*ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; ३० जूनपासून 'बीएलओ' घरोघरी जाणार !!
*ठाणे, दि. २९* : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) राबवण्यात येत आहे. मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन गणनाप्रपत्र भरून घेणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
*राजकीय पक्षांसोबत बैठक*
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत रोडे, विठ्ठल डाके आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
*७४.५ लाख मतदारांची तपासणी*
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ६,८९४ मतदान केंद्रांशी जोडलेल्या ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांची पात्रता या मोहिमेत तपासली जाणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची भागनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.
*कार्यक्रमाचा टप्पा*
- *३० जून ते २९ जुलै २०२६*: BLO घरोघरी जाऊन गणनाप्रपत्र भरून घेणार. नाव, लिंग, वय, पालकांचा तपशील, स्थलांतरित, मृत व दुहेरी नोंद असलेल्या मतदारांचे वर्गीकरण केले जाईल.
- *५ ऑगस्ट २०२६*: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. विसंगती असलेल्या मतदारांची सुनावणी होईल.
- *५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६*: दावे व हरकतींचा कालावधी. नवीन नोंदणीसाठी फॉर्म ६, नाव वगळण्यासाठी फॉर्म ७, दुरुस्ती व स्थलांतरासाठी फॉर्म ८ भरावा लागेल.
*नागरिकत्वाचा पुरावा बंधनकारक*
- *१ जुलै १९८७ पूर्वी जन्म*: स्वतःची जन्मतारीख/जन्मस्थळाचा कोणताही एक वैध पुरावा.
- *१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४*: आई किंवा वडिलांचा भारतातील जन्माचा पुरावा.
- *२ डिसेंबर २००४ नंतर जन्म*: पालकांपैकी कोणी भारतीय नागरिक नसल्यास, जन्माच्या वेळचा वैध पासपोर्ट व व्हिसा.
- *परदेशात जन्म*: भारतीय दूतावासाने जारी केलेला जन्मनोंदणी पुरावा.
- *नागरिकीकरणाद्वारे नागरिकत्व*: नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र.
मतदाराचा २०२६ च्या यादीतील छापील तपशील, गणना प्रपत्र आणि घोषणापत्राशिवाय नवीन नोंद केली जाणार नाही. ज्या भागात ४० टक्क्यांपेक्षा कमी मॅपिंग आहे, तेथे राजकीय पक्षांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
*'पात्र मतदार सुटणार नाही, अपात्र समाविष्ट होणार नाही'*
‘पात्र असलेल्या कोणत्याही नागरिकाचे नाव मतदार यादीतून सुटणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही’ हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अंतिम यादी छापेपर्यंत दर आठवड्याला आढावा बैठक होणार असून राजकीय पक्षांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment