Saturday, 6 June 2026

कल्याण-मोहने परिसरात मध्यरात्री गोळीबार !!

कल्याण-मोहने परिसरात मध्यरात्री गोळीबार !!

तीन आरोपी अटकेत

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने-अटाळी परिसरातील पाटील नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक उर्फ अभी पवार आणि त्याचे काही साथीदार पाटील नगर परिसरातून जात असताना मोनू फुलोरे यांच्यात जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर मोनू फुलोरे यांच्या दिशेने दोन राऊंड फायरिंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

गोळीबारानंतर घाबरलेल्या मोनू फुलोरे यांनी तात्काळ खडकपाडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या फुलोरे यांच्या म्हणण्यानुसार, अभि पवार यांनी आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी  स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. 

प्राथमिक तपासात व्हॉट्सॲप स्टेटसवरून सुरू झालेला वाद आणि पूर्वीचे मतभेद हे या घटनेमागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आंधळे करीत असून गोळीबारामागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे.

या घटनेमुळे मोहने-अटाळी परिसरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Friday, 5 June 2026

अतिभार व अवैध मालवाहतुकीविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम !

अतिभार व अवैध मालवाहतुकीविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम !

मुंबई, दि. ४ जून २०२६ : राज्यातील रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार (ओव्हरलोड) व इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.

परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश देत सांगितले आहे की, अतिभार वाहतुकीबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अशा वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. ६ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीत विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली असून दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

तपासणीसाठी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या पथकांना संबंधित कार्यालयांनी ई-चलन मशीन, वाहन तपासणीसाठी आवश्यक साधने तसेच वाहन व चालक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कारवाईचा सविस्तर अहवाल २२ जून २०२६ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावा लागणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील अतिभार व अवैध मालवाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा या विशेष मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.

कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशन वादावर खासदार शिंदे आक्रमक; विशेष चौकशी समितीची मागणी !

कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशन वादावर खासदार शिंदे आक्रमक; विशेष चौकशी समितीची मागणी !

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याणातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या जागेचा वाद चिघळत असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी फाऊंडेशनच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर खासदार शिंदे यांनी या प्रकरणाची विशेष समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

खासदार शिंदे यांनी आपल्या निवेदनात १० प्रमुख मागण्या केल्या आहेत:

१. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (ST) स्थापन करावी.  
२. बुद्धभूमी फाऊंडेशन आणि विवादित जमिनीचा सातबारा व नावनोंदणीबाबत उचित तपासणी करून कार्यवाही करावी.  
३. जमिनीसंदर्भात दिलेल्या हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) बाबत समिती गठीत करून तपासून कायदेशीर कारवाई करावी.  
४. उड्डाणपुलाच्या अलाइनमेंटबद्दल पुनर्निरीक्षण करून फाऊंडेशनची मागणी तपासावी.  
५. येथे विपश्यना केंद्र, शैक्षणिक केंद्र किंवा समाजोपयोगी रुग्णालय, शाळेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याबत तपासून कार्यवाही करावी.  
६. जमिनीचे आरक्षण बदलण्याबत तपासून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.  
७. उड्डाणपुलाच्या नावाबत फाऊंडेशनची मागणी तपासून शासनास प्रस्ताव सादर करावा.  
८. संरक्षण भिंत आणि पोहोच रस्ता बांधण्याबत फाऊंडेशनच्या मागणीची तपासणी करून कार्यवाही करावी.  
९. जमीन भूसंपादन आणि नुकसान भरपाईबाबत जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करून कार्यवाही करावी.  
१०. ३० मे रोजीच्या कारवाईदरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य झाले असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.

बुद्धभूमी फाऊंडेशनच्या मागण्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने खासदार शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रकरणाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

ठाण्यात जिल्हा परिषदेत अचानक पाहणी : अधिकाऱ्यांना नोटीस !!

ठाण्यात जिल्हा परिषदेत अचानक पाहणी : अधिकाऱ्यांना नोटीस !!

*ठाणे, दि. 5 जून 2026*

जिल्हा परिषदेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी आज ठाणे जिल्हा परिषद कार्यालयाला अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

या पाहणीत गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे नोंदवून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. उपस्थिती नोंदवहीची तपासणी करताना गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रणजित यादव यांनी सांगितले की, नागरिकांना वेळेवर सेवा देणे हे जिल्हा परिषदेचे कर्तव्य आहे. कामात हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यापुढेही अशा अचानक तपासण्या सुरू राहतील.

Thursday, 4 June 2026

आ. रोहित पवार यांनी दिली करंजा बंदराला भेट ; मच्छिमार बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या !

आ. रोहित पवार यांनी दिली करंजा बंदराला भेट ; मच्छिमार बांधवांच्या जाणून घेतल्या समस्या !

** समस्या सोडविण्याचे रोहित पवार यांचे आश्वासन.

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे )
दिनांक ३/६/२०२६ रोजी आमदार रोहित दादा पवार यांनी उरण तालुक्यातील करंजा गावाला भेट देऊन करंजा येथील प्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी मातेच्या मंदीराला भेट देऊन दर्शन घेतले. आणि द्रोणागिरी मंदाराला मिळालेला पर्यटनाचा दर्जा बाबत तसेच मंदीर परीसर शुशोभिकरणा बाबत ग्रामस्थांकडून सविस्तर माहीती घेतली. मच्छीमार समाजाचे तसेच शेतकरी वर्गाचे प्रश्न  समजुन घेतले. मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्सा बाबत करंजा मच्छीमार सोसायटी च्या कार्यालयाला भेट देऊन डिझेल कोटा, डिझेल परतावा, करंजा बंदरात मच्छीमारांना भेडसवणाऱ्या विविध समस्या ,मच्छीमारांच्या गावठान विस्ताराचा प्रश्न, मच्छीमारांची व्यापारी वर्गा कडून होणारी फसवणूक, शासना कडून नव्यानेचं मिळालेला शेतकरी दर्जा परंतु आत्ता पर्यंत मच्छीमार समाजाला याचा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही  या बाबत तसेच विवीध समस्स्यां बाबत सविस्तर माहीती घेतली. नव्यानेच सुरू असलेल्या करंजा रेवस पुलाची बोटीतुन पहाणी केली  या पुलाच्या कामामुळे बाधीत मच्छीमार आणी शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या नुकसान भरपाई बाबतीत तसेच या पुलाच्या कामामुळे होणाऱ्या अन्याया बाबतीत ग्रामस्थांसोबत चर्चा केली.

 या सर्व समस्या बाबत आणि करंजा पोर्ट बाबत येणाऱ्या पावसाळी आधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याबाबत आणि या सर्व प्रश्नाना मार्गी लावण्याबाबत मच्छीमार तसेच शेतकरी वर्गाला आश्वासित केले. या दौऱ्याचे आयोजन उरण नगपालिकेच्या नगराध्यक्षा  भावना ताई घाणेकर यांनी यांनी केले.या वेळी  सिताराम नाखवा,  मार्तंड नाखवा, के एल कोळी,   रमेश भगत, भारत नाखवा, रमेश नाखवा, जयेंद्र नाखवा  नरेश कोळी, उरण नगरपालिकेचे राट्रवादी पक्षाचे सर्व  नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते  सचिन रमेश डाऊर, कल्पेश थळी, मधुकर थळी, कॉंग्रेस नेते भालचंद्र घरत. मनोहर थळी, शैलेश डाऊर, देवदास थळी, मुकेश थळी , परेश म्हात्रे आणि मोठ्या संखेने करंजा ग्रामस्थ उपस्थित होते.

पनवेल जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतूक मुळे होत आहेत अपघात !!

पनवेल जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतूक मुळे होत आहेत अपघात !!

विरुद्ध दिशेने वाहने न सोडण्याची सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांची मागणी.

त्वरित कारवाई न केल्यास अजित म्हात्रे यांचा आंदोलनाचा इशारा.

उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )
पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात वैष्णो लॉजिस्टिक या आस्थापने अंतर्गत चालणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बेकायदेशीर वाहतुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच विरुद्ध दिशेने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. परिसरातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा विशेष त्रास होत आहे.तरी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वैष्णो लॉजिस्टिक अंतर्गत चालणाऱ्या अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे. त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा अजित म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.

आज पर्यंत उरण मध्ये बेकायदेशीर व अवैध वाहतूक मुळे अनेक जणांचे विनाकारण मृत्यू झाले आहे. तर काही ठिकाणी अपघात होऊन महत्वाचे हात पाय कायमचे निकामी झाले आहेत. अपघातामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे गोर गरीब जनतेची, नागरिकांची मागणी व त्यांच्या समस्या लक्षात घेता पर्यावरणवादी तथा सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी सदर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर समस्या त्वरित सुटली नाही तर नागरिकांचा मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच यावर त्वरित कारवाई करण्याची व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आह

"अपघात होण्यापूर्वी जागे व्हा! खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा"

"अपघात होण्यापूर्वी जागे व्हा! खोपटे ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा"

खोपटे-कोप्रोली काँक्रेट रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थ मंडळ खोपटे यांची मागणी


उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील खोपटे-कोप्रोली या नव्याने काँक्रेटीकरण करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी या मार्गावर तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व तहसील प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उरण-खोपटा हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग मानला जातो. रस्त्यालगत अनेक औद्योगिक कंपन्या असल्याने जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. नुकतेच रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे याच मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण प्रवास करत असतात. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने यापूर्वी किरकोळ अपघात घडले असून भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थ मंडळाने प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात कारवान गोडाऊन जवळ,धसाखोशी /द.पी. पाडा बस स्टॅन्ड, म्हात्रेपाडा बस स्टॅन्ड,आणि विरगो बस स्टॅन्ड. या ठिकाणी तातडीने गतिरोधक व वाहतूक सूचना फलक उभारण्याची मागणी केली आहे.

यावेळी ग्रामस्थ मंडळ खोपटेचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव  कुमार ठाकूर, धसाखोशी अध्यक्ष कमलाकर म्हात्रे तसेच ग्रामस्थ मंडळाचे सल्लागार  कल्पेश ठाकूर (गुरुजी) उपस्थित होते.

"रस्त्यांचा विकास स्वागतार्ह आहे; मात्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. एखादा निष्पाप जीव गमावण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांना संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे

कल्याण-मोहने परिसरात मध्यरात्री गोळीबार !!

कल्याण-मोहने परिसरात मध्यरात्री गोळीबार !! तीन आरोपी अटकेत कल्याण, संदीप शेंडगे : मोहने-अटाळी परिसरातील पाटील नगर येथे शुक्रवारी...