Saturday, 25 April 2026

सरळगाव येथे प्राचार्य श्री. गोरख ओंकार माळी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !!

सरळगाव येथे प्राचार्य श्री. गोरख ओंकार माळी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !!

सरळगाव (ता. मुरबाड, जि. ठाणे) : ता. २५,
पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचलित सरळगाव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शाळेचे प्राचार्य श्री. गोरख ओंकार माळी यांच्या सेवापूर्तीनिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय बी. डी. काळे सर, मा. आमदार गोटीराम पवार, आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे खजिनदार भोईर सर, उपाध्यक्ष श्रीराम भोईर, मा.के.बी घाटोळे सर, मा. सोन्या पाटील तसेच श्री.एन.एम भामरे, मा.बी.एन पाटील, मा.प्रशांत भामरे सर मा.दिपक पवार साहेब. मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष मा. मनिषा देसले मॅडम, शाळा समितीचे सदस्य मा.विष्णु पवार, मा.राजेश झुंजारराव इ.यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, सरळगाव शाळेचे सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कारमूर्ती श्री. गोरख माळी सर यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात प्रामाणिकपणा, शिस्त आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यामुळे शाळेची शैक्षणिक प्रगती साधली. त्यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना माळी सरांच्या कार्यशैलीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली. शेवटी सत्कार, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देऊन माळी सरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पडले. संपूर्ण कार्यक्रम भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.

सौजन्य- श्री विश्वनाथ राऊत सर

Friday, 24 April 2026

ग्रामपंचायत नोंदीत फेरफार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश !!

ग्रामपंचायत नोंदीत फेरफार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश !!

कल्याण प्रतिनिधी – विशाल कुरकुटे

पंचायत समिती कल्याण यांच्या कार्यालयातून ग्रामपंचायत रायते, ता. कल्याण, जि. ठाणे येथील प्रकरणात महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेतील ठरावांच्या अनुषंगाने बोपस व नमुने क्रमांक ८ व ९ क्षेत्रातील अतिक्रमण धारकांची नोंद व कर आकारणी करताना अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेतलेल्या बाबींमध्ये फेरफार केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले असून संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात श्री.राजू सोनवणे यांनी दिलेल्या अर्जांवर व पत्रव्यवहारावरून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमबाह्य कृत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीने स्पष्ट केले आहे.

'सुखी माणसाचा सदरा' म्हणजेच चंद्रकांत मढवी ; माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार !!

'सुखी माणसाचा सदरा' म्हणजेच चंद्रकांत मढवी ; माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे गौरवोद्गार !!

चंद्रकांत मढवी हे अजातशत्रू : महेंद्रशेठ घरत

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
 "काही कर्मचारी सेवेत असताना कामापेक्षा उचापती जास्त करतात; परंतु चंद्रकांत मढवी यांनी कामावर निरपेक्ष भावनेने प्रेम केले. त्यांनी आपली जीवनशैली आणि कामाप्रती असलेले उत्तरदायीत्व यांची उत्तम सांगड घातली आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे की, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे'. त्यामुळे आपणही सुखी माणसाचा सदरा शोधायला जातो; परंतु ३० वर्षांच्या सेवापूर्तीनंतरही चंद्रकांत मढवी यांच्याकडे बघून वाटते ते सुखी माणसाचा सदरा लेवून आले आहेत," असे गौरोदगार माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि ज. आ. भगत ज्युनियर महाविद्यालय गव्हाण-कोपर येथे काढले. श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे वरिष्ठ कर्मचारी चंद्रकांत मढवी यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रामशेठ ठाकूर होते. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, "भगत साहेबांनी चांगली माणसे पेरली. त्यांचा वसा रामशेठ ठाकूर चालवतात. रयत शिक्षण संस्थेसाठी तर ते सर्वाधिक मोठे देणगीदार आहेत. साहजिकच 'रयत'मध्ये त्यांच्या शब्दाला कमालीचा मान आहे. त्यांच्यामुळेच आज 'रयत'मध्ये अनेकांचे भले झाले आहे. 'रयत'च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांमध्येही अनेकांना मानाचे स्थान मिळाले आहे. आपल्याला आयुष्य जगता आले पाहिजे. सतत समाजासाठी काम केले पाहिजे. आपल्यावर असणारी जबाबदारी प्रामाणिकपणे पेलली पाहिजे. चंद्रकांत मढवी हे अजातशत्रू आहेत. त्यांनी आपल्या कामाने सर्वांवर छाप पाडली आहे." 

चंद्रकांत गजानन मढवी हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती समारंभ शुक्रवारी (ता.२४) विद्यालयात झोकात झाला. यावेळी त्यांचा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी मढवी यांच्यावर प्रेम करणारे, तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी प्रामाणिकपणा, साधा व सरळ माणूस अशा भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्रशेठ घरत, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,  चेअरमन अरुणशेठ भगत, जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, मो. का. मढवी गुरुजी, अनंता ठाकूर, विजय घरत, माईताई भोईर, प्राचार्य ज्योत्स्ना ठाकूर, व्ही. वाय. लेंभे, महेश म्हात्रे आणि विद्यालयाचा कर्मचारी वृंद उपस्थित होता. सागर रंधवे यांनी सूत्रसंचालन केले

उरण नगरपरिषदेतर्फे लाल मैदानावर धडक स्वच्छता मोहीम; नगराध्यक्षांनी स्वतः चालवला बुलडोझर !!

उरण नगरपरिषदेतर्फे लाल मैदानावर धडक स्वच्छता मोहीम; नगराध्यक्षांनी स्वतः चालवला बुलडोझर !!

​उरण  दि २४, (विठ्ठल ममताबादे) : ​उरण शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ व सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी उरण नगरपरिषदेच्या वतीने  स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान (लाल मैदान) येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्षा श्रीमती भावना घाणेकर यांनी स्वतः बुलडोझर चालवून या मोहिमेचे नेतृत्व केले आणि स्वच्छतेचा नवा आदर्श घालून दिला.​मैदानाची दुरवस्था आणि वाढलेला कचरा लक्षात घेता, नगरपरिषदेने  सकाळपासूनच ही व्यापक मोहीम हाती घेतली. सफाई कामगारांच्या खांद्याला खांदा लावून नगराध्यक्षांनी कामात सहभाग घेतला. मैदानाची व्याप्ती मोठी असल्याने नगरपरिषदेच्या नियमित कर्मचाऱ्यांसोबतच अतिरिक्त मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यामुळे मैदानातील कचरा आणि झाडेझुडपे काढण्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.​याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा भावना घाणेकर म्हणाल्या की, "सावरकर मैदान हे आपल्या शहराचे वैभव असून ते स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ही मोहीम केवळ आजपुरती मर्यादित नसून, शहर स्वच्छतेचा हा संकल्प पुढेही असाच सुरू राहील."
​उरण नगरपरिषदेने या मोहिमेच्या माध्यमातून 'स्वच्छ उरण, सुंदर उरण' असा संदेश दिला आहे. मैदानावर कचरा न टाकता त्याचे पावित्र्य राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, आगामी काळात शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणीही अशाच मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

​"चला, आपले मैदान स्वच्छ ठेवण्यासाठी आणि उरणच्या वैभवात भर घालण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया!"अशी साद नागरिकांना नगराध्यक्ष भावना घाणेकर यांनी घातली आहे

ग्राम स्वराज्य', चला खेडी वाचवू या... सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांचे जनतेला आवाहन !!

ग्राम स्वराज्य', चला खेडी वाचवू या...  सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांचे जनतेला आवाहन !!

** शाश्वत विकास आणि प्रशासकीय संवेदनांचा कस याबाबत केली भावना व्यक्त.

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
    मानवी संस्कृतीचा पाया 'अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य' या पंचसूत्रीवर उभा आहे. निसर्ग आणि मानवी जीवन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र, आजच्या आधुनिकतेच्या आंधळ्या शर्यतीत आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत. महात्मा गांधीजींनी दिलेला ‘खेड्यांकडे चला’ हा मंत्र केवळ एक घोषणा नव्हती, तर ती एक परिपूर्ण, समाधानी आणि निसर्गपूरक जीवनशैलीची दिशा होती. आज वाढती उष्णता, प्रदूषण आणि कचऱ्याचे डोंगर पाहता, गांधीजींचा विचार आणि विनोबांची कर्मनिष्ठा पुन्हा एकदा अंगीकारण्याची वेळ आली आहे.असे मत उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी व्यक्त केले असून विविध सोशल मीडिया व जनतेला प्रत्यक्ष भेटून ते या बाबत जनजागृती करीत आहेत.

    आपले प्रशासक आणि लोकप्रतिनिधी शिक्षित आहेत परंतु साक्षर आणि सार्थक यातील धुसर संभ्रमात आहेत. त्यामुळे प्रशासकीय अनास्था आणि विकास म्हणजेच बांधकाम या चुकीच्या धोरणामुळे जनतेच्या घामाच्या पैशातून, कराच्या माध्यमातून सरकारी निधीतून सुशासन होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसते. शहरांमध्ये टोलेजंग इमारती आणि सिमेंटचे रस्ते होत आहेत, पण श्वास घ्यायला शुद्ध हवा आणि प्यायला शुद्ध पाणी मिळवणे कठीण झाले आहे. विकासाचे आराखडे आखताना पादचारी, सायकलस्वार किंवा सामान्य माणसापेक्षा मूठभर धनदांडग्यांच्या सोयीचा विचार प्राधान्याने केला जात आहे. ही विकासाची चुकीची धोरणे भविष्यात पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहेत.

    आचार्य विनोबा भावे यांनी आयुष्यभर विचार आणि व्यवहाराची सांगड घातली. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. आजच्या 'वापरा आणि फेकून द्या' या संस्कृतीमुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला एक अशी 'इकोसिस्टिम' हवी आहे, जिथे कचरा ही समस्या न राहता ती 'संपत्ती' बनायला हवी. विकेंद्रित पद्धतीने कचऱ्याचे खतात रूपांतर होऊन ती मातीला परत मिळायला हवी.

   पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणारी यंत्रणा हवी, जेणेकरून टँकरमुक्त गावे निर्माण होतील. केवळ काँक्रीटचे हायवे नकोत, तर झाडांच्या सावलीत असणारे सायकल ट्रॅक आणि चालण्यासाठी सुरक्षित पदपथ हवेत. जोपर्यंत आपली गावे स्वयंपूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शहरांवरील ताण कमी होणार नाही. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ‘ग्रामस्वराज्यात अन्नापासून ऊर्जेपर्यंत सर्व गोष्टी स्थानिक पातळीवर निर्माण होणे अपेक्षित होते. सौर ऊर्जा, सेंद्रिय शेती आणि स्थानिक रोजगाराला प्राधान्य दिल्यास 'स्वदेशी'चे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल. प्रशासकांनी केवळ फाईलवरचे आकडे न बघता, जमिनीवरचा निसर्ग वाचवण्यासाठी दूरगामी धोरणे आखण्याची गरज आहे.

     वाढते तापमान आणि निसर्गाचा कोप ही धोक्याची घंटा आहे. विकास म्हणजे केवळ सिमेंटचे बांधकाम नव्हे, तर माणसाचा आनंद आणि निसर्गाचा समतोल होय. जेव्हा आपले लोकप्रतिनिधी स्वतःला 'मालक' न समजता 'सेवक' समजून निसर्गपूरक जीवनशैलीला प्रतिष्ठा देतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने सुराज्य येईल. साधी राहणी आणि निसर्गाशी नाते जोडूनच आपण समृद्ध आणि शाश्वत भविष्याकडे वाटचाल करू शकतो.असे मत उरण मधील सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी व्यक्त केले आहे.

वालधुनी नदी प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा !!

कल्याण, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याण या प्रमुख शहरांमधून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पाण्याचा रंग अलीकडे रंगीबेरंगी होत असून त्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण येथील अधिकाऱ्यांसोबत वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीचा पाहणी दौरा (निरीक्षण) करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेसाठी आवश्यक यंत्रणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.
या पाहणी दौऱ्याचे प्रमुख मार्गदर्शन शशिकांत दायमा, सौ.रेखा अत्तरदे मॅडम, दिपाली आमडोस्कर व सुरेखा दिविलकर यांनी केले.
या  तपासणी व निरीक्षण मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर, तसेच भारती अय्यर, गणेश कांबळे, अनिल सरदार, सुरेश अहिरे व विशांत (बबली) कांबळे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.

दौऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यात आले असून संपूर्ण अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना व महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी संबंधितांना निमंत्रित केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिली.

Thursday, 23 April 2026

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ !!

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ !!

** महोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार

कोल्हापूर, दि. २२ : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ, तसेच विविध फळांची विक्री होण्याच्या उद्देशाने कृषी पणन मंडळामार्फत भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी या ठिकाणी २२ ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, हिंदकेसरी दीनानाथ सिंह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. मास्तोळी म्हणाले, या महोत्सवामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यास मदत होईल. पणन मंडळाने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अथवा तत्पूर्वी कोल्हापूर शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करावे, जेणेकरून आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध होईल. या फळ व मिलेट महोत्सवाचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

डॉ. सुभाष घुले प्रास्ताविक करताना म्हणाले की, आजचा महोत्सव हा कृषी पणन मंडळाचा 'रौप्य महोत्सव' असून या उपक्रमात राज्यातील ११ जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी झाले आहेत. या उपक्रमामुळे उत्पादक व ग्राहक यांच्यात थेट खरेदी होत असल्याने त्यांना दर्जेदार उत्पन्न मिळण्यास मदत होते.

यावेळी पणन मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या "पौष्टिक तृणधान्य पाककृती" पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर खानापूर येथील प्रगतशील शेतकरी विजय मोरे यांनी आंब्याच्या विविध जाती विकसित केल्याबद्दल त्यांचा आणि प्रसिद्ध रांगोळीकार शिवाजी जेऊरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचे उत्पादन घेणारे शेतकरी तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू आदी फळे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या महोत्सवाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी आहे. या प्रदर्शनात मिलेट व फळांचे तब्बल ४५ विविध स्टॉल आहेत. मानवी आरोग्याच्या दृष्टीने २३ तारखेपासून 'मिलेटचे महत्त्व' यावर डॉ. संदीप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे, डॉ. योगेश बन व डॉ. प्रतिभा ठोंबरे इ. आहारतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

यावेळी बबनराव रानगे, दत्ताजीराव वारके यांच्यासह अनेक प्रयोगशील शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुयोग टकले यांनी मानले.

प्रसिद्धी : विलासराव कोळेकर सर 

सरळगाव येथे प्राचार्य श्री. गोरख ओंकार माळी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !!

सरळगाव येथे प्राचार्य श्री. गोरख ओंकार माळी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न !! सरळगाव (ता. मुरबाड, जि. ठाणे) : ता....