Sunday, 20 September 2026

‘गोंधळ’ची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड !!

‘गोंधळ’ची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड !!

** तब्बल ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान

अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर आता ‘गोंधळ’च्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला ऑस्करच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक आहे.

               लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर 

'डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -१, ‘धुरंधर -२ ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भाषांतील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती, तर ‘धुरंधर’सारख्या चित्रपटांमागे भव्य निर्मितीमूल्य, मोठे कलाकार आणि प्रचंड व्यावसायिक ताकद होती. या विविध आणि तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिवंत सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सिनेमॅटिक दर्शन घडवणाऱ्या मराठी ‘गोंधळ’ची निवड झाली आणि भारताचे अधिकृत ऑस्कर प्रतिनिधित्व करण्याचा ऐतिहासिक मान चित्रपटाला मिळाला.

‘गोंधळ’चा मूळ गाभा भारतीय मातीतला असला, तरी चित्रपटाची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत हा चित्रपट प्रभावीपणे उभा राहू शकतो, याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना आवश्यक असलेली संपूर्ण मेहनत, ताकद आणि साधने आम्ही या अभियानासाठी लावणार आहोत.

आमच्या चित्रपटावर विश्वास दाखवल्याबद्दल भारत सरकार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि एफएफआयच्या निवड समितीतील सर्व मान्यवर ज्युरी सदस्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. अनेक मोठ्या आणि दर्जेदार चित्रपटांमधून ज्युरीने ‘गोंधळ’ची निवड केली, ही आमच्यासाठी सन्मानासोबतच एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी आहे.

लहानपणापासून ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंकडे आम्ही अपार अभिमानाने पाहात आलो आहोत. आज ‘गोंधळ’च्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे, तेव्हा मनात अगदी तशीच भावना आहे. हा केवळ एका चित्रपटाचा गौरव नाही, भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची जिवंत लोकपरंपरा आणि आपल्या मातीतून जन्मलेल्या कथेला मिळालेला राष्ट्रीय सन्मान आहे.

या सर्वोच्च सन्मानाविषयी बोलताना सर्वप्रथम माझ्या डोळ्यांसमोर ‘गोंधळ’ची संपूर्ण टीम उभी राहते. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि सहकाऱ्याने प्रामाणिकपणे, व्यावसायिक निष्ठेने आणि जिवापाड मेहनत घेऊन हा चित्रपट उभा केला. त्यामुळे या यशाचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण ‘गोंधळ’ परिवाराचे आहे. सध्या आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी असलो, तरी येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण टीम एकत्र येऊन या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करणार आहोत.

माझ्या कुटुंबीयांनी माझ्यावर आणि या स्वप्नावर अखंड विश्वास ठेवला. आमच्या इतर कंपन्यांतील संचालक, अधिकारी आणि प्रत्येक स्तरावरील सहकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी व्यावसायिक कामकाजाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मला पूर्ण एकाग्रतेने चित्रपटनिर्मितीकडे लक्ष देता आले. उत्तम टीम, कुटुंबाचा विश्वास आणि सर्व सहकाऱ्यांच्या भक्कम पाठबळामुळेच हा प्रवास शक्य झाला.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच आम्ही एक गोष्ट ठामपणे सांगत आलो आहोत, ‘गोंधळ’ची तुलना केवळ प्रादेशिक चित्रपटांशी न करता जगातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी व्हावी. आज एफएफआयच्या ज्युरीने ‘गोंधळ’वर दाखवलेला विश्वास आमच्या त्या भूमिकेला आणखी बळ देणारा आहे.

९९व्या अकादमी पुरस्कारांसाठीचे आमचे आंतरराष्ट्रीय अभियान लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, सक्षम आणि प्रभावी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर अत्यंत ताकदीने, प्रतिष्ठेने आणि जबाबदारीने करण्यासाठी आमची संपूर्ण टीम सज्ज आहे.

‘गोंधळ’ पाच वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शनासाठी तयार आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाचेही नियोजन करण्यात आले आहे. भारतातील आणि जगभरातील प्रदर्शनाच्या तारखा आम्ही लवकरच अधिकृतपणे जाहीर करू.

हा चित्रपट त्याची भव्य दृश्यभाषा, जिवंत ध्वनी आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभूती यांमुळे मोठ्या पडद्यावरच पाहण्यासारखा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा पायरेटेड प्रतीवर अवलंबून न राहता ‘गोंधळ’ चित्रपटगृहातच अनुभवावा.

‘गोंधळ’ मर्यादित कालावधीसाठी प्रदर्शित केला जाणार आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट स्वतः पाहावा, आपल्या कुटुंबीयांना व मित्रांना पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि भारताच्या या ऑस्कर प्रवासाचा अभिमानाने भाग व्हावे, असे आम्ही नम्र आवाहन करतो. प्रेक्षकांचा प्रत्येक प्रतिसाद आणि प्रत्येक तिकीट भारताच्या ऑस्कर अभियानाला अधिक बळ देईल, अशी भावना ‘गोंधळ’चे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर यांनी व्यक्त केली आहे.

Saturday, 19 September 2026

अनैतिक व्यापार करणाऱ्या ०२ इसमांना अटक, ०२ पीडित महिलांची सुटका - येरवडा पोलिसांची कारवाई !!

अनैतिक व्यापार करणाऱ्या ०२ इसमांना अटक, ०२ पीडित महिलांची सुटका - येरवडा पोलिसांची कारवाई !!

*पुणे / येरवडा, (विनोद गिरी) :

मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संजय दराडे, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग यांनी येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार १३७७ नवले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येरवडा येथील एका हॉटेलमध्ये एक इसम व त्याचे साथीदार ग्राहकांना फोनवर बुकिंग करून मुली अनैतिक व्यापारासाठी पाठवून विशिष्ट रक्कम ठरवून कल्याणी नगर, येरवडा परिसरातील लॉजवर पाठवितात.

सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गिते यांना कळविली असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून बनावट ग्राहक येरवडा येथील हॉटेलमध्ये पाठवून त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकण्यात आला. यामध्ये अनैतिक व्यापारास प्रवृत्त केलेल्या ०२ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

पीडित महिलांकडे सखोल चौकशी करून त्यांनी दिलेल्या माहितीवरून हा व्यवसाय करवून घेणाऱ्या इसमांना तपास पथक प्रभारी अधिकारी किशोर बेरड, पो.अं. ९८६६ वाबळे, १०७०६ गणेश पालवे, ४२०२ सोमनाथ गायकवाड यांनी सदर भागात जाऊन सापळा रचून अप्पर खराडी रोड परिसरातून दोन इसमांना ताब्यात घेतले.

*अटक आरोपी -*
*१.* राज राजेशम सविता, वय २८ वर्षे, रा. खराडी, पुणे
*२.* सुनील शिवाजी शिंदे, वय ३७ वर्षे, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे

वर नमूद आरोपींविरुद्ध दि. १४/०९/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १४३(२)(३), ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.

*सदरची कामगिरी -* श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, श्री. संजय दराडे, सह पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, श्री. चिलुमुला रजनीकांत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४, श्री. सुनील जैतापूरकर, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. उमेश गिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती शारदा कोकाटे, पो.नि. (गुन्हे), श्री. केशव दिंडे, पो.नि. (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शरद देठे, तपास पथक प्रभारी पो.उप.नि. किशोर बेरड, पो. हवा. रामेश्वर नवले, पो.हवा. कोकणे, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, सागर दळवी, लक्ष्मण ठोकळ, नितीन चांदणे, नागेश कुंजटवाड, प्रशांत कांबळे, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, संदीप धादवड, महिला पो.अं. ज्योती नाईक यांनी केली आहे.

विष्णुनगर पोलिसांची कामगिरी; मोबाईल दुकान फोडणाऱ्या तिघांना अटक, ९ मोबाईल जप्त !!

विष्णुनगर पोलिसांची कामगिरी; मोबाईल दुकान फोडणाऱ्या तिघांना अटक, ९ मोबाईल जप्त !!

*विष्णुनगर / डोंबिवली (विनोद गिरी)

विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. २४६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(a), ३(५) अन्वये दि. १७/०९/२०२६ रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात एका मोबाईल दुकानाचे शटर उचकटून ३०,००० रुपये किमतीचे ०९ मोबाईल फोन व चार्जर आणि ६,५०० रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार दाखल होती.

घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक केली आहे.

*अटक आरोपींची नावे -*

*१.* तजुमल कमरुल खान, वय २४ वर्षे, मूळ रा. जिल्हा किशनगंज, पो. ठाणे ठाकुरगंज, राज्य बिहार
*२.* अशफाक असिरुद्दीन आलम, वय ३२ वर्षे, रा. इ/८१९ शब्बीर शेख यांचा गाडा, एपीएमसी मार्केट, तुर्भे, नवी मुंबई
*३.* नजीम मोहम्मद जलाल शेख, वय २१ वर्षे, रा. इ/८१९ शब्बीर शेख यांचा गाडा, एपीएमसी मार्केट, तुर्भे, नवी मुंबई

आरोपींकडून चोरीस गेलेले एकूण ९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

सदर आरोपींना रिमांडकामी दि. १९/०९/२०२६ रोजी मा. न्यायदंडाधिकारी सो, ५ वे न्यायालय, कल्याण येथे हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून त्यांना आधारवाडी कारागृह, कल्याण पश्चिम येथे जमा करण्यात आले आहे.

लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट येथे गुंड प्रवृत्तीच्या अमोल प्रभाकर पालकरवर जातीवाचक शिवीगाळ, खंडणी व बदनामीचा गुन्हा दाखल; आरोपी फरार !!

लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट येथे गुंड प्रवृत्तीच्या अमोल प्रभाकर पालकरवर जातीवाचक शिवीगाळ, खंडणी व बदनामीचा गुन्हा दाखल; आरोपी फरार !!

.                      आरोपी अमोल पालकर 

*लोणार / किनगाव जट्ट :*

लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट येथे दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या अमोल प्रभाकर पालकर याच्यावर जातीवाचक शिवीगाळ, खंडणी आणि बदनामीप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

किनगाव जट्ट येथील रहिवासी तथा 'लोणार टाइम्स' वृत्तपत्राचे संपादक समाधान तुकाराम मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अमोल प्रभाकर पालकर याची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे. तो वाळू तस्करीसह विविध अवैध व्यवसायातून पैसा कमावून कोणत्याही अधिकाऱ्याला जुमानत नाही. पैशाच्या जोरावर अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव टाकत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपीने गावातील सरपंच, पत्रकार तसेच सर्वसामान्य नागरिकांना सतत त्रास देत खंडणी उकळण्याचे प्रकार चालविल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने CCTNS पोर्टलवर तक्रार केल्याच्या कारणावरून स्वतःच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल होऊ नये म्हणून पत्रकारांची व पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. व्हॉट्सॲप ग्रुपवर फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. "या चिलर वार्ताहराला कोणी घाबरत नाही" असे म्हणत सार्वजनिक ठिकाणी व सोशल मीडियावर त्यांची मानहानी करून जातीय भावनेतून कमी लेखण्याचा प्रयत्न केला.

तसेच गावातील नागरिकांकडून, गरीब व विधवा महिलांच्या घरकुलाच्या पैशांवर डल्ला मारणे आणि पत्रकारांना खंडणीसाठी वेठीस धरण्याचे गंभीर कृत्य करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही आरोपी अमोल पालकर याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी बिबी पोलीस स्टेशन येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नव्याने त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३५६(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि पत्रकार संरक्षण कायदा २०२१ च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Friday, 18 September 2026

🇮🇳 *हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात नागरी संरक्षण दलाची उल्लेखनीय कामगिरी* !!!

🇮🇳 *हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात नागरी संरक्षण दलाची उल्लेखनीय कामगिरी* !!!

नवी मुंबई, वाशी : केंद्र शासन गृह विभागाच्या वतीने हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलन दि. १४ व १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या भव्य संमेलनासाठी देशाच्या विविध शहरांतून केंद्रीय अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार व उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सुरक्षा व इतर आवश्यक कर्तव्ये चोखपणे बजावली.

दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी भारताचे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित भाई शहा यांनी दीप प्रज्वलित करुन संमेलनाचे उद्घाटन केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्यमञी, उपमुख्यमंञीसह अनेक आमदार व खासदार यांची कार्यक्रमास उपस्थिती लाभली. मा.केंद्रिय गृहमंञी महोदय यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण दलाचे उपमुख्य क्षेत्ररक्षक, विभागीय क्षेत्ररक्षक, मानसेवी अधिकारी/पदाधिकारी व स्वयंसेवकांसह एकूण ४६ जणांनी आपले कर्तव्य चोख बजावले. तसेच सहा. उपनियंत्रक श्री.आननसिंग गढरी यांचीही उपस्थिती होती.

दि. १३ सप्टेंबर रोजी ५० नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी/पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी कर्तव्य बजावत संपूर्ण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या कर्तव्याची आणि नागरी संरक्षण दलाच्या कार्याची देशाच्या विविध शहरांतून आलेल्या सुमारे ७,००० हून अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत भव्य व्यासपीठावरून प्रशंसा करण्यात आली. या कौतुकामुळे कर्तव्य बजावणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये आनंद व अभिमानाची भावना निर्माण झाली. आपल्या सेवेला मिळालेली ही पोहोचपावती असल्याची भावना स्वयंसेवकांनी व्यक्त केली.

नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी शिस्त, तत्परता, सेवाभाव आणि जबाबदारीचे उत्कृष्ट दर्शन घडवत या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

समारोपीय दिवस प्रंसगी मा.विजय जाधव, उपनियंञक, नागरी संरक्षण यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून तिन्ही दिवशी उत्कृष्ट कर्तव्य बजावल्याबद्दल सर्व नागरी संरक्षण स्वयंसेवक व पदाधिकारी यांना शाबासकीची थाप देऊन मार्गदर्शन केले.

Regards - DCCD, NMC, Thane.

वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

Thursday, 17 September 2026

समेळपाडयात अनधिकृत बांधकामांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ..

समेळपाडयात अनधिकृत बांधकामांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ..

*सदनिका घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक*

नालासोपारा प्रतिनिधी – “अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा’, असे राज्यसरकारचे आदेश असतानाही महापालिका  यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे समेळपाड्यात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत असून, त्यामध्ये सदनिका घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे.

अनधिकृत बांधकामांमुळे समेळपाडा बकाल होत आहे. अनधिकृत बांधकामांवर वेळीच उपाययोजना न केल्याने दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना ना कायद्याचे बंधन ना कुणाची भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे.
अनधिकृत बांधकामांमध्ये पार्किंगची सुविधा नसते. तसेच, रस्त्यासाठी आवश्‍यक ती मोकळी जागा सोडलेली नसते. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. अशा इमारतींन कडुन लाखो रुपये घेऊन महापालिकेकडून पाणीपुरवठा तसेच महावितरणकडून वीजेची जोडणी देण्यात येते. यावेळीही अधिकृत की अनधिकृत बांधकाम याची तपासणी संबंधित यंत्रणेकडून होताना दिसत नाही. कोणतीच यंत्रणा ही बाब गांभीर्याने पहात नसल्याने या अनधिकृत बांधकाम वाल्यांचे अधिक फावते.

अनधिकृत बांधकामे करताना नियम पायदळी, अनधिकृत बांधकामे करणाऱ्या व्यक्‍तींकडून कोणत्याच नियमांचे पालन केले जात नाही. 
आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ, अनधिकृत बांधकाम करणारी व्यक्‍ती ही बांधकाम लवकर पूर्ण करून ते विकून मोकळे होण्याच्या मार्गावर असते. त्यामुळे बांधकामाची गुणवत्ता राखली जात नाही. पर्यायाने अशा अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवावर अपघाताची टांगती तलवार कायम राहाते.
 यापूर्वी अनधिकृत बांधकामे उभारतानाच पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, इमारत पूर्ण झाल्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे थोड्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्‍तींकडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होताना दिसत आहे.

यासंदर्भात महापौर अजीव पाटील यांना निवेदन देऊन कारवाई ची मागणी करणार आहे कारवाई न झाल्यास प्रभाग समिती ई येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचे रुचिता नाईक यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन !!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन !!

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण मानव सेवा संघाच्या वतीने आदिवासी  बांधवांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी रा. जि. प. शाळा, डाऊरनगर, उरण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

उरण मानव सेवा संघ ही संस्था उरण परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, शिक्षण, आरोग्य तसेच गरजू नागरिकांना मदत करण्याचे कार्य करत आहे. समाजात वावरताना गरजू बांधवांना आवश्यक ती मदत मिळावी, या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

उरण परिसरातील नागरिकांच्या विविध सामाजिक गरजा लक्षात घेऊन भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले

‘गोंधळ’ची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड !!

‘गोंधळ’ची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड !! ** तब्बल ११ वर्षांनंतर मराठी चित्रपटाला भारताचे प्रतिनिधित्व ...