Friday, 10 July 2026

कल्याणमध्ये विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात चार विद्यार्थी जखमी !!

कल्याणमध्ये विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात चार विद्यार्थी जखमी !!

 कल्याण : संदीप शेंडगे 

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील मार्टिन चौक येथे गुरुवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रिक्षा कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरातून विद्यार्थ्यांना घेऊन नॅशनल उर्दू शाळेकडे जात होती. रिक्षामध्ये चालकासह सहा विद्यार्थी प्रवास करत होते. सकाळच्या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना समोरून भरधाव वेगाने येणारी बस पाहून रिक्षाचालकाचा क्षणभर ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्यावर उलटली.

या अपघातात चार विद्यार्थ्यांना दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे.

या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

या घटनेनंतर शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शालेय रिक्षांची नियमित तपासणी, चालकांचे प्रशिक्षण आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

माळशेज घाटात दोन कारच्या भीषण धडकेत 4 जण जखमी; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान !!

माळशेज घाटात दोन कारच्या भीषण धडकेत 4 जण जखमी; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान !!

*माळशेज, प्रतिनिधी* : माळशेज घाटातील आंब्याच्या वळणाजवळ समोरासमोर दोन कारच्या भीषण धडकेत 4 जण जखमी झाले आहेत. या अपघात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उल्हासनगर येथून इर्टिगा कारने आपल्या गावी अहिल्यानगरला जात असताना पंढरीनाथ दहातोंडे व वाहनचालक रंजन जाधव हे सोमवारी माळशेज घाटातील आंब्याच्या वळणावर पोहोचले. यावेळी समोरून येणाऱ्या हरीश अमजद पठाण या २१ वर्षांच्या तरुणाने अत्यंत बेपर्वाईने भरधाव वेगात कार चालवत आपली लेन सोडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये प्रवेश करून इर्टिगाला जोरदार धडक दिली.

अपघाताची तीव्रता जास्त असतानाही चालक रंजन जाधव यांनी प्रसंगावधान राखत गाडी नियंत्रणात ठेवल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या धडकेत दोन्ही वाहनांतील 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

*चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात*  
या अपघातात समोरून येणाऱ्या हरीश अमजद पठाण याने निष्काळजी व धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने हा अपघात घडला, असा आरोप इर्टिगाचे चालक रंजन जाधव व प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अशा प्रकारे वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रत्येकदर्शी यांच्या सांगण्यानुसार व रंजन जाधव यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार - सचिन केणी.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा अधिक तीव्र करणार - सचिन केणी.

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे प्रेरणास्थान, राष्ट्रीय नेते स्वर्गीय  लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी यापुढे लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा लोकनेते दी. बा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड -नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र समितीचे कार्याध्यक्ष -सचिन केणी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला असून दिनांक ८ जुलै रोजी पनवेल शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सामील झालेल्या सर्व आंदोलक, ग्रामस्थ, स्थानिक भूमिपुत्र, विविध सामाजिक संस्था संघटना यांचे सचिन केणी यांनी जाहिर आभार मानले.येत्या ३ महिन्यात नाव न दिल्यास गनिमी काव्याने लढून दिबा पाटील साहेबांचे नाव लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार सचिन केणी यांनी केला आहे.

सर्व भूमिपुत्र, बंधू आणि भगिनींनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकतेचे मनापासून आभार.पाऊस, पाणी किंवा कोणतीही परवानगी नसतानाही केवळ आपल्या हक्कासाठी आणि दिबा साहेबांच्या सन्मानासाठी तुम्ही सर्वजण या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालात.त्यामुळे सर्वांचे  पुन्हा एकदा आभार या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रशासनाला आणि सरकारला आमची नम्र विनंती आहे की, आमच्या संयमाचा अंत पाहू नका. आमचा आगरी-कोळी, कराडी,समाज आणि ५ जिल्ह्यांतील तमाम भूमिपुत्र आपल्या न्याय्य हक्कांसाठी कोणत्याही थरापर्यंत संघर्ष करण्यास सज्ज आहेत!
पुढील आंदोलनातही सर्वांनी अशाच प्रकारे मोठ्या संख्येने एकत्र यावे, हीच विनंती.शेवटचा मिशन येत्या ३ महिन्यात नवी मुंबई विमानतळ गनिमी काव्याने बंद करण्यात येईल त्यावेळेस राष्ट्रीयनेते दि. बा. पाटील  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव जाहीर करण्यास सर्व भूमिपुत्र,  केंद्र सरकारला भाग पाडणार.असा इशारा लोकनेते दि. बा पाटील प्रेमी नामकरण संघर्ष समिती तर्फे प्रशासनाला लोकनेते दी. बा पाटील भूमिपुत्र सामाजिक संस्था शिवभूमी रायगड -नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्र समितीचे कार्याध्यक्ष -सचिन केणी यांनी दिला आहे

ICTPL सीएफएस परवाना तातडीने पूर्ववत करा ; आयटीपीएल गेटवर ८५० कामगारांचा एल्गार !!

ICTPL सीएफएस परवाना तातडीने पूर्ववत करा ; आयटीपीएल गेटवर ८५० कामगारांचा एल्गार !!


उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) :
ICTPL (International Cargo Terminal Pvt. Ltd.) च्या सीएफएस परवान्याच्या निलंबनाविरोधात दिनांक ९ जुलै २०२६ रोजी आयटीपीएल गेटवर सुमारे ८५० कर्मचारी, कामगार, कंत्राटी मजूर आणि वाहनचालक यांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आंदोलनादरम्यान झालेल्या सभेत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, तसेच अन्य मान्यवरांनी कामगारांना संबोधित केले. त्यांनी सीएफएस परवान्याच्या निलंबनामुळे शेकडो कामगारांच्या रोजगारावर गदा आली असून त्यांच्या कुटुंबांपुढे उपजीविकेचे गंभीर संकट उभे राहिल्याचे सांगितले.

उपस्थित मान्यवरांनी केंद्र व राज्य सरकार, सीमाशुल्क (Customs) प्रशासन आणि संबंधित विभागांना तातडीने हस्तक्षेप करून ICTPL सीएफएसचा परवाना पूर्ववत करण्याची मागणी केली. कोणत्याही प्रशासकीय किंवा कायदेशीर प्रक्रियेचा फटका निरपराध कामगारांना बसू नये, रोजगार सुरक्षित ठेवावा आणि सीएफएसचे कामकाज लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली.

आंदोलनादरम्यान कामगारांनी एकजुटीचे दर्शन घडवत घोषणाबाजी केली आणि "कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे", "सीएफएस परवाना तातडीने सुरू करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उपस्थित नेत्यांनी संघर्ष शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.सदर आंदोलन शांततेत पार पडले. शेवटी सर्व कर्मचारी, कामगार, मजूर आणि वाहनचालकांनी एकमुखाने ठराव मंजूर करून ICTPL सीएफएसचा परवाना पूर्ववत होईपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार  व्यक्त केला.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर, काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शिवसेना तालुका संघटक बी एन डाकी, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर, पंचायत समिती सदस्य प्रारंभी गावंड, कविता पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते रमाकांत पाटील, ऍड पर्जन्य म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख भूषण ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे उरण उप तालुका अध्यक्ष मुकुंद गावंड, भारतीय जनता पार्टीचे विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड,शिवसेना प्रणित विद्यार्थी सेना रायगड जिल्हा संघटक रोहिदास पाटील,शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर,सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कामगार व शेतकरी वर्गही यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

डॉक्टर - नर्स मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी !!

डॉक्टर - नर्स मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी !!

कल्याण, संदीप शेंडगे : प्रतिनिधी  डोंबिवली येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत १३ जुलै पर्यंत (दोन दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे.

रमेश म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी छातीत दुखत असल्याचे कारण सांगत उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना ज्युपिटर या खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता पाठवण्यात आले होते. मात्र, या घटनेनंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ठाणे सिव्हिल रुग्णालय येथे डॉक्टरांनी आंदोलन करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणात आंदोलन करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत रमेश म्हात्रे यांना अटक केली होती. मात्र कोर्टात हजर केले नाही.
यापूर्वी सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुख्य आरोपी असलेल्या रमेश म्हात्रे यांना वेळेत न्यायालयात हजर न केल्याबद्दल पोलिसांनाही फटकारले होते आणि आरोपीला न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशानुसार आज रमेश म्हात्रे यांना न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे.

या सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Wednesday, 8 July 2026

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै १९४५ साली स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिवस आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व संस्थेचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब अध्यक्षस्थानी होते. तसेच संस्थेचे विश्वस्त-सचिव डॉ. वासुदेव गाडे, पद्मश्री उज्वल निकम, ऍड. बि. के. बर्वे, श्री. अरविंद सोनटक्के, डॉ. वेंकटस्वामी, विपश्यनाचार्य भदंत्त राहुल बोधी व कार्यकारी समितीचे सदस्य श्री. चंद्रशेखर कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे यांनी केले.

मागिल ४ वर्षांपासून या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिग्गजांना, महामहीम राज्यपाल व पीईएसचे अध्यक्ष सन्माननीय आठवले साहेबांच्या हस्ते *'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार'* देऊन सन्मानित करण्यात येते. ती परंपरा कायम ठेवत आजदेखील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व कला- क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या अनेक मान्यवरांचा 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार -२०२६' देऊन त्यांना राज्यपाल व आठवले साहेबांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यामध्ये राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र विधानसभेच्या माजी उपसभापती श्रीमती निलमताई गोऱ्हे, पद्मश्री अशोक (आबा) खाडे साहेब, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ विनय राऊत, सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश खानविलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालवाडी, कोल्हापूरचे संचालक श्री. नंदकुमार गोंधळी, के. जे. सोमय्या विद्याविहार कॉलेजचे प्राचार्य डॉ. किसन पवार, सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विजय मोहिते, महापरिनिर्वाण समन्वय समितीचे सचिव श्री. नागसेन कांबळे, तसेच सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु भंडारे व प्राध्यापक डॉ. विजय मोरे इत्यादीना, प्रमुख पाहुणे महामहीम राज्यपाल व संस्थेचे अध्यक्ष आठवले साहेबांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांनी त्यांच्या भाषणात, आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली, सर्व विश्र्वस्तांच्या सहकार्याने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या देशभरातील विविध शाळा,महाविद्यालये व वसतीगृहांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे केले जात असल्याबद्दल त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. तसेच आठवले साहेबांनीदेखिल त्यांच्या भाषणातून संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा थोडक्यात सादर केला. पीईएसच्या सर्व शाळा महाविद्यालयाचा कार्यभार संस्थेचे सचिव व सर्व विश्र्वस्तांच्या देखरेखीखाली मुख्याध्यापक / प्राचार्य चांगल्या प्रकारे चालवत आहेत त्याबद्दल आठवले साहेबांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पीईएसच्या शाळा व महाविद्यालये सुरू करून बहूजन समाजातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारीत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल असेही आठवले साहेबांनी जाहीर केले.

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वासुदेव गाडे साहेबांनी केल, स्वागतपर भाषण ऍड. उज्वल निकम साहेबांनी केले व ऍड. बि. के. बर्वे साहेबांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले व सर्वांचे आभार मानले. महामहीम राज्यपालांचे स्वागत‌ आठवले साहेबांनी शाल‌, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केले व‌ आठवले साहेबांचे स्वागत पद्मश्री उज्वल निकम साहेबांनी केले. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व विश्वस्तांचे स्वागत पीईएसच्या कार्यकारी समितीचे सदस्य श्री. चंद्रशेखर कांबळे यांनी केले.
 
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून श्री चंद्रशेखर कांबळे सोबत त्यांचे सहकारी  प्रशांत मोरे, धर्मराज ब्राम्हणे व अश्विन वाघ हे प्रत्येक शाळा महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या सर्व शिक्षक कर्मचारी व काही विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी विनंती /आव्हान करत होते. त्याला सिबीडी बेलापूर येथील शाळेचे मुख्याध्यापक, महाड कॉलेजचे प्राचार्य व सिद्धार्थ वाणिज्य व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चांगला प्रतिसाद देऊन त्यांचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती नोंदवली आणि  पीईएसचा ८१वा वर्धापनदिन यशस्वी करण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य केले, त्यांच्याप्रती बर्वे साहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली.

वृत्तांकन - अश्विनी निवाते 

४० वर्षे पुनर्वसन रखडवून शेवा गावठाणावर कोट्यवधींचे उद्यान ?

४० वर्षे पुनर्वसन रखडवून शेवा गावठाणावर कोट्यवधींचे उद्यान ? 

**  जेएनपीए व प्रशासनाविरोधात SIT चौकशीची विस्थापितांची संतप्त मागणी.


उरण  दि ७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शेवा व कोळीवाडा येथील ६२० विस्थापित कुटुंबांनी जेएनपीए आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करत संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. पुनर्वसन न करता मूळ गावठाणावर कोट्यवधी रुपयांची उद्याने व विकासकामे सुरू करून विस्थापितांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. विस्थापितांच्या म्हणण्यानुसार, शेवा बेटावर सुमारे ८०० हेक्टर सुपीक शेती आणि सुमारे २३,५४२ हेक्टर पारंपरिक मासेमारी क्षेत्र होते. या परिसरावर शेकडो कुटुंबांची शेती, मासेमारी, फळबागा, पशुपालन आणि इतर पारंपरिक व्यवसायांवर आधारित उपजीविका होती.

२१ जून १९८४ रोजी शासनाने शेवा व कोळीवाडा गावठाणातील ७.२१ हेक्टर क्षेत्र संपादनासाठी अधिसूचना काढली होती. मात्र, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उरण कार्यालयाने २४ जून २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरात ही जमीन आजपर्यंत संपादित झालेली नसल्याची लेखी माहिती दिल्याचा दावा विस्थापितांनी केला आहे.

याउलट, १७ फेब्रुवारी १९९० आणि १७ मार्च १९९० रोजी काढण्यात आलेल्या दोन आज्ञापत्रांमध्ये शेवा व कोळीवाडा गावठाण विनामूल्य संपादित करून त्याबदल्यात बोरीपाखाडी व बोकडविरा येथे पर्यायी जमीन दिल्याचा उल्लेख आहे. ही दोन्ही आज्ञापत्रे बनावट असल्याचा गंभीर आरोप विस्थापितांनी केला असून, त्याच आधारे गेली ४० वर्षे ६२० प्रकल्पग्रस्त कुटुंबांची दिशाभूल, फसवणूक आणि पुनर्वसनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

विस्थापितांनी असा आरोप केला आहे की, संबंधित बनावट आज्ञापत्रांचा आधार घेत जेएनपीए आणि पुनर्वसन प्रशासनाने पुनर्वसनाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. त्यामुळे शेकडो कुटुंबांचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क बाधित झाले.

दरम्यान, ८ डिसेंबर २०२५ रोजी शासनाला सादर करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात बोरीपाखाडी येथील उपलब्ध करून दिलेली जमीन अपुरी असल्याची नोंद असून, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ झाल्याचे नमूद असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विस्थापितांच्या आरोपानुसार, पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न काढता जेएनपीए प्रशासनाने  शेवा मूळ गावठाण परिसरात मंदिरांचा जीर्णोद्धार, उद्यान व सुशोभीकरणासाठी सुमारे ₹१३.१४ कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. संबंधित ठेकेदारांकडून प्रत्यक्ष कामेही सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विस्थापितांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तसेच संपूर्ण प्रकरणाची एस आय टी (SIT) मार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी व विभागीय कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

कल्याणमध्ये विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात चार विद्यार्थी जखमी !!

कल्याणमध्ये विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात चार विद्यार्थी जखमी !!  कल्याण : संदीप शेंडगे  कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरा...