेखित करते, तसेच भारताच्या सागरी व्यापार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विकासातील जेएनपीएची वाढती भूमिका स्पष्ट करते.

महेंद्रशेठ घरत यांच्या मोठ्या मनाचा दिलदारपणा ; नितांत सुंदर व्हिएतनामचे ३५ जणांना घडवले पर्यटन !!

महेंद्रशेठ घरत यांच्या मोठ्या मनाचा दिलदारपणा !!

*# नितांत सुंदर व्हिएतनामचे ३५ जणांना घडवले पर्यटन

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांचे अनोखे दातृत्व‌ सर्वपरिचित आहे. दुसऱ्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. ज्यांनी केवळ विमान हा शब्द ऐकला आहे, अशा अनेकांना त्यांनी आजपर्यंत विमान प्रवास घडवला आहे. महेंद्रशेठ घरत यांच्या मोठ्या मनाच्या दिलदारपणामुळेच हायस्कूल आणि महाविद्यालयीन जीवनात लाभलेल्या सवंगड्यांसह त्यांनी चक्क ३५ जणांना १७ ते २५ ऑगस्ट असे आठ दिवस नितांतसुंदर अशा व्हिएतनामचे पर्यटन घडवले. परदेश प्रवास स्वप्नातही न पाहिलेल्यांना महेंद्रशेठ घरत यांनी व्हिएतनामची सफर घडवली. त्यांचे परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे चाकोरीबद्ध आयुष्य जगलेल्या सवंगड्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. 

ज्यांनी पासपोर्ट शब्द ऐकला होता, पण पासपोर्ट काढला नव्हता, त्यांनीही आठ दिवसांच्या पर्यटनात व्हिएतनामची राजधानी हनोई, त्यानंतर दा नांग, बाणा हिल, फु कॉक, हो ची मिन्ह शहर आणि मुंबई असा पाच वेळा विमान प्रवास केला आणि फाईव्हस्टार आणि थ्री स्टार हॉटेलमध्ये व्हिएतनाममध्ये राहाण्याची संधी दिली. त्यामुळे अशा सहकाऱ्यांना आकाश ठेंगणे झाले होते. क्रूझ सफर, तेथे जागोजागी असणारी बेटे, बाणा हिल येथे केबल कारमधून प्रवास आणि ते विहंगम दृश्य, दोन्ही हातावर साकारलेला पूल, तेथील उंचच उंच डोंगर रांगांतून जाणारी केबल कार, अनेक बेटांना जोडणारी जगातील सर्वाधिक लांबीची केबल कार, दा ची मिन्ह हे सुसज्ज शहर आणि व्हिएतनाम-अमेरिकादरम्यानच्या युद्धाची अंगावर काटा आणणारी दृश्य असणारे संग्रहालय आदींचे दर्शन एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांना महेंद्रशेठ घरत यांनी घडवले. त्यामुळे एम. जी. ग्रुपचे सहकारी भारावले आहेत. 

यावेळी एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांना भावना अनावर झाल्या होत्या. महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच आम्ही पहिल्यांदा विमानात बसलो. एवढेच नव्हे तर परदेशात जाऊ शकलो. त्यांनी प्रवासात जो आनंद दिला त्याला तोड नाही. त्यांनी स्वतःपेक्षा आमचीच काळजी व्हिएतनाम प्रवासात घेतली. उत्तम नियोजन आणि शिस्तप्रिय व्यवस्थापनाने प्रवासाचा आनंद द्विगुणित केला, अशा भावना पहिल्यांदाच परदेश प्रवास केलेल्या सवगंड्यांनी व्यक्त केल्या. परदेशात ३५ जणांना सांभाळणे आणि सांभाळून घेणे सोपे काम नव्हते, पण महेंद्रशेठ घरत यांनी ते लीलया पार पाडले. विशेष म्हणजे व्हिएतनाम पर्यटनासाठी असलेल्या सहकाऱ्यांच्या काही नातेवाईकांचे निधन झाले, काहींच्या घरी अडीअडचणी निर्माण झाल्या. कुणी गंभीर आजारी पडले, मात्र व्हिएतनाम प्रवासात महेंद्रशेठ घरत यांनी ज्यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडली आहे, त्यांना मोलाचा आधार दिला. श्रद्धांजली वाहिली. तसेच गंभीर आजारी असणाऱ्यांवर व्यवस्थित आणि वेळेवर उपचार होतील, याची काळजी महेंद्रशेठ घरत यांनी व्हिएतनाममधूनही घेतली. त्यामुळे मोठ्या मनाचा, दिलदार आणि दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती, समोरच्याच्या चेहऱ्यावरील भावना वाचणारे महेंद्रशेठ घरत, हे सद्यपरिस्थितीत एकमेव नेते असल्याच्या भावनाही व्हिएतनाम पर्यटनातील सवंगड्यांनी व्यक्त केल्या.

उरण तालुका बौद्धधम्म संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड !!

उरण तालुका बौद्धधम्म संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील बौद्ध धर्मातील नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण करण्याबरोबरच धार्मिक व शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उरण तालुक्यातील बौद्ध समाजातील नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून उरण तालुका बौद्धधम्म संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.

या संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी दिनेश गायकवाड, सुनील गायकवाड, परशुराम शिवशरण, एन. बी. कुरणे, सुनील जाधव आणि शैलेश तांमगाडगे, कार्याध्यक्षपदी ॲड. निलेश मर्चंड, सहकार्याध्यक्षपदी डॉ. निशा ओव्हाळ,  सरचिटणीसपदी सुनील जोशी, सहसरचिटणीसपदी आम्रपाली गायकवाड, खजिनदारपदी सदानंद गायकवाड , सहखजिनदारपदी जोती सकपाळ मॅडम, सल्लागारपदी ॲड. श्रीधर कवडे व विनायक नगावरे, प्रसिद्धीप्रमुखपदी सुयोग गायकवाड यांची निवड करण्यात आली.

यावेळी सदस्य तुकाराम खंडागळे, गणेश कांबळे (जासई), प्रकाश कांबळे (जासई), कांचन ओव्हाळ, मनोज ओव्हाळ, प्रमोद कांबळे, संतोष मोघे, शांताबाई परुळेकर, अर्चना परुळेकर, नवनीत कांबळे, आदित्य मर्चंडे, दीपक साळुंके, अरुण ओव्हाळ, ऋषिकेश कासारे, सिद्धार्थ कांबळे, सुरेंद्र नवधरे, आदित्य गायकवाड, मंगेश कांबळे, विशाल कवडे, विनायक नानावले, लखन गायकवाड, प्रकाश शरणागत, प्रकाश गायकवाड, सचिन धुळे, संतोष गायकवाड, दिपक साबळे, समर्थ कांबळे, महेश, निखिल, समीर गायकवाड, आदी सदस्य उपस्थित होते.

उरण तालुक्यातील स्थानिक बौद्ध समाजाच्या न्याय हक्कासाठी सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच  तालुका स्तरीय बुद्ध विहार उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*कल्याण : 'शिव कल्याण राजा' सोहळ्यात पोवाड्यावर कथकचा अनोखा प्रयोग, रसिक मंत्रमुग्ध !!

*कल्याण : 'शिव कल्याण राजा' सोहळ्यात पोवाड्यावर कथकचा अनोखा प्रयोग, रसिक मंत्रमुग्ध !!

*कल्याण, प्रतिनिधी :* नारायणी नृत्य कला मंदिर आयोजित वार्षिक सांस्कृतिक सोहळा 'शिव कल्याण राजा' शनिवार, दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता कल्याण येथील सी. एम. गांधी ऑडिटोरियममध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कथक नृत्याच्या माध्यमातून मानवंदना देणारा हा सोहळा कल्याणकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

*नटराज पूजनाने सुरुवात*
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध नृत्यालंकार सौ. श्रद्धा भिडे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेच्या संचालिका नृत्यालंकार शिवाई आरेकर यांनी मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

*पोवाड्यावर कथकचा अनोखा संगम*
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवचरित्रावर आधारित कथक नृत्याविष्कार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातील मावळ्यांना एकत्र करून केलेली हिंदवी स्वराज्याची स्थापना हा संपूर्ण इतिहास वीररसयुक्त गीते, ओव्या आणि शाहीरी वांग्मयातील पोवाडा या काव्यप्रकारावर कथकच्या माध्यमातून सादर करण्यात आला. पोवाडा या लोककलेवर शास्त्रीय कथक सादर करण्याच्या या अनोख्या प्रयोगाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

'वेडात मराठे वीर दौडले सात', 'छाती केसरीची', 'जिजाऊ मातेचा पोवाडा' यासारख्या अजरामर गीतांवर कथक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. लहान मुलींनी सादर केलेल्या 'झुलवा पाळणा छान शिवबाचा' या गीतावरील नृत्याने आणि शिवाजी महाराजांच्या आगमनाच्या नाट्यप्रसंगाने सर्वांची मने जिंकली.

*वयाचे बंधन नाही*
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात वयाची कोणतीही मर्यादा नव्हती. चार-पाच वर्षांच्या चिमुकलीपासून ते 18-19 वर्षांच्या युवती, संसाराची जबाबदारी सांभाळत कला जोपासणाऱ्या गृहिणी आणि प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या महिलांनीही सहभाग घेतला.

यावेळी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री. वाधरे आणि त्यांच्या पत्नी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कथक सादर केलेल्या सर्व कलाकारांचे कौतुक करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत कानडे यांनी केले.

भिवंडी तालुक्यात एफ. एफ एस .ॲपद्वारे खत विक्री सुरळीत सुरू !!

भिवंडी तालुक्यात एफ. एफ एस .ॲपद्वारे खत विक्री सुरळीत सुरू !!

** शेतकऱ्यांना घरबसल्या खत बुकिंगची सुविधा ; क्यू.आर कोड दाखवून कृषी सेवा केंद्रातून खरेदी

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव)

केंद्र शासनाच्या Framework for Fertilizer Sale ( एफ. एफ एस ) ॲपद्वारे भिवंडी तालुक्यात आजपासून खत विक्रीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे. या नव्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या आवश्यक खताचे बुकिंग करता येणार असून, बुकिंगनंतर मिळणारा क्यू आर कोड निवडलेल्या कृषी सेवा केंद्रावर दाखवून खत खरेदी करता येणार आहे. खत विक्री आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार खत उपलब्ध करून देणे तसेच संपूर्ण वितरण व्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन करणे, हा एफ. एफ .एस प्रणालीचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अनावश्यक वेळ आणि त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.एफ. एफ .एस . प्रणालीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी गुण नियंत्रण निरीक्षक विवेक दोंदे यांनी तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन केंद्र चालक तसेच शेतकऱ्यांना ॲपच्या वापराबाबत आणि क्यू आर कोडद्वारे खत खरेदी करण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. प्रणाली सुरू असताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक दक्षता घेतली. दरम्यान, एफ. एफ .एस. प्रणाली सुरू करण्यापूर्वी कृषी सेवा केंद्र चालकांसह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामस्तरावरही कृषी विभागामार्फत या प्रणालीबाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अडचण आल्यास तातडीने मार्गदर्शन मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे तसेच कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी महेश बनकर आणि जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे यांनीएफ. एफ .एस . प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. या प्रणालीमुळे भिवंडी तालुक्यात शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक आणि व्यवस्थित खत वितरण व्यवस्था उपलब्ध होणार आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणताही अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.

केडीएमटीची निवासी बस बंद पडल्याने प्रवासी बेजार; वाहतूक कोंडी !!

केडीएमटीची निवासी बस बंद पडल्याने प्रवासी बेजार; वाहतूक कोंडी !!
*डोंबिवली, दि. 28 ऑगस्ट 2026*

कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या (केडीएमटी) बस सतत नादुरुस्त होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. आज गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डोंबिवलीतील बाजीप्रभू स्थानकातून निवासीकडे निघालेली बस मिलापनगर स्टॉपवर आल्यावर अचानक बंद पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

*मध्येच बस बंद, प्रवाशांना उतरवले*

बस मिलापनगर स्टॉपवर आल्यानंतर नादुरुस्त झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालक आणि वाहकाने बस तेथेच उभी करून प्रवाशांना तेथेच उतरवले. त्यामुळे प्रवाशांना पुढील इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधावा लागला.

आधीच निवासी मार्गावर केडीएमटी व्यवस्थापनाकडे बसचा तुटवडा असल्याने बस वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. त्यात ही बस नादुरुस्त झाल्याने निवासी ते डोंबिवली या बस फेऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे प्रवाशांना बस स्टॉपवर अधिक काळ ताटकळत थांबावे लागले.

सुमारे दीड तासानंतर केडीएमटीचा मेकॅनिक घटनास्थळी आल्यावर बसची तात्पुरती दुरुस्ती करून ती तेथून हलविण्यात आली.

*वाहतूक कोंडीत भर*

नादुरुस्त बस रस्त्यातच उभी असल्याने वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका नागरिकांना आणि वाहनचालकांना बसला. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळ असल्याने कोंडीत आणखी भर पडली.

केडीएमटीच्या सुमार दर्जाच्या बसमुळे प्रवाशांचे हाल होत असून त्याचा फायदा रिक्षाचालक घेत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी अपेक्षा येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

केडीएमटी निवासी बस बंद पडल्याने प्रवासी बेजार ! त्यामुळे वाहतूक कोंडी !!

केडीएमटी निवासी बस बंद पडल्याने प्रवासी बेजार ! त्यामुळे वाहतूक कोंडी !!

              कल्याण डोंबिवली परिवहन सेवेच्या बस सतत नादुरूस्त होण्याचे प्रकार वाढत असून त्यामुळे प्रवासी बेजार, त्रस्त झाले आहेत. आज गुरुवारी सकाळी साडे अकरा आसपास डोंबिवली बाजीप्रभू स्थानकातून निवासी कडे निघालेली बस जेव्हा मिलापनगर स्टॉपवर आली तेव्हा ती नादुरुस्त झाल्याचे चालकाला समजल्यावर ती बस तेथेच उभी करून त्याने व वाहकाने प्रवाशांना तेथेच उतरविले. त्यामुळे प्रवाशांना पुढील इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधावा लागला. आधीच निवासी मार्गावर बस या वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. कारण केडीएमटी व्यवस्थापनाकडे बसचा तुडवडा आहे. त्यात ही बस नादुरुस्त झाल्याने अर्थातच निवासी ते डोंबिवली या बस फेऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे प्रवाशांना अधिक काळ बस स्टॉप वर थांबावे लागले. काही वेळाने केडीएमटीचा मेकॅनिक आल्यावर अंदाजे दीड तासानंतर ही बस तेथून तात्पुरती दुरुस्ती करून हलविण्यात आली आहे. 

              सदर या नादुरुस्त झालेल्या बसमुळे वाहतूक कोंडी होऊन त्याच्या फटका नागरिकांना आणि वाहनचालकांना बसला होता. त्यात शाळेच्या सुटण्याचा व भरण्याच्या वेळ असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. 
             केडीएमटीच्या या सुमार दर्जाच्या बसमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून त्याचा फायदा रिक्षावाले घेत आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा येथील रहिवाशी व्यक्त करीत आहेत. 
 
वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

२०२६ च्या पहिल्या सहामाहीच्या आढावा अहवालात जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीए २१व्या स्थानी !!

२०२६ च्या पहिल्या सहामाहीच्या आढावा अहवालात जगातील प्रमुख ३० कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीए २१व्या स्थानी !! उरण दि २७, (विठ्ठल ममता...