Saturday, 11 April 2026

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन !!

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन !!

**फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी

सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपाच्या वतीने विनम्र अभिवादन केले. समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांनी आपण सर्वांनी प्रेरित व्हावे, हीच खरी आदरांजली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास गाढवे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, विनायक रूपनवर, लक्ष्मण ठोंबरे, अँड. विजय लेंगरे, अंकुश देवडकर, अँड. बापूसाहेब डोबाळे उपस्थित होते.महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी केली आहे.तसेच कटगून, नायगाव व खानवडी या ऐतिहासिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत येथे भव्य शिल्पसृष्टी उभारण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे असे श्री गाढवे म्हणाले.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

पीईएसच्या आंबेडकर, दोन्ही सिद्धार्थ कॉलेज व रयतच्या केबीपी कॉलेजच्या रक्तदान शिबिराद्वरे महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन !!

'पीईएसच्या आंबेडकर, दोन्ही सिद्धार्थ कॉलेज व रयतच्या केबीपी कॉलेजच्या रक्तदान शिबिराद्वरे महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन !!

महात्मा ज्योतिराव फुले (११/४) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४/४) यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने त्यांना रक्तदानासारख्या लोकहिताच्या कार्यातून अभिवादन करण्यासाठी सालाबादप्रमाणे, 
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील ३ महाविद्यालये व नविन मुंबईच्या एका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने दादर, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस व बेलापूर रेल्वे स्थानकावर दि. शुक्रवार दि. १०/४/२०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये डॉ. आंबेडकर महाविद्यालय वडाळा, सिद्धार्थ महाविद्यालय आनंद भवन व बुद्ध भवन फोर्ट व कर्मवीर भाऊराव पाटील अशा चार महाविद्यालयाच्या विद्यार्थि व एन एस एस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.‌ दि. ११/४ रोजीही ठाणे रेल्वे स्थानकावर शिबीराचे आयोजन केले आहे.

एकूण ४ रक्तदान शिबिरात दादर स्थानकातून ३७, सिएसटी स्थानकातून ४४, चर्चगेट स्थानकातून ४८ व बेलापूर स्थानकातून ६० असे एकूण १८९ बॉटल्स रक्ताचे संकलन झाले. सदर शिबिरातून कामा रुग्णालय, सायन रुग्णालय, जगजीवनराम रेल्वे रुग्णालय व जसलोक रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी रक्त संकलन करण्यात आले.

कोविडनंतर रेल्वे स्थानकावर एन एस एसच्या सहभागाने आयोजित केलेली आत्तापर्यंतची सर्वच रक्तदान शिबिरांना रक्तदात्यांचा उत्तम‌ प्रतिसाद मिळतो. कारण एन एस‌ एस‌चे विद्यार्थी त्यासाठी सातत्याने स्टेशनवर पोस्टर घेऊन फिरून रक्तदात्यांना डोनेशन करण्यासाठी घेऊन येतात. तसेच काही विद्यार्थी माईकवरून जाहीर आवाहन करून लोकांमध्ये रक्तदान करण्यासाठी जनजागृती करतात.

अशा प्रकारे संयुक्त रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे हे दुसरे वर्ष आहे, यामध्ये नायर रुग्णालय रक्तपेढीचे माजी CDO श्री अनिल गरेसाहेब समन्वयक म्हणून अत्यंत मोलाचे योगदान नेहमीच करतात. लायन्स क्लब ही सेवाभावी संस्था प्रायोजकाच्या भूमिकेतून सर्वांच्या चहा, नाश्ता जेवणासह ईतरही खर्च करतात. तसेच एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन खडतार, डॉ. धनंजय चंदनशिवे, प्रा. विशाल करंजवकर‌, प्रा. प्रणिता भाले व डॉ. विष्णु भंडारे त्यांचे प्रत्येकी १०-१२ विद्यार्थी सहभागी झाल्यामुळेच हे शिबीर यशस्वी झाले. सदर शिबिराच्या आयोजनासाठी मुंबई  विद्यापिठ स्तरावरून एन एस एस OSD प्रा. सुशिल शिंदे, जिल्हा समन्वयक प्रा. क्रांती रूके व प्रा. देशमुख यांचेही सहकार्य मिळाले व त्यांनी सहभागी विद्यार्थी व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

*डॉ. विष्णु भंडारे*
(प्रभारी प्राचार्य व कार्यक्रम अधिकारी) 
सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, आनंद भवन, फोर्ट, मुंबई

Friday, 10 April 2026

जबलपूर येथे कुर्मी राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्राचा तलवार देऊन गौरव !!

जबलपूर येथे कुर्मी राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्राचा तलवार देऊन गौरव !!

जबलपूर (मध्यप्रदेश) | 4-5 एप्रिल 2026

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन मध्यप्रदेशातील जबलपूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. देशभरातील विविध राज्यांमधून प्रदेश व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी झाले होते.

या अधिवेशनात पटेल, पाटीदार, मराठा, कुणबी, कुर्मी, कुडुंबर, कुडमी, कापू, कम्मा, कलबी, कुलमी, ओक्का लिंगा, देवेंद्र कुल वेल्लालार, महतो, खंडायत, गुर्जर, नायक, नायडू आदी विविध समाजघटक कुर्मी या प्रातिनिधिक या नावात येत असून त्या सर्व प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. तसेच या समाजाच्या  सर्व राज्यांच्या समित्यांचा सक्रिय सहभाग या  कार्यक्रमात दिसून आला.

महाराष्ट्रात कुर्मी ( कुणबी मराठा )  महासभेचे संघटन मजबूत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे राज्याने देशात अव्वल स्थान मिळवले. प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, यांच्या नेतृत्वाखाली युवा महासभा, महिला महासभा, विद्यार्थी महासभा, उद्योग महासभा, पुरोहित महासभा आणि कृषी महासभा या विविध शाखांद्वारे प्रभावीपणे कामगिरी करण्यात आली.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष आणि महासचिव यांच्या हस्ते प्रदेश अध्यक्ष संजय पाटील व युवा प्रदेश अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील यांचा तलवार व  पगडी देऊन विशेष गौरव करण्यात आला.

1894 मध्ये नोंदणीकृत असलेली ही महासभा विविध समाजघटकांच्या न्याय व हक्कांसाठी कार्यरत आहे. याच संस्थेने 1919 साली लखनौ येथे छत्रपती शाहू महाराजांना “राजश्री” ही उपाधी देऊन सन्मानित केले होते.

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील आठ मान्यवरांनी या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, स्व. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा विशेष उल्लेख केला जातो.

सौजन्य - जयेश शेलार (पाटील)

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!

युद्ध सुरु असतानासुद्धा भारताची रणनीती ठरली यशस्वी.

उरणच्या जेएनपीए मध्ये ग्रीन आशा जहाजचे स्वागत.

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) :
पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर, 'ग्रीन आशा' हे एलपीजी वाहून नेणारे भारतीय जहाज यशस्वीरित्या भारत देशात दाखल झाले आहे. सुमारे १५ हजार टन एलपीजी घेऊन आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली सुरक्षित मार्गक्रमण मुंबईलगतच्या उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरात सुरक्षितपणे पोहोचले. 

गेल्या सुमारे ४० दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्धस्थितीत या जहाजाचे सुरक्षित आगमन हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 'ग्रीन आशा'ने इराणमधील लारक, केशम आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संवेदनशील सागरी मार्ग यशस्वीरित्या पार केला. होर्मुझचा तणावपूर्ण मार्ग जहाजाने कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केला आहे.भारतच्या रणनीती मुळे इंधन व कर्मचारी सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहेत.

जेएनपीए बंदरातील बीपीसीएलच्या लिक्विड जेट्टीवर हे जहाज उभे करण्यात असून हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आखातात व्रातात युद्धाला सुरुवात झाल्यापासून जेएनपीए बंदरात पोहोचलेले एलपीजी वाहून आणणारे हे पहिलेच जहाज आहे.

'ग्रीन आशा' जहाजाच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने सतत निरीक्षण ठेवले होते. नौदलाच्या मार्गदर्शनाखाली हे जहाज सुरक्षित भारतात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे सुरक्षित पोहोचलेले हे नववे भारतीय जहाज असल्याची माहिती देण्यात आली. 'ग्रीन आशा'चे सुरक्षित आगमन हे केवळ एक यशस्वी सागरी ऑपरेशन नाही, तर भारताच्या ऊर्जासुरक्षेचा मजबूत आधार असल्याचे सांगण्यात आले.या जहाजचे जेएनपीए मध्ये मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले

कोप्रोली आरोग्य केंद्रात रिक्त पदामुळे रुग्णांची हेळसांड !!

कोप्रोली आरोग्य केंद्रात रिक्त पदामुळे रुग्णांची हेळसांड !!

** दोन डॉक्टर, २३ आरोग्य सेविकांची पदे रिक्त ; कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र 'सलाईन'वर

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील आरोग्य विभागाची अतिशय दुर्दशा झाली आहे. अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यां अनास्थे मुळे उरण मधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर आहे.आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर गेले आहे. कोप्रोली केंद्रात  डॉक्टर आणि आरोग्य सेविका व इतर कर्मचारी अशी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उरण ग्रामीण भागातील हजारो गर्भवती महिला, नवजात बालकांची तपासणी आणि इतर कामांचा भार अवघ्या तीन आरोग्य सेविकांवर आहे.

उरण तालुक्यातील दोन लाख लोकसंख्येसाठी येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. उरणच्या पूर्व भागातील सुमारे एक लाख गोरगरीब नागरिक उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. मात्र मागील आठवड्यात उद्भवलेली पाणदिव्यातील डेंग्यूची साथ आटोक्यात आल्यानंतर आता कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक उणिवा समोर आल्या आहेत.

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी ३, महिला आरोग्य परिचारिका २, आरोग्य सेविका २६, शिपाई २ आदी ३३ पदे मंजूर आहेत. यामध्ये आवश्यकता असलेल्या तीन सुरक्षारक्षकांचा समावेश नाही. मात्र यापैकी वैद्यकीय अधिकारी २, महिला आरोग्य परिचारिका १, आरोग्य सेविका २३, शिपाई २ अशी एकूण २७ पदे रिक्त आहेत.

रुग्ण तपासणीचा भार केवळ तीन आरोग्य सेविकांवर असल्यामुळे येथील आरोग्य सेवेचा परिणाम रुग्णावर होत आहे.रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे.रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजावर परिणाम होत आहे. वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. 


कोट (चौकट):-
शासना कडे रिक्त पदा बाबत यापूर्वी ही पाठपुरावा करण्यात आला आहे.मात्र कर्मचारी यांची भरती होत नाही.कोप्रोली आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी दरमहा होणाऱ्या प्रत्येक बैठकीत मागणी केली जाते.

   - डॉ वंदन कुमार पाटील,उरण  तालुका आरोग्य अधिकारी

उरणमधील प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर कचरा डंपिंग !!

उरणमधील प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीर कचरा डंपिंग !!

 ** नगरसेविका प्रमिला पवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) :
 उरण नगरपरिषद हद्दीतील श्री.हरिश्चंद्र गावंड उद्यानामागील प्रतिबंधित डंपिंग ग्राउंडच्या जागेवर बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात असल्याची गंभीर बाब नगरसेविका प्रमिला संतोष पवार यांनी उघडकीस आणली आहे. 

प्रमिला पवार यांनी मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर डंपिंग ग्राउंड मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनामुळे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. असे असतानाही काही अज्ञात व्यक्तींकडून खाजगी जागेवर बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात आहे. हा कचरा NAD (नेवल आर्मामेंट डेपो) मधून कचरा भरलेली गाड्यांद्वारे आणून टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

हा प्रकार केवळ पर्यावरणाचे नुकसान करणारा नसून  उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा आहे, असे प्रमिला पवार यांनी नमूद केले.या प्रकरणी तातडीने खातरजमा करून कठोर कारवाई करण्याची मागणी  प्रमिला पवार यांनी केली आहे. सदर पत्राच्या प्रती नगराध्यक्ष, उरण नगरपरिषद व पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.


नगरसेविका प्रमिला पवार यांच्या प्रमुख मागण्या:- 

१)  सदर जागेची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून खाजगी जागेवर विना परवानगी बेकायदेशीर कचरा टाकणे त्वरित थांबवावे.
२)या बेकायदेशीर कृत्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ एफ.आय.आर. (FIR) दाखल करावा.
३)  जर हा कचरा एन ए डी मधून येत असेल, तर त्यांनाही या कायदेशीर उल्लंघनाबाबत लेखी कळवावे आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल द्यावा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी !!

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी !!

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात एम.कॉम. च्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी हृषीकेश संजय मेहेर याने शरीरसौष्ठव क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

२०२४ पासून ‘मिस्टर ऑलिम्पिया’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या शैक्षणिक वर्षात त्याने विविध स्पर्धांमध्ये दमदार कामगिरीची नोंद केली. मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेत ‘बेस्ट फिजिक मेन्स’ (८० किलो गट) मध्ये रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा १३ फेब्रुवारी २०२६ रोजी डोंबिवली (पूर्व) येथील प्रगती महाविद्यालयात पार पडली.

तसेच, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मालाड (पूर्व) येथे झालेल्या ‘मुंबई श्री’ ज्युनिअर बॉडीबिल्डिंग स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळवला. पुढे पिंपरी-चिंचवड, पुणे येथे २८ ते ३० मार्चदरम्यान पार पडलेल्या ६३व्या आयबीबीएफ ज्युनिअर नॅशनल, मास्टर व फिजिक चॅलेंज स्पर्धेत त्याने ‘मेन्स क्लासिक (१८० से.मी. वरील उंची)’ आणि ‘मेन्स फिजिक (१८० से.मी. वरील उंची)’ या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ८० किलो गटात एकूण तृतीय क्रमांक मिळवून चमकदार कामगिरी केली.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष हसमुखभाई शहा यांच्या उपस्थितीत प्राचार्य डॉ अरविंद उबाळे यांच्या हस्ते महाविद्यालयातर्फे त्याचा सत्कार  व अभिनंदन करण्यात आले.

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन !!

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन !! **फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्...