Saturday, 16 May 2026

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !!

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !!

टिटवाळा, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना होत असलेल्या विविध समस्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत श्रद्धा गॅस एजन्सी विरोधात जोरदार प्रदर्शन करत गॅस पुरवठा सुरळीत करण्याकरिता निवेदन दिले. घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये होत असलेला प्रचंड विलंब, घरपोच सेवा नाकारणे, घरपोच शुल्क जादा आकारूनही ग्राहकांना स्वतः गोदामातून सिलेंडर आणण्यास भाग पाडणे, अधिकृत पावती न देणे तसेच ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासन आणि तेल कंपन्यांकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात असताना प्रत्यक्षात ग्राहकांना सिलेंडर मिळण्यासाठी तब्बल वीस ते बावीस दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. एवढ्यावरच न थांबता सिलेंडर वितरणानंतर पुन्हा तीस दिवस पूर्ण झाल्याशिवाय पुढील बुकिंग करता येणार नसल्याचे ग्राहकांना सांगितले जात असल्याने सामान्य कुटुंबांना वर्षभरात मिळणारे हक्काचे बारा सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरपोच वितरणासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असतानाही अनेकांना प्रत्यक्षात घरपोच सेवा दिली जात नसल्याचा आरोपही मनसेने केला आहे. अनेक ग्राहकांना सिलेंडर घेण्यासाठी थेट गोदामात जावे लागत असून, ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास दादा भोईर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष दिनेश भोय यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील विधी व न्याय विभागाचे जयेश खंदारे ॲड. अविनाश शिळकांदे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे ॲड. अविनाश शेळकांदे दिलीप राठोड विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद ठाकरे, गिरीश यशवंतराव, समीर मेस्त्री तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केडीएमसी प्रशासनातील कथित भ्रष्टाचाराविरोधात उपोषण !!

केडीएमसी प्रशासनातील कथित भ्रष्टाचाराविरोधात उपोषण !!

पालिका मुख्यालयासमोर जाहीर मुंडण

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनातील कथित अनियमितता, भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रहिवासी व शिवसेना ग्राहक संरक्षण पक्षाचे पदाधिकारी ऋतुकांचन शंकर रसाळ यांनी ११ मे पासून उपोषण सुरूकेले आहे 

मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसीच्या ‘४ ज’ विभागातील सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या कार्यपद्धतीविरोधात स्थानिक नागरिकांकडून वारंवार गंभीर तक्रारी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही खासगी विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांना राज बिल्डर अँड डेव्हलपर्स राजप्रीतम चतुर्वेदी रहिवाशांवर अन्याय केला जात असल्याचेही आंदोलनकरते   ऋतूकांचन रसाळ यांनी सांगितले आहे.

तसेच काही प्रकरणांमध्ये स्थानिक नागरिकांच्या मालकीची घरे जाणीवपूर्वक  “धोकादायक” घोषित करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पक्षपाती भूमिका घेतली जात असल्याचाही आरोप करण्यात आला.

याशिवाय संबंधित गृहनिर्माण प्रकल्पांबाबत आवश्यक माहिती फलक नसणे, रेरा नोंदणी क्रमांक उपलब्ध नसणे यामुळे फ्लॅट खरेदी करणाऱ्या नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याचेही रसाळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या सर्व प्रकरणांबाबत नगर रचना विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.आयुक्त अभिनव गोयल यांनी या प्रकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत यापूर्वी सहा दिवसांचे आमरण उपोषण करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता पुन्हा त्यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केली असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे.

मागण्या मान्य न झाल्यास मुख्यालयासमोर “आमरण उपोषण तर सुरू आहेच शिवाय रसाळ यांनी प्रशासनाच्या विरोधात जाहीर मुंडन आंदोलन केले आहे. त्यामुळे यांच्या या उपोषणा संदर्भात प्रशासन काय भूमिका घेतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती !!

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती !!

*चाळीसगाव, दि. 16 मे 2026*

आज 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव व अंतर्गत गावांमध्ये विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.

*वरिष्ठांचे मार्गदर्शन*  
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या सूचनेनुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित भोसले व डॉ. सुप्रिया पाटील, आरोग्य पर्यवेक्षक किरण बेलदार, आरोग्य सहाय्यक शितोळे, आरोग्य सहाय्यक कुलकर्णी व एलएचव्ही दराडे सिस्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले.

*मादुर्णे उपकेंद्रात जनजागृती*  
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत मादुर्णे उपकेंद्रात हस्त पत्रिका वाटप करण्यात आले. डेंग्यू विषयी बॅनर दाखवून लोकांना डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व स्वच्छतेचे महत्त्व यावर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.

*उपस्थित मान्यवर*  
यावेळी सीएचओ रामटेके मॅडम, आरोग्य सेवक संदीप चौधरी, आरोग्य सेविका ठाकूर सिस्टर, आशा सेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावेत व डासोत्पत्ती होऊ देऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

श्री दत्ता म्हात्रे सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांच्या मार्फत "विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा. २०२६"चे आयोजन !!

श्री दत्ता म्हात्रे  सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांच्या मार्फत "विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा. २०२६"चे आयोजन !!

पेण (पी.डी. पाटील) : आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यात उत्तुंग झेप घेण्यासाठी निघालेल्या पाखरांच्या पंखांना बळ देण्यासाठी त्यांना भावी आयुष्याच्या वाटा दाखवून स्वतःची वाट निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये जिद्द, प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने तसेच अनेक साधनांचा अभाव असताना अविश्रांत मेहनत करत आपल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंचक्रोशीतील इ. १० वी ते १२ वी. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसहित पालकांचा सन्मान करण्यासाठी श्री दत्ता म्हात्रे  सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांनी "विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा २०२६" चे आयोजन केले आहे. हा  दिनांक २४ मे  रोजी  सायंकाळी ठिक ६ वा. मंत्रीवाडी (पेण- रायगड) याठिकाणी पार पडणार आहे.
       या कार्यक्रमात  प्रमोद जाधव सर (सांगली) MPSC परिक्षा उत्तीर्ण (कर सहाय्यक व महसुल पदी नियुक्ती) आणि  मा. मोहिनी  थोरात All India Ranking 76 GATE CSE 2025 (IIT MUMBAI) मुख्य  मार्गदर्शन करणार आहेत. तसेच  प्रमुख अतिथी म्हणून श्री. अतुल नंदकुमार म्हात्रे (मास्टर ऑफ आर्किटेक्ट, लंडन), श्री. प्रभाकर म्हात्रे साहेब (रायगड जि.प. सदस्य), श्री. मिलिंद पाटील साहेब (सामाजिक कार्यकर्ते), श्री. समीर म्हात्रे साहेब (उपाध्यक्ष-सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्तान), सौ. मनिषा मंगलदास ठाकूर (सरपंच-ग्रु.ग्रा.पं. दिव), श्री. विवेक म्हात्रे साहेब (गटनेते पंचायत समिती, पेण) श्री. संताजी का. पाटील (सामाजिक कार्यकर्ते), डॉ. सुभाष लक्ष्मण म्हात्रे (डॉक्टरेट मंत्रीवाडी) श्री. मंगलदास ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते), श्री. सचिन पाटील (उप सरपंच- ग्रु .ग्रा.पं. दिव), श्री. प्रफुल्ल म्हात्रे (मा. सभापती सदस्य ग्रुप .ग्रा. दिव) श्री. सुजित म्हात्रे (मा. सदस्य ग्रु.ग्रा. वढाव), सौ. करिष्मा सं. म्हात्रे (सदस्या-ग्रु.ग्रा.पं. दिव) सौ. सुप्रिया पाटील (सरपंच-सु.ग्रा.पं. बोरझे), श्री. रत्नाकर ठाकूर साहेब (रायगड भूषण), श्री. अविनाश पाटील (निवृत्त मुख्याध्यापक काळेश्री), श्री. कृष्णा लांगी (ग्रामसेवक), श्री. शरद म्हात्रे (प्रो. सेरिमा हॉटेल), डॉ. आशिर्वाद मोकल (बेनवले), श्री. प्रकाश माळी (पत्रकार), श्री. संभाजी पाटील (उपसरपंच-गु.ग्रा.पं.बोरझे), सौ. प्रणया सिद्धांत पाटील (उरण) श्री. रामकृष्ण ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते), श्री. जितेंद्र ठाकूर (अध्यक्ष छावा संघटना) श्री. प्रकाश ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते), सौ. अर्चना मोहन म्हात्रे (मा. सदस्या गु.ग्रा.पं.बोरझे ), श्री. वैभव म्हात्रे (वढाव) श्री. संतोष म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते), श्री. जितेंद्र पाटील सर (खारपाले) श्री. पंकज पाटील (पत्रकार ), श्री. अविनाश गुरुजी (रा.जि.प. शाळा, नारवेल), श्री. संजय ठाकूर, श्री. एस. के. ठाकूर सर (शिक्षक ठाकूर बेडी), श्री. मनोज ठाकूर (शिक्षक-ठाकूर बेडी), श्री. दयानंद ठाकूर (शिक्षक-ठाकूर बेडी), श्री. विजय ठाकूर (शिक्षक-ठाकूर बेडी), श्री. प्रल्हाद ठाकूर (शिक्षक-ठाकूर बेडी), श्री. संतोष पाटील (शिक्षक-घोडा बंदर) लाभणार आहेत.
        तसेच या कार्यक्रमासाठी श्री. सुधाकर म्हात्रे (अध्यक्ष ट्रॉफी फायटर फाऊंडेशन), श्री. गंगाराम म्हात्रे,श्री. रुपेश पाटील, श्री. सत्यविजय ठाकूर, श्री. सुहास म्हात्रे (कान्होबा) यांचे  विशेष सहकार्य लाभेल तर ग्रामस्थ मंडळ मंत्रीवाडी व महिला मंडळ मंत्रीवाडी यांचे  विशेष पाठबळ असणार आहे.  
      तेव्हा एक सामाजिक उद्दिष्ट समोर ठेऊन  दत्ता म्हात्रे सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांनी आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढवावा आणि  सन्मानासोबत करिअर दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या सुवर्ण संधीचा पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे.

Friday, 15 May 2026

साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत.

्साई मंदिरचे शिस्तबद्ध व्यवस्थापन : महेंद्रशेठ घरत.

निष्ठा पाटील हिचा साई मंदिर वहाळतर्फे सत्कार

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : निष्ठा प्रज्वल पाटील हिने दहावीत घवघवीत यश मिळविल्याने वहाळच्या साई मंदिरात तिचा गुरुवारी (ता. १४) महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मो. का. मढवी गुरुजी, साई मंदिरचे संस्थापक-अध्यक्ष रविशेठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. इंटकचे उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची ती नात होय. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, "वहाळच्या साई मंदिरचे व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करीत आहे. त्यामुळे मी प्रभावित होऊन साई मंदिरात दरमहा अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आम्ही अन्नदान करतो, ते कायम सुरूच राहील. गेली अनेक वर्षे अव्याहतपणे हे काम रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे. मी सुद्धा काबाडकष्ट करून वर आलोय, आई-वडिलांच्या मेहनतीमुळे, संस्कारामुळे आणि समाजाला  देण्याच्या भूमिकेमुळे आजची माझी वाटचाल सुखकर आहे. आजघडीला मी जग पालथे घातले आहे, कैलास मानसरोवरापासून सर्व देवस्थाने पाहिली, पण मला देव मानसात दिसतोय."

यावेळी श्री जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ वाकडी यांचे सुश्राव्य भजन झाले. जयवंत गंगाराम पाटील आणि जयश्री जयवंत पाटील यांना साई मंदिरात मंगलस्नान करण्याचा मान मिळाला. यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आले

आजच्या राजकारणात अर्थकारण : गणेश नाईक.

आजच्या राजकारणात अर्थकारण : गणेश नाईक.

आगरी समाजाचा मला सार्थ अभिमान : महेंद्रशेठ घरत 

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) : "दुसऱ्याच्या आयुष्यातील सुख ओरबाडल्यास आपल्याला सुख लाभत नाही. त्यांना वातानुकूलित दालनातही घाम फुटतो. प्राणी असो वा माणूस आपल्या पोटच्या गोळ्याला कधीही कुणी पायदळी तुडवत नाही. एकेकाळी आगरी समाजाला खूप बदनाम केले गेले. मात्र तो काळ गेला, आज समाजाची प्रगती सर्वच बाबतीत निश्चितच चांगल्या प्रकारे होत आहे. स्वाभिमानाने आपला पुढे जात आहे. मी सामाजिक बांधिलकी जपून काम करीत आहे, मात्र आजच्या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही नाही," असे वनमंत्री गणेश नाईक पेण येथे म्हणाले. पेण येथे शुक्रवारी (ता. १५) अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था आयोजित राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन पार पडले. त्याचे उदघाटन वनमंत्री गणेश नाईक, आमदार रवींद्र पाटील, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. 
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "आगरी समाजाची ताकद मोठी आहे, परंतु समाज विखुरला आहे. आज आगरी समाज एकसंध झाला तर रायगड, ठाणे येथील सर्व आमदार, खासदार आगरी समाजाचेच होतील. मी जिल्हा परिषद सदस्य होताच सर्वप्रथम जलकुंभ उभारून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला. आगरी समाजासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करीत आलो आहे  आणि करीतच राहीन. कारण आगरी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र दिबांचे नाव अद्यापही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे समाज पेटून उठला पाहिजे. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवायला हवी. आज आगरी समाजातील असंख्य तरुण, तरुण उच्च शिक्षण घेत आहेत, हे अभिमानास्पद आहे. आपला आगरी समाज स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनीही आगरी समाजावर अतोनात प्रेम केले. शिवरायांच्या काळातही आगरी समाजाचे योगदान अनन्यसाधारण आहे, मात्र आताच्या राज्यकर्त्यांना दिबांच्या नावाचा विसर पडला आहे. त्यांना आगरी समाजाचे योगदान कळत नाही. त्यामुळे येत्या काळात आगरी समाजाची एकजूट कायम हवी. नाही तर रात्र वैऱ्याची आहे, हे समाजातील नेत्यांनीही लक्षात घ्यावे. आगरी समाजासाठी मी काम करतो. समाजासाठी सर्वकाही सहकार्य करतो आणि यापुढेही करायला तयार आहे. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत असलो तरी माझी सही मी मराठीत करतो. आगरी माणसाने आगरी समाजाला साथ दिली पाहिजे. तरच समाज कुठेतरी जिवंत राहील."

यावेळी  पेणचे आमदार रवींद्र पाटील, पुरुषोत्तम महाराज यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सूर्यकांत पाटील यांनी केले. यावेळी 'वारी देवाची' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

तबलावादक प्रताप पाटील, जगदीश पाटील, संजीवन म्हात्रे, तसेच समाजातील अनेक मान्यवर मंडळींचा यावेळी सत्कार करण्यात आला. आगरी समाजाचे कार्य म्हणून यावेळी दोन लाख रुपयांची देणगी महेंद्रशेठ घरत यांनी दिली. 

"समाजाचे उपकार कधीही विसरणार नाही,  ज्यांच्या नावात इंद्र आहे, ते महेंद्रशेठ घरत असे सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील म्हणाले. यावेळी 'माझा आगरी आगरी जाम हाय स्वाभिमानी' हे गाणे त्यांनी गाऊन रसिकांना जिंकले

मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षा साठी मोफत वर्षभर मार्गदर्शन !

मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेश परिक्षा साठी मोफत वर्षभर मार्गदर्शन !

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे) :

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे  च्या पुढाकाराने व शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे "सुपर थर्टी" या उपक्रमा अंतर्गत बारावी सायन्स उत्तीर्ण मेडिकल आणि इंजीनियरिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत नीट व जेईई परीक्षेसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.

शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे हा उपक्रम देशभरात दहा ठिकाणी चालू आहे.
 या उपक्रमा अंतर्गत उरण  तालुक्यातील विज्ञान शाखेच्या सर्व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य/शिक्षक यांची एक बैठक घेऊन उपक्रमाची माहिती दिली. बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रकल्पाची माहिती दिली.बारावी उत्तीर्ण झालेल्या मेडिकल व इंजिनिअरिंग प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी शोभा मेमोरियल फाउंडेशन तर्फे सुपर थर्टी या उपक्रमांतर्गत वर्षभर निवासी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

गरीब व गरजू इच्छुक विद्यार्थ्यांतील गुणवंत तीस विद्यार्थी नीट साठी व तीस विद्यार्थी जेईई परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षा घेऊन निवडले जातील. परीक्षा बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेचे गुण व विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी निवासी प्रशिक्षण दिले जाईल, त्यामध्ये अभ्यासक्रम शिकविणे, उजळणी परीक्षा, गृहपाठ, शंका निरसन, सराव परीक्षा इत्यादी तयारी करून घेतली जाईल. 

सुपर थर्टी साठी इच्छुक विद्यार्थी व त्यांचे पालक यांची बैठक दिनांक २० मे रोजी सकाळी साडेदहा वाजता वीर वाजेकर महाविद्यालयात आयोजित केलेली आहे. पालकांना या उपक्रमाची माहिती दिली जाईल व त्याच वेळेस विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया परीक्षा ही घेतली जाईल. 

 मेडिकल व इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व दिनांक २० मे रोजी महाविद्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन शोभा मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने  आशिष गुप्ता व डॉ. आमोद ठक्कर प्रभारी प्राचार्य वीर वाजेकर महाविद्यालय, फुंडे, उरण,  यांच्याकडून करण्यात आले आहे.

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !!

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !! टिटवाळा, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना होत ...