लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !!
** महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिले निवेदन.
उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व्हावे, झाडे, वृक्ष वेली आदीचे महत्व येणाऱ्या भविष्यातील नवीन पिढीला समजावे, पर्यावरण विषयक जनजागृती व्हावे या अनुषंगाने उरण मधील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या व वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करणाऱ्या विजय विकास सामाजिक संस्थेने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची मागणी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्याच बरोबर श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा, महेश बालदी आमदार उरण विधानसभा, प्रशांत ठाकूर आमदार-पनवेल विधानसभा,जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला "३०० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम" हा पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व स्तुत्य असा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील महान नेत्यांच्या स्मृती जपण्याची आणि पर्यावरण रक्षणाची दुहेरी संधी निर्माण झाली आहे.
रायगड व नवी मुंबई परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि आगरी समाजाचे नेतृत्व करणारे लोकनेते दि. बा. पाटील यांनी आयुष्यभर स्थानिक जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या त्याग, नेतृत्व आणि कार्यामुळे संपूर्ण परिसरातील जनतेच्या मनात त्यांचे स्थान अत्यंत आदराचे आणि प्रेरणादायी आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली. या विकासकामांच्या प्रक्रियेत त्या परिसरातील अनेक झाडे तोडली गेली. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसानही झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्या परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संतुलन राखणे ही काळाची गरज आहे.त्या अनुषंगाने विजय विकास सामाजिक संस्था, नवघर तसेच स्थानिक जनता आणि आगरी समाज यांची अशी ठाम मागणी आहे की, नवी मुंबई विमानतळ परिसरात विशेष वृक्षलागवड करून "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्यात यावे. या स्मृती वनामध्ये हिंदू संस्कृतीत पूजनीय आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडे जसे वड, पिंपळ, औदुंबर, कडुलिंब, बेल इत्यादी मोठ्या प्रमाणावर लावण्यात यावीत.अशी मागणी विजय विकास संस्थेने केली आहे.
अशा प्रकारे उभारण्यात येणारे "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" हे केवळ पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक ठरणार नाही, तर ते लोकनेते दि. बा. पाटील यांच्या महान कार्याचे स्मरण करून देणारे एक प्रेरणास्थान ठरेल. भविष्यातील पिढ्यांना या स्मृती वनातून प्रेरणा, ऊर्जा आणि सामाजिक जाणीव मिळेल, असा ठाम विश्वास विजय विकास सामाजिक संस्थेचे विजय भोईर, विकास भोईर यांनी व्यक्त केला आहे.
सदर मागणीचा सकारात्मक विचार करून शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विजय विकास सामाजिक संस्था, नवघर तसेच स्थानिक जनता आणि आगरी समाज यांच्या वतीने करण्यात आहे.या मागणी बाबत श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा,महेश बालदी आमदार उरण विधानसभा, प्रशांत ठाकूर आमदार-पनवेल विधानसभा, जिल्हाधिकारी रायगड आदी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे लवकरात लवकर दिबा पाटील स्मृती वन उभारण्यात यावे अशी मागणी आता सर्वच स्तरातून होत आहे.