Tuesday, 5 May 2026

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!


उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि रस्त्यांवरील शिस्तीसाठी नवी मुंबई पोलीस, उरण वाहतूक शाखेने सम-विषम तारीख पार्किंग पद्धत लागू केली आहे. उरण नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला सम आणि विषम तारखांचे पार्किंग बोर्ड लावण्यात आले असून नागरिकांनी त्यानुसारच वाहने पार्क करावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक, उरण वाहतूक शाखा यांनी केले आहे. 

नव्या नियमानुसार, ज्या ठिकाणी सम तारखांचे म्हणजेच २, ४, ६, ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३० या तारखांचे बोर्ड लावले आहेत, तिथे फक्त त्या सम तारखांनाच वाहने पार्क करता येतील. तर जिथे विषम तारखांचे म्हणजेच १, ३, ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९, ३१ या तारखांचे बोर्ड लावले आहेत, तिथे फक्त त्या विषम तारखांनाच पार्किंगची परवानगी असेल. या बोर्डांशिवाय इतर ठिकाणी किंवा चुकीच्या दिवशी वाहन पार्क केल्यास मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. 

उरण शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेशिस्त पार्किंगमुळे आपत्कालीन वाहने, बस आणि रुग्णवाहिकांना मार्ग मिळणे कठीण होत होते. ही समस्या लक्षात घेऊन उरण नगरपालिका व वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. सम-विषम पार्किंगमुळे रस्त्याच्या एकाच बाजूला वाहने लागतील व दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोकळी राहील, त्यामुळे कोंडी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून उरण शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होईल, असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे

श्रावणी ठाकूरचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

श्रावणी ठाकूरचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) :
बेलपाडा येथील श्रावणी संतोष ठाकूर हिने रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्युनियर सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, बोरी, उरण येथे बारावी वाणिज्य शाखेत पहिला क्रमांक मिळविला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश संपादन केले आहे. सोमवारी (ता. ४) तिने आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी तिचे मनापासून अभिनंदन केले, तिचा शाल आणि पुस्तके भेट देऊन सन्मान केला. यावेळी तिची आजी सरिता ठाकूर, संतोष ठाकूर उपस्थित होते. "शैक्षणिक क्षेत्रांत उत्तुंग भरारी घे, पुढील शिक्षणासाठी शक्य ते सहकार्य मी करणार, तू फक्त अभ्यास कर," असे महेंद्रशेठ घरत यांनी श्रावणी ठाकूर हिला आश्वासित केले.

सरिता ठाकूर यांची दुसरी नात गौरी दर्शन ठाकूर हिला महेंद्रशेठ घरत यांनी दत्तक घेतले आहे. गेली तीन वर्षे तिचा सर्व खर्च महेंद्रशेठ घरत करीत आहेत. यावेळी सरिता ठाकूर म्हणाल्या, "महेंद्रशेठ घरत यांच्यासारखा देवदूत आमच्यासोबत आहे. नाही तर मला धुणी-भांडी करून घर चालवावे लागले असते. केवळ महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच आम्ही सुखाने जगतोय. माझ्या गौरीला तीन वर्षांत काहीही कमी पडले नाही. आता दुसऱ्या नातीलाही ते शिक्षणासाठी मदत करणार आहेत. त्यांचे मी आभार कसे मानू समजत नाही, परमेश्वर महेंद्रशेठ घरत यांना सतत हसतमुखानेच ठेवू दे," अशी मी देवाजवळ प्रार्थना करीत आहे.

MMRDA नवनगर तीसरी मुंबई शेतकऱ्यांच्या साठी शाप की ऊशाप !!

MMRDA नवनगर तीसरी मुंबई शेतकऱ्यांच्या साठी शाप की ऊशाप !!

** शेतकऱ्यांचा तिसऱ्या मुंबईला विरोध.

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : शासनाच्या विविध धोरणामुळे व भू (जमीन) संपादन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून कोणत्याही प्रकल्प किंवा शासनाच्या निर्णयात शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडुन होत आहे.

महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्ह्यातील पेण पनवेल उरण या तीन तालुक्यातील १२४ गावात तिसरी मुंबई नवनगर प्रकल्प बसविण्या ची अती घाईने अधिसूचना २०२४ मध्ये जारी केली होती त्या प्रकल्पा ला १२४ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत त्यांच्या हरकती मागविल्या होत्या त्या प्रमाणे शेतकऱ्यांनी वेळेत १९००० हून अधिक शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या त्यावर सुनावणी न घेता पुढील कारवाई रेटून दिनाक १६/४/२०२६ रोजी आदेश देऊन दिनांक २७/४/२०२६ रोजी ऑन लाईन भूसंपादन करण्यास सुरूवात केली आहे पण  १२४ गावातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता १९००० शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकती वर सुनावणी न घेता शेतकऱ्यां च्या भावना , मागण्या विचारात न घेता हा प्रकल्प लादला जात आहे त्याचा समर्थन करणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

सदरच्या प्रकल्पात शेतकऱ्यांची पिढ्या न पिढ्या वडील, आजोबा पणजोबा नी राखून ठेवलेल्या जमिनी  इतक्या सोप्या पद्धतीने कश्या देतील. आज १२४ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीत लाखो राहाती घर आहेत त्याच जमिनीत शेतकऱ्यांचे कुटुंब रोजी रोजगार निर्माण करून अनेक शेती सह धंदे करून पोटभर अन्न खाऊन जगत आहेत त्यांना सरकारने काढलेल्या आदेशाने स्वतःच्या नावे मालक असलेल्या जमिनी देऊन बाहेर काढले जात आहे हे इतके सोपे आहे का ? दिनाक १६/४/२०२६ रोजी जे शासन निर्णया मध्ये जे कायदे दाखवून जमिनी संपादित करण्यासाठी अध्यादेश जारी केले आहेत ते १२४ गावातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत त्याला शेतकरी बळी पडणार असे जर शासनाला वाटत असेल तर त्या शासनाची घोर चूक आहे. पहिले मुंबई त्या नंतर नवी मुंबई, त्या नंतर पनवेल उरण येथील सिडको या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांची झालेली फसवणूक लक्षात घेता आता MMRDA नवनगर तीसरी मुंबई परिसरातील शेतकरी आता जागृत झाला आहे  सरकार च्या २२, ५%भूखंड FSI आणि TPR आणि रेडिनेकर प्रमाणे मोबदला या धोरणाला शेतकरी बळी पडणार नाही.शेतकऱ्यांची जमीन सरकार कवडी मोल लाखात घेणार आणि ती शेती विकासाच्या नावावर परकीय गुंतवणूक करणाऱ्यांना देणार आणि परकीय लोक कोटी च्या भावत विकणार आणि परकीय लोक त्या शेतीच्या मध्ये गडगंज श्रीमंत होणार आणि शेतकरी देशोधडीला लागणार हे मनसुबे शासनाचे आहेत ते आम्ही शेतकरी हाणून पडणार आम्हाला आमची जमीन पाहिजे आम्हाला आमची काळी आई महत्त्वाची आहे. MMRDA नवनगर तीसरी मुंबई साठी आम्ही आमची जमीन देणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.आता नो काँप्रमाईज ,जमीन आमच्या हक्कांची नाही कुणाच्या बापाची, जय जवान जय किसान असा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !!

देवरुखात रंगला महिला आणि कामगार दिनाचा सोहळा !!

** चार महिलांना हिरकणी, पाच अधिकारी यांना कार्यक्षम
अधिकारी, तर तीन कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

कोकण, (शांताराम गुडेकर) :
               १ मे कामगार दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लोकनिर्माण वृत्तपत्राच्या वतीने चार महिलांना हिरकणी, पाच अधिकारी यांना कार्यक्षम अधिकारी, तर तीन कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये लांजा येथील भाकर संस्थेच्या सुरभी वाडकर, देवरुख नगरपंचायतीत सतत दोन वेळा नगराध्यक्ष पद भुषविणाऱ्या मृणाल शेट्ये, बीएसएनएल च्या दिप्ती सावंत, शिक्षण क्षेत्रातील स्नेहल यशवंतराव यांना हिरकणी  पुरस्कार, तर संगमेश्वर तालुक्याच्या तहसीलदार अमृता साबळे मॅडम, संगमेश्वर पंचायत समितीचे सहायक गटशिक्षणाधिकारी विनोदकुमार शिंदे, देवरुख आयडीबीआय बॅंकेचे व्यवस्थापक प्रतिक मनवानी, सैन्यदलातील सुरेश शिंदे, चिपळूणातील शिक्षण आणि आयुर्वेदिक क्षेत्रातील जगदीश थरवळ गुरुजी यांना कार्यक्षम अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पशुसंवर्धन खात्यातील कर्मचारी विजय कांबळे, एसटी कर्मचारी सुरेश धने, स्वयं फौंडेशनचे राहूल घोलम यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
                यावेळी पुरस्कार स्विकारल्या नंतर पुरस्कारकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर लोकनिर्माण वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
                कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण, प्रशासनातील कार्यक्षमता आणि कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.हा सन्मान सोहळा लोकमान्य वाचनालय देवरुख येथे आयोजित करण्यात आला होता.
                 या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक तथा लोकनिर्माण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कासार, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. दादा अनेराव, तहसीलदार अमृता साबळे, देवरुखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, युयुत्सु आर्ते तर उपस्थितांमध्ये  लोकनिर्माण वृत्तपत्राचे प्रतिनिधी सत्यवान विचारे, धनंजय भांगे, संतोष शिंदे, अंकुश पोटले, रुपेश चवंडे, मैहरुन्निसा साखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यकर्माचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले.

Monday, 4 May 2026

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. डोंगर-दऱ्यांतून वळणावळणांनी जाणारा हा मार्ग केवळ भौगोलिक नव्हे, तर इतिहासाचा साक्षीदार आहे. या घाटाशी निगडित एक तेजस्वी, पण दुर्लक्षित नाव म्हणजे सिंग्रोबा धनगर.लोककथांमधून जिवंत राहिलेला हा वीर केवळ मार्गदर्शक नव्हता, तर देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि त्याग यांचा जिवंत आदर्श होता. 

सिंग्रोबा धनगर हे सह्याद्रीच्या कठीण भौगोलिक रचनेत वाढलेले धनगर समाजातील व्यक्तिमत्व होते. मेंढपाळीच्या कामातून त्यांना डोंगर-दऱ्यांची, वाटांची, हवामानाची आणि भूभागाची अचूक ओळख होती. आज ज्या अचूकतेने आपण “गूगल मॅप” वापरतो, त्याच अचूकतेने त्या काळी धनगर समाजातील लोक प्रवाशांना मार्ग दाखवत असत. सिंग्रोबा हे त्यातीलच एक विलक्षण ज्ञान असलेले मार्गदर्शक होते. त्यांनी खंडाळा घाटातील गुंतागुंतीच्या वाटा ओळखून सुरक्षित मार्ग शोधून काढला, ज्यामुळे प्रवाशांना आणि व्यापाराला मोठी मदत झाली. 

लोकपरंपरेनुसार, इंग्रजांनी हा घाट मार्ग उभारण्यासाठी सिंग्रोबा धनगर यांची मदत घेतली. त्यांच्या ज्ञानामुळे खंडाळा घाटाचा मार्ग सुकर झाला. या कार्याबद्दल इंग्रजांनी त्यांना बक्षीस देऊ केले. परंतु सिंग्रोबांनी अत्यंत स्वाभिमानाने उत्तर दिले—“मी धनगर, म्हणजे धनाचा धनी आहे; मला काही नको. तुम्ही फक्त आमचा भारत देश सोडून जा.” हा संवाद त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कणा दर्शवतो—त्यांना संपत्तीची लालसा नव्हती; त्यांना हवी होती ती मातृभूमीची स्वातंत्र्य. 

याच कारणामुळे, असेही सांगितले जाते की इंग्रजांनी त्यांच्या देशभक्तीमुळे आणि नकारामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हा प्रसंग अधिकृत इतिहासात ठळकपणे नोंदलेला नसला, तरी लोककथांमध्ये तो अत्यंत जिवंत आहे. अशा कथांमधून समाजाच्या स्मृतीत साठवलेले सत्य, त्या काळातील संघर्ष आणि लोकांच्या भावविश्वाचे प्रतिबिंब दिसते. सिंग्रोबा धनगर यांचा त्याग हा अशाच लोकस्मृतीतून जपला गेलेला एक प्रेरणादायी अध्याय आहे. 

आज खंडाळा घाटातून प्रवास करताना “सिंग्रोबा मंदिर” आणि त्या परिसरातील स्थानिक श्रद्धा या त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देतात. प्रवासी क्षणभर थांबून नमस्कार करतात, कारण त्यांना ठाऊक आहे की या मार्गामागे कोणाचा तरी कष्ट, ज्ञान आणि त्याग दडलेला आहे. हा केवळ धार्मिक भाव नाही, तर इतिहासाबद्दलचा आदर आहे. 

दुर्दैवाने, अशा अनेक लोकनायकांची माहिती मुख्य प्रवाहातील इतिहासात फारशी दिसत नाही. अभ्यासक्रमात त्यांचा उल्लेख नसल्यामुळे नव्या पिढीपर्यंत त्यांची गाथा पोहोचत नाही. त्यामुळेच आज गरज आहे की सिंग्रोबा धनगर यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांना योग्य स्थान मिळावे. त्यांच्या कार्याची शास्त्रशुद्ध नोंद व्हावी, संशोधन व्हावे आणि त्यांच्या योगदानाची जाणीव समाजाला व्हावी. 

खंडाळा घाटाच्या “मिसिंग लिंक” प्रकल्पाला सिंग्रोबा धनगर यांचे नाव देणे ही केवळ एक नामफलकाची बाब नाही; ती त्यांच्या कार्याची कृतज्ञतेने केलेली दखल ठरेल. हा निर्णय पुढील पिढ्यांना त्यांच्या इतिहासाची जाणीव करून देईल आणि देशभक्तीचा संदेश देईल. 

इतिहास केवळ पुस्तकांत नसतो; तो लोकांच्या स्मृतीत, परंपरांत आणि कथांमध्ये जिवंत असतो. सिंग्रोबा धनगर यांची कथा ही त्याच जिवंत इतिहासाचा भाग आहे. त्यांच्या त्यागाची, स्वाभिमानाची आणि देशप्रेमाची गाथा आपण जपली पाहिजे, पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. कारण अशा वीरांच्या कथा आपल्याला केवळ भूतकाळ सांगत नाहीत, तर वर्तमानाला दिशा देतात आणि भविष्याला प्रेरणा देतात. 

सिंग्रोबा धनगर—एक नाव, एक मार्गदर्शक, आणि एक अजरामर दीपस्तंभ. त्यांची माहिती संपूर्ण विश्वाला झाली पाहिजे. त्यांचे उदाहरण म्हणजे एका उत्तम देशभक्ती चे उदाहरण आहे. त्यांनी स्वतः साठी काही मागितले नाही तर, संपूर्ण भारतीयांसाठी मागितले.. मला धन, दौलत नको, मी धनाचा धनी म्हणजे धनगर आहे, मला फक्त माझा देश स्वतंत्र हवा, तुम्ही येथे थांबू नका. किती महान विचार होते. त्यांच्या परिवाराबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्यांचे गाव तेथेच पायथ्याशी असलेले शिवोली असे सांगतात, त्यांना ३ भाऊ होते, त्यांनीच त्या ठिकाणी दगड ठेवला, जेथे इंग्रजांनी सिंग्रोबा धनगरास गोळ्या घालून ठार केले. आता तेथे एक छोटे मंदिर बांधले आहे.पूर्वी पासून धनगर लोक काटक होती, मैत्रीत जीव देत होती, प्रामाणिक, निष्ठावान, देशप्रेमी होती. त्यांच्या इतके कार्य कोणाचे नाही. पण तरीही त्यांचा इतिहास काही नोंद घेत नाही, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा इतिहास अजूनही समावेश केलेला नाही? का असे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर यांच्याबद्दल ही लोकांना माहिती नाही.. त्यांच्यावर कविता, लेख लिहायला सांगितले की, त्यांची इच्छा होत नाही असे जाणवते? काही झाले तरी, न्याय हा मिळाला पाहिजेच. ज्यांनी खंडाळा घाट मार्ग शोधला, दाखविला त्यांचा म्हणजे सिंग्रोबा धनगर यांचेच नाव त्या मिसिंग लिंकला मिळायला हवेच. तरच समानता, योग्य मिळाला सारखे होईल. ज्यांचे कार्य, त्यांनाच त्याचे श्रेय मिळायला हवेच. कार्य एकाने करायचे, नाव दुसऱ्यांचे द्यायचे हे कितपत योग्य. थोडी तरी माणुसकीची जाणीव हवी, विचार आपले पारदर्शक हवे, अभ्यासू वृत्ती हवी, विशाल दृष्टी हवी. तरच अचूक न्याय मिळेल. माझा भारतीय लोकशाहीवर विश्वास आहे, ते अचूक न्याय देतील.

सौ.प्रतिमा अरुण काळे/खेमनर
निगडी प्राधिकरण,पुणे ४४
मो. न.९४०५०४२९३८

Sunday, 3 May 2026

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
१ मे जागतिक कामगार दिना निमित्ताने नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस कडून राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला आय टी एफ चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर तथा इंटकचे राष्ट्रीय सविक राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा कडाडून विरोध केला व आम्ही सर्व नेते कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहू असे कामगारांना आश्वाशित केले.

या परिषदेसाठी आय टी एफ लंडनचे जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन, एसीया पॅसिफिक रिजनल सेक्रेटरी अब्दुल गनी सारंग, नेपाल कॉंग्रेस अध्यक्ष गगन थापा, कॉंग्रेस जेष्ठ नेते शेखरजी कोईराला, नेपाळ ट्रेड युनियनचे अध्यक्ष योगेंद्र कुमार, नेपाळ ट्रेड युनियन तथा आय टी एफ चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर अजयकुमार राय आदी उपस्थित होते, या परीषदेनंतर महेंद्रशेठ घरत यांनी नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेलजी यांची भेट घेतली. नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस तर्फे परीषदेचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले होते

प्रियांशी आशाराम जामनेरकर उरण तालुक्यातून प्रथम !!


प्रियांशी आशाराम जामनेरकर उरण तालुक्यातून प्रथम !!

** सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि ३(, विठ्ठल ममताबादे) :
 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाचा दिवस तसा कौतुकाचा आणि आनंदाचा होता सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत असताना अकोला जिल्ह्यातील अनकवाडी या छोट्याशा गावातील कुमारी प्रियांशी आशाराम जामनेरकर या विद्यार्थिनीने मुंबईत विभागातील उरण या तालुक्यात आपली बाजी मारली आहे. उरण येथील सिटीजन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये ८७.५०% गुण घेत घवघवीत यश प्राप्त करून सायन्स शाखेतून उरण तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपेक्षित गुणवंत विद्यार्थिनीचे नाव कुमारी प्रियांशी आसाराम जामनेरकर असून सिटीजन हायस्कूल ज्युनिअर कॉलेज उरण येथे शिक्षण घेऊन शिक्षक सादिक सर, शैलेंद्र प्रजापती, नरेंद्र पाटील ,प्रमोद पाटील , व साजिया मामी यांच्या मार्गदर्शनाखाली व विवेकानंद येथील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षक दत्तात्रय शेळके , मयूर पाटील,आदित्य सर यांचे मार्गदर्शन घेऊन उत्तम अभ्यास करून तालुक्यातील पहिला क्रमांक पटकावला आहे. 

प्रियांशी चे वडील शेतकरी असून उरण येथे एसटी बस चालक आहेत व आईचे वडापावचे दुकान आहे.तिने दहावीपर्यंत जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतले. स्नितिल पडते  यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरा क्रमांक दहावीत पटकावला होता. पुढे प्रियांशीला इंजीनियरिंग करायची आहे असे तिथे ठरविले आहे. कम्प्युटर सायन्स किंवा आर्टिफिशल इंटेलिजन्स या ब्रांच मध्ये  पुढचे करिअर तिला करायचे आहे. सायन्स शाखेतून प्रियांशी आशाराम जामनेरकर ही उरण तालुक्यातून प्रथम आल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...