उल्हासनगर महानगरपालिकेसमोर भर पावसात दिव्यांगांच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन !!
** साहित्य घोटाळा व मूलभूत हक्क यासाठी प्रहार संघटना आक्रमक
उल्हासनगर, प्रतिनिधी :
दिव्यांगांना मागील २० वर्षांपासून एकही स्टॉल दिला नसल्याने व दिव्यांग कायदा २०१६ च्या उल्लंघनाचा निषेध म्हणून आज उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती आणि राष्ट्र कल्याण पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन पार पडले.
प्रमुख मागण्या:
• दिव्यांगांना स्टॉल वाटपाबाबत तात्काळ कारवाई
• दिव्यांगांना मोफत बससेवा उपलब्ध करणे
• दिव्यांग साहित्य खरेदीतील घोटाळ्यावर तात्काळ कारवाई
दिव्यांग बांधवांनी तब्बल २.५ तास ठिय्या आंदोलन करत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मात्र महानगरपालिकेच्या महिला आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे आणि असंवेदनशीलतेमुळे दिव्यांगांचे संतापाचे रूप चक्का जाममध्ये बदलले. भर पावसात रस्त्यावर ठिय्या देत दिव्यांगांनी सरकार व प्रशासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला.
यावेळी मा. सहायक पोलिस आयुक्त आणि मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक (मध्यवर्ती पो.स्टे.) यांच्या मध्यस्थीने अतिरिक्त आयुक्त श्री. चव्हाण यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील निर्णय जाहीर करण्यात आले :
• दिव्यांगांना स्टॉल वाटपासाठी एक महिन्यात सर्वेक्षण करून जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
• दिव्यांग साहित्य खरेदीतील घोटाळ्यावर कारवाई प्रस्तावित आहे याबाबतचे लेखी आश्वासन आंदोलकांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व श्रीमती काजल नाईक, ॲड. स्वप्निल पाटील, श्री शैलेश तिवारी, निलेश जाधव आणि श्री प्रधान पाटील यांनी केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे उल्हासनगर महापालिकेत ८०० रुपयांची काठी तब्बल १२,००० रुपयांना खरेदी करणाऱ्या महिला आयुक्तांना “राज्यात प्रथम क्रमांक” कसा मिळाला, हा प्रश्न दिव्यांगांच्या मनात ठसठसत आहे.
No comments:
Post a Comment