Tuesday, 28 July 2026

एक तास केडीएमटी बस न आल्याने व त्यानंतर आलेली बस ही डेपोत जात असल्याने तरुणाचा संताप ! प्रकरण पोलीस ठाण्यात !

एक तास केडीएमटी बस न आल्याने व त्यानंतर आलेली बस ही डेपोत जात असल्याने तरुणाचा संताप ! प्रकरण पोलीस ठाण्यात !!

महानगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर...

          डोंबिवली एमआयडीसी निवासी ते डोंबिवली रेल्वे स्थानक अशी बस सेवा कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) तर्फे चालविण्यात येते. मागील मार्च महिन्यापासून सर्वच मार्गावरील नवीन घेतलेल्या वातानुकूलित बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वच मार्गावर जुन्या बीना वातानुकूलित (नॉनएसी) बसेस चालविण्यात येत होत्या. त्या बसेस मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने त्या वाटेत बंद पडत असल्याने या निवासी व इतर मार्गावरील काही बसेस फेऱ्या रद्द करण्यात येतात. यामुळे प्रवासी जाम वैतागले गेले आहेत. यामुळे त्याचीच परिणीती काल सोमवारी दुपारी घडली.

             निवासी भागात राहणारे  सागर पाटील हे आपल्या नोकरी व्यवसाय करीता जाण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता निवासी मधील एमएसईबी ऑफीस बस स्टॉपवर आले, त्यांना डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे जायचे असल्याने केडीएमटी बसची वाट बघत बसले परंतु तासभर थांबून तीन वाजले तरी एकही बस आली नाही, त्यात जोराचा पाऊस पडत होता त्यामुळे ते आणि बसस्टॉपवर उभे असलेले इतर ज्येष्ठ पुरुष/महिला संतापले होते. तेवढ्यात तेथे एक केडीएमटीची विनाफलक लावलेली बस आली पण त्यातील चालक वाहक यांनी सदर बस ही डेपोत जात असल्याचे सांगितले त्यामुळे ते सर्वजण या बस मध्ये चढले नाहीत. अजून थोड्यावेळाने विनाफलक लावलेली एक बस आली असता त्यात या स्टॉपवरील सर्वजण त्यात चढले असता त्यातील वाहकाने सांगितले की ही बस कल्याण डेपोत जात आहे तेव्हा त्या मार्गावरील प्रवासी बसा, बाकी सगळे खाली उतारा. परंतु येथील स्टॉपवरील सर्व प्रवाशांना डोंबिवली कडेच जायचे होते. त्यामुळे गुपचूपपणे ज्येष्ठ पुरुष, महिला प्रवासी या बस मधून उतरले पण तरुण असलेले सागर पाटील याना कामावर तातडीने जायचे असल्याने व आधीच उशीर होवून तासभर स्टॉपवर थांबल्याने ते संतापले होते. त्यांनी शांतपणे बसमधून उतरण्यास नकार दिला व ही बस डोंबिवलीकडे नेहून नंतर ती डेपोत घेऊन जावी असा सल्ला दिला. त्याला कारणही असे होते की तासभर बस न आल्याने पुढील प्रत्येक बस स्टॉपवर डोंबिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती. परंतु सदर बसचा वाहक उर्मटपणे वागून बस डोंबिवलीकडे जाणारच नाही असे सांगू लागला. शिवाय उर्मटपणे बोलला की तुम्ही मुख्यमंत्री, आयुक्त, परिवहन व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली तरी आमचे कोणीकाही वाकडे करू शकणार नाही. यानंतर सागर पाटील याने विनंतीने, नम्रपणे सांगूनही या बसच्या वाहक, चालकाने डोंबिवली स्थानकाकडे बस नेण्यास नकार दिला. सदर बस वाहकाने चालकास सांगून ही बस मानपाडा पोलिस ठाण्याकडे घेऊन त्या तरुणाला धमकावले की सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिस ठाण्यात तुझाविरुद्ध गुन्हा दाखल करतो. खरे तर सागर पाटील या तरुणाने कोणतीही शिविगाळ आणि मारहाण केलेली नसतानाही पोलिसांना या वाहकाने गुन्हा दाखल करण्यास सांगितले असता पोलिसांनी सागर पाटील याच्याशी बोलून सदर तक्रार तथ्यहीन असल्याने तक्रार घेण्यास नकार दिला. शिवाय त्यावेळी पोलिस ठाण्यात आलेल्या काही राजकीय पदाधिकारी इत्यादींनी या सागर पाटील तरुणाची बाजू घेतली. त्यामुळे शेवटी या वाहकाने तेथून काढता पाय घेतला. सदर या बसचा रोजनामा (फेरीपत्रक) हे सागर पाटील याने पाहून त्याचा फोटो घेतला असता त्यात असे पाहण्यास आले की या बस मध्ये सकाळी ११.५५ वाजता बसच्या पुढील डावीकडील टायरच्या बेअरिंग मध्ये आवाज येत होता व तो दुरुस्त करण्यात आला होता, शिवाय ही बस क्रमांक :- ५१ डोंबिवली कासा रिओ (मेन गेट निळजे मार्गे) आणि डोंबिवली - निवासी अशा फेऱ्या मारणारी होती. या बसचा क्रमांक ११५५ आणि वाहकाचा/कंडक्टरचा क्रमांक ७१११ असा होता. हे सर्व फेरीपत्रक मधून समजले आहे. या सर्व प्रकाराने या तरुणाचे आणि सदर बस वाहक, चालकाचे दोन तास वाया गेले. याच वेळेत पंधरा मिनिटांवर असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकवर अनेक बस फेऱ्या झाल्या असत्या. विशेष म्हणजे या डेपोत जाणाऱ्या दोन्ही बसेसवर बस कुठे जात आहे याचा कोणताही फलक लावला नव्हता. त्यामुळे प्रवाशांच्या आणखी गोंधळ उडाला.

केडीएमटीच्या अधिकृत बस वेळापत्रकाप्रमाणे दुपारी दोन ते तीन दरम्यान कमीतकमी तीन बस (१४.१०, १४.२०, १४.४५)  या एमएसईबी ऑफीस बसस्टॉपवर यायला पाहिजे होत्या पण त्या दरम्यान एकही बस आली नाही. या सर्व गोंधळाला केडीएमटी प्रशासन जबाबदार असून रोजच दिवसभर असाच प्रकाराचा गोंधळ तसेच बसेस वेळेवर न येण्याच्या प्रकार चालू असतो. यामुळे याच्या फायदा रिक्षावाले उचलीत असून केडीएमटी प्रशासनाशी रिक्षावाल्यांचे साटेलोटे होत असल्याचे आरोप बस प्रवासी करीत आहेत. एकंदर प्रवाशांना वेळ नसल्यामुळे व पोलिस स्टेशनला जाण्याची भीती असल्यामुळे कोणी प्रवासी या अन्यायाविरुद्ध समोर येत नाही याचा गैरफायदा हे केडीएमटी बसवाले घेत असल्याचे दिसत आहेत.

डोंबिवली एमआयडीसी निवासी हा मार्ग केडीएमटीचा सर्वात फायदेशीर मार्ग असून रोज या मार्गावरून हजारो प्रवासी जात येत असतात. केडीएमटी प्रशासनाने या मार्गावरील बस सेवेत वेळीच सुधारणा न केल्यास येथील प्रवाशांचा संताप अनावर होऊन त्याची मोठी किंमत प्रशासनाला कधीतरी मोजावी लागणार आहे. त्यात सागर पाटील सारखे तरुण वर्ग एकटवले तर हे तरुण जेन झी (Gen z) संतापून उठून आंदोलनाच्या मार्ग अवलंबतील तर प्रशासनाची मोठी गोची होईल. प्रशासनाने यात वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

No comments:

Post a Comment

*एक तास बस न आल्याने प्रवाशांचा संताप; डेपोत जाणाऱ्या बसवरून वाद, प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात !

*एक तास बस न आल्याने प्रवाशांचा संताप; डेपोत जाणाऱ्या बसवरून वाद, प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात ! *डोंबिवली, प्रतिनिधी  डोंबिवली ...