Monday, 15 June 2026

ठाण्यात हुक्का पार्लरवर धाड: 9 हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह 14 जणांवर गुन्हा !!

ठाण्यात हुक्का पार्लरवर धाड: 9 हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह 14 जणांवर गुन्हा !!

*ठाणे, दि. 15 जून 2026*

ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उथळसर प्रभाग समितीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील 'लाऊड 9 लाऊंज' या आस्थापनावर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून बेकायदेशीर हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत हुक्का पॉट व विविध फ्लेव्हरसह सुमारे 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हॉटेल चालकासह एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*गोपनीय माहितीवर कारवाई*  
पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1, ठाणे बाळासाहेब पाटील यांना 14 जून रोजी रात्री 11.30 च्या सुमारास उथळसर परिसरातील 'लाऊड 9 लाऊंज' येथे ग्राहकांना हुक्का सेवा पुरवली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकला.

15 जून रोजी पहाटे 12.35 वाजता पोलिसांचे पथक लाऊंजमध्ये दाखल झाले. अचानक झालेल्या छापेमारीमुळे आस्थापनात खळबळ उडाली. तपासणीत ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी आवश्यक साहित्य व विविध फ्लेवर उपलब्ध करून दिले जात असल्याचे आढळले.

*14 जणांवर गुन्हा, मुद्देमाल जप्त*  
पोलिसांनी हॉटेल चालकासह तेथे उपस्थित असलेल्या 13 जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून हुक्का पॉट, विविध फ्लेवर व संबंधित साहित्य असा एकूण 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 134/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण विनियमन अधिनियम 2003 मधील कलम 4(अ) व 21(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हुक्का पार्लर चालवण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.

*बेकायदेशीर हुक्का व्यवसायावर कठोर कारवाई*  
अलिकडच्या काळात हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याबत चिंता व्यक्त होत आहे. अशा बेकायदेशीर व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरात परवानगीशिवाय सुरू असलेल्या हुक्का पार्लर व तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सौजन्य - (सा. सत्य निर्णय)

बेकायदा ट्रेलर पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण !!

बेकायदा ट्रेलर पार्किंगमुळे अपघाताला निमंत्रण !!

** कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जनतेतून मागणी.

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावर तसेच उरण पनवेल मुख्य रस्त्यावर जासई बस स्टॅन्ड येथे तसेच करळ फाटा येथे दोन्ही बाजूला पार्किंग करून ठेवलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर वाहनांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, बस, रिक्षा, मोटार सायकलस्वरांचा अपघात होण्याचा धोका मोठया बळावला आहे.यातून अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे अशा बेकायदेशीर व अनधिकृत पणे उभे असलेल्या सर्वच वाहणावर कायदेशीर कारवाई करून या समस्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी जनतेने केली आहे.

गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावर तसेच उरण पनवेल मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी, या मार्गावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम खात्याने काही वर्षांपूर्वी गव्हाण फाटा-दिघोडे मार्ग हा चौपदरी करण्यात आला होता. मात्र, काही गोदाम मालकांनी येथे चक्क अनधिकृतपणे ट्रेलर उभे करण्यास सुरुवात केली. अशात रस्ता अरुंद होत असून, इतर गाड्यांना प्रवास करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.याचा त्रास वयोवृद्ध व शाळकरी मुलांनीही अनेकदा होतो. यावर तोगडा काढावा यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व पोलिस प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.वारंवार होणाऱ्या अनधिकृत व बेकायदेशीर पार्किंग मुळे उरण मधील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रोजचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ही दैनंदिन समस्या आता उग्र रुप धारण करत आहे.


कोट (चौकट ):- 

रस्ते वाहतूक व अपघात तसेच वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग संदर्भात आम्ही जेएनपीएच्या चेअरमनसोबत बैठक घेतली आहे. यार्डमध्ये ५० कंटेनरची जागा असते, तर येथे २५० कंटेनर येतात. त्यामुळे अनेक कंटेनर हे रस्त्याच्या आडवे लावले जातात. याबाबत आम्ही वेळोवेळी कारवाई करत असतो. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच अपघात होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत 
  - अतुल दहिफळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण वाहतुक विभाग,

कल्याणमध्ये वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनचा वाद चिघळला !!

कल्याणमध्ये वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनचा वाद चिघळला !!
 
*पालिका मुख्यालयासमोर दोन गट आमने-सामने; तणावपूर्ण वातावरण*

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण पूर्वेतील वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. बौद्ध भूमीच्या बचावासाठी बौद्ध भिक्खू संघ आक्रमक झाला असून, दुसरीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून तणाव वाढला आहे.

*३० मे च्या कारवाईनंतर असंतोष*  
३० मे रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेने उड्डाणपुलाच्या कामासाठी परिसरातील काही बांधकामे आणि धार्मिक प्रतीके हटवली होती. या कारवाईमुळे बौद्ध समाजात तीव्र असंतोष पसरला. राज्य शासनाने या जागेवर बिहारमधील बोधगयाच्या धर्तीवर भव्य ‘महाबोधी संकुल’ विकसित करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक भंते आणि आंदोलक मूळ मागण्यांवर ठाम आहेत.

*बौद्ध भिक्खू संघाच्या प्रमुख मागण्या*  
बौद्ध भूमीच्या संरक्षणासाठी भिक्खू संघाने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा :

- *दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई*: पूर्वसूचना न देता धार्मिक वास्तू आणि झाडांची तोड करणाऱ्या जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्वरित निलंबित करावे.
- *उड्डाणपुलाचा मार्ग बदलावा*: प्रस्तावित उड्डाणपुलामुळे बुद्धभूमीला धक्का लागू नये. तो वालधुनी नदीलगत घेण्यात यावा.
- *जागेचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत*: जागेची मालकी आणि सीमांकन यांसारखे प्रलंबित प्रश्न आधी निकाली काढावेत.

*आरपीआय आठवले गटाचे आंदोलन*  
दुसरीकडे आरपीआयचे नेते अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या भूमीचा विकास जागतिक स्तरावर व्हावा आणि बोधगयाच्या धर्तीवर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन व ध्यान केंद्र उभारले जावे, यासाठी हे आंदोलन सुरू आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या गेटसमोर दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घोषणाबाजी आणि गोंधळामुळे महापालिका परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

*प्रशासनाची भूमिका*  
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासनाकडून दोन्ही गटांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वासार्ह पर्याय !!

उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विश्वासार्ह पर्याय !!

तळसंदेतील डी. वाय. पाटील विद्यापीठ **
** हे उद्योगाभिमुख शिक्षण, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि करिअरच्या व्यापक संधींचा संगम : डॉ. शंकर पुजारी . 

तळसंदे : 
 बदलत्या जागतिक शैक्षणिक व औद्योगिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे (ता. हातकणंगले) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यावर्षी  डिझाईन आणि कायदा शिक्षण देणारे अभ्यासक्रम त्याचबरोबर दहावीनंतर अभियांत्रिकी पदवी देणारा सहा वर्षांचा इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आल्याची माहिती प्रवेश प्रक्रिया संचालक प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी दिली.

कुलपती डॉ. संजय डी.पाटील, प्र- कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाची शैक्षणिक, संशोधन आणि कौशल्यविकास क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

डॉ. पुजारी म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये, संशोधनवृत्ती, नेतृत्वगुण, संवाद कौशल्ये आणि उद्योग क्षेत्राशी सुसंगत ज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. याच दृष्टीने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची रचना केली आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड बी.टेक. (डिप्लोमा + डिग्री) हा अभिनव अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यामुळे कमी कालावधीत तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळण्यास मदत होते. यामध्ये ६ वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून अभियंता बनण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

व्यवस्थापन क्षेत्रात बीबीए, एमबीए, अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए (फार्मास्युटिकल मॅनेजमेंट),  बीबीए,  एमबीए तसेच ग्लोबल एमबीए हे अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, उद्योजकता, आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि नेतृत्व विकासाच्या संधी उपलब्ध होतात.

कायदा क्षेत्रात बी.ए. एल.एल.बी. व एल.एल.बी. त्याचबरोबर बीसीए व एमसीए, तर सर्जनशील क्षेत्रात बॅचलर ऑफ डिझाईन अंतर्गत व्हिज्युअल कम्युनिकेशन, यूआय/यूएक्स, अॅनिमेशन, प्रॉडक्ट डिझाईन तसेच इंटिरिअर अँड स्पेस डिझाईन यांसारखे अभ्यासक्रम नव्या युगातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देत आहेत 

याशिवाय बी.एस्सी. डेटा सायन्स, एम.एस्सी. ऑर्गेनिक केमिस्ट्री, अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांसारखे आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम संशोधन व उद्योग क्षेत्रातील संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहेत.

विद्यापीठामध्ये आधुनिक प्रयोगशाळा, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्राशी असलेले सहकार्य, इंटर्नशिप, प्लेसमेंट सहाय्य, संशोधनाच्या संधी तसेच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध मेरिट स्कॉलरशिप योजनाही उपलब्ध आहेत.

करिअरला योग्य दिशा देणारे शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि जागतिक स्तरावरील संधी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी डी. वाय. पाटील ऍग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे येथे भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन डॉ. पुजारी यांनी केले.  प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी : डॉ. शंकर पुजारी, ( डायरेक्टर  ऍडमिशन्स ) : 9922772522  या नंबर वर संपर्क साधावा.

प्रसिद्धी - विलासराव कोळेकर सर 

Sunday, 14 June 2026

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह !

JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू; GBL कंपनी-ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह !

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
जेएनपीटीच्या JSW ऑइल जेट्टीवर आज सकाळी तेलवाहिनी पिगिंगचे काम सुरू असताना BPCL जेटीवर ग्रॅसचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. करावली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील रहिवासी राजेंद्र शिंदे, गणेश बेन्झोप्लास्ट कंपनीचे अधिकारी, आणि उरण तालुक्यातील पिरकोन येथील जगन्नाथ गावंड, कंत्राटी कामगार, यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. दोन्ही मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.  

घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिगिंगसारखे अत्यंत धोकादायक काम सुरू असताना GBL कंपनी आणि संबंधित ठेकेदाराने सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नसल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. हेल्मेट, परमिट टू वर्क, सेफ्टी ऑडिट, गॅस टेस्टिंग यासारख्या मूलभूत सुरक्षा उपायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हा स्फोट झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. "GBL कंपनी आणि ठेकेदाराला कामगारांच्या जीवाची किंमतच नाही. फक्त उत्पादन आणि नफा हेच त्यांचे उद्दिष्ट आहे," अशी टीका संघटनांनी केली आहे.  

अपघाताची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांची कारवाई अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचण्याआधीच GBL कंपनी आणि ठेकेदार यांच्यात 'जुळवाजुळव' झाल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे. या प्रकरणात 'सेटलमेंट' करून फाईल बंद केली जाईल की काय, अशी भीती पीडित कुटुंबीय आणि स्थानिक व्यक्त करत आहेत. "दोन जीव गेले तरी GBL कंपनी आणि ठेकेदारावर ठोस कारवाई होत नाही. पोलीस तपास फक्त कागदावरच राहतो का?" असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  

जेएनपीटी प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून दोषी GBL कंपनी आणि ठेकेदाराला वाचवले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेमुळे जेट्टीवरील काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. परंतु, "काम थांबवून काय उपयोग? दोषींवर गुन्हा कधी दाखल होणार आणि शिक्षा कधी मिळणार? पोलीस पुढील तपास करतात की दबावाखाली फाईल बंद करतात, हे आता पाहावे लागेल," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ईश्वरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व जनसागर !!

ईश्वरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व जनसागर !!

.                                      आ.गोपीचंद पडळकर मार्गदर्शन करताना

ईश्वरपूर, प्रतिनिधी :

ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा व जाहीर सभेला उपस्थित राहून समाजबांधवांशी संवाद साधला. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या समाजबांधव, माता-भगिनी आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण ईश्वरपूर नगरी अहिल्यामातेच्या जयघोषाने दुमदुमून गेली.

पुण्यश्लोक अहिल्यामाता यांचे कार्य, त्याग, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी विचार हे आजही समाजाला दिशा देणारे आहेत. इस्लामपूरचे 'ईश्वरपूर' आणि अहमदनगरचे 'अहिल्यानगर' झाल्यानंतर स्वाभिमानी ईश्वरपूरच्या भूमीत साजरी झालेली ही जयंती केवळ उत्सव नव्हे, तर समाजशक्ती, स्वाभिमान आणि संघटनशक्तीचे विराट दर्शन ठरली.अहिल्यामातेचे भव्य स्मारक कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या उपकारातून नव्हे, तर समाजबांधव आणि माता-भगिनींच्या लोकवर्गणीतून स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यामाता यांच्या जन्मभूमी चौंडीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने मंजूर केलेला ₹१००० कोटींचा विकास आराखडा हा ऐतिहासिक निर्णय असून आचारसंहिता संपताच त्यावरील कामांना गती मिळणार आहे.धनगर समाजाच्या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी प्रत्येक 'क' वर्ग तीर्थक्षेत्राला ₹५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला असून आरेवाडी देवस्थानचा ₹१५० कोटींचा विकास आराखडाही शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

मेंढपाळ बांधवांवर होणारा अन्याय, दडपशाही आणि जुलूमशाही आता सहन केली जाणार नाही. संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी, एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि धनगर समाजाच्या न्याय्य अधिकारांसाठी आमचा संघर्ष अधिक तीव्रतेने सुरू राहील. ही पिढी केवळ तमाशा पाहण्यासाठी नाही, तर इतिहास घडवण्यासाठी आणि समाजाचा स्वाभिमान प्रस्थापित करण्यासाठी मैदानात उतरली आहे.

यावेळी राज्यसभा खासदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते डॉ. अण्णासाहेब डांगे, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, सम्राटबाबा महाडिक, माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध देवस्थानांचे संत, महंत, पुजारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.

शब्दांकन - विलासराव कोळेकर सर 

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ !

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ !

१३ ते १९ जूनपर्यंत अर्जदारांना प्रवेशाची संधी; हा दुसरा टप्पा अंतिम

ठाणे, दि. १३ : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (RTE) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यास मुदतवाढ देण्यात आली असून, आता ही प्रवेश प्रक्रिया दिनांक १३ जून २०२६ ते १९ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

यापूर्वी प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेशाची मुदत दिनांक १२ जून २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संबंधित विभागामार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ केवळ दुसऱ्या टप्प्यासाठी असून, हा अंतिम टप्पा असल्याची नोंद सर्व संबंधित पालकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरटीई कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद ठाणे प्रशासनामार्फत पालकांना वेळेत प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्यात येत असून, संबंधित यंत्रणांना प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणताही विलंब होऊ नये तसेच पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी पालकांनी अंतिम मुदतीपूर्वीच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे‌.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही सामाजिक समावेशकता आणि प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम असून दिलेल्या मुदतवाढीत पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शिक्षण विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे

ठाण्यात हुक्का पार्लरवर धाड: 9 हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह 14 जणांवर गुन्हा !!

ठाण्यात हुक्का पार्लरवर धाड: 9 हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह 14 जणांवर गुन्हा !! *ठाणे, दि. 15 जून 2026* ठाण्यातील राबोडी पोल...