कोणाचे भाषण चांगले झाले, कोणत्या मेळाव्याला जास्त गर्दी होती, अशी चर्चा जरी सध्या सुरू असली तरी दोन्हीकडे चांगली गर्दी झाल्याने ठाकरे-शिंदे गटामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. शिंदे गटाने केलेल्या उठावानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यभरात सहानुभूती आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या दसरा मेळाव्यालाही शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती, याहीवर्षी ती कायम होती. शिवसेनेची ताकद विभागली गेली असली तरी शिवाजी पार्क किंवा आझाद मैदान भरण्यासाठी लागणारी संख्या जमवणे या दोन्ही पक्षांना कठीण नाही. एकनिष्ठ-गद्दारांचा मेळावा अशी एकमेकांची खिल्ली दोन्ही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून उडवली. दोन्ही बाजूंनी तासभर एकमेकांवर यथेच्छ आरोप-प्रत्यारोप झाले.
आगामी लोकसभा निवडणुका पाहता, या वेळी ठाकरे आणि शिंदे यांनी आक्रमक भाषण केले. हातचे काही राखून न ठेवता हे दोघेही बोलले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मवाळ भूमिकेवर बोलणारेही कालच्या त्यांच्या भाषणानंतर प्रभावित झाले, तर एकनाथ शिंदे यांनी आता आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही हे आपल्या भाषणातून व्यासपीठावर बसलेल्या व समोर उपस्थितांपैकी शिवसैनिकांना भासवण्याचा प्रयत्न केला.
राज्यातील राजकीय परिस्थिती, सरकारविरोधात मराठा, धनगर, ओबीसींचा आक्रमक पावित्रा पाहता हे मेळावे यशस्वी होतात की फ्लाॅप? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण दोन्ही मेळावे यशस्वी झाल्यामुळे ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसैनिकांना मध्ये आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी उत्सहाचे वातावरण तयार झाले आहे.
No comments:
Post a Comment