Monday, 1 June 2026

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत 

संगमेश्वर : खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

श्री. सरनाईक यांनी कालपासून, दि. ३० मेपासून रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू केला. शनिवारी संध्याकाळी त्यांनी संगमेश्वर येथील नव्या एसटी बसस्थानकाला अचानक भेट दिली. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना मंत्र्यांनी आपला ताफा अचानक बस स्थानकाकडे वळवल्यामुळे एसटी प्रशासनाची आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. या भेटीदरम्यान त्यांनी केवळ वरवरची पाहणी न करता बसस्थानकातील अंतर्गत व्यवस्था आणि प्रवासी सुविधांचा थेट आढावा घेतला.

यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. रात्री धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांना प्रवाशांच्या जेवणासाठी अधिकृत स्थानकांवरील उपाहारगृहात थांबवणे बंधनकारक असतानाही काही चालक-वाहक आपल्या मर्जीनुसार खासगी धाब्यांवर गाड्या थांबवतात, हा गंभीर विषय यावेळी पत्रकारांनी मांडला. यावर मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत अशा मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य पातळीवरूनच विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असे स्पष्ट केले. काही कर्मचारी खासगी धाबाचालकांशी संधान साधून प्रवाशांना वेठीस धरतात, ही बाब गंभीर असून यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, याची देखल घेत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

बसस्थानकात दाखल झाल्यानंतर श्री. सरनाईक यांनी सर्वप्रथम स्थानक परिसर, प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष आणि कर्मचारी निवासस्थानांची अत्यंत बारकाईने पाहणी केली. नूतन बसस्थानकातील चकाचक व्यवस्था, प्रसाधनगृहांची उत्तम स्वच्छता आणि महिला प्रवाशांसाठी सज्ज असलेला हिरकणी कक्ष पाहून मंत्र्यांनी प्रशासकीय कामाबद्दल विशेष समाधान व्यक्त केले. या पाहणीदरम्यान त्यांनी हिरकणी कक्षात चोवीस तास वीज, पाणी आणि सुरक्षित वातावरण कायम राखले जावे, तसेच प्रवाशांच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशा काही महत्त्वाच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या.

​स्थानक परिसराच्या पाहणीनंतर परिवहन मंत्र्यांनी आपला मोर्चा उपाहारगृहाकडे वळवला. उपाहारगृहात प्रवेश केल्यानंतर त्यांनी तेथील स्वयंपाकघराची, अन्न शिजवण्याच्या जागेची आणि भांड्यांची बारकाईने पाहणी केली. सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी मिळणारे खाद्यपदार्थ दर्जेदार मिळतात की नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रवाशांमध्ये बसून उपाहाराचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी उपाहारगृह चालक वैभव भोजने यांच्याकडून खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल आणि इतर घटकांची सविस्तर माहिती घेतली. उपाहारात वडापाव खाल्ल्यानंतर  त्यांनी व्हीआयपी संस्कृती बाजूला सारत आपल्या बिलाचे पैसे स्वतःहून रोख स्वरूपात अदा केले.

या पाहणीनंतर उपस्थित स्थानिक पत्रकारांनी एका गंभीर समस्येकडे परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले. संगमेश्वर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन आणि सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले असले, तरीही एवढ्या मोठ्या स्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती पत्रकारांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. अत्याधुनिक स्थानक उभे राहिले असताना प्रवाशांना पाण्यासाठी तहानलेले राहावे लागणे ही अत्यंत चुकीची बाब असल्याचे सांगत मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी उपस्थित असलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागेवरच कडक सूचना देत, तत्काळ या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश दिले.

अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम; एकाच दिवशी होणार 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित !!

अहिल्यानगरचे सीए डॉ. प्रा. शंकर अंदानी यांचा जागतिक विक्रम; एकाच दिवशी होणार 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित !!

‘आई’ विषयावर 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह; लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार नोंद

12100 कविता, 115 जागतिक विक्रम, 3180 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 150 मानद डॉक्टरेटने साहित्यविश्‍वात निर्माण केली वेगळी ओळख

अहिल्यानगर (प्रतिनिधी) - हिंदी आणि मराठी साहित्य क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करत अहिल्यानगरचे सुपुत्र सीए (डॉ.) प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांनी जागतिक स्तरावर नवा इतिहास घडविला आहे. एकाच दिवशी तब्बल 106 स्वलिखित पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर नोंदविला असून, ‘आई’ या विषयावर 5121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची ऐतिहासिक कामगिरीही त्यांनी केली आहे.
साहित्य, समाजकार्य आणि विक्रमांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सीए शंकर अंदानी यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच भारतातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थांनी घेतली असून त्यांच्या कार्याची अधिकृत नोंद होणार आहे.

‘मा की ममता  मा अनेकता की शक्ति’ या नावाने प्रकाशित होत असलेल्या भव्य हिंदी काव्यसंग्रहात संपूर्ण भारतातील 140 कवींनी लिहिलेल्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तब्बल 5121 कवितांचा हा संग्रह जगातील सर्वात मोठा मातृत्वविषयक हिंदी काव्यसंग्रह मानला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य संकलन आणि संपादनाचे कार्य आजवर जगात कुणीही केले नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

याचबरोबर सीए शंकर अंदानी यांनी स्वतः लिहिलेल्या एकूण 12100 कवितांचे विविध पुस्तकांमध्ये प्रकाशन होत असून, हा देखील एक जागतिक विक्रम ठरत आहे. साहित्यविश्‍वात सर्वाधिक कविता प्रकाशित करण्याचा मान देखील त्यांच्या नावावर नोंदविला जात आहे. मराठी साहित्य क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. ‘वडील  बाबा अबोल जीवनाचे कोडे’ या नावाने महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1161 कवितांचे संकलन असलेला मराठी कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. तसेच ‘बहिण माझी प्रिय ताई’ या नावाने बहिणीवरील 1161 कवितांचा स्वतंत्र संग्रह प्रकाशित केला जात आहे.

या सर्व उपक्रमांमुळे एकाच दिवशी तब्बल पाच जागतिक विक्रम सीए शंकर अंदानी यांच्या नावावर नोंदविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर भव्य प्रकाशन सोहळा 30 मे 2026 रोजी पुणे येथे होणार असून, विविध क्षेत्रातील नामवंत राजकीय नेते, साहित्यिक, लेखक, कवी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

सीए शंकर अंदानी हे केवळ साहित्यिक नसून समाजसेवक म्हणूनही त्यांनी मोठे कार्य केले आहे. अनेक मंदिरे, धर्मशाळा, सामाजिक संस्था, चर्च, मस्जिद तसेच विविध सामाजिक संघटनांचे आर्थिक व करसल्लागार कामकाज त्यांनी अत्यंत अल्प दरात किंवा विनामूल्य केले आहे. 2022 मध्ये त्यांनी 364 मंदिरे, मस्जिद, चर्च आणि सामाजिक संस्थांचे कामकाज केल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली होती. याबाबतची माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ही संस्था देशभरातील उल्लेखनीय कार्य आणि विक्रमांची काटेकोर तपासणी करूनच नोंद करते. अत्यंत मर्यादित व्यक्तींना या संस्थेकडून अधिकृत मान्यता दिली जाते. त्यामुळे सीए शंकर अंदानी यांच्या कार्याला मिळालेली ही दखल विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

सीए शंकर अंदानी यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. युनायटेड नेशन अमेरिका तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून त्यांना “मेडल ऑफ एक्सलन्स” हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत तब्बल 3180 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नोंद असून, 115 जागतिक विक्रम आणि 150 मानद डॉक्टरेट मिळाल्या आहेत. व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले सीए शंकर अंदानी हे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी येथे मागील 18 वर्षांपासून करसल्लागार म्हणून कार्यरत होते. तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेचे मागील 20 वर्षांपासून करसल्लागार म्हणून ते कार्य करत आहेत. अनेक शासकीय संस्था, बँका आणि पतसंस्थांचे ते लेखापरीक्षक व करसल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या या अभूतपूर्व कार्याबद्दल शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, संगमनेरचे आ. सुधीर तांबे, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, आमदार संग्राम अरुणकाका जगताप, अहमदनगर सिंधी समाज अध्यक्ष महेश मध्यान यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, सीए शंकर अंदानी यांना “डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2022” ने देखील गौरविण्यात आले आहे. डॉक्टर बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठान, नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला. देशभरातून आणि परदेशातून प्राप्त झालेल्या सुमारे 1000 अर्जांमधून केवळ 40 जणांची निवड करण्यात आली होती. उत्कृष्ट समाजसेवेबद्दल हा पुरस्कार 11 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये पद्मश्री जितेंद्र सिंग शनटी, भाजप राष्ट्रीय सचिव व खासदार दुष्यंत गौतम, दिल्ली पोलिसांचे एसपी तोमर आणि भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल राजीव भल्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. साहित्य, समाजकार्य, विक्रम आणि सामाजिक बांधिलकी या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्यरत राहून सीए डॉ. प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांनी अहिल्यानगरचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.

वृत्तांकन/प्रसिद्धी - विलासराव कोळेकर सर 

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत  संगमेश्वर : खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर...