Wednesday, 11 February 2026

त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व !!!

त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व !!!

 *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प

*५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी  आरोग्य साहित्याचे वितरण

*चिपळूण/ खेड (प्रतिनिधी- वार्ताहर)*

ग्रामीण भागातील अनामिकांच्या चिट्ठ्यातून उलगडले किशोरवयींचे भावविश्व; निमित्त होते, कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि दिशान्तर संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने 'निर्भया' हा विशेष उपक्रमाचे ; या प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील तीन प्रमुख शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.

*जागतिक संकल्पनेतला उपक्रम*

यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) जागतिक महिला दिनानिमित्त मासिक पाळी आरोग्य आणि जागृतीवर विशेष भर दिला आहे. याच जागतिक संकल्पनेला अनुसरून 'निर्भया' प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. 'मासिक पाळी आरोग्य जागृती, सन्मान आणि समता सशक्तिकरण' हे या प्रकल्पाचे मुख्य सूत्र होते.

*तीन विद्यालये ५०० विद्यार्थिनी*

खेड तालुक्यातील यशवंत विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय धामणंद,  न्यू इंग्लिश स्कूल आंबडस आणि चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) या तीन विद्यालयांमध्ये या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या शाळांतील ५००  विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. 

 *डॉक्टरांचे मार्गदर्शन* 

प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा कुलकर्णी-उत्पात (BAMS, MA, MSc) यांनी अत्यंत ओघवत्या आणि संवेदनशील वृत्तीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया कशी आहे, या काळात आहार, व्यायाम आणि स्वच्छता कशी राखावी, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.  कार्यशाळेच्या उत्तरार्धात मुलींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. अपर्णा यांनी शास्त्रीय उत्तरे देऊन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले.

*आरोग्य संच व पुस्तिका*

केवळ मार्गदर्शनच नव्हे तर मुलींना प्रत्यक्ष मदत मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीला 'निर्भया' मार्गदर्शक पुस्तिका देण्यात आली. या पुस्तिकेत मासिक पाळी दरम्यान पाळावयाची पथ्ये आणि स्वच्छतेबाबतची माहिती  देण्यात आली आहे. तसेच, पर्यावरणाचे रक्षण आणि दीर्घकालीन वापरासाठी उपयुक्त असे 'रियूजेबल सॅनिटरी पॅड्स' (पुन्हा वापरण्यायोग्य सॅनिटरी पॅड) देखील सर्व विद्यार्थिनींना वितरित करण्यात आले.

*नेरोलॅक चे सामाजिक उत्तरदायित्व*

       कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे सामाजिक उत्तरदायित्व (CSR) आणि दिशान्तर संस्थेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. 

    कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड या कंपनीच्या असोसिएट ऑफिसर ह्युमन रिसोर्स प्राजक्ता पाटील तसेच अनिशा निकम व सेजल बेलोसे तर दिशान्तर संस्थेतर्फे अध्यक्ष श्री. राजेश जोष्टे, सचिव सौ. सीमा यादव यांची उपस्थिती होती. कार्यक्रम मार्गदर्शन व सहकार्य कंपनीचे सीएसआर प्रमुख श्री संतोष देशमुख व यशस्वीतेसाठी लोटे प्लांट चे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक नंदन सुर्वे यांचे योगदान राहिले. विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी झाला. 

(चौकट घेणे)
*...त्या अनामिका!*
सहभागी विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्य विषयक तसेच मासिक पाळी विषयक  शंका- समस्या यांची एक अगदी छोटी चिट्टी लिहावयास सांगण्यात आली होती. यात त्या विद्यार्थिनीची कुठेही ओळख दिसता नये याची काळजी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या दोन दिवसपूर्वी या  चिठ्ठ्या  एकत्र करण्यात आल्या. त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून आरोग्य विषयक शंका -समस्यांचा उलगडा होण्यास मोठीच मदत झाली.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे वार्ड क्र.१२४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.सकिना ताई शेख यांचा सत्कार !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे वार्ड क्र.१२४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.सकिना ताई शेख यांचा सत्कार  !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभांच्यावतीने शिवसेना नेते खासदार ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा.श्री.अनिल भाऊ देसाई  यांच्या आदेशानुसार तसेच ग्रा.सं.क. सचिव मा.श्री.निखिलजी सावंत व श्री. अशोक शेंडे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका एन विभागांमधील झालेल्या २०२६ मुंबई महानगर पालिका मधील निवडणुकीमध्ये निवडून आलेले घाटकोपर पश्चिम मधील शाखा क्रमांक १२४ नगरसेविका सौ.सकिना ताई शेख व श्री.इब्रानभाई शेख युवासेना समन्वय याचाही सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन ग्रा.स.क. पदाधिकारी यांच्यावतिने करण्यात आले. यावेळी महीला शाखा संघटीका सौ.संगीता ताई तुळसकर, युवा सेना विभागाधिकारी कु.श्रुती खोपकर, कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर, कक्ष प्रसारक श्री.अनंत पवार, कक्ष उपसंघटक शाखा क्र १२३/१२४ श्री राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक श्री. संतोष चांदे १२३, कक्ष वार्ड संघटक शाखा क्र.१२४ निर्मला आवटे ताई, कक्ष वार्ड संघटक तानाजी सावंत १२६, कक्षप्रतिनिधी श्री प्रकाश कुष्टे, श्री रियाज शेख, श्री.प्रमोद जाधव, श्री.सचिन भालेकर, इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Tuesday, 10 February 2026

सिद्धार्थ नगर ११ आयोजित डि.के. ग्रुप चषक २०२६ स्पर्धा उत्साहात संपन्न !!

सिद्धार्थ नगर ११ आयोजित डि.के. ग्रुप चषक २०२६ स्पर्धा उत्साहात संपन्न !!

 ** अर्णव इलेव्हन मोठी संघाने पटकाविला प्रथम क्रमांक 

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) : सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने व फुले शाहू आंबेडकरी विचाराचा तळागाळात प्रचार व प्रसार व्हावा या अनुषंगाने २०२१ साली सामाजिक कार्यकर्ते दिनेश गायकवाड यांनी डी के ग्रुप ची स्थापना केली. डी के ग्रुपच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूना साहित्य वाटप असे अनेक कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आले असून गोर गरीब जनतेच्या वेगवेगळ्या अडी अडचणी सोडविण्यात आले आहेत.खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांना प्रोत्साहन मिळावे, उरण मधील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या हेतूने सिद्धार्थनगर ११ तर्फे उरण कोटनाका, पेट्रोल पंपा पाठीमागील मैदानात भव्य दिव्य असे डि.के.ग्रुप चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.एकूण तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अर्णव ११ मोठी जुई संघाने प्रथम क्रमांक पटकविला असून द्वितीय क्रमांक साई माऊली मोरा, तृतीय क्रमांक विंधणे संघ, मॅन ऑफ द सिरीज विंधणे संघाचा आकाश, उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोठी जुई संघाचा निनाद याला मान मिळाला आहे.

यावेळी  डी के ग्रुपचे अध्यक्ष दिनेश गायकवाड, कुणाल म्हात्रे, बळीराम मसन, सनी भोईर, संकेत पाटील, ऋषिकेश कासारे, जयेश गायकवाड, लकी भिसे, नागेश गायकवाड, आदित्य भिसे, प्रेम गायकवाड,बहुजन समाज पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड, बसपाचे रायगड प्रभारी राहुल बेनवाल, विकास निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डी के ग्रुपच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा सर्वत्र प्रचार करणाऱ्या या संघटनेतर्फे आरोग्याला जपा निरोगी रहा, खेळा शरीर तंदुरुस्त ठेवा अशी आरोग्य विषयक जनजागृती या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

बीएलओचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माधव सिद्धेश्वरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार !!

बीएलओचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माधव सिद्धेश्वरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार !!

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )बीएलओचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उरण नगर परिषदेचे कर्मचारी माधव काशिनाथ सिद्धेश्वरे यांचा रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी सत्कार केला आहे.माधव सिद्धेश्वरे हे मतदार यादीचे पुनरनिरीक्षण कामी  बीएलओ (BLO ) म्हणून अतीशय जबाबदारीने गेले अनेक वर्षे काम करत आहेत. खऱ्या अर्थांने लोकशाही टिकली पाहीजे यासाठी उरण नगर परिषदेचे कर्मचारी माधव सिद्धेश्वरे यांनी आपले काम प्रामाणिकपणे शिस्तबद्ध पद्धतीने केल्याबद्दल म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे खजिनदार तथा कर्मचारी माधव सिद्धेश्वरे यांना रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय , अलिबाग येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असलेले कर्मचारी माधव सिद्धेश्वरे यांना म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व कामगार कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने माधव सिद्धेश्वरे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुखकर्ता'वर महेंद्रशेठ घरत यांनी केला विजयी उमेदवारांचा सत्कार


रायगडमध्ये कॉंग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय : महेंद्रशेठ घरत 

'सुखकर्ता'वर महेंद्रशेठ घरत यांनी केला विजयी उमेदवारांचा सत्कार

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांत महाराष्ट्रात भाजपची घोडदौड सुरू आहे. आमचा मित्र पक्ष असलेल्या शेकापची रायगड जिल्ह्यात अनेक वर्षे एकहाती सत्ता होती, परंतु त्यांनाही यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. असे असताना रायगडमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन जागा लढवल्या आणि दोन जिंकल्या. त्यामुळे आमचा कॉंग्रेसचा झेंडा रायगडमध्ये डौलाने फडकतोय, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. हे सर्व यश महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांचे आहे. तन, मन, धनाने काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी सॅल्यूट करतोय," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले. पनवेल तालुक्यातील शेलघर येथे 'सुखकर्ता' बंगल्यावर महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झालेले डॉ. मनीष पाटील, ऍड.अविनाश ठाकूर यांचा सत्कार मंगळवारी (ता.१०) करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ. मनीष पाटील म्हणाले, "मी जासई मतदारसंघातून बहुमतांनी निवडून आलो. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले, हे मी कधीही विसरणार नाही. धनशक्तीविरुद्ध आमचा लढा होता, तो आम्ही आमचे नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकला आहे." 

यावेळी अविनाश ठाकूर म्हणाले, "महाविकास आघाडीचे सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मी जिंकलो. जिल्हा परिषदेची लढाई सोपी नव्हती, पण जनशक्ती आमच्या मागे होती. त्यामुळे आमचा विजय झाला. त्यामुळ सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो."

उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे म्हणाले, "आमच्या मागे ठामपणे महेंद्रशेठ घरत होते. माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि शेकाप, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही हिरीरीने प्रचारात उतरले होते. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा विजय आहे."

"उरणमध्ये पंचायत समितीवर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असे मी म्हणालो होतो, ते कार्यकर्त्यांनी अपार मेहनतीने करून दाखवले आहे. उरणमध्ये आमचा भावना पॅटर्न चालला, येत्या काळातही आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावर जोमाने लढू," असेही महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले. 

यावेळी काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, अलंकार परदेशी, जयवंत पाटील, किरण कुंभार, घनश्याम पाटील, शेखर ठाकूर, अजय म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, अलंकार पाटील, अजित ठाकूर, मनोज पाटील, मंगेश म्हात्रे, भाई पाटील, समीर ठाकूर, सुनील वर्तक, मीलन म्हात्रे, आकाश ठाकूर आदी काग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 9 February 2026

पडघा आर. के. पालवी इंग्रजी शाळेचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!

पडघा आर. के. पालवी इंग्रजी शाळेचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!

** मल्लखांब, कराटे व समूहनृत्यांतून विद्यार्थ्यांचा सामाजिक संदेश; विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवणाऱ्यांचा सन्मान

भिवंडी, प्रतिनिधी (मिलिंद जाधव) :

भिवंडी तालुक्यातील पडघे येथील आर. के. पालवी विद्यामंदिर इंग्रजी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा १९ वा वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी व रविवारी सायंकाळी बालाजीनगर, नगर पडघे येथील भव्य मैदानात मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य रवींद्र पालवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व क्रीडाप्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. स्नेहसंमेलनात भारतीय सांस्कृतिक वारसा जतन करणारी नृत्ये, तसेच प्राचीन भारतीय क्रीडा प्रकार असलेल्या मल्लखांबाचे थरारक सादरीकरण करण्यात आले. लाकडी खांबावर व दोरीवर हवेत योगासने, कसरती व कुस्तीचे डाव दाखवत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळवली. यासोबतच शारीरिक क्षमता, शिस्त व स्वसंरक्षण तंत्रांचे दर्शन घडवणारी कराटे कौशल्यांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. मोबाईलचे दुष्परिणाम, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, भारतीय सैनिकांचे शौर्य, शेतकऱ्यांचे जीवन, पंढरीची वारी, अपघात जनजागृती आणि मैत्रीचा संदेश अशा विविध विषयांवर आधारित समूहनृत्यांतून विद्यार्थ्यांनी प्रभावी सामाजिक संदेश दिला. पहिली ते दहावी तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

यावेळी संस्थेची उभारणी करताना आलेल्या अडचणी व संघर्षांविषयी संस्थापक रवींद्र पालवी यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षभरात विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच उत्कृष्ट पालक म्हणून काही पालकांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी पालवी विद्यामंदिर इंग्रजी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न ; नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा

भारतीय मजदूर संघाचे २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन संपन्न ; नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा 

** २५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील सर्व राज्यांतील जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालये, शासकीय कार्यालये, कामगार कार्यालये व ई-कार्यालयांसमोर धरणे आंदोलन.

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) : भारतीय मजदूर संघाचे (BMS) तीन दिवसीय २१वे त्रैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन धर्मनगरी जगन्नाथ पुरी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातील विविध क्षेत्रांतील हजारो प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अधिवेशनात कामगारांच्या हिताशी निगडित गंभीर राष्ट्रीय प्रश्नांवर सखोल चर्चा व मंथन करण्यात आले.

अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात अखिल भारतीय अध्यक्ष  एस. मलेशम यांनी देशातील कामगारविरोधी धोरणांवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी जाहीर केले की दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील सर्व राज्यांतील जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालये, शासकीय कार्यालये, कामगार कार्यालये व ई-कार्यालयांसमोर धरणा आंदोलन करण्यात येईल.

या आंदोलनाच्या माध्यमातून कामगार हितांचे संरक्षण, कामगार संहितांमधील (Labour Codes) आवश्यक सुधारणा, तसेच “सरकार जागे व्हा” या मागणीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे.नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.कालावधी २०२६–२०२९ साठी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी पुढील तीन वर्षांसाठी नवीन अखिल भारतीय कार्यकारिणीची सर्वसम्मतीने घोषणा करण्यात आली. एस. मलेशम (तेलंगणा) — अखिल भारतीय अध्यक्ष, सुरेंद्र कुमार पांडे (छत्तीसगड) — महामंत्री बी. सुरेंद्रन — संघटन मंत्री,

तसेच महाराष्ट्रातील अनिल ढुमणे यांची अखिल भारतीय सचिव म्हणून , मोहन येणुरे क्षेत्रीय सहसंघटक, जयंत देशपांडे, असंघटित क्षेत्र प्रमुख, शर्मिला पाटील व तृप्ती आळती महिला विभाग प्रमुख निवड जाहीर करण्यात आली.विविध मागणींबाबत सरकार ने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी जिल्ह्याधिकारी कार्यालय समोर आंदोलन  करून 'सरकार जगाव' देशभर करण्याचा निर्णय करण्यात आला आहेत. 

याशिवाय अधिवेशनात कंत्राटी कामगार क्षेत्रातील आव्हाने व कामगार सुरक्षेसंदर्भातील विशेष ठराव देखील मंजूर करण्यात आले. या २५ फेब्रुवारी सरकार जगाव आंदोलनात कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून न्याय हक्कां करिता संघर्ष  करावा असे आवाहन अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे. 

महामंत्र्यांचे वक्तव्य
नवनियुक्त महामंत्री सुरेंद्र कुमार पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“भारतीय मजदूर संघ येत्या काळात समाजाच्या शेवटच्या टोकावर उभ्या असलेल्या कामगाराच्या सन्मान व अधिकारांसाठी आपला संघर्ष अधिक तीव्र करेल. आमचे ध्येय केवळ मागण्या मांडणे नसून, राष्ट्रनिर्मितीत कामगारांचा सन्मानजनक सहभाग सुनिश्चित करणे हे आहे."  अधिवेशनाचा समारोप देशव्यापी, संघटित व सातत्यपूर्ण संघर्षाच्या दृढ संकल्पाने करण्यात आला. अशी माहीती सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.


कोट (चौकट ):- 

अधिवेशनातील प्रमुख संकल्प व ठराव:- 

अधिवेशनात कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी खालील महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले—

१)कामगार कायद्यांचे सार्वत्रिकीकरण :
कोणताही भेदभाव किंवा अपवाद न ठेवता सर्व श्रेणीतील कामगारांवर कामगार कायदे समानपणे लागू करण्यात यावेत.
२)ठेका प्रथेतील सुधारणा :
ठेका कामगारांचे शोषण कायमचे थांबवण्यासाठी विद्यमान कायद्यांत कठोर सुधारणा करण्यात याव्यात.
३)आंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान :
आंगणवाडी सेविका व मदतनीस यांना “मानधन”ऐवजी शासकीय कर्मचारी दर्जा, योग्य वेतन व संपूर्ण सामाजिक सुरक्षा लाभ देण्यात यावेत.
४)त्रिपक्षीय यंत्रणेची पुनर्बहाली :
सरकार, नियोक्ता व कामगार यांच्यातील त्रिपक्षीय संवाद यंत्रणा पुनरुज्जीवित करून ती नियमित व प्रभावी करण्यात यावी.
५)भरती प्रक्रिया :
शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील ‘जनरल भरती’वरील बंदी तात्काळ उठवून युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
६)कामगार संहिता :
सोशल सिक्युरिटी कोड व वेज कोड तातडीने आणि प्रभावीपणे अंमलात आणण्यात यावेत.
७)स्कीम वर्कर्स :
सर्व स्कीम वर्कर्सना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा.
पी फ , ई.एस.आय,  पेन्शन,  ग्रेजुएटी,  बोनस मिळावे

त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व !!!

त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व !!!  *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प *५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी  आरोग्...