Saturday, 11 April 2026

उरण तालुक्यातून पोलिसांनी जप्त केले २.५ लाखांचे हेरॉईन ; उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेचा बाजार !!

उरण तालुक्यातून पोलिसांनी जप्त केले २.५ लाखांचे हेरॉईन ; उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेचा बाजार !!

** शाळा, कॉलेज मधील मुले नशेच्या आहारी ; नशेच्या आहारी गेलेले वळत आहेत गुन्हेगारी कडे 

व्यसना विरोधात त्वरित कारवाई करण्याची गरज....

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात चरस गांजा करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण वाढत असून उरण मध्ये अनेक ठिकाणी खुलेआम पणे नशेचा बाजार सुरु आहे. अनेक ठिकाणी या नशेली पदार्थांची खरेदी विक्री मोठया प्रमाणात सुरु असून या व्यसनाला उरण मधील शाळा, कॉलेज मधील तरुण मुले सर्वाधिक बळी पडत आहेत त्यामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय हिच नशा करणारी  व्यक्ती पुढे गंभीर गुन्ह्याकडे वळतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हा नशेचा बाजार रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

उरण पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व त्याचे सेवन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जासई येथील पार्किंगमध्ये छापा मारून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणासह त्याचे सेवन करणाऱ्या दोघांना असे एकूण तीन जणांना अटक करीत २ लाख ५२ हजार ८०० रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उरण तालुक्यातील जासई येथील शीतल परिवहन पार्किंगच्या मागे असलेल्या जांभळाच्या झाडाखाली काही तरुण संशयास्पद अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे उरण पोलिसांनी १० एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास छापा मारला. यावेळी तेथे रवींद्र कल्याण शेट्टी (२७), गणेश दत्तू भिडे (२५) व गणेश विनय पाटील (१९) हे तिघेही अमली पदार्थाचे सेवन करताना आढळले.

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, गणेश पाटील याच्याकडे ६.३२ ग्रॅम वजनाची हेरॉईनच्या ८५ पुड्या सापडल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात अमली पदार्थाची किंमत अंदाजे २,५२,८०० रुपये आहे. या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांनाअटक केल्याची माहिती वपोनि हनिफ मुलाणी यांनी दिली. तिघांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी सांगितले.

उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेच्या औषधांची विक्री खरेदी मोठया प्रमाणात होत असून अशा खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्ती वर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटनानीं केली आहे

समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेमुळे कामगारांना पगार वाढ !!

समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेमुळे कामगारांना पगार वाढ !!

** करारानुसार कामगारांना मिळणार विविध सेवा सवलती.

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील भेंडखळ येथे  पोलीरीस कंपनीत समर्थ रायगड जनरल कामगार संघटने अंतर्गत कार्यरत असणारे इलेक्ट्रिशन व मेंटेनन्सचे काम करणारे कर्मचारी कार्यरत असून या कंपनीत समर्थ रायगड जनरल कामगार संघटना व जीएमसी मेंटेनन्स वर्क एल एल पी यांच्यात वेतन वाढीचा यशस्वी संपन्न झाला. या  करारा अंतर्गत कामगारांना तीन वर्षासाठी  प्रति महिना प्रति व्यक्ती ६२५० रुपये इतकी वेतन वाढ करण्यात आली आहे. तसेच पगारवाढी सोबत बोनस व इतर सेवा सुविधा जसे की रजा, सुरक्षा साहित्य, युनियनची देणी, थकबाकी आदी सुविधा कामगारांना मिळणार आहेत. या करारा प्रसंगी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भगत, युनियन लीडर नैनेश म्हात्रे, किशोर बनसोडे, जीएमसीचे मालक इरफान पटेल, ऍडमिन ऑफिसर अरुण माने, चिटणीस अजय पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून कामगारांनी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे तसेच जीएमसी मालक इरफान पटेल, पोलीरिस कंपनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. 

समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून हे यशस्वी करार संपन्न झाल्याने संघटनेच्या कार्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरू असून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात संघटनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महेंद्रशेठ घरत दाम्पत्यातर्फे गव्हाणच्या शांतादेवीला सोन्याचा हार अर्पण !!

महेंद्रशेठ घरत दाम्पत्यातर्फे गव्हाणच्या शांतादेवीला सोन्याचा हार अर्पण !!

** महेंद्रशेठ यांनी 'समायरा'सोबत घेतले शांतादेवीचे दर्शन

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) :
पंचक्रोशित सुप्रसिद्ध असणाऱ्या गव्हाणच्या शांतादेवीची यात्रा शनिवारपासून (ता. ११) सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेला शेकडो वर्षांची धार्मिक व ऐतिहासिक परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे शांतादेवीचे निस्सीम भक्त आहेत. दर मंगळवारी ते न चुकता शांतादेवीचे दर्शन घेतात. त्यानंतरच दिवसभरातील कामांना सुरुवात करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते हे नित्यनेमाने करतात. गेली चार-पाच वर्षे महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत या दाम्पत्यातर्फे शांतादेवीला यात्रेच्या दिवशी सोन्याचा हार अर्पण केला जातो. शांतादेवी नवसाला पावते, ही भाविकांची भावना आहे. परिसरातील नागरिकांची शांतादेवीवर अपार श्रद्धा आहे.

यंदा तर महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई आजोबा झालेत. त्यांच्या घरात समायरा हिच्या रूपाने नात जन्माला आलेली आहे. त्यामुळे यंदा शांतादेवीची यात्रा आणि नात समायरा हिच्या जन्माचा दुग्धशर्करा योग असल्याने घरत दाम्पत्य अत्यानंदात आहेत. त्यामुळे शनिवारी (ता.११) सकाळी महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत, नात- समायरा, सोनाली घरत-चौधरी, मयूरेश चौधरी यांनी सहपरिवार सकाळीच शांतादेवीची ओटी भरून पूजा केली, मनोभावे दर्शन घेतले आणि सोन्याचा हार अर्पण केला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मी शांतादेवीचा निस्सीम भक्त आहे. आई-वडील, गणपती बाप्पा, शांतादेवी यांचे अपार ऋण माझ्यावर आहेत. त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण प्रयत्न करू शकतो. पूर्वी शांतादेवीला सावकार दागिने द्यायचे, हे लहानपणी मी पाहायचो. तेव्हा मला कुतूहल वाटायचे. आज मला आई-वडील, गणपती बाप्पा, शांतादेवी यांच्यामुळे सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळेच मी ह्रदयाच्या अंतःकरणापासून शांतादेवी सोन्याचा हार अर्पण केला आहे." यावेळी एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन !!

पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन !!

**फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी

सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपाच्या वतीने विनम्र अभिवादन केले. समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या विचारांनी आपण सर्वांनी प्रेरित व्हावे, हीच खरी आदरांजली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास गाढवे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, विनायक रूपनवर, लक्ष्मण ठोंबरे, अँड. विजय लेंगरे, अंकुश देवडकर, अँड. बापूसाहेब डोबाळे उपस्थित होते.महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी केली आहे.तसेच कटगून, नायगाव व खानवडी या ऐतिहासिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत येथे भव्य शिल्पसृष्टी उभारण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे असे श्री गाढवे म्हणाले.

सौजन्य/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

पीईएसच्या आंबेडकर, दोन्ही सिद्धार्थ कॉलेज व रयतच्या केबीपी कॉलेजच्या रक्तदान शिबिराद्वरे महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन !!

'पीईएसच्या आंबेडकर, दोन्ही सिद्धार्थ कॉलेज व रयतच्या केबीपी कॉलेजच्या रक्तदान शिबिराद्वरे महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन !!

महात्मा ज्योतिराव फुले (११/४) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४/४) यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने त्यांना रक्तदानासारख्या लोकहिताच्या कार्यातून अभिवादन करण्यासाठी सालाबादप्रमाणे, 
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील ३ महाविद्यालये व नविन मुंबईच्या एका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने दादर, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस व बेलापूर रेल्वे स्थानकावर दि. शुक्रवार दि. १०/४/२०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये डॉ. आंबेडकर महाविद्यालय वडाळा, सिद्धार्थ महाविद्यालय आनंद भवन व बुद्ध भवन फोर्ट व कर्मवीर भाऊराव पाटील अशा चार महाविद्यालयाच्या विद्यार्थि व एन एस एस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.‌ दि. ११/४ रोजीही ठाणे रेल्वे स्थानकावर शिबीराचे आयोजन केले आहे.

एकूण ४ रक्तदान शिबिरात दादर स्थानकातून ३७, सिएसटी स्थानकातून ४४, चर्चगेट स्थानकातून ४८ व बेलापूर स्थानकातून ६० असे एकूण १८९ बॉटल्स रक्ताचे संकलन झाले. सदर शिबिरातून कामा रुग्णालय, सायन रुग्णालय, जगजीवनराम रेल्वे रुग्णालय व जसलोक रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी रक्त संकलन करण्यात आले.

कोविडनंतर रेल्वे स्थानकावर एन एस एसच्या सहभागाने आयोजित केलेली आत्तापर्यंतची सर्वच रक्तदान शिबिरांना रक्तदात्यांचा उत्तम‌ प्रतिसाद मिळतो. कारण एन एस‌ एस‌चे विद्यार्थी त्यासाठी सातत्याने स्टेशनवर पोस्टर घेऊन फिरून रक्तदात्यांना डोनेशन करण्यासाठी घेऊन येतात. तसेच काही विद्यार्थी माईकवरून जाहीर आवाहन करून लोकांमध्ये रक्तदान करण्यासाठी जनजागृती करतात.

अशा प्रकारे संयुक्त रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे हे दुसरे वर्ष आहे, यामध्ये नायर रुग्णालय रक्तपेढीचे माजी CDO श्री अनिल गरेसाहेब समन्वयक म्हणून अत्यंत मोलाचे योगदान नेहमीच करतात. लायन्स क्लब ही सेवाभावी संस्था प्रायोजकाच्या भूमिकेतून सर्वांच्या चहा, नाश्ता जेवणासह ईतरही खर्च करतात. तसेच एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन खडतार, डॉ. धनंजय चंदनशिवे, प्रा. विशाल करंजवकर‌, प्रा. प्रणिता भाले व डॉ. विष्णु भंडारे त्यांचे प्रत्येकी १०-१२ विद्यार्थी सहभागी झाल्यामुळेच हे शिबीर यशस्वी झाले. सदर शिबिराच्या आयोजनासाठी मुंबई  विद्यापिठ स्तरावरून एन एस एस OSD प्रा. सुशिल शिंदे, जिल्हा समन्वयक प्रा. क्रांती रूके व प्रा. देशमुख यांचेही सहकार्य मिळाले व त्यांनी सहभागी विद्यार्थी व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

*डॉ. विष्णु भंडारे*
(प्रभारी प्राचार्य व कार्यक्रम अधिकारी) 
सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, आनंद भवन, फोर्ट, मुंबई

Friday, 10 April 2026

जबलपूर येथे कुर्मी राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्राचा तलवार देऊन गौरव !!

जबलपूर येथे कुर्मी राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्राचा तलवार देऊन गौरव !!

जबलपूर (मध्यप्रदेश) | 4-5 एप्रिल 2026

अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे 46 वे राष्ट्रीय अधिवेशन मध्यप्रदेशातील जबलपूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. देशभरातील विविध राज्यांमधून प्रदेश व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी झाले होते.

या अधिवेशनात पटेल, पाटीदार, मराठा, कुणबी, कुर्मी, कुडुंबर, कुडमी, कापू, कम्मा, कलबी, कुलमी, ओक्का लिंगा, देवेंद्र कुल वेल्लालार, महतो, खंडायत, गुर्जर, नायक, नायडू आदी विविध समाजघटक कुर्मी या प्रातिनिधिक या नावात येत असून त्या सर्व प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. तसेच या समाजाच्या  सर्व राज्यांच्या समित्यांचा सक्रिय सहभाग या  कार्यक्रमात दिसून आला.

महाराष्ट्रात कुर्मी ( कुणबी मराठा )  महासभेचे संघटन मजबूत करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे राज्याने देशात अव्वल स्थान मिळवले. प्रदेश अध्यक्ष संजय पाटील, यांच्या नेतृत्वाखाली युवा महासभा, महिला महासभा, विद्यार्थी महासभा, उद्योग महासभा, पुरोहित महासभा आणि कृषी महासभा या विविध शाखांद्वारे प्रभावीपणे कामगिरी करण्यात आली.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष आणि महासचिव यांच्या हस्ते प्रदेश अध्यक्ष संजय पाटील व युवा प्रदेश अध्यक्ष प्रमोद ठोंबे पाटील यांचा तलवार व  पगडी देऊन विशेष गौरव करण्यात आला.

1894 मध्ये नोंदणीकृत असलेली ही महासभा विविध समाजघटकांच्या न्याय व हक्कांसाठी कार्यरत आहे. याच संस्थेने 1919 साली लखनौ येथे छत्रपती शाहू महाराजांना “राजश्री” ही उपाधी देऊन सन्मानित केले होते.

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील आठ मान्यवरांनी या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, स्व. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा विशेष उल्लेख केला जातो.

सौजन्य - जयेश शेलार (पाटील)

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!

'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!

युद्ध सुरु असतानासुद्धा भारताची रणनीती ठरली यशस्वी.

उरणच्या जेएनपीए मध्ये ग्रीन आशा जहाजचे स्वागत.

उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) :
पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर, 'ग्रीन आशा' हे एलपीजी वाहून नेणारे भारतीय जहाज यशस्वीरित्या भारत देशात दाखल झाले आहे. सुमारे १५ हजार टन एलपीजी घेऊन आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली सुरक्षित मार्गक्रमण मुंबईलगतच्या उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरात सुरक्षितपणे पोहोचले. 

गेल्या सुमारे ४० दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्धस्थितीत या जहाजाचे सुरक्षित आगमन हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 'ग्रीन आशा'ने इराणमधील लारक, केशम आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संवेदनशील सागरी मार्ग यशस्वीरित्या पार केला. होर्मुझचा तणावपूर्ण मार्ग जहाजाने कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केला आहे.भारतच्या रणनीती मुळे इंधन व कर्मचारी सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहेत.

जेएनपीए बंदरातील बीपीसीएलच्या लिक्विड जेट्टीवर हे जहाज उभे करण्यात असून हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आखातात व्रातात युद्धाला सुरुवात झाल्यापासून जेएनपीए बंदरात पोहोचलेले एलपीजी वाहून आणणारे हे पहिलेच जहाज आहे.

'ग्रीन आशा' जहाजाच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने सतत निरीक्षण ठेवले होते. नौदलाच्या मार्गदर्शनाखाली हे जहाज सुरक्षित भारतात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे सुरक्षित पोहोचलेले हे नववे भारतीय जहाज असल्याची माहिती देण्यात आली. 'ग्रीन आशा'चे सुरक्षित आगमन हे केवळ एक यशस्वी सागरी ऑपरेशन नाही, तर भारताच्या ऊर्जासुरक्षेचा मजबूत आधार असल्याचे सांगण्यात आले.या जहाजचे जेएनपीए मध्ये मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले

उरण तालुक्यातून पोलिसांनी जप्त केले २.५ लाखांचे हेरॉईन ; उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेचा बाजार !!

उरण तालुक्यातून पोलिसांनी जप्त केले २.५ लाखांचे हेरॉईन ; उरण मध्ये मोठया प्रमाणात नशेचा बाजार !! ** शाळा, कॉलेज मधील मुले नशेच्या आहारी ; नश...