Friday, 22 May 2026

जासई गावाला ऐतिहासिक दिलासा ; मा. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर ठरवले !!


जासई गावाला ऐतिहासिक दिलासा ;  मा. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर ठरवले !!

** बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारे होणारी पाडकाम कारवाई थांबणार, ४०० हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
नवी मुंबई परिसरातील जमीनमालकांसाठी दूरगामी परिणाम करणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयामध्ये, बॉम्बे हाय कोर्ट यांनी उरण तालुक्यातील जासई गावासंदर्भात सिडको यांनी राबविलेली भूसंपादन प्रक्रिया सुरुवातीपासूनच बेकायदेशीर व शून्य (Void Ab Initio) असल्याचे घोषित केले असून, अनेक वर्षांपासून आपल्या मालमत्ता हक्कांवर होत असलेल्या बेकायदेशीर हस्तक्षेपाविरोधात लढा देणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या संपूर्ण कायदेशीर लढ्याचे नेतृत्व अँड. संकेत दिपक ठाकूर यांनी केले. त्यांनी प्रभावित जमीनमालकांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत, योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता करण्यात आलेले भूसंपादन, बेकायदेशीर फेरफार नोंदी, तसेच ग्रामस्थांवर करण्यात आलेल्या दबावतंत्राला आव्हान दिले. शशिकला भोलनाथ पाटील, गोगरी कुटुंब आणि एन. जी. ठाकूर यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या वतीने दाखल करण्यात आलेली ही याचिका आता नवी मुंबई परिसरातील भूसंपादन प्रकरणांमधील एक महत्त्वपूर्ण कायदेशीर विजय मानली जात आहे.

नवी मुंबई प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनांनंतर सिडकोने जासई गावातील मोठ्या प्रमाणातील जमिनी स्वतःच्या नावावर ७/१२ उताऱ्यांमध्ये व महसुली नोंदींमध्ये दाखल करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण झालेली नसताना आणि अनेक जमीनमालकांना कोणतीही नुकसानभरपाई न देता या नोंदी करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर, अशा वादग्रस्त फेरफार नोंदींच्या आधारे पाडकाम नोटिसा बजावण्यात आल्या व ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण गावामध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

ग्रामस्थांचा आरोप असा होता की, सिडकोने या बेकायदेशीर भूसंपादन फेरफार नोंदींचा वापर करून नागरिकांवर तथाकथित “२२.५% योजना” स्वीकारण्यासाठी दबाव निर्माण केला. ग्रामस्थांच्या मते, या योजनेअंतर्गत जमीनमालकांना Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 अंतर्गत मिळणाऱ्या बाजारभावाच्या चारपट नुकसानभरपाईसह २०% विकसित जमीन या कायदेशीर हक्कांपासून वंचित केले जात होते. अनेक ग्रामस्थांनी असा आरोप केला की, चुकीच्या महसुली नोंदी, पाडकामाची भीती आणि प्रशासनिक दबाव यांच्या माध्यमातून जमीनमालकांना संमती देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

अँड .संकेत ठाकूर यांनी  मुंबई उच्च न्यायालयात भूसंपादन प्रक्रियेच्या वैधतेलाच आव्हान देत मांडणी केली की, सिडको व संबंधित प्रशासनाने कायदेशीर तरतुदी, घटनात्मक हक्क आणि सक्तीच्या प्रक्रियांचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. महसुली नोंदींमध्ये नाव चढविणे म्हणजे मालकी हक्क प्राप्त होणे नाही, जोपर्यंत कायदेशीर आणि वैध भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होत नाही, असा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला.

दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये उच्च न्यायालयाने भूसंपादन प्रक्रिया लॅप्स झाल्याचे घोषित करत ती कायद्यानुसार शून्य ठरविली. न्यायालयाने मूळ जमीनमालकांच्या नावे महसुली नोंदी पुनर्स्थापित करण्याचे तसेच सिडकोच्या नावाने करण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले.

तथापि, न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही, संबंधित बेकायदेशीर भूसंपादन नोंदी महसुली अभिलेखांमध्ये कायम राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे ग्रामस्थांना सतत त्रास, मानसिक दबाव आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागत होते. यानंतरअँड.संकेत ठाकूर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली.

दि. ०८ मे २०२६ रोजी मा. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य प्रशासन आणि सिडकोवर तीव्र नाराजी व्यक्त केली व चार आठवड्यांच्या आत बेकायदेशीर भूसंपादन फेरफार नोंदी हटविण्याचे आदेश दिले. तसेच आदेशाचे पालन न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहावे लागेल आणि संबंधित विभागावर खर्च (Costs) लादला जाऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला.

या निर्णयानंतर आता बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारावर सुरू करण्यात येणारी घरांची व संरचनांची पाडकाम कारवाईही थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण सिडकोकडून करण्यात येणाऱ्या अनेक कारवाया या वादग्रस्त महसुली नोंदींवर आधारित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी सातत्याने केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर अशा नोंदींचा कायदेशीर आधारच संपुष्टात आल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाच्या या हस्तक्षेपानंतर आता राज्य प्रशासनाने संपूर्ण जासई गावातील ७/१२ उतारे, फेरफार नोंदी आणि इतर महसुली अभिलेखांमध्ये दुरुस्ती व बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे ४०० हून अधिक प्रभावित कुटुंबांना थेट दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून वादग्रस्त भूसंपादन नोंदींमुळे निर्माण झालेला मालकी हक्कांवरील प्रश्न आता दूर होत आहे. अनेक ग्रामस्थांसाठी ही महसुली दुरुस्ती म्हणजे त्यांच्या कायदेशीर मालकी हक्कांची अधिकृत पुनर्स्थापना मानली जात आहे.

हा निर्णय केवळ जासई गावापुरता मर्यादित नसून, नवी मुंबईतील इतर अधिसूचित गावांमधील जमीनमालकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे कोणतीही विकास प्राधिकरणे कायदेशीर भूसंपादन, नुकसानभरपाई आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण न करता केवळ महसुली नोंदी बदलून खाजगी जमिनींवर हक्क सांगू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

अँड.संकेत ठाकूर यांनी सांगितले की, सिडकोसारख्या प्राधिकरणांकडून होत असलेल्या बेकायदेशीर भूसंपादन आणि मनमानी कारभाराविरोधातील लढा अद्याप सुरू असून, हा निर्णय ही केवळ सुरुवात आहे. ग्रामस्थांना दबावाखाली संमती देण्यास भाग पाडणे, वादग्रस्त फेरफार नोंदींचा आधार घेऊन पाडकामाची भीती निर्माण करणे आणि कायद्याला बगल देणे, अशा प्रकारांविरोधात पुढेही कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जासई ग्रामस्थांसाठी हा निर्णय अनेक वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर त्यांच्या सन्मान, मालकी हक्क आणि सुरक्षिततेची पुनर्स्थापना करणारा ठरला आहे. ग्रामस्थांच्या मते, हा निर्णय म्हणजे बेकायदेशीर भूसंपादन आणि चुकीच्या महसुली नोंदींच्या आधारावर सुरू असलेल्या दडपशाहीतून मिळालेली ऐतिहासिक मुक्तता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत 100 हून अधिक अनधिकृत खोल्या तसेच सुमारे 70 जोते जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोरसे तसेच सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या उपस्थितीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पथक आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.

पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामे परवानगीशिवाय उभारण्यात आली होती. वारंवार नोटिसा देऊनही बांधकामे हटविण्यात आली नसल्याने अखेर ही कठोर कारवाई करण्यात आली.

 या मोहिमेत जेसीबी आणि इतर यंत्रांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

कल्याण परिमंडळ ०३ ची आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई; तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त !!

कल्याण परिमंडळ ०३ ची आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई; तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त !!

डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा मोठा घाव

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण परिमंडळ ०३ अंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल ३४ कोटी १८ लाख ५४ हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. ही कारवाई परिमंडळ ०३ मधील आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई मानली जात असून, यामुळे अमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले आहेत.

डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कल्याण परिसरात पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील स्मशानभूमी परिसर आणि सांगळे वाडी मार्गावर अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना दोन संशयित इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले.

पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही जागीच ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात हेरॉईन (गर्द) जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत तब्बल ३४ कोटींहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कासिम अब्दुल सतार (वय ३८, शाहापूर, ठाणे) आणि कृष्णा नागण्णा हक्केमणी वय ३६, (सायन कोळीवाडा, मुंबई) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणातील मुख्य पुरवठादार आणि इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. दयानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे कल्याण परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले असून, अमली पदार्थ तस्करांविरोधातील मोहिम आणखी तीव्र करण्याची मागणी होत आहे.

Thursday, 21 May 2026

संत एकनाथ रंगमंदिर येथे २३ मे रोजी 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन !!

संत एकनाथ रंगमंदिर येथे २३ मे रोजी 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन !!

छ. संभाजीनगर (प्रतिनिधी):

शहरात प्रथमच आगळ्या वेगळ्या धाटणीतील 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि गुणगानाचे लोककलेच्या माध्यमातून सादरीकरण करणारा हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे रंगणार आहे.

महाराष्ट्रभर या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, लोककला आणि शिवचरित्र यांचा संगम असलेल्या या आख्यानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कार्यक्रमातील प्रत्येक गीतावर तरुणाई आणि महिला उत्स्फूर्तपणे नृत्य व गायनात सहभागी होत असल्याचा अनुभव आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमात वासुदेव, हलगी, ढोलक, डफ, बासरी, तुणतुणे यांसारख्या पारंपरिक आणि देशी वाद्यांच्या साथीने - छत्रपती शिवाजी महाराजांचे ने गुणगान सादर करण्यात येणार - आहे. लोप पावत चाललेल्या

अनेक लोकवाद्यांचे पुनर्जीवन या कार्यक्रमातून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच गण, गौळण, जोगवा यांसारख्या लोकपरंपरांसह मृदंग आणि बासरीची सुंदर जुगलबंदीही रसिकांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाचे निर्माते, गीतलेखक आणि संगीतकार योगेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचावेत यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. कार्यक्रमातील सर्व कलाकार महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भाग, वाडी-वस्ती आणि दुर्गम क्षेत्रांतून सहभागी झाले असून, प्रत्येक कलाकाराने आपल्या कलेत जीव ओतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ग्रामीण आणि लोककलावंतांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनोख्या लोककला सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कॉंग्रेसच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !

कॉंग्रेसच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील ; आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
 रायगड जिल्हा हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन भूमी आहे. राजकारणातील सारीपटात कॉंग्रेसने वरिष्ठ पातळीवर दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड असे रायगड जिल्ह्याचे दोन तुकडे केले आहेत. त्यामुळे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. मनीष पाटील आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजाभाऊ ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. मनीष पाटील हे सध्या रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे रायगडचे मावळते जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी 'सुखकर्ता' बंगल्यावर डॉ. मनीष पाटील यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.डॉ मनीष पाटील,राजाभाऊ ठाकूर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ पुणे येथे किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष गणेश ताठे यांची सदिच्छा भेट !!

विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ पुणे येथे किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष  गणेश ताठे यांची सदिच्छा भेट !!

विज उद्योगातील कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा.

विविध जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित.

उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
भारतीय मजदूर संघ संलग्न विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ, पुणे कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य किमान वेतन मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) गणेश ताठे यांची सदिच्छा भेट घेऊन विविध प्रलंबित कामगार प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.

बैठकीदरम्यान विज उद्योगामध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना अत्यंत प्रतिकूल व जोखमीच्या परिस्थितीत काम करावे लागत असून, त्यांच्या कामाचे स्वरूप, तांत्रिक जबाबदाऱ्या व जीविताचा धोका लक्षात घेता विज उद्योगातील कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र किमान वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.

यावर अध्यक्ष  गणेश ताठे यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करत संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करून आवश्यक त्या स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तसेच पुणे मेट्रो रेल कामगार संघ यांच्या माध्यमातून पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये कार्यरत कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना केंद्रीय वेतन दरानुसार वेतन देण्यात यावे, तसेच कामगारांना सर्व कायदेशीर सुविधा तातडीने लागू करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली.

कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

या प्रसंगी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मज़दूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, संघटन सचिव उमेश आणेराव, पुणे मेट्रो रेल कामगार संघ अध्यक्ष राम सुरवसे, तसेच निखील टेकवडे, सुमीत कांबळे व चंद्रकांत नागरगोजे उपस्थित होते.विविध जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यातील महत्वाचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून, कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिनिधींनी स्पष्ट केले

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन छेडणार !

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन छेडणार ! 

** रायगड जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांचा इशारा


उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मुळापासून उखडून टाकणारा आहे. या कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी असून, तो हिंदू धर्माच्या धार्मिक व मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणारा आहे. या लोकशाहीविरोधी मसुद्याचा रायगड जिल्ह्यातील अनेक मंदिर विश्वस्तांनी तीव्र निषेध केला असून सरकारने प्रस्तावित अधिनियम विनाशर्त मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. याविषयीचे निवेदने २० आणि २१ मे या दिवशी रायगडमधील मंदिर विश्वस्तांनी सुधागड तहसील कार्यालयात तहसीलदार उत्तम कुंभार यांना दिली.

   सदर निवेदने देताना पाली येथील अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांच्या नेतृत्वाखाली श्री उद्धर रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप तुकाराम लांगी, बल्लाळेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष  वैभव आपटे, रामवाडी देवस्थानचे  राजू पातेंरे, विष्णू देवस्थानचे  योगेश उपाध्ये, पाली देवस्थानचे प्रमोद पावगी, मारुती देवस्थानचे अध्यक्ष  अभिजित चांदोरकर, मरी माता मंदिराचे अध्यक्ष  संजय घोसाळकर आणि महाकाली देवस्थानचे विश्वस्त महादेव पिंपळे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी राजेंद्र पावसकर यांच्यासह ६० हून अधिक भक्तगण आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

  'प्रस्तावित मसुद्यातील तरतुदींनुसार, महाराष्ट्रातील सर्व देवस्थानांच्या मालकीच्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनींवरून देवस्थानांचे मालकी हक्क संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे," अशी तीव्र चिंता  जितेंद्र गद्रे यांनी यावेळी व्यक्त केली. देवस्थानांचे अस्तित्व आणि त्यांच्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी सर्व मठ-मंदिरे एकजुटीने विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर श्री उद्धर रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप लांगी म्हणाले, 'इतर देवस्थानच्या अध्यक्षांनी जी भूमिका घेतली आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. समस्त रायगडमध्ये या कायद्याचे तीव्र निषेध आम्ही करणार आहोत. वेळ पडल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन आंदोलन छेडण्यात येईल'.

    एकीकडे वक्फ मालमत्तांना विशेष संरक्षण दिले जात असताना, दुसरीकडे मंदिरांच्या जमिनी बळकावण्यासाठी कायदा करणे, हा दुजाभाव निषेधार्ह आहे. मंदिरांची भूमी ही केवळ जमीन नसून तो हिंदू संस्कृतीचा आणि आस्थेचा पवित्र वारसा आहे. सरकारने जर हिंदू समाजाच्या भावना पायदळी तुडवून हा कायदा रेटण्याचा प्रयत्न केला, तर धार्मिक संस्था, संप्रदाय आणि भाविकांना सोबत घेऊन रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्तांनी दिला

जासई गावाला ऐतिहासिक दिलासा ; मा. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर ठरवले !!

जासई गावाला ऐतिहासिक दिलासा ;  मा. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर ठरवले !! ** बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारे होणारी ...