Thursday, 12 February 2026

कोळी समाजाचा मला नितांत आदर ; महेंद्रशेठ घरत

कोळी समाजाचा मला नितांत आदर ; महेंद्रशेठ घरत

केडीएच स्पोर्टस वाघिवली वाडा संघ ठरला विजेता 

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : समुद्राच्या तुफान लाटांशी झुंजणारा कोळी बांधव आपली संस्कृती जपणारा समाज आहे. त्यामुळे कोळी समाजाचा मला नितांत आदर आहे. भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांना सिडकोचे साडेबारा टक्के भूखंड मिळाले पाहिजेत, ही लोकनेते दिबा साहेबांची भूमिका होती, पण त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने आजही झालेली नाही, हे दुर्दैव आहे. मैदाने नसतील तर येणारी पिढी खेळणार कुठे, त्यामुळे मैदानांसाठी सर्वांनीच पुढे या, आपण भूमिपुत्र आहोत, आपला पहिला हक्क आहे. लढल्याशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे मी आपल्यासोबत आहे. गावातील तरुणांनी पुढे यावे, घरे बांधावीत, गरजेनुसार घरांची गरज आपल्यालाही आहे. सत्ताधाऱ्यांना मूलभूत सुविधांचा विसर पडलेला आहे, असे महेंद्रशेठ घरत उरण येथील कुंडेगाव येथे म्हणाले. 

श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा यांनी कॉंग्रेस चषक आयोजित केला होता. त्यावेळी महेंद्रशेठ बोलत होते. त्यावेळी ते क्रिकेटपटूंशी संवाद साधताना म्हणाले, "परप्रांतीय येतील, झोपड्या बांधतील, सरकार त्यांना फुकटात घरे देईल, असेच सध्या सुरू आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनो, सावध व्हा आणि वाढत्या गरजेनुसार घरे बांधा. कुंडेगावातील तरुणांनी पहिल्यांदाच प्रकाशझोतातील क्रिकेट सामने ठेवले, उत्तम आयोजन केले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन." 

पालघर-वाडा येथे राज्यस्तरीय ब्रास बँड स्पर्धेत कुंडेगाव येथील जय हनुमान कला सर्कल ब्रास बँड पथकाला द्वितीय क्रमांक मिळाला. त्याबद्दल महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचे ब्रास बॅंडने स्वागत केले आणि यथोचित सन्मान केला.

यावेळी केडीएच स्पोर्टस वाघिवली वाडा संघ विजेता ठरला; तर सुरुंग पाडा, फुंडे, पागोटे या संघानीही द्वितीय, तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळविली. 
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, सरपंच सविता मढवी, भजन गायक लक्ष्मण पाटील, ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील, अंगद ठाकूर, भालचंद्र चोगले, चंद्रकांत ठाकूर, राजेश ठाकूर, कल्पेश पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

टाटा पॉवरने कर्जत मधिल भिवपुरी येथील विज्ञान केंद्राच्या माध्यमातून STEM ( विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणाबाबत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जागरूकता !

टाटा पॉवरने कर्जत मधिल भिवपुरी येथील विज्ञान केंद्राच्या माध्यमातून STEM ( विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षणाबाबत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये  निर्माण केली जागरूकता !

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवात्मक विज्ञान शिक्षण सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, टाटा पॉवरने भिवपुरी परिसरातील गौलवाडी शाळेत एक समर्पित विज्ञान केंद्राची स्थापना केली आहे . या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक वर्गखोल्यांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीद्वारे विज्ञान  शिकण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. टाटा पॉवरच्या या सामाजिक उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. 

या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत ५५० हून  अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले असून विविध शाळांमध्ये विज्ञानविषयक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक दिवस व महिन्यांपर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील संकल्पना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजावून देण्यात येत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात हा उपक्रम आणखी विस्तारण्याची योजना कंपनीने आखली आहे.

गौलवाडी शाळेत कार्यरत असलेले हे विज्ञान केंद्र इयत्ता ६ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी असून येथे विज्ञान मॉडेल्स, प्रयोग किट्स, प्रात्यक्षिक साधने तसेच संवादात्मक शिकण्याची संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे केंद्र प्रयोग आणि शोधाचे केंद्र म्हणून कार्य करते, जिथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शित कृतींच्या माध्यमातून वैज्ञानिक संकल्पना अधिक प्रभावीपणे समजून घेता येतात.
.
या उपक्रमाचा दीर्घकालीन आणि शाश्वत प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी, भागीदार संस्था आणि बाह्य STEM शिक्षणतज्ज्ञांच्या माध्यमातून शिक्षक आणि प्रशिक्षकांना देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे. आधुनिक अध्यापन पद्धती आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकवण्याच्या तंत्रांचा वापर करून वर्गात अनुभवाधारित विज्ञान शिक्षण सुरू ठेवण्यास त्यांना सक्षम करण्यात आले आहे.

नियमित शैक्षणिक प्रक्रियेत व्यत्यय न आणता जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, शाळेच्या वेळापत्रकानुसार सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांमध्ये वर्गांचे आयोजन करण्यात येते, कायमस्वरूपी पायाभूत सुविधा, मोबाइल पोहोच उपक्रम आणि शिक्षक क्षमतावृद्धी यांचा समन्वय साधून, टाटा पॉवर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी  समावेशक आणि विस्तारक्षम शिक्षण परिसंस्था निर्माण करत आहे. यामुळे शैक्षणिक दरी कमी होत असून ग्रामीण विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम केले जात आहे.

स्थायी पायाभूत सुविधा, मोबाइल पोहोच उपक्रम आणि शिक्षक क्षमतावृद्धी यांचा समन्वय साधून टाटा पॉवर समावेशक आणि विस्तारक्षम शिक्षण परिसंस्था निर्माण करत आहे. यामुळे शैक्षणिक दरी कमी होऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम केले जात आहे.

उरण शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा !!

उरण शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा !!

** म्युनि्सिपल एम्प्लॉईज युनियन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग समोर आमरण उपोषण.

विविध मागण्या पूर्ण करण्याची उपोषणकर्ते कामगार वर्गांची मागणी - जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : उरण नगर परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून दलीत, आदिवासी गोरगरीब कंत्राटी सफाई कामगार कार्यरत आहेत. या कंत्राटी कामगारांनी कोवीड मध्ये देखील जीवाची बाजी लावून काम केले.या कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्या पूर्ण होत नसल्याने या कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. अध्यक्ष ऍड सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषद मधील कचरा साफ सफाई कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी लाखो रूपये अधिकचे खर्च करून काम दिले जाते.मात्र कमीत कमी कामगार वापरून अधिकाधीक नफा मिळवण्याचे काम अतीशय राजरोसपणे ठेकेदार मे. समिक्षा एंटरप्राईजेस करत आहे. उरण नगर परिषद प्रशासन मात्र या बाबतीत मौन पाळून शांत का ? 

हा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे. उरण शहरात कचर्याचे साम्राज्य असतानाही ठेकेदार कामगारांना कामावर घेत नाही या आडमुठ्या धोरणा विरोधात जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाहीत असा आक्रमक पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आहे. या बाबतीत प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन कामगार वर्गांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वच स्तरातून होताना दिसून येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांना याबाबतीत निवेदन देण्यात आले आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

कोट (चौकट ):- 

विविध खालील समस्या सोडविण्यासाठी "आमरण उपोषण" जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, अलिबाग येथे सुरू झाले आहे.

१) ११ कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ रूजू करून घेणे.
२) मागील में. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीने तीन वर्षे नियमानुसार पीएफ भरलेला नाही.तो त्वरित भरण्यात यावा 
३) २ वर्षांचा बोनस दिलेला नाही. तो त्वरित मिळावा 
४) मृत कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसांना ईएसआयसी योजनेचा लाभ मिळालेला नाही.तो लाभ त्वरित मिळावा 
५) में. समिक्षा एंटरप्राईजेस या नवीन ठेकेदाराने ५ महिन्यांचा पीएफ भरलेला नाही.हा पीएफ त्वरित मिळावे 
६) में.  समिक्षा एंटरप्राईजेस या कंपनीने कामगारांना ईएसआयसी या योजनेचे कार्ड दिलेले नाही.ते कामगारांना त्वरित मिळावे

राज्यातील २७ ओबीसी जातींचा केंद्राच्या यादीत समावेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद !!

राज्यातील २७ ओबीसी जातींचा केंद्राच्या यादीत समावेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय मंत्र्यांशी संवाद !!


** दिल्लीतील दोन दिवसीय दौऱ्यात महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालींना गती.

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
राज्यातील २७ ओबीसी जाती व पोटजातींना केंद्र शासनाच्या इतर मागासवर्गीय  यादीत समाविष्ट करण्याच्या प्रलंबित प्रश्नावर अखेर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार खटीक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत या प्रलंबित प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याची विनंती केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र ओबीसी कृती समितीचे पदाधिकारी दिल्ली येथे दोन दिवसीय दौऱ्यावर असून, त्यांनी केंद्रीय मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांची तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन विषयाच्या तातडीची जाणीव करून दिली.

बडगुजर सर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार, भोयर, पवार, बेलदार, कापेवार, मुन्नार कापेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकारी, लोध, लोधा, लोधी, डांगरी, कुलवंत वाणी, वाणी (कुलवंत), कराडी, कानोडी, नेवे वाणी, सलमानी, निषाद, मल्ला, मल्लाह अशा सदर २७ जातींना राज्यात आरक्षण सुविधा असली तरी केंद्राच्या यादीत आरक्षणाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगार क्षेत्रात मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र मागासवर्ग आयोग, सामाजिक न्याय विभाग आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग यांनी संयुक्त सुनावणी करून अहवाल सादर केला असून, आता या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटची अंतिम मंजुरी आवश्यक आहे. या मंजुरीसाठी दीड वर्षांपासून प्रतीक्षा सरू असून महाराष्ट्र ओबीसी कृती समितीने वेळोवेळी दिल्ली, मुंबई, पुणे येथे जाऊन केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, तसेच भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये समितीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनही सादर केले होते. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील मंत्रालयात समितीच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार खटीक यांच्याशी भेट झाली. या वेळी आमदार परिणय फुके यांच्या विशेष सहकार्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दूरध्वनीद्वारे मंत्र्यांशी संवाद साधून विषयावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली. यादरम्यान, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहिर तसेच वर्ध्याचे खासदार अमरजी काळे यांचीही भेट घेऊन विषय तातडीने कॅबिनेटमध्ये मांडण्याची मागणी समितीने केली. या दौऱ्यात महाराष्ट्र ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे,उपाध्यक्ष विलास पाटील, सहसचिव प्रल्हाद कासकर,वरिष्ठ मार्गदर्शक डॉ. नामदेव राऊत, सल्लागार मधुकर चोपडे, महासचिव मोरेश्वर भादे, सचिव दीपक नेवे यांचा समावेश होता. या मोहिमेत आमदार परिणय फुके, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे, विठ्ठल चोपडे, युवा भोयर-पवार मंचाचे उपाध्यक्ष अमोल खोडे यांचे विशेष सहकार्य लाभले. समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आता केंद्र शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय मिळेल अशी अपेक्षा आहे. यावेळी उपस्थित असलेले उपाध्यक्ष विलास पाटील यांनीही आपले मत व्यक्त करताना सांगितले कि ओबीसी आरक्षण साठी आमचे नियमित,सकारात्मक पाठपुरावा, प्रयत्न सुरु आहेत. कोणीही चांगल्या दर्जेदार शिक्षण व नोकरी पासून वंचित राहू नये. प्रत्येकाला चांगले शिक्षण, चांगली नोकरी मिळाली पाहिजे. येणाऱ्या पिढीचे भविष्य सुरक्षित झाले पाहिजे यासाठी आरक्षणाची गरज असून लवकरच ही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरु असल्याचे उपाध्यक्ष विलास पाटील यांनी सांगितले.या दिल्ली दौऱ्या बाबत तसेच आरक्षणच्या प्रत्येक कार्यात कराडी समाज अध्यक्ष महादेव बंडा, रमण कासकर, सूरदास गोवारी, शिवदास पाटील, मधुकर भगत, मधुकर सुरते, महेंद्र पाटील यांचे नेहमी विशेष सहकार्य लाभले आहे. आरक्षण प्रसंगी या पदाधिकारी मान्यवरांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आरक्षणचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Wednesday, 11 February 2026

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !!

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !!

** सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थे विषयी अक्षय म्हात्रे यांनी केली खंत व्यक्त.

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
अक्षय म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटाचे कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते असून सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. यंदाच्या चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडून येण्यासाठी त्यांनी दिवसाची रात्र करून अथक मेहनत घेऊन जनतेशी संवाद साधला. मात्र या चाणजे गणातून भाजपचे कैलास भोईर हे विजयी झाले. मात्र अक्षय म्हात्रे हे पराभवाने खचले नाहीत. उलट नव्या ताकदीने, नव्या उत्साहाने परत ते पुढील कामाला लागले आहेत. त्यांच्या मतदार संघात त्यांना १६२० मते मिळाली हे त्यांच्या उत्तम कार्याचे फलित आहे असे जनतेचे म्हणणे आहे.पक्षातील एकही माणसाचे पाठबळ नसताना आणि निवडणुकीत एकही पैसा न खर्च करता, केवळ कामाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात १६२० मतं मिळवणाऱ्या अक्षय म्हात्रे यांनी भ्रष्ट व्यवस्थे विषयी खंत व्यक्त केली आहे.अक्षय म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि एवढ्या मोठ्या व्यवस्थेविरुद्ध एकटा लढलो, समोर पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य व आजी माजी आमदार यांची ताकद पणाला लागली आणि करोडो रुपयांचा चुराडा झाला.निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या पक्षाचे नेते आठवडाभर माझ्याच गावात ठाण मांडून होते, विरोधकांनी इथेच रात्री जागवल्या, अमाप पैसा वाटला. तरीही हरवता येत नाही म्हणून अफवा पसरवल्या , बदनामी केली आणि या सर्वांच्या विरुद्ध एकटा लढलो, ना पक्षाचे पाठबळ, ना मनुष्यबळ होते.उमेदवारी शेवटच्या क्षणी भरली आणि पॅम्प्लेट (प्रचार पत्रके) उशिरा आल्याने वेळ पण कमी मिळाला.तरीही एकही पैसा न वाटता १६२० मते पडली.हे जनतेने मला भरभरून दिलेले आशीर्वाद आहे. त्यांचे मी कायमचा ऋणी आहे. त्यांचे मी आभार मानतो अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यंग तरुण असलेल्या अक्षय म्हात्रे यांनी १६२० घेऊन विरोधकांना आपल्या कामातून चांगलेच चोख प्रत्यूत्तर दिले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.हार न मानता, निराश न होता अक्षय म्हात्रे हे पुन्हा नव्या जोमाने, उत्साहाने पुढील कामाला लागल्याने जनतेने त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.

भिवंडीतील कोपर गावात महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिवपुराण"अमृत कथा सप्ताह. !!

भिवंडीतील कोपर गावात महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिवपुराण"अमृत कथा सप्ताह. !!

भिवंडी,दिं, १२,अरुण पाटील (कोपर). :

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील श्री क्षेत्र "कोपरेश्वर"मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिव पुराण "अमृत कथा सप्ताहाचे आयोजन कोपर गावचे सरपंच श्री .हेमंत सूर्यकांत घरत, श्री. जगत्गुरु तुकाराम महाराज वारकरी सांप्रदाय,स्वाध्याय परिवार,समर्थ दास परिवार,,आध्यात्मिक परिवार,व समस्त ग्रामस्थ मंडळ ,कोपर यांच्या वतीने गुरुवार  दिं,१२/२/२०२६ ते रविवार‌ दिं,१५/२/२०२६ पर्यंत आयोजित केले आहे. 

दिवस पहिला माघ कृ.१०, वार गुरुवार ,दिं, १२/२/२०२६ रोजी सकाळी ६ वा. सरपंच सौ/श्री.सुषमा हेमंत सूर्यकांत घरत यांच्या तर्फे अभिषेक घालण्यात आला आहे तर संध्याकाळी हरिपाठ व रात्री महा प्रसाद ठेवण्यात आला आहे. 

दिवस दुसरा माघ कृ.११, वार शुक्रवार दिं, १३/२/२०२६ रोजी सकाळी ५/ते ६ दरम्यान  काकड आरती होणार आहे.व सकाळी ६ वा.अभिषेक होणार आहे.तसेच संध्याकाळी ५ वा.ते ७ वाजे दरम्यान श्री. कोपरेश्वर प्रासादिक भजनी मंडळ,कोपर श्री.रंजन बुवा पाटील,श्री.चिंतामण बुवा घरत,श्री.गुरुनाथ बुवा,श्री.नरेश बुवा , मृदंगमणी: ह. भ. प.कमलाकर बुवा नाईक व इतर भजन  मंडळ यांच्या तर्फे हरी भजन होणार आहे.तर ७ ते ९.३० वा.श्री. "श्री.महाशिवपुराण" अमृत कथा व रात्री महाप्रसाद होणार आहे. 

दिवस तिसरा माघ कृ.१२, वार शनिवार,  दिं,१४/२/२०२६ रोजी सकाळी ५ ते ६ वा. काकड आरती,व सकाळी ६ वा. सौ /श्री. विमल कबीर पाटील , सौ/श्री.केशव शिवराम पाटील, सौ/श्री.संदीप गोरखनाथ पाटील, यांचा अभिषेक होणार आहे.तर संध्याकाळी हरी भजन,व रात्री ७ ते ९.३० वा.रात्री "श्री.महाशिव पुराण"अमृत कथा होणार आहे.व रात्री महाप्रसाद .

दिवस चौथा,माघ कृ.१३,महाशिवरात्री वार ,रविवार दिं,१५/२/२०२६ राजी सकाळी काकड आरती,भजन,वाकली ९ ते ११ वा. "श्री. महाशिवपुराण "अमृत कथा सांगता सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात  कथा प्रवक्ते म्हणून श्री.क्षेत्र श्रीरामपूर येथील ह.भ. प. शिव भक्त श्री. रामदास शास्त्री महाराज हे आपल्याला लाभणार आहे. 

या कार्यक्रमासाठी मा. श्री.कपिलजी मोरेश्वर पाटील (मा.केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री), मा. श्री. देवेशजी पुरुषोत्तम पाटील, (महा. प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, मा.सदस्य जिल्हा परिषद ठाणे) व मा. श्री. डि. के. म्हात्रे (महा.प्रदेश उपाध्यक्ष मनसे) हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. 

या धार्मिक कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहण्याची विनंती कोपर गावचे सरपंच श्री.हेमंत सूर्यकांत घरत, ग्रामविकास अधिकारी श्री. आशीष चव्हाण व ग्रामस्थांनी केली आहे.

नेपाळच्या पत्रकारांची 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट !!

नेपाळच्या पत्रकारांची 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट !!

** नेपाळचे क्रीडा पत्रकार पडले महेंद्रशेठ घरत यांच्या प्रेमात! 

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : नेपाळचे पत्रकार आयसीसी टी २० वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांचे वार्तांकन करण्यासाठी भारतात आले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची ख्याती माहिती आहे. त्यांनी दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा केल्याने, तसेच नेपाळमधील एका शाळेला साह्य केल्याने महेंद्रशेठ घरत यांची महती नेपाळमध्येही झाली आहे. त्यामुळे २० पत्रकार बांधवांनी भारतात आल्यावर महेंद्रशेठ घरत यांची मंगळवारी (ता. १०) 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट घेतली. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी नेपाळच्या क्रीडा पत्रकारांशी संवाद साधला, त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी ते म्हणाले, "मी पत्रकारांवर विशेष प्रेम करतो, आपण भारतात क्रिकेट सामन्यांच्या वार्तांकनासाठी आल्याने मलाही आनंद झाला आहे. कारण मीही क्रिकेटचा प्रचंड चाहता आहे. भारत-पाकिस्तान सामना जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी मी आवर्जून प्रत्यक्ष 'याचि देही याचि डोळा' पाहायला जातो. मी आजही मनमुराद क्रिकेट खेळतो. आपण नेपाळहून आमच्याकडे आल्याने 'अतिथी देवो भवं' या नात्याने आपला आदर-सन्मान करणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे 'सुखकर्ता'वर आपले मनापासून स्वागत करतो. आपण ज्या ज्या वेळी भारतात याल, तेव्हा आम्ही आपल्या सेवेशी सदैव असू."

यावेळी महेंद्रशेठ घरत यांना प्रत्यक्ष पाहून आणि त्यांच्या कामाचा आवाका पाहून नेपाळचे पत्रकारही त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्याशी पत्रकारांनी दिलखुलास संवाद साधला, मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपण 'माणूस' म्हणून ग्रेट आहात. आम्ही सातासमुद्रापार राहतो, पण भारतात आल्यावर आम्हाला आपण कुटुंबासारखे प्रेम दिलेत, हे प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. आपण ज्यावेळी यापुढे कधीही नेपाळमध्ये याल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असू, तुम्हालाही आम्ही सर्व सहकार्य करू," अशा भावना नेपाळच्या पत्रकारांनी शेलघर येथील 'सुखकर्ता' बंगल्यावर व्यक्त केल्या.

कोळी समाजाचा मला नितांत आदर ; महेंद्रशेठ घरत

कोळी समाजाचा मला नितांत आदर ; महेंद्रशेठ घरत केडीएच स्पोर्टस वाघिवली वाडा संघ ठरला विजेता  उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : समुद्र...