कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10/ई प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट; सहा महिने तक्रार करूनही कारवाई नाही !!
*डोंबिवली, प्रतिनिधी :* कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 10/ई प्रभागातील अनधिकृत बांधकामे आणि विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज गिरी यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करत नसल्याने आज दिनांक ३१ ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
*प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?*
मनोज गिरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 10/ई प्रभागात सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथावर अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका विभागाकडे लेखी तक्रारी आणि पाठपुरावा करूनही पारदर्शक कारवाई झालेली नाही.
*मनोज गिरी यांच्या प्रमुख मागण्या :*
1. तक्रारीत नमूद केलेल्या सर्व ठिकाणांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करावा.
2. अनधिकृत बांधकामांच्या मंजूर नकाशे आणि परवानग्यांची तपासणी करावी.
3. विनापरवाना फेरीवाल्यांवर नियमानुसार कारवाई करून सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटवावे.
4. गेल्या सहा महिन्यात केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल (Action Taken Report) द्यावा.
5. वेळेत कारवाई न करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी.
*वॉर्ड ऑफिसरने तक्रारीची नोंदही घेतली नाही - आरोप*
उपोषणाचा अर्ज केल्यानंतर 10/ई प्रभागातून तीन वेळा "उपोषण थांबवून सहकार्य करावे" असे पत्र आले. मात्र, चौथ्यांदा विनंती केली असता वॉर्ड ऑफिसरने तक्रारीची साधी नोंदही घेतली नसल्याचा आरोप गिरी यांनी केला आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कार्यालयात थांबूनही सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे हे सकाळी 11.30 वाजता येऊन गाडीतून न उतरताच निघून गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने कठोर व निष्पक्ष कारवाई करून लेखी अहवाल द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार राखून ठेवल्याचे गिरी यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment