*एक तास बस न आल्याने प्रवाशांचा संताप; डेपोत जाणाऱ्या बसवरून वाद, प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात !
*डोंबिवली, प्रतिनिधी
डोंबिवली एमआयडीसी निवासी ते डोंबिवली रेल्वे स्थानक या केडीएमटी बससेवेत वारंवार गोंधळ होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यातूनच सोमवारी दुपारी वाद होऊन प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले.
*काय घडले?*
निवासीतील एमएसईबी ऑफीस बसस्टॉपवर सागर पाटील हे दुपारी 2 वाजल्यापासून डोंबिवलीला जाण्यासाठी वाट पाहत होते. एक तास उलटूनही बस न आल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यात विनाफलक असलेल्या दोन बसेस डेपोत जात असल्याचे सांगून आल्या.
त्यातील एका बसमध्ये सर्व प्रवासी चढले असता वाहकाने "ही बस कल्याण डेपोत जाते, डोंबिवलीला जाणाऱ्यांनी उतरा" असे सांगितले. इतर ज्येष्ठ नागरिक उतरले, मात्र उशीर झाल्याने सागर पाटील यांनी ही बस आधी डोंबिवलीला घेऊन जावी अशी विनंती केली. यावरून वाहकाशी वाद झाला. वाहकाने उर्मटपणे बोलून बस मानपाडा पोलीस ठाण्यात नेली आणि सरकारी कामात अडथळा केल्याचा आरोप केला.
पोलिसांनी चौकशीअंती तक्रार तथ्यहीन असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही तरुणाची बाजू घेतली.
*प्रवाशांच्या तक्रारी*
केडीएमटीच्या वेळापत्रकानुसार दुपारी 2 ते 3 या वेळेत किमान 3 बसेस यायला हव्या होत्या, पण एकही आली नाही. बसेस वारंवार बिघडतात आणि फेऱ्या रद्द होतात. डेपोत जाणाऱ्या बसेसवर फलक नसल्याने गोंधळ वाढतो. याचा फायदा रिक्षाचालक घेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
*प्रशासनाला इशारा*
डोंबिवली एमआयडीसी निवासी हा केडीएमटीचा सर्वात फायदेशीर मार्ग आहे. वेळेत सुधारणा न झाल्यास प्रवाशांचा संताप अनावर होईल आणि तरुण वर्ग आंदोलनाच्या मार्गाने जाईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)
No comments:
Post a Comment