Wednesday, 19 August 2026

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना उबाठाकडून मानपाडा पोलिसांना निवेदन !?

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना उबाठाकडून मानपाडा पोलिसांना निवेदन !?

*डोंबिवली, दि. 19 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसीतील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलात विकासकामासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीचा निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मानपाडा पोलिस ठाण्यात निवेदन दिले.

*पोलिसांकडे तक्रार, कायदेशीर कारवाईची मागणी*  
शिवसेना उबाठा कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख श्री. अभिजीत सावंत यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान शिंदे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. 

निवेदनात म्हटले आहे की, क्रीडा संकुलाच्या विकासाच्या नावाखाली संकुलातील शेकडो लहान-मोठी झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात आली आहेत. ही झाडतोड कोणाच्या परवानगीने आणि कोणत्या नियमांनुसार झाली याची चौकशी करावी. जर ही कृती बेकायदेशीर असेल तर संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.

*शिवसेना पदाधिकारी उपस्थित*  
यावेळी शिवसेना उबाठाचे उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे, माजी विभागप्रमुख राजू नलावडे, शाखाप्रमुख मंगेश सरमळकर आणि शिवसैनिक स्वप्नील पाटील उपस्थित होते.

क्रीडा संकुलातील वृक्षतोड हा पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर विषय असून यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Tuesday, 18 August 2026

सावळाराम महाराज क्रीडा संकुलात विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची तोड; पर्यावरणप्रेमी संतप्त !!

सावळाराम महाराज क्रीडा संकुलात विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची तोड; पर्यावरणप्रेमी संतप्त !!

*डोंबिवली, दि. 19 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी मधील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या विकासकामासाठी संकुलातील शेकडो लहान-मोठी झाडे तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

*पत्रे ठोकून गुप्तपणे झाडतोड*  
केडीएमसीने या क्रीडा संकुलाचा सर्वोत्तम आणि आधुनिक दर्जाचे क्रीडा संकुल म्हणून विकास करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि राज्य शासनाकडून मोठा निधी मिळाल्याचे समजते. 

सध्या संकुलाच्या मैदानाभोवती अनेक ठिकाणी उंच पत्रे ठोकण्यात आली आहेत. त्यामुळे आत काय चालले आहे हे बाहेरून दिसत नाही. या पत्र्यांच्या आत ठेकेदाराने केडीएमसीच्या संमतीने संकुलातील शेकडो झाडे तोडली असून तोडलेल्या झाडांची तातडीने विल्हेवाटही लावली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

*वृक्षलागवडीच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह*  
एकीकडे केडीएमसी दरवर्षी वृक्षलागवडीसाठी लाखो रुपये खर्च करत असून दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवते. दुसरीकडे स्वतःच्याच मालकीच्या जागेत लावलेली झाडे विकासाच्या नावावर तोडली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केडीएमसीची वृक्ष संवर्धन समिती सध्या कार्यरत आहे की नाही असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

*पर्यावरणप्रेमींची मागणी*  
या झाडतोडीमुळे पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. विकासाच्या नावाखाली झाडे तोडणे निंदनीय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शेकडो झाडतोडीची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करून जर हे कृत्य बेकायदेशीर आढळले तर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

क्रीडाप्रेमींनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर हे क्रीडा संकुल केवळ खेळाडू आणि विविध खेळांसाठी विकसित केले जात असेल तर भविष्यात ते दहीहंडी, नवरात्र उत्सव, लग्न समारंभ यासारख्या कार्यक्रमांसाठी दिले जाऊ नये.

सध्या प्रशासनाने या प्रकरणी अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र झाडतोडीचे प्रमाण आणि त्यामागील परवानगी याबाबत नागरिकांनी पारदर्शक माहिती द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

*अष्टपैलू समाजसेवक लक्ष्मीकांत पोपळे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ने सन्मानित* !!!

*अष्टपैलू समाजसेवक लक्ष्मीकांत पोपळे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ने सन्मानित* !!!

 *नागरी संरक्षण, समाजसेवा, पत्रकारिता व चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव सोहळा* ...!

खारघर, दि. १५ ऑगस्ट २०२६ : समाजसेवा, मानवता, आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रहितासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे नागरी संरक्षण दलाच्या बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन, ज्येष्ठ समाजसेवक, वरिष्ठ पत्रकार (VMW News) तसेच चित्रपट निर्माते व गंगोत्री प्रोडक्शनचे प्रोप्रायटर श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांना ‘लेक माहेरचा कट्टा फाउंडेशन’तर्फे प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी लेक माहेरचा कट्टा फाउंडेशनच्या वतीने ए.सी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, खारघर सेक्टर-४ येथील सभागृहात १५ ऑगस्ट रोजी भव्य ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या समाजसेवा, नागरी संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, समाजसेविका सौ. स्नेहा देशपांडे यांच्या हस्ते श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांचा पुरस्कार प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.

देशसेवा, समाजसेवा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

या गौरव सोहळ्यास विविध क्षेत्रांतील नामवंत मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये म्युझिक इव्हेंट्स ऑर्गनायझर व अखिल भारतीय नाट्य परिषद सदस्य तसेच ‘५० खोके एकदम ओके’ या नाटकाचे निर्माते श्री. अशोक हर्ष, माजी सैनिक व कारगिल युद्धातील सहभागी, भारतीय सैन्यात २० वर्षे सेवा बजावलेले तसेच सध्या बँक ऑफ बडोदा येथे कार्यरत असलेले श्री. प्रशांत तुकाराम चव्हाण, १०७ इंजिनिअर रेजिमेंटचे हवालदार, NSG Black Commander, Bomb Squad सदस्य व राष्ट्रपती पदकासह विविध पुरस्कारांचे मानकरी श्री. बसवराज सुभाष गोवे, सेवानिवृत्त सहाय्यक अधिकारी श्री. साधू झेंडे, गेल्या २२ वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आणि सुमारे ६५० पोलीस प्रकरणांच्या निराकरणात योगदान देणाऱ्या समाजसेविका सौ. स्नेहा देशपांडे, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर व फॅशन स्टायलिस्ट, बालाजी प्रॉडक्शनमध्ये एकता कपूर यांच्यासोबत कार्य केलेले आणि झी नाट्य गौरव पुरस्कारप्राप्त श्री. मंदार तांडेल, तसेच दूरदर्शन कलाकार, गप्पागोष्टीकार, अभिनेता व निवेदक श्री. जयंत ओक यांचा समावेश होता.

देशसेवा, समाजसेवा, कला, संस्कृती, पत्रकारिता, मनोरंजन आणि विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या पुरस्कार सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

“हा सन्मान जबाबदारी वाढवणारा आहे”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना श्री. लक्ष्मीकांत पोपळे म्हणाले, “सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून समाजसेवेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन लेक माहेरचा कट्टा फाउंडेशनने आम्हाला ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ने सन्मानित केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि मनापासून कृतज्ञता वाटते. हा गौरव केवळ माझ्या कार्याची पोचपावती नसून, आपत्तीच्या काळात आणि गरजेच्या वेळी निःस्वार्थ भावनेने नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मिळालेली प्रेरणादायी थाप आहे.”

ते पुढे म्हणाले, “हा सन्मान आमची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. समाज, मानवता आणि राष्ट्रसेवेसाठी यापुढेही अधिक समर्पण, करुणा आणि शिस्तीने कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाली आहे. लेक माहेरचा कट्टा फाउंडेशनच्या विश्वास, प्रोत्साहन आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”

यावेळी त्यांनी “सेवा, सुरक्षा, शिस्त – हेच आमचे ब्रीद!” हा संदेश देत “जय हिंद! जय महाराष्ट्र!” अशा घोषणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लेक माहेरचा कट्टा फाउंडेशन ही संस्था समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने करीत आहे. “Be a Reason for Someone's Smile” या प्रेरणादायी संदेशातून सेवा, करुणा आणि मानवतेची भावना समाजात वृद्धिंगत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, माजी सैनिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कलाकार, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या बहुआयामी कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक व राष्ट्रसेवेच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि मानवतेच्या कार्याला मिळालेला हा सन्मान श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

सेवा, सुरक्षा, शिस्त – हेच आमचे ब्रीद!

जय हिंद! जय महाराष्ट्र! 
सौजन्य- विश्वनाथ राऊत सर

सेबी अधिकाऱ्याच्या नावाने धमकी देऊन उरणमधील ज्येष्ठ नागरिकाला 29 लाख 36 हजारांचा गंडा - डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक !!

सेबी अधिकाऱ्याच्या नावाने धमकी देऊन उरणमधील ज्येष्ठ नागरिकाला 29 लाख 36 हजारांचा गंडा - डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक !!

महिलेपासून सुरू झालेला फोन, सीबीआय-इनव्हेस्टिगेशन ऑफिसरच्या खोट्या कॉलने संपूर्ण आयुष्याची पुंजी लुटली.

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या "डिजिटल अटक" आणि "मनी लॉन्ड्रिंग"च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीचा एक गंभीर प्रकार उरणमध्ये उघडकीस आला आहे. उरण येथील बोरी नाका परिसरात राहणाऱ्या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला टेलिकॉम कंपनी आणि सीबीआय अधिकाऱ्याच्या नावाने धमकी देऊन तब्बल 29 लाख 36 हजार 94 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. शांताराम हे राहणार उरण येथे राहत असून ते सेवानिवृत्त आहेत. दिनांक 14 जुलै 2026 रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईल क्रमांक वरून या अनोळखी क्रमांकावरून एका महिलेचा फोन आला. सदर महिलेने स्वतःला टेलिफोन निगममधून बोलत असल्याचे सांगितले आणि शांताराम या नावाने मुंबईत एक बनावट सिमकार्ड वापरले जात असल्याचे सांगून धमकी दिली.

या फोननंतर काही दिवसांनी या वेगवेगळ्या क्रमांकावरून वेगवेगळ्या व्यक्तींचे कॉल येण्यास सुरुवात झाली. कॉल करणाऱ्यांपैकी एकाने स्वतःला राजेश प्रधान नावाचा इनव्हेस्टिगेशन ऑफिसर, दुसऱ्याने राजेंद्र सिंग नावाचा सीबीआय अधिकारी आणि तिसऱ्याने सुनीलकुमार गौतम नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी शांताराम म्हात्रे यांना सांगितले की संदीप कुमार नावाच्या व्यक्तीच्या मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज स्मगलिंग आणि वुमन ट्रॅफिकिंग या गुन्ह्यात त्यांच्या नावाने आयसीआयसीआय बँकेत 78 लाख रुपये जमा झालेले आढळून आले आहेत आणि यात त्यांना अटक होऊ शकते.

या भीतीपोटी आणि अधिकाऱ्यांच्या धाकाने शांताराम  यांनी 14 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत वेगवेगळ्या वेळी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण 29 लाख 36 हजार 94 रुपये जमा केले. पैसे गेल्यानंतरही आरोपींनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शांताराम यांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9.01 वाजता उरण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून उरण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 204, 318(4), 319(2), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66(डी) तसेच भादंवि कलम 170, 420, 419, 34 प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 299/2026 दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास उरण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल काटवाणी हे करत आहेत. घटनास्थळी ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आणि पोलीस उपनिरीक्षक रोशन काथारा यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी फिर्यादीचा जबाब यथार्थ प्रणालीद्वारे नोंदवून घेतला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

या घटनेनंतर उरण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या नावाने फोन आल्यास घाबरून जाऊ नये. सीबीआय, पोलीस किंवा इतर कोणतीही यंत्रणा फोनवर पैसे मागत नाही किंवा डिजिटल अटक करत नाही. अशा प्रकारचा संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यां सोबत साधला राजू मुंबईकर यांनी मुक्त संवाद !

महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यां सोबत साधला राजू मुंबईकर यांनी मुक्त संवाद !

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : हिंदू संस्कृतीतील साजरा केला जाणारा पारंपरिक म्हणजे नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येणारा पहीला सण आहे ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालियामर्दन केले असे मानले जाते.याच नागपंचमी सणाचे औचित्य साधून महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल येथे वन्यजीवप्रेमी आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या माध्यामातून आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यानमालेत खास करून युवा तरुणांमध्ये निसर्गाप्रती आत्मियता निर्माण व्हावी याच उदात्त भावनेतून महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना निसर्गातील जीवजंतू, प्राणी - पक्षांविषयी खास करून सापांबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी व्याखनरुपी मार्गदर्शनपर प्रबोधनात्मक विचारमंथनपर चर्चासत्रात अर्थात " साप समज आणि गैरसमज "या व्याख्यान रुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून खास करून सापांबद्दलची उपयुक्त असी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या मोठ्या प्रशस्त अश्या विवेकवाहिनी ऑडिटोरियम हॉलमध्ये फ्लेक्स ( फोटोच्यां ) माध्यमातून विषारी, निमविषारी आणि बिनविषारी सापांच्या अनेक जाती पाहायला मिळाल्या... सोबतच सापांबद्दलची उपयुक्त माहितीची देवाण - घेवाण करत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची अचूक आणि उपयुक्त अशी माहिती देत विद्यार्थ्यांच्या मनात सापांबद्दलची असणारी भीती आणि अनेक गैरसमज देखील दूर करण्यात आले.

     महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य या महाविद्यालयात राजू मुंबईकर यांनी घेतलेल्या प्रबोधनात्मक चर्चासत्रात सहभागी झालेले विद्यार्थी हे शहरी आणि ग्रामीण भागातून असल्यामुळे त्यांच्यात सापांबद्दलचे असणारे अनेक समज गैरसमज आणि भीती त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून जाणवत होती. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन आणि निसर्गातील जीव - जंतू आणि प्राणी - पक्षांबद्दलची आणि खास करून सापांबद्दलची उपयुक्त अशी माहिती देऊन राजू मुंबईकर यांनी विद्यार्थ्या मध्ये सापांबद्दलचे असणारे "समज आणि गैरसमज " आणि अंधश्रद्धाचं निरासरण केल.


     नागपंचमी सणाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत सहभागी झालेल्या महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य रायगड भूषण गणेशजी ठाकूर,सहप्राचार्य प्रफुल्लजी वशेणीकर यांनी राजू मुंबईकर यांच्या माध्यामातून साकारलेल्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमा द्वारे विद्यार्थ्यांना दिलेल्या सापांबद्दलच्या उपयुक्त अश्या माहितीमुळे राजू मुंबईकर यांचे भरभरून कौतुक करत आभार मानले.

    या प्रबोधनात्मक अश्या व्याख्यान रुपी कार्यक्रमात सहभागी झालेले महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत हा प्रबोधनात्मक व्याख्यान पुष्प कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची उरणमध्ये निघृण हत्या !!

साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची उरणमध्ये निघृण हत्या !!

पलंगावरून पडल्याचा रचला बनाव; शवविच्छेदन अहवालानंतर नराधम सावत्र पित्याचं बिंग फुटलं.

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : उरण मध्ये लहान बालकाची हत्त्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांकडे जायचंय... अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडयाच्या या निष्पाप हट्टाचा संताप अनावर होऊन एका क्रूर सावत्र पित्याने त्याची अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उरणमधील फणसवाडी (मोरा) येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर मुलगा खेळताना पलंगावरुन पडून जखमी झाल्याचा बनाव रचून गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचाही सावत्र पित्याचा डाव होता; मात्र मोरा सागरी पोलिसांच्या सतर्कतेने आणि शवविच्छेदन अहवालाने या हत्येचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सावत्र पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

या घटनेतील मृत बालक मोक्ष (३ वर्षे ५ महिने) हा त्याची आई काव्या आणि तिचा दुसरा पती जितेंद्र प्रदीप भिसे (२८) यांच्यासह उरण-मोरा येथील फणसवाडी येथे राहत होता. मोक्ष हा जितेंद्र भिसे याचा सावत्र मुलगा असल्याने त्याला सतत किरकोळ कारणांवरुन मारहाण करुन त्याचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारी घरात मोक्ष आणि जितेंद्र दोघेच होते. यावेळी मोक्षने आरोपी जितेंद्र याला तू माझा खरा पप्पा नाहीस, मला माझ्या खऱ्या पप्पांजवळ जायचं आहे, असा हट्ट धरला.

या निष्पाप शब्दांचा भयंकर राग आल्याने आरोपी जितेंद्रचे मानसिक संतुलन सुटले. त्यामुळे त्याने चिमुकल्या मोक्षचे डोके थेट भिंतीवर आपटले आणि लाकडी काठीने त्याच्या पायांवर बेदम मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता, त्याने मोक्षला सोफ्यावर पाडून त्याच्या छातीवर

जोरात ठोसा (पंच) मारला. या जबर मारहाणीत मोक्षच्या बरगड्या तुटल्याने आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

अपघाताचा बनाव आणि अंत्यसंस्काराची घाई:- 

मोक्षचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी जितेंद्रने दुपारी मुलगा घरात खेळताना अचानक पलंगावरुन खाली पडला व बेशुद्ध झाला, असा बनाव रचला. त्यानंतर मोक्षला तातडीने उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी ४ वाजता मोक्षला तपासून मृत घोषित केले. मुलगा मृत पावल्याचे स्पष्ट होताच आरोपी जितेंद्रने पोलिसांना न कळवता व शवविच्छेदन न करता बालकावर परस्पर अंत्यसंस्कार उरकण्याची घाई सुरु केली.

पोलिसांची सतर्कता आणि शवविच्छेदनाने उघड केली क्रूरता:- 


या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच मोरा सागरी पोलिसांचे पथक फणसवाडी येथे दाखल झाले. पोलिसांना पालकांच्या भूमिकेवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल केला. दिनांक १५ ऑगस्ट रोजी रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या ऍडव्हान्स डेथ सर्टिफिकेटमध्ये मोक्षच्या डोक्याला गंभीर दुखापत, बरगडया फॅक्चर आणि जबर मारहाणीमुळे झालेला हत्येचा मृत्यू, असे डॉक्टरांनी धक्कादायक निष्कर्ष नोंदवले. वैद्यकीय अहवाल समोर येताच पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी जितेंद्रने हत्येची कबुली दिली.

दरम्यान, आरोपीने मुलाच्या हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक तपासामुळे सत्य समोर आले. त्यानुसार आरोपी जितेंद्र प्रदीप भिसे याला हत्या आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कटवाणी यांनी दिली. न्यायालयाने आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धभूमी फाउंडेशनबाबत सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक !!

डॉ. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धभूमी फाउंडेशनबाबत सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक !!

*मुंबई, दि. 18 ऑगस्ट 2026*

मा. डॉ. रामदासजी आठवले साहेब, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल मुंबई येथे बुद्धभूमी फाउंडेशनशी संबंधित विविध विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत तीन प्रमुख मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

*बैठकीतील प्रमुख चर्चा*  

*1. जमीन आणि सातबारा नोंदीबाबत*  
बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातील जमिनीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने TDR काढून सातबारा उताऱ्यावर केलेल्या नोंदींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सदर नोंदींची सुनावणी घेऊन त्या रद्द कराव्यात तसेच दोषी अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी झाली. यासोबतच सातबारा उतारा बुद्धभूमी फाउंडेशनच्या नावावर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

*2. भंतेगण आणि साधकांवरील FIR रद्द करण्याची मागणी*  
बुद्धभूमी फाउंडेशनचे भंतेगण आणि साधकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले अन्यायकारक FIR तातडीने रद्द करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली.

*3. नावकरण आणि धम्मगेट उभारणी*  
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वालधुनी नदी समांतर नियोजित उन्नत मार्गाला "तथागत भगवान गौतम बुद्ध उड्डाणपूल" अlसे नाव देण्यात यावे. तसेच बुद्धभूमी परिसराच्या संरक्षणासाठी "बुद्धभूमी धम्मगेट" उभारण्याबाबतही प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली.

*बैठकीला कोण होते उपस्थित*  
या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी, प्रांत अधिकारी कल्याण विभाग, तहसीलदार कल्याण, कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी, MMRDA चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बुद्धभूमी फाउंडेशनशी संबंधित प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना उबाठाकडून मानपाडा पोलिसांना निवेदन !?

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना उबाठाकडून मानपाडा पोलिसांना निवेदन !? *डोंबिवली, दि. 19 ऑगस्ट 2026* डो...