*रेती वाहतुकीसाठी 6 लाखांची खंडणी मागितली; किनगाव जट्टू येथे गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल !
*मेहकर (बुलडाणा) प्रतिनिधी :* शासनमान्य रेती घाटातून रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला अडवून 6 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील एका गावगुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*काय घडले?*
फिर्यादी दुर्गेश दिलीप अवचार (वय 25, रा. कळमेश्वर, ता. मेहकर) हे देवी तुळजाई रियल इस्टेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीने खापरखेड लाड शिवारात पुर्णा नदी पात्रातील शासकीय रेती घाट घेतला असून, तेथे नियमानुसार रॉयल्टीने रेती विक्री सुरू आहे. दुर्गेश हे रॉयल्टी पावती देण्याचे काम करतात.
दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रेती वाहतूक सुरू होती. दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास चालक अक्षय म्हस्के (रा. भुमराळा) हा MH 28 BB 9789 या टिप्परमधून दोन ब्रास रेती घेऊन मेहकरकडे जात असताना, किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रोडवरील नदी पुलाजवळ आरोपी अमोल प्रभाकर पालकर (रा. किनगाव जट्टू) याने टिप्पर अडवला.
*धमकी आणि शिवीगाळ*
आरोपीने फिर्यादीला घटनास्थळी बोलावून, "तुमचे रेती स्टॉक उचलणे चालू आहे, त्यासाठी मला तुमच्या मालकाकडून सहा लाख रुपये पाहिजे, तरच मी येथून वाहने जाऊ देणार" अशी धमकी दिली. फिर्यादीने वाहने अडवू नको, मालकाशी बोल असे सांगताच आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारे वाहने अडवून पैशाची मागणी करत असून त्याच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे फिर्यादीने सांगितले.
या प्रकरणी आरोपी अमोल पालकर विरुद्ध कायमी अपराध क्रमांक / 2026 अंतर्गत कलम 126(2), 308(2), 352, 351(2) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
वृत्त - समाधान मुळे
No comments:
Post a Comment