Wednesday 30 November 2022

'महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना !

'महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपाध्यक्ष असतील. या समितीत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार सदस्य असतील.

याशिवाय या समितीमध्ये विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. याशिवाय डॉ.अनिल काकोडकर, डॉ.शशिकला वंजारी, वासुदेव कामत, ॲड. उज्ज्वल निकम आणि डॉ. जयंत नारळीकर हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतील. सदर समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहील.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना !

राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतांना ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.

नाटक या कलाक्षेत्रासाठी सतिश पुळेकर, कंठसंगीतासाठी मृदला दाढे-जोशी, उपशास्त्रीय संगीतासाठी मंजूषा पाटील, चित्रपटासाठी सुमित राघवन, कीर्तनासाठी विजय बोधनकर, शाहिरीसाठी शाहीर नंदेश उमप, नृत्यासाठी राजश्री शिर्के, कलादानासाठी जयराज साळगांवकर, वाद्यसंगीतासाठी तौफिक कुरेशी, लोककलासाठी सत्यपाल महाराज चिंचोलकर आणि आदिवासी गिरीजनसाठी डॉ. बाळु धुटे हे नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहील.

लघुवाद न्यायालयात संविधान दिनी शोभायात्रा !

लघुवाद न्यायालयात संविधान दिनी शोभायात्रा !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लघुवाद न्यायालयात संविधान दिनाचे औचित्य साधून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. संविधानातील कलम २१ व कलम ३९ अ अंतर्गत नागरिकांना त्यांचे हक्क व अधिकार यांची जाणीव व्हावी हा त्यामागचा हेतू होता. या शोभायात्रेत लघुवाद न्यायालयातील मुख्य न्यायाधीश, अतिरिक्त मुख्य न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, प्रबंधक, अप्पर प्रबंधक तसेच कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला. 

लघुवाद न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ही शोभायात्रा वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो चौक) ते हुतात्मा चौक अशी काढण्यात आली. हुतात्मा चौकात पोहचल्यानंतर न्यायाधीश डी. एस. दाभाडे यांनी संविधानातील कलम २१ व कलम ३९ (अ) चे महत्व समजावून दिले. हा कार्यक्रम मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. त्याचे यशस्वी आयोजन प्रबंधक ना. वा. सावंत तसेच अप्पर प्रबंध निलम शाहीर, अतुल राणे व रश्मी हजारे यांनी केले. कार्यक्रमात कर्मचारी वर्गाचाही सक्रीय सहभाग लाभला.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन !

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे वयाच्या ७४व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
 
मुखेड (जि. नांदेड) येथे २९ मार्च १९४८ रोजी जन्मलेल्या नागनाथ कोत्तापल्ले यांनी साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती केली. १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले. १९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते.

१९८० मध्ये औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून डॉ. यु. म. पठाण सरांच्या मार्गदर्शनाने 'शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर त्यांनी पीएच. डी. चं संशोधन केलं. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते तसेच २००५ पासून २०१० पर्यंत कोतापल्ले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं. दरम्यान, नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असं कामही त्यांनी पाहिलं. 

*कोत्तापल्ले यांना मिळालेले पुरस्कार* 

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार -मूड्स (१९७६) संदर्भ (१९८४) गांधारीचे डोळे (१९८५) ग्रामीण साहित्य (१९८५) उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२) 'ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध'साठी परिमल पुरस्कार (१९८५) 'ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२) दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८) यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१) राख आणि पाऊस'साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५) राख आणि पाऊस'साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५) 'साहित्य अवकाश'साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार

*अभिजात लेखणी शांत झाली – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार*

ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने अभिजात लेखणी शांत झाली आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मुनगंटीवार म्हणाले, कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा या साहित्यप्रकारांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या प्रा. कोतापल्ले यांनी आपल्या लेखनातून समाजाला दिशा देत नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. साहित्यिक म्हणून ते जितके परिचित होते तितकाच त्यांनी कुलगुरु पदावर आपला ठसा उमटवला. एक अध्यापनकुशल आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठी ग्रामीण साहित्यात त्यांचे योगदान मोठे होते. महात्मा फुले यांच्या जीवनावरील डॉ. कोतापल्ले यांचा 'ज्योतीपर्व' हा ग्रंथ सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. कुलगुरु असताना ‘कॉपीमुक्त विद्यापीठ अभियान’ राबविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राज्य सरकारच्या मराठी राजभाषा धोरण विषयक समितीवर काम करताना त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रा. कोतापल्ले यांच्या निधनाने साहित्य आणि शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर प्रा.नागनाथ कोतापल्ले यांना सद्गती देवो. कोतापल्ले कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असून हे दु:ख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर वंचित ची युती भाजपाला मारणार तर मविआ ला तारणार ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर वंचित ची युती भाजपाला मारणार तर मविआ ला तारणार ?

कल्याण, (संजय कांबळे) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात सध्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर क्रांतिवीर वस्ताद लहूजी साळवे यांच्या जाहिर कार्यक्रमात उध्दव ठाकरे सहभागी झाले, या सर्वाचा अंत्यत चांगला परिणाम बहुजन समाजावर झाला असून भविष्यात वंचित बरोबर युती झाल्यास याचा जबरदस्त फटका भाजपाला बसणार असून यामुळे महाविकास आघाडी ला तारणार असे चित्र दिसत आहे.

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन समाजाला एकत्र करून वंचित आघाडी स्थापन केली, संपूर्ण महाराष्ट्रात याला चांगला प्रतिसाद मिळाला. सन २०१९ ,च्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित ला ९० हजार ते ३लाखाच्या आसपास मतदान मिळाले, सांगली, अकोला हिंगोली सोलापूर आदी जिल्ह्यात तर ,२/३, लाख मतदान झाले, दुर्दैवाने काँग्रेस, राष्ट्रवादी चे तब्बल ३७ उमेदवारांना याचा फटका बसला होता. या निवडणुकीत एकूण मतदानाच्या १४ टक्के मतदान वंचित ला झाले होते.
केवळ ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर भिवंडी लोकसभा मतदार संघात वंचित च्या उमेवारानी तब्बल ५१ हजार इतकी मते घेतली होती,तसेच कल्याण लोकसभा निवडणुकीत देखील वंचित ने चांगली कामगिरी केली होती.

सध्याचा विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड अनेकांना रुचले नाही, कल्याण डोंबिवली परिसरातील एका संस्थेने आँनलाईन केलेल्या सर्व्हे मध्ये सध्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच सर्वाधिक पंसती मिळाली आहे, याशिवाय हे राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहे का? अशा प्रश्नावर तब्बल ७०/८० टक्के लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. तसेच हे सरकार स्थिर सरकार होईल का?अशा प्रश्नाला नाही असे म्हणणारे अधिक आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदारांचे वादग्रस्त वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अपमान, वाढती महागाई, विविध उद्योग गुजरात ला जाणे, हेही कारणे आहेत च,अशातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बरोबर केलेली जवळीक, वस्ताद लहुजी साळवे यांच्या कार्यक्रमात सहभाग यामुळे गेली अनेक वर्षे शिवसेना पाण्यात पाहणारा मागासवर्गीय समाज बदलतोय, ठाणे जिल्ह्यातील भिंवडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ आदी तालुक्यात वंचित आघाडीचे चांगले वर्चस्व आहे, ऐवढेच नाही तर अनेक ग्रामपंचायत मध्ये सदस्य, सरपंच, वंचित चे आहेत, भीम अनुयायांचा सुरुवातीपासून भाजपाला विरोध आहे.  इतर रिपब्लिकन गटाचे  अस्तित्व अत्यल्प आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत वंचित तस इतर गटाशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जवळीक साधली तर हे भाजपासाठी मारक व महाविकास आघाडीसाठी नक्कीच तारक ठरणार यात शंका नाही.

अधिसंख्य पदावरील बोगस अदिवासींसाठी राज्य सरकारने घेतलेला निर्णय तमाम आदिवासी समाजावर अन्याय करणारा - आमदार डॉ. किरण लहामटे

अधिसंख्य पदावरील बोगस अदिवासींसाठी राज्य सरकारने घेतलेला निर्णय तमाम आदिवासी समाजावर अन्याय करणारा - आमदार डॉ. किरण लहामटे

पुणे, अखलाख देशमुख‌ : शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणारा निर्णय हा राज्यातील तमाम आदिवासी समाजावर अन्याय करणारा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला आहे. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल लहामटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. 

अधिसंख्य पदातील ७५ हजार बोगस आदिवासींना कायम करण्याचा आणि त्यांना पेंशन देण्याचा निर्णय हा आदिवासी समाजावर अन्याय करणारा आहे. यातून हे सरकार बोगस आदिवासींच्या मागे उभे आहे असा घणाघाती आरोप किरण लहामटे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी तरतूद केली असताना आज आदिवासी मूळ प्रवाहात येऊ लागले असताना राज्य सरकार असा अन्याय करत आहे, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. त्यामुळे सर्व आदिवासी समजाने शिंदे- फडणवीस सरकारचा राज्यभरातून निषेध व्यक्त करावा, असे अवाहन त्यांनी यावेळी केले. भाजपला मूळातच आदिवासी समाज मान्य नाही त्यामुळे या समाजाला पायाखाली कुचलण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी सर्व आदिवासी समाजाने एकत्र होऊन राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करायला हवा, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

वाचाळविरांना आवरा - अजीत दादा पवार ।

वाचाळविरांना आवरा - अजीत दादा पवार । 

मुंबई, अखलाख देशमुख, दि ३० :  वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील या लोकांना कळत नाही. एखाद्याला ठेच लागली की दुसरा ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करत असतो हे तर यांच्यात दिसतचं नाही. उलट चढाओढ लागलेली दिसते, अशी टीका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी केली. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमनास्पद वक्तव्यावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 

एकाने चूक केली की मग दुसऱ्याला बोलायला संधी मिळाली की, तो चूक करतो, पुन्हा तिसरा चूक करतोय. हे कधी थांबणार आहे? असा संतप्त सवाल अजितदादांनी केला. 

एकनाथ शिंदे स्टेजवर असातानाच त्यांच्या देखतच तुलना केली. आपण कोणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्याला जबाबादरी काय, आपण कसे बोलले पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा विचार करावा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? याचेही तारतम्य या लोकांना राहिले नाही, अशा शब्दांत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुका लागू दे...जनता यांना योग्य जागा दाखवेल, असेही ते म्हणाले.

अंगणवाडी मदतनीस श्रीमती कोळी याना तीन महिन्याच्या आत सेवानिवृत्ती लाभ देण्याचां लोकायुक्तांचा आदेश !

अंगणवाडी मदतनीस श्रीमती कोळी याना तीन महिन्याच्या आत सेवानिवृत्ती लाभ देण्याचां लोकायुक्तांचा आदेश !

जळगाव, प्रतिनिधी : चोपडा तालुक्यातील आडगाव येथील अंगणवाडी मदतनीस श्रीमती सिंधुबाई शामराव कोळी या 30/7/2019 मध्ये 65 वर्षे वय झालेनंतर सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना 30 एप्रिल 2014 पासून 20 वर्षे सेवेनंतर सेवानिवृत्ती लाभ अनुक्रमे एक लाख रुपये व 75 हजार रुपये देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्रीमती सिंधुबाई शामराव कोळी या 1989 ते 2019 पर्यंत सुमारे 30 वर्षे अंगणवाडी केंद्रामध्ये मदतनीस म्हणून कार्यरत होत्या तेव्हा सेवा निवृत्त झाल्यानंतर एकात्मिक बाल विकास योजना कार्यालयाने विमा कॉर्पोरेशन कंपनी शी केलेल्या करारप्रमाने महाराष्ट्र शासनाने त्यांच्या सेवा निवृत्ती द्यावयास पाहिजे होती परंतु त्यांनाच काय ?जळगाव जिल्ह्यात 2017 /18 पासून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे 600/700 सेविका मदतनिसांना भारतीय जीवन विमा निगम कंपनी मार्फत त्यांचे सेवानिवृत्त लाभ मिळत नाहीत. वयाच्या 65 व्या वर्षी सेवानिवृत्ती झाल्यानंतर सेविका किंवा मदतनीस यांची शारीरिक क्षमता संपते त्यांना विविध आजांर ही बळावत असतात अशा तऱ्हेने जिल्ह्यात सहा सातशे सेविका मदतीस सेवानिवृत्त झालेल्या आहेत त्या स्थानिक कार्यालयाचे उंबरठे जिजवत आहेत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जळगाव जिल्हा व त्या सरकारकडे सतत पत्रे वार करीत असतात परंतु त्यांच्या पत्राची दखलही कोणी घेत नाही म्हणून श्रीमती सिंधुबाई शामराव कोळी 2 वर्षे वाट पाहिली कार्यालयाकडे आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. पण लाभ न मिळाल्याने त्यांनी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष का अमृतराव महाजन यांच्या मार्फत लोकायुक्त मुंबई यांच्याकडे दिनांक 7/5/ 2021 रोजी अपील केले त्या आपिलावर सुनावणी आली असता न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांनी बाल विकास सेवा योजना चोपडा आदिवासी प्रकल्पा चे प्रकल्पधिकारी यांना 11/ 11/ 2022 रोजी आदेश दिला की, त्यांची तक्रारीनुसार तीन महिन्याच्या आत त्यांना सेवानिवृत्ती लाभ देण्यात यावा व लाभ दिल्याचे पत्र लोकांच्या कार्यालयास एक महिन्याच्या आत सादर करावे..

ग्रामपंचायत उमराठ तर्फे २६ नोव्हेंबर "संविधान दिन" मोठ्या उत्साहात साजरा !

ग्रामपंचायत उमराठ तर्फे २६ नोव्हेंबर "संविधान दिन" मोठ्या उत्साहात साजरा !

[निवोशी / गुहागर : उदय दणदणे]
दि. ३० नोव्हेंबर-२०२२

गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ येथील श्री नवलाई देवीची सहाण येथे ग्रामपंचायत उमराठ, जि. प. शाळा उमराठ न.१ व शाळा नं.३ तसेच समस्त ग्रामस्थ बंधू-भगिनीं या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने व मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाच्या प्रेरणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला तसेच भारतीय संविधान पुस्तिकेला पुष्पहार अर्पण करून पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले.

जि.प.शाळा उमराठ नं.३ कोंडवीवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले तर सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व यथाशक्तीय संविधान पुस्तिका देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जि.प. शाळा उमराठ नं.१ च्या विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून सर्वांनी शपथ ग्रहण केली. शाळेतील विद्यार्थ्यांची संविधान व देशभक्तीपर गीते, किर्तनातून संविधान दिनाचे प्रबोधन, संविधानानुसार विद्यार्थींनी घेतलेली बालसभा, मौजे मासूचे सुपुत्र लोकशाहीर सचिन पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेली गीते, पोवाडे व इतर मान्यवरांचे प्रबोधन /मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचे आगळे वेगळे असे खास वैशिष्ट्य ठरले. सरपंच, जनार्दन आंबेकर यांना आंतरराज्य आदर्श सरपंच म्हणून सन्मान झाल्याबद्दल लोकशाहीर सचिन पवार यांनी खास शाहिरीतून सरपंचांचा गौरव केला.

सदर संविधान दिनाच्या कार्यक्रमाला उमराठच्या कदम वाडीतील बौध्दजन ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख पदाधिकारी बौद्धाचार्य सुगंधा कदम, पांडुरंग कदम, श्रीधर कदम, मनोज कदम, अविनाश कदम व धर्मदास कदम हे सर्वजण खास करून मुंबईहून आले होते. त्यांनी ग्रामपंचायत उमराठ, उमराठ गावातील १० वाड्यांना तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांना संविधान पुस्तिकेचे वाटप केले.

 सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, उमराठ खुर्दच्या पोलीस पाटील वासंती आंबेकर, लोकशाहीर सचिन पवार, तंटामुक्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष वसंत कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, सुरेश पवार, भिकू मालप, शांताराम गोरिवले, बौद्धाचार्य सुगंधा कदम, पांडुरंग कदम, विनायक कदम, ग्रामपंचायत सदस्य/सदस्या, आरोग्य सेवक अजय हळये, उमराठ शाळा नं.१ च्या शिक्षिका प्रियांका किर, सायली पालशेतकर, उमराठ शाळा नं.३ चे मुख्याध्यापक शैलेश सैतावडेकर, संजय सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व उत्कृष्ट सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर व अनिल अवेरे सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजनाच्या कामी उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायत उमराठचे असिस्टंट नितीन गावणंग, रोजगार सेवक प्रशांत कदम, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, विनायक कदम, निलेश पवार(बारक्या), सनी गोरिवले, महेश गोरिवले यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. 

 कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री संदीप गोरिवले यांनी सांगितले की, संविधानचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे, सर्व समाजाचे आदर्श आहेत. संविधान पुस्तिका सर्वांनी वाचली पाहिजे तसेच प्रत्येकाने आपापल्या घरी संग्रहीत ठेवली पाहिजे. सुगंधा कदम व पांडुरंग कदम यांनी सुद्धा संविधान व बाबासाहेबांचे विचार यांवर विस्तृत विवेचन केले. 

या संविधान दिन कार्यक्रमाला सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, सर्व बचतगटांच्या महिला सदस्या, शाळेतील विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ बंधू-भगिनीं उपस्थितीत होत्या. 

अध्यक्षीय भाषणात सरपंच जनार्दन आंबेकर यांनी संविधान दिनाचे महत्त्व आणि नागरिकांची जबाबदारी याबाबतीत मार्गदर्शन करताना सांगितले की, २६ नोव्हेंबर हा दिवस प्रतिवर्षी भारतीय संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. याच दिवशी १९४९ साली संविधान प्रक्रिया पुर्ण करून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे घटनेची मूळ प्रत सादर केली. त्यानंतर दि. २६ जानेवारी १९५० पासून आपल्या देशात लोकशाही राज्य खऱ्या अर्थाने सुरू झाले. या घटनेत सर्वसामान्य जनतेचे हक्क आणि कर्तव्य आहेत. त्याचप्रमाणे जबाबदारी नमुद करण्यात आली आहे. प्रत्येकाने आपले हक्क आणि जबाबदारीचे पाळण केले पाहिजे असे सांगून सदर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानून सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर अनिल अवेरे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी कल्पेश राऊत !

जन आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी कल्पेश राऊत !

जव्हार-जितेंद्र मोरघा

जन सामान्यांच्या समस्यांचा निवारा करण्यासाठी जव्हार तालुक्यातील कासटवाडी, जुनीजव्हार, आयरे आणि रायतळे या चार ग्रामपंचायती मिळून एक जन आरोग्य समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

आरोग्य वर्धीनी केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे गरदवाडी येथे झालेल्या सभेत जन आरोग्य समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती आरोग्य सेविकांच्या कामाचा आढावा व त्यांच्या अडचणी, नागरिकांच्या आरोग्य विषयक सुविधा, स्तनदा व गरोदर मतांची सुरक्षितता, मुलांच्या लासीकरणावर देखरेख, साथीच्या आजारांचे पूर्वनियोजन अश्या पद्धतीने समितीची एक दक्षता असणार आहे. या वेळी आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता या विषयीही चर्चा करण्यात आली.

या जन आरोग्य समितीच्या उपाध्यक्ष पदी डॉ.संजय लोहार, सचिव डॉ.कोमल गायकवाड, सदस्यपदी जुनीजव्हार ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश भोये, आयरे ग्रामपंचायतीचे सरपंच देवराम धिंडा, रेणुका गवळी, रेखा पोटिंदे, रामदास किरकिरे, पुष्पा गावित व कविता भुसारा अशी समितीची रचना राहणार असून या समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या प्राथमिक आरोग्य विषयक सुविधा आता तरी वेळेवर उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

रोजगार सेवक हेच स्थलांतर रोखु शकतात - प्रदीप वाघ

रोजगार सेवक हेच स्थलांतर रोखु शकतात - प्रदीप वाघ

जव्हार-जितेंद्र मोरघा

तालुक्यातील रोजगार सेवक यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला असुन आज ग्राम रोजगार सेवक शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उपसभापती  प्रदीप वाघ यांना दिले.

यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की मी आपल्या सोबत ठाम पणे उभा असुन आपल्या सर्व मागण्या रास्त आहेत. शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, या साठी मी सर्व लोकप्रतिनिधी यांना संपर्क करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच त्यांनी रोजगार सेवक खऱ्या अर्थाने जनतेला काम उपलब्ध करून देतात व स्थलांतर रोखण्यासाठी एक प्रकारे मदतच करतात असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

आपण या मधुन लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु आपणही सहकार्य करावे असे आवाहन प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले. यावेळी  भगवान कचरे,  विलास गवारी,सोमा शिद, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Tuesday 29 November 2022

आई वडिलांचे छत्र हरपलेल्यांसाठी मदतीचे शेकडोचे हात सरसावले, म्हारळगावात माणुसकीचे दर्शन !

आई वडिलांचे छत्र हरपलेल्यांसाठी मदतीचे शेकडोचे हात सरसावले, म्हारळगावात माणुसकीचे दर्शन !

कल्याण, (संजय कांबळे) : भ्रष्टाचार, आरोप प्रत्यारोप, घाणेरडे राजकारण, शेकडो तक्रारी आदी मुळे पुरते बदनाम झालेल्या म्हारळ गावात सध्या माणुसकीचे अनोखे दर्शन घडत आहे,ते म्हणजे गेल्या ४/५ दिवसापूर्वी गावातील सुर्यानगर परिसरात राहणा-या श्रीमती रंजना उमाजी कांबळे यांचे स्लँब कोसळून दु:खद निधन झालं, एक वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते, त्यामुळे आईवडिलाविना पोरखे झालेल्या मुलांना आधार/ मदत देण्यासाठी, विविध संस्था, संघटना पुढे सरसावल्या असून आतापर्यत शेकडो लोकांनी मदत देऊ केली आहे, त्यामुळे म्हारळ गावात अनोख्या माणुसकीचे दर्शन पाह्याला मिळत आहे‌.

मागिल शुक्रवारी म्हारळ गावातील सुर्यानगर येथे राहणा-या श्रीमती रंजना उमाजी कांबळे या घरकाम करणा-या महिलेच्या अंगावर घराचे स्लँब कोसळून जागीच मृत्यू झाला होता तर मुलगी कु प्रज्ञा हि गंभीर जखमी झाली, मुलगा राज व दुसरी मुलगी बाजूला झोपायला गेल्याने सुदैवाने वाचली ,यांच्या वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते व आता आई ही निघून गेल्याने ही मुले पोरखी झाली आहेत.

अशातच मुलगी प्रज्ञा हिचा उजवा डोळा निकामी झाल्याची माहिती मिळत आहे, तसेच तिच्यावर ४/५ शस्त्रक्रिया करावयाच्या आहेत, निराधार झालेल्या कुंटूबाला म्हारळ गावातील आम्ही युवा प्रतिष्ठान ग्रुप, मी म्हारळकर आणि बौध्द विहार संघटना समन्वय समिती यांनी' एक हात मदतीचा,या शिर्षकाखाली तमाम नागरिकांना या पोरख्या झालेल्या अनाथाना मदत करण्याचे अवाहन केले ,आणि आश्चर्य बघताबघता कोणी, २०० कोणी ५०० एक हजार, दोन हजार अशी मदत सुरु झाली, आजमितीस सुमारे १०० च्या आसपास लोकांनी मदत केली आहे, शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल पंरतू आपले काहीतरी कर्तव्य आहे, असे समजून या कुंटूबाला मदतीचा ओघ सुरु झाला आहे, 

अत्यंत योग्य वेळी मदत देणे सुरु झाल्याने म्हारळगाव व परिसरातील तमाम दानशुर व यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करणा-या संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनीधी, यांचेही कौतूक व्हायलाच हवे, अपेक्षा इतकीच आहे की ही मदत "त्या निराधाराच्या "सत्कार्यी लागो, बस्स !

१ डिसेंबर रोजी शिवसेनेचे जिल्हाभर चक्काजाम आंदोलन !

१ डिसेंबर रोजी शिवसेनेचे जिल्हाभर चक्काजाम आंदोलन !

औरंगाबाद अखलाख देशमुख, दि २९ : शेतकरी बांधव अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक विवंचनेत सापडला असून सध्या राज्यभर शेतकऱ्यांकडून वीज बिलाची सक्तीने वसुली सुरू आहे, पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे तसेच विमा कंपन्यांचा भोंगळ कारभार व दादागिरीच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या आदेशाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली *शिवसेनेच्या वतीने एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण जिल्हाभर गुरुवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे विरोधी पक्ष नेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी कळविले आहे.

यात औरंगाबाद जिल्ह्यातील *वैजापूर तालुक्यात शिऊर बंगला या ठिकाणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या* नेतृत्वाखाली तसेच सहसंपर्कप्रमुख ॲड आसाराम रोठे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक आनंदीताई अन्नदाते उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, संजय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

*गंगापूर तालुक्यातील ईसारवाडी फाटा या ठिकाणी विरोधी पक्ष नेता जिल्हाप्रमुख अंबादास दानवे* यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, अविनाश पाटील, कृष्णा डोणगावकर, अंकुश सुंभ, जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

*कन्नड तालुक्यातील पिशोर नाका या ठिकाणी आमदार उदयसिंह राजपूत,* उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका हर्षलीताई मुठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 

*रत्नपुर तालुक्यात भक्तनिवास समोर महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप यांच्या* नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

*सिल्लोड तालुक्यात आंबेडकर चौक या ठिकाणी जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड,* उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अग्रवाल, जिल्हा युवा अधिकारी कैलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

*फुलंब्री तालुक्यात टी पॉइंट या ठिकाणी उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ पवार यांच्या* नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

*पैठण तालुक्यात सह्याद्री हॉटेल समोर या ठिकाणी उपजिल्हाप्रमुख अंकुश रंधे, महिला आघाडी जिल्हा संघटिका राखी परदेशी जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ यांच्या* नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

*करमाड तालुक्यात उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे यांच्या* नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनास उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, शेतकरी बांधव, नागरिकांनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख दिनेश मुथा, सचिन बंडू वाणी, सुभाष कानडे, संजय मोटे, राजू वरकड, रघुनाथ घडामोडे, दिलीप मचे, सोमनाथ करपे, मनोज पेरे, शंकर ठोंबरे, अनंत भालेकर, तालुका विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, मनोज गायके, डॉ.अण्णा शिंदे, गणेश अधाने, रघुनाथ चव्हाण, अक्षय खेडकर, सोमनाथ जाधव,अमित वाहुळ, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका लताताई पगारे, हर्षलीताई मुठ्ठे, तालुका संघटिका अर्चना सोमासे, वैशाली जाधव, पल्लवी मोहिते, शशिकला बारगळ, वैशाली बदर, मंगला कापरे, तालुका युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, योगेश पवार, आतिश देवगिरीकर, राजेंद्र तायडे, विकास गोर्डे, आकाश लेंभे, ऋषिकेश धाट व शिवसेना औरंगाबाद  च्या वतीने करण्यात आले आहे.

विम्या कंपन्यांना इशारा - 'शेतकऱ्यांना' नडू नका *विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा*

 विम्या कंपन्यांना इशारा - 'शेतकऱ्यांना' नडू नका  *विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा 

मुंबई, अखलाख देशमुख, दि २९  -  अतिवृष्टी, संततधार यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. त्यात पीक विम्याचा परतावाही शेतकऱ्यांना मिळत नाही. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांना नडू नका असा इशारा पीक विमा कंपन्यांना दिला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आज आयसी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या पीक विम्या कंपनीच्या प्रभादेवी येथील मुख्यालयाला भेट देऊन कंपनी प्रशासनाला जाब विचारला.
तसेच एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि., भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी विधानभवनातील दालनात अंबादास दानवे यांनी बैठक घेऊन पीक विम्याच्या परताव्याचा आढावा घेतला.

शेतकऱ्यांना पीक विमा मदत मिळत नसून आधीच अतिवृष्टी व संततधार यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक घेण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी दूरध्वनीद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. या मागणी नंतर आज कृषी मंत्र्यांनी सर्व पीक विम्या कंपन्यांची आढावा बैठक बोलावली आहे.


राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानानंतर पीकविमा नाकारण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांवर आहे. विमा कंपन्या एकप्रकारे शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खातायत. मदतही वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना आग्रही भूमिका मांडत असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, शाखा क्र.१९३च्या  शाखाप्रमुख संजय भगत, माजी महापौर व महिला विभाग संघटक श्रद्धा जाधव,
शाखासंघटक कीर्ती म्हस्के, युवासेना शाखाधिकारी चिंतामणी मोरे, रेखा देवकर व शिवसेना पदाधिकारी तसेच आयसीआयसीआय लोंबार्डचे अधिकारी उपस्थित होते.

सरपंच रसिका राजेंद्र कळंबे यांच्या हस्ते आमडोशी नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन...

सरपंच रसिका राजेंद्र कळंबे यांच्या हस्ते आमडोशी नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन... 

       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत "हर घर जल" या कार्यक्रम अंतर्गत पेण तर्फे तळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील  मौजे आमडोशी येथील वाढीव नळपाणी पुरवठा योजनेसाठी 27 लक्ष रुपये  मंजूर झाले. 
      सदर योजने संदर्भात मागील मे महिन्यामध्ये शासनाच्या माध्यमातून सर्वे करून वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याचे यश म्हणून आज आम्ही सदर नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करत आहोत. असे पेण तर्फे तळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. रसिका राजेंद्र कळंबे म्हणाल्या. 
     सदर योजने बाबत पुढे माहिती देताना सरपंच रसिका राजेंद्र कळंबे म्हणाल्या की, राष्ट्रीय जलजीवन मिशन योजने अंतर्गत पेण तर्फे तळे ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मौजे बोरघर येथील नळपाणीपुरवठा योजना सुमारे 60 लक्ष रुपये आणि मौजे पेन तर्फे तळे येथील 1कोटी 2 लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना आपल्याच पाठपुरावयमुळे मंजूर झाल्या असून लवकरच पेन तर्फे तळे येथील भूमिपूजन करून काम चालू होईल, अशी माहिती सरपंच रसिका राजेंद्र कळंबे यांनी सदर भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी दिली. 
     सदर कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत पेण तर्फे तळे सरपंच रसिका कळंबे, अध्यक्ष गणेश घुलघुले, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ शिगवण, ग्रामपंचायत सदस्य निशा सकपाळ, माजी उपसरपंच मोतीराम घुलघुले, ग्रामसेवक अभिषेक मकु, पाणी कमिटी सचिव बाबुराव नासकर, खजिनदार सुनील शिगवण, ग्रामस्थ मनोज सोनकर, नामदेव घुलघुले, अंकुश घुलघुले, काशीराम कासारे, सिताराम भोनकर, सुरेश गायकवाड आणि आमडोशी, बोरघर, पेण गावातील नागरिक उपस्थित होते.

नालासोपारात कॉंग्रेस ला खिंडार, रूचिता नाईक यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश !

नालासोपारात कॉंग्रेस ला खिंडार, रूचिता नाईक यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश !

वसई, प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात सक्रिय असलेल्या कॉंग्रेस समेळगाव अध्यक्षा रूचिता नाईक यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादामुळे अध्यक्ष पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आपल्या समर्थकांसह जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

जिल्हाध्यक्ष यांनी स्वागत करत पक्ष कार्यास शुभेच्छा देत महिला आघाडी शहर संघटक नालासोपारा शहर (प) प्रभाग समिती (ई)  हि मोठी जबाबदारी रूचिता नाईक यांना देण्यात आली.

बहुजन पँथर जिल्हाध्यक्ष महेश निकम व शाखा प्रमुख असिफ शेख यांनी हि रूचिता नाईक यांचे काम पाहुनी त्यांना पाठिंबा दिला.

पक्ष संघटना वाढवण्यासाठी तसेच  नालासोपाराचा विकास, सामान्य नागरीकांचा समस्या प्रशासना कडुन कामे करून घेण्यासाठी  व शासकीय योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवुन देण्यासाठी व  महिलांच्या  समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द राहिल असे रूचिता नाईक यांनी सांगितले..

Monday 28 November 2022

६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ !

६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ !

मुंबई (प्रतिनिधी) : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित ६१ व्या महाराज्य नाट्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई केंद्र २ (प्रभादेवी) केंद्रावरील प्राथमिक फेरीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटन सोहळ्यास दृकश्राव्य माध्यमातून स्पर्धेतील सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

राज्य नाट्य स्पर्धेतील पुरस्कारांची व मानधनाचीही रक्कम वाढवणार अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी , वेशभूषाकार प्रकाश निमकर, नेपथ्य प्रकाश योजनाकार सुनील देवळेकर, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक/अध्यक्ष तसेच साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी केंद्रावरील परीक्षक संजय कुलकर्णी, विनिता पिंपळखरे आणि रमेश भिडे यांचे स्वागत पू ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तपस्या नेवे यांनी केले. 
उद्घाटनानंतर विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई या संस्थेच्या वैभव विलास जाधव लिखित आणि मयुरेश शिंदे दिग्दर्शित इन सर्च ऑफ या नाटकाचे उत्तम सादरीकरण करण्यात केले.

जळगाव येथे ग्रंथोत्सव मोठ्या उत्साहात सुरु ; वाचनामुळे विचारांची निर्मिती - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव येथे ग्रंथोत्सव मोठ्या उत्साहात सुरु ; वाचनामुळे विचारांची निर्मिती - पालकमंत्री गुलाबराव पाटील

'ग्रंथालय कार्यालयाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण'

जळगाव, अखलाख देशमुख, दि. २८   :  गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून वाचनाची महत्ता अधोरेखीत करतांना आज तंत्रज्ञान हे कितीही अद्ययावत बनलेले असले तरी वाचनाचे महत्व अबाधीत असल्याचे नमूद केले. वाचाल तर वाचाल अशी म्हण असून प्रतिकूल परिस्थितीतही व्यक्ती घडविण्याचे कार्य ग्रंथ आणि ग्रंथालये करीत असतात. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालय जीवनातील अविभाज्य घटक आहे.  ग्रंथ हे महत्वाचे शस्त्र असून ग्रंथालय हेच ज्ञानेचे देवालय असून या देवालयाचे पुस्तक हेच देव आहे. ग्रंथाचे वाचन केल्याने विचार आणि विचारा FC BB hbw7@ने आचार तयार होतात . वाचनामुळे विचारांची निर्मिती होते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ग्रंथोत्सव सन 2022-23 ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 29 नोव्हेंबर 2012 रोजी जळगाव येथे ग्रंथोत्सव 2012 चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जळगाव मनपाच्या महापौर श्रीमती जयश्रीताई महाजन, नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, अखिल भारतीय मराठी प्रशासक संघ प्रतिनिधी युवराज माळी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष युवराज वाणी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव सुहास रोकडे, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण, धरणगाव माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे,राजेंद्र पाटील, नवलसिंग पाटील, नरेंद्र पाटील यांच्यासह वाचक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथोत्सव सन 2022-23 ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 29 नोव्हेंबर 2012 रोजी जळगाव येथे ग्रंथोत्सव 2012 चे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

*सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन !*

डीपीडीसी मधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रंथालयासाठी वीज बचत व्हावी यासाठी ३१ लक्ष निधी देऊन मागील वर्षी प्रशासकीय मान्यता दिली  होती. या 50 wat सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यन्वित करण्यात आले. यामुळे जिल्हा ग्रंथालय, विद्यार्थी व वाचकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा ग्रंथालय विभागा मार्फत ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात  जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी २ दिवसात होणाऱ्या  कार्याक्रमची सविस्तर माहिती विषद केली.  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसी मधुन जिल्हा ग्रंथालय व सौर उर्जेचा प्रकल्प उभारणी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार हर्षल पाटील यांनी केले.

प्लास्टीक बंदी; कायदेशीर कारवाई सोबत जनजागृती आवश्यक- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश !

प्लास्टीक बंदी;  कायदेशीर कारवाई सोबत जनजागृती आवश्यक- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश !

अकोला, अखलाख देशमुख, दि. २८-  प्रदुषण नियंत्रणासाठी प्लास्टीक बंदी आवश्यक आहे. त्यासाठी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे मात्र त्यासोबत जनजागृतीवरही भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
प्रदुषण नियंत्रण व प्लास्टीक बंदी कारवाई संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. तुषार बावने, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मनिष होळकर, अनंतनंदाई संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील तसेच प्राणीमित्र आदी उपस्थित होते.

  जिल्ह्यात व शहरात प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी सामंजस्य कराराद्वारे स्वयंसेवी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेने कायदेशीर कारवाई करतांना प्लास्टीक वापर बंदी बाबत जनजागृतीही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी दिले. याबाबत समाजात जनजागृती झाल्यास त्यामुळे प्लास्टीक वापरापासून लोक परावृत्त होतील, असेही श्रीमती अरोरा यांनी सांगितले.

लोहमार्ग पोलीसांना झालेतरी काय? आधी चरस विक्री, आता गुटख्यामध्ये हफ्ता, ऐसीबीचा मस्त दस्ता !

लोहमार्ग पोलीसांना झालेतरी काय? आधी चरस विक्री, आता गुटख्यामध्ये हफ्ता, ऐसीबीचा मस्त दस्ता !

कल्याण, (संजय कांबळे) : पुढच्यास ठेस मागचा शहाणा, अशी मराठीत म्हण आहे, परंतु हे मुंबई लोहमार्ग पोलीसाना माहिती नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे,ते आज घडलेल्या पालघर लोहमार्ग पोलीसांच्या हफ्तेखोरी मुळे ?

याबाबत सविस्तर वृत असे की, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातंर्गत पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक अकील जमाल पठाण वय ३२ वर्षे आणि त्यांचा सहकारी पोलीस शिपाई समाधान शेषराव नरवडे यांनी आज महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा वाहतूक करताना एका ३७ वर्षीय पुरुषाला पकडले, यामध्ये कारवाई करु नये म्हणून व यापुढे धंदा सुरु ठेवण्यासाठी दरमहा १० हजार रुपये देण्याची मागणी केली, यातील पहिला १० हजाराचा हफ्ता स्विकारताना डहाणू रेल्वे स्थानक येथे ऐसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ऐसीबीच्या या सापळ्यात नवनाथ जगताप, उप अधीक्षक, स्वपन बिश्वास, पोलीस निरिक्षक, पोहवा, अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक समुडा, नवनाथ भगत, पोना,सखाराम दोडे, स्वाती तरवी यांनी पोलीस अधीक्षक, सुनील लोंखडे, ऐसीबी ठाणे परिक्षेत्र, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ऐसीबी ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई केली,

विशेष बाब म्हणजे काहीच दिवसापूर्वी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पैलीसांना "चरस" हा अंमलीपदार्थ विक्री करताना पकडले, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, तर यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेट्रल, दादर, कुर्ला, ब्रांदा, कल्याण आदी स्टेशनवर सोने व्यापारी, चरस, गांजा, गुटखा, आदी बाबतीत जबरी वसुली केल्यामुळे अनेक लोहमार्ग पोलीसावर कारवाई केली आहे, परंतू तरीही यातील भ्रष्टाचार, वसुली कमी होत नाही, हे वरीष्ठांना माहिती नाही असे नाही की ते जाणीवपुर्वक याकडे दुर्लक्ष करतात असा संशय निर्माण होतो.

डाँ,प्रज्ञा सरवदे, पोलीस महासंचालक, लोहमार्ग मुंबई या अंत्यंत कर्तव्यनिष्ठ आहेत, त्यांचा जबरदस्त धाक आहे, त्यांनी आतापर्यत अनेकावर कडक कारवाई केली आहे, तरीही असे प्रकार वांरवार कसे घडतात? हा खरा प्रश्न आहे,अशा बेकाबू,भ्रष्ट पोलीसामुळे संपूर्ण लोहमार्ग पोलीसांची प्रतिमा मलिन होत आहे, हे वेळीच रोखायला हवे.

आजही वरील टर्मिनस वर वरीष्ठाचे आदेश/ सूचना डावलून बँग चेकिंगच्या गोडस नावाखाली जबरन वसूली सुरु असल्याचे खात्रीलायक वृत आहे‌.

मुंबई चे लोन आता थेट पालघर पर्यत पोहचल्याचे आजच्या ऐसीबीच्या कारवाई वरुन स्पष्ट होते, त्यामुळे हे रोखायचे असल्यास स्वत: अप्पर पोलीस महासंचालक डाँ प्रज्ञा सरवदे मँडम यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत एका सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केले.

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा वरप येथे संपन्न !

कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा वरप येथे संपन्न !

कल्याण, (संजय कांबळे) : क्रांतीबा महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून आणि डाँ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे निमित्ताने आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेत मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला, कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले होते,

यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई पाटील, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व अर्थ समिती, सुभाष पवार, आ किसन कथोरे,महिला बालकल्याण सभापती रेश्मा मगर, झेडपी सदस्या जयश्री सासे, वृशाली शेवाळे, रमेश पाटील, कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता जाधव, सदस्य रंजना देशमुख, दर्शना जाधव, रमेश बांगर, पांडूरंग म्हात्रे, यशवंत दळवी, रेश्मा भोईर, भारती टेंबे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षणाधिकारी डाँ रुपाली खोमणे व शिक्षणविस्तार अधिकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिमा पूजन झाल्यावर जिपशाळा म्हसरोंडी च्या विद्यार्थांनी स्वागतगीत सादर केले, तथपूर्वी आमदार किसन कथोरे मधेच कार्यक्रमातून उठून निघून गेल्याने उपस्थितामध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली‌.

दरम्यान गटशिक्षणाधिकारी डाँ रुपाली खोमणे यांनी प्रास्ताविक केले, त्या म्हणाल्या, कल्याण तालुका भोगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे, जिप शाळेचा दर्जा उचावंत असून आजमितीस शाळेची विद्यार्थी संख्या १०  हजार २७१ इतकी आहे, शासनाच्या हरघरमे तिंरगा मध्ये खडवली केंद्रातून सुमारे ४ हजार मुलांनी सहभाग घेतला, तर १४२ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे सांगितले, शिवाय आजचा शिक्षक पुरस्कार केवळ गुणवत्तूवर आधारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितलेकी शिक्षकांनी संधीचा फायदा घेऊन मुलांना सहभागी  करुन त्यांना क्रियाशील शिक्षण द्यावे,यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा,सानेगुरुजी यांची उदाहरणे दिली, शिक्षकानी झुंड निर्माण करण्यापेक्षा गुणवान व क्रियाशील विद्याथ्याची फौज निर्माण करावी असे अवाहन शिक्षकांना केले‌

तर झेडपी उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले, शिक्षकांचे योगदान मोठे आहे, शिक्षकांचा आदर वाढला पाहिजे असे काम शिक्षकांनी करावे असे सांगून जिल्हात ७१० शिक्षकांची कमतरता आहे, जिल्हयातील पाचही तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदे भरली असल्याचे त्यांनी सांगितले, हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी खर्चाची तरतूद डब्बल केली आहे, असे बोलून स्पर्धा परीक्षेत कल्याण तालुक्याचे प्रतिनिधित्व नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, शिवाय यापुढे कार्यक्रम वेळेवर सुरु करावा, अशा सूचना केल्या,यामुळे आमदार महोदय निघून गेल्याचे सांगितले.

यानंतर झेडपी अध्यक्षा पुष्षा पाटील, सभापती अस्मिता जाधव, झेडपी सदस्या जयश्री सासे, वृशाली शेवाळे आदींचीही भाषणे झाली.

यावेळी तालुका स्तरीय आदर्श पुरस्कार मिळालेल्या धनाजी गायकर (जिपशाळा), पावशेपाडा,) श्रीमती संध्या पवार (वडवली), सुनील तुपसौदर्य, (उशीद) सुनीता बेंडसे (कोंळिंब) संतोष भागवत (घोटसई) संजय होण्याळकर (सोनारपाडा) आणि शर्मिला गायकवाड (बामल्ली) या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गोरविण्यात आले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करताना  गटविकास अधिकारी  अशोक भवारी यांनी  मान्यवरांनी व्यक्त केलेली खंत व इतर चुका बद्दल  प्रशासनाचे  प्रमुख म्हणून दिलगिरी व्यक्त केली,
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, समग्रशिक्षा अभियान व शिक्षणविभाग कर्मचारी वृंद यांनी मेहणत घेतली.

Sunday 27 November 2022

तब्बल ३६ वर्षांनी उघडली ऋणानुबंधाच्या आठवणींची शिदोरी, रायते येथील रायते विभाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांंचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न !

तब्बल ३६ वर्षांनी उघडली ऋणानुबंधाच्या आठवणींची शिदोरी, रायते येथील रायते विभाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांंचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न !

कल्याण (रायते), नारायण सुरोशी : कल्याण तालुक्यातील रायते येथील रायते विभाग हायस्कूल, रायते मधील  १९८६ साली दहावीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन  रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले.

गणपती व सरस्वतीचे पुजन करुन राष्ट्रगीताने या स्नेहसंमेलनाची सुरवात करण्यात आली. यावेळी आपल्यातून कायमचे निघून गेलेले शाळेतील काही शिक्षक, मित्र व कर्मचारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आपली शाळा व आपल्याला घडविणारे शिक्षक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेमध्ये आपण शिकत असताना वेगवेगळ्या मित्र मैत्रीणींजवळ आपले मैत्रीचे ऋणानूबंध जुळले यातील काही मित्र शालेय जिवनानंतर आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दूर गेले त्यांना एकत्र आणण्यासाठी या बॕचचे विद्यार्थी व विद्यार्थीनी पुढाकार घेऊन सदर स्नेहसंमेलनाचे प्रमिला रिसॉर्ट, भिसोळ येथे आयोजन केले.

१९८६ बॅचच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी या स्नेह संमेलनाचे सुंदर आयोजन करुन तब्बल ३६ वर्षांनी आपल्या शालेय मित्र मैत्रिणींना एकत्र आणले. स्नेह भोजनानंतर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील चांगले वाईट अनुभव एकमेकांजवळ व्यक्त करतानाच आपल्यातील कलागुणही सादर केले.

या स्नेहसंमेलनामुळे ३६ वर्षांनी शालेय मित्र मैत्रीणींची भेट होणार या ओढीने सर्व मित्र मैत्रिणी उपस्थित राहील्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या स्नेहमिलनाची आठवण प्रत्येकाच्या हृदयात जपली जावी व ऋणानुबंध असाच कायम रहावा तसेच उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींच्या एकत्र स्नेहसंमेलनाचे आयोजन करणाऱ्या टीमचं सर्वांनी कौतुक व आभार मानले व यापुढेही असेच सर्वजण गृपच्या माध्यमातून एकमेकांच्या कायम संपर्कात राहून प्रत्येकाच्या सुख दुःखात नेहमीच मदतीचा हात पूढे करु हा दृढनिश्चय करुन पुन्हा एकत्र येण्याचे ठरवून एकमेकांचा निरोप घेतला.

"मृदगंध" पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण !

"मृदगंध" पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लोकशाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. १२व्या लोकशाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृदगंध पुरस्कार २०२२ चे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, पद्मभूषण उस्ताद राशीद खान, पराग लागू, नंदेश उमप मंचावर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की,आज ज्यांना मृदगंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे. इथे या सर्व लोकांच्या मनोगतातून, गायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तीरस्कारालाही तोंड द्यावे लागते मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे.

विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी १२वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह तसेच २०२२ सालचे मृदगंध पुरस्कार रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार त्यांच्या समवेत आमदार अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.  

कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. २६/११ च्या कटू स्मृती आणि भारतीय संविधान दिनाच्या गोड आठवणी जाग्या करून संगीत समारोहाला सुरूवात झाली. मुंबईच्या कोकण कन्या बँडने अगदी अलवारपणे आपल्या सुरांची जादू संपूर्ण सभागृहात पसरली. बघता बघता सारे सभागृह त्यांच्या सुरांच्या तालावर लयबद्ध ठेका धरून गाऊ लागले. एकसंध तालासुरात ह्या कन्यांच्या  सप्तसुरांत सारे सभागृह रममाण झालेले असतानाच सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांचे आगमन झाले आणि समीरा जोशी यांनी खास त्यांच्यासाठी छत्रपती शिवरायांच्या गीतांचं सादरीकरण करण्याची विनंती केली. आणि आहा त्यानंतर जो काही माहोल तयार झाला तो शब्दातीत होता. खुद्द मंत्री महोदयांनी देखील मनसोक्त दाद दिली.

त्यानंतर पारितोषिक वितरणाच्या मुख्य कार्यक्रमात श्री. फ. मु. शिंदे - जीवन गौरव, रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे - सामाजिक क्षेत्र, संजय मोने व सुकन्या मोने - अभिनय क्षेत्र, रवींद साठे - संगीत क्षेत्र, श्रीमती कमलाबाई शिंदे - लोककला, श्रेया बुगडे - नवोन्मेष प्रतिभा यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार त्यांच्या समवेत आमदार अॅड. आशिष शेलार, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.  

सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उस्ताद राशीद खान हे यंदाच्या स्मृती संगीत समारोहाचे खास आकर्षण ठरले. प्रदीर्घ काळानंतर गायक आणि मुंबईचे रसिक प्रथमच सामोरे आले होते. आपली गायकी सादर करत असताना त्यांनी साथसंगत करत असलेल्या आपल्या सहकलाकारांनाही त्यांची गुणवत्ता दाखवण्याची संधी दिली. स्वतः गात असताना प्रेक्षकांना स्वतःसाेबत गाण्याची संधी त्यांनी दिली. स्मृती संगीत समारोहाच्या उत्तरार्धाची सांगता त्यांच्या 'आओ गे जब तुम साजना" ह्या गाण्याने होत असताना रसिकांचे डोळे, कान आणि मन तृप्त झाले होते.  
डॉ. समीरा गुजर जोशी यांनी सोहळ्याचे समयसूचक सूत्रसंचालन केले. सर्व पुरस्कार्थींच्या मानपत्रांचे वाचनही त्यांनी त्यांच्या खास पद्घतीने केले. त्यामुळे सभागृहात असलेल्या सर्वांसोबतच पुरस्कार्थीही दाद देत होते. या मानपत्रांचं सुंदर शब्दांकन आनंद खासबागदार यांनी केले.
आपल्या गायकीच्या कारकिर्दीची पन्नाशी गाठत असणार्‍या रवींद्र साठे यांनी "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हे गीत सादर केलं आणि सभागृहाने त्यांच्या सुरामध्ये आपला ताल मिसळला.  
विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्कारास लागू बंधू यांनी सहकार्य केले. पुरस्काराचे शिस्तबद्घ आयोजन सुप्रसिद्ध गायक, शाहिर तसेच विठ्ठल उमप फाऊंडेशनचे सर्वेसर्वा नंदेश विठ्ठल उमप, सरिता नंदेश उमप आणि कुटुंबीय तसेच सहकार्‍यांनी अगदी लिलया केले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपन्नतेचे उदाहरण जगाला दिले जाईल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपन्नतेचे उदाहरण जगाला दिले जाईल – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्राला संपन्न असा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या संपन्न अशा वारसाचे जतन आणि जोपासना करून येणाऱ्या काळात अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे  उदाहरण दिले जाईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या दृकश्राव्य केंद्राचे “स्वरालय” दालनात आज उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री वामन केंद्रे, दर्शनिका विभागाचे सचिव दिलीप बलसेकर, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा आहेच. जेथे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्याच महाराष्ट्रात महर्षी वाल्मिकी आणि भगवद्गीता पण आहे. शेक्सपिअर सर्वांना माहीत आहे पण कालिदासही याच भूमीतला आहे. एकूणच हीच महाराष्ट्राची ओळख आपल्याला जगभरात पोचवायची आहे. महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आहे तशीच सांस्कृतिक सुबत्ता आहे. कारण आपल्याकडे असलेली कलेची माध्यमे आपले मन आनंदी ठेवण्याचे काम करतात. आपला हॅपिनेस इंडेक्स वाढविणाऱ्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सर्व प्रयत्न आपण करू. सांस्कृतिक वारशात महाराष्ट्राचा क्रमांक जगात पहिल्या दहात लागेल इतका समृद्ध वारसा आपल्याकडे आहे, असे ते म्हणाले.

माणसाच्या मनुष्यत्वाला उन्नत व परिपूर्ण करण्याचे कलेचे हे सामर्थ्य आणि त्याबाबतीत महाराष्ट्राचा विश्वविख्यात वारसा व आगळेपणा ध्यानात घेऊन ही कला जतन, संवर्धन व जोपासाण्यासाठी ध्वनिमुद्रित संगीत संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्याच्या दृकश्राव्य कलेचा मोठा वारसा डिजीटल रूपात पुढच्या पिढीला मनोरंजनासोबत अभ्यासासाठीही या दृकश्राव्य केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

श्री. केंद्रे यावेळी म्हणाले की, रवींद्र नाट्य मंदिर येथील वास्तूचा इतक्या कलात्मक पद्धतीने वापर होणार आहे याचा आनंद वाटतो.

दृकश्राव्य दालनाविषयी :

रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे एका दृकश्राव्य दालनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या दालनामध्ये नाट्य, चित्रपट, लोककला, शास्त्रीय संगीत याविषयीची दुर्मिळ सादरीकरण होणार आहेत. या अभिलेखांमध्ये कॅसेट, ध्वनिमुद्रिका, व्हिडिओ क्लिप्स, पुस्तके, फोटो, भाषणे इत्यादी दुर्मिळ बाबींचा समावेश आहे. हे दालन सर्वसामान्यांसाठी आजपासून (२६ नोव्हेंबर २०२२) खुले होत आहे.

कला ही निसर्गनिर्मित सृष्टीला अधिक रमणीय बनविणारी मानवनिर्मित प्रतिसृष्टी असते. ती मानवाच्या अस्तित्वाला अधिक सुंदर बनविते. त्याच्या अंतर्बाह्य जीवनसत्वाला आविष्कृत करते. माणसा-माणसाला प्रसन्नपणे जोडते आणि समग्र मानवी जीवनाला आनंदमय करते. कोणत्याही कलाक्षेत्रातील कामगिरी हा त्या समाजाच्या नवनिर्माण क्षमप्रज्ञेचा एक अत्यंत महत्त्वाचा मापदंड असतो.
ध्वनिमुद्रित संगीत संग्रहालयामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेले शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे दुर्मिळ ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे. तसेच चित्रपट महोत्सव, पुरस्कार सोहळे, लोककला महोत्सव, शिबिरे, परिसंवाद या कार्यक्रमांचेही जतन यामार्फत करण्यात आलेले आहे.

विविध ज्येष्ठ कलावंतांच्या मुलाखती जसे की, बाळ कुरतडकर, प्रभाकर जोग, मोहनदास सुखटणकर, सुलोचना लाटकर, भारुडरत्न निरंजन भाकरे, शाहीर देवानंद माळी, भरत कदम (गोंधळ, नृत्यांगना रेश्मा परितेकर, अरुण काकडे, भालचंद्र पेंढारकर, किशोरी आमोणकर, अप्पा वढावकर, प्रभा अत्रे, चित्तरंजन कोल्हटकर, आत्माराम भेंडे इ. मातब्बर कलावंतांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. रानजाई, प्रतिभा आणि प्रतिमा, शब्दापलिकडले इ. मुलाखतींचे कार्यक्रमांचे ध्वनिचित्रमुद्रण दुरदर्शन यांच्याकडून उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहे. श्री. के.टी.देशमुख यांनी संग्रहीत केलेल्या दुर्मिळ नाटकांचे, कलाकारांचे फोटोचे जतन करुन डिजिटल स्वरुपात ठेवण्यात आलेले आहेत. भालचंद्र पेंढारकर यांनी ध्वनिमुद्रित केलेल्या नाटकांचे ध्वनिमुद्रण स्वरालयमध्ये उपलब्ध आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने १९८५ साली संग्रहित केलेली संगीत व गद्य नाटकांचे ध्वनिचित्रमुद्रण स्वरालयात उपलब्ध आहे. उदा. संगीत मानापमान, संगीत जय जय गौरीशंकर, संगीत पुण्यप्रभाव, संगीत संशय कल्लोळ, संगीत पंडितराज जगन्नाथ, संगीत सुवर्णतुला, संगीत स्वयंवर, संगीत मदनाची मंजिरी, रायगडाला जेव्हा जाग येते (गद्य). महाराष्ट्रातील नऊ विद्यापिठांमार्फत करण्यात आलेल्या लोककला सर्वेक्षणाचे ध्वनिचित्रमुद्रण ‘स्वरालय‘ येथे उपलब्ध आहे.

कुणबी वधु-वर मेळाव्याचे चेंबूर येथे आयोजन !

कुणबी वधु-वर मेळाव्याचे चेंबूर येथे आयोजन !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) :
               कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई विभागीय शाखा चेंबूर संलग्न विवाह मंडळ यांच्यावतीने इच्छुक वधु-वर यांच्याकरिता रविवार दि.११ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३-३० वाजता आचार्य मराठे काॅलेज,चेंबूर (प.) मुंबई-४०० ०७१ येथे आयोजित केला आहे. इच्छुक वधू -वर /पालक यांनी मेळाव्यापूर्वी दररोज सायंकाळी ६ ते ८-३०या वेळेत कुणबी भवन, दुर्गादेवी मैदान, खारदेवनगर, घाटला,चेंबूर,मुंबई-७१ येथे श्री. प्रभाकर नागरेकर- मो- 9320246382 आणि शांताराम जाधव - मो.9969941429 यांच्याशी संपर्क ‌साधवा असे आवाहन शाखेच्यावतीने दत्ताराम शिवगण( सचिव- विवाह मंडळ चेंबूर) यांनी केले आहे.

'आजचा दिवस फक्त' (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास पुरस्कार !

'आजचा दिवस फक्त' (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास पुरस्कार !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) :

             मराठा मंदिर साहित्य शाखेच्या  वतीने नवोदित लेखकांसाठी प्रथम साहित्य लेखन पुस्तक प्रकाशन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक नवोदित लेखकांनी आपली पुस्तके  स्पर्धेसाठी पाठवली होती. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मराठा मंदिर सभागृहात पार पडला. या सोहळ्यासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि राज्यसभा खासदार पद्मश्री श्री कुमार केतकर उपस्थित होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री जयसिंगराव पवार यांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचे विनामानधन कार्य करणारे रमेश सांगळे यांनी स्वतःच्या जीवनावर लिहिलेल्या 'आजचा दिवस फक्त'(व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका आणि  वृत्तपत्र लेखीका श्रीमती मंदाकिनी भट यांनी ही जबाबदारी पार पाडली.मराठा मंदिर साहित्य शाखेचे खजिनदार श्री संतोष घाग यांच्या हस्ते सांगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.या पुरस्काराबाबत रमेश सांगळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला माझी दिवंगत पत्नी नंदा हिच्याकडून मिळाली. हा पुरस्कार मी तिला सन्मानपूर्वक बहाल करीत आहे. तसेच आगामी काळात व्यसनांच्या संदर्भातच पुस्तक लिखाण करणार आहे.या सोहळ्यासाठी व्यासपीठावर पद्मश्री श्री.कुमार केतकर, श्री.जयसिंगराव पवार यांच्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे ॲड. शशिकांत पवार, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विलासराव देशमुख, चिटणीस श्री. राजेंद्र गावडे उपस्थित होते.

ग्रामपंचायत वेळंब मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न !

ग्रामपंचायत वेळंब मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न !

*निवोश / गुहागर: उदय दणदणे*

देशात २६ नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक नागरिकांसाठी फार महत्वाचा आहे. जगण्याचा खरा अधिकार राजमार्ग  प्राप्त झाला असा तो दिवस भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथांग प्रयत्नातून भारताचे संविधान लिहिले गेले व  २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत पारित केले गेले. धर्मनिरपेक्ष लोकशाही  व अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले तो  हा दिवस  संविधान दिन  म्हणून देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत वेळंब येथे संविधान दिनाप्रति भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय संविधानाची शपथ घेण्यात आली व वेळंब बाजारपेठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्तंभाला पुष्पहार अर्पण करून वेळंब बौद्धवाडी विहार येथे सर्व वाडीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला वेळंब ग्रामपंचायत सरपंच -समीक्षा बारगोडे , उपसरपंच- श्रीकांत मोरे, पोलीस पाटील - स्वप्नील बारगोडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआघाडीतील विसंवाद यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा विजय होणार मोठ्या मताधिक्याने !! कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, ...