Saturday, 21 March 2026

चवदार तळ्याच्या आंदोलनातून समतेचा संदेश : हर्षवर्धन सपकाळ

चवदार तळ्याच्या आंदोलनातून समतेचा संदेश :  हर्षवर्धन सपकाळ

आजचे सत्ताधीश खोटारडे  : उल्का महाजन

चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव दणक्यात साजरा व्हायला हवा  : महेद्रशेठ घरत 

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झाला. अस्पृशांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी, सामाजिक समतेसाठी हा लढा झाला होता. त्या सत्याग्रह आंदोलनाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त महाड येथे चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्षे सोहळा शुक्रवारी (ता. २०) आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, सिद्धार्थ हत्तीअंबीरे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "चवदार तळ्याच्या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेकांचा सहभाग होता. त्या आंदोलनातून समतेचा संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. तेव्हा समता, बंधुता, न्याय यांची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी तोच वसा पुढे नेला. त्यातूनच पुढे संविधानाची निर्मिती झाली. आज सर्वधर्मसमभावाच्या विचारानेच काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातून माणसाने माणसाशी कसे वागावे, हा संदेश मिळतो."

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन म्हणाल्या, "बाबासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मीयांचे अनुयायी होते. आजचा काळ फार कठीण आहे. आजच्या सत्ताधीशांची सत्तेसाठी जी तंत्रे वापरली आहेत त्यात पोटात भूक आणि डोक्यात भीती, जातीभेद याचा अवलंब केला आहे. आजच्या सत्ताधीशांचा खोटे बोलण्यात कुणी हात धरू शकत नाही. ते प्रचंड भ्रष्टाचारी आहेत." 

यावेळी तुषार गांधी म्हणाले, "महाडमधील ९९ वर्षांपूर्वीचा काळ अंगावर काटा आणणारा आहे. तो फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर समतेचा विचार समाजात देण्याचा होता. त्यामुळे तो विचार रुजविण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे."

यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात रुजविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या. चवदार तळ्याचा शताब्दी महोत्सव पुढच्या वर्षी भरगच्च व्हायला हवा. तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे." यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते

Friday, 20 March 2026

मुक्ताबाई लक्ष्मण मोकल यांचे दुःखद निधन !!

मुक्ताबाई लक्ष्मण मोकल यांचे दुःखद निधन !!

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
 महिला सामाजिक कार्यकर्त्या तथा आदर्श गृहिणी मुक्ताबाई लक्ष्मण मोकल यांचे दिनांक १६/३/२०२६ रोजी वयाच्या ७५ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार २५/३/२०२६ रोजी माणकेश्वर उरण येथे सकाळी ८ वाजता तर उत्तर क्रिया विधी व होम विधी शुक्रवार दिनांक २७/३/२०२६ रोजी बोरखार येथे त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. उत्तर कार्य निमित्त गोरक्षक समाज प्रबोधनकार कीर्तनकार ह भ प कलावतीबाई शिवकर (केळवणे - पनवेल) यांचे दिनांक २७ रोजी सकाळी ९:३० वा.सुश्राव्य कीर्तन ठेवण्यात आले आहे. मनमिळाऊ व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, गोर गरिबांच्या अडी अडचणीत गोरगरिबांना त्या मदत करत असल्याने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पाच नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. बोरखार गावचे पोलीस पाटील विनायक लक्ष्मण मोकल यांच्या त्या मातोश्री होत्या. या दुःखद प्रसंगी व विधी प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुःखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे.

कोप्रोली येथे श्री साई चरित्र पारायण, श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न !!

कोप्रोली येथे श्री साई चरित्र पारायण, श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न !!

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : सालाबाद प्रमाणे ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली (उरण )यांच्या सौजन्याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवार दिनांक १८/३/२०२६ ते गुरुवार दिनांक १९/३/२०२६ रोजी श्री साईबाबांचे साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायणाचे महापूजा व साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार व गुरुवारी दररोज काकड आरती, बाबाचे मंगल स्नान,श्री साई चरित्र पारायण, मध्यान्ह आरती, हरिपाठ, साईबाबांचे धुपारती असे विविध धार्मिक उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.दि १९/३/२०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या साई भंडाराचा (महाप्रसादाचा ) साई भक्तानी, भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. रात्री ९ वाजता श्री बापूजी देव कला मंच व अर्णवी आर्ट कोप्रोली उरण प्रस्तुत साई गीत, लोकगीत,कोळीगीतांचा मराठी नजराणा कार्यक्रम सादर करण्यात आले. आलेल्या प्रत्येक प्रमुख पाहुण्यांचे तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील गणेश मंदिर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जनतेचा भाविक भक्तांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली व साई सेवक, ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ उरण व साई सेवक, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, सर्व महिला बचत गट, माऊली हरिपाठ मंडळ, सर्व क्रिकेट क्लब, बापूजी देव कला मंच, अर्णवी आर्ट, थ्री व फोर व्हीलर रिक्षा चालक-मालक संघटना  कोप्रोली, ग्रामस्थ मंडळ कोप्रोली आदी विविध संस्था,संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्वच कार्यक्रमाचे सुंदर,उत्तम असे नियोजन व आयोजन केल्याने सर्वांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले

जिप सदस्या प्रेरणा कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उदघाटन !!

जिप सदस्या प्रेरणा कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उदघाटन !!

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील १९८४ सालच्या शेतकरी लढ्यात सहभागी झालेले पागोटे गावचे सुपुत्र तथा हुतात्मा महादेव हिरा पाटील, हुतात्मा केशव महादेव पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण महादेव पाटील यांच्या समाजसेवेचा वसा घेतलेल्या पागोटे गावचे आदर्शवत सरपंच कुणाल पाटील यांच्या पत्नी तथा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांच्या पागोटे येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते झाले.

 रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पागोटे गावालगत जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,पंचायत समितीचे उपसभापती परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष कमळाकर पाटील, पंचायत समिती सदस्य कविता रुपेश पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, नवघर ग्रामपंचायत सरपंच सविता मढवी, जसखारच्या सरपंच काशीबाई ठाकूर, पागोटे ग्रामपंचायत सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सोनाली भोईर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पागोटेचे शिवसेना शाखाप्रमुख  महेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचे समस्या,प्रश्न सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना लगेच त्वरित संपर्क साधता यावे यासाठी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल असे मत या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांनी व्यक्त केले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी सरपंच कुणाल पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत दोघांचेही कार्य योग्य दिशेने योग्य पद्धतीने चालत असल्याचे सांगत या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनसंपर्क कार्यालय झाल्याने नागरिकांना त्वरित जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील यांना भेटता येणार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे विविध समस्या,  प्रश्न मार्गी लागणार असल्याने जनतेने सुद्धा समाधान व्यक्त केले आहे.

शब्द पंढरीचे वारकरी; कवी श्रीराम यांच्या घरी साहित्याची गुडी !!

शब्द पंढरीचे वारकरी; कवी श्रीराम यांच्या घरी साहित्याची गुडी !!

लोणावळा परिसरातील ग्रामीण कवी श्रीराम यांनी यंदा एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. पारंपरिक गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या घरी “साहित्याची गुडी” उभारून वाचनसंस्कृतीचा संदेश दिला.

“शब्द पंढरीचे आम्ही आहोत वारकरी, साहित्याची गुडी उभारली माझ्या घरी” या ओळींतून त्यांनी आपल्या भावनांना सुंदर शब्दांत व्यक्त केले. या उपक्रमातून पुस्तकांप्रती प्रेम, ज्ञानाची उपासना आणि मराठी साहित्याची जपणूक करण्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला.

साहित्याची गुडी म्हणजे केवळ सजावट नसून ती ज्ञान, संस्कार आणि विचारांची उंच पताका असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, तरुण पिढीने वाचनाची आवड जोपासावी, असा संदेशही त्यांनी दिला.

ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेल्यास वाचनसंस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

वृत्त - प्रमोद सुर्यवंशी 

कवयित्री, लेखिका उषा घोडेस्वार यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित !

कवयित्री, लेखिका उषा घोडेस्वार यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित !

शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीच्या संचालिका कवयित्री, लेखिका सौ. उषा शिलवंत घोडेस्वार  यांना यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्यासाठी हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
      अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर, (सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चरवळीची संघटना) तसेच थियासॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री शक्ती जागृती मेळाव्यानिम्मित  दिनांक 15 मार्च 2026 रोजी आदर्श मंगल कार्यालय ,नागपूर येथे या हिरकणी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर निताताई ठाकरे, सह उद्घाटक उपमहापौर लीनाताई हाथीबेड  यांच्या हस्ते करण्यात आले, अध्यक्षा अनिताताई पांडव, स्वागताध्यक्ष डॉ. स्मिता मेहेंत्रे(अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड, नागपूर), प्रमुख अतिथी पोलिस सायबर क्राइम श्रद्धाताई ढोमणे, डॉ. नीलम जैन, सरिता राणेकर, रीता चंद्रिकापुरे, प्रगती मानकर, रुपाली ढोमणे, रेणू गुप्ता, अंजली पोटूवार व संपूर्ण संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली हा पुरस्कार वितरण करण्यात आला. 
          सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य व सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलाना शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, भेटवस्तू व प्रत्येकांना एक रोपट देऊन सन्मानित करण्यात आले हा मौल्यवान संदेश होता. सर्वांच्या उपस्थितीत या सोहळा अतिशय सुरळीतपणे पार पडला.

वृत्त - प्रमोद सुर्यवंशी 

पडघ्यात शंभर वर्षांची परंपरा जपणारी ‘बोहाडा’ यात्रा उत्साहात संपन्न !!

पडघ्यात शंभर वर्षांची परंपरा जपणारी ‘बोहाडा’ यात्रा उत्साहात संपन्न !!

** मुखवटेधारी सोंगांची अनोखी परंपरा; सर्व धर्मीयांच्या सहभागातून गावात ऐक्याचा संदेश

भिवंडी, प्रतिनिधी (मिलिंद जाधव) 

भिवंडी तालुक्यातील पडघे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक ‘बोहाडा’ यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने भरविण्यात येणारी ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून यावर्षीही मोठ्या संख्येने नागरिकांनी यात्रेत सहभाग नोंदवला. शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा लाभलेल्या या यात्रेत पडघेकरांनी आपली संस्कृती जपण्याचा अनोखा वारसा कायम ठेवला आहे. बोहाडा यात्रेच्या दिवशी कान्होबा मंदिरापासून ते गावाच्या वेशीपर्यंत पारंपरिक वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर देवी-देवतांची सोंगं नाचवली जातात. विशेष म्हणजे विविध देवतांचे मुखवटे घालून सोंगं सादर करण्याची ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे.

या सोहळ्यात देवी-देवतांच्या सोंगांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिरापासून गावाच्या वेशीपर्यंत नाचत जाणारी ही सोंगं पुन्हा मंदिरात परत येतात, हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या उत्साहाने उपस्थित राहतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे सर्व सोंगांचा कार्यक्रम पार पडताच ग्रामदैवत आई गावदेवीचे पात्र साजरे करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आई गावदेवीचे पात्र रितेश मेस्त्री यांनी साकारले होते. या उत्सवाची परंपरा दिवंगत कै. तुळशीराम गायकवाड यांनी सुरू ठेवली असून सध्या त्यांचे सुपुत्र जगदीश गायकवाड हे या उत्सवाची धुरा सांभाळत आहेत. गावातील नागरिक तसेच युवकांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाला लाभत असल्याने परंपरा अधिक बळकट होत आहे. यात्रेदरम्यान मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विविध मनोरंजनाची साधने, पाळणे, लहान मुलांसाठी खेळणी, तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. पडघा ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व वीजेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. गुढीपाडवा आणि बोहाडा यात्रेच्या निमित्ताने भिवंडी तालुक्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पडघ्यात दाखल झाले होते. विशेष म्हणजे या उत्सवात सर्व जाती-धर्मीय नागरिक एकत्र येऊन सहभाग घेतात, त्यामुळे गावातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याची भावना स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पडघा पोलीस ठाण्याच्या वतीने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे परंपरा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य यांचे दर्शन घडवणारी पडघ्याची ‘बोहाडा’ यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

चवदार तळ्याच्या आंदोलनातून समतेचा संदेश : हर्षवर्धन सपकाळ

चवदार तळ्याच्या आंदोलनातून समतेचा संदेश :  हर्षवर्धन सपकाळ आजचे सत्ताधीश खोटारडे  : उल्का महाजन चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव दणक्य...