Monday, 24 August 2026

'युथ की बात’ संवादात युवकांनी व्यक्त केली सरकारी खात्यांकडून जबाबदेही !

'युथ की बात’ संवादात युवकांनी व्यक्त केली सरकारी खात्यांकडून जबाबदेही ! 

ठाणे, दि. २४ -

“बरेच वर्षे आपण बघत आलोय - युवकांना फारसे व्यक्त व्हायला दिले जात नाही. आता त्यांना समजून घ्या”, असा सुर ‘जन गण मन अभियाना’ अंतर्गत आयोजित ‘युथ की बात’ चर्चासत्रात युवक - युवतींनी व्यक्त केला. लक्ष्य परिवर्तन व समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ठाण्यात हा युवा संवाद आयोजित केला होता. भारत जोडो अभियानाचे राजेंद्र चव्हाण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे अजित डफले, समता विचार प्रसारक संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर आदी मान्यवर श्रोत्यांमध्ये बसून युवा की बात ऐकत होते! 

“सरकार कडून देशाची अपेक्षित प्रगती जेंव्हा पुरेशी होतांना दिसत नाही तेंव्हां आंदोलने होतात. जंतर मंतर आंदोलनात शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला जबाबदार म्हणून जरी मंत्र्यांचा राजीनामा मिळवण्यात यश प्राप्त झाले. मात्र अजून शिक्षण व्यवस्थासुधार होणे बाकी आहे. त्यासाठी आंदोलन सुरुच ठेवावे लागेल. कारण सरकार अनेकदा अवास्तव वा खोटे दावे करत असतात. त्या दाव्यांचा खरेपणा तपासणं आता सोपं झालं आहे. त्यामुळे सरकार आधी नीट विकास करत नाही व मग खोटे दावे करतं तेंव्हां युवक आंदोलन छेडतात! अनेकदा चांगल्या व्यवस्थेच्या आवरणाखाली चुकीच्या बाबी खपवल्या जातात. विद्यार्थ्यांना खरे सांगितले जावे. युवकांना सरकारकडून जबाबदेहीची रास्त अपेक्षा आहे! ही अपेक्षा व्यक्त करत असतांना कुणा आंदोलकाची भाषा अयोग्य वाटली तरी ती ऐकून घ्या. चुका झाल्या तर समजून सांगा. वडीलकीची ही जबाबदारीही सरकार व समाजाने पार पाडायला हवी. तरच युवा निर्भयतेने अभिव्यक्त होईल”, असे मत युवा दक्ष घार्वेने व्यक्त केले. 

शुभम लाड हा दुसरा महाविद्यालयीन युवक म्हणाला, “राजकारणाबाबत मी अगदी अनभिज्ञ होतो. आपलं घर, कुटुंब व अभ्यास हेच माझे जगलहोते. जंतरमंतर आंदोलनाने मला जागे केले. आपलाच पैसा सरकार वापरत असते तर त्याबाबत आपणच जागरूक रहायला हवे, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळेच या आंदोलनाला पाठींबा देतांना स्वतःसाठीही मी यात उतरलो. रेल्वे स्टेशनवर आंदोलन समर्थनाचा फलक घेऊन प्रसंगी एकटा उभा राहीलो. आता युवकांनी “शाळा ठीक करा”, हे आंदोलन करण्यात काही गैर आहे का? तरीही युवकांना मारहाण, शाळा प्रवेश बंदी, त्यांच्यावर केसेस हे कशासाठी केलं जातंय? सरकारच्या कामांवर सर्व स्तरांवर लक्ष ठेवणे ही नागरिकांची जबाबदारी आहे”. 

अपेक्षा कांबळे या युवतीने सांगितले, “जोवर युवक बोलणार नाही, आपसात चर्चा करणार नाही तोवर एकमेकांची मदतही मिळणार नाही. युवकांनी सहकार्य वाढवून एकजुटीने समाजकार्य करत रहायला हवे. आता जागरूक मुली आंदोलनात हिरीरीने सहभागी होत आहेत. निर्भयतेने व्यक्त होत आहेत. मुली मुलांच्या बरोबरीने पुढे येणार याचे भान मुलांनी बाळगायला हवे. मुलींवरील अत्याचाराला पुरुष जबाबदार आहेत तर मुलांना समजवा. युवकांना सजग बनवा. युवतींवर बंधने लादू नका. हा नव्या युगाचा मंत्र आहे”.  

लक्ष्य परिवर्तनचा संयोजक व संस्थेचा एकलव्य गोरख हिवाळे म्हणाला, “स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली. तरी आपण विशेषतः युवक व त्यातही युवती स्वतंत्र आहोत का? अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आपल्यात हिंमत आहे का? आजकाल व्हीडीयो मॅार्फींग करून खोट्याचे खरे करून भासवतात. जो अपराध घडलाच नाही तो केल्याचा आरोप लावून; जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील उमर खालीद प्रमाणे वर्षोन् वर्षे तुरुंगात डांबवतात. मिडीया यावर गप्प बसत असेल तर आपल्यालाच सोशल मिडीयावर वापर करून सत्य सांगावे लागेल. सरकारला जाब विचारत रहाण्याची आपलीच जबाबदारी आहे”. 

सनिराज यादव या जर्नालिझमच्या विद्यार्थ्याने समर्पक उदाहरणातून तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भाष्य केलं. “हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमात लोकांना रेल्वे गाडी सुरुवातीला लोखंडी राक्षस वाटला. लोकं गाडी पाहून घाबरले. रेल्वे ही आज मुंबई सारख्या शहरांची लाईफ - लाईन बनली आहे. आज आपणही एआय तंत्रज्ञानाला असेच घाबरत आहोत. तंत्रज्ञानाशी मैत्री करून युवकांनी विकास साधला पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. त्यामुळेच सरकारी शाळांमधील दुरावस्था आम्हांला सहन होत नाही”, असे त्यांने सांगितले. 

लोकवस्तीतील युवा कार्यकर्ते करण पडांगळे म्हणाले, “युवकांना आपले करीयर, रोजगार, उद्योजकता यासाठी आजचे शिक्षण पुरेसे पडत नाही. शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना त्यासाठी सक्षम बनवण्यात कमी पडतं आहे. शिक्षणाने युवकांना प्रश्न विचारण्याची शिकवण दिली आहे का? शिक्षणाची जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे त्या विरोधात आमची मागणी सर्वांना समान शिक्षण मिळावे, अशी आहे. जिल्हा परीषद शाळेत शिकणारा खाजगी वा खार्चिक शाळेतील शिकणाऱ्याशी निकोप स्पर्धा करू शकेल का?”

किशोर जाधव या पीएचडीच्या विद्यार्थ्याने, “आपल्या शाळा कारखाने बनल्या आहेत का? शिक्षणाने आपण सक्षम बनतोय का? असे विचारत शाळांकडे लक्ष देणें आवश्यक आहे. शाळांमध्ये दप्तर, पुस्तके, गणवेश वेळेवर मिळत नाही हे लक्षात आल्यावर, त्याबाबत माहितीचा अधिकार कायदेयान्वये एक चौकशी अर्ज टाकला आणि पुढच्या आठवड्यात सर्वांना वरील साहित्य मिळालं, हा अनुभव कथन केला. युवकांनी सभोवतालच्या सरकारी आस्थापनांच्या कामावर लक्ष ठेवून, कुठे कमतरता दिसल्यास आरटीआयचा वापर करण्याची सक्रीयता दाखवणे आवश्यक आहे. आपण केवळ ‘रील्स’ मध्ये अडकून न पडता सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर  ‘रियल’ हस्तक्षेप केला पाहीजे”, असे प्रतिपादन केले. 

चंद्रकांत रोकडे म्हणाले, “सर्व स्तरांवरील प्रगती, स्वच्छता याबाबत निव्वळ इतर देशांची उदाहरणं देऊन उपयोगाचे नाही. आपल्या देशाचे उदाहरण देता येईल असा देश उभारण्यासाठी आपण झटायला हवे”.  

अस्मिता गायकवाड या एकलव्य विद्यार्थिनीने सांगितले की, “सरकारी शाळांमधील स्वच्छता हा कळीचा मुद्दा बनला आहे. तिथली स्वच्छतागृहे, मध्यान्हभोजन योजनेची स्वयंपाकघरे येथे स्वच्छता नसल्याने मुलांना संसर्गजन्य रोगांचा सामना करावा लागतो. डॅाक्टरचा खर्च वाढतो. अभ्यासावर परिणाम होतो. याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे”. 

रोनित भिडे या महाविद्यालयीन युवकाने, “शालेय शिक्षक व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आवश्यक आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपुलकीने समजावले जाईल व तेच खरे शिक्षण आहे”, यावर भर दिला! 

संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता अजय भोसले म्हणाला, “आपले प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी दुसऱ्यांवर अवलंबून रहाणे योग्य नाही. फीया वाढतात. रेल्वे - बस मध्ये बसायला मिळत नाही. पेट्रोल भरले तर त्यात भेसळ आढळते. अशा मुद्द्यांवर तिथल्या तिथे प्रश्न विचारण्याची धमक युवकांमध्ये असायला हवी. आम्ही कर भरतो. आम्हांला सरकारकडून जबाबदेही हवी”! 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निनाद रावराणे, अजय पटेकर, कृष्णा किर्तीकर, रुपेश गायकवाड यांनी मेहनत घेतली.

विनीत, मीनल उत्तुरकर (9833113414)
विश्वस्त,  समता विचार प्रसारक संस्था


Sunday, 23 August 2026

शहाड येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी !!

शहाड येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी !!

*विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वह्या वाटपाने कार्यक्रमाची रंगत*

(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत.)
*शहाड (कल्याण),* मातंग परिवर्तन संघ, कल्याण यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती महोत्सवानिमित्त मार्गदर्शन, वैचारिक प्रबोधन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शहाड येथील मातोश्री कॉलेजमध्ये नुकताच मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगल मोरे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश कापरे सर, श्रमिक (मु.) पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आणि अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस, मा. महेंद्र उर्फ अण्णा पंडीत उपस्थित होते. प्रमुख वक्त्या म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत यांनी मार्गदर्शन केले. 

आपल्या मार्गदर्शनात डॉ. सुषमा बसवंत व डॉ. सुरेश कापरे यांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन, साहित्यिक योगदान आणि सामाजिक क्रांतीतील त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे कसे गरजेचे आहे यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक व श्रमिक (मु.)पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष,सन्माननीय महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांनी भुषवले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अण्णा पंडीत यांनी समाजावरील सामाजिक अत्याचारा संदर्भात भाष्य करुन समाजावर कोठेही अन्याय अत्याचार झाल्यास आपण सदैव अत्याचाराचा प्रतिकार करण्यास समाजासाठी उपलब्ध असु अशी ग्वाही दिली.तर विशेष अतिथी म्हणून समाजसेवक सुनील उतेकर उपस्थित होते.

*विद्यार्थ्यांचा सत्कार हा केंद्रबिंदू*
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळा होता. यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण घेऊन समाजात पुढे जाण्याचा सल्ला दिला. समाजाच्या प्रगतीसाठी छोटे-छोटे बदल स्वतःपासून सुरू करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच लहान मुलांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर सुंदर भाषणे केली, ज्याचे सर्वांनी कौतुक केले. शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटपही करण्यात आले.

*मान्यवरांची उपस्थिती*
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातोश्री कॉलेजचे किरण खिल्लारे यांनी मोलाचे सहकार्य करत हॉल उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष सोनवणे, मोहन साठे, विवेक लोखंडे, उत्तम भिसे, दीपक सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी दीपक काळे, गणेश साठे, नवनाथ सोनवणे, सुरेंद्र धोत्रे, सुनील भिसे, गुलाब भोंडवे, देवेंद्र मोरे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी विवेक लोखंडे सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

          अंमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासोबतच अंमली पदार्थांची मागणीच निर्माण होऊ नये यासाठी व्यापक जनजागृती करणारी 'कॅम्पस कनेक्ट' ही नवी मुंबई पोलिसांनी हाती घेतलेली विशेष मोहीम अत्यंत महत्त्वाची व युवाशक्तीला दिशा देणारी असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
          व्यसनांच्या दलदलीत युवा पिढीने फसू नये यासाठी सजगतेने काम करण्यासोबतच व्यसनांच्या गर्दीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार न समजता त्यांना व्यसनमुक्ती केंद्राद्वारे मदतीचा हात देण्याची नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने पोलिसांनी हाती घेतलेली भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

          नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 'नशामुक्त नवी मुंबई अभियान' अंतर्गत 'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने नवी मुंबई पोलीसांनी सुरू केलेल्या 'व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रा'चा शुभारंभ मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑफ एक्सलन्स, नेरूळ येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे तरुणाईच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाला.
          याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. श्री. गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. भरत गोगावले, बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधान परिषद सदस्य आ.श्री.रवींद्र फाटक, विधानपरिषद सदस्य आ.श्री. विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य आ.श्री. महेश बालदी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन मुद्गल, कोकण विभागीय आयुक्त श्रीम. रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
          'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहीमेच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हा नशा विरोधातील लढ्याचे केंद्र बनेल आणि प्रत्येक विद्यार्थी हा या मोहिमेचा सैनिक होईल असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय दुर्दैवाने व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या युवकांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी उपचार करणे आणि मानसिक आधार देण्याचे कामही केले जाणार आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानाद्वारे व्यसनमुक्ती विरोधी लढ्याला नवे बळ मिळेल असे ते म्हणाले.
          आज समाजात वाढते व्यसन आणि मानसिक ताणतणाव यांमुळे व्यसनमुक्ती केंद्राची गरज खूप वाढली आहे. विशेषत्वाने तरुणाई दारू, ड्रग्स आणि इतर घातक व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. व्यसनांमुळे शरीराचे नुकसान होतेच याशिवाय नैराश्य, भीती यामुळे मनाचे आणि भविष्याचेही मोठे नुकसान होते.
          त्यावर योग्य उपचारासाठी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची गरज लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर सेक्टर 8 येथील मदर तेरेसा इमारतीमध्ये ‘व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
          बांधिलकी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने या केंद्राचे परिचलन केले जाणार आहे. येथे पुनर्वसन कार्यक्रम, जीवन-कौशल्य उपक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षणाशी संबंधित उपक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम तसेच इतर रुग्ण-सहाय्यक कार्यक्रमांचे नियोजन व समन्वय केला जाणार आहे.
          पहिल्या टप्प्यात 11 रूग्णखाटा क्षमतेच्या या केंद्राद्वारे व्यसनातून सुटका करण्यासाठी आपुलकीचा आधार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे समाजात पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी पुनर्वसनासाठी मदत केली जाणार आहे.
          याकरिता रुग्णाच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. तसेच विविध जनजागृती कार्यक्रम राबवून रुग्णाच्या पुनर्वसनासाठी आणि समाजात त्यांच्या पुनर्समावेशासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
          नवी मुंबई पोलीस विभागामार्फत सूचित केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिके मार्फत चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात रुग्णाचा प्रवेश झाल्यानंतर, दैनंदिन रुग्ण समन्वय, त्यांच्या कुटुंबियांशी समन्वय, त्यांचे समुपदेशन, पुनर्वसन सहाय्य व फॉलो-अप उपक्रमांव्दारे कार्यवाही केली जाणार आहे.
          केंद्रात दाखल होणा-या रूग्णाच्या मानसिकतेचा विचार करून त्याच्या कलाने योग्य उपचार करण्याकरिता याठिकाणी कार्यरत कर्मचारी हे आवश्यक अर्हताधारक आणि प्रशिक्षित व अनुभवी असतील. त्या कर्मचा-यांनाही वेळोवेळी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल व पर्यवेक्षण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येईल.
          याठिकाणी अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist), अनुभवसंपन्न मानसशास्त्रज्ञ / समुपदेशक ( Psychologist / Counselor ) तसेच नर्सेस, वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षक असे कर्मचारी कार्यरत असतील. येथील व्यवस्थापनासाठी अनुभवी व्यवस्थापक कार्यरत राहील. 
          या केंद्रामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार केले जातील तसेच मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist) रुग्णाशी बोलून त्याच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करतील. येथे कॅरम, बुध्दीबळ अशा खेळांच्या सुविधांसोबतच मानसिक शांती, सकारात्मक विचार आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग, ध्यान आणि व्यायामाची सोय असणार आहे.
          या व्यसनमुक्ती सुविधा केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त नवी मुंबई साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या सहयोगाने सामाजिक बांधिलकी जपत आहे.


पत्रकारांच्या एकजुटीचा निर्धार; ठाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

पत्रकारांच्या एकजुटीचा निर्धार; ठाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*अंबरनाथ, दि. 23 ऑगस्ट 2026*

पत्रकारांच्या हक्क, अधिकार आणि विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्यासाठी तसेच ठाणे जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची भक्कम बांधणी करण्यासाठी आयोजित केलेली महत्त्वपूर्ण बैठक अंबरनाथ येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालली. ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आणि भगिनी उपस्थित राहिल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

*सदस्य नोंदणीवर भर*  
या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह सदस्य नोंदणी अभियानावर विशेष भर देण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी सदस्य नोंदणीचे फॉर्म भरून संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व ठाणे जिल्हा सुप्रीमो गौतम वाघ होते. महाराष्ट्र सहसंघटक सुरेश जगताप यांनी प्रस्तावना मांडताना ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांचे हक्क व अधिकार, संघटनेची गरज तसेच आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

*एकजुटीने संघर्षाचा निर्धार*  
बैठकीत पत्रकारांना दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या अडचणी, हिताचे प्रश्न आणि विविध समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

पत्रकार एकत्र आले तरच त्यांच्या प्रश्नांना ताकद मिळेल. संघटन मजबूत झाले तरच हक्क आणि अधिकारांसाठीचा संघर्ष अधिक प्रभावी होईल या भूमिकेतून ठाणे जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडियाची मजबूत संघटनात्मक उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला.

*आगामी उपक्रमांचे नियोजन*  
आगामी काळात ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराला एका मजबूत व्यासपीठावर आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. उपस्थित पत्रकारांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गौतम गवई, संजय साळवे, प्रशांत ढोणे, रजनीकांत गायकवाड, जगन्नाथ जावळे, सतीश अहिरे, सलीम मन्सूरी, राजदीप जगताप, संतोष क्षेत्रे, राजू दोंदे, देवानंद पाढेन यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील विविध विभागांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण नवीन एसटी स्टँडचे काम संथगतीने; प्रवाशांची गैरसोय, आम्ही नगरकर संघटनेचा आंदोलनाचा इशारा !!

कल्याण नवीन एसटी स्टँडचे काम संथगतीने; प्रवाशांची गैरसोय, आम्ही नगरकर संघटनेचा आंदोलनाचा इशारा !!

*कल्याण, दि. 21 ऑगस्ट 2026*

कल्याण पश्चिम येथील नवीन एसटी स्टँडचे काम मागील सहा ते सात वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने आम्ही नगरकर संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

*परिवहन मंत्री सरनाईक यांना निवेदन*  
या संदर्भात आम्ही नगरकर संघटनेने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले आहे. संघटनेचे पदाधिकारी शांताराम झावरे यांनी हे निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, कल्याणच्या नवीन एसटी स्टँडचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. कामासाठी आवश्यक असलेली पुरेशी यंत्रणा कार्यरत दिसत नाही. हे काम कधी पूर्ण होईल याची कोणतीही शाश्वती दिसत नाही. संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

*विठ्ठलवाडीला जाण्याची सक्ती*  
सध्या कल्याण येथून सुटणाऱ्या एसटी गाड्या विठ्ठलवाडी येथून सोडल्या जात आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे येथून कल्याणला येणाऱ्या आणि कल्याणहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना विठ्ठलवाडीपर्यंत जावे लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

*संघटनेची मागणी*  
सदर कामाला गती देऊन ते जलदगतीने पूर्ण करावे. जोपर्यंत नवीन स्टँड पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांसाठी कल्याणमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून तात्पुरती सुविधा करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

प्रवाशांची गैरसोय अशीच सुरू राहिल्यास आम्ही नगरकर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शांताराम झावरे यांनी दिला आहे.

Saturday, 22 August 2026

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

डोंबिवली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयाच्या संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता केंद्र (Centre for Research, Innovation and Entrepreneurship – Start-up & Incubation Cell) यांच्या वतीने ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे, संशोधन व नवोपक्रमाला चालना देणे तसेच समाजातील समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्स उभारण्यासाठी प्रेरित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरात इव्हॉनिक्स टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच क्विककार्टचे सह-संस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. निलाद्री रॉय यांनी “Innovation Starts With You – Cultivating the Entrepreneurial Mindset” या विषयावर मार्गदर्शन केले. “मोठी कल्पना शोधण्यापेक्षा समस्या शोधा” आणि “समस्येतच उद्योजकतेची संधी दडलेली असते” हा प्रभावी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांचे निरीक्षण करून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचे आवाहन केले.

यानंतर झायडस वेलनेस लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (DGM) डॉ. रवींदर वर्मा यांनी “Building Your First Startup – Idea to Launch” या विषयावर मार्गदर्शन करताना यशस्वी स्टार्ट-अप उभारण्यासाठी ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, कल्पनेची पडताळणी करणे, सातत्याने प्रयोग करणे आणि समस्येवर आधारित उपाय विकसित करणे किती महत्त्वाचे आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

यावेळी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हर्षल लवंगारे यांनी आपल्या मनोगतात संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता केंद्र स्थापन करण्यामागील दूरदृष्टी स्पष्ट केली. “महाविद्यालय हे केवळ पदवी देणारे केंद्र नसून समाजातील समस्या घेऊन येणारे आणि त्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेच्या माध्यमातून उपाय शोधणारे केंद्र व्हावे,” हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

डोंबिवली व परिसरातील वाहतूक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, स्थानिक उद्योग, डिजिटल सेवा, पाणी व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांतील समस्यांवर संशोधन करून त्यातून उद्योजकीय संधी निर्माण करणे, हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या संकल्पनेला डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापन समितीने दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आपल्या उद्योजकीय प्रवासाचा उल्लेख करताना श्री. लवंगारे यांनी श्री. निलाद्री रॉय यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण करून दिली. कोविड काळात रोहन जोशी यांच्यासह “कक्षा” या K-12 एडटेक स्टार्ट-अपवर एकत्रितपणे काम करताना मिळालेला अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. “उद्योजकता म्हणजे केवळ कल्पना नव्हे, तर समस्येचे सातत्याने निराकरण करण्याची वृत्ती,” असे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या आगामी उपक्रमांचीही माहिती दिली. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) यांच्या सहकार्याने एक दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहा दिवसीय ‘इनोव्हेशन अँड करिअर फेस्टिव्हल’ आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. या महोत्सवात करिअर फेस्टिव्हल, स्टार्ट-अप फेस्टिव्हल आणि मेगा जॉब फेअर आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या ‘द बायोस्कोप बग्स’ या इन-हाऊस फिल्म सोसायटीचे उद्घाटन होणार असून, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व चित्रपट दिग्दर्शक अक्षय शिंपी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार (Critical Thinking), समस्या निराकरण क्षमता (Problem Solving Skills), संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या व्यापक उद्दिष्टातून संशोधन, उद्योजकता, करिअर विकास, उद्योग सहकार्य आणि फिल्म सोसायटी यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे संकल्पनाकार व संयोजक श्री. हर्षल लवंगारे, तर सहसंयोजक म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. कैलास जगदेव आणि स्ववित्त विभागाच्या उपप्राचार्या डॉ. रिया रुपाणी यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संशोधन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुमन सात्याराम आणि डॉ. अमला पटवर्धन यांनी केलेल्या अथक परिश्रम, उत्कृष्ट नियोजन व प्रभावी समन्वयाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.

या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेची संस्कृती महाविद्यालयात अधिक दृढ करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून, भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे विचारशील, नाविन्यपूर्ण आणि उद्योजकीय नेतृत्व असलेले विद्यार्थी घडविण्याच्या महाविद्यालयाच्या ध्येयाला या कार्यक्रमाने नवी दिशा दिली.

प्रसिद्धी/वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

डोंबिवली एमआयडीसीत नाल्यात बॅग्स भरून कचरा; उघड्या चेंबर्समुळे रोगराईची भीती !!

डोंबिवली एमआयडीसीत नाल्यात बॅग्स भरून कचरा; उघड्या चेंबर्समुळे रोगराईची भीती !!

** बेजबाबदार लोकांची करामत

*डोंबिवली, दि. 21 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नाले आणि गटारांची अवस्था अतिशय भयानक झाली असून नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आणि अर्धवट विकासकामांमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

*नवीन बॅग्समध्ये कचरा भरून नाल्यात टाकला*  
कावेरी चौक जवळील एकदंत हेरिटेज आणि कोयना सोसायटीच्या मधून जाणाऱ्या नाल्यात नवीन बॅग्समध्ये भरून कचरा आणि प्लास्टिक फेकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तसेच सांडपाणी वाहिन्यांच्या अनेक चेंबर्सवर झाकणे नसल्याने त्या उघड्या चेंबर्समध्येही काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत.

ही बाब येथील ज्येष्ठ जागरूक नागरिक श्रीमती स्मिता फाटक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

*अर्धवट नाले, साचलेले पाणी, डासांची उत्पत्ती*  
निवासी भागात नवीन नाले आणि गटारे बांधण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र येऊन साचून राहत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे.

यामुळे डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर आणि कावीळ यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक रुग्ण आढळून येत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. उघड्या चेंबर्समधून कोणतीही व्यक्ती पडून अपघात होण्याचीही शक्यता आहे.

*दोन यंत्रणांमध्ये कामाची विभागणी*  
सध्या सांडपाणी वाहिन्या आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती तसेच नवीन नाले-गटारांचे बांधकाम एमआयडीसी पाहत आहे. तर स्वच्छता आणि साफसफाईचे काम केडीएमसीकडे आहे.

पुढील काही दिवसांत मोठे सण आणि उत्सव येणार असल्याने प्रशासनाने या विषयात गंभीरतेने लक्ष घालून तातडीने कारवाई करावी आणि बेजबाबदारपणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

'युथ की बात’ संवादात युवकांनी व्यक्त केली सरकारी खात्यांकडून जबाबदेही !

'युथ की बात’ संवादात युवकांनी व्यक्त केली सरकारी खात्यांकडून जबाबदेही !  ठाणे, दि. २४ - “बरेच वर्षे आपण बघत आलोय - युवकांना ...