Sunday, 21 June 2026

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

*कल्याण, प्रतिनिधी* : कल्याण पूर्व आणि श्री मलंग विभागातील वीजपुरवठा, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व तक्रारींबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कल्याण पूर्वच्या भाजपाच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी पावसाळ्यात अखंड वीजपुरवठा आणि भविष्यातील वीज प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत कल्याण पूर्वमधील प्रस्तावित स्विचिंग स्टेशन, RDSS योजनेअंतर्गत नवीन वीज प्रकल्प, विविध भागांतील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण, स्मार्ट सोलर योजना आणि पावसाळ्यात खंडित होणारा वीजपुरवठा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. वारंवार होणारे बिघाड, ट्रान्सफॉर्मरचे ओव्हरलोडिंग आणि गळतीच्या तक्रारींवर तातडीने उपाय करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

कल्याण पूर्वमधील नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची बांधिलकी यावेळी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी स्थानिक यंत्रणेशी समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.

यावेळी MSEDCL चे मुख्य अभियंता श्री. जगदीश बोडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सुनील राठोड आणि उपकार्यकारी अभियंता श्री. अमोल चौधरी उपस्थित होते.

Saturday, 20 June 2026

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून यलो अलर्ट !

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाकडून यलो अलर्ट !

*मुंबई, प्रतिनिधी 

सोमवारपासून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवत या तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

*पावसाचा अंदाज*  
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत किनारपट्टीच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार सरी पडतील. सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्र खवळण्याची शक्यता आहे.

*यलो अलर्ट म्हणजे काय*  
यलो अलर्ट म्हणजे हवामान विभागाने दिलेला 'सतर्क राहा' इशारा आहे. यामध्ये हलका ते मध्यम पाऊस, विजा व सोसाट्याचे वारे अपेक्षित असतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

*प्रशासन सज्ज*  
मुंबई महापालिका, ठाणे व रायगड जिल्हा प्रशासनाने पावसाळी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. निचऱ्या भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पंपिंग स्टेशन व आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. समुद्रकिनारी जाणे टाळावे व झाडाखाली थांबू नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

पुढील 48 तासांत पावसाच्या तीव्रतेनुसार अलर्टमध्ये बदल होऊ शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

भिवंडीत अन्न विषबाधेचा उद्रेक; फेमस शोरमामधील खाद्यपदार्थांमुळे 107 रुग्ण, दुकान बुलडोझरने पाडले !

भिवंडीत अन्न विषबाधेचा उद्रेक; फेमस शोरमामधील खाद्यपदार्थांमुळे 107 रुग्ण, दुकान बुलडोझरने पाडले !

भिवंडी, प्रतिनिधी 

भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरातील 'फेमस शोरमा' नावाच्या दुकानातून खरेदी केलेले चिकन शोरमा, पिझ्झा व फालुदा खाल्ल्यानंतर अन्न विषबाधेच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात बाधित रुग्णांची संख्या आता 107 पर्यंत पोहोचली आहे. सर्व रुग्णांवर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

*घटनेचा तपशील*  
*कारण*: खंडूपाडा येथील 'फेमस शोरमा' दुकानातील चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर विषबाधा पसरली.  
*बाधितांची संख्या*: सुरुवातीला 14 जणांना विषबाधा झाल्याची नोंद होती. नंतर ही संख्या 88 वर गेली आणि आता ती 107 पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. बाधितांना मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास जाणवत होता.

*प्रशासकीय कारवाई*  
अन्न विषबाधेच्या गंभीर प्रकारानंतर प्रशासनाने कठोर कारवाई केली. संबंधित 'फेमस शोरमा'चे दुकान बुलडोझरने पाडण्यात आले. अन्न व औषध प्रशासन FDA देखील या प्रकरणी तपास व कारवाई करत आहे. दुकानातून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

*रुग्णालयातील स्थिती*  
बाधित रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयावर ताण आला आहे. रुग्णालय प्रशासनाने अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी व औषधसाठा तैनात केला आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना बाहेरील खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अन्नपदार्थांची ताजेपणा, स्वच्छता व विक्री परवाना यांची खातरजमा केल्याशिवाय खरेदी करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भिवंडीत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आवाहन !!

भिवंडीत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आवाहन !!

प्रत्येक बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ पर्यंत स्टेमचा पाणीपुरवठा बंद राहणार; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
 
भिवंडी प्रतिनिधी

उल्हास नदीतील उपलब्ध जलसाठा आणि संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन भिवंडी शहरासाठी पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने याबाबत नागरिकांना सतर्क करत सहकार्याचे आवाहन केले आहे.

जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, कळवा-ठाणे यांच्या वतीने दिनांक ९ जून २०२६ रोजी उल्हास नदी पाणी नियोजनाबाबत आयोजित आढावा बैठकीत सर्व बिगर सिंचन ग्राहकांनी दररोज २० टक्के सक्तीची पाणी कपात करावी, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार स्टेम प्राधिकरणामार्फत भिवंडी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आवश्यक कपात करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे दर बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सलग २४ तास भिवंडी शहरासाठी स्टेममार्फत होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरच्या दिवशी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या निर्णयाचा परिणाम शहरातील ममता टाकी, चाविंद्रा गाव, पटेल नगर, बाला कंपाऊंड, फरीद बाग, संगमपाडा, कचेरीपाडा, ब्राह्मण आळी, कासार आळी, भावे नगर, आदर्श पार्क, अजयनगर, गोकुळ नगर, इंदिरा नगर, कल्याण रोड, तीनबत्ती, शिवाजी नगर, खडक रोड, अजमेर नगर, शमा नगर, अंजूरफाटा, देवजी नगर, नारपोली, विठ्ठल नगर, रोशन बाग, भंडारी कंपाऊंड, निजामपुरा, इस्लामपुरा, आमपाडा, अवचितपाडा, म्हाडा कॉलनी, शास्त्री नगर, नेहरू नगर, मिल्लत नगर, नविवस्ती, वेताळपाडा, कामतघर, ताडाली, भाग्यनगर, हनुमान नगर, कणेरी, न्यू कणेरी, गौरीपाडा, पद्मानगर, अशोक नगर, घुंघटनगर, कोटरगेट, बरफ गल्ली, काप आळी, कुरेशनगर, भादवड, टेमघर यासह अनेक भागांवर होणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने संबंधित भागांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्यात येत असून, पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी आवश्यक साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Friday, 19 June 2026

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको अधिका-यां समवेत ग्रामस्थांची बैठक संपन्न !!

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : दि.१६/०६/२०२६ रोजी सिडको द्रोणागिरी आ‌ॅफीस बोकडविरा येथे उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायत हद्दीतील नवघर,नवघरपाडा,आणि कुंडेगाव गावांमध्ये तसेच येथील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांविषयी सिडको द्रोणागिरी नोड कार्यालयात या तिन्ही गावच्या ग्रामस्थांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असता येथील सिडको कार्यालयात जमलेल्या नवघर,नवघरपाडा आणि कुंडेगावच्या ग्रामस्थांनी आपल्या गावच्या आणि परिसरातील समस्यांचा पाढाच सदर सिडको अधिका-या समोर वाचून दाखवला. येथील नागरिकांनी अनेक मुलभूत सुविधा आणि आता पावसाळ्यात नव्याने उद्भवू शकणा-या समस्या सदर सिडको अधिकारी संजय पाटील यांच्या समोर मांडल्या.या मध्ये श्री.आसरा देवीच्या तलावाच्या सुशोभीकरणाचा तसेच पावसाळ्यात उद्भवणा-या आपत्कालीन समस्येवर सिडकोच्या अधिका-यां सोबत सकारात्मक चर्चा होऊन श्री आसरा देवी तलावाचे सुशोभीकरणासाठी ६ ते ७ लाखाचा निधी देण्याचे कबूल केले आहे. तसेच समाज मंदिर आणि व्यायामशाळा बांधण्यासही सिडको कडून निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून नवघर गावातील इतर कामे जशी नवघर गावच्या आतील रोडचे काम तसेच घनकचरा उचलणे व त्या कच-याचे विल्हेवाट लावणे, इत्यादी कामे तसेच नवघर ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये आणि परिसरातील आवश्यक असणारी जनहिताची तसेच पावसाळ्यात अचानक उद्भवणारी कामेही करून देणार आसल्याचे सदर सिडकोचे अधिकारी संजय पाटील यांनी सदर बैठकीला उपस्थीत असणा-या नवघर, नवघरपाडा आणि कुंडेगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या समोर कबूल केले असता येथील  जमलेल्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीम !!

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीम !!

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमधील ७४१ गावांची केंद्र शासनाने निवड केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीमध्ये या गावांमध्ये विशेष ग्रामसभा व आदर्श गावांची संयुक्त पडताळणी मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविली आहे.

या मोहिमेद्वारे ‘प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेची’ (पीएम- अजय) जनजागृती करावयाची असून, गावाच्या विकासात्मक गरजांची ओळख, गावांचे ग्राम विकास आराखडे तयार करणे, त्यास ग्रामसभेमध्ये मंजुरी देणे, ज्या गावांचे ग्राम विकास आराखडे तयार केलेले आहेत, त्या आराखड्यांना जिल्हास्तरीय समितीची अंतिम मान्यता देणे, आदी कामकाज करण्यात येणार आहे. त्याशिवाय गावांचे ७० किंवा त्यापेक्षा जास्त गुणांकन असलेल्या गावांना आदर्श ग्राम घोषित करणे, 'आदर्श ग्राम' म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये केंद्र-राज्य शासनाच्या विविध योजनांशी समन्वय साधण्यावर भर देण्याच्या अनुषंगाने उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. या गावांमध्ये ५० सामाजिक-आर्थिक निर्देशकांचे आणि १५ ग्रामीण पायाभूत सुविधांचे निकष परिपूर्णतेबाबत माहिती घेऊन त्याबाबत ग्रामसभेमध्ये सल्लामसलत करुन त्या गावासाठी आवश्यक असणाऱ्या विकास कामकाजासाठी १० लाख रुपयांच्या पुढील मागणी प्रस्तावित करणे आदी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, आदर्श गावांची संयुक्त पडताळणी करुन तपासणी अहवाल ‘पीएम- अजय' मोबाईल अॅपद्वारे व्हिलेज इन्स्पेक्शन रिपोर्ट मध्ये भरावयाचा आहे.

याकामी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने या मोहिमेचे नियोजन केलेले आहे. या मोहिमेमध्ये, सर्व ग्रामस्थ, अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, बचत गट प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. विशेष ग्रामसभा मोहिम १०० टक्के यशस्वी करावी, असे आवाहन श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण, सनी लोंढे (दि. १९/०६/२०२६)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील क प्रभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांच्या नेतृत्वाखाली पथक प्रमुख संतोष माहिडा व त्यांच्या पथकाने स्टेशन रोड परिसरासह क प्रभाग हद्दीतील अनधिकृत फेरीवाले हटवून परिसर फेरीवाला मुक्त केला.

*जबर वचक बसवली*  
महापालिका पथकाने स्टेशन रोड परिसरात ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कायद्याची जबर वचक बसवली. कारवाईदरम्यान अनेक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरातील अतिक्रमण दूर होऊन वाहतूक व पादचाऱ्यांना मोकळी जागा मिळाली.

*पथकाचे योगदान*  
या कारवाईत पथक प्रमुख संतोष माहिडा यांच्यासह त्यांचे सहकारी पवार, परमार व शेवाळे यांनी मोलाचे योगदान दिले. प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पाडली.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर नियंत्रण आणण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे सुरू राहतील. नियमबाह्यपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !! *क...