Monday, 17 August 2026

केबल फॉल्टमुळे डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये 13 तास वीज पुरवठा बंद !!

केबल फॉल्टमुळे डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये 13 तास वीज पुरवठा बंद !!

*डोंबिवली, दि. 18 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात आज पुन्हा एकदा दीर्घकाळ वीज खंडित राहिल्याने नागरिक वैतागले आहेत. केबल फॉल्टमुळे स्नेहगंधा सोसायटीसह परिसरातील अनेक सोसायट्यांना तब्बल 13 तासांहून अधिक काळ वीजेविना रहावे लागले.

*पहाटेपासून वीज गायब*  
आज सोमवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास स्नेहगंधा सोसायटी RH 20 आणि आजूबाजूच्या सोसायट्यांचा वीज पुरवठा अचानक बंद झाला. नागरिकांनी महावितरणकडे तक्रार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता केबलमध्ये फॉल्ट असल्याचे निदर्शनास आले. 

या केबलला जॉईंट मारणे आवश्यक असल्याने खाजगी ठेकेदार एजन्सीच्या मदतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

*दुपारी 4.30 नंतर सुरू झाली वीज*  
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी 4.30 वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना पहाटेपासून दुपारपर्यंत अडचणींचा सामना करावा लागला.

*सततच्या खंडितमुळे नागरिक संतप्त*  
एमआयडीसी निवासी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून केबल फॉल्ट, पोलवरील तांत्रिक बिघाड आणि उच्च दाबाच्या वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडून किंवा स्पर्श होऊन वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

वारंवार होणाऱ्या या खंडितांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. महावितरण आणि केडीएमसी प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महानगरपालिकांना आदेश : खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा !!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महानगरपालिकांना आदेश : खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा !!

*मुंबई, प्रतिनिधी* : येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तातडीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

*आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा*  
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवातील रस्त्यांच्या प्रश्नांबाबत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते. 

यावेळी त्यांनी पावसाळ्यात तातडीने रस्ते बुजविण्यासाठी प्री-कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असेही निर्देश दिले.

*उच्च न्यायालयानेही घेतली दखल*  
राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधून रस्त्यावरील खड्ड्यांबाबत तक्रारी येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या खड्ड्यांची माननीय उच्च न्यायालयानेही दखल घेऊन ते तातडीने बुजवण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत.

*बैठकीला कोण उपस्थित होते?*  
या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज, मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह एमएमआर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी, पनवेल आणि पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली-मिरज-कुपवाड, लातूर, नांदेड, अहिल्यानगर, अकोला, इचलकरंजी, सोलापूर यासह इतर प्रमुख महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तातडीने खड्डेमुक्त करावेत, असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मनपा आयुक्तांना दिले आहेत.

Sunday, 16 August 2026

*नागरी संरक्षण क्षेत्ररक्षक प्रशिक्षण वर्ग क्र. ०१/२०२६ ची सांगता; २६ स्वयंसेवकांनी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दिली* !!!

*नागरी संरक्षण क्षेत्ररक्षक प्रशिक्षण वर्ग क्र. ०१/२०२६ ची सांगता; २६ स्वयंसेवकांनी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दिली* !!!

कल्याण | १४ ऑगस्ट २०२६ :
नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयामार्फत आणि मा. सहायक उपनियंत्रक श्री. विजय जाधव साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक १० ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नागरी संरक्षण कार्यालय, कल्याण येथे नागरी संरक्षण क्षेत्ररक्षक प्रशिक्षण वर्ग क्र. ०१/२०२६ आयोजित करण्यात आला होता.

या प्रशिक्षण वर्गामध्ये स्वयंसेवकांना नागरी संरक्षणाचे कार्य, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची दक्षता, आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रत्यक्ष परिस्थितीत प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी, दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी निर्धारित वेळापत्रकानुसार प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांची लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण २६ स्वयंसेवक उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान प्राप्त झालेले ज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यक्षमतेचे मूल्यमापन या परीक्षेच्या माध्यमातून करण्यात आले.

सदर प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण प्रभारी सौ. दिपा घरत, सहाय्यक उपनिरीक्षक (सउनि.) तसेच डॉ. घाटवळ, मानसेवी निदेशक यांनी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव साहेब यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. नागरी संरक्षणाच्या कार्यात स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रशिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये शिस्त, सेवाभाव, आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने कार्य करण्याची क्षमता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या प्रशिक्षण वर्गाची सांगता लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेने करण्यात आली.

नागरी संरक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित आणि सक्षम स्वयंसेवकांची फळी निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षण वर्ग यशस्वीरीत्या संपन्न झाला.

माहितीकरिता सादर.

Regards,
सहायक उपनियंत्रक
नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे

न्हावा शेवा पोलीस विभागात मद्यपान व्यसनाबाबत जनजागृती उपक्रम !!

न्हावा शेवा पोलीस विभागात मद्यपान व्यसनाबाबत जनजागृती उपक्रम !!

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नशामुक्त भारत अभियान अंतर्गत दर्शन नाईक, प्रतीक अमृते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्हावा शेवा पोलीस विभागासाठी मद्यपानाच्या व्यसनाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केला.

या उपक्रमाद्वारे मद्यपान हे केवळ व्यसन नसून एक आजार आहे, हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. मद्यपानाचे व्यसन कोणत्याही व्यक्तीला तिचे वय, व्यवसाय, जात किंवा सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी न पाहता होऊ शकते. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीकडे दोषी म्हणून न पाहता तिला योग्य उपचार, आधार आणि पुनर्वसनाची संधी देणे आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली.

या सामाजिक उपक्रमासाठी न्हावा शेवा पोर्ट डिव्हिजन, नवी मुंबईचे एसीपी विजय चौधरी आणि न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाटील यांनी मद्यपानाच्या समस्येची गंभीरता ओळखून या जनजागृती उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल दर्शन नाईक, प्रतीक अमृते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजीचे उपोषण पूढे ढकलले !!

१५ ऑगस्ट रोजीचे उपोषण पूढे ढकलले !!

नवीन शेवा व शेवा कोळीवाडा गावच्या आक्रमकतेपुढे प्रशासन नरमले.

विविध समस्यावर सकारात्मक चर्चा.

प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने उपोषण तात्पुरते स्थगित.

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) :
नविन शेवा व शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ह्या दोन्ही गावांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी जो उपोषण व आंदोलन करणार होते  ज्यामध्ये शेवा व कोळीवाडा गावठाण जमीन आजतागायत संपादित नसताना दि.१७/०२/१९९० व दि.१७/०३/१९९० रोजीची २ खोटे आज्ञापत्रे बनवले आहेत ते रद्द करण्याबाबत व गेली ४० वर्षे दोन्ही गावांची पुनर्वसनाची जी फसवणूक व ठकवणे होत आहे त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी व पुनर्वसनाची पूर्तता करण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाविरोधात आंदोलनाची तयारी चालू असताना दिनांक १३/८/२०२६ रोजी पोलिस प्रशासनमार्फत जेएनपीटी प्रशासन (जे एन पी ए प्रशासन )कडून दोन्ही गाव कमिटी ला चर्चेला बोलावण्यात आले होते.

    ह्या चर्चेला दोन्ही गावांच्या वतीने माजी आमदार  मनोहरशेठ भोईर व दोन्ही गावांचे ४-४ प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाकडून जेएनपीटी चे अध्यक्ष  गौरव दयाल ,जेएनपीटी चे उपाध्यक्ष,सचिव मनीषा जाधव, उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन),पनवेल प्रांत कार्यालयाचे  पवन चांडक,उरण चे तहसीलदार  उद्भव कदम  व इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व न्हावा शेवा येथील सहाय्यक आयुक्त विजय चौधरी व न्हावा शेवा पोलिस स्टेशन चे सीनियर सूरज पाटील  हजर होते.

   चर्चेला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा चेअरमन यांनी दोन्ही गावच्या प्रतिनिधीना त्यांचे विषय मांडायला सांगितले व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली. शेवटी चेअरमन यांनी तहसीदारांना सांगितले की नवीन शेवा गावाचा जो १५.७५ हेक्टर जागेचा उपविभागीय अधिकारी पनवेल यांजकडील आदेश दी. १७/२/१९९० साली आज्ञापत्र बनवला आहे त्याचा कायदेशीर गॅझेट नाही व खोटा दस्तऐवज आहे व प्रलंबित असलेले पुनर्वसन मार्गी लावणे करिता  जिल्हाधिकारी अलिबाग ह्यांना पत्र लिहून ८ ते १० दिवसात मिटिंग आयोजित करून २ आज्ञापत्रे रद्द करा आणि राहिलेल्या अपूर्ण पुनर्वसन पूर्ण करण्याचे काम लवकरात लवकर करुन घेणे असे आदेश दिले. व तसे पत्र नवीन शेवा कमिटीला द्या. व सिडको संबंधित जागेचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्या संदर्भात सिडको एमडी ह्यांना सुद्धा जेएनपीटी ने पत्र पाठवून द्यावा व चर्चा करावी असे यावेळी ठरले.

      त्याच प्रमाणे हनुमान कोळीवाडा गावाकरिता जेएनपीटी टाउनशिप च्या मागे १०.१६ हेक्टर जमीन  देण्याचा प्रस्ताव तयार आहे .परंतु हनुमान कोळीवाडा गावचा पुनर्वसनाचे अनुषंगाने  उपविभागीय अधिकारी पनवेल यांजकडील आदेश दि. १७/२/१९९० रद्द करणे बाबत व हनुमान कोळीवाडा ह्यांचे प्रलंबित असलेले पुनर्वसन तत्काळ करणेबाबत दोन्ही गावांची येत्या ८ ते १० दिवसांत मा. जिल्हाधिकारी,रायगड,अलिबाग यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे जेएनपीटी चेअरमन ने उरण तहसीलदार यांना तशा प्रकारचे दोन्ही गाव प्रतिनिधीना पत्र देण्याचे सांगितले व होणारे १५ ऑगस्ट चे उपोषण व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. ह्यामध्ये माजी आमदार  मनोहरशेठ भोईर ,वकील सिद्धार्थ  इंगळे व कोळी समाजाचे नेते नंदकुमार पवार ह्यांनी दोन्ही गावांच्या वतीने जोमाने बाजू मांडली. 

    ह्या बैठकीकरिता नवीन शेवा गावच्या सरपंच सोनल घरत, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील,  चंद्रकांत घरत,सल्लागार  पंडित घरत, पंचायत समिती सदस्य दिपक भोईर, महेश म्हात्रे, कृष्णा घरत, हेमंत म्हात्रे,लक्ष्मण म्हात्रे व इतर पदाधिकारी त्याचप्रमाणे हनुमान कोळीवाडा गावाचे सरपंच परमानंद कोळी, सामाजिक कार्यकर्ते रमेश कोळी, सुरेश कोळी, नितीन कोळी व इतर पदाधिकारी हजर होते.

मोठीजुई शाळेत उरण तालुक्यातील पहिल्या ‘आयडियल क्लासरूम’चे उद्घाटन

मोठीजुई शाळेत उरण तालुक्यातील पहिल्या ‘आयडियल क्लासरूम’चे उद्घाटन !

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) ::रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई येथे उरण तालुक्यातील पहिल्या आयडियल क्लासरूम चे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
विद्यार्थ्यांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तसेच वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी, या उद्देशाने शाळेत आयडियल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली आहे. या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून विविध विषयांचे ज्ञान अधिक सोप्या व मनोरंजक पद्धतीने घेता येणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी   जि. प सदस्य डॉ. मनिष ठाकूर,अविनाश ठाकूर ,प.स सदस्य दिपक भोईर,प्रारंभी गावंड,रमाकांत पाटील, गटशिक्षणाधिकारी सागर पवार, केंद्र प्रमुख हसन आवटे,मुख्याधपक अविनाश नवाले,ग्रामविकास अधिकारी रुपम गावंड,व्यवस्थापन अध्यक्ष लक्ष्मण भोईर, अमृता भोपी, योगेश भोईर,शशिकांत भोईर,रसिका भोईर, प्रमिला भोईर, उपस्थित होते.तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  उपक्रमशीळ शिक्षक कौशिक ठाकूर,यतीन म्हात्रे, विश्वनाथ गावंड, अंकुश पाटील,काजल पाटील यांनी मेहनत घेतली. यावेळी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. आयडियल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळून त्यांच्यामध्ये नव्या पद्धतीने शिकण्याची उत्सुकता निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
उरण तालुक्यातील पहिल्या आयडियल क्लासरूमचा मान मिळाल्याने रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुईच्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे

शिवसंकल्प समालोचक असोसिएशन उरण, रायगड तर्फे कोप्रोली वाडी शाळेतील विध्यार्थ्यांना स्नेहभोजन, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप !!

्शिवसंकल्प समालोचक असोसिएशन उरण, रायगड तर्फे कोप्रोली वाडी शाळेतील विध्यार्थ्यांना स्नेहभोजन, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश वाटप !!

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : विविध व्यासपीठावर आपल्या समलोचन आणि निवेदनातून समाज प्रबोधन करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन च्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस कोप्रोली आदिवासी शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप आणि खाऊवाटप व स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

     आपल्या समालोचन निवेदनाच्या मिळणाऱ्या मानधनातून काही रक्कम स्वइच्छेने असोसिएशन कडे जमा करून १० वी नंतर गरिबीमुले शिक्षण घेण्यास असमर्थ असणाऱ्या व ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक अर्थसहाय्य, गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, शाळांना  संगणक, प्रिंटर अशी शैक्षणिक उपकरणे, अपंगांना व्हील चेअर, सायकल, शाळांना ब्लूटूथ स्पीकर, आदिवासी वस्तीवर स्नेहभोजन,दिवाळी फराळ वाटप तसेच वस्त्रदान असे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन च्या वतीने स्टेप आर्ट डान्स अकॅडमी च्या मार्गदर्शिका  सुनंदा कुमार मॅडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळेचे मुख्याध्यापक  कल्पेश ठाकूर यांच्या तर्फे शालेय गणवेश वाटप आणि मोरा उरण येथिल साईंचे निस्सीम भक्त आकाश कोळी यांची सुकन्या कु. सबुरी हिच्या वाढदिवसाप्रित्यर्थ स्नेहभोजन असे विविध उपक्रम असोसिएशन च्या तर्फे आयोजित केले होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक कल्पेश ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर असोसिएशन चे सल्लागार आणि सुप्रसिद्ध निवेदक रायगड भूषण नितेश पंडित यांनी कार्यक्रमाचे निवेदन आणि संकल्पना मांडली.कार्यक्रमा प्रसंगी असोसिएशन चे अध्यक्ष राजेंद्र भगत, माजी खजिनदार जीवन डाकी, माजी कार्याध्यक्ष पप्पू सूर्यराव, सदस्य स्वप्निल पाटील, राहुल प्रधान, केंद्रप्रमुख निलेश भेरे, मुख्याध्यापक कल्पेश ठाकूर तसेच उत्सव मूर्ती सुनंदा कुमार मॅडम, कु. सबुरी कोळी, आकाश कोळी, मंदाकिनी कोळी, स्टेप आर्ट चे रोहन भोईर आणि सरिता शुक्ला, मोनिका चौकर आणि शाळेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

    शेवटी कुमार मॅडम यांनी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या शिवसंकल्प असोसिएशन आणि स्टेप आर्ट च्या सर्व सभासदांचे, शाळेचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

केबल फॉल्टमुळे डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये 13 तास वीज पुरवठा बंद !!

केबल फॉल्टमुळे डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये 13 तास वीज पुरवठा बंद !! *डोंबिवली, दि. 18 ऑगस्ट 2026* डोंबिवली एमआयडीसी निवासी परि...