Tuesday, 9 June 2026

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

डोंबिवली, संदीप शेंडगे : महसूल आणि उद्योग विभागाच्या सकारात्मक सहकार्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रलंबित जमीनप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सोमवारी रात्री डोंबिवलीत झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण जमीन पिंपळेश्वर महादेवाला समर्पित करण्याचा निर्णय जाहीर केला.

“पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिरासाठी सुरू असलेल्या प्रदीर्घ संघर्षाला आज पूर्णविराम मिळाला असून यात सर्व महादेव भक्तांचा विजय झाला आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरात विधीवत महापूजा झाली आणि भक्त मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, माजी खासदार कपिल पाटील, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, मंदिराचे विश्वस्त आणि हजारो भाविक उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हे पवित्र कार्य पूर्ण झाले. मात्र आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. जे कार्य करायचे असते ते महादेवच करवून घेतात. या यशाचे संपूर्ण श्रेय भगवान महादेवालाच जाते.”

पिंपळेश्वर मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून तोच सुवर्ण इतिहास पुन्हा प्राप्त करून देण्याचे काम शासन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी मांडलेल्या मंदिर परिसराच्या विकासाच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंदिरासाठी झालेल्या आंदोलनाचा इतिहास सांगितला, तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा क्षेत्रातील पुढील विकास आराखडा मांडला.

Monday, 8 June 2026

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी -कृषी विभागाचे आवाहन

येत्या खरीप हंगाम २०२६ मध्ये कृषी विभागाच्या विविध निविष्ठा व लाभाच्या योजनांपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अद्याप फार्मर आयडी न काढलेल्या सर्व शेतकऱ्यांनी (पी.एम. किसान व वनपट्टाधारक शेतकरी सहित) तात्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा संबंधित यंत्रणेमार्फत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

अॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात केली जात आहे. राज्यातील अंदाजे १७१ लाख खातेदार शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी देण्यात येणार असून विशेषतः राज्यातील ११९ लाख पीएम किसान लाभार्थी शेतक-यांना ओळखपत्र प्रदान करून या योजनेअंतर्गत सामावून घेण्याचे उदिष्ट आहे.

राज्यात कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ पारदर्शक आणि प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण करण्यात येत असून त्याद्वारे विविध कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील उपलब्ध माहितीनुसार राज्यात एकूण १७१ लाख खातेदार असून त्यापैकी १३३ लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी प्राप्त केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील एकूण नोंदणीकृत लाभार्थी ११९ लाख लाभार्थी असून त्यामधील ९१.२७ लाख सक्रिय लाभार्थी असून त्यापैकी ८० लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. याशिवाय अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणीसाठी उपलब्ध एकूण १ लाख ३ हजार वनपट्टाधारक शेतक-यांपैकी ८ हजार ३१५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली आहे.

कृषी विभागाचे सचिव यांच्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी काढलेले नाहीत अशा पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी व वनपट्टा धारक शेतकरीसहित शेतकऱ्यांचे फार्मर आयडी ३० जून २०२६ पूर्वी काढून घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापक मोहीम हाती घेऊन या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढून घेण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची फार्मर आयडी नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून या मोहिमेस सर्व संबंधित विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक ॲग्रीस्टॅक अंकुश माने यांनी केले आहे.

पंधरा वर्षापासून पावभाट बोरी येथील विजेची समस्या न सुटल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण !

पंधरा वर्षापासून पावभाट बोरी येथील विजेची समस्या न सुटल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण !

मागणी पूर्ण न झाल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा.

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील पाव भाट बोरी येथील रहिवाशी १५ वर्षांपासून विजेच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.बोरी पाव भाट येथे सिंगल फेज विद्‌युत नागरिकांना मिळत आहे गेले पंधरा वर्षापासून हे नागरिक एमएसईबी उरण येथे  ट्रिपल फेस विद्युत पुरवठा मिळावा म्हणून मागणी करत आहेत . नागरिकांकडे सिंगल फेज असल्यामुळे फ्रीज टीव्ही व इतर उपकरणे व्यवस्थित चालत नाही. विद्युत पुरवठा कमी असल्यामुळे अनेक वेळा अनेक उपकरणे बिघडून जात आहे. याबाबत अनेक वेळा त्यांनी तक्रार केली आहे बैठका झाल्या आहेत, पाठपुरावा करून देखील त्यांच्याकडे थ्री फेज लाईन आली नाही स्थानिक एक कुटुंबाचा विरोध आहे की त्यांच्या घरा च्या समोर च्या रस्त्यावरून लाईन टाकू देत नाही. एमएसईबी चे कर्मचारी पोल टाकायला येतात आणि हे कुटुंब त्याला विरोध करतो एमएसईबीचे लोक निघून जातात यावरून अनेक वेळा तणावाचे वातावरण झाले आहे.याचा त्रास इतर नागरिकांना होत आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने सुद्धा पाठपुरावा सुरु केला आहे.मागणी मान्य न झाल्यास ५ जून रोजी काँग्रेसच्या वतीने कोटनाका येथील एम एस ई बी वीज महावितरणच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.

वास्तविक पाहता जी काय अडचण असेल ती एमएसईबी पोलिसांच्या सहकायनि दूर करून आम्हाला थ्री फेस लाईन टाकून दिली पाहिजे. प्रशासनाने लक्ष घालून एमएसईबी व उरण पोलीस यांची बैठक बोलून यातून मार्ग काढावा अशी मागणी काँग्रेस तर्फे माजी नगरसेवक बबन कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी  प्रशासनाकडे केली आहे.प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) कामांबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह !

सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) कामांबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह !

घाटकोपर, (केतन भोज) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील विक्रोळी पार्कसाईट, रामनगर, राहूल नगर, डकलाईन, सेवा नगर, भीम नगर मध्ये सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) कामांसाठी ठेकेदार संस्थांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) ची कामे होताना दिसत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) च्या कामांसाठी ठेकेदार संस्था नेमली असूनही प्रत्यक्षात कामे होताना दिसत नाहीत. मग ही योजना नेमकी ठेकेदारांसाठी आहे की नागरिकांसाठी?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,अनेक भागांमध्ये नाले, गटारे सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) संबंधित कामे नियमित विभागात स्वच्छता होत नसल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जात आहे.सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) योजनांवर महापालिकेकडून लाखो रुपये मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना त्याचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांना मिळत आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.दरम्यान, या विषयावर मनपा एन विभागाच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित कामांची माहिती,कामाचे वेळापत्रक तसेच ठेकेदार संस्थांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती सार्वजनिक करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.पावसाळा तोंडावर असताना सर्वकप स्वच्छता मोहीम (डिप क्लिनिंग) योजनेच्या संबंधित कामांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याने, प्रशासनाने या तक्रारींची दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन...

*१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन...

*मा. डॉ. आण्णासाहेब डांगे, खासदार मा. श्री. रामराव वडकुते, आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती*

*प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त ऊरूण ईश्वरपूर येथील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक तसेच महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. डॉ. आण्णासाहेब डांगे, खासदार मा. श्री. रामराव वडकुते, आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांच्या सह समाजातील २१ संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणूकीचे आयोजन शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता ऊरूण ईश्वरपूर शहर व वाळवा तालुका धनगर समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे  व धनगर समाजाचे युवक नेते मा. श्री. सागरभाऊ मलगुंडे यांनी दिली.

शहरातील तहसिल कार्यालय येथुन मिरवणूकीस मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात येणार असुन या मिरवणूकीचा मार्ग तहसिलदार कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - यल्लामा चौक - गांधी चौक - लाल चौक - गणेश भाजी मंडई - मा. आण्णासाहेब डांगे चौक - शिराळा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी मिरवणूकिचा समारोप होणार आहे. वाळवा तालुक्यातील धनगर समाजाचे वास्तव्य असणाऱ्या ५६ गावामध्ये जयंती ऊत्सव निमित्त संपर्क दौरा पूर्ण केला असुन या दौऱ्यास समाज बांधवासह अन्य सर्वांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या मिरवणूकीमध्ये हत्ती, घोडे, ऊंट यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी आकर्षक रथ, व अहिल्यादेवीच्या जिवनावरील ५ जिवंत देखावे, धनगरी ढोल, नाविन्यपूर्ण देशपातळीवर नावाजलेले एकमेव गज नृत्य, महिला मुलिंचे गज नृत्य, हालगी घुमके, ब्रॉस बँन्ड कंपनी, सनई पिपाणी तसेच धनगर समाजाचे दैवत असलेल्या सुक्षेत्र बळगल, बागलकोट येथील भरमदेव सुरवंती देवस्थानचे श्री. परशुराम पुजारी, खिद्रापूर कोल्हापूर येथील आदि जगतगुरू रेवणसिध्द देवस्थान चे विशाल पुजारी, रायबाग, बेळगांव येथील मायाक्कादेवी देवस्थान चे बाळासाहेब पुजारी, आरेवाडी कवठेमहांकाळ देवस्थान चे जगन्नाथ कोळेकर पुजारी, पट्टण कोडोली कोल्हापूर येथील विठ्ठल बिरदेव देवस्थान चे संभाजी पिराई, वाशी करवीर येथील अवघडखान बिरदेव देवस्थानचे कृष्णात रानगे (गुंडादेव), माण सातारा येथील सतोबा देवस्थान चे विठ्ठल दडस, पांगरी सातारा येथील बिरदेव देवस्थानचे शिवाजीराव दडस, पुरंदर पुणे येथील विर क्षेत्र देवस्थानचे पिंटू शिंगाडे, हुलजंती मंगळवेढा सोलापूर येथील हलमत धर्म गुरूपिठाचे हलमत भास्कर कवी श्री. अडवेप्पा सोमुत्ते महाराज, हून्नूर सोलापूर येथील हून्नुरज्सिध्द बिरोबा देवस्थान चे शामराव पुजारी, बेळगांव अक्कोळ येथील सोमय्या पुजारी, आप्पाचीवाडी निपाणी बेळगांव येथील हालसिध्दनाथ देवस्थानचे सर्जेराव पुजारी, निपाणी बेळगांव येथील हालसिध्दनाथ देवस्थानचे भाकणूककार भगवान डोणे, आदमापूर संत बाळूमामा देवस्थान चे भाकणूककार कृष्णात डो‌णे, हुक्केरी बेळगांव येथील गजलिंगेश्वर बिरलिंगेश्वर देवस्थान घोडेक्षगिरीचे हुच्चापा पुजारी आदी संत महंत प्रमुख समाज बांधवांना दर्शनासाठी मिरवणूकीत उपस्थित असणार आहेत. याबरोबरच सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील समाजातील विविध मंदीरे व देवस्थानचे पुजारी, प्रमुख व समाजातील देवरशी व हेडमी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील पुरूष मंडळीनी पिवळा शर्ट व महिला भगीनीनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून मिरवणूकीस सहभागी व्हावे असे अवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ऊत्सव नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जयंती उत्सव यशस्वीतेसाठी धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी सर्व यंत्रणा, संपर्क मोहिम गतीमान केली असुन ऊरूण ईश्वरपूरचे माजी नगरसेवक मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू), मा. श्री. सागरभाऊ मलगुंडे, अभिजित रासकर, प्रकाश कणप, दत्तात्रय तांदळे, जिल्हा परिषद सदस्य संताजी मेटकरी, अँड. उमेश कोळेकर, शाहिर सागर माने, पांडूरंग वाघमोडे, भगवान बोते, प्रविण माने, सागर गावडे, भानुदास विकर, अविस्कार नांगरे, अमोल विरकर, उमेश गावडे, धोंडीराम वाटेगांवकर, पत्रकार विलासराव कोळेकर, बिरू बोते, मंगेश लवटे, विजय कवठेकर, जयवंत टिबे, धनंजय करांडे, भानुदास खरात, राजाराम गावडे, शंकर रासकर, प्रकाश अनुसे, पोपटराव काळे, बजरंग कदम, अजित पाटील यांच्यासह सर्व समाज बांधव उत्सपूर्तपणे सहभागी झाले आहेत.

प्रसिद्धीसाठी/वृत्त - विलासराव कोळेकर सर 

Sunday, 7 June 2026

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!

अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ येथील विश्वजीत ग्रीन सोसायटीच्या एफ विंगमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अंबरनाथ यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

संपूर्ण विश्वजीत ग्रीन परिसरात पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना केवळ एफ विंगमधील रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच दैनंदिन गरजांसाठी रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर समस्येची तात्काळ चौकशी करून पाणीपुरवठा खंडित होण्यामागील कारण शोधावे तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने लक्ष देऊन एफ विंगमधील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विशाल शांताराम कुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.

Saturday, 6 June 2026

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा !!

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा !!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन लोकाभिमुख प्रशासन उभारूया – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

ठाणे, दि. ६ (संदीप शेंडगे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे आज, दि. ०६ जून, २०२६ रोजी शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य, स्वाभिमान, लोककल्याण आणि सुशासनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ राज्यभर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर मानाची स्वराज्य गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. शिक्षक रविंद्र तरे आणि सहशिक्षक यांनी पोवाडा गायन केले तसेच “जय भवानी, जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमादरम्यान शिवचरित्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याण, न्याय, पारदर्शकता आणि सुशासन यांचे जे आदर्श निर्माण केले, ते आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी राज्यकारभाराची संकल्पना महाराजांनी प्रत्यक्षात उतरविली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक स्मृतीदिन नसून सुशासन, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा दिवस आहे.”

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !!

पिंपळेश्वर मंदिराची जमीन अखेर मंदिरालाच; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !! डोंबिवली, संदीप शेंडगे : महसूल आणि उद्योग विभागाच्या ...