महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!
*** १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध कामगिरीचे मान्यवरांकडून विशेष कौतुक
ठाणे प्रतिनिधी: ता. ३, महाराष्ट्र दिनानिमित्त दि. १ मे २०२६ रोजी साकेत पोलीस परेड मैदान, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला परेड संचलनाचा भव्य आणि दिमाखदार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणेचे पालकमंञी मा.श्री.एकनाथ संभाजी शिंदे साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी तथा नियंत्रक, नागरी सरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्यक्षेञरक्षक आमदार श्री.संजय केळकर, ठाणे महापौर सौ. शर्मिला पिंपळकर, उपमहापौर अरुण पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात पोलीस दल, वाहतूक नियंत्रण विभाग, अग्निशमन दल, केडीएमसी मालमत्ता विभाग, होमगार्ड, नागरी संरक्षण दल तसेच ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांनी संयुक्त सहभाग घेत उत्कृष्ट संचलन सादर केले.
नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका तालात संचलन करून महाराष्ट्राच्या एकतेचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडविले. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाला हीच खरी मानवंदना ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
नागरी संरक्षण दलाच्या परेडचे नेतृत्व महिलांकडे सोपविण्यात आले होते. परेड कमांडर म्हणून सौ.भारती सतीश देशमुख, उपविभागीय क्षेञरक्षक, वागळे ईस्टेट, ठाणे यांनी अत्यंत रुबाबदार नेतृत्व केले, तर सुपरनंबरी म्हणून सौ.रोहिणी आदेश गोलतकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पथकाने उत्कृष्ट संचलन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
सदर परेडसाठी गेले पंधरा दिवस स्वयंसेवकांनी कडक उन्हाची पर्वा न करता अत्यंत मेहनत, शिस्त आणि समर्पणाने सराव पूर्ण केला होता. या अथक परिश्रमांची दखल घेत नागरी संरक्षण दलाचे मा.उपनियंत्रक श्री.विजय जाधव, सहाय्यक उपनियंत्रक सौ.दीपा घरत मॅडम, उप मुख्य क्षेत्ररक्षक, ठाणे विभाग १, २, ३ व ४ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागी स्वयंसेवकांना सत्काररूपी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त प्रमाणपत्रांवर त्यांचे प्रेरणादायी छायाचित्र व विचार समाविष्ट करून प्रमाणपत्रांना विशेष स्वरूप देण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवानी यांचे विशेष योगदान लाभले. स्वयंसेवकांसाठी आवश्यक जॅकेट्स व कॅप्स उपलब्ध करून देणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे तसेच संपूर्ण पथकाचा उत्साह कायम ठेवण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. याशिवाय श्री.संजय मगर श्री.हनुमान चौधरी, उपमुख्य क्षेत्ररक्षक कमलेश श्रीवास्तव, विभागीय क्षेत्ररक्षक सुब्रमन्यम मुरुगन तसेच अरुण सातपुते यांनीही सातत्याने सहकार्य व प्रेरणा दिली.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ सर यांनी नागरी संरक्षण दलाच्या शिस्तबद्ध संचलनाचे विशेष कौतुक करत स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. तसेच मुख्य क्षेत्ररक्षक श्री.संजयजी केळकर यांनीही स्वयंसेवकांच्या समर्पित कार्याचे अभिनंदन केले.
याच अनुषंगाने नागरी संरक्षण अंबरनाथ कार्यालय येथेही मा. उपनियंत्रक, नागरी संयक्षण श्री.विजय जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कार्यालयीन कर्मचारी, विभागीय क्षेत्ररक्षक, उपविभागीय क्षेत्ररक्षक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आजचा हा गौरवशाली सोहळा म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकाच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाचे मोत्यात रूपांतर झाल्याचा क्षण आहे. संघटनेशी एकनिष्ठ राहून भविष्यातही अशाच उत्साहाने कार्यरत राहण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.” अशी भावना व्यक्त करत आगामी २६ जानेवारीच्या परेडसाठी नव्या जोशाने तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी “जय हिंद! जय महाराष्ट्र!” च्या घोषणांनी संपूर्ण साकेत मैदान देशभक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेले. 🇮🇳🚩
https://www.youtube.com/live/tAls--eTT5I?si=9D9FeFA88iK8sWhF
वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर (बातमीदार)