Sunday, 16 August 2026

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !!

अंबरनाथ | १५ ऑगस्ट २०२६ :
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या अंबरनाथ येथील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांच्या शुभहस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, मानसेवी अधिकारी आणि नागरी संरक्षण स्वयंसेवक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले.

या कार्यक्रमास कार्यालयीन कर्मचारी, मानसेवी अधिकारी व नागरी संरक्षण स्वयंसेवक असे एकूण ५१ जण, तसेच १० होमगार्ड जवान उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या एकता, अखंडता व सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना नागरी संरक्षण विभागाची भूमिका, आपत्तीच्या काळातील स्वयंसेवकांचे योगदान आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक नागरिकाने बजावायच्या जबाबदारीवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, मानसेवी अधिकारी, नागरी संरक्षण स्वयंसेवक आणि होमगार्ड जवान यांच्यामध्ये उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा विशेष संस्मरणीय ठरला.

स्वातंत्र्य, शिस्त, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा हा सोहळा नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या अंबरनाथ कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.

आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन !

आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन !

ठाणे (पी.डी. पाटील): आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही "गुणगौरव समारंभ" कार्यक्रम रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४.०० वा. सहयोग मंदिर हॉल, दुसरा मजला, सहयोग मंदिर मार्ग, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे.

     या समारंभात मार्च/एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या व उच्च विद्याविभूषित आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.

       या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार डॉ. श्री. संजीव गणेश नाईक तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुहास सिताराम पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या गुणगौरव समारंभास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन अध्यक्ष डॉ. श्री. किरण राम गावंड व प्रमुख कार्यवाह श्री. रमेश सिताराम गवळी यांच्यासह आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर यांच्या मार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२१२५७७१५

मुरबाड : कळमखांडे गावात प्रहार अपंग क्रांती संघटनेची शाखा सुरू; दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढ्याचा निर्धार !!

मुरबाड : कळमखांडे गावात प्रहार अपंग क्रांती संघटनेची शाखा सुरू; दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढ्याचा निर्धार !!

*मुरबाड, प्रतिनिधी* : स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. ही केवळ शाखेची सुरुवात नसून, दिव्यांग बांधवांच्या हक्क, सन्मान आणि न्यायासाठी एकजुटीने लढण्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

*दिव्यांग बांधवांसाठी सक्षम व्यासपीठ*  
या शाखेच्या माध्यमातून गावातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या प्रश्नांसाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कळमखांडे गावातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

*आमदारांच्या उदासीनतेवर टीका*  
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रहार अपंग क्रांती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यावर टीका केली. 
ते म्हणाले, "मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची ठाणे जिल्ह्यातील सर्वात कार्यक्षम आमदार अशी ओळख आहे. त्यांनी रस्ते आणि इतर विकास कामे चांगली केली आहेत. परंतु मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या बाबतीत मात्र त्यांची उदासीनता दिसून येते."

पुढे बोलताना ॲड. पाटील म्हणाले, "प्रत्येक आमदाराला शासनाकडून दरवर्षी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला जातो. त्या निधीतून आपल्या मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकली पुरविणे, त्यांना रोजगारासाठी स्टॉल उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे अपेक्षित आहे. सामान्य माणूसही दिव्यांगाला मदत करतो, पण आमदारांनी याबाबत दाखवलेली उदासीनता अक्षम्य आहे."

*मिरा-भाईंदरचे उदाहरण*  
दिव्यांगांसाठी निधीचा योग्य वापर कसा करता येतो, याचे उदाहरण देताना त्यांनी मिरा-भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्याचा उल्लेख केला. सरनाईक यांनी दिव्यांग निधीतून अनेकांना इलेक्ट्रिक सायकली आणि स्टॉल देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघटना कायम लढत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Saturday, 15 August 2026

बोरिवलीत ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला सोहळा !!

बोरिवलीत ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला सोहळा !!

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव)

भिवंडी तालुक्यातील बोरिवली येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बोरिवली ग्रामपंचायतीचे प्रशासक अन्वर पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

सामाजिक कार्यकर्ते सोहराब गुजर, सामाजिक कार्यकर्ते जियाद गुजर तसेच बोरिवली ग्रामपंचायतीच्या वतीने बोरिवली येथील गुजर हॉल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण बोरिवली गाव देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेले होते.

या कार्यक्रमाला बोरिवली ग्रामपंचायतीचे प्रशासक अन्वर पिंजारी, ग्रामपंचायत अधिकारी गणेश जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी, पोलीस उपनिरीक्षक शरद सुरलकर, मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे, माजी पंचायत समिती सदस्य मुशीर नाचण, भिवंडी काँग्रेस ग्रामीणचे माजी अध्यक्ष शरद ठाकरे, उद्योजक साजिद खोत यांच्यासह बोरिवली ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

बोरिवली येथील विविध ठिकाणी घरांवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा तिरंगे झेंडे लावण्यात आले होते. यावेळी बोरिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एकूण आठ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी  चित्रकला स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला  स्पर्धेमध्ये  प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी बोरिवली येथील बीएलओंनी मतदार यादीशी संबंधित कामकाजात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन  सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समूहगीते तसेच नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल, बोरिवली-पडघा, के.एम.ई.एस. हायस्कूल, पडघा-बोरिवली, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, बोरिवली-पडघा, इक्रा इस्लामिक स्कूल व मकतब, पडघा उर्दू हायस्कूल (सेमी इंग्लिश), बी.एस.ए. इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळा आनंदनगर आणि जिल्हा परिषद मराठी शाळा समतानगर या शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांच्या आकर्षक सादरीकरणाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना प्रकर्षाने दिसून आली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला. विद्यार्थ्यांचा उत्साह, विविध सांस्कृतिक कार्यक्रम,  विद्यार्थ्यांचा सन्मान, बीएलओंचा गौरव आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे बोरिवलीतील स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

जिनियस इंग्लिश स्कूल तांदुळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

जिनियस इंग्लिश स्कूल तांदुळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेले विलासराव कोळेकर, फौजी प्रतिक वाठारकर, संस्था अध्यक्ष श्री सतिश जाधव

ईश्वरपुर, प्रतिनिधी 

तांदुळवाडी येथील जिनियस इंग्लिश स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार श्री. विलासराव कोळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी या स्कूलचा विद्यार्थी प्रतीक वाठारकर (फौजी) तसेच संस्थेचे संस्थापक श्री. सतीश जाधव, सचिव सारीका जाधव मॅडम तसेच सौ. वैष्णवी देशमुख, मयुरी सपकाळ, शुभांगी जाधव, सारिका जाधव, पूजा जाधव, स्नेहल भोसले, रेखा कांबळे, अर्चना देशमुख, वंदना कांबळे, अर्चना शिंदे, ज्योती भोसले आदी शिक्षकवर्ग तसेच श्री ओंकार खंडागळे, प्रकाश खंडागळे, राजू मोठे, विजय भोरडे, गजानन जाधव, आकाश वाठारकर, तानाजी पाटील, अमीर लांडगे, कोरे सर, नितीन पाटील, जीवन पाटील,  राजश्री भोसले आदी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी श्री विलासराव कोळेकर व फौजी श्री प्रतिक वाठारकर यांचा संस्था अध्यक्ष श्री सतिश जाधव यांनी शाल,बुके देवून सत्कार केला.

यावेळी कु. शौर्य मोठे, ज्ञानेश्वरी जाधव, वल्लभ साळुंखे, शांभवी चौगुले, शिवज्ञ जाधव, राजवर्धन मोहिते, शिवांश निकम, अविरा जाधव, ज्योतीराज पाटील, तनिष्का काकडे, यशवी पाटील, हर्षल जाधव, शिवांजली खंडागळे, शिवांश कांबळे, रियांश रविकिरण बनसोडे, प्रज्वल नागराज धामणेकर, राजमुद्रा मानसिंग पवार, नेत्रजा अरुण काकडे, कादंबरी संदीप पाटील, सानवी संतोष पाटील, जान्हवी कृष्णात लुगडे, वेदांत राहुल पाटील, राजवीर प्रवीण जाधव, स्वानंदी सतीश पाटील, ज्ञानेश्वरी सचिन पाटील, अमृता संदीप पाटील ,अन्विता अभिजीत पाटील सृष्टी प्रदीप सावंत ,राही योगेश नायकवडी, दर्शराज शिव प्रसाद कोरे, शौर्य कोळेकर, वीरेन शिंदे ,अनन्या जाधव, अद्विका जाधव, आराध्या कुंभार, आरोही जाधव, हर्षवर्धन पाटील, कार्तिकी पाटील, जयवर्धन पाटील, अनाया लांडगे, अव्दिका पवार, वीर जाधव, वेदांत जाधव, वीणा जाधव, निर्भय बागुल, नित्या बागुल, आर्य खंडागळे, आरव शिंदे, रुद्रांश खोत, समर्थ नलवडे, अन्वी खडके,‌ईश्वरी शिंदे, ईश्वरी घोरपडे, प्रगती पाटील ,निधी बनसोडे, सिद्धार्थ निकम, अनन्या गोसावी, आसिम पटेल आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

जर्मनीत भारतीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला 80 वा स्वातंत्र्यदिन !!

जर्मनीत भारतीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला 80 वा स्वातंत्र्यदिन !!

*म्युनिक, दि. 15 ऑगस्ट 2026*

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जर्मनीतील म्युनिक, बर्लिन, फ्रँकफर्टसह विविध शहरांमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास कार्यालयांच्या वतीने ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारतीय वाणिज्य दूतावासाच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमांना जर्मनीत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत गायन, देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक सादरीकरणे झाली.

या निमित्ताने परदेशात असलेल्या भारतीयांना एकमेकांना भेटण्याची आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारलेले होते.

दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि परदेशात असूनही देशाशी असले नाते घट्ट ठेवण्याचे आवाहन केले. 

जर्मनीतील भारतीय समुदायाने हा 80 वा स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि उत्साहात साजरा केला.

वृत्त - समाजसेवक राजू नलावडे (डोंबिवली)

आंतरराष्ट्रीय युवा दिन : साकेत महाविद्यालयात जिल्हास्तरीय ‘रेड रन’ स्पर्धा आणि जनजागृती रॅली उत्साहात संपन्न !!

आंतरराष्ट्रीय युवा दिन : साकेत महाविद्यालयात जिल्हास्तरीय ‘रेड रन’ स्पर्धा आणि जनजागृती रॅली उत्साहात संपन्न !!

*कल्याण, प्रतिनिधी* : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त साकेत महाविद्यालय, कल्याण येथे जिल्हास्तरीय ‘रेड रन’ स्पर्धा आणि HIV/AIDS जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. क्रीडा आणि सामाजिक संदेश यांचा संगम असलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

*221 विद्यार्थ्यांचा रेड रनमध्ये सहभाग*  
ठाणे जिल्ह्यातील 60 महाविद्यालयांमधील एकूण 221 विद्यार्थ्यांनी ‘रेड रन’ स्पर्धेत भाग घेतला. तर HIV/AIDS प्रतिबंध आणि सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या जनजागृती रॅलीमध्ये तब्बल 450 विद्यार्थी सहभागी झाले होते.

*जनजागृतीचा मुख्य संदेश*  
या रॅलीच्या माध्यमातून HIV/AIDS प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, नियमित HIV तपासणी, उपचारांची उपलब्धता आणि HIV संदर्भातील गैरसमज व भेदभाव दूर करणे, असे महत्त्वाचे संदेश देण्यात आले. 

*"अचूक माहिती हेच संरक्षण"*  
या उपक्रमाच्या निमित्ताने “अचूक माहिती, सुरक्षित वर्तन आणि संवेदनशील दृष्टिकोन” याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. युवा पिढीला आरोग्याबाबत जागरूक करणे आणि समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमामुळे क्रीडा, युवकांचा सहभाग आणि सामाजिक जनजागृती यांचा उत्तम मिलाफ साधला गेला.

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !! अंबरनाथ | १५ ऑगस्ट २०२६ : भा...