Saturday, 18 April 2026

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न !!

दैनिक बातमीदार प्रतिनिधी : ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा.श्री.विजय जाधव, उपनियंञक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली दि. ०६ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज दु. १३.०० ते सायं. १७.३० या वेळेत ना.सं. प्रशिक्षण हॉल, कल्याण कार्यालय, जि. ठाणे येथे प्राथमिक पाठ्यक्रम प्रशिक्षण वर्ग क्र. ०८/२०२६ यशस्वीरित्या पार पडला. सदर प्रशिक्षणामध्ये एकूण ४३ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.

   
    प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी श्री.अनिल गावित, सहाय्यक उपनियंत्रक यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. प्रशिक्षणार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली असून त्यांच्या ज्ञान व कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

     तसेच, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना नागरी संरक्षण कार्यासाठी शपथ देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार व नागरी संरक्षणाच्या विविध बाबींविषयी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

     सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून त्यासंबंधित छायाचित्रे वरिष्ठांना माहितीसाठी सविनय सादर करण्यात आली आहेत.

– DCCD, NMC, ठाणे

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

Friday, 17 April 2026

कासारकोळवण गावासाठी ऐतिहासिक निर्णय घेत ६. ५० कोटींच्या पुलास मंजुरी; ४० /४५ वर्षांची प्रतीक्षा संपली, ग्रामस्थांचा जल्लोष !!

कासारकोळवण गावासाठी ऐतिहासिक निर्णय घेत ६. ५०  कोटींच्या पुलास मंजुरी; ४० /४५ वर्षांची प्रतीक्षा संपली, ग्रामस्थांचा जल्लोष !!

मुंबई (शांताराम गुडेकर /मोहन कदम) :

                 चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील कासारकोळवण गावासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला असून आमदार मा.श्री. शेखरजी निकम यांच्या प्रयत्नातून तब्बल ६.५० कोटी रुपयांच्या पुलास मंजुरी मिळाली आहे. गेल्या चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेली ही गावकऱ्यांची अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर पूर्ण झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
              कासारकोळवण गावाच्या दळणवळणासाठी पूल हा अत्यंत आवश्यक होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे गावाचा संपर्क तुटत असे, ज्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक वेळा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असायचे. त्यामुळे या पुलाची मागणी मागील ४०/४५ वर्षांपासून सातत्याने होत होती.
              या पार्श्वभूमीवर आमदार शेखरजी निकम यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. त्यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा ठामपणे मांडला आणि शासनाचे लक्ष वेधून घेतले. तसेच CRF (Central Road Fund) अंतर्गत निधी मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत दिल्ली दरबारी जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या चिकाटी, नियोजनबद्ध प्रयत्न आणि लोकहिताच्या भूमिकेमुळे अखेर या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली. ही आनंदाची बातमी कळताच कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी आमदार साहेबांचे आभार मानण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मोठ्या उत्साहात सावर्डे, चिपळूण येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार साहेबांचे स्वागत करत त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सौ. मानसी करंबेळे (सरपंच), प्रकाश तोरस्कर (उपसरपंच), महेंद्र करंबेळे (पोलीस पाटील), नथुराम करंबेळे (तंटामुक्ती अध्यक्ष), राजाराम तोरस्कर (गुरुजी), सुहास मांगले (माजी ग्रामपंचायत सदस्य), उल्हास मांगले, सोन्या मांगले, बाळकृष्ण तोरस्कर, रोशन कदम, प्रशांत करंबेळे, सदानंद करंबेळे (ग्रामपंचायत सदस्य) तसेच गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ग्रामस्थांनी या प्रसंगी भावना व्यक्त करत सांगितले की, “आमच्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला आज प्रत्यक्षात उतरवण्याचे काम आमदार साहेबांनी केले आहे. हा पूल आमच्या गावाच्या विकासासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे. आता शिक्षण, आरोग्य, शेती व इतर कामांसाठी होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. ”या पुलाच्या उभारणीमुळे कासारकोळवण गावाचा सर्वांगीण विकास साधण्यास मोठी चालना मिळणार आहे. दळणवळण अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार असून भविष्यातील आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय एक मैलाचा दगड ठरणार असून ग्रामस्थांनी आमदार शेखरजी निकम यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न

गौरवपूर्ण वृद्धावस्थेकडे वाटचाल : पनवेलमध्ये ‘संगम’ कार्यक्रम संपन्न !

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे)

प्रजापिता ब्रह्माकुमारीज माऊंट आबू तर्फे तसेच समाज सेवा प्रभाग (RERF) यांच्या सहकार्याने पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे ‘संगम – गौरवपूर्ण वृद्धावस्था एवं सन्मानित जीवन’ हा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक सभेच्या उपाध्यक्ष श्रीमती माधुरी गोसावी, सचिव सुनील खेडेकर तसेच पनवेल ब्रह्माकुमारीजच्या मुख्य संचालिका राजयोगिनी बीके तारा दीदी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बीके डॉ. सचिन परब उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. सचिन परब यांचे ज्येष्ठ नागरिक सभेतर्फे व पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. सचिन परब यांनी ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत मोलाचे विचार दिले. “उबुन्टु” या संकल्पनेद्वारे “आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहणे आवश्यक आहे” हा संदेश त्यांनी प्रभावीपणे मांडला. आजच्या काळात अनेक वृद्धांना वृद्धाश्रमात राहावे लागते याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत, एकटेपणा टाळण्यासाठी एकमेकांशी संवाद साधा, भावना व्यक्त करा आणि मन मोकळे ठेवा, असे आवाहन केले.

ज्येष्ठ नागरिक सभेचे १००० हून अधिक सभासद असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन करत, त्यामुळे एकटेपणाची भावना कमी होण्यास मदत होईल असे नमूद केले. तसेच या वयात भावनिक गुंतवणूक कमी ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला, कारण त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख कमी होते.

मनात काहीही दडवून न ठेवता व्यक्त होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी “मनात गाठी तयार करू नका” हा संदेश दिला. यावेळी त्यांनी उपस्थितांना हात उंच करून मूठ घट्ट बंद करून नंतर हळूहळू सैल सोडण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले आणि मूठ सैल सोडल्यावर कसे हलके वाटते हे त्यांनी समजावून सांगितले.

विज्ञानानेही हे मान्य केले आहे की मनातील ताणतणावाचा शरीरावर परिणाम होतो, असे सांगत त्यांनी हृदयविकार आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचावासाठी सकारात्मक विचार आणि मोकळेपण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तसेच वाढत्या वयात खळखळून हसणे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. वयोमानानुसार स्मरणशक्ती घटण्याच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी नियमित राजयोग मेडिटेशन करण्याचा सल्ला दिला.

मृत्यूबद्दलचे भय कमी करण्यासाठी त्यांनी आत्म्याबद्दल मार्गदर्शन करत “आपण शरीर नसून आत्मा आहोत” हा आध्यात्मिक दृष्टिकोन स्पष्ट केला. आत्मा अमर असून एक शरीर सोडून दुसरे धारण करतो, हा आत्म्याचा प्रवास आहे, असे त्यांनी सांगितले. ध्यान (Meditation) करून घेतल्यानंतर उपस्थितांनी शांत, हलके आणि आनंदी वाटल्याची भावना व्यक्त केली.

यानंतर राजयोगिनी बीके तारा दीदी यांनी एकटेपणा दूर करण्यासाठी परमपिता परमात्म्याशी नाते जोडण्याचे महत्त्व सांगितले. त्याच्याशी विविध नात्यांनी जोडल्यास जीवनात खरे सुख, शांती आणि आनंद मिळतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच राजयोग मेडिटेशन कोर्स करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजयोगिनी बीके शकुंतला दीदी यांनी सुरेखरीत्या केले. शेवटी उपाध्यक्ष माधुरी गोसावी व सचिव सुनील खेडेकर यांनी प्रमुख पाहुणे व आयोजकांचे आभार मानले.

पनवेल ब्रह्माकुमारीजतर्फे सर्व ज्येष्ठ नागरिकांचा टिळा लावून सन्मान करण्यात आला तसेच ‘ब्लेसिंग कार्ड’ देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना चहा व बिस्किटे देण्यात आली.

हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ सन्मानाचा नव्हे, तर मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करणारा ठरला. उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण करून आनंदी, निरोगी आणि सन्मानित जीवन जगण्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला

Thursday, 16 April 2026

न्यायहक्काच्या कामगार धोरणासाठी भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा !!

न्यायहक्काच्या कामगार धोरणासाठी भारतीय मजदूर संघाचा कामगार आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा !!

** कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करण्याची मागणी.

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) :
वीज, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला, युवा उद्योग अशा विविध धोरणाप्रमाणे मागील अनेक वर्षांपासून आपल्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील कष्टकरी, श्रमिक कामगारांचे देखील धोरण तयार करून, कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त सेवेसाठी हरियाणा पॅटर्न लागू करण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने आपल्या विविध उद्योगातील कामगारांचा आज मुंबईतील वांद्रे स्थित कामगार आयुक्त कार्यालयावर हजारोंच्या संख्येने धडक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता, या भव्यदिव्य अशा मोर्चामध्ये घरेलू, बांधकाम, वीज, अंगणवाडी, आशा वर्कर, रिक्षा टॅक्सी चालक, फेरीवाले, विडी कामगार, जलसेवा, गरपालिका, सहकारी बँका, राष्ट्रीय बैंक, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे, संरक्षण, माथाडी, एसटी महामंडळ, रुग्णालय, टोल आदी आस्थापनातून सुमारे १०,००० कामगार सहभागी झाले होते, कामगार संघटनांच्या या मागण्यांबर तातडीने विचार करू आणि सर्व उद्योगाशी संबंधित मंत्र्यांच्या बैठका मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊन कामगारांचे हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन कामगारमंत्री  आकाश फुंडकर यांनी दिले शिष्ट मंडळाला दिले.

मागील अनेक वर्षांपासून राज्यातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या न्यायहक्कांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, ईएसआय रुग्णालय सेवा, विमा संरक्षण, बोनस आणि उपदान असे अनेक प्रश्न कायम प्रलंबित असून कामगाराची विविध आस्थापनातील मालकांकडून कायम पिळवणूक झालेली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच कामगार आयुक्तालयावर या आक्रोश मोर्चाचे आयोजण केले गेले होते. या मोर्चाचे नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री  सुरेंद्र पांडे, प्रदेश अध्यक्ष ऍड.अनिल ढुमणे आणि सरचिटणीस किरण मिलगीर, क्षेत्र संघटक सी व्ही राजेश, बाळासाहेब भुजबळ, हरी चव्हाण यांनी केले.

याप्रसंगी परेलू अशा विविध कामगार संघटनांच्या  सुरेंद्र पांडे, ऍड अनिल ढुमणे, किरण मिलगीर, सी व्ही राजेश बाळासाहेब भुजबळ, अरुण पिवळ, संदीप कदम, हरी चव्हाण, बाळासाहेब कांबळे, अनिता चव्हाण, ज्योती तावरे, निलेश खरात, सचिन मेंगाळे, अनिल पारधी, सागर पवार, संजन वाडकर, राजेश सिंघ, संजय कांबळे आदींच्या शिष्ट मंडळाने कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांची ३२ निवेदन देण्यात आली. या प्रसंगी कामगार आयुक्त हनुमंत तुम्मोड आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या मागण्यांमध्ये महाराष्ट्रात कामगारांचे धोरण तयार करावे, कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करावा, प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य रुग्णालय सुरु करावे, बांधकाम कामगार मंडळातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, आशा आणि अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, राज्यातील ईपीएस ९५ पेन्शन धारकांना राज्य सरकाने दरमहा ३००० रुपये द्यावेत, घरेलू मंडळाच्या योजना सुरु कराव्यात, फेरीवाल्यांचे व्यवसाय पुन्हा सुरु करू द्यावे, बँकांना ५ दिवसाचा आठवडा करावा आदी मागण्याचा समावेश होता.

या मोर्चाला संबोधित करताना महामंत्री  सुरेंद्रजी पांडे यांनी राज्य सरकारने कामगारांच्या प्रश्नावर संवेदनशील राहणे आवश्यक असून अनेक राज्यात सरकारच्या असंवेदनशीलतेमुळेच कामगारांचा असंतोष उफाळून आला आहे, तशी स्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये याची सरकारने काळजी घेऊन लेबर कोड कायद्याचा प्रत्यक्ष लाभ कामगारांना मिळण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. तर मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष ऍड अनिल ढुमणे यांनी राज्यातील कामगारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही सरकार कायम दुर्लक्ष करत असल्याने या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे, म्हणूनच सरकारने वेळीच लक्ष घालून कामगारांवरील अन्याय दूर करावा असे आवाहन केले. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. या प्रसंगी विविध संघटनाच्या ३८ प्रतिनिधींची भाषणे झाली

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !!

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान !!

श्री प्रवीण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलनाचे वतीने श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चे वतीने चांदवड नाशिक येथे प्रवीण काकडे संस्थापक अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रवीण काकडे हे शैक्षणिक चळवळीला महत्त्व देण्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आता पर्यंत ५००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप डोंगर द-या खोऱ्यातील जंगलातील दुर्गम भागातील महिलांना साडी वाटप, सॅनिटरी पॅड वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा  आहे. महाराष्ट्रातील काही दुर्गम भागातील विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील दुर्गम भागात सक्रिय काम केले आहे. आपली नोकरी करत करत काम करत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रि शताब्दी जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करुन महिलांचा यथोचित सन्मान केला त्यामध्ये कराडला १४५ पुणे ९० मुंबई मध्ये १४२ व एकाच वेळी २४५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक चळवळीला महत्त्व देण्यासाठी कराड येथे शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मा श्रीमंत अमरजीत राजे जाहीगरदार तळोदा संस्थान नंदुरबार अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ चे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर खासदार रामराव वडकुते आमदार गोपीचंद पडळकर आमदार राहुल आहेर डॉ अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन श्री सदगुरु सहकारी साखर कारखाना चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर ‌, श्री विजयराव हाके, डॉ नरेंद्र बागुल, प्राचार्य मधुकर सलगरे लातूर,  श्री दिपक राहीज युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संपतराव शेंडगे, प्रा शितल काकडे, हेडाम कादंबरी चे नागु वीरकर, शेखर कुंवर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष  बन्सीलाल भागवत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष फादर बॉडी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रा बाळासाहेब माने येवला, भास्करराव जाधव, राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रा गणेश हजारे, बापुसाहेब शिंदे शिवाजीराव ढेपले, संभाजी राव सुळ, सचिन सागोरे, जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

भिमप्रेरणा सामाजिक संस्था यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पाणी व लाडू वाटप कार्यक्रम संपन्न !!

भिमप्रेरणा सामाजिक संस्था यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पाणी व लाडू वाटप कार्यक्रम संपन्न !!

घाटकोपर, (केतन भोज) : भिमप्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विक्रोळी पार्कसाईट याठिकाणी पाणी व लाडू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक योगेश शिंदे यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमाला एसीपी प्राची विनायक कर्णे तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करत पुढे देखील तुम्ही असे चांगले उपक्रम राबवत राहा असे संस्थेचे पाधिकारी यांना मार्गदर्शन करत,संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
        यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुगत साळवे,महादेव ढीवरे,प्रमोद कांबळे, रोहित सावंत, महेंद्र दानाने, सुभाष कांबळे, सिद्धेश घोरपडे, सुनिल कांबळे, सुनिल मोहिते, तेजस दळवी, सुमित गमरे आदि संस्थेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 15 April 2026

AIMIM च्या नगरसेविका समर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात !!

AIMIM च्या नगरसेविका समर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात !!

ठाणे महापालिका निवडणुकीत ‘कैसा हराया’ म्हणत चर्चेत आलेल्या एआयएमआयएम (AIMIM) च्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा अहवाल ठाणे तहसीलदारांनी दिला आहे.

ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालात सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे समोर आले असून, या निष्कर्षामुळे त्यांचे नगरसेविका पद धोक्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

या प्रकरणाची सुरुवात अहमद सिद्दीकी यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली होती. सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर त्यांनी आक्षेप घेतला होता. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली आणि तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालात या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याची नोंद आहे. त्यामुळे दुसऱ्या राज्यातील रहिवासी असताना महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेतल्याचा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पुढील तपासानंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सहर शेख या अपात्र ठरून त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता आहे.

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या संपन्न !! दैनिक बातमीदार प्रतिनिधी : ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठा...