जकात नाक्यांचा व्यावसायिक वापर "वाहतूक, व्यावसायिक हब तयार करण्याचा विचार" !
मुंबईबाहेरून येणाऱ्या गाड्या वेशीवरच थांबणार.....
मुंबई : वस्तू आणि सेवा कराची (जी.एस.टी.) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जुलै २०१७ पासून ओस पडलेल्या जकात नाक्यांच्या जागेचा वापर करण्यासाठी पालिकेची पुन्हा सल्लागाराकडून प्रस्ताव मागवले आहेत.
दहिसर, मुलुंड, ऐरोली, वाशी, मानखुर्द अशा पाच जकात नाक्यांच्या १६ एकर जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक हब उभारण्याचा पालिकेचा विचार आहे.
रिकाम्या असलेल्या जागेच्या वापरातून पालिकेला महसूल मिळू शकणार आहे.
या जागेवर वाहतूक हब उभे राहिल्यास मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवासी गाड्या तिथेच थांबवल्या जाणार आहेत.
पालिकेची जकातवसुली १ जुलै २०१७ पासून बंद झाल्यामुळे शहराच्या सीमांवर असलेले पाचही जकात नाके गेल्या चार वर्षांपासून ओस पडले आहेत.
या जकात नाक्यांवर अनधिकृत बांधकामांचे अतिक्रमण होऊ नये म्हणून या जागेचा वापर करण्याबाबत विविध सूचना नगरसेवकांनी केल्या होत्या. काही वर्षांपूर्वी पालिकेने या जागेच्या वापरासाठी सल्लागारांकडून प्रस्तावही मागवले होेते. मधल्या काळात पालिकेने ही जागा सागरी मार्गाच्या कामासाठी कार्यशाळा म्हणून वापरण्याचे ठरवले होते. मात्र सागरी मार्गापासून जकात नाके दूर असल्यामुळे तो पर्यायही नाकारण्यात आला.
त्यामुळे आता पालिकेने पुन्हा जागेच्या विकासासाठी सल्लागारांकडून प्रस्ताव मागवले आहेत.
सल्लागारांना ९ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जकात नाक्यांवर वाहतूक हब उभारल्यानंतर मुंबई बाहेरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या तिथे थांबवल्या जाणार आहेत. तसेच ट्रक टर्मिनलही उभारण्यात येणार आहे.त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रदूषणही कमी होईल.
No comments:
Post a Comment