Monday, 2 March 2026

WeRmore Solutions Private Limited चा ६ वा वर्धापनदिन उत्साहात; मानसी पत्याणे पहिल्या ‘करोडपती लीडर’ !!

WeRmore Solutions Private Limited चा ६ वा वर्धापनदिन उत्साहात; मानसी पत्याणे पहिल्या ‘करोडपती लीडर’ !!

 मुंबई (शांताराम गुडेकर )

           WeRmore Solutions Private Limited कंपनीचा ६ वा वर्धापनदिन सोहळा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी येथील CIDCO Exhibition Centre येथे दिमाखात पार पडला. देशभरातून ५००० हून अधिक सभासद या भव्य कार्यक्रमास उपस्थित होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विरारच्या सौ. मानसी पत्याणे यांचा कंपनीच्या पहिल्या ‘करोडपती लीडर’ म्हणून झालेला विशेष सन्मान. कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात यांच्या उपस्थितीने रंगत वाढली. कंपनीचे सीएमडी विकास गोपाळ व एमडी प्रिया कड यांच्या हस्ते मानसी पत्याणे यांना गौरविण्यात आले.

केवळ तीन वर्षांत हे यश संपादन करणाऱ्या मानसी पत्याणे यांनी महिलांनी आर्थिक स्वावलंबनासाठी डायरेक्ट मार्केटिंग क्षेत्रातील संधी ओळखून पुढे यावे, असे आवाहन केले. ‘टीम विनर्स’मधील १५०० हून अधिक सभासद उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५० लीडर्सचा सन्मान करण्यात आला, तर लकी ड्रॉमध्ये ५३० पेक्षा अधिक सदस्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

एम. एम. पवार यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित !!

एम. एम. पवार यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित !!

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :

जप जीवाला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विद्या मंदिर, मांडा-टिटवाळा येथील सहाय्यक शिक्षक एम. एम. पवार यांना नुकतेच राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

एम. एम. पवार हे गेली पावशतक विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करीत असून ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांच्या अध्यापनातून शाळा, गाव आणि देशाचे भविष्य घडविणारी गुणवंत पिढी तयार होत असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. त्यांच्या आदर्श कार्यामुळे राष्ट्रउभारणीला शाश्वत बळ मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष एन. ए. कदम, सचिव तुकाराम मोंडकर, निवड समिती अध्यक्ष किसन बोंद्रे तसेच उपाध्यक्षा करुणा बांगर यांच्या हस्ते पवार यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानाबद्दल एम. एम. पवार यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Sunday, 1 March 2026

श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानाद्वारे केली साफसफाई !!

श्री सदस्यांनी स्वच्छता अभियानाद्वारे केली साफसफाई !!

** ओला कचरा-१३.९ टन, / सुका कचरा-१९.७५१ टन गोळा

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ उरण शहर व परिसरात डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मभूषण डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १ मार्च २०२६ रोजी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत १५७७ श्री सदस्यांनी सहभाग घेतला. 

या स्वच्छता मोहिमेत ओला कचरा-१३.९ टन,सुका कचरा-१९.७५१टन गोळा करण्यात आला.स्वच्छते विषयी समाजात, जनतेत जनजागृती व्हावी, आपले शहर स्वच्छ सुंदर व निरोगी राहावे या अनुषंगाने उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मभूषण डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राबविलेल्या स्वच्छता अभियानाला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या मोहिमेत उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सहभागी होऊन स्वच्छता अभियानात भाग घेतला

तिसऱ्या मुंबई साठी २०१३ चा भू संपादन कायदा लागू करण्याची मागणी !

तिसऱ्या मुंबई साठी २०१३ चा भू संपादन कायदा लागू करण्याची मागणी !

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :

राज्य सरकारने तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन करतांना साडेबावीस टक्के ऐवजी शेतकरी हिताच्या २०१३ च्या भूसंपादन कायदा लागू करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सिडकोच्या साडेबावीस टक्के भूसंपादन योजनेच्या विरोधात न्यायालयाने नवी मुंबई विमानतळासाठी २०१३ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तिसऱ्या मुंबई सह उरण मधील सिडकोच्या लॉजिस्टक पार्क,रिजनल पार्क तसेच विरार अलिबाग कॉरिडॉर या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठीही २०१३ च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 युपीए सरकारच्या काळात भूसंपादनाचा सक्तीचा देशातील १८९४ चा ब्रिटीश कालीन भूसंपादन कायदा रद्द करून त्या जागी २०१३ चा नवा भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा २०१४ पासून अंमलात आला आहे. मात्र महाराष्ट्र राज्य सरकार आणि सिडको कडून भूसंपादन करतांना हा कायदा अंमलात आणला जात नाही. त्या ऐवजी शेतकऱ्यांकडून संमती पत्र घेऊन भूसंपादन केलं जातं आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन आणि भूखंडाला अधिकचा दर देण्यासाठी न्यायालयात दाद मागता येत नाही. ज्याची तरतूद ब्रिटिश कालीन आणि २०१३ च्या नव्या भूसंपादन कायद्यात आहे. 

शिवाय २०१३ च्या कायद्यात शेतकऱ्यांना बाजार दराच्या चार ते सहा टक्के अधिक दर तसेच संपादित जमिनीच्या २० टक्के विकसित भूखंड,बागायती जमीनीसाठी अधिकचा दर,शेतकऱ्यां प्रमाणे समुद्रावर अवलंबून असलेल्या मासेमारी करणाऱ्यांचाही या पुनर्वसन कायद्यात समावेश करण्यात आला आहे. आशा सर्व शेतकऱ्यांच्या लाभाच्या व फायद्याच्या तरतुदी असणारा कायद्याची सरकार कडून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे शेतकरी नाडला जात आहे. याच संदर्भात नवी मुंबई विमानतळ बाधीत व सिडको लॉजीस्टिक पार्क बाधीत शेतकरी उच्च न्यायालयात गेले असतांना  २०१३ चा कायदा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 

याच पार्श्वभूमीवर विरार अलिबाग कॉरिडॉर बाधीत शेतकऱ्यांनी हा कायदा लागू करण्याची मागणी सरकार कडे केली असल्याची माहिती शेतकरी समितीचे सचिव रविंद्र  कासुकर यांनी दिली आहे.तर तिसऱ्या मुंबईतील बाधीत शेतकऱ्यांना येथील विकासात सहभागी करून स्थानिक भूमीपुत्रांच्या पुढील पिढ्यांना या विकासाचा लाभ मिळावा या करिता सरकार आणि एमएमआरडीएने फसव्या साडेबावीस टक्के योजने ऐवजी  २०१३ च्या भूसंपादन कायदा लागू करावा यासाठी शासनाकडे आपली बाजू मांडणार असल्याचे व त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार असल्याची माहीती येथील शेतकरी शहाजी पाटील यांनी दिली. यासाठी त्यांनी समाजमाध्यमातून जनजागृती सुरू केली आहे.

रायगड मधील तिसरी मुंबई विकासाचे धोरण विनाशाच्या वाटेवर - उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी केली खंत व्यक्त.

रायगड मधील तिसरी मुंबई विकासाचे धोरण विनाशाच्या वाटेवर.

“माती, मनुष्य आणि महानगर” — तिसऱ्या नवी मुंबईच्या उंबरठ्यावर गांधी-विनोबांचा प्रश्न.

उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी केली खंत व्यक्त.

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : तिसऱ्या मुंबईचे विकासाचे धोरण हे विनाशाच्या मार्गावर आहे असे मत व्यक्त करत उरण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड यांनी तिसऱ्या मुंबईच्या होत असलेल्या नाशा बाबत  खंत व्यक्त केली आहे.


रायगडच्या भातखाचरांत सकाळच्या धुक्यातून उगवणारा सूर्य हा केवळ निसर्गचित्र नसतो; तो श्रमांचा साक्षीदार असतो. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याशी सामना करत, पावसाच्या लहरी स्वभावाशी जुळवून घेत शेतकरी ज्या निष्ठेने रोपे लावतो, त्यात जीवनाचा धर्म दडलेला असतो. आज या भूमीवर ‘तिसरी नवी मुंबई’ उभारण्याची संकल्पना पुढे येत असताना प्रश्न केवळ विकासाचा उरत नाही; तो मूल्यांचा, तत्त्वांचा आणि मानवकेंद्रित धोरणांचा ठरतो.रायगडमधील उरण, पेण आणि पनवेल हे तालुके हे केवळ भौगोलिक क्षेत्र नाहीत; ते कृषी-संस्कृतीचे जीवंत पट आहेत. भात, नारळी-सुपारीच्या बागा, आंबा-काजू-फणस यांच्या फळबागा आणि मत्स्यव्यवसाय यांवर येथील ग्रामीण अर्थव्यवस्था उभी आहे. शेती म्हणजे केवळ उपजीविका नाही; ती पर्यावरणीय संतुलनाची हमी आहे.भातखाचरे पावसाचे पाणी साठवतात, भूजल पुनर्भरण करतात आणि जैवविविधतेला आश्रय देतात. अशा भूमीचे नागरीकरण म्हणजे नैसर्गिक संरक्षक कवच काढून टाकणे होय.याच संदर्भात महात्मा गांधी यांची ‘श्रमप्रतिष्ठा’ आठवते. गांधीजी म्हणाले होते, “भारताचा आत्मा खेड्यांत वसतो.” त्यांच्या दृष्टीने विकास म्हणजे श्रमाचा सन्मान, स्वावलंबन आणि स्थानिक संसाधनांचा न्याय्य वापर. जर विकासाच्या आराखड्यांतून शेतकऱ्याचा आवाज हरवला, तर तो विकास गांधीवादी कसोटीवर टिकणार नाही. जमीन ही केवळ संपत्ती नसून समाजाची नैतिक जबाबदारी आहे, ही त्यांची धारणा आज अधिक महत्त्वाची ठरते.

गांधींच्या विचारांचा विस्तार करणारे विनोबा भावे यांनी शेतीला ‘धर्म’ मानले. भूदान चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जमिनीचे पुनर्वाटप करताना समाजातील समत्वाचा आग्रह धरला. “जमीन ही ईश्वराची; आपण तिचे सेवक,” असे ते म्हणत. त्यांच्या मते, भूमीचा उपयोग हा माणसाच्या लोभासाठी नव्हे तर सर्वांच्या कल्याणासाठी असावा. आज तिसऱ्या नवी मुंबईच्या आराखड्यांत जर सुपीक जमिनींचे रूपांतर केवळ आर्थिक व्यवहार म्हणून पाहिले जात असेल, तर ते विनोबांच्या समत्वाच्या विचारांशी विसंगत ठरते.सरकारच्या भूमिकेचा विचार करता, मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्याची गरज नाकारता येत नाही. पायाभूत सुविधा, उद्योग आणि गुंतवणूक यांची आवश्यकता आहेच. परंतु प्रश्न असा आहे की हा भार हलका करण्यासाठी रायगडच्या शेतीवरच का आघात ? विकासाचा पर्याय शोधताना कृषी-आधारित उद्योग, सेंद्रिय शेती, मत्स्यप्रक्रिया, ग्रामीण पर्यटन अशा पर्यावरणपूरक मार्गांकडे का वळले जात नाही ?

भातखाचरे नष्ट झाली, तर केवळ अन्नउत्पादन घटणार नाही; जलसंतुलन बिघडेल, पूरस्थिती वाढेल आणि हवामानबदलाचे दुष्परिणाम तीव्र होतील. समुद्रालगतच्या खाड्या आणि मिठागरांच्या परिसंस्थेवर त्याचा परिणाम होईल. हे सर्व परिणाम दीर्घकालीन आणि अपरिवर्तनीय असू शकतात. गांधीजींच्या शब्दांत सांगायचे तर, “पृथ्वी प्रत्येकाच्या गरजा भागवू शकते; परंतु प्रत्येकाच्या लोभाला नाही.” या वाक्याचा अर्थ आजच्या धोरणकर्त्यांनी नव्याने उलगडण्याची गरज आहे.रायगडमधील शेतकरी, आदिवासी आणि कष्टकरी समाज हा अल्पसाधनांतून जीवन उभे करणारा आहे. त्यांची ओळख ही जमिनीशी असलेल्या नात्यानेच घडलेली आहे. जमीन गेली की केवळ आर्थिक साधन जात नाही; एक सांस्कृतिक वारसा, एक सामाजिक रचना आणि आत्मसन्मानाचा आधार हरवतो. विकास जर विस्थापनाच्या वेदनेवर उभा राहत असेल, तर तो सर्वसमावेशक ठरू शकत नाही.

विकास आणि शेती यांचा संघर्ष अपरिहार्य नाही; तो नियोजनातील असमतोलाचा परिणाम आहे. पर्यावरणीय मूल्यमापन, लोकसहभाग, पारदर्शक संवाद आणि दीर्घकालीन शाश्वतता या चौकटीत निर्णय घेतले, तर समन्वय शक्य आहे. तिसरी नवी मुंबई ही संकल्पना जर खरोखरच सर्वांच्या हिताची असेल, तर तिच्या आराखड्यात शेतीचे संरक्षण, जलस्रोतांचे जतन आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाची स्पष्ट हमी असावी.

गांधी-विनोबांचा विचार सांगतो — विकास म्हणजे मातीपासून तुटणे नव्हे; मातीशी नाळ जोडून पुढे जाणे. महानगरांची उंच इमारती आकर्षक असतील; पण अन्ननिर्मितीचा पाया कमकुवत झाला, तर त्या उंचीला अर्थ उरणार नाही. रायगडचा प्रश्न हा केवळ स्थानिक वाद नाही; तो भारताच्या विकासदृष्टीचा कसोटीप्रश्न आहे.

शेवटी, ‘माती, मनुष्य आणि महानगर’ यांचा समतोल साधणे हीच खरी कसोटी आहे. श्रमाला प्रतिष्ठा, शेतीला संरक्षण आणि विकासाला मानवी चेहरा — या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच तिसरी नवी मुंबई ही संकल्पना समाजमान्य ठरेल. अन्यथा, इतिहास विचारेल — आपण प्रगतीच्या मोहात पडून भविष्याच्या पिढ्यांचा अन्नाधारच गमावला का ? असा सवाल विलास सीताबाई हसुराम गावंड - सर्वोदय कार्यकर्ता विनोबा जन्मस्थान, गागोदे, रायगड यांनी उपस्थित केला आहे.

उरण विधानसभा मतदार संघातील समस्या प्राधान्याने सोडविणार - खा. श्रीरंग आप्पा बारणे.

उरण विधानसभा मतदार संघातील समस्या प्राधान्याने सोडविणार 
  - खा. श्रीरंग आप्पा बारणे.

शिवसेना उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उदघाटन.

** पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती ; विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश.

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : उरण विधानसभा मतदार संघातील विविध समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले असून उरण विधानसभा मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहू असे आश्वासन श्रीरंग आप्पा बारणे यांनी दिले.

शिवसेनेच्या उरण विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन श्रीराजनगर कॉम्प्लेक्स, उरण कामठा रोड, गाडे हॉस्पिटलच्या शेजारी येथे रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. यावेळी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करून खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक तथा पनवेल विधानसभा रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे,उरण विधानसभा रायगड जिल्हा प्रमुख विनोदभाऊ साबळे,अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष समद भोंगले, जिल्हा युवा अध्यक्ष प्रीतम सुर्वे,जेष्ठ शिव सैनिक मनोहर ठाकूर,रायगड जिल्हाध्यक्ष मेघाताई दमडे,जिल्हा संघटक महेंद्र पाटील,उपजिल्हा अध्यक्ष वैजयंती ठाकूर,तालुका प्रमुख दिपक ठाकूर,उप तालुका प्रमुख महिला रुबीना कुटी,निवडणूक प्रभारी सुनिल भोईर,चाणजे विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे,उप शहर प्रमुख वीरू चाळके,शाखा प्रमुख संदेश म्हात्रे,गणेश म्हात्रे,दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार बारणे म्हणाले कि उरण मतदार संघांमध्ये शिवसेनेची फार मोठी ताकद आहे. हे विसरून चालणार नाही. नाकारता येत नाही.महायुती मधूनच मी पहिल्यांदा खासदार झालो. माझा पक्ष वाढविणे ही माझी जबाबदारी आहे. आम्हाला जनतेचे, सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करायचे आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारानुसार, तत्वानुसार वाटचाल सुरु आहे. त्यानुसार काम केले. कार्यकर्त्यांना नेहमी बळ देण्याचे काम केले. शिवसेनेचे धनुष्यबाण सर्व सामान्यापर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो. राजकारण निवडणुकी पुरते ठीक आहे. विकास कामासाठी कधीही राजकारण करीत नाही. नेहमी स्थानिक भूमिपुत्रांना मदत करीत आलो आहोत. उरण विधानसभा मतदार संघात सेफ्टी झोन व विविध समस्या सोडविण्याचे काम केले.विविध समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. जो पर्यन्त गोर गरिबांचे, बाधीतांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत कार्यरत राहणार. सर्वच निवडणुकीत गेल्या ३ वर्षात महाराष्ट्रात २ नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना कार्यरत आहे. निवडणुकीत सुद्धा जनतेने शिवसेनेला भरभरून चांगला प्रतिसाद दिला आहे. भविष्यात जनतेसाठी चांगले काम करायचे आहे. जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे मी जनतेच्या पाठीशी नेहमी उभा आहे. सर्वांनी हेवे दावे सोडून पक्ष वाढवा. मी तू पणा, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवा. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब जनतेसाठी काम करतात त्या पद्धतीने सर्वांनी उरण मध्ये काम करा. शिवसेना असा पक्ष आहे जो सर्वांना न्याय देतो, सर्वांच्या समस्या सोडवितो. सर्वांना सामावून घेतो असा पक्ष शिवसेना आहे. कार्यालयाचे उदघाटन झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. उरण विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. निश्चितच या कार्यालयातून जनतेचे, गोर गरिबांचे प्रश्न समस्या सोडविले जातील असे मत व्यक्त करत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.सदर कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन राजेश पाटील तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष सुलेमान शेख यांनी केले. एकंदरीत शिवसेना पक्ष कार्यलयाचे उदघाटन मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाले

राज्यस्तरीय पुरस्काराने अशा घटकांना प्रकाश झोतात आणण्याचे काम - वनमंत्री गणेश नाईक

राज्यस्तरीय पुरस्काराने अशा घटकांना प्रकाश झोतात आणण्याचे काम - वनमंत्री गणेश नाईक        

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्या प्रत्येकाला सन्मानाचे भाग्य मिळत नाही. परंतु धगधगती मुंबई च्या माध्यमातून पत्रकार भिमराव धुळप यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे. कुठेतरी अंधारामध्ये असलेल्या अशा घटकांना प्रकाश झोतात आणण्याचे काम ते गेले सोळा वर्षे करत आहे. हेच कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई येथे केले.

              साप्ताहिक धगधगती मुंबई सोळाव्या वर्धापनदिना निमित्त आयोजित केलेल्या नवी मुंबई ,कोपरखैरणे येथील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृहातील भरगच्च कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई महापौर सौ . सुजाता पाटील, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, अँड. स्मिता चिपळूणकर, उद्योजक हनुमंत रांजणे, के. के. शेलार व लोक कलावंत योगेश चिकटगावकर व धगधगती मुंबई संपादक भिमराव धुळप, सरपंच रमेश धनावडे यांच्यासह मान्यवर पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे हितचिंतक मित्र परिवार व कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

               सातारा जिल्ह्यातील घोगाव ता. कराड येथील श्री धुळप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली १६ वर्ष महाराष्ट्रात लेखणी धगधगती ठेवली . भिमराव धुळप व त्यांचे चिरंजीव ओमकार धुळप यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये चांगली टीम तयार केलेली आहे. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने उपेक्षितांची बाजू मांडणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे . वृत्तपत्रातही स्पर्धा असली तरी आपल्या उत्पन्नातील वाटा समाजासाठी खर्च करणाऱ्या पत्रकारांबद्दल समाज सुद्धा जागृत असल्याचे दिसून आले आहे. अशा शुभेच्छा देऊन अशा कार्यक्रमाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल. असे आदरणीय वनमंत्री गणेश नाईक ,माजी खासदार डॉ. संजीव नाईक व नवी मुंबई महापौर सौ . सुजाता पाटील यांच्यासह मान्यवरांनी आश्वासन देऊन सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले. 

            महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा मोठा गौरव होत असतो. परंतु सामान्य माणसांसाठी पुरस्कार देऊन  त्यांना उत्साहित करणे. हे काम खऱ्या अर्थाने सामाजिक जबाबदारी वाढवणारी आहे. सर्व स्तरातील लोकांचा बहुमान ही अद्भुत शक्ती सर्वांच्या पाठीशी कायम राहणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

            यावेळी  ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार व रमेश कदम (समाज रत्न) वसंत जाधव (समाज गौरव)  राजन किणे (दलित मित्र) रमेश धनावडे (आदर्श सरपंच) प्रताप महाडिक (शिक्षण रत्न) संगम प्रतिष्ठान व नरेंद्र छाया कम्प्युटर इन्स्टिट्यूट (उत्कृष्ट संस्था पुरस्कार) नंदकुमार काटकर (सहकार रत्न) डॉक्टर शांताराम कारंडे (साहित्यरत्न) सचिन वरखडे वैद्यरत्न ( वैद्यकीय) अँड .मनीषा चव्हाण (कायदा रत्न) डॉक्टर सुरज पाटील (वैद्यकीय रत्न) विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी (अध्यात्मिक) अनुजा दांडगे (उद्योजिका) के.के शेलार (उद्योग रत्न) हनुमंत रांजणे (समाजभूषण) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

            या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले,  माजी खासदार राहुल शेवाळे, नवी मुंबई आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी प्रेमानंद जगताप, शुभम कांबळे, तानाजी गायकवाड,  वाकळवाडी सरपंच डोईफोडे, सौ . कल्पना जगताप, श्रीमती वैशाली कांबळे यांच्यासह सातारा, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वाशी, जावळी महाबळेश्वर तापोळा व कराड परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन युवा पत्रकार ओमकार धुळप यांच्यासह धगधगती मुंबईच्या सर्व पत्रकारांनी उत्कृष्टरित्या केल्याबद्दल श्री गणेश नाईक यांनी या सर्वांचे मनापासून कौतुक केले. विविध संगीताच्या कार्यक्रमाने अनेकांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन करून कलावंतांनी चांगली गीत सादर केले होते. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

----------------------------------------------

चौकट ----नवरात्री प्रेरणा विशेष सन्मान पुरस्कार आ.ज्योती गायकवाड,अँड. स्मिता चिपळूणकर, रेणुका सोनवणे, सौ स्वाती माने होलमुखे , मानसी पोळ, दिव्या ढोले, राधिका महांकाळ, सौ भारती प्रकाश पाटील, प्रिया शिंदे  यांना देण्यात आला. स्मृतिचिन्ह पैठणी व बुके देऊन माता-भगिनींचाही गौरव करण्यात आल्याने कार्यक्रमाला एक कौटुंबिक झालर निर्माण झाली होती.

WeRmore Solutions Private Limited चा ६ वा वर्धापनदिन उत्साहात; मानसी पत्याणे पहिल्या ‘करोडपती लीडर’ !!

WeRmore Solutions Private Limited चा ६ वा वर्धापनदिन उत्साहात; मानसी पत्याणे पहिल्या ‘करोडपती लीडर’ !!  मुंबई (शांताराम गुडेकर )...