Tuesday, 14 April 2026

जागतिक परिस्थितीतील बदलत्या घडामोडींमध्येही जेएनपीए ने कार्यक्षम स्थिरता कायम राखली असून सर्व कामगिरी निर्देशांकांमध्ये जेएनपीए ची उत्कृष्ट कामगिरी !!

जागतिक परिस्थितीतील बदलत्या घडामोडींमध्येही जेएनपीए ने कार्यक्षम स्थिरता कायम राखली असून सर्व कामगिरी निर्देशांकांमध्ये जेएनपीए ची उत्कृष्ट कामगिरी !!

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
 भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशांक कायम राखत उल्लेखनीय कार्यक्षमता दर्शविली आहे. जागतिक पुरवठा साखळ्या अजूनही अनिश्चिततेचा सामना करत असताना, जेएनपीएने पूर्वतयारी, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि भागधारकांशी घनिष्ठ समन्वय यांच्या माध्यमातून बंदरातील कामकाज सुरळीत ठेवण्यात यश मिळवले आहे. अशी माहिती जेएनपीए च्या जनसंपर्क कार्यालया द्वारे देण्यात आली आहे.

कोट (चौकट ): 

 मुख्य ठळक बाबी पुढीलप्रमाणे :- 

जेएनपीए येथील आयात कंटेनर थांबण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या सुधारला असून, तो फेब्रुवारी २०२६ मधील २५.१७ तासांवरून मार्च २०२६ मध्ये २२.६८ तासांपर्यंत कमी झाला आहे, जे वाढलेली माल हाताळणी कार्यक्षमता आणि सुव्यवस्थित प्रक्रिया दर्शवते.
डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी (डीपीडी) आणि डायरेक्ट पोर्ट एन्ट्री (डीपीई) यांसारख्या कार्यक्षमतेवर‌ आधारित उपक्रमांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात अनुक्रमे ७४.५७% आणि ४५.७४% कामगिरी नोंदवत मजबूत कामगिरी कायम ठेवली आहे, ज्यामुळे मालाची जलद हालचाल आणि गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.

सरासरी टर्नअराउंड वेळ २२.६१ तास आहे, जी आव्हानात्मक परिस्थितीतही जहाज हाताळणीची उत्कृष्ट कामगिरी राखण्याची जेएनपीएची क्षमता अधोरेखित करते.
ट्रान्सशिपमेंट कंटेनर हाताळणीत लक्षणीय वाढ होऊन त्याचे प्रमाण ५% वरून १६% पर्यंत गेले असतानाही जेएनपीएने कार्यक्षमतेची पातळी कायम राखली आहे. जेएन पोर्टमध्ये सध्या पुरेशी साठवण क्षमता उपलब्ध असून, कंटेनर साठवण क्षमतेपैकी केवळ सुमारे ५०% जागा वापरात आहे. याशिवाय, निर्यात कंटेनर साठवणुकीसाठी बंदर परिसरात अतिरिक्त ९. २ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, रीफर कंटेनरची वापरक्षमताही सुमारे ५०% इतकी आहे.

जेएनपीएने एक समर्पित कार्यदल स्थापन करून, टर्मिनल ऑपरेटर आणि हितधारकांशी सतत समन्वय साधून, आणि प्रत्यक्ष कार्यान्वयन देखरेखीद्वारे सक्रियपणे प्रतिसाद दिला आहे. ट्रॅक्टर ट्रेलरची ‘बॅक टू टाऊन’ (बीटीटी) वाहतूक, मालाची तात्पुरती पुनर्वाहतूक आणि इतर गर्दी कमी करण्याच्या उपक्रमांसारख्या लक्ष्यित उपायांमुळे कार्यान्वयन स्थिरता सुनिश्चित झाली आहे.

उरण महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

उरण महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, महिलांना त्याचे स्वातंत्र्य व अधिकार मिळाले,दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला अशा महान थोर समाज सुधारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदेतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उरण महाविद्यालयात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी वक्ते म्हणून डॉ. एच. के.जगताप, डॉ.एम.जी. लोणे  आणि 
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए.के गायकवाड यांनी केले प्राचार्य डॉ.वाल्मिक गर्जे यांनी मा. फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार अंगीकरण्याची आवश्यकता आहे असा उपदेश उपस्थितांना दिला. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली.डॉ जगताप यांनी डॉ आंबेडकर यांचे कृषी व आर्थिक धोरण विषद केले.डॉ लोणे यांनी डॉ.आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता हिंगमिरे आणि आभार प्रदर्शन डॉ. ए.आर. कांबळे यांनी केले. आदर्श महापुरुषांचा वारसा व त्यांचे आदर्श गुण अंगीकरण्या बाबत या कार्यक्रमातून आवाहन करण्यात आले. जयंती निमित्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीही मोठया प्रमाणात उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारणासाठी राज्यव्यापी आक्रोश मोर्चा !!

महाराष्ट्रातील कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारणासाठी राज्यव्यापी आक्रोश मोर्चा !!

** मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील कामगार होणार मोठया संख्येने सहभागी.

पत्रकार परिषदेतून भारतीय मजदूर संघाने दिली माहिती.

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन दोन वर्ष होत आले. त्याआधी सुमारे आठ वर्ष त्यांनी मुखमंत्री म्हणून काम केलेले आहे. या काळात वारंवार पाठपुरावा करूनही कामगारांचे प्रश्न सुटलेले नाही. कामगार प्रश्नांना सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यावर चर्चा करायला सरकारला वेळ नाही. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची देखील पूर्तता होता नाही. त्यामुळे राज्यातील कामगारांच्या मनात प्रचंड अस्वस्थता व संताप असून तो व्यक्त करण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश च्या नेतृत्वाखाली १६ एप्रिल २०२६ रोजी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा पूर्व मुंबई या ठिकाणी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला असून किमान पाच हजार कामगार सहभागी होतील आणि आपली नाराजी व्यक्त करणार आहेत अशी माहिती प्रदेश अध्यक्ष ऍड. अनिल ढुमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी व कामगारांच्या समस्या कडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय मजदूर संघातर्फे १६ एप्रिल २०२६ रोजी कामगार आयुक्त कार्यालय बांद्रा मुंबई येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी मुंबई मध्ये भारतीय मजदूर संघातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र सरकारचे उद्योग, ऊर्जा, कृषी , पाणी, महिला , बाल, युवा, खेळाडू, शिक्षण, आरोग्य, सहकार आदी सर्व विषयांचे धोरण आहे. मात्र कामगार विषयक धोरण नाही. महाराष्ट्र सरकार एक ट्रीलीयान अर्थव्यवस्था निर्माण व्हावी हे लक्ष समोर ठेवून काम करत  आहे. मात्र अशा प्रगत अर्थव्यवस्थेत कामगारांचे स्थान काय असणार हे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही. वर्षानुवर्ष कामगारांनी केवळ किमान वेतन आणि त्यापेक्षा कमी वेतनातच काम करावे असे सरकारला अपेक्षित आहे का ? कामगारांना त्यांचे किमान वेतन, बोनस, उपदान, भविष्य निर्वाह निधी कामगार विमा  कायदेशीर हक्क मिळणार का ? या बाबत राज्यातील कंत्राटी, बांधकाम , घरेलू, आशा, अंगणवाडी, फेरीवाले, बिडी कामगार ,रिक्षा टॅक्सी चालक, EPS 95 व अन्य पेन्शन धारक, वीज, नगर पालिका यासह  विविध उद्योगातील कामगारंचे प्रश्न सरकारकडे प्रलंबित असून त्याबाबत सातत्याने पाठ पुरावा करूनही ते सोडवत नसल्याने  याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चात  सहभागी होणार आहेत.  

सदर मोर्चापूर्वी  राज्याचे कामगार मंत्री नामदार  आकाश फुंडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना राज्यातील किमान २२ संघटनांच्या  प्रलंबित प्रश्नांची निवेदन सादर केलेली आहेत. या सर्व प्रश्नांवर सरकारने प्रत्यक्ष चर्चा करावी आणि ते प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा भारतीय मजदूर संघाची आहे. 

पत्रकार परिषदेत भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगिर , अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे व रामनाथ किणी , महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात,  उपसरचिटणीस अमर लोहार,  व माध्यम प्रमुख सागर पवार पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. 
                   

कोट (चौकट ):- 

महत्वाच्या मागण्या :- 

१) महाराष्ट्र राज्याचे कामगार धोरण तयार करा. विकसित महाराष्ट्रात कामगारांचे स्थान निश्चित करा. 
२) शोषण मुक्त रोजगारासाठी महाराष्ट्रात शासनाच्या विविध खात्यात व मंडळांमध्ये कामकरणार्या कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न लागू करा. 
३) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा रुग्णालय आणि प्रत्येक औद्योगिक वसाहतीत कामगार राज्य विमा दवाखाना सुरू करा. 
४) बांधकाम कामगार मंडळातील आरोग्य तपासणी आणि नोंदणीतील भ्रष्टाचार थांबवा. बोगस नोंदणी रद्द करा. 
५) घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
६) आशा, अंगणवाडी सेविका यांना कर्मचारी म्हणून मान्यता द्या. दिवाळीला भाऊबीज नको बोनस द्या.
७) फेरीवाल्यांचे बंद व्यवसाय त्वरित सुरू करा. 
८) वेतन कोड आणि सामाजिक सुरक्षा कोड त्वरित लागू करा. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा. 
९) बोनस मिळण्यासाठी वेतन मर्यादा ४२००० रुपये करा. ESI वेतन मर्यादा ४२०००/- रुपयांपर्यंत वाढवा. 
१०) महाराष्ट्र राज्य वीज कंपन्यांचे खाजगीकरण थांबवा. 
११) राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँकांमध्ये पाच दिवसाचा आठवडा सुरू करा. 
१२) EPS 95 पेन्शन धारकांना किमान पेन्शन रुपये ७५००/- द्या. 
१३) राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचार्याना घोषित केल्या प्रमाणे कायम करा. 
१४) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रीपेड टॅक्सीचे दर पुर्निर्धारित निर्धारित करा. ओला , उबेर आदी खाजगी ऍप ना दिले जाणारे प्राधान्य थांबवा.  
१५) पुणे मेट्रो, परिवहन मंडळ, नगरपालिका, जीवन प्राधिकरण, पोर्ट आणि डॉक, टोल नाके आदी उद्योगातील कायम व कंत्राटी कामगारांचे  प्रलंबित प्रश्न सोडवा.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा घाटकोपर पश्चिमच्या वतीने सत्कार !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या नवनिर्वाचित  पदाधिकाऱ्यांचा  घाटकोपर पश्चिमच्या वतीने सत्कार !!

शिवसेना नेते खासदार तसेच ग्राहक संरक्षण कक्षाच्या अध्यक्षपदी श्री.अनिलभाऊ देसाई यांची नियुक्ती

 मुंबई (शांताराम गुडेकर) :
          शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अध्यक्ष पदी शिवसेना नेते खासदार श्री.अनिलभाऊ देसाई यांची नियुक्ती झाल्याबद्दल घाटकोपर पश्चिम कक्षाच्या वतीने त्यांचा तसेच इतर नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
                प्रक्षप्रमुख मा्.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या कार्यकारिणीत अध्यक्षपदी शिवसेना नेते खासदार मा. श्री.अनिलभाऊ देसाई यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राजू पाटील, विजय मालणकर, अशोकजी शेंडे तसेच सरचिटणीसपदी निखिलजी सावंत, सचिव राजेश कुचीत, वनिता पटेल, खजिनदार देविदास माडये, कक्ष मध्यवर्ती कार्यालय प्रमुख विजय पवार, सहकार्यालय प्रमुख राजेश चव्हाण आणि कार्यकारणी सदस्य बबन दत्ताराम सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल घाटकोपर पश्चिम कक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
               यावेळी घाटकोपर पश्चिम कक्ष विधानसभा संघटक यशवंत विठ्ठल खोपकर, कक्ष कार्यकारिणी चिटणीस विश्वनाथ जाधव, कक्ष उपसंघटक राजेंद्र पेडणेकर शाखा क्र. १२३१२४, कक्ष उपसंघटक शंकर तेली शाखा क्र. १२८ १२९, कक्ष उपसंघटक विकास डुकरे १२६ १२७, कक्ष वार्ड संघटक संतोष चांदे शाखा क्रमांक १२३,कक्ष वार्ड संघटक तानाजी उल्लारकर शाखा क्रमांक १२६ तसेच कक्ष प्रतिनिधी सचिन भालेकर, प्रमोद जाधव, अनंत पवार, संतोष कदम, निर्मल आवटे, कल्पेश बुवा, रियाज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तिसरी मुंबई : विकास की विनाश ?

तिसरी मुंबई : विकास की विनाश ? 

** भूमिपुत्रांनो, आपल्या अस्तित्वाचा विचार करा ; सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांचे स्थानिक भूमीपुत्रांना अस्तित्वासाठी एकत्र येण्याचे आवाहन 


उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : सध्या 'तिसरी मुंबई म्हणजेच' मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे विकसित केले जाणारे एक नवीन नियोजित शहर , ज्याला अधिकृतपणे 'कर्नाळा-साई-चिरनेर' (KSC) न्यू टाऊन असे नाव देण्यात आले आहे, याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. चकाचक रस्ते, टोलेजंग इमारती आणि स्मार्ट सिटीच्या स्वप्नांनी सामान्य माणसाचे डोळे दिपवले जात आहेत. परंतु, या विकासाच्या झगमगाटामागे उरण, पनवेल आणि पेणच्या सुपीक मातीत राबणाऱ्या आगरी, कोळी, कऱ्हाडी आणि आदिवासी बांधवांचे भविष्य अंधारात ढकलले जात नाही ना ? हा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे.त्यामुळे सर्वकाही मतभेद विसरून तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचे आवाहन उरण मधील प्रसिद्ध  सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी केले आहे.

      तिसरी मुंबई म्हणून निर्मिती होणाऱ्या या भागातील शेती हि केवळ जमीन नाही, तर पिढ्यांची उपजीविका आहे. ज्या जमिनीवर आपल्या पूर्वजांनी घाम गाळला, जिथे पिढ्यांनपिढ्या भात पिकविला, ती जमीन आज 'रिअल इस्टेट'च्या नावाखाली गिळंकृत केली जात आहे. शेती ही 'अन्नदाती' आहे. जमिनीतून मिळणारे उत्पन्न शाश्वत आहे, पण जमिनीच्या बदल्यात मिळालेला पैसा महागाईच्या काळात फार काळ टिकणार नाही. एकदा का हातातून जमीन गेली, की पुढच्या पिढ्यांसाठी उत्पन्नाचे हक्काचे साधन कायमचे नष्ट होईल.

    आजवर जपत आलेली संस्कृती आणि गावपण सिमेंटच्या जंगलात कधी हरवून जाईल, हे कळणार सुद्धा नाही. आपली आगरी-कोळी संस्कृती, गावदेवीच्या जत्रा, पालखी सोहळे, पारंपरिक उत्सव आणि एकमेकांवरील जिव्हाळा हा आपल्या गावांचा प्राण आहे. शहरीकरणामुळे गावेच नष्ट होतील आणि माणसे फ्लॅट संस्कृतीच्या खोल्यांमध्ये बंदिस्त होतील. आपला पेहराव, आपली खास बोलीभाषा आणि आपली सामूहिक शक्ती, सामाजिक ओळख या सिमेंटच्या जंगलात कायमची पुसली जाईल. 

      आजकाल बातम्यांच्या माध्यमातून शहरीकरणांचे भयंकर कटू वास्तव आपण रोजच पहात आहेत, मुंबई आणि इतर शहरांच्या बातम्या वाचल्या की अंगावर काटा येतो. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणारी माणसे आणि वाढती गुन्हेगारी. ज्या भागाची जाणीव नसलेले लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतील, तेव्हा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होईल. महिलांवरील अत्याचार, अपहरण, आर्थिक फसवणूक आणि अमली पदार्थांचा विळखा या समस्या शहरीकरणासोबतच येतील. आपला शांत गावकुसाचा परिसर या प्रदूषणात आणि गुन्हेगारीत भरडला जाईल. 

    सध्या शेती कष्टाची वाटत असली तरी, शेतकरी कायम मालक म्हणूनच शेतीची मशागत करत होता. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ज्या जमिनीचा आज शेतकरी 'मालक' आहे, उद्या तोच शेतकरी त्याच जमिनीवर उभ्या राहणाऱ्या इमारतीचा 'वॉचमन' किंवा 'सफाई कामगार' तर होणार नाही ना ? आपल्या नवीन पिढीकडे जर तांत्रिक शिक्षण नसेल, तर त्यांना या हाय-टेक शहरात नोकऱ्या मिळणार नाहीत. मग आपल्या मुलांना रोजगारासाठी वणवण करावी लागेल. हे चित्र आजवर ज्यांनी जमिनी देऊन त्यावर प्रकल्प किंवा व्यवसाय उभे राहिले आहेत, त्यात आपण दररोज पाहत आहोत.

    हा प्रश्न फक्त जमिनीचा आणि उपजीविकेचाच नसून येथील निसर्गाचा आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीचाही आहे . सुपीक भातशेती, नैसर्गिक नाले आणि डोंगर बुजवून जेव्हा काँक्रीटचे जंगल उभे राहील, तेव्हा निसर्गाचा कोप अटळ आहे.पावसाळ्यातील पूर, वाढते तापमान आणि अशुद्ध हवा यामुळे आपल्या आरोग्याचे बारा वाजतील. नैसर्गिक अन्नाऐवजी भेसळयुक्त शहरावर अवलंबून राहवे लागेल. म्हणजेच उपजीविका तर जाईल आणि आरोग्याचे प्रश्नही उद्भवतील.

      विकास हवा, पण तो भूमिपुत्रांना विस्थापित करणारा नसावा. आपली सुपीक जमीन ही आपली जीवनदायीनी आहे. त्यामुळे येथील शेतीकडे आजचा आधार आणि पुढील पिढीचे भविष्य म्हणून पाहिले पाहिजे. आज आपण एक झालो नाही, तर उद्या आपली येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. तिसऱ्या मुंबईच्या विचारांच्या झगमगाटामागे उध्वस्त गावांचा अंधार डोळे उघडून पहायला हवा. नाहीतर पश्चातापच होईल.

 अजूनही वेळ गेलेली नाही. जागे होवू या, नाहीतर आपण आपल्याच मातीत उपरे ठरू असे मत उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी व्यक्त केले आहे. सर्व नागरिकांनी, तरुणांनी कोणत्याही लोभ, प्रलोभने, अमिषाला बळी न पडता आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Saturday, 11 April 2026

उरण तालुक्यातून पोलिसांनी जप्त केले २.५ लाखांचे हेरॉईन ; उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेचा बाजार !!

उरण तालुक्यातून पोलिसांनी जप्त केले २.५ लाखांचे हेरॉईन ; उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेचा बाजार !!

** शाळा, कॉलेज मधील मुले नशेच्या आहारी ; नशेच्या आहारी गेलेले वळत आहेत गुन्हेगारी कडे 

व्यसना विरोधात त्वरित कारवाई करण्याची गरज....

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात चरस गांजा करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण वाढत असून उरण मध्ये अनेक ठिकाणी खुलेआम पणे नशेचा बाजार सुरु आहे. अनेक ठिकाणी या नशेली पदार्थांची खरेदी विक्री मोठया प्रमाणात सुरु असून या व्यसनाला उरण मधील शाळा, कॉलेज मधील तरुण मुले सर्वाधिक बळी पडत आहेत त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय हिच नशा करणारी  व्यक्ती पुढे गंभीर गुन्ह्याकडे वळतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हा नशेचा बाजार रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

उरण पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व त्याचे सेवन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जासई येथील पार्किंगमध्ये छापा मारून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणासह त्याचे सेवन करणाऱ्या दोघांना असे एकूण तीन जणांना अटक करीत २ लाख ५२ हजार ८०० रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उरण तालुक्यातील जासई येथील शीतल परिवहन पार्किंगच्या मागे असलेल्या जांभळाच्या झाडाखाली काही तरुण संशयास्पद अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे उरण पोलिसांनी १० एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास छापा मारला. यावेळी तेथे रवींद्र कल्याण शेट्टी (२७), गणेश दत्तू भिडे (२५) व गणेश विनय पाटील (१९) हे तिघेही अमली पदार्थाचे सेवन करताना आढळले.

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, गणेश पाटील याच्याकडे ६.३२ ग्रॅम वजनाची हेरॉईनच्या ८५ पुड्या सापडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात अमली पदार्थाची किंमत अंदाजे २,५२,८०० रुपये आहे. या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांनाअटक केल्याची माहिती वपोनि हनिफ मुलाणी यांनी दिली. तिघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी सांगितले.

उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेच्या औषधांची विक्री खरेदी मोठया प्रमाणात होत असून अशा खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्ती वर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटनानीं केली आहे

समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेमुळे कामगारांना पगार वाढ !!

समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेमुळे कामगारांना पगार वाढ !!

** करारानुसार कामगारांना मिळणार विविध सेवा सवलती.

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील भेंडखळ येथे  पोलीरीस कंपनीत समर्थ रायगड जनरल कामगार संघटने अंतर्गत कार्यरत असणारे इलेक्ट्रिशन व मेंटेनन्सचे काम करणारे कर्मचारी कार्यरत असून या कंपनीत समर्थ रायगड जनरल कामगार संघटना व जीएमसी मेंटेनन्स वर्क एल एल पी यांच्यात वेतन वाढीचा यशस्वी संपन्न झाला. या  करारा अंतर्गत कामगारांना तीन वर्षासाठी  प्रति महिना प्रति व्यक्ती ६२५० रुपये इतकी वेतन वाढ करण्यात आली आहे. तसेच पगारवाढी सोबत बोनस व इतर सेवा सुविधा जसे की रजा, सुरक्षा साहित्य, युनियनची देणी, थकबाकी आदी सुविधा कामगारांना मिळणार आहेत. या करारा प्रसंगी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भगत, युनियन लीडर नैनेश म्हात्रे, किशोर बनसोडे, जीएमसीचे मालक इरफान पटेल, ऍडमिन ऑफिसर अरुण माने, चिटणीस अजय पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून कामगारांनी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे तसेच जीएमसी मालक इरफान पटेल, पोलीरिस कंपनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. 

समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून हे यशस्वी करार संपन्न झाल्याने संघटनेच्या कार्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरू असून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात संघटनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जागतिक परिस्थितीतील बदलत्या घडामोडींमध्येही जेएनपीए ने कार्यक्षम स्थिरता कायम राखली असून सर्व कामगिरी निर्देशांकांमध्ये जेएनपीए ची उत्कृष्ट कामगिरी !!

जागतिक परिस्थितीतील बदलत्या घडामोडींमध्येही जेएनपीए ने कार्यक्षम स्थिरता कायम राखली असून सर्व कामगिरी निर्देशांकांमध्ये जेएनपीए ची उत्कृष्ट ...