Wednesday, 13 May 2026

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

*कल्याण, दि. 13 मे 2026*

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सभागृहात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, पुनर्वसन, क्लस्टर योजना, प्रशासकीय प्रकल्प अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

*पाणीप्रश्नावर मोठा निर्णय*  
*अमृत योजनेला 100 कोटींचा निधी*: 27 गावांमधील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महापालिकेच्या 50 कोटी रुपयांच्या निधीसह आता एकूण 100 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून नवीन जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था मजबूत करण्याच्या कामांना गती मिळणार आहे.  
*268 कोटींचा स्वतंत्र आराखडा*: जुन्या जलवाहिन्यांमुळे होणारी गळती व कमी दाबाची समस्या सोडवण्यासाठी 268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र शासनाच्या नव्या तरतुदींमधून निधी उपलब्ध करण्यावर चर्चा झाली.

*वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रकल्प*  
*वालधुनी पुलाचे काम वेगाने*: कल्याण पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.  
*यू-टाईप रस्ते प्रकल्प*: शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी यू-टाईप रस्ते प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.  
*कल्याण रिंग रोड*: टप्पा तीनसाठी भूसंपादन पूर्ण झाले असून कामाला गती दिली जाणार आहे. उर्वरित भूसंपादन जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.  
*सॅटिस प्रकल्प*: डोंबिवली पूर्व येथे सॅटिस प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कल्याण पश्चिम येथील सॅटिस प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला.

*आरोग्य सुविधांवर भर*  
*500 बेडची रुग्णालये*: शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयांचा पुनर्विकास करून ठाण्याच्या धर्तीवर प्रत्येकी 500 बेडची अत्याधुनिक रुग्णालये उभारण्यावर भर देण्यात आला.  
*कॅन्सर हॉस्पिटल व सुतिकागृह*: डोंबिवलीतील कॅन्सर हॉस्पिटल व सुतिकागृह प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत आणण्याचे नियोजन आहे.

*पुनर्वसन व गृहनिर्माण*  
*बीएसयुपी घरे*: विकासकामांमुळे बाधित नागरिकांचे पुनर्वसन बीएसयुपी घरांमध्ये करताना घरांची गुणवत्ता, सुरक्षितता व मूलभूत सुविधांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.  
*क्लस्टर योजना*: ठाणे व मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना प्रभावीपणे राबविण्यावर चर्चा झाली. कल्याण पूर्व, पश्चिम व डोंबिवली परिसरातील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

*इतर महत्त्वाचे निर्णय*  
*प्रशासकीय इमारत व स्मारके*: कचोरे व नेतिवली टेकडी येथील नवी महापालिका प्रशासकीय इमारत, संत सावळाराम महाराज स्मारक व शिवसृष्टी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना.  
*पार्किंग व फेरीवाला धोरण*: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व शिस्तबद्ध पार्किंगसाठी तयार केलेल्या फेरीवाला धोरण व पार्किंग धोरणाची लवकरच अंमलबजावणी होणार.  
*नाट्यगृह पुनर्विकास*: डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी 20 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार राजेश मोरे, उपमहापौर राहुल दामले, स्थायी समिती अध्यक्ष मल्लेश शेट्टी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा पालिका गटनेते शशिकांत कांबळे, भाजपाचे वरूण पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, रमिझ मणियार यांच्यासह कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व नगरसेवक व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

पालिकेच्या प्रत्येक प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावी आयुक्तांचे आदेश !!

पालिकेच्या प्रत्येक प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वीची सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावी आयुक्तांचे आदेश !!

कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या प्रत्येक प्राधिकरणाने आपापल्या अखत्यारीतील अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज त्यांच्या दालनात संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित अधिकारी वर्गास दिले.

या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोर्डे, इतर आस्थापना तसेच एमआयडीसी, पोलीस, अग्निशमन, बांधकाम विभाग, मेट्रो, वाहतूक व्यवस्था इ. विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका तसेच इतर शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आणि प्राधान्य देऊन रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. पावसाळी परिस्थितीत, दुर्घटना टाळण्यासाठी, अतिधोकादायक इमारतींमधून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी पोलीस प्रशासनाने महापालिकेस सहकार्य करावे, यासाठी अतिधोकादायक इमारतींची यादी पोलीस प्रशासनाला पाठवण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी या बैठकीत दिली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त केलेल्या यंत्रणांनी त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा. सदर कॅमेरे संबंधित यंत्रणांनी दुरुस्त करून घ्यावेत अथवा त्यांचा खर्च महापालिकेस अदा करावा, असेही निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले.

महापालिका मुख्यालयात तसेच प्रत्येक प्रभाग स्तरावर आपली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक प्राधिकरणाने आपल्या नोडल अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांस द्यावा, म्हणजे पावसाळी परिस्थितीत नागरिकांना प्रतिसाद देणे सुलभ होईल, असेही ते पुढे म्हणाले.

महावितरणाने कापलेल्या झाडांच्या फांद्या त्यांच्या मार्फत उचलल्या जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे, सदर फांद्या महापालिकेमार्फत उचलल्या जात आहेत. सदरचा खर्च महावितरणाने महापालिकेस अदा करावा, असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत महापालिका मुख्यालयातील १००२३३००५४, ०२५१२३२७२७३, ०२५१२३२६६५५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी ; फेरीवाल्यांविरोधातील तक्रारीचा राग !!

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी ; फेरीवाल्यांविरोधातील तक्रारीचा राग !!

*डोंबिवली, दि. 13 मे 2026*

कल्याण, संदीप शेंडगे :

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका पत्रकाराला पोलीस ठाण्याच्या आवारातच धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

*नेमके काय घडले*  
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार विनोद प्रेमनारायण गिरी यांनी केडीएमसीकडे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रार करून बातमी प्रकाशित केली होती. याचाच राग मनात धरून छाया अमोल खिल्लारे या महिलेने 12 मे रोजी डोंबिवली पोलीस ठाणे परिसरात गिरी यांना धमकी दिल्याचा आरोप मनोज गिरी यांनी केला आहे.

*धमकीचे स्वरूप*  
या महिलेने पोलीस ठाण्याच्या आवारातच “तुला बघून घेईल, एक महिला काय करू शकते हे तुला दाखवते” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली असून एका महिलेला पुढे करत पत्रकाराला धमकविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

*गुन्हा दाखल*  
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 351(2) अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाण्यात एनसीआर क्रमांक 1708/2026 दाखल करण्यात आला आहे. सध्या अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

*कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह*  
पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकावण्याचा प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फेरीवाला लॉबी इतकी बेधडक झाली आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध करत आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण.

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्या नागरिकांना पोस्ट कार्यालयाच्या व्यवहारासाठी जेएनपीटी टाऊनशिप येथे जावे लागत होते. पूर्वी उरण शहरात असलेले पोस्ट कार्यालय जेएनपीटी टाऊनशिप येथे हलविल्याने जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, स्त्रिया आदी व्यक्तींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र हे जेएनपीटी टाऊनशिपला असलेले कार्यालय पुन्हा पूर्वी प्रमाणे उरण शहरात कार्यरत होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


उरण शहरातील आनंदनगर येथील जुन्या पोस्ट कार्यालयाची इमारत पुनर्विकासासाठी गेल्यानंतर हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात जेएनपीटी शॉपिंग सेंटर येथे हलविण्यात आले होते. मात्र, शहरापासून दूर गेलेल्या या कार्यालयामुळे नागरिकांना अतिरिक्त प्रवास खर्च, वेळेचा अपव्यय आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून, लवकरच उरण शहरात नव्या ठिकाणी पोस्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. कामठा रस्त्यावरील शामियाना हॉटेलसमोरील युनियन बँकेच्या वरच्या मजल्यावर हे पोस्ट कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, बचत खाते, मनीऑर्डर, पोस्टल व्यवहार तसेच विविध शासकीय कामांसाठी वारंवार पोस्ट कार्यालयात जावे लागते. महिला वर्गालाही दैनंदिन व्यवहारांसाठी मोठी गैरसोय होत होती. आता पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात सुरू होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.उरण शहरात पोस्ट कार्यालय सुरु होणार असल्यामुळे नागरिकांच्या वेळ व पैशाची, श्रमाची बचत होणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत लवकरात लवकर उरण शहरात पोस्ट कार्यालय सुरु करावे अशी मागणी केली 

परंपरा यशाची, जिद्द निकालाची! जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे चा दहावीचा निकाल सलग १०० टक्के !

परंपरा यशाची, जिद्द निकालाची! जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे चा दहावीचा निकाल सलग १०० टक्के ! 

उरण  १३, (विठ्ठल ममताबादे)
'विद्वान सर्वत्र पूजते' हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलने आपला यशाचा आलेख यावर्षीही उंचावत ठेवला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत परीक्षेत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यालयाने स्थापनेपासूनची 'शतप्रतिशत' निकालाची परंपरा यंदाही मोठ्या अभिमानाने कायम राखली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांची चमक:
यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, दोन विद्यार्थिनींनी समान ८२.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा बहुमान विभागून मिळवला आहे.
प्रथम क्रमांक (संयुक्त): कु. दिशा उदय म्हात्रे (८२.२०%) आणि कु. श्रुती ऋषिकेश म्हात्रे (८२.२०%) द्वितीय क्रमांक: कु. कार्तिकी भारत पाटील (८०.४०% तृतीय क्रमांक: कु. भक्ती अयोध्या म्हात्रे (७८%)

हे विद्यालय म्हणजे स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या शैक्षणिक स्वप्नातून उभे राहिलेले एक मंदिर आहे. आज अशोक ठाकूर  नसले तरी, त्यांच्या विचारांचा वारसा या यशाच्या रूपाने जिवंत असल्याचे पाहायला मिळाले. परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व २३ विद्यार्थ्यांनी आपले हे घवघवीत यश साश्रू नयनांनी आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक लाडके स्वर्गीय अशोक ठाकूर  यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केले आहे. "सरांनी पाहिलेले स्वप्न आम्ही आमच्या कष्टाने पूर्ण केले," अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे अध्यक्ष प्रतीक ठाकूर, खजिनदार वामन ठाकूर , विश्वस्त अलका ठाकूर , सिंधू ठाकूर , आदिनाथ ठाकूर  ,प्रसाद ठाकूर, रीना ठाकूर , मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे  व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

द्रोणागिरीच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याने 'स्वागत' ; सिडकोचा स्वच्छतेचा गाजावाजा फक्त कागदावरच ?

द्रोणागिरीच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याने 'स्वागत' ; सिडकोचा स्वच्छतेचा गाजावाजा फक्त कागदावरच ? 

** बाहेरच्या कचऱ्याचा द्रोणागिरीला विळखा

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) :
सिडको प्रशासन एकीकडे 'स्वच्छ शहर' मोहिमेचा गाजावाजा करत असताना, द्रोणागिरी नोडच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे भीषण साम्राज्य पसरले आहे.उरण तालुक्यातील खोपटे रोडकडून द्रोणागिरीकडे येताना रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे या परिसराला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आजूबाजूच्या ग्रामपंचायतींच्या कचरा गाड्याही याच ठिकाणी कचरा आणून टाकत असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

या डम्पिंग ग्राऊंडवर ओला आणि सुका कचरा एकत्रित टाकला जात असल्याने तो कुजून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना नाकावर रुमाल धरल्याशिवाय प्रवास करणे अशक्य झाले आहे. या घाणीमुळे परिसरात गिधाडे, उंदीर आणि भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काही भटके लोक या घाणीतून प्लास्टिक वेचताना दिसतात, ज्यांच्या आरोग्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

केवळ कचराच नाही, तर द्रोणागिरी नोडमध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणे उघडी आहेत. या उघड्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत असून त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रात्रीच्या वेळी हे उघडे ड्रेनेज अपघातांना निमंत्रण देत आहेत.

सध्या सिडकोकडून रस्त्यावरील दुभाजकांना काळ्या-पिवळ्या रंगाने रंगवण्याचे काम सुरू आहे वाहन चालकांना दुभाजक दिसावेत हा हेतू चांगला असला तरी डोळ्यांना दिसणारे रंगापेक्षा नाकाला येणारी दुर्गंधी सिडको प्रशासनाला का जाणवत नाही असे रहिवाशी विचारत आहे.कचरा साठवायच्या आतच त्यांनी विल्हेवाट लावणे गरजेचे असताना प्रशासन केवळ रंग आहे रंगरंगोटी च्या कामात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे. 

पावसाळ्यात उंबरठ्यावर आला आहे जर वेळेत हा कचरा उचलला नाही  आणि ही उघडी  ड्रेनेज चेंबर बंद केली नाही तर पावसाच्या पाण्यात ही घाण कुजून संपूर्ण द्रोणागिरी परिसरात दुर्गंधीयुक्त रोगराई पसरण्याची भीती आहे सिडकोणी तात्काळ याकडे लक्ष देऊन ग्रामपंचायतच्या कचऱ्या गाड्यांना प्रतिबंध करावा आणि या कचऱ्याच्या साम्राज्यातून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी  जोर धरत आहे

कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी इएसआय (ESI) यंत्रणा सक्षम करण्यास सरकार कटिबद्ध !!

कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी  इएसआय (ESI) यंत्रणा सक्षम करण्यास सरकार कटिबद्ध !!


भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत सरकारची हमी

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) :
 महाराष्ट्रातील सुमारे ४९ लाख सभासद व १ कोटी ९२ लाख लाभधारक असलेल्या कामगार राज्य विमा योजना राज्य कामगार विमा योजना  (ESIS) अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात इएसआय (ESI) रुग्णालये आणि प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात दवाखाने सुरू करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण हमी महाराष्ट्राचे कामगार मंत्री नामदार मा आकाश फुंडकर  व आरोग्यमंत्री  नामदारमा  प्रकाश आबीटकर यांनी दिली.

भारतीय मजदूर संघाच्या वतीने १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित मोर्चाच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी दिनांक १२ मे २०२६ रोजी मंत्रालयात कामगार मंत्र्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस कामगार राज्य विमा योजना आयुक्त रमेश चव्हाण, संचालक श्रीमती अनुलेखा झा, रिजनल डायरेक्टर, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, कामगार उपायुक्त लक्ष्मण भुजबळ तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऍड. अनिल ढुमणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे, कोशाध्यक्ष ऍड.बाळकृष्ण कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, सुरेश पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अशोक निकम, नागपूर सेक्रेटरी हर्षल ठोंबरे, सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत भारतीय मजदूर संघाने राज्यातील इएसआय (ESI) योजनेतील गंभीर त्रुटी व कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. राज्यात ESI योजनेअंतर्गत मंजूर २४०० बेड क्षमतेपैकी केवळ १२०४ बेड उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. ठाणे, पालघर, रायगड यांसारख्या २० लाखांहून अधिक सभासद असलेल्या भागात एकही इएसआय (ESI) रुग्णालय नसल्याची गंभीर बाबही मांडण्यात आली.

अल्प दवाखाने, अपुरी वैद्यकीय सुविधा आणि निकृष्ट दर्जाच्या व्यवस्थेमुळे कामगारांकडून नियमित योगदान जमा होत असूनही त्यांना योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याकडे संघटनेने सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातून  योजनेसाठी सर्वाधिक निधी जमा होत असतानाही राज्यातील कामगारांवर अत्यल्प खर्च होत असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली.

भारतीय मजदूर संघाने मांडलेल्या मुद्द्यांशी सरकारने सहमती दर्शवून राज्यातील मंजूर १८ नवीन इएसआय रुग्णालयांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात इएसआय (ESI) दवाखाने सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

प्रत्येक कामगाराला इएसआय (ESI )योजनेची माहिती मिळावी, प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध दवाखाने व रुग्णालयांची माहिती सुलभ व्हावी यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. औद्योगिक वसाहतींमध्ये माहिती शिबिरे आयोजित करून त्यामध्ये भारतीय मजदूर संघाला सहभागी करून घेण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इतर राज्यांतील आदर्श पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यासही सरकारने मान्यता दिली. या सर्व विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

कंत्राटी कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय __
** बैठकीत कंत्राटी कामगारांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय स्पष्ट करण्यात आला की —

कंत्राटदार बदलला तरी कामगारांचा जुना ESI नंबर कायम सुरू राहील.
तसेच त्याच इएसआय (ESI) क्रमांकाच्या आधारे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी उपचार योजनांअंतर्गत सर्व वैद्यकीय लाभ पूर्ववत मिळत राहतील, अशी स्पष्ट भूमिका सरकारने अधोरेखित केली.यामुळे कंत्राटी कामगारांच्या वैद्यकीय सुविधा, उपचारातील सातत्य आणि सामाजिक सुरक्षेला मोठा दिलासा मिळणार आहे.

आरोग्यमंत्र्यांनी विभागस्तरावर नियमित बैठक घेऊन  इएसआय (ESI) योजनेतील दैनंदिन अडचणी सोडविण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित वेतनवाढीबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही बैठकीत देण्यात आले.

शासनाने या विषयात पुढाकार घेऊन उच्चस्तरीय बैठक आयोजित केल्याबद्दल भारतीय मजदूर संघाच्या वतीने सचिन मेंगाळे यांनी शासनाचे आभार मानले.यावेळी भारतीय मजदूर संघ कामगारांच्या हक्कांसाठी सतत संघर्षरत राहील!  असे मनोगत सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...