Thursday, 2 July 2026

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे

*कोकण, बातमीदार :

स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा योग्य फायदा घेऊन कोकणवासीयांनी संघटित होण्याचे आवाहन केले आहे. कोकणातील विकास, रोजगार, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

*स्वतंत्र धोरणाची गरज*  
देश आणि राज्यातील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. अशा परिस्थितीत कोकणाच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण, स्थानिकांना रोजगार, मत्स्यव्यवसाय, शेती, पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे, असे कोकरे म्हणाले. ही संधी गमावल्यास भविष्यात कोकणासमोरील समस्या अधिक गंभीर होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

*अणुप्रकल्प विरोधात लोकचळवळ*  
कोकणातील नैसर्गिक संपत्ती, पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रस्तावित अणुप्रकल्पाविरोधात व्यापक लोक चळवळ उभारणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येणार नाही यासाठी जनतेने जागरूक राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

*आंदोलनाची भूमिका स्पष्ट*  
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या माध्यमातून कोकणातील विविध प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे, लोकजागृती करणे आणि लोकशाही मार्गाने न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरू राहणार असल्याचे कोकरे यांनी स्पष्ट केले.

*एकत्र येण्याचे आवाहन*  
कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिकांना न्याय मिळावा आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र येऊन दबाव गट तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

*" सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कनिष्ठ लिपिक, सौ. साक्षी सुभाष गायकवाड यांचा सेवानिवृत्ती समारंभ " !!

*" सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कनिष्ठ लिपिक, सौ. साक्षी सुभाष गायकवाड यांचा सेवानिवृत्ती समारंभ " !!

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या‌  कर्तव्यदक्ष कनिष्ठ लिपिक सौ. साक्षी सुभाष गायकवाड यांनी अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे त्यांचा २६ वर्षाचा प्रदिर्घ सेवाकार्यकाळ पूर्ण करून मंगळवार दि. ३०/६/२०२६ रोजी त्या सन्मानाने निवृत्त झाल्या. त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयदेखिल आवर्जून उपस्थित होते. सर्वांसाठी दुपारी त्यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

दोन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या निरोपाच्या कार्यक्रमात अनेकांनी  त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. कारण त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयात अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने सलग्न २६ वर्षे सेवाकार्यकाळ पूर्ण केला. त्यांच्या प्रेमळ व नम्र स्वभावामुळे कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी व शिक्षकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. साक्षी म्याडम कधी कोणावर ओरडल्या किंवा रागवल्या नाहीत, त्यांचा सर्वांसोबतचा स्नेह, आई व मोठ्या बहिणी प्रमाणे होता व सदैव राहील असे एका कर्मचाऱ्याने व्यासपीठावरुन सांगताना अनेकांचे डोळे पाणावले. कॉलेजच्या कोणत्याही कार्यक्रमात एखादी जबाबदारी त्यांना दिली की त्या मनापासून व उत्तम प्रकारे पार पाडायच्या.

या प्रसंगी कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून त्यांना सुंदर भेटवस्तू, शाल व साडी देऊन त्यांचा प्राचार्य, उप प्राचार्य व जेष्ठ प्राध्यापक व प्राध्यापिकांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच काही कर्मचाऱ्यांनी त्यांना वैयक्तिक भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला व त्यांना निवृत्तीनंतरचे पुढील आरोग्यदायी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या कुटूंबातील त्यांच्या यजमानांसह त्यांची मुलगी सृष्टी,मोठी बहिण व ननंद यांनीदेखिल त्यांच्या भावना व्यक्त करताना, साक्षी म्याडमनी नोकरी करताना कौटूंबिक जबाबदारी देखील उत्तमप्रकारे पार पाडली. तसेच त्यांच्या लाडक्या लेकीने देखील आपल्या आईचे तोंडभरून कौतुक करताना तिला गहिवरून आले.

शेवटी साक्षी म्याडमनी कॉलेजच्या सर्व कर्मचारी व शिक्षकांनी त्यांना आजपर्यंत केलेले सहकार्य व त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या मंगल भावनाबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. शेवटी सर्वांनी त्यांना वाजतगाजत, जल्लोषात  व नृत्य करत कॉलेजच्या गेटपर्यंत सोबत दिली व जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला.

डॉ. विष्णु ज. भंडारे 
(प्रभारी प्राचार्य)


Wednesday, 1 July 2026

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घ्यावा -वंदना कोचुरे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घ्यावा -वंदना कोचुरे

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारित्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) जमीन अथवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) जमीन उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंचना कोचुरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी कमाल आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली असून, जिरायती जमिनीसाठी प्रति एकर रु. ५ लाख तसेच बागायती जमिनीसाठी प्रति एकर रु. ८ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात येते. योजनेअंतर्गत नमूद दरानुसार जमीन विक्री करण्यास इच्छुक असलेल्या जमीन मालकांनी आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता करुन आपल्या जमीन विक्रीबाबतचे प्रस्ताव सादर सादर करावेत.

बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा
समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्याच्या योजनेअंतर्गत बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने ९० टक्के शासकीय अनुदानावर (कमाल रु. ३ लाख १५ हजार रुपये) मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदीसाठी कमाल खर्च मर्यादा रु. ३ लाख ५० हजार निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटाने एकूण खर्चाच्या १० टक्के म्हणजेच रु. ३५ हजार इतका स्वहिस्सा भरल्यानंतर योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे श्रीमती कोचुरे यांनी कळविले आहे.

आधुनिक शिक्षण आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती !!

आधुनिक शिक्षण आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती !!

उरण, (विठ्ठल ममताबादे ) : भारतामध्ये डिजिटल उत्क्रांतीच्या तिसऱ्या टप्प्यात ‘डिजिटल भारत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल साक्षरतेवर भर देण्यात आला. त्यानंतर ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ च्या माध्यमातून शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचे एकात्मिकरण अधिक ठळकपणे अधोरेखित झाले. मागील तीन दशकांमध्ये शैक्षणिक परिसंस्थेमध्ये अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच स्थानिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतुदींमुळे शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. मात्र शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अपेक्षित वाढ अजूनही झालेली नाही. या बदलांमध्ये ग्रामीण, निम-शहरी आणि शहरी स्तरावर तफावत स्पष्टपणे जाणवते.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतीची गरज असल्याचे मत शिक्षण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश ठाकूर यांनी व्यक्त केले.सध्याच्या शिक्षणामध्ये दोन महत्त्वाचे टप्पे दिसतात: शिक्षणाचे आधुनिकीकरण – पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करून डिजिटल साधनांचा वापर, आधुनिक शिक्षणाचा समावेश – पायाभूत साक्षरतेसोबत तंत्रज्ञान, नीतीमूल्ये, कौशल्ये आणि सर्जनशीलतेवर भर. या प्रक्रियेत शिक्षक आणि मानवी भूमिका महत्वाची ठरते. आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळ आवश्यक आहे. 

सुरुवातीला संगणकीय शिक्षण म्हणजे आधुनिक शिक्षण मानले जात होते. मात्र कालांतराने नियमित विषयांच्या अध्यापनामध्ये डिजिटल पद्धतींचा वापर होऊ लागला. डिजिटल अभ्यासक्रमामुळे क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजण्यास मदत झाली. ही पद्धती विद्यार्थ्यांना रुचली असली तरी शिक्षक किंवा पर्यवेक्षण स्तरावरील मनुष्यबळाकडून अजून पूर्णपणे स्वीकारली गेलेली नाही. काही प्रमाणात भीती तर काही प्रमाणात गरज नसल्याची भावना दिसून येते. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेईल ही बाब अशक्यप्राय आहे. मात्र विकसित तंत्रज्ञानाचा स्वीकार न केल्यास पुढील शैक्षणिक परिसंस्थेतून असे मनुष्यबळ मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षकांनी आपल्या कौशल्यांमध्ये डिजिटल संसाधने वापरण्याचे तंत्र कमी अवधीत आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. तुलनात्मक बोलताना आपण विकसित देशांमधील शिक्षणप्रणालीची उदाहरणे देतो, मात्र ती प्रणाली आपल्या देशात राबवण्यासाठी आवश्यक तयारी करताना मात्र कारणे दिली जातात. ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. डिजिटल संसाधने आणि एआय तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा शिक्षकांकडून प्रभावी व संतुलित वापर झाल्यास पुढच्या टप्प्यात अशा तंत्रज्ञानाच्या विकासासंदर्भातील शिक्षणाचा समावेश करणे शक्य होईल. 

आधुनिक शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन राहिलेले नाही, तर विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारीला चालना देणारे माध्यम बनले आहे. शिक्षणाचे आधुनिकीकरण हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे, आणि शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून या बदलाला गती देणे ही काळाची गरज आहे असे मत निलेश बाळकृष्ण ठाकूर (समन्वयक-EdTech कार्यक्रम, प्रथम इन्फोटेक फाउंडेशन) यांनी व्यक्त केले आहे. निलेश ठाकूर हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिक्षण क्षेत्रातील विविध विषयावर ते नेहमी जनजागृती करीत असतात

एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीसाठी महानपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ !!

एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीसाठी महानपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ !!

*# ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी थेट जमिनीवर बसून केला निषेध

कल्याण, संदीप शेंडगे : सोमवारी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कोट यांनी एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याने सभागृहात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

राहुल कोट यांनी विचारलेल्या प्रश्नावर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की, एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असून प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप राहुल कोट यांनी केला.
तसेच गोरगरिबांच्या शंभर रुपये घरपट्टी बाकी असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते परंतु कोट्यावधी रुपयाची थकबाकी असून या बड्या उद्योगपतींना महापालिका पाठीशी घालत असल्याचा आरोप कोट यांनी केला आहे.

गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये एकही लोकप्रतिनिधी नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर राहुल कोट यांनी संताप व्यक्त करत सभागृहातच जमिनीवर बसून आंदोलन सुरू केले. त्यांच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्यासह इतर नगरसेवकही जमिनीवर बसून पालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर हर्षाली चौधरी आणि उपमहापौर राहुल दामले यांनी मध्यस्थी करत समितीचा अहवाल दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर राहुल कोट व इतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी शिवसेनेचे उमेश बोरगावकर यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक एनआरसीचा प्रश्न वारंवार उपस्थित करावा लागत असल्याची टीका केली. तसेच, एनआरसीची थकबाकी नेमकी कधी वसूल होणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

मिलिंद नगर येथे महिलेला घरात बोलावून मारहाण करत केले अश्लील कृत्य !

मिलिंद नगर येथे महिलेला घरात बोलावून मारहाण करत केले अश्लील कृत्य !

खडकपाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण, संदीप शेंडगे :- कल्याण मध्ये एका महिलेला घरी बोलवुन तिला मारहाण करत तिच्यासोबत अश्लील कृत्य केले इतकेच नव्हे तर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून पोलीसांनी सुजित जाधव, संकेश शिंदे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

    मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या धुणीभांडी करणाऱ्या एका महिलेला फोन खरेदी करायचा होता मात्र तिच्या नावाने कर्ज मिळत नसल्याने तिने आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याच्या नावाने फोनसाठी लोन घेतले. या कर्जाचा पहिला हप्ता देखील तिने भरला होता. दुसरा हप्ता भरण्यासठी तिला एका महिलेने घरी बोलावून घेतले. महिला त्याठिकाणी गेली असता त्या घरात सुजीत जाधव आणि संकेश शिंदे हे आधीपासून घरात बसून होते. यावेळी या महिलेच्या घरात आधीपासून थांबलेल्या संकेश शिंदे आणि सुजित जाधव या दोघांनी पीडित महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर या महिलेचा फोन काढून घेतला हे दोघे इथवरच न थांबता त्यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली .याप्रकरणी या महिलेने सुजित जाधव ,संकेत जाधव विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

भिवंडीत बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा !!

भिवंडीत बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा !!

'डॉक्टर्स डे' निमित्त तीन क्लिनिकची तपासणी; संशयित डॉक्टरांवरही कारवाईचे आदेश

प्रतिनिधी भिवंडी 
दिनांक 01 जुलै 2026 

'डॉक्टर्स डे'चे औचित्य साधून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत तीन खासगी क्लिनिकची तपासणी केली. या तपासणीत एका क्लिनिकमध्ये अॅलोपॅथी इंजेक्शन्स व औषधांचा साठा आढळून आल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांच्या आदेशानुसार बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी मुंबई मंडळ, ठाणे येथील उपसंचालक (आरोग्य सेवा) यांनी भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्राला भेट देऊन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसह विविध क्लिनिकची पाहणी केली. यावेळी पटेलनगर येथील डॉ. शफिन खान यांचे क्लिनिक, गणेशनगर येथील आशापूरा क्लिनिक आणि पद्मानगर येथील गाजेंगी क्लिनिकची तपासणी करण्यात आली. गाजेंगी क्लिनिकमध्ये अॅलोपॅथी औषधे व इंजेक्शन्सचा साठा आढळल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

यानंतर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी, १ ते २० नागरी आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत भिवंडी शहरात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ७८ बोगस डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट, १९६१ मधील कलम ३३ व ३६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) अंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार १ ते २० नागरी आरोग्य केंद्रांमार्फत एकूण ४५२ डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली. या यादीतील ३३ डॉक्टरांच्या वैद्यकीय शैक्षणिक पात्रतेबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उपसंचालक (आरोग्य सेवा) यांनी दिले आहेत.

बैठकीत विविध शासकीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबविणे, विशेषतः HPV लसीकरण मोहिमेला गती देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

भिवंडी महानगरपालिकेने बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी !!

बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व गुणांच्या कौशल्याने कामगारांना न्याय देण्यात सातत्याने यशस्वी होत आहेत. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून यावर्षातील पाचवा पगारवाढीचा करार सोमवार दिनांक २९ जून रोजी करण्यात आला. मे. बाल्मर लॉरी CFS भेंडखळ येथील मे. बिपिन मरीन सर्व्हिसेस या कंत्राटाअंतर्गत काम करत असलेल्या सर्व्हेअर कामगारांसाठी हा तिन वर्षासाठी पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ, यामधे पहिल्या वर्षी ५००० रुपये, दुसऱ्या वर्षी १२५० रुपये व तिसऱ्या वर्षी १२५० रुपये तसेच ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, ३० हजार ते ५१००० हजार बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारानुसार कामगारांना १ मार्च २०२५ पासून पगारवाढीच्या फरकाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, सरचिटणीस वैभव पाटील, बाल्मर लॉरी कंपनीचे एच. आर. हेड सतिश आंदेगावकर, ऑपरेशन सिनियर मॅनेजर रमेश व्ही. आर, बिपिन मरीन सर्व्हिसेस चे डायरेक्टर  बी.डी. पाटील, कामगार प्रतिनिधी अजित ठाकूर, मनोहर ठाकूर, शक्ती पाटील, संदीप वर्तक, सचिन भोईर, सनी भोईर, आदी उपस्थित होते. कामगारांनी याप्रसंगी संघटनेचे आभार मानले

'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान' योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज !!

'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान' योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज !!

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना अंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा रु. ५,००० मानधन देण्यात येते. अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक (दिव्यांगांसाठी ४० वर्षे), कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे योगदान, वार्षिक उत्पन्न रु. ६० हजारांपेक्षा कमी तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इच्छुकांनी महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' पोर्टलवर ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत वय, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला , बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), भूषण जोशी यांनी केले आहे.

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा; हजारो भीमसैनिकांचा एल्गार !!

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा; हजारो भीमसैनिकांचा एल्गार !!

*मुंबई, संदीप शेंडगे* : अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत मुंबईतील आझाद मैदान येथे सोमवारी भव्य 'विराट मोर्चा' काढण्यात आला. राज्याच्या विविध भागांतून हजारो भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

*आनंदराज आंबेडकर, अशोक आंबेडकर यांचे नेतृत्व*  
या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर आणि अशोक आंबेडकर यांनी केले. उपवर्गीकरणाच्या प्रस्तावामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडेल व संविधानाने दिलेल्या समान हक्कांवर परिणाम होईल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

*घोषणांनी दणाणले आझाद मैदान*  
मोर्चादरम्यान "संविधान बचाव", "अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा", "सामाजिक न्याय अबाधित ठेवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र व राज्य शासनाने आरक्षण व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

*शासनाला निवेदन*  
मोर्चानंतर शासन प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, संविधानातील सामाजिक न्यायाची संकल्पना कायम ठेवावी आणि समाजात फूट पाडणारे निर्णय तातडीने थांबवावेत, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

*राज्यभरातून भीमसैनिकांची उपस्थिती*  
बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, ठाणे, पनवेल, कल्याण, भिवंडी, अमरावती अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक सहभागी झाले होते. आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात पंचशील ध्वज, निळा ध्वज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा होत्या.

शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चामुळे आझाद मैदान परिसरात दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे आंबेडकरी समाजातील विविध संघटना मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संगीतमय सुरसंगमात महापुरुषांना मानवंदना; कल्याणात प्रबोधनाचा जागर, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव !!

संगीतमय सुरसंगमात महापुरुषांना मानवंदना; कल्याणात प्रबोधनाचा जागर, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव !!

*कल्याण, दि. 1 जुलै 2026*

कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात "महापुरुषांना संगीतमय मानवंदना" आणि "समाजभूषण पुरस्कार" वितरण सोहळा मंगळवार दि. 30 जून रोजी उत्साहात संपन्न झाला. समाजप्रबोधन आणि मनोरंजनाचा अनोखा संगम यावेळी अनुभवायला मिळाला.

*महापुरुषांच्या विचारांचा जागर*  
विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पत्रकार तसेच नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम दिमाखात पार पडला. गीत, संगीत, निवेदन आणि प्रेरणादायी सादरीकरणाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. संपूर्ण सभागृह देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेले.

*समाजभूषण पुरस्कार वितरण*  
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. 

*सन्मानित मान्यवर*: ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरुद्ध संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष दिलीप मालवणकर, प्रशासकीय अधिकारी प्रशांत मानकर, राजेंद्र साळुंखे, नगरसेवक महेश गायकवाड, समाजसेवक रामजीत जीतू गुप्ता, सुरेश सोनवणे, पुष्पा कांबळे, लताताई एस पडघान. 

*व्हॉईस ऑफ मीडिया पुरस्कार*: पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सचिन बुटाला, सुरेश जगताप, सलीम मन्सूरी, गौतम गवई, संदीप शेंडगे, प्रशांत ढोणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*विशेष उपस्थिती*  
कार्यक्रमाला बिग बॉस मराठी फेम लोकप्रिय कलाकार संतोष चौधरी उर्फ दादूस यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच संघर्षयोद्धा निलेशदादा येलवे, अतुल भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांचे विचार देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला. सामाजिक जाणीव जागृत ठेवत महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे *कोकण, बातमीदार : स्वतंत्र कोकण राज्य अभियाना...