Monday, 31 August 2026

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन !

*दुःखद निधन*

*अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन*

*अमरावती, दि. 30 ऑगस्ट 2026*

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे वयाच्या 92 व्या वर्षी रविवार, दि. 30 ऑगस्ट 2026 रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने गिरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व गिरी परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

*शोकाकुल - गिरी परिवार, अमरावती*

Sunday, 30 August 2026

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10/ई प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट; सहा महिने तक्रार करूनही कारवाई नाही !!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10/ई प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट; सहा महिने तक्रार करूनही कारवाई नाही !!

*डोंबिवली, प्रतिनिधी :* कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 10/ई प्रभागातील अनधिकृत बांधकामे आणि विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करत नसल्याने आज दिनांक ३१ ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

*प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?*
मनोज गिरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10/ई प्रभागात सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथावर अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका विभागाकडे लेखी तक्रारी आणि पाठपुरावा करूनही पारदर्शक कारवाई झालेली नाही.

*मनोज गिरी यांच्या प्रमुख मागण्या :*
1. तक्रारीत नमूद केलेल्या सर्व ठिकाणांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करावा.
2. अनधिकृत बांधकामांच्या मंजूर नकाशे आणि परवानग्यांची तपासणी करावी.
3. विनापरवाना फेरीवाल्यांवर नियमानुसार कारवाई करून सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवावे.
4. गेल्या सहा महिन्यात केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल (Action Taken Report) द्यावा.
5. वेळेत कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी.

*वॉर्ड ऑफिसरने तक्रारीची नोंदही घेतली नाही - आरोप*
उपोषणाचा अर्ज केल्यानंतर 10/ई प्रभागातून तीन वेळा "उपोषण थांबवून सहकार्य करावे" असे पत्र आले. मात्र, चौथ्यांदा विनंती केली असता वॉर्ड ऑफिसरने तक्रारीची साधी नोंदही घेतली नसल्याचा आरोप गिरी यांनी केला आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कार्यालयात थांबूनही सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे हे सकाळी 11.30 वाजता येऊन गाडीतून न उतरताच निघून गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने कठोर व निष्पक्ष कारवाई करून लेखी अहवाल द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राखून ठेवल्याचे गिरी यांनी म्हटले आहे. 

*रेती वाहतुकीसाठी 6 लाखांची खंडणी मागितली; किनगाव जट्टू येथे गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल !

*रेती वाहतुकीसाठी 6 लाखांची खंडणी मागितली; किनगाव जट्टू येथे गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल !

*मेहकर (बुलडाणा) प्रतिनिधी :* शासनमान्य रेती घाटातून रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला अडवून 6 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील एका गावगुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*काय घडले?*
फिर्यादी दुर्गेश दिलीप अवचार (वय 25, रा. कळमेश्वर, ता. मेहकर) हे देवी तुळजाई रियल इस्टेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीने खापरखेड लाड शिवारात पुर्णा नदी पात्रातील शासकीय रेती घाट घेतला असून, तेथे नियमानुसार रॉयल्टीने रेती विक्री सुरू आहे. दुर्गेश हे रॉयल्टी पावती देण्याचे काम करतात.

दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रेती वाहतूक सुरू होती. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास चालक अक्षय म्हस्के (रा. भुमराळा) हा MH 28 BB 9789 या टिप्परमधून दोन ब्रास रेती घेऊन मेहकरकडे जात असताना, किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रोडवरील नदी पुलाजवळ आरोपी अमोल प्रभाकर पालकर (रा. किनगाव जट्टू) याने टिप्पर अडवला.

*धमकी आणि शिवीगाळ*
आरोपीने फिर्यादीला घटनास्थळी बोलावून, "तुमचे रेती स्टॉक उचलणे चालू आहे, त्यासाठी मला तुमच्या मालकाकडून सहा लाख रुपये पाहिजे, तरच मी येथून वाहने जाऊ देणार" अशी धमकी दिली. फिर्यादीने वाहने अडवू नको, मालकाशी बोल असे सांगताच आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारे वाहने अडवून पैशाची मागणी करत असून त्याच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे फिर्यादीने सांगितले.

या प्रकरणी आरोपी अमोल पालकर विरुद्ध कायमी अपराध क्रमांक / 2026 अंतर्गत कलम 126(2), 308(2), 352, 351(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

वृत्त - समाधान मुळे

जी. के. एस. महाविद्यालयात एचआयव्ही समुपदेशन कार्यक्रम संपन्न !

जी. के. एस. महाविद्यालयात एचआयव्ही समुपदेशन कार्यक्रम संपन्न !

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव) 

इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी यांच्या वतीने जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली येथे विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. सागर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर समुपदेशक करुणा भवर यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय, एचआयव्ही तपासणीचे महत्त्व, उपचाराच्या उपलब्ध सुविधा तसेच एचआयव्हीविषयी असलेले गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रसिका लोकरे  यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांडले, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंदिरा गांधी रुग्णालय, भिवंडी तसेच समुपदेशक करुणा भवर यांचे महाविद्यालयाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

मुंबई–नाशिक महामार्गावर पडघा येथे मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ; दुचाकीला धडक, तिघे जखमी !

मुंबई–नाशिक महामार्गावर पडघा येथे मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ; दुचाकीला धडक, तिघे जखमी !

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)

मुंबई–नाशिक महामार्गावरील पडघा येथील एम.ई.सीबी पॉवर हाऊस गेटसमोर मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालवणाऱ्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघांसह कंटेनर चालक  जखमी झाला असून, तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याची नोंद पडघा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. पडघा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. कंटेनर उत्तर प्रदेश राज्यातील असून, चालकाचे नाव अमित पाठक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली. दरम्यान, मुंबई -नाशिक  महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसविण्यात आलेल्या ब्रेकरमुळे वाहनांचा वेग कमी झाला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. महामार्गावर अवजड वाहने चालवताना चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.

नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी !!

नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी !!

** ₹१२ कोटी हुन जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचा आरोप ; पत्रकार परिषदेत सर्व पत्रव्यवहार, कागदपत्रे, पुरावे दाखवून केली पोलखोल.

** ग्रामस्थांचा एल्गार घरपट्टी, पाणीपट्टी, बेकायदेशीर नोंदी व विकासकामांबाबत गंभीर आरोप; दोषींवर कारवाईची मागणी.

कोणतेही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय.

२ सप्टेंबर रोजी पंचायत समितीवर मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारणार,वेळ आल्यास ठिय्या आंदोलन करणार.

उरण दि. ३० (विठ्ठल ममताबादे) — नागाव ग्रामपंचायतीच्या कारभारात विविध शासकीय योजना, कर व विकासकामांच्या नावाखाली कथित गैरप्रकार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची शासकीय स्तरावर सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीने केली आहे.माऊली रिसॉर्ट म्हातवली- उरण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत 
घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, बेकायदेशीर नोंदी, बनावट कागदपत्रे तसेच विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचे आरोप संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. विकासाच्या नावाखाली झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे.या कथित प्रकरणाची पंचायत समिती उरण यांच्याकडून कारवाई करण्यासंदर्भात होत असलेली टाळाटाळ तसेच विकासाच्या नावाखाली झालेला कथित अपहार याबाबतही या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून उपलब्ध शासकीय नोंदी, कागदपत्रे, निधीचा वापर आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व प्रश्नांवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने व दोषीवर त्वरित कारवाई व्हावी तसेच भविष्यात नागाव ग्रामपंचायत मध्ये कोणतेही भ्रष्टाचार होऊ नये या दृष्टीकोणातून रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता म्हातवली येथील माऊली रिसॉर्ट येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . या पत्रकार परिषदेत कथित गैरव्यवहारासंदर्भातील मुद्दे व कागदपत्रे, सर्व पुरावे, कागदपत्रे माध्यमांसमोर मांडण्यात आले.संघर्ष समितीने सांगितले आहे की ....

“विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.


नागाव ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततां प्रकरणी शासनाच्या निर्देशानुसार कठोर कारवाईची मागणी पत्रकार परिषदेत व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वप्नील माळी यांनी केली. यावेळी ते म्हणाले की नागाव ग्रामपंचायतीच्या कथित गैरकारभार, आर्थिक अनियमितता व ग्रामनिधीच्या वापराबाबत दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद, रायगड अलिबाग यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक सुनावणी घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर चौकशी अहवाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर १८ मे २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्तांनी आदेश पारित करून, नागाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच चेतन गायकवाड व ग्रामविकास अधिकारी किरण केनी यांच्याकडून अनियमिततेची रक्कम वसूल करण्याबाबत तसेच महाराष्ट्र शासनाच्या ४ जानेवारी २०१७ व  सप्टेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकातील निर्देशांचा विचार करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले असतानाही आजतगायत संबंधित दोषीवर कोणतेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.केवळ रक्कम वसूल करून प्रकरण संपविणे योग्य आहे का ?  मुख्य प्रश्न असा आहे की, चौकशीत आर्थिक अनियमितता आढळल्यास केवळ संबंधितांकडून रक्कम वसूल करणे पुरेसे आहे का ? जर सार्वजनिक निधीच्या गैरवापराबाबत केवळ आर्थिक वसुली करून प्रशासकीय अथवा फौजदारी जबाबदारी निश्चित केली जात नसेल, तर भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा कसा बसेल, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आर्थिक अनियमिततेची रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधितांची जबाबदारी निश्चित करून, लागू असलेल्या कायदे व शासन निर्देशांनुसार प्रशासकीय व आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी सर्व तक्रारदारांची तसेच ग्रामस्थांची मागणी आहे.असे स्वप्नील माळी यांनी सांगितले.

सतत पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून सुद्धा लोकशाही कायदेशीर व शांततेच्या मार्गाने लढाई लढून सुद्धा भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी व्यक्तीवर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याने प्रशासनाचा निषेध करत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असून बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर मोर्चा नेण्यात येणार असून गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. असा आक्रमक इशारा या पत्रकार परिषदेत नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सल्लागार तथा मार्गदर्शक काका पाटील यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेत नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सल्लागार काका पाटील, अध्यक्ष कल्पेश सुतार, उपाध्यक्ष विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील माळी, नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सदस्य जितेंद्र ठाकूर, नितीन म्हात्रे, वीरेंद्र म्हात्रे, कमळाकर थळी, किशोर पाटील, निखिल माळी, भारतराज थळी आदी सदस्य उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत ग्रामस्थही मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भ्रष्टाचार बाबत ग्रामस्थ वर्गामध्येही संतापाचे वातावरण होते. त्यांनीही या भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविला व नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीच्या  निर्णयाला, भूमिकेला जाहीर पाठिंबा देत दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली.

ग्रामनिधीतील सर्व खर्च, १५ /१६ वा वित्त आयोग निधी, ओएनजीसी कंपनी कडुन सी एस आर फंड , वाढीव ५ कोटी ५० लाख  निधीची चौकशी, पाणी पुरवठा योजणांचा निधी, विकासकामांचे अंदाज पत्रके व प्रत्यक्ष काम , मोजमाप पुस्तिका (MB ), मूल्यांकन व पूर्णत्व प्रमाणपत्रे, निविदा व कार्यादेश, साहित्य खरेदी व स्टॉक रजिस्टर, कॅशबूक व बँक व्यवहार, ठेकेदारांना दिलेली देयके, वकिलांना अदा केलेल्या फी, महानगर गॅस सुरक्षा अनामत, पंचायत समिती फंड, नागरिकांकडून जमा झालेली कररूपाने रक्कम, दैनदिन खर्च, किरकोळ खर्च, इतर खर्च आरोग खर्च, धूरफवारणी, स्टेशनरी खरेदी, सोलर पथदिवे खरेदी, पथदिवे लाइट खरेदी कर्मचारी वेतन व मानधन, शासकीय मालमत्तेची विल्हेवाट या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून या आर्थिक व्यवहारांचे विशेष व स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे.तसेच तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, बांधकाम अभियंते, संबंधित अधिकारी कर्मचारी,कामांचे अंदाज पत्रक व मूल्यांकन करणारे अधिकारी, देयकांना मंजुरी देणारे अधिकारी, संबंधित कंत्राटदार व पुरवठादार यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम शासन निर्णय नुसार कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या कारभारात काही अनियमितता आढळल्यास संबंधित कायदे व शासकीय नियमांनुसार जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

कोट (चौकट ):- 

तक्रारदारांचा थेट सवाल.

"आर्थिक अनियमितता झाली आणि नंतर रक्कम वसूल केली, तर प्रकरण संपते का  ? "

सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न होत असल्यास, केवळ रक्कम वसूल करणे हा अंतिम उपाय असू नये. अनियमितता किंवा भ्रष्टाचार का झाली कोणत्या कारणामुळे झाली , त्यासाठी कोण जबाबदार आहे, निर्णय प्रक्रिया कोणी राबवली आणि ग्रामपंचायतीच्या निधीचे नुकसान का झाले, याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. अन्यथा "प्रथम निधीचा गैरवापर करा आणि नंतर रक्कम जमा करून प्रकरणातून सुटका करून घ्या" असा चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो.त्यामुळे दोषीवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. !!

उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : उरणमधील डाऊर  नगरचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी मुंबईतील प्रतिष्ठित एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयात पीएच.डी पदवी संपादन करून उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्यांना अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या दिमाखदार समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे उपस्थित होत्या.

डॉ. मोहम्मद आमिर शेख सध्या पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेतली जात असून, पीएच.डी. पदवी संपादन करणे ही त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

उरण, रायगड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात त्यांची ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे. उरण परिसरातील एका तरुणाने अभियांत्रिकी क्षेत्रात पीएच.डी.सारखी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, त्यांच्या या यशामुळे उरणच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.

या यशाबद्दल डॉ. आमिर शेख यांनी आपले वडील  रियाज अहमद, माजी उपप्राचार्य (निवृत्त), आई श्रीमती निशात बानो, पत्नी जैनब खातून, भगिनी, मित्रपरिवार तसेच सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

डॉ. मोहम्मद आमिर शेख यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल उरण, रायगड परिसरातून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन !

*दुःखद निधन* *अमरावती येथील शीतला प्रसाद गिरी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन* *अमरावती, दि. 30 ऑगस्ट 2026* अमरावती येथील शीतला प...