Saturday, 25 April 2026

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!   
  
*कल्याण, दि. 24 एप्रिल 2026*

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आदरणीय "कर्मवीर" श्री विजय साळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहरातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज गुरुवार, दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 3:30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण येथे धडक दिली. 

*आंदोलनाची पार्श्वभूमी*  
नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्दे समाविष्ट होते:
- *स्कूल बस तपासणी*: अनेक स्कूल बसेस अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने धावत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- *नोंदणीकृत रिक्षा स्टँड*: अधिकृत स्टँड नसल्याने रिक्षाचालकांची मनमानी व प्रवाशांची लूट होत आहे.
- *मीटरप्रमाणे भाडे*: रिक्षा व टॅक्सीचालकांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नसून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
- *इतर नागरी समस्या*: बेकायदा वाहतूक, पार्किंग, परवाने याबाबतही निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळाने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना या सर्व विषयांवर लेखी निवेदन देऊन जाब विचारला. अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर चर्चा झाली.

*यशस्वी आंदोलन*  
शिवसेना उपनेते विजय साळवी साहेब यांनी आक्रमक भूमिका घेत नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. आरटीओ प्रशासनाने सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेत लेखी आश्वासन दिले. स्कूल बसची विशेष मोहीम राबवणे, अनधिकृत रिक्षा स्टँडवर कारवाई करणे व मीटर तपासणी मोहीम तीव्र करणे याबाबत कार्यवाहीचे आश्वासन मिळाले.

यावेळी कल्याण शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी, माजी नगरसेवक, युवासेना, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पण निर्धाराने पार पडले.

शिवस्फूर्ती प्रगती मंडळ, (गोविंदा पथक) तर्फे श्री साईनाथ महोत्सव २०२६ चे आयोजन !!

शिवस्फूर्ती प्रगती मंडळ, (गोविंदा पथक) तर्फे श्री साईनाथ महोत्सव २०२६ चे आयोजन !!

घाटकोपर, (केतन भोज) ::श्री साईनाथ मंदिर, रामनगर(अ), घाटकोपर(प), मुंबई-८६ येथील नावाजलेले शिवस्फूर्ती प्रगती मंडळ (गोविंदा पथक) तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदा ही श्री साईनाथ महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी श्री साईनाथ उत्सवानिमित्त बुधवार दि.२९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता गीत, संकल्पना साईरत्न श्रावण बाळा(भाऊ) तसेच संगीत संयोजक अशोक दादा वायंगणकर यांच्या सुस्वर स्वराने अवघ्या महाराष्ट्राला मुक्तकंठाने गौरवलेली साई पालखी गीते (झाले तुझे दर्शन साई) मराठी हिंदी साई पालखी भजनांचा सुस्वर साई भजन सोहळा आयोजित करण्यात आले असून, दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता भव्य साईपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे आणि शेवटी शुक्रवार दि.०१ मे २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता साई अभिषेक केला जाणार असून तद्नंतर दुपारी २.३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तसेच नंतर सायंकाळी ७.०० वाजता महाप्रसाद (साई भंडारा) होणार आहे. आणि शेवटी रात्री ८.३० वाजता प्रमुख अतिथी देणगीदारांचा जाहिर सत्कार सोहळा पार पडणार आहे.अशा प्रकारे तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहे. 

तरी या भव्य श्री साईनाथ महोत्सवामध्ये सर्व साई भक्तांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष-हरेश धांद्रुत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत !!


समाधान म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्त गोर गरिबांना शैक्षणिक व आर्थिक मदत !!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक रायगड जिल्हाध्यक्ष तथा गोवठने ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते समाधान गुरुनाथ म्हात्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवून गोरगरिबांना आधार दिला आहे.

 गोवठणे गावात गावदेवी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. रायगड जिल्हा परिषद शाळा गोवठणे येथे मुलांना शाळेचे बॅग, खाऊ शैक्षणिक साहित्य वाटप केले.गावातील दिव्यांग बांधवांचे समस्या समजून घेऊन समाधान म्हात्रे यांनी दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत केली. आवरे येथे भोलेनाथ मंदिरात भेट वस्तु दिली त्यानंतर बेलापूर येथे दहा ते बारा उद्योजकांनी  आपापल्या ऑफिसमध्ये केक कापून समाधान म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी उरण नगर परिषदेत नगराध्यक्ष भावना घाणेकर, नगरसेविका प्रार्थना म्हात्रे,नगरसेविका नाहिदा ठाकूर, नगरसेविका तनिषा पाटील, नगरसेवक मंगेश कासारे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष चेतन म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार या सर्वांच्या उपस्थितीत केक कापून समाधान म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

 रात्री नऊ वाजता समाधान म्हात्रे यांच्या निवासस्थानी परिवार, मित्रमंडळी व गावातील ग्रामस्थांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी गोवठणे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच समीर म्हात्रे, प्रसिद्ध निवेदक सुनील वर्तक, शाळा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, व शिक्षक वृंद ,पत्नी शलाका म्हात्रे,परिवार व गोवठणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विशेष मेहनत घेतली

महेंद्रशेठ घरत यांची दिनदुबळ्यांना मदत करण्याची भूमिका लाजवाब : भावना घाणेकर


मावनता हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत.

** महेंद्रशेठ घरत यांची दिनदुबळ्यांना मदत करण्याची भूमिका लाजवाब : भावना घाणेकर  

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : "जगाच्या कानाकोपऱ्यात मी कामगार नेता म्हणून जात असतो. जागतिक पातळीवर कामगारांचे कायदे बनवले जातात, अशा व्यासपीठावर माझी ऊठबस असते. त्यामुळे परदेशात जाणे-येणे सर्रास झाले आहे. अशावेळी मी प्रवासात आवर्जून त्या त्या देशांतील चर्चमध्ये जातो. चर्चची भव्यता, शांतता, येशूला बघूला मनाला शांती लाभते. विशेष म्हणजे बहुतांश चर्च किमान ५०० वर्षांपूर्वीच्या आहेत. तिथे गेल्यावर वेगळीच प्रसन्नता मनाला लाभते. विरोध आमच्या संतांनाही त्या त्या काळी पत्करावा लागला आहे. विरोध नवीन नाही, पण आपण लढले पाहिजे, चालत राहिले पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. भारत हा बहुभाषिक आणि सर्व धर्मांना सामावून घेणारा देश आहे. सर्व धर्म ग्रंथांत मानवतेचाच संदेश आहे. ज्ञानेश्वर महाराज यांनीही ज्ञानेश्वरीत 'पसायदाना'द्वारे जगाच्या कल्याणाचा विचार केला आहे. साने गुरुजींनी सांगितले आहे, 'जगाला प्रेम अर्पावे'. त्यामुळे त्याच वाटेवर मी चालत आहे. ख्रिस्ती समाजाने आपल्या हक्काचे ठिकाण म्हणून उलवा नोडमध्ये चर्च निर्माण करावे, मी खंबीरपणे उभा आहेच," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत ख्रिस्ती समाजाला संबोधन करताना म्हणाले. उलवे नोडमधील भूमिपुत्र भवन येथे ख्रिस्ती समाजाचा दोन दिवसीय शांती मेळावा पार पडला. शुक्रवारी (ता. २४) अखेरच्या सत्रात महेंद्रशेठ घरत यांनी ख्रिस्ती समाजाला आश्वासित केले. ते पुढे म्हणाले, "काँग्रेस हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा मी रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. मी कुठेही गेलो तरी माणसातच देव पाहतो. म्हणूनच 'सुखकर्ता' बंगल्यावरून कुणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही, याची काळजी घेतो." 

"महेंद्रशेठ घरत यांच्याविषयी मी ऐकून होते. मला फार काही त्यांच्याविषयी माहिती नव्हते; परंतु उरणमध्ये मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी, म्हणून ते नुसते बोलले नाहीत, तर खंबीरपणे मागे उभे राहिले. एक लिडर कसा असावा, याचे उदाहरण म्हणजेच महेंद्रशेठ घरत होय, असे मी अभिमानाने सांगेन. आजघडीला देशात प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता आहे. सध्या जे टोकाचे राजकारण सुरू आहे. ते निंदनीय आहे. आई-वडिलांच्या सेवेत मुले कमी पडत आहेत; परंतु दिनदुबळ्यांची, पीडितांची सेवा ख्रिस्ती समाज करतोय, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या माणुसकीच्या लढ्यात मी खंबीरपणे साथ देण्यास तयार आहे. महेंद्रशेठ घरत यांची दिनदुबळ्यांना मदत करण्याची भूमिका लाजवाब आहे. असा नेता आपल्याला लाभणे, हे सुद्धा भाग्यच आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर कायम राहील," असे उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर ख्रिस्ती समाजाला संबोधित करताना उलवे नोड येथील 'भूमिपुत्र भवन' येथे म्हणाल्या.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, माजी नगरसेविका अफशा मुकरी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ख्रिस्ती समाजाच्या शांती मेळाव्यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी दोन दिवसांसाठी 'भूमिपुत्र भवन' प्रायोजित केल्याबद्दल ख्रिस्ती समाजाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.२३ आणि २४ एप्रिल रोजी समस्त उलवे ख्रिस्ती समाजाच्या वतीने एकता सभा झाली. यावेळी प्रेरित राम बाबू यांनी मार्गदर्शन केले. आयोजक बबन कांबळे, धनंजय नाईक, विकी कुलकर्णी, आनंद  मतमारी, प्रल्हाद लकडा आणि त्यांची टीम, तसेच समस्त उलवे ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

उरणच्या ज्योती पाटील आदर्श मुख्याध्यापिका तर प्रदीप म्हात्रे आदर्श पुरस्काराने सन्मानित !!

उरणच्या ज्योती पाटील आदर्श मुख्याध्यापिका तर प्रदीप म्हात्रे आदर्श पुरस्काराने सन्मानित !!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट दादर, मुंबई यांच्यातर्फे २४ एप्रिल २०२६ रोजी संस्थेचा  १३५ वा वर्धापन दिन छबीलदास हायस्कुल दादर मुंबई येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उपमहापौर  संजय घाडी, मुकुंद चितळे, देवचंद राका आदी मान्यवर उपस्थित होते. विविध मान्यवर व संस्थेचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न  झाला.
कै.गो.ना.अक्षीकर विद्यासंकुलातील ज. ए. इ ची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, उरणच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील  यांना आदर्श मुख्याध्यापिका, तर एन.आय.हायस्कूल मधील वरीष्ठ लिपिक प्रदिप म्हात्रे यांना शाळेकरीता विद्यार्थ्यांकरीता उत्तम कामगिरी केल्या बद्दल आदर्श पुरस्कार देण्यात आले.ज्योती पाटील यांना आदर्श मुख्याध्यापिका तसेच वरिष्ठ लिपिक प्रदीप म्हात्रे यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याने या दोघांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मुख्याध्यापिका ज्योती पाटील तसेच वरिष्ठ लिपिक प्रदीप म्हात्रे त्यांनी शिक्षण क्षेत्रात बजावलेल्या महत्वाच्या सेवे बद्दल, उत्तम कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने विद्यार्थी, पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड, नवी मुंबई तर्फे आयोजित बेमुदत धरणे आंदोलनला २८ एप्रिल रोजी होणार एक वर्ष पूर्ण !!

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड, नवी मुंबई तर्फे आयोजित बेमुदत धरणे आंदोलनला २८ एप्रिल रोजी होणार एक वर्ष पूर्ण !!

विविध मागण्या साठी सतत अखंडितपणे पाठपुरावा सुरु.

विविध मागण्यासाठी शेतकरी प्रकल्पग्रस्त एकत्र.

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
दि. २८ एप्रिल २०२५ पासून नवी मुंबई मधील बेलापूर सिडको भवनच्या गेटसमोर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड, नवी मुंबई  तर्फे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे त्याला आता २८ एप्रिल २०२६ रोजी १ वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त सिडको भवन समोर आंदोलनाचा वर्षपूर्ती कार्यक्रम मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दूपारी २.०० वा. सिडको भवनच्या गेटवर आयोजित केला आहे. या वर्षपूर्ती कार्यक्रमास सर्व प्रकल्पग्रस्त, शेतकरी, भूमीपुत्रांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)रायगड, नवी मुंबई तर्फे करण्यात आले आहे.

सिडकोने रायगड, नवी मुंबई मधील जमिनी घेवून तुमचा विकास करतो अशी आशा दाखवून स्वतःचाच विकास केला. मात्र येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त गावाभोवती होणाऱ्या विकासाला स्वतःचा विकास समजू लागला.प्रस्थापित राजकीय पक्षांचे पुढारी सिडकोचे ठेकेदार व दलाल बनून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे न राहता सिडकोच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे सिडकोची ताकद वाढली. शेतकऱ्यांच्या जमिनी घेवून स्वतःचाच विकास केला. शेतकऱ्यांच्या लढयातून मिळालेले १२.५% चे प्लॉट देण्यास सिडको गेली कित्येक वर्षे टाळाटाळ करीत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सुध्दा वाढीव पेमेंट देण्यास सिडको टाळाटाळ करीत आहे. वाढीव गावठाणे अतिक्रमित, अनधिकृत ठरवून पाडण्याच्या नोटीसा कोर्टाकडून आणत आहे. हया सर्व प्रश्नांच्या विरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)रायगड, नवी मुंबई तर्फे दि. २८ एप्रिल २०२५ पासून नवी मुंबई मधील बेलापूर येथील सिडको भवनच्या गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनातील मागण्या या सर्व शेतकरी, प्रकल्पग्रस्त जनतेच्या आहेत, प्रत्येक गावाच्या प्रत्येक घरातल्या आहेत. तेव्हा हे आंदोलन पुढे नेण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी हया लढयात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एक वर्ष पूर्ण होऊनही शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अजूनही पूर्ण न झाल्याने शेतकरी व प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

सी.आय.टी.यू., अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी. वाय. एफ. आय.आदी संघटणेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील या आंदोलनात सुरवातीपासून सहभागी आहेत. त्यांचे सुद्धा योगदान या उपोषणाला लाभले आहे.


कोट (चौकट ):- 

: मागण्या :

१) गरजेपोटी घरांवरील तोडक कारवाई त्वरीत थांबवा.

२)१२.५% योजनेच्या भूखंडाचे त्वरीत वाटप करा.

३) १२.५% भूखंड प्रकरणी मावेजाची आकारणी रद्द करा.

४) वाढीव नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत अदा करा.

५)सप्टेंबर २०२४ च्या गरजेपोटी जी. आर. ला विरोध करा.

६) १२.५% पात्रतेतून कापलेले बांधकामाचे प्लॉट परत करा.

श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा चिरनेर समितीच्या कार्यकारणी निवड !!

श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा चिरनेर समितीच्या कार्यकारणी निवड !!

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
रायगड जिल्ह्यात श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. रायगड जिल्ह्यात सर्वात मोठी श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उरण मध्ये छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्ध नौका ग्रुप व ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या माध्यमातून साजरी केली जाते. यंदा १४ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती उरण तालुक्यातील चिरनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या उत्सवानिमित्त नुकतेच चिरनेर येथे संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत श्री छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सचिन केणी, कार्याध्यक्ष पदी योगेश गावंड,उपाध्यक्ष शैलेश चिर्लेकर ,सचिव ऋषिकेश कडू, सहसचिव मयुरेश सिंग, समन्वयक महेश केणी,सदस्य पृथ्वीराज कडू, सदस्य जित तांडेल सदस्य आदित्य केणी यांची निवड झाली आहे. श्री छत्रपती संभाजी महाराजांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या या श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्याच्या उत्सव समितीच्या विविध पदावर नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकारी सदस्यांवर शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव होत आहे. हे सर्व पदाधिकारी, सदस्य श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्या  कार्यालयावर शिवसेनेची धडक : नागरिकांच्या वाहतूक समस्यांवर जाब !!       *कल...