Tuesday, 28 July 2026

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

            कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या (केडीएमटी) डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील बाजीप्रभू चौक मधील मुख्य बस स्थानक हे गैरसोय, असुविधा मुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. येथून एमआयडीसी निवासी, कल्याण आणि डोंबिवली ग्रामीण परिसरात जाणाऱ्या बसेस सुटतात. पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्री उशिरा पर्यंत येथून बसची येजा चालू असते. हजारो प्रवासी येथून ये जा करीत असतात. केडीएमटीचा दृष्टीने सर्वात गर्दीचा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे एमआयडीसी निवासी हा होय. निवासी येथे जाण्यासाठी या बाजीप्रभू चौकातील स्थानकात एक बस थांबा उभा केला आहे. परंतु हा बस थांबा प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीने, असुविधेने असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. याच निवासी थांब्यावर सकाळ, सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते तरी केडीएमटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी, सुविधा देण्यात चालढकल/निष्काळजीपणा होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे तेथे केडीएमटी वाहतूक नियंत्रक यांची केबिन आहे, त्यातील कर्मचारी हा प्रवाशांना होणारा त्रास मुकाटपणे बघत असतात.
१) सद्या पावसाळा सुरू आहे, पाऊस पडल्यावर बस थांब्यासमोर पाणी साचते. थांब्यावर बस उभी राहिल्यावर प्रवासी त्या पाण्यातूनच बस मध्ये चढत असतात. २) केडीएमटी बस स्थानकाच्या जवळ रिक्षावाले, फेरीवाले, टपरीवाले यांच्या गराडा असतो. जर बस वेळेवर आल्या नाहीत तर रिक्षावाले बिनधास्तपणे थांब्याजवळ उभे राहून प्रवासी घेत असतात. ३) निवासी बस थांबा छोटा असल्याने प्रवाशांची गर्दी झाली किंवा रांग वाढली तर प्रवाशांना बस थांब्याबाहेर भर पावसात, उन्हात उभे राहावे लागते. ४) महिला , पुरुष प्रवाशांसाठी येथे जवळच प्रसाधन /स्वच्छता गृह याची व्यवस्था नाही आहे. ५) जर जोरात पाऊस आला तर बस थांब्यापुढे शेड/पत्रा नसल्याने पावसाच्या सरी अंगावर येऊन भिजायला होते.

       उपरोक्त बाबतीत प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. आता प्रवाशांना याविषयी आंदोलन करावे लागेल असे दिसते असे डोंबिवलीतील समाजसेवक राजू नलावडे यांनी सांगितले.

       एमआयडीसी निवासी मधील रहिवाशांनी यावर दिलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :-

१. अनेकदा रिक्षा किंवा इतर बस मधे असल्याने निवासी बस स्टॉपच्या मागे किंवा पुढे थांबते व रांग मोडून सर्व प्रवासी चढायला चेंगराचेंगरी करतात. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना फार त्रास होतो.
2. बस स्टॉप वर लाईन सुरु होण्याच्या जागेच्या आधी अनेक घुसखोर प्रवासी घोळक्याने उभे रहातात व बसमध्ये घुसतात. लाईनीत उभे असणारे मागे रहातात.
3. बस स्टॉपच्या शेजारी अतिक्रमित चायनीज टपरी च्या अती उग्र वासाने प्रवासी हैराण होतात.
4. ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी राखीव आसने दर्शवण्यासाठी असलेल्या पट्ट्या अनेक बसमध्ये गायब झाल्या आहेत. 
5. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी (समुहात नसलेल्या) वेगळे तिकीट न देता एकाच नागरीकाच्या हातात अनेक जणांसाठीचे तिकीट दिले जाते. 

👆 मुकुंद साबळे ( व्यवसाय सीए, वय 65 वर्षे )

बाजीप्रभू चौक निवासी बस स्टॉप च्या बाजूलाच पान टपरी आहे आणि त्यामुळे तिथे अनेक लोक सिगारेट ओढत असतात त्यामुळे तिथे तो धूर होतो आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो एवढी सगळ्या वयाची लोकांची तिथे गर्दी असते त्या गर्दीच्या ठिकाणी सिगारेटचा धूर नसावा. तसेच त्या चायनीजच्या दुकानातून देखील वास येतो त्यामुळे त्या बसस्टॉप वर थांबणे असहाय्य होते. तसेच पावसामुळे तिथे खूप पाणी साचते ज्यामुळे तिकडे उभे सुधा राहता येत नाही. तसेच त्या बसस्टॉप वर बसचे एक वेळापत्रक असावे. बऱ्याच वेळा गाडी अर्धा अर्धा तास येत नाही ते का होते ते ही बघावे व अस होऊ नये ह्याचीही दक्षता घेण्यात यावी.

👆 मीनाक्षी नेरकर, गृहिणी, वय 74 वर्षे 

केडीएमटीची बस सर्विस खूपच अनियमित झाली आहे. तासभर बस येत नाही.
बाजी प्रभू चौकात निवासी विभाग बस स्टॉप वर खूप पाणी साचलेले असते. त्या पाण्यातून बस मधे चढावे लागते. 

👆 राजीव देशपांडे, निवृत्त, वय 70 वर्षे

   मला नोकरीसाठी रोजच प्रभादेवी, मुंबई येथे रेल्वेने जावे लागते. त्यासाठी प्रथम मला सकाळी 6.20 वाजताची बस निवासी बस थांबा येथून आणि सायंकाळी/रात्री बाजीप्रभू चौक थांबा येथून केडीएमटी बस पकडावी लागते. सकाळची 6.20 आणि 6.25 वाजताची बस कधीच वेळेवर येत नाही. अनियमित बस सेवेमुळे अनेक वेळा मला रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागतो. सद्या असलेल्या बस या देखभाल दुरुस्ती व्यवस्थित न ठेवता तशाच पाठविल्या जात आहेत. प्रशासनाने सुस्थितीतील बस पाठवाव्यात जेणेकरून प्रवाशांना आणि चालक, वाहक यांना त्रास होणार नाही. वातानुकूलित बस सेवा का बंद केल्या हे समजत नाही, त्या पुन्हा चालू कराव्यात ही विनंती. जर बस सेवेत सुधारणा झाली नाही तर आम्हा Gen z तरुणांना यासाठी उग्र आंदोलन करावे लागेल.
 
👆 निहाल आंबेरकर, पदवीधर नोकरदार, वय 30 वर्षे

*'नेत्रदान, अवयवदानाविषयीची अनास्था चिंताजनक' ; लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांचे प्रतिपादन !!

*'नेत्रदान, अवयवदानाविषयीची अनास्था चिंताजनक' ; लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांचे प्रतिपादन !!

*नवी मुंबई, प्रतिनिधी*

लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांनी नेत्रदान आणि अवयवदानाविषयी समाजात असणारी अनास्था चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. 

वांगणी येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्रात दृष्टीहीनांसाठी घरत यांच्या 34 व्या 'लेकुरे उदंड झाली' आणि 35 व्या 'प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा' या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन 27 जुलै रोजी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

*श्रीलंकेचे उदाहरण*  
घरत म्हणाले, "श्रीलंका हा देश भारताच्या एखाद्या राज्याइतकाच आहे. परंतु तेथे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारतात मरणोत्तर नेत्रदान करणारे केवळ 10 ते 12 टक्के आहेत. देहदानाची परिस्थितीही अशीच आहे."

"मौल्यवान डोळे, यकृत आणि इतर मानवी अवयव मृत्यूनंतर त्या देहासोबतच जाळून टाकून राख करण्याऐवजी ते अवयवदान म्हणून दिल्यास कित्येकांना नवजीवन मिळू शकते," असेही त्यांनी सांगितले.

*पुस्तक प्रकाशन*  
'लेकुरे उदंड झाली' या पुस्तकाचे प्रकाशन विद्यानिकेतन संगीत विद्यालयाच्या संचालिका सुरेखा थिगळे यांच्या हस्ते झाले. त्या म्हणाल्या, "दृष्टीहीनांच्या संगीत साधनेबद्दल आपण जाणतो. डोळ्यांच्या उणीवेच्या बदल्यात नियतीने त्यांना अतिरिकीत इंद्रिय दिले असावे इतके तन्मयतेने ते संगीत सादर करतात. आपले अवयव शाबूत असल्याने आपण मोठ्या आरोग्यसंपदेचे धनी आहोत."

'प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा' या पुस्तकाचे प्रकाशन घरत यांचे महाविद्यालयीन सहकारी प्रा. एकनाथ जाधव यांच्या हस्ते झाले. जाधव म्हणाले, "आपल्यावर समाजाचे कर्ज आहे. त्याची फेड करताना घरत यांना पाहून समाधान वाटते. असाच ज्ञानप्रकाश सर्वत्र पसरावा."

*उपस्थिती*  
या कार्यक्रमाला डॉ. श्रद्धा सोमण, अध्यापिका विभावरी तरटे, शुभदा बोराडे आणि देशमुख पर्यटन केंद्राचे प्रमुख दिलीप देशमुख उपस्थित होते. देशमुख यांनी घरत यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या 38 वर्षांच्या सेवेला नागरिकांचा सलाम !!

डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या 38 वर्षांच्या सेवेला नागरिकांचा सलाम !!

*डोंबिवली, प्रतिनिधी* : डोंबिवली शहरात गेल्या 38 वर्षांपासून अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची 38 वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या निरंतर सेवेबद्दल नागरिकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

*सेवाभावी वृत्तीचे कौतुक*  
या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक श्री. प्रकाश माने यांनी डॉ. ढाके यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना श्री. प्रकाश माने म्हणाले, _"वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. प्रदीप ढाके. गेल्या 38 वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांना योग्य उपचार आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करून समाजात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे."_

*रुग्ण आणि सहकाऱ्यांसह साजरा केला गौरव*  
कार्यक्रमात डॉ. ढाके यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना डोंबिवली विधानसभा समन्वयक तथा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह श्री. विजय देशमुख, शिवसेना डोंबिवली शहर उपसंघटक सौ. प्रतीक्षा प्रकाश माने, टिळक नगर येथील हरी मुकुंद सोसायटीचे पदाधिकारी श्री. महाजन, श्री. महापदी, ज्येष्ठ समाजसेविका सौ. मालती ताई साटम, एकरूप सहकार मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे डॉ. ढाके यांच्या सेवेला साथ देणाऱ्या स्टाफमधील श्री. रघुनाथ कांबळे, सौ. प्रियांका गायकर, सौ. मनीषा गरुड, सौ. सोनल पिस्ते, दर्शन सोनावणे, नागेश पवार, पूनम जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. प्रदीप ढाके आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अशीच निरंतर समाजसेवा करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

*एक तास बस न आल्याने प्रवाशांचा संताप; डेपोत जाणाऱ्या बसवरून वाद, प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात !

*एक तास बस न आल्याने प्रवाशांचा संताप; डेपोत जाणाऱ्या बसवरून वाद, प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात !

*डोंबिवली, प्रतिनिधी 

डोंबिवली एमआयडीसी निवासी ते डोंबिवली रेल्वे स्थानक या केडीएमटी बससेवेत वारंवार गोंधळ होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यातूनच सोमवारी दुपारी वाद होऊन प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले.

*काय घडले?*  
निवासीतील एमएसईबी ऑफीस बसस्टॉपवर सागर पाटील हे दुपारी 2 वाजल्यापासून डोंबिवलीला जाण्यासाठी वाट पाहत होते. एक तास उलटूनही बस न आल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यात विनाफलक असलेल्या दोन बसेस डेपोत जात असल्याचे सांगून आल्या. 

त्यातील एका बसमध्ये सर्व प्रवासी चढले असता वाहकाने "ही बस कल्याण डेपोत जाते, डोंबिवलीला जाणाऱ्यांनी उतरा" असे सांगितले. इतर ज्येष्ठ नागरिक उतरले, मात्र उशीर झाल्याने सागर पाटील यांनी ही बस आधी डोंबिवलीला घेऊन जावी अशी विनंती केली. यावरून वाहकाशी वाद झाला. वाहकाने उर्मटपणे बोलून बस मानपाडा पोलीस ठाण्यात नेली आणि सरकारी कामात अडथळा केल्याचा आरोप केला. 

पोलिसांनी चौकशीअंती तक्रार तथ्यहीन असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही तरुणाची बाजू घेतली.

*प्रवाशांच्या तक्रारी*  
केडीएमटीच्या वेळापत्रकानुसार दुपारी 2 ते 3 या वेळेत किमान 3 बसेस यायला हव्या होत्या, पण एकही आली नाही. बसेस वारंवार बिघडतात आणि फेऱ्या रद्द होतात. डेपोत जाणाऱ्या बसेसवर फलक नसल्याने गोंधळ वाढतो. याचा फायदा रिक्षाचालक घेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

*प्रशासनाला इशारा*  
डोंबिवली एमआयडीसी निवासी हा केडीएमटीचा सर्वात फायदेशीर मार्ग आहे. वेळेत सुधारणा न झाल्यास प्रवाशांचा संताप अनावर होईल आणि तरुण वर्ग आंदोलनाच्या मार्गाने जाईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

एक तास केडीएमटी बस न आल्याने व त्यानंतर आलेली बस ही डेपोत जात असल्याने तरुणाचा संताप ! प्रकरण पोलीस ठाण्यात !

एक तास केडीएमटी बस न आल्याने व त्यानंतर आलेली बस ही डेपोत जात असल्याने तरुणाचा संताप ! प्रकरण पोलीस ठाण्यात !!

महानगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर...

          डोंबिवली एमआयडीसी निवासी ते डोंबिवली रेल्वे स्थानक अशी बस सेवा कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) तर्फे चालविण्यात येते. मागील मार्च महिन्यापासून सर्वच मार्गावरील नवीन घेतलेल्या वातानुकूलित बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वच मार्गावर जुन्या बीना वातानुकूलित (नॉनएसी) बसेस चालविण्यात येत होत्या. त्या बसेस मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने त्या वाटेत बंद पडत असल्याने या निवासी व इतर मार्गावरील काही बसेस फेऱ्या रद्द करण्यात येतात. यामुळे प्रवासी जाम वैतागले गेले आहेत. यामुळे त्याचीच परिणीती काल सोमवारी दुपारी घडली.

             निवासी भागात राहणारे  सागर पाटील हे आपल्या नोकरी व्यवसाय करीता जाण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता निवासी मधील एमएसईबी ऑफीस बस स्टॉपवर आले, त्यांना डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे जायचे असल्याने केडीएमटी बसची वाट बघत बसले परंतु तासभर थांबून तीन वाजले तरी एकही बस आली नाही, त्यात जोराचा पाऊस पडत होता त्यामुळे ते आणि बसस्टॉपवर उभे असलेले इतर ज्येष्ठ पुरुष/महिला संतापले होते. तेवढ्यात तेथे एक केडीएमटीची विनाफलक लावलेली बस आली पण त्यातील चालक वाहक यांनी सदर बस ही डेपोत जात असल्याचे सांगितले त्यामुळे ते सर्वजण या बस मध्ये चढले नाहीत. अजून थोड्यावेळाने विनाफलक लावलेली एक बस आली असता त्यात या स्टॉपवरील सर्वजण त्यात चढले असता त्यातील वाहकाने सांगितले की ही बस कल्याण डेपोत जात आहे तेव्हा त्या मार्गावरील प्रवासी बसा, बाकी सगळे खाली उतारा. परंतु येथील स्टॉपवरील सर्व प्रवाशांना डोंबिवली कडेच जायचे होते. त्यामुळे गुपचूपपणे ज्येष्ठ पुरुष, महिला प्रवासी या बस मधून उतरले पण तरुण असलेले सागर पाटील याना कामावर तातडीने जायचे असल्याने व आधीच उशीर होवून तासभर स्टॉपवर थांबल्याने ते संतापले होते. त्यांनी शांतपणे बसमधून उतरण्यास नकार दिला व ही बस डोंबिवलीकडे नेहून नंतर ती डेपोत घेऊन जावी असा सल्ला दिला. त्याला कारणही असे होते की तासभर बस न आल्याने पुढील प्रत्येक बस स्टॉपवर डोंबिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती. परंतु सदर बसचा वाहक उर्मटपणे वागून बस डोंबिवलीकडे जाणारच नाही असे सांगू लागला. शिवाय उर्मटपणे बोलला की तुम्ही मुख्यमंत्री, आयुक्त, परिवहन व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली तरी आमचे कोणीकाही वाकडे करू शकणार नाही. यानंतर सागर पाटील याने विनंतीने, नम्रपणे सांगूनही या बसच्या वाहक, चालकाने डोंबिवली स्थानकाकडे बस नेण्यास नकार दिला. सदर बस वाहकाने चालकास सांगून ही बस मानपाडा पोलिस ठाण्याकडे घेऊन त्या तरुणाला धमकावले की सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिस ठाण्यात तुझाविरुद्ध गुन्हा दाखल करतो. खरे तर सागर पाटील या तरुणाने कोणतीही शिविगाळ आणि मारहाण केलेली नसतानाही पोलिसांना या वाहकाने गुन्हा दाखल करण्यास सांगितले असता पोलिसांनी सागर पाटील याच्याशी बोलून सदर तक्रार तथ्यहीन असल्याने तक्रार घेण्यास नकार दिला. शिवाय त्यावेळी पोलिस ठाण्यात आलेल्या काही राजकीय पदाधिकारी इत्यादींनी या सागर पाटील तरुणाची बाजू घेतली. त्यामुळे शेवटी या वाहकाने तेथून काढता पाय घेतला. सदर या बसचा रोजनामा (फेरीपत्रक) हे सागर पाटील याने पाहून त्याचा फोटो घेतला असता त्यात असे पाहण्यास आले की या बस मध्ये सकाळी ११.५५ वाजता बसच्या पुढील डावीकडील टायरच्या बेअरिंग मध्ये आवाज येत होता व तो दुरुस्त करण्यात आला होता, शिवाय ही बस क्रमांक :- ५१ डोंबिवली कासा रिओ (मेन गेट निळजे मार्गे) आणि डोंबिवली - निवासी अशा फेऱ्या मारणारी होती. या बसचा क्रमांक ११५५ आणि वाहकाचा/कंडक्टरचा क्रमांक ७१११ असा होता. हे सर्व फेरीपत्रक मधून समजले आहे. या सर्व प्रकाराने या तरुणाचे आणि सदर बस वाहक, चालकाचे दोन तास वाया गेले. याच वेळेत पंधरा मिनिटांवर असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकवर अनेक बस फेऱ्या झाल्या असत्या. विशेष म्हणजे या डेपोत जाणाऱ्या दोन्ही बसेसवर बस कुठे जात आहे याचा कोणताही फलक लावला नव्हता. त्यामुळे प्रवाशांच्या आणखी गोंधळ उडाला.

केडीएमटीच्या अधिकृत बस वेळापत्रकाप्रमाणे दुपारी दोन ते तीन दरम्यान कमीतकमी तीन बस (१४.१०, १४.२०, १४.४५)  या एमएसईबी ऑफीस बसस्टॉपवर यायला पाहिजे होत्या पण त्या दरम्यान एकही बस आली नाही. या सर्व गोंधळाला केडीएमटी प्रशासन जबाबदार असून रोजच दिवसभर असाच प्रकाराचा गोंधळ तसेच बसेस वेळेवर न येण्याच्या प्रकार चालू असतो. यामुळे याच्या फायदा रिक्षावाले उचलीत असून केडीएमटी प्रशासनाशी रिक्षावाल्यांचे साटेलोटे होत असल्याचे आरोप बस प्रवासी करीत आहेत. एकंदर प्रवाशांना वेळ नसल्यामुळे व पोलिस स्टेशनला जाण्याची भीती असल्यामुळे कोणी प्रवासी या अन्यायाविरुद्ध समोर येत नाही याचा गैरफायदा हे केडीएमटी बसवाले घेत असल्याचे दिसत आहेत.

डोंबिवली एमआयडीसी निवासी हा मार्ग केडीएमटीचा सर्वात फायदेशीर मार्ग असून रोज या मार्गावरून हजारो प्रवासी जात येत असतात. केडीएमटी प्रशासनाने या मार्गावरील बस सेवेत वेळीच सुधारणा न केल्यास येथील प्रवाशांचा संताप अनावर होऊन त्याची मोठी किंमत प्रशासनाला कधीतरी मोजावी लागणार आहे. त्यात सागर पाटील सारखे तरुण वर्ग एकटवले तर हे तरुण जेन झी (Gen z) संतापून उठून आंदोलनाच्या मार्ग अवलंबतील तर प्रशासनाची मोठी गोची होईल. प्रशासनाने यात वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

Monday, 27 July 2026

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!

        डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उत्सव, कला , सेवा आणि पर्यावरणीय कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या शिवप्रतिमा मित्र मंडळातर्फे निवासी भागात 50 बकुळ फुलांची झाडे लावली गेली आहेत. वृक्षारोपण केलेली ही झाडे आठ फूट उंचीची असल्याने लवकरच त्या झाडांवर फुले बहरणार असून एमआयडीसी निवासी परिसर त्याच्या सुगंधाने आणि सुहासिक वासाने प्रदूषण मुक्त होणार आहे. सदर ही झाडे आणि त्याना लागणारे खत हे केडीएमसी तर्फे मोफत देण्यात आले होते. 

विशेष म्हणजे आज रविवारी 26 जुलै रोजी झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त श्री अभिनव गोयल, मुख्य उद्यान अधीक्षक श्री संजय जाधव, नगरसेवक महेश पाटील, नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे, शिवसेना (उबाठा) कल्याण जिल्हा अध्यक्ष अभिजित सावंत, योगेश म्हात्रे हे जातीने उपस्थित होते. माननीय आयुक्त आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी आयुक्तांनी आपले विचार मांडतांना असे सांगितले की कल्याण डोंबिवली महापालिका तर्फे यावर्षी दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यामध्ये सामाजिक संस्था, मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, गृहनिर्माण संस्था, नगरसेवक इत्यादींनी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी महापालिका सर्व सहकार्य करेल.

            एमआयडीसी निवासी मध्ये या पावसाळ्यात काही कारणांमुळे अनेक झाडे कोसळली होती. यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक होते. सदर ही 50 मोठ्या उंचीची बकुळ फुलांची झाडे लावल्यामुळे एमआयडीसी मधील प्रदूषण भविष्यात काही अंशी कमी होईल तसेच या नगरीच्या सौंदर्यात वाढ होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारची झाडे लावण्याच्या संकल्प शिवप्रतिमा मित्र मंडळाने केला आहे. 

           शिवप्रतिमा मित्र मंडळाच्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री दिलीप साळवी, सचिव श्री जयसिंग आयरे, श्री विजय कुलकर्णी, राजू नलावडे, मंदार स्वर्गे, रामदास मेंगडे, मनोहर पाटील, निहाल आंबेरकर, सौ. रजनी कुचे इत्यादींनी परिश्रम घेतले होते.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ६६ झाडांचे वृक्षारोपण !

मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ६६ झाडांचे वृक्षारोपण !

डोंबिवली, प्रतिनिधी : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेतर्फे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आज 27 जुलै वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांना ६६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज सकाळी एमआयडीसी निवासी भागात एकूण ६६ देशी झाडे लावण्यात आली आहेत. यात जांभूळ, वड, पिंपळ, कडुनिंब, बकुळ इत्यादी प्रकाराच्या झाडांचा समावेश आहे. 

              डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये प्रदूषणाची समस्या मोठी आहे. शिवाय येथे नवीन गटारे/नाले आणि काँक्रिट रस्ते बनविताना झाडाच्या खोडांना/बुंध्याला धक्के बसल्याने तसेच काँक्रीटीकरणामुळे झाडांना पाणी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात झाडे पडली होती. यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक होते. सदर ही ६६ देशी झाडे लावल्यामुळे एमआयडीसी मधील प्रदूषण भविष्यात कमी होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारची देशी झाडे लावण्याचे उद्दिष्ट एमआयडीसी शिवसेना शाखेने ठरविले आहे.

        नुकत्याच झालेल्या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते, आमदार श्री आदित्यजी ठाकरे यानी डोंबिवली एमआयडीसी मधील धोकादायक रासायनिक उद्योगांचे स्थलांतर करण्याविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा मा. उद्योग मंत्री श्री उदय सामंत यानी उत्तर देऊन धोकादायक रासायनिक स्थलांतरित करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भविष्यात डोंबिवली प्रदूषण मुक्त होणार आहे.

              सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हा प्रमुख श्री अभिजीत सावंत, उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, महिला विभाग संघटक सौ रजनी कुचे, शाखा संघटक सौ विनिता सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप साळवी, राजू नलावडे, जयसिंग आयरे, विजय कुलकर्णी, रामदास मेंगडे, मनोहर पाटील, रमेश गुरव, भरत सावंत इत्यादी उपस्थित होते.

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डों...