Monday, 3 August 2026

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !!

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !!

*डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट 2026, (राजू नलावडे)

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. आज सोमवारी सकाळी निवासी मधील माणिक रत्न सोसायटी RH 121 च्या आवारातील आंब्याचे मोठे झाड कोसळून शिवाई बालक मंदिर शाळेच्या मैदानातील संरक्षक भिंतीवर पडले. 

सुदैवाने घटनेच्या वेळी शालेय विद्यार्थी मैदानात नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाड कोसळल्याने शाळेच्या आणि सोसायटीच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे.

*अग्निशमन दलाची मदत*  
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड कापून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.

*15 ते 16 झाडे आधीच पडली*  
यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत एमआयडीसी निवासी परिसरात 15 ते 16 झाडे पडली आहेत. त्यामुळे वाहन, संरक्षक भिंती यांसारख्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. यापुढेही अजून काही धोकादायक झाडे पडू शकतात अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

*प्रशासनाला मागणी*  
नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसीने परिसरातील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून छाटणी आणि तोडणी करावी अशी मागणी केली आहे. 

अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या आणि धोकादायक झाडांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच महावितरणकडून उच्च दाबाच्या वाहिन्याजवळील फांद्या फक्त एका बाजूने तोडल्या जातात. त्यामुळे दुसऱ्या बाजूला भार पडून झाडे कोसळत आहेत. 

त्यामुळे महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी यांनी समन्वय साधून झाडांच्या फांद्यांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी. पुढे जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Sunday, 2 August 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन !!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन !!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार, कारागीर, संस्था व बचत गटांनी लाभ घेऊन स्वयंरोजगारासह रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरूंग यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत उत्पादन उद्योगांसाठी १ लाख ते १०० लाख रुपयांपर्यंत, तर सेवा उद्योग व कृषीपूरक सेवा उद्योगांसाठी १ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत प्रकल्प कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सेवा उद्योगासाठी २० लाख रुपयांपर्यंत, तर उत्पादन उद्योगासाठी ५० लाख रुपयांपर्यंत मार्जिन मनी अनुदान देण्यात येते. उर्वरित प्रकल्प रक्कम कर्ज स्वरूपात परतफेड करावयाची असते. तसेच नवीन सेवा उद्योग, उत्पादन उद्योग आणि ई-रिक्षा तसेच ई-ट्रान्स्पोर्ट व्यवसायालाही या योजनेत प्रोत्साहन देण्यात येत आहे.

योजनेसाठी अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा व त्याचे कोणतेही स्थायी उत्पन्न नसावे. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. शासनाच्या अन्य कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. केवळ नवीन उद्योजक, कारागीर, संस्था व बचत गट या योजनेस पात्र राहतील. १० लाख रुपयांवरील उत्पादन उद्योग प्रकल्प तसेच ५ लाख रुपयांवरील सेवा व कृषीपूरक उद्योग प्रकल्पांसाठी अर्जदार किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील (पती-पत्नी) केवळ एका व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अर्जासोबत आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र अथवा अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ग्रामसेवकांचा लोकसंख्येचा दाखला, प्रकल्प अहवाल, विहित नमुन्यातील इंग्रजीतील अंडरटेकिंग, पॅन कार्ड, गुणपत्रिका व छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.

इच्छुकांनी maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करताना KVIB या एजन्सीची निवड करावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका पर्यवेक्षक उद्योग किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीमार्फत संपर्क करू नये. अशा व्यक्तींमार्फत फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नसल्याचेही श्री. सुरूंग यांनी स्पष्ट केले आहे.

#मुख्यमंत्री_रोजगार_निर्मिती_योजना #स्वयंरोजगार #उद्योजकता #महाराष्ट्रशासन #पुणे

मालेवाडी येथील धनंजय संजय शेवाळे यांचा प्रशस्तीपत्र देवून प्रांताधिका-यांच्या हस्ते सत्कार !

मालेवाडी येथील धनंजय संजय शेवाळे यांचा प्रशस्तीपत्र देवून प्रांताधिका-यांच्या हस्ते सत्कार !

ईश्वरपुर येथे महसूल दिनानिमित्त तहसील ऑफिस वाळवा - ईश्वरपूर येथे पार पडलेल्या कार्यक्र‌मामध्ये श्री धनंजय शेवाळे यांनी महसूल वर्ष सन २०२५-२०२६ मध्ये प्रशासकीय कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने, तन्मयतेने व अचूकपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानपूर्वक व समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

 गेल्या वर्षभरात सन  2025-26 सालातील  महसूल प्रशासनातील ग्राम महसुल अधिकारी (तलाठी ) धनंजय संजय शेवाळे यांचा   गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी श्री.श्रीनिवास अर्जुन होते. वाळवा तहसीलमधील  उत्कृष्ट कामगिरीसाठी   धनंजय संजय शेवाळे (ग्राम महसूल अधिकारी चिकुर्डे) व विनायक बेडगे (ग्राम महसूल अधिकार कापूसखेड) यांचा सन्मान करण्यात आला.  प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला . सदर कार्यक्रमात तहसीलदार वाळवा ईश्वरपूरच्या श्रीमती  सारिका रासकर तसेच तालुक्यातील महसूल कर्मचारी, आष्टा अप्पर तहसील  अप्पर तहसीलदार तहसीलदार राजशेखर लिंबारे  यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वाळवा-ईश्वरपुर मधील महसुल अधिकारी ,कर्मचारी आदींच्या उपस्थितीत  महसुल दिन उत्साहात पार पडला.

डोंबिवली एमआयडीसी निवासीत झाड कोसळून 2 वाहनांचे नुकसान; जीवितहानी टळली !!

डोंबिवली एमआयडीसी निवासीत झाड कोसळून 2 वाहनांचे नुकसान; जीवितहानी टळली !!

*डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट 2026, राजू नलावडे*

डोंबिवली एमआयडीसी निवासी, सुदर्शन नगर येथील ओम अगत्य सोसायटी RX 16/17 च्या आवारात आज सोमवारी सकाळी एक मोठे औदुंबराचे झाड कोसळले. यामध्ये दोन चार चाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी तेथे कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

*अग्निशमन दलाने झाड हटवले*  
ही माहिती याच सोसायटीत राहणाऱ्या श्री. सोमा नायर यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कोसळले झाड बाजूला केले.

*धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर*  
एमआयडीसी निवासी परिसरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावर्षी पावसाळ्यात फक्त एमआयडीसी निवासी परिसरातच सुमारे 15 झाडे पडल्याची माहिती आहे.

स्थानिक नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसीने परिसरातील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून ती तोडावीत अशी मागणी केली आहे.

कास्ट्राईब कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांवर जिल्हा परिषदेत सकारात्मक चर्चा !!

कास्ट्राईब कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांवर जिल्हा परिषदेत सकारात्मक चर्चा !!

*अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावणार – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव*

ठाणे, दि. ३१ (सचिन ननगरे): कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेची बैठक जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दि. २८ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके डिजिटल स्वरूपात अद्ययावत करण्याबाबत, त्यामध्ये सर्व महत्त्वाच्या सेवा नोंदी अचूकपणे समाविष्ट करण्याबाबत आणि सेवा विषयक प्रक्रियांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

याशिवाय आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना १०-२०-३० लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचे संघटनेच्या प्रतिनिधींनी विशेष कौतुक केले. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नियमित संवाद व्हावा यासाठी अशा बैठका दर तीन महिन्यांनी (त्रैमासिक) आयोजित करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आस्थापनेशी संबंधित गट विमा, भविष्य निर्वाह निधी, सेवा विषयक प्रकरणे तसेच कर्मचारी हिताच्या विविध बाबींमध्ये प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दल संघटनेच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करून सर्व विभागांचे कौतुक केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी जिल्हा परिषद प्रशासन कर्मचारी हिताच्या सर्व प्रश्नांबाबत संवेदनशील असून सेवा विषयक प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विशेषतः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्तीविषयक प्रकरणे प्राधान्याने आणि तातडीने निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडचणी संवादातून सोडविण्यावर प्रशासनाचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष संतोष साबळे, केंद्रीय उपाध्यक्ष अनिल धांडे, सहसचिव जनार्धन राऊत, तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक साळवे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कोकण विभाग अध्यक्ष संतोष गाढे, दिव्यांग विभागाचे प्रदेश सचिव शिवाजी बिबराळे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष राहुल नगराळे, सेवानिवृत्ती विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर भोईर यांच्यासह कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना व कर्मचारी कल्याण महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत विविध कर्मचारी हिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन प्रशासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये समन्वय अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाच्या भावनेतून संत निरंकारी मिशनचे रक्तदान !!

करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाच्या भावनेतून संत निरंकारी मिशनचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनतर्फे वारजे ब्रँच येथे आयोजित रक्तदान शिबिरात २३६ युनिट रक्त संकलित

  
वारजे ,पुणे : दि. २ ऑगस्ट २०२६ : करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाची भावना जेव्हा मानवी जीवनात जागृत होते, तेव्हा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनते. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेतून परोपकार, करुणा आणि मानवसेवेच्या उदात्त भावनेने संत निरंकारी मिशनतर्फे दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी वारजे, शिवणे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात २३६  युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले. निरंकारी रक्तपेढी तसेच ससून रुग्णालय रक्तपेढीच्या च्या अनुभवी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित, शिस्तबद्ध  पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण आयोजनामध्ये स्वच्छता, सुरक्षितता, नियोजन आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित न राहता मानवता, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

शिबिराचे उद्घाटन मिशनच्या पुणे सिटी सेक्टर प्रमुख पुष्पा करमचंदनी  यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी क्षेत्रीय संचालक अवनित तावरे, अशोक कोऱ्हाळे  याचबरोबर अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या समाजोपयोगी कार्याचे मनापासून कौतुक केले.

विशेष म्हणजे, संत निरंकारी मिशनची रक्तदानाची ही पवित्र सेवा-परंपरा गेल्या चार दशकांहून अधिक काळ अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत देशभरात होणाऱ्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५,००,००० पेक्षा जास्त  युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेसाठी मिशनची अटळ बांधिलकी यामधून अधोरेखित होते.

युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा स्वीकार करून आपली शक्ती समाजसेवेसाठी अर्पण करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी "रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे" हा प्रेरणादायी संदेश देत रक्तदानाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. हाच मानवसेवेचा संदेश आजही सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी तसेच या उपक्रमाच्या आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे श्री.विजय कदम  यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Saturday, 1 August 2026

*गुणगौरव सोहळा* : *बहुजन विकास आघाडीचा वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान !!

*गुणगौरव सोहळा* :  *बहुजन विकास आघाडीचा वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी सन्मान !!

*कार्यक्रमास समाजसेविका रूचिता नाईक यांची उपस्थिती...*

नालासोपारा ता, १ :- बहुजन विकास आघाडीचा वतीने  २०२५-२६ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि वातावरणात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव, त्यांच्या मेहनतीचे कौतुक आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा हा सोहळा .
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मा.आमदार क्षितिज दादा ठाकुर तसेच उपमहापौर मार्शल लोपीस व नगरसेविकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 आमदार क्षितीज ठाकुर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि सर्व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. यशामागील सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे गमक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जीवनात यश आणि अपयश दोन्हींचे समतोलपणे स्वागत करा. समाजातून खूप काही शिकता येते. साधेपणातच खरी शिस्त आणि संस्कार दडलेले असतात. गुणवत्तेबरोबरच खेळ, वक्तृत्व, सांस्कृतिक उपक्रम आणि माणसे जोडण्याची कला आत्मसात करा. मोठी स्वप्ने पाहा, आव्हानांना सामोरे जा, प्रत्येक संधीचा उपयोग करा, अनुभवातून शिका, प्रश्न विचारण्याची सवय लावा आणि विविध क्षेत्रांची माहिती मिळवा. करिअर हा केवळ व्यवसाय नसून आयुष्य आनंदाने जगण्याचा मार्ग आहे.” उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमास मा.आमदार क्षितीज दादा ठाकुर, उपमहापौर मार्शल लोपीस, नगरसेवक, बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते, युवा पदाधिकारी उपस्थित होते.

*माळशेज घाटातील रस्ता खचला; कल्याण-आहिल्यानगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गावर मोठी कोंडी !!

*माळशेज घाटातील रस्ता खचला; कल्याण-आहिल्यानगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गावर मोठी कोंडी !!

*कल्याण, प्रतिनिधी* : कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा महत्त्वाचा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन हजारो प्रवासी आणि पर्यटक तासन्तास अडकून पडले आहेत.

*दुरुस्तीचे काम संथगतीने*  
खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

*पर्यायी मार्गावर प्रचंड कोंडी*  
मात्र हा पर्यायी मार्ग अरुंद, एकेरी आणि काही ठिकाणी खराब अवस्थेत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी रात्रीपासूनच या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन हजारांहून अधिक पर्यटक आणि प्रवासी अनेक तास रस्त्यावर अडकून पडले होते. लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

*पर्यटकांसाठी महत्त्वाचा मार्ग*  
माळशेज घाट हा मुंबई, ठाणे, पुणे आणि आहिल्यानगरला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. पावसाळ्यात निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दर विकेंडला हजारो पर्यटक येथे येतात. त्यामुळे शनिवार-रविवारी या मार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. सध्या पर्यायी मार्गाची मर्यादित क्षमता लक्षात घेता आजही मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

*प्रशासनाचे आवाहन*  
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम नसल्यास माळशेज घाट मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवास करणे आवश्यक असल्यास वाहतुकीची सद्यस्थिती जाणून घेऊनच घराबाहेर पडावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून नियोजनबद्ध प्रवास करावा, असे सांगण्यात आले आहे. 

दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !!

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !! *डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट 2026, (राजू नलावडे...