*'बातमीदार माझा'चा दणका : केडीएमटीच्या निवासी फेऱ्या वाढणार; ब्रेकडाऊन बसेसची दुरुस्ती आणि चालक भरती होणार*
*डोंबिवली, प्रतिनिधी* : डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील बससेवेच्या अनियमिततेसंदर्भात 'बातमीदार माझा' ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची केडीएमटी प्रशासनाने दखल घेतली आहे. त्यामुळे आता निवासी मार्गावरील बस फेऱ्या वाढविण्याबरोबरच ब्रेकडाऊन झालेल्या बसेसची तातडीने दुरुस्ती आणि चालक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
*काय होती समस्या?*
'बस थांब्यावर एक तास केडीएमटी बस न आल्याने तरुणाचा संताप' आणि 'बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीमुळे प्रवासी त्रस्त' ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवाशांच्या समस्या ऐरणीवर आल्या होत्या.
*केडीएमटीची तातडीची कार्यवाही*
या बातमीची दखल घेत माननीय परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खालील महत्त्वाचे निर्देश दिले:
1. *ब्रेकडाऊन बसेस दुरुस्त* : कार्यशाळेत गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्तीअभावी उभ्या असलेल्या बसेसची तातडीने दुरुस्ती करून त्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात.
2. *चालक भरती* : बससेवा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने चालक भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.
*बस थांब्यावरील अतिक्रमणांवर कारवाई*
बस थांब्यावरील अनधिकृत फेरीवाले, टपरीवाले आणि अवैध रिक्षा पार्किंगच्या समस्येबाबत केडीएमटीने यापूर्वीच केडीएमसीचे उपायुक्त (फेरीवाला हटाव मोहीम), आरटीओ आणि पोलीस वाहतूक शाखेला पत्रे दिली होती. आता त्याबत पुन्हा स्मरण पत्रे देण्यात येणार असल्याची माहिती केडीएमटी अधिकाऱ्यांनी दिली.
*प्रवाशांकडून समाधान*
या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत निवासी मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांच्या समस्या सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याबद्दल केडीएमटी प्रशासन आणि 'बातमीदार माझा'चे एमआयडीसी प्रवासी संघटनेचे राजू नलावडे यांनी आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment