Sunday, 23 August 2026

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

          अंमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासोबतच अंमली पदार्थांची मागणीच निर्माण होऊ नये यासाठी व्यापक जनजागृती करणारी 'कॅम्पस कनेक्ट' ही नवी मुंबई पोलिसांनी हाती घेतलेली विशेष मोहीम अत्यंत महत्त्वाची व युवाशक्तीला दिशा देणारी असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
          व्यसनांच्या दलदलीत युवा पिढीने फसू नये यासाठी सजगतेने काम करण्यासोबतच व्यसनांच्या गर्दीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार न समजता त्यांना व्यसनमुक्ती केंद्राद्वारे मदतीचा हात देण्याची नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने पोलिसांनी हाती घेतलेली भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

          नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 'नशामुक्त नवी मुंबई अभियान' अंतर्गत 'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने नवी मुंबई पोलीसांनी सुरू केलेल्या 'व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रा'चा शुभारंभ मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑफ एक्सलन्स, नेरूळ येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे तरुणाईच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाला.
          याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. श्री. गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. भरत गोगावले, बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधान परिषद सदस्य आ.श्री.रवींद्र फाटक, विधानपरिषद सदस्य आ.श्री. विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य आ.श्री. महेश बालदी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन मुद्गल, कोकण विभागीय आयुक्त श्रीम. रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
          'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहीमेच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हा नशा विरोधातील लढ्याचे केंद्र बनेल आणि प्रत्येक विद्यार्थी हा या मोहिमेचा सैनिक होईल असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय दुर्दैवाने व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या युवकांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी उपचार करणे आणि मानसिक आधार देण्याचे कामही केले जाणार आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानाद्वारे व्यसनमुक्ती विरोधी लढ्याला नवे बळ मिळेल असे ते म्हणाले.
          आज समाजात वाढते व्यसन आणि मानसिक ताणतणाव यांमुळे व्यसनमुक्ती केंद्राची गरज खूप वाढली आहे. विशेषत्वाने तरुणाई दारू, ड्रग्स आणि इतर घातक व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. व्यसनांमुळे शरीराचे नुकसान होतेच याशिवाय नैराश्य, भीती यामुळे मनाचे आणि भविष्याचेही मोठे नुकसान होते.
          त्यावर योग्य उपचारासाठी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची गरज लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर सेक्टर 8 येथील मदर तेरेसा इमारतीमध्ये ‘व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
          बांधिलकी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने या केंद्राचे परिचलन केले जाणार आहे. येथे पुनर्वसन कार्यक्रम, जीवन-कौशल्य उपक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षणाशी संबंधित उपक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम तसेच इतर रुग्ण-सहाय्यक कार्यक्रमांचे नियोजन व समन्वय केला जाणार आहे.
          पहिल्या टप्प्यात 11 रूग्णखाटा क्षमतेच्या या केंद्राद्वारे व्यसनातून सुटका करण्यासाठी आपुलकीचा आधार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे समाजात पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी पुनर्वसनासाठी मदत केली जाणार आहे.
          याकरिता रुग्णाच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. तसेच विविध जनजागृती कार्यक्रम राबवून रुग्णाच्या पुनर्वसनासाठी आणि समाजात त्यांच्या पुनर्समावेशासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
          नवी मुंबई पोलीस विभागामार्फत सूचित केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिके मार्फत चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात रुग्णाचा प्रवेश झाल्यानंतर, दैनंदिन रुग्ण समन्वय, त्यांच्या कुटुंबियांशी समन्वय, त्यांचे समुपदेशन, पुनर्वसन सहाय्य व फॉलो-अप उपक्रमांव्दारे कार्यवाही केली जाणार आहे.
          केंद्रात दाखल होणा-या रूग्णाच्या मानसिकतेचा विचार करून त्याच्या कलाने योग्य उपचार करण्याकरिता याठिकाणी कार्यरत कर्मचारी हे आवश्यक अर्हताधारक आणि प्रशिक्षित व अनुभवी असतील. त्या कर्मचा-यांनाही वेळोवेळी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल व पर्यवेक्षण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येईल.
          याठिकाणी अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist), अनुभवसंपन्न मानसशास्त्रज्ञ / समुपदेशक ( Psychologist / Counselor ) तसेच नर्सेस, वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षक असे कर्मचारी कार्यरत असतील. येथील व्यवस्थापनासाठी अनुभवी व्यवस्थापक कार्यरत राहील. 
          या केंद्रामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार केले जातील तसेच मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist) रुग्णाशी बोलून त्याच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करतील. येथे कॅरम, बुध्दीबळ अशा खेळांच्या सुविधांसोबतच मानसिक शांती, सकारात्मक विचार आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग, ध्यान आणि व्यायामाची सोय असणार आहे.
          या व्यसनमुक्ती सुविधा केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त नवी मुंबई साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या सहयोगाने सामाजिक बांधिलकी जपत आहे.


पत्रकारांच्या एकजुटीचा निर्धार; ठाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

पत्रकारांच्या एकजुटीचा निर्धार; ठाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*अंबरनाथ, दि. 23 ऑगस्ट 2026*

पत्रकारांच्या हक्क, अधिकार आणि विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्यासाठी तसेच ठाणे जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची भक्कम बांधणी करण्यासाठी आयोजित केलेली महत्त्वपूर्ण बैठक अंबरनाथ येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालली. ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आणि भगिनी उपस्थित राहिल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

*सदस्य नोंदणीवर भर*  
या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह सदस्य नोंदणी अभियानावर विशेष भर देण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी सदस्य नोंदणीचे फॉर्म भरून संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व ठाणे जिल्हा सुप्रीमो गौतम वाघ होते. महाराष्ट्र सहसंघटक सुरेश जगताप यांनी प्रस्तावना मांडताना ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांचे हक्क व अधिकार, संघटनेची गरज तसेच आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

*एकजुटीने संघर्षाचा निर्धार*  
बैठकीत पत्रकारांना दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या अडचणी, हिताचे प्रश्न आणि विविध समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

पत्रकार एकत्र आले तरच त्यांच्या प्रश्नांना ताकद मिळेल. संघटन मजबूत झाले तरच हक्क आणि अधिकारांसाठीचा संघर्ष अधिक प्रभावी होईल या भूमिकेतून ठाणे जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडियाची मजबूत संघटनात्मक उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला.

*आगामी उपक्रमांचे नियोजन*  
आगामी काळात ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराला एका मजबूत व्यासपीठावर आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. उपस्थित पत्रकारांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गौतम गवई, संजय साळवे, प्रशांत ढोणे, रजनीकांत गायकवाड, जगन्नाथ जावळे, सतीश अहिरे, सलीम मन्सूरी, राजदीप जगताप, संतोष क्षेत्रे, राजू दोंदे, देवानंद पाढेन यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील विविध विभागांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण नवीन एसटी स्टँडचे काम संथगतीने; प्रवाशांची गैरसोय, आम्ही नगरकर संघटनेचा आंदोलनाचा इशारा !!

कल्याण नवीन एसटी स्टँडचे काम संथगतीने; प्रवाशांची गैरसोय, आम्ही नगरकर संघटनेचा आंदोलनाचा इशारा !!

*कल्याण, दि. 21 ऑगस्ट 2026*

कल्याण पश्चिम येथील नवीन एसटी स्टँडचे काम मागील सहा ते सात वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने आम्ही नगरकर संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

*परिवहन मंत्री सरनाईक यांना निवेदन*  
या संदर्भात आम्ही नगरकर संघटनेने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले आहे. संघटनेचे पदाधिकारी शांताराम झावरे यांनी हे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, कल्याणच्या नवीन एसटी स्टँडचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. कामासाठी आवश्यक असलेली पुरेशी यंत्रणा कार्यरत दिसत नाही. हे काम कधी पूर्ण होईल याची कोणतीही शाश्वती दिसत नाही. संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

*विठ्ठलवाडीला जाण्याची सक्ती*  
सध्या कल्याण येथून सुटणाऱ्या एसटी गाड्या विठ्ठलवाडी येथून सोडल्या जात आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे येथून कल्याणला येणाऱ्या आणि कल्याणहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना विठ्ठलवाडीपर्यंत जावे लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

*संघटनेची मागणी*  
सदर कामाला गती देऊन ते जलदगतीने पूर्ण करावे. जोपर्यंत नवीन स्टँड पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांसाठी कल्याणमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून तात्पुरती सुविधा करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

प्रवाशांची गैरसोय अशीच सुरू राहिल्यास आम्ही नगरकर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शांताराम झावरे यांनी दिला आहे.

Saturday, 22 August 2026

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

डोंबिवली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयाच्या संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता केंद्र (Centre for Research, Innovation and Entrepreneurship – Start-up & Incubation Cell) यांच्या वतीने ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे, संशोधन व नवोपक्रमाला चालना देणे तसेच समाजातील समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्स उभारण्यासाठी प्रेरित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरात इव्हॉनिक्स टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच क्विककार्टचे सह-संस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. निलाद्री रॉय यांनी “Innovation Starts With You – Cultivating the Entrepreneurial Mindset” या विषयावर मार्गदर्शन केले. “मोठी कल्पना शोधण्यापेक्षा समस्या शोधा” आणि “समस्येतच उद्योजकतेची संधी दडलेली असते” हा प्रभावी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांचे निरीक्षण करून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचे आवाहन केले.

यानंतर झायडस वेलनेस लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (DGM) डॉ. रवींदर वर्मा यांनी “Building Your First Startup – Idea to Launch” या विषयावर मार्गदर्शन करताना यशस्वी स्टार्ट-अप उभारण्यासाठी ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, कल्पनेची पडताळणी करणे, सातत्याने प्रयोग करणे आणि समस्येवर आधारित उपाय विकसित करणे किती महत्त्वाचे आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

यावेळी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हर्षल लवंगारे यांनी आपल्या मनोगतात संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता केंद्र स्थापन करण्यामागील दूरदृष्टी स्पष्ट केली. “महाविद्यालय हे केवळ पदवी देणारे केंद्र नसून समाजातील समस्या घेऊन येणारे आणि त्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेच्या माध्यमातून उपाय शोधणारे केंद्र व्हावे,” हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

डोंबिवली व परिसरातील वाहतूक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, स्थानिक उद्योग, डिजिटल सेवा, पाणी व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांतील समस्यांवर संशोधन करून त्यातून उद्योजकीय संधी निर्माण करणे, हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या संकल्पनेला डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापन समितीने दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आपल्या उद्योजकीय प्रवासाचा उल्लेख करताना श्री. लवंगारे यांनी श्री. निलाद्री रॉय यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण करून दिली. कोविड काळात रोहन जोशी यांच्यासह “कक्षा” या K-12 एडटेक स्टार्ट-अपवर एकत्रितपणे काम करताना मिळालेला अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. “उद्योजकता म्हणजे केवळ कल्पना नव्हे, तर समस्येचे सातत्याने निराकरण करण्याची वृत्ती,” असे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या आगामी उपक्रमांचीही माहिती दिली. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) यांच्या सहकार्याने एक दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहा दिवसीय ‘इनोव्हेशन अँड करिअर फेस्टिव्हल’ आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. या महोत्सवात करिअर फेस्टिव्हल, स्टार्ट-अप फेस्टिव्हल आणि मेगा जॉब फेअर आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या ‘द बायोस्कोप बग्स’ या इन-हाऊस फिल्म सोसायटीचे उद्घाटन होणार असून, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व चित्रपट दिग्दर्शक अक्षय शिंपी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार (Critical Thinking), समस्या निराकरण क्षमता (Problem Solving Skills), संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या व्यापक उद्दिष्टातून संशोधन, उद्योजकता, करिअर विकास, उद्योग सहकार्य आणि फिल्म सोसायटी यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे संकल्पनाकार व संयोजक श्री. हर्षल लवंगारे, तर सहसंयोजक म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. कैलास जगदेव आणि स्ववित्त विभागाच्या उपप्राचार्या डॉ. रिया रुपाणी यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संशोधन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुमन सात्याराम आणि डॉ. अमला पटवर्धन यांनी केलेल्या अथक परिश्रम, उत्कृष्ट नियोजन व प्रभावी समन्वयाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.

या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेची संस्कृती महाविद्यालयात अधिक दृढ करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून, भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे विचारशील, नाविन्यपूर्ण आणि उद्योजकीय नेतृत्व असलेले विद्यार्थी घडविण्याच्या महाविद्यालयाच्या ध्येयाला या कार्यक्रमाने नवी दिशा दिली.

प्रसिद्धी/वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

डोंबिवली एमआयडीसीत नाल्यात बॅग्स भरून कचरा; उघड्या चेंबर्समुळे रोगराईची भीती !!

डोंबिवली एमआयडीसीत नाल्यात बॅग्स भरून कचरा; उघड्या चेंबर्समुळे रोगराईची भीती !!

** बेजबाबदार लोकांची करामत

*डोंबिवली, दि. 21 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नाले आणि गटारांची अवस्था अतिशय भयानक झाली असून नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आणि अर्धवट विकासकामांमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

*नवीन बॅग्समध्ये कचरा भरून नाल्यात टाकला*  
कावेरी चौक जवळील एकदंत हेरिटेज आणि कोयना सोसायटीच्या मधून जाणाऱ्या नाल्यात नवीन बॅग्समध्ये भरून कचरा आणि प्लास्टिक फेकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तसेच सांडपाणी वाहिन्यांच्या अनेक चेंबर्सवर झाकणे नसल्याने त्या उघड्या चेंबर्समध्येही काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत.

ही बाब येथील ज्येष्ठ जागरूक नागरिक श्रीमती स्मिता फाटक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

*अर्धवट नाले, साचलेले पाणी, डासांची उत्पत्ती*  
निवासी भागात नवीन नाले आणि गटारे बांधण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र येऊन साचून राहत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे.

यामुळे डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर आणि कावीळ यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक रुग्ण आढळून येत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. उघड्या चेंबर्समधून कोणतीही व्यक्ती पडून अपघात होण्याचीही शक्यता आहे.

*दोन यंत्रणांमध्ये कामाची विभागणी*  
सध्या सांडपाणी वाहिन्या आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती तसेच नवीन नाले-गटारांचे बांधकाम एमआयडीसी पाहत आहे. तर स्वच्छता आणि साफसफाईचे काम केडीएमसीकडे आहे.

पुढील काही दिवसांत मोठे सण आणि उत्सव येणार असल्याने प्रशासनाने या विषयात गंभीरतेने लक्ष घालून तातडीने कारवाई करावी आणि बेजबाबदारपणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

*सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन मागे घ्या; कोकण विभागीय पत्रकार संघाची मागणी*

*सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन मागे घ्या; कोकण विभागीय पत्रकार संघाची मागणी*

कल्याण, संदीप शेंडगे : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्यावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी करण्यात आलेली निलंबनाची बेकायदेशीर केलेली कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे यांनी केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापालिकेत पालिका अधिकारी असलेल्या एका क्लास-वन अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने निलंबनाची कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या ‘अ’ प्रभागात भविष्यात अधिकारी जबाबदारी स्वीकारण्यास धजावतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जयवंत चौधरी यांनी ‘अ’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून सुमारे दहा ते अकरा महिन्यांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने कारवाई केली आहे विशेषतः बल्याणी विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत शेकडो खोल्या, गाळे आणि जोते जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

चौधरी यांच्या कार्यकाळात अ प्रभाग क्षेत्रात सर्वच प्रभागात ४०० हून अधिक अनधिकृत घरगुती खोल्या व गाळे तसेच ८०० हून अधिक जोत्यांवर कारवाई करण्यात आली असून अनेक व्यावसायिक आणि घरगुती खोल्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः पत्रकार परिषदेत आपली पाठ थोपटून घेतली होती.

*अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती कारवाईची भीती*

‘अ’ प्रभागातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौधरी यांनी तात्काळ प्रभाग पातळीवर कारवाई केल्याचे सातत्याने पाहावयास मिळाले आहे. बल्ल्यानी टिटवाळा मांडा मोहने अटाळी वडवली आदी भागात सातत्याने कारवाई करण्यात आली होती त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये चौधरी यांच्या कारवाईची भीती निर्माण झाली होती,

यापूर्वी अटाळी-वडवली परिसरात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीतही चौधरी यांनी आपली जबाबदारी पार पाडत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. 
पालिका कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना संरक्षण पुरवून अनेक ठिकाणी त्यांनी धाडसी कारवाई केल्याचे पहावयास मिळते.

अनधिकृत बांधकामाची जबाबदारी केवळ सहाय्यक आयुक्तांचीच का?

दरम्यान, ‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांसाठी केवळ सहाय्यक आयुक्तांनाच जबाबदार धरणे योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या मुख्यालयात बसून अनधिकृत बांधकाम नियंत्रणाचे काम पाहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. सहाय्यक आयुक्तांकडून कारवाई अपेक्षित असेल, तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या अधिकारक्षेत्रातील जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे, केवळ खालच्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवणे योग्य नाही मग अनधिकृत बांधकाम उपयुक्त पदाचा उपयोग काय असा सवाल संदीप शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.

शुक्रवारी कारवाई, सोमवारी पुन्हा बांधकाम?

‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांबाबत आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेकडून शुक्रवारी एखाद्या बांधकामावर कारवाई केली जाते; मात्र त्यानंतर काही तासांतच त्याच ठिकाणी पुन्हा खोल्या अथवा गाळ्यांचे बांधकाम उभे राहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक नवीन बांधकामावर सतत लक्ष ठेवायचे का? त्यांच्यावर इतर प्रशासकीय कामांची जबाबदारी नाही का? असा सवाल करत अनधिकृत बांधकाम पुन्हा उभे राहण्यामागील यंत्रणेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे पत्रकार संघाने म्हटले आहे. अनधिकृत फेलेवाल्यांचा प्रश्न अतिशय बिकट असताना मांडा टिटवाळ्यातील बल्यानी येथील मोहने विभागातील फेरीवाल्यांचा प्रश्न त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून फेरीवाल्यांना रस्त्याच्या मागे बसण्यास आदेशित केले होते.

निवडणूक काळातही चौधरी यांच्या कामाचे कौतुक

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या (२०२५- २६) या काळातही ‘अ’ प्रभागात सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडला असून निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रभागातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे सर्वांनी पाहिले आहे त्याचप्रमाणे एस आय आर (SIR) योजनेतही त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण प्रभाग क्षेत्रात नागरिकांची गणना करून घेतली आहे. याच कामात त्यांचा बहुतांश वेळ गेल्याने काही प्रमाणात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी वाढल्याचे पहावयास मिळाले आहे

निवडणुकीनंतरही नवनिर्वाचित नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन मोठ्या प्रमाणावर खोल्या जमीनदोस्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. जयवंत चौधरी यांनी बल्यानी मांडा टिटवाळा परिसरात धाडसी कारवाई करत अनेक दिग्गज राजकीय वरदहत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केलेली आहे.

‘कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला संरक्षण मिळाले पाहिजे’

अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यालाच निलंबित केल्यास भविष्यात इतर अधिकारी अनधिकृत बांधकाम सहाय्यक आयुक्त या पदावर काम करण्यास घाबरतील अशी भीती पत्रकार संघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे केली आहे. तसेच याबाबत सोमवारी पालिका आयुक्त उपयुक्त यांना पत्र देऊन निलंबन मागे घेण्याची विनंती करणार आहे.

दरम्यान, निलंबनाची नेमकी कारणे, चौधरी यांच्यावरील आरोप आणि महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका याबाबत स्वतंत्रपणे स्पष्टता होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बाजू ऐकूनच अंतिम निष्कर्ष काढला जावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.‘अ’ प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरच कारवाई का? त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या 
त्यांच्याकडून खुलासा मागून घ्या त्यांना बोलण्याची संधी तरी द्या.
अशी मागणी कोकण विभागीय पत्रकार संघाचे कल्याण शहर अध्यक्ष संदीप शेंडगे यांनी केली आहे

कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यानाच्या विकासाला गती; 2 एकर जागेसाठी आरक्षण बदलाचे निर्देश !!

कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यानाच्या विकासाला गती; 2 एकर जागेसाठी आरक्षण बदलाचे निर्देश !!

*मुंबई, दि. 20 ऑगस्ट 2026*

कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विधानसभा उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

*आरक्षण बदलाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश*  
उद्यानाच्या लगत असलेली सुमारे 2 एकर जागा विकासासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला दिले.

उद्यानाच्या विकासाला गती मिळावी आणि स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित सुशोभीकरणाचे काम प्रभावीपणे पूर्ण व्हावे यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

*बैठकीला कोण होते उपस्थित*  
या बैठकीला नगरविकास विभागाचे अधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे कल्याणमधील महत्त्वाचे उद्यान असून त्याचा विकास झाल्यास नागरिकांसाठी मोकळी आणि प्रेरणादायी जागा उपलब्ध होणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभह...