Friday 24 November 2023

मराठी चित्रपटसृष्टीत ७०/८० चे दशक गाजवणाऱ्या चरित्र अभिनेते विलासराव रकटे यांची सर्वांकडूनच भयानक उपेक्षा, जीवन जगणे मुश्कील?

मराठी चित्रपटसृष्टीत ७०/८० चे दशक गाजवणाऱ्या चरित्र अभिनेते विलासराव रकटे यांची सर्वांकडूनच भयानक उपेक्षा, जीवन जगणे मुश्कील?

कल्याण, (संजय कांबळे) : तांबड्या मातीचे मैदान मारल्यावर चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आपल्या बलदंड शरीर, खर्जातील जबरदस्त पडदा व्यापणारा आवाज, करारी नजर आणि दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, अनंत माने, दादा कोंडके, दत्ता माने, कमलाकर तोरणे व डॉ जब्बार पटेल अशा मातब्बर दिग्दर्शकांच्या ७०/८० मराठी आणि १०च्या आसपास हिंदी चित्रपटात काम करून चरित्र अभिनेते म्हणून कलारसिकांच्या आठवणीतल्या कप्प्यात कायमस्वरूपी घर करून राहिलेल्या प्रतिभासंपन्न विलासराव रकटे यांची उतारवयात मात्र गावासह सर्वाकडूनच भयानक उपेक्षा झाली आहे. यामुळे त्यांचे जगणे मुश्किल बनले आहे. कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणा-या अशा गुणी अभिनेत्याला शासनाने वा-यावर सोडू नये अशी भावना त्यांच्या वर प्रेम करणाऱ्या चाहत्याकडून व्यक्त केली जात आहे.

विलास यशवंत रकटे यांचा जन्म ३० जुलै १९४५ रोजी कामेरी ता वाळवा जि सांगली येथे झाला. लहानपणीच वडीलांचा मृत्यू झाल्याने आई आक्काताई रकटे हिच्या वर कुंटूबाची जबाबदारी पडली, चुलते हैबती सखाराम पाटील यांनी यांनी शिक्षण व इतर जबाबदारी स्वीकारली, कामेरी येथे ७वीपर्यत शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षण इस्लामपूर व उच्च शिक्षण इंदूर युनिव्हर्सिटी मध्यप्रदेश झाले.बालपणापासून खेळाची आवड असल्याने कबड्डी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक, कुस्ती, यामध्ये अनेक बक्षिसे मिळवली, शाळा महाविद्यालयात अनेक नाटकामधून काम सुरू केले. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू लहान वयातच मिळाले.

कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापूर येथे गेल्यानंतर अनेक पैलवानांची ओळख झाली, बलदंड शरीरयष्टी यामुळे खाशाबा तालमितून कुस्ती चे धडे घेतले, डाव, प्रतिडाव यात तरबेज झाल्यावर विविध ठिकाणी नामांकित मल्लांबरोबर कुस्तीचे मैदाने गाजवली, मुंबई गोवा याही ठिकाणी कुस्तीचा डंका वाजत होता, हिंदकेसरी मारुती माने यांच्या सह मोठमोठ्या मुल्लांशी कुस्ती केली, मुख्यमंत्री, सह दारासिंग यांनी विलास रकटे यांचे कौतुक केलं. कुस्तीतील यशामुळे कामेरी ता वाळवा चे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले होते. गावाच्या यात्रेत कुस्ती सह वाटचुकली, वाहतो दुर्वाची जुडी, कुंटुब, मी उभा आहे, वेगळं व्हायच मला, मुंबई ची माणसं अशी नाटकं केली,यातून खलनायक साकारले होते.

आई आहे शेतात, हा पहिला चित्रपट केल्यानंतर मात्र डॉ जब्बार पटेल यांच्या 'सामना, या चित्रपटाने रकटे यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हा चित्रपट मैलाचा दगड ठरला, यानंतर चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, अनंत माने, दादा कोंडके, दत्ता माने,कमलाकर तोरणे अशा मातब्बर दिग्दर्शकांच्या चित्रपटात भूमिका साकारल्या, 'पांडू हवालदार' चित्रपटापासून ते दांदाच्या चमूत दाखल झाले. बोटं लाविन तिथं गुदगुल्या, रामराम गंगाराम, तुमचं आमचं जमल, या चित्रपटात त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली, गनिमी कावा, चित्रपटात थरारक तलवारबाजी करून अस्सल मोगल सुभेदार रंगवला.

त्या काळी चित्रपटांचा चेहरा पूर्णतः ग्रामीण असल्यामुळे रकटे यांच्या भूमिकाचा बाज देखील ग्रामीण ढंगाचा राहिला, फुकट चंबू बाबुराव, चोरावर मोर,गाव तस चांगल, पण वेशीला टांगल, निखारे, चांडाळ चौकडी, लक्ष्मी, सर्वसाक्षी, तांबव्याचा विष्णू बाळा, अंगारकी, सुळावरची पोळी, अश्या जवळपास ७०/८० मराठी चित्रपटात रकटे यांनी खलनायक साकारला, बहुतांश चित्रपटाचे चित्रीकरण आपल्या कामेरी गावातच केले. यामुळे गाव  देश विदेशात पोहचले, १९७०/८०चे दशकात विलास रकटे हे रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

आपले गाव दुष्काळाचे आहे, म्हणून रकटे यांनी  कामेरी येडेनिपाणी पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला, कृष्णा नदिचे पाणी इरिगेशन द्वारे आणन्यासाठी त्यांनी आपल्या ओळखीचा पुरेपूर वापर केला, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण निळूभाऊ फुलं यांना गावात आणलं, २०/३० किलोमीटर पाईपलाईन करून ओसाड गाव सुजलाम सूफलाम केले, आज २०/२२ हजार लोकसंख्या व १७ सदस्य असलेले कामेरी गाव हिरवेगार दिसत आहे त्याचे शिल्पकार विलास रकटे हेच आहेत. यासह अनेक लोकोपयोगी व जनहितार्थ कामे करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली, ऐवढेच नाही तर 'गाव तसं चागलं पण वेशीला टांगल,या चित्रपटात गावातील वाद, राजकारण यामुळे गावाची कशी वाट लागते हे दाखवून दिलं तसं स्वतः देखील आचरण केले. गावात निवडणूका नको, बिनविरोध व्हायला हव्यात म्हणून त्यांनी २० ते ३० वर्षे अंगाला गुलाल लावला नाही.

या योगदानाबद्दल विलास रकटे यांना व्ही शांताराम पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, वंसतदादा पुरस्कार, कला रत्न पुरस्कार, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्य पुरस्कार असे शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या पुरस्काराचा समावेश यामध्ये आहे.

करारी नजर, बलदंड शरीरयष्टी, खर्जातील पडदा व्यापणारा आवाज, आणि आवेशपूर्ण अभिनयाच्या जोरदार रकटे यांनी संत्तर ऐंशीचे दशक गाजवलं, मराठी चित्रपटसृष्टी मर्यादित असताना चित्रपटाचे बजेट मर्यादित, वितरणात अनंत अडचणी, सर्वदूर पसरलेल्या प्रेक्षकापर्यत चित्रटप पोहचवणे अशी आव्हाने असताना ग्रामीण भागातील रांगडा कलाकार विलास रकटे चित्रपटसृष्टीत भक्कम उभा राहिला. खलनायक, चरित्र अभिनेता अशी इमेज असली तरी नायक म्हणून त्यांनी अन्याय व प्रतिकार या दोन चित्रपटात भूमिका केल्या, या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शक रकटे यांनी च केले होते. यासाठी त्यांनी ५ लक्ष रुपये घेतले होते.१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रतिकारक ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.आ चित्रपटात डॉ श्रीराम लागू, शरद तळवलकर, निळू फुले, अलका कुबल, असे दिग्गज कलाकार यामध्ये होते, उन्मत पुढा-याना धडा शिकवणारा  रणजीत  लक्षवेधी ठरला, पुढे १० वर्षानी 'प्रतिडाव,ची निर्मिती केली पुन्हा आघाडीच्या कलाकाराची फळी दिसली, पण या चित्रपटाचे म्हणावे तेवढे कौतुक झाले नाही, याचा परिणाम असा झाला की, कर्जाचा डोंगर उभा राहिला, ५ लाखाचे ३० लक्ष द्यावे लागले, शिवाय मुंबई चा बंगला विकला, गावाची शेती गेली, उपासमारीची वेळ आली‌.

सध्या विलास रकटे यांचे ८० ते ८५ वय आहे, दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, औषधोपचार सुरू आहे, वैद्यकीय खर्च परवडत नाही, शासनाच्या २/३ हजार रुपये मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर कसातरी घरखर्च चालतो आहे, पत्नी अरुणा यांना ही मणक्यांचा आजार आहे, एकूणच जीवन जगणे मुश्कील बनले आहे. रकटे कुंटूबीय हे स्वातंत्र्य आंदोलनात  व चलेजाव चळवळीत सक्रिय सहभागी झाल्याने सांगली, सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनातील क्रातीसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, राजाराम बापू पाटील, यशवंतराव चव्हाण, वंसतदादा पाटील, पांडू मास्तर, आदीचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान सांगणारा 'क्रांतीपर्व, या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, लेखन पुर्ण झाले आहे. पण केवळ आर्थिक अडचणी मुळे हे साहित्य धुळखात पडले आहे. नव्या पिढीला क्रांतिकारकाचे योगदान कळावे, समजावे, हा उद्देश या मागचा आहे, पण तो सध्या साध्य होईल असे वाटत नाही.

सध्याचा मराठी चित्रपट सातासमुद्रापार पोहचला आहे ढिगभर चँनेल आणि मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट वाजत गाजत आहे. या काळात शेकडो कलाकार आले अन् विस्मरणात गेले. मात्र आपल्या जरबयुक्त आवाजाने पडादा व्यापणारा,करारी नजर, बलदंड शरीर आवेशपूर्ण अभिनयामुळे विलास रकटे नावाचा प्रतिभासंपन्न अष्टपैलू कलाकार आठवणींच्या कप्यात राहिला. खरे सांगायचे तर अभिनेते विलास रकटे यांचे चित्रपट, कला क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अमुल्य योगदान, कामेरी गावाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे केलेले काम, जपलेली सामाजिक बांधिलकी, याचा विचार केला तर या परिसरात उदयास आलेली कारखादारी, वाढलेले विविध उद्योग, राजकीय पुढारी, नेते, शासन,चित्रपट निर्मिती संस्था, पतपुरवठा संस्था, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाव या सर्वांना ठरविले, निश्चय केला तर या अष्टपैलू, प्रतिभासंपन्न चरित्र अभिनेत्याच्या आयुष्यात 'आर्थिक, ओलावा निर्माण करु शकत नाही का?क्रांतीपर्व, हा चित्रपट तयार होऊन प्रदर्शित व्हावा हि एकच आशा रकटे यांची आहे, ती पुर्ण होईल का?स्वतः ची पाठ थोपटून घेण्यासाठी शासन लाखो रुपये जाहिरातबाजीवर खर्च करत आहे, ते हा आपला अमुल्य ठेवा जपून ठेवण्यासाठी पुढाकार घेईल का? अन्यथा, जुनं ते सोनं, ही म्हण नामशेष होईल, एवढे नक्की !

1 comment:

  1. जबरदस्त खलनायक पण इतके हलाखीचे जीवन खुप वाईट घटना

    ReplyDelete

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...