Thursday, 4 June 2026

चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा..

चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा..

मुरबाड (प्रतिनिधी) : कामगार चळवळ, पत्रकारिता आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार तथा कामगार नेते मंगल दादा डोंगरे यांनी तब्बल ३९ वर्षे ९ महिने आणि १७ दिवसांच्या सेवेनंतर ३१ मे रोजी सेवेतून निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त मुरबाड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

मुरबाड तालुक्यातील गोरख मचिंद्र गडाच्या पायथ्याशी वसलेल्या "खोपीवली"या  गावी,, ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रवास सुरू करणाऱ्या मंगल डोंगरे यांनी १३ ऑगस्ट १९८७ रोजी मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील ब्लास्ट कार्बो ब्लॉक्स प्रा. लि. कंपनीत नोकरीला सुरुवात केली. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी पत्रकारिता, कामगार चळवळ आणि समाजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

कामगारांच्या न्यायहक्कांसाठी लढा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, गोरगरिबांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत नेणे, तसेच सामाजिक अडचणींमध्ये मदतीचा हात देणे ही त्यांची कार्यशैली राहिली. कोरोना काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक गरजूंना मदत केली.

पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी व्हॉईस ऑफ मीडिया, पत्रकार सुरक्षा समिती, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ यांसारख्या संघटनांमध्ये विविध पदांवर काम करत शेकडो पत्रकारांना संघटित केले. तर कामगार क्षेत्रात महाराष्ट्र मजदूर संघासह विविध संघटनांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळली.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आदर्श पत्रकार, समाजभूषण, समाजरत्न यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तर शिर्डी येथे तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार, तसेच पंढरपूर येथे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या सहा जिल्हाध्यक्ष मध्ये कोकण मुंबई विभागातून उत्कृष्ट जिल्हा अध्यक्ष म्हणून राज्यपाल हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याला राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला.

सेवापूर्ती निमित्त कंपनीत आयोजित सत्कारानंतर मित्रपरिवार, नातेवाईक,सहकारी, पत्रकार, आणि सामाजिक कार्यकर्ते व कुटुंबीयांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून त्यांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत, समाजसेवेची त्यांची वाटचाल अशीच अविरत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

"नोकरीतून निवृत्ती झाली असली तरी समाजसेवेच्या प्रवासातून नाही," अशा शब्दांत उपस्थितांनी मंगल डोंगरे यांच्या कार्याचा गौरव केला.

कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू ; विविध योजनांसह 50 कोटींचा निधी मंजूर !!

कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू ; विविध योजनांसह 50 कोटींचा निधी मंजूर !!

नवी मुंबई दि. ०३, :- ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा आणि सन्मानाचा घालवता यावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय कोकण भवन येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक यांनी दिली आहे. 

या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे सामाजिक जीवन सुसह्य करणे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राखणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांना हक्काचे विमा संरक्षण आणि वैद्यकीय मदत मिळवून देणे शक्य होणार आहे. याशिवाय वृद्धापकाळात होणारी छळवणूक, जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण आणि निवारा यांसारख्या अत्यंत संवेदनशील बाबींवरही हे महामंडळ विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१११/महामंडळे, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ अन्वये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी या स्वतंत्र महामंडळाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता नवी मुंबईतील सी.बी.डी. बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमधील ६ व्या मजल्यावर, रूम नंबर ६१९ मधील प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण (मुंबई विभाग) यांच्या कार्यालयात हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांच्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.

या महामंडळाच्या सुचारू कामकाजासाठी शासनाकडून ५० कोटी रुपयांचे भरीव भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. कोकण भवन येथील या कार्यालयाशी ज्येष्ठ नागरिकांना थेट संपर्क साधता यावा, यासाठी ०२२-२७५७५९७९ हा अधिकृत दूरध्वनी क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अडचणींसाठी व शासकीय योजनांच्या लाभासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

म्यानमारचे राष्ट्रपती जेएनपीएच्या दौऱ्यावर !

म्यानमारचे राष्ट्रपती जेएनपीएच्या दौऱ्यावर !

** बंदराच्या पायाभूत सुविधांची आणि भावी विस्तार योजनांची घेतली माहिती.

उरण ३, (विठ्ठल ममताबादे) : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथे मंगळवार, २ जून २०२६ रोजी म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम  मिन आंग ह्लाइंग यांच्या भेटीचा सन्मान लाभला. या भेटीदरम्यान महामहिम राष्ट्रपती यांच्यासमवेत ६७ सदस्यीय अधिकृत शिष्टमंडळ उपस्थित होते.जेएनपीएमध्ये आगमनानंतर, म्यानमारच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, भा. प्र. से. आणि जेएनपीएच्या विभागप्रमुखांनी उत्साहपूर्ण व आदरपूर्वक स्वागत केले.

भेटीदरम्यान शिष्टमंडळाला जेएनपीएच्या बंदर पायाभूत सुविधा, कार्यक्षमता, क्षमता विस्तार उपक्रम, धोरणात्मक विकास प्रकल्प, शाश्वतता उपाययोजना तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक म्हणून विकसित होत असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाची माहितीही देण्यात आली. हा प्रकल्प प्रादेशिक सागरी व्यापार वृद्धीस चालना देणारा आणि देशाच्या सागरी क्षेत्रातील महत्त्वाचा विकास टप्पा मानला जात आहे.

यावेळी महामहिम राष्ट्रपती यांनी जेएनपीएने भारतातील क्रमांक एकचे बंदर म्हणून मिळवलेले स्थान हे त्याच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचे आणि सक्षम सेवा क्षमतेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. त्यांनी आपल्या देशातही बंदर विकास उपक्रमांना गती देण्याची इच्छा व्यक्त केली तसेच बंदर क्षेत्राविषयी अधिक माहिती जाणून घेणे, जेएनपीएच्या अनुभवातून शिकणे आणि ज्ञानविनिमय व परस्पर सहकार्याच्या संधींचा आढावा घेणे याबाबत शिष्टमंडळाची विशेष उत्सुकता असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, भा. प्र. से. म्हणाले, “म्यानमार प्रजासत्ताक संघराज्याचे राष्ट्रपती महामहिम  मिन आंग ह्लाइंग आणि त्यांच्या मान्यवर शिष्टमंडळाचे जेएनपीएमध्ये स्वागत करण्याचा आम्हाला सन्मान लाभला. या भेटीमुळे भारताच्या सागरी क्षेत्रातील क्षमता, जेएनपीएची उत्कृष्ट कार्यक्षमता तसेच वाढवण बंदर प्रकल्पासह भविष्योन्मुख विकास उपक्रम सादर करण्याची एक उत्तम संधी मिळाली. भारत आणि म्यानमार यांच्यातील सागरी व व्यापारविषयक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी तसेच प्रादेशिक संपर्क, आर्थिक विकास आणि परस्पर प्रगतीस चालना देणाऱ्या नव्या सहकार्याच्या शक्यतांचा वेध घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

यावेळी शिष्टमंडळाने बंदर परिसराला भेट देऊन बंदराची कार्यक्षम कामकाज पद्धती, माल हाताळणी प्रक्रिया तसेच एकात्मिक लॉजिस्टिक्स परिसंस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीद्वारे जेएनपीएच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यामधील त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली.
व्यापार, संपर्कक्षमता आणि शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी व्यापक इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सहकार्य आणि प्रादेशिक भागीदारीची भूमिका अधिक बळकट होत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.

उरणच्या ८ खेळाडूंची गरुडझेप ; महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड !

उरणच्या ८ खेळाडूंची गरुडझेप ; महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड !

** राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे प्रतिनिधित्व

उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे) : औद्योगिक आणि किनारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्याच्या क्रीडा इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे. उरणमधील तब्बल आठ खेळाडूंनी महाराष्ट्र आईस हॉकी संघात स्थान मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून, ते उत्तराखंडमधील देहरादून येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
आईस हॉकीसारख्या प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या आणि विशेष कौशल्याची गरज असणाऱ्या खेळात उरणसारख्या किनारपट्टीच्या भागातून खेळाडू तयार होणे ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब मानली जात आहे. 

१२ वर्षांखालील गट: वरदा आसरकर, शिवांश तांडेल १५ वर्षांखालील गट: अर्थ सावंत, रुद्र घरत, रेवा पाटील. १८ वर्षांखालील गट: सुरज करण.सीनियर गर्ल्स गट: स्नेहा शेळके, शर्वणी या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

या खेळाडूंच्या यशामागे 'श्री स्केटिंग अकॅडमी'चे संस्थापक व प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी घेतलेले अपार परिश्रम, सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन आणि खेळाडूंमध्ये निर्माण केलेली जिद्द यामुळेच उरणच्या खेळाडूंनी ही गरुडझेप घेतली आहे. बर्फावर खेळल्या जाणाऱ्या या अत्यंत वेगवान आणि रोमांचक खेळात शारीरिक तंदुरुस्ती, विवेक संतुलन आणि चपळ निर्णयक्षमतेची गरज असते. महाराष्ट्रात स्केटिंगच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार वेगाने वाढत आहे.
या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे  प्रतिनिधी प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करावी आणि उरणच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरावा अशी अपेक्षा आणि विश्वस्ताने क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे .सद्यस्थितीत सर्व खेळाडूंवर सर्वच क्षेत्रातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !!

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !!

** मात्र मुख्य रेती चोरांना अभय, कारवाई नाही 

केवणी रेती बंदर येथे कारवाई करताना महसूल अधिकारी व ग्रामीण पोलीस प्रशासन

*भिवंडी, दि. 4 जून 2026, (अरुण पाटील) :

हा"सरळ बातमीदार"च्या "बातमीदार माझा" या अधिकृत पोर्टलवर 1 जून 2026 रोजी केवणी रेती बंदर येथे सुरू असलेल्या अवैध रेती चोरी व वाहतुकीबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर महसूल विभागाने आज केवणी व काल्हेर रेती बंदर येथील अवैध रेती साठ्यांवर मोठी कारवाई केली. मात्र मुख्य रेती चोर व वाहतूकदारांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

*23 अवैध कुंड्या नष्ट*  
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील व उपविभागीय अधिकारी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार अभिजित खोले यांच्या आदेशाने महसूल विभाग भिवंडी व भिवंडी तालुका पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई केली. मौजे केवणी रेती बंदर व काल्हेर रेती बंदर येथील राखीव वन व गुरूचरण क्षेत्रात खाडीमधून अनधिकृतपणे उपसा करून साठवलेल्या रेतीच्या कुंड्यांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

या कारवाईत मौजे केवणी रेती बंदर येथील सर्वे क्रमांक 181/अ, क्षेत्र 22.33.39 हेक्टर आर चौ.मी व सर्वे क्रमांक 181/ब, क्षेत्र 08.03.61 हेक्टर आर चौ.मी तसेच मौजे काल्हेर येथील सर्वे क्रमांक 114, क्षेत्र 03.32.85 हेक्टर आर चौ.मी या ठिकाणी उभारलेल्या एकूण 23 अवैध रेती साठवणूक कुंड्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या. केवणी येथील 15 व काल्हेर येथील 8 कुंड्यांचा समावेश आहे. या कुंड्यांचा वापर खाडीमधून चोरी करून आणलेली रेती साठवण्यासाठी केला जात असल्याचे महसूल विभागाच्या पाहणीत आढळले. 

*रात्रीच खेळ चाले*
तसेच स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार केवणी रेती बंदर येथे रोज रात्री ८ वा.ते १० वाजे दरम्यान बार्ज व सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर उत्खनन केलेली रेती या किनाऱ्यावर खाली केली जाते व त्याच दरम्यान ती त्या ठिकाणावरून जेसीबी यंत्राने विविध डंपर मध्ये भरून पहाटे पर्यंत चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते.

*रातोरात रेती गायब*  
3 जून 2026 च्या रात्री केवणी रेती बंदर येथे जवळपास 800 ते 1000 ब्रास रेती साठवून ठेवली होती. मात्र 4 जून रोजी महसूल प्रशासन छापा टाकणार असल्याची गुप्त माहिती रेती चोर व वाहतूकदारांना मिळाल्याने त्यांनी ती साठवलेली रेती रातोरात उचलून नेली. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबत "बातमी गळती" करणाऱ्या व्यक्तीला शोधून त्याच्यावर पहिली कारवाई करावी, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

*माफियांच्या साखळीला धक्का*  
या कारवाईमुळे अवैध रेती चोर व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या साखळीला मोठा धक्का बसला असून रेती माफियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने यापूर्वीही भिवंडी तालुक्यात अवैध रेती उत्खन, वाहतूक व साठवणुकीविरोधात वारंवार कारवाया करून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र गुन्हे मुख्य आरोपींविरोधात न करता बार्ज व सक्शन पंपावर काम करणाऱ्या गरीब मजुरांवरच दाखल केले जात असल्याचा आरोप होत आहे.

*कारवाईत सहभागी यंत्रणा*  
या कारवाईत मंडळ अधिकारी खारबाव, मंडळ अधिकारी भिवंडी, मंडळ अधिकारी आनगाव, मंडळ अधिकारी राहूर यांच्यासह त्यांच्या अधीनस्थ सर्व ग्राम महसूल अधिकारी, कांदळवन संधारण घटक ठाणे, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, भिवंडी ग्रामीण पोलीस व नारपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती भिवंडीचे अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

महसूल विभागाच्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. अवैध रेती उत्खन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांना प्रशासनाने कठोर इशारा दिला असून शासनाच्या आदेशानुसार अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात भविष्यातही अधिक तीव्र व सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Wednesday, 3 June 2026

"जेएनपीटी पोर्ट रोडवर प्रशासनाचा निष्काळजीपणा !!

"जेएनपीटी पोर्ट रोडवर प्रशासनाचा निष्काळजीपणा !!

** ऑईल टँकर पलटी, हजारो लिटर तेलाची नासाडी; 'मृत्यूच्या सापळ्या'कडे प्रशासनाचे दुर्लक्ष?"

उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात जेएनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. पियूपी बिल्डिंग परिसरात आज सकाळी १०:४० वाजता तेलाने भरलेला एक ऑईल टँकर अचानक पलटी झाल्याने हजारो लिटर तेल रस्त्यावर सांडले. या अपघातामुळे पोर्टची वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर रस्ता निसरडा होऊन दुसऱ्या मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.

उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर आज सकाळी तेलाने भरलेला टँकर पलटी झाला. घटनास्थळाजवळच इंडियन कस्टमचे कार्यालय असल्याने आणि हा मार्ग पोर्टसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हजारो लिटर तेल रस्त्यावर सांडल्याने रस्ता पूर्णपणे निसरडा झाला आणि आणखी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रित केली, मात्र तोपर्यंत मोठे आर्थिक व पर्यावरणीय नुकसान झाले होते.


स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित विभागांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेएनपीटी पोर्ट रोडवर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिकाच सुरू आहे. अवजड वाहनांची बेसुमार वर्दळ, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटी आणि वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन होत असताना प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप नागरिकांनी केला. प्रत्येक वेळी अपघात झाल्यावर केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. एखाद्या दिवशी मोठी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा रस्ता आता 'मृत्यूचा सापळा' बनला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.


या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हजारो लिटर तेल वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून तेल रस्त्यावर व गटारात मिसळल्याने पर्यावरणीय धोकाही निर्माण झाला आहे. तेलामुळे रस्ता निसरडा झाल्याने दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. नागरिकांनी या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. अवजड वाहनांवर कडक नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, वेगमर्यादा पाळण्यास भाग पाडणे आणि अपघातप्रवण ठिकाणांची तपासणी करून गतिरोधक, सूचना फलक यांसारख्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ अपघात झाल्यावर घटनास्थळी धाव घेणारे प्रशासन अपघात रोखण्यासाठी ठोस पावले कधी उचलणार, असा प्रश्न आता उरणकर विचारत आहेत. संबंधित विभागांनी वेळीच दखल न घेतल्यास यापेक्षाही मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे

वसई विरार शहरातील सार्वजनिक ठिकाणी लवकरच मोफत वायफाय सुविधा व नालासोपारा ते तहसिलदार बससेवा सुरू करण्याची मागणी मान्य !!

वसई विरार शहरातील सार्वजनिक ठिकाणी लवकरच मोफत वायफाय सुविधा व नालासोपारा ते तहसिलदार बससेवा सुरू करण्याची मागणी मान्य !!

*बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांची महापौर अजीव पाटील साहेबांकडे मागणी...*

नालासोपारा ता, ३ :- लोकनेते आमदार हितेंद्र ठाकुर साहेब, युवा आमदार क्षितीज दादा ठाकुर, उपमहापौर मार्शल लोपीस साहेब व जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधु) यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील साहेब यांची भेट घेऊन नागरिकांच्या विविध महत्त्वाच्या समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.

या भेटीदरम्यान वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा, बस स्थानके, सार्वजनिक उद्याने तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा लाभ होईल. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवासादरम्यान तसेच विविध शासकीय कामे ऑनलाइन पद्धतीने सुलभपणे पूर्ण करता येतील यासंदर्भात महापौर साहेबांनी मागणी मान्य करत लवकरच काम पूर्णत्वास होईल असे आश्वासन देण्यात आले.

तसेच नालासोपारा बस डेपोपासून वसई तहसीलदार कार्यालयापर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याबाबत पूर्वी करण्यात आलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. ही बस सेवा सुरू झाल्यास नालासोपारा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

याशिवाय सोपारा गावातील जामा मस्जिद परिसरातील अरुंद नाल्याची रुंदी वाढवून त्याचे नव्याने बांधकाम करण्याची मागणीही करण्यात आली. पावसाळ्यात या परिसरात पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये तसेच मशिदीत पाणी शिरण्याची समस्या निर्माण होते. नाल्याची रुंदी वाढविल्यास पूरस्थिती टाळण्यास मदत होईल व नागरिकांना दिलासा मिळेल.

या तीनही महत्त्वाच्या विषयांवर महापौरांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नागरिकांच्या हितासाठी हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी रूचिता नाईक, दानिश करारी, महेश निकम, जया गुप्ता उपस्थित होते.

चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा..

चार दशकांच्या सेवेला सलाम; झुंजार कामगार नेते मंगल डोंगरे यांचा गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा.. मुरबाड (प्रतिनिधी) : कामगार चळवळ, प...