विशेष लेख __ *जाणून घेवू नागरी संरक्षण दल*
*आपत्ती समयी मदत व बचाव कार्य करण्यासाठी तत्परतेने धावून जाणारे शासकीय स्वयंसेवी दल*
नागरी संरक्षण दल, नवी मुंबई समूह, ठाणे शहरामध्ये नागरी संरक्षण संघटना सन १९७१ पासून कार्यरत असून या शहरामध्ये नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती आल्यास नागरिकांच्या जीवित व वित्त संरक्षणासाठी नागरी संरक्षण उपाययोजना अंमलात आणल्या जातात. या आपत्ती टाळता येऊ शकत नसल्या तरी नियोजनाद्वारे त्यांची तीव्रता कमी करता येते किंवा त्याची परिणामकारकता कमी करता येऊ शकते. यासाठी सामूहिक प्रयत्नांची व व्यवस्थापनाची गरज आहे.
भारतात प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी, भूकंप, वणवा, दरड कोसळणे, चक्रीवादळ, वीज पडणे तसेच मानवनिर्मित आपत्तीमध्ये आग लागणे, इमारत कोसळणे, वायू गळती, साथीचे रोग, औद्योगिक - रासायनिक अपघात इत्यादींचा समावेश होतो. नैसर्गिक आपत्ती येणे आपल्या हातात नसले तरी त्यांची तीव्रता कमी करणे शक्य आहे आणि भविष्यात त्यापासून होणारे नुकसान व परिणाम होऊ नयेत, याकरिता योग्य नियोजन करता येते.
ठाणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास आपत्तीच्या काळात संदेश/माहिती मिळताच संचालक, नागरी संरक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच नियंत्रक व जिल्हादंडाधिकारी, नागरी संरक्षण, ठाणे यांच्या आदेशान्वये त्वरीत मदत व बचाव कार्य करण्यासाठी घटनास्थळी पोहोचणे अभिप्रेत आहे.याकरिता प्रमाणित कार्यपद्धती (एस.ओ.पी.) निश्चित केलेली आहे. त्याप्रमाणे कार्य अपेक्षित आहे.
सन १९६१ पासून ठाणे शहरात नागरी संरक्षण दलाची स्थापना झाली आहे. जिल्हादंडाधिकारी व नियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे हे या संघटनेचे विभाग प्रमुख असून, उपनियंत्रक नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे हे कार्यालय प्रमुख आहेत.
उपनियंत्रक 14 नागरी संरक्षण कार्यालय, मुख्य नियंत्रण कक्ष, कल्याण तहसिलदार कार्यालयाच्या आवारामध्ये व उप मुख्य नियंत्रण कक्ष, सिद्धार्थ नगर, अंबरनाथ (पश्चिम) येथे आहे. या ठिकाणी एकूण वैतनिक अधिकारी व कर्मचारी विभागून कर्तव्यावर असतात. या कार्यालयाकडे एक बोलेरो जीप, एक रुग्णवाहिका अशी शासनाने दिलेली वाहने आहेत. या वाहनांचा वापर आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यात येतो.
सन १९७१ ते एप्रिल १९८६ पर्यंत कल्याण / अंबरनाथ व ठाणे ही शहरे नागरी संक्षण शहर म्हणून अस्तित्वात होती. त्यावेळी सुध्दा ठाणे कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात मुख्य नियंत्रण केंद्र जिल्ह्याचे ठिकाणी म्हणून अस्तित्वात होते. तसेच कल्याण येथे उप नियंत्रण केंद्र कार्यरत होते. ठाणे शहरात हवाई हल्ला धोका सूचना देण्यासाठी १७ विद्युत सायरन अस्तित्वात होते, तसेच ठाणे ते मुख्य नियंत्रण केंद्र मुंबई दरम्यान हॉट लाईन कार्यरत होती.
एप्रिल, १९८६ रोजी नागरी संरक्षण ठाणे शहर भारत सरकार पत्र क्र.८/11011/183/ सीडीसीडी(सी.डी.) ने ठाणे शहर नागरी संरक्षण शहराच्या यादीतून वगळण्यात आले, तेव्हापासून कल्याण तहसिलदार कार्यालयामागे सर्व्हे नं. प्लॉट वर नागरी संरक्षण कार्यालयातर्फे बांधकाम करुन कल्याण उप नियंत्रण केंद्राचे मुख्य नियंत्रण केंद्रात रूपांतर केले व आवश्यक ते दूरध्वनी १०० वॅट एच.एफ. सेट, हॉट लाईन हवाई हल्ला धोका सूचना यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.
संचालक, नागरी संरक्षण ना.सं./५/२३/९५, दि. २६ सप्टेंबर १९९५ नुसार नागरी संरक्षण कल्याण अंबरनाथ ऐवजी नवी मुंबई समूह, ठाणे वर्ग-१ म्हणून घोषित करण्यात आले असून अंतर्गत प्रमुख शहरे म्हणून ठाणे-कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ-नवी मुंबई व बेलापूर औद्योगिक पट्टा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच ठाणे महानगरपालिका व नवी मुंबई महानगरपालिका इत्यादी ठिकाणचा समावेश केल्याने ठाणे हे ठिकाण मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागरी संरक्षण शहराच्या आराखडयात ठाणे येथे मुख्य नियंत्रण केंद्र निर्देशित केले आहे.
*नागरी संरक्षण दल, ठाणे येथील कार्यालयीन जागांची माहिती*
*कार्यालयाचे नाव –*
• उप नियंत्रक, नवी मुंबई समूह, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, 5 वा मजला, रुम नं. 504, ठाणे. दूरध्वनी क्रमांक-022-25432288
• मुख्य नियंत्रण कक्ष, कल्याण, तहसिलदार कार्यालय मागे, मुरबाड रोड, महात्मा फुले चौक, कल्याण (प.). दूरध्वनी क्रमांक-022-25432288, 0251-2317578/2313295/2313263
• उप नियंत्रण कक्ष अंबरनाथ, पाणीपुरवठा कार्यालयासमोर, पंप हाऊस, अंबरनाथ (प.) दूरध्वनी 0251-2684073/ 264074.
सध्या नागरी संरक्षण दल, उप नियंत्रक, नवी मुंबई समूह, ठाणे या पदाची धुरा श्री. विजय जाधव हे सांभाळीत आहेत.
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे
No comments:
Post a Comment