भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड, नवी मुंबई तर्फे आयोजित बेमुदत धरणे आंदोलनला २८ एप्रिल रोजी होणार एक वर्ष पूर्ण !!
विविध मागण्या साठी सतत अखंडितपणे पाठपुरावा सुरु.
विविध मागण्यासाठी शेतकरी प्रकल्पग्रस्त एकत्र.
उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
दि. २८ एप्रिल २०२५ पासून नवी मुंबई मधील बेलापूर सिडको भवनच्या गेटसमोर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) रायगड, नवी मुंबई तर्फे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे त्याला आता २८ एप्रिल २०२६ रोजी १ वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त सिडको भवन समोर आंदोलनाचा वर्षपूर्ती कार्यक्रम मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दूपारी २.०० वा. सिडको भवनच्या गेटवर आयोजित केला आहे. या वर्षपूर्ती कार्यक्रमास सर्व प्रकल्पग्रस्त, शेतकरी, भूमीपुत्रांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)रायगड, नवी मुंबई तर्फे करण्यात आले आहे.
सिडकोने रायगड, नवी मुंबई मधील जमिनी घेवून तुमचा विकास करतो अशी आशा दाखवून स्वतःचाच विकास केला. मात्र येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त गावाभोवती होणाऱ्या विकासाला स्वतःचा विकास समजू लागला.प्रस्थापित राजकीय पक्षांचे पुढारी सिडकोचे ठेकेदार व दलाल बनून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे न राहता सिडकोच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे सिडकोची ताकद वाढली. शेतकऱ्यांच्या जमिनी घेवून स्वतःचाच विकास केला. शेतकऱ्यांच्या लढयातून मिळालेले १२.५% चे प्लॉट देण्यास सिडको गेली कित्येक वर्षे टाळाटाळ करीत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सुध्दा वाढीव पेमेंट देण्यास सिडको टाळाटाळ करीत आहे. वाढीव गावठाणे अतिक्रमित, अनधिकृत ठरवून पाडण्याच्या नोटीसा कोर्टाकडून आणत आहे. हया सर्व प्रश्नांच्या विरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)रायगड, नवी मुंबई तर्फे दि. २८ एप्रिल २०२५ पासून नवी मुंबई मधील बेलापूर येथील सिडको भवनच्या गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनातील मागण्या या सर्व शेतकरी, प्रकल्पग्रस्त जनतेच्या आहेत, प्रत्येक गावाच्या प्रत्येक घरातल्या आहेत. तेव्हा हे आंदोलन पुढे नेण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी हया लढयात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एक वर्ष पूर्ण होऊनही शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अजूनही पूर्ण न झाल्याने शेतकरी व प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
सी.आय.टी.यू., अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी. वाय. एफ. आय.आदी संघटणेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील या आंदोलनात सुरवातीपासून सहभागी आहेत. त्यांचे सुद्धा योगदान या उपोषणाला लाभले आहे.
कोट (चौकट ):-
: मागण्या :
१) गरजेपोटी घरांवरील तोडक कारवाई त्वरीत थांबवा.
२)१२.५% योजनेच्या भूखंडाचे त्वरीत वाटप करा.
३) १२.५% भूखंड प्रकरणी मावेजाची आकारणी रद्द करा.
४) वाढीव नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत अदा करा.
५)सप्टेंबर २०२४ च्या गरजेपोटी जी. आर. ला विरोध करा.
६) १२.५% पात्रतेतून कापलेले बांधकामाचे प्लॉट परत करा.
No comments:
Post a Comment