Wednesday, 11 February 2026

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !!

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !!

** सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थे विषयी अक्षय म्हात्रे यांनी केली खंत व्यक्त.

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) :
अक्षय म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटाचे कट्टर प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ते असून सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. यंदाच्या चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडून येण्यासाठी त्यांनी दिवसाची रात्र करून अथक मेहनत घेऊन जनतेशी संवाद साधला. मात्र या चाणजे गणातून भाजपचे कैलास भोईर हे विजयी झाले. मात्र अक्षय म्हात्रे हे पराभवाने खचले नाहीत. उलट नव्या ताकदीने, नव्या उत्साहाने परत ते पुढील कामाला लागले आहेत. त्यांच्या मतदार संघात त्यांना १६२० मते मिळाली हे त्यांच्या उत्तम कार्याचे फलित आहे असे जनतेचे म्हणणे आहे.पक्षातील एकही माणसाचे पाठबळ नसताना आणि निवडणुकीत एकही पैसा न खर्च करता, केवळ कामाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात १६२० मतं मिळवणाऱ्या अक्षय म्हात्रे यांनी भ्रष्ट व्यवस्थे विषयी खंत व्यक्त केली आहे.अक्षय म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि एवढ्या मोठ्या व्यवस्थेविरुद्ध एकटा लढलो, समोर पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य व आजी माजी आमदार यांची ताकद पणाला लागली आणि करोडो रुपयांचा चुराडा झाला.निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या पक्षाचे नेते आठवडाभर माझ्याच गावात ठाण मांडून होते, विरोधकांनी इथेच रात्री जागवल्या, अमाप पैसा वाटला. तरीही हरवता येत नाही म्हणून अफवा पसरवल्या , बदनामी केली आणि या सर्वांच्या विरुद्ध एकटा लढलो, ना पक्षाचे पाठबळ, ना मनुष्यबळ होते.उमेदवारी शेवटच्या क्षणी भरली आणि पॅम्प्लेट (प्रचार पत्रके) उशिरा आल्याने वेळ पण कमी मिळाला.तरीही एकही पैसा न वाटता १६२० मते पडली.हे जनतेने मला भरभरून दिलेले आशीर्वाद आहे. त्यांचे मी कायमचा ऋणी आहे. त्यांचे मी आभार मानतो अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यंग तरुण असलेल्या अक्षय म्हात्रे यांनी १६२० घेऊन विरोधकांना आपल्या कामातून चांगलेच चोख प्रत्यूत्तर दिले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.हार न मानता, निराश न होता अक्षय म्हात्रे हे पुन्हा नव्या जोमाने, उत्साहाने पुढील कामाला लागल्याने जनतेने त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.

भिवंडीतील कोपर गावात महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिवपुराण"अमृत कथा सप्ताह. !!

भिवंडीतील कोपर गावात महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिवपुराण"अमृत कथा सप्ताह. !!

भिवंडी,दिं, १२,अरुण पाटील (कोपर). :

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील श्री क्षेत्र "कोपरेश्वर"मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिव पुराण "अमृत कथा सप्ताहाचे आयोजन कोपर गावचे सरपंच श्री .हेमंत सूर्यकांत घरत, श्री. जगत्गुरु तुकाराम महाराज वारकरी सांप्रदाय,स्वाध्याय परिवार,समर्थ दास परिवार,,आध्यात्मिक परिवार,व समस्त ग्रामस्थ मंडळ ,कोपर यांच्या वतीने गुरुवार  दिं,१२/२/२०२६ ते रविवार‌ दिं,१५/२/२०२६ पर्यंत आयोजित केले आहे. 

दिवस पहिला माघ कृ.१०, वार गुरुवार ,दिं, १२/२/२०२६ रोजी सकाळी ६ वा. सरपंच सौ/श्री.सुषमा हेमंत सूर्यकांत घरत यांच्या तर्फे अभिषेक घालण्यात आला आहे तर संध्याकाळी हरिपाठ व रात्री महा प्रसाद ठेवण्यात आला आहे. 

दिवस दुसरा माघ कृ.११, वार शुक्रवार दिं, १३/२/२०२६ रोजी सकाळी ५/ते ६ दरम्यान  काकड आरती होणार आहे.व सकाळी ६ वा.अभिषेक होणार आहे.तसेच संध्याकाळी ५ वा.ते ७ वाजे दरम्यान श्री. कोपरेश्वर प्रासादिक भजनी मंडळ,कोपर श्री.रंजन बुवा पाटील,श्री.चिंतामण बुवा घरत,श्री.गुरुनाथ बुवा,श्री.नरेश बुवा , मृदंगमणी: ह. भ. प.कमलाकर बुवा नाईक व इतर भजन  मंडळ यांच्या तर्फे हरी भजन होणार आहे.तर ७ ते ९.३० वा.श्री. "श्री.महाशिवपुराण" अमृत कथा व रात्री महाप्रसाद होणार आहे. 

दिवस तिसरा माघ कृ.१२, वार शनिवार,  दिं,१४/२/२०२६ रोजी सकाळी ५ ते ६ वा. काकड आरती,व सकाळी ६ वा. सौ /श्री. विमल कबीर पाटील , सौ/श्री.केशव शिवराम पाटील, सौ/श्री.संदीप गोरखनाथ पाटील, यांचा अभिषेक होणार आहे.तर संध्याकाळी हरी भजन,व रात्री ७ ते ९.३० वा.रात्री "श्री.महाशिव पुराण"अमृत कथा होणार आहे.व रात्री महाप्रसाद .

दिवस चौथा,माघ कृ.१३,महाशिवरात्री वार ,रविवार दिं,१५/२/२०२६ राजी सकाळी काकड आरती,भजन,वाकली ९ ते ११ वा. "श्री. महाशिवपुराण "अमृत कथा सांगता सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात  कथा प्रवक्ते म्हणून श्री.क्षेत्र श्रीरामपूर येथील ह.भ. प. शिव भक्त श्री. रामदास शास्त्री महाराज हे आपल्याला लाभणार आहे. 

या कार्यक्रमासाठी मा. श्री.कपिलजी मोरेश्वर पाटील (मा.केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री), मा. श्री. देवेशजी पुरुषोत्तम पाटील, (महा. प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, मा.सदस्य जिल्हा परिषद ठाणे) व मा. श्री. डि. के. म्हात्रे (महा.प्रदेश उपाध्यक्ष मनसे) हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. 

या धार्मिक कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहण्याची विनंती कोपर गावचे सरपंच श्री.हेमंत सूर्यकांत घरत, ग्रामविकास अधिकारी श्री. आशीष चव्हाण व ग्रामस्थांनी केली आहे.

नेपाळच्या पत्रकारांची 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट !!

नेपाळच्या पत्रकारांची 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट !!

** नेपाळचे क्रीडा पत्रकार पडले महेंद्रशेठ घरत यांच्या प्रेमात! 

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : नेपाळचे पत्रकार आयसीसी टी २० वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांचे वार्तांकन करण्यासाठी भारतात आले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची ख्याती माहिती आहे. त्यांनी दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा केल्याने, तसेच नेपाळमधील एका शाळेला साह्य केल्याने महेंद्रशेठ घरत यांची महती नेपाळमध्येही झाली आहे. त्यामुळे २० पत्रकार बांधवांनी भारतात आल्यावर महेंद्रशेठ घरत यांची मंगळवारी (ता. १०) 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट घेतली. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी नेपाळच्या क्रीडा पत्रकारांशी संवाद साधला, त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी ते म्हणाले, "मी पत्रकारांवर विशेष प्रेम करतो, आपण भारतात क्रिकेट सामन्यांच्या वार्तांकनासाठी आल्याने मलाही आनंद झाला आहे. कारण मीही क्रिकेटचा प्रचंड चाहता आहे. भारत-पाकिस्तान सामना जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी मी आवर्जून प्रत्यक्ष 'याचि देही याचि डोळा' पाहायला जातो. मी आजही मनमुराद क्रिकेट खेळतो. आपण नेपाळहून आमच्याकडे आल्याने 'अतिथी देवो भवं' या नात्याने आपला आदर-सन्मान करणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे 'सुखकर्ता'वर आपले मनापासून स्वागत करतो. आपण ज्या ज्या वेळी भारतात याल, तेव्हा आम्ही आपल्या सेवेशी सदैव असू."

यावेळी महेंद्रशेठ घरत यांना प्रत्यक्ष पाहून आणि त्यांच्या कामाचा आवाका पाहून नेपाळचे पत्रकारही त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्याशी पत्रकारांनी दिलखुलास संवाद साधला, मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपण 'माणूस' म्हणून ग्रेट आहात. आम्ही सातासमुद्रापार राहतो, पण भारतात आल्यावर आम्हाला आपण कुटुंबासारखे प्रेम दिलेत, हे प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. आपण ज्यावेळी यापुढे कधीही नेपाळमध्ये याल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असू, तुम्हालाही आम्ही सर्व सहकार्य करू," अशा भावना नेपाळच्या पत्रकारांनी शेलघर येथील 'सुखकर्ता' बंगल्यावर व्यक्त केल्या.

उरणच्या युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी !!

उरणच्या युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी !!

*#'वरद गावंड यांच्या जलरंग कलाकृतीची IWS सिंगापूर प्रदर्शनासाठी निवड

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील युवा चित्रकार वरद विलास गावंड यांच्या जलरंग कलाकृतीची इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी (IWS) सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा व प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या यशामुळे रायगड जिल्ह्यातील कला क्षेत्रात गौरवाची भावना निर्माण झाली आहे.

  वरद गावंड हे सध्या देवरुख कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथे बॅचलर ऑफ फाईन आर्ट (प्रथम वर्ष) शिक्षण घेत आहेत. त्यांनी साकारलेली “द एज ऑफ द स्टॉर्म” (The Edge of the Storm) ही कलाकृती ३ री IWS सिंगापूर आंतरराष्ट्रीय जलरंग स्पर्धा व प्रदर्शन २०२६ साठी निवडण्यात आली आहे.

     या चित्रात आकाश आणि पृथ्वी यांच्यातील नाट्यमय क्षण प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. सोनेरी पिवळा, मऊ निळा आणि अग्निमय केशरी रंगांनी सजलेले आकाश जांभळ्या व राखाडी छटांमध्ये विरघळताना दिसते. प्रकाश आणि सावलीचा खेळ चित्राला सखोल भावनिक परिणाम देतो. खालील भागात मातीचा तपकिरी रंग, पाण्यातील शांत प्रतिबिंब, लहान शिडाच्या बोटी आणि विखुरलेले पक्षी जीवन आणि हालचालीचे प्रतीक ठरतात. ही कलाकृती कागदावर जलरंग माध्यमात साकारण्यात आली आहे.

     वरद खुशाली विलास गावंड हे प्रामुख्याने निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे आणि लाईव्ह पेंटिंगसाठी ओळखले जातात. त्यांच्या कलाकृतींमधून निसर्गाची भव्यता आणि मानवी भावना यांचा सुरेख संगम दिसून येतो. सामाजिक जागरूकता, समानता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या विषयांवर ते आपल्या कलेतून भाष्य करतात.

      ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा व प्रदर्शन ७ ते १० जून २०२६ दरम्यान मॅकफर्सन आर्ट स्टुडिओ, सिंगापूर येथे होणार असून, कार्यक्रमाचे शीर्षक ‘शालोम पीस (शांती)’ असे आहे. स्पर्धेचा विषय अनिर्बंध असून, १८ वर्षांवरील कलाकारांसाठी गट ३ (उत्कृष्ट समूह) अंतर्गत ही निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी अतनूर डोगान (तुर्की/कॅनडा), हाँग शान (चीन), सुसाना सुन लियान (सिंगापूर) यांच्यासह जगभरातील नामवंत कलाकार व क्युरेटर परीक्षक म्हणून लाभले आहेत.

      वरद यांच्या या यशामागे देवरुख कॉलेज ऑफ फाईन आर्टचे प्राचार्य रणजीत मराठे, संस्थापक अजय पित्रे तसेच प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. कॉलेज प्रशासनाने वरद यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

      यापूर्वीही वरद यांच्या कलाकृतींना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, कर्नाटक चित्रकला परिषद, बेंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात तसेच पुणे आर्ट फिएस्टा २०२५ या सामूहिक प्रदर्शनात त्यांच्या कलाकृतींची निवड होऊन विशेष सन्मान मिळाला आहे.

महाराष्ट्र सरकारची बेपर्वाई, ३८ वर्षानंतर जमीन मालकाला मिळाला न्याय !!

महाराष्ट्र सरकारची बेपर्वाई, ३८ वर्षानंतर जमीन मालकाला मिळाला न्याय !!

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : राज्य शासनाच्या दुर्लक्ष आणि कागदपत्रे जपण्याच्या बेपर्वा कारभारामुळे एखादया सामान्य नागरीकाला त्याचा कायदेशीर हक्क मिळण्यासाठी कसा दीर्घकाळ संघर्ष करावा लागतो याचे उदाहरण म्हणजे रायगड जिल्हयातील दापोली येथील एका शेतकऱ्याला त्याची जमीन सरकारने भुसंपादन केल्यानंतर मिळणाऱ्या विकसित भुखंडाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याला ३८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे. ती पण फक्त सरकारी कागदपत्रे गायब झाल्यामुळे.

चेतन कांती कुडवकर (पनवेल, रायगड) यांची दापोली, तालुका पनवेल येथील जमीन १९८६ मधे संपादीत करण्यात आली होती. या संपादनाबद्दलच्या "अवार्ड" ची प्रत उपलब्ध नसल्याने सिडकोच्या १२.५% विकसीत भुखंडाच्या योजने अंतर्गत त्यांना मिळायचा विकसित भुखंड मिळु शकत नव्हता. त्या करीता त्यांनी महाराष्ट्र शासन व इतर विरूद्ध बॉम्बे हायकोर्टात रिट याचीका दाखल केली होती.

सरकारतर्फे डेप्युटी कलेक्टर (लँड एक्विझिशन) कार्यालयाने एका शपथपत्रात कबुली केली की अवार्डची मुळ प्रत कार्यालयात सापडत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार जुने कागदपत्र खोक्यांमधे ठेवले होते व कोर्टाच्या आदेशाने ते खोके जप्त झाल्यामुळे कागद जमिनीवर पडले होते. त्यांच्याकडे कागद स्कॅन करण्यासाठी अर्थसाहाय्यही नव्हते.

हायकोर्टाच्या खंडपीठाने (न्यायमुर्ती मनीष पितळे आणि श्रीराम व्ही. शिरसाट) निर्णय देताना सरकारी कार्यालयाने "महाराष्ट्र सार्वजनिक नोंदी कायदा, २००५ चे उल्लंघन केल्याचे नमुद करून अवार्ड पुनर्बाधण्याचे आदेश दिले." त्याच बरोबर सिडकोला अवार्ड नसतानाही इतर कागदोपत्री पुराव्याच्या आधारे कुडवकर यांचा अर्ज ६ आठवडयात निकाली काढण्याचे आदेश दिले.

कोर्टाने सरकारी कार्यालयांच्या बेपर्वा वृत्तीवर तीव्र टीका केली व "सार्वजनीक नोंदी योग्य रीतीने जतन न करणे ही सरकारची निष्काळजीपणाची निशाणी आह". असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. चेतन कांती कुडवकर यांची  उच्च न्यायालयामधे बाजु मांडण्याचे काम ऍड.कुणाल दत्तात्रेय नवाळे यांनी यशस्वीपणे केले.

त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व !!!

त्या अनामिकांनी उलगडले किशोरवयींचे भावविश्व !!!

 *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा निर्भया प्रकल्प

*५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी  आरोग्य साहित्याचे वितरण

*चिपळूण/ खेड (प्रतिनिधी- वार्ताहर)*

ग्रामीण भागातील अनामिकांच्या चिट्ठ्यातून उलगडले किशोरवयींचे भावविश्व; निमित्त होते, कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि दिशान्तर संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने 'निर्भया' हा विशेष उपक्रमाचे ; या प्रकल्पांतर्गत चिपळूण तालुक्यातील तीन प्रमुख शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.

*जागतिक संकल्पनेतला उपक्रम*

यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) जागतिक महिला दिनानिमित्त मासिक पाळी आरोग्य आणि जागृतीवर विशेष भर दिला आहे. याच जागतिक संकल्पनेला अनुसरून 'निर्भया' प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. 'मासिक पाळी आरोग्य जागृती, सन्मान आणि समता सशक्तिकरण' हे या प्रकल्पाचे मुख्य सूत्र होते.

*तीन विद्यालये ५०० विद्यार्थिनी*

खेड तालुक्यातील यशवंत विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय धामणंद,  न्यू इंग्लिश स्कूल आंबडस आणि चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) या तीन विद्यालयांमध्ये या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या शाळांतील ५००  विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. 

 *डॉक्टरांचे मार्गदर्शन* 

प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा कुलकर्णी-उत्पात (BAMS, MA, MSc) यांनी अत्यंत ओघवत्या आणि संवेदनशील वृत्तीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया कशी आहे, या काळात आहार, व्यायाम आणि स्वच्छता कशी राखावी, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.  कार्यशाळेच्या उत्तरार्धात मुलींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. अपर्णा यांनी शास्त्रीय उत्तरे देऊन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले.

*आरोग्य संच व पुस्तिका*

केवळ मार्गदर्शनच नव्हे तर मुलींना प्रत्यक्ष मदत मिळावी यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीला 'निर्भया' मार्गदर्शक पुस्तिका देण्यात आली. या पुस्तिकेत मासिक पाळी दरम्यान पाळावयाची पथ्ये आणि स्वच्छतेबाबतची माहिती  देण्यात आली आहे. तसेच, पर्यावरणाचे रक्षण आणि दीर्घकालीन वापरासाठी उपयुक्त असे 'रियूजेबल सॅनिटरी पॅड्स' (पुन्हा वापरण्यायोग्य सॅनिटरी पॅड) देखील सर्व विद्यार्थिनींना वितरित करण्यात आले.

*नेरोलॅक चे सामाजिक उत्तरदायित्व*

       कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे सामाजिक उत्तरदायित्व (CSR) आणि दिशान्तर संस्थेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. 

    कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड या कंपनीच्या असोसिएट ऑफिसर ह्युमन रिसोर्स प्राजक्ता पाटील तसेच अनिशा निकम व सेजल बेलोसे तर दिशान्तर संस्थेतर्फे अध्यक्ष श्री. राजेश जोष्टे, सचिव सौ. सीमा यादव यांची उपस्थिती होती. कार्यक्रम मार्गदर्शन व सहकार्य कंपनीचे सीएसआर प्रमुख श्री संतोष देशमुख व यशस्वीतेसाठी लोटे प्लांट चे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक नंदन सुर्वे यांचे योगदान राहिले. विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी झाला. 

(चौकट घेणे)
*...त्या अनामिका!*
सहभागी विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्य विषयक तसेच मासिक पाळी विषयक  शंका- समस्या यांची एक अगदी छोटी चिट्टी लिहावयास सांगण्यात आली होती. यात त्या विद्यार्थिनीची कुठेही ओळख दिसता नये याची काळजी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या दोन दिवसपूर्वी या  चिठ्ठ्या  एकत्र करण्यात आल्या. त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून आरोग्य विषयक शंका -समस्यांचा उलगडा होण्यास मोठीच मदत झाली.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे वार्ड क्र.१२४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.सकिना ताई शेख यांचा सत्कार !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे वार्ड क्र.१२४ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.सकिना ताई शेख यांचा सत्कार  !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभांच्यावतीने शिवसेना नेते खासदार ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा.श्री.अनिल भाऊ देसाई  यांच्या आदेशानुसार तसेच ग्रा.सं.क. सचिव मा.श्री.निखिलजी सावंत व श्री. अशोक शेंडे यांच्या सूचनेनुसार महानगरपालिका एन विभागांमधील झालेल्या २०२६ मुंबई महानगर पालिका मधील निवडणुकीमध्ये निवडून आलेले घाटकोपर पश्चिम मधील शाखा क्रमांक १२४ नगरसेविका सौ.सकिना ताई शेख व श्री.इब्रानभाई शेख युवासेना समन्वय याचाही सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन ग्रा.स.क. पदाधिकारी यांच्यावतिने करण्यात आले. यावेळी महीला शाखा संघटीका सौ.संगीता ताई तुळसकर, युवा सेना विभागाधिकारी कु.श्रुती खोपकर, कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर, कक्ष प्रसारक श्री.अनंत पवार, कक्ष उपसंघटक शाखा क्र १२३/१२४ श्री राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक श्री. संतोष चांदे १२३, कक्ष वार्ड संघटक शाखा क्र.१२४ निर्मला आवटे ताई, कक्ष वार्ड संघटक तानाजी सावंत १२६, कक्षप्रतिनिधी श्री प्रकाश कुष्टे, श्री रियाज शेख, श्री.प्रमोद जाधव, श्री.सचिन भालेकर, इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !!

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !! ** सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थे विषयी अक्षय म्हात्रे यांनी...