विस्थापित आदिवासी बांधवांची भेट घेऊन जाणुन घेतल्या त्यांच्या व्यथा !
अंबरनाथ - अंबरनाथ तालुक्यातील एमआयडीसी बहनोली येथील आदिवासी पाड्यातील काही आदिवासी कुटुंबांना त्यांचे अज्ञान व निरक्षर पणाचा गैरफायदा घेऊन काही स्थानिक तथाकथित पुढा-यांनी (सरपंच आणि पोलीस पाटील) संगनमत करुन आदिवासींच्या वहीवाटीत असलेली वडीलोपार्जित जमीन एमआयडीसीतील *सिएट* कंपनीला खोटे कागदपत्रे बनवून विकली असल्याचा दावा तेथील विस्थापित आदिवासी कुटुंबांनी केला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सदर 8/9 कुटुंबांना तुम्हाला कंपनीत नोकरी देतो, प्रत्येकी र.रु. 20 लाख रुपये व जमीनीच्या मोबदल्यात तुमचे दुसरीकडे जमीन देवुन घरे बांधून देतो. अशी खोटी व फसवी आश्वासने देवुन कागदपत्रांवर निरक्षर अज्ञानी आदिवासी कुटूंबातील सदस्यांचे अंगठे घेऊन जवळपास अडीच एकर जमीन सिएट कंपनीने आजुबाजुच्या गावातील पोलीस पाटील व तथाकथित नेतेमंडळी यांच्या मध्यस्थीने बळकावून आदिवासी कुटूंबांना गावकुसाबाहेर निर्जन स्थळी तात्पुरती घरे देवुन त्यांची बोळवण करुन त्यांची फसवणूक केली आहे.
सदर जमीनीचा मोबदला तेथील मध्यस्थी करणा-या तथाकथित नेते मंडळी व पोलीस पाटील व इतरांनी हडप केल्याची व्यथा विस्थापित व पिडीत आदिवासी कुटुंबांनी *अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य.* संघटनेचे प्रदेश सरचिटणीस *महेंद्र तथा अण्णा पंडित.* यांचे कडे मांडली आहे.
सदर विस्थापित कुटुंबांना नागरी सुखसुविधांपासुन वंचित ठेवणा-या व फसवणुक करुन आदिवासी जमीन बळकवल्या प्रकरणी आपण सिएट कंपनी विरुद्ध आणि त्यांना सदर जमीन व्यवहार प्रकरणात मदत करणारे पोलीस पाटील व इतरांविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंदवुन व आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन करण्याबाबत प्रशासनाकडे संघटने मार्फत दाद मागण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महा.राज्य प्रदेश सरचिटणीस अण्णा पंडित यांनी केले आहे. पिडीत कुटुंबियांच्या भेटी दरम्यान स्थानिक समाजसेविका किशोरी पाटील पत्रकार तथा मानवाधिकार कार्यकर्ता अजित इंगळे स्थानिक जातीवादी गावगुंडांच्या अत्याचाराने पिडीत असलेले बाळाराम शिद हे अण्णा पंडीत यांचे सोबत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment