पडघा वनविभागात विद्यार्थिनींचे रक्षाबंधन ; राखीच्या धाग्यातून वनरक्षणाचा संदेश !!
भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील पडघा वनविभाग कार्यालयात शारदा विद्यालय, पडघे येथील इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थिनींनी वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रती आपुलकी व्यक्त करण्यासोबतच वन, पर्यावरण आणि राखीच्या धाग्यातून वनरक्षणाचा संदेश दिला. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून एकमेकांच्या संरक्षणाची आणि जबाबदारीची भावना जपणारा सण आहे. याच भावनेतून विद्यार्थिनींनी वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींच्या या अनोख्या उपक्रमामुळे वनविभाग कार्यालयातील वातावरण आनंदमय झाले.
यावेळी पडघा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ, शिपाई महेंद्र भेरे ,वाहुली वन व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेश मते , शारदा विद्यालयातील शिक्षक शिक्षक जयश्री सोनवणे, गौरी भामरे, विशाल देवरे, कर्मचारी सुयोग वेखंडे उपस्थित होते. यावेळी पडघा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे उपस्थितांनी सांगितले. ‘राखीच्या धाग्यातून नाते जुळले, तर निसर्गरक्षणाचा संकल्पही दृढ झाला,’ असा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
No comments:
Post a Comment