Saturday, 18 April 2026

घाटकोपर पश्चिम येथील कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर भारत रत्न गौरव श्री पुरस्कार -२०२६ ने सन्मानित !!

घाटकोपर पश्चिम येथील कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर भारत रत्न गौरव श्री पुरस्कार -२०२६ ने सन्मानित !!

मुंबई (शांताराम गुडेकर)
            मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आणि आदर्श मुंबई फाउंडेशन तसेच ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स, संविधान जागरण परिषद -२०२६ च्यावतीने भारत रत्न गौरव श्री पुरस्कार   -२०२६  वितरण सोहळा नुकताच विक्रोळी पूर्व येथील विकास कॉलेज सभागृह, कन्नवार नगर येथे मोठया थाटामाटात संपन्न झाला. पुरस्कार सोहळ्यात घाटकोपर येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक, मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांना सामाजिक कार्य क्षेत्रातील कामगिरीसाठी "भारत रत्न गौरव श्री  पुरस्कार-२०२६ मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारला. त्यांच्या सोबत राजेंद्र पेडणेकर, प्रकाश कुष्टे हे सहकारी उपस्थित होते.
              यावेळी व्यासपीठावर संजय भोईर आयोजक, शिवश्री काजी सोहेल शेख छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचिव वकील पारसनीस शिवश्री काजी हैदर यांचे तेरावे वैशज, सुभेदा महेंद्र गवई भारतीय लष्कर, सानिका मोजर अभिनेत्री, ज्योतीताई दुराफे उपाध्यक्ष महिला मोर्चा मुंबई,आदी सामाजिक क्षेत्राबरोबरच वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम व नेटनेटके आयोजन मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आणि आदर्श मुंबई फाउंडेशन तसेच ओमकार अकॅडमी ऑफ आर्ट्स, संविधान जागरण परिषद यांच्यातर्फे करण्यात आले होते.
                 दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो.यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या घाटकोपर येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार यशवंत खोपकर याना विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.
              सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांना " भारत रत्न गौरव श्री पुरस्कार- २०२६ देण्यात आला.गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत.तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांच्या याच कार्याचे  कौतुक म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असे आयोजकांकडून सांगण्यात आले.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, दौलत बेल्हेकर, वसंत घडशी, गंधाली मयेकर, निर्मला आवटे, राजेंद्र पेडणेकर, संतोष चादे, वैभव डोके, महेश कुलकर्णी, विश्वास तेली, राजेंद्र चिखलकर, संतोष होलब यांच्या सहकार्यने यशवंत खोपकर सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात !!

नागरी संरक्षण प्राथमिक प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरुवात !!

दैनिक बातमीदार प्रतिनिधी: ता. १८, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा.श्री.विजय जाधव, उपनियंञक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. एप्रिल १७ ते २१ २०२६ या कालावधीत दु. १२.०० ते सायं. १६.३० या वेळेत पोलिस वाहतूक नियंत्रण हॉल, पोलिस उपायुक्त, कार्यालय, तीन हात नाका, ठाणे (प.) येथे प्राथमिक प्रशिक्षण वर्ग क्र. ०९/२०२६ सुरू करण्यात आला आहे. सदर प्रशिक्षणामध्ये एकूण ५६ RSP शिक्षक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.

     प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी श्री. अनिल गावित, सहाय्यक उपनियंत्रक व मानसेवी निदेशक श्री. बिमल नथवानी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत व्याख्याने आणि प्रात्यक्षिके सादर केलीत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांना नागरी संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन व प्रथमोपचार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांची सखोल माहिती मिळाली.

     यावेळी मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या कार्याबद्दल प्रोत्साहन दिले. सदर प्रशिक्षणाचे प्रभारी म्हणून सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित कार्यरत आहेत.

    हा प्रशिक्षण वर्ग आगामी दिवसांत विविध उपयुक्त विषयांवर आधारित असून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

     सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, नागरी संरक्षण दलाचे उपमुख्य क्षेञरक्षक, १, २, ४ व डाॅ.किशोर आढळकर, RSP चे श्री.स्वामी सर, शिंपीसर, अनेक प्रशिक्षक व ठाणे मनपा विभागीय आपत्ती व्यवस्थापन (RDMC) विभाग व TDRF चे प्रभारी श्री.यासिन तडवीजी उपस्थित होते.

     काही छायाचित्रे वरिष्ठांना माहितीसाठी सविनय सादर करण्यात आली आहेत.

– DCCD, NMC, ठाणे.

सौजन्य - विश्वनाथ राऊत सर 

"इतिहासाच्या पाऊलवाटेवर 'बहुसांस्कृतिक ठाणे' !

"इतिहासाच्या पाऊलवाटेवर 'बहुसांस्कृतिक ठाणे' !

*संस्कृतीचा संगम आणि इतिहासाची साद: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा अनोखा 'हेरिटेज वॉक'*

ठाणे,दि.18 :-* 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या विशेष दिवसानिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने "बहु सांस्कृतिक ठाणे" या हेरिटेज वॉक (Heritage Walk) चे आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज वॉकची सुरुवात सुप्रसिद्ध पुरातन कोपिनेश्वर मंदिरापासून करण्यात आली, त्यानंतर मासुंदा तलाव, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर, मुस्लिम धर्मियांचे सामाजिक भवन या ठिकाणी भेट देऊन शेवटी समारोप टाऊन हॉल येथे करण्यात आला.

     या हेरिटेज वॉक मध्ये अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे, तहसिलदार सचिन चौधरी, अमोल कदम, उमेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहायक गिरीश काळे, आर्किऑलॉजिस्ट गौरी काळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अद्वैता मांगले, क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर आदी अधिकारी उपस्थित होते.

     या हेरिटेज वॉक दरम्यान संदेश अवडण यांनी मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत चोख बजावली. भेट दिलेल्या प्रत्येक वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व, त्या वास्तूविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, त्याचे संदर्भ अशी वैविध्यपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांना जेष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव तेटविलकर, इंटॅक च्या सहसंयोजक ॲड.दिव्या ठाकूर, सिने अभ्यासक संतोष पाठारे, दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मानसी आमडेकर, कार्यक्रम छायाचित्रकार जय मनोरे या सर्वांची मोलाची साथ लाभली. 

   जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या हेरिटेज वॉकचे अतिशय उत्कृष्ट नियोजन तहसिलदार सचिन चौधर आणि अश्वमेध प्रतिष्ठान चे संस्थापक, पुरातत्व अभ्यासक व मानद वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र राज्य अविनाश हरड यांनी केले.

बोकडवीरा एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाजवळील उड्डाणपूल धोक्यात; आधाराच्या प्रतीक्षेत, अपघाताची भीती !!

बोकडवीरा एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाजवळील उड्डाणपूल धोक्यात; आधाराच्या प्रतीक्षेत, अपघाताची भीती !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाजूला असलेला उड्डाणपूल अस्तित्व टिकवण्यासाठी आधाराची वाट पाहत उभा आहे. पाच वर्षांपूर्वी अवजड वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी आणि नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून मालाचे कंटेनर वेळेत बंदरात पोहोचवण्यासाठी हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. मात्र आजघडीला हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून वाहनचालक व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

पूलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.प्रत्यक्ष पाहणी केली असता पूलाची दुरवस्था स्पष्ट दिसते. एका बाजूला पूलाच्या मध्यभागी तडे गेले असून तो तब्बल सुमारे एक फूट खचला आहे. तर दुसऱ्या बाजूला पूलाच्या दोन्ही कडेला संरक्षक कठडे तुटले आहेत. उड्डाणपूलाच्या दोन्ही टोकाला भल्या मोठ्या भगदाडांची निर्मिती झाली असून येथून अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू आहे. सध्या या पुलावरून जड वाहतूक बंद करून फक्त हलकी वाहने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने धोका कायम आहे.

द्रोणागिरी नोडमधील धोक्याची मालिका सुरूच आहे.ही परिस्थिती नवीन नाही. १४ मार्च  २०२१ रोजी द्रोणागिरी नोडमधील सेक्टर १५ मध्ये फुंडे गावाजवळील उरण-जुनाशेवा मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टवरून प्रवास करताना अचानक स्लॅब कोसळल्याने दीपक कसूरकर या तरुणाचा मोटारसायकलसह कोसळून करुण अंत झाला होता. या घटनेनंतर सिडकोने द्रोणागिरी नोडमधील सेक्टर १५ ते ५१ मधील सर्व मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासर्वांची दुरुस्तीसाठी निविदा काढली होती. द्रोणागिरी नोड परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाणपूलांची निर्मिती करण्यात आली असली तरी त्यांच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला असून चौकशीची मागणी जनतेतून होत आहे.एकिकडे उड्डाणपूलाचे काम सदोष व निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध होत आहे. आता या द्रोणागिरी नोड परिसरातील सर्वच उड्डाणपूलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जनतेकडून या सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे. तसेच संबंधित ठेकेदारांच्या कामाची सखोलपणे चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणीही जोर धरत आहे. अशा पद्धतीने काम करून घेणाऱ्या अभियंत्यांचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाची भूमिकेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी पावेतो हा पूल परिसरातील उड्डाणपूलांचा काही भाग पडला होता. त्यानंतर चार ते पाच वर्षे पूर्वी जासई गावाजवळील उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू असतानाच काही भाग कोसळून पडला होता. तेव्हापासूनच या भागातील उड्डाणपूलांच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या हा पूल  आधाराची आणि अपघात होण्याची वाट पाहत आहे. संरक्षणाच्या दोन बाजूंना ही संरक्षणभिंत तोकडी असल्याने वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे.

 एमएसईबी प्रकल्प आणि वीज यंत्रणा
बोकडवीरा येथे महानिर्मितीचा (MAHAGENCO) औष्णिक वीज प्रकल्प आहे. राज्यात वीजेची मागणी वाढत असताना अशा प्रकल्पांजवळील पायाभूत सुविधा सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. महापारेषणच्या बाभळेश्वर-कुडूस २२८ किमी लांबीच्या वीजवाहिनीमुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. मात्र स्थानिक पातळीवर रस्ते व पुलांची अवस्था वाईट असेल तर औद्योगिक विकासाला खीळ बसू शकते.

नागरिक, वाहनचालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या उड्डाणपूलाच्या तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक आधार देण्याची मागणी केली आहे. अन्यथा उरणमधील आणखी एक मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. सिडको, एमएसईबी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जासई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

जासई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
फुले शाहु आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठाण जासई, नवी मुंबई यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला, सकाळी जासई हायस्कुल येथे सर्व महापुरुषाच्या पुतळ्यास पुष्पार्पण करण्यात आले व नंतर सावित्रीबाई फुले नगर येथे मान्यवरांचे आगमन व स्वागत करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी उरण पंचायत समिती सदस्या  निर्मला नरेश घरत उपस्तिथ होत्या.या प्रसंगी रायगड जिल्हा रिपब्लिकन सेना उपाध्यक्ष सुधीर पवार यांनी आपले विचार मांडले व रिपब्लिकन सेना सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनीही जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या , कार्यक्रमाचे दिप प्रज्वलित करून कामगार नेते व शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रोहिदास घरत यांनी उपस्तिथ आंबेडकरी जनतेस मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.आपण एकत्रित राहूनच कुठलेही कार्य पुढे नेऊ शकतो हेच त्यांनी जयंती दिनी सांगितले. तसेच कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे माजी व्हा. चेअरमेन नूरा शेख सर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजाप्रती त्याग व आपण यातून आपल्या मुलांना शिक्षण देणे हे किती गरजेचे आहे ते सांगितले. जासई ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच धिरज घरत यांनी हि शुभेच्छा दिल्या व आजही उपेक्षित वर्गासाठी आपण याच  जयंती च्या मार्फत काय केले पाहिजे , जेणेकरून समाजाच्या शेवट पर्यंत मुलांना शिक्षण कसे घेता येईल यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ग्रामपंचायत सदस्य आदित्य यशवंत घरत यांनी फुले शाहू आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठाण च्या जयंती ला आल्यावर प्रत्येक वर्षी या ठिकाणी कुणी डॉक्टर तर वकील , तर शासकीय अधिकारी , अनेक मुलं घडवण्याचे काम या ठिकाणी चालू आहे आणि आम्हाला हे चित्र दिसल्यावर खरच अभिमान वाटतो या शब्दात त्यांनी आपले विचार मांडले. अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाग्यश्री मुंजाजी मस्के यांनीही आपले अध्यक्षीय भाषण केले , स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि पुढे येऊन चळवळीचे काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विजय मस्के आणि सुरज पवार यांनी केले तर अनेक विध्यार्थाने आपले विचार मांडले  व काही विध्यार्थ्यानी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर असलेल्या गीतावर नृत्य केले सर्व मुलांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले, व कार्यक्रमाच्या शेवटी भोजन देण्यात आले ,  या कार्यक्रमास अनेक ठिकाणाचे, विविध भागातील पदाधिकारी उपस्थित होते.हा कार्यक्रम फुले शाहु आंबेकर सामाजिक प्रतिष्ठाण जासई यांच्या सर्व सभासदांनी व रमाई महिला बचत गट आणि यशोधरा महिला बचत गट यांच्या सर्व सभासद यांनी उत्तम नियोजन करून यशस्वीरित्या पार पाडला. या कार्यक्रमास  जासई , एस सी ठाकूर कॉलनी ,फुले नगर , शिवाजीनगर , रेल्वे कॉलनी , शिर्के कॉलनी , नवघर , कोपर  येथून आलेले सर्व अनुयायी उपस्थित होते

सत्तेच्या विरोधात लढण्याचे पत्रकाराचे कर्तव्य मी बजावतो - प्रवीण पुरो.

सत्तेच्या विरोधात लढण्याचे पत्रकाराचे कर्तव्य मी बजावतो  -  प्रवीण पुरो.

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मधुबन कट्ट्यावर "भोंदू बाबा "या विषयांवर झालेल्या कविसंमेलनात जीवन गौरव मूर्ती जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो या विषयावर बोलताना म्हणाले की, एका अशोक खरात या एका भोंदूने महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. त्याला कारण सरकार आहे.जे सरकार चुकीचे करीत आहे,त्या विरोधात लढण्याचे पत्रकाराचे कर्तव्य करणं आवश्यक आहे ते मी करीत आहे.यावेळी प्रवीण पुरो यांच्यासोबत लेखक नाट्यकर्मी शरद कोरडे आणि पत्रकार नागेश कुलकर्णी यांनाही कोमसापकडून जीवन गौरव पुरस्काराने कट्ट्याचे अध्यक्ष राम म्हात्रे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्ष स्थानी सुरेश शिंदेसर  होते.सूत्रसंचालन मच्छिंद्र म्हात्रे यांनी सुरेख केले.
  
    
     विमला उरण येथे  दर महिन्याच्या १७  तारखेला कवी संमेलन आयोजित करण्यात येते. विमला तलाव येथे १२६ व्या कविसंमेलनात भोंदूबाबांच्या भोंदूगिरीवर अतिशय परखड विचारांच्या कविता सादर करण्यात आल्या. साहित्यरत्न प्रा.एल.बी. पाटील अजय शिवकर, नरेश पाटील, म.का. म्हात्रे,अनिल भोईर, कवी पुगावकर, भरत पाटील,हेमंत पाटील, रामचंद्र म्हात्रे,मारुती तांबे, भालचन्द्र म्हात्रे,ज्येष्ठ कवी मेस्त्री,नारायण धरत इत्यादी १६ कवींनी कविता सादर केल्या.     
  
   
        एड.राजेंद्र जैन, सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, नीळवर्ण दत्ताराम, प्रकाश पाटील, राम पाटील, बाजीराव घरत इत्यादी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.

जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले व ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या वतीने आई भवानी मातेचा उत्सव साजरा !!


जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले व ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या वतीने आई भवानी  मातेचा उत्सव साजरा !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात अनेक ठिकाणी देवीच्या यात्रा, उत्सव सुरु आहेत.उरण तालुक्यातील पाले गावात  आई भवानी मातेचे जागरण तसेच आई  भवानी मातेचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी मंडळाचे सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी, खजिनदार सल्लागार व सर्व सभासद, ग्रामस्थ तसेच वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पंचायत समिती सदस्य प्रारंभी अविनाश गावंड यांनी आई भवानी मातेच्या मंदिरात स्पीकर साठी दहा हजाराची मदत यावेळी केली.

जय भवानी नवतरुण  मित्र मंडळ पाले व ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली २३ वर्षे जय भवानी मातेचा उत्सव साजरा मोठ्या उत्साह साजरा होत आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ तसेच गावातील सर्व कार्यकारी मंडळ माता भगिनी सहभागी होतात.या उत्सवाला दरवर्षी मोठा प्रतिसाद लाभत आहे यावर्षी सुद्धा हा उत्सव साजरा  करण्यासाठी गावातील ग्रामस्थ तसेच  जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले चे सर्व सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार सल्लागार यांनी विशेष मेहनत घेऊन हा उत्सव यशस्वीपणे, उत्साहाने साजरा केला. आई भवानी माता  म्हणजे पालेगाव ची शान आहे. भाविक भक्तांची देवीवर खूप मोठी श्रद्धा आहे.म्हणून हा उत्सव मोठ्या उत्साहाने भाविक भक्त साजरा करतात

घाटकोपर पश्चिम येथील कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर भारत रत्न गौरव श्री पुरस्कार -२०२६ ने सन्मानित !!

घाटकोपर पश्चिम येथील कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर भारत रत्न गौरव श्री पुरस्कार -२०२६ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)  ...