Monday, 27 July 2026

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!

        डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उत्सव, कला , सेवा आणि पर्यावरणीय कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या शिवप्रतिमा मित्र मंडळातर्फे निवासी भागात 50 बकुळ फुलांची झाडे लावली गेली आहेत. वृक्षारोपण केलेली ही झाडे आठ फूट उंचीची असल्याने लवकरच त्या झाडांवर फुले बहरणार असून एमआयडीसी निवासी परिसर त्याच्या सुगंधाने आणि सुहासिक वासाने प्रदूषण मुक्त होणार आहे. सदर ही झाडे आणि त्याना लागणारे खत हे केडीएमसी तर्फे मोफत देण्यात आले होते. 

विशेष म्हणजे आज रविवारी 26 जुलै रोजी झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त श्री अभिनव गोयल, मुख्य उद्यान अधीक्षक श्री संजय जाधव, नगरसेवक महेश पाटील, नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे, शिवसेना (उबाठा) कल्याण जिल्हा अध्यक्ष अभिजित सावंत, योगेश म्हात्रे हे जातीने उपस्थित होते. माननीय आयुक्त आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी आयुक्तांनी आपले विचार मांडतांना असे सांगितले की कल्याण डोंबिवली महापालिका तर्फे यावर्षी दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यामध्ये सामाजिक संस्था, मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, गृहनिर्माण संस्था, नगरसेवक इत्यादींनी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी महापालिका सर्व सहकार्य करेल.

            एमआयडीसी निवासी मध्ये या पावसाळ्यात काही कारणांमुळे अनेक झाडे कोसळली होती. यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक होते. सदर ही 50 मोठ्या उंचीची बकुळ फुलांची झाडे लावल्यामुळे एमआयडीसी मधील प्रदूषण भविष्यात काही अंशी कमी होईल तसेच या नगरीच्या सौंदर्यात वाढ होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारची झाडे लावण्याच्या संकल्प शिवप्रतिमा मित्र मंडळाने केला आहे. 

           शिवप्रतिमा मित्र मंडळाच्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री दिलीप साळवी, सचिव श्री जयसिंग आयरे, श्री विजय कुलकर्णी, राजू नलावडे, मंदार स्वर्गे, रामदास मेंगडे, मनोहर पाटील, निहाल आंबेरकर, सौ. रजनी कुचे इत्यादींनी परिश्रम घेतले होते.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ६६ झाडांचे वृक्षारोपण !

मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ६६ झाडांचे वृक्षारोपण !

डोंबिवली, प्रतिनिधी : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेतर्फे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आज 27 जुलै वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांना ६६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज सकाळी एमआयडीसी निवासी भागात एकूण ६६ देशी झाडे लावण्यात आली आहेत. यात जांभूळ, वड, पिंपळ, कडुनिंब, बकुळ इत्यादी प्रकाराच्या झाडांचा समावेश आहे. 

              डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये प्रदूषणाची समस्या मोठी आहे. शिवाय येथे नवीन गटारे/नाले आणि काँक्रिट रस्ते बनविताना झाडाच्या खोडांना/बुंध्याला धक्के बसल्याने तसेच काँक्रीटीकरणामुळे झाडांना पाणी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात झाडे पडली होती. यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक होते. सदर ही ६६ देशी झाडे लावल्यामुळे एमआयडीसी मधील प्रदूषण भविष्यात कमी होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारची देशी झाडे लावण्याचे उद्दिष्ट एमआयडीसी शिवसेना शाखेने ठरविले आहे.

        नुकत्याच झालेल्या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते, आमदार श्री आदित्यजी ठाकरे यानी डोंबिवली एमआयडीसी मधील धोकादायक रासायनिक उद्योगांचे स्थलांतर करण्याविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा मा. उद्योग मंत्री श्री उदय सामंत यानी उत्तर देऊन धोकादायक रासायनिक स्थलांतरित करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भविष्यात डोंबिवली प्रदूषण मुक्त होणार आहे.

              सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हा प्रमुख श्री अभिजीत सावंत, उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, महिला विभाग संघटक सौ रजनी कुचे, शाखा संघटक सौ विनिता सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप साळवी, राजू नलावडे, जयसिंग आयरे, विजय कुलकर्णी, रामदास मेंगडे, मनोहर पाटील, रमेश गुरव, भरत सावंत इत्यादी उपस्थित होते.

Sunday, 26 July 2026

साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा !!

साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा !!

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता आणि विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केले होती आणि हातात भगवे झेंडे घेतले होते. विठू नामाच्या गजरात टाऊनशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. 

यावेळी जे एन पी ए चे अधिकारी वर्ग उपस्थित होते त्यामध्ये सयाजीराव साळुंखे  मॅनेजर इस्टेट जे एन पी ए, प्रवीण पाटील लेबर वेल्फेअर ऑफिसर जे एन पी ए आणि संदीप घरत मॅनेजर जे एन पी ए यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, माध्यमिक मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक  गिरीश पाटील , बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे, माध्यमिक इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  भूषण जाधव, आणि अंकुश जोगळे यांनी केले.सुरुवातीला शाळेचे आदर्श पिटी शिक्षक मनोहर टेमकर  यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे महाराष्ट्राचे पारंपारिक नृत्य लेझीमच्या गजरात स्वागत केले. यानंतर रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी शाळेचे संगीत शिक्षक पंडित गणेश बंडा यांनी आणि विद्यार्थ्यांनी भजन केले.दिंडी शिस्त आणि फलक लेखन कलाशिक्षक मिलिंद ठाकूर यांनी उत्तमप्रकारे केले.या रिंगण सोहळ्यात सर्व मान्यवरांनी सहभाग घेतला. जे एन पी ए चे उपस्थित सर्व अधिकारी विद्यार्थ्यासोबत नृत्याच्या भक्तीरसात दंग झाले. प्रमुख पाहुण्यांनी फुगडी देखील घातली. 

यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी श्री विठ्ठलाची मनोभावे पूजा केली. यावेळी साईट ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे झाडाचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी सयाजीराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेने आषाढी एकादशीची दिंडी काढताना पर्यावरणाचा संदेश दिल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक तरी झाड लावले पाहिजे आणि ते जगविले पाहिजे असे आवाहन केले. तसेच इयत्ता दहावी आणि स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांनी शाळेच्या इतिहासात अशाप्रकारे प्रथमच भव्य दिव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले असे म्हटले. तसेच तसेच मराठी माध्यमाचा निकाल गेली अनेक वर्ष सातत्याने १००% लागत आहे. तसेच तालुक्यातील मराठी माध्यमात पहिले चार विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत असे म्हटले. इंग्रजी माध्यमाचा निकाल  उत्तम आहे. यावर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा अधिक गुण मिळतील असे आश्वासन त्यांनी मान्यवरांना दिले. 

त्यानंतर संगीत शिक्षक  गणेश बंडा यांनी महाआरती घेतली. यामध्ये सर्व प्रमुख मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी भजनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी स्वरा कांबळे आणि यांनी सुंदर अभंग गायले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या सहशिक्षिका श्रीमती वंदना कपूर आणि माध्यमिक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका श्रीमती कीर्ती शिरसाठ , किशोर म्हात्रे  यांनी केले.आषाढी एकादशीच्या अभंगवाणी कार्यक्रमात इंग्रजी व मराठी माध्यमाचे इयत्ता दहावीचे खालील विद्यार्थी सहभागी होते 
कु.स्वरा कांबळे, कु.प्रियांसी डाकी, कु.अविष्कार घोडके, कु.जिग्नेश, कु.तन्मय कोळी, कु.कार्तिक ठाकूर त्याचबरोबर या पर्यावरण रक्षण दिंडी सोहळ्यामध्ये शाळेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या भक्तिभावाने सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.

आषाढी एकादशी निमित्ताने वंचित बहुजन आघाडी शिवडी तालुका वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

आषाढी एकादशी निमित्ताने वंचित बहुजन आघाडी शिवडी तालुका वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

*वंचित बहुजन आघाडी – शिवडी तालुका यांच्यातर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*

शिवडी मुंबई (सचिन ननगरे) : आषाढी एकादशी निमित्ताने परिवार साफल्य हाऊसिंग सोसायटी बाहेर, दा. ग. महाजनी पथ, शिवडी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी, शिवडी तालुका वॉर्ड क्र. २०२ यांच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल, इरेझर व शार्पनर अशा  शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. 

कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे मुंबईतील पदाधिकारी चेतन अहिरे मुंबई अध्यक्ष, समीर कांबळे मुंबई महासचिव बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत भालेकर, प्रतीक जाधव, महेश तांबे, संजय भालेराव, सुभाष काळे, प्रदीप गुलाबराव जाधव, सुमेर खरे, ॲड. विकास गांगुर्डे, सतीश गांगुर्डे, वेदांत पागडे, वैशाली विजय भालेराव, महेश्वरी तांबे, श्रद्धा भालचंद्र जाधव,उज्वला काळे आणि वैशाली गुणवंत भालेकर वंचित बहुजन आघाडी, शिवडी तालुका यांच्या वतीने करण्यात आले.

Saturday, 25 July 2026

स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन !!

स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन !!

उरण दि २५,'(विठ्ठल ममताबादे) : उरणचे उत्तम खेळाडू स्वर्गीय अश्विन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अश्विन पाटील मित्र परिवारच्या माध्यमातून श्री साई ब्लड बँक, पनवेल यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत श्री. मा. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, उरण शहर येथे होणार आहे.

“रक्ताचा आहे थेंब थेंब मौल्यवान, याची असावी सर्वांना जाण; म्हणूनच करावे रक्तदान” या सामाजिक संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ सामाजिक कार्य असून, आपल्या एका रक्तदानामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या उपक्रमात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या सामाजिक उपक्रमाचे आयोजक अश्विन पाटील मित्र परिवार असून, वाढदिवसा निमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

आई एकवीरा मातेच्या जयघोषात ९ ऑगस्ट रोजी ‘भव्य बाईक रॅली’ !!

आई एकवीरा मातेच्या जयघोषात ९ ऑगस्ट रोजी ‘भव्य बाईक रॅली’ !!

*# कोप्रोली ते श्री क्षेत्र कार्ला एकवीरा गडावर भक्तिमय प्रवास.

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : आई एकवीरा मातेच्या भक्तीभावाने प्रेरित होऊन आई एकवीरा मंदिर, कोप्रोली,उरण ते श्री क्षेत्र कार्ला (एकवीरा) गड अशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन रविवार, दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे.उरण मध्ये पहाटे ६.३० वाजता आई एकवीरा मंदिरात आरती झाल्यानंतर उरण मधून रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन ढोल-ताशांच्या गजरात रॅली मार्गस्थ होईल. श्री क्षेत्र कार्ला येथील आई एकवीरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर आई एकवीरा मंदिर परिसराची स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येणार आहे.

या भव्य बाईक रॅलीच्या आयोजनात विविध गावातील भाविक भक्तांचा सहभाग आहे.रॅलीच्या आयोजनासाठी संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन संस्थापक देविचंद अनंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

आई एकवीरा मातेच्या जयघोषाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित या भव्य बाईक रॅलीत शिवप्रेमी, एकवीरा भक्त आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


नाव नोंदणी व संपर्कासाठी फोन नंबर :- 
विकी कोळी (कोप्रोली) – ९८२०६७३४८४,
जितू कोळी (कोप्रोली) – ९९३०३०५२५५,
चेतन गावंड (पिरकोन) – ९८१९६७९९०५,
विधाता पाटील (कोप्रोली) – ९९२०६३२०२१,
कुणाल म्हात्रे (कोप्रोली) – ७७७७००१०८७,
प्रसाद पाटील (गोठ्या) – ७९६६६०४०३२,
विनायक गावडे (पिरकोन) – ८०७९२९५४७६,
दूशंत ठाकूर (पानदिवे) – ८८२८६८६६९७,
अक्षय मोकाशी (पानदिवे) – ८०८२२५८८२९,
संस्थापक देविचंद अनंत म्हात्रे – ९८२१८३८४०८

माझ्या पंढरीची वारी जगात भारी : महेंद्रशेठ घरत

माझ्या पंढरीची वारी जगात भारी : महेंद्रशेठ घरत 

स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासनाला सॅल्युट.

 उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : "माऊली माऊलीच्या जयघोषात, जय जय राम कृष्णा हरी नाम घोषात पंढरपूर दुमदुमले आहे. अक्षरशः लाखो भक्तांचा महासागर पाहून मन तृप्त झाले. पंढरपूरचा शिवाजी चौक ते  विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदीला आलेला भक्तांचा महापूर ओलांडताना आणि असंख्य भक्तांच्या लाटा अंगावर झेलताना आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आणि आनंद मिळाला. दिनदुबळे, कष्टकरी विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले २० ते २५ लाख भाविक, दर्शनासाठी १५ ते २० किलोमीटर लांबच्या लांब लागलेल्या रांगा पाहून भक्तांच्या सहनशीलतेला आणि श्रद्धेला सलाम करायला हवा. मी जगभर फिरतो; नुकताच अमेरिकेत जाऊन अर्जेंटिना-स्पेन फुटबॉल अंतिम लढतच्या सामन्याचा सहपरिवार आनंद घेतला. तेथून १७ ते १८ तास प्रवास करून आल्यानंतर तातडीने पंढरपूर गाढले. कारण १९९७ पासून मी आषाढी एकादशीची वारी न चुकता दरवर्षी करतो. कोविडचा अपवाद वगळता माझ्या पंढरपूर वारीला २५ वर्षे झाली. त्यामुळे वारीतील भक्तांच्या चेहऱ्यावरील तो निरागस आनंद, सुख पाहून मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, माझ्या पंढरीची वारी जगात भारी," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत शनिवारी (ता. २५) विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर म्हणाले. ते पुढे म्हणाले, "वारीतील भक्तांचा कमालीचा शिस्तबद्धपणा, कुठलाही त्रागा न करता मिळेल त्या रस्त्याने हरिनामात तल्लीन झालेले भाविक, दर्शनासाठी जाताना जागा मिळेल तिथे तंबू ठोकलेले भाविक, तहानभूक विसरून माऊली माऊलीचा जयघोष करणारे वारकरी पाहून महाराष्ट्रात, संतांच्या भूमीत जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आषाढी एकादशी वारी हे महत्त्वाचे जणू वैभव आहे. तसेच लाखोंच्या गर्दीला आवरण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासन यांच्या कामगिरीला सॅल्युट करावासा वाटतो."
शुक्रवारी महेंद्रशेठ घरत यांनी कांबे-रसायनी येथून पंढरपूर येथे दाखल झालेल्या दिंडीत सहभागी होऊन वारकरी यांच्यासोबत महाप्रसाद घेतला. 

यावेळी युवा अध्यक्ष निखिल ढवळे उपस्थित होते, तर शनिवारी चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांच्या महासागरात महेंद्रशेठ घरत डुंबले. त्यानंतर त्यांनी तरघर, उलवे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रासादिक भजन मंडळाच्या दिंडीला भेट दिली. यावेळी मनोहर ओवळेकर, उत्तम कोळी आणि वारकरी बंधूंनी महेंद्रशेठ घरत आणि गुलाबशेठ घरत यांचे स्वागत केले.

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!         ...