Saturday, 28 March 2026

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !!

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !!

मुंबई, पी. डी. पाटील : नागरी निवारा परिषद, गोरेगाव पूर्व  येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास व बालविकास केंद्र, (दिंडोरी प्रणित) यांच्या वतीने नागरी निवारा परिषद, प्लॉट नं. ६, गणेश मंदिर येथे, नवरात्री अष्टमी विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा मोठया उत्साहात संपन्न झाली. 

असंख्य महिलानी त्यांच्या कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती वर कुंकूमार्चन करून कुलस्वामिनीचा आशीर्वाद घेतला. रामनवमी निमित्ताने समुहिक रामरक्षा व हनुमान चालीसा पठण विशेष सेवा करण्यात आली. 

ज्येष्ठ सेवेकरी सुनील पडवळ व श्रीधर कडू  यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सेवा खूप उत्साहात पार पडली.

Friday, 27 March 2026

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना नेते,खासदार व ग्राहक संरक्षण कक्षचे अध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्राहक संरक्षण कक्षचे सचिव मा.श्री. निखिलजी सावंत व श्री. अशोकजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत मंडळ रेल्वे प्रबंधक श्री हिरेश मीना तसेच चीफ ओ.एस. श्री निरज मेंटल यांच्या उपस्थितीत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने निवेदन पत्र देण्यात आले. या वेळी विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर,कक्ष प्रसार श्री.अनंत पवार, कक्ष उपसंघटक श्री.राजेंद्र पेडणेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.संबंधित रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
              दादर-रत्नागिरी पॅसेंजरमागील काही काळापासून राज्यांतर्गत रेल्वेगाड्या रद्द करून परराज्यातील रेल्वेगाड्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. करोना काळात मुंबई – कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई – मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, पुणे – भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्स्प्रेस यांसारख्या असंख्य रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.ज्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याच नाहीत. त्या वेळापत्रकात आता परराज्यात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येत आहेत. कायमची बंद करण्यात आली असून त्याजागी आता दादर-गोरखपूर एक्सप्रेस सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण मुंबई आणि कोकणवासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच !

प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच !

कल्याण, प्रतिनिधी :

मोहन पॅराडाईज फेज-२, वायले नगर येथील रहिवाशांना मागील अनेक दिवसांपासून भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येबाबत सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्री. सुरेश आंबेकर यांनी महानगरपालिका तसेच पाणीपुरवठा कार्यकारी विभाग, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. स्थानिक नगरसेवकांकडेही याबाबत निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघाला नव्हता.

या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेत जाऊन प्रभाग ५ चे शिवसेनेचे नगरसेवक रुपेश केरू सकपाळ, डॉ. तनुजा अनिकेत वायले, किरण राजाराम भांगले तसेच सौं. प्रमिला भगवान पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. अभिनय गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर पाणीप्रश्नावर तातडीने तोडगा काढत या समस्येचे तातडीने निराकरण करावे अशी ठाम मागणी केली.

नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत आणि योग्य पद्धतीने मिळाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रभागातील नागरिकांची कोणतीही तक्रार किंवा समस्या असेल तर त्या संदर्भात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या समस्यांचा पाठपुरावा करत त्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यांनी (प्रभाग ५ चे नगरसेवक) यांनी सांगितले.


Thursday, 26 March 2026

वालधुनी नदी संदर्भात धक्कादायक माहिती उघडकीस !!

वालधुनी नदी संदर्भात धक्कादायक माहिती उघडकीस !!

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय कल्याण यांच्या वालधुनी नदी संदर्भात गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.

वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर यांनी माहिती अधिकाराद्वारे मागील पाच वर्षांतील नोंदी मागविल्या असता खालील बाबी समोर आल्या मागील पाच वर्षांत वालधुनी नदी संदर्भात सामाजिक व राजकीय लोकप्रतिनिधींकडून अत्यल्प पत्रव्यवहार झाला आहे. उपलब्ध नोंदीनुसार केवळ श्री. सुनील उतेकर व श्री. निशांत कांबळे यांचीच दोन पत्रे आढळून आली.
*महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शासनाकडे वालधुनी नदी संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केलेला नसल्याचे (निरंक) कळविण्यात आले.
वालधुनी नदी स्वच्छतेसाठी कोणताही निधी उपलब्ध झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नदीसाठी स्वतंत्र अकाउंट हेड किंवा खर्चासाठी खाते उघडण्यात आलेले नाही, असेही सांगण्यात आले. वरील सर्व बाबींमुळे संबंधित विभागाची निष्क्रियता स्पष्ट होत असून, हा अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी केवळ कार्यालयात बसून कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेकडून करण्यात आला आहे. तसेच वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था लवकरच या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील सिताराम उतेकर यांनी दिली आहे. 

वृत्त - कल्याण (प्रतिनिधी)

उरण नगर परिषदेत भाडे आणि टेंडरच्या नावाखाली झाला कोट्यावधीचा घोटाळा !!

उरण नगर परिषदेत भाडे आणि टेंडरच्या नावाखाली झाला कोट्यावधीचा घोटाळा !!

** बनावट कागदपत्रच्या आधारे कंत्राटदाराची फसवणूक.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : उरण नगर परिषदेत भ्रष्टाचार झाला असून नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी तो भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. यामुळे उरण मध्ये राजकीय वर्तुळात एकच खळ बळ माजली आहे. उरण नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक स्फोटक घोटाळा उघडकीस आला आहे. 'भाडे आणि टेंडर'च्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून एका जिवंत कंत्राटदाराच्या नावावर तब्बल दहा वर्षे व्यवहार चालवल्याचा धक्कादायक प्रकार उरण मध्ये समोर आला आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, खुद्द नगराध्यक्षांनीच या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत "श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल" येथील ठेक्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, २०१३ पासून एका त्रयस्थ व्यक्तीला कोणतीही कल्पना न देता, त्याच्या नावाचा आणि कागदपत्रांचा गैरवापर करून हे काम लाटण्यात आले. यामध्ये नवी मुंबईतील कंत्राटदार वासुदेव छगन पाटील यांच्या 'मे. वी.सी. पाटील इंटरप्रायजेस' या फर्मच्या नावाने बोगस पॅनकार्ड, रेशनकार्ड, आयकर विवरणपत्र आणि बनावट सह्यांचा वापर करुन टेंडर मिळवण्यात आले.


कोट (चौकट ):- 


१ कोटींहून अधिकची थकबाकी:- 

२०१५ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत क्रीडा संकुलातील विविध सुविधा चालवून नगरपरिषदेची तब्बल १ कोटी १ लाख ६३ हजार ४९८ रुपयांची थकबाकी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या वासुदेव पाटील यांच्या नावावर हे काम दाखवण्यात आले, त्यांनी "मी असे कोणतेही काम घेतलेले नाही," असे स्पष्ट करत आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी उरण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.


======================================


माहिती अधिकारातही दिशाभूल  ?

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे ते म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागवलेल्या माहितीवरून. पत्रकारांनी यापूर्वी या ठेक्याबाबत माहिती मागवली असता, नगरपरिषदेकडून चुकीची आणि बोगस माहिती पुरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे हा घोटाळा जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न झाला का, असा संशय व्यक्त केला आहे.


सध्या उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव रजेवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत पदभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे. उरण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या महाघोटाळ्याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.उरण नगर परिषदेत अनेक वर्षांपासून विविध कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.उरण नगर परिषदेत अनेक घोटाळे, भ्रष्टाचार झाले असून नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सर्व प्रकरणे बाहेर काढावीत अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे

उरण नगर पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय ; अनेक ठिकाणी छोटे पाईप लाईन फुटून पाणी वाया !

उरण नगर पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय ; अनेक ठिकाणी छोटे पाईप लाईन फुटून पाणी वाया !

दररोज शेकडो लिटर पाणी वाया ; नागरिकांमध्ये संताप.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :

उरण नगर पालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय  होत असल्याचे अनेक ठिकाणी पाहवयास मिळत आहे.शहरातील काही भागात पाण्याचे कारंजे उडत असून पाणी  वाया जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. उरण नगर पालिका क्षेत्रात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज वाढली आहे, परंतु पाण्याचे स्रोत कमी आहेत. रानसई धरण आणि पुनाडे धरण हे दोन प्रमुख पाण्याचे स्रोत आहेत, परंतु त्यांची क्षमता दिवसे दिवस कमी कमी होत चालली आहे. 

       पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व पाण्याची बचत करण्यासाठी उरण नगर पालिकेने कडक व धडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पाण्याची अपव्यय होत असल्याचे अनेक वेळा उरण नगर पालिकेला कळवले आहे, परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. उरण नगर पालिकेचे अधिकारी म्हणतात की, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी कारवाई केली जाईल. पाण्याचे कारंजे उडून पाणी फुकट वाया जात असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

उरण पनवेल मार्गावर मोठी दुर्घटना टळली; पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने वाहतूक ठप्प, आता रस्ता मोकळा !

उरण  पनवेल मार्गावर मोठी दुर्घटना टळली; पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने वाहतूक ठप्प, आता रस्ता मोकळा ! 

सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
उरण-पनवेल महामार्गावरील चिर्ले जवळील नागाव फाटा येथे काल (बुधवारी) सकाळी १०:३० च्या सुमारास उड्डाणपुलाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सपोर्ट स्ट्रक्चरला एका भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे पुलाचा जड लोखंडी सांगाडा थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी उरण परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

     चिर्ले (नागाव) येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्याला एका ट्रेलरने जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की लोखंडी स्ट्रक्चर थेट रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेलर चालकाने एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गाडी उभी केली होती. परंतु हॅन्ड ब्रेक निसटल्याने अवजड ट्रेलर उतारावरून पुढे सरकला आणि थेट पुलाच्या लोखंडी बांधकामात शिरला चालकाचा ताबा नसलेला हा ट्रेलर वेगाने धडकल्याने हा अपघात घडला. या धडकेत ट्रेलर चा एक्सेल बार तुटून मोठे नुकसान झाले आहे, आणि पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

     महामार्ग प्राधिकरणाने क्रेनच्या साहाय्याने पडलेले लोखंडी खांब बाजूला केले असून, आता हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. उरण आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. या घटनेबाबत माहिती देताना उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच डी मुलाणी म्हणाले की, अपघात घडल्यानंतर तातडीने आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !!

गोरेगाव येथे नवरात्री अष्टमी निमित्त विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा संपन्न !! मुंबई, पी. डी. पाटील : नागरी निवारा परिषद...