Sunday, 6 September 2026

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ने 9 मराठी शिक्षक सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव !!

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ने 9 मराठी शिक्षक सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव !!

*नवी दिल्ली, प्रतिनिधी :* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि कौशल्याधारित शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील 82 शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026’ ने गौरवण्यात आले. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित या समारंभात महाराष्ट्रातील 9 शिक्षकांचा समावेश आहे.

पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि 50 हजार रुपये रोख असे पारितोषिक देण्यात आले.

या 82 पुरस्कारांमध्ये 48 शालेय शिक्षक, 21 उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि 13 कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा समावेश आहे.

*राष्ट्रपतींचे प्रतिपादन*
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.

"शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर व्यक्तिमत्व आणि चारित्र्याला आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात. भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनवण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल," असे राष्ट्रपती म्हणाल्या.

*मान्यवरांची उपस्थिती*
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभास केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी, शिक्षण सचिव अनिल कुमार आणि कौशल्य विकास सचिव देबाश्री मुखर्जी उपस्थित होते.

*महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त 9 शिक्षक*
🏆 *डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे* - साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड
🏆 *कुंदा जयवंत बच्छाव* - महापालिका शाळा, नाशिक
🏆 *वैभव वसंतराव कुलकर्णी* - जवाहर नवोदय विद्यालय, लातूर
🏆 *शिवप्रसाद अरविंद टिंगरे* - सैनिक स्कूल, सातारा
🏆 *डॉ. विक्रम विशाल* - IIT मुंबई
🏆 *डॉ. अमर मोहनराव ताकसांडे* - जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा
🏆 *डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे* - शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर
🏆 *किरण प्रकाश झरकर* - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव
🏆 *अर्चना राकेश जाधव* - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक

राज्यात ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी; दप्तराचे ओझे कमी होणार !!

राज्यात ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी; दप्तराचे ओझे कमी होणार !!

*मुंबई, दि. ७ सप्टेंबर २०२६*

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतिप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

जास्त वजनाच्या दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे व शारीरिक वाढीवर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या धोरणानुसार -

- पूर्व-प्राथमिक वर्गातील लहान मुलांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, या दृष्टीने शाळांनी नियोजन करावे.
- मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये. त्या दिवसासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके आणली जावीत यासाठी वर्गनिहाय 'दप्तर वेळापत्रक' तयार करावे.
- विद्यार्थ्यांनी दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची आवश्यकता भासू नये म्हणून शाळांनी वर्गखोल्यांमध्ये कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
- घरातून जड पाण्याची बाटली वाहून आणावी लागू नये यासाठी शाळांनी स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करण्यात यावा. या कालावधीत स्थानिक कारागीर व व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी बनविणे, हस्तकला, कृषीविषयक व स्थानिक व्यवसायांची ओळख यांसारखे प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रम राबविले जाणार आहेत.

तसेच वर्षभरात क्रीडा, बौद्धिक खेळ, वाचन, कथाकथन, पर्यावरण संवर्धन आणि क्षेत्रभेटी अशा कृतिप्रधान दिवसांचे आयोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण !!

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण !!

*डोंबिवली, दि. ६ सप्टेंबर २०२६, (राजू नलावडे)*

येणाऱ्या गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या निर्माल्याबाबत जनजागृती व्हावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत कसे तयार होते याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम आज रविवारी सकाळी ९.०० ते ११.३० या वेळेत श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्प, एमआयडीसी, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन, केडीएमसी) श्री रामदास कोकरे, निर्मल युथ फाउंडेशनच्या अध्यक्षा कु. अक्षता औटी, श्री गणेश मंदिर संस्थानचे सचिव व विश्वस्त प्रवीण दुधे, पर्यावरण तज्ज्ञ विजय घोडेकर, पर्यावरण प्रेमी राजीव तायशेटे, राजू नलावडे, राजू काळे, सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते. प्रगती कॉलेज आणि एस.आय.ए. कॉलेजमधील एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. येणाऱ्या गणेशोत्सवात विसर्जनस्थळी जमा होणारे निर्माल्य हे स्वयंसेवक विद्यार्थी गोळा करून प्लास्टिकविरहित स्वरूपात श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्पात पोहोचवणार आहेत. यानिमित्ताने उपायुक्त श्री रामदास कोकरे यांनी नागरिकांनी निर्माल्य कसे द्यावे याबाबत जनतेला संदेश दिला.

सदर कार्यक्रमादरम्यान श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्पाच्या आवारात श्री रामदास कोकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान, निर्मल युथ फाउंडेशन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि सुमित एल्को (Sumeet ELCO) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

Saturday, 5 September 2026

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

** स्पर्धेत भरत गोसावी प्रथम

पालघर, प्रतिनिधी 

मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. “मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” हा स्पर्धेचा विषय होता. शिक्षक म्हणून कार्यरत असताना स्वतःच्या विद्यार्थी जीवनातील अपेक्षा आणि आज शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, या अनुषंगाने शिक्षकांनी आपल्या अनुभवांना व विचारांना लेखणीतून व्यक्त केले.

स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदा एकूण ४२ शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. मुंबई येथील प्रा. सचिन परब यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेत श्री. भरत गोसावी यांनी प्रथम क्रमांक, सौ. अमृता रोशन धुमाळ यांनी द्वितीय क्रमांक, तर श्री. पंकज शंकर चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्यांना त्यांच्या आवडीची ₹५०० किमतीची पुस्तके, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमाच्या ऑक्टोबर महिन्यातील कार्यक्रमात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

लेखणीपेक्षा ‘स्वतःचा विचार’ महत्त्वाचा!

या स्पर्धेच्या निकालासोबतच आयोजकांनी एक महत्त्वाची खंतही व्यक्त केली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या काही शिक्षकांनी निबंध लेखनासाठी एआयचा (Artificial Intelligence) वापर केल्याचे निदर्शनास आले. शिक्षकांच्या अनुभवांवर आणि त्यांच्या विद्यार्थी-शिक्षक प्रवासावर आधारित असलेल्या या विषयात प्रत्येक शिक्षकाचा स्वतःचा अनुभव, विचार, भावना आणि चिंतन अपेक्षित होते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेताना स्वतःची सर्जनशीलता आणि लेखनविचार यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

“स्पर्धेचा उद्देश केवळ क्रमांक मिळविणे नसून शिक्षकांनी स्वतःच्या विद्यार्थी जीवनाकडे पुन्हा एकदा पाहावे आणि ‘माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी कसा शिक्षक आहे?’ याचे आत्मपरीक्षण करावे, हा आहे,” असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे मनोविकास ग्रंथोत्सवचे अमोल पाटकर आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांच्या वतीने आभार मानण्यात आले. पुस्तक वाचन, चिंतन आणि लेखनातून शिक्षकांच्या विचारविश्वाला समृद्ध करण्याचा हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे यावेळी देण्यात आली.

वृत्त - पंकज चव्हाण (वसई)

पडघ्यात ८० वर्षांची परंपरा कायम; कृष्ण जन्मोत्सव अन् दहीहंडीचा रंगला उत्सव !!

पडघ्यात ८० वर्षांची परंपरा कायम; कृष्ण जन्मोत्सव अन् 
दहीहंडीचा रंगला उत्सव !!

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)

भिवंडी तालुक्यातील पडघा व परिसरात विविध मंडळे, राजकीय पक्ष, सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोविंदा पथकांच्या जल्लोषाने आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण पडघा परिसर दुमदुमून गेला.

दहीहंडी उत्सवानिमित्त सकाळपासूनच पडघा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते.  पडघे गावात गेल्या ८० वर्षांपासून सुरू असलेली कृष्ण जन्म महोत्सवाची परंपराही यंदाही मोठ्या उत्साहात कायम राखण्यात आली. सुदर्शन नगर येथून संपूर्ण पडघे गावातून  श्रीकृष्ण भगवानांची वेशभूषा केलेल्या बालकृष्णाची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक वाजत-गाजत  काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या कृष्ण जन्म महोत्सवात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पडघा शहर व विभाग, सिद्धिविनायक प्रतिष्ठान, एकता मित्रमंडळ यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दहीहंडी फोडण्यासाठी ओमसाई गोविंदा पथक, जय बजरंग गोविंदा पथक, सुदर्शन गोविंदा पथक यांसह विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पथकांनी एकामागून एक थर रचत उंच मानवी मनोरे उभारले आणि दहीहंडीला दिमाखदार सलामी दिली. डीजेच्या तालावर थिरकणारे तरुण, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषामुळे वातावरणात उत्साह संचारला होता. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी थरावर थर रचत आपले कौशल्य आणि शारीरिक सामर्थ्य पणाला लावले. उंच मनोरे रचून हंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पडघ्यातील बस स्थानक, विद्यानगर, शीतल शरद अपार्टमेंट यांसह विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केल्याने उत्सवाला आणखी रंगत आली. गोविंदा पथकांच्या धाडसी कामगिरीला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त घोषणांनी दाद दिली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी दहीहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. परंपरा, उत्साह, साहस आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत पडघ्यातील दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Friday, 4 September 2026

धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; रात्रभर नामस्मरण, भजनाने रंगला जागर, अनेक वर्षाची परंपरा !!

धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; रात्रभर नामस्मरण, भजनाने रंगला जागर, अनेक वर्षाची परंपरा !!

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील धुतुम गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

धुतुम खालची आळी यांच्या वतीने शंकर मंदिरात पूजा अर्चा, अभिषेकचा मान सामाजिक कार्यकर्ते समाधान कृष्णा कटेकर व सामाजिक कार्यकर्त्या भारती समाधान कटेकर या दांपत्याला देण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते सप्ताहाचा अभिषेक, पूजा अर्चा भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा तसेच गावात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, यासाठी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करण्यात आली.जन्माष्टमीच्या निमित्ताने रात्रभर नामस्मरण, भजन आणि जागर करण्यात आला. 

सालाबादप्रमाणे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत रघुनाथ ठाकूर यांच्या घरात आयोजित करण्यात आला. यंदाही धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपत हा उत्सव उत्साहात पार पडला.

या धार्मिक सोहळ्यास दशरथ रोहिदास ठाकूर, मेघनाथ दशरथ ठाकूर, सुरेश गंगाराम ठाकूर, गोविंद नामदेव ठाकूर, यांच्यासह धुतुम खालची आळीतील ग्रामस्थ,धुतुम गावातील ग्रामस्थ,भाविक आणि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जि. प. सदस्य कुंदा ठाकूर यांनी श्रीकांत ठाकूर यांच्या घरी जाऊन श्री कृष्णच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले.भजन, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणामुळे धुतुम गावात संपूर्ण रात्र श्रीकृष्णमय झाली. अखेर सर्व उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

(रस्ते दुरुस्ती मध्ये नागरिकांचा कराचा पैसा केडीएमसी ठेकेदाराला खड्डे भरण्यासाठी चे पैसे देणार कि खड्ड्यांच्या नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण दुरुस्तीचे पैसे देणार शिल्पा बजरंग तांगडकर यांचा सवाल)

.                                 शिल्पा बजरंग तांगडकर

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण परिसरामध्ये सर्व ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे या रस्त्या दुरुस्ती करण्यामध्ये फक्त खड्डे पडलेल्या जागेवर डांबरीकरणाचा मुलामा  देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा  प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकडे करून  येत आहे ,शिल्पा बजरंग तांगडकर यांच्या वतीने टावरी पाडा ,बारावी परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर ऑनलाइन पत्रा सोबत कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता यावर तत्काळ दिलेल्या कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली नाही परंतु आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर टावरीपाडा वॉटर फिल्टर रोड डांबरीकरणाचे काम करण्यात आले परंतु हे काम संपूर्ण रस्त्याचे काम केले नसून फक्त खड्डे पडले होते त्या ठिकाणी पॅच मारुन डांबरीकरण करण्यात आले, तसेच अजून  बारावे पाइपलाइन ,गोदरेज हिल परिसरातील रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे.

नागरिकांचा करातील पैसा केडिएमसी खड्डे बुजवल्यानंतर कंत्राटदाराला फक्त त्या खड्डे बुजवले त्याचे पैसे देणार कि रस्ता दुरुस्ती नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण चे पैसे देणार हा प्रश्न शिल्पा तांगडकर यांचा वतीने विचारण्यात येत आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ने 9 मराठी शिक्षक सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव !!

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ने 9 मराठी शिक्षक सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव !! *नवी दिल्ली, प्रतिनिध...