Wednesday, 8 April 2026

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून 'अन्नपूर्णा स्वादिष्ट' उपक्रमा अंतर्गत "राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा" आयोजन !!

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून 'अन्नपूर्णा स्वादिष्ट' उपक्रमा अंतर्गत "राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा" आयोजन !!

मुंबई (पंकजकुमार पाटील) : मुंबईतील भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून 'अन्नपूर्णा स्वादिष्ट' उपक्रमा अंतर्गत 'राज्यस्तरीय मोदक स्पर्धा विशेष' आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हि स्पर्धा पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात होणार असून, राज्यातील कोणत्याही कोपऱ्यातून गृहिणी, आचारी आणि पाककला प्रेमींना यात सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये मोदक बनवण्याची पद्धत (Traditional & Innovative). आकर्षक सजावट (Modak Presentation). पाककृतीची माहिती (Ingredients & Recipe). स्वच्छता आणि सात्विकता (Purity and Divinity)या प्रमुख निकषांवर गुण दिले जातील.

हि स्पर्धा पूर्णतः मोफत असून यात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मोदकाचा एक सुंदर फोटो काढावा. त्यासोबत मोदकाची सविस्तर कृती (Recipe) आणि स्वतःची माहिती लिहावी. हि सर्व माहिती संस्थेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. स्पर्धेसाठी अंतिम तारीखः १५ एप्रिल असून निकाल १८ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता जाहीर होईल. 

यशस्वी स्पर्धकांना संस्थेमार्फत अधिकृत डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच, काही विशेष निवडक सदस्यांना दादर येथील संस्थेच्या प्रशालेत आयोजित मुख्य कार्यक्रमात विशेष अतिथींच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :  ९९६८५1३६०९/ ९३२३०६८८७३ संकेतस्थळ: bharatiyavedic.org

उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणीची निवड !!

उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणीची निवड !!

उरण दि ८,'(विठ्ठल ममताबादे) : बुधवार दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची विशेष सभा पी.एन.पी. माध्यमिक शाळा मोठी जुई येथे संघाचे मावळते अध्यक्ष सुधीर मुंबईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी संघाचे संस्थापक अध्यक्ष नाथा नाईक,अरुण घाग, सूरदास राऊत,किशोर भोईर, संतोष म्हात्रे, प्रवीण पाटील, मिलिंद पट्टेबहादूर, मनोज म्हात्रे, सोनाली कोळी  इत्यादी सदस्य उपस्थित होते. या सभेत संघाची नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. अध्यक्ष म्हणून  मिलिंद पट्टेबहादूर, उपाध्यक्ष  सोनाली कोळी, सचिव पदी संतोष म्हात्रे आणि खजिनदार  म्हणून प्रवीण पाटील  यांची नियुक्ती करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पी.एन.पी .शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोईर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात संघाची स्थापनेपासूनची वाटचाल विशद केली .याप्रसंगी नाथा नाईक,अरुण घाग,सुभाष ठाकूर, संतोष म्हात्रे,कोळी मॅडम,सुधीर मुंबईकर या सर्वांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. सुधीर मुंबईकर यांनी सर्वांसाठी भोजनाची उत्तम प्रकारे व्यवस्था केली होती. मोठया उत्साहात सदर सभा संपन्न झाली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली

बाळू कृष्णा पार्टे यांचे दुःखद निधन. !

बाळू कृष्णा पार्टे यांचे दुःखद निधन. !

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र पोलीस कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते बाळू कृष्णा पार्टे यांचे शनिवार दिनांक ४/४/२०२६ रोजी वयाच्या ७५ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा उत्तरक्रिया विधी बुधवार १५/४/२०२६ रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी बोरी, पानसरे आळी, उरण येथे होणार आहे. मनमिळाऊ व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे बाळू पार्टे हे गोर गरिबांच्या अडी अडचणीत गोरगरिबांना ते मदत करत असल्याने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.एक कर्तव्य दक्ष व प्रामाणिक पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. सेवानिवृत्त झाल्या नंतरही त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना मार्गदर्शन, मदत केली आहे. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली ,बारा नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. २ मुले महाराष्ट्र पोलीस विभागात कार्यरत आहेत , एक आर्मी मध्ये तर एक नात पीएसआय आहे. देश सेवेला वाहून घेतलेले हे कुटुंब आहे. बाळू पार्टे यांच्या निधनाने पार्टे कुटूंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या मृत्यू झाल्याने सर्वत्र मोठया प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे. या दुःखद प्रसंगी व विधी प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुःखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते 'देव घरा आयला'चे उद्घाटन !

महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते 'देव घरा आयला'चे उद्घाटन ! 

नाटकांची परंपरा जपणारे रांजणपाडा गाव : महेंद्रशेठ घरत

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : पूर्वीच्या काळी जत्रा म्हणजे गावोगावी आनंदोत्सव असायचा. त्याकाळी बहुतांश घरांमध्ये फक्त जत्रेलाच मटन शिजायचे. त्यामुळे गावात मटनाचा सुगंध दरवळत असे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला हक्काने जेवायला दोन घास तरी खा, असा आग्रह केला जात असे. तसेच जत्रे निमित्ताने नाटक, कव्वालीचे सामने वा इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम असायचे. ही परंपरा आजही काही गावांमध्ये जपली जातेय, त्यापैकीच उरण तालुक्यातील रांजणपाडा गाव. मंगळवारी रांजणपाडा गावची यात्रा होती. त्यानिमित्ताने  जुन्याजाणत्या हौशी कलाकारांनी स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'देव घरा आयला' या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "हसुराम पाटील यांच्यासारखे अनेक हरहुन्नरी कलाकार ग्रामीण भागात आहेत. त्यांच्या नसानसांत नाटक भिनले आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी गावोगावी होणाऱ्या नाटकांची परंपरा ते आजही जपत आहेत. ते नवीन पिढीला सोबत घेऊन त्यांच्यात कलेचे बीज रोवत आहेत. वास्तवदर्शी नाटक सादर करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. लहान मुले, तरुण यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नाटक बसवणे आणि त्याचे उत्तम सादरीकरण करणे, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे रांजणपाडा ग्रामस्थांचे आणि उत्तम नाटक सादर करणारे कलाकार यांचे मनापासून अभिनंदन! मी कलेचा भुकेलेला आणि प्रोत्साहन देणारा आहे. मी नाटक वेडा आहे. पूर्वी मी शिवाजी मंदिरला नाटक पाहायला जायचो, आजही मला उसंत मिळाली नाटकाचा मोह आवरत नाही. कारण नाटक ही एक जिवंत कला आहे."

रांजणपाडा येथील 'अष्टगंध सांस्कृतिक, कला, सामाजिक मंडळा'च्या वतीने मरूआईच्या यात्रेनिमित्त आणि बाबीबाई त्रिंबक पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी ( ता. ७) धनेश्वर म्हात्रे लिखित व हसुराम पाटील दिग्दर्शित तसेच प्रसाद कडू सहदिग्दर्शक असलेल्या नाटकाचा प्रयोग रांजणपाडा (उरण) येथील हनुमान मंदिराच्या पटांगणात सादर करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत बोलत होते. 

 या नाटकाची निर्मिती रमेश चिंतामण कोळी यांची आहे. नाट्य मंडळाचे अध्यक्ष- अशोक कान्हा म्हात्रे, सचिव- दत्तात्रेय घरत, खजिनदार- प्रज्योत पाटील, सल्लागार- रंजन ठाकूर, नरेंद्र ठाकूर, पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे यांच्या टीमने उत्तम कामगिरी केली आहे. 

दिगंबर कोळी, मनोहर ठाकूर यांची संकल्पना आणि धनेश्वर म्हात्रे, हसुराम पाटील, कृष्णकांत म्हात्रे, दिगंबर कोळी, सुमित कुंभार, अशोक म्हात्रे, जयकिसन मोकल, वैभव म्हात्रे, प्रसाद कडू, अलंकार कडू, वैशाली मोहिते, परीशा सरोदे, व रुद्र ठाकूर आदी कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांना जिंकले. आनंद कुबल यांचे संगीत, राजा जोशी यांचे नेपथ्य, डी. वाय. म्हात्रे यांची रंगभूषा, संतोष साऊंड सर्विस यांची रंगमंच व्यवस्था प्रश्वंसनीय होती. आगरी संस्कृती, आगरी भाषेतील गोडवा, आगरी रुढी-परंपरा व नातेसंबंधांवर आधारित वास्तवदर्शी 'देव घरा आयला' हे नाटक रसिकांच्या मनात कायम घर करेल, अशा भावना यावेळी रसिकांनी व्यक्त केल्या.

भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त एका वाहनावर, ग्रामस्थांमधून आचर्य व्यक्त !!

भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त एका वाहनावर, ग्रामस्थांमधून आचर्य व्यक्त !!

** महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह 

भिवंडी, दिं,८,अरुण पाटील (कोपर)
सद्या भिवंडी तालुक्यातील खाडी पत्रातून दररोज दिवसा - रात्री बेकायदेशीर रित्या लाखो ब्रास रेती उत्खनन होऊन तिची शेकडो हायवा डंपरमधून हजारो ब्रास रेती बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असून त्या पैकी बुधवार दिं,१/४/२०२६ रोजी तलाठी सजा कोपर येथील मा.तलाठी श्री.रमेश रामराव सूर्यवंशी यांनी आपल्या महसूल पथकासह एका बेकायदेशीरीत्या "रेती" ची चोरटी वाहतूक करणाऱ्या टाटा  हायवा ट्रक वर कारवाई करत नारापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तलाठी कोपर यांनी दिली आहे. मात्र याच ठिकाणावरून दररोज शेकडो हायवा डंपर मधून हजारो ब्रासची रेतीची चोरटी वाहतूक हात असताना फक्त एकाच वाहनावर कारवाई केल्याने ग्रामस्थांमधून आचर्य व्यक्त होत असून महसूल खात्या विरोधात आर्थिक व्यवहाराचा संशय बळावत आहे.

      सविस्तर हकिगत अशी की, भिवंडी तहसीलदार श्री.अभिजीत खोल यांनी मा. जिल्हाधिकारी ठाणे ,श्री.कृष्णा पांचाळ साहेब, मा.अप्पर जिल्हाधिकारी- ठाणे श्री हरिचंद्र पाटील साहेब, उपविभागीय अधिकारी, श्री सानप साहेब यांच्या आदेशाचे पालन करत दिं,२०/०३/२०२६ रोजी केवणी (दिवे)खाडी किनारी छापा टाकून येथील बार्ज, सक्शन पंप,असा एकूण ४० ते ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

           मात्र त्याच दिवसापासून पुन्हा त्याच ठिकाणावरून बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन व रेती वाहतूक सुरळीत सुरू आहे.या बाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी मंडळ अधिकारी - खारबाव व तलाठी सजा - कोपर यांना दिली होती. मात्र त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने या  कालावधी दरम्यान महसूल खात्याचे  रेती या गौण खनिज रूपाने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे व होत आहे, त्याला जबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे महसूल खात्याने या गंभीर विषयाकडे जातीने लक्ष केंद्रित करून दररोज  शासनाचा" स्वामित्व धन" रूपाने महसूल चोरी करणाऱ्यांनवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची.मागणी जोर धरू लागली आहे.

         तलाठी सजा - कोपर चे तलाठी श्री मा. श्री.रमेश सूर्यवंशी यांनी दिं,१/४/२०२६ रोजी संध्याकाळी ७.३० वा. आपल्या पथकातील सहकारी मनोज नवले ग्राम महसूल अधिकारी - पालखाने, रुपेश कारभारी - जुनांदुर्खी, किसान हांबीर - ग्राम महसूल अधिकारी चिंबिपाडा, या पथकासह कोपर गावातील दोस्ती ग्रेटर - ठाणे येथे गस्त घालत असताना त्यांना केवणी (दिवे) गावाकडून भिवंडी - ठाणे मुख्य रस्त्याकडे रीतीने भरलेला हायवा ट्रक क्रं. एम.एच.४६- सी.यू.९३७२) जात असताना दिसला त्यावेळेस चालकाला गाडी थांबवण्यास सांगून आम्ही आमची ओळख सांगून रेती बाबत रॉयल्टी/परवाना काही कागद पत्रे असल्या बाबत विचारणा केली असता ट्रॅक चालक मनोज याने कोणतेही कागद पत्रे नसल्याचे सांगुन पळून गेला.

        नंतर नारपोली पोलिसांनी बेकायदेशीर रेती चोरी प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसुल संहिता, व भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करून १५ लाख १५ हजार रु. किंमती ट्रक सह मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास नारपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक धनराज केदार करत आहे.

         या कारवाई नंतर देखील वाळू /रेती माफिया यांनी महसूल खात्याला फाट्यावर मारत रेती उत्खनन व वाहतूक सुरू ठेवली आहे.तेंव्हा या बाबतची माहिती उप जिल्हाधिकारी  रुपाली भालके मॅडम यांना मिळाली असता त्यांनी सोमवार‌,दीं ६/४/२०२६ रोजी दुपारी अचानक छापा टाकून त्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या  साठवणूक केलेली १५ कुंड्यांन मधून ४५० ब्रास रेती साठा जप्त केला आहे. यापुढे आता अश्या वाळू माफियांवर गुप्त बातमीदारामार्फत त्यांची नावे शोधून काढून त्यांच्यावर "मोकोका"च्या कायद्यात तरतूद असेल तर तो लावणार अथवा विविध कलमा खाली विविध गुन्हे दाखल करणार असल्याचं संकेत श्रीमती रुपाली भालके मॅडम यांनीं दिल्याने या वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

Tuesday, 7 April 2026

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

कल्याण, प्रतिनिधी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त 'रामदास कोकरे' यांनी नुकताच कल्याण परिसरातील वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने वालधुनी नदीपात्रात प्रत्यक्ष उतरून प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

या पाहणी दरम्यान त्यांनी नदीतील विविध ठिकाणांची स्थिती बारकाईने तपासली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेतल्या. नागरिकांनीही त्यांना नदी प्रदूषणाबाबत सविस्तर माहिती दिली.

या दौऱ्यात वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील सिताराम उतेकर, खजिनदार श्री निशांत बबली कांबळे, तसेच श्री दीपक थोरात, श्री गणेश कांबळे, सौ. भारती अय्यर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने माननीय उपायुक्तांना नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर उपायुक्त श्री रामदास कोकरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, "या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करून शहराला पुन्हा एकदा स्वच्छ व सुंदर नदीचे वैभव मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे," असे आश्वासन दिले.

या पाहणी दौऱ्यास उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे प्रमुख श्री. शशिकांत दायमा, सौ.रेखा अत्तरदे, श्री.सुरेश अहिरे यांनी उपायुक्तांचे आभार मानले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांची नियुक्ती !!

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांची नियुक्ती !!

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र राज्यातील आगरी-कोळी समाज हा पारंपरिक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या फार महत्त्वपूर्ण घटक आहे. कोकणात आणि विशेष करून मुंबई महानगर प्रदेशात प्रभावी लोकसंख्या असलेला आणि स्थानिक भूमिपुत्र असलेल्या ह्या समाजाला गेल्या पन्नास वर्षात अनेक प्रकल्पांनी वेढा घातलेला असून या समाजास विविध शासकीय, शैक्षणिक, रोजगार व सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

आगरी व कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या समस्या शासन प्रशासन स्तरावर प्रभावीपणे मांडून सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” ची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सक्षम आणि उमदे नेतृत्व, अनुभवी व समाजकार्याची जाणीव असणारे नवी मुंबईतील उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांच्या कडे देण्यात आलेली असून त्यांची “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार - आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे  ह्यांच्या हस्ते आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून पक्षाची आणि समाजाची प्रतिमा उंचावून समाजाच्या हितासाठी निष्ठेने कार्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने “आगरी व कोळी समाज सेल- महाराष्ट्र प्रदेश” राज्यप्रमुख पदी नवी मुंबईचे सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील ह्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून 'अन्नपूर्णा स्वादिष्ट' उपक्रमा अंतर्गत "राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा" आयोजन !!

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून 'अन्नपूर्णा स्वादिष्ट' उपक्रमा अंतर्गत "राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा" आयोजन !...