Sunday, 9 August 2026

*मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ*

*मराठा समाज  विद्यार्थी गुणगौरव समारंभ*

मुंबई, (पी. डी पाटील) : सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई,  यांच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळगाव असलेली व मराठा ज्ञातीतील ज्या मुला/मुलीनी मुंबई शहर व उपनगर परिसरातील शाळा-कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना सन २०२५-२६ या  शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, इ. १० वी च्या परीक्षेत ८० टक्के, १२ वीत ७५ टक्के (विज्ञान व वाणिज्य शाखा), ७० टक्के ( कला शाखा ) व त्याहून अधिक गुण संपादन केले आहेत, विविध शाखेतील पदविका, पदवी व उच्च पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना, संस्थेच्या वार्षिक स्नेह-संमेलनात रोख रक्कमेची पारितोषिके, सन्मान चिन्हे, प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात  येणार आहे. 


तरी वरील प्रमाणे यश संपादन केलेल्या विद्यार्थांनी आपल्या गुण पत्रिकेची छायांकित प्रत, संपूर्ण नाव, मुंबईतील पत्ता, गावचा  पत्ता, टेलीफोन क्र /मोबाईल क्र. मराठी  मध्ये दि. ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी, सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, स्टार मॉल, ३रा मजला, न. चिं. केळकर मार्ग, दादर (पाश्चिम), मुंबई ४०००२८ या पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहिती साठी संपर्क ( सोमवार सोडून ) बाळा पाताडे - 9137469348( सायं.३ ते ६ ) यांना करावा.

आता उठवू सारे रान -: युवकांचा आवाज..

आता उठवू सारे रान -: युवकांचा आवाज..

गेल्या अनेक दिवसापासून चालू असणारे शैक्षणिक लढा हा शिक्षणा पुरता मर्यादित न राहता अनेक समस्यांचा आवाज झाला आहे. अनेक युवकांनी मांडलेले प्रश्न आज जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अंतर्गत लक्ष परिवर्तन संस्था युवकांच्या आवाज या कार्यक्रमात दिसले.

     शिक्षण, वाढती बेरोजगारी, पेपर फुटी, चॅट जिटीपी, ए आय, व्यसन, शिक्षण व्यवस्था, नीट परीक्षा, खेळाडूवरील अत्याचार, आत्महत्या, E20 पेट्रोल आणि इथेनॉल, अशा विविध प्रश्नातून युवकांनी आपले विचार मांडण्याच्या प्रयत्न केला. आज आपण बघतोय, पाहतोय पण यावर आपण बोलायला तयार नाही का? एकाची समस्या आहे का ? तर नाही ती समस्या प्रत्येकाची आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणे देखील आपले कर्तव्य आहे. 

शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे, आर्थिक फी यावर सरकारने विचार करायला हवे. जेणे करून सर्वांना शिक्षणात संधी मिळाले पण वाढती फी बघता १० नंतर ४० टक्के मुलांचे शिक्षण घटल्याचे समोर आले आहे. तरी आपण त्यावर शांत आहोत ? तसेच प्रश्न अत्याचाराच्या, तरुणांनी आपल्या आजूबाजूच्या आणि स्वतःच्या आयुष्यातील समस्या मांडल्या, तसेच त्या समस्यांवर उपाय शोधण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे ही चर्चा केवळ समस्या मांडण्यापुरती मर्यादित न राहता त्यातून पुढे काय करता येईल, याचाही विचार करणारी ठरली. चर्चेदरम्यान AI मुळे मुलांमध्ये आळशीपणा वाढत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. आजच्या काळात AI चा योग्य वापर आणि त्यावरील अतिनिर्भरता याबाबत तरुणांनी विचार करणे किती आवश्यक आहे, हेही या चर्चेतून जाणवले. मोबाईल मधील AI चा अती वापर तसेच इतर अँप चा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेकाना वेगवेगळ्या प्रश्नांना समोरे जाऊन तणावाला बळी पडताना दिसत आहेत पण आपण त्यावर उपाय करण्यापेक्षा आजुन नवीन कसे अँप व मूल गुंतून कसे बसतील यांच्या विचार आपण करतो.

सरकार नागरिकांच्या प्रश्नावर उपाय कधी शोधणार ? कधी त्यांना न्याय देणार ? आज अनेक आमदार खासदार, नगरसेवक आहेत जे पैशाच्या जोरावर, पदावर नागरिकांच्या छळ करताना दिसत आहे. पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही. आमली पदार्थाचे सेवन वयाच्या ६ वर्षापासून गलो गल्ली होताना दिसत आहे तरी देखील पोलिस प्रशासन गप्पा का ? आजुन किती लहान मुलांचे बळी घेणार आहे. असे असंख्य प्रश्न युवकांच्या मनात आहे आता त्यांना संधी मिळाली आहे आणि ते आवाज उठवून नागरिकांना जागे करून आपल्या हक्काच्या आवाज होण्यास तयार आहे. "हम सब एक हे" च्या घोषणेने तरुणांना लढण्याची ऊर्जा मिळाली. युवकांच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडू शकतात त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे देखील गरजेचे आहे. 


कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय डॉ. संजय मंगला गोपाळ, श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, वी नीड यू सोसायटी सचिव अभय कांता, समता विचार प्रसारक संस्थेचे सचिव लतिका सुप्रभा मोतीराम, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अजय भोसले तसेच लक्ष परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष गोरख हिवाळे, योगेश कांबळे व इतर सदस्य उपस्थित होते.

हा कार्यक्रम सुंदर झाला याचा आम्हाला आनंद आहे. भविष्यात तो आणखी मोठ्या स्वरूपात व्हावा, अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावा आणि समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांना विचार करण्यासाठी, बोलण्यासाठी व कृती करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ मिळावे. कारण समाजात बदल घडवायचा असेल तर केवळ समस्या मांडून उपयोग नाही; प्रश्न विचारावे लागतील, विचार मांडावे लागतील, उपाय शोधावे लागतील आणि त्या उपायांवर कृतीही करावी लागेल. आजच्या या चर्चेतून एक आशा नक्कीच निर्माण झाली आहे की तरुणांना योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाले, तर ते समाजात नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतात.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे वी नीड यू सोसायटी सदस्या कल्पना ताई, मनिषा ताई, रोनित व इतर सदस्य यांनी मेहनत घेतली.

आदिवासी वीरांचा पोलिसांकडून सन्मान; पनवेलमध्ये ‘जय आदिवासी’चा जयघोष !

आदिवासी वीरांचा पोलिसांकडून सन्मान; पनवेलमध्ये ‘जय आदिवासी’चा जयघोष !

जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात; आमदार विक्रांत पाटील यांची विकासकामांसाठी पुढाकाराची ग्वाही

महेंद्र (अण्णा) पंडित / प्रतिनिधी 

पनवेल : आदिवासी समाजाच्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि योगदानाचा बुलंद आवाज पनवेलमध्ये घुमला. जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन २०२६ निमित्त गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत एकजुटीचे दर्शन घडविले. ‘जय भारत! जय संविधान!! जय आदिवासी!!!’च्या घोषणांनी कार्यक्रमस्थळ दुमदुमून गेले.

कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासोबतच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनवणे, प्रहार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुनील शिरीषकर, श्रमिक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक व मानवाधिकार संरक्षक महेंद्र उर्फ अण्णा पंडित, आदिवासी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. मदन गोवारी, भीमशक्ती संघटनेचे सुभाष गायकवाड, शैलेश पाटील (चिखले), डॉ. श्री. हांडे पाटील (पनवेल), आदिवासी कार्यकर्ता रामा चौधरी तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

*प्रबळमाचीच्या ‘आदिवासी वीरां’ना पोलिसांचा सलाम!*

या सोहळ्यातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण ठरला तो प्रबळमाची परिसरातील आदिवासी बांधवांच्या पोलिसांकडून करण्यात आलेल्या सन्मानाचा.

प्रबळमाची परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अडचणीत सापडलेल्या पर्यटकांना मदतीचा हात देण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधव सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या समाजोपयोगी आणि सेवाभावी कार्याची दखल घेत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने पांडुरंग देहू पारधी, हरिश्चंद्र देहू पारधी, नामदेव देहू पारधी आणि नथुराम कान्हो पारधी यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. पोलिसांच्या हस्ते झालेला हा गौरव केवळ चार व्यक्तींचा नव्हे, तर संकटसमयी धावून जाणाऱ्या संपूर्ण आदिवासी समाजाच्या माणुसकीच्या भावनेचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.

*‘विकासासाठी मागे हटणार नाही’; आमदार विक्रांत पाटील यांची ग्वाही*

कार्यक्रमात आमदार विक्रांत पाटील यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधला. आदिवासी भागातील मूलभूत सुविधा, विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निधीतून शक्य तितकी विकासकामे करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.

आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. त्यामुळे कार्यक्रमाला केवळ उत्सवाचे स्वरूप न राहता आदिवासी समाजाच्या विकासाच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळाले.

*गुलाबाचे फूल देत मान्यवरांकडून आदिवासी बांधवांचा गौरव*

कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित मान्यवरांनी आदिवासी बांधवांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत केले. आदिवासी समाजाच्या संघर्षाला, संस्कृतीला आणि सामाजिक योगदानाला सलाम करत उपस्थितांनी जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

*या अनोख्या उपक्रमामुळे कार्यक्रमस्थळी आपुलकी, सन्मान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.*

कार्यक्रमास आमदार विक्रांत पाटील, स्वतंत्र संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष नामदेव शेलार, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक शशिकांत शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी दूरध्वनीद्वारे आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

*मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला बळ*

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागताध्यक्ष संतोष चाळके, किरण शेटे, रमेश खिल्लारे, राहुल गायकवाड, रतन कडू, रामा चौधरी, रत्नदीप जोशी, अमोल कांबळे, जोमा निरगुडा, परेश लोंढे, भास्कर मदे, अशोक चौधरी, सुनील भगत आणि राज भोईर यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. मदन गोवारी यांनी केले, तर सूत्रसंचालन बी. पी. लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सौ. जोमी दामू गिरा यांनी आयोजक, कार्यकर्ते आणि उपस्थित आदिवासी बांधवांचे आभार मानले.

अल्पोपहारानंतर ‘जय भारत! जय संविधान!! जय आदिवासी!!!’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

‘माहिती अधिकार कार्यकर्ते ब्लॅक मेलर’ या वक्तव्याने भोवले; नगरसेवकांविरोधात बाजारपेठ पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल !!

‘माहिती अधिकार कार्यकर्ते ब्लॅक मेलर’ या वक्तव्याने भोवले; नगरसेवकांविरोधात बाजारपेठ पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल !!
 
*कल्याण, दि. 9 ऑगस्ट 2026*

डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कल्याण पश्चिम बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

*काय घडले होते?*  
दि. 25 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता महापालिका भवन येथे झालेल्या महासभेत डोंबिवली येथील नगरसेवक मंदार श्रीकांत हळबे यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना उद्देशून ‘ब्लॅक मेलर’ असा शब्द वापरल्याचा आरोप आहे.

*पोलिसांत तक्रार, नंतर NCR दाखल*  
पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश काटे यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दि. 9 जुलै 2026 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 356(1) अन्वये NCR क्रमांक 1398/2026 नोंदवला आहे.

त्यानंतर दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी पोलिसांनी तक्रार अर्जावर कारवाई झाल्याचे नमूद करून अर्ज दप्तरी दाखल केल्याचे पत्र गणेश काटे यांना दिले आहे.

*महासभेत चर्चेला उधाण*  
या प्रकरणामुळे महापालिकेच्या महासभेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "नगरसेवकांनी आपली पायरी ओळखून शब्द वापरावेत. एखाद्याला दमदाटी करू नये आणि पदाचा गैरवापर करू नये. आरटीआय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी विविध स्तरातून येत आहेत."

पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Friday, 7 August 2026

समेळपाडा मध्ये नागरी समस्यांत वाढ; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे परिणाम....

समेळपाडा मध्ये नागरी समस्यांत वाढ; नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे परिणाम....

*प्रभाग क्र ११ मधिल समस्यांबाबत समाजसेविका रूचिता नाईक यांचे महापौरांना निवेदन..*

नालासोपारा ता, ७ :- प्रभाग क्रमांक ११ मधील समेळ पाडा परिसरातील समस्या कायम असल्याने  समाजसेविका रूचिता नाईक यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे.

समे़ळपाडा मधिल चैतन्य स्कुल मागील नैसर्गिक नाला बुजवून त्याठिकाणी आर सी सी पाईप टाकण्यात आले परंतु नाल्यावरती लोखंडी जाळी नसल्याने सर्व कचरा आत पडत असल्याने वारंवार नाला तुंबला जातो यामुळे पावसाचे पाणी नाल्याचे पाणी वाहत नसल्याने रोगराई व पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. 
गणेश कृपा सोसायटी जवळील  उद्यानात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे आरोग्याच प्रश्न निर्माण झाला आहे.या ठिकाणी उद्यान विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे,पथदीप नादुरुस्त अवस्थेत आहेत. 

तेथील समस्यांकडे लक्ष दिले जात नाही  नगरसेवक कोणीही फिरकून पहात नाहीत.नगरसेवक नेमकी कोणती कामे करतात.असा प्रश्न समाजसेविका रूचिता नाईक यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात महापौर अजीव पाटील साहेब यांना निवेदन देऊन प्रभाग क्रमांक ११ मधिल समेळपाडा परिसरातील समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अशी मागणी समाजसेविका रूचिता नाईक यांनी केली आहे.

खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई; सराईत दुचाकी चोर जेरबंद, 9 दुचाकी हस्तगत, 6.35 लाखांचा मुद्देमाल जप्त !!

खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई; सराईत दुचाकी चोर जेरबंद, 9 दुचाकी हस्तगत, 6.35 लाखांचा मुद्देमाल जप्त !!

*कल्याण, दि. 6 ऑगस्ट 2026, (विनोद गिरी)

खडकपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका सराईत दुचाकी चोराला जेरबंद करून त्याच्याकडून 9 दुचाकी असा एकूण 6,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामुळे कल्याण, ठाणे आणि मुरबाड परिसरातील एकूण 8 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

*24 तासात आरोपीला अटक*  
दि. 04/08/2026 रोजी महानगरपालिका डंपिंगजवळ, 10 फूट वडवली रोड, गांधारी, कल्याण पश्चिम येथून हॉन्डा सीबी शाईन MH05BX1296 ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 399/2026 भा.न्या.सं. कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासांच्या आत आरोपी अब्बास शाहजोर सय्यद, वय 25 वर्षे, रा. खोली नं. 102, मलंगनगर, अटाळी रोड, आंबिवली, कल्याण पश्चिम याला पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीची हॉन्डा सीबी शाईन हस्तगत करून अटक करण्यात आली. त्याला 07/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

*पोलिसांनी उघड केले 8 गुन्हे*  
आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यातून चोरलेल्या 9 दुचाकी मिळून आल्या. यामध्ये स्कुटी आणि अपाचे सारख्या महागड्या दुचाकींचा समावेश आहे.

*हस्तगत मुद्देमाल*
1. *मध्यवर्ती पो.स्टे गु.र.नं. 943/2024*: सुझुकी बर्गमन MH05EZ7603 - 80,000 रु
2. *डोंबिवली पो.स्टे गु.र.नं. 416/2026*: सुझुकी ऍक्सेस MH05FR6917 - 75,000 रु
3. *विष्णुनगर पो.स्टे गु.र.नं. 203/2026*: टीव्हीएस एनटॉर्क MH05FU2002 - 70,000 रु
4. *मुरबाड पो.स्टे गु.र.नं. 277/2026*: टीव्हीएस अपाचे MH05EP6170 - 80,000 रु
5. *मुंब्रा पो.स्टे गु.र.नं. 1546/2025*: टीव्हीएस अपाचे MH04LV5350 - 80,000 रु
6. *महात्मा फुले चौक पो.स्टे गु.र.नं. 205/2026*: सुझुकी ऍक्सेस MH05FX9120 - 70,000 रु
7. *कळवा पो.स्टे गु.र.नं. 960/2025*: सुझुकी एनटॉर्क MH02GG0462 - 80,000 रु
8. *अंबरनाथ पो.स्टे गु.र.नं. 392/2026*: सुझुकी ऍक्सेस MH05EZ3644 - 60,000 रु
9. *खडकपाडा पो.स्टे गु.र.नं. 399/2026*: हॉन्डा सीबी शाईन MH05BX1296 - 40,000 रु  
*एकूण*: 6,35,000 रु

*आरोपीचा गुन्हेगारी इतिहास*  
अटक आरोपी अब्बास सय्यद हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात कापुरबावडी आणि बदलापूर येथे जबरी चोरीचे 3 गुन्हे प्रलंबित आहेत. तसेच सांताक्रूझ, खडकपाडा, डोंबिवली येथेही त्याच्यावर चोरी, एनडीपीएस आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल शेंडे, सहा. पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांच्या देखरेखीखाली पो.नि. प्रेमनाथ बोले, पो.नि. मारुती आंधळे, सपोनि सतीश पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

Thursday, 6 August 2026

लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मानवी हक्क आयोगात तक्रार; १४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी !!

लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मानवी हक्क आयोगात तक्रार; १४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी !!

खेड | ५ ऑगस्ट — रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात मानवी हक्क आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सुनावणी पार पडली असून, आयोगाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

तक्रारदार संजय कोकरे, अध्यक्ष, स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती यांनी कंपनीत अत्यंत धोकादायक रसायनांचे उत्पादन होत असल्याचा आरोप करत संबंधित कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी कंपनी बंद करण्याची मागणीही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनावणीदरम्यान आंदोलनकर्ते अशोकराव जाधव, सुरेश रानडे, डॉ. मंगेश सावंत, सुनील जाधव आणि आल्हाद पाटील उपस्थित होते. पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते अशोकराव जाधव यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर संबंधित कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आयोगाच्या पुढील सुनावणीत या प्रकरणातील विविध मुद्द्यांवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

*मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ*

*मराठा समाज  विद्यार्थी गुणगौरव समारंभ* मुंबई, (पी. डी पाटील) : सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई,  यांच्या वतीने, सिंधुदुर्ग ज...