Friday, 21 August 2026

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

*डोंबिवली, दि. 20 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात काँक्रिट रस्ते, नाले आणि गटारींची विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र नियोजनाच्या अभावामुळे त्याचा फटका नागरिकांसह महावितरणलाही बसत आहे. अनेक ठिकाणी केबल फॉल्ट झाल्याने नवनवीन काँक्रिट रस्ते तोडण्याची वेळ येत आहे.

*षटकार इमारतीजवळ फॉल्ट, वीजपुरवठा खंडित*  
आज मिलापनगर तलाव रस्त्यावरील षटकार इमारतीसमोर RL 40 येथे महावितरणच्या भूमिगत केबलमध्ये फॉल्ट निर्माण झाला. त्यामुळे आजूबाजूच्या काही इमारती आणि बंगल्यांचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला.

महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता काँक्रिट रस्त्याच्या खालून जाणाऱ्या केबलमध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले. ग्राहकांना तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला पर्यायाने काँक्रिटचा रस्ता तोडावा लागला.

*विकासकामांमुळे केबल्सना धक्के*  
एमआयडीसी निवासीतील काँक्रिट रस्ते आणि नाले-गटारी बनविताना वीज, पाणी यांच्या भूमिगत वाहिन्यांना धक्के बसल्याने अशा प्रकारचे केबल फॉल्ट वारंवार होत असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नियोजनाअभावी एकीकडे करोडो रुपये खर्च करून बनवले रस्ते पुन्हा तोडावे लागत आहेत. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असून नागरिकांनाही खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी मागणी केली आहे की, पुढील विकासकामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवून एकात्मिक आराखडा तयार करावा. म्हणजे नवीन रस्ते बनल्यानंतर लगेच ते फोडण्याची वेळ येणार नाही.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

डॉ. महेंद्र घरत यांना ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार’ प्रदान !!

डॉ. महेंद्र घरत यांना ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार’ प्रदान !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट, समर्पित आणि प्रेरणादायी योगदानाची दखल घेत विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. महेंद्र लक्ष्मण घरत यांना यंदाच्या ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता ईटाँस एम्पोरियल, नंदुरबार येथे संपन्न झाला. नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोरख देवरे यांच्या हस्ते डॉ. घरत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. महेंद्र घरत यांनी अध्यापनासोबतच शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक संशोधन आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत आयोजित राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता तसेच निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी या विषयांसाठी त्यांची मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता सहावीच्या ‘व्यवसाय शिक्षण’ विषयाच्या पाठ्यपुस्तकाच्या समीक्षणासाठी बालभारती येथेही त्यांची निवड झाली आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील पीएम श्री शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

केंद्रशासित प्रदेशाच्या वतीने आयोजित पीजीटी व टीजीटी शिक्षकांच्या क्षमता वृद्धी प्रशिक्षणासाठी दीव-दमण येथे समन्वयक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आतापर्यंत प्रशिक्षक म्हणून त्यांनी एक हजाराहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा गौरव मानला जात आहे. पुरस्काराबद्दल  संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या श्रीमती चित्रा ठाकूर, शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी डॉ. महेंद्र घरत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्वप्नांशी तडजोड करू नका; राष्ट्र प्रथम ठेवा’ : पृथ्वीराज बी. पी.

स्वप्नांशी तडजोड करू नका; राष्ट्र प्रथम ठेवा’ : पृथ्वीराज बी. पी.

(लोकनेत्या तारामाई वर्तक जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात विविध उपक्रम)

वसई प्रतिनिधी/पंकज चव्हाण

“आपल्या आकांक्षा उंच ठेवा, परिस्थितीशी संघर्ष करताना स्वप्नांशी तडजोड करू नका. अपयशातून शिका आणि उपलब्ध वेळेचा सदुपयोग करा; कारण वेळ हे पुन्हा न मिळणारे संसाधन आहे. कोणतेही कार्य करताना ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना केंद्रस्थानी असावी,” असा संदेश वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी विद्यार्थ्यांना दिला. अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात थोर लोकनेत्या तारामाई वर्तक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘तारामाई वर्तक जन्मशताब्दी महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी चिकाटीने आणि कठोर परिश्रमाने प्रयत्न करावेत, अपयशाला शिकण्याची संधी मानावे आणि प्रत्येक क्षेत्रातील संधी ओळखून त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या या पंचसूत्रीसोबतच कोणत्याही व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी तिचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘Educate, Organise, Agitate’ या विचारांचीही त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करून दिली.

हे व्याख्यान महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षातर्फे आयोजित करण्यात आले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. विकास वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महोत्सवाला संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग गजानन नाईक, सचिव रवी मोहोळ, कोषाध्यक्ष हसमुखभाई शाह, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, विद्यावर्धिनी परिवारातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

तारामाई वर्तक यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण, त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात तारामाई वर्तक मेमोरियल अकादमीच्या शिक्षिकांनी सादर केलेल्या गौरवगीताने आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘असीम तारा’ या नाटुकलीने उपस्थितांची मने जिंकली. तारामाईंचे राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्य, त्यांचा संघर्ष, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा ध्यास या नाट्यप्रस्तुतीतून प्रभावीपणे उलगडला.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी तारामाईंच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची पुनर्भेट घडवून आणली. केवळ पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे संस्था उभारणे नव्हे, तर परिवर्तनाचा ध्यास आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे हा खरा संस्थात्मक वारसा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी तारामाईंच्या स्मृतींना अभिवादन केले.
उपाध्यक्ष पांडुरंग गजानन नाईक यांनी अण्णासाहेब व भाऊसाहेब वर्तक यांच्या कार्यपरंपरेच्या पार्श्वभूमीवर तारामाईंच्या कर्तृत्वाचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात विकास वर्तक यांनी तारामाईंच्या स्त्री सबलीकरण, बालशिक्षण, पाणीप्रश्न आणि तंत्रशिक्षणातील योगदानाच्या विविध पैलूंना उजाळा दिला. पापडखिंडी धरणाच्या संकल्पापासून तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून बोईसर औद्योगिक परिसरासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यापर्यंत त्यांची दूरदृष्टी दिसून येते. समाजाची गरज ओळखून त्यानुसार शैक्षणिक संस्था उभारण्याच्या त्यांच्या कार्यामुळे अनेकांना शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम डोंगरे व प्रा. अदिती यादव यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. महिला विकास कक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी १५० हून अधिक विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, लायन्स क्लबच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्रसेना यांच्या समन्वयातून आयोजित रक्तदान शिबिरात ९६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला जन्मशताब्दी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. या उपक्रमांमधून तारामाई वर्तक यांच्या समाजाभिमुख आणि मानवकेंद्री कार्यविचारांना कृतीची जोड देण्यात आली.
*तुकाराम मुंढेंचा नवा आदेश! खाद्य तेल उत्पादकांपासून किराणा दुकानदारांपर्यंत सर्वांचे धाबे दणाणले*

*मुंबई, प्रतिनिधी* : दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीवर कारवाई केल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्य तेलातील भेसळीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

*भेसळखोरांवर थेट कारवाईचा इशारा*  
खाद्य तेलातील भेसळ, अनधिकृत मिश्रण, एक्सपायरी झालेल्या तेलाचे पुनर्पॅकिंग आणि हॉटेल्समध्ये वारंवार तळणीचे तेल वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुंढे यांनी दिला आहे. 

मुंढे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील खाद्यतेल उत्पादक, वितरक, किराणा दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

*नवीन नियम काय आहेत?*  
FDA ने दिलेल्या निर्देशानुसार,
1.  *सुट्या स्वरूपात खाद्यतेल विक्री करता येणार नाही.* तेल सीलबंद पॅकिंगमध्येच विकावे लागणार आहे.
2.  उत्पादक आणि विक्रेत्यांनी पॅकेजिंग आणि लेबलिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
3.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना रद्द करण्यासह दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

*ग्राहकांसाठी महत्त्वाचे आवाहन*  
या पार्श्वभूमीवर ग्राहकांनीही जागरूक राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तेल खरेदी करताना पॅकिंगचे सील, लेबलवरील माहिती, कंपनीचे नाव आणि एक्सपायरी डेट तपासूनच तेल खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Thursday, 20 August 2026

ठशांची नोंद न होणाऱ्या वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा !!

ठशांची नोंद न होणाऱ्या वयस्कर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधा !!

‘आपले सरकार’ सेवा केंद्रातून प्रक्रिया; प्रमाणीकरण न झाल्यास तालुकास्तरीय समितीमार्फत ओळख निश्चिती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दिपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत १६.९६ लाख पात्र लाभार्थी असून, त्यापैकी १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

वयस्कर शेतकऱ्यांना किंवा बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणात अडचणी येत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात (ASSK) आधार कार्ड व बँक पासबुक सोबत घेवून जावे. यादीतील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जाबाबतची माहिती पाहून मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद केल्यानंतर बोटांच्या ठशांद्वारे प्रमाणीकरण करण्यात येईल.

एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. त्यानंतरही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ (Unable to Authenticate) हा पर्याय सेवा केंद्र चालकाने निवडावा. त्यानंतर सेवा केंद्र चालक स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करेल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदार यांच्याकडे ऑनलाइन पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आदी स्वतःची ओळख निश्चित करणारी कागदपत्रे सादर करावीत.

 तालुकास्तरीय समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करून व्यक्तीची ओळख निश्चित केली जाईल. संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर समितीमार्फत तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेच्या निकषांनुसार कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण वरील प्रक्रियेनुसार तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश  सहकार आयुक्त तथा सहकारी संस्था निबंधक दिपक तावरे यांनी दिले आहेत.


सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहन !!

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहन !!

 पुणे , प्रतिनिधी : मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजने (SSY) मध्ये पालकांनी आपल्या पात्र मुलींची खाती उघडावीत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त जे. बी. गिरासे यांनी केले आहे.

पुणे विभागात या योजनेअंतर्गत सुमारे ८ लाख मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत दहा वर्षांखालील मुलींसाठी पालक किंवा कायदेशीर पालकांच्या नावाने खाते उघडता येते. या योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजारापर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या वार्षिक ८.२ टक्के व्याजदर असून, योजनेची परिपक्वता २१ वर्षांनी होते. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी नियमानुसार खात्यातील ५० टक्के रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शालेय शिक्षकांच्या माध्यमातून योजनेचा अधिकाधिक प्रसार करून पात्र मुलींची १०० टक्के नोंदणी करण्याचे उद्दिष्ट टपाल विभागाने ठेवले आहे. पालकांनी अधिक माहितीसाठी टपाल कार्यालयातील अधीक्षक समीर महाजन- ८४४८३२९८४४, नितीन येवला- ८८३०७०५५४१, दिलीप सर्जेराव- ९७६६०७७९९६, केतन शित्रे, बारामती -९२७०५३२३९४, अविनाश पाखरे- ८७८८३२३२१८ यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गिरासे यांनी केले आहे.

#सुकन्यासमृद्धीयोजना #मुलींचेभविष्य #मुलींचेशिक्षण #आर्थिकसुरक्षितता #महिलावबालविकास #पुणे #मुलींचेसक्षमीकरण #बचत

डोंबिवली : क्षयरुग्णांसाठी रोटरी क्लबचा ‘निक्षय मित्र’ उपक्रम; शुक्रवारी उद्घाटन !!

डोंबिवली : क्षयरुग्णांसाठी रोटरी क्लबचा ‘निक्षय मित्र’ उपक्रम; शुक्रवारी उद्घाटन !!

*डोंबिवली, प्रतिनिधी* : क्षयरोगाविरुद्धच्या (टीबी) लढ्यात रुग्णांना वैद्यकीय उपचारांसोबतच योग्य पोषण मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने क्षयरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘निक्षय मित्र प्रकल्प’ हा विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे.

*के डी एम सी आयुक्तांची प्रमुख उपस्थिती*  
या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता डोंबिवली पूर्व येथील रोटरी भवन येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

*रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप*  
उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना उपचाराच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पौष्टिक अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये तांदूळ, डाळी, कडधान्ये, धान्य आणि स्वयंपाकाचे तेल यांसारख्या रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा समावेश असेल.

योग्य पोषणामुळे रुग्णांच्या आरोग्यात जलद सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास रोटरी क्लबने व्यक्त केला आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

केबल फॉल्टसाठी  मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !! *डोंबिवली, दि. 20 ऑगस्ट 2026* डोंबिवली एमआयडीसी नि...