Saturday, 4 July 2026

उरणमध्ये मुसळधार पाऊस; पूरपरिस्थितीत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर स्वतः रस्त्यावर, नागरिकांना दिली मोठी मदत !!

उरणमध्ये मुसळधार पाऊस; पूरपरिस्थितीत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर स्वतः रस्त्यावर, नागरिकांना दिली मोठी मदत !!

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात, शहरात सतत जोरदार पाऊस सुरु असून उरण शहरात आज झालेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता थेट मैदानात उतरून मदतकार्य सुरू केले आहे.

सत्र न्यायालय (सेशन कोर्ट) परिसर आणि उरणमधील इतर गंभीर पूरग्रस्त भागांमध्ये  भावनाताई घाणेकर यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला गती देणे, यासाठी त्या स्वतः जागोजागी धावपळ करताना दिसत आहेत.

नगराध्यक्षांच्या या धाडसी भूमिकेमुळे 'प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण ताकदीने नागरिकांच्या पाठीशी उभी असून, कोणीही घाबरून जाऊ नये,' असे आवाहन यावेळी नगराध्यक्षांनी केले आहे.

माननीय सुनील सिताराम उत्तेकर यांचा मुंबईत सत्कार सोहळा !

माननीय सुनील सिताराम उत्तेकर यांचा मुंबईत सत्कार सोहळा !
  
*शिवभक्त कोकण प्रतिष्ठान तर्फे समाजकार्याचा गुणगौरव*  

*मुंबई, दि. 4 जुलै 2026*

शिवभक्त कोकण प्रतिष्ठान संगमेश्वर तालुकातर्फे माननीय सुनील सिताराम उत्तेकर यांच्या समाजकार्याचा गुणगौरव सत्कार सोहळा रविवार दि. 5 जुलै 2026 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

*कार्यक्रमाची माहिती*  
हा सत्कार सोहळा दादर पश्चिम येथील सद्गुरू हॉल येथे सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय निलेश करंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होईल.

*सुनील उत्तेकर यांचे योगदान*  
शिवभक्त कोकण प्रतिष्ठान कोकणातील नमन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे. प्रतिष्ठानच्या सर्व नमन कलाकारांचा परदेश दौरा यशस्वी होण्यासाठी सुनील उत्तेकर यांनी सतत मार्गदर्शन आणि सहकार्य केले आहे. याच सहकार्याबद्दल संस्थेने त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले आहे.

गेल्या 35 वर्षांपासून सुनील उत्तेकर कोकणातील रेल्वे वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. तसेच पर्यावरण रक्षणासाठी वालधुनी नदी स्वच्छता अभियान आणि वारकरी संप्रदायाच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत.

या सर्वांगीण सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय कार्याची दखल घेऊन शिवभक्त कोकण प्रतिष्ठानने सुनील उत्तेकर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय; बदलली ठाणे-पालघरची राजकीय समीकरणे !

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय; बदलली ठाणे-पालघरची राजकीय समीकरणे !

*दिग्गज पॅनलसमोर 'टायगर' एकटा लढला*  

    

*ठाणे, संदीप शेंडगे :

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या आणि राजकारणात नवी समीकरणे ठरविणाऱ्या ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने यंदा अनेक नवे राजकीय संदेश दिले आहेत. महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाच, शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांनी मात्र अपक्ष उमेदवार म्हणून दिलेल्या दमदार लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या निवडणुकीमुळे ठाणे-पालघरच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. 

या निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून पत्रकार परिषद घेत 'परिवर्तन पॅनल'ची घोषणा केली होती. तसेच बँकेचे माजी अध्यक्ष तथा मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बाबाजी पाटील हे देखील या पॅनलमध्ये संपूर्ण ताकदीनिशी सक्रिय होते. गणेश नाईक प्रत्यक्ष संयोजक नसले तरी या पॅनलमधील त्यांचा रस राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. 

सुरुवातीला भाजपच्या पुढाकारातून आमदार किसन कथोरे यांच्या पाठिंब्याने 'सहकार पॅनल' उभे राहिल्याची चर्चा होती. मात्र, महायुतीतील मतभेदानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पॅनलला पाठिंबा दिल्याने निवडणुकीत अधिक चुरस वाढली. या संपूर्ण प्रक्रियेत महायुतीतील अंतर्गत राजकारणही उघड झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याचे पहावयास मिळाले. 

एवढे असतानाही निलेश सांबरे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आरोग्य शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणे हा स्वभाव मतदारांना भावला तसेच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केलेली जनतेची सेवा कामी आली आणि त्यांचा विक्रमगड मधून बिनविरोध निवडून येण्याचा मान त्यांनी पटकावला. 

दरम्यान, गेल्या काही वर्षांत शिवसेनेत अनेक मोठे राजकीय नेते दाखल झाले. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधानपरिषदेच्या सभापतीपदाची संधी मिळाली, रवींद्र फाटक यांचीही योग्य दखल घेण्यात आली, तर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यासह अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. नुकत्याच राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत सहा खासदारांचा पक्षप्रवेशही चर्चेत राहिला. काही आमदारही शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाही शिवसेनेच्या उपनेतेपदावर असतानाही निलेश सांबरे यांना पक्षाने कोणतीही संधी उपलब्ध करून दिली नाही अनेक नेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले परंतु निलेश सांबरे यांना मात्र पक्षाने वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, याच काळात ठाणे, पालघर, रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा प्रभाव निर्माण करणारे शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांना मात्र शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आणि खदखद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. 

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या निलेश सांबरे यांनी केवळ विरोधकांवर टीका न करता, निवडून आल्यास बँकेसाठी काय करणार याचा ठोस आणि वास्तववादी आराखडा मतदारांसमोर मांडला. विशेषतः बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या प्रचारामुळे निवडणुकीत वेगळे वातावरण निर्माण झाले. 

इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघात त्यांनी प्रस्थापित उमेदवाराला कडवी झुंज देत अवघ्या शंभर मतांनी पराभव स्वीकारला, तर विक्रमगड तालुका सेवा संस्था मतदारसंघातून निर्विवाद विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. या निकालाने राजकीय विश्लेषकांचेही लक्ष वेधून घेतले. 

निलेश सांबरे यांचा जनाधार यापूर्वीही स्पष्ट झाला होता आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी तब्बल २ लाख ३१ हजार ४१७ मते मिळवली होती. त्या निवडणुकीत दोन वेळा खासदार राहिलेले कपिल पाटील यांचा ६५ हजार ६५७ मतांनी पराभव झाला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे विजयी झाले होते. कपिल पाटील यांच्या पराभवामागे निलेश सांबरे यांच्या मतविभाजनाचा मोठा प्रभाव असल्याचे विश्लेषण त्यावेळी करण्यात आले होते. तर कपिल पाटील यांच्या पराभव केवळ निलेश सांबरे यांच्या मुळेच झाला असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. 

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी ठाणे-पालघर परिसरात व्यापक सामाजिक कार्य उभे केले आहे. मोफत सीबीएसई शाळा, मोफत रुग्णालये, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे यांसारख्या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांपर्यंत ते पोहोचले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक युवक-युवती प्रशासकीय सेवेत आणि पोलीस दलात दाखल झाले असून, त्यामुळे त्यांच्याभोवती मोठा समर्थक वर्ग तयार झाला आहे. तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट) अडचणीच्या काळात पक्षप्रवेश करून शिवसेनेला ठाणे पालघर जिल्ह्यात मोठी ताकद मिळवून दिली होती. 

अशा प्रभावी सामाजिक आणि राजकीय कामगिरीनंतरही शिवसेनेच्या उपनेत्यालाच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते परिणामी, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून लढण्याची वेळ त्यांच्यावर आली. परंतु स्वतःवर असलेला विश्वास आणि जनतेची केलेली कामे पाहून जनता अधिकृत अनधिकृत पाहणार नाही केवळ विकासाला मध्ये या एकाच विश्वासाने निलेश सांबरे निवडणुकीला सामोरे गेले आणि अधिकृत उमेदवाराचा पराभव करून बिनविरोध निवडून गेले. 

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीत दोन्ही बाजूंना अनुभवी आणि मातब्बर राजकीय नेते असतानाही निलेश सांबरे यांनी दिलेली कडवी लढत ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेना सातत्याने ऑपरेशन टायगर राबवत आहे परंतु एकटा लढणाऱ्या या ठाणे पालघरच्या टायगर मात्र दुर्लक्षित होत चालला आहे 

या निवडणुकीने ठाणे आणि पालघरच्या राजकारणात नवे राजकीय संकेत दिले असून, पुढील काळात 'निलेश सांबरे फॅक्टर' अधिक प्रभावी ठरणार का, त्यामुळे ऑपरेशन टायगर राबवीत असताना आपला हा टायगर निसटून तर जाणार नाही ना याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
.

Friday, 3 July 2026

आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

** १०११ विद्यार्थ्यांचा सहभाग; स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवरील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat), कोल्हापूर तसेच प्रफुल्लित केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा परिचय व्हावा, भारतीय संविधानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी तसेच शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने आंतरशालेय 'राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाला परिसरातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १०११ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून ज्ञान, कौशल्य व स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडविले.स्पर्धेची रचना स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा, ऑनलाइन परीक्षांचा अनुभव मिळावा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत गुणवत्तापूर्ण मूल्यमापन व्हावे, या दृष्टीने प्रश्नमंजुषेचे विशेष रचना करण्यात आली होती.

या ऑनलाइन परीक्षेचे एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा पूर्ण केल्यानंतर त्यांना तत्काळ निकाल, गुणपत्रिका,सहभागाचे प्रमाणपत्र, आंतर शालेय क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

स्पर्धेतील प्रत्येक सहभागी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या संबंधित शाळेत जाऊन पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या गौरव समारंभास मेरा युवा भारतचे सहाय्यक निलेश कांबळे, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील, अध्यक्षा तसेच महाराष्ट्र शासन जिल्हा युवती पुरस्कार विजेत्या डॉ.अल्फिया बागवान,संचालिका बिस्मिल्ला नदाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची ओळख करून देणे आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करणे या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

वृत्त - डॉ प्रफुल्ल पाटील 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अजरामर आवाज : कवी मानवेल गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अजरामर आवाज : कवी मानवेल गायकवाड

** पाच हजारांहून अधिक गीतांचा अमूल्य वारसा; तरीही उपेक्षित राहिलेल्या लोककवीची कहाणी 

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांची चळवळ केवळ भाषणांत किंवा पुस्तकांत मर्यादित राहिली नाही. लोककला, भारूड, शाहिरी आणि लोकगीतांच्या माध्यमातून हा विचार सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचला. या परिवर्तनवादी प्रवाहात आपल्या लेखणीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गीतकारांमध्ये कवी मानवेल गायकवाड यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.त्यांच्या लेखणीतून जन्मलेली गीते आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतात. महामानवांच्या जयंती आणि स्मृतिदिनांपासून ते ग्रामीण जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विवाहसोहळ्यांपर्यंत त्यांच्या गीतांचा निनाद ऐकू येतो.
काळ बदलला, पिढ्या बदलल्या; मात्र मानवेल गायकवाड यांच्या शब्दांची जादू आजही कायम आहे. 

लेखणीशी जुळलेले आयुष्यभराचे नाते: मानवेल गायकवाड यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे झाला. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील मालुंज. १९६४ मध्ये त्यांचे कुटुंब ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे आले आणि पुढे वासिंद (ता. शहापूर) येथे स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना शब्दांचे विलक्षण आकर्षण होते. शाळेच्या वहीत गणितापेक्षा कविता अधिक दिसायच्या. अवघ्या चौदा-पंधरा वर्षांच्या वयात सुरू झालेली लेखनाची ही वाटचाल आज सत्तरीच्या उंबरठ्यावरही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. ते नेहमी म्हणतात, "गाणे गाणारा कलाकार प्रकाशझोतात येतो; पण त्या गाण्याला जन्म देणाऱ्या कवीची ओळख समाजापर्यंत पोहोचली पाहिजे." ही भावना त्यांच्या संपूर्ण साहित्यकृतीत प्रतिबिंबित होते. त्यांनी लेखणीचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून केला. 

'जवा नवीन पोपट हा...'ने मिळवून दिली अनोखी ओळख : १९८६ हे वर्ष मानवेल गायकवाड यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष ठरले. त्यांनी लिहिलेले "जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला" हे गीत आनंद शिंदे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले आणि अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. ग्रामीण संस्कृतीचा अस्सल गंध असलेले हे गीत आजही लग्नसमारंभ, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तितक्याच उत्साहाने वाजते. या एका गीताने त्यांना 'लोकगीतांचा बादशहा' अशी ओळख मिळवून दिली.

भीमगीतांचा बुलंद आवाज : मानवेल गायकवाड यांची खरी ओळख म्हणजे आंबेडकरी चळवळीचे प्रभावी गीतकार. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील "भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले", "भीमासारखा बाळ जन्मा यावा", "भीमा तुझ्या जन्मामुळे जीवनी संगीत आले" ही त्यांची गीते आजही लाखो अनुयायांच्या भावना व्यक्त करतात.

याशिवाय "ए फॉर आंबेडकर", "ग्रेट यशवंत आंबेडकर", "तुझ्या हाती झेंडा निळा पाहिजे", "बीएसपी मे आओ", "मंत्रिपदाला अशी हो माझ्या भीमाने लाथ मारली" यांसारखी प्रबोधनपर गीतेही त्यांनी लिहिली. बुद्ध विचारांचा प्रसार करणारी "बुद्ध शरणं गच्छामी", "शुद्ध जो होगा वो ही बुद्ध होगा", "बुद्ध विहारी जाऊ या" "जस चमके मोत्याच दान, अस भीमाचं गाणं"

ही गीतेही त्यांच्या लेखणीतून साकारली. त्यामुळेच त्यांना 'भीमगीतांचा सम्राट' म्हणून ओळखले जाते. तर विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

माईसाहेबांवरील पहिले गीत : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी डॉ. सवितामाई (माईसाहेब) आंबेडकर यांच्यावर गीत लिहिणारे ते बौद्ध समाजातील पहिले गीतकार ठरले. तुटलेल्या कानाच्या कपातून बाबासाहेब चहा पित असल्याचे पाहून माईसाहेबांच्या मनात काय भावना उमटल्या असतील आणि त्यावर बाबासाहेबांनी काय उत्तर दिले असेल, या कल्पनेवर आधारित त्यांनी एक हृदयस्पर्शी गीत लिहिले. हे गीत ऐकून ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक यांनी त्यांना मिठी मारत, "हा फार मोठा कवी होईल," असे गौरवोद्गार काढले. पुढील काळात ते शब्द अक्षरशः खरे ठरले.

 लोकगीतांचा अफाट खजिना : भीमगीतांबरोबरच ग्रामीण जीवन, नातेसंबंध, विनोद आणि लोकसंस्कृतीवर आधारित हजारो लोकगीते त्यांनी लिहिली. "राती या आंटीची जवा घंटी मी वाजवली", "गेली माझी सख्खी बायको गेली", "हॅलो मी बाबुराव बोलतोय", "गारुडी लागला मागं", "गेला माझा सख्खा सासरा गेला" यांसारखी अनेक गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. आजपर्यंत त्यांनी पाच हजारांहून अधिक गीते लिहिली असून, आजही त्यांची लेखणी तितक्याच ताकदीने सुरू आहे. 

शेकडो गायकांचा आवाज; पण कवी मात्र उपेक्षित: 
मोहम्मद अजीज, सुरेश वाडकर, उदित नारायण, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले, आदर्श शिंदे अशा शंभरहून अधिक नामवंत गायकांनी त्यांच्या गीतांना स्वर दिले. अनेक मराठी चित्रपटांनाही त्यांच्या गीतांनी वेगळी उंची मिळवून दिली. परंतु, ज्या गीतांनी अनेक गायक आणि संगीत कंपन्यांना प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळवून दिला, त्या गीतांचा निर्माता असलेला हा प्रतिभावान कवी आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

पक्षाघातावर मात; संघर्ष आजही सुरूच : दोन वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. आर्थिक अडचणींमुळे उपचार करणेही कठीण झाले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" या संदेशातून प्रेरणा घेत त्यांनी आजाराशी आणि परिस्थितीशी जिद्दीने सामना केला. आजही वासिंद येथील आपल्या साध्याशा घरात राहून ते अखंड लेखन करत आहेत. गरिबीशी झुंज देत असतानाही त्यांनी स्वाभिमान आणि विचारांची साथ कधी सोडली नाही. 

सन्मानाची प्रतीक्षा : मानवेल गायकवाड यांची कहाणी ही केवळ एका गीतकाराची नाही; ती आपल्या समाजाने आणि व्यवस्थेने प्रतिभावान कलावंतांकडे केलेल्या दुर्लक्षाची वेदनादायी कहाणी आहे. पाच हजारांहून अधिक गीतांचा अमूल्य ठेवा महाराष्ट्राला देणाऱ्या या लोककवीला त्यांच्या हयातीतच योग्य सन्मान मिळणे ही समाजाची आणि शासनाची जबाबदारी आहे. गायकाचा आवाज काळाच्या ओघात विरून जातो; पण कवीचे शब्द काळाच्या पलीकडे जिवंत राहतात. अशाच अजरामर शब्दांचा शिल्पकार म्हणजे कवी मानवेल गायकवाड.

लेखक : मिलिंद सुरेश जाधव
पडघा, भिवंडी, मो.8655569436

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पाटील प्रमुख पाहुणे !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पाटील प्रमुख पाहुणे !!

*अध्यक्ष रविंद्र मानगावे, व्यवस्थापन व कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण*  

*मुंबई, (राहुल बैसाणे)

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर MACCIA च्या वर्ष 2026-2028 च्या नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र मानगावे, व्यवस्थापन मंडळ व कार्यकारिणी मंडळाचा भव्य पदग्रहण सोहळा शनिवार, 4 जुलै 2026 रोजी मुंबईत होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम पार पडेल.

*प्रमुख उपस्थिती*  
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत. 

*दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती*  
कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार उपस्थित राहतील. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हेही सहभागी होतील.

आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार बाबुराव कदम कोहलीकर आणि आमदार सत्यजित देशमुख हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. चेअरमन ट्रस्ट बोर्ड आशिष पेडणेकर आणि तत्कालीन माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांचीही उपस्थिती असेल.

*नवे नेतृत्व स्वीकारणार जबाबदारी*  
या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र मानगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, उपाध्यक्ष किरण भोसले, उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने, महेंद्र कैलास अग्रवाल, उपाध्यक्ष संतोष राणे, उपाध्यक्ष सुनिल किर्दक, उपाध्यक्ष सर्जेराव नलावडे, उपाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष सिद्धार्थ रूहाटीया, व्यवस्थापन समितीत निमंत्रित सदस्य वेदांशू पाटील यांच्यासह नवीन कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होईल.

'गाव तिथे उद्योजक' या संकल्पनेला बळ देणारा हा सोहळा चेंबरच्या 100 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

डायसाण फाउंडेशनच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव; 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार – २०२६' प्रदान

डायसाण फाउंडेशनच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव;  'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार – २०२६' प्रदान

मुंबई | प्रतिनिधी

समाजसेवा, रक्तदान जनजागृती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या डायसाण फाउंडेशन (NGO) च्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, संस्थेचे डॉ. अतुल तारासिंग राठोड आणि सौ. वैशाली अतुल राठोड यांना 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार – २०२६' या मानाच्या पुरस्काराने  मुंबईतील मालाड येथे येथे पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात गौरविण्यात आले.

अर्हितांगण रक्त सारथी संस्थान, जालोर (राजस्थान) यांच्या वतीने आयोजित या भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून सामाजिक कार्यकर्ते, रक्तदाते, पत्रकार, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या डायसाण फाउंडेशनने अल्पावधीतच समाजकार्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये २५ हून अधिक भव्य रक्तदान शिबिरे आणि आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करून हजारो नागरिकांना लाभ मिळवून देण्यात संस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे. रक्तदान, नेत्रदान आणि अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठीही फाउंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.

याशिवाय बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योजकतेसाठी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आदिवासी शाळांच्या दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, 'क्लीन येऊर – ग्रीन येऊर' या पर्यावरण संवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान, सामाजिक आरोग्य जनजागृती, गरजू कुटुंबांना विविध प्रकारची मदत तसेच "Pay Back to Society" या संकल्पनेतून समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून डायसाण फाउंडेशनने समाजात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. अतुल तारासिंग राठोड यांनी सांगितले की, "हा सन्मान केवळ माझा आणि माझ्या पत्नीचा नसून डायसाण फाउंडेशनशी जोडलेल्या प्रत्येक स्वयंसेवक, रक्तदाता, सामाजिक कार्यकर्ता, देणगीदार, कॉर्पोरेट सहकारी आणि समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. हा पुरस्कार आम्हाला अधिक जबाबदारीने आणि अधिक व्यापक स्वरूपात समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे."

सौ. वैशाली अतुल राठोड यांनीही हा सन्मान समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला समर्पित करत, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यास कैलाशजी जैन, कु. पियू चव्हाण, अभयकुमार तेलगुडे (श्रीरामपूर), माधव सुभाष पुर्णीकर (नांदेड), अभी बले (पांढरकवडा), श्रीकृष्ण कुमार (मूर्तीजापूर) यांच्यासह विविध राज्यांतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.

डायसाण फाउंडेशनला मिळालेला हा सन्मान संस्थेच्या सातत्यपूर्ण, निःस्वार्थ आणि समाजकेंद्रित कार्याची अधिकृत दखल मानली जात असून, भविष्यातही शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रोजगारनिर्मिती आणि समाजसेवा या क्षेत्रात अधिक व्यापक प्रमाणात कार्य करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगसमूह आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी अशा उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

उरणमध्ये मुसळधार पाऊस; पूरपरिस्थितीत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर स्वतः रस्त्यावर, नागरिकांना दिली मोठी मदत !!

उरणमध्ये मुसळधार पाऊस; पूरपरिस्थितीत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर स्वतः रस्त्यावर, नागरिकांना दिली मोठी मदत !! उरण दि ४, (विठ्ठल म...