जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत कृपा अडकूरकर प्रथम; विभागीय स्तरावर निवड !!
*पालघर, प्रतिनिधी / पंकज चव्हाण*
विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी कृपा अडकूरकर हिने जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पालघर येथील आर्यन हायस्कूलमध्ये आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कृपाने 'भारतीय ऊर्जा क्षेत्रे २०४७ : संधी आणि आव्हाने' या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर केले. भारतीय ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य, वाढती ऊर्जेची गरज, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, शाश्वत विकास तसेच २०४७ पर्यंतच्या संधी आणि आव्हानांचा तिने अभ्यासपूर्ण वेध घेतला.
*विभागीय स्तरावर निवड*
या यशामुळे कृपाची आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने विज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवणे ही उत्कर्ष विद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
कृपाने मेहनत, विषयाचा सखोल अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिला मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेश्मा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
*अभिनंदनाचा वर्षाव*
कृपा अडकूरकर आणि मार्गदर्शक शिक्षिका रेश्मा जोशी यांचे मुख्याध्यापिका चित्रा ठाकूर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर झेप घेणाऱ्या कृपाच्या या यशामुळे उत्कर्ष विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून विभागीय स्पर्धेसाठी संपूर्ण उत्कर्ष परिवाराकडून तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment