'ग्रीन आशा' यशस्वी रित्या जेएनपीएत दाखल ; सुमारे १५ हजार टन एलपीजीची आयात !!
युद्ध सुरु असतानासुद्धा भारताची रणनीती ठरली यशस्वी.
उरणच्या जेएनपीए मध्ये ग्रीन आशा जहाजचे स्वागत.
उरण दि १०, (विठ्ठल ममताबादे) :
पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर, 'ग्रीन आशा' हे एलपीजी वाहून नेणारे भारतीय जहाज यशस्वीरित्या भारत देशात दाखल झाले आहे. सुमारे १५ हजार टन एलपीजी घेऊन आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली सुरक्षित मार्गक्रमण मुंबईलगतच्या उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरात सुरक्षितपणे पोहोचले.
गेल्या सुमारे ४० दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्धस्थितीत या जहाजाचे सुरक्षित आगमन हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 'ग्रीन आशा'ने इराणमधील लारक, केशम आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संवेदनशील सागरी मार्ग यशस्वीरित्या पार केला. होर्मुझचा तणावपूर्ण मार्ग जहाजाने कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केला आहे.भारतच्या रणनीती मुळे इंधन व कर्मचारी सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहेत.
जेएनपीए बंदरातील बीपीसीएलच्या लिक्विड जेट्टीवर हे जहाज उभे करण्यात असून हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आखातात व्रातात युद्धाला सुरुवात झाल्यापासून जेएनपीए बंदरात पोहोचलेले एलपीजी वाहून आणणारे हे पहिलेच जहाज आहे.
'ग्रीन आशा' जहाजाच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने सतत निरीक्षण ठेवले होते. नौदलाच्या मार्गदर्शनाखाली हे जहाज सुरक्षित भारतात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे सुरक्षित पोहोचलेले हे नववे भारतीय जहाज असल्याची माहिती देण्यात आली. 'ग्रीन आशा'चे सुरक्षित आगमन हे केवळ एक यशस्वी सागरी ऑपरेशन नाही, तर भारताच्या ऊर्जासुरक्षेचा मजबूत आधार असल्याचे सांगण्यात आले.या जहाजचे जेएनपीए मध्ये मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले
No comments:
Post a Comment