सिग्नल शाळेचा विद्यार्थी दशरथ पवारला दहावीत ६६ टक्के !!
ठाणे, दि. २९ :दोन वर्षांपुर्वी दहावीच्या निकालात सिग्नल शाळेच्या दोन मुलांनी उज्वल यश संपादन केले होते यावर्षी शाळेचा एक विदयार्थी दहावीत होता त्याने देखील ६६ टक्के मिळवत सिग्नल शाळेच्या यशाची कमान अधिक उंचावली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुलाखाली राहून दशरथने हे यश संपादीत केले आहे.
समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन हात नाका पुलाखाली राहत असलेल्या व महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील स्थलांतरीतांच्या मुलांसाठी सिग्नल शाळा हा अभिनव उपक्रम पाच वर्षांपुर्वी सुरू झाला. दोन वर्षांपुर्वी या शाळेतील दोन विदयार्थी दहावी उत्तीर्ण झाले. आज दहावीचा निकाल जाहीर झाला त्यात सिग्नल शाळेचा दशरथ जालिंदर पवार हा विदयार्थी ६६ टक्के गुण मिळवुन दहावीची परिक्षा उत्तिर्ण झाला. महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ सभापती विकास रेपाळे, शिक्षण विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे दशरथ पवार याला हे उज्वल शैक्षणिक यश संपादित करता आले.
दशरथ जालिंदर पवार याचे आई आणि वडील हे अनेक वर्षांपासुन सिग्नलवर गजरा विकण्याचा व्यवसाय करतात. सिग्नल शाळा सुरू झाल्यानंतर दशरथ शाळेत दाखल झाला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शाळा झाल्यानंतर आई-वडिलांना गजरे विकण्यास मदत करणे आदी कामे करून उशीरा रात्री पर्यंत अभ्यास करून दशरथने दहावीत ६६ टक्के कमवीले. यापुढे त्याला तंत्रशिक्षण घेण्याची इच्छा असुन त्या दृष्टीने समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने त्याच्या भविष्यातील उच्च शिक्षणासाठी देखील सहाय्य करणार आहे.
सिग्नल शाळेच्या प्रकल्प प्रमुख आरती परब, शिक्षिका प्रियांका पाटील, संगिता एलल्ला, सुप्रिया कर्णीक, पौर्णीमा करंदीकर, सुमन शेवाळे, सौ. अवचट मॅडम यांच्या सहकार्याने दशरथ हे शैक्षणिक यश प्राप्त करू शकला.
No comments:
Post a Comment