Thursday, 13 August 2026

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी; रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक !

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी; रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक !

** उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) रायगड जिल्हा परिषद उलवे, केंद्र वहाळ, तालुका पनवेल येथील शाळेची विद्यार्थिनी कु. समिक्षा महेश मढवी हिने महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समिक्षाने रायगड जिल्ह्यात चौथा क्रमांक, तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उलवे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

समिक्षाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उलवे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तिच्या घरी जाऊन गुणगौरव व सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी समिक्षाचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कारप्रसंगी उलवे शहराचे माजी अध्यक्ष  राहुल बाबुराव पाटील, पनवेल तालुका सचिव  निर्दोष केशव गोंधळी, गव्हाण विभाग अध्यक्ष तुषार सुनील म्हात्रे तसेच गव्हाण विभाग उपाध्यक्ष बबलू जगन्नाथ पाटील उपस्थित होते.

समिक्षाने मिळवलेले हे यश तिच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेचे प्रतीक असून, तिच्या यशामुळे उलवे परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्ता आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता आहे, हे समिक्षाने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.

साई ट्रस्ट ज. ने. पोर्ट विद्यालयाचा कु. नमित प्रदीप वाघावले राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा तर उरण तालुक्यातून १ला !

साई ट्रस्ट ज. ने. पोर्ट विद्यालयाचा कु. नमित प्रदीप वाघावले राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा तर उरण तालुक्यातून १ला !

उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे) साई ट्रस्ट ज ने पोर्ट विद्यालय शेवा प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाचा हुशार, मेहनती आणि गुणी विद्यार्थी कु. नमित प्रदीप वाघावले याने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९८ पैकी २४० गुण मिळवून रायगड जिल्हा राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा आणि शाळेतून व उरण तालुक्यातून १ ला येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याला वर्ग शिक्षिका श्रीम. वंदना कपूर, श्रीम. सारिका तायडे, श्रीम. योगसाधना पाटील, श्रीम. सचिता वाघावले या मेहनती शिक्षिकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच कु. नमित याचे पालक यांनी सुध्दा खूप मेहनत घेतली. कु. नमित वाघावले याने शाळेचे नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यात उंचावले आहे. तसेच शाळेचे ७ हुशार व मेहनती विद्यार्थी उत्तीर्ण (पात्र )झाले आहेत.त्याच्या या
उज्ज्वल यशाबद्दल साई ट्रस्ट चे अध्यक्ष नरसू पाटील ,शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड, गिरीश पाटील, भुषण जाधव, अंकुश जोगळे, श्रीम. वैशाली बोरचटे, ज्येष्ठ कलाशिक्षक मिलिंद ठाकूर, श्रीम. सुमन पाटील, श्रीम. भारती कांबळे, पंडित गणेश बंडा, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ आणि पालक संघर्ष समिती पदाधिकारी आणि तमाम पालक वर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे. त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

२ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे) गेली २ वर्षे प्रलंबित असलेली वारसा हक्काची नोकरीची समस्या मार्गी लागल्याने सदर निर्णय व नियुक्ती उरण नगरपरिषद आणि १९ नव्याने रुजू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा ठरला.

 मुंबई उच्च न्यायालयचे औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश आणि महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिलेले आदेश व संबंधित गरपालिका प्रशासन संचालनालयाने दिलेल्या प्रशासकीय आदेशांच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसांना "वारस हक्क" योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या १९ उमेदवारांनी आज उरण नगरपरिषदेत सफाई कर्मचारी या पदावर अधिकृतपणे रुजू होऊन आपल्या सेवेला प्रारंभ केला. 

सुमारे २ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सन्माननीय नगरसेवक गणेश शिंदे, अतूल ठाकूर, प्रमिला पवार, मंगेश कासारे यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रसंगी नगरसेविका प्रमिला पवार यांनी नगरपरिषद सभागृहात कागदोपत्री पुराव्यासह प्रभावीपणे बाजू मांडली. त्यावेळी  नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी या संदर्भात वरिष्ठ कार्यालय नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पत्रव्यवहार करून आयुक्त तथा संचालक  अभिषेक कृष्णा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्याबाबतचा अन्याय दूर करण्याची विनंती करण्यात आली. 

 नगराध्यक्षा  भावनाताई घाणेकर यांच्या विऩंतीला मान देऊन तात्काळ  आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी उरण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिल्यामुळे अखेर १९ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि एकूण १९ वारस रुजू होऊन कर्तव्याला सुरुवात केली आहे.

 नवीन कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुटुंबियांच्या समाधानामुळे हा क्षण अधिक संस्मरणीय ठरला. 

याप्रसंगी या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयात या विषयावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले.

ही केवळ नोकरीची सुरुवात नसून अनेक कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य, स्वाभिमान आणि नव्या आशेचा किरण घेऊन आलेला दिवस आहे. नगरपरिषदेची स्वच्छता आणि नागरिकांची सेवा या नव्या कर्मचाऱ्यांमुळे अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य, यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

*धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला पुन्हा टाळे; निवासी नागरिक वैतागले, 26 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा !!

*धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला पुन्हा टाळे; निवासी नागरिक वैतागले, 26 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा !!

*डोंबिवली, दि. 13 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील केडीएमसीच्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानाला गेल्या वर्षभरात वारंवार टाळे लावून बंद ठेवले जात असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. येथील नागरिक धर्मवीर आनंद दिघे यांचे नुसते नाव घेऊन सध्याच्या राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी आतातरी थोडी लाज बाळगत या उद्यानावर लक्ष द्यावे असे म्हणत आहेत तसेच हे उद्यान तातडीने नियमितपणे सुरू न केल्यास 26 ऑगस्टला धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25 व्या पुण्यतिथीला उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी दिला आहे. 

*उद्यानाचा इतिहास*  
धर्मवीर आनंद दिघे उद्यानाची उभारणी 2002 साली तत्कालीन शिवसेना नगरसेवक श्री. भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून झाली होती. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी आमदार श्री. राजू पाटील यांनी सुशोभीकरणासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी दिला होता. यात जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांची खेळणी आणि विविध झाडे लावण्यात आली होती. केडीएमसीने यासाठी एक कंत्राटी सुरक्षा रक्षकही नेमला होता.

*गेल्या वर्षभरापासून बंदची समस्या*  
गेल्या वर्षभरापासून सुरक्षा रक्षकाचा ठेका संपल्याने उद्यान सकाळ-संध्याकाळ उघडले जात नव्हते. मध्यंतरी काही दिवस स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जबाबदारीवर उद्यान सुरू ठेवले. मात्र साफसफाई, झाडांना पाणी न मिळाल्याने आणि उद्यानात प्रेमी युगल व नशेखोर व्यक्तींचा वावर वाढल्याने पुन्हा उद्यान बंद करण्यात आले. त्यामुळे बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांना फटका बसत आहे.

*आश्वासनानंतरही परिस्थिती जैसे थे*  
काही दिवसांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियावर उद्यानात सुरक्षा रक्षक नेमल्याचे पत्र आणि फोटो शेअर केले होते. त्यामुळे उद्यान आता नियमित सुरू राहील अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा उद्यान बंद असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे.

*नागरिकांच्या प्रमुख मागण्या*
1. उद्यान दररोज सकाळ आणि संध्याकाळ नियमित वेळेत सुरू ठेवावे
2. उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ दर्शवणारा फलक प्रवेशद्वारावर लावावा
3. उद्यानातील वाढलेले गवत आणि झाडी झुडपे कापून साफसफाई करावी
4. कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी

*26 ऑगस्टला आंदोलन*  
उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे, शाखाप्रमुख सागर पाटील, महिला आघाडी विभाग संघटक सौ. रजनी कुचे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, माजी विभाग प्रमुख राजू नलावडे आणि असंख्य शिवसैनिक 26 ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25 व्या पुण्यतिथी दिवशी उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहून त्यानंतर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात इतर स्थानिक सामाजिक संघटना आणि नागरिकही सहभागी होणार आहेत.

वृत्त - समाजसेवक राजू नलावडे (डोंबिवली)

Wednesday, 12 August 2026

राष्ट्रीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न !!

राष्ट्रीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबीर संपन्न !!

चाळीसगाव (प्रतिनिधी) :

स्थानिक राष्ट्रीय महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून डेंग्यू, कीटकजन्य व जलजन्य आजार तसेच एच.आय.व्ही./एड्स आणि कुष्ठरोग जनजागृतीपर आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले.

सहायक संचालक हिवताप _ नाशिक डॉ.विवेक खतगावकर,
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार तसेच नगर परिषद मुख्याधिकारी हनुमंत बांगर व हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील समुपदेशक (कौन्सेलर) नामदेव अहिरे, LSO सचिन महाले, दीपक ठाकरे, चंद्रकांत चौधरी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे व उपाय, जलजन्य व साथीच्या आजारांपासून घ्यावयाची काळजी, तसेच एच.आय.व्ही. एड्स आणि कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परिसरातील विद्यार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

झेंडावंदनाचा 'भादाणे पॅटर्न' ठरतोय देशपातळीवर आदर्श; विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर चर्चेत !!

झेंडावंदनाचा 'भादाणे पॅटर्न' ठरतोय देशपातळीवर आदर्श; विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर चर्चेत !!

.               भादाणे गावाचे मा. सरपंच श्री संजय हांडोरे पाटील 

*ठाणे, प्रतिनिधी :

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे यावरून अनेक ठिकाणी वाद होतात. मात्र ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावाने यावर क्रांतिकारी तोडगा काढला आहे. गावात राबवला जाणारा 'भादाणे पॅटर्न' आता महाराष्ट्राबाहेरही आदर्श म्हणून पाहिला जात असून सामाजिक संघटनांकडून हा राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

*काय आहे 'भादाणे पॅटर्न'?*  
ऑगस्ट 2015 मध्ये भादाणे गावातील जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीने ऐतिहासिक ठराव मंजूर केला. त्यानुसार शाळेतील ध्वजारोहणाचा पारंपारिक अधिकार लोकप्रतिनिधी किंवा सरपंचांऐवजी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आला.

नियम पुढीलप्रमाणे:
- *इयत्ता 10 वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण*
- *इयत्ता 12 वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण*  
हे ध्वजारोहण विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांसोबत केले जाते.

भादाणे गावाचे माजी सरपंच आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. संजय हंडोरे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि तत्कालीन मुख्याध्यापक राजाराम कंटे सर यांच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू झाला.

*परराज्यातही गाजला भादाणे पॅटर्न*  
या अनोख्या उपक्रमाची दखल थेट उत्तर प्रदेशमध्येही घेण्यात आली. उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री मा. आशिष पटेल यांनी 4 फेब्रुवारी 2024 रोजी लखनौ येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात 'भादाणे पॅटर्न'चे जाहीर कौतुक केले. यावेळी या संकल्पनेचे जनक संजय हंडोरे पाटील यांचा सन्मानही करण्यात आला.

ठाणे जिल्हा परिषदेनेही सर्वसाधारण सभेत या निर्णयाचे कौतुक करून हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा अशी विनंती राज्य शासनाकडे केली आहे.

*गावात उमटले सकारात्मक पडसाद*
1. *गुणवत्तेत वाढ*: ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे.
2. *वादाला पूर्णविराम*: ध्वजारोहण कोण करणार यावरून होणारे राजकीय वाद थांबले आहेत.
3. *निकोप स्पर्धा*: परीक्षेत प्रथम येण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली आहे.
4. *पालकांचा सन्मान*: गुणवंत मुलांमुळे आई-वडिलांना जाहीर व्यासपीठावर मान मिळत आहे.
5. *आत्मविश्वास*: ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढला आहे.

देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय असल्याने विविध सामाजिक संघटनांकडून हा पॅटर्न राज्यातील आणि देशातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये बंधनकारक करावा अशी आग्रही मागणी शासनाकडे केली जात आहे. 

शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख श्री. काशिनाथ हिरु शेलवले यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tuesday, 11 August 2026

‘कनेक्टिंग लिंक’वर बुधवारी तीन तास वाहतूक बदल !

‘कनेक्टिंग लिंक’वर बुधवारी तीन तास वाहतूक बदल !

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’च्या पुणे ते मुंबई दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत देखभाल-दुरुस्तीचे काम तसेच मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरील मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

वाहनचालकांनी नियोजित कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीदरम्यान काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी; रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक !

उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी; रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक ! ** उलवे शहर मनसे तर्फे सत्कार. उरण दि...