कचरा संकलनासाठी तैनात केलेल्या सायकल रिक्षांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद !
कल्याण, बातमीदार : महापालिका क्षेत्रात असलेल्या झोपडपट्टी परिसरात, दाटीवाटीच्या वस्तीत तसेच अरुंद गल्ली बोळात महापालिकेचे मोठी कचरा वाहने कचरा संकलनासाठी आत जाऊ शकत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागाने २५ सायकल रिक्षा प्राथमिक टप्प्यात खरेदी केल्या असून त्यापैकी काही सायकल रिक्षा आय प्रभागात आणि काही सायकल रिक्षा अ प्रभागात कचरा संकलन वाहतूकीसाठी देण्यात आल्या आहेत.
आज आय प्रभागातील कचरा संकलन करणा-या सायकल रिक्षांनी गोळवली, पिसवली, आशेळे, दावडी या परिसरातील अरुंद रस्त्यावर, झोपडपट्टी परिसरात फिरून तेथील नागरिकांकडून कचरा संकलित केला. अ प्रभागातील गाळेगाव, मोहना, बंदरपाडा, मांडा पश्चिम येथील झोपडपट्टी परिसरात आणि दाटीवाटीच्या परिसरातील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकडूनही आज या सायकल रिक्षांमार्फत कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेचे कचरा संकलित करणारे वाहन प्रत्यक्ष दारात पाहून नागरिकांनी स्वतःहूनच ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करत महापालिकेच्या सायकल रिक्षांना चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
No comments:
Post a Comment