हवामान खात्याचा इशारा ; ऑरेंज अलर्ट जारी ! पुढील काही दिवस अतिवृष्टीची शक्यता !!
ठाणे, बातमीदार : आज दुपारपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरु आहे. याशिवाय पुढील काही तासांत हा पाऊस आणखी वाढू शकतो, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.मुंबईसह परिसरातील यलो अलर्ट आता बदलून ऑरेंज अलर्ट झाला आहे. तसंच या सर्व ठिकाणी पुढील काही दिवस आणखी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.
यंदा काहीशी उशीरा पावसाला सुरुवात झाली असली तरी आज दुपारपासून पावसाची संततधार सुरू असून, सध्या मुंबईतील दादर, सायन, वरळी या शिवाय उपनगरीय भागात धो-धो पाऊस पडत आहे. ठाण्यापासून पुढे कल्याण तसंच अंबरनाथपर्यंत धुवांधार पाऊस सुरु आहे.
जोरदार पाऊस सुरु असून लोकल जवळपास 20 ते 30 मिनिटं उशीराने सुरु आहेत. या सर्वामुळे शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली जाऊ लागले आहेत. वाढत्या पावसामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांना काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.
पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं मुंबईसह परिसर आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.

No comments:
Post a Comment