Saturday, 12 September 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

सातारा, प्रतिनिधी :  शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची वाढती संख्या व उ‌द्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उ‌द्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती   कार्यक्रम योजना राबविण्यात येत आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राकडून करण्यात आले आहे.

 प्रक्रिया व निर्मिती प्रकल्पांसाठी कमाल रु. 100 लक्ष व सेवा उ‌द्योग प्रवर्गातील प्रकल्पांसाठी रु. 50 लक्ष योजनेअंतर्गत प्रकल्प किंमत मर्यादा असणार आहे.  सर्वसाधारण अर्जदाराचे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे. शिक्षण 8 वी पास आवश्यक आहे. ही योजन व्यक्तीक, भागिदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट / संस्था सोसायटी / स्वयंसहाय्यता बचत गट नविन उ‌द्योगासाठी योजना लागू आहे. कुटूंबातील एक व्यक्तीस (पती किंवा पत्नी) लाभ घेता येईल. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी   www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर करावा. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उ‌द्योग केंद्र, फुलोरा हॉटेल जवळ, कामगार वसाहत जुनी एमआयडीसी, सातारा, ता दुरध्वनी क्र. 02162-244655, ई-मेल-didic.satara@maharashtra.gov.in येथे संपर्क करावा.

कल्याणमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च; ५२ हजारहून अधिक गणेश मूर्तींसाठी कडेकोट बंदोबस्त !!

कल्याणमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च; ५२ हजारहून अधिक गणेश मूर्तींसाठी कडेकोट बंदोबस्त !!

*कल्याण, दि. १२ सप्टेंबर २०२६ :*

कल्याण उपायुक्त परिमंडळ - ३ च्या अंतर्गत एकूण ५२,५४४ खाजगी, ७,२२० गौरी आणि ३०२ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. या निमित्ताने परिमंडळ येथील बंदोबस्तासाठी उपायुक्त (२), सहायक आयुक्त (४), पोलीस निरीक्षक (२५), सहायक पोलीस निरीक्षक/फौजदार (८०), पोलीस अंमलदार (७९५), होमगार्ड (१६०) व दोन स्ट्रायकि‍ंग प्लाटून तैनात करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक १२/०९/२०२६ रोजी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (कल्याण विभाग) श्री. अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

रूट मार्च सायंकाळी १८:०० वा. महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून सुरू होऊन पुढे मोहम्मद अली चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करून शंकरराव चौक - घेलादेवजी चौक - गांधी चौक - जुने बाजारपेठ पोलीस स्टेशन - दूधनाका - पारनाका - लाल चौकी या ठिकाणी सायंकाळी १८:४० वा. समाप्त करण्यात आला.

या रूट मार्चमध्ये मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अशोक होनमाने स्वतः, वपोनि महात्मा फुले पोलीस स्टेशन, १३ पोलीस अधिकारी, ७२ पोलीस अंमलदार, ३२ नवप्रविष्ट पोलीस अंमलदार, ४२ SRPF अंमलदार, २० होमगार्ड, ०२ CRM मोबाईल, ०२ पीटर मोबाईल, ०२ बीट मार्शल सहभागी होते.

Friday, 11 September 2026

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

*चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :*

"दिसता चट्टा, डॉक्टरांना भेटा..! येता कण-कण तापाची, करा तपासणी रक्ताची..! सावध राहा, सुरक्षित राहा, एड्सपासून दूर राहा. टीबीला हरवायचे आहे, देश स्वस्थ करायचा आहे."

अशा विविध आरोग्य संदेशांचा संदर्भ घेत चाळीसगाव शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप इत्यादी कीटकजन्य आजार तसेच इतर साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी आणि कुष्ठरोग, क्षयरोग, एचआयव्ही-एड्स जनजागृतीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दिनांक ११/०९/२०२६, वार शुक्रवार रोजी नालंदा माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथे डेंग्यू व इतर कीटकजन्य, जलजन्य आजार, साथीचे आजार, एचआयव्ही/एड्स आणि कुष्ठरोग, क्षयरोग या विषयावर जनजागृतीपर आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले.

सहायक संचालक (हिवताप) नाशिक आदरणीय डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ डॉ. राजेंद्र चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी श्रेणी-१ डॉ. वैदेही पंडित, डॉ. मंथन, डॉ. बागडे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खैरनार, चाळीसगाव नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. बांगर, आरोग्य विस्तार अधिकारी श्री. सोनवणे, हिवताप पर्यवेक्षक श्री. किरण बेलदार, श्री. ममराज राठोड, श्री. रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथील कुष्ठरोग अवैद्यकीय सहायक महेश सूर्यवंशी, समुपदेशक नामदेव अहिरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सचिन महाले, आरोग्य सेवक दीपक ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिरात डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग, हिवताप यांसारख्या कीटकजन्य आजारांची लक्षणे व उपाय, जलजन्य व साथीच्या आजारांपासून घ्यावयाची काळजी, तसेच एचआयव्ही-एड्स आणि कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करून सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले. सर्व आजारांविषयी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अनुसूचित जाती व तृतीयपंथी नागरिकांनी एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन !!

अनुसूचित जाती व तृतीयपंथी नागरिकांनी एसआयआर अंतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन !!

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक पात्र नागरिकाचा अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक अधिकार आहे. अनुसूचित जाती तसेच तृतीयपंथी समाजातील पात्र नागरिकांनी विशेष सखोल व पुनरिक्षण प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

आपल्या मताच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या मतदार यादीमध्ये नाव नसल्यास पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांसह आपल्या मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून मतदार नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय, लिंग किंवा अन्य तपशीलात काही त्रुटी असल्यास आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी.

स्थलांतरित नागरिकांनी नवीन पत्त्यानुसार मतदार नोंदणी अथवा पत्ता बदलाची प्रक्रिया पूर्ण करावी. नव्याने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी अथवा त्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७, तर नाव, पत्ता व इतर तपशीलातील दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरता येईल. ऑनलाइन अर्जासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

ऑफलाइन अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार आहेत. मतदार यादी दुरुस्तीच्या कामकाजाबाबत ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी सर्व पात्र मतदारांनी मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

मतदार यादीत आपले नाव असणे म्हणजे आपल्या लोकशाही हक्काचे संरक्षण होय. त्यामुळे अनुसूचित जाती व तृतीयपंथी समाजातील प्रत्येक पात्र नागरिकाने एसआयआर प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपली मतदार नोंदणी तपासावी व आवश्यक ती कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. तसेच कुटुंबातील, परिसरातील आणि समाजातील पात्र नागरिकांनाही याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गावात शिक्षकांना आदर राहिला नाही, तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आमदार किसन कथोरे यांचे परखड मत !

'गावात शिक्षकांना आदर राहिला नाही, तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आमदार किसन कथोरे यांचे परखड मत !

कल्याण, (संजय कांबळे) : शिक्षकांना पुरस्कार मिळाला,त्यांचा गौरव झाला तर त्यांच्या मध्ये उमेद तयार होते, ते पिढी घडवतात, परंतु सध्या पिढीला घडविणेसोपे राहिले नाही, आता गावात शिक्षक कधी येतो कधी जातो हेच कळत नाही, पुर्वी गावात गुरुजी आले तर रस्त्यावर खेळणारी मुले घरात जाऊन बसत होते, असा आदर होता, परंतु आता तो आदर राहिला नाही, परिस्थिती बदलली आहे, असे परखड मत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी, कल्याण तालुका आदर्श पुरस्कार गुणगौरव सोहळ्यात व्यक्त केले, यावेळी त्यांच्या हस्ते तालुक्यातील ८ शिक्षकांना'आदर्श शिक्षक, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, गटशिक्षणाधिकारी सुनीता मोटघरे मँडम, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे, बाजार समितीचे संचालक श्री भांगरे, भाजपाचे शेखर लोणे, जेष्ठ शिवसैनिक सुदाम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

दिपप्रज्वलानंतर कांबा जिल्हा परिषदेच्या मुलींनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, यानंतर आमदार कथोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते खोणी, सोनारपाडा, दहिसर, गोवेली, म्हारळ, मामणोली, खडवली, गुरवली या जिप शाळेतील श्रीमती विद्या-हावकर, शोभा महाजन, जनार्दन देशमुख, सुनिता ठुबे, दिलशाद शेख, प्रिती महाजन, ज्योती खेडकर, सुनिता देसाई यांचा२०२६-२७चा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एका शिक्षकेला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी सुनीता मोटघरे यांनी सांगितले की, तालुक्यात १२० शाळा असून ४०७ शिक्षकांची पदे मंजूर आहेत, त्यापैकी २७२ कार्यरत आहे. ३७ शाळा एकशिक्षकी तर ३ शाळांना शुन्य शिक्षक आहेत, सन२०२५-२६या शैक्षणिक वर्षात वरप, शिरढोण, नडगाव, हेदूटणे, गुरवली, मानिवली, सोनारपाडा, या शाळेतील १० विद्यार्थ्यांना मिशन भरारी अंतर्गत इस्त्रोमध्ये जाण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

तर गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांनी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन करून मला एका वरीष्ठ अधिका-याचा फोन आला की, एका या शिक्षकाला पुरस्कार द्या, परंतु ही नावे निश्चित झाल्याने त्यांंनी नाराज होऊ नये, पुढील वर्षी त्यांना देण्यात येईल असे मी म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सभागृहात मोठ्या प्रमाणात शिक्षक व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Thursday, 10 September 2026

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!

    'शिक्षण संजीवनी' मासिका तर्फे दरवर्षी साहित्य निर्मितीला  विशेष पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा हा पुरस्कार 'राजयुवा प्रकाशन' ने प्रकाशित केलेल्या वसुधा वैभव नाईक, पुणे यांच्या 'आईचे हळवे मन' या लघुकथा संग्रहास 'उत्कृष्ट साहित्य निर्मिती' हा पुरस्कार प्राप्त झाला.
   हा पुरस्कार पुणे येथील पत्रकार भवन,नवी पेठ येथे प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष मा.श्री. एकनाथ आव्हाड (बालसाहित्यिक आणि लेखक) प्रमुख पाहुणे मा. स्वाती महाळंक (प्रमुख कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) तसेच माधुरी गोखले,श्रुती कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी,अविनाश सकुंडे, शिक्षण संजीवनी मासिकाचे संपादक देविदास लिमये आणि कार्यकारी संपादक डॉक्टर संजय दत्त जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा उत्तम पार पडला.
    या मासिकातर्फे महाराष्ट्रातील बाल साहित्यिक तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांना विविध पुरस्कार दिले जातात.

    'आईचे हळवे मन' या लघुकथा संग्रहामध्ये शिक्षकांच्या जीवनातील अनुभव, आई म्हणून मुलांचे आलेले अनुभव आणि समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचे आलेले अनुभव यावर  लहान कथा लिहिलेल्या आहेत. ललित लेख म्हटले तरी चालेल.
   हा कथासंग्रह आपल्याला निश्चितच आवडेल आणि रसिकांच्या मनावर राज्य करणार हे मात्र नक्कीच. यातील भाषाशैली साधी  आहे. मनाला भावणारी आहे.
   'आईचे हळवे मन' या कथासंग्रहास मिळालेल्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्र, साहित्यक्षेत्र,सामाजिक क्षेत्र यातून अभिनंदनाचा  आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वृत्त - प्रमोद सुर्यवंशी (पुणे)

समेळपाड्यात मा. नगरसेवक व भावाचे अनधिकृत बांधकामे !!

समेळपाड्यात मा. नगरसेवक व भावाचे अनधिकृत बांधकामे !!

*नालासोपारा, दि. १० सप्टेंबर २०२६ :*

अनधिकृत बांधकाम रोखण्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे करत असल्याचे आढळून येते.

समेळपाडा येथील सर्व्हे क्रमांक २१/४ व २१/५ मधील बांधकाम परवानगीपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकाम हटविण्याची जबाबदारी असणाऱ्या पालिका प्रशासनाने वारंवार तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली आहे.

माजी नगरसेवक राजेश ढगे व भाऊ यतीन ढगे यांनी देवगड तालुक्यातील तिर्लोट गावात आईच्या नावे खोटा सातबारा तयार करून शेतकरी असल्याचे दाखवून समेळपाडा येथे जमिनी विकत घेतल्या, असा आरोप आहे.

विकत घेतलेल्या जागेवर पहिला महसूल खात्यात खोटे दस्तऐवज केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल आहे. अनधिकृत इमारती उभ्या करून नागरिकांची, महसूल, नगररचना, सिडको, महानगरपालिका यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून अनधिकृत वाढीव बांधकाम केले असल्याचा आरोप माहिती अधिकारातून बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक यांनी केला आहे.

तसेच काही ठिकाणी बांधलेल्या इमारती या १५ वर्षातच पडायला आल्याने महापालिकेने नोटीस देऊन धोकादायक इमारत घोषित केले आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रहिवाशांवर अवघ्या १५ वर्षातच बेघर होण्याची वेळ आली आहे.

या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार पालिका आयुक्त, संबंधित सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यावर संबंधित तक्रारीची शहानिशा, चौकशी आणि कारवाई करून अहवाल देण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे उत्तर पालिकेकडून देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !! सातारा, प्रतिनिधी :  शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित बे...