Tuesday 28 February 2023

ग्रामस्थांनी दिले शाळेला साहीत्य वाद्य !

ग्रामस्थांनी दिले शाळेला साहीत्य वाद्य !

जव्हार, जितेंद्र मोरघा -

शाळा म्हटले की एक मंदिरच आहे, असे सांगायला वावगे जाणार नाही. कारण शाळेमधून खूप काही आपण शिकून आणि मोलाचे अनुभव घेत असतो आणि अश्या वेळी आपल्याला काही कारणास्तव विविध ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्ती मोलाचे मार्गदर्शन करतात तसेच काही भेट म्हणून वस्तू देऊन जातात.

अश्याच प्रकारे किनिस्ते येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थ व पालक बाळकृष्ण शिंदे यांनी शाळेसाठी वाद्य साहित्य भेट दिले आहे, ग्रामस्था कडुन स्वखर्चाने दिलेल्या या अनोख्या भेटी मुळे सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी शिंदे यांचे कौतुक केले आहे.
यावेळी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यां साठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी शाळेसाठी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच शाळेच्या दर्जा सुधारला जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, पालक व शिक्षक यांचे नाते निर्माण झाले पाहिजे, माझ गाव व माझी शाळा या भावनेने काम केले तर नक्कीच आदर्श शाळा घडायला वेळ लागणार नाही.

यावेळी श्री मंगेश दाते यांनी देखील मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावकरी नेहमीच शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, शिक्षकांना सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच किनिस्ते व वाकडपाडा केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेला हि  प्रदीप वाघ यांनी मार्गदर्शन केले, पोर्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत श्रीमती ढेरे यांनी शिक्षण परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते.

कार्यक्रमास  प्रदीप वाघ, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष  चंद्रकांत दाते, केंद्र प्रमुख  नागु विरकर, नंदकुमार वाघ उपसरपंच,  संजय वाघ माजी सरपंच,  गणेश खादे,  ग्रामपंचायत सदस्य, बाळकृष्ण शिंदे,  दिपाली शिंदे, मुख्याध्यापक  सुरेश हमरे,  ढेरे व केंद्रातील सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मकबरा व परिसरातील ऐतिहासिक सौंदर्य पाहून जी 20 परिषदेच्या महिला प्रतिनिधींनी केला आनंद व्यक्त !

मकबरा व परिसरातील ऐतिहासिक सौंदर्य पाहून जी 20 परिषदेच्या महिला प्रतिनिधींनी केला आनंद व्यक्त ! 

छत्रपती संभाजीनगर, अखलाख देशमुख, दि. २८ :  - दोन दिवसीय G-20 परिषदेसाठी शहरात आलेल्या शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधीनी आज सकाळी बिबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. यावेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मकबरा व परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून त्यांनी आनंद  व्यक्त केला. 

यावेळी शिष्टमंडळाने सामूहिक फोटोशूट देखील केले. यावेळी इंटयाक संस्थेच्या प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तू विषयी माहिती दिली. 

मकबरा परिसरात संबंधित सर्व प्रतिनिधींचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात  करण्यात आले. यानंतर  चहा पाण्याचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला होता.  सर्व परदेशी पाहुण्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला. 'आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष' असल्याने या मध्ये विशेष तृणधान्याचा समावेश होता. यात मूग ,मटकी, ज्वारी या धान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ होते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी .बी नेमाने, पुरातत्व अधीक्षक श्री.भगत, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार शंकर  लाड तसेच पोलिस विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.

जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची औरंगाबाद लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट !

जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची औरंगाबाद लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट !

*ऐतिहासिक वारसा पाहून भारावून गेल्या विदेशी पाहुण्या*

छत्रपती संभाजीनगर, अखलाख देशमुख‌, दि. २८ :  जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाने आज  शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबऱ्याला भेट दिली.  शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या.

शिष्टमंडळ औरंगाबाद लेणीला भेट देणार असल्या कारणाने संपूर्ण लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते.

तीन वातानुकूलित बसेसमधून सकाळीच लेणीच्या पायथ्याशी महिला पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर नऊवारी नेसलेल्या तरुणींनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांना गुलाब पुष्प भेट दिले. लेणीपर्यंत जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरलेले होते. पुरातत्व विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. मुख्य लेणीच्या परिसरात आल्यानंतर  लेणीचे सौंदर्य पाहून सर्व महिला थक्क झाल्या. यावेळी उपस्थित गाईडने प्राचीन लेणीच्या प्रत्येक भागाची इंतभूत माहिती पाहुण्यांना दिली. हा प्राचीन वारसा पहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले.

औरंगाबादच्या लेण्यांचा समूह हा आसपासच्या जमिनीपासून ७० फूट उंचीवर असलेल्या दख्खन पठारामध्ये कोरलेल्या आहेत. येथे बौध्द धर्माला समर्पित एकूण १२ लेणी आहेत ज्या तीन स्वतंत्र गटामध्ये विभाजित आहेत. पहिल्या गटात १ ते ५ पर्यंत दुसऱ्या गटात ६ ते ९ आणि तिसऱ्या गटात १० ते १२ लेणी आहेत. या लेण्या सुमारे तिसऱ्या ते सातव्या शतकात निर्माण केलेल्या आहेत.

पहिल्या गटात लेणी क्र. १ ही अपूर्ण लेणी आहे ज्या मध्ये व्हरांडा आणि स्तंभ आहेत लेणी क्र. २ आणि ५ या समकालीन संरचनात्मक मंदिराप्रमाणे दिसतात जे शैलकृत उदाहरणांमध्ये दुर्मिळ आहेत. लेणी क्र. ३ ही पहिल्या गटातील सर्वात प्रमुख आणि सर्वात मोठी लेणी आहे, हे एक महाविहार आहे. ज्यामध्ये प्रदक्षिणापथा सोबतच गर्भगृह आहे. या वरील स्तंभांवर पर्णसंभार, मिथुन शिल्प आणि जातक कथा कोरलेल्या आहेत. लेणी क्र. ४ हे हिनयान काळातील एकमात्र चैत्यगृह आहे.

दुसऱ्या गटातील लेणी ही पहिल्या गटाच्या उत्तर पूर्वेस सुमारे साधारणतः १ कि.मी. अंतरावर आहे. लेणी क्र. ६ अ आणि ७ विहार आहेत. जे तेथील विवरणत्मक शिल्पे आणि सुंदर प्रतिमांकरिता प्रसिध्द आहेत. लेणी क्र. ८ आणि ९ या अपूर्ण उत्खननामुळे आपल्याला लेणी निर्माण करण्याची प्रक्रिया माहीती होते. या गटातील लेणी प्रतिमा शिल्पांनी युक्त आहेत आणि औरंगाबाद लेण्यातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. यात बोधीसत्व, अष्टमहाभय, अवलोकितेश्वर, पट-प्रज्ञा देवी सोबतच बोधिसत्व, हारिती पंचिका, नृत्य वादनच्या दृश्यांचे पटल, महापरिनिर्वाणाचे दृश्य इ. भरपूर अंकन केलेले आहेत. स्तंभावर पर्णसंभार आणि भौमितिक आकृत्यांचे सुंदर अंकन केले आहे.

तिसऱ्या गटातील लेणी क्र. १० आणि १२ दुसऱ्या गटापासून थोडया अंतरावर उत्तरेकडे स्थित आहेत  लेणी क्र. १० आणि ११ अर्धनिर्मित लेण्या आहेत तर लेणी क्र. १२ एक विहार आहे.

औरंगाबाद लेणी पहिल्यानंतर शिष्टमंडळाने जवळच असणाऱ्या बीबी का मकबऱ्याला भेट दिली. या ठिकाणी त्यांचे स्वागत तुतारी व सनई चौघडयाच्या वादनाने अतिशय उत्साहात करण्यात आले. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारा बीबी का मकबरा पाहताना पाहुण्यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले.

कांदा आणि कापूस उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल...

कांदा आणि कापूस उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल...

मुंबई  दि २८  : 'सरकार प्रचारात व्यस्त', 'कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त',  'शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो', 'कांद्याला भाव मिळालाच पाहिजे', 'कापसाला भाव मिळालाच पाहिजे', 'हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे', 'दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो', 'शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो', 'गद्दार सरकार जोमात...शेतकरी मात्र कोमात', 'कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं' अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
 
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

सरकारने कापसासाठी निर्यात धोरण तयार करावे व कांद्याला योग्य हमी भाव मिळायला द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी यावेळी केली.

मराठी राजभाषा दिनानिमित्त कल्पराज फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम !

मराठी राजभाषा दिनानिमित्त कल्पराज फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम !

साहित्यिकांच्या सन्मान सोहळ्याने मराठी राजभाषा दिन साजरा

शहापूर, (एस. एल. गुडेकर) :
          मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत कल्पराज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष,साहित्यिक व महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक विजयकुमार देसले यांच्या संकल्पनेतून साहित्यिकांचा सन्मान सोहळा सोमवारी  शहापुरातील रिअल अकॅडमी, काबाडी प्लाझा,शहापूर येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

           साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधुकर हरणे, महेशकुमार धानके, शरद पांढरे, संजय गगे खरीडकर, शिवाजी सातपुते, प्रकाश फर्डे, नवनीत यशवंतराव, प्रमोद पाटोळे, शर्मिला पाटोळे, वसंत निमसे, मुकेश दामोदरे, मनाली दामोदरे, रुपेश बोराडे, प्रशांत चौधरी, संजय चौधरी, विजय धानके, सुनील म्हसकर, साईनाथ भालके, निळकंठ विशे, जयराम मांजरे आदी साहित्यिकांना सन्मानपत्र, पुस्तक, भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान ग्राफिक्सचे अप्रतिम काम करणाऱ्या योगिता गोडेचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.

       आई-वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या कल्पराज फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांची विजयकुमार देसले यांनी माहिती दिली.भविष्यातही फाऊंडेशनचे सल्लागार सेवानिवृत्त केंद्रप्रमुख राजाराम देसले यांच्या मार्गदर्शनानुसार शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.शहापूर भूमीला साहित्यिकांचा वारसा आहे. भविष्यात एखादे भव्यदिव्य साहित्य संमेलन शहापूर नगरीत आयोजित व्हावं हा आशावादही त्यांनी यावेळी मान्यवरांसमोर व्यक्त केला.

       या कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख  शंकर खाडेपाषाणे तत्वज्ञान ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. कैलास महाराज निचिते, साहित्यिक व साप्ताहिक शिवमार्गचे संपादक महेशकुमार धानके, योगगुरु अब्दुल शेख, रिअल अकॅडमीचे संचालक राजपूत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कल्पराज फाऊंडेशनच्या कार्याचे भरभरुन कौतुक करत भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
        या कार्यक्रमासाठी नंदकिशोर पानसरे, नामदेव बांगर, तुकाराम देसले, निळकंठ विशे, पांडुरंग भेरे‌ तसेच रिअल अकॅडमी येथील सर्व स्टाफने मौलिक योगदान दिले. या कार्यक्रमात आपल्या खुमासदार शैलीने साईनाथ भालके यांनी रंगत भरत अप्रतिम सूत्रसंचालन केले तर उपक्रमशील शिक्षक जयराम मांजरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांची कार्यशाळा रायते येथे संपन्न !

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली  तालुकास्तरीय अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांची कार्यशाळा रायते येथे संपन्न ! 

कल्याण, (संजय कांबळे) : अमृत महाआवास अभियान अंतर्गत अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांची कार्यशाळा आदित्य अँग्रो फार्म, ग्राम पंचायत रायते, तालुका कल्याण येथे पंचायत समिती कल्याण तर्फे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कल्याण तालुक्यातील घरकुल सुरु नसलेले व अपूर्ण घरकुल काम असलेले लाभार्थी, सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक, जलसुरक्षक, ग्रा.प.कर्मचारी व पं.स. स्तरावरील सर्व विस्तार अधिकारी तसेच घडामोडींचा मागोवा घेणारे पत्रकार श्री.संजयजी कांबळे स्वयंर्स्फूतीने आवर्जून उपस्थित होते.
 

सदर कार्यशाळेस प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे श्रीम. छायादेवी शिसोदे मॅडम यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे अनिवार्य कारणास्तव प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य झाले नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.ठाणे मनुज जिंदल सर व  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते मॅडम हे ऑनलाईन झूम लिंकद्वारे कार्यशाळेत सहभागी झाले व लाभार्थीशी संवाद साधून महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व लाभार्थ्यांनी अपूर्ण असलेली घरे तातडीने पूर्ण करणे व छपरा पर्यत काम झालेली सर्व घरकुले आठ दिवसात पूर्ण करणेबाबत निर्देश दिले व घरकुल कामाचे कार्यवाही बाबत प्रशंसा करुन उपस्थित सर्वाना प्रोत्साहीत केले... अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इतर राज्यात नियोजित वेळेपूर्वी घरकुले पूर्ण होतात बिहार, झारखंड सारख्या राज्यात कमी वेळेत घरकुले पूर्ण होतात मग आपली घरकुले ही योग्य नियोजन व त्यानुसार कार्यवाही केली तर नक्कीच काल मर्यादेत पुर्ण होतील व पूर्ण करावीत ही अपेक्षा लाभार्थी, ग्रामसेवक व तालुका स्तरावरील यंत्रणा यांचेबाबत व्यक्त केली. प्रकल्प संचालक यांनी अमृत महाआवास अभियान बाबत लाभार्थ्यांना माहिती दिली व अभियानाच्या या तिसऱ्या वर्षात देखील आपल्याला पहिल्या दोन वेळेप्रमाणे पुरस्कार मिळवायचा आहे असे सांगितले. सुरु नसलेली घरकुल कामे तातडीने सुरु करुन अपूर्ण घरकुले 31 मार्च 2023 पूर्वी पूर्ण करणेबाबत सुचना दिल्या. 

गट विकास अधिकारी, पंचायत समिती कल्याण अशोक भवारी यांनी सर्व लाभार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व घरकुले पूर्ण करणेबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच घरकुल बांधून झाल्यानंतर देखील इतर योजनांचा लाभ अभिसरणाद्वारे लाभार्थी कसा घेऊ शकतो व आदर्श घरकुल होऊ शकते याचे मार्गदर्शन केले. सर्व पूरक योजनांची माहिती तसेच पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती गट विकास अधिकारी यांनी दिली... घोलप वि.अ. (कृषी) यांनी शेती विषयक योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली... संत, वि.अ. (कृषी) यांनी सुरु नसलेल्या घरकुल लाभार्थी यादीचे वाचन केले प्रत्येक लाभार्थ्यांशी संवाद साधून घरकुल कामे तातडीने सुरु करावीत असे सांगितले. श्रीम. परटोले, वि.अ. (सांख्यिकी) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. त्याचप्रमाणे गगे, शाखा अभियंता (बांधकाम) यांनी घरकुल बांधकामाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संपुर्ण नियोजन व व्यवस्थापन यशस्वीपणे पुर्ण केलेले हरड, वि.अ.(पंचायत) यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

सदर कार्यशाळेमध्ये लाभार्थी यांनीसुध्दा आपल्या अडचणी मांडल्या व त्यावरील उपाय योजना झालेमुळे व घरकुल काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करु असे आश्वासित केले. तसेच परसबाग, शोषखडडे, जलपुर्नभरण, शौचालय इत्यादी सुविधांनी युक्त आदर्श घरकुल करणेबाबत प्रयत्न करु असे सांगितले. सदरची कार्यशाळा यशस्वी होणेकामी सर्व वि.अ., सर्व ग्राविअ, ग्रामसेवक, घरकुल कक्षाचे लिपीक श्रीम. पेढवी, डाटा एन्ट्री ऑपरेटर श्रीम. लोणे, तालुका समन्वयक गणेश शेलार तसेच पंचायत समिती कल्याण कार्यालयातील सर्व विस्तार अधिकारी, कर्मचारी,चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संपुर्ण सहकार्य केले.

Monday 27 February 2023

महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा !

महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा !

नवी दिल्ली, प्रतिनिधी, 27 : महाराष्ट्र  परिचय केंद्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ आज साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या ग्रंथालयात विष्णू वामन शिरवाडकर उर्फ  ‘कुसुमाग्रज’ यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (मा.) (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी ‘कुसुमाग्रज’ यांच्या पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र शासन ‘कुसुमाग्रज’ यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी करते. याप्रसंगी उपस्थित माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह कार्यालयातील उ‍पस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज’

विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान  आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या नंतर  मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक ठरले. 

वि.वा शिरवाडकर यांचे एकूण २४ कविता संग्रह, ३ कादंब-या, १६ कथा संग्रह, १९ नाटके, ५ नाटिका व एकांकी आणि ४ लेखसंग्रह आदि साहित्य संपदा प्रसिध्द आहे. १९६४ मध्ये  गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. तर, याच साहित्यकृतीला १९८७ मध्ये ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारही मिळाला.

मायभूमी फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा व महारक्तदान शिबीर मुंबई परेल येथे संपन्न !

मायभूमी फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा व महारक्तदान शिबीर मुंबई परेल येथे संपन्न !

 मुंबई (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर )

           मुंबई शिरोडकर हॉल येथे सर्वांच्या वैद्यकीय सेवेसाठी मदतीला धावून येणाऱ्या मायभूमी फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा व महारक्तदान शिबीर मुंबई परेल येथे रविवारी  संपन्न झाला. संस्थापक श्री.अनंत धोंडू काप यांच्या संकल्पनेतून गोर -गरीब जनतेच्या वैद्यकीय सेवेसाठी सुरू केलेल्या चळवळीला खरी साथ मिळाली. तर या उदघाटन सोहळा समयी विविध क्षेत्रात काम करणारे समाज सेवक / उद्योजक आणि श्री.अनंत काप यांच्यावर प्रेम करणारे स्नेही मंडळी उपस्थित होते.

           रक्तदान शिबिर राबण्यामागचा उद्देश  सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता  मुंबई सरकारी हॉस्पिटलमध्ये मधील ब्लड बँक मध्ये रक्त साठा मुबलक नाही.सर्व सामान्य जनतेच्या रुग्णास रक्ताची गरज भासल्यास प्रायव्हेट ब्लड बँक वाजवी पेक्षा पैसे मोजावे लागतात. अशा परिस्थितीत सर्व सामान्य जनतेला रुग्णास रक्त लागल्यास आपल्या हक्काची मायभूमी फाऊंडेशनचे शिलेदार - रुग्ण सेवेकरी त्यांच्या ओळखीने निस्वार्थपणे रक्त उपलब्ध करून देतात.या मागचे कारण त्यांच्या मध्ये असलेली माणुसकी समजली जात आहे.सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. आणि रक्तदान शिबिरात २८० रक्त दात्यांनी आपले मोलाचे योगदान दिले.

           प्रमुख अतिथी सर. जे जे रुग्णालयाचे अधीक्षक मा. डॉ.संजय सुरासेसर, मंडणगड तालुक्याचे माजी सभापती श्री.दौलतराव पोस्टूरे, उद्योजक श्री. मनोज शेठ घागरुम, उद्योजक श्री. महेंद्र टिंगरे, डॉ.चेतन भगत सर, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुभाष पोस्टुरे, श्री चंद्रकांत करंबेले, सर जे.जे. रुग्णालयाचे कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. काशिनाथ राणे,सचिव श्री. महेश चव्हाण, श्री. चेतन मोरे (माणगाव), श्री.सुधीर कदम (दापोली), दशरथ डांगरे, पुष्पा बेर्डे‌ (शताब्दी हॉस्पिटल), श्री. प्रदीप मोगरे ( के. एम. हॉस्पिटल), श्री.नितीन चाळके (रुग्णसेवक), शिवशंकर बांदरे, विश्वास शिंदे, तुकाराम गायकवाड, सुनील माळी, तुकाराम गायकवाड, विश्वनाथ रक्ते, सुनील माळी,जल फाऊंडेशन श्री.नितिन जाधव,श्री.सचिन म्हादळेकर इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मायभूमी फाउंडेशन उद्घाटन सोहळा आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये कोकणातील खेड, दापोली, मंडणगड, माणगाव, श्रीवर्धन या तालुक्यातील रक्तदात्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
             कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माय भूमी फाउंडेशनचे संचालक मंडळ मा. श्री महादेव धामणे, (कार्याध्यक्ष) श्री.अनंत कोबनाक (सचिव ), श्री रघुनाथ पोस्टुरे (उपाध्यक्ष), श्रीसत्यजित भोनकर, (सहसचिव) ,श्री.कृष्णा रावजी चाचले (कोषाध्यक्ष), श्री. विठ्ठल शिगवण, सहखजिनदार श्री.दीपेश हेलगावकर (वैद्यकीय सदस्य),श्री. संजय पातेरे (क्रीडा सदस्य ),श्री.प्रदीप मोगरे (सल्लागार), श्री.नितीन चाळके (सल्लागार) इतर अनेक फाउंडेशनच्या सहकाऱ्यांचा  कार्यक्रम यशस्वी करण्यामागे सिंहाचा वाटा होता. त्या सर्व शिलेदारांचे, रक्तदात्यांचे माय भूमी फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष श्री. अनंत काप यांनी आभार मानले.

महिला आमदारावर अधिवेशन सोडुन जाण्याची वेळ !

महिला आमदारावर अधिवेशन सोडुन जाण्याची वेळ !

मुंबई, अखलाख देशमुख, दि २७ : देवळाली मतदार संघासाठी न्याय मागण्यासाठी महिला आमदार सरोज अहिरे आज इथे बाळाला घेऊन अधिवेशनाला आल्या आहे. मागच्या आठवड्यामध्ये २३ फेब्रुवारी २०२३ ला त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून हिरकणी कक्षाची मागणी केली होती, त्यांनी एक कार्यालय दिले आहे मात्र हिरकणी कक्षामध्ये प्रचंड धूळ आहे, बसण्याची व बाळाला झोपवण्यासाठी व्यवस्था नाही, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची हिरकणी कक्ष म्हणून व्यवस्था केली गेली नाही, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

नागपूर अधिवेशनच्या वेळेस सर्व गोष्टीचे पालन केले होते आणि पुढचा  अधिवेशनाला  मुंबईला कायमस्वरूपी हिरकणी कक्ष करण्यात येईल जेणेकरून आपल्या मतदार संघासाठी काम करण्याऱ्या आपल्या महिला आमदारांना सहकार्य होईल. परंतु आज कुठलीच व्यवस्था त्या ठिकाणी झालेली नाही. विधिमंडळाचे कोटी रुपयाचं टेंडर निघाले आहे तिथे काम चालू आहे पण एक महिला आमदाराचा छोट्या बाळासाठी कोणती व्यवस्था झालेली नाही याचा दुःख होता असल्याची भावना सरोज अहिरे यांनी व्यक्त केली. जर आज व्यवस्था झाली नाही तर मला हे अधिवेशन सोडून जावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

पत्रकार काशिनाथ म्हादे 'निर्भीड पत्रकार' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

पत्रकार काशिनाथ म्हादे 'निर्भीड पत्रकार' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )

                 गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारितेत आपला ठसा उमटवणारे राजकीय पत्रकार काशिनाथ म्हादे यांना निर्भीड पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले.वरीष्ठ पत्रकार आणि दै. प्रहारचे संपादक डॉ.सुकृत खांडेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या नोंदणीकृत संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ, सरचिटणीस सामंत, उपाध्यक्ष के. रवी आणि मुंबईचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर यावेळी उपस्थित होते.
            काशिनाथ महादेव म्हादे गेल्या १३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. क्राईम, शिक्षण, आरोग्य, मुंबई महापालिका बीट ते राजकीय वार्ताहर असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. दैनिक लोकमत, सकाळ, आपलं महानगर, तरूण भारत बेळगाव, नवशक्ती, पुढारी या अग्रगण्य वृत्तपत्रात त्यांनी काम केले आहे. मागील 2 वर्षांपासून Etv भारत या वेबचॅनलसाठी मंत्रालय प्रतिनिधी आणि राजकीय वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत. 
             रत्नागिरीमधील चिपळूण तालुक्यातील तळसर गावचे काशिनाथ म्हादे रहिवासी. घरची परिस्थिती अतिशय बेताची. आई - वडील शेतकरी. त्यामुळे आते भाऊ श्रीकांत पिटले यांनी त्यांना मुंबईत आणले. दत्ताराम वकटे भावोजींनी नोकरीला लावले. शिक्षण घेत असताना इथून खरी पत्रकारिता करीअरची सुरुवात झाली. आई, बहीण भाऊ यांचा विरोध होता. मात्र वडिलांना मुलाच्या मेहनतीचा नेहमीच अभिमान होता. आज राजकीय पत्रकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने कार्याची दखल घेत गौरव केला आहे. गावातील संघटनांपासून चार हात लांब असलेले पत्रकार काशिनाथ म्हादे कोकण विभाग म्हादे परिवार विभाग संलग्न कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठान मुंबई या संघटनेचे सरचिटणीस आहेत.
             सुकृत खांडेकर यांच्या सोबत दै. नवशक्ती या वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या हातून हा पुरस्कार मिळणे हे माझं भाग्य समजतो. मात्र, हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही. अनेक हातानी मला इथपर्यंत पोहचवले आहे. माझी आई छाया, पत्नी आदीती, मोठी बहीण जयश्री लाड, माई, ज्योती, पिंकी, भावोजी जयंत लाड, निलेश शिगवण, प्रशांत रेवाळे, अनंत चव्हाण, भाऊ रवींद्र आणि संदेश, संदीप दादा, त्यांच्या पत्नी पिंकी, अस्मिता, माया म्हादे, माझा जिवलग मित्र तथा मार्गदर्शक कोकणवृत्तसेवाचे मुख्य संपादक प्रशांत गायकवाड, रुपेश सुर्वे, अमित राणे, प्रदीप भीतळे, ईटीव्हीचे व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ आणि प्रमुख मार्गदर्शक सुरेश ठमके यांनी झोकून काम करण्यास दिलेल्या संधीमुळे हा मान मिळाला, असे मत काशिनाथ म्हादे यांनी व्यक्त केले. तसेच, पुरस्कार बाबांना समर्पित केल्याचे ते म्हणाले. आज ते हयात नाहीत, मात्र नेहमीच लढण्याचे बळ आणि जिंकण्याची जिद्द देतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

W 20 च्या महिला शिष्टमंडळाची 'नुरानी मस्जिद'ला भेट !

W 20 च्या महिला शिष्टमंडळाची 'नुरानी मस्जिद'ला भेट !

औरंगाबाद, अखलाख देशमुख‌, दि  २७ : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी जी 20 परिषद अंतर्गत W 20 ही महिलांची आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. यासाठी विदेशातील महिलांचे एक शिष्टमंडळ रविवारी औरंगाबाद शहरात दाखल झाले. यातील काही सदस्यांनी गारखेडा परिसरातील नुरानी मस्जिद पाहण्याची इच्छा व्यक्त केली. 

दुपारी साडेबाराच्या सुमारास या महिला मस्जिदमध्ये पोहोचल्या. त्यांनी मस्जिदची पाहणी करून स्थापत्य शैलीचे कौतुक केले. ही मस्जिद पाहून खूप आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या. मस्जिद कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

Sunday 26 February 2023

वेरूळ- अजिंठा महोत्सवात दुसऱ्या दिवशी शहरवासीयांना मिळाली संगीताची मेजवानी !

वेरूळ- अजिंठा महोत्सवात दुसऱ्या दिवशी शहरवासीयांना मिळाली संगीताची मेजवानी !

'उस्ताद सुजाद हुसेन खान' यांचे सतार वादन आणि गायनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद... 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ :  
शहरवासीयांचा रविवार खऱ्या अर्थाने सत्कारणी लागला. आज सलग दुसऱ्या दिवशी संगीत प्रेमींना संगीताची मेजवानी मिळाली. उस्ताद सुजाद हुसेन खान यांचे सतार वादन आणि गायनाला मायबाप रसिकांनी भरभरून दाद दिली तर ताल वाद्याचे जादूगार पद्मश्री शिवमणी यांच्या वादनाने रसिकांना खेळून ठेवले. शेवटी ताल वाद्याचे जादूगार पद्मश्री शिवमणी तसेच अदिती भागवत यांच्या लावणीने संगीत मैफिलीचा समारोप झाला.

महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय  महोत्सवास शनिवारपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल मध्ये प्रारंभ झाला. 

आज रविवारी  पहिल्या सत्रामध्ये उस्ताद सुजाद हुसेन यांनी यमन कल्याण रागाने सतार वादनाला प्रारंभ केला.   रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. सतार वादनानंतर त्यांनी काही गजल सादर करून रसिकांची मने जिंकली. मेरे हिस्से से कोई नही या गझलला तर रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सितार वादन आणि गायनातील त्यांनी आपली हुकूमत दाखवून दिली त्यांना तबल्यावर अमित चोबे आणि पंडित मुकेश जाधव यांनी सुरेख साथ दिली.

दुसऱ्या सत्रामध्ये ताल वाद्याचे जादूगर पद्मश्री शिवमणी यांनी एकाच वेळी विविध प्रकारचे वाद्य वाजवून रसिकांची वाह वाह मिळवली.त्यांना सतार वादक रवी चारी, गिटार वादक सेल्देन डी सिल्वा, खंजिरा वादक सेल्व गणेश  आणि सितार वादक संगीत हळदीपूर यांनी साथ संगत केली.अदिती भागवत यांच्या कथक नृत्याने तर या संगीत मैफिलीला चार चांद लावले. यावेळी लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस आयुक्त निखिल गुप्ता आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल यांची भेट !

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल यांची भेट !

मुंबई, अखलाख देशमुख‌, दि २६ : 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडत सध्याच्या सरकारच्या संवेदना हरवल्या असून हे तडजोडीचे सरकार काही फार दिवस टिकणार नाही असे सांगत राज्यात गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनिधी सुध्दा सुरक्षित नाहीत असे सांगून उद्या सोमवार २७ फेब्रुवारी पासून सुरू होणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारच्या चहा पानावर बहिष्कार घालत विरोधकांनी सडकून टीका केली.

तसेच महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे जावून सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री अनिल परब,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार अनिल पाटील, आमदार सुनील प्रभू, आमदार कपिल पाटील, आमदार विनोद निकोले उपस्थित होते.

जी-२० परिषदेसाठी प्रतिनिधींचे विमानतळावर उत्साहात स्वागत !

जी-२० परिषदेसाठी प्रतिनिधींचे विमानतळावर उत्साहात स्वागत !

"दिवसभरात विविध देशातील प्रतिनिधींचे आगमन" 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : औरंगाबाद येथे G 20 परिषदेअंतर्गत 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान जागतिक महिला परिषदेचे आयोजन  होत आहे. परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन होताच त्यांचे औक्षण करण्यात आले. जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांनी  पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचे स्वागत केले. 

शिष्टमंडळ विमानतळावरुन बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासमोर लेझीमचे आणि इतर वाद्यांचे सादरीकरण केले. यावेळी करण्यात आलेल्या पारंपरिक स्वागतातून महिला सदस्यांमध्ये विश्वास आणि आपुलकीचा संदेश निर्माण झाला. ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या जिल्ह्यात जागतिक महिला परिषद होत असल्याने राज्याची  संस्कृती आणि शिष्टाचाराची ओळख झाल्याने मनामध्ये वेगळाच आनंद निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेक विदेशी पाहुण्यांनी  विमानतळावर व्यक्त केली. 

यावेळी केंद्रीय वित्त् राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार ज्योती पवार,  श्री.निलावाड यांच्यासह लेझीम पथकाच्या अंजली चिंचोलकर यांच्यासह मुकूंदवाडी महानगर पालिकेतील शाळेच्या 18 मुली आणि 3 वादक मुले उपस्थित होते.   परिषदेसाठी विविध देशातून एकूण 38 महिला सदस्य प्रतिनिधींचे आगमन झाले आहे. 

विमानतळावर आलेल्या महिला प्रतिनिधींचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी स्वागत केले.  जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा आणि वेरुळ लेणीची तसेच औरंगाबाद शहराची थोडक्यात माहिती डॉ कराड यांनी शिष्टमंडळास देत दोन दिवसीय या परिषदेमध्ये तसेच विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. 

यामध्ये एंजेला जू-ह्यून कांग, डॉ.संध्या पुरेचा, बन्सुरी  स्वराज, डॉ.शमिका रवी, रविना टंडन, भारती घोष,  केसेनिया शेवत्सोवा, एलेना म्याकोटनिकोवा, केल्सी हॅरिस, समंथा जेन हंग, प्रभिओत खान, आयेशा अक्तर, कार्लो सोल्डातिनी, उंडा लॉरा सब्बादिनी, जिओव्हाना आयेलिस, मार्टिना रोगाटो, , स्टेफानो डी ट्रेलिया, एल्विरा मारास्को, व्हेनेसा डी अलेस्सांद्रे, अँड्रिया ग्रोबोकोपटेल, सिल्व्हिया तारोझी, निकोलस बोरोव्स्की, कॅथरीना मिलर, हदरियानी उली तिरु इडा सी, येणें क्रिसंती, इस्तियानी सुरोनो, श्री वुर्यानिंगसिह, तंत्री किरणदेवी, हरियाणा हुताबरात, जॉइस फ्रान्सिस्का कार्ला यास्मिन, डेनाटालाइट क्रिस्डेमेरिया, डेनाटली क्रिस्डेमेरिया, फराहदिभा तेन्रीलेंबा, गुल्डन तुर्कन, यांचा समावेश आहे.

यशवंत व्हा ! बुद्धीवंत व्हा ! - वत्सला वाळंज मा. आदर्श सरपंच आंबवणे

यशवंत व्हा ! बुद्धीवंत व्हा ! - वत्सला वाळंज मा. आदर्श सरपंच आंबवणे 

आंबवडे, वार्ताहर - सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथे इ. 10 च्या विद्यार्थ्यांचा "निरोप समारंभ" पार पडला. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपल्या मनोगतात सौ. वाळंज म्हणाल्या की खूप शिका मोठे व्हा पण आई वडिलांनी व शाळेने केलेले संस्कार विसरू नका. मुलगी शिकली पाहिजे असे मला मनापासून वाटते. भविष्यात गरज लागली तर नक्की सांगा. यशवंत व्हा ! बुद्धिवंत व्हा ! कार्यक्रमाला उपस्थित नारायण दळवी - अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, काकाशेठ मेहता - मा.उपसरपंच, योगेश वाळंज - अध्यक्ष शिक्षक पालक संघ, भटू देवरे - मुख्याध्यापक या प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. छोटी पाहुणी शाल्मली (परी) वाळंज हिने विदयार्थ्यांना ऑल दी बेस्ट फ्रेंड्स म्हणत शुभेच्छा दिल्या.

सुरवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. दीप प्रज्वलनानंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीता तुन स्वागत केले. 
याप्रसंगी विद्यार्थ्यानी विविध फोटो फ्रेम शाळेला भेट दिल्या. 

कु. निशांत मेहता याने सरस्वती व महाराजांच्या मूर्ती करिता पाच हजार रुपये देऊ केले. सौ. वाळंज ताई यांच्या वतीने सर्व दहावीतील विद्यार्थ्यांना भेट वस्तू व पेनचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उल्हासभाऊ मानकर उपाध्यक्ष यांचे विशेष सहकार्य लाभले. स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यार्थ्यानी आपल्या भावना प्रकट केल्या. सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी झाला.

रब्बीच्या पिकांवर वन्यप्राण्यांचे संकट; सोयगाव शिवारातील प्रकार--- 'ऑनलाइन तक्रारी' साठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेना !

रब्बीच्या पिकांवर वन्यप्राण्यांचे संकट; सोयगाव शिवारातील प्रकार--- 'ऑनलाइन तक्रारी' साठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेना !

सोयगाव शिवारात वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारात रब्बीच्या पिकांची नुकसान 

सोयगाव, दिलीप शिंदे, दि.२१... जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या सोयगाव शेती शिवारातील रब्बीच्या पिकांवर ऐन कापणीच्या हंगामात वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारा मुळे रब्बी हंगाम अडचणीत आला आहे सोयगावच्या जंगलात रोही, हरीण, मोर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांच्या कळप मुक्तसंचार करून कापणीवर आलेली पिकं आडवी करत आहे वन्यप्राण्यांच्या या नुकसानीच्या भरपाईसाठी मात्र ऑनलाइन तक्रारीचा ससेमिरा असल्याने बाधित शेतकऱ्यांना या ऑनलाइन तक्रारी बाबत वनविभागाच्या वतीने मात्र जनजागृती करण्यात येत नाही त्यातच तक्रारी ची संकेतस्थळ बंद अवस्थेत राहत असल्याने सोयगाव च्या रब्बी उत्पादक शेतकऱ्यांना रब्बीचा हंगाम उत्पन्नासाठी अडचणींचा ठरला आहे.

                                आडवी पडलेली पीक

सोयगाव शिवाराला लागून वेताळवाडी, अजिंठ्याच्या डोंगर यासह घनदाट जंगल आहे या जंगलात अजिंठ्याच्या डोंगर रांगातून वन्यप्राण्यांच्या कळप शेती शिवारात आली आहे ऐन कापणीच्या कालावधीत या वन्यप्राण्यांच्या कळपा कडून पिकांची नुकसान करून पिकांना आडवी करत आहे त्यामुळे सोयगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे दरम्यान वनविभागाच्या पथकाकडून मात्र 'ऑनलाइन तक्रार' केल्या शिवाय नुकसानीचा पंचनामा केल्या जात नाही त्यामुळे या जाचक अटी मुळे शेतकरी हताश झाला आहे. 

वनविभागाच्या पथकांनी या नुकसानी चा पंचनामा ऑनलाइन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

------सोयगाव शिवारात रब्बीच्या हंगामाची तब्बल १२०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे यामध्ये भाजीपाला क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे उन्हाळी पिकांचीही लागवड करण्यात आली आहे मात्र वन्यप्राणी या पिकांची नासाडी करत आहे...

औरंगाबाद मध्ये स्मृती इराणी सोबत सेल्फी घेण्याची संधी !

औरंगाबाद मध्ये स्मृती इराणी सोबत सेल्फी घेण्याची संधी !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती स्मृती इराणी या औरंगाबाद शहरांमध्ये दिनांक 27 फेब्रुवारी वार सोमवार रोजी येणार आहेत जी 20 च्या अनुषंगाने त्यांच्या विविध बैठक आहेत, त्याच बरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या वतीने लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे, त्या मध्ये महिला लाभार्थ्यांना श्रीमती स्मृती इराणी केंद्रीय महिला बालविकास मंत्री यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा फोटो घेण्याचा संधी मिळणार आहे, स्मृती इराणी यांचे हे अभियान औरंगाबाद मधून सुरूहोत आहे, देशभरामध्ये एक कोटी महिला लाभार्थ्यांसोबत स्मृती इराणी ह्या सेल्फी घेणार आहेत, या अभियानाची सुरुवात तापडिया नाट्यमंदिर येथे सोमवार  दुपारी साडेबारा वाजल्या पासून हा कार्यक्रम सुरू होईल, या कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्रीमती चित्राताई वाघ, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सविताताई कुलकर्णी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट माधुरी अदवंत, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई चिखलीकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी , महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर, महिला मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पुष्पाताई काळे, डॉ. उज्वलाताई दहिफळे या प्रमुख महिला पदाधाकारी उपस्थित राहणार आहेत, या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री खा.रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थमंत्री डॉ. खा. भागवत कराड, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, भाजपा राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर, महाराष्ट्र राज्य ओबीसी इतर कल्याण मागासवर्गीय मंत्री माननीय नामदार अतुल सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, मेधाताई कुलकर्णी, सेल्फी विथ स्मृती इराणी या अभियानाच्या राष्ट्रीय संयोजिका व भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, सेल्फी स्मृति ईराणी या अभिनयाच्या महाराष्ट्राच्या संयोजिका वर्षा भोसले, या मान्यवरांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे, या कार्यक्रमला मोठ्या संख्येने महिलानी उपस्थित राहावे असे आव्हान भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, यांनी  केले आहे.

गलवाडा ग्रामपचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पोलीस बंदोबस्तात पारित; सात विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव मंजूर !

गलवाडा ग्रामपचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पोलीस बंदोबस्तात पारित; सात विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव मंजूर !

गलवाडा ग्रामपंचायत मध्ये अविश्वास ठराव पारित झाल्यावर  सदस्य 

सोयगाव, दिलीप शिंदे, दि.१६... गलवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच पंजाबराव कुणगर यांच्या विरोधात नऊ पैकी सात विरुद्ध दोन असा अविश्वास ठराव पारित झाला आहे. ग्रामपंचायत सभागृहात मंगळवारी (दि.२१) दाखल झालेल्या ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. अखेर अविश्वास ठराव दाखल केलेल्या सहा सदस्यांच्या मागणीवर एकमत न झाल्याने अखेर अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पिठासन अधिकारी रमेश जसवंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले यावेळी ठरावाच्या बाजूने सात जणांनी तर ठरावाच्या विरोधात दोघांनी मतदान केले, त्यामुळे सात विरुद्ध दोन असा सरपंच पंजाबराव कुनगर यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित होऊन मंजूर झाला आहे. यावेळी सभागृहात नऊचे नऊ सदस्य उपस्थित होते.

                              पोलीस बंदोबस्त

गलवाडा ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी दिलेल्या अविश्वास ठरावात सात मुद्दे नमूद केले होते यामध्ये सरपंच पंजाबराव कुणगर हे सदस्यांना विश्वासात न घेता विकासकामे करतात, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सतत गैरहजर राहून सदस्यांचे काही एक म्हणणे ऐकून घेत नाही गावाच्या स्वच्छते बाबत उदासीन राहून ग्रामपाणी पुरवठा बाबत कोणताही निर्णय घेत नाही तसेच मासिक बैठकीत गैरहजर राहतात अशा सात मागण्या मुळे नाराज होवून सहा सदस्यांनी गुरुवारी सोयगाव तहसिल कार्यालयात अविश्वास ठराव  दाखल केला होता.

----- यावेळी सभागृहात सरपंच पंजाबराव कुनगर, उपसरपंच मंगलाबाई बिरारे, सुशिलाबाई इंगळे, दीपाली औरंगे, फिरोज उस्मान पठाण, रवींद्र जगताप, आसमाँ हुसेनखा पठाण, सखुबाई इंगळे ,मधुकर इंगळे आदी सदस्य उपस्थित होते. याकामी अध्यासी अधिकारी रमेश जसवंत, मंडळ अधिकारी मारोती धोंडकर, आशिष औटी, ग्रामसेवक गणेश गवळी,प्रेम राजपूत, यांनी कामकाज पाहिले.

---पोलीस बंदोबस्तात गलवाडा ग्रामपंचायत च्या सभागृहात मंगळवारी अविश्वास ठरावाची प्रक्रिया राबविण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक अनमोल केदार, रवींद्र तायडे, गणेश रोकडे, राजू बर्डे आदींनी बंदोबस्त ठेवला होता...

सोयगावच्या आठवडे बाजारात भाजीपाला दरामध्ये चढ-उतार सुरूच !

सोयगावच्या आठवडे बाजारात भाजीपाला दरामध्ये चढ-उतार सुरूच !

सोयगाव, (बाळू शिंदे, सोयगाव).. १४ खेड्यांना लागून असलेल्या सोयगाव च्या आठवडे बाजारात मंगळवारी भाजीपाला दरात चढ-उतार आढळून आला दरम्यान मेथीच्या दरात चढ-उतार कायम असून वांगी,सिमला, गवार चे दर तेजीत होते कोथिंबीरचे दर आवाक्यात असून कोथिंबीर ची पेंढी पाच रु ला एक असे होते.

सोयगाव आठवडे बाजारात फळ मार्केट मध्ये द्राक्षे व टरबूजची आवक झाली आहे द्राक्षाच्या आवक वाढल्याने दर आवाक्यात आले आहे स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढली आहे त्यामुळे कोबी, फ्लॉवर, ओली मिरची, भेंडी, दोडक्याच्या दर स्थिर आहेत या आठवड्यात वांग्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे दरात वाढ झाली असून, गवारचे दर चढेच राहिले आहे गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात ६० रु प्रति किलो असणारी गवार ७५ रु पर्यंत पोहचली आहे उष्णता वाढू लागल्याने काकडीचे दर ही वाढू लागले आहे सध्या बाजारात तीस रु किलो दर असला तरी किरकोळ विक्री साठी चाळीस रु मोजावे लागतात पाले भाज्यांचे आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे किरकोळ बाजारात मेथी, पालक, पाच रु पेंढी चा दर आहे शेंगेचा दर कमी झाला असून दहा रुपयांनी शेंगा चा दर आहे फळ मार्केट मध्ये द्राक्षे, सफरचंद, डाळिंब, टरबूज, खरपूस कलिंगड आदी फळांची आवक वाढली आहे..... त्यामुळे दर चाळीस ते पन्नास रु किलो आहे...

सोयगाव वन विभागाच्या सतर्कतेमुळे वेताळवाडी जंगलात लागलेली आग आटोक्यात !

सोयगाव वन विभागाच्या सतर्कतेमुळे वेताळवाडी जंगलात लागलेली आग आटोक्यात !

     वेताळवडीच्या जंगलात रात्री आगीने घातलेला विळखा 

सोयगाव, दिलीप शिंदे, दि.२६... अजिंठ्याच्या डोंगरात वेताळवाडी च्या जंगलात पश्चिम वनक्षेत्रात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आगीचा वणवा पेटला दरम्यान आगीचा वणवा रौद्ररूप धारण करून सिल्लोड तालुक्यातील वनक्षेत्रात पुढे सरकत होता मात्र सोयगाव वनक्षेत्र विभागाचे पथकांनी रात्री घटनास्थळी धाव घेवून मध्यरात्री एक वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली होती.दरम्यान सोयगाव वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाची वेळीच उपाय योजना मुळे सोयगाव चे वेताळवाडी जंगलातील वनसंपदा आगीच्या विळख्यातून बचावली आहे मात्र तरीही आगीच्या विळख्यात दोन ते तीन हेक्टर क्षेत्र जळून झाक झाले असल्याची माहिती वनविभागाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे.

सोयगावच्या वेताळवाडी पश्चिम वनक्षेत्रात शनिवारी रात्री (दि.२५) आग लागल्याचे वनकर्मचारी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ भ्रमणध्वनी द्वारे वरिष्ठांना माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारीअनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनखाली वनपाल गणेश सपकाळ यांनी दोन पथके तयार करून घटना स्थळी रवाना केले. आगीने उग्र रूप धारण झाले परंतु आग नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच दोन्ही पथकांनी दोन्ही बाजूने ब्लोअर मशीन व झाडाच्या फांद्यानी आग आटोक्यात आणली व आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश.सपकाळ, व्ही. आर. नागरे वनरक्षक, जी.टी.नागरगोजे वनरक्षक, शरद चेके वनरक्षक, नितेश मुलताने ,कृष्णा पाटील व वनमजूर यांनी पूर्ण केली. 
सोयगाव वन परिक्षेत्र वन, वन्यजीव व वनसंपत्ती यांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाय योजना करीत असून आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वन हद्दी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीसे द्वारे  बंधारे न जाळण्याचे सूचित करण्यात येणार असल्याचे या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अनिल मिसाळ यांनी सांगीतले..

कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाट खड्यात, पोलीस चौकी समोरच जीवघेणे खड्डे, रेल्वे ठेवा बाजूला पहिले रस्ते द्या ?

कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाट खड्यात, पोलीस चौकी समोरच जीवघेणे खड्डे, रेल्वे ठेवा बाजूला पहिले रस्ते द्या ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाट अक्षरशः खड्यात गेला असून तळवली पुलापासून  मढच्या पुढे पर्यंत या मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून मोरोशी नाका पोलीस चौकी समोरच जीवघेणी खड्डे आहेत. याशिवाय माळशेज घाट परिसरातील अनेक गावाना रस्ते नाहीत ज्या गावाला रस्ते आहेत ते असूनही नसल्यासारखे असल्यामुळे रेल्वे ठेवा बाजूला प्रथम जमीनीवर चालण्यासाठी रस्ते द्यावे अशी संतप्त भावना येथील ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

कल्याण नगर मार्गावरील माळशेज घाट हे पर्यटन केंद्र म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या घाटात दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येतात. त्याचप्रमाणे ओतून, नारायणगाव, मंचर, जुन्नर अशा बाजारपेठा असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, भाजीपाला, कांदे, इतर अवजड वाहतूक या मार्गावर सतत चालू असते. नुकतीच सावर्णे येथे पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कल्याण नगर मार्गाचे सिंमेट काँक्रीटीकरण चे उद्घाटन झाले होते. ते सावर्णे येथे बंद आहे. मढ बाजूला सुरू आहे.
असे असलेतरी सध्या माळशेज घाटात तळवली पुलापासून  फांगुळगव्हाण, डोंगरवाडी, शिसवेवाडी, मोरोशी, थितवी, मढ, पिपळगावधरण पुलापर्यत रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे टोकावडे पोलीस चौकी अंतर्गत मोरोशी नाका पोलीस चौकी समोर एक ते दिड फुट खोल खड्डे पडले आहेत. येथे तसेच इतर ठिकाणी अनेक वेळा जीवघेणे अपघात झाले आहेत व होतात पण याकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधी,मंत्री, आमदार, खासदार, नँशनल हायवे अँथोरटी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही.

इतकेच नव्हे तर या घाटातील आंबोमाळी या ३०/४० लोकवस्ती असलेल्या गावाला रस्ताच नाही, तर फांगुळगव्हाण, मोरोशी, साकिरवाडी, निरगुडपाडा, चिंचवाडी, थितवी, वाघवाडी, शिसवेवाडी, फांगणे, आवळीची वाडी आदी गावांचे रस्ते असून नसल्यासारखे झाले आहेत. 

याला राजकारण कारणीभूत ठरते आहे. ते इतके टोकाचे झाले आहे की, या गावातील काही तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयतीचे निमंत्रण देण्यासाठी एका लोकप्रतिनिधीकडे गेले असता, साहेब आमच्या गावात रस्ता नाही, याकडे लक्ष द्यावे अशी विंनती केली असता, त्यावर तूम्ही दुसऱ्या कडून तूमचा रस्ता मंजूर करून घेतला ना? तो कसा होतो तो मी पाहतो? असा दमच या तरुणांना देण्यात आला,
आता बोला, जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असे बोलत असेल तर त्या गावाचे काय? सध्या मुरबाड रेल्वे चा विषय चर्चेला जात आहे. यावर येथील ग्रामस्थांना विचारले असता, पहिल्यांदा आम्हांला जमीनीवर चालण्यासाठी रस्ते द्या, मग रेल्वेचे स्वप्ने दाखवा अशी संतप्त भावना या ग्रामस्थांनी बोलून दाखविली. या परिसरातील ग्रामपंचायत आप आपल्या परिने नागरिकांना सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना मर्यादा येत असल्याने 'विकास, होत नाही. परंतु शासनाचे काय? खरेच सरकारचे यांच्या कडे लक्ष आहे,?तर उत्तर नाही असेच द्यावे लागेल व या परिसरातील विकास 'कोठे हरवला आहे, याचा शोध घ्यावा लागेल.

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !!

राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे आयोजन !! पुणे, प्रतिनिधी : भारतीय शालेय खेळ महास...