Tuesday, 26 May 2026

नालासोपारात शिवसेना- भाजपला धक्का ; खिंडार रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश.....

नालासोपारात शिवसेना- भाजपला धक्का ; खिंडार रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश.....

*"शेकडो कार्यकर्ते तीन नवीन रुग्णवाहिका" लोकार्पण करत केले भव्य शक्तिप्रदर्शन....*

नालासोपारा ता २५ :- बहुजन विकास आघाडी हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असून लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, महापौर आजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांचा हस्ते व जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा मार्गदर्शनाखाली आज रुचिता नाईक, वैभव पवार, यांनी  शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तीन नवीन रुग्णवाहिका लोकार्पण करत भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

या भव्य प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात बहुजन विकास आघाडीची ताकद अधिक भक्कम होणार असून, कार्यकर्त्यांन मध्ये जोश दिसत होता. वसई विरारचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता बहुजन विकास आघाडीत असल्याने रील बनवणारे नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारे नेते खरे रील स्टार असतात  नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे  आमदार हितेंद्र ठाकूर साहेब व क्षितिज दादा ठाकूर महापौर अजीव पाटील साहेब यांच्या कार्यपद्धतीचे रुचिता नाईक यांनी कौतुक केले.

याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण शेट्टी, मा.नगरसेवक अतुल साळुंखे, मा.नगरसेवक किशोर पाटील, युवा अध्यक्ष नवीन वाघचौडे, नवनाथ पगारे, अभिषेक हटकर, संजीव कदम, रोहन डिसोझा,राजेंद्र खुळे,रोहित डिसोझा वैभव पवार, किशोर कारेकर, गणेश मुणगेकर, महेश निकम जया गुप्ता, शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ !!

नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ !!

 कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण ; ८ वर्षासाठी झाला करार 

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे ) : नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ झाली आहे.देव इंटरप्राईजेचे मालक शेखर तांडेल यांच्यासोबत आठ वर्षाचा करार झाला आहे. उरण तालुक्यातील नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनी मधील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० चे भरघोस पगारवाढ झाले आहे. महाराष्ट्र जनरल कामगार युनियन  तर्फे झालेल्या पगारवाढमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे


महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष भूषण सामंत,जनरल सेक्रेटरी वर्गीस चाको,द्रोणागिरी न्हावा शेवा उपाध्यक्ष रोशन ठाकूर,सेक्रेटरी धर्मेंद्र तांडेल,कमिटी मेंबर जयप्रकाश पाटील,निलेश भोईर,वैभव चोगले,ज्ञानेश्वर भोईर,देव एंटरप्राइजेसचे मालक शेखर तांडेल,एपीएम टर्मिनलचे मॅनेजर योगेश ठाकूर आदी पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झाला.या करारामुळे कामगार वर्गाने समाधान व्यक्त करत कमिटी मेंबर जयप्रकाश पाटील व वैभव चोगले आणि सर्व कामगारांनी युनियनचे आभार मानले आहेत.

 खालील प्रमाणे पगार वाढ करण्यात येणार आहे.

८ वर्षासाठी २०,०००/-

१ ला वर्ष ५०००/-
२ रा वर्ष २५००/-
३ रा वर्ष २५००/-
४ था वर्ष २०००/-
५ व वर्ष २०००/-
६ वा वर्ष २०००/-
७ वा वर्ष २०००/-
८ वा वर्ष २०००/-

जेएनपीए मराठी माध्यम स्कूलच्या रूपाने साई संस्था (ट्रस्ट). - शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा.

जेएनपीए मराठी माध्यम स्कूलच्या रूपाने साई संस्था (ट्रस्ट). - शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या साई संस्था(ट्रस्ट) डोंबिवली यांच्या शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षा पासून जेएनपीए मराठी माध्यम स्कूलच्या रूपाने सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे.या विद्यालयाचा कारभार आत्ता साई संस्थेच्या हातात आला असल्यामुळे परिसरांतील पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून उरण परिसरांतून जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि या संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे.

महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या साईसंस्था (ट्रस्ट) डोंबिवली या संस्थेच्या वतीने डोंबिवली येथे मराठी, गुजराथी, इंग्रजी  माध्यमाच्या बरोबरीने   गत वर्षी आणखीन एक  स्कूल सुरु केले आहे.ही संस्था गेली १८ वर्षा पेक्षा अधिक काळ कार्यरत आहे,तर रायगड-माणगाव येथे गेली २४ वर्षा पेक्षा अधिक काळ इंग्रजी  माध्यमाचे स्कूल कार्यरत आहे,या सर्व शैक्षणिक वर्षात या सर्व विद्यालयाने आपल्या शालांत परीक्षेचा निकाल १०० % टक्के लाऊन निकालाची यशस्वी परंपरा आजही राखून ठेवली आहे.मागील चार वर्षात संस्थेच्या वतीने उरण येथे नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल व बरोबरीने कोल्हापूर गडहिंग्ल्ज येथे इ.बी.गडकरी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून गत वर्षी नरसू पाटील कॉलेज ऑफ फ़िजिओ थेरपी या  आणखी एका नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश या साई संस्थेच्या शैक्षणिक संकुलात झालेला आहे. 

साई संस्था(ट्रस्ट)ने शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली असतानाच या सर्व शैक्षणिक बाबीची देशांतील नंबर वन असणाऱ्या जेएनपीए प्रशासनाने दखल घेत प्रकल्पग्रस्थ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीणविकास व्हावा हा उद्दात हेतू विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन उरण येथील जेएनपीए वसाहत संकुलात असणाऱ्या जेएनपीए विद्यालयाच्या मराठी माध्यमाची धुरा साई संस्थेवर यंदाच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षा पासून टाकली आहे.याबाबतची ऑर्डर दि.३० एप्रिल २०२६ रोजी जेएनपीए प्रशासनाने संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या कडे सपुर्द केली आहे.
या संदर्भात साई संस्थेचे (ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी स्वतः शिक्षक असल्याने मला शैक्षणिक क्षेत्राची चांगली जाण आहे.जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि प्रशासनाने संस्थेवर विश्वास दाखून  शिक्षणाची मोठी जबाबदारी माझ्या संस्थेवर सोपविली आहे. तीपूर्ण करण्यास मी व संस्था कटिबद्ध राहून पूर्ण करू, येथील बहुसंख्य विद्यार्थी हे प्रकल्पग्रस्त आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पीएपीची सवलत मिळेल,साई संस्थेच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही प्रकारे फी वाढ होणार नाही.विशेष म्हणजे सरकारकडून अनुदान मिळविण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने संस्थेला परवानगी दिली आहे त्यामुळे शिक्षकांच्या वेतना मध्येही फरक पडेल व सर्व शिक्षक कायम स्वरूपी सुरक्षित राहतील त्याचप्रमाणे सरकारच्या निकषानूसार विध्यार्थ्यानाही मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील,आत्ता आपलाच कुटुंबांतील एक व्यक्ती आपलीच शाळा चालवीत आहे ही पालकांची भावना असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती पासून सुरक्षतेपर्यंतचे प्रश्न सुटले असल्यामुळे पालक वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. जेएनपीए प्रशासनाने संस्थेवर टाकलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मी वचन बद्ध राहीन असे साई संस्थेचे(ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील यांनी सांगितले

ओडिशा मध्ये १०,००० वीज कंत्राटी कामगारांची कपात.!!

ओडिशा मध्ये १०,००० वीज कंत्राटी कामगारांची कपात.!!

टाटा पॉवरच्या १०,००० वीज कंत्राटी कामगार कपाती विरोधात महाराष्ट्रातून ओडिशा आंदोलनाला पाठिंबा.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
भुवनेश्वर (ओडिशा) येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक वीज कंत्राटी कामगार आंदोलनाला भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने जाहीर पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रभर विविध वीज कार्यालयांसमोर निषेध द्वार सभा, व आंदोलनांचे आयोजन केले.

ओडिशा राज्यात वीज क्षेत्राच्या खाजगीकरणानंतर टाटा पॉवर व्यवस्थापनाकडून “खर्च कपात” या नावाखाली सुमारे १०,००० कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात देशभरातील कामगार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री तथा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी भुवनेश्वर येथील आंदोलनस्थळी बोलताना सांगितले की, “खाजगीकरणाचा सर्वात मोठा फटका गरीब व कंत्राटी कामगारांना बसत आहे. तरी या मधे  मुख्यमंत्री ओडीसा यांनी भारतीय मजदूर संघ पदाधिकाऱ्यांसह मिटींग आयोजित करून अनेक वर्षे सेवा देणाऱ्या कामगारांना खर्च कपातीच्या नावाखाली बाहेर काढणे हा अन्याय असून सर्व कामगारांना तात्काळ विनाअट कामावर पुन्हा घ्यावे.” अशी मागणी  केली आहे . 

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी इशारा देताना म्हटले की, “आज वेळ ओडिशाची आहे, उद्या महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांवरही अशीच वेळ येऊ शकते. एका तरुण आंदोलकाने बेरोजगारीच्या नैराश्यातून आत्महत्या केली सरकार नवीन रोजगार देऊ शकत नसताना आहे तो रोजगार कमी करू लागला तर देशातील तरुणांकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात वीज क्षेत्रातील सर्व कामगारांनी संघटित राहणे आवश्यक आहे.”

संघटनेचे प्रतिनिधी सचिन मेंगाळे व निलेश खरात हे भुवनेश्वर येथे पोहोचले असून त्यांनी आंदोलनकर्त्या कामगारांशी चर्चा करून संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.संघटनेने स्पष्ट केले आहे की, वीज उद्योगातील खाजगीकरणामुळे केवळ कंत्राटीच नव्हे तर कायमस्वरूपी कामगारांचेही रोजगार धोक्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध वीज कार्यालयांसमोर आयोजित निषेध सभांमध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.
पुणे येथील महावितरण रास्ता पेठ कार्यालयासमोर आयोजित गेट मिटिंगमध्ये भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्यासह तुकाराम डिंबळे, सुरेश जाधव, उमेश आणेराव व राहुल बोडके व निखिल टेकवडे , मार्गदीप मस्के,  योगेश महांगरे यांनी मार्गदर्शन केले.महाराष्ट्रातील विविध वीज उद्योग कार्यालयांसमोर घेण्यात आलेल्या आंदोलनातून ओडिशातील कामगार कपात तात्काळ रद्द करावी, सर्व कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे तसेच कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.!!

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.!!

शासनाने ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव करत केला दुसरा क्रमांक देऊन केला सन्मान.

ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जासईने केलेल्या सर्वच लोककल्याण कारी कार्याची व जनतेच्या सर्वांगीण विकासाची कार्ये लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत जासईला उरण तालुक्यातून दुसरा क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या कार्याचा गौरव करत दुसरा क्रमांक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.ग्रुप ग्रामपंचायत जासईने सर्वच घटकासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविले आहेत. अनेक विकासकामे केली आहेत त्यामुळे त्यांना हा उरण तालुक्या मध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.अभियान अंतर्गत दुसरा क्रमांक मिळाल्याने ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


अभिमानास्पद व गौरवास्पद कामगिरी ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या माध्यमातून झाली असून जासईचे सरपंच  संतोष रामचंद्र घरत यांचा नेतृत्वाखाली जासई ग्रुप ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविण्यात आलेल्या "मूख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान "मध्ये उरण तालूक्यात दूसरा क्रमांक पटकविला आहे.बक्षिसपात्र रक्कम-१२ लाख ग्रामपंचायतला मिळणार आहे. ग्रामपंचायत जासई चे व्याप्ती व कारभार मोठा असलं तरी या अभियान मध्ये सर्व घटक परिपूर्ण करून अभियान यशस्वी करण्यासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येणारे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे。 स्थानिक स्वराज्य संस्थांना (जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती) कार्यक्षम बनवणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.या अभियानांतर्गत स्थानिक संस्थांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते.ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभाग वाढवणे, कर वसुली, आणि डिजिटल सेवांचा वापर यांसारख्या निकषांवर आधारित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि ग्रामीण नागरिकांना सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांचा विकास करणे, कोणतेही समस्या निर्माण झाल्यास ते त्वरित सोडविणे आदी विविध कार्य उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी करण्यात येते.हे सर्व ग्रामपंचायतचे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणून शासनाने ग्रुप ग्रामपंचायत जासईला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुका स्तरीय दुसरा क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

कल्याण मध्ये विवाहितेची निर्घृण हत्या !!

कल्याण मध्ये विवाहितेची निर्घृण हत्या !!

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण शहरातील काळा तलाव परिसरात एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांचा संशय महिलेच्या वडिलांवर असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके रवाना केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील बारेकर वाडी येथील रचना रॉयल सोसायटीमध्ये राहणाऱ्या गायत्री शिंदे या महिलेचा मृतदेह तिच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाणे चे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक महत्त्वाचा धागा हाती लागला. जिन्यातून एक व्यक्ती घाईघाईने बाहेर पडताना दिसून आली असून, ती व्यक्ती महिलेचे वडील विनोद वसईकर असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

या घटनेमुळे काळा तलाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

Monday, 25 May 2026

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!

*२० वर्षांच्या आरोग्यसेवेचा मानाचा टप्पा; ‘Code QRT 2.0’ उपक्रमाची घोषणा*

कल्याण, संदीप शेंडगे (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ परिसरात गेली २० वर्षे सातत्याने आरोग्यसेवा देणाऱ्या फोर्टिस हॉस्पिटल कल्याणने अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन करत आरोग्यसेवेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावेळी “Code QRT 2.0” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून, परिसरातील २५ स्थानिक रुग्णालयांना जोडून आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा संकल्प रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला.

या उद्घाटनप्रसंगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, फोर्टिस हॉस्पिटल्स महाराष्ट्रचे बिझनेस हेड डॉ. एस. नारायणी, फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. आयुषोत पांडे तसेच ट्रॉमा आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. सुधीर गोरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी फोर्टिस हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “आरोग्यसेवा ही कोणत्याही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाल्यास नागरिकांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यास मोठी मदत होते. फोर्टिस हॉस्पिटलने सुरू केलेले ‘Code QRT 2.0’ हे नेटवर्क भविष्यात शहरातील आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि वेगवान बनवेल.”

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणच्या आपत्कालीन विभागाने गेल्या २० वर्षांत ६० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. यामध्ये हृदयविकार, श्वसनविकार, मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर रुग्णांचा मोठा समावेश आहे. या अनुभवाच्या आधारे नव्या विभागाची उभारणी करण्यात आली असून जलद तपासणी, अत्याधुनिक बेडसाईड डायग्नोस्टिक्स आणि विविध तज्ज्ञांमधील समन्वयावर विशेष भर देण्यात आला आहे. 

नवीन विभागात चार अत्याधुनिक आपत्कालीन बेड, निगेटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम, सतत हृदय मॉनिटरिंग, व्हेंटिलेशन आणि डिफिब्रिलेशन सुविधा उपलब्ध आहेत. तसेच डिजिटल ट्रायज सिस्टम आणि रिअल-टाइम बेड मॅनेजमेंट डॅशबोर्डमुळे आपत्कालीन प्रतिसाद अधिक जलद आणि कार्यक्षम होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

या विभागात इमर्जन्सी फिजिशियन, हृदयरोगतज्ज्ञ, न्युरोलॉजिस्ट, ट्रॉमा तज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर विशेषज्ञ एकत्रितपणे सेवा देणार आहेत. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अपघात, सेप्टिक शॉक, पल्मनरी एम्बोलिझम, सर्पदंश तसेच रेल्वे किंवा रस्ते अपघातातील गंभीर रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे. 

“Code QRT 2.0” या उपक्रमाद्वारे आपत्कालीन सेवा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित न ठेवता शहरभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांना गंभीर रुग्णांची ओळख पटवणे आणि रुग्णालयात हलवण्यापूर्वी रुग्णांची स्थिती स्थिर ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

तसेच परिसरातील २५ प्रमुख रुग्णालयांना एकाच नेटवर्कमध्ये जोडून इमर्जन्सी डॉक्टर, फर्स्ट रिस्पॉन्डर्स आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. गंभीर रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविताना उपचारांमध्ये कोणताही विलंब होऊ नये आणि ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे फोर्टिस प्रशासनाने स्पष्ट केले.

नालासोपारात शिवसेना- भाजपला धक्का ; खिंडार रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश.....

नालासोपारात शिवसेना- भाजपला धक्का ; खिंडार रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश..... *"शेकडो कार्यकर्ते तीन नवीन रुग्...