गौरी गणपती सणा निमित्त कोकणात येणाऱ्या गणेशभक्तां करिता आवश्यक त्या सोईसुविधा मिळण्यासाठी प्रयत्नशील -'पालकमंत्री आदितीताई तटकरे'.
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) आगामी गौरी-गणपती सणाकरिता मुंबईहून गणेशभक्त आपापल्या गावी कोकणात यायला लागतील. त्यांना योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांना याविषयी पत्रान्वये विनंती केली आहे. बरेचसे गणेशभक्त हे एसटी प्रवासानेच कोकणात येतात. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या व्यक्तींसाठी स्थानिक प्रशासनाने विलगीकरणाचे दिवस निश्चित करून कोकणात येणाऱ्या व्यक्तीने दिनांक ०७ ऑगस्ट २०२० पूर्वीच आपल्या गावी यावे,असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप एसटी प्रवासासंदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कोणताही निर्णय झालेला नाही तसेच येणाऱ्या गणेश भक्तांना ई- पास मिळण्यासंदर्भात आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडे आकारणी या गैरसोयीलाही सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यापुढे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा हाच एक उत्तम पर्याय आहे. यामुळेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांना या संदर्भात लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याविषयी पत्रान्वये विनंती केली आहे.
No comments:
Post a Comment