Sunday, 10 May 2026

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

पेण (पंकजकुमार पाटील) : 
पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ताहिक 'रायगडची शान' चे संपादक सुरेश सीताराम म्हात्रे यांचे दिनांक ७ मे रोजी हृदय विकाराच्या झटक्याने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी (पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पेण तालुका सचिव) अवंतिका म्हात्रे, दोन मुली एक मुलगा व इतर नातलग  असा परिवार आहे.

" *शब्दांची लेखणी विसावली, विचारांचा सूर्य मावळला...* 

सुरेश म्हात्रे यांची एक निर्भीड पत्रकार, सच्चा विचारवंत अशी ओळख होती. त्यांनी आपल्या लेखणीतून  केवल  बातम्या लिहिल्या नाहीत, तर समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. समाजातील  अन्यायाविरुद्ध त्यांची लेखणी तलवारीपेक्षा धारदार होती. जनतेच्या समस्या  शासन -प्रशासन दरबारी पोहचवून प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचा त्यांचा  प्रामाणिक प्रयत्न राहिला. सत्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांच्या वेदनेला वाचा फोडणारा तो आवाज आज कायमचा शांत झाला आहे. 

🙏🙏 त्यांचा  उत्तरकार्य विधी-  दशक्रिया विधी शनिवार दि. १६ मे  रोजी उद्धर -पाली  येथे होईल. तर तेरावा विधी मंगळवार दि. १९ मे  रोजी राहत्या घरी गडब, काराव पेण येथे होईल असे त्यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.

Saturday, 9 May 2026

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिलवान यांचे सुपुत्र) यांनी स्पीच थेरपी आणि स्वॅलॉइंग डिफिकल्टीज या विषयात त्यांनी PhD पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. उझैर यांनी स्ट्रोकनंतरचे रुग्ण, मुलांमधील भाषण विकासातील विलंब, बोलू न शकणारे रुग्ण तसेच घशाच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर गिळण्यास अडचण येणाऱ्या रुग्णांवर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची National Speech Therapist of the Year म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान सोहळा दिल्ली येथे पार पडला.या यशाबद्दल घुमटकर ग्रुप परिवारातर्फे उझैर चिलवान यांचे  व त्यांचे वडील डॉ. आदिल महमूद चिलवान यांचेही
अभिनंदन  करण्यात आले.

त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे.त्यांना यश, आरोग्य आणि समाजसेवेची संधी  मिळो अशा घुमटकर ग्रुपच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ !!

जावलीत शैक्षणिक क्रांतीला नवी दिशा

UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ !!

प्रतिनिधी | जावली

श्रीमान्य आर. के. धनावडे साहेब यांच्या पुढाकारातून जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात “शिक्षणाचं माहेरघर” म्हणून ओळख निर्माण केलेल्या जावली तालुक्यात आता UPSC आणि MPSC परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन, मोटिवेशनल लेक्चर्स आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

डोंगराळ भौगोलिक परिस्थिती आणि शेतीसाठी मर्यादित साधनसंपत्ती असूनही जावली तालुक्यातील अनेक कुटुंबांनी शिक्षणालाच प्रगतीचा मुख्य मार्ग मानला. त्यातूनच सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला “जावली पॅटर्न” उदयास आला. आज तालुक्यातील अनेक विद्यार्थी UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली ही शैक्षणिक क्रांती संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विशेष म्हणजे, जावली तालुक्यातून UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी होणारे पहिले अधिकारी म्हणून श्री ओमकार पवार सर यांनी जावली तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांच्या प्रेरणेतून आणि राज्यातील वरिष्ठ राजपत्रित अधिकारी तसेच मंत्रालयीन अनुभवाच्या बळावर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, अधिकाधिक क्लास वन व क्लास टू अधिकारी घडावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

येत्या काळात जावली तालुक्यात विविध मोटिवेशनल लेक्चर्स, हायस्कूल स्तरावरील करिअर मार्गदर्शन, नवीन उद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन, विविध क्षेत्रांतील नोकरी संधींबाबत माहिती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी तालुक्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी व क्लास वन अधिकारी देखील सहकार्य करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जावलीच्या विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे हे कार्य काळाची गरज असून श्रीमान्य आर. के. धनावडे साहेब यांनी असेच प्रेरणादायी कार्य पुढेही सुरू ठेवावे, अशा भावना जावली युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रसिद्ध समाजसेवक तथा उद्योजक डॉ. विजय दिघे आणि जावलीकरांकडून व्यक्त होत आहेत.

विशेष लेख/प्रसिद्धी - विलासराव कोळेकर सर 

उरण न्यायालयासमोर पडक्या इमारतीत गांजाची नशा ; पोलिसांचा छापा, चौघांवर गुन्हा दाखल !

उरण न्यायालयासमोर पडक्या इमारतीत गांजाची नशा ; पोलिसांचा छापा, चौघांवर गुन्हा दाखल !

निर्जन इमारती ठरताहेत नशेबाजांचे अड्डे.
 
उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरात न्यायालयाच्या अगदी समोरच अलिबाग वन विभागाच्या वापरात नसलेल्या पडक्या इमारतीत गांजा ओढणाऱ्या चौघा तरुणांना उरण पोलिसांनी शनिवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे उरणमधील निर्जन व पडक्या इमारती नशेबाजांचे अड्डे बनत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १३०/२०२६ अन्वये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ मे २०२६ रोजी दुपारी १२:३५ वाजताच्या सुमारास उरण कोर्टाच्या समोर असलेल्या अलिबाग वन विभागाच्या जुन्या, पडक्या इमारतीत काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोउपनि गोविंद केंद्रे व पथकाने दुपारी १२:२५ ते १२:५५ या वेळेत घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी सौरभ बिस्वनाथ प्रामाणीक, वय ३०, रा. अर्श टॉवर बी/२०१, उरण कोर्ट जवळ; हर्षल विनायक भोईर, वय २४, रा. भोईरआळी, नवीन शेवा; हेमंत बबन कोळी वय ३२ रा. घर नं. ५६/डी  हनुमान कोळीवाडा राम मंदिरासमोर; आणि जुगल लक्ष्मण पाटील, वय २३, रा. पाण्याचे टाकीजवळ केगाव आवेडा हे चौघेजण 'गांजा' या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये चौघांनाही नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. 

या घटनेची नोंद ३ मे २०२६ रोजी दुपारी ३:२३ वाजता उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याचे काम पोउपनि निलेश कोंडाळकर यांनी केले असून प्राथमिक तपास पोउपनि गोविंद केंद्रे करत आहेत. 

उरण शहरात गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या वापराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः समुद्रकिनारी असलेल्या केगाव, पिरवाड, दांडा तसेच शहरातील पडक्या इमारती, बंद पडलेले गोडाऊन व निर्जन जागा यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गांजा सेवन प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली होती. उरण हे जेएनपीटी बंदर व द्रोणागिरी नोडमुळे वेगाने विकसित होत असले तरी, येथील सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. 

न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणासमोरच दिवसाढवळ्या नशा केली जात असल्याने कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पडक्या सरकारी इमारतींची डागडुजी करावी किंवा त्यांना कुलूप लावून संरक्षित करावे, जेणेकरून त्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनणार नाहीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालय परिसर, न्यायालय, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. 

अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढत असून त्यासाठी समुपदेशन केंद्रे व जनजागृती मोहीम राबवण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर पालक, शिक्षण संस्था व पोलिस यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या घटनेमुळे उरणमधील वाढत्या नशेखोरीवर पुन्हा प्रकाश पडला असून पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी : नगरपरिषदेच्या रस्त्यावरच वाळू-रेतीचे ढीग, वाहतूक कोंडी आणि अपघातांना आमंत्रण; प्रशासनाचे डोळेझाक, नागरिक संतप्त !!

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी : नगरपरिषदेच्या रस्त्यावरच वाळू-रेतीचे ढीग, वाहतूक कोंडी आणि अपघातांना आमंत्रण; प्रशासनाचे डोळेझाक, नागरिक संतप्त !!

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) :
 उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावरच बिल्डरांनी आपली मनमानी सुरू केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. खासगी इमारतीच्या बांधकामासाठी कोणतीही परवानगी न घेता भर रस्त्यातच रेती-वाळूचे ढीग टाकण्यात आले असून, अर्ध्याहून अधिक रस्ता अडवला गेला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून अपघाताची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर आहे. ‘उद्या अपघात झाला तर जबाबदार कोण? बिल्डर की ढिम्म प्रशासन?’ असा संतप्त सवाल उरणकर विचारत आहेत.

प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले की, उरण शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर इमारतीच्या बांधकामासाठी आणलेली रेती थेट रस्त्यावरच ओतली आहे. रस्त्याच्या निम्म्याहून अधिक भाग व्यापल्याने दुचाकी, रिक्षा व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर पसरलेल्या रेतीमुळे वाहनांची चाके घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. रात्रीच्या वेळी तर दृश्यमानता कमी असल्याने धोका आणखी वाढला आहे.

नियम काय सांगतात ? बिल्डरला मोकळीक कोणी दिली  ? 

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यास सक्त मनाई आहे. बांधकामासाठी नगरपरिषदेची परवानगी घेणे बंधनकारक असून, रस्ता अडविल्यास संबंधित बिल्डरवर दंडात्मक व फौजदारी कारवाईची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७) अन्वये अवैधपणे रस्ता अडवून केलेल्या कृत्यासाठी बाजारभावाच्या तिप्पट दंड आकारता येतो. 

तरीही उरणमध्ये मात्र बिल्डरांनी थेट रस्त्यावरच ‘साईट ऑफिस’ थाटल्यासारखे चित्र आहे. विशेष म्हणजे, ज्या नगरपरिषदेच्या कर निरीक्षक व मुख्य अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, तेच मूग गिळून गप्प आहेत. ‘परवानगी आहे का?’ याची साधी विचारणाही न करता बिल्डरला मोकळे रान कोणी दिले, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

‘कुंपणच शेत खातंय’ – नागरिकांचा आरोप :- 

“बिल्डरने रेती रस्त्यावर टाकली आणि अर्धा रस्ता गायब झाला. शाळेची मुले, ज्येष्ठ नागरिक रोज जीव धोक्यात घालून जातात. उद्या अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार?  की बिल्डरच्या पैशापुढे सगळे हतबल आहेत?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला. उरण नगरपरिषदेला  तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. 

प्रशासनाला अंतिम इशारा:- 

बांधकाम साहित्यामुळे रस्ता अडवणे हा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चा भंग आहे. असे असूनही उरण नगरपरिषद प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ‘बिल्डर आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का?’ अशी शंका व्यक्त होत आहे. 

नागरिकांनी मागणी केली आहे की, १) तात्काळ रस्त्यावरील रेती-वाळू हटवावी. २) संबंधित बिल्डरवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करावा. ३) यापुढे विनापरवानगी रस्ता अडविल्यास थेट बांधकाम परवाना रद्द करावा. ४) निष्काळजीपणा करणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.

‘रस्ते हे नागरिकांच्या वाहतुकीसाठी आहेत, बिल्डरच्या गोदामासाठी नाहीत’ हे प्रशासनाने लक्षात ठेवावे. अन्यथा उरणकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे:- 

उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी करून २४ तासांत रस्ता मोकळा करावा. बिल्डरच्या मनमानीपुढे प्रशासन झुकणार असेल तर उद्या प्रत्येकजण रस्त्यावरच बांधकाम साहित्य टाकेल आणि उरणची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. कारवाईस झालेला विलंब एखाद्याचा जीव घेऊ शकतो, याचे भान प्रशासनाने ठेवावे.

उरण नगरपरिषदेच्या ‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याचे नवी मुंबई पोलीस दलात निवड !!

उरण नगरपरिषदेच्या ‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याचे नवी मुंबई पोलीस दलात निवड !!

अभ्यासिकेचे १० वे यश ;;स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनालय ठरत आहे वरदान.

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : उरण नगरपरिषद संचलित माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथील अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या कु. श्रीकांत सांगोलकर या विद्यार्थ्याची नवी मुंबई पोलीस दलात नवीमुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांच्या हस्ते श्रिकांतचा सत्कार करण्यात आला.

सदर अभ्यासिका तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्रीकांत सांगोलकर याने हे यश संपादन केले आहे.  

विशेष म्हणजे, या अभ्यासिकेतील विद्यार्थ्याने मिळविलेले हे १० वे यश आहे. यापूर्वीही या अभ्यासिकेतील यापूर्वी ९ विद्यार्थी एमपीएससी, पोलीस, तलाठी, मुंबई महापालिका, खाजगी कंपन्या , अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाले आहेत.  

श्रीकांतच्या या निवडीमुळे अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये अधिक  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रिकांत याने आपले मनोगत व्यक्त करताना उरणमधील ही एकमेव अभ्यासिका आहे तीथे आम्हाला वेळेचे बंधन नाही त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा उद्देश सफल होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करताना ग्रंथपाल  संतोष पवार, सहाय्यक जयेश वत्सराज यांचे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी ॲड निरंतर सावंत यांनी श्रिकांतला मार्गदर्शन करताना सांगीतले आता थांबायचे नाही.जयेश वत्सराज यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले आहे असे मत व्यक्त केले, ग्रंथपाल संतोष पवार यांनी श्रिकांतची जीद्द , चिकाटी आणि परिस्थितीवर मात करण्याची प्रबळ इच्छेच्या जोरावर श्रिकांतने हे यश मिळविले आहे असे मत व्यक्त केले. वाचनालयाच्या वतीने श्रिकांत आणि त्याच्या सतत पाठिशी खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या आई बाबांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या यशाबद्दल उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी श्रीकांत सांगोलकर याचे अभिनंदन केले व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अभ्यासिकेस मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. आणि अभ्यासिकेत सातत्याने अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार नगरपरिषदेमार्फत यापुढेही विद्यार्थ्यांसाठी इन्व्हर्टर व ईतर सुविधा अधिक सक्षमपणे पुरविल्या जातील, अशी ग्वाही नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली.

एस ई झेड च्या जमीन फेरफार प्रकरणी तहसीलदार उद्धव कदम यांच्या कार्याचे चौकशीचे आदेश !!

एस ई झेड च्या जमीन फेरफार प्रकरणी तहसीलदार उद्धव कदम यांच्या कार्याचे चौकशीचे आदेश !!

कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केल्याचे तहसीलदार डॉ उद्धव कदम यांचे मत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले चौकशीचे आदेश

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील हजारो एकर जमीन महा मुंबई एस ई झेड ह्या विशेष प्रयोजनासाठी  सन २०१० मध्ये संपादित करण्यात आली आणि त्या सर्व सातबारा वर मुंबई एस ई झेड चे नाव दाखल झाले. त्यामुळे सदर जमिनीच्या सात बारावर कोणत्याही व्यक्तीचे नाव कोणत्याही परिस्थितीत लागू शकत नाही. तरीही तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांनी दलालांच्या मदतीने सदरहू जमीन बेकायदेशीररित्या त्रयस्थ व्यक्तीच्या नावे हस्तांतरित केली आहे. सदर जमिनींच्या किमती अब्जावधी रुपये सांगण्यात येत आहे. सदर केसेस मध्ये मुंबई एस ई झेड चे वकील ॲड सागर जगे यांनी लेखी म्हणणे आणि अवॉर्ड कॉपी सादर करून सदर हस्तांतरणास लेखी हरकत नोंदविलेली आहे. तरीही तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांनी हे काम केले आहे.त्यांना ह्याबद्दल विचारले असता त्यांनी रीतसर सुनावणी घेऊन कलम २३६ अन्वये कायदेशीररित्या आदेश पारित केल्याचे सांगितले. तहसलीदार उरण डॉ उद्धव कदम यांना मुंबई एस ई झेड यांच्या नावांच्या जागी त्रयस्थ व्यक्तीचे नाव सातबारा सदरी दाखल करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. मुंबई एस ई झेड उलवे येथील अधिकारी आणि लीगल टीम ने स्पष्ट सांगितले की आम्हाला तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांनी १५ नोटीस पाठविलेल्या असून त्या प्रत्येक केस मध्ये सदर हस्तांतरण बेकायदेशीर असून त्यास लेखी हरकत नोंदविलेली आहे तसेच प्रत्येक केस मध्ये अवॉर्ड कॉपी देखील सादर केलेली आहे.अवॉर्ड कॉपी सादर केल्यावर त्या जमिनीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार महसूल न्यायाधिकरणाला नाही तो अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे. याचाच अर्थ तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांनी सिव्हिल कोर्टाचे अधिकार वापरल्याचे स्पष्ट होत आहे. सिव्हिल कोर्टाचे अधिकार वापरून अब्जावधी रुपयांची जमीन अवैधरित्या हस्तांतरित करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा जमविल्याची चर्चा जनमानसात आहे. सदर बाब ही अत्यंत गंभीर असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ह्या विषयाच्या चौकशीचे आदेश दिले असून कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांना १५ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सदर चौकशीमध्ये किती सात बारा हस्तांतरित केले आहेत हे स्पष्ट होईल आणि ह्या अवैध्य हस्तांतरणमध्ये कोण कोण जबाबदार आहेत हे देखील स्पष्ट होणार आहे

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन ! पेण (पंकजकुमार पाटील) :  पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ता...