"तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे" पासून "कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं" पर्यंतचा सिने-गीतकार सागर पवार यांचा प्रेरणादायी प्रवास" !!
अनेक गाणी आपल्या नेहमीच ओठांवर असतात. आपण ती ऐकतो, गुणगुणतो; मात्र त्या गाण्यांच्या मागे असलेल्या गीतकारांचा शोध फार कमी वेळा घेतला जातो. अशाच असंख्य लोकप्रिय गीतांचे प्रतिभावान कवी-गीतकार म्हणजे सागर पवार.
फुले, शाहू आणि आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी तसेच सांस्कृतिक चळवळ बळकट करण्यासाठी कवींनी मोठे योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गाण्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचे कार्य अनेक कलाकारांनी केले. त्यामध्ये ज्येष्ठ कवी सागर पवार यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे सागर पवार यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना लेखनाची विशेष आवड होती. त्यांनी ही आवड जपली आणि लेखणीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आय.टी.आय.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर १९८७ साली सेंट्रल रेल्वेमध्ये त्यांना नोकरी मिळाली. १९९० मध्ये त्यांनी भोपाळ येथे सेवा बजावली, तर १९९४ मध्ये त्यांची बदली कल्याण येथे झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून लेखनाची प्रेरणा अधिक दृढ झाली. १९८८ मध्ये गायक कृष्णा शिंदे यांच्या कॅसेटसाठी त्यांनी पहिले गीत लिहिले. १९९० मध्ये "भीमा तुझी पुण्याई" हा त्यांचा पहिला अल्बम प्रदर्शित झाला आणि आंबेडकरी चळवळीत त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर "कोहिनूर दलितांचा" हा अल्बम विशेष गाजला.
१९९३-९४ दरम्यान टी-सीरीजसारख्या नामांकित कंपनीसाठी त्यांनी विविध विषयांवर अनेक गीते लिहिली. २००१ मध्ये त्यांनी लिहिलेले "भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात" हे गीत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. सागर पवार यांनी आपल्या लेखणीतून अनेक अजरामर गीते दिली. त्यांपैकी काही गाजलेली गीते म्हणजे: "तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे", "भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात", "तुझ्या पाळण्याने साऱ्या जगाला हलविलं". सध्या भीम जयंती उत्सवात सर्वत्र गाजणारे गीत म्हणजे "कुणी नाही केलं भलं व माय, भीमानं केलं… दिल्लीचं दालन खुलं व माय, भीमानं केलं…". हे गीत महागायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजात महाराष्ट्रासह राज्याबाहेरही लोकप्रिय झाले आहे. तसेच बाहेरच्या देशातसुद्धा त्यांची गाणी लाेकप्रिय ठरली आहेत. ही जादू सागर पवार यांच्या प्रभावी लेखणीचीच आहे.
विशेष म्हणजे, सागर पवार यांनी आपल्या लेखणीतून ११ हजारांहून अधिक गीते लिहिली आहेत. त्यापैकी ४ हजार गीते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहेत. तसेच लोकगीते, भीमगीते, प्रबोधनपर गीते आणि विविध सामाजिक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी ३२ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. त्यांच्या गीतांना सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, रवींद्र साठे, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, सुदेश भोसले, अवधूत गुप्ते, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, वैशाली सामंत, बेला शेंडे यांसारख्या अनेक दिग्गज गायक-गायिकांनी स्वर दिले आहेत.
संगीतकार अशोक पत्की, कमलेश जाधव, मधू रेडकर, श्रीरंग आरस, अशोक वायंगणकर यांच्यासह अनेक मान्यवर संगीतकारांचा त्यांना सहवास लाभला. टी-सीरीज, व्हिनस, सम्राट म्युझिक, अल्ट्रा, शेमारू, नोकिया म्युझिक, कुणाल म्युझिक अशा विविध कंपन्यांनी त्यांची गीते प्रकाशित केली.
फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार आणि सामाजिक प्रबोधन घराघरात पोहोचविण्यासाठी सागर पवार यांनी आपल्या लेखणीतून मोलाचे योगदान दिले आहे. "समाजप्रबोधनासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लेखणी चालवत राहीन", अशी भावना मुलाखत देताना माझ्याकडे व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला सलाम.
लेखक : कवी, पत्रकार – मिलिंद सुरेश जाधव
पडघा, भिवंडी मो. ८६५५५६९४३६