Monday, 6 July 2026

कल्याण-डोंबिवलीला पावसाने झोडपले !!

कल्याण-डोंबिवलीला पावसाने झोडपले !!

पाच दिवस सतत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत 

कल्याण, संदीप शेंडगे : गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरासह परिसराला अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, गल्लीबोळ आणि चौक जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सततच्या पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. एमआयडीसी परिसरातही पाणी साठण्यास सुरुवात झाली असून काही कारखान्यांमध्ये पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, बारवी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन नागरिकांना केले आहे. अधिकृत माहिती केवळ प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांवरूनच स्वीकारावी, असेही सांगण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे बैल बाजार, गांधारी, अटाळी, शहाड वडवली, टिटवाळा तसेच इतर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी घरांच्या परिसरातही पाणी शिरल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर यंत्रणा सतर्क असून पाणी उपसा, झाडे हटविणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना मदत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाची तीव्रता कायम असल्याने प्रशासनाने अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व पाण्याने भरलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भिवंडीत पावसाचा बळी; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून बेपत्ता !!

भिवंडीत पावसाचा बळी; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून बेपत्ता !!

चविंद्रा येथील काळा दगड नदीत दुर्घटना; आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू, नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
 
प्रतिनिधी,भिवंडी 
दि. ६ जुलै २०२६

भिवंडीतील गैबी नगर परिसरातील १७ वर्षीय मोहम्मद गौस हा तरुण चविंद्रा गावाजवळील काळा दगड नदीत बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली असताना खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या या तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद गौस हा आपल्या तीन ते चार मित्रांसह चविंद्रा परिसरातील काळा दगड नदीच्या काठावर खेकडे पकडण्यासाठी गेला होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला असून पाण्याची पातळी आणि प्रवाह दोन्ही धोकादायक झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीत उतरलेल्या मोहम्मद गौस याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि प्रवाहात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत मोहम्मद गौस याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीचा वेग वाढला असून पाण्याचा प्रवाह अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे बचाव कार्यातही अनेक अडचणी येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, पावसाळ्यात नदी, नाले, ओढे तसेच पाणी साचलेल्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, कोणत्याही परिस्थितीत पाण्यात उतरू नये आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

भिवंडीत मुसळधार पावसाचा कहर; तीनबत्ती जलमय, शहरातील अनेक भागांत झाडे कोसळून जनजीवन विस्कळीत !!

भिवंडीत मुसळधार पावसाचा कहर; तीनबत्ती जलमय, शहरातील अनेक भागांत झाडे कोसळून जनजीवन विस्कळीत !!

दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान; नालासफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाची दिवसभर धावपळ

प्रतिनिधी, भिवंडी दि. ६ जुलै २०२६

सोमवार सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भिवंडी शहराला अक्षरशः झोडपून काढले. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून तीनबत्ती परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय शहरातील विविध भागांत झाडे व मोठ्या फांद्या कोसळल्याने अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिवसभर बचाव व मदतकार्य करावे लागले.

तीनबत्ती परिसरात साचलेल्या पाण्यामुळे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. नागरिकांना कंबरभर पाण्यातून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागला. अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्यापाऱ्यांनी जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींमुळे दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली.

स्थानिक नागरिकांनी वेळेत नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील ५० ते ६० टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता. उर्वरित कामही पावसापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी मॅनहोलमधून रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, मुसळधार पावसासोबतच शहरातील विविध भागांत झाडे व फांद्या कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. धामणकर नाका रोडवरील कमला हॉटेलजवळ मोठे झाड रस्त्यावर कोसळले. तसेच महावीर चौक-अंजूरफाटा मार्गावरील हरिहर बिल्डिंगसमोरही झाड पडल्याची घटना घडली. चविंद्रा आणि भादवड परिसरातही झाडे व मोठ्या फांद्या कोसळल्यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ती हटवून वाहतूक सुरळीत केली.

भवानीनगर-कामतघर येथील साईराज बिल्डिंगजवळील विशाल पिंपळाचे झाड संरक्षक भिंतीवर कोसळून टेकल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. संबंधित भिंत कोसळल्यास परिसरातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने बचावात्मक उपाययोजना सुरू केल्या.

सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, हवामान विभागाने पुढील काळातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खराब हवामानाच्या काळात जुन्या झाडांखाली, धोकादायक भिंतींजवळ तसेच जीर्ण इमारतींच्या परिसरात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग किंवा अग्निशमन दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

चक्री वादळाचा फटका ; जेएनपीटी पोर्ट मध्ये अंगावर कंटेनर पडून एका कामगारांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी !!

चक्री वादळाचा फटका ; जेएनपीटी पोर्ट मध्ये अंगावर कंटेनर पडून एका कामगारांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी !!

** दोषीवर कारवाई करण्याची मागणी.

उरण दि ६, (विठ्ठल ममताबादे) :
उरण मध्ये सतत जोरदार पाऊस सुरु असून मुसळधार पावसानंतर शनिवारी मध्यरात्री उरण तालुक्यात वादळी वाऱ्याने जोरदार धुमाकूळ घातला. सतत सुरु असलेल्या वादळी वाऱ्याचा फटका जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरणातील (JNPA) एनएसएफटी (NSFT) टर्मिनलला बसला असून, येथे  रचून ठेवलेले रिकामे कंटेनर अचानक कोसळून एका १९ वर्षीय तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना सोमवारी दिनांक ६ जुलै रोजी सकाळी झाल्याचे काही प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे.अमितकुमार किशोर प्रसाद (वय १९, रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. दरम्यान, या गंभीर दुर्घटनेबाबत अधिकृत यंत्रणांनी मौन बाळगल्याने माहिती दडवली जात असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. सदर माहिती बाबत जेएनपीटी (जेएनपीए) प्रशासन तसेच पोलीस प्रशासनातर्फे कोणतेही त्वरित अधिकृत माहिती मिळाली नसल्याने या अपघाताचे गूढ अधिकच वाढत आहे. पोलीस प्रशासनाकडे फोन द्वारे चौकशी केली असता एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे व अधिक तपास सुरु असल्याचे एवढेच सांगण्यात आले. मात्र एवढी मोठी दुर्घटना घडली तरी वेळेत आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी कर्मचारी वर्ग तिथे पोहोचायला पाहिजे. तसे या घटनेत दिसून येत नाही. कोणतेही इमरजेन्सी (तात्काळ) मदत न मिळाल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

समुद्र किनारी असलेल्या वेसेल वर कंटेनर समुद्रातील जहाजात भरताना हा अपघात घडले असल्याचे बोलले जात आहे.मयत कर्मचारी अमितकुमार किशोर प्रसाद याचा मृतदेह उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालायात नेण्यात आला असून, तेथे मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. याबाबत न्हावा - शेवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेतून जेएनपीए प्रशासनाच्या अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. विविध त्रुटी मुळे एका कामगाराचा मृत्यू व दोघे गंभीर जखमी झाल्याने दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे .

मा. आमदार किरण पावसकर यांनी जेष्ठ नागरिकांना दिली खुर्च्या आणि छत्रीची भेट !;

मा. आमदार किरण पावसकर यांनी  जेष्ठ नागरिकांना दिली खुर्च्या आणि छत्रीची भेट !!

मुंबई(शांत्ताराम गुडेकर/समीर खाडिलकर ) 
                 शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या न्याय - हक्कासाठी  सतत कार्यरत असलेले श्री. किरण पावसकर (मा.आमदार, शिवसेना सचिव, शिवसेना प्रवक्ते, अध्यक्ष -राष्ट्रीय कर्मचारी सेना) यांनी ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना खुर्च्या आणि पावसाळा लक्षात घेऊन छत्र्या देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली.तर ईशान्य मुंबईतील १५ जेष्ठ नागरिकांसह जेष्ठ पत्रकार,मुक्त पत्रकार व श्रमिक पत्रकार यांना छत्री वाटप (वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) केले. आज (दि.६ जुलै २०२६ रोजी) पावसाळ्यात बसण्याची सोय व्हावी म्हणून घाटकोपर, बंबखाना, अमृत नगर येतील रस्त्यावर रहाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना खुर्ची भेट देत मदतीचा हात दिला.नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो. आणि बऱ्याचदा ज्येष्ट नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते.आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात.ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत कामगारांच्या न्याय -हक्कसाठी सतत कार्यरत असलेले श्री. किरण पावसकर (मा.आमदार, शिवसेना सचिव, शिवसेना प्रवक्ते,अध्यक्ष -राष्ट्रीय कर्मचारी सेना) यांनी  बोलताना व्यक्त केले .ख्रिसमस, इयर एन्ड, न्यू इयर आणि गुलाबी थंडी, एकीकडं पावसाचा आनंद लुटण्यासाठी प्लान आखले जातायत तर दुसरीकडं रस्त्यावर राहणा-यांसाठी मात्र पाऊस, थंडी  जीवघेणी ठरतेय.म्हणून त्यांनी हा मदतीचा हात दिला. 

ईशान्य मुंबईतील घाटकोपर,विक्रोळी येथे गरजवंत जेष्ठ नागरिकांना मदत केल्याबद्दल अनेकांनी माजी आमदार किरण पावसकर  यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले.तर अमृत नगर, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांकडून त्यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.

Sunday, 5 July 2026

रामनगर ट्रान्झिट कॅम्प येथे वडाचे विशाल झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली !!

रामनगर ट्रान्झिट कॅम्प येथे वडाचे विशाल झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली !!

घाटकोपर, (केतन भोज) : सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाटकोपर (पश्चिम) येथील रामनगर अ ट्रान्झिट कॅम्प परिसरात रविवारी वडाचे मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.रामनगर 'अ' हा परिसर मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.झाड कोसळण्याच्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.मात्र,सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मुके आणि करण इंगवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.तसेच त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एन' विभागाला घटनेची माहिती देत झाड हटविण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.या घटनेमुळे परिसरातील रहदारी व वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Saturday, 4 July 2026

मुसळधार पावसामुळे उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन जलमय ; रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांचा तीव्र संताप !!

मुसळधार पावसामुळे उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन जलमय ;  रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांचा तीव्र संताप !!

उरण, दि. ३ , (विठ्ठल ममताबादे) :: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि ढिसाळ नियोजनाचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

स्टेशन परिसरातील जिने, पायऱ्या आणि प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने रेल्वे प्रशासनाचा कारभार केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

उरण परिसरात रेड अलर्ट असतानाही स्टेशन परिसरात पाणी साचण्याची समस्या कायम राहिल्याने प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असताना कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेशी सर्रास खेळ केला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, हजारो प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करत असताना त्यांच्या जीविताची कोणतीही पर्वा नसल्याचे चित्र दिसत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत रेल्वेत चढावे लागत असून, एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला तातडीने जागे होण्याचे आवाहन करत स्टेशन परिसरातील पाणी निचऱ्याची सक्षम व्यवस्था करावी, दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

कल्याण-डोंबिवलीला पावसाने झोडपले !!

कल्याण-डोंबिवलीला पावसाने झोडपले !! पाच दिवस सतत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत  कल्याण, संदीप शेंडगे : गेल्या 48 तासांपासून ...