Wednesday, 24 June 2026

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी उपक्रम...

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी उपक्रम...

*समाजसेविका रुचिता नाईक यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम...*

नालासोपारा ता, २४ :- सामाजिक बांधिलकी जपत आणि  सेवाभावी उपक्रम राबवत बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते व वसई विकास सहकारी बँकेचे मा.संचालक "हेमंत म्हात्रे (बंधू)" यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन समाजसेविका रुचिता नाईक यांचा वतीने नालासोपारा शहरात करण्यात आले होते.

सोपारा हॉस्पिटल येथे रूग्णांना मोफत फळे वाटप उपमहापौर मार्शल लोपीस साहेब व नगरसेवक अतुल दादा साळुंखे यांचा उपस्थितीत करण्यात आले. या भावस्पर्शी उपक्रमाने रुग्णांचा चेहर्‍यावर मोठा आनंद पाहायला मिळाला फळे स्विकारताना जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांना निरोगी आणि उदंड आयुष्याचा भरभरून शुभेच्छा दिल्या.
 उपमहापौर मार्शल लोपीस साहेब यांनी रुग्णांची आपुलकीने विचारपूस केली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रुग्णालयातील समस्यांबाबत डॉक्टर यांच्याशी चर्चा करून आरोग्य सेवेत अधिक गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांना आदेश दिले.

वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या कृतज्ञतापूर्ण  उपक्रमाबद्दल रुचिता नाईक आणि उपस्थित मान्यवरांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गुरुवारी अंगणवाडी क्रमांक ११० येथे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बहुजन विकास आघाडीचे नवनाथ पगारे, हितेश म्हात्रे, भाविक चावडा, जया गुप्ता, महेश निकम, अमित नाईक, नीतेश पाटील, उपस्थित होते.

वालधुनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी आयुक्तांचा ठोस निर्णय; उल्हासनगर-अंबरनाथला नोटीस !!

वालधुनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी आयुक्तांचा ठोस निर्णय; उल्हासनगर-अंबरनाथला नोटीस !!

*कल्याण, दि. 23 जून 2026*

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था, कल्याण पश्चिम सातत्याने पाठपुरावा करत आहे. संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर मागील सहा महिन्यांपासून माननीय महापौर, आयुक्त व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे याबत पाठपुरावा करत आहेत.

*पाणी दौऱ्यातून प्रत्यक्ष पाहणी*  
संस्थेच्या मागणीनुसार 13 जून 2026 रोजी माननीय आयुक्त, महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वालधुनी नदीचा प्रत्यक्ष पाणी दौरा करण्यात आला. या दौऱ्यात नदीतील वाढते प्रदूषण, सांडपाणी व घनकचरा याबत सविस्तर पाहणी करण्यात आली.

*उल्हासनगर व अंबरनाथला नोटीस*  
पाणी दौऱ्यानंतर माननीय महापौर व आयुक्त यांनी ठोस भूमिका घेतली. उल्हासनगर महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या क्षेत्रातून वालधुनी नदीत सोडले जाणारे प्रदूषित पाणी तात्काळ थांबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार नोटीस क्रमांक 521, दिनांक 23 जून 2026 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागामार्फत संबंधित संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे.

*संस्थेचे पदाधिकारी उपस्थित*  
या पाणी दौऱ्यास संस्थेचे पदाधिकारी विशांत कांबळे, गणेश कांबळे, सुरेश अहिरे, सुनीता खेताडे, सुरेखा दिविलकर, रसिका बागवे, अनिल सरदार तसेच विविध स्थानिक संस्था व नागरिक उपस्थित होते.

आयुक्तांनी घेतलेल्या या सकारात्मक व ठोस निर्णयाचे संस्थेने स्वागत केले आहे. वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आवश्यक कामांना तात्काळ सुरुवात करावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

दिबांच्या नावासाठी तरुण पेटून उठले तर मी आजही नेतृत्व करायला तयार : भारतीताई पोवार

दिबांच्या नावासाठी तरुण पेटून उठले तर मी आजही नेतृत्व करायला तयार : भारतीताई पोवार

** महेंद्रशेठ घरत यांनीही दिबांना केले अभिवादन 

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : अत्याधुनिक सेवा सुविधाने परिपूर्ण असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन सहा महिने झाले, आता लवकरच आंतरराष्ट्रीय विमाने उडतील, परंतु दि. बा. पाटील साहेब यांचे नाव विमानतळाला दिले गेले नाही, ही शोकांतिका आहे. कारण सरकारला दिबांच्या नावाची एलर्जी आहे. त्यांना त्यांच्या बॉसचे नाव द्यायचे आहे, अशी घणाघाती टीका १९८४ च्या गौरवशाली आणि शौर्यशाली ऐतिहासिक आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांनी दिबांना जासई येथे अभिवादन केल्यानंतर केली. आज दिबांचा स्मृतिदीन असल्याने कोल्हापूरवरून भारतीताई दिबांना अभिवादन करण्यासाठी आल्यात होत्या. जासई येथे दिबांच्या आठवणी दाटून आल्याने भारतीताई अश्रू अनावर झाले.
त्यानंतर त्यांनी पनवेल येथील 'संग्राम' बंगल्यावर दिबांना अभिवादन केले. सोबत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत होते. यावेळी दिबांची सून मनीषा पाटील यांनी भारतीताईंचे स्वागत केले.

 यावेळी त्या पुढे म्हणाल्या, "१९८४ च्या आंदोलनावेळी मी ऐन तारुण्यात म्हणजे २३ वर्षांची होती. वयाच्या अकराव्या वर्षापासून मी शेकापची कार्यकर्ती म्हणून काम करीत होते. त्यामुळे नसानसांत आंदोलने भिनलेली होती. साहजिकच दिबांचा आदेश शिरसावंद्य मानून आंदोलनासाठी कशाचीही तमा न बाळगता आले होते. दिबांसहित बहुतांश नेते सरकारने तुरुंगात डांबले होते. त्यामुळे तत्कालीन सरकारला हे आंदोलन यशस्वी होईल, याची सुतराम शक्यता नव्हती. मी आल्यानंतर दहा-बारा गावांत फिरले, तिथे गुप्त बैठका घेतल्या. वाहतुकीची फार साधने नसल्याने बहुतांश गावे पायीच फिरले. हातावर पोट असणाऱ्या महिलांना जमीन संपादन विषय समजून सांगितला. सरकार कशा पद्धतीने शेतकरी वर्गाची फसवणूक करतेय आणि दि. बा. पाटील साहेब आपल्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा म्हणून लढत आहेत, हेही ठासून सांगितले. त्यामुळे गावोगावी आंदोलनाचे वारे पसरले. त्यामुळेच ज्या दिवशी जमीन संपादन करण्यात येणार होती, त्यास विरोध करण्यासाठी लाखो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले. सरकारला कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन चिरडायचे होते. साहजिकच पोलिस आणि एसआरपी तयारीनिशी होते. त्याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आणि बेछूट गोळीबारही केला. त्यात ५ हुतात्मे झाले. ते केवळ सरकारच्या बिनडोकपणामुळे. दि. बा. पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच शेतकऱ्यांना काहीअंशी न्याय मिळाला, कालांतराने साडेबारा टक्के जमिनीचे सूत्र देशभर लागू झाले दिबांमुळे. तसेच मंडल आयोगाचा लढाही दिबांनी यशस्वी केला. त्यामुळे ओबीसी समाजाला फायदा झाला, परंतु ओबीसी समाजाला दिबांचे महत्त्व समजलेच नाही, असे मला वाटते. दि. बा. पाटील साहेब हे देशाचे तत्वांशी जगलेले नेते, परंतु आताच्या सरकार केवळ मिंधे हवेत. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून आयुष्य वेचणारा दिबांसारखा नेता चालत नाही, असे सध्याचे सरकारचे आचरण पाहता मला वाटते. वास्तविक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगीच दिबांचे नाव लागायला हवे होते, पण सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला, हे माझे ठाम मत आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळ नावासाठी जर तरुण पेटून उठले, तर मी नेतृत्वाची धुरा सांभाळायला तयार आहे, असे भारतीताई पोवार म्हणाल्या.

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, "दि. बा. पाटील साहेब आमची अस्मिता आहेत. ते देशातील अठरापगड जातींतील समाजाचे नेते होते. अशा महान लोकनेत्याचा सरकारला विसर पडला आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितले दिबांचे नाव विमानतळाला लागेल. मग उद्घाटन होऊन आणि आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण होईपर्यंत तयारी झाली आहे, तरीही दिबांचे नाव अद्याप का नाही, भूमिपुत्रांचा सरकार अंत पाहत आहे का, थोडक्यात सरकारने झोपेचे सोंग घेऊन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसलीत, हे लांच्छनास्पद आहे."

यावेळी रश्मिता पोपेटा यांनी दिबांच्या नावासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याठिकाणी भारतीताई पोवार, महेंद्रशेठ घरत यांनी भेट दिली आणि उपोषणास पाठिंबा दिला. आज सर्वपक्षीय नेत्यांनीही दिबांना अभिवादन केले.

प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले विनम्र अभिवादन !

प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार मनोहर भोईर  यांनी केले विनम्र अभिवादन !

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज, भूमिपुत्रांचे कैवारी, १९८४ च्या उरणच्या शेतकरी आंदोलनाचे प्रणेते, सर्वसामान्य जनतेचे कल्याणासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या स्मृतिदिना निमित्त बुधवार दिनांक २४ जून २०२६ रोजी शिवसेना (ठाकरे) पक्ष्याचे रायगड जिल्हप्रमुख व उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  मनोहरशेठ भोईर व उरण पंचायत समितीचे सदस्य  दीपक भोईर यांनी स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील साहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, जासई येथे जाऊन उरण मतदार संघातील प्रकल्पग्रस्त जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, सदर वेळी स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या आठवणींना  उजाळा देऊन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी स्वर्गीय पाटील साहेबांबद्दल असलेला आदर व त्याने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

Tuesday, 23 June 2026

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !!

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !!

1984 च्या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांचे रोखठोक मत

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापही दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशी सरकारने केलेली प्रतारणा आहे, असे रोखठोक मत १९८४ च्या उरणच्या शेतकऱ्यांच्या लढ्यातील अग्रभागी असलेल्या रणरागिणी भारतीताई पोवार यांनी जसखार येथे मंगळवारी (ता. २३) आपले मत व्यक्त केले. यावेळी भारतीताई म्हणाल्या, "१९८४ च्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व दि. बा. पाटील साहेब करीत होते. ते आंदोलन शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळाला म्हणून होते. दि. बा. पाटील साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सरकारने तुरुंगात डांबले होते. त्यावेळी दिबांचा मला आदेश आला, तुम्ही तातडीने निघून या. त्यावेळी मी २३ वर्षांची होती. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मी तान्ह्या बाळाला घरी सोडून कोल्हापूर येथून तडक निघून आले जासईला. त्यावेळी आंदोलनात सहभागी होण्यासाठी उरणला येण्यासाठी माझ्याकडे तिकिटासाठी जवळ पैसे नव्हते. एकाकडून शंभर रुपये उसणे घेऊन आले. पाहतो तर परिसरातील गावे ओस पडली होती. प्रचंड पोलिसांचा फौजफाटा होता. एसआरपी बंदुका जणू रोखूनच होते, अशी भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे दिबांनी जणू काही माझ्यावर विश्वास ठेवून आंदोलनाचे नेतृत्व माझ्याकडे सोपवून पुढील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जणू आदेश दिला होता. तो कार्यकर्ती म्हणून मी स्वीकारला आणि आंदोलनाच्या तयारीसाठी गावोगावी जाऊन गुप्त बैठका घेतल्या. या बैठकांमधून निर्धार करण्यात आला. सरकारसमोर झुकायचे नाही. एक इंच जमिनीवर सुद्धा ताबा द्यायचा नाही. त्यामुळे 
 १९८४ च्या त्या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यात गावोगावच्या शेतकऱ्यांनी घरादाराला कुलपे लावून एकप्रकारे घरावर तुळशीपत्र ठेवून रस्त्यावर उतरले होते. ते दिवस अंगावर काटा आणणारे आहेत." असेही भारतीताई म्हणाल्या.

दिबांची  (ता. २५) पुण्यतिथी आहे. त्यामुळे भारतीताई दिबांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरवरून आल्या आहेत. त्यांचे आगमन होताच स्वतः आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे सारथ्य केले. सर्वप्रथम भारतीताई यांनी गव्हाण येथील शांतादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर उरण तालुक्यातील जसखार येथील रत्नेश्वरीचे दर्शन घेतले. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश आणि दप्तरांचे  वाटप त्यांच्या हस्ते झाले. 

यावेळी महेंद्रशेठ घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीताई म्हणाल्या, "आंदोलनाला जवळ जवळ ४२ झालीत, पण माझा सन्मान फक्त महेंद्रशेठ घरत यांनी आईच्या नावाने पुरस्कार देऊन केला. सध्या सर्वांचे भले व्हावे म्हणून विचार करणारा महेंद्रशेठ मला दिसतोय. त्याचे काम मी डोळ्यांदेखत पाहातोय. तो ग्रेट माणूस आहे." 

त्यानंतर त्या आंदोलनात सक्रिय असणारे पी. जे. पाटील यांची भारतीताई आणि महेंद्रशेठ घरत यांनी सदिच्छा भेट घेतली आणि आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला. पी. जे. पाटील परिवाराने यावेळी भारतीताई यांचा साडीचोळी देऊन यथोचित सन्मान केला.
दरम्यान, उरण परिसर पाहून भारतीताई गहिवरल्या. जुन्या आठवणींत रमल्या. महेंद्रशेठ घरत स्वतः गाडी चालवत असल्याने त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा, गावांचा, परिसराचा, डोंगररांगांचा आवर्जून उल्लेख केला. हा संपूर्ण परिसर मी पायी फिरले. अनेक जण सोबत होते. तहानभूक विसरून आंदोलन केले. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. हे सर्व महेंद्रशेठ घरत ऐकून घेऊन म्हणाले, "मी त्यावेळी १२ वीला होतो. विद्यार्थिदशेत असतानाही आंदोलन सहभागी झालो होतो. माझ्या शेजारी असणाऱ्या गव्हाण कोपर येथील एका सहकारीला गोळी लागली. पोलिसांच्या गोळीबारामुळे सगळे सैरावैरा पळत होते"

३० जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करा; अन्यथा १० हजारांचा दंड !!

३० जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करा; अन्यथा १० हजारांचा दंड !!

*मुंबई, दि. 23 जून 2026*

प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम 2023 अंतर्गत नोंदणीकृत सर्व नियतकालिकांच्या प्रकाशकांनी आर्थिक वर्ष 2024-25 चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र Annual Statement 30 जून 2026 पर्यंत प्रेस सेवा पोर्टल PSP वर ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी केले आहे.

*बंधनकारक सूचना*  
प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम 2023 मधील कलम 14(1)(ब) व 14(3) नुसार प्रत्येक नोंदणीकृत नियतकालिकासाठी वार्षिक विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 चे विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांना 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

*दंडात्मक कारवाई*  
निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर न केल्यास संबंधित प्रकाशकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
*पहिले उल्लंघन*: किमान 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.  
*पुढील उल्लंघन*: त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल.  
*कमाल मर्यादा*: एकूण दंडाची कमाल मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

प्रेस रजिस्टर जनरल यांनी आर्थिक वर्ष 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र अद्याप दाखल न केलेल्या प्रकाशकांना 30 जूनपूर्वी प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन विवरणपत्र सादर करून दंडात्मक कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

केंद्र शासनामार्फत स्टँड अप इंडिया योजना राबविण्यात येत असून, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेला पूरक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांसाठी मार्जिन मनी सहाय्य योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. योजनेच्या लाभासाठी प्रकल्प खर्चाच्या १० टक्के स्वहिस्स्याचा भरणा केल्यानंतर आणि संबंधित बँकेने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर, उर्वरित १५ टक्के रक्कम फ्रंट एंड सबसिडी (मार्जिन मनी) स्वरुपात राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील इच्छुक व पात्र नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी उपक्रम...

बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी उपक्रम... *समाजसेविका रुचिता नाईक यांचा स्तु...