Monday, 6 April 2026

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा  मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

** ३३ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला

मुंबई (शांताराम गुडेकर) :
  
         महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.

                    या गावामधील गावदेवीची यात्रा चैत्र कृष्ण पक्ष-१  दि.३ एप्रिल २०२६ पार पडला. तर  पालखी सोहळा दि.४ एप्रिल २०२६ रोजी मोठया थाटामाटात पार पडला.अनेक गावामधील ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला .पालखी सोहळा यावर्षी ३३ तास चालला होता. ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती.तसेच हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामसुधारक मंडळ न्हावे कमिटीचे अध्यक्ष राजेश काळूराम घरत,उपाध्यक्ष जयेंद्र जनार्दन पाटील,नितीन भरत भोईर, सतीष दत्ताराम भोईर,सुशांत बांद्रे,खजिनदार  निलेश हरिश्चंद्ध भोईर,सहखजिनदार  अनंत लहु म्हात्रे,चेतन लक्ष्मण कडू,समाधान सदानंद म्हात्रे ,सरपंच  विजेद्र गणेश पाटील,उपसरपंच शैलेश विठ्ठल पाटील आणि हिरालाल हरी पाटील , सुहास पाटील,जयवंत पाटील मनीष गणेश भोईर अशोक  दामू भोईर, गणेश भोईर तसेच मंडळ सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली.

              पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे .सर्व भक्तांनी आरोग्य,सुख,शांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी बोलताना सांगितले.

नागरी संरक्षण विभागाची अंबरनाथ येथे विभागीय कार्यशाळा संपन्न !!

नागरी संरक्षण विभागाची अंबरनाथ येथे विभागीय कार्यशाळा संपन्न !!  

बातमीदार प्रतिनिधी : ता. ५, अंबरनाथ, दि. ०२ एप्रिल २०२६  नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे कार्यालयाच्या अंतर्गत तसेच मा. श्री विजय जाधव साहेब, उपनियंत्रक यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली दि. ०२/०४/२०२६ रोजी नागरी संरक्षण कार्यालय, अंबरनाथ येथे विभागीय क्षेत्ररक्षक व उपविभागीय क्षेत्ररक्षक यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेला एकूण ३६ मानसेवी अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व क्षेत्ररक्षकांना नागरी संरक्षणाच्या विविध जबाबदाऱ्या, आपत्ती व्यवस्थापनातील भूमिका, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधण्याच्या पद्धती, बचावकार्याचे नियोजन, तसेच स्थानिक पातळीवरील तातडीच्या उपाययोजनांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान मा. उपनियंत्रक यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करत नागरी संरक्षण दलाची जबाबदारी, शिस्त, तत्परता आणि आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या कृती यांचे महत्त्व अधोरेखित केले.

तसेच विभागीय आणि उपविभागीय स्तरावर कार्यरत क्षेत्ररक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव, अडचणी आणि उपाययोजना यावर विचारमंथन केले.

या कार्यशाळेमुळे मानसेवी अधिकाऱ्यांचे कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत झाली असून भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे हाताळण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Regards – DCCD, Thane

सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

काळ्या जादू'च्या भीतीतून १.६६ कोटींची फसवणूक !!

काळ्या जादू'च्या भीतीतून १.६६ कोटींची फसवणूक !!

ठाणे, ता. ४ : काळी जादू, पूजा विधी आणि १२ ज्योतिर्लिंग यात्रेचे प्रलोभन दाखवून ठाण्यातील उच्चभ्रू गृहसंकुलामधील एका कुटुंबाची एक कोटी ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हा प्रकार फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडला असून याप्रकरणी मंजुनाथ शेट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २५ वर्षीय तरुणी ही हिरानंदानी इस्टेट येथे राहणारी आहे. त्या तरुणीने दिलेल्या तक्रारीत, मंजुनाथ शेट्टीने सामाजिक ओळखीचा फायदा घेत तक्रारदार कुटुंबाचा विश्वास संपादन केला. कुटुंबावर नातेवाइकांनी काळी जादू केल्याचा खोटा दावा करत 'तुमच्या जीवाला धोका आहे' अशी भीती निर्माण केली. यावर उपाय म्हणून केरळमधील पुजाऱ्यांमार्फत विविध पूजा व १२ ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचा सल्ला देण्यात आला. फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान त्याने सुरुवातीला १० लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर वेळोवेळी नवीन कारणे देत आणि भीती दाखवत त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. न्यायालयीन प्रकरणे, अपूर्ण पूजा विधी आणि भविष्यातील संकटांची भीती दाखवत मे २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत विविध बँक खात्यांवर १.५६ कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले. अशाप्रकारे एकूण रक्कम १.६६ कोटींवर पोहोचल्यानंतरही त्याने पैसे मागणे सुरूच ठेवले. त्यामुळे संशय बळावल्याने कुटुंबाला फसवणुकीची जाणीव झाली. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sunday, 5 April 2026

मुरबा गणपती भक्तांसाठी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते लोकार्पण !!

मुरबा गणपती भक्तांसाठी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दुसऱ्या पॅसेंजर बोटीचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते लोकार्पण !!

भक्तीचा आणि सुरक्षेचा संगम साधला : महेंद्रशेठ घरत 

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील उलवे नोड मधील समुद्र किनारी वसलेले मोरावे येथील मुरबा गणपती मंदिर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय होता. मात्र या होड्या छोट्या आहेत. गणेश दर्शन घेण्यासाठी प्रवास करताना अबाल-वृद्धांना, माय-लेकींना त्या धोकादायक असल्याचे महेंद्रशेठ घरत यांच्या लक्षात आले होते. मध्यंतरी एक होडी जरा कलंडली होती, साहजिकच भक्तांमध्ये भीती निर्माण झाली होती. महेंद्रशेठ घरत यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुरबा गणपतीचे दर्शन घेताना गणेशभक्तांना सुरक्षित प्रवासासाठी लाईफ जॅकेट आणि पॅसेंजर बोट द्यायची, असे त्यांनी सौभाग्यवती शुभांगीताईंसोबत मुरबा गणपतीचे दर्शन घेताना बोलून दाखवले होते. 

त्यामुळे गेल्या वर्षी २९ मे २०२५ रोजी पॅसेंजर बोट आणि लाईफ जॅकेट गणेशभक्तांसाठी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताईंनी आपल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे दान केले होते. त्यानंतर अनेकदा त्यांनी त्या पॅसेंजर बोटीने प्रवास केला. तेव्हा भक्तांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी (ता.५) वर्षपूर्ती होण्यापूर्वीच संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत दुसरी पॅसेंजर बोट दिली. तिचे लोकार्पण महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरावे गावातील मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी फक्त गणेशभक्त नाही तर सेवक आहे. त्यामुळेच भक्तांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन दुसरी पॅसेंजर बोट देण्याचा निर्णय घेतला. आज तिचे लोकार्पण करताना आनंद होत आहे. मी भक्ती आणि सुरक्षेचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे."
महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत हे दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रद्धा आहे. ते दर संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जातातच. तसेच बऱ्याच वेळा ते थेट मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतात. 

पनवेल तालुक्यातील, उलवे नोडमधील समुद्रकिनारी वसलेले मोरावे गाव. येथील मासेमारी करणाऱ्या तीन-चार तरुणांनी स्वकष्टाने चक्क समुद्रात मुरबा गणपतीचे मंदिर बांधले आहे. राज्य सरकार शिवस्मारक समुद्रात कधी बांधेल माहिती नाही, पण मोरावे गावच्या तरुणांनी भर समुद्रात गणपतीचे मंदिर बांधून मोठेच धाडस केले आहे. महेंद्रशेठ घरत हे दूरदृष्टीचे नेते आहेत. मोरावे गावातील मासेमारी करणारे तरुण स्वयंपूर्ण व्हावेत, त्यांची रोजीरोटी कायम चालली पाहिजे, ते आर्थिकदृष्ट्याही सक्षम व्हावेत, यासाठी त्यांनी आगामी काळात पर्यटनाद्वारे तरुणांना रोजगार कसा मिळेल, याचे व्हिजन डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून महेंद्रशेठ घरत यांनी रविवारी दुसरी पॅसेंजर बोट दिली. 
गणेशाचे निस्सीम भक्त असलेले महेंद्रशेठ घरत दर संकष्टी चतुर्थीला मुरबा गणपतीच्या दर्शनाला जातात. तेव्हा ते गणपतीचे मनोभावे दर्शन घेतात आणि फ्लेमिंगोंचे थवे पाहण्याचा विलक्षण आनंदही घेतात. राज्यातील कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला हे जमेल असे नाही, मात्र महेंद्रशेठ घरत यांनाच ते जमते. कारण खरा आनंद कशात आहे, याची मोजमापे त्यांनाच माहिती आहेत. महेंद्रशेठ घरत हे नुसते बोलत नाहीत तर करून दाखवतात. त्यांनी दोन पॅसेंजर बोट मुरबा गणपती मंदिराला दान करून आम्हाला उपकृत केले आहे.  आम्ही त्यांचे कायमच ऋणी राहू. त्यामुळे आम्ही मुरबा गणपतीचरणी प्रार्थना करतोय, की गणराया, महेंद्रशेठ घरत यांना समाजकारण आणि सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी अखंड ऊर्जा प्राप्त होऊ दे, अशी भावना मुरबा गणपती मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. 

यावेळी कॉंग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील,ऍड.अविनाश ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, श्रीकांत घरत, रमेश घरत, तसेच एम. जी. ग्रुपचे सदस्य आणि हजारो गणेशभक्त उपस्थित होते.

"सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून पाहाणी " !!

"सिद्धार्थ महाविद्यालयाच्या इमारतीची शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून पाहाणी " !!

महाराष्ट्र शासनाच्या, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, सनदी अधिकारी, सन्माननीय हर्षदीप कांबळे साहेब (IAS) यांनी शनिवार दि. ४/४/२०२६ रोजी सकळी ठिक १०.३० वाजता आमच्या फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय, आनंद भवनला भेट देऊन, संपूर्ण इमारतीची पाहाणी केली. यावेळी आमच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सचिव डॉ. वासूदेव गाडे, प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे व सिद्धशक्ती मासिकाचे संपादक आयु. चंद्रशेखर कांबळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्यासोबत उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर, डॉ. देविका सुर्यवंशी, प्रा. संजयकुमार बोरसे व डॉ. शशिकांत मुंडेसह‌ ईतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

ब्रिटिशांच्या काळात १०० वर्षांपूर्वी लोखंड व सागाच्या लाकडाचे स्टक्चर असलेल्या महाविद्यालयाच्या हेरिटेज इमारतीच्या नुतनीकरणसाठी शासनाकडून अलिकडेच ४२ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे व लवकरच PWD विभागामार्फत काम सुरू केले जाणार आहे. त्या अनुषंगाने हर्षदीप कांबळे साहेबांनी सदर भेट त्यांचे अधिकारी व वास्तूविशारद यांच्या समवेत नियोजित केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी असलेले आयु. हर्षदीप कांबळे साहेबांनी सिद्धार्थ महाविद्यालयाची नवीन वास्तू आधुनिक शिक्षण पद्धतीला आवश्यक अशा सर्व पायाभूत सूविधांनी सुसज्ज अशी बनवली जावी अशी भावना  इमारतीचे अत्यंत बारकाईने पाहणी करताना व्यक्त केली. त्यानंतर त्याच्यासमोर प्रस्तावित नुतनीकरणाचा आराखडा शासनाच्या वास्तुविशारदांनी सादर केला, त्यात त्यांनी अनेक चांगले बदल करण्याच्या सुचना त्यांच्या अधिकाऱ्यांना केल्या. 

तसेच आमच्या पिईएसचे विश्र्वत- सचिव डॉ. वासूदेव गाडे साहेबांनी देखील नविन शैक्षणिक धोरणांना प्रमाणे लागू केलेला अभ्यासक्रम विचारात घेऊन व त्यानुसार विद्यार्थी, शिक्षकाच्या गरजेनुसार, तसेच  कॉलेजला निरंतर मेन्टनंसचा खर्च सस्टेन करता येईल, अशा स्वरूपाचे नुतनीकरण व्हावे अशी महत्वपूर्ण सुचना मांडली व त्याला प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित शिक्षकांनी दुजोरा दिला.

इमारतीच्या पाहाणी दरम्यान कांबळे साहेबांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला आवर्जून भेट दिली, त्यावेळी तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या आराम खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीला‌ अत्यंत आदराने नतमस्तक झाले व त्यांनी व्यक्तिगत तसेच आमच्या शिक्षकांसोबत तसेच त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत फोटो काढण्याच्या सुचना दिल्या. तसेच आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंपैकी त्यांच्या जवळच्या परीचयाचा वरीष्ठ लिपीक राजू रोकडेसह‌ ईतर कर्मचाऱ्यांशी त्यांच्या जवळ जाऊन संवाद साधला व एकत्र फोटो काढला.

सौजन्य -
*-डॉ. विष्णु ज. भंडारे* 
*(प्रभारी प्राचार्य)*

Saturday, 4 April 2026

जि प प्राथमीक कन्या शाळा कळमडू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव‌ येथे अभिजात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम संपन्न....

जि प प्राथमीक कन्या शाळा कळमडू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव‌ येथे अभिजात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम संपन्न.... 

चाळीसगाव, प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यातील जि प प्राथमिक कन्या शाळा कळमडू येथे अभिजात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम झाला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदर्श समाजसेवक पुरस्कार प्राप्त श्री. युवराज बच्छे यांनी अभिजात मराठी भाषा, तिचे संवर्धन आणि जतन कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केले. मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळेत शिकायला या असे श्री. बच्छे सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्यावर एक सुंदर कविता सादर केली. शाळेला कवी कुसुमाग्रज यांची प्रतिमा भेट दिली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.प्रल्हादराव चिंचोले सर यांनी श्री युवराज बच्छे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सौ संगीता सोनवणे मॅडम होत्या शिक्षिका सौ रत्नप्रभा पाटील ,श्री प्रल्हादराव चिंचोले सौ कल्पना चिंचोले श्री दीपक सनेर , श्रीमती गजश्री पाटील ,सौ प्रियंका खलाणे मॅडम यांनी युवराज बच्छे सरांचे आभार मानले.

Thursday, 2 April 2026

श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!

श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !!

श्री प्रवीण काकडे  हे धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी असलेले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडचे अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने  श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण चांदवड  नाशिक येथे अहिल्यादेवी होळकर वाडा येथे दिनांक ११ व १२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रा. रामशिंदे सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, माजी आमदार रामहरी रुपनवर श्रीमंत अमरजीत राजे, जहागीरदार तळोदा संस्थान नंदुरबार खासदार रामराव वडकुते परभणी, आमदार गोपीचंद पडळकर, डॉ प्रकाश महानवर कुलगुरू सोलापूर विद्यापीठ संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यू टकले ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर बाळासाहेब कर्णवर पाटील वाय चेअरमन श्री श्री  सदगुरू साखर कारखाना राजेवाडी इत्यादी उपस्थित राहणार आहेत. ‌प्रवीण काकडे हे गेली कित्येक वर्ष झाली सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. कोरोना काळात महाभयंकर संकट असताना त्यांनी डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना सात जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा मोठा उपक्रम राबविला.मुलाना ऑनलाईन पद्धतीने डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही म्हणून प्रत्यक्ष वाडी वस्तीवर जंगलात जाऊन साहित्य वाटप केले डोंगरदऱ्या खोऱ्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आपली स्वतःची नोकरी सांभाळून प्रत्येक सुट्टीच्या दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी जात असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठे एमपीसी यूपीसी सेंटर कराड येथे उभे करण्याचा त्यांचा मानस आहे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडच्या वतीने प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कराड येथे आयोजित केला जातो व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. आत्तापर्यंत अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास प्रचार वतीने ५०००चे पुढे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आर्थिक मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्याचे काम प्रवीण काकडे यांनी केला आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार सोहळा कराड येथे १४६ महिलांना देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे येथे ९० महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व नवी मुंबई येथे १४१ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर .कराड येथे २४५  विद्यार्थ्यांना शिक्षण रत्न पुरस्कार देऊन एकाच वेळी गौरविण्यात आले हे सर्व कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने २०२५ रोजी एकाच वर्षात कार्यक्रम आयोजित केले होते प्रवीण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल २०१९ ला ॲम्युनेशन दारूगोळा फॅक्टरी पुणे भारत सरकार यांनी समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यानंतर ईगल फाउंडेशन च्या वतीने एमआयटी कॉलेज पुणे येथे राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२३ रोजी देण्यात आला त्यानंतर सिने अर्क प्रोडक्शन मुंबईच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य ने घेतली त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील गोव्यातील व कर्नाटकातील धनगर व इतरही समाजा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा  मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३३ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भा...