Saturday, 5 September 2026

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

** स्पर्धेत भरत गोसावी प्रथम

पालघर, प्रतिनिधी 

मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. “मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” हा स्पर्धेचा विषय होता. शिक्षक म्हणून कार्यरत असताना स्वतःच्या विद्यार्थी जीवनातील अपेक्षा आणि आज शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, या अनुषंगाने शिक्षकांनी आपल्या अनुभवांना व विचारांना लेखणीतून व्यक्त केले.

स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदा एकूण ४२ शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. मुंबई येथील प्रा. सचिन परब यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेत श्री. भरत गोसावी यांनी प्रथम क्रमांक, सौ. अमृता रोशन धुमाळ यांनी द्वितीय क्रमांक, तर श्री. पंकज शंकर चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्यांना त्यांच्या आवडीची ₹५०० किमतीची पुस्तके, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमाच्या ऑक्टोबर महिन्यातील कार्यक्रमात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

लेखणीपेक्षा ‘स्वतःचा विचार’ महत्त्वाचा!

या स्पर्धेच्या निकालासोबतच आयोजकांनी एक महत्त्वाची खंतही व्यक्त केली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या काही शिक्षकांनी निबंध लेखनासाठी एआयचा (Artificial Intelligence) वापर केल्याचे निदर्शनास आले. शिक्षकांच्या अनुभवांवर आणि त्यांच्या विद्यार्थी-शिक्षक प्रवासावर आधारित असलेल्या या विषयात प्रत्येक शिक्षकाचा स्वतःचा अनुभव, विचार, भावना आणि चिंतन अपेक्षित होते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेताना स्वतःची सर्जनशीलता आणि लेखनविचार यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

“स्पर्धेचा उद्देश केवळ क्रमांक मिळविणे नसून शिक्षकांनी स्वतःच्या विद्यार्थी जीवनाकडे पुन्हा एकदा पाहावे आणि ‘माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी कसा शिक्षक आहे?’ याचे आत्मपरीक्षण करावे, हा आहे,” असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे मनोविकास ग्रंथोत्सवचे अमोल पाटकर आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांच्या वतीने आभार मानण्यात आले. पुस्तक वाचन, चिंतन आणि लेखनातून शिक्षकांच्या विचारविश्वाला समृद्ध करण्याचा हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे यावेळी देण्यात आली.

वृत्त - पंकज चव्हाण (वसई)

पडघ्यात ८० वर्षांची परंपरा कायम; कृष्ण जन्मोत्सव अन् दहीहंडीचा रंगला उत्सव !!

पडघ्यात ८० वर्षांची परंपरा कायम; कृष्ण जन्मोत्सव अन् 
दहीहंडीचा रंगला उत्सव !!

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)

भिवंडी तालुक्यातील पडघा व परिसरात विविध मंडळे, राजकीय पक्ष, सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोविंदा पथकांच्या जल्लोषाने आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण पडघा परिसर दुमदुमून गेला.

दहीहंडी उत्सवानिमित्त सकाळपासूनच पडघा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते.  पडघे गावात गेल्या ८० वर्षांपासून सुरू असलेली कृष्ण जन्म महोत्सवाची परंपराही यंदाही मोठ्या उत्साहात कायम राखण्यात आली. सुदर्शन नगर येथून संपूर्ण पडघे गावातून  श्रीकृष्ण भगवानांची वेशभूषा केलेल्या बालकृष्णाची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक वाजत-गाजत  काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या कृष्ण जन्म महोत्सवात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पडघा शहर व विभाग, सिद्धिविनायक प्रतिष्ठान, एकता मित्रमंडळ यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दहीहंडी फोडण्यासाठी ओमसाई गोविंदा पथक, जय बजरंग गोविंदा पथक, सुदर्शन गोविंदा पथक यांसह विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पथकांनी एकामागून एक थर रचत उंच मानवी मनोरे उभारले आणि दहीहंडीला दिमाखदार सलामी दिली. डीजेच्या तालावर थिरकणारे तरुण, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषामुळे वातावरणात उत्साह संचारला होता. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी थरावर थर रचत आपले कौशल्य आणि शारीरिक सामर्थ्य पणाला लावले. उंच मनोरे रचून हंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पडघ्यातील बस स्थानक, विद्यानगर, शीतल शरद अपार्टमेंट यांसह विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केल्याने उत्सवाला आणखी रंगत आली. गोविंदा पथकांच्या धाडसी कामगिरीला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त घोषणांनी दाद दिली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी दहीहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. परंपरा, उत्साह, साहस आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत पडघ्यातील दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Friday, 4 September 2026

धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; रात्रभर नामस्मरण, भजनाने रंगला जागर, अनेक वर्षाची परंपरा !!

धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; रात्रभर नामस्मरण, भजनाने रंगला जागर, अनेक वर्षाची परंपरा !!

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील धुतुम गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

धुतुम खालची आळी यांच्या वतीने शंकर मंदिरात पूजा अर्चा, अभिषेकचा मान सामाजिक कार्यकर्ते समाधान कृष्णा कटेकर व सामाजिक कार्यकर्त्या भारती समाधान कटेकर या दांपत्याला देण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते सप्ताहाचा अभिषेक, पूजा अर्चा भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा तसेच गावात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, यासाठी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करण्यात आली.जन्माष्टमीच्या निमित्ताने रात्रभर नामस्मरण, भजन आणि जागर करण्यात आला. 

सालाबादप्रमाणे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत रघुनाथ ठाकूर यांच्या घरात आयोजित करण्यात आला. यंदाही धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपत हा उत्सव उत्साहात पार पडला.

या धार्मिक सोहळ्यास दशरथ रोहिदास ठाकूर, मेघनाथ दशरथ ठाकूर, सुरेश गंगाराम ठाकूर, गोविंद नामदेव ठाकूर, यांच्यासह धुतुम खालची आळीतील ग्रामस्थ,धुतुम गावातील ग्रामस्थ,भाविक आणि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जि. प. सदस्य कुंदा ठाकूर यांनी श्रीकांत ठाकूर यांच्या घरी जाऊन श्री कृष्णच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले.भजन, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणामुळे धुतुम गावात संपूर्ण रात्र श्रीकृष्णमय झाली. अखेर सर्व उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

(रस्ते दुरुस्ती मध्ये नागरिकांचा कराचा पैसा केडीएमसी ठेकेदाराला खड्डे भरण्यासाठी चे पैसे देणार कि खड्ड्यांच्या नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण दुरुस्तीचे पैसे देणार शिल्पा बजरंग तांगडकर यांचा सवाल)

.                                 शिल्पा बजरंग तांगडकर

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण परिसरामध्ये सर्व ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे या रस्त्या दुरुस्ती करण्यामध्ये फक्त खड्डे पडलेल्या जागेवर डांबरीकरणाचा मुलामा  देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा  प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकडे करून  येत आहे ,शिल्पा बजरंग तांगडकर यांच्या वतीने टावरी पाडा ,बारावी परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर ऑनलाइन पत्रा सोबत कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता यावर तत्काळ दिलेल्या कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली नाही परंतु आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर टावरीपाडा वॉटर फिल्टर रोड डांबरीकरणाचे काम करण्यात आले परंतु हे काम संपूर्ण रस्त्याचे काम केले नसून फक्त खड्डे पडले होते त्या ठिकाणी पॅच मारुन डांबरीकरण करण्यात आले, तसेच अजून  बारावे पाइपलाइन ,गोदरेज हिल परिसरातील रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे.

नागरिकांचा करातील पैसा केडिएमसी खड्डे बुजवल्यानंतर कंत्राटदाराला फक्त त्या खड्डे बुजवले त्याचे पैसे देणार कि रस्ता दुरुस्ती नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण चे पैसे देणार हा प्रश्न शिल्पा तांगडकर यांचा वतीने विचारण्यात येत आहे.

रायते पिपंळोली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा आमदार, खासदारांकडून सत्कार, पत्रकारांनीही केला सन्मान !!

रायते पिपंळोली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा आमदार, खासदारांकडून सत्कार, पत्रकारांनीही केला सन्मान !!

कल्याण, (संजय कांबळे) : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कल्याण तालुक्यातील रायते पिपंळोली ग्रुप ग्रामपंचायचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी, म्हणून खासदार बाळ्या मामा म्हात्रे, आणि आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, डेप्युटी सीईओ (साप्र) अविनाश फडतरे, ग्रामपंचायत डेप्युटी सीईओ प्रमोद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्रक, सन्मान पदक देऊन गौरव करण्यात आला, तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुल्यमापन समितीचे सदस्य तथा पत्रकार संजय कांबळे यांनी ही कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान केला.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासात्मक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपातळीवरील प्रशासन अधिक सक्षम करण्यामध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ग्रामस्थांच्या गरजा, स्थानिक समस्या आणि विकासाच्या प्राधान्यक्रमांचा विचार करून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत, जिल्हा परिषद, ठाणेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गुणगौरव सोहळा’ उत्साहात पार पडला.
उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत विभागातील ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) व आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये रायते पिपंळोली ग्रुपचे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचाही समावेश असून त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच कल्याण तालुक्यातील पत्रकार तथा समिती सदस्य संजय कांबळे यांनी रायते ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरवसे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच इतर ग्रामपंचायत अधिकां-यांचेही अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची दखल, रायते पिपंळोली ग्रामपंचायतीकडून विसर्जन घाटांची साफसफाई !

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची दखल, रायते पिपंळोली ग्रामपंचायतीकडून विसर्जन घाटांची साफसफाई !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात,तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास सुमारे ९३ सार्वजनिक आणि ४ हजार ५०० घरगुती गणेशोत्सव साजरे होणार असून यासाठी १९ गणेशघाटावर 'श्री, चे विसर्जन होणार आहे. या करिता ८६ अंमलदार, १० पोलीसअधिकारी, होमगार्ड, पोलीस पाटील हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु विसर्जन घाट, रस्त्यावरील खड्डे चिखल पाहता इतर विभागाचे काय? असा प्रश्न उपस्थित करून पत्रकार संजय कांबळे यांनी 'एस न्यूज महाराष्ट्र, तसेच दैनिक सागर, माझा बातमीदार, आदी विविध दैनिकामधून प्रसिद्ध करताच याची दखल तालुक्यातील 'रायते पिपंळोली ग्रुप ग्रामपंचायतीने घेऊन तात्काळ या घाटांची साफसफाई केली, त्यामुळे पत्रकार श्री कांबळे यांनी त्यांचे आभार मानून सन्मान केला.

महाराष्ट्रात विशेष:त मुंबई, ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, शिवाय शासनाने हा महाराष्ट्र उत्सव म्हणून घोषित केला आहे. यावेळी पोलीस यंत्रणेवर प्रंचड ताण येतो, केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी ८० ते ९० कर्मचारी आहेत, अशातच आता गणेशोत्सव तोडांवर आला आहे, या पोलीस ठाण्यातंर्गत ९३ सार्वजनिक तर ४ हजार ५०० घरगुती गणेशाची स्थापना होणार आहे, बाप्पाच्या विसर्जनासाठी उल्हास, काळू, भातसा आणि बारवी नदीच्या काठावर तसेच काही ठिकाणी गाव तलावात विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत, असे १९ घाट आहेत, परंतु या घाटांची सध्याची परिस्थिती पाहिली तर हे विसर्जन घाटआहे की एखादे दलदल खाडी, अशी स्थिती दिसून येत आहे. काही ठिकाणी या घाटाच्या लाद्या तुटलेल्या, फुटलेल्या, उखडलेल्या दिसून येत आहेत, मागील काही वर्षाचा विचार केला तर गणेश विसर्जन दरम्यान अनेक गणेशभक्त बुडवून मरण पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत असेल अथवा महसूल विभाग असेल यांनी गणेशोत्सवापूर्वी या घाटांची दुरुस्ती, दिवाबत्ती ची सोय, जीवरक्षक नेमणे, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवने, वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी उपाययोजना वेळीच केल्या तर यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकतो, अशा प्रकारे बातमी एस न्यूज महाराष्ट्र, दैनिक सागर, बातमीदार माझा, अशा विविध माध्यमातून प्रसिद्ध केली होती. याची दखल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरोशे, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी घेऊन जेसीबीच्या माध्यमातून हा चिखल बाजूला केला आहे, शिवाय नदीमध्ये मोटार लावून पाण्याने संपर्क घाट स्वच्छ करणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांनी सांगितले. त्यामुळे पत्रकार कांबळे यांनी त्यांचे कार्यालयात जाऊन आभार मानले व त्यांचा सन्मान केला. तसेच असेच काम इतरही यत्रणांनी करावे असे कांबळे यांनी सांगितले.

Thursday, 3 September 2026

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण पूर्वेतील पाणी, रस्ते, आरोग्य प्रश्नावर आमदार सुलभा गायकवाड यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक !!

*कल्याण, प्रतिनिधी :* कल्याण पूर्व मतदारसंघातील पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाशी संबंधित मूलभूत प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन सविस्तर बैठक घेतली.

या बैठकीत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर चर्चा करून प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कालबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

*बैठकीतील प्रमुख मागण्या व निर्णय :*

*🔹 पाणी प्रश्न :* 27 गावांतील नागरिकांना पाणी जोडणीसाठी मालमत्ता कर पावतीची अट 2022 ऐवजी 2025 पर्यंत शिथिल करणे, आशेळे-माणेरे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, चिंचपाडा, द्वारली, नांदिवली, वसार येथील अमृत योजनेतील जलवाहिनी व जलकुंभाची कामे वेगाने पूर्ण करणे आणि वाढीव पाणी बिलांची तपासणी करून कपात करणे.

*🔹 रस्ते व स्वच्छता :* गणेशोत्सवापूर्वी सर्व मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, सिद्धार्थनगर ते कल्याण स्टेशन स्कायवॉकची स्वच्छता व रंगरंगोटी, दुर्गाडी व उंबर्डे डंपिंग ग्राउंडवरील NACOF व ITCON कंपनीच्या कामाची चौकशी.

*🔹 आरोग्य व सार्वजनिक सुविधा :* 100 फुटी रोडवरील आरक्षण क्र. 283 मधील 30,000 चौ.मी. जागेवर अद्ययावत रुग्णालयासाठी निधी प्रस्ताव, आरक्षण क्र. 279 मधील क्रीडासंकुलाचे अधिग्रहण, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व स्वच्छता, चिंचपाडा 100 फुटी रोडवर नवीन शौचालय उभारणे.

*🔹 सुरक्षा व इतर :* भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, नादुरुस्त CCTV दुरुस्ती, सार्वजनिक विहिरींवर लोखंडी जाळी बसवणे, खडेगोळवली प्रभाग कार्यालयात 24 तास अग्निशमन वाहन व स्वर्गरथ उपलब्ध करणे, दादासाहेब गायकवाड मैदानात खेळाडूंसाठी सुविधा, द्वारलीपाडा, वसार, नेवाळी नाका येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई.

तसेच कल्याण पूर्वसाठी नवीन शिधावाटप कार्यालयासाठी महापालिकेच्या वास्तूत जागा देणे, परिवहन उपक्रमातील 59 कायम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे आणि महापालिकेचे गाळे महिला बचत गट व सेवाभावी संस्थांना नाममात्र दरात देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

"नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे आणि कल्याण पूर्वचा नियोजनबद्ध विकास हीच आमची प्राथमिकता आहे. प्रश्न केवळ मांडणे नाही तर त्याचा पाठपुरावा करून तोडगा काढणे यासाठी प्रयत्न सुरू राहतील," असे आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !! ** स्पर्धेत भरत गोसावी प्रथम पाल...