Wednesday 30 November 2022

ग्रामपंचायत उमराठ तर्फे २६ नोव्हेंबर "संविधान दिन" मोठ्या उत्साहात साजरा !

ग्रामपंचायत उमराठ तर्फे २६ नोव्हेंबर "संविधान दिन" मोठ्या उत्साहात साजरा !

[निवोशी / गुहागर : उदय दणदणे]
दि. ३० नोव्हेंबर-२०२२

गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ येथील श्री नवलाई देवीची सहाण येथे ग्रामपंचायत उमराठ, जि. प. शाळा उमराठ न.१ व शाळा नं.३ तसेच समस्त ग्रामस्थ बंधू-भगिनीं या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने व मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाच्या प्रेरणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला तसेच भारतीय संविधान पुस्तिकेला पुष्पहार अर्पण करून पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले.

जि.प.शाळा उमराठ नं.३ कोंडवीवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले तर सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व यथाशक्तीय संविधान पुस्तिका देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जि.प. शाळा उमराठ नं.१ च्या विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून सर्वांनी शपथ ग्रहण केली. शाळेतील विद्यार्थ्यांची संविधान व देशभक्तीपर गीते, किर्तनातून संविधान दिनाचे प्रबोधन, संविधानानुसार विद्यार्थींनी घेतलेली बालसभा, मौजे मासूचे सुपुत्र लोकशाहीर सचिन पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेली गीते, पोवाडे व इतर मान्यवरांचे प्रबोधन /मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचे आगळे वेगळे असे खास वैशिष्ट्य ठरले. सरपंच, जनार्दन आंबेकर यांना आंतरराज्य आदर्श सरपंच म्हणून सन्मान झाल्याबद्दल लोकशाहीर सचिन पवार यांनी खास शाहिरीतून सरपंचांचा गौरव केला.

सदर संविधान दिनाच्या कार्यक्रमाला उमराठच्या कदम वाडीतील बौध्दजन ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख पदाधिकारी बौद्धाचार्य सुगंधा कदम, पांडुरंग कदम, श्रीधर कदम, मनोज कदम, अविनाश कदम व धर्मदास कदम हे सर्वजण खास करून मुंबईहून आले होते. त्यांनी ग्रामपंचायत उमराठ, उमराठ गावातील १० वाड्यांना तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांना संविधान पुस्तिकेचे वाटप केले.

 सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, उमराठ खुर्दच्या पोलीस पाटील वासंती आंबेकर, लोकशाहीर सचिन पवार, तंटामुक्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष वसंत कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, सुरेश पवार, भिकू मालप, शांताराम गोरिवले, बौद्धाचार्य सुगंधा कदम, पांडुरंग कदम, विनायक कदम, ग्रामपंचायत सदस्य/सदस्या, आरोग्य सेवक अजय हळये, उमराठ शाळा नं.१ च्या शिक्षिका प्रियांका किर, सायली पालशेतकर, उमराठ शाळा नं.३ चे मुख्याध्यापक शैलेश सैतावडेकर, संजय सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व उत्कृष्ट सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर व अनिल अवेरे सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजनाच्या कामी उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायत उमराठचे असिस्टंट नितीन गावणंग, रोजगार सेवक प्रशांत कदम, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, विनायक कदम, निलेश पवार(बारक्या), सनी गोरिवले, महेश गोरिवले यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. 

 कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री संदीप गोरिवले यांनी सांगितले की, संविधानचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे, सर्व समाजाचे आदर्श आहेत. संविधान पुस्तिका सर्वांनी वाचली पाहिजे तसेच प्रत्येकाने आपापल्या घरी संग्रहीत ठेवली पाहिजे. सुगंधा कदम व पांडुरंग कदम यांनी सुद्धा संविधान व बाबासाहेबांचे विचार यांवर विस्तृत विवेचन केले. 

या संविधान दिन कार्यक्रमाला सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, सर्व बचतगटांच्या महिला सदस्या, शाळेतील विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ बंधू-भगिनीं उपस्थितीत होत्या. 

अध्यक्षीय भाषणात सरपंच जनार्दन आंबेकर यांनी संविधान दिनाचे महत्त्व आणि नागरिकांची जबाबदारी याबाबतीत मार्गदर्शन करताना सांगितले की, २६ नोव्हेंबर हा दिवस प्रतिवर्षी भारतीय संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. याच दिवशी १९४९ साली संविधान प्रक्रिया पुर्ण करून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे घटनेची मूळ प्रत सादर केली. त्यानंतर दि. २६ जानेवारी १९५० पासून आपल्या देशात लोकशाही राज्य खऱ्या अर्थाने सुरू झाले. या घटनेत सर्वसामान्य जनतेचे हक्क आणि कर्तव्य आहेत. त्याचप्रमाणे जबाबदारी नमुद करण्यात आली आहे. प्रत्येकाने आपले हक्क आणि जबाबदारीचे पाळण केले पाहिजे असे सांगून सदर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानून सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर अनिल अवेरे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...